पाच वर्षांचा गणेश आणि इवल्याशा सव्वा वर्षाच्या दुर्गाला सुमित्राच्या पदरात टाकून शामरावांनी आत्महत्या केली.
जेमतेम दोन एकर शेती, त्यात ही पिके पाहिजे तशी आली नाही, डोक्यावर कर्ज. कसं बसं दोन वेळा पोटात अन्न जाई. शेताजवळ एका झोपडीत गणेश, दुर्गा, शामराव, सुमित्रा आणि म्हातारी आजी राहायचे. शामराव अचानक गेल्याने घरावर संकट कोसळले. सुमित्रा झाल्या प्रकाराने हादरली, काय करावे काही सुचेना. आजी आणि पदरात लहान मुलं अशा वेळी संसार कसा सांभाळावा या विचाराने सुमित्राला रात्र रात्र झोप लागेना. कुणाकडून मदतीची अपेक्षा नव्हतीच. भेटायला येणारा प्रत्येक जण सांत्वन करीत असे पण शेवटी ज्याचे त्यालाच बघावे लागते.
सुमित्रा मनातून खचून गेली असली तरी डोळ्यापुढे दोन लेकरांना बघून पदर खोचायला पाहिजे हे तिने ओळखले. शामरावांना ती शेतीच्या कामात मदत करत असे पण एकटीने गाडा सांभाळायचा म्हणजे कठीणच.
गावच्या सरपंचांनी मदत करून सरकारकडून लाख रुपयांची मदत जाहीर केली. तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारत कसे बसे ते लाख रुपये पदरात आले पण कर्ज ही डोक्यावर होतेच. बघता बघता पावसाळ्याची चाहूल लागली. गणेश ला गावच्या शाळेत दाखल केले.
सुमित्रा ने दोन एकर पैकी एक एकर जमीन कर्ज फेडण्यासाठी विकली. उरलेल्या एक एकरात पालेभाज्या, फुलांची लागवड केली. आलेली पालेभाजी बाजारात विकून थोडा फार पैसा मिळायला सुरुवात झाली. गाडी जरा रुळावर येत आहे असं चिन्ह दिसत असतानाच मुसळधार पावसामुळे होतं नव्हतं सगळं वाहून गेल. सुमित्रा पुन्हा एकदा काळजीत पडली पण हिम्मत हारली नाही.
पावसाचा खेळ सुरू होताच पण शक्य ते प्रयत्न करत वांगी, मिरची, टमाटर, पालक, कोथिंबीर, भेंडी अशा अनेक भाज्या शेतातून घ्यायला सुरुवात केली.
झेंडूच्या फुल झाडांची लागवड केली, श्रावण महिन्या पासून व्रत, सणवार असल्याने फुलांची मागणी चांगली असते तेव्हा भाज्या आणि झेंडूच्या फुलांची जोरावर कसं बसं घर चालवलं. वेळ मिळेल तसा आजूबाजूच्या शेतावर कामाला जायची. मुलगा गणेश आणि आजीच्या मदतीने तालुक्यातील बाजारात भाज्या , फुल विकायची. दुर्गा लहान असल्याने तिला सांभाळून घर चालवताना, संसाराचा गाडा चालवताना सुमित्राला खूप खस्ता खाव्या लागल्या. मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडही सुरू. अशातच म्हातारी आजी आजारी पडली आणि देवाघरी गेली. नाही म्हंटले तरी दुर्गाला सांभाळून बाजारात फुले, भाजी विकायला आजीची चांगली मदत व्हायची.
आजीच्या जाण्याने पुन्हा एकदा सुमित्रा पोरकी झाली. गणेश त्यावेळी चौथ्या वर्गात होता. आता घरी सगळी जबाबदारी सुमित्रा वर पडली. गणेशला आईची धावपळ दिसत होती, जमेल तशी मदत तो करायचा. अशातच त्यावर्षी ओल्या दुष्काळाने हाती काही लागले नाही आणि होती नव्हती ती एक एकर जमीन सुद्धा विकावी लागली. आता दुसर्यांच्या शेतात मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय सुमित्रा करू लागली पण काम ठराविक वेळीच मिळायचे तेव्हा इतर वेळी कुणापुढे हात पसरायला वेळ येवू नये म्हणून मिळालेल्या पैशातून जरा बचतही करावी लागे. दोन लहान मुलांना घेऊन एकटीने जगणं सोपं नाही हे तिला क्षणोक्षणी जाणवत होते.
क्रमशः
कथेतील परिस्थिती ही आपल्या देशात सत्य परिस्थिती आहे. कर्ज बाजारी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते.
सुमित्रा मुलांचा भार सांभाळत त्यांचे आयुष्य सुखी करण्यासाठी जी धडपड करते, त्याची ही कहाणी.
पुढे सुमित्रा संसार, मुलांची जबाबदारी कशी सांभाळते हे लवकरच जाणून घेऊया पुढच्या भागात.
© अश्विनी कपाळे गोळे