Day: May 27, 2019

  • फसवणूक…( एक सत्य कथा )

    काही महीना पूर्वीची गोष्ट, सकाळी उठल्यावर फोन बघितला तर एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता की “तू आज फ्री आहेस का. मी तुला भेटायला यायचे म्हणते. “मेसेज वाचल्यावर मला आनंद गगनात मावेनासा झाला कारण तब्बल सहा वर्षांनी आज आम्ही भेटणार होतो. बाळ झाल्यामुळे मी तशी घरीच असायची, लगेच तिला रिप्लाय केला “अगं नक्की ये. मी घरीच आहे, वाट पाहते मी, ये लवकर , एकटीच येत आहे की जीजू, बाळ कुणी सोबत आहे आणि हा जेवायला घरीच या मग तुम्ही सगळे”

    थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला “ओके. १२:३०-१ पर्यंत येते. मी एकटीच येत आहे.”

    इतक्या वर्षांनी मैत्रिण भेटणार म्हणून उत्साहात पटापट आवरून घेतले. कधी एकदा तिला भेटते अशी मनस्थिती झाली. लक्ष सतत घड्याळाकडे. बाळाचं आवरून बाळ झोपी गेले आणि मी तिच्या येण्याची वाट पाहत होते.

    ठरल्याप्रमाणे ती आली आणि एकमेकींना बघून डोळ्यात आनंदाश्रु आले.

    मी विचारले “मुलाला घेऊन आली असतीस तर मला त्याला भेटता आले असते, त्यावर ती म्हणाली “अगं मी त्याला आईकडे म्हणजेच माझ्या माहेरी ठेवले आहे त्याला. महीन्यातून एकदा भेटुन येते, खूप आठवण आली की मग मध्ये कधीही जाते. मी नोकरी शोधत आहे, चांगली नोकरी मिळाली की मुलाला इकडे घेऊन येयील.”

    तिचं हे उत्तर ऐकून मला जरा विचित्र वाटले. पुढे काही बोलण्याआधीच ती म्हणाली “मला खूप भूक लागली आहे, आपण आधी जेवण करू नंतर गप्पा मारत बसू.”

    पटापट जेवणाची तयारी करून जेवायला बसलो तेव्हा सहज मी विचारले”जिजू काय म्हणतात” .

    ती म्हणाली ” आम्ही सोबत राहत नाही, आता दोन वर्षे होतील.”

    हे ऐकून मला धक्काच बसला.

    कारण विचारले असता कळाले की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिले, त्याने लग्न केले फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी, घर सांभाळायला बायको मिळेल म्हणून. शिवाय शारीरिक भूक भागवायला अजून एक हक्काची व्यक्ती मिळणार होती. तो फक्त हव्यासापोटी तिला जवळ घेत असे, प्रेमाचे शब्द तर दुर पण काही बोलायलाही त्याला वेळ नसे. सुरवातीच्या दिवसात तिला त्याच्या प्रेयसी बद्दल माहिती नव्हते पण दररोज त्याचे उशिरा येणे, सुट्टिच्या दिवशीही कामाचं कारण सांगून दिवसभर बाहेर असणे तिला विचार करायला भाग पाडत होते. त्याच्या कपाटाला हात लावलेला त्याला चालायचे नाही, बाहेर पडताना कपाट लॉक करून चावी घेऊन तो बाहेर पडायचा. तिने नोकरी करू‌ नये असं त्याला वाटायचं म्हणून तिला गुंतवून ठेवण्यासाठी तिची इच्छा नसतानाही तिला आई होण्यास भाग पाडले. कधीही तिला बाहेर फिरायला घेऊन गेला नाही तर मित्र मैत्रिणींना तिची ओळखही करून दिली नाही. घरातून बाहेर पडू नये म्हणून घरात एक रुपयाही ठेवत नसे, घराची चावी घरी ठेवत नसे.

    या सगळ्यात लग्ना नंतरच्या काही महीन्यातच जेव्हा तिला ती आई होणार ते कळाले तेव्हा काही काळ तिला वाटले की बाळ नकोच पण या सगळ्यात होणा-या बाळाची काय चूक शिवाय बाळ झाले की हा बदलेल म्हणून तिने बाळ होऊ देण्याचे ठरवले. आई होण्याचा आनंद नऊ महीने अनुभवतानाच तिला त्याच्या प्रेयसी बद्दल कळाले आणि तिला मोठा धक्का बसला, त्याला विचारले असता त्याने या सगळ्याची कबूली दिली पण घरी याविषयी सांगितले तर जीवे मारायची धमकी दिली. ती गरोदर होती शिवाय आई-वडीलांना सांगितले तर सगळे काळजी करतील, लहान बहीणीचे काय होणार या विचाराने ती सगळं सहन करत राहिली.

    गरोदरपणातही तिला वेळेत डाॅक्टरकडे घेऊन जात नसे, फळं, आवडीचा खाऊ तर‌ दूरच. त्याला काही बोलले की सरळ मारायला धावायचा.

