Category: Parenting

  • रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

           तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

       अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

        आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
       दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
    पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

    जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

    तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
    त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
    जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
    विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

    या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
    तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
    तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

    तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
    तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

    तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
    ती परत रडायला लागली.

    जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
    जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

    आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

    तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

    झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

    झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

    हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

    ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

    प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

        शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”

        धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवता जा बरं दोघेही. मुलांचं आवरून त्यांना बस मध्ये बसवून शुभदा आली तसच नवरोबा म्हणाले, “अगं काल झोपण्यापूर्वी बघत बसलेलो ती फाइल कुठे आहे माझी..इथेच तर होती..” शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाइल सापडली. ती त्याच्या हातात फाइल देत म्हणाली, ” रात्री आवरून ठेवायला काय होते हो..अस सकाळी सकाळी गडबडीत हे कुठेय ते कुठेय…मी काय काय बघायचं..समोरची उशी सुद्धा उचलून बघत नाही…नुसता वैताग माझ्या जीवाला..”

    त्यावर महाशय तिला म्हणाले, “अगं आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामचं असतो ना..मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं..”

    आराम आणि मला…शुभदा‌ ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली, “दिवसभर किती काम पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना… वरून म्हणायला मोकळे की तू आता आधी सारखी उत्साही राहीली नाहीस… हसतखेळत वावरत नाहीस..माझं मलाच ठाऊक किती दमून जाते मी सगळं आवरता आवरता..”

    शेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात‌ डबा देत बाय केले आणि मनात काही तरी विचार करत आरशासमोर जाऊन ती उभी राहिली.
    जरा वेळ स्वतः ला आरश्यात निरखून पाहिले तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणार्‍या केसांमुळे पहिल्या भेटीतच आपल्यावर भाळलेले आपले पती देव आता हा जरा पांढर्‍या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा अंबाडा बघून काय विचार करत असणार.
    लग्न झाल्यावर मला बघताच तुझ्यापुढे चंद्र फिका म्हणणारा माझा हा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्याभोवती आलेले काळसर वर्तुळ बघून काय कौतुक करणार.
    मुलं झाल्यापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतः कडे जरा लक्ष दे, स्वतः साठी वेळ काढ, केसांना कलर कर, पार्लर मध्ये जाऊन फेशियल कर पण मी मात्र त्यांच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने म्हणणे बंद केले. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही… पूर्वीसारखा कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले पण चूक माझीही आहेच ना.

      सगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतः कडे दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झालीत. त्यांचं ते सहज करू शकतात.

    काही तरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला, पार्लर वालीला घरी बोलावले. मस्त पैकी फेशियल करून केसांना कलर करवून घेतला.
    सुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लास ची चौकशी करत क्लास जॉइन करण्याचे ठरविले.

    मुले घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी आई आज आपलं आपल्याला सगळं आवरायला सांगते बघताच मुलेही जरा गोंधळली पण मुकाट्याने आपापली कामे आवरून दोघेही मुले डायनिंग टेबल वर येऊन बसत आईच्या गोड बदलाचे निरीक्षण करत होती.

    मुलगा आईला म्हणाला , “आई आज काय खास… हेअर कलर छान दिसतोय बरं का…”
    तिनेही थॅंक्यू म्हणत गोड स्माइल दिली आणि म्हणाली, ” आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही..मग मला‌ जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना..नाही तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी विचारातील अरे ही तुझी आई की आजी…”
    त्यावर तिघेही खिदिखिदी हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सॅंडवीच दोघांनीही फस्त केले.

      आता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतः ची लहानसहान कामे स्वतः करण्याची सवय लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणे कमी झाले. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितके स्वतः साठी वेळ काढत ती स्वतः कडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बस मध्ये बसवून नवर्‍याचे आवरून दिले की नियमीत योगा करणे, वेळेत नाश्ता , जेवण सगळं कसं तिने ठरविल्याप्रमाणे सुरू केले. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पती राजांना तिच्यातला हा बदल खूप आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली, मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता, त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता पण आता शुभदा मधल्या तिच्यातल्या ‘ ती ‘ ने नव्याने जन्म घेत हा दुरावा‌ दूर केला. दोघा राजा राणीचे नाते नव्याने बहरत गेले.

      खरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घरदार, मुलंबाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होत जाते. मग तिची होणारी चिडचिड ही सहाजिकच आहे, ही चिडचिड व्हायला मग कुठलेही लहानसहान कारण पुरेसे असते. नवरोबांना वाटते बायको आता पूर्वी सारखी राहीली नाही तर बायकोला वाटतो नवरोबा आता बदलले पण सत्य हे आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदलली असते. मग छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू.
    अशा या संसाराच्या वाटेवर शक्य तो वेळ स्वतः साठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो.

      चला तर मग आपल्यातल्या ‘ मी ‘ ला शोधून स्वतः साठी वेळ काढा आणि हसतखेळत आयुष्य जगा.?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आईची दुहेरी भूमिका…

    रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची. 
    जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
    भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
    लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
    ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
    दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
    हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
    दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी. 

    खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

    ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.

    आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.

    ईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.

    वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले , 

    ” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”

    ईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न. 

    अमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची. 

    दोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.

    त्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”

    ईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”

    आताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा. 

    मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”

    कसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता. 

    नोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं. 

    तिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.

      

    आज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं. 

    ईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला, 

    “आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”

    टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण  स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला. 

    खरंच विचार करण्याजोगे आहे नाही का?

    ईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

    मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”

    मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.

    मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता

    घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”

    रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी,  बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”

    मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”

    रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”

    मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
    मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”

    मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.

    रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
    मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
    लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
    अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
    सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
    रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
    एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
    एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
    तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
    महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
    महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
    तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
    मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
    दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
    आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
    मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.

    मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.

    फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
    त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.

    अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सात मुली नंतर आठवा मुलगा झाला…

    आजच्या विज्ञान युगात आठ वेळा बाळंतपण, ऐकूनच धक्का बसतो ना…कामवाल्या मावशी अतिशय आनंदाने सांगत होत्या की माझ्या बहिणीला वारीस जन्माला आला, सात मुली नंतर आठवा मुलगा झाला.

    ते ऐकून आश्चर्यने त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. आजच्या काळात आठ वेळा बाळंतपण. त्या मात्र अतिशय आनंदात होत्या.

    जरा वेळ विचारात गुंतून भानावर आले आणि त्यांना म्हणाले “मावशी, अहो मुलगा असो की मुलगी आजकाल इतका भेद नाही राहीला. मुलगा व्हावा म्हणून इतके वेळा बाळंतीण झालेल्या बाईची काय अवस्था झाली असेल शिवाय त्यांच्या हातात नाही ना मुलगाच व्हावा ते.”

    त्यावर मावशी म्हणतात ” ताई तुम्ही सुशिक्षित, शहरात राहता म्हणून तुम्हाला तसं वाटतं. गावाकडे असं न्हाय, वारीस नसला‌ की बाईच्या जातीला लय टोमणे मारतात बघा. त्यासाठी बहीणीनं नवस केला, तेव्हा मुलगा झाला. सगळ्यात मोठ्या मुलीचं अनं आईचं बाळंतपण एकाच वेळी पाठोपाठ झालं बघा. लेकीला मुलगा झाल्यावर आईला आठवड्यानंतर मुलगा झाला. भाच्याच्या पायगुणानं मामा जन्माला आला बघा ”

    मावशीचे उत्तर ऐकून धक्काच बसला, चक्कर येणेच बाकी राहिले. अजूनही अशे विचार, अशी परिस्थिती आजुबाजुला आहे हा विचार कधी केला नव्हता. त्यात सगळ्यात मोठ्या मुलीचं आणि आईचं बाळंतपण एकाच वेळी हे ऐकून तर आश्चर्याने ताणलेल्या भुवया पूर्वस्थितीत यायला बराच वेळ लागला. मावशी सगळं सहजरीत्या आनंदात सांगून गेल्या. मी मात्र अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातच होते.

    आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे, मग मुलगा असो वा मुलगी. या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असताना मुलगाच व्हावा म्हणून बाईच्या जीवाचा, तिच्या वेदनेचा विचार न ‌करता तिला मुलगी झाली म्हणून मानसिक छळ कितपत योग्य आहे. मुलगा नाही म्हणून टोमणे ऐकायचे पण ते खरंच तिच्या हातात आहे का. आठ वेळा बाळंतपण झाल्यावर तिची शारीरिक अवस्था काय झाली असेल. केवळ समाजात टोमणे नको, मुलगा होत नाही म्हणून नवरा सोडून देयील या भितीने हे सगळं सहन करणे हाच यावर उपाय आहे का.

    ग्रामिण भागात अजूनही अशे विचार जिवंत आहेत. अजूनही मुलगा होत नाही म्हणून सासरी छळ, नवर्‍याने सोडून दिले असले प्रकार सुरू आहेत. ही परिस्थिती खरंच बदलायला हवी. यासाठी स्त्रीनेच पाऊल उचलायला हवे, खंबीर व्हायला हवे. अशा परिस्थितीतून गेलेल्या आईने मुलीलाही अशाच विचारांचे घडवले, अन्याय सहन करत राहिले तर ही परिस्थिती बदलणे खरंच खूप कठीण आहे.

    अश्विनी कपाळे गोळे

  • सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास

    सोहम, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. सोहम, आई वडील ,बहीण आणि एक भाऊ असं पाच जणांचं कुटुंब. वडील सरकारी नोकरीत कामाला. सोहम सगळ्यात मोठा मुलगा, देखणा, गोरापान, अभ्यासात हुशार पण वयानुसार मात्र त्याचा आवाज पुरुषांसारखा बदलला नाही. वयात आल्यावर सोहम मध्ये बदल होईल म्हणून सुरवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. शाळेत मात्र त्याला या गोष्टींमुळे सगळे चिडवायचे, त्याच्या आवाजाची नक्कल करायचे.
    बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला पण त्याच्या नाजूक, अगदी मुली सारख्या आवाजामुळे त्याला परत चीडवणे, आवाजाची नक्कल करणे या गोष्टी सुरू झाल्या. सोबतच्या मुलांमध्ये बरेच बदल झालेले त्याला जाणवत होते, त्यांच्या आवाजात बदल झाले होते मग आपल्या आवाजात का बदल होत नाही‌ म्हणून सोहम सतत आई जवळ रडायचा, कॉलेजमध्ये जायला टाळायचा. या प्रकारामुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सोहम मध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. सोहमची आर्थिक परिस्थिती साधारण त्यामुळे मुलांनी चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे वडीलांचे स्वप्न. सोहमच्या वडिलांचा स्वभाव रागीट, कडक होता त्यांच्यापुढे आईचे काही चालत नव्हते.
    सोहम आता बाहेर जायला टाळायचा, कुठल्या कार्यक्रमात जाणे, मित्रांमध्ये जाणे त्याने बंद केले, कॉलेजमध्येही कधी तरीच जायचा, त्यामुळे अभ्यासात तो मागे पडत होता. या प्रकारामुळे सोहमचे वडील त्याचावर खूप चिडायचे.
    पदवी परीक्षेत कसा बसा तो उत्तीर्ण झाला. पदवीधर झाला असला तरी नोकरीचं काय, वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा मुलगा अपयशी ठरला म्हणून वडिल सगळा राग सोहमवर काढायचे.
    या सगळ्या प्रकाराने आईचा जीव तीळ तीळ तुटत होता. बाहेर गेलो की कुणी आवाजावरून पुरुषत्व ठरवतील, चिडवतील म्हणून दिवसभर सोहम घरात असायचा. घरातही बहीण भावांशी वडीलांशी बोलणे टाळायचा. एकटाच एका खोलीत स्वत:च्या विचारात उदास पडून असायचा सोबतीला मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा.
    असंच रेडिओ ऐकताना आईच्या डोक्यात एक कल्पना आली, तिने आपल्या भावाला म्हणजेच सोहमच्या मामाला फोन केला. मामा शहरात नोकरीला होता. त्याला सोहमच्या परीस्थिती बद्दल माहिती होते. आई आणि मामाचे बोलणे झाल्यावर मामा लगेच येत्या शनिवारी सोहमला सोबत घेऊन जायला आला. जरा हवापालट होईल शिवाय शहरात तुला कुणी ओळखत नाही तेव्हा चिडवायचा प्रश्न नाही म्हणून सोहमची समजुत काढून त्याला सोबत घेऊन गेला. वडिलांना सोहम असल्याने नसल्याने काही फरक पडत नव्हता, आपली दोनचं मुलं आहेत असं मानून ते चालले होते. त्यामुळे त्यांनी सोहमला मामासोबत जाण्यासाठी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
    सोहम मामासोबत शहरात आला, कित्येक दिवसांनी तो बाहेर मोकळ्या हवेत वावरत होता, बाहेरच जग बघत होता. मामा त्याला अगदी मित्राप्रमाणे वागणूक देत त्याचा न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करत होता.  सोमवारी मामाने सुट्टी घेतली आणि सोहमला घेऊन एका कंपनीत गेला. ते होते रेडिओ रेकॉर्डींग आॉफिस. मामाचा एक मित्र तिथे काम करायचा. तिथलं वातावरण, काम करायची पद्धत सगळं सोहमला दाखवून दोघे घरी आले. मामाने सोहमची समजुत काढली आणि पटवून दिले की रेडिओ स्टेशन वर काम केले तर देवाने तुला दिलेल्या नाजूक, सुरेख आवाजाने तू सगळ्यांना जिंकू शकतो. जगाला कुठे कळणार की जो स्त्रीचा आवाज रेडिओ वर आपण ऐकतो आहे तो एका पुरूषाचा आहे.
    नोकरी मिळेल शिवाय तुझी ओळख ही सोहम नसून शिवानी म्हणून पुढे आणू. सोहमला ते पटले पण‌ हे खरंच इतके सोपे आहे का, पण प्रयत्न करायला हरकत नाही ना म्हणून मामाने सोहमची मानसिक तयारी केली. सोहमनेही त्यासाठी रेडिओ जॉकी होण्यासाठी लागणारी माहिती नेटवरून मिळवली आणि प्रॅक्टीस सुरू केली. लहानपणापासून घरात रेडिओ ऐकायची सवय असल्याने सोहमला ते इंटरेस्टिंग वाटले.
    मामाच्या मित्राच्या मदतीने बाॅसला पूर्ण परीस्थिती सांगितली आणि दोन दिवसांनी सोहमला इंटरव्ह्यू साठी बोलावले गेले.
    सोहमला “रेडिओ जॉकी” म्हणून नोकरी मिळाली. आई आणि मामा सोडून घरात कुणालाही हे माहीत नव्हते. आॅफिसमध्ये याविषयी गोपनीयता ठेवण्यासाठी बॉस कडून आदेश दिले गेलेले होते. लवकरच त्याने सगळ्यांना आपलसं केलं.
    सोहम मुळातच हुशार, त्याचा गमावलेला आत्मविश्वास मामा मुळे आणि नोकरी मुळे परत आला. नोकरीच्या ठिकाणी बाकी सहकारी सुरवातीला त्याला हसायचे पण त्याची हुशारी, त्याच्यातला आत्मविश्वास, त्याचा प्रेमळ स्वभाव बघून सगळ्यांना त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटला. लवकरच तो फेमस “रेडिओ जॉकी शिवानी” म्हणून प्रसिद्ध झाला. बेस्ट रेडिओ जॉकी म्हणूनही त्याला अवार्ड मिळाला.
    वडीलांनी सोहमचा विषय कधीच सोडला होता पण आई मात्र लपून छपून सोहम सोबत फोनवर बोलायची. त्याच्या रेडिओ वरच्या आवाजाचं कौतुक करायची.
    एकदा सामान आवरताना सोहमला एक डायरी दिसली त्यात घरात एकटा बसून असताना त्याने लिहिलेल्या बर्‍याच कविता, गाणे होते. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, एक गिटार विकत घेतली. मामाच्या मदतीने सुट्टीच्या दिवशी सोहमने लिहिलेल्या गाण्यांचे दोघे मिळून रेकॉर्डींग करायचे. सोहमने गायलेल्या गाण्यांचा एक ऑडिओ अल्बम बनवून इंटरनेट वर टाकला आणि अल्बम ला नाव दिले ‘सिक्रेट सुपरस्टार’. त्याच्या गाण्यात इतका दर्द, शब्दात अनेक भावना होत्या. इंटरनेट वर तो अल्बम वार्‍या सारखा पसरला. जो तो त्या गाण्यांचा फॅन झालेला.  हे सिक्रेट फक्त मामा भाच्यालाच माहित होते.  हा सिक्रेट सुपरस्टार कोण हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली होती.
    एकदा रेडिओ स्टेशनच्या आॅफिसमध्ये स्वतः चे गाणे गुणगुणत असताना एका सहकार्‍याने म्हणजेच साहीलने बघितले, त्यातलं एक शब्द न शब्द अगदी हुबेहूब सिक्रेट सुपरस्टार सारखा सोहम गातोय ऐकून सहकार्‍याला शंका आली. जेवायला बसल्यावर साहीलने सिक्रेट सुपरस्टार अल्बमचा विषय काढला, सगळ्यांनी खूप वाहवा केली.   साहिल सोहमच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता, ती चर्चा ऐकून सोहमला मनोमन किती आनंद झाला हे त्याने ओळखले.
    संधी बघताच सोहमला भेटून साहिल म्हणाला ” सोहम, तू जगासाठी सिक्रेट सुपरस्टार, रेडिओ ऐकणार्‍यांसाठी शिवानी आहे पण आमचा सगळ्यांचा सच्चा यार आहे. ”
    सोहमला ऐकून धक्का बसला, ह्याला कसं कळाल की सिक्रेट सुपरस्टार माझा अल्बम आहे. साहिलने सगळा किस्सा सोहमला सांगितला, जेवताना जेव्हा सगळे सिक्रेट सुपरस्टार विषयी बोलत होते तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान, जो आनंद होता त्यावरून माझी शंका खरी ठरल्याचे साहिलने सांगितले.
    साहिल म्हणाला ” सोहम, जगभरात सिक्रेट सुपरस्टार च्या गाण्यांचे चाहते आहेत, तेव्हा तू तुझी ओळख आता जगासमोर आणली तरी चाहत्यांचं प्रेम कमी होणार नाही शिवाय तुझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.”
    सोहमला मात्र भिती वाटत होती की खरी ओळख जगासमोर आली तर आता पर्यंत मिळालेली सिक्रेट सुपरस्टारची प्रसिध्दी , सगळ्यांच्या आवडत्या रेडिओ जॉकी शिवानी चे नाव खराब तर होणार नाही ना. लोकांना सत्य परिस्थिती समजली आणि कुणी ते चुकीचं ठरवून फसवणूक समजून स्विकारले नाही तर काय होईल. घराण्याचे नाव खराब होईल म्हणून आहे तेच ठिक आहे या विचाराने तो साहिलला उत्तर न देता निघून गेला.
    साहिलने खरं काय ते इतर सहकार्‍यांना सोबत बॉसला सांगितले, सिक्रेट सुपरस्टार दुसरी कुणी नसून आपली शिवानी म्हणजे आपला सोहम आहे हे ऐकून सगळ्यांना आनंद झाला शिवाय आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांना खूप अभिमान वाटला.
    बॉसने सगळ्यांना एकत्र बोलावले, त्यात सोहम होताच. सगळ्यांनी सोहमचे खूप कौतुक केले, बॉसने अनाउन्समेंट केली की आपण आपल्या चॅनल तर्फे सिक्रेट सुपरस्टारची म्युझिक कॉंसर्ट  करायची आहे आणि त्यातून सोहमची ओळख जगासमोर आणून त्याचा मान त्याला मिळवून द्यायचा. सोहमला ऐकून धक्का बसला पण बॉसने त्याला विश्वासात घेतले , कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत असेन असे आश्वासन दिले. रेडिओ चॅनल वरून सिक्रेट सुपरस्टार च्या म्युझिक कॉंसर्ट ची जाहिरात सुरू झाली. अवघ्या तीन दिवसांत सगळे तिकीट विक्री झाले.
    ठरल्याप्रमाणे सिक्रेट सुपरस्टार जगासमोर आला, फिमेल व्हाॅइस मधला ‘ सिक्रेट सुपरस्टार’  अल्बम एका पुरुषाचा आहे ऐकून सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला, पण सोबत सोहमची वाहवा झाली, न्यूनगंड दूर करून परिस्थिती वर मात देत मिळवलेली प्रसिध्दी बघून सोहम जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान म्हणून सोहम प्रसिद्ध झाला.

    त्याचा हा काटेरी प्रवास एका मुलाखतीत सांगताना आई, मामा आणि माझ्या सहकाऱ्यांमुळे मी सुपरस्टार झालो हे ऐकून आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू ओठांवर आले. वडिलांना सोहमचा खूप अभिमान वाटला, ते त्याला भेटायला गेले, माझ्या मुलाने माझी मान अभिमानानं उंचावली असं म्हणताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, त्यांनी कित्येक वर्षांनी सोहमला मिठीत घेतले. आपण किती वाईट वागणूक दिली सोहमला म्हणून पश्चात्तापाने ते सोहमला कवटाळून रडायला लागले.

    काही गोष्टी या माणसांमध्ये नैसर्गिक असतात त्या बदलता येत नसेल तरी परिस्थिती वर मात करून योग्य मार्ग नक्कीच काढता येतो. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला असेल तर नावासह शेअर करा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • तेच खरे हिरो….

    मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने मनवाच्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती म्हणाली “काकू आज क्लास उशीरा संपला पण आम्ही सोबतच बस स्टॉप वर आलो. माझी बस लवकर आल्यामुळे मी निघाले, मनवा बस साठी थांबली होती. येयीलच इतक्यात काळजी करू नका.”
    आईचं मन मात्र काळजीने व्याकूळ, मनवा ठिक तर असेल ना , फोन का बंद आहे, किती हा निश्काळजीपणा , उशीर होईल म्हणून कळवायचे तरी ना अशा विचाराने आई काळजीत पडली शिवाय जरा संतापलेली. तितक्यात एक रिक्षा घरापुढे थांबली, मनवा त्यातून उतरली बघून आईच्या जीवात जीव आला. पण हे काय सोबत हे कोण….
    मनवा सोबत रिक्षा मधून त्रृतीयपंथी म्हणजेच दोन हिजडे उतरले बघून आईचा पारा चढला, आई दारातूनच ओरडली ” मनवा,‌हा काय प्रकार आहे,  हे लोक इथे कशाला, तुला काही कळते की नाही. ह्यांच्या सोबत तू…शी… तुला काय हिच रिक्षा मिळाली का…”  आई चिडून नको ते बोलून गेली.
    मनवा आईला शांत करायचा प्रयत्न करत होती पण आई मात्र सगळ्या‌ प्रकाराने शिवाय मनवाला उशीर झाल्याने संतापलेली होती.
    ते पाहून सोबत आलेले दोघे तसेच कधी परत गेले मनवाला कळालेही नाही.
    आईचं बोलणं ऐकून मनवा रडायला लागली आणि चिडून म्हणाली “आई आता गप्प बस… त्यांच्या विषयी असं बोलण्याआधी मी काय म्हणते ऐक..ते हिजडे नाही..तेच खरे हिरो आहेत..ते नसते‌ तर आज माझ्या सोबत काय झाले असते कुणास ठाऊक.. कदाचित मी तुझ्या समोर अशी उभी नसते..”
    मनवा‌ आईच्या कुशीत शिरून हुंदके देत रडायला लागली.
    काही तरी गंभीर आहे आईला लक्षात आले.
    मनवाला शांत करून विचारले तेव्हा ती म्हणाली “आई, आज आमचा क्लास नेहमी पेक्षा उशीरा संपला आणि त्यामुळे माझी रोजची बस चुकली. दुसऱ्या बस‌ची वाट बघत मी बस स्टॉप वर थांबली, सोबतच्या मैत्रिणी त्यांच्या बस आल्यावर निघून गेल्या. बस स्टॉप वर बरेच लोक होते, त्यात काही टवाळक्या करणार्‍या पोरांचा ग्रुप होता. मी एकटी मुलगी दिसल्यावर ते काही तरी अश्लील बोलत माझ्या आजूबाजूला उभे होते. मी ज्या बाजूला जाईल तिकडे येऊन उभे. बरेच लोक तिथे असूनही कुणी त्यांना काही बोलत नव्हते, दुर्लक्ष करत आपापल्या फोन मध्ये, काही जण दुसरीकडे बघत उभे होते. मी खूप घाबरले तशातच तुला फोन करून कळवावे म्हणून फोन काढला तर एकाने येऊन धक्का दिला, माझा फोन खाली पडला, बंद झाला.. कसाबसा उचलून बॅगेत ठेवून बस कधी येते म्हणून मी रडकुंडीला येऊन बसची वाट पाहत होते. एकाने येऊन ओढणी ओढली आणि चूकून झालं असं दाखवत पुढे गेला..त्याच्या सोबतचे त्याला वाहवा करत हसू लागले.. माझ्या फिगरवरून काही तरी अश्लील बोलायला लागले..ते सगळे नजरेने बलात्कार करत होते आई…”
    बोलतानाच मनवा सगळा प्रकार आठवून रडू लागली..परत सांगायला लागली..
    ” तिथल्या गर्दीत सगळ्यांना कळत होते की मी घाबरली आहे.. रडकुंडीला आली आहे..पण कुणी दखल घेत नव्हते.. तितक्यात तिथून एक हिजड्यांचा ग्रूप जात होता, त्यात एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, ते सगळे जवळ आले, माझी विचारपूस केली..मी रडायला लागली..माझ्या सोबत होत असलेला प्रकार सांगितला.. एकाने जाऊन त्या ओढणी ओढणार्‍या मुलाच्या कानाखाली मारली. त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला.. घाबरून ते टवाळके तिथून पळत सुटले. आजूबाजूला असलेले लोक सगळा प्रकार बघत होते पण फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. ते मुलं पळून गेल्यावर काही लोक सांत्वन करण्यासाठी आले पण तेच लोकं आधी मात्र लक्ष नसल्यासारखे उभे होते. मी खूप घाबरले आई.. माझं रडणं थांबतच नव्हतं.. तेव्हा एकाने रिक्षा थांबवली, मला पत्ता विचारला आणि म्हणून त्यातले दोघे मला सुखरूप घरी पोहोचवायला घरा पर्यंत आले. तू मात्र त्यांना नको ते बोललीस. काही माहित नसताना त्यांचा अपमान केला..ते काही अपेक्षा न ठेवता परत गेले आई तुझं बोलणं ऐकून. त्यांचे मी साधे आभार सुद्धा मानले नाही..मी खूप घाबरले होते..ते माझ्या मदतीला आले नसते तर माझं काय झालं असतं काय माहित. आई माझी इज्जत त्यांच्यामुळे वाचली. ते हिजडे नाही तेच खरे हिरो आहेत..”
    मनवाच्या बोलण्याने आईला रडू आवरले नाही.. ऐकूनच आईच्या अंगावर काटा आला.. ज्यांना आपण हिजडे म्हणून अपमानीत केले त्यांच्यामुळे आपल्या मुलीची इज्जत वाचली. त्यांचे उपकार कशे फेडायचे.. आई मनवाला कुशीत घेऊन पश्चात्ताप करत रडू लागली..मनवा सुखरूप घरी पोहोचली म्हणून मनोमन त्यांचे आभार मानू लागली.

    कधी कधी आपल्याला परीस्थिती माहीत नसताना आपण कुणाला असं दुखावतो आणि नंतर पश्चात्ताप होतो.. जसं मनवाच्या आईच्या बाबतीत झालं..
    जे आहे ते नैसर्गिक आहे..ते लोक त्रृतीयपंथी असले तरी एक मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत.. तेव्हा त्यांच्यावर हसत त्यांची खिल्ली उडवणे, नको ते त्यांना बोलणे खरंच अयोग्य आहे…

    कथा कशी वाटली ते जरूर कळवा.. शिवाय तुमचं याबद्दल मत मांडायला विसरू नका…

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नकारात्मक विचार.. जीवघेणे परीणाम-भाग २

    अनन्याला  नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता.
    गरोदरपणात तिसऱ्या त्रैमासिकित जास्त काळजी घ्यायला हवी पण अनन्या मात्र दिवसेंदिवस खचून जाऊ लागली, वेडेवाकडे विचार करू लागली. तिला बाळाची हालचाल जरा कमी वाटली की रडायला लागायची, माझ्या बाळाला काही झालं नाही ना म्हणून सतत आईला प्रश्न विचारायची. जरा पोटात पाठीत दुखले तरी घाबरून रडायची, मग डॉक्टर कडे घेऊन गेल्या शिवाय पर्याय नसायचा. एक एक दिवस आता अवघड जाऊ लागला.
    कशातच तिचं मन लागत नव्हते, सतत नकारात्मक विचार, चिडचिड सुरू असायची.
    अशातच एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले, शतपावली करताना चक्कर आली आणि ती खाली पडली. नशिबाने आई  आणि राघव सोबतच होते. त्यांनी लगेच तिला हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेले तर अनन्याचं ब्लडप्रेशर खूप वाढलेले होते आणि त्यामुळे तिला चक्कर आली होती. अजूनही ती पुर्णपणे शुद्धीत नव्हती. डॉक्टरांनी तिला अॅडमीट करून घेतले. ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, या सगळ्या प्रकाराने अनन्या अजूनच नकारात्मक होत गेली आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले, ब्लडप्रेशर वाढले. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत होते.
    बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालले होते शिवाय अनन्याची परिस्थिती नाजूक झाली होती. सगळ्यांना काळजी वाटत होती. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याचे सगळे उपाय डॉक्टर करत होते शिवाय बाळ आणि आई सुखरूप राहण्याचे प्रयत्न सुरू होते. अनन्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सहा तास होत आले तरी काही सुधारणा होत नव्हती. अशातच अचानक अनन्याला परत चक्कर आली आणि तिची शुद्ध पुर्णपणे हरपली, थोडा वेळात ती शुद्धीवर आली पण बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र थांबले होते, सातव्या महिन्याच्या अखेरीस उच्च रक्तदाब ( हाय ब्लडप्रेशर) मुळे बाळाने जन्माला येण्याआधीच या जगाचा निरोप घेतला होता.
    राघव तसेच घरी सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.
    अनन्याच्या जीवाला सुद्धा धोका होता. ती नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन उच्च रक्तदाबाच्या वेढ्यात अडकली होती, अस्वस्थ होती. अशावेळी बाळाला जास्त काळ पोटात ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे इंजेक्शन व्दारे कृत्रिम कळा आणून नैसर्गिक रित्या बाळाला बाहेर काढले गेले.
    जे काही झाले ते अतिशय धक्कादायक होते, टेंशन, नकारात्मक विचार, चिडचिड , मनात सतत दडपण यामुळे इतका मानसिक व शारीरिक त्रास अनन्याला आणि सोबतच घरी सगळ्यांनाच झाला होता.
    अनन्याला यातून सावरण्यासाठी वर्ष लागले. पण तिला समजून चुकले होते की सगळं सुरळीत चालू असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नकारात्मक विचार करून इतक्या वर्षांनी लाभलेलं मातृत्व ती गमावून बसली होती.
    यातून सावरण्यासाठी घरी सगळ्यांनी अनन्याला खूप मदत केली.
    सुदैवाने पुढे दोन वर्षांनी अनन्या आणि राघव च्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली, त्यांच्या जीवनात एका गोंडस बाळाचे आगमन झाले.

    या कथेतून हाच संदेश द्यायचा आहे की “नकारात्मक विचार किती जीवघेणे ठरू शकतात, नकारात्मकता जवळ बाळगू नका. कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक राहून शांतपणे सामना केला तर योग्य मार्ग नक्कीच मिळतो.”
    माझ्या या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमा असावी. नकारात्मकता दूर करणे हाच हेतू यामागे आहे.

    अशाच कथा वाचत राहण्यासाठी मला फॉलो करा.
    कथा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नकारात्मक विचार….जीवघेणे परिणाम- भाग १

    अनन्या आज खूप आनंदात होती, काय करू कुणाला सांगू अशा अवस्थेत  तिने आईला फोन केला ” हॅलो आई, काय करते आहे, कामात होतीस का… बरं ऐक मला तुझ्याशी बोलायचं आहे… म्हणजे तुला काही तरी सांगायचे आहे…आई…आई…. अगं तू आजी होणार आहे”, आताच आम्ही डाॅक्टरांकडे जाऊन आलो.. आई मी आज खूप खुश आहे..”.
    हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले, “अनन्या अगं किती गोड बातमी दिली तू…मी लवकरच येते तुला भेटायला.. काळजी घे बाळा… आणि हो, तुम्हा दोघांचेही अभिनंदन..”
    फोन ठेवताच सासूबाईंना अनन्याने गोड बातमी दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला.. लग्नानंतर सात वर्षांनी अनन्या आणि राघवच्या आयुष्यात एक बाळ येण्याची चाहूल लागली होती. राघवही खूप आनंदात होता, त्याने अनन्याला अलगद मिठीत घेतले आणि कपाळावर चुंबन घेत आनंद व्यक्त केला. आता स्वतःची नीट काळजी घ्या राणीसाहेब, दगदग करू नका असं म्हणतं अनन्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अनन्याला खूप प्रसन्न वाटले.
    अनन्या घरीच ट्युशन्स घ्यायची, राघव एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा.  दोघांचा प्रेमविवाह. अनन्या दिसायला अतिशय सुंदर, हुशार पण जरा चिडखोर, रागीट, आई वडिलांची एकुलती एक  त्यामुळे थोडी हट्टी मुलगी. राघव एकत्र कुटुंबात वाढलेला, नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत असला तरी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा शांत, समजुतदार मुलगा. कॉलेजमध्ये असताना अनन्या सोबत ओळख होती नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झाले आणि मग‌ लग्न. लग्नाला दोन वर्षे  झाले तसेच बाळ होण्या साठी दोघेही प्रयत्नशील होते सोबतच दवाखाना सुरू. आज लग्नाच्या सात वर्षांनी त्यांच्या जीवनात गोड बातमी आली. दोघांच्याही घरी सगळे लाड पुरवत होते, अनन्या स्वत: ची व्यवस्थित काळजी घेत होती. जेवण, आराम, फिरणं सगळं अगदी वेळेत. तिला राग येऊ नये, तिची चिडचिड होऊ नये याची पुरेपूर काळजी राघव घेत होता. असेच पाच महिने पूर्ण झाले. राघवनी नवीन घर खरेदी केले होते आणि त्याचा ताबा आता त्याला मिळणार होता. बाळाचं आगमन नवीन घरात होईल म्हणून दोघेही खूष. सामान नवीन घरात शिफ्ट करताना दगदग  नको म्हणून अनन्याला राघवने काही दिवस आई कडे ठेवले. घरच्यांच्या मदतीने नवीन घर सजवले.
    अनन्या नवीन घरात जायला खूप उत्सुक होती, ती घरी परत येताना राघवने तिचं छान सरप्राइज वेलकम केले. घरात तिच्या आवडीचे टेरेस गार्डन, रूममध्ये बाळाचे फोटो, दारात फुलांची रांगोळी, तोरणं शिवाय घरगुती वास्तुशांतीची पुजा आयोजित केली. सगळं अगदी आनंदाने पार पडले.
    नवीन ठिकाणी अजून जास्त ओळख नसल्याने आणि बाळ होणार म्हणून आता अनन्याने काही दिवस ट्युशन घ्यायचं बंद केले. सायंकाळी सोसायटीच्या आवारात अनन्या फेरफटका मारायला जाऊ लागली, त्यामुळे हळूहळू तिची ओळख होतं गेली.
    एक दिवस एका स्त्रीने तिला विचारले की ” तुम्ही नवीन रहायला आल्या का, कुठल्या मजल्यावर..”
    अनन्याने आनंदात उत्तर दिले ” हो, पाचव्या मजल्यावर, ५०५ मध्ये.”
    ते ऐकताच ती स्त्री घाबरून म्हणाली “५०५ मध्ये, जरा जपून हा.. त्यात तुम्ही गरोदर”.
    अनन्या दचकून म्हणाली” असं काय म्हणताय तुम्ही? काय झालं”.
    तिने अडखळत उत्तर दिले ” विशेष काही नाही पण असं ऐकलं आहे की आधी हे घर कुणी तरी बूक केले होते एका तुमच्या सारख्या जोडप्याने पण घराची खरेदी पक्की करून येताना त्यांचा अपघात झाला आणि ती गेली..तो अपंग झाला.. आणि मग त्यांनी ती खरेदी रद्द केली.. तेव्हा पासून ते घर घेण्याचे सगळे टाळायचे…तू काळजी करू नकोस.. होईल सगळं नीट.. वास्तुशांती केली ना..?” 
    त्या स्त्रीचे बोलणे ऐकून अनन्या हादरली.. घाबरून घरात जायला दचकली…ते ऐकल्यापासून तिच्या मनात सतत नकारात्मक विचार यायला सुरु झाले.. काही वाईट होणार नाही ना म्हणून सतत विचार करायला लावली.. अचानक झोपेतून दचकून जागी व्हायची.
    राघवला मात्र याची काही कल्पना नव्हती.
    अनन्याच्या वागण्यात बदल होत आहे हे राघवला जाणवलं. तिला विचारायचा प्रयत्न केला पण ती फक्त म्हणाली ” सगळं नीट होईल ना रे राघव.. काही संकट येणार नाही ना.. मला भीती वाटते..”
    राघव अनन्याला खूप समजावून सांगत होता की काही होणार नाही… आपल्याला बाळ होणार आहे..तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.. अनन्या अशी का वागते … गोंधळलेली का असते हे त्याला कळत नव्हतं..
    शेवटी तीन चार दिवस मनात गुंतागुंत निर्माण झाल्यावर अनन्याने झालेला प्रकार राघवला सांगितला.
    राघव ने तिची खूप समजूत काढली की हे सगळे आपण घर घेण्यापूर्वी झाले शिवाय त्यांनी फक्त घर बूक केले होते.. राहायला आले नव्हते..जे झाले तो एक अपघात होता शिवाय हे कितपत खरे आहे हे माहीत नसताना तू स्वत:ला अशा अवस्थेत त्रास करून घेऊ नकोस, तेही कुणाच्या सांगण्यावरून..तू याविषयी काही विचार करू नकोस. आपल्या आयुष्यात आनंदाचे दिवस आहेत ते एंजॉय कर…हवं असल्यास आईला आपण बोलावून घेऊ म्हणजे तुला एकटं वाटणार नाही.
    अनन्याला प्रसन्न वाटावं म्हणून शक्य तितका वेळ राघव तिला द्यायचा.. तिच्या आईला त्याने बोलावून घेतले.. आता सातवा महिना सुरू झाला.. अनन्या मात्र नकारात्मक विचारात गुंतलेली असायची.. सगळे आपापल्या परीने तिची समजूत काढून आनंदात ठेवायचा प्रयत्न करत होते पण अनन्याला नकारात्मक विचारांनी घेरले होते. जरा काही दुखले की ती टोकाचा विचार करायला लागत होती.. गरोदर असताना आनंदात राहणे किती गरजेचे आहे हे आई, राघव शिवाय डॉक्टर तिला समजून सांगत होते.. नकारात्मकता बाळासाठी तसेच अनन्या साठी घातक ठरू शकते हे सगळयांना लक्षात आले होते.
    अनन्याला यातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता..

    यातून अनन्या बाहेर पडणार की नाही.. त्याचा काय परिणाम होईल हे पुढील भागात पाहू.
    ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे..
    पुढचा भाग लवकरच… गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • कपड्यांवरून व्यक्तीमत्व ठरविणे- योग्य की अयोग्य

    “अय्या हीच का मोना, पंजाबी ड्रेस घालून आली लग्नात. होणार्‍या सासरची मंडळी भेटतील तर साडी नेसून जावं इतकं कसं कळत नसेल तिला. तुझी सून आतापासूनच मर्यादा ओलांडत आहे बघ रमा. तू तर म्हणाली होती की मुलगी संस्कारी घरातील आहे म्हणून. ” सुजयच्या काकू त्याच्या आईला म्हणाल्या.

    सुजयच्या आईला ते ऐकून जरा अपमानास्पद वाटले. त्यांनी मोना ची घरी सगळ्यांशी ओळख करून दिली पण मनात मात्र काकूंचे‌ वाक्य सतत बोचत होते. न राहवून त्यांनी मोनाला म्हंटले “अगं तू आमच्या घरची होणारी सून आहेस. साडी नेसून आली असती तर बरं झालं असतं, काय म्हणतील आता सगळे, लग्नाआधीच नावं ठेवायला सुरुवात होईल आता तुला आणि सोबतच मला.”

    मोनाला ते ऐकून वाईट वाटले, त्यावर ती दबक्या आवाजात म्हणाली, “आई माझ्याकडे साडी ब्लाऊज तयार नव्हते. अचानकच लग्नाला यायचं ठरलं ना शिवाय मला दिवसभर साडी मध्ये सुचले नसते काहीच म्हणून ड्रेस घातला.”

    सुजयच्या आई त्यावर काही न बोलता निघून गेल्या. घरी आल्यावर सुजयला ह्याविषयी त्यांनी सुनावले “आजकालच्या मुलींना कपड्यांचं भान नसतं, कुठे काय घालायचं कळतं नाही. लग्न व्हायच्या आधीच मला म्हणते साडी सांभाळायला दिवसभर सुचलं नसतं म्हणून. आम्ही नेसतोच ना नेहमी साडी, आम्हाला कसं जमतं साडी नेसून सगळं काम. कारणं आहेत नुसती.आता सगळे नातेवाईक नावं ठेवतील त्याचं काय”.

    तर गोष्ट अशी आहे की मोना म्हणजे सुजयच्या बाबांच्या मित्राची मुलगी, दिसायला आकर्षक, हुशार, आत्मविश्वासू. सुजयला ती खूप आवडायची, दोघांच्याही घरी लग्नाची काही अजून तयारी नव्हती पण जुळवून ठेवायला काय हरकत म्हणून सुजयच्या बाबांनी त्यांच्या मित्राकडे मोना आणि सुजयच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. दोघांचेही कुटुंब पुण्यात स्थायिक झालेले, जरा मॉडर्न विचारांचे. दोघांच्याही घरी तशी काही हरकत नव्हती. अचानकच लग्न ठरले, साखरपुडा आणि लग्नाचे मुहूर्त चार महिन्यांनंतरचे होते. पुढच्याच तीन दिवसांत सुजयच्या नातेवाईकांकडे एक लग्न होते आणि त्यात सुजयच्या आईने आग्रहाने मोनाला बोलावून घेतले, कुटुंबात सर्वांशी ओळख करून देण्याच्या उद्देशाने. अचानकच सगळे ठरल्यामुळे मोना जवळ साडी, ब्लाऊज काहीच तयार नव्हते. ती छान गुलाबी रंगाचा पार्टी विअर पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. तिचा उंच बांधा, गोरा रंग, त्यात तिच्या लांबसडक केसांची हेअरस्टाईल सोबतच हलकासा मेकअप त्यामुळे ती अजूनच आकर्षक दिसत होती. तिला आज बघून सुजय अजूनच तिचा तिच्या प्रेमात पडला. सुजयच्या आईने तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले पण काकूंनी साडी नेसून आली नाही म्हणताच आईचं मत बदललं.

    असं कपड्यांवरून कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवणे कितपत योग्य आहे. मोना नोकरी करणारी स्वतंत्र विचारांची, आई वडिलांनी तिला कधी कपड्यांच्या बाबतीत बंधन लादली नाहीत, कपड्यांवरून संस्कार ठरत नाही असे त्यांचे परखड मत होते, मोना समजुतदार होती, स्पष्टवक्ती होती. आई वडिलांचा तिच्यावर विश्वास होता आणि हे सगळे सुजयच्या घरच्यांच्या आधीच माहीत होते. लग्न ठरेपर्यंत त्याच्या आईला ह्या गोष्टीचा प्रोब्लेम नव्हता पण आता ती आपली सून होणार म्हणून त्यांच्या अपेक्षा बदलल्या होत्या त्याही नातेवाईक काय म्हणतील म्हणून.

    असाच अजून एक किस्सा, नविन लग्न झाल्यावर आम्ही राहायचो तिथल्या घरमालकीण काकूंचा. काकू नेहमी नववारी साडीत असायच्या आणि त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला ती शोभून दिसायची. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आणि खाली घरमालक सोबतच बाजूला अजून एक कुटुंब भाड्याने राहायचे. काकूंची आणि माझी भेट दररोज सकाळी ,६ वाजता व्हायची. ती वेळ म्हणजे माझी आॉफिसला जाण्याची आणि त्यांची माॅर्निंग वाॅकला जाण्याची. त्या काही न बोलता फक्त माझ्या स्मितहास्यावर एक स्मितहास्य करायच्या. आमचं दोघांचं राहणीमान, आॅफिसमुळे दिसणारी धावपळ शिवाय मॉडर्न कपडे बघून काकूंना वाटायचे की मी घरी जेवण कधी बनवतच नाही, मला बनवायलाही येत नाही असं. एकदा घाईघाईने निघाले आणि टिफीन विसरले, मागोमाग नवरोजी आले टिफीन बॅग घेऊन तेव्हा काकूंनी आश्र्चर्यचकित होऊन विचारले “अगं, इतक्या लवकर सकाळी उठून तू टिफीन बनवला?” मी म्हणाले ” हो काकू, रोज दोघांचाही टिफीन बनवून निघते मी.” त्यावर त्या म्हणाल्या”अगं, मला वाटायचे तुला काही बनवता येत नाही, बाहेरच जेवत असाल तुम्ही. आमची सुनबाई तर अजून उठलीही नाही तू स्वयंपाक करून सगळं आवरून ६ वाजता ऑफिसला निघाली, खरंच विश्वास बसत नाही आहे गंं माझा. मी असं समजायचे की शिकलेल्या, नोकरी करणारर्‍या, जीन्स घालणार्‍या मुलींना घरची जबाबदारी, संसार नीट जमत नसेल पण तुला बघुन माझा गैरसमज दूर झाला बघ.” काकूंच्या बोलण्यावरून मनात विचार आला ” रहाणीमान, कपडे यावरून एखाद्याचं व्यक्तीमत्व ठरवणे खरंच योग्य आहे का.

    ती माॅडर्न कपडे घालते , टिकली लावत नाही, मंगळसूत्र, जोडवे घालत नाही, अशा अनेक गोष्टींवरून व्यक्तीमत्व ठरवणे, सत्य परिस्थिती माहीत नसताना व्यक्तीला समजून न घेता नावं ठेवणे कितपत योग्य आहे.

    कसे राहावे, काय घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्त्येकाच्या घरच्यांच्या आवडीनिवडीनुसार , परीस्थितीवर ते अवलंबून आहे. वरवर पाहता कुणाला हिणवणे, संस्कार काढणे खरंच खूप चुकीचं आहे.

    कुठल्या वेळी काय घालायचं, कुठल्या पोषाखात आपण कम्फरटेबल आहोत हा विचार करून स्वत: त्या व्यक्तीला ते कळत असेल तर इतरांनी त्यावर चर्चा करणे खरंच योग्य नाही.

    याविषयी प्रत्त्येकाचे मत वेगळे असू शकतात. कुणालाही दुखावण्याचा हेतू नसून केवळ कपड्यांवरून कुणाचेही व्यक्तीमत्व, संस्कार ठरवणे अयोग्य आहे हाच मूळ उद्देश.
    तुमचे याविषयीचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा.
    © लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. पोस्ट शेअर करताना नावासकट शेअर करावी.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • आई- मातृदिन विशेष

    आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते.

    सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार आई सकाळी सगळ्यात आधी उठून डबा बनवते, ती घरी असली तरी वेळेत सगळं तयार ठेवण्याची जबाबदारी तिची असतेच.

    आई नोकरी करणारी असेल तरी तिची ही जबाबदारी चुकत नाही.

    मुलं जशजशी मोठी होतात त्यानुसार त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-बाबा दोघांची असली तरी त्यात आईचा मोलाचा वाटा असतो.

    मुलं वयात येऊ लागली की मुलांना मैत्रीण बनून समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे अशा अनेक जबाबदारी आई तत्परतेने सांभाळत असते. या सगळ्यात घरातील प्रत्येकाची काळजी तिला असतेच. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सगळी काळजी आईला, पण ती आजारी असेल तर सगळ्यांची दिनचर्या विस्कटून जाते.

    आई हा प्रत्येक घराचा आधार स्तंभ असते, तिच्याशिवाय घरातील प्रत्येकजण अपुर्ण असतो.

    तरुण वयात‌ तसेच लग्नानंतर मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई. मनातलं सगळं आई जवळ सांगितले की मन कसं हलकं वाटतं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना तिचे मार्गदर्शन नेहमी महत्वाचे ठरते. घरात काय आहे काय नाही‌ याची यादी, इस्रीवाला, दूधवाला, कामवाली अशे घरातले बाहेरचे सगळे मॅनेजमेंट खाते आईकडेच असते.

    आईची भूमिका ही आयुष्यभर संपत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्या असह्य कळा सहन करत आई बाळाला जन्म देते, बाळासाठी अनेक रात्री जागून काढते. आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखे जपते. मुलं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांच्या मागे ती उभी असते, मुलांचे जीवन सुरळीत चालू आहे हे बघून ती आनंदात असते. शेवटपर्यंत तिला आपल्या मुलांची काळजी असते, कशाचीही अपेक्षा न ठेवता ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत: उपाशी राहीन पण ती घरात सगळ्यांना पोटभर खाऊपिऊ घालण्यासाठी धडपडत असते.

    बाबांच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी ती जपते, त्यांच्या गरजा पूर्ण करते.

    ती आयुष्यात स्वत: साठी खूप कमी जगते, तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती घरात सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.

    ते म्हणतात ना”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ते खरेच आहे. आईविना आयुष्य अपूर्ण आहे. आईची माया, तिची भूमिका दुसरा कुणीच साकारू शकत नाही. आई या शब्दात खरंच खूप भावना दडलेल्या आहेत.

    आईची महती जितकी लिहिली तितकी कमीच आहे.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

    सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे. 

    ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट.

    तो : एक काम कर, ती किट ठेव जरा वेळ बाजूला आणि झोप. उठल्यावर बघू आपण परत. आता तरी मला एकच लाइन दिसते आहे.

    एवढे बोलून त्याने तिला झोपवले आणि तो परत झोपी गेला. 

    काही वेळाने तो उठला आणि बघतो तर ती अजूनही किट कडे कटाक्षाने बघत बसलेली.

    त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि किट कडे बघितले तर त्याला सुद्धा दुसरी अंधुक लाईन दिसत होती.

    त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आनंदाची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. Gynaecologist कडे जाऊन गुड न्यूज ची खात्री करून घ्यायची असे ठरले. रविवार असल्याने दोघंही जरा निवांत होते. 

    आता दोघांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्याने लगेच Gynaec ची अपॉइंटमेंट घेतली.

    ठरलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन check up केला, डाॅक्टरांनी ती आई‌ होणार असल्याचे सांगितले आणि काही आवश्यक सुचना दिल्या. तो अतिशय लक्ष देऊन सगळं ऐकत होता, ती मात्र आनंदाच्या भरात दुसरीकडेच हरवली होती, चेहऱ्यावर एक स्मीत करत वेगळ्याच विश्वात रमली होती. 

    ठिक आहे, Again Congratulations and take care या डॉक्टरांच्या वाक्याने ती हरवलेल्या विश्वातून बाहेर आली. 

    दोघेही खूप आनंदात होते, घरी येतांच त्याने तिला हळूवारपणे मिठी मारली. त्या मिठीत तिला एक काळजी, होणार्‍या बाळाचे जबाबदार वडील अशा अनेक भावना जाणवल्या. 

    आई जवळ आणि सासुबाई जवळ ही आनंदाची बातमी कधी एकदा शेअर करते असं तिला झालं. आईला बातमी सांगितली त्याच क्षणापासून आईची काळजी, काय करायचे काय नाही करायचे अशी सूचनांची यादी यायला सुरुवात झाली. आई आणि सासूबाई दोघिंनीही सांगितले की लगेच ही बातमी कुणाला सांगू नकोस. सुरवातीला तीन महिने गर्भ अगदी नाजूक अवस्थेत असतो, त्यामुळे पुर्णपणे विकास होईपर्यंत कुणाला सांगत नसतात. 

    नंतर Bike वर जाणं बंद झाले आणि त्याऐवजी कार चा वापर सुरू झाला. शक्यतो bike ने कुठे जाणे या अवस्थेत टाळलेले बरे असते, गेले तरी दोन पाय दोन्ही कडे टाकून न बसता एका बाजूला बसून जावे. दररोज आॅफिसला नवर्‍यासोबत जाताना दोन पाय दोन्ही बाजूला टाकून बसून जाण्याने आणि धक्क्यांमुळे एका मैत्रिणीची गर्भपिशवी चौथ्या महिन्यांतच ओपन झालेली आणि पुढे बाळ होत पर्यंत मग complete bed rest. त्यामुळे सहसा ते टाळलेले बरे. 

    आहारात आता फळं, शक्य ते पौष्टिक पदार्थ असे बदल झाले. सुरवातीला दोन महिने काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र भयंकर मळमळ, उलटी, थकवा यांनी घेरले. काही खाल्लं की उलटी होणार, कशाचाही वास नको नको वाटायचा. अन्न तर नकोच वाटायचे पण बाळाचा विचार करून जे खावं वाटले ते बिंदास खायचं असं ठरवलं. 

    Papaya, pineapple आणि Chinese food सोडलं तर बाकी जे खावं वाटले ते बिंदास पण प्रमाणात खाल्ले. Papaya, pineapple आणि Chinese food या अवस्थेत खायला चालत नाही पण बाकी कशानेही काही अपाय नसतो याची खात्री पटली. अर्थात सगळे पोषक रस पोटात गेलेले चांगले असतात मग ते गोड, आंबट, कडू अशे कुठलेही असो.  

    गरोदरपणाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण ही नैसर्गिक अवस्था असते, आजारपण नाही हे लक्षात घेऊन नीट काळजी घेणे आवश्यक असते. बाळाचा पूर्ण विकास आईच्या खाण्यापिण्यावर आणि तिच्या दिनचर्येवर अवलंबून असतो, त्यासाठी योग्य काळजी घेतली तर कधीही चांगले. हंगामी फळे, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. 

    खूप कर्कश आवाज, जास्त हळव्या करणारे कार्यक्रम अशा गोष्टी टाळाव्यात. जितकं आनंदात राहता येईल तितके चांगले. योग्य आराम, व्यायाम, चांगले साहित्य वाचन केले की मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते, या अवस्थेत अशी दिनचर्या पाळली तर फायद्याचे ठरते.

    तब्येत बरी नसली तरी आई होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता मनात, माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल. या सगळ्यात पाचवा महिना संपत आला तेव्हा मळमळ उलटी थकवा दूर झाल्यासारखा वाटला, तब्येतीत सुधारणा झाली, बाळाची हालचाल सुरू झाली. बाळाची पहिली हालचाल पोटात जाणवली तो क्षण तर शब्दात मांडता येणार नाही. हळूहळू बाहेर सगळ्यांना पोटाच्या वाढत्या आकारावरून गुड न्यूज असल्याचे जाणवायला लागले. 

    या अवस्थेत सगळे किती काळजी घेतात, नवरा तर अगदी फुलाप्रमाणे जपतो, काय हवं नको ते अगदी समोर नाव काढताच हजर. 

    जसजसा पोटाचा आकार वाढत गेला तशा बाथरूमच्या चकरा वाढल्या. नऊ महिने कसे भराभर गेले, सातव्या महिन्यात ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला, छान फोटोशूट केले, अगदी आनंदात हे दिवस गेले. 

    पाच ते सात महिन्यांच्या कालावधीत अगदी छान वाटत होते. आठवा महिना सुरू झाला आणि नंतर शरीर जड वाटायला लागले, पायावर जरा सुज यायला सुरुवात झाली ,जास्त वेळ बसून नको वाटायचे त्यामुळे मध्ये जरा चालायचे. या दिवसांत जितके जास्त चालायला जमेल तितकं चांगलं पण ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते पण पोटाचा वाढलेला घेर सांभाळून झोपताना जरा त्रास हा होतोच. 

    या पुर्ण अनुभवात जेव्हा सोनोग्राफी मध्ये बाळाला आपण बघतो तो क्षण किती गोड असतो. कधी एकदा बाळ बघायला मिळते असं वाटतं. 

    सगळ्या गोष्टी अनुभवताना दिवस भराभर गेले, जसजसा बाळ होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत होती तसतशी मनात हुरहूर, अनेक प्रश्न, एक भिती अशी गोंधळलेली अवस्था झाली होती. 

    अचानक काही त्रास झाला आणि ट्राफीक मध्ये अडकले तर काय, कळा नक्की कशा येतात, बाळ होताना खूप त्रास होईल का, मला सहन होईल का अशा अनेक शंका मनात असतात पण मनाची तयारी, बाळाच्या आगमनाची उत्सुकता यामुळे आपण खूप strong होत जातो. 

    बघता बघता वेळ आली बाळ होण्याची, २४ तास Labour Room मध्ये कळा , OT मधल्या वेदना सहन करून एक गोंडस परी आमच्या आयुष्यात आली. मनापासून वाटायचे मला मुलगी व्हावी, तिला बघून एका क्षणात सगळ्या वेदनांचा विसर पडला. दोघेही खूप खुप आनंदी झालो.

    आई होण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, प्रत्येकाची गरोदरपणातील अवस्था, अनुभव हा वेगळा असतो. त्यासाठी योग्य काळजी, आनंदी मन , संयम खूप आवश्यक आहे. 

    – अश्विनी कपाळे गोळे

  • Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव

        आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते.

    अशा या सुंदर अनुभवात breast Abscess सारखी समस्या आली की तो अनुभव अतिशय painful असतो, आई आणि बाळ दोघांनाही या गोष्टीचा त्रास होतो. असाच एक painful अनुभव मी शेयर करते आहे.

    बाळासोबत छान वेळ घालवताना भराभर दिवस जात होते. एक दिवस अचानक सकाळी उजव्या Breast मध्ये दुखायला लागले, अंगात ताप आलेला होता. गरगरल्या सारखे वाटत होते, मळमळ आणि उलटी सुद्धा सुरू होती. अचानक अशे काय झाले कळायला मार्ग नव्हता कारण बाळंतपण झाल्यामुळे घरीच, बाहेर जाणं, बाहेर खाणं सगळं बंद. माझी मुलगी तेव्हा फक्त चार महिन्यांची, मला क्षणभरही सोडून वेगळी कधी नव्हतीच.

    वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी सासरी खेडेगावात खूप काही तज्ज्ञ डॉक्टर नव्हते आणि शहर अगदी दहा किलोमीटर अंतरावर असले तरी उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात बाळाला सोडून अथवा घेऊन जाणं जरा कठीणच वाटले. गावातील डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या म्हणण्यानुसार उन्हामुळे असं झालं आहे हे सांगून त्यांनी ताप कमी होण्यासाठी औषधे दिली आणि आराम करण्याचे सुचवले. Breast मध्ये दुखत होते त्यासाठी जरा शेक देऊन मालीश करायला सांगीतले. सांगितल्या प्रमाणे पाच दिवस औषध आणि बाकी काळजी घेतली पण त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला. अचानक आहारात बदल झाला, जेवणाची इच्छा होत नव्हती पण बाळासाठी म्हणून जेवण सुरू होते. कदाचित ताप असल्यानं असं होतं आहे असे समजून आठवडा गेला आणि आम्ही आमच्या घरी पुण्यात आलो. प्रवासानंतर रात्री अंगात परत खूप ताप भरला, अशक्त वाटू लागले. स्तनातील वेदना वाढत होत्या, ताप आणि त्या वेदना यामुळे रात्र जागून काढली. सकाळी लगेच Gynaec कडे गेले, तपासणी केल्यानंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे अंगात ताप आलेला आहे. त्यासाठी अॅंटीबायोटिक्स दिली आणि स्तनात गाठ जाणवत असल्याने स्तनाचे स्कॅनींग करायला सांगीतले. पुढचे पाच दिवस औषध घेत असताना वेदना कमी होत नव्हत्या त्यामुळे स्कॅनींग करायचे ठरले. 

    स्कॅनींगमध्ये कळाले की स्तनामध्ये गाठ होऊन पस सुद्धा झालेला आहे. त्यामुळे स्तनावर लालसरपणा आला असून अंगात ताप आहे. स्कॅनींगचे रीपोर्ट ब्रेस्ट स्पेशालीस्टला दाखवताच तिने आॅपरेशन करून लवकरात लवकर पस काढण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आॅपरेशन करायचे ठरले. या सगळ्यात माझ्या सोबत बाळालाही त्रास सहन करावा लागत होता. माझ्या दुखण्यामुळे तिला लवकरच फाॅर्मुला मिल्क सारखे टॉप फिडींग सुरू करावे लागले.

    वेळ न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळी मी आॅपरेशन साठी हाॅस्पीटलला दाखल झाले. या सगळ्यात माझ्या मनात सतत विचार येत होता तो म्हणजे मला स्तनांचा कर्करोग तर झाला नसेल. मला काही झाले तर माझ्या बाळाचं कसं होणार. डॉक्टर समजूत काढत असली तरी मला मात्र अशा अनेक वाईट विचारांनी घेरले होते, पहील्यांदाच मी आणि माझं बाळ एकमेकींपासून वेगळे राहणार होतो. मी २४ तास हाॅस्पीटलला असताना माझ्या बाळाची काळजी मला जास्त त्रास देत होती. 

    तिची सुद्धा वेगळी अवस्था नव्हती, सतत रडून मला माझी आई पाहिजे या भावनेने ती सगळीकडे मला शोधत होती.

    ठरल्याप्रमाणे आॅपरेशन झाले, इन्फेक्शन परत होऊ नये म्हणून अशा केस मध्ये टाके देत नाही, त्यामुळे पाच ते सहा आठवडे जखम भरून येईपर्यंत ड्रेसिंग करावे लागणार होते. जखमेतला पस तपासणीसाठी पाठविण्यात आला, सुरवातीला जखम मोठी आणि खोल असल्याने दररोज ड्रेसिंग करताना तिव्र वेदना व्हायच्या. माझ्या साठी हा एक अतिशय वेदनादायी अनुभव होता.

    या तीन आठवड्यात वजन अचानक पाच किलो कमी झाले. अशक्तपणा आला, बाळ माझ्यावर अवलंबून असल्याने स्वत: कडे मी आता नीट लक्ष देऊ लागली. पस तपासणीनंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात झाले त्यासाठी दहा दिवस दररोज दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार. पस रिपोर्ट वरून ब्रेस्ट अॅब्सेस आणि कॅन्सर यामध्ये फरक आहे, हे मला डॉक्टरांनी पटवून दिले तेव्हा मला खात्री पटली.

    सतत हाॅस्पीटलच्या चकरा मारून वैताग आला होता पण अर्थातच काही पर्याय नव्हता.

     या सगळ्यात बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न सुरू होते. हळूहळू जखम भरून येत होती, तब्येतीत सुधारणा होत गेली. या सगळ्यात माझ्या दुखण्यामुळे घरी सगळ्यांनाच मानसिक, शारीरिक त्रास होत होता. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, औषधे न मिळाल्याने तसेच स्तनातील वेदनांकडे दुर्लक्ष झाल्याने माझ्यावर ही वेळ आली होती. 

    स्तनात दूध साठू नये म्हणून काळजी घेणे किती आवश्यक आहे हे मला जाणवत होते. 

    माझ्या अनुभवावरून मी नविन आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की स्तनामध्ये दुध साठवून राहणार नाही याची काळजी घ्या, काहीही त्रास झाला तर दूर्लक्ष न करता त्वरीत उपचार करून घ्या.

    -अश्विनी कपाळे गोळे