Month: August 2019

  • सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

    राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली.

    माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले, “नेत्रा , कशाचा विचार करते आहेस. कॉलेजमध्ये काही झालं का..चिमुकले सानू, गोलू तुला हाक मारत ताई ताई करत अवतीभवती फिरत होते पण आज पहिल्यांदाच तू त्यांना जवळ न घेता सरळ खोलीत निघून गेली. काही काळजीचं कारण असेल तर सांग मला बिनधास्त. ”

    नेत्राला स्वतः च्या वागण्यातला बदल जाणवला. तिने मोठी हिंमत करून माई जवळ सगळं काही सांगायला सुरुवात केली, “माई, रागवू नका पण मी राघव विषयी बोलले ना…. त्याने त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं.. तसं तो मनाने चांगला वाटला पण मला खूप घाबरल्या सारखं वाटलं माई..मनात काय चलबिचल सुरू आहे मला खरंच कळत नाही आहे..”

    माई- “नेत्रा , तू नुकतीच कॉलेजला जायला लागली आहे, आयुष्याच्या नव्या वळणावर आहेस..तुला स्वतः च्या पायावर उभे राहायचे तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना.. राघव तुझा मित्र आहे शिवाय तुमची ओळख काही दिवसांपूर्वी झालेली..तो तुझा पहिलाच मित्र ना..त्याच्या विषयी ही भावना‌ तुझ्या मनात निर्माण होणे नैसर्गिक आहे..हे आकर्षक आहे की प्रेम मी आता नाही सांगू शकणार..पण बाळा जरा विचार कर.. सध्या तुला तुझ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.. प्रेम, संसार या गोष्टी आयुष्यात येतातच पण त्याची एक ठराविक वेळ असते..आज तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि पुढे काही दिवसांनी नाही पटलं तर पुढचं आयुष्य नुसतच झुरत घालवायचं नाही तेव्हा वेळीच सावर मनाला..मित्र म्हणून रहा यात माझी हरकत नाही पण प्रेम, संसार अशा गोष्टींचा विचार आता करू नकोस..तुला तो आवडतो मला कळतंय पण हे प्रेमच आहे असं नाही ना..”

        माईंच्या बोलण्याने नेत्राला मन अगदी हलके वाटले. मनातला गोंधळ बराच कमी झाला. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून तिने स्पष्ट काय ते राघवशी बोलायचं ठरवलं.
    राघवला भेटल्यावर तिने त्याला सांगितले, “राघव, आता तरी मला उत्तर देणे शक्य नाही..मला माझ्या मनाची अवस्था कळत नाहीये..मला तू आवडतोस पण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं अजून तरी ठामपणे माझं मन मानत नाहीये. मला वेळ दे. तू नोकरी करतोस.. लवकरच सेट होशील पण माझं स्वतः च्या पायावर उभे राहायचे स्वप्न माझं नसून माई, आमचा आश्रम या सगळ्यांचं आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी याविषयी, आपल्या नात्याविषयी काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. पण हा, आपण चांगले मित्र बनून नक्कीच राहू शकतो.”

    नेत्राच्या बोलण्याने राघव अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. इतक्या कमी वयात इतका समजुतदारपणा बघून त्याला तिचं खरंच खूप कौतुक वाटलं. त्यानेही तिला त्यावर उत्तर दिले, “तू हवा तितका वेळ घे..मी वाट पाहीन..आपण चांगले मित्र नक्कीच आहोत..तुला काहीही मदत लागली तर मला हक्काने सांग..तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच मदत करेन.”

    तिनेही त्यावर एक गोड स्माइल देत मैत्री स्वीकारली. मित्र बनून राहत असला तरी राघव तिच्या प्रेमात पडला होता आणि मान्य करत नसेल तरी मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नेत्रा सुद्धा त्याच्यावर जिवापाड प्रेम करत होती.

    दोघांची मैत्री दिवसेंदिवस बहरतचं होती. अशातच भराभर वर्षे निघून गेली. नेत्रा कॉलेजच्या अंतिम वर्षाला होती. तिचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने तिची योग्य ती वाटचाल सुरू होती. राघवच्या घरी दोघांच्या मैत्री विषयी काही एक माहिती नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक साजेस स्थळ आणले आणि त्याविषयी राघवला सांगितले. या क्षणी राघवने मला हे स्थळ मान्य नाही सांगून नकार दिला पण नकार देण्यासारखे काहीच नव्हतं. मुलगी त्याच्या तोलामोलाची, सुंदर, सुशिक्षित नोकरी करणारी. त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे आई बाबांना शंका आली. त्यांनी त्याच्याशी बोलल्यावर त्यांना नेत्रा विषयी कळाले. त्यात ती अनाथाश्रमात वाढलेली म्हंटल्यावर त्याच्या वडिलांचा पारा चढला. “कोण कुठली मुलगी, प्रेम करायचं होतं तर जरा तोलामोलाची तरी बघायचं होतं..आई वडिलांशिवाय वाढलेली ती.. काही संस्कार तरी असतील का..” असं बोलून त्यांनी राग व्यक्त केला.
    आईने तिचा फोटो बघताच ती म्हणाली, “कशी काय आवडली रे तुला..ना‌ रंग ना रूप.. वरून अनाथ..राघव तिला विसरून जा.. आम्ही तिचा कधीच स्वीकार करू शकत नाही..”

    आई बाबांच्या बोलण्याने राघव खूप दुखावला पण त्याने विचार केला, “समाज अजूनही जात धर्म, रंग रूप या गोष्टींचा विचार करतोच..तसाच विचार आई बाबा करत आहेत.. त्यांचं चुकलं असंही नाही पण जी परिस्थिती नेत्रा वर ओढावली त्याच काय..त्यात तिची काय चूक..मला तिचं रंग रूप पाहून नाही तर तिचं प्रेमळ मन, तिची जिद्द, तिचा स्वभाव बघून ती आवडली.. वरवर पाहता प्रेम कुणीही करेल पण मन समजून घेत प्रेम केल हा माझा गुन्हा का वाटला आई बाबांना..”

    आता आई बाबांची समजुत कशी काढावी म्हणून राघव काळजीत पडला‌. त्याने याविषयी नेत्रा ला काही एक सांगितले नाही. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू द्यावं म्हणून तो गप्प राहिला.

    माईंना भेटून त्याने सगळी परिस्थिती त्यांना सांगितली शिवाय नेत्रा साठी त्यांच्याकडे मागणी घातली. एकंदरीत त्याची धडपड, नेत्रा विषयी आपुलकी, प्रेम बघता माईंना आता राघवची, त्याच्या नेत्रा वरच्या खर्‍या प्रेमाची खात्री पटली होती. त्या त्याला मदत करायला तयार झाल्या पण आई बाबा तयार नसतील तर नेत्रा सोबत लग्न लावून देऊ शकणार नाही हेही त्यांनी राघवला सांगितले.

    त्याने आई बाबांची कशीबशी समजूत काढत एकदा त्या अनाथाश्रमात येण्यासाठी त्यांना तयार केले. आई बाबा माईं सोबत आश्रमात एका झाडाखाली खुर्चीवर बसले होते. माईंनी त्यांना नेत्राचा भूतकाळ सांगितला, “नेत्रा त्यांना एका मंदिरात सापडली. मुलगा व्हावा म्हणून पहिल्या मुलीचा बळी जाणार होती पण अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी तिला वाचवले आणि आश्रमात सोडले. केवळ दोन महिन्यांची होती ती‌. जसजशी मोठी झाली तसंच अख्खं आश्रम तिने प्रेमाने जिंकले, खूप हुशार, मेहनती आहे ती.. दुर्दैव इतकंच की आई वडिलांना तिची किंमत नव्हती..मुलगा हवा होता म्हणून तिला बळी देणार होते तिचा..” त्याविषयी त्यांच्याकडे असणारे पुरावेही माईंनी दाखवले. आता राघवचे आई बाबा कितपत विश्वास ठेवतील हे त्यांच्या वर सोडले.

    ते ऐकताच राघवच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले, नेत्रा विषयी वाईट वाटले पण अशा अनाथ मुलीला सून करून घ्यायचं हे काही त्यांना पटलं नव्हतं.

    माईंनी त्यांना हेही स्पष्ट केले की, तुम्ही तयार नसाल तर तुमचे मन दुखावून ती कधीच राघव सोबत लग्न करणार नाही.
    माईंनी नेत्राला बोलावून घेतले. तिला मात्र काय चाललं आहे काही कळालं नाही. ती तिथे जाताच अतिथी म्हणून आई बाबांच्या पाया पडली. त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. माईंनी ओळख करून दिली तेव्हा तिला कळाले की हे राघव चे आई बाबा आहेत. ते ऐकताच ती जरा गोंधळली, अचानक ते इथे कशे आणि मग राघव कुठे आहे याचा विचार करत स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. तिचं साधं सरळ राहणीमान, निरागस चेहरा, प्रेमळ बोली बघून आईला ती चांगली वाटली पण तिचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी मात्र अजूनही मन मानत नव्हतं.

    बाबां तर अजूनही नकारावर ठाम होते. त्यांचा नकार माईंना कळाला तसंच ते गेल्यावर त्यांनी नेत्रा आणि राघव ची समजुत काढली. राघव, तुझ्या घरी ही गोष्ट स्वीकारण्यास कुणी तयार नाही तेव्हा तुम्ही दोघेही इथेच तुमच्या भावनांना थांबवले तर योग्य राहील असे सांगितले. 

    नेत्रा हळवी असली तरी वास्तविकतेचा विचार करणारी होती. तिने माईंच्या बोलण्याचा आदर ठेवत राघवला भेटणे, बोलणे बंद केले. या गोष्टीचा विचार करून मनोमन तिला खूप त्रास होत होता पण चेहऱ्यावर हास्य ठेवून ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होती. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीचे प्रयत्न सुरू केले.

    वेळेनुसार हळूहळू ती राघवला विसरण्याचा प्रयत्न करत होती पण मनोमन त्याला आठवत खूप रडतही होती.

    इकडे राघव आई बाबांशी तुटक पणे वागायला लागला, आयुष्यभर लागलं करायचं नाही म्हणत आले ते स्थळ हूडकावून लावू लागला. नेत्रा ला भेटायचा खूप प्रयत्न केला पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. मनोमन झुरत तो जगत होता. आईला त्याची ही अवस्था बघवत नव्हती पण बाबांच्या निर्णयापुढे, समाजाच्या भितीने त्या काही पुढाकार घेत नव्हत्या.

    अशातच वर्ष गेले पण राघव काही नेत्राच्या विचारातून बाहेर पडला नव्हता. तिघेही रात्री जेवताना टिव्ही समोर बसले होते. एका न्यूज चॅनलवर माईंची मुलाखत सुरू होती. आश्रमाला इथवर आणण्याचा प्रवास त्या वर्णन करताना त्यांच्या बोलण्यात नेत्रा चा उद्धार सतत होत होता. आमची नेत्रा मेहनतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून मोठ्या हुद्द्यावर रूजू झाली हे त्या अभिमानाने सांगत होत्या. ते बघताच राघवच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. माझी नेत्रा, तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं असं तो रडक्या सुरात बोलून गेला. तिला माईंसोबत तिला टिव्हीवर बघताच त्याला खूप आनंद झाला. आपला मुलगा इतका हळवा झालाय हे बघताच बाबांच्या डोळ्यातही पाणी आले. आपण ज्या मुली विषयी चुकीचा विचार करत आलो तिने खरंच नाव कमावलं असा विचार बाबांच्या मनात आला. समाज, नातलग काय म्हणतील म्हणून आपल्या मुलाचं सुख आपण हिरावून घेत आहोत याची त्यांना जाणीव झाली.

    एक अपराधीपणाची भावना मनात घेऊन ते काही दिवसांनी राघव सह आश्रमात आले. नेत्राच्या कर्तुत्वाचे कौतुक करत त्यांनी माईंची माफी मागितली आणि नेत्रा ला राघव साठी मागणी घातली. आता हा समाज, माझे नातलग कांहीही म्हणो पण माझ्या मुलाचा सुखी संसार आम्हाला बघायचा आहे आणि तो नेत्रा शिवाय अपूर्ण आहे हे त्यांनी माईंना सांगितले.

    राघव आणि नेत्रा हे सगळं ऐकून मनोमन खूप आनंदी झाले. इतके दिवस मनात साठवलेले प्रेम, राघवच्या आठवणी नेत्राच्या डोळ्यातून अश्रु रूपात बरसायला लागल्या.तिचा बांध फुटला, राघव कडे बघत ती आनंदाने रडायला लागली. त्यानेही तिचे अश्रू पुसत हळूच तिला मिठी मारली.

    माईंनी मोठ्या आनंदाने नेत्रा चे लग्न राघव सोबत लावून दिले. आपली नोकरी सांभाळत सासरी आल्यावर सुरवातीला कुरकुर करणार्‍या  नातलगांची मने नेत्राने प्रेमाने जिंकली.

    आपल्या आजूबाजूला प्रेमापेक्षा जास्त समाज, नातलग , मानपान, प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले जाते. अशाच गोष्टींचा विचार करून घरच्यांचा नकार, धमक्या  बघता अनेकदा तरुण पिढी प्रेमापोटी आपले आयुष्य संपवायला ही मागेपुढे पाहत नाही. अशाच परिस्थितीतून सामाजिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने ही कथा मी लिहीलेली आहे.

    अशी ही आगळीवेगळी सामाजिक प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

    नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला पडायचे पण कधी कुणाला विचारण्याची हिंमत झाली नाही. अनाथाश्रमाच्या मुख्य सविता ताई म्हणजेच माई तिच्या साठी आई समान होत्या तर अख्खा आश्रम तिचं कुटुंब.

    बारावीमध्ये ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. पुढे संगणक शाखेत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिलाच दिवस होता तो. नेहमीप्रमाणेच अगदी साधा पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली आणि माईंचा आशिर्वाद घेऊन कॉलेजला निघाली. जुलै महिना असल्याने जरा पावसाचे चिन्ह दिसत होतेच. लगबगीने बस स्टॉपवर येऊन उभी राहिली. बस स्टॉपवर दोन लहान मुले बाजूला खाली फुटपाथवर बसून खेळत होते आणि त्यांची आई तिथे उभ्या असलेल्या लोकांना गुलाबाची फुले विकत घेण्यासाठी विनवण्या करत होती. यावरच त्यांचं पोट भरत असं एकंदरीत परिस्थिती पाहता नेत्राला लक्षात  आलं. तिला त्या मुलांकडे बघून वाईट वाटत होते, मनात काही तरी विचार करत तिने स्वतः जवळचा जेवणाचा डबा त्या लहान मुलांना दिला आणि ती मुलेही अगदी त्यावर तुटून पडली. ते बघताच त्यांच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि तिने एक गुलाबाचे फुल नेत्राला आग्रहाने दिले.

    हा सगळा प्रकार बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येक जण बघत होता. त्या गर्दीत राघव सुद्धा उभा होता. त्याला नेत्रा विषयी एक वेगळाच अभिमान वाटला, कौतुकही वाटले. तिच्या प्रेमळ स्वभावाची जाण त्याला त्या क्षणभरात झाली‌. त्याचे डोळे तिच्यावरच स्थिरावले.

    काही वेळातच बस आली आणि नेत्रा बसमध्ये चढली. योगायोगाने नेत्रा आणि राघवला आजुबाजूला जागा मिळाली. नेत्राचे कौतुक करण्याच्या उद्देशाने राघव म्हणाला , “हाय, मी राघव. तुम्ही खरंच खूप छान काम केलं आज..त्या भुकेल्या मुलांना डबा दिला तेव्हा त्या मुलांच समाधान बघता खरंच खूप छान वाटलं. तुमचं खरंच खूप कौतुक वाटलं..आपणही काही मदत करावी म्हणून मी दोन पिवळ्या गुलाबाची फुले त्या बाईंकडून घेतली पण आता या फुलांचा तुम्ही स्वीकार केला तर मला आनंदच होईल. फक्त तुमचं कौतुक म्हणून माझ्याकडून हि भेट समजा.”

    नेत्राला त्याच्या बोलण्याने जरा अवघडल्या सारखे वाटले. ती त्याला म्हणाली, “माफ करा पण आपली काही ओळख नसताना मी या फुलांचा स्वीकार करू शकत नाही..”

    त्यावर तो म्हणाला, ” असो… काही हरकत नाही..पण गैरसमज नको..मला खरंच कौतुकास्पद वाटलं तुमचं वागणं म्हणून म्हंटलं शिवाय मी एका मुलाखतीला जातोय तिथे फुले घेऊन कसा जाऊ हाही प्रश्न आहेच..”

    ते ऐकताच मनोमन विचार करत नेत्रा म्हणाली, “ठिक आहे द्या मग मला ती फुले.. गरज नसताना त्या माऊली ला मदत व्हावी म्हणून घेतलीत ना फुले..मग तुमचं सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल.. तुमच्या मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा ?..”

    तिचं बोलणं, तिचं वागणं बघता राघवच्या मनात तिच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. दोघांनी स्टॉप येत पर्यंत गप्पा मारल्या.

    कॉलेजचा पहिला दिवस नेत्रा साठी खास होता.सगळा नविन अनुभव, नविन विश्व. आश्रमात परत आल्यावर तिने माईंजवळ दिवसभराच्या सगळ्या आठवणींची उजळणी केली. त्यात राघव विषयी सांगताना का कोण जाणे पण एक आनंदाची लहर तिच्या चेहऱ्यावर झळकली, ते भाव माईंनी अलगद टिपले. माईंना जरा काळजी सुद्धा वाटली पण आपली नेत्रा समजुतदार आहे, विचारी आहे शिवाय ती आपल्या पासून काही लपवत नाही याची त्यांना खात्री होती.

    दोन दिवसांनी सकाळी परत बस स्टॉपवर तिला राघव भेटला, पेढ्यांचा डबा तिच्यासमोर देत तिला म्हणाला, “मिस नेत्रा, तुम्ही माझ्यासाठी लकी ठरलात..मला नोकरी मिळाली.. तुमच्याशी गप्पा मारून फ्रेश मूडमध्ये मुलाखत दिली आणि निवड झाली..थ्यॅंक्यू.. प्लीज पेढा घ्या ना..”

    नेत्राने त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “माझ्या मुळे नाही तुम्ही तुमच्या जिद्दीने, मेहनतीमुळे निवडले गेले..”

    राघव तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता. काळी सावळी असली तरी किती सुंदर व्यक्तीमत्व आहे हे असा विचार करत तो एकटक तिला बघत होता. दोघांची नजरानजर झाली तशीच ती लाजली.

    राघव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार मेहनती मुलगा. पिळदार शरीरयष्टी, सावळा वर्ण, उंच पुरा रूबाबदार.

    दोघांची त्या बस स्टॉपवर अधून मधून भेट व्हायची. हळूहळू मैत्री झाली.

    आजकाल नेत्राच्या वागण्यात बोलण्यात जरा वेगळा बदल माईंना जाणवत होता. ती एका वेगळ्या विश्वात वावरत होती. आनंदी राहत होती, आपण कसं दिसतोय, कॉलेजला जाताना नीट तयारी केली की नाही अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे नेत्रा बारकाईने लक्ष देऊ लागली होती.

    माईंना हा बदल आवडत होता पण नेत्रा प्रेमात तर पडली नसेल ना की कॉलेज मध्ये इतर मुलींमध्ये आपणही नेटकं दिसावं म्हणून हा बदल झाला याचा अंदाज त्यांना बांधता येत नव्हता. हल्ली तिच्या बोलण्यात राघवचा उद्धार हा असायचाच.
    पहीलाच मित्र होता तो तिचा शिवाय वयाच्या ज्या टप्प्यावर नेत्रा होती त्यामुळे माईंना तिची काळजी वाटू लागली. तिच्याशी यावर बोलावं का असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

    इकडे दोघांची मैत्री छान रंगली होती. एकमेकांची ओढ निर्माण झाली होती. राघवला नेत्राने ती अनाथ असल्याचे सांगितले होतेच पण त्याला त्याची काही अडचण नव्हती. तो तिच्या प्रेमात पडला होता. मनापासून त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली होती.

    एक दिवस त्याने बस स्टॉपवरच्या त्या माऊली कडून लाल गुलाबाचे फुल नेत्राला देत आपले प्रेम व्यक्त केले. तिलाही सगळं हवंहवंसं वाटत होतं पण आपण अनाथ आहोत तेव्हा राघवचे आई वडील आपला स्वीकार करतील का या विचाराने ती निराश झाली. राघव वर तिचेही प्रेम होतेच, त्याच्या सोबत संसार करण्याचे स्वप्न ती बघत होती. पण त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला तरी पुढे काय..हे संसाराचं स्वप्न वास्तव्यात उतरू शकणार की नाही याची तिला भिती वाटत होती.

    याविषयी माईंसोबत बोलावं का असंही तिला वाटत होतं.

    राघव तिच्या उत्तराची वाट बघत होता पण नेत्रा मात्र विचारांच्या गर्दीत अडकली होती.

    आता नेत्रा पुढे काय करेल ? दोघांच्या नात्याचे भविष्य काय असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    काय मग उत्सुकता वाढली की नाही, कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

    प्रिय दादा,

    रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ?
    यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जाण्याचं ठरवलं असावं आणि म्हणूनच तू आपल्या या लहानग्या बहिणीला स्वरक्षणासाठी बालपणापासूनच सबल बनविले. तुझ्यामुळेच मी क्रिडा स्पर्धेत सहभागी व्हायला लागलेले‌, आजही कॉलेजमध्ये कुठल्याही खेळात मी मागे नाही. सोबतच तुझ्यामुळे मिळालेले कराटे प्रशिक्षण मला स्वतः च्या रक्षणासाठी आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे. या सगळ्यामुळे माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्याच संपूर्ण श्रेय तुलाच आहे दादा. घरी आई बाबांना तुझी उणीव भासू नये म्हणून बाहेरचे सगळे व्यवहार तू मला शाळेपासूनच शिकविले. बॅंकेचे काम असो किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार, तू अगदी मला सोबत घेऊन करत आलास आणि त्यामुळेच मी आज अगदी आत्मविश्वासाने सगळं सांभाळते.

    तुझ्या साठी देशभरातून अनेक राख्या येतात, शाळकरी मुली हातावर राख्या बांधतात तेव्हा तुला माझी आठवण येते असं तू म्हणालास मागच्या वर्षी पण दादा तू मला स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप तत्पर बनविले आहेस पण या भारतमातेला तुझ्या रक्षणाची खूप गरज आहे तेव्हा माझी रक्षा कर असं न म्हणता या भारतमातेच्या रक्षणासाठी असंच कायम लढत रहा हीच माझी इच्छा.

    दादा, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. अख्ख्या देशातील  बहिणींना तुझ्या सारख्या भावाची गरज आहे, तुझ्यामुळे अख्खा देश शांतपणे जगू शकतो, झोपू शकतो. आपल्या या देशात कुठेही काही संकट आलं तरी तू मदतीला धावून जातो तेव्हा संकटात सापडलेल्या प्रत्येक बहिणीला तुझा अभिमान वाटतो, तुला मनोमन ती खूप आशिर्वाद देते. त्या संकटात सापडलेल्या प्रत्येकाला.अगदी ईश्वरा समान भासतो तू.  यापेक्षा मोठे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार दादा. जेव्हा तुझ्या कौतुकाचे गोडवे अख्खा देश गातो त्या क्षणी मला खरंच तुझी बहीण असल्याचा खुप अभिमान वाटतो.

    पत्रा सोबत राखी सुद्धा पाठवत आहे. तसं पाहिलं तर आपलं बहिण भावाचं नातं या राखीच्या रेशमी धाग्यापेक्षा तुझ्या कडून मला मिळालेल्या स्व रक्षणाच्या धड्यांमुळे अजूनच घट्ट झालं आहे. दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस. जिवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी लढणार्‍या माझ्या दादाचं आणि माझं असं एक अनोखं बंधन आहे ज्याला कशाचीही तोड नाही.

    तू घरी आलास ना की आपण सगळे सण एकदाच साजरे करू. तेव्हा आता पत्र वाचून माझी आठवण आली तरी निराश न होता असाच भारतभूमीच्या रक्षणासाठी लढ.

    इकडे आम्ही सगळे ठिक आहोत. आमची काळजी करू नकोस.

    तुझीच लाडकी,
    मिनू

    आपल्या लाडक्या बहिणीचे पत्र वाचून या दादाच्या मनाची अवस्था काय होणार याचा विचार करताना मनात बॉर्डर सिनेमातील “संदेशे आते है…” गाणे आपसूकच आठवते.

    खरंच विचार करण्याजोगे आहे. सीमेवर सदैव तत्पर असणार्‍या या भावावर अख्ख्या भारतभूमीच्या रक्षणाची जबाबदारी आहे. देशभरात बहिण भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सोहळा सुरू असताना हा भाऊ देशसेवा करत या मातृभूमीसाठी लढत असतो. अशा या शूर भावाला माझा सलाम.

     

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    माझा हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    लेख वाचून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

    रोहन पेशाने सिव्हिल इंजिनिअर, उंच पुरा रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला अत्यंत हुशार पंचेवीशीतला मुलगा. एका छोट्याशा गावातील धरणाच्या कामाची मुख्य जबाबदारी रोहनवर सोपवण्यात आली होती आणि त्या निमित्ताने तो एका त्या गावात काही महिन्यांसाठी वास्तव्यास होता. गावात आला तसंच इंजिनिअर साहेब आलेत म्हणत गावकरी त्याच्या मागेपुढे होते, गावात प्रत्येकाला रोहन विषयी फार कौतुक वाटत होते. इतका मानपान, इतकी वाहवा बघता रोहनला मनोमन आनंद होत होता पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांनी आपल्याला असं तुम्ही आम्ही करत मागेपुढे धावणे त्याला जरा अवघडल्यासारखे वाटले. असो, गावकऱ्यांचे प्रेम म्हणून तोही त्यांच्यात रमला. आपल्या कामाची आखणी करत बसला असतानाच एक दिवस गावातला रामू त्याला आवाज देऊ लागला, “रोहन सायब, तुमास्नी गावच्या मंदिरात बोलावलं सरपंचांनी. भजनाचा कार्यक्रम हाय, जरा वेळ या म्हणत्यात तुमास्नी..”

    रोहन जरा विचार करत म्हणाला , “ठिक आहे. आलोच थोडा वेळात काम संपवून. ”

    रोहन हातातील काम संपवून मंदिराच्या दिशेने निघाला तोच त्याच्या कानावर भक्तीगीताचे मधूर सूर पडले, ते सुर एखाद्या तरूणीचे आहे हे लक्षात आले होतेच पण या लहानग्या गावात कोण इतकं छान गात आहे हे बघण्यासाठी तो आतुर झाला.
    जसाच तो मंदिरात पोहोचला तसेच गावकरी साहेबांना खुर्ची द्या, पाणी द्या करत मागेपुढे, आजुबाजूला जमले. तो मात्र त्या गाण्यात तल्लीन झाला होता,

    “श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
    लोग करें मीरा को यूँ ही बदनाम

    साँवरे की बंसी को बजने से काम
    राधा का भी श्याम वोतो मीरा का भी श्याम

    जमुना की लहरें बंसीबट की छैयां
    किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया
    श्याम का दीवाना तो सारा बृज धाम..”

    रोहनचे डोळे त्या आवाजाकडे लागले, ती अगदीच सगळ्यात समोर देवापुढे बसून गाण्यात तल्लीन झाली होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत रोहन क्षणभर हरवला होता. त्या आवाजात जणू काही जादूच असल्यासारखे त्याला जाणवले. पुढच्या काही वेळातच भजन संपून आरतीचा कार्यक्रम झाला आणि इतका वेळ पाठमोरी दिसणारी ती त्याला समोरासमोर दिसली. पांढराशुभ्र सलवार कमीज, लाल ओढणी, केसांची लांबसडक वेणी, त्या वेणीत मळलेला मोगर्‍याचा गजरा, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेली मीरा आरतीचे ताट हातात घेऊन जशी रोहनला दिसली तसाच तो एकटक तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या साध्या राहणीमानात ती खूप सुंदर दिसत होती.

    देवाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच पुजारीजींनी रोहनच्या हातात प्रसाद देत तिची ओळख करून दिली,
    “साहेब ही माझी मुलगी मीरा. अख्ख्या गावात मुलींमध्ये एकटीच सगळ्यात जास्त शिकलेली आहे. तालुक्याला जाऊन पदवी घेतली माझ्या पोरीने. दिवाळीनंतर लग्न आहे तिचं, तुमच्या सारखाच मोठ्या नोकरीत आहे होणारा पाहूणा.”

    ते ऐकताच क्षणभर मिराच्या आवाजाने तिच्याकडे आकर्षित झालेला, तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतच घायाळ झालेला रोहन मनात लड्डू फुटत असतानाच मनोमन उदास झाला. आजुबाजूच्या लोकांचे बोल त्याला आता ऐकू येत नव्हते. मिराकडे चोरून बघताना त्याच्या मनावर झालेला घाव त्याला तिच्याकडे आकर्षित होण्यापासून वाचवत होता. आज अचानक असं काय झालंय,का इतका आकर्षित झालो मी तिच्याकडे हा विचार करतच रोहन त्याच्या राहण्याच्या खोलीवर परत आला.

    रात्री उशिरा पर्यंत त्याला झोप लागत नव्हती, ते गाण्याचे बोल, तो सुमधुर आवाज त्याच्या कानात अजुनही गुंजत होता. मीराचा चेहरा सतत डोळ्यापुढे येत होता. पहिल्यांदाच रोहनची अशी अवस्था झाली होती. तिच्याच विचारात त्याला झोप लागली. सकाळी उठून कामावर जाताना‌ आज पहिले तो मंदिरात गेला. तिथे देवाचे दर्शन घेऊन मग कामावर जायला निघाला तेव्हा मीरा मंदिरात येत होती, तिचे ओले केस, निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस तिला अगदी शोभून दिसत होता. हातात फुलांनी भरलेले पुजेचे ताट होते.

    दोघांची नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना एक स्माइल दिली. ती मंदिराच्या पायर्‍या चढून वर येताच घंटी वाजवून आत गेली. परत एकदा तिच्या विचारात क्षणभर हरवलेला रोहन त्या घंटानादाने भानावर आला.

    तिचं लग्न ठरलं आहे, ती आपली कधीच होऊ शकत नाही हे कळत असूनही तो तिच्यात गुंतत होता. ती न चुकता सकाळी नऊ वाजता मंदिरात येते हे लक्षात आल्यापासून तोही तिची एक झलक बघायला त्याच वेळी तिथे यायचा आणि मग साइटवर जायचा. रोजची ती नजरानजर, ती गोड स्माइल त्याच्या दिनचर्येचा भाग बनले होते.
    कितीही आवरलं तरी तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. आपण मीराच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला एव्हाना कळून चुकले होते. तिलाही त्याचे भाव कदाचित कळाले असावेत.

    एकदा कागदपत्रातील माहिती ऑनलाइन भरून एक रिपोर्ट तयार करायचा होता. अवधी कमी आणि भरपूर काम असल्याने त्याची तारांबळ उडत होती. या परिस्थितीत त्याला मीराची बरीच मदत झाली, तिचे संगणक प्रशिक्षण झाले असल्याने गावकऱ्यांनी तिला रोहनच्या मदतीला पाठवले होते. त्या प्रसंगामुळे जरा का होईना पण दोघांचे बोलणे झाले.

    रोहन आता तिच्यात खूप गुंतला होता, प्रेमात पडला होता पण त्या प्रेमात कुठलाही स्वार्थ, कुठलीही वासना नव्हती. एक निस्वार्थ निरागस प्रेमाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती पण ती भावना तो कधीही व्यक्त करू शकणार नव्हता. गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास त्याला जपायचा होता, मीराला आनंदी बघायचं होतं, तिच्या नजरेत आपल्याविषयी आदर आहे तो टिकवून ठेवायचा होता.

    तिला त्याच्या मनातले भाव कदाचित कळाले होते पण या नात्याला काहीही भविष्य नाही हे त्याला कळत होते. त्याचा प्रोजेक्ट आता संपत आला होता. या काही महिन्यांत मीराच्या अनेक आठवणी त्याने मनात साठवून ठेवल्या होत्या.
    गावाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी एक छोटासा समारोप सोहळा त्याच मंदिरात आयोजित केला होता. सरपंचांनी रोहन चे भरभरून कौतुक करत त्याचा सत्कार केला. त्या सोहळ्यात रोहनची नजर मीराला शोधत होती पण ती काही दिसली नाही.

    परत निघताना गाडीत बसला तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी हात हलवत निरोप देणारी मीरा त्याला अखेर दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याने गावाचा निरोप घेतला.

    मीरा विषयी मनात असलेलं प्रेम आठवणी या कायम रोहनच्या स्मरणात राहणार्‍या होत्या. ते एक अव्यक्त प्रेम होते.
    तिची आठवण आली की तो मनोमन एकच प्रार्थना करायचा, “मीरा तू जिथे कुठे असशील, आनंदी रहा..हसत रहा..”

    आता जेव्हा केव्हा धरणाची पाहणी करण्यासाठी त्याला त्या गावात जावं लागायचं त्यावेळी त्या सगळ्या आठवणी नव्याने ताज्या व्हायच्या. आजही ते सुमधुर आवाजातील गाणे त्याच्या कानात गुंजत असायचे.

    “श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
    लोग करें मीरा को यूँ ही बदनाम..”

    अशी ही एक आगळीवेगळी अव्यक्त प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सहवास तुझा ( एक प्रेमकथा )

    रविवार असल्याने आज प्रिया घरीच होती. सायंकाळी चहाचा कप हातात घेऊन प्रिया बाल्कनीत जाऊन बसली तितक्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण बरं आलं असेल असा विचार करत दार उघडले तर समोर एक मोठा हार्टच्या ♥️ आकाराचा गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन कुणीतरी उभे होते. चेहऱ्यापुढे तो गुच्छ धरल्यामुळे कोण आहे हे तिला बघताक्षणी कळाले नाही.
    पुढच्या काही क्षणातच मनिष ने तो गुच्छ बाजुला करत तिला विश केले, “हॅपी व्हॅलेंटाईन डे स्वीटहार्ट…?”

    मनिष आठवडाभरासाठी कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता.

    प्रिया मनिषला असं अचानक परत आलेला बघून मोठ्या आनंदाने थॅंक्यू सो मच म्हणाली पण तिच्या लक्षात आलं की आज तर व्हॅलेंटाईन डे नाहीये. क्षणभर तिला शब्द सुचत नव्हता, जरा गोंधळून त्याच्या हातातला गुच्छ हातात घेत ती म्हणाली, “किती गोड सरप्राइज..तू असा अचानक आलास परत…तू तर दोन दिवसांनंतर येणार होतास ना…आणि हे काय आज कुठला व्हॅलेंटाईन डे आहे..भर पावसाळ्यात ?‌‌…”

    मनिष घरात येत बॅग बाजूला ठेवून प्रिया ला मिठीत ओढुन म्हणाला , “हे काय, इतक्या लवकर विसरलीस आजचा दिवस. मागच्या वर्षी आजच्या दिवशीच तर आपली पहिल्यांदा भेट झालेली. मग आपल्यासाठी आजचा दिवसच व्हॅलेंटाईन डे आहे की नाही.”

    प्रिया जरा लाजतच त्याला उत्तरली, “हो आठवतोय ना…तो पाऊस..ती आपली पहिली भेट त्या कॅफे मध्ये.. हॅपी व्हॅलेंटाईन डे अॅंड हॅपी अॅनिव्हर्सरी टू..बरं तू लवकर कसा काय आलास..”
    मनिष तिला चिडवत म्हणाला, “का? नको होतं का यायला मी…काम लवकर संपलं म्हंटलं बायकोला सरप्राइज द्यावं..खूश होईल बायको पण ही तर उलट विचारतेय राव..”

    प्रिया त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, “असं का म्हणतोय, तू लवकर आला याचा आनंदच आहे मला.. तुझ्याशिवाय हे घर खायला उठत होतं एकटीला. आता असं एकटीला सोडून नको जाऊस परत कुठे.”
    मनिष तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, “आता आलोय ना मी. आय लव्ह यू..आय मिस्ड यू सो मच..चल मस्त तयार हो डिनर ला जाऊया बाहेर..”

    मनिष आणि प्रिया यांचं नुकतंच लग्न झालेलं. रेशीमबंध नावाच्या एका वधू वर सूचक मंडळातून दोघांच्या घरच्यांची ओळख झाली आणि त्यांनी मनिष प्रिया ची भेट घडवून आणली. प्रिया आयटी कंपनीत नोकरीला, दिसायला सुंदर, गोरा वर्ण, सुडौल बांधा, शोभेसा हेअरकट. मनिष सुद्धा त्याच क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला, देखणा, उंचपुरा राजबिंडा.

    पहिल्यांदा भेटायचं ठरलं तेव्हा एका कॅफे मध्ये ऑफिसनंतर दोघे भेटलेले. त्या दिवशी धो धो पाऊस सुरू होता. प्रिया कशीबशी रिक्षा शोधून कॅफे मध्ये पोहचली तर मनिष आधीच तिची वाट बघत बसलेला होता. दोघांनी एकमेकांचे फोटो बघितले होते त्यामुळे त्या कॅफे मधल्या गर्दित त्यांना एकमेकांना शोधायला वेळ लागला नाही. प्रिया समोर आली तशीच मनिषची नजर तिच्यावर स्थिरावली. लाल रंगाचा स्लीवलेस कुर्ता, मोकळे केस, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, अगदी कुणी अप्सरा नजरेसमोर आल्याचा भास मनिषला झाला. ती जसजशी त्याच्या दिशेने येत होती तसंच मनिषच्या हृदयाचे ठोके वाढत होते. ती जवळ येताच हाय म्हणाली तसाच तो भानावर आला. दोघांनी औपचारिक ओळख करून घेत जरा वेळ गप्पा मारल्या, सोबतीला कॉफी होतीच.
    मनिषला प्रिया पहिल्या भेटीतच आवडली. जितकं सुंदर तिचं रूप तितकंच प्रेमळ, मृदू बोलणं त्याला मनातून भावलं.

    बराच वेळ झाला पण पाऊस काही थांबत नव्हता. आता घरी निघायला हवं म्हणून दोघेही कॅफेच्या बाहेर आले पण इतक्या पावसात घरी कसं जायचं म्हणून प्रिया जरा विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत मनिष तिला म्हणाला, “इफ यू डोन्ट माईंड, मी तुला घरी सोडतो. इतक्या पावसात एकटी जाणार तरी कशी.”

    प्रिया सुरवातीला नको म्हणाली पण उगाच पावसात भिजत रिक्षा शोधल्या पेक्षा मनिष चा प्रस्ताव उत्तम आहे असा विचार करत ती त्याच्या सोबत तिच्या घरी जायला निघाली. मनिषने कार काढली, प्रियाच्या मनात जरा वेगळेच भाव होते. असं लग्नाच्या निमित्ताने त्याला पहिल्यांदाच भेटल्यावर सोबतच जायचं म्हणजे तिला जरा अवघडल्या सारखे वाटले. तसा तिलाही तो पहिल्या भेटीतच आवडला होता. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, बोलण्यातला आत्मविश्वास तिला त्याच्याकडे आकर्षित करत होता.

    भर पावसात असं मस्त वातावरणात एकत्र जाताना दोघांच्याही मनात लड्डू फुटत होते, जरा वेळ काय बोलावं दोघांनाही कळेना. ती शांतता जरा दूर व्हावी म्हणून मनिष ने रेडिओ सुरू केला तर त्यावर गाणेही तसेच सुरू होते,

    “टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात..
    कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात…
    टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात…
    नाही कधी सरी तरी भिजते अंग पाण्याने सोचा तुम्हे पलभर भी बरसे सावन जोमाने,
    शिंपल्याचे शो पीस नको जीव अडकला मोत्यात… टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात…”

    मनिष ने रेडिओ चॅनल बदलत प्रिया सोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिला अवघडल्या सारखे नको वाटायला म्हणून उगाच ऑफिस, काम असं काही तरी बोलत संभाषण सुरू केले. जरा वेळ गेला की परत दोघेही गप्प..मग मंद आवाजात गाण्यांचे सुर कानावर पडले की जणू आपल्यासाठीच गाणं लागलंय असा विचार मनात येऊन दोघेही लाजत, मनोमन आनंदी होत प्रवास करत होते.

    प्रियाच्या घराजवळ पोहोचणार होते तितक्यात मनिष तिला म्हणाला, “प्रिया तुझ्या मनात काय आहे माहीत नाही पण मला तू पहिल्या भेटीतच आवडली. तुला वाटेल हा किती उतावळा, लगेच होकार दिला पण तुला हरकत नसेल तर पुढचे काही दिवस आपण जसं जमेल तितकं भेटायचं का म्हणजे आपल्याला एकमेकांविषयी अजून जास्त माहीत होईल, स्वभाव जरा तरी कळेल. पण हो तुला मी आवडलो असेल तरचं..”

    प्रियाला त्याच म्हणणं पटलं होतं पण तरी ठीक आहे मी तसं विचार करून कळवते म्हणत ती निघाली. तिला घरी सोडून परत जाताना मनिष एकटाच मनोमन आनंदी होऊन हसत स्वत:शीच बोलत होता. रोमॅंटिक गाणे गुणगुणत होता. काही तरी वेगळंच वाटलं होतं त्याला तिला भेटल्यानंतर जे सगळं तो पहिल्यांदाच अनुभवत होता.
    प्रिया हो म्हणेल की नाही हा विचार मनात आला की जरा निराश व्हायचा. रात्रभर तिच्याच विचारात तो नकळत झोपी गेला. तिचा चेहरा मात्र सतत त्याच्या नजरेसमोर दिसत होता.

    दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोहोचताच त्याला प्रियाचा फोन आला, तिचा होकार ऐकून तो आनंदाने मनोमन वेडापिसा झाला. मनातच गाण गुणगुणायला लागला,

    “पहला पहला प्यार है…पहली पहली बार है..जान के भी अनजाना कैसा मेरा यार है..”

    झालं पुढचे काही दिवस दोघांच्या भेटी गाठी झाल्या. एकमेकांविषयी एक ओढ निर्माण झाली, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढच्या काही महिन्यांनी दोघांचे लग्न झाले. अगदी परफेक्ट कपल अशी त्यांची एक ओळख निर्माण झाली होती.

    आज‌ दोघांच्या भेटीला एक वर्ष पूर्ण झाले होते. पहिल्यांदा भेटलो तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे, प्रपोज केले तो दिवस प्रपोज डे, तिला पहिल्यांदा गुलाबाचे फूल दिले तो रोझ डे असे मनिषचे मत. म्हणूनच आजचा दिवस त्याला खास बनवायचा होता.

    दोघेही बाहेर जायला तयार झाले. प्रियाने मस्त ब्लॅक वनपीस घातला, हलकासा मेकअप केला. त्याच्या सरप्राइज मुळे एक वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिला तयार झालेलं बघताच त्याला पुन्हा एकदा त्यांची पहिली भेट आठवली‌ आणि तो म्हणाला, “ब्युटिफुल, यू आर लूकींग सो हॉट..”

    ती लाजतच त्याला उत्तरली, “थॅंक्यू. निघायचं? ”
    तो मस्करी करत म्हणाला, “तसं तर आता मूड बदलला माझ्या इतक्या सुंदर बायकोला बघून पण आता जावं लागेलच ना..?”

    दोघेही कॅंडल लाइट डिनर साठी छानशा रेस्टॉरंट मध्ये गेले. तिथलं वातावरण अगदीच रोमॅंटिक होतं, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात प्रिया अजूनच उठून दिसत होती. सोबतीला रोमॅंटिक म्युझिक सुरू होते. दोघांनी एकत्र कपल डान्स केला नंतर डिनर केला. डिनर करून मस्त लॉंग ड्राईव्ह ला जाऊन उशीरा दोघेही घरी आले. प्रिया आज खूप आनंदी होती. एखाद्या स्वप्नासारखं सगळं अनुभवल्या सारखं वाटत होतं तिला.

    घरी येताच मनिष ने तिचा हात हातात घेत तिला स्वतः कडे ओढले तशीच ती लाजून चूर झाली. तिच्या हृदयाची धडधड वाढली, चेहऱ्यावरचे भाव बदलले. मनिष एकटक तिचं रूप, तिचे भाव टिपत अजूनच तिच्याकडे आकर्षित होत होता. दोघेही फक्त नजरेनेच बोलत होते आणि नजरानजर होताच ती लाजत होती. त्याने तिला अजूनच जवळ ओढले तसंच दोघांच्याही मनात एकच गाणे सुरू झाले,

    ” बाहो के दरमिया दो प्यार मिल रहे हैं,

    जाने क्या बोले मन,

    डोले सुन के बदन धड़कन बनी ज़ुबा…”

    ती सायंकाळ, ती रात्र, त्यातला प्रत्येक क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय होता.

    अशी ही दोघांची गोड प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

    फोटो- गूगल साभार

    .

  • मैत्री बनली जगण्याची उमेद…

    सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”

    काकू सोसायटीच्या भजन मंडळात अगदी उत्साही व्यक्ती त्यामूळे त्यांच्या बर्‍याच मैत्रिणी होत्या. काका रिटायर्ड झालेले. एकंदरीत सुखी कुटुंब.
    या आनंदात वावरणाऱ्या सुखी कुटुंबावर एक दिवस अचानक मोठे संकट कोसळले. ऑफिसमधून परत येताना सुजयला अपघात झाला. डोक्याला जबर मार लागला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. काका काकूंना हा धक्का पचविणे अशक्य झाले होते.

    सुजयच्या लग्नाचे स्वप्न बघणार्‍या काका काकूंना त्याचे अंतिम सोपस्कार पार पाडावे लागले. काकू रडून मोकळ्या व्हायच्या पण काका मात्र मनातच कुढत काकूंना आधार देत होते. या घटनेला महिना होत नाही तोच या सगळ्या धक्क्यामुळे काकांना हार्ट अटॅक आला, तोही इतका तीव्र की त्यांनीही क्षणभरात या जगाचा निरोप घेतला. आता मात्र काकू पूर्णपणे मोडून पडल्या. आता कुणासाठी जगायचे म्हणत अन्न पाणी सोडण्याचा विचार करत होत्या. नातलग काही दिवस राहून परत गेले, घरी कुणी ना कुणी असेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर ठेवला. नंतर मात्र त्या एकट्या पडल्या, रात्र रात्र जागून फक्त मुलगा आणि नवर्‍याच्या आठवणीत रडायचं इतकंच काय ते सुरू होत. अशामुळे काकूंच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम होत होता. या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी खूप मदत केली. काकूंना एकटे सोडणे धोक्याचे आहे म्हणून आळीपाळीने एक एक मैत्रीण त्यांच्या सोबतीला असायच्या. भजन मंडळात त्यांना बळजबरीने घेऊन जायच्या.या सगळ्यामुळे काकू काही क्षण का होईना पण दु:खातून बाहेर यायच्या.

    काकूंना या सगळ्या धक्क्यामुळे झोपेच्या गोळ्या खावून झोपण्याची वेळ आलेली. सततच्या विचारचक्रामुळे त्यांना झोपच लागेना. काकूंच्या मैत्रीणी त्यांना शक्य तो प्रयत्न करत धक्क्यातून सावरायला मदत करत होत्या. कधी भजनात व्यस्त ठेवायच्या तर कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन जायच्या. असंच एकदा सगळ्या एका अनाथाश्रमात गेल्या. तिथल्या मुलांना मायेची किती गरज आहे हे लक्षात घेऊन काकूंनी स्वतः ला त्या मुलांच्या सेवेत व्यस्त करून घेतले. काकांची पेंशन मिळायची शिवाय काकूंच्या नावाने काही पैसा होताच. त्या सगळ्याला एक वाटा काकू अनाथाश्रमात, गरजूंना दान करण्यात वापरायच्या.

    अधूनमधून नातलग ये-जा करायचे. अशातच वर्ष गेलं. आज काकूंच्या सुजयला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ काकूंच्या मैत्रीणींनी गरजूंना दान धर्म करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुजयला श्रद्धांजली अर्पण करत काकू म्हणाल्या , “आज मी जीवंत आहे हे फक्त आणि फक्त माझ्या या मैत्रीणींमुळे, त्या नसत्या तर कदाचित माझं आयुष्य मी कधीच संपवलं असतं. आता मनावर दगड ठेवून मी जगते आहे. सुजय आणि रावांच्या आठवणी मनात अमर आहेत. पूर्वी झोपेच्या गोळ्या न खाता मला झोपच येत नव्हती पण आता मात्र मला ह्या गोळ्यांची गरज नाही तेही फक्त माझ्या ह्या सख्यां मुळे. या माझ्या जीवलग सख्यांनी मला जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली.”

    हे सगळं बोलताना काकू आणि त्या ठिकाणी असलेला प्रत्येक जण अश्रू गाळत होता.

    ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ह्यातला काही भाग काल्पनिक आहे.

    खरंच आहे ना, मैत्रीच्या नात्यात वय , धर्म, जातपात अशा गोष्टी कवडीमोल असतात. एकेकाळी नातलग पाठ फिरवतिल पण मैत्री मात्र सदैव पाठीशी उभी राहते‌.

    हि कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पूरग्रस्ताचे मनोगत…

    नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.

       खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे किराणा दुकान, त्यावरच सगळा संसाराचा गाडा चालतो. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे हे एव्हाना कळाले होतेच पण ही नदी आमची देवता धोक्याची पातळी ओलांडून असं रौद्र रूप धारण करून आमचे अख्खे संसार एका क्षणात स्वतःच्या पोटात सामावून घेईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पाहता पाहता आजुबाजूच्या गावात पाणी शिरायला सुरवात झाली, काहींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आम्ही सगळी परिस्थिती टिव्हीवर बघून घाबरलो होतो. नंतर लाइट नसल्याने काय चाललंय काही कळत नव्हतं. आमच्यावर कुठल्याही क्षणी ही परिस्थिती ओढाविणार हे माहित होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती. कधीही आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल म्हणून आम्ही सतर्क होतोच पण आतापर्यंत पै पै साठवून उभ्या केलेल्या ह्या घराचं काय? मोठ्या उत्साहाने घरात एक एक वस्तू घेतली, संसार सजविला पण आता जीवाची पर्वा करत घराचा विचार न करता सगळं सोडून कुठल्याही क्षणी जावं लागणार होतं. ही वेळ यायला फार काही उशीर लागला नाही. अचानक आमच्या गावातही पाणी शिरले, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची धडपड सुरू झाली, बरेच बचाव कार्य करणाऱ्या तुकडीची पथके सुरक्षा जॅकेट, बोट घेऊन गावात पोहोचले. आमचं किराणा दुकान आधीच पाण्याखाली गेले होते. इतका सगळा किराणा माल आता कवडीमोल झाला होता, ज्यावर संसार अवलंबून तेच क्षणात वाहून गेले. आम्ही आहे त्या अवस्थेत सुरक्षा पथकाच्या मदतीने एका शाळेत पोहोचलो. घर असं नजरेपुढे पाण्याखाली जाताना बघून अंतर्बाह्य रडू फुटले होते पण त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाचा जीव जास्त महत्वाचा होता. घरी परत कधी येणार याची शाश्वती नव्हती शिवाय परत आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल याचा विचारही करवत नव्हता.
    गेल्या दोन दिवसांपासून लाइट नव्हती त्यामुळे फोन बंद, कुणाशीही काही संपर्क नाही. नातलग सगळे काळजीत पडले होते. शाळेत आसरा घेतलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तीस वर्षांनंतर अशी परिस्थिती आमच्या गावावर आली होती तिही जास्त भयाण स्वरूपात. काही ठिकाणांहून खाण्यापिण्याचे पॅकेट, ब्लॅंकेट, कपडे अशी मदत मिळत होती. घरात सगळं असूनही आज आमचा संसार उघड्यावर आला होता. यापेक्षा मोठे दुःख काय असणार ना….आपला जीव वाचला याच समाधान मानावं की आल्या परिस्थितीवर रडावं अजूनही काही कळत नाहीये.  हा महापूर, पंचगंगेचे रौद्र रूप कधी शांत होणार माहीत नाही. सतत देवाचा धावा करत आम्ही सगळे परिस्थिती शांत व्हावी म्हणून प्रार्थना करत आहोत. एक एक क्षण आता जड जात आहे. हा सगळा अनुभव खूप भयंकर आहे, होतं नव्हतं सगळं क्षणात नष्ट झालं. परिस्थिती शांत झाल्यावर नव्याने सुरुवात करणेही आता खूप जास्त अवघड आहे.
    या सगळ्यात दोष तरी कुणाला द्यावा.
    या पुरामुळे कितीतरी मुक्या प्राण्यांना, पक्षांना जीव गमवावा लागला. गुरे ढोरे हंबरडा फोडत काही तरी सांगू पाहत आहेत, सगळीकडे नुसताच हाहाकार पसरलाय.

    आता फक्त देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतोय की पावसाला, नदीच्या प्रवाहाला शांत करत आमचं आयुष्य आम्हाला परत दे. आम्हाला आमच्या घरी जाऊ दे. ही परिस्थिती पूर्ववत कधी होणार माहीत नाही पण जे काही आम्ही अनुभवतोय ते खरंच खूप भयानक आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप असं उघड्या डोळ्यांनी पाहणे, अनुभवणे फार अवघड आहे.

    खरंच किती भयानक आहे ना सगळं. आयुष्यभर राबून उभा केलेला संसार क्षणात पाण्याखाली जाताना बघून काय वाटत असेल या सगळ्यांना .
    आपला अख्खा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा शिकार बनला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिकच भयानक आहे. अनेक बचाव पथक, नागरिक या परिस्थितीत मदतीला तत्पर आहेत. शक्य ती मदत करत प्रत्येक जण एकमेकांना आधार देत आहे. जे प्रत्यक्षात या परिस्थितीत अडकले त्यांच्या मनाचा विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतंय.

    अशा परिस्थितीत आपण प्रत्येकाने शक्य ती मदत केली तर खारीचा वाटा उचलल्या सारखे होईल.

    हा लेख लिहिण्यामागे हेतू म्हणजेच आपल्या आजूबाजूला ओढावलेल्या या संकटाची तीव्रतेची जाणिव प्रत्येकाला होत आपल्याकडून शक्य ती मदत आपण करावी.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सासर ते सासरच असतं…

           सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

       सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.
    तापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.
    आता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा,  छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”

    आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”
    ते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “स्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”

    सीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.

    सायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला‌ आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”

    या क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही. 

    सीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.
    अमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.

    दुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.
    अमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.
    तो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”

    आज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच‌. शेवटी सासर आहे हे.. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..

    सीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता
    कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.

    दुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.
    आता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.

    सासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. ?

    तर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. ?

    पटतंय ना….

    मग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आठवणी पावसाच्या… बालपणीच्या…

    “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा…
    पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा…”

    हे बालगीत ऐकण्यात अख्खं बालपण गेलं. आजही पावसाळ्याचे वेध लागले की हिच कविता मनात कुठेतरी गुणगुणायला होते, आता तर माझ्या लहान मुलीमुळे परत एकदा त्या बालपणात शिरून हि कविता ऐकायला, बघायला मज्जा येते.

     रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस आला की येणारा मातीचा तो सुगंध, त्याला कशाचीही तोड नाही. बालपणी पहिला पाऊस बघताच म्हणावं वाटायचं,

    ” ये आई , मला पावसांत जाउं दे …
    एकदाच ग भिजुनी मजला चिंब चिंब होउं दे…..
    मेघ कसे हे गडगड करिती , विजा नभांतुन मला  खुणविती….
    त्यांच्यासंगे अंगणांत मज खुप खुप नाचुं दे….”

    पहिला पाऊस आला की अगदी वातावरणाला शांत करत एक प्रसन्न सुवास दरवळत असतो.

      पावसाचं आणि आठवणींचं एक वेगळंच नातं आहे ना, कुणाला आठवतं पहिलं प्रेम तर कुणाला शिरतं बालपणीच्या आठवणीत.

      पाऊस आला की डोळ्यापुढे येतात गरमागरम भजी, पोटॅटो वेजेस, गाडी वर मिळणारं मक्याचं कणिस म्हणजेच बुट्टा आणि कडक चहा, काॅफी. त्यात आपली जवळची व्यक्ती सोबत असेल तर त्यात एक वेगळीच मजा. मनात मग गुणगुणायला होतं,

    “आला आला वारा संगे पावसाच्या धारा…
    पाठवणी करा सया निघाल्या सासुरा…”

      बालपणी पाऊस म्हंटलं की शाळेत अगदी मज्जाच मज्जा. शिक्षकांच्या शिकविण्याकडे कुणाचही लक्ष लागत नसे, वर्गातून बाहेर पाऊसाचं निरीक्षण करण्यात वेगळाच आनंद मिळायचा. मग वर्गाच्या बाहेर वर्‍हांड्यात उभे राहून तळहातावर पावसात पाणी टिपण्याचा प्रयत्न आनंदाने सुरू. शाळेतून घरी जाताना पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी होती. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत वह्या पुस्तके गुंडाळून पाठीवरच्या दप्तरात ठेवायचे म्हणजे ते भिजण्याची काळजी नको आणि मग छत्री असूनही बिनधास्त पाणी उडवत घरी जाण्याचा आनंद म्हणजे अगदी दुर्लभ अनुभव.

    भिजून घरी गेल्यावर आईने रागवले की लाडात येऊन पटापट कपडे बदलत आई जवळ काही तरी छान पदार्थ बनवण्यासाठी आग्रह करायचा आणि आईला रागावली असली तरी भिजून अंगात थंडी भरली असेल म्हणत असला तरी मस्त गरमागरम काहीतरी खाऊ आई बनवायची ते खाण्याची मजा काही औरच.

    शाळा कॉलेज मध्ये असताना सकाळी संततधार पाऊस असला की सुट्टी नक्कीच ठरलेली. मग दिवसभर घरातल्या घरात बसून झोपून का असेना.
    त्यात मग मस्त गाणी कानावर पडली की आनंदी आनंद.

    पावसात ट्रेकिंगची मज्जा म्हणजे स्वर्गसुख. निसर्गाच खुललेलं सौंदर्य बघायला भटकंती करण्यात वेगळीच मजा.
    तारुण्यात पावसाची वेगळीच ओढ, मित्र मैत्रिणी सोबत मस्त कुठे तरी फिरण्याचा बेत आखून मनसोक्त भिजायचे, मज्जा मस्ती करायची. एखादा ट्रेकिंग ग्रुप जॉईन करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जायचं, धबधब्याखाली भिजायचं आणि त्या आठवणी फोटो सोबतच मनात टिपून ठेवायच्या.

    आता कधी पाऊस आल्यावर आॅफिसला दांडी मारली की अगदी शाळेची आठवण येते. त्यात मात्र तो आधी सारखा आनंद नाही शिवाय जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर पावसाची मज्जा घेण्याचा जणू विसरच पडला आहे. बाहेर चिकचिक आहे तेव्हा सुट्टी असली तरी घरातच बसलेले बरे असं काहीसं झालंय आता पण तरीही पहिला पाऊस पडताच मनोमन  एक समाधान हे मिळतेच.

    नवविवाहित जोडप्याला तर पहिला पाऊस अतिशय रोमांचक अनुभव असतो. अविस्मरणीय दिवस असतात ते.

    काहींना पावसात आपलं प्रेम आठवतं. त्याच्या/तिच्या गोड प्रेमळ आठवणी. कुणी विरह आठवून रडकुंडीला येत जणू पावसाच्या निमीत्ताने रडून मन मोकळं करतं.

      बळीराजा तर पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, त्यांचं अख्खं आयुष्य या निसर्गावर तर अवलंबून असतं. सुरवातीला पाऊस हवाहवासा वाटतो पण पेरणी झाल्यावर अतिवृष्टी झाली की त्याच्या मनाला हुरहूर लागून राहते. काही ठिकाणी महापूर येत संसार मोडतात, स्थलांतर होतं तर कधी कुणाला जीव गमवावा लागतो. कुणी पावसाचा आनंद घेत उत्साहात असतो तर कुणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची काळजी करत.

      लहानपणी पावसाची मज्जा वाटायची पण आता मात्र पाउस आला की आॅफिसमधून लवकर काम संपवून निघण्याची गडबड कारण पाऊस आला की ट्राफीक जाम, सगळीकडे पाणीच पाणी, मग घरी पोहोचायला उशीर, या सगळ्यात पावसाचा आनंद घेणे बाजूला राहून जाते. पाऊस आला की इलेक्ट्रिसिटी बंद, अगदी ठरलेली गम्मत. मग घाईघाईने इलेक्ट्रिसिटी असे पर्यंत घरातील महत्वाची कामे आवरण्याची लगबग त्यात कपडे वाळविण्याची काळजी.

    वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पावसाच्या वेगवेगळ्या आठवणी मनात आपसूकच कोरल्या जातात. कधी एकटं बसून चहा कॉफी घेत पाऊस बघत बसलं की आठवतात या सगळ्या पावसातील गमतीजमती आणि मग चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आपसूकच उमटतं. 

    तुमच्या आयुष्यात पावसातल्या अशा आठवणी असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • पहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा )

    आजची सकाळ नेहमीपेक्षा अगदीच वेगळी होती. रविवार असल्याने निनादला सुट्टी त्यामुळे मेघना जरा निवांत उठून आंघोळ करून नाश्ता चहा बनवायला ती स्वयंपाकघरात आली. निनाद अजूनही गाढ झोपेत होता. आज वातावरण जरा नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते. जून महिन्याची सुरुवात त्यामुळे पावसाच्या आगमनाची चाहूल लागली होती. सकाळचे नऊ वाजले असले तरी ढगाळ वातावरण असल्याने पहाट असल्यासारखे भासत होते.

    चहाचा कप हातात घेऊन ती बाल्कनीत आली तोच पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध तिला प्रफुल्लित करत होता, लांब कुठेतरी पावसाने हजेरी लावली असावी.

    नभ दाटून आले होते, मधूनच मेघगर्जना कानी पडत होती. मेघना चहाचा घोट घेत पहिल्या पावसाच्या आगमनाची चाहूल अनुभवत होती. तितक्यात निनाद तिला घरभर शोधत बाल्कनीत आला आणि मागून गुपचूप येत तिला मिठी मारत म्हणाला, “गुड मॉर्निंग स्वीटहार्ट..मी घरभर शोधलं तुला..तू मात्र इकडे…”

    अचानक त्याच्या येण्याने जरा दचकून लाजतच कसाबसा हातातला कप सांभाळत ती म्हणाली, “वेरी गुड मॉर्निंग…”

    पाठमोर्‍या मेघनाच्या खांद्यावर आपला चेहरा टेकवत त्याने विचारले, “काय मग आज पहिल्यांदा आपण असं निवांत दोघेच…वातावरण पण मस्त रोमॅंटिक झालंय ना…”

    ती लाजत मुरडत त्याला बाजुला करत म्हणाली, “तुम्हाला पाऊस आवडतो का हो…”

    तो त्यावर खट्याळ उत्तर देत म्हणाला , ” पावसाचं माहीत नाही पण मेघ ( मेघना ) खूप आवडते…मेघां मुळेच तर हा आनंदाचा पाऊस पडतो ना…”

    ती लाजत त्याची नजर चुकवत फक्त चेहऱ्यावर हास्य आणत नभात बघत होती.

    ती मान वर करून नभांकडे बघताना निनाद तिचं तेजस्वी रूप न्याहाळत होता. तिचे ओले मोकळे केस, नितळ चेहरा, ती नाजुक मान, जराही मेकअप नसताना  तिचं रूप जणू कुणी अप्सरा.  निनादने गिफ्ट केलेला निळसर रंगाचा छान फिटींगचा कुर्ता तिला अगदीच शोभून दिसत होता. निनाद तिचा हात हातात घेत म्हणाला , “इतका आवडतो तुला पाऊस…किती कुतुहलाने बघते आहेत आकाशात…जरा आम्हालाही बघा…”

    ती हसतच त्याला बघत म्हणाली, ” खरंच खूप आवडतो मला पाऊस…बघा ना किती मस्त झालंय वातावरण….मातीचा सुगंध येतोय का तुम्हाला… खूप आवडतो मला…”

    तो तिला जवळ ओढून तिची गालावर आलेली केसांची बट बाजुला करत म्हणाला , “हो येतोय ना..पण मातीचा नाही तुझ्या ओल्या केसांमधून मस्त सुगंध येतोय..”

    ती खळखळून हसत म्हणाली, ” तुम्हाला मुळात पावसाचा आनंदच घेता येत नाही…”

    तो त्यावर तिला चिडवत म्हणाला , “कोण म्हणतंय असं…खरं सांगू मलाही आवडतो हा पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध..पावसात भिजायला आवडत नाही पण पाऊस बघून नक्कीच आनंद होतो… ”

    ती आनंदाने म्हणाली , “खरंच…चला मग आज काही तरी खास बेत करूया या पहिल्या पावसाचा…”

    तितक्यात पावसाची हजेरी लागली, रिमझिम पाऊस सुरू झाला. ती आनंदाने पावसात हात पुढे करून पावसाचे थेंब टिपण्याचा प्रयत्न करत होती. दोघांनी पहिल्या पावसाचे थेंब चेहऱ्यावर झेलत एकमेकांच्या डोळ्यांत बघितले तसच त्याने त्याच्या बोटांनी तिच्या गालावरच्या थेंबाला बाजुला करत तिच्या गालावर ओठ टेकवले. ती लाजून घरात निघून गेली.

    तिच्या मनात गाण्यांचे बोल गुणगुणत होते,

    “रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम
    भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम
    चलते हैं चलते हैं…..”

    मेघना आणि निनाद एक नवविवाहित जोडपे, दोघांचं अरेंज मॅरेज.

    मेघना दिसायला सुंदर, उंच कमनीय बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस. लहानाची मोठी एका छोट्या शहरात झाली. वाणिज्य पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असताना तिच्या मामांनी निनादचे स्थळ आणले.

    निनाद फॉरेन रिटर्न, मॉडर्न विचारांचा, दिसायला देखणा, आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. त्याला मेघना फोटोत बघताक्षणीच आवडली होती. दोघांचं लग्न झालं आणि राजा राणीचा संसार सुरु झाला.

    लग्नाला अजून एक महिनाही झाला नव्हता. आज पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस दोघांसाठीही खास भासत होता.

    ती लाजत घरात आली तसाच निनाद तिच्या पाठोपाठ आला. ती स्वयंपाकघरात निनाद साठी चहाचा कप भरत होती. त्याने चहाचा कप हातात घेत तिच्याकडे बघितले, नजरानजर होताच ती लाजली. तिचं असं लाजणं निनादला अजूनच मोहात पाडत होतं.

    जोरात मेघगर्जना झाली तशीच ती दचकून त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही हातातला कप बाजुला ठेवून तिला अजून घट्ट मिठी मारली.

    त्यांच्या नव्या संसारात आज पहिल्या पावसाने प्रेमाला अजूनच बहर आला होता. त्यालाही आता गाणं गुणगुणाव वाटत होतं,

    ” रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन…..
    भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…..
    रिम-झिम गिरे सावन …

    पहले भी यूँ तो बरसे थे बादल, पहले भी यूँ तो भीगा था आंचल……
    अब के बरस क्यूँ सजन, सुलग सुलग जाए मन….. भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन रिम-झिम गिरे सावन … ”

    अशी बहरली त्यांच्या प्रेमाची प्रीत पहिल्या पावसाच्या आगमनाने…?

    निनाद आणि मेचनाची ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे