Day: May 15, 2019

  • संसाराचे ब्रेकअप

    संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच..
    आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..”
    होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता संजय. अजयची बडबड ऐकून त्यावर फारसं प्रत्युत्तर न देता गुपचूप तो ऐकून घेत होता. न राहवून काही वेळाने अजयने त्याला विचारले तेव्हा बराच वेळ काही नाही झालं म्हणणारा संजय शेवटी म्हणाला,”त्याच्यामुळे आज तुझ्या वहिनीचे आणि माझे भांडण झाले रे..नकोच तो मला आता आयुष्यात..म्हणजे डोक्याला ताप नसेल..”
    अजयला मात्र काही कळालं नाही..”अरे..तो कोण.. कशामुळे भांडण झालं..नीट सांगशील का तू..”
    संजय – “अरे तो रे.. मोबाईल.. त्याच्यामुळेच आमची जास्त भांडणे होतात..आज तर सकाळीच भांडण ?..नकोच मला‌ मोबाईल..”
    अजय जरा चक्रावून गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, “मोबाईलमुळे भांडणं..मला तू नीट सांग यार.. काय बोलतोय काही कळत नाही..”
    संजय – “अरे, काल रात्री ही‌ लवकर झोपली, मी आपला वेबसिरीज बघत बसलेलो मोबाईलवर..?हिने आवाज दिला असेल मधेच जाग आल्यावर..किती वेळ झालाय झोपा आता असं म्हणत , तर मला काही हेडफोन्स मुळे कळाल नाही.. झालं ना..मला‌‌ सकाळी म्हणाली तुम्ही रात्री कुणाशी चाटींग करत होते.. माझ्याकडे लक्ष नव्हतं..मी किती आवाज दिले तरी चेहऱ्यावर हास्य आणून चाटींग करत होतात.. माझ्याशी बोलायला वेळ नसतो.. घरी आले की मोबाईलवर असता सारखे.. वरून हद्द म्हणजे आजपर्यंत माझा फोटो डिपी‌ वर ठेवला नाही म्हणे तुम्ही.. फेसबुकवर टाकला नाही.. तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही.. नंतर तर चक्क संशय घेतला आणि म्हणाली, तुमची नक्कीच गर्लफ्रेंड आहे..तिला कळू नये तुमचं लग्न झालेलं म्हणून तुम्ही माझा फोटो लावत नाही डिपी ला..रडायला लागली राव स्वतःच संशय घेऊन..
    समजून घ्यायला तयार नव्हती.. शेवटी तिचा माझा सोबतचा फोटो ठेवलाय व्हॉट्स ॲप’ला डिपी.. चूक नसताना सॉरी म्हणालो.. कशीबशी समजूत काढली आणि आलो ऑफिसला.”
    हे सगळं ऐकून अजयला खूप हसू आलं..?? तो हसू आवरत म्हणाला,”डिपी न‌ ठेवण्यावरून भांडण..?? काय रे..तू घाबरून ठेवला मग डिपी दोघांचा फोटो ??”
    संजय – ” हसून घे.. तुझं लग्न झालं ना‌ कि मग कळेल तुला.. अरे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर काहीतरी शायरी पोस्ट केलेली मी… एव्हाना विसरलो होतो.. मॅडम ने वाचली एकदा आणि मागेच लागली विचारायला की कुणासाठी लिहीलेली तुम्ही शायरी.. माझ्या आधी कुणी होती का वगैरे..मी सारखं डिपी बदल.. फोटो अपलोड करणार्‍यातला नाही रे.. जास्तच काय तर वेबसिरीज नाही तर गेम..किती सांगितलं हिला पण पटतच नाही..इतरांचे कपल फोटो, रोमॅंटिक स्टेटस बघितले की आमचं भांडण ठरलेलंच.”
    अजयला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले.. मोबाईल मुळे संसारात इतके गैरसमज होतात याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

    तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना..पण खरं आहे हे.. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली “लग्नापासून एकदाही पतीने पत्नीचा फोटो डिपी न ठेवल्याने पत्नीने चक्क महिला सहायता कक्षाकडे पतीची तक्रार केली.” पोलिसांनाही ऐकून धक्काच बसला.. समुपदेशन करून दोघांची समजूत काढली गेली आणि पतीने व्हॉट्स ॲपवर पत्नी सोबतचा फोटो डिपी ठेवण्याचे मान्य केले तेव्हा दोघांमधला वाद मिटला. पोलिसांनी हेही सांगितले की हल्ली पती पत्नी यांच्यात जास्तीत जास्त वाद हे मोबाईल मुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींवरून संसाराच्या ब्रेकअप चे कारण हे मोबाईल असल्याने बरेचदा समुपदेशन करून वाद मिटतात तर कधी संशयावरून टोकाला जातात.
    मुलांमधील मोबाईलचे वेड आणि त्यामुळे होणारे पालकांचे भांडण यांचंही बरंच प्रमाण आहे..पण आता पती पत्नी यांच्या संसारात मोबाईल, सोशल मीडिया मुळे ब्रेकअप होण्याची वेळ येते म्हणजे विचार करण्याजोगे आहे..
    मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा असा अतिरेक करत जोडिदाराच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमक करणे चुकीचे नाही का?
    नात्यात एक स्पेस असणं, एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया, मोबाईल मुळे इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना करून नात्यात फूट पाडणे खरंच अयोग्य आहे. मोबाईल, इंटरनेट मुळे आपण अपडेटेड राहतो, नवनवीन गोष्टींची माहिती मिळते, जगभरात कनेक्टेड राहतो.. अशे फायदे अनेक आहेत पण त्यांच्या गैरवापर अथवा अतिरेकामुळे संसाराचे ब्रेकअप होत असेल तर वेळीच सावरायला हवे. संसारातील विश्वास जपायला हवा, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे, परिस्थिती वेगळी तेव्हा इतरांशी तुलना करून वाद निर्माण झाले तर आयुष्य सुखी होण्याऐवजी नात्यात फूट पडायला सुरुवात होईल.

    तुमचं याविषयी मत मांडायला विसरू नका ?? नकळत तुमच्या संसारात असंच मोबाईल, सोशल मीडिया मुळे गैरसमज होत असतील तर वेळीच सावरा.?? संवाद साधा.. गैरसमज दूर करा…??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

    सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच रिक्षा पकडून डॉक्टरांकडे निघाली. डॉक्टरांनी  तपासणी केली तर अंगात खूप जास्त ताप होता शिवाय तिला अशक्तपणा मुळे गरगरायला लागले होते.
    घरी आल्यावर जेवण करायला स्वयंपाक घरात गेली तर लगेच तिच्या कानावर शब्द पडले ” आज एका कामाला हात लावला नाही, सगळं मला‌ एकटीला करावं लागलं.” सुमित्राने कसे बसे दोन घास खाऊन औषध घेतले आणि जाऊन अंथरूणावर पडली तोच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिच्या मनात विचार आला, ” आपण घरी सगळ्यांसाठी किती झिजलो, कुणालाही गरज असो सुमित्रा तयार आणि आज आपल्यावर वेळ आली तर तब्येतीची साधी चौकशी नाही. वरून अपमानास्पद बोलून मोकळे होतात सगळे. आता बस झाल्या इतरांच्या सेवा, आता मी स्वतः साठी जगणार.. स्वतः ची काळजी घेणार.”
    सुमित्रा एकोणीस वर्षांची असताना लग्न करून बापूरावांच्या आयुष्यात आली. बापूराव प्रतिष्ठित घरातले , एकत्र कुटुंबात राहणारे. तिचं सौंदर्य बघता बापूराव तिला कुठे ठेवू कुठे नाही असे अगदी फुलाप्रमाणे जपायचे. नव्या नवरीचे नवलाईचे नवं दिवस संपले आणि ती जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकली. कुणालाही कुठल्या कामासाठी नाही म्हणने सुमित्राला जमत नव्हते. कुटुंबात कुठलाही सोहळा असो , कुणाचं आजारपण असो किंवा बाळंतपण असो सुमित्रा मदतीसाठी तत्पर असायची. अशा स्वभावामुळे सगळे तिची वाहवा करायचे शिवाय बापूरावांची मान अख्ख्या कुटुंबात वाढलेला बायकोच्या वाहवा मुळे अगदी ताठ असायची. सगळ्यांचं करता करता घरासाठी राबत असताना सुमित्रा आणि बापूरावांच्या नात्यात मात्र फूट कशी पडली सुमित्राला कळालेही नाही. त्यात भर म्हणजे कित्येक प्रयत्न केले तरी सुमित्राला आईपण काही लाभत नव्हते. सासूबाई ह्या त्या देवस्थानात नवस बोलायच्या, दवाखान्याच्या चकरा सुरूच पण सुमित्रा कडून आनंदाची बातमी काही मिळत नव्हती. असं करता करता लग्नाला सहा वर्षे झाली. गावातील लोक, नातलग नावं ठेवायला लागली. मग सासूबाईंनी सूर काढला बापूरावांच्या दुसऱ्या लग्नाचा, बघता बघता लवकरच अगदी मुलगी शोधून लग्न करायची तयारीच झाली. सुमित्राला ते ऐकून धक्का बसला, तिने आई वडीलांना सांगितले, त्यांची परिस्थिती जेमतेम, ते म्हणाले “अजून लहान बहीणींचे लग्न व्हायचे आहे तेव्हा तू कायमची माहेरी आली तर लोक काय म्हणतील शिवाय बहिणीच्या लग्नात अडथळा येयील.” क्षणभरात माहेरही तिच्यासाठी परकं झालं.
    सुमित्राच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. कुणालाही नाही म्हणने तर तिचा स्वभावच नव्हता. बापूरावांनी दुसरं लग्न करून सवत घरी आणली. लग्नानंतर दोन महिन्यांत तिला दिवस गेले, मग काय सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतले, तिचे लाड पुरवले जाऊ लागले. सुमित्रा दिवसभर राब राब राबून घर सांभाळायची पण कुणीही तिच्या कडे फारसे लक्ष देत नव्हते. एखाद्या मोलकरीणी  सारखी तिची अवस्था झाली होती. बापूराव सुद्धा साधं कधी प्रेमाने बोलत नव्हते, कामापुरते काम ठेवायचे. सुमित्रा रोज रडायची, आयुष्य संपवायचा विचार करायची पण काही उपयोग नव्हता.
    तिच्या सवतीचे दोन बाळंतपण तिनेच केले. अजूनही कुटुंबात कुणाला मदतीची गरज पडली की बापूराव तिला त्यांच्या घरी नेऊन सोडायचे. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन सगळ्यांचे बाळंतपण, म्हातारपणी सेवा,. लग्न असो किंवा कुठलाही सोहळा समारंभ , सगळं ओझं सुमित्रा वरच असायचं. तिची सवत सुद्धा तिला मोलकरीण समजून राबवून घ्यायची. घरात जिव्हाळा, प्रेम देणार कुणीच उरलं नव्हतं. जिथे नवराच आपला राहीला नाही तर इतरांकडून काय अपेक्षा असं समजून सुमित्रा जगत होती, माहेरी सुद्धा एक पाहुणीच. अशातच वयाची पन्नाशी जवळ आली, तब्येत आधी सारखी धडधाकट राहीली नव्हती, पण कुटुंबात अपेक्षा मात्र संपल्या नव्हत्या.  असंच आज अंगात इतका ताप असूनही साधी विचारपूस तर नाही पण कामात मदत केली नाही म्हणून तिची सवत तिला कुरकुर करत होती. औषधी घेऊन जरा वेळ सुमित्राला झोप लागली.
    काही वेळाने जाग आली तर कानावर शब्द पडले ” सुमित्रा आहे ना, पाठवा की तिला.”
    ते ऐकताच सुमित्रा बाहेर आली तर बापूराव,त्यांच्या आई आणि सवत बोलत होते. सुमित्राला बघताच सासूबाई म्हणाल्या “सुमित्रा, लहान काकी दवाखान्यात भरती आहे, तुला त्यांच्या जवळ जावं लागेल. एक जण बाई माणूस पाहिजे त्यांच्या सेवेत.”
    त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सुमित्रा म्हणाली “मी जाणार नाही, माझ्या अंगात इतका ताप, अशक्तपणा, तुम्हा कुणाला माझी अवस्था कळत नाही, माझा फक्त गरजेच्या वेळी वापर केला इतके वर्ष तुम्ही. पण आता बस..मला नाही जमणार जायला. हे तसं तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता माझे डोळे उघडले. सूनेच्या नात्याने कर्तव्य म्हणून मी राबत गेले पण आता बस.. नाही जमणार मला.”
    सगळे सुमित्राच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. सुमित्राचे हे रुप सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. उशीरा का होईना पण नाही म्हणण्याच्या कलेत सुमित्रा नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत होती, स्वतः साठी जगण्याची नवी उमेद तिच्या मनात नव्याने जागी झाली होती.

