जन पळभर म्हणतील हाय हाय….

Inspirational-Relations

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय ?

कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत.

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?

अगदी खरंय, आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं  आहे, कुणाचं आयुष्य किती कुणालाच माहीत नाही. काही विपरीत घडले तर कुणाला काय फरक पडतो हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

खरंच विचार केला तर फरक हा पडतोच आणि तो म्हणजे आपल्या आई वडीलांना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, आपण आई वडील होतो तेव्हा जाणवतं की आपल्या आई वडीलांना आपल्याला इथवर पोहोचवताना किती खस्ता खाव्या लागल्या असणार. आपल्या पदरात मुलबाळ असताना आपल्यावर चुकून वाईट प्रसंग ओढावला तर खरंच फरक पडतो त्या इवल्याशा जीवाला. आई वडील दोघांचीही गरज असते मुलांना‌ जशी आपल्याला अजूनही वाटते.
इतर नातलगांना मात्र दोन दिवसाचे दु:ख होते आणि परत ते आपापल्या कामी लागतात. निसर्गाचा नियम आहे तो, अपवाद फक्त आई वडील आणि मुले.

अनेक बातम्या कानावर पडतात, अपघात, आत्महत्या, हिंसा, आजारपण त्यामुळे ओढावलेला मृत्यू…ते ऐकताच प्रश्न पडतो जाणारा जातो पण त्या जन्मदात्या ला, त्यांच्या मुलाबाळांना किती बिकट परिस्थितीतून जावे लागत असेल, मनात शेवट पर्यंत एक दु:खाची सल कायम राहत असेल ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतील पण काही गोष्टींची काळजी घेत आपण आनंदाने आयुष्य जगणे कधीही चांगले.

नवरा आणि बायको यांच्यातलं नातं म्हणाल तर तेही पूनर्विवाह करून आपल्या आयुष्यात गुंतल्या जातात पण अशा वेळी मुलांची मनस्थिती काय असते हे त्यांचं त्यांनाच कळत असावं.

या जगात कुणीच कुणाचं नसतं, ज्याचं त्यालाच पहावं लागतं.  गेल्यावर दोन दिवस गोडवे गाणारे अनेक असतात पण जिवंतपणी कौतुक करणारे मोजकेच.

आई वडीलांची उणीव ही कुणीही भरून काढत नाही.  म्हणूनच कुणाकडून  काहीअपेक्षा  न बाळगता स्वतः ची काळजी स्वतः घेणे कधीही फायद्याचेच, स्वतः साठी, आई‌वडिलांसाठी आणि मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी.

काय मग , पटतंय ना.  स्वतः ची काळजी घ्या,  तंदुरुस्त रहा, बिनधास्त राहून आनंदाने आयुष्य जगा…हसत रहा…हसवत रहा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed