गण्या (काल्पनिक हास्य कथा)

Uncategorized

मोजक्याच वस्तीचे एक लहानसे गाव होते, गावात सगळ्यांचा लाडका असा एक गण्या नामक तरूण राहायचा. त्याचं नाव गणेश पण सगळे लाडाने गण्या म्हणायचे. हा गण्या होता सांगकाम्या, जरा मंद बुद्धीचा शिवाय रातांधळा. गण्या अगदी लहान असताना वडील देवाघरी गेल्याने आई आणि गण्या दोघेच घरी असायचे. गावालगत असलेल्या दोन एकर शेतात मेहनत करून गण्याच्या आईने त्याला लहानाचे मोठे केले. गण्या जरा मंदबुद्धी त्यात वडील नाही म्हंटल्यावर आईला त्याला वाढवताना चांगलीच कसरत करावी लागली.

मोठा झाला तसा गण्या आईला शेतीच्या कामात मदत करायचा. आता तो वयात आला तसा त्याच्या आईला गण्याच्या लग्नाची काळजी वाटत होती. आपण गेल्यावर गण्या एकटा कसा राहणार या विचाराने आई हैराण. गावात कुणाकडून तरी कळाले की जवळच्या गावात एक मुलगी आहे, पण ती मुकी आहे. आईने माहीती काढली आणि गण्या च्या लग्नाचा प्रस्ताव मुलीकडे पाठविला गेला.

मुलगी तशी गुणी, हसरा चेहरा, निरागस रुप, बोलता येत नसल्याने कुणीही काही बोलले की फक्त हसायची, ऊ..आ..करायची. बोलता येत नसल्याने तिचं लग्न काही ठरत नव्हतं त्यामुळे गण्या विषयी सत्य माहीत असूनही त्याला मुलीकडच्यांनी पसंत केले.

नातलगांच्या मदतीने गण्याचे तिच्याशी लग्न लावून दिले गेले.

आई त्याला संसारात कसं वागायचं सांगत असे,पण गण्या मात्र कधी स्वतःच डोकं लावून पंचाईत करून घ्यायचा😃

एकदा लग्नानंतर गण्याला सासुरवाडीला बोलावले गेले, गण्या बायकोला घेऊन तिथे गेला. गण्याच्या वागण्यामुळे सासरी त्याचा मान कमी होऊ नये म्हणून आईने त्याला बर्‍याच सुचना दिल्या.

ठरल्याप्रमाणे गण्या सासुरवाडीला पोहोचला. सासूबाई पाणी घेऊन आल्या पण गण्या काही बैठकीत दिसत नव्हता, सासुबाईनी आवाज दिला “जावई बापू, कुठे आहात? पाणी आणलं होतं” तितक्यात आवाज आला “कुहुकुहू कुहूकुहू”.

सासूबाई आवाज ऐकून इकडे तिकडे आवाजाच्या दिशेने बघते तर जावई बापू बैठकीत ठेवलेल्या चार फूट कपाटाच्या वर जाऊन बसलेले , कारण गण्याला आईने सांगितले होते, तू त्या घरचा जावई आहे तेव्हा जमिनीवर बसू नको, जरा उंचावर दिवाण किंवा उंच ठिकाणी बस. बैठकीत दोन खुर्च्या आणि एक कपाट होते, मग कपाट खुर्ची पेक्षा उंच म्हणून तो कपाटावर बसला, त्यात आईने हेही सांगितले होते की सासूबाई सासर्‍यां सोबत मोठ्याने ओरडत बोलू नको तर नाजूक आवाजात बोल मग गण्या कोकीळेच्या सुरात कुहुकुहू करत होता.

असो, सासुबाईंने आश्चर्याने गाण्याकडे बघितले, खाली उतरायला लावले आणि खुर्चीत बसवले. लाकडी खुर्चीत गण्या मांडी घालून बसला ( कारण आईने जरा ऐटीत बसायला सांगितलं होतं ) आणि पाणी प्यायला. तितक्यात सासरेबुवा आले तसाच आईने सांगितल्याप्रमाणे त्यांचा आशीर्वाद घ्यायला गण्या उठायला लागला, मांडी घालून बसल्याने एका पायाचा गुडघा खुर्चीच्या हातात अडकला, काढायचा प्रयत्न करताना गण्या खुर्चीसह सासरे बुवांच्या पायाजवळ जाऊन पडला.

कितीही सांभाळावे म्हंटलं तरी गण्याची आल्या पासून सारखीच अशी फजिती झाली होती.

पाहता पाहता सायंकाळ झाली, सहा नंतर गण्याला काहीच दिसत नसे, जन्मताच रातांधळेपणा.

सासूबाईने ताट वाढले , गण्या आणि सासरे बुवा जेवायला बसल्यावर गण्याला मात्र ताटातले काही दिसत नव्हते. घ्या बापू, सुरू करा म्हणताच गण्याने ताटाचा अंदाज घेतला आणि जेवायला सुरुवात केली. मध्येच चूकून एखादा घास सासरे बुवांच्या ताटातून खाल्ल्या जायचा हे त्याला कळतही नव्हते. शेवटी वैतागून सासरे बुवा जरा लांब सरकून बसले आणि जेवण केले. जेवतानाही सासूबाई आग्रह करायच्या की खीर पूरी खा हा जावईबापू, हो हो म्हणत जे हाती येईल ते संपवत गण्या जेवला,  धक्क्याने पेल्यातील पाणीही सांडले(घरी रात्री आई गण्याला स्वतः हाताने खावू घालायची त्यामुळे आज त्याची चांगली फजिती झाली.)

रात्री गण्याची झोपण्याची व्यवस्था दिवाणखान्यात केली होती. गण्या आडवा झाला तसाच डाराडूर झोपी गेला. मध्यरात्री गण्याला जाग आली तसाच लघवीला जाण्यासाठी तो उठला. बाहेर अंगणात न्हाणीघर आहे हे त्याला माहित होते पण आता अंधारात शोधायचं कसं म्हणून आजुबाजूला तो काहीतरी चाचपडत होता. तितक्यात एक दोरखंड त्याच्या हाती लागला. गण्या ने लगेच आपले सुपीक डोके चालवले. दोरखंडाचे एक टोक त्याने पलंगाच्या पायाला बांधले आणि दुसरे टोक कमरेला, म्हणजे अंगणातील न्हाणीघरातून परत येताना दोरखंडाच्या मदतीने सहज पलंगावर येता येईल असा त्याचा विचार होता. गण्या दार उघडून दोरखंडाच्या मदतीने अंगणात गेला आणि न्हाणीघर शोधत असताना तो चुकून गाई म्हशींच्या गोठ्यात शिरला .‌..गण्याच्या हाताचा स्पर्श एका म्हशीला होताच म्हशीने जोरात लाथ मारली आणि गण्या मागे फेकला गेला , नशिब बाजुच्या विहीरीत जाऊन नाही पडला….जोरदार धक्क्याने गोठ्याबाहेर पडला तसाच गण्या मोठ्याने किंचाळत ओरडला, “अगआय…गं…..मेलो…..रे…..देवा…”
त्याच्या ओरडण्याने सासरे जागे झाले आणि बघतात तर जावईबापू पलंगावर नाहीत… पलंगाच्या पायाला बांधलेला दोरखंड बघून दोरखंडाच्या दिशेने सासरे बुवा अंगणात गेले आणि बघतात तर काय गण्या कमरेला हात लावून अंगणात आडवा पडलेला…सासरे बुवांनी त्याला उचलले, न्हाणीघरात घेऊन गेले आणि नंतर सुखरूप पलंगावर आणून झोपवले.
सासरे बुवा म्हणाले, “अहो बापू, लघवीला जायचं तर मला हाक मारायची ना…उगाच म्हशीचा मार खाल्ला तुम्ही…”
गण्या त्यावर काहीही बोलला नाही.

दोघांच्या आवाजाने सासूबाई आणि गाण्याची बायको सुद्धा जाग्या झाल्या. जावईबापूंना काही लागलं वगैरे तर नाही ना याची खात्री करून परत सगळे झोपी गेले.

रात्री कसाबसा झोपून सकाळी तो परत जायला निघाला. मुलीला दोन दिवस माहेरी राहू द्या, मी नंतर पोहोचवून देईल असं सासर्‍यांनी सांगितल्यावर गण्या नाश्ता करून पायवाटेने परत एकटाच घरी जायला निघाला. वाटेत त्याच्या कानावर शब्द पडले “जे झालं ते खुप चांगलं झालं, असं नेहमीच होवो”.

गण्याला ते शब्द मजेशीर वाटले मग गण्या ते पुटपुटत पुढे निघाला. समोरून कुणाची तरी अंत्य यात्रा येत होती. गण्याचे बोलणं ऐकून त्यातला एक जण थबकला आणि म्हणाला काय म्हणालास 😡

गण्या भोळा भाबडा, तो जोरात बोलला  “जे झालं ते खुप चांगलं झालं, असं नेहमीच होवो”.

ते ऐकताच त्या अंत्ययात्रेतील काही लोकांनी त्याला चांगला दम दिला आणि म्हणाले असं बोलला तर बघ. अरे जे झालं ते खुप वाईट झालं, असं कधी न होवो.

मग गण्या हे नवीन वाक्य पुटपुटत पुढे निघाला तर काही अंतरावर पोहोचताच त्याला एका लग्नाची वरात भेटली, गण्या ला वाटलं आता त्यांना आपण चांगलं बोललो तर बरं वाटेल तेव्हा तो हसत म्हणाला “असं कधी न होवो, जे झालं ते खुप वाईट झालं.” वरातीत असं अशुभ बोलला म्हणून गण्याला वरातीतल्या लोकांनी चांगला चोप दिला 👊👊

गण्या कसा बसा घरी पोहोचला. आईला बिलगुन रडु लागला, म्हणाला ” आय, आता म्या कधीबी सासरवाडीला जाणार नाय. लय फजिती झाली बग…” 😄😄😄😄😄😆😆😆

समाप्त!!!

कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजन म्हणून वाचावी.

कथेविषयी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed