Tag: आईपण

  • स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

    ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.

    आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.

    ईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.

    वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले , 

    ” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”

    ईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न. 

    अमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची. 

    दोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.

    त्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”

    ईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”

    आताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा. 

    मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”

    कसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता. 

    नोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं. 

    तिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.

      

    आज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं. 

    ईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला, 

    “आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”

    टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण  स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला. 

    खरंच विचार करण्याजोगे आहे नाही का?

    ईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आई- मातृदिन विशेष

    आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते.

    सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार आई सकाळी सगळ्यात आधी उठून डबा बनवते, ती घरी असली तरी वेळेत सगळं तयार ठेवण्याची जबाबदारी तिची असतेच.

    आई नोकरी करणारी असेल तरी तिची ही जबाबदारी चुकत नाही.

    मुलं जशजशी मोठी होतात त्यानुसार त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-बाबा दोघांची असली तरी त्यात आईचा मोलाचा वाटा असतो.

    मुलं वयात येऊ लागली की मुलांना मैत्रीण बनून समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे अशा अनेक जबाबदारी आई तत्परतेने सांभाळत असते. या सगळ्यात घरातील प्रत्येकाची काळजी तिला असतेच. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सगळी काळजी आईला, पण ती आजारी असेल तर सगळ्यांची दिनचर्या विस्कटून जाते.

    आई हा प्रत्येक घराचा आधार स्तंभ असते, तिच्याशिवाय घरातील प्रत्येकजण अपुर्ण असतो.

    तरुण वयात‌ तसेच लग्नानंतर मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई. मनातलं सगळं आई जवळ सांगितले की मन कसं हलकं वाटतं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना तिचे मार्गदर्शन नेहमी महत्वाचे ठरते. घरात काय आहे काय नाही‌ याची यादी, इस्रीवाला, दूधवाला, कामवाली अशे घरातले बाहेरचे सगळे मॅनेजमेंट खाते आईकडेच असते.

    आईची भूमिका ही आयुष्यभर संपत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्या असह्य कळा सहन करत आई बाळाला जन्म देते, बाळासाठी अनेक रात्री जागून काढते. आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखे जपते. मुलं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांच्या मागे ती उभी असते, मुलांचे जीवन सुरळीत चालू आहे हे बघून ती आनंदात असते. शेवटपर्यंत तिला आपल्या मुलांची काळजी असते, कशाचीही अपेक्षा न ठेवता ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत: उपाशी राहीन पण ती घरात सगळ्यांना पोटभर खाऊपिऊ घालण्यासाठी धडपडत असते.

    बाबांच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी ती जपते, त्यांच्या गरजा पूर्ण करते.

    ती आयुष्यात स्वत: साठी खूप कमी जगते, तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती घरात सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.

    ते म्हणतात ना”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ते खरेच आहे. आईविना आयुष्य अपूर्ण आहे. आईची माया, तिची भूमिका दुसरा कुणीच साकारू शकत नाही. आई या शब्दात खरंच खूप भावना दडलेल्या आहेत.

    आईची महती जितकी लिहिली तितकी कमीच आहे.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

    सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे. 

    ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट.

    तो : एक काम कर, ती किट ठेव जरा वेळ बाजूला आणि झोप. उठल्यावर बघू आपण परत. आता तरी मला एकच लाइन दिसते आहे.

    एवढे बोलून त्याने तिला झोपवले आणि तो परत झोपी गेला. 

    काही वेळाने तो उठला आणि बघतो तर ती अजूनही किट कडे कटाक्षाने बघत बसलेली.

    त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि किट कडे बघितले तर त्याला सुद्धा दुसरी अंधुक लाईन दिसत होती.

    त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आनंदाची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. Gynaecologist कडे जाऊन गुड न्यूज ची खात्री करून घ्यायची असे ठरले. रविवार असल्याने दोघंही जरा निवांत होते. 

    आता दोघांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्याने लगेच Gynaec ची अपॉइंटमेंट घेतली.

    ठरलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन check up केला, डाॅक्टरांनी ती आई‌ होणार असल्याचे सांगितले आणि काही आवश्यक सुचना दिल्या. तो अतिशय लक्ष देऊन सगळं ऐकत होता, ती मात्र आनंदाच्या भरात दुसरीकडेच हरवली होती, चेहऱ्यावर एक स्मीत करत वेगळ्याच विश्वात रमली होती. 

    ठिक आहे, Again Congratulations and take care या डॉक्टरांच्या वाक्याने ती हरवलेल्या विश्वातून बाहेर आली. 

    दोघेही खूप आनंदात होते, घरी येतांच त्याने तिला हळूवारपणे मिठी मारली. त्या मिठीत तिला एक काळजी, होणार्‍या बाळाचे जबाबदार वडील अशा अनेक भावना जाणवल्या. 

    आई जवळ आणि सासुबाई जवळ ही आनंदाची बातमी कधी एकदा शेअर करते असं तिला झालं. आईला बातमी सांगितली त्याच क्षणापासून आईची काळजी, काय करायचे काय नाही करायचे अशी सूचनांची यादी यायला सुरुवात झाली. आई आणि सासूबाई दोघिंनीही सांगितले की लगेच ही बातमी कुणाला सांगू नकोस. सुरवातीला तीन महिने गर्भ अगदी नाजूक अवस्थेत असतो, त्यामुळे पुर्णपणे विकास होईपर्यंत कुणाला सांगत नसतात. 

    नंतर Bike वर जाणं बंद झाले आणि त्याऐवजी कार चा वापर सुरू झाला. शक्यतो bike ने कुठे जाणे या अवस्थेत टाळलेले बरे असते, गेले तरी दोन पाय दोन्ही कडे टाकून न बसता एका बाजूला बसून जावे. दररोज आॅफिसला नवर्‍यासोबत जाताना दोन पाय दोन्ही बाजूला टाकून बसून जाण्याने आणि धक्क्यांमुळे एका मैत्रिणीची गर्भपिशवी चौथ्या महिन्यांतच ओपन झालेली आणि पुढे बाळ होत पर्यंत मग complete bed rest. त्यामुळे सहसा ते टाळलेले बरे. 

    आहारात आता फळं, शक्य ते पौष्टिक पदार्थ असे बदल झाले. सुरवातीला दोन महिने काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र भयंकर मळमळ, उलटी, थकवा यांनी घेरले. काही खाल्लं की उलटी होणार, कशाचाही वास नको नको वाटायचा. अन्न तर नकोच वाटायचे पण बाळाचा विचार करून जे खावं वाटले ते बिंदास खायचं असं ठरवलं. 

    Papaya, pineapple आणि Chinese food सोडलं तर बाकी जे खावं वाटले ते बिंदास पण प्रमाणात खाल्ले. Papaya, pineapple आणि Chinese food या अवस्थेत खायला चालत नाही पण बाकी कशानेही काही अपाय नसतो याची खात्री पटली. अर्थात सगळे पोषक रस पोटात गेलेले चांगले असतात मग ते गोड, आंबट, कडू अशे कुठलेही असो.  

    गरोदरपणाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण ही नैसर्गिक अवस्था असते, आजारपण नाही हे लक्षात घेऊन नीट काळजी घेणे आवश्यक असते. बाळाचा पूर्ण विकास आईच्या खाण्यापिण्यावर आणि तिच्या दिनचर्येवर अवलंबून असतो, त्यासाठी योग्य काळजी घेतली तर कधीही चांगले. हंगामी फळे, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. 

    खूप कर्कश आवाज, जास्त हळव्या करणारे कार्यक्रम अशा गोष्टी टाळाव्यात. जितकं आनंदात राहता येईल तितके चांगले. योग्य आराम, व्यायाम, चांगले साहित्य वाचन केले की मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते, या अवस्थेत अशी दिनचर्या पाळली तर फायद्याचे ठरते.

    तब्येत बरी नसली तरी आई होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता मनात, माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल. या सगळ्यात पाचवा महिना संपत आला तेव्हा मळमळ उलटी थकवा दूर झाल्यासारखा वाटला, तब्येतीत सुधारणा झाली, बाळाची हालचाल सुरू झाली. बाळाची पहिली हालचाल पोटात जाणवली तो क्षण तर शब्दात मांडता येणार नाही. हळूहळू बाहेर सगळ्यांना पोटाच्या वाढत्या आकारावरून गुड न्यूज असल्याचे जाणवायला लागले. 

    या अवस्थेत सगळे किती काळजी घेतात, नवरा तर अगदी फुलाप्रमाणे जपतो, काय हवं नको ते अगदी समोर नाव काढताच हजर. 

    जसजसा पोटाचा आकार वाढत गेला तशा बाथरूमच्या चकरा वाढल्या. नऊ महिने कसे भराभर गेले, सातव्या महिन्यात ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला, छान फोटोशूट केले, अगदी आनंदात हे दिवस गेले. 

    पाच ते सात महिन्यांच्या कालावधीत अगदी छान वाटत होते. आठवा महिना सुरू झाला आणि नंतर शरीर जड वाटायला लागले, पायावर जरा सुज यायला सुरुवात झाली ,जास्त वेळ बसून नको वाटायचे त्यामुळे मध्ये जरा चालायचे. या दिवसांत जितके जास्त चालायला जमेल तितकं चांगलं पण ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते पण पोटाचा वाढलेला घेर सांभाळून झोपताना जरा त्रास हा होतोच. 

    या पुर्ण अनुभवात जेव्हा सोनोग्राफी मध्ये बाळाला आपण बघतो तो क्षण किती गोड असतो. कधी एकदा बाळ बघायला मिळते असं वाटतं. 

    सगळ्या गोष्टी अनुभवताना दिवस भराभर गेले, जसजसा बाळ होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत होती तसतशी मनात हुरहूर, अनेक प्रश्न, एक भिती अशी गोंधळलेली अवस्था झाली होती. 

    अचानक काही त्रास झाला आणि ट्राफीक मध्ये अडकले तर काय, कळा नक्की कशा येतात, बाळ होताना खूप त्रास होईल का, मला सहन होईल का अशा अनेक शंका मनात असतात पण मनाची तयारी, बाळाच्या आगमनाची उत्सुकता यामुळे आपण खूप strong होत जातो. 

    बघता बघता वेळ आली बाळ होण्याची, २४ तास Labour Room मध्ये कळा , OT मधल्या वेदना सहन करून एक गोंडस परी आमच्या आयुष्यात आली. मनापासून वाटायचे मला मुलगी व्हावी, तिला बघून एका क्षणात सगळ्या वेदनांचा विसर पडला. दोघेही खूप खुप आनंदी झालो.

    आई होण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, प्रत्येकाची गरोदरपणातील अवस्था, अनुभव हा वेगळा असतो. त्यासाठी योग्य काळजी, आनंदी मन , संयम खूप आवश्यक आहे. 

    – अश्विनी कपाळे गोळे

  • इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा

    तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”
    आई म्हणाली “बरं, तुला हवा तो क्लास लावून देते, आता वेळ आहे तुझ्याकडे. शिकून होईल आणि वेळही जाईल तुझा. सध्या खूप काम आहे गंं, सुट्टी नाही मिळणार मला. तरी बघूया काही दिवसांनी, तोपर्यंत तू स्विमींग, डान्सिंग, जे काही शिकायचे ते शिकून घे.”
    तनूचा इवलासा चेहरा पाहून आईला मनातून वाईट वाटले आणि मनात विचार आला की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीची किती आतुरतेने वाट बघायचो आपणं, किती मज्जा करायचो.
    सुट्टी सुरू झाली की मामाच्या गावाला कधी कधी जाणार ही‌ घाई असायची, कारण तिथे मज्जा सुद्धा तशीच यायची. सगळे भावंडे एकत्र येणार, मामा मामी, मावशी ‌काका, आजी आजोबां कडून मस्त लाड पुरवले जायचे. सकाळ‌ पासून रात्र कशी झाली कळायला वेळ नसायचा. सगळी भावंडं एकत्र जमली की‌ नुसतीच मज्जा. एकमेकांच्या खोड्या काढत, मनसोक्त खेळत,‌ छान छान खाऊन कुठे दिवस जायचा कळत नव्हतं.
    विहीरीत पोहायला जायचं, ज्यांना अजून पोहता येत नाही त्यांच्या पाठीला भोपळा किंवा जूना‌ टायर बांधून मामा,‌मोठी भावंडे पोहायला शिकवायचे. मनसोक्त पोहून झालं की‌ मस्त भूक लागायची मग मामींच्या ,‌आजीच्या हातचे नवनवीन पदार्थ, शेतातल्या ताज्या कैरी,‌आंबे अगदी नैसर्गिक रित्या आलेले सगळं खाण्याचा मोह आवरायचा नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत अंगणात, घरात इकडे तिकडे भटकायच, मनसोक्त खेळत मज्जा मस्ती करायची. त्यात भर दुपारी सायकलवरून कुल्फी वाला, आइस कॅंडी वाला यायचा मग सगळी बच्चे कंपनी त्याच्या भोवती गोळा, मला‌ ही कुल्फी, मला‌ लाल आइस कॅंडी, मला‌ हे मला‌ ते…काय मज्जा यायची नाही त्यात. कधी मग भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे‌ लग्न, त्यात आजी मग खाऊ बनवून देणार, कधी कबड्डी, कधी खो-खो, घरभर पळत लपाछपी, मातीचा खेळ, लगोरी अगदी उत्साहात खेळ रंगाचे. कधी बैलगाडीची सफर असायची. पूर्ण वर्षभराचा‌ रिचार्ज केल्यासारखे वाटायचे. भावंडांची भांडणे, त्यांचं प्रेम , चिडवाचीडवी यामुळे त्यांचं नातंही तितकंच घट्ट व्हायचं.
    खाण्या पिण्याची मज्जा, खेळण्यातील मौजमस्ती, मोठ्यांचा एक वेगळाच अनुभव, गप्पा गोष्टी, पापड , शेवया , वाळवणी पदार्थ बनवायची त्यांची वेगळी मज्जा.
    रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर किंवा अंगणात गादी टाकून सगळे झोपायचो आणि आकाशातील तार्‍यांची मज्जा बघायची, चंद्राची लपाछपी‌ बघायची, आजी मग छान छान गोष्टी सांगणार ते ऐकत झोपायचो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात.
    ही सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं. त्यात घरी कुणाचं लग्न‌ जर असेल मग तर विचारायलाच नको, सगळीकडे आनंदीआनंद…
    भेटीसाठी होऊन एकत्र वेळ घालवून नात्यांमधला गोडवा टिकून राहायचा, सुखदुःख वाटले जायचे, एकमेकांची ओढ वाटायची.
    हल्ली शहरांमध्ये नोकरी करताना‌, शहर असो किंवा ग्रामीण भाग ही सगळी मज्जा कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. आई‌ वडील इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग इंटरनेट‌ मुलांचा‌ मित्र बनतो, मोबाईल, टिव्ही, व्हिडिओ गेम यामुळे मामाच्या गावाला जी मज्जा यायची ती खरंच  हरवली आहे. नात्यात एक दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब, फोन वरून औपचारिक बोलून ती आधी सारखी आपुलकी, नात्यातला‌ जिव्हाळा कुठे तरी हरवला आहे. आई‌ वडीलांना‌ वेळ नसतो मग‌ मुलांना‌ मनासारखी सुट्टी अनुभवता येत नाही. या वेळी समर‌ कॅम्प, या वेळी हा क्लास असा अगदी टाइमटेबल ठरलेला असतो, त्यात जो‌ वेळ मिळेल तो मग इंटरनेटवर गेम, टिव्ही,‌मोबाइल. यामुळे मग मुलांनाही नात्यात ओढ वाटत नाही, आई बाबा कामात, भावंडे असली तरी मोबाईल गेम मध्ये व्यस्त. सुट्टीच्या दिवशी फार फार तर सिनेमा, माॅलमध्ये फिरायला जायचं. काही दिवस सुट्टी मिळालीच तर मग जवळपास कुठे फिरून यायचं अशी हल्ली सुट्टी संपते पण त्यात पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा नसते.
    खरंच वाईट वाटत‌ं ना विचार करून. म्हणूनच मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवून त्यांना वेळ देण्याची गरज आहे, आजोळी काही दिवस घालवले, घरातल्या घरात न राहता बाहेर मनसोक्त खेळू दिले, मुलांना जबरदस्तीने व्यस्त ठेवण्यासाठी क्लास न लावता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देऊन हवं ते शिकू दिले, आवडीची‌ गोष्टींची पुस्तकं दिली तर त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लक्षात राहील. ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    तुमच्या लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा

    शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..????”.
    आई मनात पुटपुटली “तुमची मज्जा..आमची सजा..?..बरं आता मस्त फ्रेश होऊन ये..आराम कर जरा‌ वेळ..”
    नेहमी फ्रेश हो म्हणत ‌अर्धा तास जायचा, आज‌ मात्र पाच मिनिटांत मॅडम कपडे बदलून फ्रेश होऊन तयार.
    निधी- “आई, माझा‌ व्हिडिओ गेम कुठे आहे गंं, तू म्हणाली होतीस परिक्षा संपली की काढू.”
    आई – “अगं, आताच घरी आलीस, जरा खाऊन घे, आराम कर..दोन‌ महिने आहेत खेळायला.”
    निधी – ” नको आज आम्हाला शाळेत स्नॅक्स होता ना, भूक नाही.. झोप पण नाही आली..सांग ना‌ कुठे आहे व्हिडिओ गेम.. “
    आई – ” बाबा आल्यावर काढायला‌ सांगते रात्री..आता‌ नको..”
    निधी – “असं ‌काय करतेस गं, तूच म्हणाली होती परिक्षा संपली की काढू..बरं मग मी रिमा कडे जाऊ खेळायला..”
    आई‌ – ” अगं, सायंकाळी जा‌ खेळायला..आता‌ जरा आराम कर..”
    निधी – ” काय गं आई‌ ..हे नको ते नको.. सुट्टीची मजा घेऊ‌ दे मला. “
    नंतर निधी‌ टिव्हीवर कार्टून बघत बसलेली…
    आई – ” निधी जरा आवाज कमी करशील का टिव्ही चा..”
    आईच्या डोक्यात विचार आला.. आजच सुट्टी सुरू झाली की इतका गोंधळ.. पुढचे दोन महिने काही खरं नाही..
    रात्री बाबा घरी आल्यावर तर विचारायलाच नको..आई‌ जेवायला‌ आज हे बनव.. नाश्त्याला ते बनव.. सकाळी आईची‌ ड्युटी स्विमींग ला‌ घेऊन जाणे..नंतर घरकाम..बाहेर उन्हामुळे ‌दिवसभर घरात टिव्हीचा, व्हिडिओ गेमचा आवाज..सोबत कुणी ना कुणी मित्र मैत्रिणी..मग निधीच्या खाण्या पिण्याच्या डिमांड.. एक मिनिट दुपारी आराम नाही..
    पूर्ण घर डोक्यावर घेऊन निधी सुट्टीचा‌ पुरेपूर आनंद घेत होती.
    सायंकाळी पाच वाजले की‌ एक सेकंद इकडे तिकडे न होऊ देता खेळायला बाहेर.. नंतर सात वाजले तरी घरात यायचं नावं नाही..
    घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण झाले की बाबांसोबत मस्ती.. दोघांची बडबड..बाबा दिवसभर घरी नसतात‌ मग आल्यावर काय करू नी काय नको…आई मात्र कधी एकदा जाऊन झोपते अशा विचारात..
    निधी शाळेत गेली की ‌आईला‌ जरा‌ स्वतः साठी वेळ मिळायचा.. घरातील काम आवरले जायचे..आता‌ मात्र दिवसभर आईचे काम काही संपत नाहीत.. त्यात निधी मॅडम‌ रात्री सुद्धा लवकर झोपायचे नावं घेत नाही..आई गोष्टी सांग ना..आताच काय झोपते..बाबा चला ना हे खेळू..ते खेळू..मग निधी आणि बाबांचा लुडो‌, बुद्धीबळ, सापसिडी तर कधी पेंटिंग ‌असा काही ना‌ काही कार्यक्रम उशीरा पर्यंत सुरू.. आईनेही झोपायचे नाही..?
    बाबांनी मग काही दिवस सुट्टी घेतली आणि फिरायला जायचा बेत आखला, तर आठवडाभर आधी निधीची तयारी..आतुरता..तिथे गेल्यावर असं करायचं तसं करायचं.. प्लॅनिंग ची मोठीं यादी तयार आणि आईने ती यादी दररोज ऐकायची.
    आई बिचारी मनात विचार करत बसायची , का शाळेला‌ इतक्या सुट्ट्या देतात.. घरात किती पसारा झालाय.. मैत्रिणींना ही भेटले नाही मी इतक्यात..सगळा वेळ निधीच्या मागे.. निधीची परिक्षा संपली आणि माझी सुरू झाली..?

    निधीच्या आई सारखी सगळ्या आयांची परिक्षा असते, मुलांची उडालेली झोप आणि अर्थातच आईची सुद्धा..दिवस भर घरात गोंधळ.. टिव्हीचा आवाज.. भावंडांची भांडणे.. अरे शांत बसा, भांडू नका अशी आईची कमेंटरी ..नोकरी करणारी आई असेल तर वेगळी काळजी..डे केअर अथवा मावशी जवळ सोडून जात‌ असेल तर सुचनांची यादी.. आईने सुट्टी घ्यावी म्हणून मुलांची चिडचिड..खाण्या पिण्याच्या डिमांड..हा क्लास तो क्लास.. नेऊन सोडा.. घेऊन या.. रात्री उशिरापर्यंत मस्ती.. आणि बरंच काही.. बिचारी थकलेली‌ आई?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..

    “आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता.
    आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.”
    अमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे नेहमी. विनय माझ्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करतो. नंतर पाहिजे तेव्हा सापडत नाही मला. मी नाही देणार, त्याची खेळणी का नाही खेळत तो. आता मी गिटार प्रॅक्टीस करतोय तर त्यालाही तेच पाहिजे आहे.”
    विनय आणि अमन, दोघे भावंडे. विनय अगदी तीन वर्षांचा तर अमन‌ बारा वर्षांचा. अमन समजूतदार , जरा अबोल तर विनय खूप मस्तीखोर. हळूच अमनच्या खोड्या काढायचा आणि काही न झाल्यासारखा दूर पळायचा. दोघांमध्ये जास्त अंतर असल्याने नेहमी दोघांचे भांडण झाले की नेहमी अमनला ओरडा खावा लागायचा, तू मोठा आहेस, विनय अजून लहान आहे, त्याला समजून घे. विनयला वाटायचं आपण काही केले तरी आई बाबा दादाला रागावतात, मग हळूहळू तो या गोष्टीचा बालीश पणे फायदा घ्यायचा.
    सारखं आई बाबांचा ओरडा खाऊन अमन मनातल्या मनात विनयचा राग करायला लागला, त्याला वाटायचं अमन खोड्या करतो आणि ओरडा मी खातो, विनय झाल्यापासून आई बाबा विनय वरच प्रेम करतात‌, काही झाले की मलाच ओरडतात, माझ्यावर आता आई बाबा प्रेमच करत नाही. ही भावना हळूहळू अमनच्या मनात घर करत होती.
    आई बाबांना वाटायचे इतर भावंडा प्रमाणे हे दोघेही भांडतात पण नेहमी अमनला रागविल्याने तो मनात सलते विचार करायला लागला. एकदा बाबा घरी आले तेव्हा दोघेही अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर दोघांचे भांडण बघून घरात येताच बाबा अमनवर ओरडले ” अमन‌ हे काय चाललंय, किती भांडता दोघे, लहान आहेस का तू आता,  उगाच कशाला विनयला त्रास देतो, इतका मोठा झाला तरी अगदी लहान असल्यासारखा वागतो.”
    बाबा रागाच्या भरात बोलून गेले पण अमनच्या मनाला ते खूप खोलवर लागलं. तो त्याच्या खोलीत जाऊन दार बंद करून रडत बसला.
    आईलाही त्याच असं वागणं बघुन अजूनच राग आला, खोलीचं दार वाजवत आई म्हणाली “अमन हा काय वेडेपणा, दार का लावून घेतलंस. उघड दार पटकन आणि ये बाहेर.”
    अमनने रडतच दार उघडले आणि आई-बाबांना रडतच म्हणाला “मी तुमचाच मुलगा आहे ना नक्की… काही झालं की मलाच ओरडता तुम्ही दोघे..विनय किती कुरापती करतो, खोड्या काढतो त्यालाही कधीच रागवत नाही..मला नाही राहायचं इथे..मला हॉस्टेलवर ठेवा मी नको असेल तुम्हाला तर..माझ्यावर कुणाचं प्रेमच नाही..”
    अमनच्या अशा बोलण्याने, वागण्याने आई बाबांना धक्का बसला. बाबांना वाईटही वाटले की आपण असं ओरडायला नको होतं, जरा समजून सांगायला पाहिजे होतं.
    बाबांनी अमनला जवळ घेतले आणि त्याला समजावत म्हणाले ” अमन बेटा, असा का म्हणतो आहेस तू.. अरे आमचं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे..तू इतका समजूतदार आहेस तरी असं म्हणतोय..फक्त तू मोठा आहेस आणि विनय अजून लहान आहे तेव्हा त्याच्याशी नुसतं भांडण न करता दादा म्हणून ते त्याला हक्काने समजून सांग..तू असं चिडलास तर विनय तुझं अनुकरण करून तोही चिडेल.. हट्ट करेल.. त्याच्याशी चिडून न‌‌‌ बोलता, नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणार नाही. मी दमून आलो रे घरी आणि तुम्ही अशे आरडाओरड करताना बघून माझी चिडचिड होणारच ना.. आणि तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला वाढदिवसाला गिटार गिफ्ट दिली असती का..तुला pets आवडतात म्हणून तर आपण टफी (Tuffy – त्यांच्या घरचा पाळीव कुत्रा) घेऊन आलो ना घरी. तेव्हा असा विचार परत करायचा नाहीस..हस बघू आता..”
    आईनेही अमनची समजूत काढली. त्याला पटवून दिले की आई बाबांचं प्रेम हे सारखंच असतं.
    झालेल्या प्रसंगावरून आई बाबांनाही त्यांची चूक लक्षात आली, आपण अमन मोठा आहे तेव्हा त्यानेच समजून घ्यावे, विनय लहान आहे त्याला तितकं कळत नाही म्हणून अमन कडून अपेक्षा ठेवत गेलो पण यामुळे विनय अजून हट्टी आणि खोडकर झाला असून अमनला इतका मोठा गैरसमज झाला , तो दुखावला गेला याचे दोघांनाही वाईट वाटले.
    यापुढे हा लहान हा मोठा असा विचार न करता दोघांनाही चूका‌ केल्यास समजून सांगायच्या असे आई बाबांनी ठरवले शिवाय अशी वेळ परत यायला नको याची पुरेपूर काळजी घेतली.

    भावंडं म्हंटले की छोट्या छोट्या खोड्या काढणे, भांडणे हे आलेच पण त्यावरून मुलांमध्ये एकमेकांविषयी राग, घरात आपल्यावर कुणाचं प्रेम नाही कारण मलाच नेहमी रागावतात ही भावना जास्त प्रमाणात निर्माण झाली तर ते धोक्याचे ठरते. मुलं वयात यायला लागली की त्यांच्यातील शारीरिक मानसिक बदल समजून घेत वर्तणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.

    • अश्विनी कपाळे गोळे
  • ADHD- पाल्यांमधील एक समस्या

    एखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”.
    ADHD नक्की काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.
    ही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरा सुरू करणे, गोष्टी लगेच विसरून जाणे, Hyperactive असणे , Restless होणे अशातच कुणी समजून घेत नसेल तर आक्रमक, नकारात्मक होणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती साधारणतः बालपणापात सुरू होऊन किशोर वयातपर्यंत  दिसून येते. बालक असताना सगळी मुले आजुबाजूच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, मस्ती करतात, एकाग्र नसतात पण जसजसे मुलं मोठी होतात तसं हे सगळं कमी होऊ लागते. काही मुलांमध्ये मात्र अती चंचलता, एकाग्रतेची कमी वयानुसार वाढत जाते. काहींना अभ्यासात रस नसतो पण खेळण्याची अथवा इतर कुठल्या गोष्टीची आवड असते. अशा वेळी काळजीचं कारण नाही पण कुठल्याच गोष्टीत मन रमत नसेल तर ADHD ची लक्षणे असू शकतात तेव्हा त्यानूसार काळजी घेणे गरजेचे असते. ही एक मानसिक स्थिती असते, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांव्दारे काऊन्सलिंग करून घेतले तर मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते.

    ADHD होण्याची कारणे-

    १. आनुवंशिकता
    २. पर्यावरण – गर्भावस्थेत आई अल्कोहोल प्राशन करत असेल तर fetal alcohol spectrum disorders होऊन मुलांमध्ये ADHD ची लक्षणे दिसून येतात.
    ३. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास – मुलांचा विकास नीट झाला नसेल तरी ही लक्षणे दिसून येतात.

    काही पाल्य अतिशय चंचल आहे, अभ्यासात किंवा कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रीत करु शकत नाही, रांगेत उभं राहिल्यावर आपला नंबर येईपर्यंत थांबत नाही, अशी लक्षणं सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलांमध्ये पाहायला मिळतात. पण ही लक्षणं जास्त प्रमाणात आढळल्यास चिंतेची बाब ठरु शकते. असा स्वभाव असल्याने पाल्यांना शिक्षकांकडून तसेच पालकांकडून चुकीच्या अथवा असंवेदनशील वर्तणुकीला सामोरे जावे लागते. मुलं चंचल आहे, आपलं ऐकत नाही, वर्गात लक्ष नाही म्हणून सतत रागवले कि मुलांमधील चिडखोरपणा, आक्रमकता जास्त प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मुलांना काऊन्सेलिंग द्वारे कंट्रोल करता येते, म्हणूनच २०१७ मध्ये शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत’काऊन्सलिंग सेल’असणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं.
    मुलं अती प्रमाणात चंचल असतील, एकाग्रता नसेल तर अशा मुलांना प्रेमाने समजून सांगणे खूप गरजेचे आहे. पालकांना अशा परिस्थितीत खूप त्रास होतो पण चिडचिड न करता योग्य वेळ देऊन मुलांना समजून सांगणे, त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये त्यांना एकाग्र व्हायला मदत करणे खूप आवश्यक आहे, त्यात आई मुलांना सगळ्यात जवळची असल्याने आईने मुलांना समजून घेणे, प्रेमाने हाताळणे महत्वाचे असते, सोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काऊन्सलिंग करून घेणे फायदेशीर ठरते.

    याविषयी अधिक माहिती असल्यास नक्की शेअर करा.

    • अश्विनी कपाळे गोळे