Author: ashvini

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

     
         मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले.
    “हाय मानसी..!”
    या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक  मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी शाळेत एकाच वर्गात होते पण कधीच बोलणं वगैरे झालं नव्हतं. नावाने आणि चेहर्‍याने फक्त दोघांची ओळख होती. आज मात्र या अनोळखी कॉलेजमध्ये त्याला बघताच मानसी मनोमन आनंदी झाली.

    “हाय विनय..तू इथे..म्हणजे तुला याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला का..”

    तिच्या आश्चर्यकारक प्रश्नावर त्याने हो म्हणत उत्तर दिले तशीच ती अजूनच आनंदी झाली. या अनोळखी शहरात , कॉलेजमध्ये ओळखीची व्यक्ती भेटल्यावर किती बरं वाटलं तिला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
    विनय क्षणभर तिच्या गोड निरागस चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यालाही तिला तिथे बघून खूप आनंद झाला होता.
    मानसी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, सडपातळ उंच बांधा, लांबसडक केसांची वेणी, साधे पण नीटनेटके राहणीमान. मानसी लहान असताना आई आजारपणाने देवाघरी गेली आणि वडीलांनी दुसरं लग्न केलं. तेव्हापासून मामा मामींनी तिला लहानाचं मोठं केलेलं.
          बारावीपर्यंतचे शिक्षण जरा ग्रामीण भागात झाल्यावर आता पहिल्यांदाच ती शहरी वातावरण अनुभवत होती. मुळातच अभ्यासू, मेहनती असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या जवळच असलेल्या होस्टेलमध्ये ती राहणार होती. विनय हा तिचा पहिलाच मित्र.
    हळूहळू ती या शहरी वातावरणात रमायला लागली.
    होस्टेलमध्ये तिची रुममेट मोना हिच्याशी मानसीची लवकरच मैत्री झाली. मानसी मुळे मोना आणि विनयची सुद्धा ओळख झाली. तिघांचीही हळूहळू चांगली मैत्री झाली. एकमेकांना अभ्यासात मदत करणे, सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे सुरू झाले. 
    शाळेत असल्यापासूनच शांत, सालस, निरागस मानसी विनयला खूप आवडायची पण कधी बोलणं सुद्धा झालं नव्हतं. आता योगायोगाने दोघे एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मैत्रीचं नातं त्यांच्यात निर्माण झालेलं. विनयच्या मनात आपल्याविषयी प्रेमाची भावना आहे याची जराही कल्पना मानसीला नव्हती. विनय सुद्धा तिला काही जाणवू देत नव्हता. योग्य वेळ आली की मानसीला प्रपोज करायचे असे त्याने ठरवले होते.
      विनय उंचपुरा, दिसायला साधारण पण आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला, स्वभावाने प्रेमळ, मदतीला धावून जाणारा. कुणालाही आपलसं करेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. यामुळेच मोनाला पहिल्या भेटीतच विनय खूप आवडला होता. जसजशी मैत्री घट्ट झाली तशीच मोना विनयच्या प्रेमात पडली. त्याच्या मनात मात्र मानसी होती.

         कॉलेजचे पहिले वर्ष संपत आले होते. पुढच्या  आठवड्यात मानसीचा वाढदिवस होता. तिच्यासाठी काही तरी खास प्लॅन करून तिचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्याचा विचार विनयच्या डोक्यात सुरू होता. या सगळ्यात मोनाची मदत घ्यायची असे त्याने ठरवले आणि त्यासाठी विनयने मोनाला फोन केला. त्याने तिला एकटीला भेटायला बोलावले शिवाय याविषयी मानसीला काही सांगू नकोस असंही सांगितलं. ते ऐकताच मोनाच्या मनात आनंदाने लाडू फुटायला लागले.

      विनय ने कशासाठी बोलावले असेल, त्याचेही माझ्यावर प्रेम असेल का ? त्याविषयी तो काही बोलणार असेल का? अशे अनेक प्रश्न मोनाच्या मनात गोंधळ निर्माण करायला लागले. त्याला पहिल्यांदाच असं एकट्यात भेटायचं म्हंटल्यावर ती छान तयार झाली. मोनाला असं चार वेळा आरश्यात स्वतः ला निरखून बघत, लाजत लाजत तयार होताना बघून मानसीने तिला विचारले,” काय मॅडम, आज काय खास..छान दिसतेस पण निघाली कुठे..तेही मला न सांगता, मला एकटीला रूमवर सोडून?”

    काही खास नाही गं, शाळेतली मैत्रिण भेटायला येतेय म्हणून जरा बाहेर जाऊन येते तासाभरात असं मानसीला सांगून ती बाहेर पडली.

    ठरलेल्या ठिकाणी विनय पाठमोरा उभा तिला दिसला. त्याची पाठमोरी आकृती बघतच ती त्याच्या दिशेने निघाली. जसजशी जवळ जात होती तशीच तिची धडधड वाढली होती. चेहऱ्यावर लाजरे भाव होते. ती जवळ पोहोचताच ती लाजतच म्हणाली,

    “विनय… उशीर झाला का रे मला..बराच वेळ वाट बघतोय का..”

    तिचा आवाज ऐकताच तो‌ तिच्याकडे वळून म्हणाला, “हाय मोना… अगं नाही..मी जरा लवकर पोहोचलो..तू वेळेत आलीस..बरं आपण त्या पुढच्या बाकावर बसूया का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी.”

    ते ऐकताच ती अजूनच लाजून चूर झाली. दोघेही जवळच्या एका बाकावर जाऊन बसले. बसताना नकळत त्याच्या हाताचा स्पर्श तिला झाला तशीच ती क्षणभर एका विश्वात रमली. काय बोलणार असेल विनय असा विचार करत जरा अस्वस्थ सुद्धा झाली. आपण विनय साठी छान तयार होऊन आलोय पण ह्याने नीट बघितलं सुद्धा नाही किंवा काही प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही म्हणून तिला जरा त्याचा रागही आला.

    विनय मोनाला म्हणाला, ” मोना, आज तुला मी माझं एक सिक्रेट सांगायला बोलावलं आहे. खूप दिवसांपासून एक गोष्ट माझ्या मनात आहे आणि आज तुझ्यासोबत ती गोष्ट शेअर करणार आहे.”

    विनयचे हे शब्द ऐकताच मोना मनोमन आनंदी झाली. आता विनय आपल्याला बहुतेक प्रपोज करणार असं तिला वाटलं. ज्याच्यावर मी मनोमन प्रेम करते त्याच्या मनात सुद्धा आपल्या विषयी अगदी त्याच भावना आहे, आणि तो आज चक्क व्यक्त होतोय.. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असा काहीसा विचार करून ती अगदी गुलाबी स्वप्न बघितल्या प्रमाणे अत्यानंदी झालेली होती.

    त्याच्या बोलण्यावर फक्त गोड स्माइल देत ती ऐकत होती‌. तो पुढे म्हणाला, “मोना, माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे…अगदी मनापासून प्रेम. मी आज पर्यंत तिला याविषयी जाणवू दिले नाही पण आता मला ते व्यक्त करायचे आहे. तुला माहित आहेच की मानसी आणि मी शाळेपासूनच एकत्र शिकलो पण मैत्री मात्र कॉलेजमध्ये आल्यावर झाली. पण मला शाळेपासूनच ती आवडते. माझं खरंच खूप प्रेम आहे मानसी वर. मला आता ते व्यक्त करायचे आहे. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आहे तेव्हा खास काही तरी प्लॅन करून तिच्या विषयीच्या माझ्या मनातील भावना मला तिला सांगायच्या आहेत. यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील ना मला मदत. ”

    हे ऐकताच गुलाबी स्वप्न रंगवत असलेल्या मोनाचे मन अगदी क्षणभरात तुटले. असं काही असेल याची तिला जराही शंका आली नव्हती. ज्या विनय वर आपलं प्रेम आहे तो आपल्या समोर दुसऱ्या मुलीवरील प्रेमाविषयी बोलतोय हे तिला सहनच होत नव्हते. तिला अगदी मोठ्याने रडून त्याला सांगावं वाटत होतं की विनय अरे तू माझा आहेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…पण त्याने जे काही सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. काय प्रतिक्रिया द्यावी तिला कळत नव्हते.

    विनय तिच्या डोळ्यापुढे उभा होऊन म्हणाला, “मोना, प्लीज करशील ना मला मदत..”

    त्यावर कसंबसं ती “हा..” म्हणाली.

        विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. ती मनोमन रडत होती, दु:खी झाली होती. प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.
    या क्षणी कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे आपली अवस्था झाली याची जाणीव तिला झाली. तिचं मन अगदी या गाण्या प्रमाणे रडत होतं.

    “रब्बा मेरे, इश्क किसी को ऐसे ना तडपाये, होय
    दिल की बात रहे इस दिल में, होठों तक ना आये
    ना आये….

    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    दिल रोया की अंख भर आयी
    दिल रोया की अंख भर आयी किसी से अब क्या कहना…”

    विनय मानसी जवळ प्रेम व्यक्त करेल का? मानसी या प्रेमाचा स्वीकार करेल का..मोना हा धक्का कसा सहन करेल..मानसी आणि मोनाच्या मैत्रीत यामुळे फूट पडेल का… याची उत्सुकता तुम्हाला लागली असणार ना..

    तर हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होईल याविषयी तुमचा अंदाज अशा प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

         मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा चंद्र, आकाशात लुकलुकणारे चांदणे अगदी हुबेहूब दृश्य तिने त्या कागदावर उतरवले. जणू त्या बाहेर दिसणार्‍या दृश्याचा फोटो काढला असंच सुरेख चित्र तिने अगदी सहजपणे रेखाटले.

    त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत ती तिच्याच विश्वात रमली तितक्यात दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. माधव घरी आलेला बघून तिला अजूनच आनंद झाला. तो घरात येताच त्याच्या हातातली बॅग बाजूला ठेवून ती त्याला बिलगली आणि म्हणाली, “किती उशीर केलास यायला. कधीपासून वाट बघते आहे मी.. फोन तरी करायचा उशीर होत असेल तर..”
    त्याचं लक्ष मात्र समोर ठेवलेल्या त्या चित्राकडे गेले, तिला मिठीतून बाजुला करत तो म्हणाला, “मीरा, हे चित्र तू काढले ?”
    तिने चेहऱ्यावर हास्य आणून मानेनेच होकार दिला.
    तो त्यावर आश्र्चर्यचकित होऊन म्हणाला,

    “व्वा …किती सुंदर…अगदी हुबेहूब दृश्य रेखाटले आहे तू…माझी बायको इतकी छान कलाकार आहे हे मला तर पहिल्यांदाच कळते आहे..”

    ती लाजतच त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत म्हणाली, “खूप आवडते रे मला लहानपणापासूनच असे बोलके चित्र रेखाटायला. आश्चर्य वाटेल तुला पण तू मला बघायला आलेला ना त्यानंतर मी तुझा चेहरा आठवून आठवून एका कागदावर उतरवला. दाखवते तुला ते,  माझ्या बॅगेत आहे सगळे माझे आवडते चित्र. हे घे पाणी पी आधी, नुकताच आलास ना..दमला असशील..”

    पाण्याचा ग्लास हातात घेत तो म्हणाला,
    “अगं तू इतकं छान सरप्राइज दिलं की सगळा थकवा क्षणात दूर झाला. पण तू मला तुझ्यातल्या या कलेविषयी कधी बोलली नाहीस.”

    ती  बॅगेतून काही चित्र काढलेले कागद हातात घेऊन येत म्हणाली “चित्र, रांगोळी काढणे माझा छंद आहे असं सांगितलं होतं मी तुला आपल्या पहिल्या भेटीतच पण तुलाच लक्षात नसावं..”

    तो मनात विचार करू लागला,  छंद आहे असं म्हणाली होती मीरा पण इतकी सुंदर कला हिच्या हातात आहे असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. म्हणूनच कदाचित फार काही मनावर घेतलं नसावं मी.

    तिने रेखाटलेले त्याच्या चेहऱ्याचे चित्र बघून तर तो अजूनच चकित झाला. कांदेपोहे कार्यक्रमात पंधरा मिनिटे समोर बघितलेला माझा चेहरा हिने कसा काय इतका अप्रतिम रेखाटला याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तिने रेखाटलेले एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे बघून तो त्यात अगदी रमून गेला.
    इतक्या कौतुकाने ते सगळे चित्र निरखत असताना त्याला बघून तिला अजूनच आनंद झाला. पहिल्यांदा कुणीतरी तिच्या कलेची वाहवा करत होते.

    तो तिचं भरभरून कौतुक करत तिला मिठी मारत म्हणाला, ” मीरा, उद्या सकाळी आपल्याला बाहेर जायचे आहे. कुठे, कशासाठी ते तुझ्यासाठी सरप्राइज आहे. ”

    ती मानेनेच होकार देत त्याच्या मिठीत सामावली.

    मीरा आणि माधवचे काही दिवसांपूर्वी लग्न झालेले.
    माधव दिसायला साधारण, सावळा वर्ण, उंच पुरा, अतिशय प्रेमळ स्वभावाचा, समजुतदार हुशार मुलगा. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा
    झालेला. नोकरी निमित्त शहरात एकटाच राहायचा.

    मीरा दिसायला सुंदर, सडपातळ, उंच बांधा, रेशमी केस, नितळ कांती, चाफेकळी नाक, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे अगदी प्रसन्न चेहरा. लहानपणी आजारपणात आईचे निधन झाले आणि तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मीराच्या मामा मामींनी तिचा सांभाळ केला. ते एका गावातच राहायला होते. मामा मामी तिला खूप जीव लावायचे. मीराच्या अंगात छान कला होती, सहजपणे ती सुंदर चित्र रेखाटायची पण इतर कुणी त्याची फारशी दक्षता घेत नव्हते. मामा शेतीच्या कामात गुंतलेला तर मामी घरकाम, मुलंबाळं यांच्यात आणि कलेच्या जोरावर आपण खूप पुढे जाऊ शकतो हे गावात राहून असल्याने तिला फारसं माहिती नव्हतं. कधी तिने मनावर सुद्धा घेतलं नव्हतं.

    पदवी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षाला होती तसेच तिला माधवचे स्थळ आले, पहिल्या भेटीतच त्याला ती खूप आवडली आणि दोघांचे लग्न झाले.

    आज माधवने केलेल्या तिच्या कलेचे कौतुक बघून ती खूप आनंदात होती. सकाळी माधव काय सरप्राइज देणार आहे हाच विचार तिच्या मनात रात्रभर सुरू होता.

    सकाळ झाली तशीच ती उठून भराभर आवरू लागली. शनिवार असल्याने माधवला सुट्टी होती त्यामुळे तो अजूनही गाढ झोपेत होता. तो उठून बघतो तर मॅडम आंघोळ करून छान फ्रेश होऊन तयार. ती छान गुलाबी रंगाचा कुर्ता घालून नुकतेच धुतलेले ओले मोकळे केस वाळवत असताना तिला तो निरखत होता. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य बघून त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. तिच्या गोड आवाजात गुड मॉर्निंग शब्द ऐकून तो भानावर आला. तिला गुड मॉर्निंग म्हणत बेडवरून उठला. फ्रेश होऊन हॉलमध्ये आला तर ती नाश्त्याची तयारी करत होती. गरमागरम चहा, नाश्ता करून दोघेही घराबाहेर पडले. माधव मीराला एका प्रख्यात चित्रकाराचे प्रदर्शन बघायला घेऊन गेला. तिच्या आवडत्या कलेचे प्रदर्शन बघण्यात ती अगदी रममाण झाली. एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे, लोकांकडून होणारे त्या चित्रकाराचे कौतुक बघत ती विचारांमध्ये हरवली. जणू स्वतःचे भविष्य ती त्या चित्रकारात बघत होती.

      प्रदर्शन बघून झाल्यावर दोघेही एका मोठ्या हॉटेलमध्ये लंच करायला गेले. लंच करताना माधव मीराला म्हणाला, “मीरा, तुझ्या कलेचे असेच भरभरून कौतुक सगळ्यांनी करावे असे मला वाटते. तुला माहित आहे आजच्या या प्रदर्शनात ठेवलेल्या पेंटिंग्जची किंमत लाखो रूपये आहे. खूप मागणी आहे या कलेला. केवळ पैशासाठी म्हणून म्हणत नाही मी तुला पण तुझ्या या कलेमुळे तुला एक नवी ओळख मिळावी म्हणून सांगतोय तू या क्षेत्रात खूप यशस्वी होशील. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. छोट्या स्तरावर का होईना पण तू याची सुरुवात कर असं वाटतंय मला.”

    मीरा माधवच्या बोलण्याने खूप आनंदी झाली, त्याला म्हणाली, ” माधव, अरे माझ्यातली ही कला तुझ्यामुळे जगासमोर येत असेल तर मी अगदी एका पायावर तयार आहे. मुळात या कलेच्या क्षेत्रात करीअर करता येते याविषयी फारसं माहीत नव्हतं रे मला. आपण आजच तयारीला लागूया. आजचा दिवस माझ्यासाठी खरच खूप खास आहे. तू दिलेलं सरप्राइज तर आयुष्यातील सर्वात सुंदर भेट.”

    मीराला पेंटिंग साठी लागणारी सगळी सामग्रीची खरेदी दोघांनी केली. मीरा ने वेळ न घालवता सहजपणे अगदी सुंदर अशा पेंटिंग्ज बनवायला सुरुवात केली. माधवने तिला काही ऑनलाईन साइट वर पेंटिंग्ज टाकायला सांगितले, कसे करायचे सगळे शिकविले. भराभर तिच्या कलेला ओळख मिळायला सुरुवात झाली, भरपूर मागणी येऊ लागली. हे सगळं करताना, अनुभवताना मीरा खूप आनंदी असायची. माधवला तिचं खूप कौतुक वाटत होतं.

    आता तर मोठमोठ्या ऑर्डर सोबतच पेंटिंग्ज वर्कशॉप्स सुरू केले. तिच्या आवडत्या क्षेत्रात मन लावून काम करत मीराने लवकरच छान प्रगती केली. या सगळ्यात माधव अगदी तिच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला.

    आज तर तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. गेली तीन वर्षे अप्रतिम कलाकुसर करून नाव कमावलेल्या मीराचे पेंटींग्ज एका मोठ्या प्रदर्शनात बर्‍याच कलाकारांच्या पेंटिंग्ज सोबत लावलेले होते. तिथे बघायला येणार्‍या गर्दीतून तिचे पेंटींग्जचे होणारे कौतुक ऐकताना मीराला एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. माधवची इच्छा आपण पूर्ण केली याचा आनंद सोबतच कलेच्या माध्यमातून मिळालेली ओळख याचा जणू आज दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
    माधवला मीराचा खूप अभिमान वाटत होता.

    घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं होतं. त्याच्या हात हातात घेत त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली, “माधव, तुझ्यामुळे मला हे यश मिळाले. आय लव्ह यू..”

    त्यानेही तिला अलगद मिठीत घेत आय लव्ह यू टू म्हंटले.

    मीरा मनोमन एकच गाणे गुणगुणत होती,

    “जीवनात ही घडी अशीच राहू दे…
    प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे….

    रंगविले मी मनात चित्र देखणे
    आवडले वेडीला स्वप्न खेळणे
    स्वप्नातिल चांदवा….जिवास लाभु दे…

    जीवनात ही घडी अशीच राहू दे….”

    अशी ही मीरा आणि माधवची प्रेरणादायी प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या की लिखाणाचा हुरूप वाढतो तेव्हा कमेंट करायला विसरू नका ?

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • होम मिनिस्टर तू या घरची…

            गौरव घरी आला तसंच त्याचा उदास चेहरा बघून प्रियाने ओळखले की आज नक्कीच काहीतरी बिघडलंय. ऑफिसमधून घरी येताच नेहमी तो सोफ्यावर बॅग फेकत दोन्ही मुलांसोबत अगदी लहान होऊन खेळायला लागतो पण आज मात्र हातातली बॅग अगदी व्यवस्थित जागेवर ठेवून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दोन्ही मुले बाबांना आपले कारनामे दाखवायला बाथरूमच्या दारापाशी जाऊन तयार.
        लहान मुलगा चिन्मय त्याने काढलेले पहिलेच चित्र आपल्या बाबांना मोठ्या उत्साहाने दाखवत होता. मुलगी साक्षी विज्ञान प्रदर्शनात मिळालेली ट्राॅफी दाखवत प्रदर्शनातील गमतीजमती सांगण्यात तल्लीन झाली होती. मुलांचं कौतुक,अभिनंदन करत त्यांच्या कलेची वाहवा करतानाही त्याच्या चेहऱ्यावरची निराशा प्रियाला स्पष्ट दिसत होती.  सदैव हसतमुख गौरवचा निराश चेहरा आज प्रियाला बघवत नव्हता. नक्की काय झाले हे आताच नको विचारायला म्हणून तिने आधी जेवणाची तयारी केली. चौघांनी एकत्र बसून जेवण केले, मुलांचा अभ्यास झाल्यावर मुले झोपी गेली तेव्हा प्रियाने गौरवच्या पाठीवर हात फिरवत विचारले, “काय झालंय? इतका का निराश आहेस आज?”

    त्यावर गौरव म्हणाला, “प्रिया अगं माझी नोकरी गेली. इतके वर्ष कंपनीसाठी मेहनत घेतली पण नविन बॉस ज्याला मी सुरवातीपासूनच आवडत नव्हतो का तर मी स्पष्टवक्ता, ज्याचं जिथे चुकलं तिथे त्याला बोलायचं, प्रामाणिकपणे काम करायचं पण यामुळे बॉसच्या विरोधात मी आहे असा गैरसमज करून घेतलेला त्यांनी, पॉलिटिक्स तर बघायलाच नको या कॉर्पोरेट क्षेत्रात यांमुळे माझ्या उत्तम कामाची जराही दखल न घेता मला काढून टाकलं आज कंपनीतून. तसं मंदीमुळे सगळीकडे अशीच परिस्थिती आहेच त्यात मेहनत, काम यापेक्षा पॉलिटिक्स जास्त आहे, त्यात माझ्यासारख्या विरोध करणाऱ्या लोकांचे हमखास नुकसान होते. आता सगळं मार्केट डाऊन तेव्हा लगेच दुसरी नोकरी मिळणेही जरा अवघड वाटत आहे गं… घराचं लोन, मुलांचा वाढता खर्च, घरखर्च सगळं कसं मॅनेज होणार आहे देव जाणे.. त्याचंच टेन्शन आलंय मला..”

    प्रिया त्यावर म्हणाली, “अरे इतकंच ना.. नको टेन्शन घेऊ. तुझ्याजवळ उत्तम ज्ञान आहे, आत्मविश्वास आहे शिवाय कामाचा अनुभव आहे. दुसरी नोकरी नक्कीच मिळेल. दोन महिने घरी राहिलास तरी काही अडचण येणार नाही आपल्याला घरखर्च चालवायला. राहीला प्रश्न घराच्या लोन चा तर जे काही थोड फार सेव्हींग आहे त्यातून करूया मॅनेज काळजी करू नकोस. ”

    गौरव प्रश्नार्थक नजरेने प्रियाला बघत होता. त्याला वाटलेले प्रियाला ही बातमी ऐकून टेन्शन येईल पण झालं उलटच. तो तिला म्हणाला, “घरखर्च कसा मॅनेज होईल म्हणालीस. मला कळाल नाही तू काय म्हणते आहेस. ”

    प्रिया त्याला धीर देत म्हणाली, “अरे दर महिन्याला घरखर्च करायला तू जे पैसे देतोस ना त्यातले शिल्लक राहीलेले पैसे मी तसेच जपून ठेवते. मुलांना खाऊ म्हणून मिळालेले, मला ओवाळणी म्हणून मिळालेले अशे सगळे पैसे माझ्याजवळ जमा असतात अगदी सुरक्षित. इतक्या वर्षांचा संसार आपला त्यात मी माझ्या जवळचे क्वचितच पैसे खर्च केले असतील बाकी सगळे आहेत. सगळे मी माझ्या खात्यात जमा करते दर महिन्याला. हे बघ पासबुक.”

    गौरव ते पासबुक बघताच त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तिने पै पै साठवून सत्तर हजार रुपये जमवले होते. तो ते बघताच म्हणाला, “तू तर खरंच लक्ष्मी आहेस.”
    ती त्यावर म्हणाली, “आता चेहऱ्यावरचे भाव जरा बदला. असं उदास नाही बघवत रे तुला आणि अजून एक दुसरी नोकरी मिळेपर्यंत तू क्लासेस घ्यायला सुरु कर.  घरात बसून तोच तो विचार करत असं निराश राहिल्या पेक्षा क्लासेस घेतले तर तुझं मन फ्रेश राहील शिवाय जरा पैसा सुद्धा मिळेल.”

    गौरव ते ऐकताच विचार करू लागला, किती समजुतदार बायको आहे आपली. अचानक नोकरी गेल्याने किती टेन्शन मध्ये आलेलो मी. वाटलं होतं ही गोष्ट ऐकून प्रियाला सुद्धा टेन्शन येईल पण हिने पाच मिनिटांत मध्ये सगळं टेन्शन कमी केलं. किती भाग्यवान आहे मी, मला प्रिया सारखी अर्धांगिनी मिळाली.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच गौरव जवळच्या एका इन्स्टिट्यूट मध्ये गेला. आयटी क्षेत्रात लागणारे बर्‍याच टेक्नॉलॉजी चे क्लासेस देणारे हे इन्स्टिट्यूट, त्यांना उत्तम ज्ञान असलेल्या ट्रेनर ची गरज होतीच त्यामुळे गौरवला लगेच तिथे नोकरी मिळाली. चांगल्या कंपनीत पूर्वीच्या पदाला साजेशी नोकरी मिळेपर्यंत दररोज क्लासेस घ्यायचे आणि नोकरी मिळाली की शनिवार रविवारी या इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनर म्हणून यायचे असं ठरलं. घरी येताच मोठ्या आनंदाने त्याने सगळं प्रियाला सांगितले आणि अशा अचानक ओढावलेल्या आर्थिक संकटातून पटकन मार्ग काढण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभ्या प्रियाचे त्याने मनोमन कौतुक केले.

    प्रिया आणि गौरव यांचा पंधरा वर्षांचा संसार.  त्यांच्या या संसाराच्या वेलीवर पाच वर्षांचा चिन्मय आणि अकरा वर्षांची साक्षी अशी दोन गोड मुले.
    गौरव आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. पूर्वी प्रिया सुद्धा त्याच क्षेत्रात नोकरी करायची पण चिन्मय झाल्यावर तिने नोकरी सोडली. या संसाराच्या वाटेवर अनेक संकटे आली, चिन्मयच्या जन्मापूर्वी अचानक गौरवच्या आई बाबांचा अपघातात मृत्यू झाला‌. त्या घटनेने गौरव पार हादरला होता, त्यावेळी सुद्धा प्रियाने गौरवला खूप हिंमत दिली. असेच अनेक चढ-उतार झेलत दोघेही आनंदाने नांदत होते.

    गौरव एक परखडपणे मत मांडणारा, हुशार , आत्मविश्वासू पण तितकाच भाऊक स्वभावाचा. गरीब परिस्थितीतून वर येत यशस्वी झालेला पण कुठलेही संकट आले की लगेच निराश व्हायचा. अशा वेळी प्रिया मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असायची त्यामुळेच गौरवला प्रियाचा खूप अभिमान वाटायचा. आजही तिच्यामुळे निराश न होता दुसरी चांगली नोकरी मिळविण्यासाठी तो नव्याने सज्ज झाला.

    त्याला असलेले उत्तम सखोल ज्ञान आणि समजून सांगण्याची पद्धत यामुळे महिनाभरात त्याची उत्तम ट्रेनर म्हणून प्रसिध्दी झाली. त्यातून मिळणारा पैसा वाढतच गेला. आता तर नोकरी न करता नोकरी करणार्‍यांना, फ्रेशर्स ला टेक्निकल ट्रेनिंग देत तो पगाराएवढा पैसा क्लासेस मधूनच मिळवू लागला.
    अख्ख्या शहरात त्याचे नाव झाले. टेक्निकल विषयांवर व्हिडिओ बनवून स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले. त्याचे नाव भराभर प्रसिद्ध झाले. या सगळ्यांचे श्रेय तो प्रियाला देतो. तिचा पाठींबा असल्याने मी यशस्वी झालो असं अभिमानाने सांगतो.

    ते म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी एक स्त्री असते त्याचे हे जिवंत उदाहरण. 

    अशा बर्‍याच स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतात. पै पै अगदी जपून ठेवतात, संसारात अडीअडचणीला तो साठवून ठेवलेला पैसा कामी पडतो. पतीच्या , मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. संसारात येणाऱ्या अनेक संकटांचा मोठ्या हिमतीने सामना करत त्यातून या शोधतात. अशा समस्त गृहलक्ष्मींना मानाचा मुजरा ☺️

    मी लिहिलेला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    मी लिहिलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

    फोटो गूगल साभार

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

       लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.

        दोघेही मलेशियाला पोहोचले, स्पेशल हनीमून पॅकेज घेतले असल्याने दोघे हॉटेल मध्ये त्यांच्या खोलीत पोहोचले तसंच त्यांना एक गोड सरप्राइज मिळाले. खोली गुलाबांच्या फुलांनी, पाकळ्यांनी छान सजविली होती. सगळीकडे मंद सुवास दरवळत होता. लाईटच्या मंद प्रकाशात अतिशय रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ते बघताच मोनिका आपसूकच पुटपुटली,  
    “व्वा..किती रोमॅंटिक वाटतंय ना सगळं..”

        मयंकच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नव्हता. तिच्या बोलण्याला काही एक उत्तर न देता तो बॅग ठेवून आंघोळीला निघून गेला. तो बाहेर आला तसंच मोनिकाने त्याला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो दचकून तिला दूर करत म्हणाला, “चला भूक लागली आहे, पटकन फ्रेश हो आपण खाली जरा काही खाऊन येऊ आणि फेरफटका मारून येऊ.

         त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मोनिकाला फार वाईट वाटले, अशा प्रकारे दूर का लोटले असावे मयंक ने. त्याला मी असं जवळ आलेलं आवडलं नसेल का, की मी फार उतावीळ झाले असं काही वाटत असेल. पण मिठी मारण्यात काही वावगं तर नाही शिवाय आता आम्ही नवरा बायको आहोत मग असा का वागतोय मयंक लग्नापासून. जराही प्रेमाने बोलला नाही की जवळही घेतले नाही. अजून त्याला वेळ हवा असेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत मोनिका आंघोळ करताना करत होती. फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघेही खाली गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही खाली फेरफटका मारत होते. खोलीवर परतले तेव्हा मयंक म्हणाला , आज प्रवासामुळे थकवा वाटतोय, उद्या सकाळीच फिरायला निघायचं आहे. लवकर झोपा. इतकं बोलून तो अंगावर चादर ओढून झोपी गेला. मोनिकाला मात्र त्याच हे वागणं अजूनच खटकलं.
         

         त्याने प्रेमाने छान रोमॅंटिक काही तरी बोलावं, हळूहळू या नात्याला बहरायला एक पाऊल पुढे घ्यावं इतकीच तर अपेक्षा होती तिची पण मयंक ने तिचा हिरमोड केला. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या साथीदाराकडून प्रेमाची अपेक्षा ही असतेच पण मयंक मात्र फारच वेगळा वागत होता. विचार करत तिचे डोळे पाणावले.

     
       पुढे आठवडाभर एकाच खोलीत दोघेच असूनही तो तिला जराही जवळ घेत नव्हता. दिवसा बाहेर फिरायचे आणि हॉटेल मध्ये येऊन आराम करायचा असाच काय तो त्यांचा हनीमून साजरा झाला. मोनिका त्याच्या कुशीत शिरण्याचा, त्याला मिठी मारण्याचा अलगद प्रयत्न करत होती पण तो मात्र तिला दूर करत तिला टाळायचा प्रयत्न करत होता. आता दोघांच्या नात्यात या नाजुक विषयावर बोलायचं म्हणजे मुलीसाठी कठीणच तेव्हा नक्की काय करावे तिला काही सुचेना.

       दोघेही हनीमून वरून परत आले. मयंक ची सुट्टी संपली होती आणि तो नोकरीला रूजू झाला. मोनिका सुद्धा वडीलांच्या व्यवसायात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्यायला सुरु झाली. ती सतत काही तरी विचारात दिसते आहे हे तिच्या आई वडिलांनी ओळखले, “मोना , सगळं ठीक आहे ना..कशाच्या विचारात आहेस..” असही आईने तिला विचारले.
    नवरा बायको यांच्या मिलनाच्या विषयावर आई सोबत तरी कसं बोलावं तिला कळेना‌ त्यामुळे “काही नाही..मी ठिक आहे..” इतकंच ती बोलली.
         
        मोनिकाला आता मयंक विषयी जरा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. मयंक रोज उशीरा घरी यायचा, सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचा. मोनिका दिवसभर प्रवास , काम यामुळे थकून त्याची वाट बघत झोपी जायची. त्याला तर तेच हवे होते. शक्य त्या प्रकारे तिला टाळण्याचा प्रयत्न तो करत होता. आता आपणच पुढाकार घ्यावा असं मनोमन ठरवून मोनिका तो येत पर्यंत झोपली नाही. उगाच झोपण्याचे नाटक  करत ती बेडवर पडून होती.

    रात्री १२:३० च्या सुमारास तो घरी आला. बराच वेळ बाथरूम मधे फ्रेश होत होता. बाहेर आला तर मोनिका मस्त तयार होऊन छान आकर्षक नाइट ड्रेस घालून त्याच्या समोर उभी राहिली. तिला बघताच त्याला धक्काच बसला. आपल्याला असं छान तयार झालेलं बघून मयंक आपल्याकडे आकर्षित होईल असे तिला वाटलेले पण तशी काहीही भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तिचा सुडौल बांधा, सेक्सी नाइट ड्रेस कडे दुर्लक्ष करत तो म्हणाला , “झोपली नाही अजून..”
    आता तिला त्याचा फार राग आलेला. लग्नाला तीन आठवडे होत आले होते पण मयंक तिला जराही स्पर्श करत नव्हता, जराही प्रेमाने छान काही बोलत नव्हता.

      ती आपला राग आवरत त्याला जाऊन बिलगली तसंच त्याने तिला जोरात दूर लोटले. “मोनिका, काय करतेय, खूप उशीर झाला आहे झोप आता” असं चिडक्या सुरात बोलून तो झोपला. ती रात्रभर रडत होती, विचार करत होती.
      आता त्याच्या विषयी अजूनच शंका तिला आल्या. मनात काही तरी ठरवून तिने पुढच्या काही दिवसांत त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या विषयी चौकशी सुरू केली. मयंकच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी तर नाही ना हाच संशय आता पर्यंत तिला होता. त्याच्या मित्रांकडून याविषयी असंच कळालं की आमच्या माहिती नुसार तरी त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी नव्हती, ना आहे. त्याच्या कंपनीत तर त्याच्या विषयी सगळ्यांनी त्याच्या कामाबाबत फारच कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. हुशार, मनमिळाऊ, वेळेत काम पूर्ण करणारा सगळ्यांचा लाडका मयंक असंच तिला कळालं.

        मग मयंक असं का वागतोय तिला काही कळत नव्हते. तिने एका मैत्रिणीला याविषयी सांगितले तेव्हा याविषयी स्पष्ट बोलून दोघांनी हा प्रश्न सोडवलेला बरा असं तिने सांगितलं.
       मयंकच्या जवळ जाण्यासाठी मोनिका अनेकदा पुढाकार घेत होती पण तो तिला टाळत ,दूर करत होता आणि तिच्या पदरात प्रेम नाही तर निराशाच येते होती.
       लग्नाला जवळपास दोन महिने झालेले होते. सगळ्यांसमोर आपल्याशी अगदी छान वागणारा हा मयंक काही तरी नक्कीच लपवितो आहे याची मोनिकाला खात्री पटली होती. आज मयंक सोबत स्पष्ट बोलून हा मनातला गोंधळ कमी करावा असं तिने ठरवलं.

        रविवार असल्याने दोघेही घरी होते. मयंक नाश्ता करून टिव्ही बघत बसला‌ होता. मोनिका हळूच त्याच्या पाठीमागून आली आणि तिने परत एकदा पुढाकार घेत त्याला मिठी मारत त्याच्या गालावर चुंबन केले. तिच्या या कृतीमुळे तो ताडकन उठून उभा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो चिडून म्हणाला, “मोनिका कितीदा सांगितलं तुला मला नाही आवडत तुझं असं वागणं…का करतेस तू असं…”

    मोनिका त्यावर उत्तरली “का रे…काय प्रोब्लेम आहे..आपण नवरा बायको आहोत ना..मग इतका अधिकार तर नक्कीच आहे मला..तुला आवडत नाही का मी..का टाळतोय मला सतत.. कुणी दुसरी असेल तुझ्या आयुष्यात तर तसं तरी सांग..का वागतोय असा तू..बोल मयंक बोल..”

    तो चिडून म्हणाला, “दुसरं कुणी आयुष्यात असण्याचा काही प्रश्नच नाही….मला नाही आवडत तू अशी मला चिपकलेली…मला‌ या सगळ्यात काही एक रस नाहीये… लैंगिक संबंध ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला..मी शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही ह्या सगळ्यासाठी…झालं आता समाधान…हेच ऐकायचं होतं ना‌ तुला..कळालं आता…आता परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस..”

    हातातलं रिमोट जमिनीवर आपटत तो तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, शरीर त्याच्या शब्दांनी थरथरू लागले. स्वतः ला सावरत ती सोफ्यावर बसून रडत होती. मयंक ने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपविली, आपली फसवणूक केली या गोष्टीचा तिला विश्र्वासच होत नव्हता.

        किती तरी वेळ विचार करत , रडत ती तिथेच बसून राहीली. मयंक ने तिचा मोठा विश्वासघात केला होता याचा जाब विचारण्यासाठी ती त्याच्या समोर गेली. त्याला विचारले, ” मयंक लग्नापूर्वी का नाही सांगितलं हे सगळं…का केला इतका मोठा विश्वासघात..किती प्रेम करते मी तुझ्यावर माहीत होतं ना तुला..अरे मला लग्नानंतर सुद्धा एकदा कधी तू विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर काही तरी उपचार केले असते.. काही तरी मार्ग काढला असता..पण तू फक्त माझ्या भावनांशी खेळला..मला‌ अंधारात ठेवले..प्रेमाचे दोन शब्द कधी बोलला नाही तू.. फसवणूक केली मयंक तू माझी..याची शिक्षा तुला मिळणारच..”

      त्यावर तो म्हणाला, “कर आता माझी बदनामी करत..सांग सगळ्यांना मी खरा पुरुष नाही.. लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही..नाहीये मी सक्षम.. माहीत आहे मला…लग्न का केलं म्हणतेस ना…लग्न न करण्याचे हे कारण नव्हतो सांगू शकत मी कुणाला..सगळ्यांचा सतत तगादा..काय सांगू त्यांना मी.. म्हणून केलं लग्न…”

    “अरे‌ पण तुझी अवस्था तुला माहीत होती ना… इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे…माझं आयुष्य उध्वस्त केलं मयंक तू…कळतंय का तुला… विश्वासाने. सांगितलं जरी असतं ना तर सहनही केलं असतं मी..मार्ग काढला असता यातून आपण..पण आता नाही… विश्वासघात केला तू…नाही राहू शकत मी तुझ्यासोबत..”

    इतकं बोलून कशीबशी पर्स उचलून मोनिका आई वडीलांकडे निघून आली. मोनिका अशी रडत रडत अचानक असं घरी आल्याने आई बाबा गोंधळले. तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसाच त्यांनाही मोठा धक्का बसला. या सगळ्याचा मोनिकाच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झाला. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे तिची तब्येत चांगलीच खालावली.

    सत्य कळताच मोनिकाच्या आई वडीलांनी मयंकचया घरच्यांना‌ फोन केला तर त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले मयंकला जाब विचारला तर त्याने सगळं खरं असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली होती. मोनिकाला भेटायला आले असता तिची माफी मागत ते इतकंच म्हणाले, ” मोना, आम्हाला हे सगळं माहीत असतं तर त्याच लग्न केलच नसतं गं..पण आम्हाला याविषयी खरंच काही कल्पना नव्हती. आमच्या मुलामुळे तुझ्यावर ही वेळ आली याचा आम्हालाही खूप त्रास होतोय..आम्ही सुद्धा कधीच स्वतः ला माफ करू शकणार नाही….”

    सतत तोच विषय, इतका मोठा मानसिक धक्का यामुळे मोनिका ची तब्येत जरा जास्त बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दिवसात मयंक एकदाही तिला भेटला नाही, फोन नाही.

    मोनिका तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असे त्याचे वडील त्याला ओरडून बोलले तेव्हा तिला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये आला‌ पण मोनिकाच्या आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले.
      काही दिवसांनी मोनिका बरी झाली. मयंकला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला. लग्न, प्रेम या सगळयां वरून आता तिचा विश्वास उडाला होता.

        एक सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आयुष्याच्या जोडीदाराला ओळखण्यात चुकली होती. लग्नापूर्वी कधीच तिला भेटायला पुढाकार मयंक का घेत नव्हता, लग्नापूर्वी कधीच रोमॅंटिक का बोलत नव्हता यांचं उत्तर तिला आता मिळालं होतं. आपण त्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, त्याच्या शांत स्वभावाचा दोष समजून त्याच्या वागण्या कडे, त्याला आपल्यात रस आहे की नाही हे जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केले याची मनापासून तिला खंत वाटली. 

        मयंक मध्ये शारीरिक दोष असताना त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून मोनिका ची फसवणूक केली. तिची काहीही चूक नसताना तिच्या भावना, तिच्या आयुष्याशी तो खेळला. असंच हल्ली समाजात बरेच ठिकाणी होताना दिसते आहे.

    अशाच एका सत्य घटनेवर आधारित मी ही कथा लिहिली आहे.

      मुलांमध्ये शारिरीक दोष असतील, ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतुल तर याविषयी त्यांच्या आई वडिलांना तरी कसे कळणार ना. पण मुळात अशा वेळी स्वतः ची परिस्थिती माहीत असताना एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळणे म्हणजे गुन्हाच म्हणावा‌ लागेल. लग्नानंतरही हे सत्य इतरांना कळणारच ना त्यापेक्षा असा प्रोब्लेम असल्यास आधीच विचार करून निर्णय घेतला तर अशी बिकट परिस्थिती येणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

        मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे..”

    ते ऐकताच मयंक काहीही न बोलता तिथून निघून गेला.

    आई मोनिकाच्या केसांवरून हात फिरवत पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात बुडाली.

        मोनिका अतिशय हुशार, आत्मविश्वासाने वडिलांचा मुंबई सारख्या शहरातील व्यवसाय अगदी सहजपणे सांभाळून शिक्षण पूर्ण करणारी. व्यवसायातील महत्वाच्या कामांमध्ये वडीलांना तिचा मोठा आधार वाटायचा. आई वडिलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, वयाच्या मानाने तिला व्यवसायातील उत्तम ज्ञान होते. अगदी महत्वाचा निर्णय ती मोठ्या चतुराईने घेत असे. अशा या मोनिकाच्या लग्नाचा विचार आता आई वडिलांच्या मनात सुरू झाला.

        मोनिका शी याविषयी बोलल्यावर तिने एकच अट घातली ती म्हणजे, ” मुलगा हा मुंबईत नोकरी करणारा असावा, म्हणजे वडीलांना व्यवसायात मदत करता येईल शिवाय आई वडीलांकडे लक्ष सुद्धा देता येईल..”

         मोनिकाच्या आई वडीलांना ही हे पटलं होतं. लहानपणापासून ती वडिलांसोबत त्यांच्या कामात शक्य तसा हातभार लावायची त्यामुळे तिच्या शिवाय एकट्याने या भल्या मोठ्या व्यवसायाची धुरा सांभाळणे त्यांनाही अवघडच होते.

           आता तिच्या अटी लक्षात घेऊन वर संशोधन सुरू झाले. जे स्थळ यायचे त्यांना आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली मोनिका सहजच पसंत पडायची. अशातच मयंकचे स्थळ आले. तो मूळचा मुंबईचा नसला तरी कॉलेज, नोकरी सगळं मुंबईत झालेले शिवाय दोघेही एकाच वयाचे. मयंक दिसायला देखणा, चांगल्या पदावर नोकरीला, शांत स्वभावाचा  त्यामुळे पहिल्या भेटीतच तिला तो बर्‍यापैकी आवडला. मग पुढे अजून जरा भेटून बोलून निर्णय घ्यावा असं तिने मनोमन ठरवलं. त्यालाही पहिल्या भेटीतच ती आवडली. तिच्या अटीनुसार तो सुयोग्य वाटल्याने तिने पुढाकार घेत पुढे गाठी भेटी घडवून आणल्या.

       त्याच्याशी बोलून तिला तो अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा वाटला. आता गोष्टी पुढे न्यायला हरकत नाही असंही तिला जाणवलं पण त्याचा हा शांत, जरा अबोल स्वभाव तिच्या अगदीच विरूद्ध त्यामुळे तिला जरा वेगळे वाटले पण प्रत्येकाचा स्वभाव असतो शिवाय नातं अजून नविन आहे तेव्हा वेळेनुसार तो मोकळा बोलेल असा विचार करून तिने लग्नाला होकार दिला.
       त्याच्याकडून तर सुरवातीपासूनच होकार मिळाला होता त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. दोघांचं लग्न ठरलं. तिला अगदी मनाप्रमाणे मुलगा मिळाल्याने ती अगदीच आनंदात होती. आता एकाच शहरात आहे म्हंटल्यावर वारंवार भेटी गाठी होणार म्हणून ती अजूनच सुखावली. लग्न ठरल्यानंतर एकमेकांना ओळखण्याची एक ओढ, उत्सुकता, आकर्षक अशा अनेक भावनांनी तिच्या मनात गर्दी केली. अशीच अवस्था त्याचीही असेल असेच तिला वाटलेले. तिच्या बिनधास्त, बोलक्या स्वभावामुळे तिनेच पुढाकार घेत त्याला फोन, मेसेज वरून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या पुढाकाराला तोही अगदी छान प्रतिसाद द्यायचा तेव्हा त्याच्याविषयी कुठली शंका मनात येणे शक्यच नव्हतं.
      लग्नाला अजून दोन महिन्यांचा अवधी होता तेव्हा मधल्या काळात दोघांच्या भेटी, संवाद हा सुरू होताच. पण या दरम्यान प्रत्येक वेळी भेटण्यासाठी तिच पुढाकार घ्यायची, तिला ही गोष्ट जरा खटकली पण त्याच्या शांत स्वभावामुळे कदाचित तो स्वतःहून भेटण्यासाठी काही बोलत नसावा किंवा आपणच पुढाकार घेतोय तेव्हा त्याला संधी मिळत नसावी असंही तिला वाटलं. भेटल्यावर त्याची अगदी छान वागणूक असल्याने तिने मनात कधी फार शंका निर्माण होऊ दिली नाही. भेटल्यावर त्याच्या वागण्या बोलण्यातून काही वेगळे तिला कधी जाणवलं नाही. दोन महिन्यांत लग्नाची खरेदी, सगळी तयारी ह्यात भराभर वेळ निघून गेली. मुंबईत मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. सगळेच अगदी उत्साहात, लग्न सोहळ्यात कशाचीच कमी नव्हती.
       लग्नात पाठवणी झाल्यावर मुंबईतल्या त्याच्या फ्लॅटवर दोघेही गेले. सोबतीला पाहुणे मंडळी होतीच. मनाप्रमाणे सगळं झाल्याने मोनिका खूप आनंदी होती. मयंकच्या फ्लॅट वर दुसऱ्या दिवशी लग्नानंतर सत्यनारायण पुजा करण्यात आली आणि पहिल्या रात्रीची तयारीही.
       लग्न म्हंटलं की दोघांच्याही मनात प्रेमाचा एक वेगळाच बंध निर्माण होऊन मीलनाची ओढ लागलेली असते. नैसर्गिक भावनाच आहे ती पण या ओढी सोबतच मनात भिती, हुरहूर सुद्धा असते. मोनिका चेही तेच झाले. आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आज लाजून, घाबरून सजविलेल्या खोलीत बसून मयंकची वाट बघत होती. नाईलाजाने तो खोलीत आला तसंच तिची धडधड वाढली, मयंक प्रेमळ नजरेने आपल्याला बघून अलगद मिठीत घेईल , छान काही तरी रोमॅंटिक बोलेल असेच काहीसे तिला वाटलेले पण घडले काही तरी भलतेच. त्याने खोलीत येताच तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला , “छान दिसते आहेस…आजचा दिवस खुप खास आहे ना पण मोनिका मला जरा वेळ हवा आहे.. खूप दगदग झाली ना मागच्या काही दिवसात..तू सुद्धा दमली असशील ना ..आराम कर..‌मलाही खूप झोप येत आहे… मागच्या काही दिवसात झोपच झाली नाही..”

       त्याचं असं बोलणं तिला खटकलं पण कदाचित मयंक ला वेळ हवा आहे, तो आता या सगळ्याला मानसिकरीत्या तयार नाही, शारिरीक थकवा जाणवत असेल त्याला असा बराच विचार करून तिने अंगावरचे दागिने काढले, साडी बदलून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. मनात एक प्रकारची हुरहूर तिला जाणवत होती पण पुढच्या दोन दिवसांनी दोघेही हनीमून साठी मलेशिया ला जाणार होते. तिथे दोघांना छान एकांत मिळेल अशा सुखद भावनेने ती आजच्या रात्रीचा फारसा विचार न करता झोपी गेली.
      व्यवसायातील महत्वाचे, अवघड निर्णय अगदी सहजपणे, मोठ्या आत्मविश्वासाने घेत असली तरी मनात मयंक विषयी प्रेम, एक नाजुक भावना तिच्या मनात होती. आता तिच्या मनाला आतुरता लागली होती ती म्हणजे हनीमून ला जाण्याची. या सगळ्यात त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र तिला ओळखता आले नाही.

       मोनिका आणि मयंक यांच्या नात्यात पुढे नक्की काय होते, मयंक काही लपवत तर नाहीये ना. जशी मोनिकाला मयंकची ओढ वाटते आहे तशीच त्याला मोनिकाची ओढ जाणवत असेल का?
    मोनिका हॉस्पिटलमध्ये कशी? तिची आई जे म्हणाली फसवणूक, विश्वासघात हे सगळं नक्की काय आहे ?
    असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असणार ना. कथेत पुढे काय होते याची उत्सुकता सुद्धा लागली असणार,
    तर ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. दोघांच्या नात्याविषयी जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

      
     
      

  • नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

        शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”

        धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवता जा बरं दोघेही. मुलांचं आवरून त्यांना बस मध्ये बसवून शुभदा आली तसच नवरोबा म्हणाले, “अगं काल झोपण्यापूर्वी बघत बसलेलो ती फाइल कुठे आहे माझी..इथेच तर होती..” शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाइल सापडली. ती त्याच्या हातात फाइल देत म्हणाली, ” रात्री आवरून ठेवायला काय होते हो..अस सकाळी सकाळी गडबडीत हे कुठेय ते कुठेय…मी काय काय बघायचं..समोरची उशी सुद्धा उचलून बघत नाही…नुसता वैताग माझ्या जीवाला..”

    त्यावर महाशय तिला म्हणाले, “अगं आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामचं असतो ना..मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं..”

    आराम आणि मला…शुभदा‌ ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली, “दिवसभर किती काम पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना… वरून म्हणायला मोकळे की तू आता आधी सारखी उत्साही राहीली नाहीस… हसतखेळत वावरत नाहीस..माझं मलाच ठाऊक किती दमून जाते मी सगळं आवरता आवरता..”

    शेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात‌ डबा देत बाय केले आणि मनात काही तरी विचार करत आरशासमोर जाऊन ती उभी राहिली.
    जरा वेळ स्वतः ला आरश्यात निरखून पाहिले तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणार्‍या केसांमुळे पहिल्या भेटीतच आपल्यावर भाळलेले आपले पती देव आता हा जरा पांढर्‍या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा अंबाडा बघून काय विचार करत असणार.
    लग्न झाल्यावर मला बघताच तुझ्यापुढे चंद्र फिका म्हणणारा माझा हा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्याभोवती आलेले काळसर वर्तुळ बघून काय कौतुक करणार.
    मुलं झाल्यापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतः कडे जरा लक्ष दे, स्वतः साठी वेळ काढ, केसांना कलर कर, पार्लर मध्ये जाऊन फेशियल कर पण मी मात्र त्यांच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने म्हणणे बंद केले. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही… पूर्वीसारखा कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले पण चूक माझीही आहेच ना.

      सगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतः कडे दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झालीत. त्यांचं ते सहज करू शकतात.

    काही तरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला, पार्लर वालीला घरी बोलावले. मस्त पैकी फेशियल करून केसांना कलर करवून घेतला.
    सुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लास ची चौकशी करत क्लास जॉइन करण्याचे ठरविले.

    मुले घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी आई आज आपलं आपल्याला सगळं आवरायला सांगते बघताच मुलेही जरा गोंधळली पण मुकाट्याने आपापली कामे आवरून दोघेही मुले डायनिंग टेबल वर येऊन बसत आईच्या गोड बदलाचे निरीक्षण करत होती.

    मुलगा आईला म्हणाला , “आई आज काय खास… हेअर कलर छान दिसतोय बरं का…”
    तिनेही थॅंक्यू म्हणत गोड स्माइल दिली आणि म्हणाली, ” आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही..मग मला‌ जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना..नाही तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी विचारातील अरे ही तुझी आई की आजी…”
    त्यावर तिघेही खिदिखिदी हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सॅंडवीच दोघांनीही फस्त केले.

      आता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतः ची लहानसहान कामे स्वतः करण्याची सवय लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणे कमी झाले. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितके स्वतः साठी वेळ काढत ती स्वतः कडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बस मध्ये बसवून नवर्‍याचे आवरून दिले की नियमीत योगा करणे, वेळेत नाश्ता , जेवण सगळं कसं तिने ठरविल्याप्रमाणे सुरू केले. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पती राजांना तिच्यातला हा बदल खूप आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली, मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता, त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता पण आता शुभदा मधल्या तिच्यातल्या ‘ ती ‘ ने नव्याने जन्म घेत हा दुरावा‌ दूर केला. दोघा राजा राणीचे नाते नव्याने बहरत गेले.

      खरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घरदार, मुलंबाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होत जाते. मग तिची होणारी चिडचिड ही सहाजिकच आहे, ही चिडचिड व्हायला मग कुठलेही लहानसहान कारण पुरेसे असते. नवरोबांना वाटते बायको आता पूर्वी सारखी राहीली नाही तर बायकोला वाटतो नवरोबा आता बदलले पण सत्य हे आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदलली असते. मग छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू.
    अशा या संसाराच्या वाटेवर शक्य तो वेळ स्वतः साठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो.

      चला तर मग आपल्यातल्या ‘ मी ‘ ला शोधून स्वतः साठी वेळ काढा आणि हसतखेळत आयुष्य जगा.?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

    आरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली.
    दोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात गुंतल्याने आई आणि आरती दोघींचेच विश्व. दिवाळीच्या सुट्टीत चार दिवस पाहुणे म्हणून भाऊ, भावजया, भाचे कंपनी यायची आणि पुढे वर्षभर त्यांच्या आठवणी मनात साठवून जगायचं असंच काहीसं झालं होतं आरतीच्या आईचं.

    मुळात शांत स्वभाव त्यामुळे मुला सुनांवर ओझे नको म्हणून त्या काही त्यांना कुठल्याच बाबतीत काही बोलेना. बाबांची पेन्शन शिवाय दादांच्या महिन्याला येणार्‍या पॉकेट मनी मधून दोघी मायलेकी घरखर्च करायच्या. त्यातही वहिनीच्या लपून छपून दादा पैसे पाठवतो असं कळाल्यावर तर आरतीला अजूनच वाईट वाटे.

    आता आरती वयात आली होती आईला वाटे आपल्या डोळ्यासमोर पोरीचे हात पिवळे झाले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळं. त्यांनी आरती जवळ तिच्या लग्नाविषयी बोलून पण दाखविले पण प्रत्येक वेळी तिचं उत्तर ठरलेलं, “मला नाही करायचं लग्न..तुला एकटीला सोडून मला नाही जायचं सासरी..”

    आपण सासरी गेलो तर आईचं कसं होणार या विचाराने लग्न न करण्याचा निश्चय आरतीने केला, कारण भाऊ भावजय आईला सोबत घेऊन जाणार नाही याची तिला एव्हाना खात्री पटली होती. इकडे आईला वाटे आपण आहोत तोपर्यंत ठिक पण आपण गेल्यावर आरती एकटी आयुष्य कसं जगणार? भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही? आरतीच्या लग्न न करण्याच्या निश्चयाने भाऊ सुद्धा तिला त्याविषयी फार काही आग्रह करत नसे.

    दोघीही आपापल्या हट्टाला चिकटून. आरतीला एक छोटीशी नोकरी मिळाली होती, नोकरी आणि आई असं तिचं विश्व बनलेलं. भराभर दिवस , वर्षे जात होते.
    अशातच एकदा आईची तब्येत खराब झाली आणि तिला कॅन्सर असल्याचे कळाले. आईचे उपचार सुरू असले तरी तिच्या जगण्याची शक्यता कमी आहे हे डॉक्टरांकडून सुरवातीलाच कळाले होते.

    आता तर आरतीने आपला निश्चय अजूनच पक्का केला. आईची सेवा करायची आणि ती हयात आहे तितके दिवस आनंदात घालवायचं असं ठरवलं. नोकरी सोडून आरतीने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. घरीच ट्युशन घेताना आई कडेही लक्ष देता यायचे आणि थोडी फार कमाई सुद्धा व्हायची. भाऊ भावजय अधूनमधून भेटायला येत असे. आई म्हणायची आरती तू माझ्या डोळ्यांदेखत लग्न कर पण आरती काही मानत नव्हती. तू माझी काळजी करू नकोस म्हणत तीच आईची समजूत काढत होती.
    असेच कसंबसं एक वर्ष‌ गेलं आणि आई आरतीला सोडून कायमची निघून गेली.

    आई कुठल्याही क्षणी आपल्याला सोडून जाऊ शकते हे माहीत असले तरी ती गेल्यावर ते वास्तव स्विकारण्याची हिम्मत आरती मध्ये नव्हती. आईच्या जाण्याने ती पोरकी झाली होती, पूर्णपणे एकटी पडली होती, मनातून पार खचून गेली होती. आईच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात जिवंत होत्या.
    आई गेल्यावर आरतीला मोठा भाऊ आग्रह करत सोबत घेऊन गेला पण भावाच्या संसारात आपली अडचण होतेय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवले. दोन भाऊ आहेत मग दुसर्‍यानेही बहिणीचा जरा भार उचलावा अशी भावजयीची प्रतिक्रिया कानावर पडताच आरतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या राहत्या घरी आईच्या आठवणीने एक एक क्षण कठीण म्हणून आरतीने होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गावचे राहते घर भाड्याने दिले आणि पूर्वी नोकरीला होती त्या मालकाशी बोलून नोकरी परत मिळविली.

    आरती पूर्णपणे एकटी पडली होती. कधीतरी भाऊ भेटून जायचे, सोबत चल म्हणायचे पण तुमच्यावर भार नको मी इथेच बरी म्हणत ती आयुष्य जगत होती. असं खडतर आयुष्य जगताना पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेली आरती चाळीशी पलिकडची दिसायला लागली, स्वतः कडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. भाऊ म्हणायचे अजून वेळ गेलेली नाही, तू लग्न कर पण प्रेम, भावना सगळ्या गोष्टींचा विचार तिने कधी केलाच नव्हता आणि आता तर तिने मनातून सगळे भाव पुसून टाकले होते. तारूण्यात मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी काही तरी जाणवत असेलही पण जबाबदारी पुढे तिने ते कधी अनुभवण्याचा विचार केला नव्हताच.
    आई गेल्यावर एकटेपणाची भावना मनात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचारही तिच्या मनात आलेला पण आई नेहमी सांगायची, ” मी गेल्यावर खचून जाऊ नकोस, तू दुर्गा आहेस, तूच रणरागिणी आहेस…”
    आईचे शब्द आठवून मनातल्या वाईट विचारांना लाथ मारत ती नव्याने जगायचा प्रयत्न करत होती. होस्टेलमध्ये बर्‍याच पिडीत महिला, शिकणाऱ्या अनाथ मुली होत्या. त्यांच्याकडे बघत आरती विचार करायची, ” आपल्या वयाच्या पस्तीशी पर्यंत का होईना पण आईचं प्रेम लाभलं.. दूर का असेना पण भाऊ म्हणायला भाऊ सुद्धा आहेत…कधी फोन वर चौकशी तर करतात.. इतरांच्या मानाने आपण सुखीचं आहोत..”
    कशीबशी मनाची समजूत काढत ती नोकरी करत आयुष्य जगत होती. गरजूंना शक्य ती मदत करत समाजसेवा करण्याचा निर्णय तिने घेतला आणि पुढचे आयुष्य असंच समाजसेवेत अर्पण करण्याचे मनोमन ठरविले.

    हा लेख सत्य परिस्थिती वर आधारित असून काही भाग काल्पनिक आहे.
    आरती सारखं आयुष्य जगणार्‍या स्त्रिया म्हणजे खरंच रणरागिणी आहेत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • फुलले रे क्षण माझे ( प्रेमकथा )

    रुपा आज अगदीच उत्साहात होती. कारणही तसेच होते, तिच्या स्वप्नातला राजकुमार आज तिला भेटणार होता. परी कथेतल्या राजकुमाराची स्वप्न बघणारी रुपा दिसायला अतिशय सुंदर, सुडौल बांधा, लांबसडक केस, निळसर डोळे, गालावर खळी. नावाप्रमाणेच रुपवान, अगदीच लाडात कौतुकात वाढलेली. गावात मोठा वाडा, एकत्र कुटुंब, त्यात आजी आजोबा, आई बाबा, दोन काका काकू, एकूण सहा भाऊ आणि त्या सगळ्यात रुपा एकुलती एक लाडकी बहीण शिवाय सगळ्यात लहान. मग काय ताईसाहेबांचा तोरा बघायलाच नको. अगदी फुलाप्रमाणे जपायचे सगळे तिला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून रूपा गावातल्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची. आवाज सुरेख असल्याने गायनाचे क्लास सुद्धा घ्यायची.
    रुपा आजीकडून लहानपणापासून परी कथा ऐकत आलेली आणि मनात कुठेतरी असेच राजकुमाराचे स्वप्न रंगवत बसायची.

    कितीही लाडाची लेक असली तरी भविष्यात काळजी नको म्हणून आई आणि काकूंनी तिला घरकामात, स्वयंपाक करण्यातही तरबेज बनविले होते. अगदी सर्वगुणसंपन्न म्हणून रुपाची चर्चा गावात असायची.

    जशीच ती वयात आली तसे तिचे सौंदर्य बघता तिला बरेच स्थळ यायचे पण तिच्या तोलामोलाचा राजकुमार काही एव्हाना गवसला नव्हता.
    कधी घरच्यांना पसंत नसे तर कधी रुपाला पसंत नसे. गावात वावर असला तरी रुपाच्या घरी सगळे आधुनिक विचाराचे त्यामुळे तिचे मत लक्षात घेऊनच राजकुमाराचा शोध सुरू होता.

    एक दिवस रुपा गायन क्लास घेऊन परत आली तसंच दादाने तिला चिडवत एक लिफाफा हातात दिला आणि म्हणाला, ” हे बघ आम्ही तुझ्यासाठी मुलगा पसंत केलाय, फोटो वरून अगदी चाळीशी पार केलेला दिसतोय, डोक्यावर केस मोजकेच आहेत शिवाय भिंगाचा चष्मा लावतो असं दिसतोय. पण मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे बरं का..तेही मोठ्या शहरात..बघ जरा आवडतो का..”

    रुपा दादाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे धावली. अगदी मांजर बोका सारखे दोघेही बहीण भावाची मज्जा मस्ती सुरू झाली. सोबतीला इतर भावंडे होतीच. चिडून म्हणाली, “मला नाही करायचं लग्न जा… फोटो पण नाही बघायचा..तूच बघ..”

    ती चिडक्या सुरात रडकुंडीला येऊन आईच्या कुशीत शिरली. सगळ्या भावांनी रुपाची मस्करी करत खोड्या केल्या की राणीसाहेब हमखास आईच्या कुशीत शिरणार हे ठरलेलेच.
    आज आईच्या कुशीत शिरताच आई म्हणाली, “अगं, मस्करी करताहेत ते सगळे. फोटो बघ एकदा मुलाचा. अगदी साजेसा आहे तुला. बाबा आणि काका जाऊन आलेत त्यांच्याकडे, तुझा फोटो बघताच सगळ्यांना आवडली तू..शहरात चांगल्या पदावर नोकरीला आहे मुलगा. मुलाचे नाव काय बरं म्हणाले बाबा..( जरा विचार करत)….हा…. सुशांत गायकवाड..घराणे सुद्धा आपल्या सारखेच..उद्या तुला बघायला येणार आहेत..तुला मुलगा पसंत असला तरच पुढचं ठरवू….”

    आईचं बोलणं ऐकून जरा लाजतच ती लिफाफा हातात घेत आपल्या खोलीत निघून गेली. आज का कोण जाणे पण त्याचा फोटो बघण्याची वेगळीच आतुरता लागली होती तिला. खोलीत एका खुर्चीवर बसून लाजर्‍या चेहऱ्याने ती फोटो लिफाफ्यातून बाहेर काढू लागली. हृदयाची धडधड अलगदपणे का वाढली तिला कळत नव्हते. तसाच त्याचा फोटो बघितला तशीच त्याच्या घार्‍या डोळ्यांवर तिची नजर स्थिरावली. दादाने वर्णन केले त्याच्या अगदीच विरूद्ध, दिसायला राजबिंडा, फोटोतही लक्षात येतील असे त्याचे घारे डोळे, काळ्याभोर केसांची हेअरस्टाईल अगदीच शाहीद कपूर सारखी. एकंदरीत तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आज गवसला होता. असं आलेल्या स्थळांचे फोटो बघणं, त्या मुलाची सगळी माहिती ऐकणे काही पहिल्यांदा होत नव्हते पण आज सुशांतचा फोटो बघताच, त्याच एकंदरीत वर्णन ऐकता तिच्या मनात एकच भाव होता तो म्हणजे, “हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार..”

    उगाच कितीतरी वेळ ती त्याचा फोटो निरखत बसलेली. स्वत:शीच हसत, लाजत एका वेगळ्याच विश्वात हरवली होती ती.‌ तिच्या भावंडांनी तिचे भाव लपून छपून टिपले आणि घरात एकच दवंडी पिटत सांगितले, “रुपाला पोरगा आवडलेला दिसतोय…तासभर फोटो बघत बसली आहे ती…हसतेय काय…लाजतेय काय..”

    ते ऐकताच घरातील प्रत्येक जण मनोमन आनंदी होत म्हणत होते, आता उद्या एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला की सगळं सुरळीत होवो म्हणजे झालं. घरात सगळ्यांना दुसऱ्या दिवशीची आतुरता लागली होती.

    इकडे रुपाला काही रात्रभर झोप लागत नव्हती. फोटो तर एव्हाना बाबांच्या ताब्यात गेलेला पण सुशांतचा चेहरा तिच्या सतत नजरेसमोर होता. अजून भेट सुद्धा झाली नाही मग का इतका विचार करते आहे मी असंही तिला वाटलं पण मन काही त्याच्या विचारातून बाहेर पडेना. रात्रभर स्वप्न रंगवत कशीबशी पहाटे ती झोपी गेली.

    सकाळी जाग आली तशीच स्वतः ला आरश्यात बघून लाजतच ती स्वतःशीच पुटपुटली, “चला आज राजकुमार येणार आहे….तयार व्हा लवकर…” मनात एकीकडे आतुरता तर होती पण एक वेगळीच भितीही तिला वाटत होती. त्याने मला नाकारले तर…हाही विचार करून जरा मधूनच अस्वस्थता तिला जाणवत होती.

    मोठ्या उत्साहाने काकूंच्या मदतीने ती तयार झाली. घरातला जो तो तिला चिडवत , मस्करी करत तिचं भरभरून कौतुक करत होते. लाल रंगाची जरी काठी साडी नेसून ती तयार झाली. लांबसडक केसांची वेणी, त्यावर मोगर्‍याचा गजरा, हातात मॅचिंग बांगड्या , कानात इवल्याशा कुड्या, गळ्यात नाजुक नेकलेस, कपाळावर इवलिशी टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत होते. चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना एखाद्या अप्सरेसारखी सुरेख ती दिसत होती.

    पाहुणे मंडळी आली म्हणताच रुपाची धडधड वाढली. खोली वरच्या बाजूला असल्याने खिडकीतून मुख्य दरवाजा सहज दिसत होता. काकू तिला तयार करून खोलीबाहेर पडताच रुपा लपून छपून खिडकीतून डोकावून बघत होती आणि तितक्यात तिची नजर सुशांत वर गेली. आकाशी रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट परिधान केलेला सुशांत हळूच डोळ्यांवरचा गॉगल काढत असताना तिला दिसला तशीच ती त्याच्यावर फिदा. फोटो पेक्षा प्रत्यक्षात अजूनच हॅंडसम दिसत होता तो.
    त्याने त्या अप्रतिम अशा वाड्यावर एक नजर फिरवली तशीच रुपा खिडकीतून लपून बघताना त्याला दिसली. दोघांची नजरानजर होताच ती भरकन बाजुला सरकली. पण त्याने ते घेरले, तिची एक झलक बघताच तिला बघण्यासाठी तो आतुर झाला होता.

    रुपाची धडधड आता अजूनच वाढली. कितीतरी वेळा ती स्वतः ला आरश्यात निरखून बघत हसत लाजत होती.

    काही वेळातच काकू तिला बैठकीत घेऊन जायला‌ आल्या. ती जिन्यावरून जसजशी खाली उतरत होती तशीच तिच्या हृदयाची स्पंदने वाढत होती. खाली नजर ठेवून ती सगळ्यांसमोर आली. सुशांत तिला बघताच घायाळ झालेला. तिचं निरागस सौंदर्य, तिचा सुडौल बांधा, तिला शोभेसा तिचा लूक बघताच त्याला ती पहिल्या नजरेतच आवडली. सुशांत च्या आई बाबांनी तिला काही प्रश्न विचारले. सुशांत मात्र सगळ्यांची नजर चुकवत तिला न्याहाळत होता. तिचा सुमधुर आवाज त्याला अजूनच तिच्याकडे आकर्षित करत होता.

    काही वेळाने घरातल्या मोठ्यांनी दोघांना एकत्र बोलायला बाजुला पाठवले. दादाच्या मदतीने दोघेही बैठकी बाजुच्या खोलीत बसले. रुपा लाजून चूर झाली होती. खाली नजर ठेवून बसलेल्या रुपाचे सौंदर्य निरखत सुशांत तिला म्हणाला , “खूप छान दिसत आहेस…”

    लाजतच ती थॅंक्यू म्हणाली पण नजर काही त्याच्याकडे वळत नव्हती. मनात अनेक भावना होत्या पण या क्षणी काय बोलावं, कसं वागावं तिला सुचत नव्हतं. ती शांतता दूर करण्यासाठी सुशांत तिला एक एक प्रश्न विचारत तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. न राहवून तो‌ तिला म्हणाला, ” हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध तर होत नाहीये ना…कारण मी एकटाच बोलतोय पण तू एक नजर सुद्धा मला बघत नाहीये..”

    तशीच ती त्याला बघत म्हणाली, “नाही नाही मनाविरुद्ध अजिबात नाही…उलट तुमचा फोटो बघताच मला तुम्ही खूप आवडलात पण आता या क्षणी काय करावं खरंच मला सुचत नाहीये…”
    दोघांची नजरानजर झाली आणि क्षणभर दोघेही एकमेकांच्या नजरेत बघतच राहिले. आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच जीभ चावत तिने परत त्याची नजर चुकवली तसंच त्याला काही हसू आवरलं नाही. आनंदी होत तो म्हणाला , “खरंच…इतका आवडलो मी..तरीच मघाशी खिडकीतून लपून छपून बघत होतीस मला..”

    ते ऐकताच तिलाही हसू आलं शिवाय लाजून चूर सुद्धा झाली आणि एकमेकांना बघत दोघेही हसले.
    आता ती जरा मोकळी झाली बघत दोघांनी एकमेकांविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारले, अपेक्षा जाणून घेतल्या. तिच्या मनात एकच गाणे गुणगुणत होते,

    “फुलले रे क्षण माझे फुलले रे….”

    हा दिवस हे क्षण इथेच थांबावे आणि आम्ही असंच एकमेकांच्या नजरेत बघत गप्पा माराव्या असंच काहीसं झालेलं दोघांना. त्या पहिल्या भेटीतच दोघांनाही एकमेकांच्या भावना आपसूकच कळाल्या.

    रुपाला स्वप्नातला राजकुमार भेटला होता, अगदी मनात आकृती कोरलेली तसाच तिला तो भासत होता. त्यालाही तिची प्रत्येक छबी घायाळ करत होती.

    इथूनच त्यांच्या प्रेमाची एक गोड सुरवात झाली. घरच्यांनी मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न लावून दिले. अगदी फुलाप्रमाणे जपलेल्या रुपाला सासरी पाठवताना‌ दादांना आज काही केल्या रडू आवरले नव्हते, आजोबा, बाबा आणि काका सगळ्यांची नजर चुकवत डोळे पुसत होते. आजी रडतच तिला म्हणाली, “परीकथेतला राजकुमार आमच्या राजकुमारीला गवसला..आता आनंदाने संसार करू बाळा…”

    मिश्र भावनांनी रुपाने सुशांतच्या आयुष्यात पाऊल टाकले. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून तोही भावनिक झाला. तिचा हात हातात घेत सगळ्यांना म्हणाला, “काळजी करू नका, मी खूप आनंदात ठेवेल रुपाला..” त्याच्या हाताच्या स्पर्शाने, त्याच्या बोलण्याने रुपा मनोमन आनंदी झाली. समाधानाचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवले तशीच त्याच्या चेहऱ्याकडे बघत ती मनातच म्हणाली,

    ” फुलले रे क्षण माझे फुलले रे….
    फुलले रे क्षण माझे फुलले रे…
    मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
    सजले रे क्षण माझे सजले रे….”

    अशी झाली दोघांच्या नात्याची सुरुवात.

    ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

    मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

    राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली.

    माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले, “नेत्रा , कशाचा विचार करते आहेस. कॉलेजमध्ये काही झालं का..चिमुकले सानू, गोलू तुला हाक मारत ताई ताई करत अवतीभवती फिरत होते पण आज पहिल्यांदाच तू त्यांना जवळ न घेता सरळ खोलीत निघून गेली. काही काळजीचं कारण असेल तर सांग मला बिनधास्त. ”

    नेत्राला स्वतः च्या वागण्यातला बदल जाणवला. तिने मोठी हिंमत करून माई जवळ सगळं काही सांगायला सुरुवात केली, “माई, रागवू नका पण मी राघव विषयी बोलले ना…. त्याने त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं.. तसं तो मनाने चांगला वाटला पण मला खूप घाबरल्या सारखं वाटलं माई..मनात काय चलबिचल सुरू आहे मला खरंच कळत नाही आहे..”

    माई- “नेत्रा , तू नुकतीच कॉलेजला जायला लागली आहे, आयुष्याच्या नव्या वळणावर आहेस..तुला स्वतः च्या पायावर उभे राहायचे तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना.. राघव तुझा मित्र आहे शिवाय तुमची ओळख काही दिवसांपूर्वी झालेली..तो तुझा पहिलाच मित्र ना..त्याच्या विषयी ही भावना‌ तुझ्या मनात निर्माण होणे नैसर्गिक आहे..हे आकर्षक आहे की प्रेम मी आता नाही सांगू शकणार..पण बाळा जरा विचार कर.. सध्या तुला तुझ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.. प्रेम, संसार या गोष्टी आयुष्यात येतातच पण त्याची एक ठराविक वेळ असते..आज तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि पुढे काही दिवसांनी नाही पटलं तर पुढचं आयुष्य नुसतच झुरत घालवायचं नाही तेव्हा वेळीच सावर मनाला..मित्र म्हणून रहा यात माझी हरकत नाही पण प्रेम, संसार अशा गोष्टींचा विचार आता करू नकोस..तुला तो आवडतो मला कळतंय पण हे प्रेमच आहे असं नाही ना..”

        माईंच्या बोलण्याने नेत्राला मन अगदी हलके वाटले. मनातला गोंधळ बराच कमी झाला. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून तिने स्पष्ट काय ते राघवशी बोलायचं ठरवलं.
    राघवला भेटल्यावर तिने त्याला सांगितले, “राघव, आता तरी मला उत्तर देणे शक्य नाही..मला माझ्या मनाची अवस्था कळत नाहीये..मला तू आवडतोस पण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं अजून तरी ठामपणे माझं मन मानत नाहीये. मला वेळ दे. तू नोकरी करतोस.. लवकरच सेट होशील पण माझं स्वतः च्या पायावर उभे राहायचे स्वप्न माझं नसून माई, आमचा आश्रम या सगळ्यांचं आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी याविषयी, आपल्या नात्याविषयी काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. पण हा, आपण चांगले मित्र बनून नक्कीच राहू शकतो.”

    नेत्राच्या बोलण्याने राघव अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. इतक्या कमी वयात इतका समजुतदारपणा बघून त्याला तिचं खरंच खूप कौतुक वाटलं. त्यानेही तिला त्यावर उत्तर दिले, “तू हवा तितका वेळ घे..मी वाट पाहीन..आपण चांगले मित्र नक्कीच आहोत..तुला काहीही मदत लागली तर मला हक्काने सांग..तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच मदत करेन.”

    तिनेही त्यावर एक गोड स्माइल देत मैत्री स्वीकारली. मित्र बनून राहत असला तरी राघव तिच्या प्रेमात पडला होता आणि मान्य करत नसेल तरी मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नेत्रा सुद्धा त्याच्यावर जिवापाड प्रेम करत होती.

    दोघांची मैत्री दिवसेंदिवस बहरतचं होती. अशातच भराभर वर्षे निघून गेली. नेत्रा कॉलेजच्या अंतिम वर्षाला होती. तिचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने तिची योग्य ती वाटचाल सुरू होती. राघवच्या घरी दोघांच्या मैत्री विषयी काही एक माहिती नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक साजेस स्थळ आणले आणि त्याविषयी राघवला सांगितले. या क्षणी राघवने मला हे स्थळ मान्य नाही सांगून नकार दिला पण नकार देण्यासारखे काहीच नव्हतं. मुलगी त्याच्या तोलामोलाची, सुंदर, सुशिक्षित नोकरी करणारी. त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे आई बाबांना शंका आली. त्यांनी त्याच्याशी बोलल्यावर त्यांना नेत्रा विषयी कळाले. त्यात ती अनाथाश्रमात वाढलेली म्हंटल्यावर त्याच्या वडिलांचा पारा चढला. “कोण कुठली मुलगी, प्रेम करायचं होतं तर जरा तोलामोलाची तरी बघायचं होतं..आई वडिलांशिवाय वाढलेली ती.. काही संस्कार तरी असतील का..” असं बोलून त्यांनी राग व्यक्त केला.
    आईने तिचा फोटो बघताच ती म्हणाली, “कशी काय आवडली रे तुला..ना‌ रंग ना रूप.. वरून अनाथ..राघव तिला विसरून जा.. आम्ही तिचा कधीच स्वीकार करू शकत नाही..”

    आई बाबांच्या बोलण्याने राघव खूप दुखावला पण त्याने विचार केला, “समाज अजूनही जात धर्म, रंग रूप या गोष्टींचा विचार करतोच..तसाच विचार आई बाबा करत आहेत.. त्यांचं चुकलं असंही नाही पण जी परिस्थिती नेत्रा वर ओढावली त्याच काय..त्यात तिची काय चूक..मला तिचं रंग रूप पाहून नाही तर तिचं प्रेमळ मन, तिची जिद्द, तिचा स्वभाव बघून ती आवडली.. वरवर पाहता प्रेम कुणीही करेल पण मन समजून घेत प्रेम केल हा माझा गुन्हा का वाटला आई बाबांना..”

    आता आई बाबांची समजुत कशी काढावी म्हणून राघव काळजीत पडला‌. त्याने याविषयी नेत्रा ला काही एक सांगितले नाही. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू द्यावं म्हणून तो गप्प राहिला.

    माईंना भेटून त्याने सगळी परिस्थिती त्यांना सांगितली शिवाय नेत्रा साठी त्यांच्याकडे मागणी घातली. एकंदरीत त्याची धडपड, नेत्रा विषयी आपुलकी, प्रेम बघता माईंना आता राघवची, त्याच्या नेत्रा वरच्या खर्‍या प्रेमाची खात्री पटली होती. त्या त्याला मदत करायला तयार झाल्या पण आई बाबा तयार नसतील तर नेत्रा सोबत लग्न लावून देऊ शकणार नाही हेही त्यांनी राघवला सांगितले.

    त्याने आई बाबांची कशीबशी समजूत काढत एकदा त्या अनाथाश्रमात येण्यासाठी त्यांना तयार केले. आई बाबा माईं सोबत आश्रमात एका झाडाखाली खुर्चीवर बसले होते. माईंनी त्यांना नेत्राचा भूतकाळ सांगितला, “नेत्रा त्यांना एका मंदिरात सापडली. मुलगा व्हावा म्हणून पहिल्या मुलीचा बळी जाणार होती पण अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी तिला वाचवले आणि आश्रमात सोडले. केवळ दोन महिन्यांची होती ती‌. जसजशी मोठी झाली तसंच अख्खं आश्रम तिने प्रेमाने जिंकले, खूप हुशार, मेहनती आहे ती.. दुर्दैव इतकंच की आई वडिलांना तिची किंमत नव्हती..मुलगा हवा होता म्हणून तिला बळी देणार होते तिचा..” त्याविषयी त्यांच्याकडे असणारे पुरावेही माईंनी दाखवले. आता राघवचे आई बाबा कितपत विश्वास ठेवतील हे त्यांच्या वर सोडले.

    ते ऐकताच राघवच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले, नेत्रा विषयी वाईट वाटले पण अशा अनाथ मुलीला सून करून घ्यायचं हे काही त्यांना पटलं नव्हतं.

    माईंनी त्यांना हेही स्पष्ट केले की, तुम्ही तयार नसाल तर तुमचे मन दुखावून ती कधीच राघव सोबत लग्न करणार नाही.
    माईंनी नेत्राला बोलावून घेतले. तिला मात्र काय चाललं आहे काही कळालं नाही. ती तिथे जाताच अतिथी म्हणून आई बाबांच्या पाया पडली. त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. माईंनी ओळख करून दिली तेव्हा तिला कळाले की हे राघव चे आई बाबा आहेत. ते ऐकताच ती जरा गोंधळली, अचानक ते इथे कशे आणि मग राघव कुठे आहे याचा विचार करत स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. तिचं साधं सरळ राहणीमान, निरागस चेहरा, प्रेमळ बोली बघून आईला ती चांगली वाटली पण तिचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी मात्र अजूनही मन मानत नव्हतं.

    बाबां तर अजूनही नकारावर ठाम होते. त्यांचा नकार माईंना कळाला तसंच ते गेल्यावर त्यांनी नेत्रा आणि राघव ची समजुत काढली. राघव, तुझ्या घरी ही गोष्ट स्वीकारण्यास कुणी तयार नाही तेव्हा तुम्ही दोघेही इथेच तुमच्या भावनांना थांबवले तर योग्य राहील असे सांगितले. 

    नेत्रा हळवी असली तरी वास्तविकतेचा विचार करणारी होती. तिने माईंच्या बोलण्याचा आदर ठेवत राघवला भेटणे, बोलणे बंद केले. या गोष्टीचा विचार करून मनोमन तिला खूप त्रास होत होता पण चेहऱ्यावर हास्य ठेवून ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होती. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीचे प्रयत्न सुरू केले.

    वेळेनुसार हळूहळू ती राघवला विसरण्याचा प्रयत्न करत होती पण मनोमन त्याला आठवत खूप रडतही होती.

    इकडे राघव आई बाबांशी तुटक पणे वागायला लागला, आयुष्यभर लागलं करायचं नाही म्हणत आले ते स्थळ हूडकावून लावू लागला. नेत्रा ला भेटायचा खूप प्रयत्न केला पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. मनोमन झुरत तो जगत होता. आईला त्याची ही अवस्था बघवत नव्हती पण बाबांच्या निर्णयापुढे, समाजाच्या भितीने त्या काही पुढाकार घेत नव्हत्या.

    अशातच वर्ष गेले पण राघव काही नेत्राच्या विचारातून बाहेर पडला नव्हता. तिघेही रात्री जेवताना टिव्ही समोर बसले होते. एका न्यूज चॅनलवर माईंची मुलाखत सुरू होती. आश्रमाला इथवर आणण्याचा प्रवास त्या वर्णन करताना त्यांच्या बोलण्यात नेत्रा चा उद्धार सतत होत होता. आमची नेत्रा मेहनतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून मोठ्या हुद्द्यावर रूजू झाली हे त्या अभिमानाने सांगत होत्या. ते बघताच राघवच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. माझी नेत्रा, तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं असं तो रडक्या सुरात बोलून गेला. तिला माईंसोबत तिला टिव्हीवर बघताच त्याला खूप आनंद झाला. आपला मुलगा इतका हळवा झालाय हे बघताच बाबांच्या डोळ्यातही पाणी आले. आपण ज्या मुली विषयी चुकीचा विचार करत आलो तिने खरंच नाव कमावलं असा विचार बाबांच्या मनात आला. समाज, नातलग काय म्हणतील म्हणून आपल्या मुलाचं सुख आपण हिरावून घेत आहोत याची त्यांना जाणीव झाली.

    एक अपराधीपणाची भावना मनात घेऊन ते काही दिवसांनी राघव सह आश्रमात आले. नेत्राच्या कर्तुत्वाचे कौतुक करत त्यांनी माईंची माफी मागितली आणि नेत्रा ला राघव साठी मागणी घातली. आता हा समाज, माझे नातलग कांहीही म्हणो पण माझ्या मुलाचा सुखी संसार आम्हाला बघायचा आहे आणि तो नेत्रा शिवाय अपूर्ण आहे हे त्यांनी माईंना सांगितले.

    राघव आणि नेत्रा हे सगळं ऐकून मनोमन खूप आनंदी झाले. इतके दिवस मनात साठवलेले प्रेम, राघवच्या आठवणी नेत्राच्या डोळ्यातून अश्रु रूपात बरसायला लागल्या.तिचा बांध फुटला, राघव कडे बघत ती आनंदाने रडायला लागली. त्यानेही तिचे अश्रू पुसत हळूच तिला मिठी मारली.

    माईंनी मोठ्या आनंदाने नेत्रा चे लग्न राघव सोबत लावून दिले. आपली नोकरी सांभाळत सासरी आल्यावर सुरवातीला कुरकुर करणार्‍या  नातलगांची मने नेत्राने प्रेमाने जिंकली.

    आपल्या आजूबाजूला प्रेमापेक्षा जास्त समाज, नातलग , मानपान, प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले जाते. अशाच गोष्टींचा विचार करून घरच्यांचा नकार, धमक्या  बघता अनेकदा तरुण पिढी प्रेमापोटी आपले आयुष्य संपवायला ही मागेपुढे पाहत नाही. अशाच परिस्थितीतून सामाजिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने ही कथा मी लिहीलेली आहे.

    अशी ही आगळीवेगळी सामाजिक प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

    नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला पडायचे पण कधी कुणाला विचारण्याची हिंमत झाली नाही. अनाथाश्रमाच्या मुख्य सविता ताई म्हणजेच माई तिच्या साठी आई समान होत्या तर अख्खा आश्रम तिचं कुटुंब.

    बारावीमध्ये ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. पुढे संगणक शाखेत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिलाच दिवस होता तो. नेहमीप्रमाणेच अगदी साधा पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली आणि माईंचा आशिर्वाद घेऊन कॉलेजला निघाली. जुलै महिना असल्याने जरा पावसाचे चिन्ह दिसत होतेच. लगबगीने बस स्टॉपवर येऊन उभी राहिली. बस स्टॉपवर दोन लहान मुले बाजूला खाली फुटपाथवर बसून खेळत होते आणि त्यांची आई तिथे उभ्या असलेल्या लोकांना गुलाबाची फुले विकत घेण्यासाठी विनवण्या करत होती. यावरच त्यांचं पोट भरत असं एकंदरीत परिस्थिती पाहता नेत्राला लक्षात  आलं. तिला त्या मुलांकडे बघून वाईट वाटत होते, मनात काही तरी विचार करत तिने स्वतः जवळचा जेवणाचा डबा त्या लहान मुलांना दिला आणि ती मुलेही अगदी त्यावर तुटून पडली. ते बघताच त्यांच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि तिने एक गुलाबाचे फुल नेत्राला आग्रहाने दिले.

    हा सगळा प्रकार बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येक जण बघत होता. त्या गर्दीत राघव सुद्धा उभा होता. त्याला नेत्रा विषयी एक वेगळाच अभिमान वाटला, कौतुकही वाटले. तिच्या प्रेमळ स्वभावाची जाण त्याला त्या क्षणभरात झाली‌. त्याचे डोळे तिच्यावरच स्थिरावले.

    काही वेळातच बस आली आणि नेत्रा बसमध्ये चढली. योगायोगाने नेत्रा आणि राघवला आजुबाजूला जागा मिळाली. नेत्राचे कौतुक करण्याच्या उद्देशाने राघव म्हणाला , “हाय, मी राघव. तुम्ही खरंच खूप छान काम केलं आज..त्या भुकेल्या मुलांना डबा दिला तेव्हा त्या मुलांच समाधान बघता खरंच खूप छान वाटलं. तुमचं खरंच खूप कौतुक वाटलं..आपणही काही मदत करावी म्हणून मी दोन पिवळ्या गुलाबाची फुले त्या बाईंकडून घेतली पण आता या फुलांचा तुम्ही स्वीकार केला तर मला आनंदच होईल. फक्त तुमचं कौतुक म्हणून माझ्याकडून हि भेट समजा.”

    नेत्राला त्याच्या बोलण्याने जरा अवघडल्या सारखे वाटले. ती त्याला म्हणाली, “माफ करा पण आपली काही ओळख नसताना मी या फुलांचा स्वीकार करू शकत नाही..”

    त्यावर तो म्हणाला, ” असो… काही हरकत नाही..पण गैरसमज नको..मला खरंच कौतुकास्पद वाटलं तुमचं वागणं म्हणून म्हंटलं शिवाय मी एका मुलाखतीला जातोय तिथे फुले घेऊन कसा जाऊ हाही प्रश्न आहेच..”

    ते ऐकताच मनोमन विचार करत नेत्रा म्हणाली, “ठिक आहे द्या मग मला ती फुले.. गरज नसताना त्या माऊली ला मदत व्हावी म्हणून घेतलीत ना फुले..मग तुमचं सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल.. तुमच्या मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा ?..”

    तिचं बोलणं, तिचं वागणं बघता राघवच्या मनात तिच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. दोघांनी स्टॉप येत पर्यंत गप्पा मारल्या.

    कॉलेजचा पहिला दिवस नेत्रा साठी खास होता.सगळा नविन अनुभव, नविन विश्व. आश्रमात परत आल्यावर तिने माईंजवळ दिवसभराच्या सगळ्या आठवणींची उजळणी केली. त्यात राघव विषयी सांगताना का कोण जाणे पण एक आनंदाची लहर तिच्या चेहऱ्यावर झळकली, ते भाव माईंनी अलगद टिपले. माईंना जरा काळजी सुद्धा वाटली पण आपली नेत्रा समजुतदार आहे, विचारी आहे शिवाय ती आपल्या पासून काही लपवत नाही याची त्यांना खात्री होती.

    दोन दिवसांनी सकाळी परत बस स्टॉपवर तिला राघव भेटला, पेढ्यांचा डबा तिच्यासमोर देत तिला म्हणाला, “मिस नेत्रा, तुम्ही माझ्यासाठी लकी ठरलात..मला नोकरी मिळाली.. तुमच्याशी गप्पा मारून फ्रेश मूडमध्ये मुलाखत दिली आणि निवड झाली..थ्यॅंक्यू.. प्लीज पेढा घ्या ना..”

    नेत्राने त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “माझ्या मुळे नाही तुम्ही तुमच्या जिद्दीने, मेहनतीमुळे निवडले गेले..”

    राघव तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता. काळी सावळी असली तरी किती सुंदर व्यक्तीमत्व आहे हे असा विचार करत तो एकटक तिला बघत होता. दोघांची नजरानजर झाली तशीच ती लाजली.

    राघव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार मेहनती मुलगा. पिळदार शरीरयष्टी, सावळा वर्ण, उंच पुरा रूबाबदार.

    दोघांची त्या बस स्टॉपवर अधून मधून भेट व्हायची. हळूहळू मैत्री झाली.

    आजकाल नेत्राच्या वागण्यात बोलण्यात जरा वेगळा बदल माईंना जाणवत होता. ती एका वेगळ्या विश्वात वावरत होती. आनंदी राहत होती, आपण कसं दिसतोय, कॉलेजला जाताना नीट तयारी केली की नाही अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे नेत्रा बारकाईने लक्ष देऊ लागली होती.

    माईंना हा बदल आवडत होता पण नेत्रा प्रेमात तर पडली नसेल ना की कॉलेज मध्ये इतर मुलींमध्ये आपणही नेटकं दिसावं म्हणून हा बदल झाला याचा अंदाज त्यांना बांधता येत नव्हता. हल्ली तिच्या बोलण्यात राघवचा उद्धार हा असायचाच.
    पहीलाच मित्र होता तो तिचा शिवाय वयाच्या ज्या टप्प्यावर नेत्रा होती त्यामुळे माईंना तिची काळजी वाटू लागली. तिच्याशी यावर बोलावं का असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

    इकडे दोघांची मैत्री छान रंगली होती. एकमेकांची ओढ निर्माण झाली होती. राघवला नेत्राने ती अनाथ असल्याचे सांगितले होतेच पण त्याला त्याची काही अडचण नव्हती. तो तिच्या प्रेमात पडला होता. मनापासून त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली होती.

    एक दिवस त्याने बस स्टॉपवरच्या त्या माऊली कडून लाल गुलाबाचे फुल नेत्राला देत आपले प्रेम व्यक्त केले. तिलाही सगळं हवंहवंसं वाटत होतं पण आपण अनाथ आहोत तेव्हा राघवचे आई वडील आपला स्वीकार करतील का या विचाराने ती निराश झाली. राघव वर तिचेही प्रेम होतेच, त्याच्या सोबत संसार करण्याचे स्वप्न ती बघत होती. पण त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला तरी पुढे काय..हे संसाराचं स्वप्न वास्तव्यात उतरू शकणार की नाही याची तिला भिती वाटत होती.

    याविषयी माईंसोबत बोलावं का असंही तिला वाटत होतं.

    राघव तिच्या उत्तराची वाट बघत होता पण नेत्रा मात्र विचारांच्या गर्दीत अडकली होती.

    आता नेत्रा पुढे काय करेल ? दोघांच्या नात्याचे भविष्य काय असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    काय मग उत्सुकता वाढली की नाही, कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

    प्रिय दादा,

    रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ?
    यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जाण्याचं ठरवलं असावं आणि म्हणूनच तू आपल्या या लहानग्या बहिणीला स्वरक्षणासाठी बालपणापासूनच सबल बनविले. तुझ्यामुळेच मी क्रिडा स्पर्धेत सहभागी व्हायला लागलेले‌, आजही कॉलेजमध्ये कुठल्याही खेळात मी मागे नाही. सोबतच तुझ्यामुळे मिळालेले कराटे प्रशिक्षण मला स्वतः च्या रक्षणासाठी आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे. या सगळ्यामुळे माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्याच संपूर्ण श्रेय तुलाच आहे दादा. घरी आई बाबांना तुझी उणीव भासू नये म्हणून बाहेरचे सगळे व्यवहार तू मला शाळेपासूनच शिकविले. बॅंकेचे काम असो किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार, तू अगदी मला सोबत घेऊन करत आलास आणि त्यामुळेच मी आज अगदी आत्मविश्वासाने सगळं सांभाळते.

    तुझ्या साठी देशभरातून अनेक राख्या येतात, शाळकरी मुली हातावर राख्या बांधतात तेव्हा तुला माझी आठवण येते असं तू म्हणालास मागच्या वर्षी पण दादा तू मला स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप तत्पर बनविले आहेस पण या भारतमातेला तुझ्या रक्षणाची खूप गरज आहे तेव्हा माझी रक्षा कर असं न म्हणता या भारतमातेच्या रक्षणासाठी असंच कायम लढत रहा हीच माझी इच्छा.

    दादा, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. अख्ख्या देशातील  बहिणींना तुझ्या सारख्या भावाची गरज आहे, तुझ्यामुळे अख्खा देश शांतपणे जगू शकतो, झोपू शकतो. आपल्या या देशात कुठेही काही संकट आलं तरी तू मदतीला धावून जातो तेव्हा संकटात सापडलेल्या प्रत्येक बहिणीला तुझा अभिमान वाटतो, तुला मनोमन ती खूप आशिर्वाद देते. त्या संकटात सापडलेल्या प्रत्येकाला.अगदी ईश्वरा समान भासतो तू.  यापेक्षा मोठे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार दादा. जेव्हा तुझ्या कौतुकाचे गोडवे अख्खा देश गातो त्या क्षणी मला खरंच तुझी बहीण असल्याचा खुप अभिमान वाटतो.

    पत्रा सोबत राखी सुद्धा पाठवत आहे. तसं पाहिलं तर आपलं बहिण भावाचं नातं या राखीच्या रेशमी धाग्यापेक्षा तुझ्या कडून मला मिळालेल्या स्व रक्षणाच्या धड्यांमुळे अजूनच घट्ट झालं आहे. दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस. जिवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी लढणार्‍या माझ्या दादाचं आणि माझं असं एक अनोखं बंधन आहे ज्याला कशाचीही तोड नाही.

    तू घरी आलास ना की आपण सगळे सण एकदाच साजरे करू. तेव्हा आता पत्र वाचून माझी आठवण आली तरी निराश न होता असाच भारतभूमीच्या रक्षणासाठी लढ.

    इकडे आम्ही सगळे ठिक आहोत. आमची काळजी करू नकोस.

    तुझीच लाडकी,
    मिनू

    आपल्या लाडक्या बहिणीचे पत्र वाचून या दादाच्या मनाची अवस्था काय होणार याचा विचार करताना मनात बॉर्डर सिनेमातील “संदेशे आते है…” गाणे आपसूकच आठवते.

    खरंच विचार करण्याजोगे आहे. सीमेवर सदैव तत्पर असणार्‍या या भावावर अख्ख्या भारतभूमीच्या रक्षणाची जबाबदारी आहे. देशभरात बहिण भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सोहळा सुरू असताना हा भाऊ देशसेवा करत या मातृभूमीसाठी लढत असतो. अशा या शूर भावाला माझा सलाम.

     

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    माझा हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    लेख वाचून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

    रोहन पेशाने सिव्हिल इंजिनिअर, उंच पुरा रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला अत्यंत हुशार पंचेवीशीतला मुलगा. एका छोट्याशा गावातील धरणाच्या कामाची मुख्य जबाबदारी रोहनवर सोपवण्यात आली होती आणि त्या निमित्ताने तो एका त्या गावात काही महिन्यांसाठी वास्तव्यास होता. गावात आला तसंच इंजिनिअर साहेब आलेत म्हणत गावकरी त्याच्या मागेपुढे होते, गावात प्रत्येकाला रोहन विषयी फार कौतुक वाटत होते. इतका मानपान, इतकी वाहवा बघता रोहनला मनोमन आनंद होत होता पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांनी आपल्याला असं तुम्ही आम्ही करत मागेपुढे धावणे त्याला जरा अवघडल्यासारखे वाटले. असो, गावकऱ्यांचे प्रेम म्हणून तोही त्यांच्यात रमला. आपल्या कामाची आखणी करत बसला असतानाच एक दिवस गावातला रामू त्याला आवाज देऊ लागला, “रोहन सायब, तुमास्नी गावच्या मंदिरात बोलावलं सरपंचांनी. भजनाचा कार्यक्रम हाय, जरा वेळ या म्हणत्यात तुमास्नी..”

    रोहन जरा विचार करत म्हणाला , “ठिक आहे. आलोच थोडा वेळात काम संपवून. ”

    रोहन हातातील काम संपवून मंदिराच्या दिशेने निघाला तोच त्याच्या कानावर भक्तीगीताचे मधूर सूर पडले, ते सुर एखाद्या तरूणीचे आहे हे लक्षात आले होतेच पण या लहानग्या गावात कोण इतकं छान गात आहे हे बघण्यासाठी तो आतुर झाला.
    जसाच तो मंदिरात पोहोचला तसेच गावकरी साहेबांना खुर्ची द्या, पाणी द्या करत मागेपुढे, आजुबाजूला जमले. तो मात्र त्या गाण्यात तल्लीन झाला होता,

    “श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
    लोग करें मीरा को यूँ ही बदनाम

    साँवरे की बंसी को बजने से काम
    राधा का भी श्याम वोतो मीरा का भी श्याम

    जमुना की लहरें बंसीबट की छैयां
    किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया
    श्याम का दीवाना तो सारा बृज धाम..”

    रोहनचे डोळे त्या आवाजाकडे लागले, ती अगदीच सगळ्यात समोर देवापुढे बसून गाण्यात तल्लीन झाली होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत रोहन क्षणभर हरवला होता. त्या आवाजात जणू काही जादूच असल्यासारखे त्याला जाणवले. पुढच्या काही वेळातच भजन संपून आरतीचा कार्यक्रम झाला आणि इतका वेळ पाठमोरी दिसणारी ती त्याला समोरासमोर दिसली. पांढराशुभ्र सलवार कमीज, लाल ओढणी, केसांची लांबसडक वेणी, त्या वेणीत मळलेला मोगर्‍याचा गजरा, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेली मीरा आरतीचे ताट हातात घेऊन जशी रोहनला दिसली तसाच तो एकटक तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या साध्या राहणीमानात ती खूप सुंदर दिसत होती.

    देवाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच पुजारीजींनी रोहनच्या हातात प्रसाद देत तिची ओळख करून दिली,
    “साहेब ही माझी मुलगी मीरा. अख्ख्या गावात मुलींमध्ये एकटीच सगळ्यात जास्त शिकलेली आहे. तालुक्याला जाऊन पदवी घेतली माझ्या पोरीने. दिवाळीनंतर लग्न आहे तिचं, तुमच्या सारखाच मोठ्या नोकरीत आहे होणारा पाहूणा.”

    ते ऐकताच क्षणभर मिराच्या आवाजाने तिच्याकडे आकर्षित झालेला, तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतच घायाळ झालेला रोहन मनात लड्डू फुटत असतानाच मनोमन उदास झाला. आजुबाजूच्या लोकांचे बोल त्याला आता ऐकू येत नव्हते. मिराकडे चोरून बघताना त्याच्या मनावर झालेला घाव त्याला तिच्याकडे आकर्षित होण्यापासून वाचवत होता. आज अचानक असं काय झालंय,का इतका आकर्षित झालो मी तिच्याकडे हा विचार करतच रोहन त्याच्या राहण्याच्या खोलीवर परत आला.

    रात्री उशिरा पर्यंत त्याला झोप लागत नव्हती, ते गाण्याचे बोल, तो सुमधुर आवाज त्याच्या कानात अजुनही गुंजत होता. मीराचा चेहरा सतत डोळ्यापुढे येत होता. पहिल्यांदाच रोहनची अशी अवस्था झाली होती. तिच्याच विचारात त्याला झोप लागली. सकाळी उठून कामावर जाताना‌ आज पहिले तो मंदिरात गेला. तिथे देवाचे दर्शन घेऊन मग कामावर जायला निघाला तेव्हा मीरा मंदिरात येत होती, तिचे ओले केस, निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस तिला अगदी शोभून दिसत होता. हातात फुलांनी भरलेले पुजेचे ताट होते.

    दोघांची नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना एक स्माइल दिली. ती मंदिराच्या पायर्‍या चढून वर येताच घंटी वाजवून आत गेली. परत एकदा तिच्या विचारात क्षणभर हरवलेला रोहन त्या घंटानादाने भानावर आला.

    तिचं लग्न ठरलं आहे, ती आपली कधीच होऊ शकत नाही हे कळत असूनही तो तिच्यात गुंतत होता. ती न चुकता सकाळी नऊ वाजता मंदिरात येते हे लक्षात आल्यापासून तोही तिची एक झलक बघायला त्याच वेळी तिथे यायचा आणि मग साइटवर जायचा. रोजची ती नजरानजर, ती गोड स्माइल त्याच्या दिनचर्येचा भाग बनले होते.
    कितीही आवरलं तरी तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. आपण मीराच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला एव्हाना कळून चुकले होते. तिलाही त्याचे भाव कदाचित कळाले असावेत.

    एकदा कागदपत्रातील माहिती ऑनलाइन भरून एक रिपोर्ट तयार करायचा होता. अवधी कमी आणि भरपूर काम असल्याने त्याची तारांबळ उडत होती. या परिस्थितीत त्याला मीराची बरीच मदत झाली, तिचे संगणक प्रशिक्षण झाले असल्याने गावकऱ्यांनी तिला रोहनच्या मदतीला पाठवले होते. त्या प्रसंगामुळे जरा का होईना पण दोघांचे बोलणे झाले.

    रोहन आता तिच्यात खूप गुंतला होता, प्रेमात पडला होता पण त्या प्रेमात कुठलाही स्वार्थ, कुठलीही वासना नव्हती. एक निस्वार्थ निरागस प्रेमाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती पण ती भावना तो कधीही व्यक्त करू शकणार नव्हता. गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास त्याला जपायचा होता, मीराला आनंदी बघायचं होतं, तिच्या नजरेत आपल्याविषयी आदर आहे तो टिकवून ठेवायचा होता.

    तिला त्याच्या मनातले भाव कदाचित कळाले होते पण या नात्याला काहीही भविष्य नाही हे त्याला कळत होते. त्याचा प्रोजेक्ट आता संपत आला होता. या काही महिन्यांत मीराच्या अनेक आठवणी त्याने मनात साठवून ठेवल्या होत्या.
    गावाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी एक छोटासा समारोप सोहळा त्याच मंदिरात आयोजित केला होता. सरपंचांनी रोहन चे भरभरून कौतुक करत त्याचा सत्कार केला. त्या सोहळ्यात रोहनची नजर मीराला शोधत होती पण ती काही दिसली नाही.

    परत निघताना गाडीत बसला तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी हात हलवत निरोप देणारी मीरा त्याला अखेर दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याने गावाचा निरोप घेतला.

    मीरा विषयी मनात असलेलं प्रेम आठवणी या कायम रोहनच्या स्मरणात राहणार्‍या होत्या. ते एक अव्यक्त प्रेम होते.
    तिची आठवण आली की तो मनोमन एकच प्रार्थना करायचा, “मीरा तू जिथे कुठे असशील, आनंदी रहा..हसत रहा..”

    आता जेव्हा केव्हा धरणाची पाहणी करण्यासाठी त्याला त्या गावात जावं लागायचं त्यावेळी त्या सगळ्या आठवणी नव्याने ताज्या व्हायच्या. आजही ते सुमधुर आवाजातील गाणे त्याच्या कानात गुंजत असायचे.

    “श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
    लोग करें मीरा को यूँ ही बदनाम..”

    अशी ही एक आगळीवेगळी अव्यक्त प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सहवास तुझा ( एक प्रेमकथा )

    रविवार असल्याने आज प्रिया घरीच होती. सायंकाळी चहाचा कप हातात घेऊन प्रिया बाल्कनीत जाऊन बसली तितक्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण बरं आलं असेल असा विचार करत दार उघडले तर समोर एक मोठा हार्टच्या ♥️ आकाराचा गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन कुणीतरी उभे होते. चेहऱ्यापुढे तो गुच्छ धरल्यामुळे कोण आहे हे तिला बघताक्षणी कळाले नाही.
    पुढच्या काही क्षणातच मनिष ने तो गुच्छ बाजुला करत तिला विश केले, “हॅपी व्हॅलेंटाईन डे स्वीटहार्ट…?”

    मनिष आठवडाभरासाठी कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता.

    प्रिया मनिषला असं अचानक परत आलेला बघून मोठ्या आनंदाने थॅंक्यू सो मच म्हणाली पण तिच्या लक्षात आलं की आज तर व्हॅलेंटाईन डे नाहीये. क्षणभर तिला शब्द सुचत नव्हता, जरा गोंधळून त्याच्या हातातला गुच्छ हातात घेत ती म्हणाली, “किती गोड सरप्राइज..तू असा अचानक आलास परत…तू तर दोन दिवसांनंतर येणार होतास ना…आणि हे काय आज कुठला व्हॅलेंटाईन डे आहे..भर पावसाळ्यात ?‌‌…”

    मनिष घरात येत बॅग बाजूला ठेवून प्रिया ला मिठीत ओढुन म्हणाला , “हे काय, इतक्या लवकर विसरलीस आजचा दिवस. मागच्या वर्षी आजच्या दिवशीच तर आपली पहिल्यांदा भेट झालेली. मग आपल्यासाठी आजचा दिवसच व्हॅलेंटाईन डे आहे की नाही.”

    प्रिया जरा लाजतच त्याला उत्तरली, “हो आठवतोय ना…तो पाऊस..ती आपली पहिली भेट त्या कॅफे मध्ये.. हॅपी व्हॅलेंटाईन डे अॅंड हॅपी अॅनिव्हर्सरी टू..बरं तू लवकर कसा काय आलास..”
    मनिष तिला चिडवत म्हणाला, “का? नको होतं का यायला मी…काम लवकर संपलं म्हंटलं बायकोला सरप्राइज द्यावं..खूश होईल बायको पण ही तर उलट विचारतेय राव..”

    प्रिया त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, “असं का म्हणतोय, तू लवकर आला याचा आनंदच आहे मला.. तुझ्याशिवाय हे घर खायला उठत होतं एकटीला. आता असं एकटीला सोडून नको जाऊस परत कुठे.”
    मनिष तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, “आता आलोय ना मी. आय लव्ह यू..आय मिस्ड यू सो मच..चल मस्त तयार हो डिनर ला जाऊया बाहेर..”

    मनिष आणि प्रिया यांचं नुकतंच लग्न झालेलं. रेशीमबंध नावाच्या एका वधू वर सूचक मंडळातून दोघांच्या घरच्यांची ओळख झाली आणि त्यांनी मनिष प्रिया ची भेट घडवून आणली. प्रिया आयटी कंपनीत नोकरीला, दिसायला सुंदर, गोरा वर्ण, सुडौल बांधा, शोभेसा हेअरकट. मनिष सुद्धा त्याच क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला, देखणा, उंचपुरा राजबिंडा.

    पहिल्यांदा भेटायचं ठरलं तेव्हा एका कॅफे मध्ये ऑफिसनंतर दोघे भेटलेले. त्या दिवशी धो धो पाऊस सुरू होता. प्रिया कशीबशी रिक्षा शोधून कॅफे मध्ये पोहचली तर मनिष आधीच तिची वाट बघत बसलेला होता. दोघांनी एकमेकांचे फोटो बघितले होते त्यामुळे त्या कॅफे मधल्या गर्दित त्यांना एकमेकांना शोधायला वेळ लागला नाही. प्रिया समोर आली तशीच मनिषची नजर तिच्यावर स्थिरावली. लाल रंगाचा स्लीवलेस कुर्ता, मोकळे केस, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, अगदी कुणी अप्सरा नजरेसमोर आल्याचा भास मनिषला झाला. ती जसजशी त्याच्या दिशेने येत होती तसंच मनिषच्या हृदयाचे ठोके वाढत होते. ती जवळ येताच हाय म्हणाली तसाच तो भानावर आला. दोघांनी औपचारिक ओळख करून घेत जरा वेळ गप्पा मारल्या, सोबतीला कॉफी होतीच.
    मनिषला प्रिया पहिल्या भेटीतच आवडली. जितकं सुंदर तिचं रूप तितकंच प्रेमळ, मृदू बोलणं त्याला मनातून भावलं.

    बराच वेळ झाला पण पाऊस काही थांबत नव्हता. आता घरी निघायला हवं म्हणून दोघेही कॅफेच्या बाहेर आले पण इतक्या पावसात घरी कसं जायचं म्हणून प्रिया जरा विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत मनिष तिला म्हणाला, “इफ यू डोन्ट माईंड, मी तुला घरी सोडतो. इतक्या पावसात एकटी जाणार तरी कशी.”

    प्रिया सुरवातीला नको म्हणाली पण उगाच पावसात भिजत रिक्षा शोधल्या पेक्षा मनिष चा प्रस्ताव उत्तम आहे असा विचार करत ती त्याच्या सोबत तिच्या घरी जायला निघाली. मनिषने कार काढली, प्रियाच्या मनात जरा वेगळेच भाव होते. असं लग्नाच्या निमित्ताने त्याला पहिल्यांदाच भेटल्यावर सोबतच जायचं म्हणजे तिला जरा अवघडल्या सारखे वाटले. तसा तिलाही तो पहिल्या भेटीतच आवडला होता. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, बोलण्यातला आत्मविश्वास तिला त्याच्याकडे आकर्षित करत होता.

    भर पावसात असं मस्त वातावरणात एकत्र जाताना दोघांच्याही मनात लड्डू फुटत होते, जरा वेळ काय बोलावं दोघांनाही कळेना. ती शांतता जरा दूर व्हावी म्हणून मनिष ने रेडिओ सुरू केला तर त्यावर गाणेही तसेच सुरू होते,

    “टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात..
    कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात…
    टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात…
    नाही कधी सरी तरी भिजते अंग पाण्याने सोचा तुम्हे पलभर भी बरसे सावन जोमाने,
    शिंपल्याचे शो पीस नको जीव अडकला मोत्यात… टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात…”

    मनिष ने रेडिओ चॅनल बदलत प्रिया सोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिला अवघडल्या सारखे नको वाटायला म्हणून उगाच ऑफिस, काम असं काही तरी बोलत संभाषण सुरू केले. जरा वेळ गेला की परत दोघेही गप्प..मग मंद आवाजात गाण्यांचे सुर कानावर पडले की जणू आपल्यासाठीच गाणं लागलंय असा विचार मनात येऊन दोघेही लाजत, मनोमन आनंदी होत प्रवास करत होते.

    प्रियाच्या घराजवळ पोहोचणार होते तितक्यात मनिष तिला म्हणाला, “प्रिया तुझ्या मनात काय आहे माहीत नाही पण मला तू पहिल्या भेटीतच आवडली. तुला वाटेल हा किती उतावळा, लगेच होकार दिला पण तुला हरकत नसेल तर पुढचे काही दिवस आपण जसं जमेल तितकं भेटायचं का म्हणजे आपल्याला एकमेकांविषयी अजून जास्त माहीत होईल, स्वभाव जरा तरी कळेल. पण हो तुला मी आवडलो असेल तरचं..”

    प्रियाला त्याच म्हणणं पटलं होतं पण तरी ठीक आहे मी तसं विचार करून कळवते म्हणत ती निघाली. तिला घरी सोडून परत जाताना मनिष एकटाच मनोमन आनंदी होऊन हसत स्वत:शीच बोलत होता. रोमॅंटिक गाणे गुणगुणत होता. काही तरी वेगळंच वाटलं होतं त्याला तिला भेटल्यानंतर जे सगळं तो पहिल्यांदाच अनुभवत होता.
    प्रिया हो म्हणेल की नाही हा विचार मनात आला की जरा निराश व्हायचा. रात्रभर तिच्याच विचारात तो नकळत झोपी गेला. तिचा चेहरा मात्र सतत त्याच्या नजरेसमोर दिसत होता.

    दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोहोचताच त्याला प्रियाचा फोन आला, तिचा होकार ऐकून तो आनंदाने मनोमन वेडापिसा झाला. मनातच गाण गुणगुणायला लागला,

    “पहला पहला प्यार है…पहली पहली बार है..जान के भी अनजाना कैसा मेरा यार है..”

    झालं पुढचे काही दिवस दोघांच्या भेटी गाठी झाल्या. एकमेकांविषयी एक ओढ निर्माण झाली, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढच्या काही महिन्यांनी दोघांचे लग्न झाले. अगदी परफेक्ट कपल अशी त्यांची एक ओळख निर्माण झाली होती.

    आज‌ दोघांच्या भेटीला एक वर्ष पूर्ण झाले होते. पहिल्यांदा भेटलो तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे, प्रपोज केले तो दिवस प्रपोज डे, तिला पहिल्यांदा गुलाबाचे फूल दिले तो रोझ डे असे मनिषचे मत. म्हणूनच आजचा दिवस त्याला खास बनवायचा होता.

    दोघेही बाहेर जायला तयार झाले. प्रियाने मस्त ब्लॅक वनपीस घातला, हलकासा मेकअप केला. त्याच्या सरप्राइज मुळे एक वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिला तयार झालेलं बघताच त्याला पुन्हा एकदा त्यांची पहिली भेट आठवली‌ आणि तो म्हणाला, “ब्युटिफुल, यू आर लूकींग सो हॉट..”

    ती लाजतच त्याला उत्तरली, “थॅंक्यू. निघायचं? ”
    तो मस्करी करत म्हणाला, “तसं तर आता मूड बदलला माझ्या इतक्या सुंदर बायकोला बघून पण आता जावं लागेलच ना..?”

    दोघेही कॅंडल लाइट डिनर साठी छानशा रेस्टॉरंट मध्ये गेले. तिथलं वातावरण अगदीच रोमॅंटिक होतं, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात प्रिया अजूनच उठून दिसत होती. सोबतीला रोमॅंटिक म्युझिक सुरू होते. दोघांनी एकत्र कपल डान्स केला नंतर डिनर केला. डिनर करून मस्त लॉंग ड्राईव्ह ला जाऊन उशीरा दोघेही घरी आले. प्रिया आज खूप आनंदी होती. एखाद्या स्वप्नासारखं सगळं अनुभवल्या सारखं वाटत होतं तिला.

    घरी येताच मनिष ने तिचा हात हातात घेत तिला स्वतः कडे ओढले तशीच ती लाजून चूर झाली. तिच्या हृदयाची धडधड वाढली, चेहऱ्यावरचे भाव बदलले. मनिष एकटक तिचं रूप, तिचे भाव टिपत अजूनच तिच्याकडे आकर्षित होत होता. दोघेही फक्त नजरेनेच बोलत होते आणि नजरानजर होताच ती लाजत होती. त्याने तिला अजूनच जवळ ओढले तसंच दोघांच्याही मनात एकच गाणे सुरू झाले,

    ” बाहो के दरमिया दो प्यार मिल रहे हैं,

    जाने क्या बोले मन,

    डोले सुन के बदन धड़कन बनी ज़ुबा…”

    ती सायंकाळ, ती रात्र, त्यातला प्रत्येक क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय होता.

    अशी ही दोघांची गोड प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

    फोटो- गूगल साभार

    .

  • मैत्री बनली जगण्याची उमेद…

    सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”

    काकू सोसायटीच्या भजन मंडळात अगदी उत्साही व्यक्ती त्यामूळे त्यांच्या बर्‍याच मैत्रिणी होत्या. काका रिटायर्ड झालेले. एकंदरीत सुखी कुटुंब.
    या आनंदात वावरणाऱ्या सुखी कुटुंबावर एक दिवस अचानक मोठे संकट कोसळले. ऑफिसमधून परत येताना सुजयला अपघात झाला. डोक्याला जबर मार लागला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. काका काकूंना हा धक्का पचविणे अशक्य झाले होते.

    सुजयच्या लग्नाचे स्वप्न बघणार्‍या काका काकूंना त्याचे अंतिम सोपस्कार पार पाडावे लागले. काकू रडून मोकळ्या व्हायच्या पण काका मात्र मनातच कुढत काकूंना आधार देत होते. या घटनेला महिना होत नाही तोच या सगळ्या धक्क्यामुळे काकांना हार्ट अटॅक आला, तोही इतका तीव्र की त्यांनीही क्षणभरात या जगाचा निरोप घेतला. आता मात्र काकू पूर्णपणे मोडून पडल्या. आता कुणासाठी जगायचे म्हणत अन्न पाणी सोडण्याचा विचार करत होत्या. नातलग काही दिवस राहून परत गेले, घरी कुणी ना कुणी असेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर ठेवला. नंतर मात्र त्या एकट्या पडल्या, रात्र रात्र जागून फक्त मुलगा आणि नवर्‍याच्या आठवणीत रडायचं इतकंच काय ते सुरू होत. अशामुळे काकूंच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम होत होता. या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी खूप मदत केली. काकूंना एकटे सोडणे धोक्याचे आहे म्हणून आळीपाळीने एक एक मैत्रीण त्यांच्या सोबतीला असायच्या. भजन मंडळात त्यांना बळजबरीने घेऊन जायच्या.या सगळ्यामुळे काकू काही क्षण का होईना पण दु:खातून बाहेर यायच्या.

    काकूंना या सगळ्या धक्क्यामुळे झोपेच्या गोळ्या खावून झोपण्याची वेळ आलेली. सततच्या विचारचक्रामुळे त्यांना झोपच लागेना. काकूंच्या मैत्रीणी त्यांना शक्य तो प्रयत्न करत धक्क्यातून सावरायला मदत करत होत्या. कधी भजनात व्यस्त ठेवायच्या तर कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन जायच्या. असंच एकदा सगळ्या एका अनाथाश्रमात गेल्या. तिथल्या मुलांना मायेची किती गरज आहे हे लक्षात घेऊन काकूंनी स्वतः ला त्या मुलांच्या सेवेत व्यस्त करून घेतले. काकांची पेंशन मिळायची शिवाय काकूंच्या नावाने काही पैसा होताच. त्या सगळ्याला एक वाटा काकू अनाथाश्रमात, गरजूंना दान करण्यात वापरायच्या.

    अधूनमधून नातलग ये-जा करायचे. अशातच वर्ष गेलं. आज काकूंच्या सुजयला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ काकूंच्या मैत्रीणींनी गरजूंना दान धर्म करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुजयला श्रद्धांजली अर्पण करत काकू म्हणाल्या , “आज मी जीवंत आहे हे फक्त आणि फक्त माझ्या या मैत्रीणींमुळे, त्या नसत्या तर कदाचित माझं आयुष्य मी कधीच संपवलं असतं. आता मनावर दगड ठेवून मी जगते आहे. सुजय आणि रावांच्या आठवणी मनात अमर आहेत. पूर्वी झोपेच्या गोळ्या न खाता मला झोपच येत नव्हती पण आता मात्र मला ह्या गोळ्यांची गरज नाही तेही फक्त माझ्या ह्या सख्यां मुळे. या माझ्या जीवलग सख्यांनी मला जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली.”

    हे सगळं बोलताना काकू आणि त्या ठिकाणी असलेला प्रत्येक जण अश्रू गाळत होता.

    ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ह्यातला काही भाग काल्पनिक आहे.

    खरंच आहे ना, मैत्रीच्या नात्यात वय , धर्म, जातपात अशा गोष्टी कवडीमोल असतात. एकेकाळी नातलग पाठ फिरवतिल पण मैत्री मात्र सदैव पाठीशी उभी राहते‌.

    हि कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पूरग्रस्ताचे मनोगत…

    नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.

       खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे किराणा दुकान, त्यावरच सगळा संसाराचा गाडा चालतो. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे हे एव्हाना कळाले होतेच पण ही नदी आमची देवता धोक्याची पातळी ओलांडून असं रौद्र रूप धारण करून आमचे अख्खे संसार एका क्षणात स्वतःच्या पोटात सामावून घेईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पाहता पाहता आजुबाजूच्या गावात पाणी शिरायला सुरवात झाली, काहींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आम्ही सगळी परिस्थिती टिव्हीवर बघून घाबरलो होतो. नंतर लाइट नसल्याने काय चाललंय काही कळत नव्हतं. आमच्यावर कुठल्याही क्षणी ही परिस्थिती ओढाविणार हे माहित होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती. कधीही आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल म्हणून आम्ही सतर्क होतोच पण आतापर्यंत पै पै साठवून उभ्या केलेल्या ह्या घराचं काय? मोठ्या उत्साहाने घरात एक एक वस्तू घेतली, संसार सजविला पण आता जीवाची पर्वा करत घराचा विचार न करता सगळं सोडून कुठल्याही क्षणी जावं लागणार होतं. ही वेळ यायला फार काही उशीर लागला नाही. अचानक आमच्या गावातही पाणी शिरले, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची धडपड सुरू झाली, बरेच बचाव कार्य करणाऱ्या तुकडीची पथके सुरक्षा जॅकेट, बोट घेऊन गावात पोहोचले. आमचं किराणा दुकान आधीच पाण्याखाली गेले होते. इतका सगळा किराणा माल आता कवडीमोल झाला होता, ज्यावर संसार अवलंबून तेच क्षणात वाहून गेले. आम्ही आहे त्या अवस्थेत सुरक्षा पथकाच्या मदतीने एका शाळेत पोहोचलो. घर असं नजरेपुढे पाण्याखाली जाताना बघून अंतर्बाह्य रडू फुटले होते पण त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाचा जीव जास्त महत्वाचा होता. घरी परत कधी येणार याची शाश्वती नव्हती शिवाय परत आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल याचा विचारही करवत नव्हता.
    गेल्या दोन दिवसांपासून लाइट नव्हती त्यामुळे फोन बंद, कुणाशीही काही संपर्क नाही. नातलग सगळे काळजीत पडले होते. शाळेत आसरा घेतलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तीस वर्षांनंतर अशी परिस्थिती आमच्या गावावर आली होती तिही जास्त भयाण स्वरूपात. काही ठिकाणांहून खाण्यापिण्याचे पॅकेट, ब्लॅंकेट, कपडे अशी मदत मिळत होती. घरात सगळं असूनही आज आमचा संसार उघड्यावर आला होता. यापेक्षा मोठे दुःख काय असणार ना….आपला जीव वाचला याच समाधान मानावं की आल्या परिस्थितीवर रडावं अजूनही काही कळत नाहीये.  हा महापूर, पंचगंगेचे रौद्र रूप कधी शांत होणार माहीत नाही. सतत देवाचा धावा करत आम्ही सगळे परिस्थिती शांत व्हावी म्हणून प्रार्थना करत आहोत. एक एक क्षण आता जड जात आहे. हा सगळा अनुभव खूप भयंकर आहे, होतं नव्हतं सगळं क्षणात नष्ट झालं. परिस्थिती शांत झाल्यावर नव्याने सुरुवात करणेही आता खूप जास्त अवघड आहे.
    या सगळ्यात दोष तरी कुणाला द्यावा.
    या पुरामुळे कितीतरी मुक्या प्राण्यांना, पक्षांना जीव गमवावा लागला. गुरे ढोरे हंबरडा फोडत काही तरी सांगू पाहत आहेत, सगळीकडे नुसताच हाहाकार पसरलाय.

    आता फक्त देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतोय की पावसाला, नदीच्या प्रवाहाला शांत करत आमचं आयुष्य आम्हाला परत दे. आम्हाला आमच्या घरी जाऊ दे. ही परिस्थिती पूर्ववत कधी होणार माहीत नाही पण जे काही आम्ही अनुभवतोय ते खरंच खूप भयानक आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप असं उघड्या डोळ्यांनी पाहणे, अनुभवणे फार अवघड आहे.

    खरंच किती भयानक आहे ना सगळं. आयुष्यभर राबून उभा केलेला संसार क्षणात पाण्याखाली जाताना बघून काय वाटत असेल या सगळ्यांना .
    आपला अख्खा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा शिकार बनला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिकच भयानक आहे. अनेक बचाव पथक, नागरिक या परिस्थितीत मदतीला तत्पर आहेत. शक्य ती मदत करत प्रत्येक जण एकमेकांना आधार देत आहे. जे प्रत्यक्षात या परिस्थितीत अडकले त्यांच्या मनाचा विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतंय.

    अशा परिस्थितीत आपण प्रत्येकाने शक्य ती मदत केली तर खारीचा वाटा उचलल्या सारखे होईल.

    हा लेख लिहिण्यामागे हेतू म्हणजेच आपल्या आजूबाजूला ओढावलेल्या या संकटाची तीव्रतेची जाणिव प्रत्येकाला होत आपल्याकडून शक्य ती मदत आपण करावी.

    © अश्विनी कपाळे गोळे