    नविन लग्न झाल्यावर मुलींचे किती स्वप्न असतात, प्रेम यात सगळ्यात महत्वाचे असते पण तिला त्याचे प्रेम कधी अनूभवायलाच मिळाले नाही. लग्न झाल्यावर मुंबईसारख्या शहरात ती एकटी पडली होती. गरोदरपणात प्रवास करायचा नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितले यामुळे सतत घरात बसून, कुणी बोलायला नाही अशा परीस्थितीत नऊ महिने काढले. नववा महिना संपत येत असताना तिची आई तिच्या जवळ राहायला आली. त्याआधी अधूनमधून कुणी घरचे भेटायला आले तरी चेहर्यावरील दुःख लपवुन ती आदर सत्कार करायची. आई जवळ मन‌ मोकळे करावे असे तिला खूपदा वाटले पण सगळ्यांना काळजी लागून राहिल म्हणून ती गप्प बसायची. आता आई बाळ होई पर्यंत जवळ असल्याने हळूहळू आईच्या लक्षात आले की दोघांच नातं दिसतं तसं नाही, आपली मुलगी काही तरी लपवते आहे. शेवटी आईचं मन ते, आईने खूप विचारल्यावर मुलीचा बांध फुटला, वर्ष भर सहन केलेला अन्याय, दुःख तिने आईला सांगितले. लवकरच बाळाचें आगमन झाले , बाळाला बघून त्याच्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आईलाही लागून होती पण त्याला बाप झाल्याचा काही आनंद तितका झालेला नव्हता. औपचारिकता म्हणून तो सोबत होता. मुलाला जवळ सुद्धा घ्यायला टाळाटाळ करायचा. सासू सासर्‍यांना तिच्या आईने दोघांच्या नात्याविषयी सांगितले तर त्यांची भूमिका म्हणजे आम्हाला काही माहिती नाही आणि तो आमचं ऐकत नाही.

    अशा परिस्थितीत स्त्रीने काय करावे?

    तिच्या आईबाबांनी या सगळ्यात तिला खूप साथ दिली. तिला माहेरी घेऊन गेले शिवाय खंबीर पणे लढायला शिकवले. बाळ एक वर्षाचं झालं तेव्हा तिने काही कोर्सेस करून नोकरी शोधायला सुरुवात केली. मुलाला तिने आई वडिलांजवळ ठेवले. आलेल्या परीस्थितीशी झुंज देत पुढे जात राहायचे हे तिला आईने शिकवले, तिचा आत्मविश्वास वाढवला.

    लवकरच तिला चांगली नोकरी मिळाली आणि झालेल्या अन्यायावर मात करून तिने आपलं आणि मुलाचं आयुष्य सुखी बनवण्याचा प्रयत्नाला सुरवात केली. मला तिचा खरंच खूप अभिमान वाटतो.

    स्त्रीने जीवनात खंबीर होण्याची खरंच खूप गरज आहे. अन्याय सहन न करता आवाज उठवणे गरजेचे आहे. अत्याचाराला बळी न पडता, स्वत: साठी उभे राहिले तर अन्याय नक्कीच कमी होईल.

    यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • बहुपती विवाह- एक प्रथा

    विज्ञान युगात अजूनही आपल्या देशात अनेक प्रथा जिवंत आहेत त्यातलीच एक म्हणजे “बहुपती विवाह”.एका पुरूषाला अनेक पत्नी आहेत असं बरेचदा ऐकलं पण आजच्या काळात एका मुलीचा विवाह अनेक पुरूषांसोबत एकाच वेळी केला जातो हे क्वचितच ऐकायला मिळते.

    हो, ही सत्य परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर मधली. भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या किन्नौर गावात एकाच मुलीचा विवाह कुटुंबातील सर्व सख्ख्या भावासोबत केला जातो, अशी प्रथा तिथे अजूनही आहे. किन्नौर मधल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की अज्ञातवासात पांडवांनी त्याच ठिकाणी वास केला होता आणि म्हणून अजूनही तिथे बहुपती विवाह ही प्रथा सुरू आहे.

    या ठिकाणी सगळे सदस्य एकाच घरात राहतात शिवाय बहुपती मधील एखाद्याचे निधन झाले तरी पत्नी दु:खी राहत नाही.

    किन्नौर मध्ये खूप वाईट प्रकारे ही प्रथा पाळली जाते.

    घरातील कुठल्या पुरूषाला वाईट वाटू नये म्हणून दारू आणि तंबाखूचे सेवन जेवणासोबत केले जाते.

    आश्चर्य म्हणजे या परीसरात घराची मुख्य ही स्त्री असते. घराचा ताबा तिच्या हातात असतो.

    एक‌ पती पत्नीसोबत यौन संबंध साधत असेल तर तो त्याची टोपी दारावर अडकवून ठेवतो. ती टोपी बघून बाकी पतींना कळते की काय सुरू आहे आणि त्यात मान मर्यादा इतकी असते की बाकी कुणीही त्या ठिकाणी टोपी असेपर्यंत जात नाही.

    जेव्हा पत्नीला कुठल्या गोष्टीच दु:ख होत असेल तर ती गाणी गाते.

    हे सगळं ऐकून विचित्र वाटत असेल तरी ही प्रथा अजूनही जिवंत आहे.

    असं ऐकल्यावर प्रश्न पडतो की या सगळ्यात प्रेम, स्त्रीचा आदर, स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. स्त्री असो किंवा पुरुष पण त्यांच्या भावना, परस्परांमधील प्रेम, आदर या गोष्टीचा आनंद त्यांना माहीतच नाही कारण वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा त्यापेक्षा महत्वाची मानली जाते.

    सध्या परीस्थिती खूप बदलत आहे मात्र देशाच्या बर्‍याच भागात बालविवाह, बहुपती विवाह सारख्या अनेक प्रथा अजूनही सुरू आहेत. अशा प्रकारच्या प्रथा हळूहळू बंद झाल्या तर आपला देश खर्‍या अर्थाने विकसित झाला असं म्हणायला हरकत नाही. याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

    असेच वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचन्यासाठी मला फॉलो करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नातेसंबंधात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे