Author: ashvini

  • संसाराचे ब्रेकअप

    संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच..
    आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..”
    होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता संजय. अजयची बडबड ऐकून त्यावर फारसं प्रत्युत्तर न देता गुपचूप तो ऐकून घेत होता. न राहवून काही वेळाने अजयने त्याला विचारले तेव्हा बराच वेळ काही नाही झालं म्हणणारा संजय शेवटी म्हणाला,”त्याच्यामुळे आज तुझ्या वहिनीचे आणि माझे भांडण झाले रे..नकोच तो मला आता आयुष्यात..म्हणजे डोक्याला ताप नसेल..”
    अजयला मात्र काही कळालं नाही..”अरे..तो कोण.. कशामुळे भांडण झालं..नीट सांगशील का तू..”
    संजय – “अरे तो रे.. मोबाईल.. त्याच्यामुळेच आमची जास्त भांडणे होतात..आज तर सकाळीच भांडण ?..नकोच मला‌ मोबाईल..”
    अजय जरा चक्रावून गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, “मोबाईलमुळे भांडणं..मला तू नीट सांग यार.. काय बोलतोय काही कळत नाही..”
    संजय – “अरे, काल रात्री ही‌ लवकर झोपली, मी आपला वेबसिरीज बघत बसलेलो मोबाईलवर..?हिने आवाज दिला असेल मधेच जाग आल्यावर..किती वेळ झालाय झोपा आता असं म्हणत , तर मला काही हेडफोन्स मुळे कळाल नाही.. झालं ना..मला‌‌ सकाळी म्हणाली तुम्ही रात्री कुणाशी चाटींग करत होते.. माझ्याकडे लक्ष नव्हतं..मी किती आवाज दिले तरी चेहऱ्यावर हास्य आणून चाटींग करत होतात.. माझ्याशी बोलायला वेळ नसतो.. घरी आले की मोबाईलवर असता सारखे.. वरून हद्द म्हणजे आजपर्यंत माझा फोटो डिपी‌ वर ठेवला नाही म्हणे तुम्ही.. फेसबुकवर टाकला नाही.. तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही.. नंतर तर चक्क संशय घेतला आणि म्हणाली, तुमची नक्कीच गर्लफ्रेंड आहे..तिला कळू नये तुमचं लग्न झालेलं म्हणून तुम्ही माझा फोटो लावत नाही डिपी ला..रडायला लागली राव स्वतःच संशय घेऊन..
    समजून घ्यायला तयार नव्हती.. शेवटी तिचा माझा सोबतचा फोटो ठेवलाय व्हॉट्स ॲप’ला डिपी.. चूक नसताना सॉरी म्हणालो.. कशीबशी समजूत काढली आणि आलो ऑफिसला.”
    हे सगळं ऐकून अजयला खूप हसू आलं..?? तो हसू आवरत म्हणाला,”डिपी न‌ ठेवण्यावरून भांडण..?? काय रे..तू घाबरून ठेवला मग डिपी दोघांचा फोटो ??”
    संजय – ” हसून घे.. तुझं लग्न झालं ना‌ कि मग कळेल तुला.. अरे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर काहीतरी शायरी पोस्ट केलेली मी… एव्हाना विसरलो होतो.. मॅडम ने वाचली एकदा आणि मागेच लागली विचारायला की कुणासाठी लिहीलेली तुम्ही शायरी.. माझ्या आधी कुणी होती का वगैरे..मी सारखं डिपी बदल.. फोटो अपलोड करणार्‍यातला नाही रे.. जास्तच काय तर वेबसिरीज नाही तर गेम..किती सांगितलं हिला पण पटतच नाही..इतरांचे कपल फोटो, रोमॅंटिक स्टेटस बघितले की आमचं भांडण ठरलेलंच.”
    अजयला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले.. मोबाईल मुळे संसारात इतके गैरसमज होतात याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

    तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना..पण खरं आहे हे.. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली “लग्नापासून एकदाही पतीने पत्नीचा फोटो डिपी न ठेवल्याने पत्नीने चक्क महिला सहायता कक्षाकडे पतीची तक्रार केली.” पोलिसांनाही ऐकून धक्काच बसला.. समुपदेशन करून दोघांची समजूत काढली गेली आणि पतीने व्हॉट्स ॲपवर पत्नी सोबतचा फोटो डिपी ठेवण्याचे मान्य केले तेव्हा दोघांमधला वाद मिटला. पोलिसांनी हेही सांगितले की हल्ली पती पत्नी यांच्यात जास्तीत जास्त वाद हे मोबाईल मुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींवरून संसाराच्या ब्रेकअप चे कारण हे मोबाईल असल्याने बरेचदा समुपदेशन करून वाद मिटतात तर कधी संशयावरून टोकाला जातात.
    मुलांमधील मोबाईलचे वेड आणि त्यामुळे होणारे पालकांचे भांडण यांचंही बरंच प्रमाण आहे..पण आता पती पत्नी यांच्या संसारात मोबाईल, सोशल मीडिया मुळे ब्रेकअप होण्याची वेळ येते म्हणजे विचार करण्याजोगे आहे..
    मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा असा अतिरेक करत जोडिदाराच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमक करणे चुकीचे नाही का?
    नात्यात एक स्पेस असणं, एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया, मोबाईल मुळे इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना करून नात्यात फूट पाडणे खरंच अयोग्य आहे. मोबाईल, इंटरनेट मुळे आपण अपडेटेड राहतो, नवनवीन गोष्टींची माहिती मिळते, जगभरात कनेक्टेड राहतो.. अशे फायदे अनेक आहेत पण त्यांच्या गैरवापर अथवा अतिरेकामुळे संसाराचे ब्रेकअप होत असेल तर वेळीच सावरायला हवे. संसारातील विश्वास जपायला हवा, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे, परिस्थिती वेगळी तेव्हा इतरांशी तुलना करून वाद निर्माण झाले तर आयुष्य सुखी होण्याऐवजी नात्यात फूट पडायला सुरुवात होईल.

    तुमचं याविषयी मत मांडायला विसरू नका ?? नकळत तुमच्या संसारात असंच मोबाईल, सोशल मीडिया मुळे गैरसमज होत असतील तर वेळीच सावरा.?? संवाद साधा.. गैरसमज दूर करा…??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

    सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच रिक्षा पकडून डॉक्टरांकडे निघाली. डॉक्टरांनी  तपासणी केली तर अंगात खूप जास्त ताप होता शिवाय तिला अशक्तपणा मुळे गरगरायला लागले होते.
    घरी आल्यावर जेवण करायला स्वयंपाक घरात गेली तर लगेच तिच्या कानावर शब्द पडले ” आज एका कामाला हात लावला नाही, सगळं मला‌ एकटीला करावं लागलं.” सुमित्राने कसे बसे दोन घास खाऊन औषध घेतले आणि जाऊन अंथरूणावर पडली तोच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिच्या मनात विचार आला, ” आपण घरी सगळ्यांसाठी किती झिजलो, कुणालाही गरज असो सुमित्रा तयार आणि आज आपल्यावर वेळ आली तर तब्येतीची साधी चौकशी नाही. वरून अपमानास्पद बोलून मोकळे होतात सगळे. आता बस झाल्या इतरांच्या सेवा, आता मी स्वतः साठी जगणार.. स्वतः ची काळजी घेणार.”
    सुमित्रा एकोणीस वर्षांची असताना लग्न करून बापूरावांच्या आयुष्यात आली. बापूराव प्रतिष्ठित घरातले , एकत्र कुटुंबात राहणारे. तिचं सौंदर्य बघता बापूराव तिला कुठे ठेवू कुठे नाही असे अगदी फुलाप्रमाणे जपायचे. नव्या नवरीचे नवलाईचे नवं दिवस संपले आणि ती जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकली. कुणालाही कुठल्या कामासाठी नाही म्हणने सुमित्राला जमत नव्हते. कुटुंबात कुठलाही सोहळा असो , कुणाचं आजारपण असो किंवा बाळंतपण असो सुमित्रा मदतीसाठी तत्पर असायची. अशा स्वभावामुळे सगळे तिची वाहवा करायचे शिवाय बापूरावांची मान अख्ख्या कुटुंबात वाढलेला बायकोच्या वाहवा मुळे अगदी ताठ असायची. सगळ्यांचं करता करता घरासाठी राबत असताना सुमित्रा आणि बापूरावांच्या नात्यात मात्र फूट कशी पडली सुमित्राला कळालेही नाही. त्यात भर म्हणजे कित्येक प्रयत्न केले तरी सुमित्राला आईपण काही लाभत नव्हते. सासूबाई ह्या त्या देवस्थानात नवस बोलायच्या, दवाखान्याच्या चकरा सुरूच पण सुमित्रा कडून आनंदाची बातमी काही मिळत नव्हती. असं करता करता लग्नाला सहा वर्षे झाली. गावातील लोक, नातलग नावं ठेवायला लागली. मग सासूबाईंनी सूर काढला बापूरावांच्या दुसऱ्या लग्नाचा, बघता बघता लवकरच अगदी मुलगी शोधून लग्न करायची तयारीच झाली. सुमित्राला ते ऐकून धक्का बसला, तिने आई वडीलांना सांगितले, त्यांची परिस्थिती जेमतेम, ते म्हणाले “अजून लहान बहीणींचे लग्न व्हायचे आहे तेव्हा तू कायमची माहेरी आली तर लोक काय म्हणतील शिवाय बहिणीच्या लग्नात अडथळा येयील.” क्षणभरात माहेरही तिच्यासाठी परकं झालं.
    सुमित्राच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. कुणालाही नाही म्हणने तर तिचा स्वभावच नव्हता. बापूरावांनी दुसरं लग्न करून सवत घरी आणली. लग्नानंतर दोन महिन्यांत तिला दिवस गेले, मग काय सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतले, तिचे लाड पुरवले जाऊ लागले. सुमित्रा दिवसभर राब राब राबून घर सांभाळायची पण कुणीही तिच्या कडे फारसे लक्ष देत नव्हते. एखाद्या मोलकरीणी  सारखी तिची अवस्था झाली होती. बापूराव सुद्धा साधं कधी प्रेमाने बोलत नव्हते, कामापुरते काम ठेवायचे. सुमित्रा रोज रडायची, आयुष्य संपवायचा विचार करायची पण काही उपयोग नव्हता.
    तिच्या सवतीचे दोन बाळंतपण तिनेच केले. अजूनही कुटुंबात कुणाला मदतीची गरज पडली की बापूराव तिला त्यांच्या घरी नेऊन सोडायचे. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन सगळ्यांचे बाळंतपण, म्हातारपणी सेवा,. लग्न असो किंवा कुठलाही सोहळा समारंभ , सगळं ओझं सुमित्रा वरच असायचं. तिची सवत सुद्धा तिला मोलकरीण समजून राबवून घ्यायची. घरात जिव्हाळा, प्रेम देणार कुणीच उरलं नव्हतं. जिथे नवराच आपला राहीला नाही तर इतरांकडून काय अपेक्षा असं समजून सुमित्रा जगत होती, माहेरी सुद्धा एक पाहुणीच. अशातच वयाची पन्नाशी जवळ आली, तब्येत आधी सारखी धडधाकट राहीली नव्हती, पण कुटुंबात अपेक्षा मात्र संपल्या नव्हत्या.  असंच आज अंगात इतका ताप असूनही साधी विचारपूस तर नाही पण कामात मदत केली नाही म्हणून तिची सवत तिला कुरकुर करत होती. औषधी घेऊन जरा वेळ सुमित्राला झोप लागली.
    काही वेळाने जाग आली तर कानावर शब्द पडले ” सुमित्रा आहे ना, पाठवा की तिला.”
    ते ऐकताच सुमित्रा बाहेर आली तर बापूराव,त्यांच्या आई आणि सवत बोलत होते. सुमित्राला बघताच सासूबाई म्हणाल्या “सुमित्रा, लहान काकी दवाखान्यात भरती आहे, तुला त्यांच्या जवळ जावं लागेल. एक जण बाई माणूस पाहिजे त्यांच्या सेवेत.”
    त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सुमित्रा म्हणाली “मी जाणार नाही, माझ्या अंगात इतका ताप, अशक्तपणा, तुम्हा कुणाला माझी अवस्था कळत नाही, माझा फक्त गरजेच्या वेळी वापर केला इतके वर्ष तुम्ही. पण आता बस..मला नाही जमणार जायला. हे तसं तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता माझे डोळे उघडले. सूनेच्या नात्याने कर्तव्य म्हणून मी राबत गेले पण आता बस.. नाही जमणार मला.”
    सगळे सुमित्राच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. सुमित्राचे हे रुप सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. उशीरा का होईना पण नाही म्हणण्याच्या कलेत सुमित्रा नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत होती, स्वतः साठी जगण्याची नवी उमेद तिच्या मनात नव्याने जागी झाली होती.

    अशा अनेक सुमित्रा आज समाजात आहेत ज्यांना नाही म्हणता येत नाही आणि म्हणून मग सगळे फायदा घेतात. अशावेळी घरात कुणालाच आपुलकी नसेल तर त्याचा किती त्रास होतो हे सहन करणार्‍यालाच माहीत असते म्हणूनच योग्य वेळी नाही म्हणने खुप गरजेचे असते.

    लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही. लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिच्या सौंदर्याचे कोड

    रीमा आई वडीलांना एकुलती एक मुलगी, गव्हाळ वर्ण असलेली पण नाकी डोळी नीटस, उंच बांधा, आकर्षक शरीरयष्टी, काळेभोर लांबसडक केस, जरा मेकअप केला की एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकेल असं तिचं सौंदर्य. पण या सौंदर्यावर ‘कोड’ पसरलं आणि परिस्थिती बदलली.

    रीमा लहानपणापासून नृत्य कलेत तरबेज. जणू नृत्य आणि मॉडेलिंग तिला जन्मताच मिळालेली देणगी. कुठलाही क्लास न लावताच टिव्हीवर बघून, इंटरनेटवर बघून ती स्वतः नृत्य शिकली. भरतनाट्यम असो वा हिपहॉप , तिला कुणीही मागे टाकू शकत नव्हते. त्यामुळे लहानपणापासूनच अनेक कार्यक्रमांमध्ये तिला बक्षिस मिळाले. वयाच्या अगदी पाचव्या वर्षी ती टिव्हीवर एका डान्स शो मध्ये झळकली. शाळेत इयत्ता तिसरीत असताना तिच्या पोटावर एक डाग दिसायला लागला. डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळाले की तो एक त्वचारोग आहे ‘कोड’ म्हणून ओळखला जाणारा. ते ऐकताच रीमाच्या आई बाबांना काळजी वाटली. शरीरावर इतरत्र कुठेही ते पसरायला नको म्हणून विविध शहरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू झाले. पण ते कोड मात्र आता चेहऱ्यावर सुद्धा दिसायला लागले. रिमाचे मैदानी खेळ बंद झाले कारण सूर्यकिरणांमुळे पुन्हा त्याची ‘रिअॅक्शन’ यायची.
    शाळेतही रिमाला मित्र मैत्रिणी सोबत खेळायला घेत नसे. तिच्या आजूबाजूला बसायला टाळत असे, त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून सतत शाळा बदलायला लागत होती. नातेवाईक सुद्धा घरी यायला टाळायचे, रीमाला आई बाबांना कार्यक्रमात बोलवायला टाळायचे, त्यांना वाटायचं रिमामुळे अख्ख्या खानदानाला लोकं नाकबोट लावतील, आमच्या मुला मुलींच्या लग्नासाठी अडचणी येतील. आई बाबांनी मात्र या गोष्टींची पर्वा केली नाही उलट रिमाला खूप हिम्मत दिली, नृत्य कला मागे पडायला नको म्हणून बाबा अनेक स्पर्धांमध्ये तिचे नाव नोंदवायचे, तिला नृत्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कोड शरीरावर सर्वत्र पसरले नसले तरी चेहऱ्यावर, पोटावर असलेले कोडाचे डाग मात्र जायला मार्ग मिळत नव्हता.
    असाच शाळा बदलत बदलत शाळेचा प्रवास संपला आणि कॉलेज सुरू झाले. कॉलेजमध्ये परिस्थिती वेगळी नव्हती. तिचं सौंदर्य अप्रतिम असलं तरी कोड असल्याने तिला बर्‍याच गोष्टी पाहून वंचित ठेवले जायचे. सहसा कुणी मैत्री करायला टाळायचे, तिला आता ह्या गोष्टींची सवय झाली होती.
    रीमा हार मानणारी नव्हती , तिने गॅदरींग मध्ये आपल्या नृत्याविष्काराने, मॉडेलिंग मधल्या अदा , कौशल्य यामुळे अख्या कॉलेजमध्ये वाहवा मिळवली. हळूहळू तिचा मित्र परिवार वाढला.
    मॉडेलिंग हे रिमाचे लहानपणापासून स्वप्न होते, पण मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्य अतिशय महत्त्वाचा घटक आहे तेव्हा आपल्या चेह-यावर असलेल्या कोड मुळे आता आपलं स्वप्न हे स्वप्नच राहिल असं तिला वाटत होतं.
    तिचे कौशल्य बघून आई बाबा तिला नेहमी प्रोत्साहन देत असे. मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू प्रयत्न करणे सोडू नकोस असं नेहमीच तिला सांगत असे.
    तिने फॅशन शोमध्ये मॉडेलिंग साठी लागणारे फोटो शूट करून घेतले, अनेक फॅशन डिझायनर ला तिचे फोटो पाठवले. कुणा कडूनही काही प्रतिसाद येत नव्हता. रीमा जरा उदास झाली पण हिम्मत हारली नाही, प्रयत्न करत राहीली. काही महिन्यांनी तिला एका फॅशन शो साठी ऑडीशनला बोलावले गेले, तिची परफेक्ट फिगर, मॉडेलिंग कौशल्य यामुळे तिने तिथे ऑडीशनला आलेल्या प्रत्येक मॉडेलला मागे टाकलं. एका प्रख्यात फॅशन डिझायनरच्या ब्रॅंड साठी तो फॅशन शो होता आणि रिमा त्यासाठी सिलेक्ट झाली. रीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचं लहानपणापासूनचं स्वप्न आता सत्यात उतरणार होते.
    ठरल्याप्रमाणे फॅशन शो झाला, त्यातले रीमाचे फोटो भराभर इंटरनेटवर पसरले. जगभरात ती प्रसिद्ध झाली. ज्या ब्रॅंड साठी तिने हा शो केला होता त्यांचीही जगभर प्रसिद्धी झाली. त्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
    मॉडेलिंग मध्ये करीयर करायचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. सोबतच स्वतः ची एक डान्स अकॅडमी तिने नृत्य कौशल्याच्या जोरावर सुरू केली त्यातही तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.
    एका मोठ्या डान्स शो साठी तिला परीक्षक म्हणून निमंत्रित केले तेव्हा तिथल्या मुलाखतीत तिने स्वतःच्या जीवनातील प्रवास सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आई बाबांची मान अभिमानाने उंचावली.
    परिस्थितीवर मात करून कौशल्याच्या आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी रिमा जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान बनली.

    कोड येणे हे नैसर्गिक आहे शरीरात काही कारणांमुळे झालेल्या बदलामुळे कोड येते, अशा‌ वेळी त्या व्यक्तीला तसेच घरच्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. लग्नाच्या वेळी अडचणी येतात कारण बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व दिले जाते. पण अशा व्यक्ती बरोबर बोलायला टाळणे, संबंध तोडणे, त्यांच्या पासून दूर राहणे मात्र अयोग्य नाही का.

    कॅनडातील विनी हार्लोने केलेले फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. कोड असलेली ही मॉडेल, तिचे फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल झाले आहे. यातूनच प्रेरीत होवून मी लिहीलेली रीमाची ही एक काल्पनिक कथा आहे.

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि याविषयी तुमचं मत मांडायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • कपड्यांवरून व्यक्तीमत्व ठरविणे- योग्य की अयोग्य

    “अय्या हीच का मोना, पंजाबी ड्रेस घालून आली लग्नात. होणार्‍या सासरची मंडळी भेटतील तर साडी नेसून जावं इतकं कसं कळत नसेल तिला. तुझी सून आतापासूनच मर्यादा ओलांडत आहे बघ रमा. तू तर म्हणाली होती की मुलगी संस्कारी घरातील आहे म्हणून. ” सुजयच्या काकू त्याच्या आईला म्हणाल्या.

    सुजयच्या आईला ते ऐकून जरा अपमानास्पद वाटले. त्यांनी मोना ची घरी सगळ्यांशी ओळख करून दिली पण मनात मात्र काकूंचे‌ वाक्य सतत बोचत होते. न राहवून त्यांनी मोनाला म्हंटले “अगं तू आमच्या घरची होणारी सून आहेस. साडी नेसून आली असती तर बरं झालं असतं, काय म्हणतील आता सगळे, लग्नाआधीच नावं ठेवायला सुरुवात होईल आता तुला आणि सोबतच मला.”

    मोनाला ते ऐकून वाईट वाटले, त्यावर ती दबक्या आवाजात म्हणाली, “आई माझ्याकडे साडी ब्लाऊज तयार नव्हते. अचानकच लग्नाला यायचं ठरलं ना शिवाय मला दिवसभर साडी मध्ये सुचले नसते काहीच म्हणून ड्रेस घातला.”

    सुजयच्या आई त्यावर काही न बोलता निघून गेल्या. घरी आल्यावर सुजयला ह्याविषयी त्यांनी सुनावले “आजकालच्या मुलींना कपड्यांचं भान नसतं, कुठे काय घालायचं कळतं नाही. लग्न व्हायच्या आधीच मला म्हणते साडी सांभाळायला दिवसभर सुचलं नसतं म्हणून. आम्ही नेसतोच ना नेहमी साडी, आम्हाला कसं जमतं साडी नेसून सगळं काम. कारणं आहेत नुसती.आता सगळे नातेवाईक नावं ठेवतील त्याचं काय”.

    तर गोष्ट अशी आहे की मोना म्हणजे सुजयच्या बाबांच्या मित्राची मुलगी, दिसायला आकर्षक, हुशार, आत्मविश्वासू. सुजयला ती खूप आवडायची, दोघांच्याही घरी लग्नाची काही अजून तयारी नव्हती पण जुळवून ठेवायला काय हरकत म्हणून सुजयच्या बाबांनी त्यांच्या मित्राकडे मोना आणि सुजयच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. दोघांचेही कुटुंब पुण्यात स्थायिक झालेले, जरा मॉडर्न विचारांचे. दोघांच्याही घरी तशी काही हरकत नव्हती. अचानकच लग्न ठरले, साखरपुडा आणि लग्नाचे मुहूर्त चार महिन्यांनंतरचे होते. पुढच्याच तीन दिवसांत सुजयच्या नातेवाईकांकडे एक लग्न होते आणि त्यात सुजयच्या आईने आग्रहाने मोनाला बोलावून घेतले, कुटुंबात सर्वांशी ओळख करून देण्याच्या उद्देशाने. अचानकच सगळे ठरल्यामुळे मोना जवळ साडी, ब्लाऊज काहीच तयार नव्हते. ती छान गुलाबी रंगाचा पार्टी विअर पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. तिचा उंच बांधा, गोरा रंग, त्यात तिच्या लांबसडक केसांची हेअरस्टाईल सोबतच हलकासा मेकअप त्यामुळे ती अजूनच आकर्षक दिसत होती. तिला आज बघून सुजय अजूनच तिचा तिच्या प्रेमात पडला. सुजयच्या आईने तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले पण काकूंनी साडी नेसून आली नाही म्हणताच आईचं मत बदललं.

    असं कपड्यांवरून कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवणे कितपत योग्य आहे. मोना नोकरी करणारी स्वतंत्र विचारांची, आई वडिलांनी तिला कधी कपड्यांच्या बाबतीत बंधन लादली नाहीत, कपड्यांवरून संस्कार ठरत नाही असे त्यांचे परखड मत होते, मोना समजुतदार होती, स्पष्टवक्ती होती. आई वडिलांचा तिच्यावर विश्वास होता आणि हे सगळे सुजयच्या घरच्यांच्या आधीच माहीत होते. लग्न ठरेपर्यंत त्याच्या आईला ह्या गोष्टीचा प्रोब्लेम नव्हता पण आता ती आपली सून होणार म्हणून त्यांच्या अपेक्षा बदलल्या होत्या त्याही नातेवाईक काय म्हणतील म्हणून.

    असाच अजून एक किस्सा, नविन लग्न झाल्यावर आम्ही राहायचो तिथल्या घरमालकीण काकूंचा. काकू नेहमी नववारी साडीत असायच्या आणि त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला ती शोभून दिसायची. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आणि खाली घरमालक सोबतच बाजूला अजून एक कुटुंब भाड्याने राहायचे. काकूंची आणि माझी भेट दररोज सकाळी ,६ वाजता व्हायची. ती वेळ म्हणजे माझी आॉफिसला जाण्याची आणि त्यांची माॅर्निंग वाॅकला जाण्याची. त्या काही न बोलता फक्त माझ्या स्मितहास्यावर एक स्मितहास्य करायच्या. आमचं दोघांचं राहणीमान, आॅफिसमुळे दिसणारी धावपळ शिवाय मॉडर्न कपडे बघून काकूंना वाटायचे की मी घरी जेवण कधी बनवतच नाही, मला बनवायलाही येत नाही असं. एकदा घाईघाईने निघाले आणि टिफीन विसरले, मागोमाग नवरोजी आले टिफीन बॅग घेऊन तेव्हा काकूंनी आश्र्चर्यचकित होऊन विचारले “अगं, इतक्या लवकर सकाळी उठून तू टिफीन बनवला?” मी म्हणाले ” हो काकू, रोज दोघांचाही टिफीन बनवून निघते मी.” त्यावर त्या म्हणाल्या”अगं, मला वाटायचे तुला काही बनवता येत नाही, बाहेरच जेवत असाल तुम्ही. आमची सुनबाई तर अजून उठलीही नाही तू स्वयंपाक करून सगळं आवरून ६ वाजता ऑफिसला निघाली, खरंच विश्वास बसत नाही आहे गंं माझा. मी असं समजायचे की शिकलेल्या, नोकरी करणारर्‍या, जीन्स घालणार्‍या मुलींना घरची जबाबदारी, संसार नीट जमत नसेल पण तुला बघुन माझा गैरसमज दूर झाला बघ.” काकूंच्या बोलण्यावरून मनात विचार आला ” रहाणीमान, कपडे यावरून एखाद्याचं व्यक्तीमत्व ठरवणे खरंच योग्य आहे का.

    ती माॅडर्न कपडे घालते , टिकली लावत नाही, मंगळसूत्र, जोडवे घालत नाही, अशा अनेक गोष्टींवरून व्यक्तीमत्व ठरवणे, सत्य परिस्थिती माहीत नसताना व्यक्तीला समजून न घेता नावं ठेवणे कितपत योग्य आहे.

    कसे राहावे, काय घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्त्येकाच्या घरच्यांच्या आवडीनिवडीनुसार , परीस्थितीवर ते अवलंबून आहे. वरवर पाहता कुणाला हिणवणे, संस्कार काढणे खरंच खूप चुकीचं आहे.

    कुठल्या वेळी काय घालायचं, कुठल्या पोषाखात आपण कम्फरटेबल आहोत हा विचार करून स्वत: त्या व्यक्तीला ते कळत असेल तर इतरांनी त्यावर चर्चा करणे खरंच योग्य नाही.

    याविषयी प्रत्त्येकाचे मत वेगळे असू शकतात. कुणालाही दुखावण्याचा हेतू नसून केवळ कपड्यांवरून कुणाचेही व्यक्तीमत्व, संस्कार ठरवणे अयोग्य आहे हाच मूळ उद्देश.
    तुमचे याविषयीचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा.
    © लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. पोस्ट शेअर करताना नावासकट शेअर करावी.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नात्यात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • रहस्य त्या तीव्र वळणावरचे.. ( रहस्यकथा )

    लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही पतीराजांच्या आजोळी गेलेलो.
    राज्य महामार्गाला लागूनच वसलेले एक गाव, महामार्गाच्या आजूबाजूला शेती, जवळच वस्ती. आजोळी घरच्या शेतात मोठमोठ्या विहीरी, गर्द हिरवी आंब्याची झाडे, जवळच नविन झालेलं एक भलं मोठं धरण असा निसर्गरम्य परिसर. मोठ्या उत्सुकतेने आम्ही सगळे घरापासून दुचाकींवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेलो. लहानपणापासून राहणं, शिक्षण हे बर्‍यापैकी शहरी वातावरणात झाल्याने इतक्या वर्षांनी शेतात फिरायला जायचा मोठा उत्साह होता मनात. शेतात सगळीकडे मनसोक्त फिरून, रानमेवा गोळा करून परतीला निघालो. शेताच्या रस्त्यात महामार्गावर एक तीव्र वळण होते. परतीच्या वाटेवर वळणाच्या आधी अंदाजे पाचशे मीटरवर एका बाबांची ( पूर्वी त्या गावात असलेले एक साधू ) समाधी होती. परत येताना त्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय परत यायचे नाही असं जातानाच घरून सांगितले गेले होते. काय बरं कारण असेल , असं आवर्जून सांगण्यामागे असा विचार मनात आलेला.
    परत येताना सगळेच बाबांच्या समाधीवर थांबून दर्शन घेतले आणि पुढे घरी जायला‌ आम्ही निघालो. दर्शन घेतानाच मला घरच्यांकडून कळाले की जो कुणी या समाधीचे दर्शन न घेता पुढे जातो त्याचा हमखास वळणावर अपघात होतो. गावातील कित्येक लोकांनी त्या वळणावर जीव गमावला आहे. ऐकून जरा विचित्र वाटले,‌पण पुढे प्रत्येकाने एक एक किस्सा सांगायला सुरुवात केली. एक किस्सा असा की, एकाने दर्शन घेतले नाही आणि तसाच पुढे गेला तर भरदिवसा वळणाच्या जवळच माकडाने झाडावरून त्याच्या दुचाकीवर उडी टाकली आणि तो इसम जागेवरच ठार झाला. मागून येणाऱ्या एका ट्रकवाल्याने तो अपघात पाहिला आणि गावकऱ्यांना कळवले. पण माकडाचे उडी मारणे आणि त्या दुचाकीचे येणे हा एक वाईट योगायोग असू शकतो ना.. असं मनात आलं. असो..
    गावात सगळ्यांना त्या वळणाचा एक धाक होता, त्या वळणावर मृत्यू झालेल्यांचे आत्मे भक्ष शोधतात पण बाबांचे दर्शन घेतले की बाबा त्या आत्म्यांपासून  संरक्षण करतात असा गावकऱ्यांचा विश्वास होता. 
    त्या वळणाचे अनेक किस्से ऐकल्यावर एखाद्याला खरंच विश्र्वास बसेल असं सगळे सांगत होते. ऐकून भयानक वाटले आणि विचारचक्र सुरू झाले की काय रहस्य असेल त्या वळणाचे, बाबांच्या समाधीचे.??
    घरी आल्यावर त्याच चर्चा सुरू होत्या तेव्हा कळाले की हे सगळे अपघात रात्रीच्या वेळी होतात (आत्मा रात्री भक्ष शोधतो), त्यामुळे सहसा रात्री त्या वळणावरून यायला गावकरी घाबरतात, शक्यतो टाळतात. माकडाच्या त्या अपघातानंतर तर बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय येतच नाही.चुकून पुढे आले तरी मागे जाऊन दर्शन घेऊन परत जातात. हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले, काय प्रकार असेल हा, काय रे रहस्य असेल हे विचारचक्र सुरू. ??
    काही दिवसांनी गावावरून आम्ही परत आलो तेव्हा पतीराजांना त्या वळणाच्या रहस्याविषयी विचारले तेव्हा कळाले, तो महामार्ग असल्याने गाड्यांची वर्दळ सतत असतेच शिवाय भरधाव वेगाने गाड्या जातात. बरंच अंतर सरळ रस्ता असताना मध्येच अचानक हे वळण लागतं तेव्हा बर्‍याच वाहकांना वळणाचा अंदाज येत नसावा.  महामार्गावर रात्री काळाकुट्ट अंधार, त्यात ते तीव्र वळण त्यामुळे भरधाव वेगाने येताना वळणाचा अंदाज आला नाही की रात्री बरेच अपघात त्याठिकाणी होतं आले आहेत. योगायोगाने वळणाच्या आधी पाचशे मीटरवर  बाबांची समाधी, मग समाधीवर थांबून पुढे निघालं की सुरवातीला गाडीचा वेग जरा कमी असतो आणि ते तीव्र वळण सावधपणे पार केलं जातं. हे वास्तविक कारण आहे पण गावकऱ्यांनी या बाबांच्या समाधीचं आणि वळणाचं एक रहस्य निर्माण करून अफवा‌ पसरविल्या. अफवांमुळे का होईना पण ज्यांना माहीत आहे ते वाहक समाधीवर थांबून पुढे निघतात आणि परत निघताच सुरवातीला गाडीचा वेग कमी असल्याने अपघात टळतात.
    वैज्ञानिक रित्या विचार केला तेव्हा त्या वळणाचे रहस्य उमगले.

    जुन्या अनेक अंधश्रद्धा लोकं अजूनही पाळतात, पण प्रत्येक अंधश्रद्धेच्या मागे एक वैज्ञानिक कारण हे असतेच. असंच हे वळणाचे रहस्य आहे.

    तुमच्या माहितीत अशे रहस्य असलेले किस्से असतील तर नक्कीच कमेंट मध्ये शेअर करा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आई- मातृदिन विशेष

    आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते.

    सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार आई सकाळी सगळ्यात आधी उठून डबा बनवते, ती घरी असली तरी वेळेत सगळं तयार ठेवण्याची जबाबदारी तिची असतेच.

    आई नोकरी करणारी असेल तरी तिची ही जबाबदारी चुकत नाही.

    मुलं जशजशी मोठी होतात त्यानुसार त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-बाबा दोघांची असली तरी त्यात आईचा मोलाचा वाटा असतो.

    मुलं वयात येऊ लागली की मुलांना मैत्रीण बनून समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे अशा अनेक जबाबदारी आई तत्परतेने सांभाळत असते. या सगळ्यात घरातील प्रत्येकाची काळजी तिला असतेच. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सगळी काळजी आईला, पण ती आजारी असेल तर सगळ्यांची दिनचर्या विस्कटून जाते.

    आई हा प्रत्येक घराचा आधार स्तंभ असते, तिच्याशिवाय घरातील प्रत्येकजण अपुर्ण असतो.

    तरुण वयात‌ तसेच लग्नानंतर मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई. मनातलं सगळं आई जवळ सांगितले की मन कसं हलकं वाटतं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना तिचे मार्गदर्शन नेहमी महत्वाचे ठरते. घरात काय आहे काय नाही‌ याची यादी, इस्रीवाला, दूधवाला, कामवाली अशे घरातले बाहेरचे सगळे मॅनेजमेंट खाते आईकडेच असते.

    आईची भूमिका ही आयुष्यभर संपत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्या असह्य कळा सहन करत आई बाळाला जन्म देते, बाळासाठी अनेक रात्री जागून काढते. आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखे जपते. मुलं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांच्या मागे ती उभी असते, मुलांचे जीवन सुरळीत चालू आहे हे बघून ती आनंदात असते. शेवटपर्यंत तिला आपल्या मुलांची काळजी असते, कशाचीही अपेक्षा न ठेवता ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत: उपाशी राहीन पण ती घरात सगळ्यांना पोटभर खाऊपिऊ घालण्यासाठी धडपडत असते.

    बाबांच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी ती जपते, त्यांच्या गरजा पूर्ण करते.

    ती आयुष्यात स्वत: साठी खूप कमी जगते, तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती घरात सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.

    ते म्हणतात ना”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ते खरेच आहे. आईविना आयुष्य अपूर्ण आहे. आईची माया, तिची भूमिका दुसरा कुणीच साकारू शकत नाही. आई या शब्दात खरंच खूप भावना दडलेल्या आहेत.

    आईची महती जितकी लिहिली तितकी कमीच आहे.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३

    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे.

    दादाने अजितचा फोटो नंबर मिळवून त्याला कॉल केला आणि भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलावले, हेही सांगितले की याविषयी संपदाला काही कळायला नको. दादाच्या फोन नंतर अजित जरा घाबरलेला, त्याला बर्‍याच शंका मनात येऊ लागल्या, दादाला आमचं प्रेम प्रकरण माहीत झालं असेल आणि चिडून मला दम द्यायला तर बोलावलं नसेल ना, माझं सैराट मधल्या प्रिंस दादा सारखा तर वागणार नाही ना संपदाचा दादा अशे अनेक बरेवाईट विचार अजितला हैराण करू लागले. संपदाची परिक्षा संपेपर्यंत तिला त्रास द्यायला नको, डिस्टर्ब करायला नको म्हणून तिच्याशी मोजकेच बोलणे सुरू होते.
    जे होईल ते होईल पण आता दादाला भेटायचं, त्यांना संपदाचा हात लग्नासाठी मागायचा असं ठरवून ठरल्याप्रमाणे अजित दादाला भेटायला गेला.
    एका छोट्याशा हॉटेल मध्ये दोघे भेटणार होते, अजित पोहोचला आणि दादाला कॉल केला तर तो आधीच पोहोचला होता, एका टेबलावर अजितची वाट बघत होता. अजित जरा संकोचाने जवळ गेला, भेटला आणि दोघांनी मस्त चहा कॉफी मागवली. दादाने अजितचा गोंधळ ओळखला, त्याला शांत करत म्हणाला, ” अरे , तू इतका संकोचाने बोलू नकोस, मी सहज भेटायला आलो आहे. काळजी करू नकोस, मला तुझ्यावर राग वगैरे नाही. आता माझ्या बहिणीची आवड कशी आहे, मलाही कळायला नको का..? तू हवं तर एक मित्र म्हणून बोल माझ्याशी..”
    दादाच्या बोलण्याने अजितला जरा धीर आला.. पुढे अजित विषयी जाणून घेण्यासाठी दादाने गप्पा सुरू केल्या. अजितच्या प्रत्येक वाक्यात संपदा विषयीचं प्रेम दादाला जाणवतं होतं. आपल्या बहिणीची निवड योग्य आहे याची दादाला खात्री होत होती. दादाने अजितला विचारले, “तुझे आई बाबा संपदाला स्विकारतील का, जर त्यांना मान्य नसेल तर काय..”
    अजित त्यावर म्हणाला, ” माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक, माझं मन आतापर्यंत त्यांनी खूप जपलं, माझ्या आवडीनुसार शिक्षण, नोकरी, इतर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हा या लग्नाला नकार देतील असं वाटत नाही मला, आणि संपदा इतकी गुणी मुलगी आहे, गोड स्वभाव, निरागस आहे ती, तिला भेटल्यावर माझे आई बाबा नाही म्हणतील असं वाटतं नाही मला..तरी जर ते तयार नसतीलच तर मी खरंच पूर्ण प्रयत्न करेन त्यांची समजूत काढण्याचा.. काही झालं तरी संपदा शिवाय आयुष्य मी नाही जगू शकत दादा.. आमचं लग्न नाही झालं तर तिच्या जागी मी कुणाचाही आयुष्यभर स्विकार करणार नाही..लग्नच करणार नाही..”
    दादाला अजितचे बोलणे फिल्मी वाटत असले तरी त्यामागच्या भावना मात्र खर्‍या आहे हे जाणवले. लवकरच संपदाची परीक्षा संपली की आमच्या घरी मी तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी बोलतो असं दादाने म्हणताच अजित आनंदी झाला. मीही आई बाबांना याविषयी कल्पना देतो आणि पुढे घरच्यांना भेटायचं ठरवूया असंही अजितने सांगितलं. सगळं सूरळीत होत पर्यंत या विषयी संपदाला कळायला नको असं दादाने अजितला सांगितले.

    दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, अजितला आता एक आशेचा किरण दिसला. काही दिवसांतच अजितने घरी संपदा विषयी सांगितले, आई बाबांना अजितच्या वागण्यातून संशय आला होता पण तो स्वतः हून सांगेपर्यंत काही विचारायचे नाही असं त्यांचं ठरलं होतं. आई बाबांनी संपदा विषयी सगळी चौकशी केली, फोटो बघितला. संपदाच्या घरच्यांनी पुढाकार घेतला तर आमची काही हरकत नाही हेही सांगितले. ते ऐकताच अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई बाबा इतक्या सहज तयार झाले म्हणताच अजितला सुखद धक्का बसला. आता प्रश्न होता संपदाच्या घरच्यांचा, त्यांनी पुढाकार घेतला तर संपदा कायमची माझी होणार म्हणून अजित नकळत अनेक स्वप्न रंगवायला लागला.
    इकडे दादाने आईला याविषयी कल्पना दिली पण असं प्रेमविवाह आपल्या कुटुंबात कुणाचाच नाही रे.. नातलग काय म्हणतील म्हणत आईने विषयाला वेगळं वळण दिलं. बाबांना हे मान्य होणार नाही, प्रेमविवाह तोही आंतरजातीय..नको आपण बाबांना नको सांगायला..उगाच चिडतील ते..संपदा समजदार आहे.. समजून सांगू आपण तिला असं म्हणत आईने अप्रत्यक्षपणे या लग्नाला नकार दिला.
    दादा आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, ” आई, अगं अजितला भेटलो मी, चांगला मुलगा आहे तो.. शिवाय संपदावर खूप प्रेम आहे त्याच..सुखात राहील आपली चिऊ.. बाबांशी बोलून तर बघू.. आंतरजातीय विवाह म्हणजे काही गुन्हा नाही.. संपदाला कुणीही पसंत करेन पण ती त्याचा मनापासून स्विकार करेल असं वाटत नाही मला..आई बाबांना दुखवायचे नाही म्हणून तडजोड करत लग्न करेन ती पण प्रेम करेलच असं नाही..अजितला विसरणे कठीण जाईल तिला.. इतक्यात तू बघितले असशील कशी गप्प गप्प असते ती..अजित विषयी घरी कसं सांगायचं याच विचाराने हैराण झाली आहे ती.. शेवटी तिचं सुख महत्वाचं..आपण सगळी चौकशी करून अजितच्या घरच्यांना भेटून सगळ्यांना मान्य असेल तर दोघांचा विचार करून लग्न लावून द्यायला काय हरकत आहे. नातलग बोलतील ते किती दिवस.. जातीतल्या मुलाशी लग्न केले तरी काही ना काही उणीव काढून सुद्धा बोलतातच.. इतरांच्या बोलण्याचा विचार बाजूला ठेवून एकदा संपदाचा विचार कर आई..तू हो म्हणालीस तर बाबांशी बोलू आपण..”
    दादाचं बोलणं संपते तितक्यात बाबांचा मागून आवाज आला, “माझी मुलं इतकी मोठी झाली कळालेच नाही रे मला..मी तुम्हा दोघांचं सगळं बोलणं ऐकलं..माझी मुलं चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची खात्री होती मला..संपदा असं अचानक कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं, मी अजूनही लहानच समजत आलो तुम्हा दोघांना..तू आईला जसं समजून सांगितलं त्यावरून बहिणींचं आयुष्य सुखी करण्यासाठीची तुझी धडपड, तिच्या विषयीचं प्रेम बघून मला खरंच अभिमान वाटला आज तुझा..” बाबांचं बोलणं ऐकून दादा बाबांच्या मिठीत शिरला..बाबा तुम्ही परवानगी द्याल ना संपदा अजितच्या लग्नाला..
    संपदा आपल्याला हट्ट करून लग्न लावून द्या असं कधीच म्हणणार नाही..पण मला तिची घालमेल कळत होती बाबा.. म्हणून मी अजितला भेटलो.. नकार द्यावा असा नाहीच तो..घरी बोलणार आहे तो संपदा विषयी..बाबा आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे..
    बाबा यावर जास्त काही बोलले नाही..संपदा ची परीक्षा संपली की बघू..अजितच्या घरी तयार असतील तर आपण विचार करू म्हणाले.
    काही वेळाने अजितचा दादाला फोन आला, त्यांचे आई बाबा लग्नाला तयार आहे हे मोठ्या आनंदाने त्याने सांगितले. आता सगळे वाट बघत होते संपदा ची परीक्षा संपण्याची. अजितच्या घरी काही अडचण नाही हे दादाने बाबांच्या कानावर टाकले.
    शेवटचा पेपर संपल्यावर संपदा घरी आली, पुढे अकाऊंटींग मध्ये करीयर करण्याविषयीची इच्छा बाबांना तिने बोलून दाखवली. आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे असं बाबांनी म्हंटल्यावर तिला हायसे वाटले.
    बाबांनी संपदा जवळ अजितचा विषय काढला, तिला ऐकताच धक्का बसला, बाबांच्या मिठीत शिरून ती रडकुंडीला आली.. काय बोलावे तिला काही कळेना.. बाबांनी तिला विचारले, “अजित सोबत लग्न करण्याविषयी काय मत आहे तुझं..”
    “बाबा, तुम्हाला कसं कळलं.. म्हणजे मी सांगणार होतेच पण…..बाबा तुम्ही रागावले का माझ्यावर….” असं तुटक तुटक बोलत संपदा गोंधळली..
    दादा‌ आणि आई तिथे होतेच..बाबा हसून म्हणाले, ” अगं, रागवत नाही आहे.. विचारतोय मी तुला.. लगेच लग्न करायचं नाही म्हणत पण तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला..”
    संपदा स्वतःला सावरत कसंबसं बोलून गेली,” बाबा‌, अजित आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे.. त्याने लग्नासाठी मागणी घातली होती पण तुम्ही तयार असाल तरच हो म्हणेल मी असंच सांगितलं मी त्याला..मला तुम्हाला दुखवायचं नाही बाबा..”
    बाबा म्हणाले, “तुला पुढे तुझं करिअर करायचं आहे.. स्वतः च्या पायावर उभं राहायचं आहे.. पुढे कधी चुकून वाईट प्रसंग आलाच तर स्वावलंबी असणं गरजेचं आहे.. लग्नाचं म्हणशील तर मी अजितच्या घरच्यांना भेटायला तयार आहे..”
    बाबांचं म्हणनं ऐकताच सगळ्यांना आनंद झाला..
    दादाने अजित विषयी घरी कसं कळाल याची पूर्ण गोष्ट संपदाला सांगितली..
    अजित आणि दादा यांनी दोन्ही कुटुंबे एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठरविला.. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरी सगळे त्यांच्या लग्नाला तयार झाले..संपदाला शिक्षण, करिअर याबाबतीत आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अजितच्या घरच्यांनी बोलून दाखवले.
    आपण सगळं स्वप्न तर बघत नाही ना‌ असा भास अजित आणि संपदाला होत होता.
    इतक्या सहजपणे सगळं जुळून येणं म्हणजे नशिबच असं दोघांनाही वाटत होतं.
    दादा नसता तर आपण कधीच बाबांशी या विषयावर बोलू शकलो नसतो असं संपदाच्या मनात आलं, दादामुळे अजित आयुष्यभरासाठी आपला होणार, दादाचे आभार मानावे की काय करावं संपदाला सुचत नव्हतं.. दाराकडे पाहून त्याच्या मिठीत शिरून तिचे आनंदाश्रु भराभर वाहू लागले..त्यावर तिला दादा भाऊक होत म्हणाला, “अगं वेडाबाई, आज लग्नाची बोलणी आहे.. सासरी जायला वेळ आहे अजून..आता पासून रडते की काय..सांगू का अजितला..संपदाला नाही यायचं तुझ्या घरी म्हणून..??”
    दादाच्या बोलण्याने रडतच हसू आलं तिला..अजितने ही दादाला मिठी मारत मनापासून आभार मानले..दादा माझ्या आयुष्यात इतका सुंदर दिवस तुमच्यामुळे आला असं म्हणताना अजितचे डोळे आनंदाने पाणावले होते..

    अशा प्रकारे दोघांच्या प्रेमकथेचा गोड शेवट आणि संसाराकडे सुंदर वाटचाल सुरू झाली..

    ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा ??

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे ?

    अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर आधार म्हणून तिने नकळत अचानक तिचा‌ हात अजितच्या खांद्यावर ठेवला आणि तिच्या हाताच्या स्पर्शाने अजितची अजून एकदा विकेट उडाली. संपदाच्या लक्षात येताच ती पटकन हात काढून लाजतच सॉरी म्हणाली आणि त्यावर अजितने लगेचच हात ठेवलास तरी हरकत नाही म्हणताच तिने परत आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. आज दोघांचीही अवस्था जरा‌ वेगळीच झाली होती. असं ठरवून भेटल्यावर काय बोलावे काय नाही अशी दोघांची अवस्था झालेली होती. कॉफी शॉप मध्ये पोहोचताच अजितने दोघांसाठी कॉफी मागवली, दोघेही आजूबाजूला बघत लाजत अवघडल्यासारखे एकमेकांसमोर बसले होते. चुकून नजरानजर झाली की संपदा एक गोड स्माइल द्यायची आणि अजित त्या स्माइल मुळे घायाळ??. बराच वेळ दोघे शांतपणे बसून नजरेनेच बोलत होते, काही वेळाने  अजितने पुढाकार घेत गप्पा सुरू केल्या. ही वेळ कधी संपूच नये अशी अजितची अवस्था झाली होती.
    अशाच दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. संपदाचा सहवास अजितला हवाहवासा वाटू लागला.संपदा कधी भेटायला तयार व्हायची तर कधी मुद्दामच अजितची मज्जा बघायला काही कारण काढून भेटायला नकार द्यायची. मनातून तर तिही त्याला भेटायला तितकीच उत्सुक असायची. असं दोघांचं भेटणं, बोलणं सुरू होत, आता संपदाला मनातल्या भावना सांगायला हव्या, तिला लग्नासाठी विचारायला हवं असं अजीतने मनोमन ठरवलं.
    येत्या रविवारी संपदाला निवांत भेटून प्रपोज करायचं असं ठरवून अजित तयारीला लागला. कसं प्रपोज करायचं याची प्रॅक्टीस आठवडाभर सुरु होती. संपदा आठवडाभरात दोन वेळा भेटली, फोनवर संवाद हा सुरू होताच. त्याने तिला रविवारी भेटायचं विचारलं तेव्हा काहीही आढेवेढे न घेता ती तयार झाली.
    ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी अजित एक सुंदर लाल गुलाबांचा गुच्छ, एक छानसा दोघांचा फोटो असलेलं पेंडंट घेऊन संपदाची वाट पाहात होता. आज नेहमीपेक्षा जास्त तयार होऊन मोठ्या उत्साहात तो भेटायला आला.
    संपदाला यायला मात्र बराच उशीर झाला, फोन केला तरी ती उत्तर देत नव्हती, तेव्हा संपदा नक्की येयील ना भेटायला, असं तर ती वागत नाही. यायचं नसतं तर आधीच नकार कळवलं असतं संपदाने अशा विचारांमध्ये अजित गुंतला असतानाच मागून येऊन कुणीतरी अजितचे़ डोळे हातांनी झाकले. त्या नाजूक बोटांचा स्पर्श अजितने लगेच ओळखला. हळूच तिचे हात पकडून डोळयांवरून बाजूला करत तो काही बोलणार तितक्यात ती म्हणाली, ” I’m really sorry..मला यायला खूप उशीर झाला..बराच वेळ वाट पहावी लागली ना तुला..sorry again..”

    अजितने मागे वळून पाहिले, संपदा सुद्धा आज छान तयार होऊन आलेली. तिचं निरागस रूप पाहून अजितचा मूड एकदम फ्रेश झाला आणि नकळत तो बोलून गेला, “अगं, sorry म्हणू नकोस, तुझ्यासाठी एक तास काय , आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे मी….? ( जरा वेळ दोघेही स्तब्ध राहून परत अजित बोलला)खूप सुंदर दिसत आहेस संपदा तू.. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..आज तुला यायला जरा उशीर झाला तर अस्वस्थ वाटू लागले होते मला, पण विश्वास होता तू येणार म्हणून.. मला आता तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाहीये.. आयुष्यभर साथ देशील माझी..?”
    अजित अचानक सगळं बोलून गेला, संपदाला त्याच्या मनातील भावना कळत होत्या पण अचानक तो व्यक्त झाल्याने त्यावर काय बोलावे तिला कळत नव्हते. जरा लाजत, गोंधळलेल्या अवस्थेत संपदा म्हणाली, “अजित , मलाही तू खूप आवडतोस पण मला जर वेळ हवा आहे विचार करायला..जरी आपलं प्रेम असलं तरी बाकी गोष्टींचा विचारही करायला हवा.. माझं कुटुंब साधारण आहे, तू श्रीमंत घरातला..तुझ्या घरी आपलं प्रेम स्विकारतील का.. शिवाय माझ्या घरच्यांनाही हे पटेल की नाही मला नाही माहित..प्रेम महत्त्वाचं असलं तरी घरच्यांना नाही दुखावू शकणार मी..मला प्लीज वेळ दे विचार करायला….”
    संपदाच्या अशा उत्तराने अजित जरा नाराज झाला. ” संपदा, अगं तू तयार असशील तर मी घरच्यांशी बोलेल या विषयावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत..प्लीज समजुन घे..”
    “अजित, अरे तू असा विचार नको करू, मी फक्त वेळ मागते आहे विचार करायला.. नाही म्हणत नाहीये..पण लग्न म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.. तेव्हा घरच्यांच्या परवानगीने सगळं झालं तर चांगलं असेल..”
    आता मात्र अजित गोंधळला, संपदाच्या बोलण्याने त्याला तिचा अभिमानही वाटला.. भावनेच्या भरात निर्णय न घेता वास्तविकतेचा विचार करणारी संपदा त्याला आज अजूनच आवडली..”संपदा, तू हवा तितका वेळ घे. माझं खूप मनापासून प्रेम प्रेम आहे गंं तुझ्यावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे.. ” इतकंच तो बोलला.
    आज याविषयी बोलल्यावर दोघेही स्तब्ध झाले.. पुढे काय बोलावे दोघांनाही काही सुचत नव्हते..
    संपदा घरी आल्यावर तिच्या मनात सतत अजितचा विचार सुरू होता. तिचही त्याच्यावर प्रेम होतच पण घरची परिस्थिती लक्षात घेता ती आता विचारात पडली होती.
    संपदाच्या भावाने तिच्या मनातली घालमेल ओळखली. काही तरी नक्कीच बिनसलंय, त्याशिवाय आपली चिमुकली बहीण अशी सतत विचारात राहणार नाही हे त्याच्या लक्षात आले. संपदा शी प्रत्यक्ष बोललो तर ती सांगेल की नाही त्याला शंका वाटली. त्याने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने माहिती काढली तेव्हा त्याला अजित विषयी कळाले. आपली चिऊताई आता मोठी झाली, कुणाच्या तरी प्रेमात पडली या विचाराने दादाला जरा आश्चर्याचा धक्का बसला पण या परिस्थितीत संपदाला मदत करायची असं दादाने ठरवलं.
    पुढचे काही दिवस संपदा आणि अजित भेटलेही नाही आणि फारसं पूर्वी सारखं बोलणंही नाही.. इकडे अजित सतत संपदाच्या उत्तराची वाट बघत होता आणि तिकडे संपदा सगळ्यांचा विचार करून गोंधळलेली होती.
    संपदाची अंतिम वर्षाची परीक्षा जवळच होती, कसाबसा अभ्यास करायची पण पूर्वी सारखं तिचं कशातच मन लागत नव्हतं.
    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता.

    आता दादा अजितला भेटून पुढे संपदाला कशी मदत करतो..त्याला अजित बहिणीचा जीवनसाथी म्हणून आवडेल का..दोघांच्या घरी याविषयी कळाल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच..तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १

    संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची.
    अजितची गाडी बंद पडल्याने तोही आज बसने ऑफिसमध्ये जायला‌ निघाला. सकाळच्या वेळी बस मध्ये बरीच गर्दी असल्याने बरेच जण उभेच होते. अजितला काही वेळाने जागा मिळाली आणि तो लगेच त्या जागी जाऊन बसला. पुढच्या स्टॉप वरून एक वृद्ध आजोबा बस मध्ये चढले पण गर्दी मुळे  बसायला जागा नसल्याने काठीचा आधार घेत कुठे जागा मिळते का याचा अंदाज घेत सर्वत्र नजर फिरवू लागले, तितक्यात संपदा आजोबांजवळ आली, तिने आजोबांना जागा करून दिली. त्याच क्षणी अजितची नजर संपदावर पडली, तिचं मदतीला धावून जाणं, तिचं ते मोहक रूप पाहून अजितची नजर काही केल्या संपदा वरून हटत नव्हती.
    अजित हा आई वडिलांना एकुलता एक, सधन कुटुंबात वाढलेला, नुकताच नोकरीला लागला. दिसायला देखणा, उंच बांधा, स्टायलीश राहणीमान. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर फिदा पण हा कुणाला भाव द्यायचा नाही. मित्रांनी चिडवले की म्हणायचा , “अरे, वो मेरे टाइप की नहीं..” त्याच असं म्हणनं होतं की बघता क्षणी असं वाटलं पाहिजे, “तुम्हे जमी पे बुलाया‌ गया है मेरे लिये..”
    संपदा अगदी अजितच्या विरूद्ध पण अजितला तिला बघताच मनात गाणं सुरू झालं, “देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार..”
    संपदाच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत असताना अजितला आजुबाजूला काय चाललंय काही भान नव्हते. संपदाचा स्टॉप आला आणि ती उतरली ‌तसाच अजित भानावर आला.
    ऑफिसमध्ये सतत संपदाचा चेहरा त्याच्या डोळ्यापुढे येत होता. कामात नेहमी प्रमाणे लक्ष लागत नव्हते. आपल्याला असं कधीच वाटलं नाही, आज पर्यंत इतक्या सुंदर सुंदर मुलींनी प्रपोज केले, मैत्री साठी स्वतः पुढाकार घेतला पण आपल्याला कुणा विषयी काही वाटले नाही. मुली इतक्या भाव देतात म्हणून टाइमपास व्हायचा, मज्जा वाटायची पण आज त्या बस मधल्या मुलीला बघून वेगळंच वाटत आहे. कोण असेल ती, इतका का विचार करतोय मी तिचा अशा मनस्थितीत अजितचा पूर्ण दिवस गेला. सायंकाळी मित्रा सोबत घरी परत गेला.संपदाला बघण्याच्या ओढीने दुसऱ्या दिवशी परत अजित बसनेच ऑफिसला निघाला. आज ती येयील की नाही हेही त्याला निश्चित माहीत नव्हते पण पुन्हा ती दिसल्यावर त्याला मनोमन आनंद झाला. त्या वीस मिनीटांच्या प्रवासात त्याच लक्ष फक्त संपदा कडे होते. संपदाच्याही ते लक्षात आले. नकळत अधून मधून दोघांची नजरानजर व्हायची.
    असाच बसने जाण्याचा कार्यक्रम आठवडाभर चालला. एक दिवस योगायोगाने दोघांना आजुबाजूला बसायला जागा मिळाली. अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला(मन में लड्डू फुटा..)
    जरा वेळ इकडे तिकडे उगाच बघत अजितने बोलण्यासाठी पुढाकार घेतला, “हाय, मी अजित..”
    त्यावर संपदा जरा लाजत, “हाय..”
    अजित ( जरा घाबरून ‌दबक्या आवाजात)- तुम्ही दररोज जाता का बसने.. काही दिवसांपासून मी येतोय तर तुम्ही दररोज दिसता म्हणून विचारलं..”
    संपदा – हो..मी गेली दोन वर्षे बसनेच जाते कॉलेजला..
    असा हाय हॅलो वरून संवाद सुरू झाला. अजित संपदाला भेटायला म्हणून रोज गाडी असूनही बसने प्रवास करायला लागला. कधी हाय हॅलो तर कधी संधी मिळाली तर थोडंफार बोलणं सुरु झालं. काही दिवसांनी दोघांची मैत्री झाली, फोन नंबर एकमेकांसोबत शेअर झाले. अजितला संपदा आवडायला लागली, तिला न बघता, तिच्याशी न बोलता त्याचा दिवसच अपूर्ण वाटू लागला. ती दिसणार नाही म्हणून रविवार नकोसा वाटायचा.
    एक दिवस अजितने संपदाला कॉफी साठी विचारले, बरेच आढेवेढे घेत शेवटी ती कॉलेज नंतर यायला तयार झाली. अजितने ऑफिसमधले काम लवकर संपवले आणि तो वेळेच्या आधीच तिला घ्यायला कॉलेज जवळ पोहोचला. समोरून संपदा येताना‌ दिसली, तिची लांबसडक वेणी उजव्या खांद्यावरून समोर आलेली, लाल पांढरा सलवार कमीज, डोळ्यातलं ते तेज, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघताच अजितची परत‌ एकदा विकेट उडाली. त्याची नजर एकटक तिच्याकडे होती,  स्वप्नातली अप्सरा जणू आपल्या जवळ येत आहे असा भास क्षणभर त्याला झाला. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणाली आणि अजित भानावर आला.

    क्रमशः

    पुढचा प्रवास पुढच्या भागात.. तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिमीरातूनी तेजाकडे..भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की शामरावांनी आत्महत्या केल्यावर सुमित्राला संसाराचा गाडा चालवताना अनेक खस्ता खाव्या लागल्या त्यात काही वर्षांनी आजीही गेली. होती नव्हती ती जमिन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. सुमित्रा आता दोन मुलांना घेऊन दुसर्‍यांकडे शेतीचे, कुणाच्या घरचे घरकाम करून संसार चालवत होती.
    गणेश म्हणजेच सुमित्राच्या मुलाला आईच्या कष्टाची जाणीव होती. आई मी शाळेत जाण्यापेक्षा तुला कामात  मदत करतो असं तो म्हणायचा पण आईची इच्छा होती ती मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, मोठं व्हावं, नावं कमवावं. तरीही शाळा , अभ्यास करून सुट्टीच्या दिवशी घरातील कामात, लहान बहिणीला सांभाळून इतर कामात तो आईला मदत करायचा.
    अशा परिस्थितीत एकटी बाई बघून गावात अनेकांचे वाईट अनुभव सुमित्राला यायचे. मदतीचा हात पुढे करत तिचा फायदा घेऊ बघणारे अनेक जण तिला भेटले पण सुमित्रा स्वाभिमानी होती. एकटी आहे म्हणून कुणापुढे न झुकता वाईट हेतूनेने कुणी जवळ येऊ पाहत असेल तर त्याची खरडपट्टी काढल्याशिवाय शांत बसायची नाही, ते त्या परिस्थितीत गरजेचे होते. मेहनत करून ती दोन मुलांना सांभाळत होती, त्यांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे तिचे स्वप्न होते.
    अशातच गणेश बारावी उत्तीर्ण झाला, मागोमाग दुर्गाचे सुद्धा शिक्षण सुरू होतेच. बारावीनंतर गणेश ने कृषी क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकला, गावातील इतर शेतकऱ्यांना आपल्या घरच्या सारखी वेळ येऊ नये म्हणून शक्य ती मदत करायची, आधुनिक तंत्रज्ञान शिकवायचे हे गणेशचे ध्येय होते.
    गावातील एकाची शेती गणेशने वर्ष भर सांभाळायला घेतली, जमिनीची सुपीकता समजून घेऊन सिमला मिरचीचे पिक घेण्याची तयारी केली, योग्य ती काळजी घेऊन सिमला मिरचीचे उत्पन्न घेतले. जवळपास कुठेच हे पिक नसल्याने त्याला चांगला नफा मिळाला. गावातील अनेक लोक त्याच्या घरी शेती विषयक सल्ला घ्यायला येवू लागले. गणेशच्या मदतीने कुणी वेगवेगळ्या भाज्या, हळद अशा प्रकारचे उत्पादन करू लागले. म्हणायला सोपे असले तरी शेती म्हंटलं की मेहनत ही आलीच शिवाय निसर्गाची साथ हवीच. तरी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून योग्य ती काळजी घेत गावात शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ होत होती शिवाय योग्य ठिकाणी योग्य दरात विकून शेतकऱ्यांना मेहनतीचा पैसा मिळावा‌ म्हणून गणेश पुरेपूर प्रयत्न करत होता.  सोबतच थोडे फार कर्ज काढून त्याने शेती विकत घेतली, त्यात ऋतू नुसार सुपिकता लक्षात घेऊन वेगवेगळे पिक घेतले.
    कित्येक वाईट दिवस बघितल्यावर आता गणेशची परिस्थिती सुधारली होती, आईला गणेशचा खूप अभिमान वाटायचा.
    मागोमाग दुर्गा बारावी झाली, पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पुढे गावातील शाळेत शिक्षिका व्हायचं, गावातील मुलांना सुशिक्षित करायचं हे तिचं गोड स्वप्न होतं.
    आता सुमित्राच्या कष्टाचे फळ तिला गुणी मुलांच्या स्वरूपात मिळाले होते. गावात गणेशची एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण झाली होती, कुणाला काही मदत लागली, कुठलीही अडचण आली तरी गणेश त्यांच्यासाठी धावून जायचा. शेतीविषयक सल्ल्यासाठी तर सतत गणेशला भेटायला कुणी ना कुणी येणारे असायचे. गणेशने तालुक्याला अर्ज देऊन, सरकारी कार्यालयात चकरा मारत गावात कालवे तयार करवून घेतले, नदी वरून पाइपलाइन टाकून शेतांमध्ये पाण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्याच्या या कार्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी सुद्धा त्याचा सल्ला घ्यायला येवू लागले.
    एक सुशिक्षित, मेहनती, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सधन शेतकरी म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. आईला त्याच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान वाटला.
    गणेशने झोपडीच्या जागी छोटंसं घर बांधलं, मेहनतीने कर्ज फेडण्यासाठी गेलेली जमिन परत मिळवली. आईने खूप कष्ट केले पण त्याचे खर्‍या अर्थाने चीज झाले.
    जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने गणेशचा सत्कार आयोजित केला तेव्हा या सत्काराची खरी मानकरी माझी आई आहे, सगळं श्रेय आईला जाते हे तो अभिमानाने सांगत होता. आम्ही खूप हलाखीची परिस्थिती अनुभवली आहे.
    तिमीरातूनी तेजाकडे येण्याचा आमचा हा प्रवास आईमुळे, तिच्या मेहनती मुळे शक्य झाला हे सांगताच सुमित्रा बाईंसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.

    कथेतील परिस्थिती ही आपल्या देशात सत्य परिस्थिती आहे. कर्ज बाजारी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते. म्हणायला सोपे असले तरी अशा हलाखीच्या परिस्थितीत मेहनत करून एकटीने मुलांना सबल, सुशिक्षित बनविणे खरंच कौतुकास्पद आहे.
    शेतकऱ्यांची परिस्थिती ही विचार करण्यासारखी आहे. शिक्षणा अभावी दलाल अथवा इतर कुणाकडून शेतकर्‍यांची फसवणूक होते, योग्य दर, हक्काचा मेहनतीचा पैसा त्यांना मिळत नाही. अशा वेळी गणेश सारखा  प्रमाणिक सल्लागार, मदत करणारा कुणी असेल तर त्याचे खरंच केले तितके कौतुक कमीच आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिमीरातूनी तेजाकडे..भाग १

    पाच वर्षांचा गणेश आणि इवल्याशा सव्वा वर्षाच्या दुर्गाला सुमित्राच्या पदरात टाकून शामरावांनी आत्महत्या केली.
    जेमतेम दोन एकर शेती, त्यात ही पिके पाहिजे तशी आली नाही, डोक्यावर कर्ज. कसं बसं दोन वेळा पोटात अन्न जाई. शेताजवळ एका झोपडीत गणेश, दुर्गा, शामराव, सुमित्रा आणि म्हातारी आजी राहायचे. शामराव अचानक गेल्याने घरावर संकट कोसळले. सुमित्रा झाल्या प्रकाराने हादरली, काय करावे काही सुचेना. आजी आणि पदरात लहान मुलं अशा वेळी संसार कसा सांभाळावा या विचाराने सुमित्राला रात्र रात्र झोप लागेना. कुणाकडून मदतीची अपेक्षा नव्हतीच. भेटायला येणारा प्रत्येक जण सांत्वन करीत असे पण शेवटी ज्याचे त्यालाच बघावे लागते.
    सुमित्रा मनातून खचून गेली असली तरी डोळ्यापुढे दोन लेकरांना बघून पदर खोचायला पाहिजे हे तिने ओळखले. शामरावांना ती शेतीच्या कामात मदत करत असे पण एकटीने गाडा सांभाळायचा म्हणजे कठीणच.
    गावच्या सरपंचांनी मदत करून सरकारकडून लाख रुपयांची मदत जाहीर केली. तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारत कसे बसे ते लाख रुपये पदरात आले‌ पण कर्ज ही डोक्यावर होतेच. बघता बघता पावसाळ्याची चाहूल लागली. गणेश ला गावच्या शाळेत दाखल केले.
    सुमित्रा ने दोन एकर पैकी एक एकर जमीन कर्ज फेडण्यासाठी विकली. उरलेल्या एक एकरात पालेभाज्या, फुलांची लागवड केली. आलेली पालेभाजी बाजारात विकून थोडा फार पैसा मिळायला सुरुवात झाली. गाडी जरा रुळावर येत आहे असं चिन्ह दिसत असतानाच मुसळधार पावसामुळे होतं नव्हतं सगळं वाहून गेल. सुमित्रा पुन्हा एकदा काळजीत पडली पण हिम्मत हारली नाही.
    पावसाचा खेळ सुरू होताच पण शक्य ते प्रयत्न करत वांगी, मिरची, टमाटर, पालक, कोथिंबीर, भेंडी अशा‌ अनेक भाज्या शेतातून घ्यायला सुरुवात केली.
    झेंडूच्या फुल झाडांची लागवड केली, श्रावण महिन्या पासून व्रत, सणवार असल्याने फुलांची मागणी चांगली असते तेव्हा भाज्या आणि झेंडूच्या फुलांची जोरावर कसं बसं घर चालवलं. वेळ मिळेल तसा आजूबाजूच्या शेतावर कामाला जायची. मुलगा गणेश आणि आजीच्या मदतीने तालुक्यातील बाजारात भाज्या , फुल विकायची. दुर्गा लहान असल्याने तिला सांभाळून घर चालवताना, संसाराचा गाडा चालवताना सुमित्राला खूप खस्ता खाव्या लागल्या. मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडही सुरू. अशातच म्हातारी आजी आजारी पडली आणि देवाघरी गेली. नाही म्हंटले तरी दुर्गाला सांभाळून बाजारात फुले, भाजी विकायला आजीची चांगली मदत व्हायची.
    आजीच्या जाण्याने पुन्हा एकदा सुमित्रा पोरकी झाली. गणेश त्यावेळी चौथ्या वर्गात होता. आता घरी सगळी जबाबदारी सुमित्रा वर पडली. गणेशला आईची धावपळ दिसत होती, जमेल तशी मदत तो करायचा. अशातच त्यावर्षी ओल्या दुष्काळाने हाती काही लागले नाही आणि होती नव्हती ती एक एकर जमीन सुद्धा विकावी लागली. आता दुसर्‍यांच्या शेतात मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय सुमित्रा करू लागली पण काम ठराविक वेळीच मिळायचे तेव्हा इतर वेळी कुणापुढे हात पसरायला वेळ येवू नये म्हणून मिळालेल्या पैशातून जरा बचतही करावी लागे. दोन लहान मुलांना घेऊन एकटीने जगणं सोपं नाही हे तिला क्षणोक्षणी जाणवत होते.

    क्रमशः

    कथेतील परिस्थिती ही आपल्या देशात सत्य परिस्थिती आहे. कर्ज बाजारी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते.
    सुमित्रा मुलांचा भार सांभाळत त्यांचे आयुष्य सुखी करण्यासाठी जी धडपड करते, त्याची ही कहाणी.

    पुढे सुमित्रा संसार, मुलांची जबाबदारी कशी सांभाळते हे लवकरच जाणून घेऊया पुढच्या भागात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • भूलभुलैया ( लघुकथा )

    गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळ एक बाग होती,‌तिथे दहा राऊंड मारले की योगा‌ करून सात वाजता घरी परत असा हा मॉर्निंग वॉक चा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी मात्र काही तरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता, “अहाहा! किती रम्य वातावरण आहे.”?? असं मनात पुटपुटत ती बागेच्या दिशेने निघाली. सोसायटी आणि बागेच्या मधल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला हिरवी झाडे, सकाळी फिरणार्‍यांची वर्दळ असायची.
    आज सोसायटीच्या गेट बाहेर येताच गौरीला ते रम्य वातावरण जरा‌‌ भयानक झालेलं जाणवलं. ?झाडांवर पक्ष्यांची किलबिल नसून वादळ आल्यावर असतो तसा झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून निघणारा आवाज जाणवला. इतक्या अलगद वार्‍याने असा भयानक आवाज कसा याचं तिला आश्चर्य वाटलं पण दुर्लक्ष करून ती पुढे निघाली. एक किलोमीटर अंतरावर असलेली बाग आज जरा‌ जास्तच दूर आहे असं वाटायला लागलं, शिवाय रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आज असं काय वाटतं आहे, किती भयाण शांतता पसरली आहे असं मनात विचार करत ती चालत होती.. कितीतरी दूर गेली तरी बाग‌ काही येत नव्हती. घड्याळात पाहिलं तर सहाच वाजलेले. असं कसं होऊ शकतं, मी सहा वाजता घरून निघाली आणि अर्धा तास तरी चालत आहे पण बाग कशी येत नाही, घड्याळ सुरू असूनही सहाच कशे वाजलेत. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर त्यातही सहाच वाजलेले. आज कुणीच फिरायला कसं आलं नसेल. अशा विचारात ती चालत होती, जरा थकवा आला पण घाबरल्या मुळे थांबण्याची हिम्मत होत नव्हती. आता पुढे न जाता घरी परत जाऊया असा विचार करून ती मागे फिरली तर मागे वेगळंच चित्र. ती ज्या रस्त्याने आली तो हा रस्ता नव्हताच, एक कच्चा रस्ता ज्याच्या आजूबाजूला जीर्ण वृक्ष, अंधूक प्रकाश, शंभर मीटर पेक्षा पुढे दृष्टी जाणार नाही इतकाच प्रकाश, वार्‍याचा तो भयानक आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत होती.
    आता गौरी अजूनच घाबरली, काय करावं काही सुचत नव्हतं. घरी फोन करून नवर्‍याला‌ बोलावून घेऊ असा विचार करून फोन बघते तर फोन मध्ये नेटवर्क कव्हरेज नव्हतं. आता गौरीची धडधड वाढली, ती झाल्या प्रकाराने अक्षरशः रडकुंडीला आली. पुढे जावं की मागे तिला काही सुचत नव्हते.
    दोन पावलं पुढे जायची परत मागे यायची. अजूनही घड्याळ बघितले तर सहाच वाजलेले होते. हा काय प्रकार आहे, कशी बाहेर पडणार मी आता‌ विचारात असतानाच नवर्‍याने तिला हलवून उठवले आणि म्हणाला, ” गौरी, सहा वाजलेत, फिरायला जायचं नसेल तर अलार्म तरी बंद कर. कधी पासून वाजतोय तो. “
    गौरी दचकून उठली, घामाघूम झाली होती ती. उठल्यावर तिला जाणवलं की जे काही अनुभवलं ते एक भयानक स्वप्न होतं, बाजूला ठेवलेले घड्याळ बघितले तर सहा वाजले होते. अलार्म बंद करून मोबाईल बघितला, त्यातही सहाच वाजलेले होते. जे काही बघितले, स्वप्नात अनुभवले ते आठवून आज मात्र मॉर्निंग वॉक ला जायची गौरीची हिम्मत होत नव्हती.?

    कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ? कथा वाचल्या बद्दल धन्यवाद ?

    आपला अभिप्राय नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • एक वाडा झपाटलेला ( भयकथा)

    संपतराव पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित माणूस, गावाच्या मधोमध भला मोठा वाडा, कामाला चोवीस तास गडी माणसं, इतक्या मोठ्या वाड्यात संपतराव, पत्नी सीमा, दहा वर्षांची मुलगी शालिनी , लहान भाऊ गणेश आणि खाटेवर आजारी संपतरावांची आई राहायचे. सोबतीला आई साहेबांच्या सेवेत कमला असायचीच.
    गावात त्यांची शेती होती आणि गणेश शेतीच्या कामाचा हिशोब बघायचा, सीमा वाड्यावर काय हवं नको, गडी माणसांचा पगार असं सगळं गृहखाते बघायची.
    आता संपतरावांना गणेशाच्या लग्नाचे वेध लागले होते, आपल्या कुटुंबाला शोभेल अशा घराण्यातील मुलीच्या ते शोधात होते. वाड्यावर जशी गणेशच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा पासून सगळ्यांना काही ना काही विचित्र जाणवत होते. एकदा रात्री सीमाला उशीरा पर्यंत झोप लागत नव्हती. तिला वाड्याच्या मधोमध असलेल्या अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला, तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर कुणीच दिसले नाही. परत जाऊन झोपली तर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. वाड्यात तर लहान बाळ नाही मग हा आवाज कुणाचा. सीमा जरा घाबरली, तिने संपतरावांना‌ उठवले. संपतरावांनाही त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. दोघांनी बाळूला हाक मारली, बाळू म्हणजेच वाड्याच्या अंगणात आउटहाऊस मध्ये राहणारा गडी. बाळू धावतच बाहेर आला, लाइट लावून सगळ्यांनी आजूबाजूला बघितले पण कुणीच नव्हते. नंतर सगळे जाऊन झोपले की परत बाळाच्या रडण्याचा आवाज आला. काही केल्या सीमाला झोप लागत नव्हती.
    दुसऱ्या दिवशी सीमाच्या मनात सतत विचार येत होता की रात्री कुणाचा आवाज असेल, शिवाय कुणी तरी चालण्याचा भासही झाला होता. काय प्रकार आहे हा.. परत रात्री उशिरा जेवण झाल्यावर अंगणात फेरफटका मारताना सीमाला कुणी तरी आपल्या मागे उभं असल्याचा भास झाला. मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते, परत समोर वळताच एक केस मोकळे असलेला, कपाळावर मोठं लाल कुंकू, भले मोठे डोळे एकटक सीमा कडे बघत असलेला चेहरा दिसला. सीमा घाबरून ओरडली, चक्कर येऊन पडली.
    सीमाच्या ओरडण्याने सगळे धावत बाहेर आले, काही वेळाने सीमा शुद्धीवर आली, घाबरलेल्या अवस्थेत तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. कोण बाई होती ती, का अशी बघत होती अशा अनेक प्रश्नांनी सीमाला भंडावून सोडले. गणेशने डॉक्टरांना बोलावले, त्यांनी सीमाला आराम करायला सांगितला.
    औषधी घेऊन सीमा झोपली. काही वेळाने झोपेतच तिला जाणवले की कुणी तरी अंगावरचे पांघरुण ओढत आहे, सीमाने झोपेतच पांघरूण परत अंगावर घेतले. पुन्हा कुणी तरी पांघरूण ओढायला लागले, सीमा आता घाबरली, घाबरतच डोळे उघडले तर परत तोच चेहरा दिसला आणि क्षणात अदृश्य झाला.. सीमाला घाम फुटला, तोंडातून शब्द निघत नव्हता, घाबरून ती इकडे तिकडे बघायला लागली. तितक्यात तिची मुलगी शालिनी तिथे आली, “आई, काय झालं तुला.. अशी का करते आहे..आई रात्री कोण होतं तुझ्या सोबत अंगणात..”
    सीमा घाबरून शालिनी कडे बघत म्हणाली “म्हणजे तुलाही दिसली‌ ती…”
    शालिनी म्हणाली, “मला अंधारात कोण आहे दिसत नव्हते पण तुझ्या सोबत एक बाई फिरताना दिसत होती.. कोण होती ती..”
    सीमा आता‌ अजूनच घाबरली.. मनात विचार करू लागली..कुणी तरी आपला‌ पाठलाग करत आहे.. तेही साधंसुधं कुणी नाही..भूत पिशाच्च बाधा आहे हा… माझ्या कडून काय पाहिजे असेल..का दिसत असेल मला..
    नंतर रोज रात्री अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा भास.. लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागले..कुणाला कधी आपल्या मागे कुणी उभे असल्याचे जाणवायचे तर कधी किंचाळी ऐकू यायची. काय होते आहे कळत नव्हतं.
    संपतरावांनाही आता भिती वाटत होती, त्यांनी गणेशला‌ खोलीत बोलावले आणि वाडयात पूजा ,शांती करण्याचा विचार ऐकवला. उद्याच पंडीतजींना बोलावून पूजा करून घ्यायची असं ठरलं, तितक्यात जोरात वारा सुटला, वाड्याच्या दारं खिडक्या जोराजोरात वाजू लागल्या, एक भयंकर विकट हास्य ऐकू येवू लागले.. अचानक वातावरण बदलले.. शालिनी धावत येऊन आईच्या कुशीत शिरली.. तिकडे आजी ओरडायला लागली पण ती काय बोलते आहे कळत नव्हतं.. जणू कुणी आजीचा गळा‌ दाबत आहे असा आवाज येत होता.. सगळे पळत आजीच्या खोलीत गेले तर आजीच्या सेवेत असलेली कमला बेशुद्ध पडली होती आणि आजी गळा आवळल्या सारखा झाल्याने तडफडत होती… कुणालाही काही कळण्याच्या आत आजीने जीव सोडला..परत ते विचित्र हास्य ऐकू आले.. हळूहळू बंद झाले.. वाड्यातले सगळे जण झाल्या प्रकाराने घाबरून गेले होते आणि आजीच्या जाण्याने सगळे हादरले होते..
    सकाळी आजीच्या जाण्याची बातमी भरभर गावात पसरली..पूर्ण गाव वाड्या बाहेर जमले.. अंत्य संस्कार आटोपले..कमला अजूनही धक्क्यातून सावराली नव्हती..न‌ राहावून तिने सीमाला सांगितले, “ताई, काल कुणी तरी मोकळे केस.. विचित्र हास्य असलेली बाई आजीच्या खोलीत आली होती..चेहरा काही दिसत नव्हता. काही केल्या बटन‌ दाबूनही लाइट लागत नव्हता..वारा‌ इतका‌ होता की दारा खिडक्यांच्या आवाजाने माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत नव्हता…मला जोरात काही तरी झटका बसला आणि मी खाली पडली..ती बाई आजी जवळ जाऊन सूड घेणार सूड घेणार म्हणत होती…तिनेच आजीला मारलं.. “
    सीमाला काही सुचत नव्हते..काय प्रकार आहे हा..कुणाचा सूड..कशाचा बदला..कोण आहे ती बाई… सगळे विधी आटोपून घरी आल्यावर सीमाने आणि कमलाने संपतरावांच्या कानावर ही गोष्ट टाकली..ते ऐकताच संपतराव घाबरले.. गणेशला बोलावून दोघे काही तरी बोलायला लागले..
    आता संध्याकाळ झाली की वाड्यात सगळ्यांना भिती वाटत होती…
    परत रात्री अंगणात चालण्याचा आवाज.. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.. मधेच ते भयानक हास्य ऐकू यायचे.. रात्रभर सगळे एका खोलीत बसून राहिले.. कुणालाही डोळा लागला नाही.. सकाळी गणेशने पंडित बोलावून वाड्याची शांती करायचे ठरवले..परत भर दिवसा तो सुसाट वारा सुटला.. वाड्याच्या खिडक्या उघड बंद होत आवाज करू लागल्या… सगळीकडे धूळ पसरली….
    काही वेळाने वातावरण परत शांत झाले.. पंडितजींनी सगळा प्रकार अनूभवताच प्रश्न केला, “घरात कुणाच्या हाताने काही विपरीत घडले का.. कुणी तरी अदृश्य पणे वास करत आहे वाड्यात.. वाडा झपाटलेला आहे त्या शक्तीने..आज‌ रात्री पूजा करून शांती करू नाही तर सगळ्यांच्या जीवाला धोका आहे..”
    त्यावर गणेश आणि संपतराव म्हणाले “काही विपरीत घडले नाही.. तुम्ही पूजेची तयारी करा..”
    ठरल्याप्रमाणे रात्री पूजेची तयारी झाली..
    एक‌ मोठा हवन‌ पेटविला गेला.. वाड्यात सगळीकडे एक सुरक्षा रेषा आखली गेली..सगळ्यांच्या हातात सुरक्षेसाठी एक एक मंतरलेला धागा बांधला गेला.. एकंदरीत सगळ्यांना भिती वाटत होती.. काही वेळ मंत्र,हवन करून आत्म्याला बोलावणे करणारे मंत्र पंडितजींनी म्हणायला सुरुवात केली, परत तो सुसाट वारा, दार खिडक्यांच्या आदळण्याचा आवाज आला..विकट हास्य ऐकू येऊ लागले..सूड घेणार..सोडणार नाही म्हणून एक किंचाळी ऐकू आली..त्या किंचाळी ने गणेश आणि संपतराव घाबरले.. एकमेकांकडे बघू लागले.. पंडितजी मंत्र म्हणत त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू लागले..प्रश्न करत म्हणाले”कोण आहेस तू..कुणाचा सूड घेण्यासाठी आलीस इथे.. काय पाहिजे तुला.. “
    परत एक विकट हास्य ऐकू आले.. गणेशला गळा आवळल्या सारखे वाटायला लागले..त्याने हातात पाहिजे तर सुरक्षा धागा सुटून बाजूला पडला होता..सोड मला सोड.. गणेश विनवण्या करू लागला.. पंडितजी त्या आत्म्याला वश करण्यासाठी प्रयत्न करत होते पण फायदा होत नव्हता.. तेव्हा पंडीतजी म्हणाले “गणेश काही पाप घडलं असेल तर कबूली दे, तुझा जीव धोक्यात आहे..”
    संपतराव सुद्धा पार घाबरले.. गणेश कसाबसा गळा सोडवत म्हणाला, “कुसूम मला‌ माफ कर…मी पाप केलं आहे..जीव नको घेऊ माझा….”
    ते ऐकताच सगळं वातावरण बदललं.. कोण ही कुसूम सगळ्यांना प्रश्न पडला..
    पंडीतजींच्या सांगण्यावरून गणेश सगळं प्रायश्चित्त करत बोलू लागला.
    कुसूम ही गावातील एक तरूणी, शेतात कामाला यायची, गणेश शेतीचे सगळे व्यवस्थापन बघायचा..एकदा‌ कुसूम ला पैशाची अडचण होती..तिची आई आजारी होती, तेव्हा तिने गणेश जवळ मागणी केली.. गणेशने तिला मदत केली.. नंतर काही कारण काढून तिला‌ शेतातल्या दोन खोल्यांच्या घरात बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली.. परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्यावर आपल्या शरीराची भूक भागवण्याचा प्रकार सुरू केला… तिला आईच्या उपचारासाठी पैसे द्यायचा…ती बिचारी गरीब घरची, बदनामीच्या भितीने गप्प राहिली..एक‌ दिवस संपतराव शेतावर आले, त्यांना हा प्रकार कळाला.. आधी गणेशकडे रागाने बघितले आणि नंतर त्यांनीही तिचा फायदा घेतला..ती झाल्या प्रकाराने हादरली, परत शेतात यायचं तिनं बंद केलं, तिच्या आईचं आजारपणामुळे निधन झालं, तेव्हा गणेश आणि संपतराव तिला भेटायला गेले तेव्हा कळाले की कुसूम गरोदर आहे.. कुसूम संपतरावांना‌ म्हणाली, “माझं गणेश सोबत लग्न लावून द्या, झालं गेलं विसरून मी नांदायला तयार आहे.. शिवाय माझ्या पोटात तुमच्या घराण्याचा अंश वाढत आहे..”
    आम्ही यावर विचार करतो असं सांगून दोघे निघाले. कुसूम मुळे आपली बदनामी होणार तेव्हा तिचा काटा काढायचा असा बेत आखला. तिला शेतातल्या घरी बोलावले, ती‌ एका आशेवर त्या ठिकाणी आली. दोघांनी मात्र तिचा काटा‌ काढला, तिचा गळा आवळून खून केला, शेताजवळच एका ठिकाणी तिचा मृतदेह दफन केला. गावात अशी बदनामी झाली की आईचं निधन होताच कुसूम कुणातरी सोबत पळून गेली.. या गोष्टीला सहा महिने सुद्धा झाले नव्हते तोच इकडे वाड्यावर गणेशच्या लग्नाची गोष्ट सुरू झाली आणि कुसुमचा आत्मा बदला‌ घेण्यासाठी वाड्यात आला.. सत्य ऐकताच सीमाला मोठा धक्का बसला.. ती रडतच म्हणाली “कुसूम तुला न्याय मिळणार.. अपराध्यांना शिक्षा मिळेल..तू कुणाचा जीव घेऊ नकोस.. माझ्यावर विश्वास ठेव..”
    सगळं वातावरण शांत झालं, सीमाने पोलीसांना बोलावले,‌ गणेश आणि संपतरावांना अटक झाली. कुसूमचा‌ दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यावर विधी युक्त अंत्य संस्कार केले गेले.
    गणेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर संपतरावांना दहा वर्षांचा तुरुंगवास.
    आता वाड्यात सीमा, शालिनी, कमला आणि गडी माणसं असायचे. सगळा व्यवहार सीमाच बघायची. आता कुणालाही काही भास होत नव्हता, त्या झपाटलेल्या वाड्यात वास करणार्‍या आत्म्याला शांती, मुक्ती मिळाली होती.

    ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कुठल्या गोष्टीशी काही संबंध वाटल्यास केवळ योगायोग समजावा ?
    भयकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न तेव्हा मत मांडायला विसरू नका ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • अधुरी प्रेम कहाणी- भाग २

    अमन रीता शुद्धिवर येण्याची वाट पाहत होता, ती लवकरच बरी होणार अशी त्याला खात्री होती. कितीही खर्च आला तरी चालेल, काहीही करून रीताला बरं करायचे अशी त्याची धडपड सुरू होती. डॉक्टर सुद्धा शक्य ते प्रयत्न करत होते. अमनचा त्याच्या प्रेमावर विश्वास होता पण नियतीच्या मनात नेमके काही वेगळेच होते. दोन आठवडे होत आले , उपचार सुरू होते पण रीताच्या प्रक्रुतीत हवी तशी सुधारणा होत नव्हती. रीताच्या अंगात बर्‍याच दिवसांपासून ताप होता, त्यामुळे तिची अवस्था अशी झाली असा अंदाज विविध तपासण्या करून डॉक्टरांनी सांगितला. रीताने स्वत: कडे इतके कशे दुर्लक्ष केले, आपल्याही लक्षात कशे आले नसेल हा विचार करत अमन दररोज रिताला बघत बसायचा, तिची शुद्धीवर येण्याची वाट पाहत असायचा.एक दिवस अचानक रीताने या जगाचा निरोप घेतला, अमनच्या पायाखालची जमीन सरकली, रीता आपल्याला अशी सोडून जाऊ शकत नाही हीच गोष्ट त्याच्या मनात होती पण नियतीने तिला अमन पासून वेगळे केले. अमन खूप खचला, इतके मोठे दुःख आयुष्यात कधी येयील असा त्याने कधीच विचार केला नव्हता.

    यातून बाहेर पडणे त्याला सोपे नव्हते, अमनला रीताच्या आणि त्याच्या आई वडिलांनी खूप समजून घेतले. तेही तितकेच खचले होते पण अमनचं अख्खं आयुष्य पुढे आहे, ते सुखी करण्यासाठी शक्य ते प्रयत्न सगळे करत होते. 

    अमनची आई त्याला सतत म्हणायची की रीता चे तुझ्यावर खूप प्रेम होते, ती या जगात नसली तरी तू नेहमी आनंदी असावा हीच रीताची सतत धडपड होती, तू असा खचून जाऊ नकोस, नव्या आयुष्याची सुरुवात कर. रीता ची साथ इथपर्यंतच होती, नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही, अमन तू स्वत:ला सावर. 

    हळूहळू वेळ गेला तसं अमनने सत्य स्विकारलं, रीता शिवाय आयुष्य कठीण असले तरी ते मान्य करावे लागणार हे त्याला जाणवले होते.

    दोन वर्षांनी अमनच्या घरच्यांनी त्याला ओळखीतल्या एका मुलीचे स्थळ सांगितले, मीनल असे तिचे नाव अतिशय साधी सरळ मुलगी. अमनच्या मनात रीताची जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही याची जाणीव अमनला होती, तिच्या गोड आठवणी त्याने मनात जपलेल्या होत्या. नविन आयुष्याची सुरुवात करताना आधी मीनलला रीता बद्दल सगळं सांगायचे अशे अमनने ठरवले. मीनलला रीता विषयी सगळं आधीच कळाले होते ,तीने अमनला समजून घेतले, मी रीता ची जागा घेऊ शकत नसली तरी नेहमी तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल, मला खरंच आवडेल तुझ्या सोबत आयुष्य घालवायला, एवढेच मीनल बोलली. अमनला तिच्या बोलण्यात एक निरागस भाव जाणवला. पुढचं आयुष्य मीनल सोबत घालवण्याचा त्याने निर्णय घेतला. रीता पहिलं प्रेम,ती मनात सदैव असेल, तिच्यासोबतची प्रेम कहाणी अधुरी असली तरी तिच्या गोड आठवणी अमर आहेत.

    मीनलचा प्रेमळ सहवास , तिचा समजुतदारपणामुळे वेळेनुसार अमन मीनल मध्ये गुंतला, तिने आपल्याला खूप समजून घेतले, आपण कधीच मीनलला दुखवायचे नाही हे अमनने मनोमन ठरवले आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात केली.

    – अश्विनी कपाळे गोळे