नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

    शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”

    धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवता जा बरं दोघेही. मुलांचं आवरून त्यांना बस मध्ये बसवून शुभदा आली तसच नवरोबा म्हणाले, “अगं काल झोपण्यापूर्वी बघत बसलेलो ती फाइल कुठे आहे माझी..इथेच तर होती..” शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाइल सापडली. ती त्याच्या हातात फाइल देत म्हणाली, ” रात्री आवरून ठेवायला काय होते हो..अस सकाळी सकाळी गडबडीत हे कुठेय ते कुठेय…मी काय काय बघायचं..समोरची उशी सुद्धा उचलून बघत नाही…नुसता वैताग माझ्या जीवाला..”

त्यावर महाशय तिला म्हणाले, “अगं आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामचं असतो ना..मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं..”

आराम आणि मला…शुभदा‌ ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली, “दिवसभर किती काम पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना… वरून म्हणायला मोकळे की तू आता आधी सारखी उत्साही राहीली नाहीस… हसतखेळत वावरत नाहीस..माझं मलाच ठाऊक किती दमून जाते मी सगळं आवरता आवरता..”

शेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात‌ डबा देत बाय केले आणि मनात काही तरी विचार करत आरशासमोर जाऊन ती उभी राहिली.
जरा वेळ स्वतः ला आरश्यात निरखून पाहिले तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणार्‍या केसांमुळे पहिल्या भेटीतच आपल्यावर भाळलेले आपले पती देव आता हा जरा पांढर्‍या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा अंबाडा बघून काय विचार करत असणार.
लग्न झाल्यावर मला बघताच तुझ्यापुढे चंद्र फिका म्हणणारा माझा हा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्याभोवती आलेले काळसर वर्तुळ बघून काय कौतुक करणार.
मुलं झाल्यापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतः कडे जरा लक्ष दे, स्वतः साठी वेळ काढ, केसांना कलर कर, पार्लर मध्ये जाऊन फेशियल कर पण मी मात्र त्यांच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने म्हणणे बंद केले. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही… पूर्वीसारखा कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले पण चूक माझीही आहेच ना.

  सगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतः कडे दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झालीत. त्यांचं ते सहज करू शकतात.

काही तरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला, पार्लर वालीला घरी बोलावले. मस्त पैकी फेशियल करून केसांना कलर करवून घेतला.
सुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लास ची चौकशी करत क्लास जॉइन करण्याचे ठरविले.

मुले घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी आई आज आपलं आपल्याला सगळं आवरायला सांगते बघताच मुलेही जरा गोंधळली पण मुकाट्याने आपापली कामे आवरून दोघेही मुले डायनिंग टेबल वर येऊन बसत आईच्या गोड बदलाचे निरीक्षण करत होती.

मुलगा आईला म्हणाला , “आई आज काय खास… हेअर कलर छान दिसतोय बरं का…”
तिनेही थॅंक्यू म्हणत गोड स्माइल दिली आणि म्हणाली, ” आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही..मग मला‌ जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना..नाही तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी विचारातील अरे ही तुझी आई की आजी…”
त्यावर तिघेही खिदिखिदी हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सॅंडवीच दोघांनीही फस्त केले.

  आता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतः ची लहानसहान कामे स्वतः करण्याची सवय लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणे कमी झाले. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितके स्वतः साठी वेळ काढत ती स्वतः कडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बस मध्ये बसवून नवर्‍याचे आवरून दिले की नियमीत योगा करणे, वेळेत नाश्ता , जेवण सगळं कसं तिने ठरविल्याप्रमाणे सुरू केले. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पती राजांना तिच्यातला हा बदल खूप आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली, मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता, त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता पण आता शुभदा मधल्या तिच्यातल्या ‘ ती ‘ ने नव्याने जन्म घेत हा दुरावा‌ दूर केला. दोघा राजा राणीचे नाते नव्याने बहरत गेले.

  खरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घरदार, मुलंबाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होत जाते. मग तिची होणारी चिडचिड ही सहाजिकच आहे, ही चिडचिड व्हायला मग कुठलेही लहानसहान कारण पुरेसे असते. नवरोबांना वाटते बायको आता पूर्वी सारखी राहीली नाही तर बायकोला वाटतो नवरोबा आता बदलले पण सत्य हे आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदलली असते. मग छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू.
अशा या संसाराच्या वाटेवर शक्य तो वेळ स्वतः साठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो.

  चला तर मग आपल्यातल्या ‘ मी ‘ ला शोधून स्वतः साठी वेळ काढा आणि हसतखेळत आयुष्य जगा.?

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Free Email Updates
We respect your privacy.