ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे.

रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
टपोरे डोळे, निरागस चेहरा, नाजुक अंगकाठी, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट असलेली रिया अनिकेतला बघता क्षणीच आवडते.
अनिकेतही तिच्या तोलामोलाचा, आकर्षक अशी पिळदार शरीरयष्टी, दिसायला राजबिंडा. अनिकेत आई बाबांना एकुलता एक, त्यामुळे अतिशय लाडका. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. स्वभावाने प्रेमळ पण आई म्हणेल ती पूर्व दिशा अशा काहीशा विचारांचा.
दोघांचे लग्न ठरले, दोन्ही कुटुंबे अगदी धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीला लागले होते. काही महिन्यांनी लग्न झाले.
दोघांचे लग्न ठरल्यापासून रियाला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं त्याला.
लग्न ठरल्या पासून  लग्न होत पर्यंत तो दररोज रियाला न चुकता भेटायचा. रियाचे ऑफिस जवळच असल्याने रोज सायंकाळी तिला भेटणे सोपे होते. रियालाही त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं, त्याच रोज भेटणं , एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणं तिला खूप सुखद वाटायचं. तिचा शांत , प्रेमळ स्वभाव , निरागस असं सौंदर्य याचे कौतुक करताना तो कधीच थकत नव्हता.  दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले होते, लग्न झाल्यावर ती घरी आली तेव्हा त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
तिला नववधू च्या रूपात बघून त्याची परत एकदा विकेट उडाली होती. घरत बरीच पाहुणे मंडळी असताना लपून छपून तिच्याशी बोलायला यायचा, तिची झलक बघायला सतत बहाणा शोधायचा. सगळे चिडवत म्हणायचे सुद्धा,  याला काही चैन पडत नाही बाबा बायको चा चेहरा बघितल्या शिवाय. पूजा विधी सगळं आटोपलं, पाहुणे मंडळी परत गेली. राजा राणीच्या संसाराला प्रेमाने सुरवात झाली. दोघांची पहिली मिलनाची रात्र तिला अजुनही आठवते,  किती उत्साहाने त्याने सगळी तयारी केली होती त्याने , ते खास क्षण अविस्मरणीय बनविण्याची. आयुष्यात कधी साथ सोडणार नाही म्हणत हातात हात घेतला तेव्हा किती सुरक्षित वाटलं होतं..किती गोड्या गुलाबी ने दोघांचा संसार सुरु झाला होता. एकत्र ऑफिसला निघायचं, मौज मजा मस्ती, भरभरून प्रेम, किती गोड दिवस होते ते. झालं ते नव्या नवलाईचे नवं दिवस भुर्रकन उडून गेले, जणू कुणाची दृष्ट लागली दोघांच्या प्रेमाला. अनिकेत चे आई बाबा दुसऱ्या गावी राहत असले तरी अनिकेत ची आई सतत त्याला फोन करायची, घरी आलास का, इतका वेळ बाहेर कशाला फिरायचे, बायको डोक्यावर बसेल, जरा धाकात ठेव असेही सल्ले द्यायचे. त्याचे बाबा मात्र या सगळ्याच्या विरोधात, ते उलट सांगायचे नविन आयुष्याची सुरवात  आहे, खूप एन्जॉय करा पण बाबांनी आईला क्रॉस केले की अनिकेत ची आई मोठा ड्रामा करायची.

जेव्हा रियाला हे सगळं कळालं तेव्हा सासूबाईंच्या विचारांची तिला कीव आली. मुलगा सुनेचा संसार आनंदाने चाललेला जणू त्यांना बघवत नव्हते की आपला मुलगा आपल्या पासून दूर जातोय अशी असुरक्षितता, एक प्रकारची भिती त्यांना वाटत होती, कोण जाणे.

