संशयाचे भूत

Relations-Social issues

       मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

     मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

     मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
     नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

  आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

     बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

      मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

    नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

      सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

    उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

     बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

    असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed