Month: January 2020

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

           तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

       अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

        आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
       दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
    पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

    जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

    तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
    त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
    जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
    विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

    या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
    तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
    तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

    तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
    तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

    तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
    ती परत रडायला लागली.

    जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
    जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

    आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

    तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

    झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

    झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

    हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

    ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

    प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग अंतिम

    अमन डायरी हातात घेऊन नदी किनारी गेला. नदीचे पाणी स्थिर पणे वाहत होते, आजुबाजूला दुरवर पसरलेली झाडे अमन बघत होता. त्याला या किनाऱ्यावरची आरती सोबतची भेट आठवली. तिच्या आई सोबत तर कधी एकटीच ती या नदी किनारी कपडे धुवायला यायची. अशीच एकदा एकटी आलेली तेव्हा अमन घरच्यांच्या लपून छपून तिला भेटायला नदीवर गेलेला. गुलाबी रंगाचा अगदी साधासा सलवार कमीज घालून आपल्या लांबसडक केसांची वेणी सांभाळत ती कपडे धुण्यात व्यस्त होती. अमन लांबूनच तिला न्याहाळत बसलेला. आजुबाजूला गावातील काही बाया सुद्धा धुणी धुवायला तिथे आलेल्या होत्या. जशा त्या बायका तिथून गेल्या तोच अमन धावत जाऊन आरतीला भेटला‌. अमनला बघताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती. बोलायला शब्द सुचत नव्हते पण आजुबाजूला बघत ती म्हणाली, “अमन अरे असं एकांतात आपल्या दोघांना कुणी बघितले तर गावात उगाच अफवा पसरतील…”

    तिच्या डोळ्यात बघतच तो म्हणाला, “किती सुंदर दिसतेस गं आरती तू…तुला भेटण्याची संधी बघत इथे आलो‌ आणि तू पळवून लावतेस…”

    ती लाजतच इकडे तिकडे बघत होती आणि अमन तिला बघत होता.

    ती गोड भेट आठवत असताना एक वार्‍याची गार झुळूक त्याला जवळून स्पर्शून गेली आणि तो भानावर आला. नदी किनारी बसून त्याने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.

    तिने त्या नदीवरील दोघांच्या भेटीचे छान वर्णन केले होते. तिच्या मनातल्या भावना, प्रेम, त्याला भेटल्यावर झालेला आनंद अगदी छान शब्दात उतरविला होता.

    पुढे पान बदलले तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यात लिहीले होते,

    “अमन, त्या दिवशी नदी किनारी आपण भेटलो‌ हे गावातल्या पाटलांच्या दिनूने बघितलं. आपल्या विषयी त्याला संशय आला. तू परत गेल्यावर त्याने एकदा मला असंच एकटं बघून गाठलं आणि आपल्या दोघांविषयी विचारलं. त्याची माझ्यावर वाईट नजर होती. त्याला मी आवडते, माझ्याशी त्याला लग्न करायचं असं तो मला बोलून गेला पण मी काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्यानंतर रोज कुठे ना कुठे तो माझा पाठलाग करत राहीला. मी त्याला भाव देत नाही त्याच्या प्रश्नांना उडवून लावते हे त्याला कळालं तसाच तो चिडला. गपगुमान मला हो‌ म्हण नाही तर गावात तुझी बदनामी करतो, तुझ्या घरच्यांना गावात राहणे मुश्किल करतो अशा धमक्या तो देत राहीला. मी खूप घाबरली अमन..तू कधी एकदा येतोस आणि मला यातून सोडवितो असं झालेलं मला..त्याच्या विषयी कुणाला सांगावं हे मला कळत नव्हतं… त्याचा अख्ख्या गावात दरारा..कुणी त्याच्या विरोधात जाणार नाही हे माहीत असल्याने काय करावं मला कळत नव्हतं. मला एकटीला घरातून बाहेर पडायला पण भिती वाटत होती अमन..मी फक्त तुझी वाट बघत होते. तू आलास की सगळं काही ठीक होईल म्हणून मी दिवस मोजत होते… वर्ष संपत होते…”

    इतकंच काय त्या डायरीत लिहीलं होतं.
    पण पुढे काय? हा प्रश्न अमनला पडला तितक्यात आरतीचा भास त्याला झाला.

    “अमन, एक दिवशी त्या दिनूने मला नदीवर एकटी बघून गाठलं. आईची तब्येत बरी नसल्याने मी एकटीच नदीवर आलेली. त्याने संधीचा फायदा घेत माझा हात धरून लग्नासाठी तयार हो म्हणत हट्टच धरला. मी नाही म्हणत त्याला एक कानाखाली वाजवली. तो‌ माझ्या अशा वागण्याने चिडला, तुला सोडणार नाही. बघून घेतो म्हणत त्या क्षणी तर तिथून निघून गेला पण मी भितीने कापत होते, रडत होते. आता झाला प्रकार आई बाबांना सांगायला पाहिजे म्हणून मनात ठरवलं पण झालं उलटच. मी घरी गेले तर  बाबा आईला तालुक्याला घेऊन जायला निघत होते. आईला डॉक्टर कडे घेऊन जातो आणि सायंकाळी परत येतो म्हणत आई बाबा बाहेर पडले. मी घरात एकटीच खूप रडले‌. तुझ्या मामी सुद्धा माझी चौकशी करायला आलेल्या तेव्हा त्यांना सांगू की नको असं झालेलं मला… काही वाटलं तर हाक मार, घरी ये म्हणत त्या निघून गेल्या. त्या दिवशी मी मामीला माझी परिस्थिती सांगितली असती तर कदाचित मी आज जिवंत असते. दिवसभर मी दार लावून घरातच होते. सायंकाळी आई बाबांना यायला जरा उशीर झाला आणि अंधाराचा फायदा घेत दिनू घरी आला. दार ठोठावले तेव्हा आई बाबा आले असं समजून मी दार उघडले तर दिनू होता. त्याने घरात शिरून माझ्यावर अत्याचार केला, माझ्या इज्जतीवर हात टाकला. त्याच्यापुढे माझी ताकद कमी पडली, मला प्रतिकार करता आला नाही. आता माझ्याशी लग्न केल्याशिवाय पर्याय नाही म्हणत तो कुत्सितपणे हसून निघून गेला. मी अंगावरचे कपडे सावरत रडत होते. आई बाबा उशीरा घरी आले, दोघेही दमून भागून आल्यावर जेवण करून झोपी गेले. मी रात्रभर रडत राहीली, वेदनेने तडफडत राहीली. झाल्या प्रकाराने माझ्या अंगात ताप भरला होता, मनात भितीने कापत होते मी पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नव्हता अमन. आई बाबांनाही मी काही सांगू शकले नाही. काही दिवस मी घरातल्या घरातच होते, बाहेरच्या जगाची भिती वाटत होती मला. परत एक दिवस घराबाहेर पडावे लागले आणि भर दुपारी आजुबाजूला कुणीही नाही बघून दिनूने माझे अपहरण केले त्याच्या गाडीतून मला शेतातल्या झोपडीत घेऊन गेला. हवा तसा उपभोग घेतला. मी सायंकाळी घरी आली नाही म्हणून आई बाबा गावभर मला शोधत होते. ही गोष्ट दिनूला मित्रांनी कळविली तेव्हा तो‌ घाबरला. आपलं सत्य गावकर्‍यांसमोर आलं तर कुटुंबाची प्रतिष्ठा खालावली जाईल, बदनामी होईल म्हणून त्याने परत परत माझ्यावर राग काढत अत्याचार केला आणि अखेरीस गळा आवळून मला ठार मारले. रात्री अंधाराचा फायदा घेत माझ्या अंगावर नीट चढवून नदीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी माझा मृतदेह नदीतील दगडाला अडकलेला सापडला तेव्हा तो परत घाबरला, त्याने मित्राच्या मदतीने माझ्या घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात होते “मी आरती, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने मला धोका दिला म्हणून मी स्वतःला संपविते आहे.”

    गावकर्‍यांना वाटले मी प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केली पण माझ्यावर किती अत्याचार झाला हे कुणालाच माहीत नाही अमन.
    योग्य वेळी मी आई बाबांना, तुझ्या मामींना हे सांगितले असते तर अशाप्रकारे माझा शेवट झाला नसता. काही तरी पर्याय नक्कीच निघाला असता.

    अमनला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसला. माझ्या आरतीचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्याने दिनूला भेटायला बेत आखला. त्याने सायंकाळी दिनूला गाठले. अमनला बघताच दिनू जरा गोंधळला पण ह्याला कुठे काय माहित म्हणून त्याने मनातला गोंधळ लपवत त्याच्याशी हाय हॅलो केले. गप्पांच्या ओघात अमन त्याला आज एकत्र जेवण करू म्हणत दारु मिळेल अशा एका धाब्यावर घेऊन गेला. दिनू काही ना काही बहाना देत नाही म्हणता म्हणता शेवटी तयार झाला. अमन ने जेवताना दारुचा ग्लास दिनूच्या पुढे करत इकड तिकडच्या गप्पा मारल्या आणि शेवटी आरतीचा विषय काढला. सुरवातीला दिनू काही त्यावर बोलत नव्हता, अमन त्याच्या तोंडून सत्य बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. बराच वेळ आरतीचा विषय काढल्यावर , जसजशी दिनूला नशा चढली तसा तो जरा जरा बोलू लागला, “मस्त आयटम होती यार ती..पुरी लाइफ तिच्या सोबत मज्जा करणार होतो, लगीन करणार होतो पण साली तयार होत नव्हती. तुझ्यासोबत लफड होतं का रे तिचं.. म्हणूनच मला नाही बोलली ती..पण मी सोडली नाही तिला, मज्जा केली तिच्या संग अन् दिली फेकून नदीत..कुणाला कळालं बी नाही..”

    अमन ने दिनूचे सगळे बोलणे त्याच्या नकळत फोनमध्ये रेकॉर्ड केले. रात्री उशिरा घरी आल्यावर अमन ने आरती विषयी त्याच्या भावना, तिच्या मृत्यूचे सत्य, पुराव्यानिशी मामांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामांच्या मदतीने दिनूच्या विरूद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली, पुरावे दाखल केले. दिनूला काही कळण्याच्या आत त्याला अटक झाली आणि वर्षभराने का होईना पण आरतीच्या मृत्यूचे सत्य सर्वांसमोर आले.

    अमनने अखेर आरतीला न्याय मिळवून दिला, तिला मुक्ती मिळाली. अमनला होणारा तिचा भास आता जाणवत नव्हता पण ज्यांनी तिच्यावर अन्याय केला, तिच्या चारित्र्यावर शिंंतोडे उडविले त्याला शिक्षा सुनावली गेली याचे अमनला समाधान वाटले.

    अमनचं पहिलं प्रेम या जगात नव्हतं पण तिच्या आठवणी त्याच्या मनात अमर होत्या.
    या आठवणी नव्याने मनात साठवून अमन शहरात परत गेला.

    समाप्त.

    मी लिहीलेली ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग दुसरा

         अमन आणि आरती एकाच वयाचे. आरती दिसायला सुंदर, उजव्या गालावर पडणारी तिची खळी कुणालाही वेड लावणारी. गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, साधं सरळ राहणीमान असलेली आरती अमनची बालपणीची मैत्रीण, दोघे दिवसभर एकत्र खेळायचे या अंगणात.  लहान असताना कधी मामांसोबत शेतात बैलगाडी सफर करायचे तर कधी मामा, आरतीचे बाबा यांच्यासोबत नदीवर पोहायला जायचे. प्रत्येक सुट्टीला आजोळी आल्यावर अमन आरतीला भेटायला अगदी आतुर असायचा. आरती सुद्धा मोठ्या उत्साहाने त्याची वाट बघायची. जरा वयात यायला लागल्यावर दोघांचे एकत्र खेळणे कमी झाले पण भेटीगाठी गप्पागोष्टी सुरू झाल्या. मुलगा मुलगी एकत्र दिसल्यावर गावात लोकं नावं ठेवतील म्हणून ती खेळायला वगैरे येत नसे पण लपून छपून कधी नजरेने तर कधी समोरासमोर भेटून दोघे खूप काही बोलायचे.

         दहावीची परीक्षा झाल्यावर अमन चांगला महीनाभर मामांकडे राहीला होता, त्यावेळी दोघांना एकमेकांविषयी जरा वेगळीच ओढ निर्माण झाली. बालपणाचा टप्पा पार करून आता तारुण्याची नवी उमेद, एकमेकांविषयी काही तरी आकर्षणाच्या भावना दोघांनाही जाणवल्या होत्या. त्यावेळी परत जाताना त्याचा पाय काही केल्या मामांकडून जायला निघत नव्हता पण आई बाबा घ्यायला आले आणि तो शहरात निघून गेला. त्याने आरतीला पत्र लिहिले होते,

    “आरती, मला तू खूप आवडतेस..माझं प्रेम आहे तुझ्यावर..आता आपली भेट कधी होईल सांगू शकत नाही पण कॉलेज संपल्यावर लवकरच चांगली नोकरी शोधून तुला मागणी घालायला घरी नक्की येईल. मला खात्री आहे तू नक्कीच माझी वाट बघशील…आता परत आलो‌ की आपल्या नात्याविषयी घरी सांगणार आहे मी…
    पत्र कुणाला दिसू देऊ नकोस, उगाच माझ्यामुळे तुझ्यावर काही आरोप झाले, कुणी काही उलट बोललं तुला तर मला सहन‌ नाही होणार ते… काळजी घे…

    तुझाच,
    अमन…”

    ती भेट आरती सोबतची शेवटची भेट होती. तिला दिलेलं वचन पूर्ण करायला, नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी तिला सांगायला तो गावी आला होता पण ती मात्र कधीच हे जग सोडून गेली होती. किती‌ वाट पाहीली असेल आरतीने आपली पण या सहा वर्षांत आपण एकदाही येऊ शकलो‌ नाही इकडे याची त्याला खंत वाटली, आपसुकच त्याचे डोळे पाणावले. त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू बघताच एक आवाज आला,
    “अमन, रडू नकोस..तुला रडताना नहीं बघवत रे…जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही..”

    अमन‌ त्या आवाजाच्या दिशेने बघतो तर आजुबाजुला कुणीच नव्हते. घरातले सगळे एव्हाना झोपी गेले होते.

    अमन अस्वस्थ होत इकडे तिकडे बघत म्हणाला, “आरती…तू का दिसत नाहीये मला.. कुठे आहेस तू.. मला अशी कशी सोडून गेलीस गं…काय झालंय तुझ्यासोबत…आरती एकदा तरी माझ्या समोर येत ना… खूप काही बोलायच आहे.. खूप काही सांगायचं आहे तुला… कुठे आहेस तू…”

    ” अमन, आता मला तुझ्या समोर नाही येता येणार… खूप वाट बघितली रे मी तुझी..मला माहित होतं तू नक्की येणार पण थांबता नाही आलं मला तुझ्यासाठी… पण मी तुझ्यासाठी एक डायरी लिहून ठेवली आहे…उद्या सकाळी माझ्या घरी जा, माझी आई देईल तुला ती डायरी. तिला लिहीता वाचता येत नाही त्यामुळे त्यात काय आहे हे तिलाही नाही माहित पण जसं तू मला ऐकू शकतोस ना तसं आई सुद्धा मला ऐकू शकते, माझ्या आवाजाच्या सहाय्याने ती निदान जगते तरी आहे. माझ्या आणि बाबांच्या मृत्यू नंतर ती स्वतः ला संपविणार होती पण माझं अस्तित्व, माझा आवाज यातून मी तिला शपथ दिली की मी देवघरात लपवून ठेवलेली डायरी अमन आल्यावर त्यालाच द्यायची, तो एक दिवस नक्कीच येणार तोपर्यंत तरी तुला जगायचं आहे. तुझ्या येण्याने माझ्या मृत्युचे सत्य तुझ्या समोर, जगासमोर नक्की येईल याची मला खात्री होती. आईला सत्य कळाले तरी ती काही करू शकणार नाही आणि गावात कुणाला सत्य कळूनही ते काहीही करणार नाही म्हणून माझी डायरी फक्त तुझ्या हातात‌ यावी‌ आणि मला न्याय मिळावा यासाठी ही माझी इच्छा अपूर्ण असल्याने मला आजवर मुक्ती मिळाली नाही. उद्या आईला भेटून डायरी घे आणि नदी किनारी मला भेटायला ये. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला.”

    “आरती…का गेलीस अशी सोडून मला…काय झालं नक्की तुझ्यासोबत…ये ना परत आरती…ये ना…”

    अमन ओक्साबोक्सा रडत तिला आजुबाजूला शोधत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आरतीच्या आईला मी जाऊन भेटतो असं झालेलं त्याला.

    आरतीच्या विचारातच रात्री उशिरा त्याला झोप लागली. सकाळी जशी जाग आली तसाच तो खाडकन उठून बसला. लवकरच आवरुन बाहेर आला तोच मामींनी गरमागरम चहा नाश्ता दिला. घाईघाईत चहा नाश्ता करून तो आरतीच्या घरी गेला, दारातून आरतीच्या आईला हाक मारली. अमनला समोर बघताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमन घरात गेला तोच त्याचे लक्ष समोरच्या भिंतीवर लावलेल्या आरतीच्या आणि तिच्या बाबांच्या हार घातलेल्या फोटोंकडे गेले. आरतीच्या आईने डोळे पुसत त्याला बसायला एक खुर्ची पुढे केली आणि त्या आत गेल्या. अमनची नजर आरतीच्या फोटोवर स्थिरावली. तिचा निरागस चेहरा बघत दु:ख, प्रेम, विरह अशा मिश्र भावनांनी त्याचे डोळे पाणावले.

    आरतीच्या आई पाण्याचा ग्लास त्याला देत त्याला म्हणाल्या, “अमन बाळा, आरती आपल्याला सोडून गेली रे… पण तिनं आत्महत्या केली नाही तर तिचा घातपात झाला असं सारखं वाटतं मला. तिच्या जाण्याचं सत्य अजूनही मी शोधतच आहे रे..वर्ष होईल तिला जाऊन पण आजही माझ्या आजूबाजूला वावरते ती असंच वाटतं मला.. त्यामुळे तर मी जगते आहे..आणि हो ही डायरी तितकी तुझ्यासाठी ठेवून गेली ती..तेही मला ती गेल्यावर कळालं..बघ बाबा काय लिहिलंय त्यात..”
    त्या परत तिच्या आठवणीने रडायला लागल्या.

    अमन ती डायरी हातात घेत त्यांना म्हणाला, “काकी, असं रडू नका, हिंमत ठेवा..मी आलोय ना.. सत्य शोधून काढल्याशिवाय नाही जाणार मी.. विश्र्वास ठेवा माझ्यावर..मला काही मदत लागली तर सांगतो .. आलोच मी..”

    अमन डायरी घेऊन नदी किनारी जायला निघाला.

    क्रमशः

    डायरीत आरतीने नक्की काय लिहीले आहे? आरतीच्या मृत्यूचे सत्य काय आहे? याची उत्सुकता लागली ना…तर हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला

           अमन बर्‍याच वर्षांनी आज आजोळी आलेला. आजोळी आता आजी आजोबा नसले तरी दोन मामा मामी, भावंडे असं एकत्र कुटुंब. गावाच्या मधोमध प्रशस्त घर, चहुबाजूंनी अंगण त्यात फुलाफळांची झाडे. अमन‌ बालपणी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचाच पण जसजसे दहावी नंतर शिक्षण सुरू झाले तसे त्याचे येणे जाणे बंदच झालेले. आता कॉलेज संपले, नोकरीची ऑफर हातात होती पण तिथे रुजू व्हायला अजून काही दिवस बाकी होते तेव्हा मामा मामींना भेटायला जायचा अमनचा बेत ठरला.

         सायंकाळी सहाच्या सुमारास तो गावात पोहोचला. गावी येताच त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. बस मधून उतरून मामांच्या घराच्या दिशेने जायला निघाला तोच त्याच्या कानावर शब्द पडले, “अमन…कसा आहेस? खूप वाट बघितली रे तुझी… खूप उशीर केलास यायला…”

    त्याला तो आवाज ओळखीचा वाटला, त्याने मागे वळुन पाहिले तर काही माणसे त्यांच्याच कामात गुंतलेली दिसली पण जिचा हा आवाज आला ती काही दिसली नाही. त्याला जरा विचित्र वाटले, जिची आठवण दररोज व्याकूळ करायची तिचाच आवाज होता हा याची त्याला खात्री पटली पण ती दिसत का नाही… उशीर केलास यायला असं का म्हणाली ती…अशा प्रश्नांची उत्तरे काही त्या क्षणी त्याला मिळत नव्हती.

         मामा मामी तर एक निमित्त आहे पण मनापासून जिला भेटायला आलो ती भेटणार की नाही हा विचार त्याच्या मनात आला तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो पुढेपुढे जात राहीला. काही मिनिटांतच मामाच्या घरी तो पोहोचला. अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, दादा आला म्हणून सारी भावंडं त्याच्या अवतीभवती फिरत आनंदात उड्या मारत होती. मामा मामी मोठ्या कौतुकाने अमनचे स्वागत करत होती. जरा फ्रेश होऊन तो अंगणात खाटेवर येऊन बसला, सगळी बच्चे कंपनी अंगणात खेळण्यात मग्न होते. त्याची नजर बाजुला असलेल्या आरतीच्या घरावर स्थिरावली, तिच्या घरात कुणी दिसत नव्हते पण घरासमोर दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. तिची एक‌ झलक दिसावी या आशेने त्याचे डोळे तिलाच शोधत होते तितक्यात मामी गरमागरम चहा घेऊन आल्या.

    “काय अमन, दमला असशील ना रे…चहा घे…बरं वाटेल जरा…”

    “दमलो‌ नाही पण चहा नक्कीच घेणार मामी तुमच्या हातचा…” असं म्हणत त्याने चहाचा कप उचलला. मामा येतात बरं का गाई म्हशी बांधून, तू घे सावकाश चहा.. आम्ही जरा स्वयंपाकाचं बघतो म्हणत मामी घरात गेल्या.

    अमन ने हळूच छोट्या भावाला जवळ बोलावून आरतीच्या घराकडे बोट दाखवून विचारले , “या घरांत कुणी राहते‌ की नाही..अंधार दिसतोय..”

    छोट्या म्हणाला, “आरती ताई ची आई असते ना..एकटीच राहते ती..”

    त्याच्या बोलण्याने अमनला विचार करायला भाग पाडले. आरतीची आई एकटीच राहते मग तिचे बाबा, आरती हे सगळे कुठे असतील या प्रश्नाने तो विचारात पडला. आरतीचे लग्न झाले असेल का…आणि मग तो आवाज कुणाचा होता…आवाज आला पण ती का नसेल दिसली…काय झालं असेल नक्की…
    विचार करून अमनच्या डोक्यात नुसताच गोंधळ उडाला होता. काही तरी विचित्र नक्की घडतंय याची त्याला चाहूल लागली होती. आजुबाजूला कुणीतरी आहे असा भास त्याला जाणवत होता पण काय होतंय ते नेमकं कळत नसल्याने तो जरा अस्वस्थ झाला. तितक्यात मोठे मामा त्याच्या शेजारी येऊन बसले. लहान मामा अंगणातल्या हौदा जवळ हात पाय धूत होते.
      
      मामांसोबत जरा वेळ गप्पा गोष्टी केल्यावर त्याने विचारले, “मामा, शेजारी आरती राहायची ना हो.. लहानपणी यायची माझ्यासोबत खेळायला…आता कुणी दिसत नाही त्यांच्या घरात…”

    त्यावर मामा म्हणाले, “आरतीची आई एकटीच राहते तिथे आता. मागच्या वर्षी आरतीने आत्महत्या केली आणि तिच्या वडिलांना तो धक्का सहन झाला नाही, ते आजारपणाने गेले. आरतीच्या आईच्या डोक्यावर बराच परिणाम झाला या सगळ्याचा. बिचारी कुणाशी बोलत नाही, काही संबंध ठेवत नाही, सतत म्हणते की माझी आरती माझ्या आजुबाजूला आहे, ती माझ्याशी बोलते. त्यामुळे गावकरी तिला वेडी म्हणतात…”

    अमनला हे सगळं ऐकून धक्काच बसला. “आरतीने आत्महत्या केली?…पण का?…”

    “कुणालाच सत्य माहीत नाही, काही जण म्हणतात तिचं लफड होत कुणाशी तरी..ती गरोदर होती…त्याने लग्नाला नाही म्हंटले म्हणून हिने स्वतः ला संपविले. कुणी म्हणते पाय घसरुन पडली नदीत कपडे धुताना… नुसत्याच मनाच्या थापा मारतात लोकं पण खरं काय कुणास ठाऊक..”

    आता मात्र अमनच्या पायाखालची जमीन सरकली. काही तरी गडबड नक्कीच आहे हे त्याला लक्षात आले. त्याला हे सगळं ऐकून खूप दुःख झाले. आरती असं कधीच करणार नाही याची त्याला खात्री होती तेव्हा नक्कीच तिच्यासोबत काही तरी झालंय हे कळायला अमनला वेळ लागला नाही. आरतीला भेटायच्या ओढीने आज इथे आलो आणि ती या जगात नाही हे त्याच्यासाठी खूप धक्कादायक होते. गावात पोहोचताच त्याला झालेला तिच्या आवाजाचा भास….गावात आल्यापासून जाणविणारं तिचं अस्तित्व त्याला या सगळ्यात काही तरी गुपीत नक्की आहे , कदाचित तिला काही तरी सांगायचे आहे हे त्याला लक्षात आले.
    आता आरतीच्या सत्य जाणून घेण्याचा त्याने निर्धार केला.

    या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मामींनी जेवायला हाक मारली आणि अमन भानावर आला. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मामा मामी , भावंडे सगळे हसत खेळत जेवण करण्यात , गप्पा गोष्टीत रमले होते पण अमन मात्र वेगळ्याच विश्वात हरवला होता, मनोमन अस्वस्थ झाला होता.

    जेवणानंतर मामांसोबत गावात जरा फेरफटका मारायला गेला तेव्हा त्याला सतत आजुबाजूला कुणाचा तरी भास होत होता. आरती अदृश्य स्वरूपात आजुबाजूला वावरत आहे हे त्याला जाणवत होते.
    रात्री झोपताना त्याला आरती सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाली.

    क्रमशः

    आरती आणि अमन यांच्यात काय नातं होतं?
    आरती सोबत काय झाले, ती अमनला तिच्या आत्महत्येचे कारण सांगेल का..तिने नक्की आत्महत्या केली की काही अपघात झाला…अमन हे सत्य कशाप्रकारे शोधून काढणार हे बघूया पुढच्या भागात.

    पुढे काय होणार याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असणार ना…

    पुढचा भाग लवकरच…

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे