आठवणी पावसाच्या… बालपणीच्या…

“ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा…
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा…”

हे बालगीत ऐकण्यात अख्खं बालपण गेलं. आजही पावसाळ्याचे वेध लागले की हिच कविता मनात कुठेतरी गुणगुणायला होते, आता तर माझ्या लहान मुलीमुळे परत एकदा त्या बालपणात शिरून हि कविता ऐकायला, बघायला मज्जा येते.

 रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस आला की येणारा मातीचा तो सुगंध, त्याला कशाचीही तोड नाही. बालपणी पहिला पाऊस बघताच म्हणावं वाटायचं,

” ये आई , मला पावसांत जाउं दे …
एकदाच ग भिजुनी मजला चिंब चिंब होउं दे…..
मेघ कसे हे गडगड करिती , विजा नभांतुन मला  खुणविती….
त्यांच्यासंगे अंगणांत मज खुप खुप नाचुं दे….”

पहिला पाऊस आला की अगदी वातावरणाला शांत करत एक प्रसन्न सुवास दरवळत असतो.

  पावसाचं आणि आठवणींचं एक वेगळंच नातं आहे ना, कुणाला आठवतं पहिलं प्रेम तर कुणाला शिरतं बालपणीच्या आठवणीत.

  पाऊस आला की डोळ्यापुढे येतात गरमागरम भजी, पोटॅटो वेजेस, गाडी वर मिळणारं मक्याचं कणिस म्हणजेच बुट्टा आणि कडक चहा, काॅफी. त्यात आपली जवळची व्यक्ती सोबत असेल तर त्यात एक वेगळीच मजा. मनात मग गुणगुणायला होतं,

“आला आला वारा संगे पावसाच्या धारा…
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा…”

  बालपणी पाऊस म्हंटलं की शाळेत अगदी मज्जाच मज्जा. शिक्षकांच्या शिकविण्याकडे कुणाचही लक्ष लागत नसे, वर्गातून बाहेर पाऊसाचं निरीक्षण करण्यात वेगळाच आनंद मिळायचा. मग वर्गाच्या बाहेर वर्‍हांड्यात उभे राहून तळहातावर पावसात पाणी टिपण्याचा प्रयत्न आनंदाने सुरू. शाळेतून घरी जाताना पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी होती. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत वह्या पुस्तके गुंडाळून पाठीवरच्या दप्तरात ठेवायचे म्हणजे ते भिजण्याची काळजी नको आणि मग छत्री असूनही बिनधास्त पाणी उडवत घरी जाण्याचा आनंद म्हणजे अगदी दुर्लभ अनुभव.

भिजून घरी गेल्यावर आईने रागवले की लाडात येऊन पटापट कपडे बदलत आई जवळ काही तरी छान पदार्थ बनवण्यासाठी आग्रह करायचा आणि आईला रागावली असली तरी भिजून अंगात थंडी भरली असेल म्हणत असला तरी मस्त गरमागरम काहीतरी खाऊ आई बनवायची ते खाण्याची मजा काही औरच.

शाळा कॉलेज मध्ये असताना सकाळी संततधार पाऊस असला की सुट्टी नक्कीच ठरलेली. मग दिवसभर घरातल्या घरात बसून झोपून का असेना.
त्यात मग मस्त गाणी कानावर पडली की आनंदी आनंद.

पावसात ट्रेकिंगची मज्जा म्हणजे स्वर्गसुख. निसर्गाच खुललेलं सौंदर्य बघायला भटकंती करण्यात वेगळीच मजा.
तारुण्यात पावसाची वेगळीच ओढ, मित्र मैत्रिणी सोबत मस्त कुठे तरी फिरण्याचा बेत आखून मनसोक्त भिजायचे, मज्जा मस्ती करायची. एखादा ट्रेकिंग ग्रुप जॉईन करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जायचं, धबधब्याखाली भिजायचं आणि त्या आठवणी फोटो सोबतच मनात टिपून ठेवायच्या.

आता कधी पाऊस आल्यावर आॅफिसला दांडी मारली की अगदी शाळेची आठवण येते. त्यात मात्र तो आधी सारखा आनंद नाही शिवाय जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर पावसाची मज्जा घेण्याचा जणू विसरच पडला आहे. बाहेर चिकचिक आहे तेव्हा सुट्टी असली तरी घरातच बसलेले बरे असं काहीसं झालंय आता पण तरीही पहिला पाऊस पडताच मनोमन  एक समाधान हे मिळतेच.

नवविवाहित जोडप्याला तर पहिला पाऊस अतिशय रोमांचक अनुभव असतो. अविस्मरणीय दिवस असतात ते.

काहींना पावसात आपलं प्रेम आठवतं. त्याच्या/तिच्या गोड प्रेमळ आठवणी. कुणी विरह आठवून रडकुंडीला येत जणू पावसाच्या निमीत्ताने रडून मन मोकळं करतं.

  बळीराजा तर पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, त्यांचं अख्खं आयुष्य या निसर्गावर तर अवलंबून असतं. सुरवातीला पाऊस हवाहवासा वाटतो पण पेरणी झाल्यावर अतिवृष्टी झाली की त्याच्या मनाला हुरहूर लागून राहते. काही ठिकाणी महापूर येत संसार मोडतात, स्थलांतर होतं तर कधी कुणाला जीव गमवावा लागतो. कुणी पावसाचा आनंद घेत उत्साहात असतो तर कुणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची काळजी करत.

  लहानपणी पावसाची मज्जा वाटायची पण आता मात्र पाउस आला की आॅफिसमधून लवकर काम संपवून निघण्याची गडबड कारण पाऊस आला की ट्राफीक जाम, सगळीकडे पाणीच पाणी, मग घरी पोहोचायला उशीर, या सगळ्यात पावसाचा आनंद घेणे बाजूला राहून जाते. पाऊस आला की इलेक्ट्रिसिटी बंद, अगदी ठरलेली गम्मत. मग घाईघाईने इलेक्ट्रिसिटी असे पर्यंत घरातील महत्वाची कामे आवरण्याची लगबग त्यात कपडे वाळविण्याची काळजी.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पावसाच्या वेगवेगळ्या आठवणी मनात आपसूकच कोरल्या जातात. कधी एकटं बसून चहा कॉफी घेत पाऊस बघत बसलं की आठवतात या सगळ्या पावसातील गमतीजमती आणि मग चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आपसूकच उमटतं. 

तुमच्या आयुष्यात पावसातल्या अशा आठवणी असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा.

– अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed.

Free Email Updates
We respect your privacy.