Tag: सामाजिक प्रश्न

  • Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_दुसरा

    ठरल्याप्रमाणे निधी येत्या विकेंड ला मम्मा पप्पांसोबत वेदांतच्या घरी जायला निघाली.

     

    तब्बल तीन महिन्यांनी वेदांतला भेटणार म्हणून निधी जाम खुश होती. कधी एकदा त्याला भेटते असं काहीसं झालेलं तिला.

     

    बारा तासांच्या प्रवासानंतर तिघेही वेदांत राहतो त्या शहरात पोहोचले. सायंकाळ झाली होती त्यामुळे हॉटेलवर रूम बुक करून तिघांनी तिथे रात्रभर मुक्काम केला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच फ्रेश होऊन वेदांत च्या घरी जायला निघाले.

     

    थोड्याच वेळात तिघेही वेदांत च्या घरी पोहोचले. दारावरची वेदांतच्या बाबांच्या नावाची पाटी व

    बघतच निधीने दारावरची बेल वाजवली.

     

    निधीचे मन आता अजूनच बेचैन झाले होते..वेदांतला बघताच मिठी मारावी असं काहीसं तिच्या मनात येत असतानाच वेदांत ने दार उघडले.

     

    निधीला असं अचानक थेट घरी आलेलं बघताच त्याचा चेहरा पडला. दचकतच तो म्हणाला, “तू…इथे…अशी अचानक..”

     

    “सरप्राइज.. मम्मा पप्पा पण आलेत.. बरं आत बोलवणार की दारातच विचारपूस करणार आहेस..”

     

    “या ना.. प्लीज..” वेदांत टेंशन च्या सुरात बोलला.

     

    वेदांत च्या घरी कोणत्या तरी कार्यक्रमाची धामधूम सुरू होती‌. बर्‍याच पाहुणे मंडळींची वर्दळ बघून निधी जरा गोंधळात पडली. ती मनात विचार करू लागली, “वेदांत च्या घरी नक्की काय चाललंय..इतक्यात हा फारसा बोलत पण नव्हता फोन वर.. आणि काही कार्यक्रम आहे असंही काही बोलला नाही..”

     

    तितक्यात वेदांत आईला घेऊन आला.

    निधी सोबत ओळख करून देत म्हणाला, “आई ही निधी, आम्ही एकत्र शिकायला होतो US ला..हे तिचे आई बाबा.. अर्थातच मी सुद्धा त्यांना आज पहिल्यांदाच भेटतोय..”

     

    वेदांत ची आई लगेचच म्हणाली, “अरे व्वा..बरं झालं आलात.. सगळं कसं अचानक गडबडीत ठरल्यामुळे वेदांत च्या इतर मित्र मैत्रिणींना लग्नात यायला जमणार नव्हतं.. तुम्ही आलात ते खरंच फार बरं झालं..”

     

    ते ऐकताच निधी अडखळत म्हणाली, “लग्न..? कुणाचं…?”

     

    “अगं, कुणाचं काय..वेदांतचं..उद्या लग्न आहे ना त्याचं..आता प्रोजेक्ट साठी परदेशात जाणार..मग परत सुट्टी नाही म्हणत वर्ष वर्ष येणार की नाही कुणास ठाउक म्हणून आताच करायचं ठरवलं आम्ही..तसं लग्न कधीच जुळवून ठेवलं होतं.. हा आला ना इकडे परत त्याआधी आम्ही ह्याच्या साठी मुलगी शोधली होती..वेदांतला आवडणार याची खात्री होतीच आम्हाला..”

     

    वेदांतच्या आईचं बोलणं ऐकून निधीच्या काळजाचा ठोकाच चुकला. निधीच्या मम्मा पप्पांना सुद्धा हे ऐकताच धक्का बसला. निधीचे पप्पा वेदांत कडे रागाच्या भरात एकटक बघत होते.. पुढे काहीतरी बोलणार तितक्यात निधीने पप्पांचा हात धरला आणि म्हणाली, “पप्पा, आपण निघूया लगेच…”

     

    निधी पाणावल्या डोळ्यांनी धपाधप पावलं टाकत वेदांतच्या घराबाहेर पडली. मम्मा पप्पा पाठोपाठ येत म्हणाले,  “निधी..निधी.. थांब..आपण जाब तरी विचारू वेदांतला.. तुमचं प्रेम होतं ना एकमेकांवर..मग हा असा कसा धोका देऊ शकतो..आम्हाला खात्री आहे त्याने तुझ्याविषयी घरी काहीच सांगितलं नाहीये..आम्ही बोलतो त्याच्या आई वडीलांशी..”

     

    निधी मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

     

    निधी आणि तिचे आई बाबा असे अचानक निघून गेल्यामुळे वेदांतच्या आईला काय झालंय काही कळालं नव्हतं. मुळात त्यांना निधी आणि वेदांत विषयी काही माहितीच नव्हते.

    घरच्यांची नजर चुकवत वेदांत घराबाहेर आला आणि निधी जवळ येत म्हणाला, “निधी..आय एम सॉरी… माझं ऐकून तर घे..”

     

    वेदांतला समोर बघताच निधीने जोरात त्याच्या कानाखाली वाजवली.

    ” आता काय ऐकून घ्यायचं तुझं.. अरे तुझ्यावर मनापासून प्रेम केलं मी..आणि तू…धोकेबाज.. खोटारडा…इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं..”

     

    वेदांत- “निधी अगं आई बाबांनी सगळं आधीच ठरवून ठेवलं..मी आपल्याविषयी सांगणार होतो पण कुणी माझं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.. श्वेता, जिच्याशी माझं लग्न ठरवलं तिच्यात नकार देण्यासारखं काहीच नाही असं आधीच सांगितलं होतं मला.. पुढे काय आणि कसं बोलायचं नाही कळालं मला..मला माफ कर..”

     

    “चूक माझीच आहे रे..मी तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवला..प्रेम केलं.. तुझ्यासोबत भविष्याचे स्वप्न रंगवले..पण तुझी लायकीच नाही..आता मनात आणलं ना तर सगळ्यांसमोर सत्य सांगून मी तुझं लग्न मोडू शकते पण मी तुझ्यासारखी नाहीये…आता त्या श्वेताचा तरी विश्वास असा मोडू नकोस म्हणजे झालं.. आणि हो.. परत मला तुझं हे तोंड दाखवू नकोस..”

     

    इतकं बोलून निधी आई बाबांसोबत मागे वळून न बघता निघून आली.

     

    निधीला या गोष्टीचा मोठा धक्का बसला. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याने असा विश्वास घात केला ही गोष्ट तिला सहनच होत नव्हती.. तिकडे वेदांत मात्र झालं ते विसरून संसारात रमला होता.

     

    निधी ने एकदा सहजच त्याचं फेसबुक प्रोफाईल उघडून बघितलं. श्वेता सोबतचे त्याचे बरेच फोटो त्याने शेअर केले तिला दिसले. निधीचा आपसूकच बांध फुटला…त्या रात्री परत एकदा ती नुसतीच रडत होती..दोष नक्की कुणाचा याचा विचार करत होती..

    निधीच्या बाबांनी तर वेदांत विषयी पोलिसांत फसवणूक केल्याची तक्रार करू असा निश्चय सुद्धा केला पण निधीने त्यांना अडवले.

     

    या गोष्टीला आता सहा महिने होत आले तरी निधी अजून सावरलेली नाही हे बघून आई बाबा सुद्धा काळजीत होते.

     

    एक दिवस मनात काहीतरी विचार करून निधीने ठरवलं की आता वेदांत चा विषय बंद..आता त्यातून बाहेर पडायला हवे. आई बाबांनी तिला या सगळ्यात खूप समजून घेतले, चूक कुणाची होती वगैरे विचार न करता आता यातून बाहेर पडत नविन आयुष्य जगायचं आहे हे वेळोवेळी निधीच्या लक्षात आणून दिले. मनातल्या जखमा मनात लपवत निधीने नविन आयुष्याकडे वाटचाल सुरू केली.

     

    निधी ने मेहनत करून चांगली नोकरी मिळवली. कामात गुंतल्या मुळे आता हळूहळू ती या सगळ्यातून बाहेर पडली पण तिचा प्रेम, लग्न यावरचा विश्वास कधीच उडाला होता.

     

    निधीच्या मम्मा पप्पाची मात्र निधीसाठी योग्य मुलगा शोधण्याची धडपड सुरू झाली होती.

     

    मुलगी परदेशात शिकायला होती, तिथे प्रियकर होता..मग त्याने धोका दिला अशा अनेक चर्चा नातलग, शेजारीपाजारी यांच्यात व्हायच्या. निधीच्या मम्मा पप्पांना याची कल्पना होतीच त्यामुळे येणाऱ्या स्थळाला अंधारात न ठेवता सगळं खरं काय ते सांगायचं आणि त्यांना याविषयी काही हरकत नसेल तरच त्या स्थळाचा विचार करायचा असं निधीच्या घरी ठरलं. निधी मात्र लग्न करायलाच तयार नव्हती.