    अशा अनेक सुमित्रा आज समाजात आहेत ज्यांना नाही म्हणता येत नाही आणि म्हणून मग सगळे फायदा घेतात. अशावेळी घरात कुणालाच आपुलकी नसेल तर त्याचा किती त्रास होतो हे सहन करणार्‍यालाच माहीत असते म्हणूनच योग्य वेळी नाही म्हणने खुप गरजेचे असते.

    लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही. लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिच्या सौंदर्याचे कोड

    रीमा आई वडीलांना एकुलती एक मुलगी, गव्हाळ वर्ण असलेली पण नाकी डोळी नीटस, उंच बांधा, आकर्षक शरीरयष्टी, काळेभोर लांबसडक केस, जरा मेकअप केला की एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकेल असं तिचं सौंदर्य. पण या सौंदर्यावर ‘कोड’ पसरलं आणि परिस्थिती बदलली.

    रीमा लहानपणापासून नृत्य कलेत तरबेज. जणू नृत्य आणि मॉडेलिंग तिला जन्मताच मिळालेली देणगी. कुठलाही क्लास न लावताच टिव्हीवर बघून, इंटरनेटवर बघून ती स्वतः नृत्य शिकली. भरतनाट्यम असो वा हिपहॉप , तिला कुणीही मागे टाकू शकत नव्हते. त्यामुळे लहानपणापासूनच अनेक कार्यक्रमांमध्ये तिला बक्षिस मिळाले. वयाच्या अगदी पाचव्या वर्षी ती टिव्हीवर एका डान्स शो मध्ये झळकली. शाळेत इयत्ता तिसरीत असताना तिच्या पोटावर एक डाग दिसायला लागला. डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळाले की तो एक त्वचारोग आहे ‘कोड’ म्हणून ओळखला जाणारा. ते ऐकताच रीमाच्या आई बाबांना काळजी वाटली. शरीरावर इतरत्र कुठेही ते पसरायला नको म्हणून विविध शहरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू झाले. पण ते कोड मात्र आता चेहऱ्यावर सुद्धा दिसायला लागले. रिमाचे मैदानी खेळ बंद झाले कारण सूर्यकिरणांमुळे पुन्हा त्याची ‘रिअॅक्शन’ यायची.
    शाळेतही रिमाला मित्र मैत्रिणी सोबत खेळायला घेत नसे. तिच्या आजूबाजूला बसायला टाळत असे, त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून सतत शाळा बदलायला लागत होती. नातेवाईक सुद्धा घरी यायला टाळायचे, रीमाला आई बाबांना कार्यक्रमात बोलवायला टाळायचे, त्यांना वाटायचं रिमामुळे अख्ख्या खानदानाला लोकं नाकबोट लावतील, आमच्या मुला मुलींच्या लग्नासाठी अडचणी येतील. आई बाबांनी मात्र या गोष्टींची पर्वा केली नाही उलट रिमाला खूप हिम्मत दिली, नृत्य कला मागे पडायला नको म्हणून बाबा अनेक स्पर्धांमध्ये तिचे नाव नोंदवायचे, तिला नृत्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कोड शरीरावर सर्वत्र पसरले नसले तरी चेहऱ्यावर, पोटावर असलेले कोडाचे डाग मात्र जायला मार्ग मिळत नव्हता.
    असाच शाळा बदलत बदलत शाळेचा प्रवास संपला आणि कॉलेज सुरू झाले. कॉलेजमध्ये परिस्थिती वेगळी नव्हती. तिचं सौंदर्य अप्रतिम असलं तरी कोड असल्याने तिला बर्‍याच गोष्टी पाहून वंचित ठेवले जायचे. सहसा कुणी मैत्री करायला टाळायचे, तिला आता ह्या गोष्टींची सवय झाली होती.
    रीमा हार मानणारी नव्हती , तिने गॅदरींग मध्ये आपल्या नृत्याविष्काराने, मॉडेलिंग मधल्या अदा , कौशल्य यामुळे अख्या कॉलेजमध्ये वाहवा मिळवली. हळूहळू तिचा मित्र परिवार वाढला.
    मॉडेलिंग हे रिमाचे लहानपणापासून स्वप्न होते, पण मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्य अतिशय महत्त्वाचा घटक आहे तेव्हा आपल्या चेह-यावर असलेल्या कोड मुळे आता आपलं स्वप्न हे स्वप्नच राहिल असं तिला वाटत होतं.
    तिचे कौशल्य बघून आई बाबा तिला नेहमी प्रोत्साहन देत असे. मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू प्रयत्न करणे सोडू नकोस असं नेहमीच तिला सांगत असे.
    तिने फॅशन शोमध्ये मॉडेलिंग साठी लागणारे फोटो शूट करून घेतले, अनेक फॅशन डिझायनर ला तिचे फोटो पाठवले. कुणा कडूनही काही प्रतिसाद येत नव्हता. रीमा जरा उदास झाली पण हिम्मत हारली नाही, प्रयत्न करत राहीली. काही महिन्यांनी तिला एका फॅशन शो साठी ऑडीशनला बोलावले गेले, तिची परफेक्ट फिगर, मॉडेलिंग कौशल्य यामुळे तिने तिथे ऑडीशनला आलेल्या प्रत्येक मॉडेलला मागे टाकलं. एका प्रख्यात फॅशन डिझायनरच्या ब्रॅंड साठी तो फॅशन शो होता आणि रिमा त्यासाठी सिलेक्ट झाली. रीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचं लहानपणापासूनचं स्वप्न आता सत्यात उतरणार होते.
    ठरल्याप्रमाणे फॅशन शो झाला, त्यातले रीमाचे फोटो भराभर इंटरनेटवर पसरले. जगभरात ती प्रसिद्ध झाली. ज्या ब्रॅंड साठी तिने हा शो केला होता त्यांचीही जगभर प्रसिद्धी झाली. त्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
    मॉडेलिंग मध्ये करीयर करायचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. सोबतच स्वतः ची एक डान्स अकॅडमी तिने नृत्य कौशल्याच्या जोरावर सुरू केली त्यातही तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.
    एका मोठ्या डान्स शो साठी तिला परीक्षक म्हणून निमंत्रित केले तेव्हा तिथल्या मुलाखतीत तिने स्वतःच्या जीवनातील प्रवास सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आई बाबांची मान अभिमानाने उंचावली.
    परिस्थितीवर मात करून कौशल्याच्या आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी रिमा जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान बनली.

    कोड येणे हे नैसर्गिक आहे शरीरात काही कारणांमुळे झालेल्या बदलामुळे कोड येते, अशा‌ वेळी त्या व्यक्तीला तसेच घरच्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. लग्नाच्या वेळी अडचणी येतात कारण बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व दिले जाते. पण अशा व्यक्ती बरोबर बोलायला टाळणे, संबंध तोडणे, त्यांच्या पासून दूर राहणे मात्र अयोग्य नाही का.

    कॅनडातील विनी हार्लोने केलेले फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. कोड असलेली ही मॉडेल, तिचे फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल झाले आहे. यातूनच प्रेरीत होवून मी लिहीलेली रीमाची ही एक काल्पनिक कथा आहे.

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि याविषयी तुमचं मत मांडायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे