Author: ashvini

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

    मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.

    दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न करीत होता. कार मधून दोघेही निघाले, रेडिओ वर मंद आवाजात गाणे सुरू झाले,

    “तेरे बिना जिया जाए ना…

    बिन तेरे…तेरे बिन….साजना

    सांस में सांस आये ना…”

    अदितीने चॅनल बदलले..

    दुसऱ्या चॅनल वर गाणे लागले,

    “बहुत प्यार करते है…तुमको सनम…”

    अदितीला जास्तच अवघडल्यासारखे वाटले आणि तिने रेडिओ बंद केला.

    अविनाश तिची घालमेल बघत होता, तो लगेच म्हणाला, “आपल्या सिच्युएशन वर गाणे लागताहेत असं वाटतंय ना..”

    अदिती त्यावर काही बोलली नाही, नजर चुकवत इकडे तिकडे बघत विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली.

    अविनाश – “अदिती, मी खूप मिस केले गं तुला दोन वर्ष..तू अचानक पूर्ण पणे संपर्क तोडला माझ्याशी तेव्हा मी खूप झुरलो तुझ्यासाठी..एका सहकार्‍याकडून तुझी चौकशी केली, तू स्वतः ला कामात झोकून घेतलं असं कळालं..तुझी कंपनीतील प्रगती ऐकून आनंदी झालो पण तू माझ्या पासून दूर जातेय हा विचार सहन होत नव्हता गं मला.. असं वाटत होतं यावं, भेटाव तुला पण कुठलही नातं तुझ्यावर लादायचं नव्हतं मला.

    दोन वर्षांनंतर आज आपली भेट झाली, अख्खा दिवस तुला भेटण्यासाठी तळमळत होतो पण तू कामात गुंतलेली बघून डिस्टर्ब नाही केलं तुला शिवाय तू आज मला बघून काय प्रतिक्रिया देशील याचीही खात्री नव्हती. खूप छान वाटतंय आज तुझ्यासोबत…भावना आवरू नाही शकलो मी.. म्हणून सगळं बोलून गेलो…”

    अदिती त्याचं बोलणं ऐकून रडायला लागली जणू दोन वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर पडत होत्या. ती अशी रडताना पाहून अविनाश ला अपराधी वाटू लागले तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून तिची समजुत काढत म्हणाला, 

    “अदिती, तुला दुखवायचं नाही गं..सो सॉरी..मी नको होतं असं सगळं अचानक बोलायला…माफ कर मला.. प्लीज रडू नकोस..शांत हो…”

    अदिती त्यावर उत्तरली,

     “तुला काय वाटतं रे..मी खूप निर्दयी आहे..तुला दोन वर्ष अवघड गेली पण इकडे माझं काय.. कितीही आवरलं स्वतः ला तरी एक दिवस असा नव्हता की तुझी आठवण आली नसेल. मीही तितकीच झुरले तुझ्यासाठी फक्त मला व्यक्त होता येत नव्हतं. तुझ्याशी संपर्कात राहीले तर अजूनच गुंतल्या जाईल मी तुझ्यात असं वाटायचं म्हणून टाळत आले तुला..तू कदाचित वेळेनुसार मला विसरशील.. तुझं आयुष्य आनंदाने जगशील असं वाटलं होतं..तू गेल्यावर हा पाऊस, ती कॉफी सुद्धा नको वाटायची मला..कारण त्यात आपल्या अनेक आठवणी दडलेल्या होत्या. आज तू समोर दिसताच वाटलं मोकळं करावं मन, सांगावं तुला की माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर पण हिम्मत होत नव्हती माझी.. इतक्यात आई बाबांनी काही स्थळ आणले माझ्यासाठी तेव्हा खूप गरज वाटली होती मला तुझी.. दुसऱ्या कुणाचा विचार करूच शकत नव्हते मी..आई बाबांनाही कळाल होतं माझ्या मनात काही तरी गोंधळ उडाला आहे पण कसं विचारावं कदाचीत त्यांना सुद्धा कळत नव्हतं..अगदी वेळेत परत आलास तू…आज तू व्यक्त झालास आणि मी कमजोर पडले.. आवरले नाही मला अश्रू… तेव्हाही आवडायचा तू मला पण मन मानत नव्हतं.. आजही आवडतोस, हवाहवासा वाटतो तुझा सहवास..आय लव्ह यू अविनाश…”

    अविनाश अदितीचा हात हातात घेत म्हणाला ” आय लव्ह यू टू अदिती..आजचा दिवस खुप खास आहे माझ्यासाठी…चल पुढे कॉफी शॉप आहे..आपला हा आनंद साजरा करायलाच पाहिजे ना…”

    अदितीने गोड स्माइल देत होकार दर्शविला आणि तिच्या गालावरची खळी बघून अविनाश अजूनच घायाळ झाला.

    दोघांनीही मस्त कॉफी घेतली, अविनाश ने अदितीला घरी सोडले. वाटेत मंद आवाजात गाणे सुरू होते,

    “पहला नशा, पहला खुमार नया प्यार हैं नया इंतज़ार करलूँ मैं क्या अपना हाल ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार तू ही बता……”

    दोघांच्याही भावना आज नकळत बाहेर पडल्या आणि त्यांच्या प्रेमाची गोड सुरवात झाली.

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.

    दोन वर्षांपूर्वी अदिती मुलाखतीसाठी आलेली तेव्हा बाहेर असाच जोरात पाऊस सुरू होता, त्यामुळे तिला जरा उशीर ही झाला होता. लगबगीने ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि आल्यावर कॉन्टॅक्ट पर्सन मिस्टर महेश शर्मा यांना भेटायचं आहे असं सिक्युरिटी कडे सांगितलं.

    सिक्युरिटी कडून कळाले की काही तरी तातडीचे काम आल्यामुळे महेश सर आज उशीरा येणार आहेत पण त्यांनी तुम्हाला मिस्टर अविनाश यांना भेटायला सांगितले आहे. पावसात तासभर प्रवास करून भिजली जरी नसेल तरी अंगात थंडी भरलेली होती.

    सिक्युरिटी ने पहिल्या मजल्यावर जाऊन उजवीकडे आत जा, तिथे तुम्हाला अविनाश सर भेटतील असं सांगितलं. जाताना अदिती विचार करत होती, “सर उशीरा येणार म्हणताहेत, आता हे अविनाश कोण बघुया.. इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणजे बरे..मोठ्या हुद्द्यावर असलेल्या लोकांचे बरे बाबा.. उशीर झाला की कळवून मोकळे..आपण मात्र लगबग करत वेळेत पोहोचण्याच्या तयारीत..असो त्यांनाही कधी तरी अशाच परिस्थितीतून जावे लागले असणार..”

    उजवीकडून आत आले, आता कुणाला तरी विचारायला पाहिजे अशा विचारात असतानाच तिची गाठ पडली अविनाश सोबत पण तिला कुठे मी माहित की हाच अविनाश आहे. ती त्याला म्हणाली, “Excuse me, मिस्टर अविनाश पाठक कुठे भेटतील सांगू शकता का..मी मुलाखतीसाठी आलेली आहे..”

    अविनाश ने तिच्याकडे बघितले तशीच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली पण तिला न कळू देण्याच्या आवेशात तो म्हणाला, ” समोर मिटिंग रूम आहे, तुम्ही बसा तिथे.. अविनाश ला सांगतो मी तुम्ही आलात म्हणून..”

    अदिती मान हलवून थॅंक्यू म्हणत मिटिंग रूम कडे निघाली. आत एका खुर्चीत बसून अविनाश सर येण्याची वाट बघत होती.

    अविनाश पुढच्या पाच मिनिटात आत आला आणि हात पुढे करून म्हणाला, “हॅलो,मी अविनाश पाठक. ”

    अदिती जरा गोंधळून हसू आवरत जरा घाबरत म्हणाली, “हॅलो सर, मी अदिती..म्हणजे मी तुम्हालाच तुमच्याविषयी विचारले तर..सो सॉरी..मला माहित नव्हतं त्यामुळे जरा कन्फ्युजन झालं असावं..”

    “डोन्ट बी सॉरी..मिस अदिती.. होतं असं कधी कधी..”

    “अदिती, आज महेश सर उशीरा येणार असल्याने तुमची मुलाखत त्यांनी मला घ्यायला सांगितली आहे..पुढचा राऊंड सर घेतील..ते येतीलच तासाभरात..” अविनाश.

    अदिती -“ओके सर..नो प्रोब्लेम..”

    अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, थंडी अंगात भरल्याने तिच्या अंगावर काटे उभे झाले होते आणि resume अविनाश च्या हातात देताना तिच्या हातावरचे काटे अविनाश च्या नजरेतून ते सुटले नव्हते. तिची एकंदरीत परिस्थिती पाहता तो म्हणाला, “मिस अदिती, तुम्हाला फ्रेश होवून यायचे असेल तर तुम्ही दहा मिनिटे जाऊन येऊ शकता, त्यानंतर आपण मुलाखत घेऊ. ”

    “इट्स ओके सर, मी तयार आहे मुलाखतीसाठी..” असं म्हणत अदितीने त्याचा प्रस्ताव नाकारला.

    अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, पाच मिनिटां पूर्वी थंडीने जरा कुडकुडत असलेली अदिती आत्मविश्वासाने उत्तर देत होती. तिची एकाग्रता, चेहऱ्यावर आत्मविश्वास, तिचे भाव टिपत अविनाश मधूनच हरवल्या सारखा होत होता. तिच्या एकंदरीत मुलाखतीनंतर तो अजूनच तिच्यावर इंप्रेस झाला. उत्तर देताना तिचा सखोल अभ्यास, प्रत्येक गोष्ट पटवून देताना तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला भाळले. अर्धा तास कसा गेला कळाले सुद्धा नाही. नंतर अविनाश ने वेल डन मिस अदिती म्हणताच ती मनोमन आनंदी झाली. आता महेश सर आले की पुढची प्रोसेस होईल तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल असं अविनाश ने सांगितले.

    अदिती त्यावर म्हणाली,” थॅंक्यू सर. एक विचारायचं होतं, इथे कॅन्टीन कुठे आहे..”

    अविनाश-“चला मी नेतो तुम्हाला..मलाही कॉफी घ्यायला जायचेच आहे..”

    अदिती आणि अविनाश एकत्र कॉफी घ्यायला ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेले. अदिती जरा गप्प गप्प आहे बघून अविनाश म्हणाला “तुम्ही टेंशन मुळे अशा गप्प आहात की मुळातच कमी बोलता..मला घाबरलात तर नाही ना.. मी साधा एम्प्लॉयी आहे बस.. गेल्या चार वर्षांपासून इथे नोकरीला आहे, माझं काम बघून सर काही महत्वाच्या जबाबदारी सोपवितात माझ्यावर विश्वासाने बाकी काही नाही… घाबरण्याचे कारण नाही..? तेव्हा अदितीला जरा हायसे वाटले..ती जरा का होईना पण बोलायला लागली. दोघांची ती पहिलीच भेट आणि पहिलीच एकत्र कॉफी ?

    जरा एकमेकांची ओळख करून देत त्यांनी औपचारिक गप्पा मारल्या. काही वेळाने महेश सरांचा अविनाश ला फोन आला.

    अदिती ला घेऊन तो महेश सरांना भेटायला गेला. अदितीची महेश सरांनी पुढची मुलाखत घेतली. तिची हुशारी , आत्मविश्वास असं एकंदरीत सगळं बघता तिला त्यांनी सिलेक्ट केले. पुढच्याच आठवड्यात तिला कंपनीत रूजू व्हायचे होते. ती अविनाश ला नोकरी मिळाल्याची बातमी आनंदाने सांगून थॅंक्यू म्हणत घरी परतली.

    अविनाश ला त्या दिवसापासून अदिती चा चेहरा सतत डोळ्यापुढे दिसत होता, किती निरागस मुलगी आहे ही.. स्वभावाने शांत वाटली पण एक वेगळाच आत्मविश्वास आहे तिच्यात असा विचार करून तो स्वतः वर हसत स्वतः ला म्हणाला , “मी का इतका विचार करतोय तिचा..”

    वरवर स्वतः ची समजुत काढत असला तरी मनातून ती कधी एकदा कामावर रूजू होते असं त्याला वाटत होते.

    अदितीला मनासारखी नोकरी मिळाल्याने ती आणि तिच्या घरचे ही खूप आनंदी होते. आठवड्यानंतर अदिती ऑफिसमध्ये आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस हा होताच. ती आॅफिसला पोहोचली, पहिल्या दिवशी महेश सरांनी तिची टीम मध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली, तिची नजर अविनाश ला शोधत होती तितक्यात अविनाश एका मिटिंगमध्यून बाहेर येताना तिला दिसला. त्याला बघताच एक गोड स्माइल देत दोघांनी हाय हॅलो केले.

    अविनाश ने काही वेळाने तिला कॉफी घ्यायला येणार का विचारले आणि क्षणाचाही विचार न करता ती गेली. कॉफी तिला खूप प्रिय, त्यात असा संततधार पाऊस मग तर काय विचारायलाच नको ?

    अविनाश ला त्या दिवशी कळाले अदिती आणि कॉफी मधलं प्रेम.

    अविनाश ऑफिसमधला पहिलाच मित्र होता तिचा. तशी जरा अबोल असल्याने फारसे मित्र मैत्रिणी नव्हते, एकाग्रतेने आणि प्रमाणिक पणे काम करणे हे तिचं खरंच कौतुकास्पद होतं. पुढे कामात कुठे काही अडकले की अविनाश तिला मदत करायचा. आता रोजचा एकत्र कॉफीचा कार्यक्रम हा ठरलेला होता दोघांचाही. अविनाश देखणा, आकर्षक, मॉडर्न राहणीमान त्यामुळे ऑफिसमध्ये अतिशय फेमस पर्सनालीटी. अदिती ला सुध्दा मनातून आवडायला लागला होता तो पण त्याच राहणीमान, श्रीमंत घरातला मुलगा आपल्याला का म्हणून पसंत करणार तेव्हा मनातल्या भावना मनातच ठेवलेल्या बर्‍या या विचाराने ती अविनाश ला काही जाणवू देत नव्हती.

    अविनाश ला मात्र ती पहिल्या भेटीतच आवडली होती, आता तर तिच्या सहवासात तिचं निरागस रूप, साधं राहणीमान त्याला अधिकच आवडू लागलं होतं. अदिती सारखी मुलगी आयुष्यात असतं किती सुखकर आहे हे त्याला कळू लागलं. दोघांची छान मैत्री झाली, तुम्ही आम्ही चे नाते मैत्री झाल्याने तू मी वर आले.

    असेच सहा महिने गेले. आज अदितीचा वाढदिवस होता, ती मस्तपैकी तयार होऊन सगळ्यांसाठी मिठाई , नमकिन घेऊन ऑफिसला आली, बघते तर काय अविनाश आणि इतर सहकार्‍यांनी मिळून तिचं क्युबिकल छान सजवलंं होतं. ते बघून ती अजूनच आनंदली, हा वाढदिवस खूप खास आहे असं तिला वाटत होतं. अविनाश सोबत कॉफी घ्यायला गेल्यावर त्याने तिला छान नाजूक असं सोन्याचं ब्रेसलेट गिफ्ट दिलं आणि म्हणाला “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अदिती..तू खूप खास मैत्रीण आहेस माझी.. म्हणून तुझ्यासाठी माझ्याकडून हे खास गिफ्ट..”

    अदिती त्यावर म्हणाली,” थॅंक्यू अविनाश पण असं महागडं गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. प्लीज समजुन घे..आई बाबांना सुद्धा नाही आवडणार अरे.. त्यांना काय सांगणार ना मी..”

    अविनाश जरा नाराज होऊन, “अगं वेडाबाई, गिफ्ट आहे ते..स्वस्त महाग असं काही नसतं.. तुझ्यासाठी खास निवडून आणलं मी..खरंच खूप आवडीने आणलं.. असं नाही म्हणून नाकारू नकोस ना.. प्लीज..”

    अदितीला अविनाश चे बोलणे आज नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते, त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव तिला दिसत होते.. तिलाही त्याच असं खास मैत्रीण म्हणनं, वाढदिवसाचं छान सरप्राइज देणं मनापासून आवडलं होतं पण तिचं मन मात्र मानत नव्हतं. नकळत ती बोलून गेली, “इतकी खास मैत्रीण आहे का रे मी तुझी..माझा वाढदिवस लक्षात ठेवून असं दिवसभर स्पेशल वागणूक देतोय तू आज मला… सगळं असं छान वाटतंय…आजचा वाढदिवस सगळ्यात खास आहे असं वाटतंय अविनाश मला…फक्त तुझ्यामुळे..तुझ्यासारखा मित्र मिळाला याचा खूप आनंद वाटतो मला.. थॅंक्यू सो मच…”

    अविनाश तिच्या डोळ्यात बघत , ” अदिती, खास मैत्रीण तर आहेच तू माझी पण त्या पलिकडे ही काही तरी वाटतयं मला..तू आवडतेस मला..”

    अदितीला हे सगळं खूप हवंहवंसं वाटत होतं, तो अगदी आपल्या मनातलं बोलतोय असं वाटत होतं पण का कोण जाणे तिचं मन मात्र मानत नव्हतं..आपण अविनाश पुढे काहीच नाही..तो घरंदाज, श्रीमंत, देखणा..आपण साधारण कुटुंबात वाढलेलो शिवाय दिसायला त्याच्या मानाने साधारण असा विचार तिला त्याच्या आयुष्यात जाण्यापासून तिला अडवत होता..त्याला आपल्यापेक्षा खूप देखणी, त्याच्या तोलामोलाची मुलगी मिळेल तेव्हा वेळीच आपण थांबलेले, भावनांना आवरलेले बरे असा विचार करून ती त्याच्या विचारातून मागे फिरली आणि म्हणाली, “अविनाश, तू काय बोलतोय, अरे आपण चांगले मित्र आहोत पण… नाही अविनाश आपण इथेच थांबलेलं बरं..”

    अविनाश नाराज होऊन, “अदिती तुला दुखवायचं नाही गं, पण का कोण जाणे आज नकळत मनातलं सगळं बाहेर आलं..But I really mean it..मला मनापासून आवडतेस तू…”

    त्यावर अदिती निरूत्तर होती, त्याने दिलेलं गिफ्ट सुद्धा तिने नाकारलं.

    अचानक अदितीच्या वागण्यातला बदल त्याला जाणवू लागला. ती शक्य तितकं त्याला टाळायचा प्रयत्न करत होती, मनातून तिलाही तसं वागायला आवडत नव्हतं पण तरीही त्याला टाळत तिने स्वतःला कामात झोकून दिलं. अविनाश ला सगळं खूप विचित्र वाटलं, मनोमन तो खूप दुखावला गेला होता. शक्य तो प्रयत्न करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, आता एकत्र कॉफी सुद्धा कधीतरीच त्यांच्या नशीबी यायची. अविनाश ने विचारल्यावर ती इतकंच म्हणायची, मला आता तरी करीअर वर लक्ष द्यायचे आहे..तू माझा विचार करू नकोस…

    अविनाश तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणायचा “अदिती, तू हवा तितका वेळ घे..तू माझं प्रेम स्विकारावे असा हट्ट नाही माझा पण असं टाळून मला दुखवू नकोस गं..आपण मित्र म्हणून तर राहूच शकतो ना..”

    तिलाही त्याच पटत होतं पण आता मैत्री सुद्धा पूर्वीप्रमाणे राहीली नव्हती. अविनाश ला दुखवायला नको म्हणून ती न चुकता त्याच्या सोबत कॉफी घ्यायला जायची पण पूर्वीसारखा संवाद राहीला नव्हता.

    इतर सहकार्‍यांचीही दोघांविषयी काही तरी कुजबुज सुरु झाली होती.

    अविनाश ला त्याच्या कामातील हुशारी मुळे प्रमोशन मिळाले. दुसऱ्या एका टिम मधून एक नविन प्रोजेक्ट UK मध्ये सुरू होणार होता आणि त्यासाठी अनुभवाच्या जोरावर योग्य व्यक्ती म्हणून अविनाश ची निवड झाली. दोन वर्षांसाठी अविनाश UK ला जाणार होता. ते कळाल्यावर अदितीला मनोमन आनंद तर झालाच पण तो सोबत नसणार म्हणून एक अस्वस्थताही वाटू लागली.

    अविनाश ची अवस्था सुद्धा अशीच झाली होती. एकीकडे UK ला जाण्याची संधी, प्रमोशन याचा आनंद तर दुसरीकडे अदितीला सोडून जावं लागणार म्हणून वेगळीच अस्वस्थता. परत येईपर्यंत अदिती च्या मनात काय असणार, दुर गेल्यावर तिचं मन बदलेल का, तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल का अशे अनेक विचार त्याच्या मनात गोंधळ घालत होते.

    अविनाश साठी जाण्यापूर्वी सगळ्यांनी छोटीशी पार्टी ठेवली होती, त्या पार्टीत अविनाश आणि अदिती वरवर आनंदी वाटत असले तरी मनातून एकमेकांसाठी झुरत होते.

    अदिती माझ्या संपर्कात राहशील ना..I will really miss you.. specially will miss our coffee..” असं तिला म्हणताच तिच्या डोळ्यात त्याला अश्रू दिसले. कसं बसं अश्रु आवरत ती हसून म्हणाली ,”All the best अविनाश..I will miss you too..”

    अविनाश ठरलेल्या दिवशी UK ला रवाना झाला.

    अदिती त्याची आठवण काढून खूपदा रडायची, तिला मनांतून वाटायचं त्याला फोन करावा, त्याचा फोन मेसेज आला की बोलावं, मन हलकं करावं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याला टाळत होती. सध्या कामाचा व्याप वाढलाय, नंतर बोलते म्हणत वेळ मारायची. हळूहळू त्याला पूर्णपणे टाळायला सुरू केले तिने. असं कुणाला दुखावणे योग्य नाही हे कळत असून भावना आवरण्याच्या नादात ती असं वागायला लागली. मनात रोज आठवण काढून , जुन्या आठवणी, सोबतचे क्षण आठवायची आणि मग अचानक भानावर येत स्वतः ला दुसरीकडे गुंतवू पाहायची. असेच दोन वर्ष गेले.

    आज अविनाश आणि अदितीची पुन्हा भेट झाली.

    मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे दोघे एकत्र घरी जायला निघाले.

    पुढे अदिती आणि अविनाश यांच्या नात्यांचं काय होणार हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात. ?

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १

    अदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली,

    “नेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस…? कधी थांबतो कुणास ठाऊक….चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल..”

    अदिती कॉफी घ्यायला निघाली आणि जाताना आजुबाजूला फ्लोअर वर एक नजर टाकली तर मोजकेच लोक होते.. शुक्रवार असल्याने बरेच जण लवकर निघून गेलेत वाटतं असा विचार करून ती कॅन्टीन मध्ये निघून गेली.

    एका टेबल खुर्ची वर बसून कॉफी घेत समोरच्या काचेतून बाहेरचा पाऊस बघत ती मग्न झालेली असतानाच एक आवाज आला,

    “excuse me miss Aditi….मी इथे बसलो तर चालेल..?”

    तो आवाज ऐकताच तिने वळून पाहिले , “अविनाश तू…अरे बस ना… कधी आलास इकडे..तू UK ला होतास ना..”

    अविनाश समोरच्या खुर्चीवर बसून, अदिती च्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदी होत बोलला,

    “आजच जॉइन झालो अगं इकडे… मागच्या आठवड्यात आलो परत..दोन वर्षांचा प्रोजेक्ट होता..संपला..आलो परत…तू सांग कशी आहेस.. अजूनही तशीच दिसतेस..जशी ऑफिसच्या पहिल्या दिवशी दिसत होती ? आठवतोय मला तो दिवस… तेव्हाही असाच पाऊस सुरू होता…आठवतो ना…”

    अदिती जरा लाजत, मनातल्या भावना आनंद लपवत , ” काहीही काय रे…तू पण ना..मी मजेत आहे….तू सांग कसं वाटलं दोन वर्षे..आणि आज दिवसभर तर दिसला नाहीस..आता अचानक इथे कसा.. म्हणजे उशीर झाला ना.. म्हणून म्हणतेय..”

    अविनाश एकटक अदितीला बघत होता, तिचा नाजूक चेहरा, तिला शोभून दिसणारे कुरळे केस, तिच्या गालावरची ती खळी, मध्यम उंचीची साधी सिंपल पण अगदीच गोड मुलगी.

    मध्यमवर्गीय कुटुंबातली , आई वडिलांना एकुलती एक. हुशार, समजुतदार आणि मेहनती, त्यामुळे कामात परफेक्शन. स्वभावाने जरा लाजाळू, अबोल पण हसरी मुलगी. ?

    तिच्या डोळ्यातले भाव टिपत तो म्हणाला, “दिवसभरात किती वेळा तुझ्याशी भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत येऊन बघितलं पण मॅडम बिझी..एकदा कॉलवर, एकदा मिटिंगमध्ये.. लक्षही नव्हतं तुझं..कामात मग्न होतीस, व्यत्यय नको आणायला म्हणून काही तुला डिस्टर्ब केलं नाही..म्हंटलं आता आज भेटतात मॅडम की नाही काय माहित.. म्हणून थांबलो तुमची वाट बघत…”

    “म्हणजे तू मला भेटायला थांबलास…. अरे, सध्या खूप काम आहे त्यामुळे कुठेच आजुबाजूला लक्ष नसतं..रोज घरी जायला उशीर होतो..” अदिती.

    “हो, खरं तर तुला भेटायलाचं थांबलो..किती कॉल, मेसेज, इमेल केले तुला.. ऑफिसच्या मेसेंजर वर सुद्धा किती तरी वेळा मेसेज केला पण तू मात्र काहीच उत्तर दिले नाही…आज ठरवलं होतं तुला भेटूनचं जायचं घरी..” अविनाश.

    अदिती विषय बदलत म्हणाली, “कॉफी घ्यायची का अजून एक.. बोलता बोलता ही कॉफी कधी थंड झाली कळालेच नाही..”.

    “अजूनही तशीच कॉफी प्रेमी आहेस वाटत तू… थांब मी घेऊन येतो…” अविनाश.

    अदिती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.
    ( अविनाश उंच पुरा, गोरापान, रूबाबदार व्यक्तीमत्व, हुशार, आत्मविश्वास असलेला होतकरू मुलगा. अगदीच मॉडर्न विचारांचा, घरी मोठा व्यवसाय असूनही पारंपरिक व्यवसाय नको म्हणून स्वबळावर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. घरचा व्यवसाय वडील आणि भाऊ सांभाळायचे. दोघेच भाऊ. घरी आई वडील, भाऊ ,वहिनी आणि अविनाश सगळ्यात लहान. )

    अविनाश दोघांसाठी कॉफी घेऊन आला.

    अदिती आधीच्या गोष्टींवर बोलण्याच्या मूड मध्ये नाही हे लक्षात घेऊन अविनाश तिला चिडवत म्हणाला, “काय मग, पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही.. कशी जाणार आहेस घरी..”

    अदिती बाहेर एक नजर टाकत, “हो ना..पाऊस कधी थांबतो काय माहीत.. आई-बाबांना कळवायला पाहिजे.. काळजी करत असतील ते.. कॅब मिळते का बघते आता.. बसने जाणे तर अशक्यच वाटतेय..”

    “तुझी हरकत नसेल तर मी सोडतो ना तुला.. पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून कार घेऊन आलेलो आज..” अविनाश.

    “नको अरे मी बघते कॅब मिळते का…तुला उगाच चक्कर होईल मला सोडून घरी जायला…” अदिती.

    “अगं, किती ही औपचारिकता…खरंच इतक्या पावसात आता कॅब मिळेल का.. मिळाली तरी मी नाही जाऊ देणार तुला एकटीला..नऊ वाजत आलेत आता..चल मी सोडतो.. काही चक्कर वगैरे होणार नाही मला…” अविनाश.

    “बरं ठीक आहे, मी आईला फोन करून कळवते..तसं आज उशीर होईल ते सांगितलं होतंच पण इतका उशीर होईल वाटलं नव्हतं…हा पाऊस पण ना…” अदिती.

    “बरं झालं आला ना पाऊस.. नाही तर काम आटोपून निघून गेली असतीस..मला तुझ्याशी भेटताही आलं नसतं…?” अविनाश.

    त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अदीती म्हणाली,

    “चला, निघायचं का…”

    न बोलताच अदीतीला मान हलवून होकार देत अविनाश चल म्हणाला.

    दोघेही पार्कींग कडे निघाले.

    क्रमशः

    अदिती आणि अविनाश यांच्यातल्या नात्याला जाणून घेऊया पुढच्या भागात ?

    पुढचा भाग लवकरच…

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ??

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अशीही एक सावित्री…

    “मॅडम, इधर क्या करने आयी है..अच्छे घर की लग रही..ये रेड लाइट एरिया है..पता है ना..”
    एक लाल भडक लिपस्टिक लावलेली , जरा विचित्र पोझ देत उभी असलेली, तोडके कपडे घातलेली एक चाळीशीतली स्त्री सविता कडे बघत बोलली.
    सविता तिच्या कडे किळसवाण्या नजरेने बघत इच्छा नसताना उत्तरली, “अहो बाई, माझा नवरा शाम, सारखा इकडे येतो असं कळालं त्यांच्या मित्रांकडून. दोन दिवस झाले घरी परतला नाही म्हणून शोधायला आली..हा बघा हा फोटो, तुम्ही बघितला का ह्याला इकडे..”
    “लैला नाम है मेरा..बाई मत बोल..धंदे का टाइम है..निकल यहाँ से नहीं तो तुझे भी लेके जायगा कोई..” फोटो कडे दुर्लक्ष करत लैला सविता ला जायला सांगत होती.
    “बरं लैला, एकदा बघ ना हा फोटो, ह्याला पाहिलं का इकडे तेवढं सांग मग मी निघते लगेच.. खूप काळजी वाटत आहे गंं..”
    “दिखा तो कोण है ये तेरा शाम..” फोटो बघत लैला म्हणाली.
    सविताने तिला फोटो दाखवला आणि आजुबाजूला कटाक्ष टाकला तर लैला सारख्या अनेक स्त्रिया तिथे खोल गळ्याचे कपडे घालून , भडक मेकअप करून विचित्र पणे इशारे करत गिर्‍हाईक शोधत होत्या. एकंदरीत परिस्थिती पाहता सविता ला भिती वाटत होती, तितक्यात लैला म्हणाली,
    “ये तेरा मर्द है..इसको तो कल अस्पताल पहुचाके आये हमारे शेठ..हरामी ने बहोत दंगा किया इधर.. बहुत मार पडा इसको कल..रेश्मा के पास आता था हमेशा.. बहुत पैसा लुटाया न रेश्मा पे इसने.. शराब के नशे मे डूब पडा था तब रेश्मा के पास दुसरा गिर्‍हाइक आया..इसने रेश्मा को दुसरे के साथ देखा तो गुस्सा होकर रेश्मा पे हाथ उठा रहा था.. जैसे के इसने खरिद लिया रेश्मा को..दंगा किया बहुत..सबने इसको बहुत मार पिटा..मर जायगा ओर हम पे आयेगा कर के शेठ अस्पताल पहुचाके आये इसको..”
    सविता ते ऐकताच हादरली, घाबरून शब्द बाहेर पडत नव्हता तिच्या तोंडातून. अडखळत म्हणाली, “कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे…”
    लैला जरा चिडून ,”इतना बताया ना अब निकल..धंदे का टाइम है बोला ना.. बाकी का नहीं पता मेरेको..”
    तितक्यात एक जण आला आणि लैला त्याला घेऊन एका लाकडी जिन्यातून आत निघून गेली.

    सगळं ऐकून सविता रडकुंडीला आली होती, कुणाला विचारावं, काय करावं काही कळत नव्हतं तिला. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करावी म्हणून तिथून निघाली. जाताना एक दोघांनी मुद्दाम धक्का देत ‘आती क्या मेरे साथ’ म्हंटल्यावर तिला अक्षरशः किळस वाटली. धावपळ करत त्या गल्लीतून बाहेर पडली. डोक्यावर रखरखतं उन्ह होतं, घरी पोरांना सोडून नवर्‍याच्या शोधात ती इथपर्यंत आली होती.
    काय पाप केलं म्हणून हा दिवस नशिबात आला आज असा विचार करत ती चालत होती. तितक्यात सविताचा फोन वाजला. शामच्या मित्राचा फोन होता, “वहिनी, शाम हॉस्पिटलमध्ये दाखल आहे…मला तिथल्या नर्स ने फोन करून कळवलं..मी पत्ता पाठवतो तुम्ही या तिकडे..मी पण येतोच..”
    सविताने रिक्षा पकडली आणि हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचली. चौकशी करून शाम जवळ आली, शामचा मित्र बंडूही सोबतीला आला होताच. शामच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या, डोक्याला ड्रेसिंग केलेलं होतं, मळकट कपडे, अंगावर मारल्याचे व्रण, पट्टी बघून सविताला राग करावा की कीव करून रडावे कळत नव्हते. एकही शब्द न बोलता ती त्याच्याकडे बघत होती. शाम मात्र औषधे घेऊन झोपी गेला होता. नर्स कडून कळाले की जास्त मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत कुणी तरी आणलेलं, जरा शुद्धीवर आल्यावर बंडूचा नंबर दिला त्याने आणि आम्ही त्यांना कळवले म्हणून.
    सविता बाजुला एका बेंचवर बसून शाम जागा होण्याची वाट बघत होती. डोळ्यातून अश्रु वाहून नकळत ओठांवर येऊन टेकत होते. डोक्यात अनेक विचारांचे थैमान उडत होते.
    सविता आणि शामच्या लग्नाला बारा वर्षे झालेली. शामचे हार्डवेअर चे दुकान होते, बर्‍यापैकी कमाई असायची. सविता शिवणकाम करून संसाराला हातभार लावायची.
    दोघ राजा राणी आणि दोन मुले असं सुखी कुटुंब होतं ते. कसा कुणास ठाऊक पण शामला दारूचे व्यसन लागले मग उशीरा घरी येणे, भांडणे अशे प्रकार सुरू झाले. मुलेही लहान, त्यांच्यासमोर उगाच तमाशा नको म्हणून सविताने त्याची खूपदा समजुत काढली. त्यानेही परत असं करणार नाही म्हणत वेळ मारली पण एक दिवस जे सविताला कळाल त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली.
    शाम दुकान बंद करून बरेचदा रेश्मा कडे शरीरसुखासाठी जाऊ लागला. दारूची सवय ही कमी होत नव्हतीच. उशीरा घरी यायचा तेव्हा मुलं झोपलेली, अशावेळी त्याला बोलण्यात अर्थ नाही म्हणून मुलं शाळेत असताना जिवांचा आकांत करत सविता त्याला जाब विचारायची, म्हणायची, “काय चुकलं रे माझं, कुठे कमी पडले मी तुला समजुन घेण्यात..का जातोस त्या सटवीकडे…”
    शाम मात्र काही झालं की हात उगारून तिला गप्प करत निघून जायचा आणि म्हणायचा , “मी काही करेन..तू मध्ये पडू नकोस..वीट आला तुझा, तुझ्या कटकटीचा..”
    सविताला खूपदा वाटायचे सोडून द्यावं सगळं पण मुलांकडे बघून ती शांत बसायची, ते म्हणतात ना कुठल्याही स्त्रिला आपला नवरा दारू पिऊन पडला तरी चालतं पण दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला मुळीच सहन होत नाही. सविताचेही असेच झाले.
    ती स्वतः ची चूक शोधत रडायची, मनातल्या मनात कुढत बसायची. मुलांसाठी संसारासाठी धडपड मात्र सुरू असायची तिची.
    गेले तीन वर्षे ती असंच आयुष्य ती जगत होती. आज तर हद्दच झाली होती.

    काही वेळाने शाम जागा झाला आणि समोर सविताला बघून जरा बिचकला. तिच्या डोळ्यात एक प्रकारची घृणा त्याला दिसली. नजर लपवत अपराधी भावनेने तो इकडे तिकडे बघत होता. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली, परत एकदा तपासणी करून घरी जाण्याची परवानगी दिली. बंड्याने औषधे आणून दिली आणि त्याच्या दुचाकीवर तो निघाला.
    सोबतच शाम आणि सविता रिक्षातून घरी यायला  निघाले. वाटेत शाम गप्प गप्पच होता.
    दोघेही घरी पोहोचलो तसेच दोन्ही मुलांनी आईला मिठी मारली आणि म्हणाले, “आई, किती वेळ वाट बघत होतो आम्ही..कुठे होतीस तू..”
    दोन्ही मुले आपल्याकडे दुर्लक्ष करत आईसोबत बोलताना बघून शामला अजूनच अपराधी वाटले. त्यांचीही काय चूक, बाबांचं प्रेम अनुभवायला बाबांना वेळच कुठे होता.
    सायंकाळ होत आली होती. सविताने स्वयंपाक करून जेवायला घेतले. काही न बोलता शामचे औषधे आणि ताट शाम समोर आणून दिले. तोही मुकाट्याने जेवला, औषधे घेऊन झोपी गेला.
    दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून सविता तयार झाली. मुलांसाठी, शामसाठी नाश्ता चहा  बनवून स्वतः कपाटातील जरीकाठी साडी नेसून तयार झाली. पुजेचं ताट तयार करतच होती तितक्यात शेजारच्या सुनंदाने आवाज दिला. हो आलेच गं म्हणत पटकन आवरून ती मुलांना म्हणाली, ” मी आलेच रे वडाची पूजा करून..नाश्ता करून घ्या दोघेही.. बाहेर जाऊ नका मी येत पर्यंत..”
    ते ऐकताच शाम च्या मनात विचार आला, आपल्यामुळे इतका त्रास सहन करूनही सविता वटपौर्णिमेचं व्रत करून सात जन्मासाठी देवाकडे आपल्यालाच मागत असणार का….

    तुम्हाला काय वाटतं सविता शाम सारखा पती  जन्मोजन्मी मिळावा म्हणून सविता वडाची पूजा करायला गेली असेल का ?

    हो..अशा अनेक सविता आहेत आपल्या आजूबाजूला. ज्यांना पती कितीही त्रास देत असेल, दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला असेल, तिच्याशी प्रेमाने वागत नसेल, मारपीट, शिवीगाळ करत असेल तरीही ती वटपौर्णिमा मात्र साजरी करतेच, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना सुद्धा करते.

    शाम वेश्येच्या मागे लागला पण दोन दिवस घरी आला नाही म्हणून सविताने जीवाची पर्वा न करता त्याचा शोध घेतला, रेड लाइट एरिया मध्ये जाऊन काही शोध लागतो का बघितले. पोलिसांकडे गेली तर नवराच दोषी असा विचार करून त्याला स्वतः शोधून काढले. त्याच्या औषध पाण्याकडे लक्ष देत काळजी घेतली. अशाही काही सावित्री आजही आहेत.

    अन्याय सहन करणे योग्य नाहीच, अन्यायाविरुद्ध आवाज आ उठवलाच पाहिजे पण काही भगिनी सविता सारख्या सुद्धा आहेच.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

    मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”

    मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.

    मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता

    घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”

    रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी,  बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”

    मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”

    रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”

    मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
    मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”

    मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.

    रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
    मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
    लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
    अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
    सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
    रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
    एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
    एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
    तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
    महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
    महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
    तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
    मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
    दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
    आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
    मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.

    मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.

    फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
    त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.

    अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

    तिला काही सांगायचंय..
    हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
    लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
    आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
    एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
    घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
    असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
    खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
    संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
    ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
    कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
    राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
    आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
    आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
    तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
    मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
    खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
    प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

    प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
    कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
    कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

    आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

    रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.
    कोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.
    शरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहायचे. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.
    पुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”
    वयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.
    अचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.
    रखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.
    उसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.
    अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.
    सतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.
    दोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.
    मुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.

    अशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.

    हे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.
    आई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.
    कष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.
    कुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

    मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

    ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
    ( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
    रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
    रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
    राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
    रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
    दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
    त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
    एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
    राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
    दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
    “राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
    “रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
    “राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
    “रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
    “राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
    दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
    रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
    हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
    “राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
    राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
    “राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
    इतकं बोलून रश्मी निघून गेली.
    तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
    तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
    रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
    रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
    कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
    इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

    आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
    राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

    सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
    सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

    त्यावर तो निशब्द झाला.
    आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

    वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

    राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
    रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

    आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

    राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

    समाप्त..!!

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही.
    अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

    https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी… भाग १

    नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
    राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
    नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
    तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
    त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
    राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
    दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

    हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

    पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

    “व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

    “हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

    सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
    राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

    तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

    (महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

    “बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
    नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

    राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

    ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

    राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

    पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

    राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

    लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

    क्रमशः

    पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पाणी मिळेल का पाणी..

    रवी नामक एक‌ गृहस्थ दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याश्या हॉटेलवर थांबून हॉटेल वाल्याशी संवाद साधत होता.

    “दादा, जरा पाणी मिळेल का प्यायला..”

    हॉटेल वाला – “हो मिळेल ना, किती पाहिजे.. अर्धा ग्लास ५ रूपये,  एक ग्लास १० रूपये..पाणी बॉटल ४० रूपये..”

    “अहो, मी पाणी मागतोय, कोल्ड ड्रिंक्स किंवा चहा कॉफी नाही…पाण्याची इतकी किंमत… ”

    “दादा, अहो किंमत तर करावीच लागेल ना‌ पाण्याची… सगळीकडे दुष्काळ पडला आहे बघा… दूर दूर वरून आम्ही पाणी‌ आणतो…या कडक उन्हात पाणीच मिळत नाही जवळपास… १०-१० किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं..तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा, नाश्ता आहे आमच्याकडे तयार…पाणी फ्री बरं का‌ नाश्ता केला तर…”

    “दे बाबा एक प्लेट समोसा, ग्लासभर तरी पाणी मिळणार ना फ्री त्याच्यासोबत..घशात कोरड पडली रे…”

    रवी समोसा खाऊन पाणी प्यायला आणि परतीच्या वाटेला निघाला.
    वाटेत तो विचार करू लागला “हॉटेल वाला जे बोलला, त्यात खरंच तथ्य आहे..किती पाणीटंचाई आहे काही ठिकाणी..दूर दूर पर्यंत पाण्यासाठी भटकावे लागते, आंघोळ तर लांबच पण पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही.. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे…सहज उपलब्ध होते म्हणून आपल्याला पाण्याची किंमत नाही.. मिळतंय म्हणून आपण पाणी किती वाया घालवतो.. ज्याला टंचाई माहीत आहे, त्यालाच पाण्याची किंमत कळते.. पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आता अनुभवलेली परिस्थिती काही वर्षांनी सर्वत्र दिसेल… कोल्ड ड्रिंक्स सारखे पाणी सुद्धा किंमत मोजून विकत घ्यावे लागेल…आताही ते मिळतेच पण ते फिल्टर केलेले… साधं पाणी पाणपोई किंवा इतर ठिकाणी उपलब्ध तरी होते…”

    खरंच विचार करण्याजोगे आहे, नाही का?

    मनुष्य पाणी विकत तरी घेईल पण पशू पक्ष्यांचे काय ?
    कडक रखरखत्या उन्हात एक वेळ जेवण नाही मिळाले तर चालेल पण पाणी मात्र गरजेचे आहे , मग तो मनुष्य असो वा पशू पक्षी..
    वेळीच काळजी घेतली नाही तर दुष्काळग्रस्त भागात जसं दूरदूरपर्यंत चालत जाऊन पाणी आणावं लागतं तशी परिस्थिती सर्वत्र दिसायला वेळ लागणार नाही.

    आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून वाया न घालवता काटकसरीने वापरले तर खरंच फायद्याचे आहे. घराबाहेर, आजुबाजूला प्राणी पक्षी यांच्यासाठी पाणी ठेवले तर त्यांना पाण्याविना तडफडत मरणाची वेळ येणार नाही.
    दरवर्षी किती तरी जीव पाण्याविना आपला जीव गमावतात, मग ते पशू पक्षी असो किंवा मनुष्य..

    तेव्हा वेळीच काळजी घ्या. प्रत्येकाने पाणी जपून वापरण्याचे मनावर घेतले तर किती पाणी वाचू शकते विचार करा?

    भविष्यासाठी एक पाऊल पुढे उचलून वेळीच काळजी घेतली नाही तर पुढच्या काही वर्षांत आपल्याला ही म्हणावं लागेल “पाणी मिळेल का पाणी…”

    प्रत्येक चांगल्या गोष्टींची सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे म्हणतात ना, चला तर मग पाणी जपून वापरण्याच्या , पशू पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा.
    ज्यांनी हा प्रयत्न आधीच सुरू केलाय त्यांचं खरंच कौतुक ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • फसवणूक…( एक सत्य कथा )

    काही महीना पूर्वीची गोष्ट, सकाळी उठल्यावर फोन बघितला तर एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता की “तू आज फ्री आहेस का. मी तुला भेटायला यायचे म्हणते. “मेसेज वाचल्यावर मला आनंद गगनात मावेनासा झाला कारण तब्बल सहा वर्षांनी आज आम्ही भेटणार होतो. बाळ झाल्यामुळे मी तशी घरीच असायची, लगेच तिला रिप्लाय केला “अगं नक्की ये. मी घरीच आहे, वाट पाहते मी, ये लवकर , एकटीच येत आहे की जीजू, बाळ कुणी सोबत आहे आणि हा जेवायला घरीच या मग तुम्ही सगळे”

    थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला “ओके. १२:३०-१ पर्यंत येते. मी एकटीच येत आहे.”

    इतक्या वर्षांनी मैत्रिण भेटणार म्हणून उत्साहात पटापट आवरून घेतले. कधी एकदा तिला भेटते अशी मनस्थिती झाली. लक्ष सतत घड्याळाकडे. बाळाचं आवरून बाळ झोपी गेले आणि मी तिच्या येण्याची वाट पाहत होते.

    ठरल्याप्रमाणे ती आली आणि एकमेकींना बघून डोळ्यात आनंदाश्रु आले.

    मी विचारले “मुलाला घेऊन आली असतीस तर मला त्याला भेटता आले असते, त्यावर ती म्हणाली “अगं मी त्याला आईकडे म्हणजेच माझ्या माहेरी ठेवले आहे त्याला. महीन्यातून एकदा भेटुन येते, खूप आठवण आली की मग मध्ये कधीही जाते. मी नोकरी शोधत आहे, चांगली नोकरी मिळाली की मुलाला इकडे घेऊन येयील.”

    तिचं हे उत्तर ऐकून मला जरा विचित्र वाटले. पुढे काही बोलण्याआधीच ती म्हणाली “मला खूप भूक लागली आहे, आपण आधी जेवण करू नंतर गप्पा मारत बसू.”

    पटापट जेवणाची तयारी करून जेवायला बसलो तेव्हा सहज मी विचारले”जिजू काय म्हणतात” .

    ती म्हणाली ” आम्ही सोबत राहत नाही, आता दोन वर्षे होतील.”

    हे ऐकून मला धक्काच बसला.

    कारण विचारले असता कळाले की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिले, त्याने लग्न केले फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी, घर सांभाळायला बायको मिळेल म्हणून. शिवाय शारीरिक भूक भागवायला अजून एक हक्काची व्यक्ती मिळणार होती. तो फक्त हव्यासापोटी तिला जवळ घेत असे, प्रेमाचे शब्द तर दुर पण काही बोलायलाही त्याला वेळ नसे. सुरवातीच्या दिवसात तिला त्याच्या प्रेयसी बद्दल माहिती नव्हते पण दररोज त्याचे उशिरा येणे, सुट्टिच्या दिवशीही कामाचं कारण सांगून दिवसभर बाहेर असणे तिला विचार करायला भाग पाडत होते. त्याच्या कपाटाला हात लावलेला त्याला चालायचे नाही, बाहेर पडताना कपाट लॉक करून चावी घेऊन तो बाहेर पडायचा. तिने नोकरी करू‌ नये असं त्याला वाटायचं म्हणून तिला गुंतवून ठेवण्यासाठी तिची इच्छा नसतानाही तिला आई होण्यास भाग पाडले. कधीही तिला बाहेर फिरायला घेऊन गेला नाही तर मित्र मैत्रिणींना तिची ओळखही करून दिली नाही. घरातून बाहेर पडू नये म्हणून घरात एक रुपयाही ठेवत नसे, घराची चावी घरी ठेवत नसे.

    या सगळ्यात लग्ना नंतरच्या काही महीन्यातच जेव्हा तिला ती आई होणार ते कळाले तेव्हा काही काळ तिला वाटले की बाळ नकोच पण या सगळ्यात होणा-या बाळाची काय चूक शिवाय बाळ झाले की हा बदलेल म्हणून तिने बाळ होऊ देण्याचे ठरवले. आई होण्याचा आनंद नऊ महीने अनुभवतानाच तिला त्याच्या प्रेयसी बद्दल कळाले आणि तिला मोठा धक्का बसला, त्याला विचारले असता त्याने या सगळ्याची कबूली दिली पण घरी याविषयी सांगितले तर जीवे मारायची धमकी दिली. ती गरोदर होती शिवाय आई-वडीलांना सांगितले तर सगळे काळजी करतील, लहान बहीणीचे काय होणार या विचाराने ती सगळं सहन करत राहिली.

    गरोदरपणातही तिला वेळेत डाॅक्टरकडे घेऊन जात नसे, फळं, आवडीचा खाऊ तर‌ दूरच. त्याला काही बोलले की सरळ मारायला धावायचा.

    नविन लग्न झाल्यावर मुलींचे किती स्वप्न असतात, प्रेम यात सगळ्यात महत्वाचे असते पण तिला त्याचे प्रेम कधी अनूभवायलाच मिळाले नाही. लग्न झाल्यावर मुंबईसारख्या शहरात ती एकटी पडली होती. गरोदरपणात प्रवास करायचा नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितले यामुळे सतत घरात बसून, कुणी बोलायला नाही अशा परीस्थितीत नऊ महिने काढले. नववा महिना संपत येत असताना तिची आई तिच्या जवळ राहायला आली. त्याआधी अधूनमधून कुणी घरचे भेटायला आले तरी चेहर्यावरील दुःख लपवुन ती आदर सत्कार करायची. आई जवळ मन‌ मोकळे करावे असे तिला खूपदा वाटले पण सगळ्यांना काळजी लागून राहिल म्हणून ती गप्प बसायची. आता आई बाळ होई पर्यंत जवळ असल्याने हळूहळू आईच्या लक्षात आले की दोघांच नातं दिसतं तसं नाही, आपली मुलगी काही तरी लपवते आहे. शेवटी आईचं मन ते, आईने खूप विचारल्यावर मुलीचा बांध फुटला, वर्ष भर सहन केलेला अन्याय, दुःख तिने आईला सांगितले. लवकरच बाळाचें आगमन झाले , बाळाला बघून त्याच्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आईलाही लागून होती पण त्याला बाप झाल्याचा काही आनंद तितका झालेला नव्हता. औपचारिकता म्हणून तो सोबत होता. मुलाला जवळ सुद्धा घ्यायला टाळाटाळ करायचा. सासू सासर्‍यांना तिच्या आईने दोघांच्या नात्याविषयी सांगितले तर त्यांची भूमिका म्हणजे आम्हाला काही माहिती नाही आणि तो आमचं ऐकत नाही.

    अशा परिस्थितीत स्त्रीने काय करावे?

    तिच्या आईबाबांनी या सगळ्यात तिला खूप साथ दिली. तिला माहेरी घेऊन गेले शिवाय खंबीर पणे लढायला शिकवले. बाळ एक वर्षाचं झालं तेव्हा तिने काही कोर्सेस करून नोकरी शोधायला सुरुवात केली. मुलाला तिने आई वडिलांजवळ ठेवले. आलेल्या परीस्थितीशी झुंज देत पुढे जात राहायचे हे तिला आईने शिकवले, तिचा आत्मविश्वास वाढवला.

    लवकरच तिला चांगली नोकरी मिळाली आणि झालेल्या अन्यायावर मात करून तिने आपलं आणि मुलाचं आयुष्य सुखी बनवण्याचा प्रयत्नाला सुरवात केली. मला तिचा खरंच खूप अभिमान वाटतो.

    स्त्रीने जीवनात खंबीर होण्याची खरंच खूप गरज आहे. अन्याय सहन न करता आवाज उठवणे गरजेचे आहे. अत्याचाराला बळी न पडता, स्वत: साठी उभे राहिले तर अन्याय नक्कीच कमी होईल.

    यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • बहुपती विवाह- एक प्रथा

    विज्ञान युगात अजूनही आपल्या देशात अनेक प्रथा जिवंत आहेत त्यातलीच एक म्हणजे “बहुपती विवाह”.एका पुरूषाला अनेक पत्नी आहेत असं बरेचदा ऐकलं पण आजच्या काळात एका मुलीचा विवाह अनेक पुरूषांसोबत एकाच वेळी केला जातो हे क्वचितच ऐकायला मिळते.

    हो, ही सत्य परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर मधली. भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या किन्नौर गावात एकाच मुलीचा विवाह कुटुंबातील सर्व सख्ख्या भावासोबत केला जातो, अशी प्रथा तिथे अजूनही आहे. किन्नौर मधल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की अज्ञातवासात पांडवांनी त्याच ठिकाणी वास केला होता आणि म्हणून अजूनही तिथे बहुपती विवाह ही प्रथा सुरू आहे.

    या ठिकाणी सगळे सदस्य एकाच घरात राहतात शिवाय बहुपती मधील एखाद्याचे निधन झाले तरी पत्नी दु:खी राहत नाही.

    किन्नौर मध्ये खूप वाईट प्रकारे ही प्रथा पाळली जाते.

    घरातील कुठल्या पुरूषाला वाईट वाटू नये म्हणून दारू आणि तंबाखूचे सेवन जेवणासोबत केले जाते.

    आश्चर्य म्हणजे या परीसरात घराची मुख्य ही स्त्री असते. घराचा ताबा तिच्या हातात असतो.

    एक‌ पती पत्नीसोबत यौन संबंध साधत असेल तर तो त्याची टोपी दारावर अडकवून ठेवतो. ती टोपी बघून बाकी पतींना कळते की काय सुरू आहे आणि त्यात मान मर्यादा इतकी असते की बाकी कुणीही त्या ठिकाणी टोपी असेपर्यंत जात नाही.

    जेव्हा पत्नीला कुठल्या गोष्टीच दु:ख होत असेल तर ती गाणी गाते.

    हे सगळं ऐकून विचित्र वाटत असेल तरी ही प्रथा अजूनही जिवंत आहे.

    असं ऐकल्यावर प्रश्न पडतो की या सगळ्यात प्रेम, स्त्रीचा आदर, स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. स्त्री असो किंवा पुरुष पण त्यांच्या भावना, परस्परांमधील प्रेम, आदर या गोष्टीचा आनंद त्यांना माहीतच नाही कारण वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा त्यापेक्षा महत्वाची मानली जाते.

    सध्या परीस्थिती खूप बदलत आहे मात्र देशाच्या बर्‍याच भागात बालविवाह, बहुपती विवाह सारख्या अनेक प्रथा अजूनही सुरू आहेत. अशा प्रकारच्या प्रथा हळूहळू बंद झाल्या तर आपला देश खर्‍या अर्थाने विकसित झाला असं म्हणायला हरकत नाही. याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

    असेच वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचन्यासाठी मला फॉलो करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नातेसंबंधात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • वडिल

    “आई असते जन्माची शिदोरी,जी सरतही नाही आणि उरतही नाही”तसेच वडील म्हणजे ते , जे म्हणतात “सोड ती चिंता सारी, आनंदात रहा तू बाळा, तुला असं उदास बघून मला लागत नाही डोळा”.

    हे अगदी खरं आहे. आपल्या मुलांच्या आनंदात वडीलांचे सुख असते. कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील सतत धडपडत असतात. ऊन पाऊस कशाचही विचार न करता रोज घराबाहेर पडतात. पैसा कमावण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्यभर झटत असतात.

    कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद, घर, गाडी अशा अनेक जबाबदारी सतत त्यांच्या डोळ्यासमोर असते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. बायकोला, मुलांना कशाचीही कमी पडू नये म्हणून स्वत: साठी ते कधी काही घेणार नाही.

    मुलांच्या संगोपनात आईचा वाटा मोठा असला तरी त्यांच भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी वडीलांचा मोलाचा वाटा असतो. ते व्यक्त करत नसेल पण वडिलांचा मुलांवर जास्त जीव असतो. त्यात जर ते मुलीचे वडील असेल तर ती सासरी जाताना सगळ्यात जास्त हळवे वडीलच होतात. प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम हे तिचे वडील. मुलांसाठी ते हिरो असतात, एक आदर्श असतात.

    आई जन्म देते, वेदना सहन करते पण त्याच वेळी अगदी भावुक होऊन आई आणि बाळ सुखरूप असू दे म्हणून प्रार्थना करतात ते वडील. बाळाला बघून त्यांना जबाबदारीची जाणीव होते, त्याच्या उज्वल भविष्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकायची धडपड ते करतात. उच्च शिक्षणासाठी सगळी तरतूद ते करून ठेवतात.

    त्यांच्या खांद्यावर बसून आपण हे नविन जग बघतो. अगदी सुरक्षा कवचाप्रमाणे ते आपल्या पाठीशी उभे असतात. कितीही मोठे संकट आले तरी वडील पाठीशी तटस्थ उभे राहतात, हिंमत न हारता संकटांना सामोरे जातात.

    स्वतः बसमधून प्रवास करतील पण मुलांना गरजेनुसार ते गाडी घेऊन देणारच. स्वतः फाटके चप्पल बूट शिवून घालतील पण मुलांना नीटनेटकेच ठेवणार. स्वतः टपरा मोबाईल वापरून, मुलांना महागडा मोबाईल घेऊन देतात.

    ज्या घरात वडील नाही त्या घरात मुलांवर कमी वयात सगळी जबाबदारी पडते, सतत वडिलांची कमी भासते. वेळ आली की वडील आई होऊन मुलांचे संगोपनही करतात.

    खरंच वडील कुटुंबाचा मोठा आधार असतात, कुटुंबाला कवच असतात, त्यांचे मजबूत हात सतत कुटुंबाच्या रक्षणासाठी, आनंदासाठी तत्पर असतात.

    अश्विनी कपाळे गोळे