     

    तरीही मम्मा पप्पा म्हणतात म्हणून कधीतरी एखाद्या स्थळाला सामोरे जायची.

     

    आजही असंच एक स्थळ निधी साठी आलेलं. तिला बघण्याचा कार्यक्रम ठरला होता आणि निधीच्या मम्माच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता.

     

     

    क्रमशः

     

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    अश्विनी कपाळे गोळे

     

     

     

     

     

     

     

     

     

     

  • Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला

    • “निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली.

     

    निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला‌ मिळतं निवांत.. ”

     

    “निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?”

     

    “मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे करत आहोत आपण..मला मूळात लग्नच करायचं नाहीये ”

     

    “निधी, असं किती दिवस त्याच आठवणी मनात घेऊन लग्नाला नकार देत राहणार आहेस बाळा.. आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून काहीतरी शिकवण घेत पुढे जायचं असतं..सगळेच मुलं काही वाईट नसतात..”

     

    “मम्मा प्लीज आज परत तो विषय नको..” – निधी उठून बसत म्हणाली.

     

    “ओके बाबा, सॉरी..पण लवकर तयार हो..”

     

    मानेनेच होकार देत निधी बाथरूममध्ये निघून गेली.

     

    निधीची आई मात्र तिच्या काळजीने मनातच पुटपुटत म्हणाली, “हा योग जुळून येऊ दे देवा.. भूतकाळ आधीच माहीत असूनही मुलाकडचे तयार झाले..आता एकदा सगळं जुळून आलं की निधीची समजूत काढता येईल..होईल तयार ती लग्नाला..”

     

    निधीच्या विचारात गुंतली असताना बाबांची हाक ऐकताच आई विचारातून बाहेर आली.

     

    “आले हा..” म्हणत आई खोलीतून बाहेर गेली.

     

    निधी दिसायला सुंदर, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज, आकर्षक व्यक्तीमत्व असलेली श्रीमंत घरातील आई वडीलांना एकुलती एक मुलगी. अगदीच लाडा कौतुकात ती लहानाची मोठी झाली. डिग्री नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. तिथे तिची ओळख वेदांत सोबत झाली. परदेशात आपली भाषा बोलणारा वेदांत भेटल्याने तिची त्याच्याशी मस्त गट्टी जमली. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री झाली. विकेंड ला सोबत फिरणे, शॉपिंग, पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन सगळं अगदी सोबत करायचे दोघेही. निधीला वेदांतचा सहवास हळूहळू आवडायला लागला होता. वेदांतच्या मनातही निधी विषयी प्रेम होतेच पण त्याने ते व्यक्त केले नव्हते. न राहावून शेवटी निधीने तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आणि दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

    दोघेही प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. दोन वर्षे एकत्र असताना‌ ते मनाने तर जवळ आलेच पण नकळत शरीरनेही एकरूप झाले. आता मायदेशी परतल्यावर घरी लग्नाचं बोलायचं आणि संसार थाटायचा असं दोघांचं ठरलेलं.

    निधी ने तर तिच्या मम्मा पप्पांना व्हिडिओ कॉल वर वेदांत विषयी सगळं काही सांगितलं सुद्धा. निधीच्या घरचं वातावरण अगदीच फ्रेंडली त्यामुळे त्यात काही वावगं असं त्यांना वाटलं नाही पण मम्मा मात्र सारखं तिला म्हणायची, “निधी बेटा, बॉयफ्रेंड आहे हे ठीक आहे पण काही चुकीचं करून बसू नकोस..”

     

    त्यावर निधी म्हणायची, “कम ऑन मम्मा.. मी काय लहान बाळ आहे का.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर..आता परत आलो ना की लग्नाचं ठरवूया म्हणतोय वेदांत..”

     

    “आपली मुलगी तशी बोल्ड आहे..माणसांची योग्य पारख तिला आहे..आता ती अल्लड नाही..आपणच उगाच काळजी करतोय बहुतेक..” असा विचार करत स्वतः ची समजूत काढत मम्मा शांत बसायची.

     

    वेदांतच्या घरी मात्र अजून निधी विषयी काही माहिती नव्हते. घरी परत गेल्यावर मी सगळ्यांशी बोलून आपल्या नात्याविषयी सांगतो..त्यांना काही प्रोब्लेम नसणार आहे असं वेदांत अगदी आत्मविश्वासाने सांगायचा.

     

    बघता बघता दोन वर्षे संपले आणि दोघेही मायदेशी परतले. दोघेही वेगवेगळ्या शहरात राहायला‌ त्यामुळे आता फक्त फोन, व्हिडिओ कॉल यावरच भेट व्हायची.  निधी त्याला सारखं विचारायची, “वेदांत तू घरी बोललास का आपल्या विषयी..”

    त्यावर वेदांत म्हणायचा, “निधी, एकदा‌ नोकरी हातात आली ना की लगेच सगळी बोलणी करुया.. तुझ्या घरी सुद्धा तुझा हात मागायला असं विना नोकरी कसं यायचं ना.. बसं काही दिवस थांब..”

     

    निधीचेही नोकरीचे प्रयत्न सुरू होतेच पण वेदांत पासून दूर राहणे तिला फार अवघड होत चाललं होतं. दोन‌ वर्षांच्या सहवासात त्याची जणू सवय झाली होती.

    एक दिवस वेदांतचा सकाळीच कॉल आला..त्याला मोठ्या कंपनीची ऑफर मिळाली होती, परत परदेशात प्रोजेक्ट साठी जावं लागणार आहे असं त्यानं सांगितलं.

     

    ते ऐकून निधी अगदी आनंदाने नाचायला लागली. “वेदांत आता घरी बोलू शकतोस तू… लगेच लग्न करायचं असं नाही पण आपल्या विषयी कल्पना तरी देऊ त्यांना..”

     

    “निधी, किती उतावीळ झाली आहेस तू…आता कुठे नोकरीची ऑफर मिळाली..बोलूया लवकरच घरी..धीर धर जरा..” असं वेदांत म्हणाला तेव्हा निधी मनोमन फार दुखावली.

     

    “आपण दिवसेंदिवस वेदांत मध्ये गुंतत जातोय पण हा मात्र सगळं खूप सहज बोलून मोकळा होतो आहे.. वेदांत धोका तर‌ देणार नाही ना.. नाही.. नाही.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर…असा नाही करणार तो… त्याला जरा‌ वेळ द्यायला हवा… “अशी स्वतः ची समजूत काढत निधीने ठरवले की आता काही दिवस तरी त्याला या विषयी काही विचारायला नको.

     

    निधीचे मम्मा पप्पा पण तिला अधूनमधून वेदांत विषयी विचारत म्हणायचे, “वेदांतला एकदा तरी घरी बोलावून घे..आम्हाला भेटायचं आहे त्याला… तुमचं पुढे काय ठरलं जरा बोलायला हवं ना..”

     

    त्यावर निधी “हो..हो..” म्हणत वेळ निभावून न्यायची.

     

    दिवसेंदिवस आता दोघांचं फोनवर बोलणं सुद्धा कमी होत चाललं होतं. निधीच्या मनात शंकाकुशंका यायला लागल्या होत्या.

     

    बराच विचार करून निधी‌ मम्मा पप्पांना म्हणाली, ” पप्पा, आपण जायचं का वेदांत कडे…तो सध्या त्याच्या नव्या नोकरीत, व्हिजा वगैरे मध्ये बिझी आहे..आपण भेटायला जाऊ..त्याला सरप्राइज देऊ..मला पत्ता माहीत आहेच..”

     

    “चालेल..काही हरकत नाही..” – पप्पा.

     

     

    क्रमशः

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा

    “समिधा…..समिधा……समिधा, अगं लक्ष कुठे आहे तुझं..मी काय विचारतेय? चहा घ्यायला जायचं ना? कोणत्या विश्वात रमली आज ऑफिसला आल्या आल्या..चल पटकन..”
    समिधा ची मैत्रिण प्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून आवाज देत म्हणाली.

    प्रियाच्या आवाजाने भानावर येत दचकून समिधा म्हणाली, “अ..हो..हो..जाऊया ना..चल… अगं नकळत विचारांमध्ये अशी गुंतले की कळालच नाही तू कधी आलीस ते..”

    दोघीही चहा घ्यायला कॅन्टीन मध्ये निघाल्या. समिधा आज जरा अस्वस्थ आहे बघून प्रिया तिला म्हणाली, “समिधा, कशाचा विचार करते आहेस..सगळं ठीक आहे ना..काय झालंय..”

    समिधा- “प्रिया, अगं अनिकेत ने बहुतेक आपलं ऑफिस जॉइन केलंय..आज मी पार्कींग मध्ये लिफ्टची वाट बघत उभी होते तेव्हा तिथे मला तो दिसला. आम्ही दोघंही असं अचानक एकमेकांसमोर आल्याने ना फारच वेगळं वाटलं… तो दिसल्या पासून ना मन अगदी अस्वस्थ झालंय..तुला माहित आहे ना मला भूतकाळातून बाहेर पडताना किती त्रास झाला.. कसं बसं सावरलं मी स्वतःला आणि आज हा असा परत माझ्यासमोर आल्यावर परत नको असताना‌ही माझं मन भूतकाळात भरकटत आहे ..”

    प्रिया – “काय? त्याला माहीत होते का तू आता इथे नोकरी करते ते.. म्हणजे मुद्दाम तर इथे आला नाही ना तो..”

    समिधा – “मला तरी असं वाटत नाही..कारण आमचा डिव्होर्स झाला त्यानंतर आम्ही जराही संपर्कात नाही इतकंच काय तर आमचे कॉमन मित्र मंडळ जे होते त्यांच्याशी सुद्धा माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि मी हे ऑफिस जॉइन केले हे घरच्यांना सोडून कुणालाही माहीत नव्हते..मुळात ते मला कुणालाच कळू द्यायचे नव्हते.. आणि अनिकेत तरी आता मुद्दाम कशाला माझ्या मागावर येणार ना..आमचे मार्ग वर्षभरापूर्वीच वेगळे झालेत..”

    प्रिया – “समिधा, अगं मग झालं ना..सोड त्याचा विचार..त्यालाही कदाचित माहिती नसेल तू इथे अशी अचानक दिसशील ते..केवळ योगायोग म्हणून सोडून दे..नको लक्ष देऊ..अनोळखी समजून दुर्लक्ष कर..”

    समिधा काहीही न बोलता चहाचा घोट घेत होती आणि परत समोरच्या काउंटरवर तो उभा दिसला…अजूनही तो तसाच हॅंडसम, अगदी नीटनेटके  रहाणीमान..समिधा क्षणभर त्याला बघतच राहिली आणि पटकन भानावर येत स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागली, “मी का त्याला बघते आहे..तो आता फक्त एक अनोळखी व्यक्ती आहे माझ्यासाठी..पण आता हा नेहमीच असा मला दिसत राहणार आणि मग मी अशीच…नाही नाही..समिधा मूव्ह ऑन..”

    प्रिया काही तरी सांगत होती, बोलत होती पण समिधाचे तिच्याकडे जराही लक्ष नव्हते. समिधा डेस्क वर आली , इमेल चेक करून आजच्या कामाचे प्लॅनिंग केले पण आज कामात तिचं लक्षच लागत नव्हतं. नकळत ती भूतकाळात जाऊन पोहोचली.

    समिधा आणि अनिकेत कॉलेजला असल्यापासून एकमेकांवर अगदी जिवापाड प्रेम करायचे. समिधा सुखवस्तू कुटुंबात वाढलेली एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, उंच कमनीय बांधा, गव्हाळ वर्ण, नीटनेटके आणि जरा मॉडर्न रहाणीमान असलेली समिधा बघता क्षणी कुणाच्याही नजरेत बसेल अशीच. अनिकेत साधारण परिस्थितीत लहानाचा मोठा झाला, दिसायला अगदीच हॅंडसम हिरो, उंचपुरा त्यात पिळदार शरीरयष्टी त्यामुळे कॉलेजमध्ये अनेक मुलींचा क्रश होता तो. समिधाला तो खूप आवडायचा आणि त्यालाही समिधा पहिल्यांदा बघताक्षणीच आवडलेली. त्यानेच पुढाकार घेऊन मग मैत्रीचा हात पुढे केला आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही. समिधाचा क्रश असणार्‍या अनिकेत ने तिला प्रपोज केले तो क्षण तर तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. तिला त्याच्या एकंदरीत परिस्थिती विषयी कल्पना होती, त्याच्या सहवासात अगदी झोपडीत सुद्धा रहायला तयार होती ती. त्याचेही तिच्यावर तितकेच प्रेम होते, समिधाला अगदी जिवापाड जपायचे असाच त्याचा गोड प्रयत्न असायचा नेहमी. कॉलेज नंतर दोघांनाही नोकरी मिळाली आणि आता लग्नासाठी घरी बोलायचे त्यांनी ठरविले. समिधाच्या आई बाबांना अनिकेत विषयी काहीच प्रोब्लेम नव्हता शिवाय समिधाच्या निवडीवर त्यांचा विश्वास सुद्धा होता. अनिकेत च्या घरी मात्र श्रीमंत घरातील मुलगी समिधा, आपल्या घरात रुळणार की नाही, रितीरिवाज, मानपान समजून घेत घरच्यांना बरोबर घेऊन संसार चालवेल की नाही याची काळजी होती, त्यांनी अनिकेत ला बोलूनही दाखवले पण दोघेही आपापल्या मतांवर ठाम आहे बघून ते या लग्नाला तयार झाले.

    घरच्यांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले. दोघेही खूप आनंदात होते, त्यांचं प्रेम आता नात्यात बदललं होतं. अगदी लव्ह बर्ड सारखे हे गोड जोडपे होते. अनिकेत तिला अगदी राणी सारखं ठेवायच्या प्रयत्नात असायचा पण आता प्रेमा सोबतच जबाबदारी वाढली होतीच, संसाराला सुरुवात झाली होती.
    दोघांचेही कुटुंब राहायला एकाच शहरात त्यामुळे समिधाला लग्नानंतर सुरवातीला फार काही वेगळे वाटले नाही पण हळूहळू नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळताना तिची फार चिडचिड व्हायला लागली. घरकामाला बाई असली तरी लहानसहान कामे पडायचीच पण समिधाला त्याची फारशी सवय नसल्याने तिला फार काही लोड झेपायचा नाही, सासूबाई मदतीला असायच्या पण आता जबाबदारी वाढलेली होतीच. पाहुण्यांचे येणे जाणे, सणवार असं सगळं रूटीन सुरू झालं. त्यात अनिकेतच्या घरातील सगळ्यांना समजून घेत त्यानुसार जरा जुळवून घेत संसार करताना अनिकेत आणि ती एकमेकांना फारसा वेळ देऊ शकत नव्हते. आता तर विकेंडला मूव्ही बघणे, शॉपिंग करणे , फिरणे सगळंच फार कमी झालेलं. अनिकेत दिवसभर त्याच्या कामात गुंतलेला असायचा, आता फक्त रात्रीच काय तो वेळ दोघांना एकत्र घालवायला मिळायचा. समिधा अचानक बदललेल्या या परिस्थितीला, जबाबदारीला जाम कंटाळली होती. अनिकेत नी तिला जरा समजून घेत आठवड्यात एक दिवस तरी पूर्णपणे तिच्यासाठी द्यावा असं तिला वाटे, ती त्याच्यावर चिडायची, रडायची, तुझं आता माझ्यावर प्रेमच राहीलं नाही म्हणत अनिकेत कडे पाठ फिरवून रडत रडत झोपी जायची. सुरवातीला तो तिची समजूत काढून तिला शांत करायचा पण समिधा ची वाढती चिडचिड बघून तोही रागाच्या भरात उलट काहीतरी बोलून जायचा. लग्नाला सहा महिने सुद्धा झाले नसतील तर दोघांचे भांडणं सुरू झाले मग कितीतरी वेळा समिधा रागारागाने आई बाबांकडे निघून जायची‌. अनिकेत बरेचदा तिला समजवायला जायचा, तिला परत घरी घेऊन यायचा पण काही दिवसांनी परत तेच घडत होतं..

    अनिकेत च्या आई-बाबांना वाटलं, आपल्यामुळे दोघांना त्यांची स्पेस मिळत नसावी म्हणून ते सुद्धा गावी राहायला गेले पण त्यांच्या गावी जाण्याने प्रश्न सुटला नाही. समिधा मुळे आई बाबांना गावी जाऊन राहावं लागतंय ही गोष्ट अनिकेतला खटकत होती. दोघेही एकत्र असले तरी मनाने मात्र दुरावत चालले होते, संवाद संपत चालला होता.
    दिवसेंदिवस अनिकेत आणि समिधा मध्ये मतभेद इतके वाढत गेले की एक दिवस समिधाची चिडचिड बघून अनिकेत बोलून गेला, “समिधा, मला ना तुझं काही कळतच नाहीये..तुझ्यामुळे आई बाबा गावी राहायला गेले…तरी तुझं समाधान झालं नाही..तुला नक्की काय हवंय हे तरी सांग..मला आता तुझ्या चिडचिडेपणाचा, भांडणाचा जाम कंटाळा आलाय..मला प्लीज शांत राहू दे..”

    अनिकेतचे बोलणे समिधाच्या मनाला खोलवर वार करून गेले. ती परत एकदा रागाच्या भरात आई बाबांकडे निघून गेली ती कायमचीच..नंतर अनिकेत सुद्धा पूर्वी प्रमाणे तिची समजूत काढायला आला नाही. समिधाने महीनाभर वाट बघितली आणि वेगळं व्हायचा निर्णय घेतला. अनिकेत ने त्यावर जराही आक्षेप घेतला नाही, तो अगदी सहजपणे डिव्होर्स साठी तयार झाला ही गोष्ट समिधाच्या मनाला खूप लागली. दोघांचा अहंकार, गैरसमज यापुढे घरच्यांचे ही काहीच चालले नाही. शेवटी दोघे कायद्याने वेगळे झाले.

    या सगळ्याचा मानसिक त्रास दोघांनाही झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी समिधाने नोकरी बदलली, नविन लोकांच्या सानिध्यात राहून वेळेनुसार सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं पण आज अनिकेत अचानक समोर आला आणि ती परत नकळत भूतकाळात शिरली.

    जुन्या आठवणींच्या विश्वात रमली असतानाच मॉनिटरवर कुणाचं तरी पिंग आलं. बघते तर अनिकेत ने “हाय समिधा..हाऊ आर यू..” असं पिंग केलेलं.
    त्याच पिंग बघून समिधाच्या डोळ्यात चटकन पाणी आले.

    अनिकेत ला काहीही रिप्लाय नको द्यायला असा विचार करत मनातल्या मनात समिधा पुटपुटली, “नको ना रे परत नेऊ मला भूतकाळात… मनाच्या कोपऱ्यात सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत… आता कुठे मी भूतकाळातून बाहेर पडू बघत होते आणि तू परत समोर आलास आज..आता असं बोलायला सुरुवात करशील आणि मी परत नकळत तुझ्यात गुंतले तर…..नाही नाही… अनिकेत प्लीज नको घेऊन जाऊस मला भूतकाळात..”

    अनिकेत ला काहीही रिप्लाय न देता तिने कामाला सुरुवात केली. दुपारी लंच टाईम मध्ये परत तो समोर आलाच, नजरानजर झाली आणि परत ती भावनिक झाली.

    दुसऱ्या दिवशी परत ऑफिसच्या कम्युनीकेटर वर त्याचं “हाय..गुड मॉर्निंग..” असं पिंग आलं. शेवटी न राहवून तिने “हाय..” म्हणत रिप्लाय दिला.

    लगेच त्याने एकामागोमाग एक पाच सहा मेसेज केले पण तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी ते अंधूक दिसत असतानाच तिने ती चॅट विंडो बंद करून मोठा श्वास घेतला, जणू वर्षभर त्याच्या विरहात मनी दाटलेल्या भावना आज नकळत अश्रू रुपात ओघळायला लागल्या होत्या.
    अश्रूंना आवरत ती वाशरूम मध्ये निघून गेली, चेहर्‍यावर पाणी मारून जरा फ्रेश होऊन आली आणि कामाला लागली पण त्याचा विचार नको म्हंटलं तरी डोक्यातून जात नव्हता. का आला असेल हा परत माझ्या आयुष्यात ? का प्रयत्न करतोय आता बोलायचा…काही बोलायचं बाकी आहे का खरंच आता? नाही त्याला जाब विचारावा लागेल नाही तर मला इथे कामात कधी लक्षच लागणार नाही…
    तिने चिडून त्याला पिंग केले , “मला तुला भेटायचंय… कॅन्टीन मध्ये येशील?”

    त्याचा लगेच रिप्लाय आला, “हो नक्की.. साडेतीन ला भेटुया..?”

    “ओके..” तिने रिप्लाय दिला.

    साडेतीन वाजता समिधा कॅन्टीन मध्ये गेली तर अनिकेत तिची वाट बघत बसलेला होता. ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली आणि म्हणाली, “वेळेआधीच आलास..”

    “नाही तसं काही नाही.. आत्ताच आलोय मी…कशी आहेस समिधा..”

    “हा प्रश्न विचारून नक्की काय जाणून घ्यायचं आहे तुला…”

    “असो.. कॉफी घेणार..?” – अनिकेत

    समिधाने यावर काहीही उत्तर दिले नाही. तिचा नाराज सूर, उदास चेहरा बघून अनिकेत उठून गेला आणि दोन कप कॉफी घेऊन आला.

    “थ्यॅंक्स…मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी..”

    “समू..मला पण खूप काही बोलायचं आहे गं…एकदा संधी निघून गेली आणि सगळं विस्कटलं…नको असताना..”

    “समू..? समिधा नाव आहे माझं..समू फक्त एकच व्यक्ती म्हणायचा, ज्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही त्याच्यावर.. बाकी कुणी समू म्हंटलेलं नाही आवडत मला.. ”

    “तो मीच होतो ना गं…तुझा अन्नू….
    समू…. सॉरी… ‌‌समिधा, मी खूप मिस केलं गं तुला‌.. असं नको होतं व्हायला…तू आयुष्यातून निघून गेलीस आणि सगळं विस्कटलं.‌.कामात लक्ष लागत नव्हतं, वारंवार चुका होत गेल्या.. माझी जी एक इमेज तयार झाली होती ना कंपनीत, ती लगेच धुळीला मिळाली माझ्या सततच्या चुकांमुळे..तीन महिने नुसताच ताणतणाव..शेवटी नोकरी गेली…
    खरं सांगायचं तर आपल्या डिव्होर्स नंतर अगदी शून्य झालेलं माझं आयुष्य..
    माझी अवस्था बघून आई बाबा सतत काळजीत होते..खरं तर ह्या सगळ्याला मीच जबाबदार होतो ना गं.. माझ्याच चुकांची शिक्षा मी भोगली‌…
    मला तू परत हवी होतीस.. खूप शोधायचा प्रयत्न केला.. तू जुनी कंपनी सोडून गेलीस इतकंच कळालं… हातात नोकरी नव्हती.. आयुष्यात तू नव्हतीस..एक क्षण असं वाटलं संपवून टाकावं सगळं एका क्षणात पण कसंबसं स्वतः ला सावरून तुझा शोध घेतला..तू इथे नोकरी करतेस कळालं त्यानंतर या कंपनीत नोकरी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले..खरं तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी…”

    समिधाच्या डोळ्यातून अश्रु टपकत होते. इकडे तिकडे बघत तिने डोळे पुसले आणि म्हणाली, “माझा डाऊट खरा निघाला तर..मला वाटलेच होते तू माझा पाठलाग करत आलास इथे‌‌..मला त्रास द्यायला…तुला काय पोरखेळ वाटतो काय रे सगळा… कोर्टाने संधी दिली होती ना.. तेव्हा तुला मी नको होते…तेव्हा का नाही माघार घेतलीस डिव्होर्स घेण्यापासून… आणि तुला काय वाटते,त्रास फक्त तुला झाला..मलाही मन आहे…त्रास मी सुद्धा सहन केलाच ना.. चूक
    माझीही होतीच.. चिडचिड व्हायची मला खूप, सगळं आयुष्य अचानक बदललं होतं लग्नानंतर…नव्हती मला कधी सवय ऍडजस्ट करायची पण तू समजून घेत प्रेमाने डोक्यावरुन हात फिरवला असतास ना तर जुळवून घेत गेले असते मी वेळेनुसार..सवय झाली असती मला सगळ्या गोष्टींची पण लग्नानंतर तू माझा अन्नू राहीला नव्हतास..तू नवरा झाला होतास माझा..मी ही चुकले, मलाही मान्य आहे पण आपलं ठरलं होतं ना, एकमेकांच्या चुका सुधारत समजून घेत आयुष्यभर साथ द्यायचं.. त्या फक्त लग्नाआधी घेतलेल्या आणाभाका म्हणाव्या का?”

    “समू, आय नो..पण तेव्हा नाही कळालं गं..जेव्हा चुक उमगली तेव्हा खूप उशीर झाला होता…मला कळायला हवं होतं तुझं मन त्या क्षणी…तू माझ्यासाठी सगळं सोडून आलेली पण नवीन परिस्थितीत जुळवून घेताना मी तुझी साथ द्यायला हवी होती.. सॉरी समू..खरंच चुकलो गं मी… तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे समू माझं…प्लीज मला एक संधी दे..मला माफ कर.. आपण सगळं नीट करूया… प्लीज माझ्या आयुष्यात परत ये..मी नाही जगू शकत गं तुझ्याशिवाय.. आणि हे फक्त म्हणत नाहीये मी, अनुभवलं आहे मी…प्लीज समू…कमी बॅक..”

    “अनिकेत सगळं इतकं सोपं नाहीये…मी यातून कशी बाहेर पडले माझं मलाच माहीत… कित्येक रात्री रडत रडत जागले मी तुझ्या आठवणीत… झोपेच्या गोळ्या खाव्या लागल्या मला.. रात्र रात्र झोप लागत नव्हती…कामात लक्ष लागत नव्हतं… वाटायचं, ज्याच्यावर प्रेम केलं तो असा कसा वागू शकतो…माझ्या अल्लड हट्टी स्वभावाची जाणिव असताना लग्न केलंस पण नंतर समजून घेणारा अन्नू कुठेतरी हरवला होता…माझी अवस्था बघून आई सतत लक्ष ठेवून असायची.. तिच्या हातांनी झोपेची गोळी द्यायची, नजरेसमोर घे म्हणायची..तिला वाटायचं मी जीवाचं काही बरं वाईट करून घेईन..त्यातही नातलग दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन यायचे… खूप चिड यायची मला..आता कुठे जरा सगळ्यातून बाहेर पडले आणि तू परत समोर आलास..
    माझं ना आता डोकं सुन्न झालंय…का आलास रे परत…” समिधा दोन्ही हात चेहर्‍यावर ठेवत म्हणाली.

    “समू..मला तू परत हवी आहेस…आपण एक नवी सुरुवात करू…नाही दुखावणार गं मी परत कधी तुला.. मनात खोलवर जखम झाली आहे जी कायम मला लक्षात राहणार..अगदी शेवटच्या क्षणापर्यंत…प्लीज समू…एक संधी दे मला..”

    “अनिकेत काय म्हणतील सगळे…संसार काही भातुकलीचा खेळ नहीं ना…हवं तेव्हा मांडला.. हवं तेव्हा मोडला…”

    “समू, किती मॅच्युअर झालीस गं‌…किती विचार करते आहेस सगळ्यांचा..पण आता यापुढे कोण काय म्हणते आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही समू.. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस..माझी समू हवी आहे मला…आपल्या परत एकत्र येण्याने आई बाबांना आनंदच होईल असे..मला खात्री आहे तुझ्या घरी सुद्धा काही हरकत नसेल…मी माफी मागतो त्यांची..हात पसरतो हवं तर पण मला तू हवी आहेस समू..आय लव्ह यू समू…आय मिस्ड यू सो मच..”

    “अन्नू तू वेडा झाला आहेस…”

    “तुझ्याशिवाय खरंच वेड लागलं मला..प्लीज समू, ये ना परत… नेहमीसाठी… जन्मोजन्मी साठी… प्लीज..एक संधी दे, पहिली आणि शेवटची…”

    समिधा ने भरल्या डोळ्यांनी अनिकेतच्या हातावर हात ठेवला आणि वर्षभर मनात दाटलेल्या भावना अलगद ओठांवर आणत म्हणाली, “आय मिस्ड यू टू अन्नू…प्लीज परत नको असा सोडून जाऊस मला अर्ध्या वाटेवर…”

    समिधाच्या होकारार्थी उत्तराने अनिकेतच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले, तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याने तिचा हात हातात घेत तिच्या पाणावलेल्या डोळ्यांत बघत मानेनेच उत्तर दिले.

    दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला…आता कुणी काहीही म्हणो पण एकमेकांशिवाय आयुष्य शून्य आहे तेव्हा परत एक नवी सुरुवात नक्कीच करायला हवी हा विचार करत अनिकेत आणि समिधा परत एकत्र आले.

    दोघांनाही आयुष्यात मोठी ठेच लागलेली पण स्वतः च्या चुकांची जाणीव सुद्धा झाली. दोघांच्या संसाराला, नव्या नात्याला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

    समाप्त!!!

    कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी संबंधित आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग

          सानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.

        सानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घालवायचा.
    सानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.

    कितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.
    सुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,
    पण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
    “काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही? तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”

    त्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”

    ते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे? नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”

    सुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान? मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”

    इतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.

    आता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..

    एव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.

    आता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,

    “जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”

    आता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.
    जाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.   

    ही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.
    त्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.

    सानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.

    माहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

    सानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”

    त्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”

    या सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.
    सानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.

    हळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.

           एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.

    अशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक कथा.

    या प्रकारात नक्की चूक कुणाची आहे? याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    समाप्त !!!

    कथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग दुसरा

        सानिकाला सासरी जाऊबाई जरा जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. सासूबाई, सासरे तर त्यांच्याच दिनचर्येत व्यस्त असायचे. सनिकाच्या मनात मात्र सुशांत विषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. लग्नाला दोन आठवडे होत आले तरी नवरा म्हणून त्याने तिला अजूनही जवळ घेतले नव्हते. सध्या खूप काम आहेत तेव्हा काही दिवस मी तुला शक्य तितका वेळ देऊ शकत नाही पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरा कामाचा व्याप कमी झाला की छान कुठे तरी फिरून येऊ म्हणत त्याने सानिकाची समजूत काढली. कामाचं निमीत्त सांगून उशीरा घरी येणे, शक्य तितके सानिकाला टाळणे असे प्रकार सुरू होते.  सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुशांत घरी नसायचा‌. घरी कुणाला काही म्हंटलं की म्हणायचे काम असतील त्याला , जरा काही दिवस गेले की देईल तो तुला वेळ. सानिकाला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने याविषयी जाऊबाईला सुद्धा बोलून दाखवलं.

    त्यावर त्या म्हणाल्या, “खरं सांगू का सानिका, सुशांत आधीपासूनच घरात फारसा नसतो, त्याचे मित्र आणि तो असंच होतं त्याचं लग्नापूर्वी सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर तरी घरात थांबेल पण आताही असंच दिसतंय. तू एक काम कर, त्याला सांग सुट्टी असली की एक दिवस तरी तुला वेळ द्यावा म्हणून. तुम्ही बोला एकमेकांशी याविषयी स्पष्टपणे.”

    ते ऐकताच सानिकाला अजूनच विचित्र वाटले.

    जेव्हा जाऊबाईंना कळाले की सानिका आणि सुशांत यांच्यात लग्नानंतर अजून एकदाही जवळीक आली नाही तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. त्यांनी सानिकाला याविषयी पुढाकार घे असंही सांगितलं.
    जाऊबाई चे बोलणे ऐकून सानिकाला सुशांत विषयी अनेक शंका मनात आल्या. लग्न म्हंटलं की एकमेकांविषयी आपसुकच ओढ निर्माण होते, एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो, तसंच सानिका चेही झाले पण सुशांत मात्र सानिकापासून लांबच होता. त्याने आपल्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशा अनेक भावना तिच्या मनात उफाळून येत होत्या.
    आता आपणच पुढाकार घेऊन सुशांतच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा निश्चय तिने केला. कदाचित तो खरच कामात गुंतलेला असेल त्यामुळे वेळ देत नसेल अशी स्वतः ची समजुत सुद्धा तिने काढली.

    मनात काही तरी प्लॅनिंग करून तिने आज रात्री कितीही उशीर झाला तरीही सुशांत आल्याशिवाय झोपायचे नाही असे ठरवले. खोली छान आवरली, नवी कोरी बेडशीट बेडवर अंथरली. रात्री आठच्या सुमारास सुशांतला फोन केला आणि जेवणाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, “मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. मी बाहेरच खाऊन घेईल. ”

    सानिका आणि जाऊबाईंनी जेवणाची तयारी केली, सगळ्यांनी एकत्र जेवण केले पण सानिका मात्र सुशांतला मिस करत होती. मोठे दिर जाऊ कसं छान एकत्र जेवतात, सासू सासरे सुद्धा दोन्ही वेळा एकमेकांशिवाय जेवण करत नाहीत पण आपण मात्र अजून एकदाही असं एकत्र बसून ना जेवण केलयं ना जरा गप्पा मारल्या अशा विचाराने तिला एकही घास घशाखाली उतरत नव्हता. कशीबशी ती जरा जेवली आणि स्वयंपाक घरात आवरून आपल्या खोलीत निघून गेली.

    जाऊबाईंनी तिला सांगितले होतेच की, आज तू त्याच्या जवळ स्वतः हून जा, प्रेमाने त्याच्याशी बोल, त्याच्यावर तुझं किती प्रेम आहे हे त्याला जाणवू दे म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी तुला जरा तरी वेळ देईल शिवाय त्याचं असं घराबाहेर राहणं जरा कमी होईल. तू प्रयत्न कर तरी काही शंका वाटलीच तर सुशांतच्या दादाला सांगते मी त्याच्याशी बोलायला.

    सुशांत रात्री बाराच्या सुमारास घरी आला. सानिका त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघत होती. तो आलेला दिसताच तिने स्वतः ला आरशात बघून कपाळावरची टिकली उगाच नीट केली आणि स्वतःशीच लाजून तिने खोलीचा लाइट बंद केला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर मंद मेणबत्त्या लावल्या. सुशांत खोलीत आला तसंच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले. त्याने एक कटाक्ष सानिकाकडे टाकला, ती लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती मोकळ्या केसात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला असं छान सजलेलं बघून सुशांत आनंदी होईल अशी गोड अपेक्षा तिला होती पण तिची अशी सगळी तयारी बघून त्याचा चेहरा उतरला. तो‌ काही एक न बोलता बाथरुम मध्ये निघून गेला.

    त्याची अशी प्रतिक्रिया बघून सानिकाचा मूड खराब झालेला पण तरीही जरा शांत राहून ती त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. तो जरा फ्रेश होऊन बाहेर आला तशीच ती त्याला टॉवेल द्यायला जवळ गेली, त्याने तिच्याकडे न बघताच तिच्या जवळचा टॉवेल घेऊन चेहरा पुसला. आज तिला त्याच्या वरच्या प्रेमाची जाणिव त्याला करून द्यायची होती. ती अलगद त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळण्याच्या आत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
    “सुशांत, किती उशीर केला यायला. खूप वाट बघत होते मी तुमची..बायको घरी आहे तेव्हा जरा लवकर येत जा ना.. प्लीज… दिवसांतला काही वेळ माझ्या साठी तर काढायला हवाच ना तुम्ही..माझा‌ हक्क आहे तितका…”

    असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवायला मान वर केली तसंच त्याने तिला दूर केले आणि म्हणाला, “सानिका, अगं कळतंय मला पण सध्या कामाचा व्याप आहे खूप… नाही होत लवकर यायला…तू वाट नको बघत जाऊ असं…”

    तिला त्याच्या अशा वागण्याचा जरा राग आलाच पण त्याला आपण समजून घ्यायलाच हवे असे ती स्वतःला समजून सांगत होती. ती त्याला उत्तर देत म्हणाली, ” सुशांत मलाही तुमची परिस्थिती कळते आहे पण असं किती दिवस दूर राहायचे आपण.. लग्नाआधी सुद्धा आपल्याला नीट बोलायला, समजून घ्यायला वेळ मिळाला नाही..आताही तेच होतेय.. मी खूप मिस करते तुम्हाला दिवसभर…”

    सुशांत मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत थकल्याचे कारण सांगून झोपी गेला. सानिका त्या रात्री खूप खूप रडली, तिच्या भावनांचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. आपण इतकं सगळं बोलून दाखवले तरी सुशांतला कांहीच कसं वाटत नसेल आपल्याविषयी हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. रात्रभर कड बदलत ती बेडवर पडून होती.

    सकाळी उठून तिने सुशांतला चहा करून दिला. त्याने मुकाट्याने चहा घेतला आणि तो घराबाहेर पडला. सानिकाचा चेहरा पाहून जाऊबाई काय ते समजून गेल्या. सासू सासरे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्यावर दोघीच घरात असताना सानिकाने रात्री घडलेला सगळा प्रसंग रडतच जाऊबाईंना सांगितला. जाऊबाई ते ऐकताच जरा गोंधळलेल्या अवस्थेत सानिकाला म्हणाल्या, “सानिका, तू शांत हो..मी आहे तुझ्या सोबत पण खरं सांगू का, मलाही आता सुशांत वर शंका यायला लागली..मी ह्यांना सांगते त्याच्याशी बोलायला… काय होते ते बघूया.. नाही तर खरं काय ते शोधून काढू आपण..तू काळजी करू नकोस..”

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम  भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग पहिला

           सानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली. हसतमुख चेहरा असलेल्या सानिकाचे डोळे रडून सुजलेले होते, चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आई बाबांच्या काळजात धडकी भरली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत. नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. आई बाबांनी तिला आधी शांत केले, बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला. सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की काय झालंय ते ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं.

       सानिका अजूनही रडतच होती, बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सानू, आधी तू चहा घे, नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला.

    कसंबसं रडू आवरून ती चहा प्यायली. आई बाबा पुढे काही बोलण्याआधी ती म्हणाली, “आई बाबा, आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी… खूप मोठी फसवणूक..” इतकं बोलून ती परत रडायला लागली.

    तिचं हे वाक्य ऐकताच आई बाबांना अजूनच काळजी वाटली.

    बाबांनी तिला विचारले, “सानू, असं का‌ म्हणते आहेस.. नक्की काय झालंय ते नीट सांग बघू…तू‌ काय बोलते आहेस काही एक‌ कळत नाहीये आम्हाला..”

    सानिका रडत रडत सगळं सांगायला‌ लागली. ती जे काही सांगत होती ते ऐकून आई बाबांना मोठा धक्का बसला.

    सानिका आणि सुशांत यांचे काही महीन्यांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झाले. दोघांचेही अरेंज मॅरेज. 

    सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत, उंच सडपातळ बांधा, स्वभावाने जरा लाजाळू, अबोल, सहनशील. भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी. मोठा भाऊ नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहायचा.
    सानिकाचा पदवी‌ अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांत चे स्थळ आले.

    सुशांत सरकारी नोकरीत कामाला, दिसायला राजबिंडा, घारे डोळे, उंच पुरा, पिळदार शरीरयष्टी. सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले. दोघांचे लग्न ठरल्यावर महीनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना‌ बोलायला भेटायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला. वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबाविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.

    लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आई बाबांना घर अगदी खायला उठू लागले. इकडे सानिका सुद्धा नविन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्न म्हंटलं की प्रेम, उत्साह, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले.
    लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांत ची वाट बघत राहीली पण तो आलाच नाही. शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला, सानिका लाजतच त्याला म्हणाली ,”रात्री बराच वेळ वाट बघितली मी तुमची..”

    त्यावर तो इतकंच बोलला, “सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलचं नाही…..त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती, जरा वेळ जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला..मुळात येऊच दिले नाही मला..असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला..तू ही दमली असणार ना लग्नाच्या धावपळीत….”

    सुशांत अगदी सहज असं बोलून गेला. पहिल्या रात्री पेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालंय की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार, असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्याचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटत असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही.

    फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली. मोठे दिर जाऊ, सासू सासरे सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला. सुशांत सुद्धा जरा फ्रेश होऊन त्यांच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला. जाऊबाईंनी हळूच सानिकाला विचारले, “काय मग, कशी होती पहिली रात्र.. काही त्रास तर होत नाहीये ना..काही वाटलं तर मला बिनधास्त सांग…मोठ्या बहिणी प्रमाणे आहे मी तुला..”

    जाऊबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं. तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली.

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

       लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.

        दोघेही मलेशियाला पोहोचले, स्पेशल हनीमून पॅकेज घेतले असल्याने दोघे हॉटेल मध्ये त्यांच्या खोलीत पोहोचले तसंच त्यांना एक गोड सरप्राइज मिळाले. खोली गुलाबांच्या फुलांनी, पाकळ्यांनी छान सजविली होती. सगळीकडे मंद सुवास दरवळत होता. लाईटच्या मंद प्रकाशात अतिशय रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ते बघताच मोनिका आपसूकच पुटपुटली,  
    “व्वा..किती रोमॅंटिक वाटतंय ना सगळं..”

        मयंकच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नव्हता. तिच्या बोलण्याला काही एक उत्तर न देता तो बॅग ठेवून आंघोळीला निघून गेला. तो बाहेर आला तसंच मोनिकाने त्याला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो दचकून तिला दूर करत म्हणाला, “चला भूक लागली आहे, पटकन फ्रेश हो आपण खाली जरा काही खाऊन येऊ आणि फेरफटका मारून येऊ.

         त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मोनिकाला फार वाईट वाटले, अशा प्रकारे दूर का लोटले असावे मयंक ने. त्याला मी असं जवळ आलेलं आवडलं नसेल का, की मी फार उतावीळ झाले असं काही वाटत असेल. पण मिठी मारण्यात काही वावगं तर नाही शिवाय आता आम्ही नवरा बायको आहोत मग असा का वागतोय मयंक लग्नापासून. जराही प्रेमाने बोलला नाही की जवळही घेतले नाही. अजून त्याला वेळ हवा असेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत मोनिका आंघोळ करताना करत होती. फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघेही खाली गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही खाली फेरफटका मारत होते. खोलीवर परतले तेव्हा मयंक म्हणाला , आज प्रवासामुळे थकवा वाटतोय, उद्या सकाळीच फिरायला निघायचं आहे. लवकर झोपा. इतकं बोलून तो अंगावर चादर ओढून झोपी गेला. मोनिकाला मात्र त्याच हे वागणं अजूनच खटकलं.
         

         त्याने प्रेमाने छान रोमॅंटिक काही तरी बोलावं, हळूहळू या नात्याला बहरायला एक पाऊल पुढे घ्यावं इतकीच तर अपेक्षा होती तिची पण मयंक ने तिचा हिरमोड केला. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या साथीदाराकडून प्रेमाची अपेक्षा ही असतेच पण मयंक मात्र फारच वेगळा वागत होता. विचार करत तिचे डोळे पाणावले.

     
       पुढे आठवडाभर एकाच खोलीत दोघेच असूनही तो तिला जराही जवळ घेत नव्हता. दिवसा बाहेर फिरायचे आणि हॉटेल मध्ये येऊन आराम करायचा असाच काय तो त्यांचा हनीमून साजरा झाला. मोनिका त्याच्या कुशीत शिरण्याचा, त्याला मिठी मारण्याचा अलगद प्रयत्न करत होती पण तो मात्र तिला दूर करत तिला टाळायचा प्रयत्न करत होता. आता दोघांच्या नात्यात या नाजुक विषयावर बोलायचं म्हणजे मुलीसाठी कठीणच तेव्हा नक्की काय करावे तिला काही सुचेना.

       दोघेही हनीमून वरून परत आले. मयंक ची सुट्टी संपली होती आणि तो नोकरीला रूजू झाला. मोनिका सुद्धा वडीलांच्या व्यवसायात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्यायला सुरु झाली. ती सतत काही तरी विचारात दिसते आहे हे तिच्या आई वडिलांनी ओळखले, “मोना , सगळं ठीक आहे ना..कशाच्या विचारात आहेस..” असही आईने तिला विचारले.
    नवरा बायको यांच्या मिलनाच्या विषयावर आई सोबत तरी कसं बोलावं तिला कळेना‌ त्यामुळे “काही नाही..मी ठिक आहे..” इतकंच ती बोलली.
         
        मोनिकाला आता मयंक विषयी जरा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. मयंक रोज उशीरा घरी यायचा, सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचा. मोनिका दिवसभर प्रवास , काम यामुळे थकून त्याची वाट बघत झोपी जायची. त्याला तर तेच हवे होते. शक्य त्या प्रकारे तिला टाळण्याचा प्रयत्न तो करत होता. आता आपणच पुढाकार घ्यावा असं मनोमन ठरवून मोनिका तो येत पर्यंत झोपली नाही. उगाच झोपण्याचे नाटक  करत ती बेडवर पडून होती.

    रात्री १२:३० च्या सुमारास तो घरी आला. बराच वेळ बाथरूम मधे फ्रेश होत होता. बाहेर आला तर मोनिका मस्त तयार होऊन छान आकर्षक नाइट ड्रेस घालून त्याच्या समोर उभी राहिली. तिला बघताच त्याला धक्काच बसला. आपल्याला असं छान तयार झालेलं बघून मयंक आपल्याकडे आकर्षित होईल असे तिला वाटलेले पण तशी काहीही भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तिचा सुडौल बांधा, सेक्सी नाइट ड्रेस कडे दुर्लक्ष करत तो म्हणाला , “झोपली नाही अजून..”
    आता तिला त्याचा फार राग आलेला. लग्नाला तीन आठवडे होत आले होते पण मयंक तिला जराही स्पर्श करत नव्हता, जराही प्रेमाने छान काही बोलत नव्हता.

      ती आपला राग आवरत त्याला जाऊन बिलगली तसंच त्याने तिला जोरात दूर लोटले. “मोनिका, काय करतेय, खूप उशीर झाला आहे झोप आता” असं चिडक्या सुरात बोलून तो झोपला. ती रात्रभर रडत होती, विचार करत होती.
      आता त्याच्या विषयी अजूनच शंका तिला आल्या. मनात काही तरी ठरवून तिने पुढच्या काही दिवसांत त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या विषयी चौकशी सुरू केली. मयंकच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी तर नाही ना हाच संशय आता पर्यंत तिला होता. त्याच्या मित्रांकडून याविषयी असंच कळालं की आमच्या माहिती नुसार तरी त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी नव्हती, ना आहे. त्याच्या कंपनीत तर त्याच्या विषयी सगळ्यांनी त्याच्या कामाबाबत फारच कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. हुशार, मनमिळाऊ, वेळेत काम पूर्ण करणारा सगळ्यांचा लाडका मयंक असंच तिला कळालं.

        मग मयंक असं का वागतोय तिला काही कळत नव्हते. तिने एका मैत्रिणीला याविषयी सांगितले तेव्हा याविषयी स्पष्ट बोलून दोघांनी हा प्रश्न सोडवलेला बरा असं तिने सांगितलं.
       मयंकच्या जवळ जाण्यासाठी मोनिका अनेकदा पुढाकार घेत होती पण तो तिला टाळत ,दूर करत होता आणि तिच्या पदरात प्रेम नाही तर निराशाच येते होती.
       लग्नाला जवळपास दोन महिने झालेले होते. सगळ्यांसमोर आपल्याशी अगदी छान वागणारा हा मयंक काही तरी नक्कीच लपवितो आहे याची मोनिकाला खात्री पटली होती. आज मयंक सोबत स्पष्ट बोलून हा मनातला गोंधळ कमी करावा असं तिने ठरवलं.

        रविवार असल्याने दोघेही घरी होते. मयंक नाश्ता करून टिव्ही बघत बसला‌ होता. मोनिका हळूच त्याच्या पाठीमागून आली आणि तिने परत एकदा पुढाकार घेत त्याला मिठी मारत त्याच्या गालावर चुंबन केले. तिच्या या कृतीमुळे तो ताडकन उठून उभा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो चिडून म्हणाला, “मोनिका कितीदा सांगितलं तुला मला नाही आवडत तुझं असं वागणं…का करतेस तू असं…”

    मोनिका त्यावर उत्तरली “का रे…काय प्रोब्लेम आहे..आपण नवरा बायको आहोत ना..मग इतका अधिकार तर नक्कीच आहे मला..तुला आवडत नाही का मी..का टाळतोय मला सतत.. कुणी दुसरी असेल तुझ्या आयुष्यात तर तसं तरी सांग..का वागतोय असा तू..बोल मयंक बोल..”

    तो चिडून म्हणाला, “दुसरं कुणी आयुष्यात असण्याचा काही प्रश्नच नाही….मला नाही आवडत तू अशी मला चिपकलेली…मला‌ या सगळ्यात काही एक रस नाहीये… लैंगिक संबंध ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला..मी शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही ह्या सगळ्यासाठी…झालं आता समाधान…हेच ऐकायचं होतं ना‌ तुला..कळालं आता…आता परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस..”

    हातातलं रिमोट जमिनीवर आपटत तो तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, शरीर त्याच्या शब्दांनी थरथरू लागले. स्वतः ला सावरत ती सोफ्यावर बसून रडत होती. मयंक ने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपविली, आपली फसवणूक केली या गोष्टीचा तिला विश्र्वासच होत नव्हता.

        किती तरी वेळ विचार करत , रडत ती तिथेच बसून राहीली. मयंक ने तिचा मोठा विश्वासघात केला होता याचा जाब विचारण्यासाठी ती त्याच्या समोर गेली. त्याला विचारले, ” मयंक लग्नापूर्वी का नाही सांगितलं हे सगळं…का केला इतका मोठा विश्वासघात..किती प्रेम करते मी तुझ्यावर माहीत होतं ना तुला..अरे मला लग्नानंतर सुद्धा एकदा कधी तू विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर काही तरी उपचार केले असते.. काही तरी मार्ग काढला असता..पण तू फक्त माझ्या भावनांशी खेळला..मला‌ अंधारात ठेवले..प्रेमाचे दोन शब्द कधी बोलला नाही तू.. फसवणूक केली मयंक तू माझी..याची शिक्षा तुला मिळणारच..”

      त्यावर तो म्हणाला, “कर आता माझी बदनामी करत..सांग सगळ्यांना मी खरा पुरुष नाही.. लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही..नाहीये मी सक्षम.. माहीत आहे मला…लग्न का केलं म्हणतेस ना…लग्न न करण्याचे हे कारण नव्हतो सांगू शकत मी कुणाला..सगळ्यांचा सतत तगादा..काय सांगू त्यांना मी.. म्हणून केलं लग्न…”

    “अरे‌ पण तुझी अवस्था तुला माहीत होती ना… इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे…माझं आयुष्य उध्वस्त केलं मयंक तू…कळतंय का तुला… विश्वासाने. सांगितलं जरी असतं ना तर सहनही केलं असतं मी..मार्ग काढला असता यातून आपण..पण आता नाही… विश्वासघात केला तू…नाही राहू शकत मी तुझ्यासोबत..”

    इतकं बोलून कशीबशी पर्स उचलून मोनिका आई वडीलांकडे निघून आली. मोनिका अशी रडत रडत अचानक असं घरी आल्याने आई बाबा गोंधळले. तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसाच त्यांनाही मोठा धक्का बसला. या सगळ्याचा मोनिकाच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झाला. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे तिची तब्येत चांगलीच खालावली.

    सत्य कळताच मोनिकाच्या आई वडीलांनी मयंकचया घरच्यांना‌ फोन केला तर त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले मयंकला जाब विचारला तर त्याने सगळं खरं असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली होती. मोनिकाला भेटायला आले असता तिची माफी मागत ते इतकंच म्हणाले, ” मोना, आम्हाला हे सगळं माहीत असतं तर त्याच लग्न केलच नसतं गं..पण आम्हाला याविषयी खरंच काही कल्पना नव्हती. आमच्या मुलामुळे तुझ्यावर ही वेळ आली याचा आम्हालाही खूप त्रास होतोय..आम्ही सुद्धा कधीच स्वतः ला माफ करू शकणार नाही….”

    सतत तोच विषय, इतका मोठा मानसिक धक्का यामुळे मोनिका ची तब्येत जरा जास्त बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दिवसात मयंक एकदाही तिला भेटला नाही, फोन नाही.

    मोनिका तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असे त्याचे वडील त्याला ओरडून बोलले तेव्हा तिला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये आला‌ पण मोनिकाच्या आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले.
      काही दिवसांनी मोनिका बरी झाली. मयंकला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला. लग्न, प्रेम या सगळयां वरून आता तिचा विश्वास उडाला होता.