एकत्र राहत नसले तरी सतत फोन करून अनिकेत ला आई सगळे अपडेट विचारायची. अनिकेत सुद्धा त्यांना एकुण एक लहानसहान गोष्टी सांगायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण हळूहळू सगळं विचित्र वाटत होतं रियाला. ती याबाबत अनिकेतला काही बोलली की त्याला वाटायचं रियाला माझे आई बाबा नकोय, दूर राहतात तरी इतक्या तक्रारी करते ही.. झालं अशा गोष्टींवरून वाद सुरू झाले. लग्नाला एक वर्षही झाले नव्हते,  अशाच गोष्टी वरून एकदा दोघांचा वाद झाला आणि रिया रागारागाने आई कडे निघून गेली. रियाचे आई बाबा त्याच शहरात राहायचे तेव्हा राग शांत झाला की अनिकेत नक्कीच घ्यायला येणार याची तिला खात्री होती पण झालं वेगळंच. अनिकेतने रिया अशी निघून गेल्याचा राग मनात धरून ठेवला, मी का माघार घ्यावी म्हणत त्यानेही पुढाकार घेतला नाही. अनिकेत चे आई बाबा त्यादरम्यान त्याच्याजवळ रहायला आले.
इकडे रिया त्याची वाट बघत एक एक दिवस मोजत होती आणि तिकडे आईच्या सल्ल्याने, धाकाने अनिकेत काही रियाला घरी आणण्याचा पुढाकार घेत नव्हता. अनिकेत चे बाबा त्याला खूप समजवायचा प्रयत्न करायचे, आईचं ऐकून दोघांमध्ये फूट पडू नये म्हणून प्रयत्न करायचे पण आईपुढे काही अनिकेत ठाम भूमिका घेत नव्हता.
रिया ची आई तिला समजून सांगायची पण तो घ्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही या रियाच्या निर्णयामुळे आई बाबांचे काही एक चालत नव्हते शिवाय अनिकेत आणि त्याच्या घरच्यांची विचित्र विचारसरणीची कल्पना तिने घरी दिल्यावर रियाच्या बाबांनाही अनिकेत चे वागणे पटले नव्हते. अशातच एक दिवस अचानक अनिकेत कडून डिव्होर्स नोटीस आली आणि रिया हादरली.

नवरा बायको यांच्यात भांडण, मतभेद हे होतातच पण असं अचानक डिव्होर्स नोटीस बघताच रियाला काही कळत नव्हतं, अनिकेत विषयी आधी जरा राग मनात होताच पण आता त्याच्या अशा वागण्याने तिला अजूनच संताप आला. त्याला , त्याच्या घरच्यांना मी नको असेल तर मलाही जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात परत जायचं ना नाही असा विचार करून ती आई बाबांकडे राहू लागली. 
अशातच सहा महिने गेले आणि आज अचानक अनिकेत रियाला भेटला.

अनिकेत रियाला सांगू लागला, “रिया अगं तू अशी रागात निघून गेली तेव्हा माझी खूप चिडचिड झाली, राग मलाही आलेलाच. तुला माझ्या घरच्यांशी प्रोब्लेम आहे असं मला वाटलं, माझं खरंच चुकलं रिया. तू निघून गेल्यावर आई बाबा आले, त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा बाबांनी मला तुला परत आणण्यासाठी खूप समजावले पण आईला ते मान्य नव्हते. आईला वाटत होतं मी तुझ्यामध्ये खूप गुंतल्या मुळे तिला मी विसरतो की काय..आईचा खूप लाडका ना मी म्हणून कदाचित तिच्यापासून दूर जाण्याची भिती तिला वाटली असावी. तुझ्याविषयी का माहित नाही पण एक राग, चिड तिने मनात धरून ठेवली. मी खूप गोंधळलो, आई बाबा आणि बायको प्रत्येकाची आयुष्यात एक वेगळी जागा असते हे मला खूप उशीरा कळलं. मला निर्णय घेता येत नव्हता, तुझ्या शिवाय एकटा पडलो होतो मी, मनात सतत कुढत होतो पण मनातलं सगळं बोलून दाखवता येत नव्हतं मला, तुझी खूप आठवण यायची पण तुला कसं सामोरं जावं कळत नव्हतं शिवाय आई परत ड्रामा करेल , चिडेल म्हणून वेगळाच धाक. अशातच मला कंपनीतर्फे विदेशात जाण्याची संधी चालून आली. आई म्हणाली वेळ गेली, राग शांत झाला की तू स्वतः परत येशील, तिला राहू दे काही दिवस माहेरी, तू ही संधी सोडू नकोस. झालं, परत मी भरकटलो, मला खूप मनापासून वाटत होतं तुला ही बातमी सांगावी पण त्या दरम्यान तुझ्या आई बाबांनी मला तुला भेटू दिले नाही, त्यांना माझा राग आलेला. तूसुद्धा फोन उचलले नाही. मी सहा महिन्यांसाठी लंडनला गेलो. कामाच्या, नविन प्रोजेक्टच्या व्यापात गुंतलो. तुझी आठवण सतत यायची, तुला मेसेज केले पण तू मला उत्तर देत नव्हती. आपल्यात काही कम्युनिकेशन राहीले नव्हते आणि म्हणूनच गैरसमज निर्माण झाले.
इकडे आईने बाबांना असं सांगितलं की रियाला अनिकेत सोबत राहायची इच्छा नाही. आपल्या घरच्यांमध्येही गैरसमज झालेले त्यामुळे आईने त्या संधीचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीने तुला डिव्होर्स नोटीस पाठवली आणि परिस्थिती अजूनच बिघडली. मी परत आलो तेव्हा बाबांकडून मला सगळं कळालं, पण तू माझ्यासोबत राहायला तयार नाही यावर माझा विश्वास नव्हता. तुला डिव्होर्स नोटीस पाठवली हे ऐकून मला मोठा धक्का बसला, खूप रडलो मी बाबांजवळ, पण त्याक्षणी माझे डोळे उघडले. आईच्या संकुचित स्वभावामुळे आपल्या सगळ्यांमध्ये गैरसमज झाले, आपल्या दोघांमध्ये फूट पडली. मला कळून चुकलं की माझी ठाम भूमिका नसल्याने आपल्या नात्यात विष पसरलं. आई, बाबा आणि बायको प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात घेऊन मी नातं जपलं असतं तर अशी वेळ आली नसती. पण रिया अजूनही वेळ गेलेली नाही, मला तू हवी आहेस. मला एक संधी दे..परत असं नाही होणार..मी तुझाच आहे आणि तुझी साथ मी नाही सोडणार..मला माफ कर रिया.. प्लीज मला माफ कर.. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..गेले सहा महिने जो दुरावा निर्माण झाला त्यामुळे मला खरंच माझ्या प्रेमाची जाणीव नव्याने झाली आहे मला..”

हे सगळं ऐकून रियाला काय बोलावं कळत नव्हतं, तिचं खरंखुरं प्रेम होतं त्याच्यावर. दोघेही वेगळे राहून मनोमन कुढत, रडत होते पण मीपणा, गैरसमज यामुळे पुढाकार कुणी घेत नव्हते.
रिया काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.
अनिकेत तिला म्हणाला , ” रिया मी तुझ्या आई बाबांशी बोलून माफी मागतो, तुला मानाने आपल्या घरी परत घ्यायला येतो..आई ला बाबांनी समजावले आहे, तिचा स्वभाव बदलला नाही तरी मी यापुढे कधीच साथ सोडणार नाही. बाबा आणि मी तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सुट्टी आहे, मी घ्यायला येतो तुला, आपल्या हक्काच्या घरी घेऊन जायला. मला खरंच एकदा माफ कर.. खूप प्रेम आहे रिया माझं तुझ्यावर..”

रियाने अश्रू पुसत मानेनेच त्याला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते. अनिकेत ने रियाचा हात हातात घेतला त्या क्षणी तिला त्यांच्या लग्नानंतर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तोच स्पर्श, तिच भावना आता नव्याने जागी झाल्याची तिला जाणीव झाली.रियाच्या आई बाबांना या गोष्टीचा आनंदच होईल हे तिला माहीत होते.
तिलाही हेच हवं होतं. त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने त्याला माफ केलं. दोघांचे नाते आज परत एकदा नव्याने बहरले.
किती तरी वेळ ते हातात हात घेऊन शब्दाविना बरेच काही बोलले.

दूर राहून त्यांच्यातील नातं आज अजूनच घट्ट झालं आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.

खरंच बर्‍याच जणांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नवरा बायको यांच्यातील नात्यात गैरसमज, मतभेद यामुळे फूट पडते. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घेतले, ठाम भूमिका घेऊन विश्वास जपला तर नातं तुटण्या ऐवजी जोडल्या जाईल. अनिकेत ला उशीरा का होईना पण त्याच्या चुकीची जाणीव झाली, आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात आलं म्हणून दोघांचे नाते नव्याने बहरले.

समाप्त.

हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed.

Free Email Updates
We respect your privacy.