        एक सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आयुष्याच्या जोडीदाराला ओळखण्यात चुकली होती. लग्नापूर्वी कधीच तिला भेटायला पुढाकार मयंक का घेत नव्हता, लग्नापूर्वी कधीच रोमॅंटिक का बोलत नव्हता यांचं उत्तर तिला आता मिळालं होतं. आपण त्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, त्याच्या शांत स्वभावाचा दोष समजून त्याच्या वागण्या कडे, त्याला आपल्यात रस आहे की नाही हे जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केले याची मनापासून तिला खंत वाटली. 

        मयंक मध्ये शारीरिक दोष असताना त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून मोनिका ची फसवणूक केली. तिची काहीही चूक नसताना तिच्या भावना, तिच्या आयुष्याशी तो खेळला. असंच हल्ली समाजात बरेच ठिकाणी होताना दिसते आहे.

    अशाच एका सत्य घटनेवर आधारित मी ही कथा लिहिली आहे.

      मुलांमध्ये शारिरीक दोष असतील, ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतुल तर याविषयी त्यांच्या आई वडिलांना तरी कसे कळणार ना. पण मुळात अशा वेळी स्वतः ची परिस्थिती माहीत असताना एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळणे म्हणजे गुन्हाच म्हणावा‌ लागेल. लग्नानंतरही हे सत्य इतरांना कळणारच ना त्यापेक्षा असा प्रोब्लेम असल्यास आधीच विचार करून निर्णय घेतला तर अशी बिकट परिस्थिती येणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

        मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे..”

    ते ऐकताच मयंक काहीही न बोलता तिथून निघून गेला.

    आई मोनिकाच्या केसांवरून हात फिरवत पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात बुडाली.

        मोनिका अतिशय हुशार, आत्मविश्वासाने वडिलांचा मुंबई सारख्या शहरातील व्यवसाय अगदी सहजपणे सांभाळून शिक्षण पूर्ण करणारी. व्यवसायातील महत्वाच्या कामांमध्ये वडीलांना तिचा मोठा आधार वाटायचा. आई वडिलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, वयाच्या मानाने तिला व्यवसायातील उत्तम ज्ञान होते. अगदी महत्वाचा निर्णय ती मोठ्या चतुराईने घेत असे. अशा या मोनिकाच्या लग्नाचा विचार आता आई वडिलांच्या मनात सुरू झाला.

        मोनिका शी याविषयी बोलल्यावर तिने एकच अट घातली ती म्हणजे, ” मुलगा हा मुंबईत नोकरी करणारा असावा, म्हणजे वडीलांना व्यवसायात मदत करता येईल शिवाय आई वडीलांकडे लक्ष सुद्धा देता येईल..”

         मोनिकाच्या आई वडीलांना ही हे पटलं होतं. लहानपणापासून ती वडिलांसोबत त्यांच्या कामात शक्य तसा हातभार लावायची त्यामुळे तिच्या शिवाय एकट्याने या भल्या मोठ्या व्यवसायाची धुरा सांभाळणे त्यांनाही अवघडच होते.

           आता तिच्या अटी लक्षात घेऊन वर संशोधन सुरू झाले. जे स्थळ यायचे त्यांना आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली मोनिका सहजच पसंत पडायची. अशातच मयंकचे स्थळ आले. तो मूळचा मुंबईचा नसला तरी कॉलेज, नोकरी सगळं मुंबईत झालेले शिवाय दोघेही एकाच वयाचे. मयंक दिसायला देखणा, चांगल्या पदावर नोकरीला, शांत स्वभावाचा  त्यामुळे पहिल्या भेटीतच तिला तो बर्‍यापैकी आवडला. मग पुढे अजून जरा भेटून बोलून निर्णय घ्यावा असं तिने मनोमन ठरवलं. त्यालाही पहिल्या भेटीतच ती आवडली. तिच्या अटीनुसार तो सुयोग्य वाटल्याने तिने पुढाकार घेत पुढे गाठी भेटी घडवून आणल्या.

       त्याच्याशी बोलून तिला तो अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा वाटला. आता गोष्टी पुढे न्यायला हरकत नाही असंही तिला जाणवलं पण त्याचा हा शांत, जरा अबोल स्वभाव तिच्या अगदीच विरूद्ध त्यामुळे तिला जरा वेगळे वाटले पण प्रत्येकाचा स्वभाव असतो शिवाय नातं अजून नविन आहे तेव्हा वेळेनुसार तो मोकळा बोलेल असा विचार करून तिने लग्नाला होकार दिला.
       त्याच्याकडून तर सुरवातीपासूनच होकार मिळाला होता त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. दोघांचं लग्न ठरलं. तिला अगदी मनाप्रमाणे मुलगा मिळाल्याने ती अगदीच आनंदात होती. आता एकाच शहरात आहे म्हंटल्यावर वारंवार भेटी गाठी होणार म्हणून ती अजूनच सुखावली. लग्न ठरल्यानंतर एकमेकांना ओळखण्याची एक ओढ, उत्सुकता, आकर्षक अशा अनेक भावनांनी तिच्या मनात गर्दी केली. अशीच अवस्था त्याचीही असेल असेच तिला वाटलेले. तिच्या बिनधास्त, बोलक्या स्वभावामुळे तिनेच पुढाकार घेत त्याला फोन, मेसेज वरून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या पुढाकाराला तोही अगदी छान प्रतिसाद द्यायचा तेव्हा त्याच्याविषयी कुठली शंका मनात येणे शक्यच नव्हतं.
      लग्नाला अजून दोन महिन्यांचा अवधी होता तेव्हा मधल्या काळात दोघांच्या भेटी, संवाद हा सुरू होताच. पण या दरम्यान प्रत्येक वेळी भेटण्यासाठी तिच पुढाकार घ्यायची, तिला ही गोष्ट जरा खटकली पण त्याच्या शांत स्वभावामुळे कदाचित तो स्वतःहून भेटण्यासाठी काही बोलत नसावा किंवा आपणच पुढाकार घेतोय तेव्हा त्याला संधी मिळत नसावी असंही तिला वाटलं. भेटल्यावर त्याची अगदी छान वागणूक असल्याने तिने मनात कधी फार शंका निर्माण होऊ दिली नाही. भेटल्यावर त्याच्या वागण्या बोलण्यातून काही वेगळे तिला कधी जाणवलं नाही. दोन महिन्यांत लग्नाची खरेदी, सगळी तयारी ह्यात भराभर वेळ निघून गेली. मुंबईत मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. सगळेच अगदी उत्साहात, लग्न सोहळ्यात कशाचीच कमी नव्हती.
       लग्नात पाठवणी झाल्यावर मुंबईतल्या त्याच्या फ्लॅटवर दोघेही गेले. सोबतीला पाहुणे मंडळी होतीच. मनाप्रमाणे सगळं झाल्याने मोनिका खूप आनंदी होती. मयंकच्या फ्लॅट वर दुसऱ्या दिवशी लग्नानंतर सत्यनारायण पुजा करण्यात आली आणि पहिल्या रात्रीची तयारीही.
       लग्न म्हंटलं की दोघांच्याही मनात प्रेमाचा एक वेगळाच बंध निर्माण होऊन मीलनाची ओढ लागलेली असते. नैसर्गिक भावनाच आहे ती पण या ओढी सोबतच मनात भिती, हुरहूर सुद्धा असते. मोनिका चेही तेच झाले. आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आज लाजून, घाबरून सजविलेल्या खोलीत बसून मयंकची वाट बघत होती. नाईलाजाने तो खोलीत आला तसंच तिची धडधड वाढली, मयंक प्रेमळ नजरेने आपल्याला बघून अलगद मिठीत घेईल , छान काही तरी रोमॅंटिक बोलेल असेच काहीसे तिला वाटलेले पण घडले काही तरी भलतेच. त्याने खोलीत येताच तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला , “छान दिसते आहेस…आजचा दिवस खुप खास आहे ना पण मोनिका मला जरा वेळ हवा आहे.. खूप दगदग झाली ना मागच्या काही दिवसात..तू सुद्धा दमली असशील ना ..आराम कर..‌मलाही खूप झोप येत आहे… मागच्या काही दिवसात झोपच झाली नाही..”

       त्याचं असं बोलणं तिला खटकलं पण कदाचित मयंक ला वेळ हवा आहे, तो आता या सगळ्याला मानसिकरीत्या तयार नाही, शारिरीक थकवा जाणवत असेल त्याला असा बराच विचार करून तिने अंगावरचे दागिने काढले, साडी बदलून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. मनात एक प्रकारची हुरहूर तिला जाणवत होती पण पुढच्या दोन दिवसांनी दोघेही हनीमून साठी मलेशिया ला जाणार होते. तिथे दोघांना छान एकांत मिळेल अशा सुखद भावनेने ती आजच्या रात्रीचा फारसा विचार न करता झोपी गेली.
      व्यवसायातील महत्वाचे, अवघड निर्णय अगदी सहजपणे, मोठ्या आत्मविश्वासाने घेत असली तरी मनात मयंक विषयी प्रेम, एक नाजुक भावना तिच्या मनात होती. आता तिच्या मनाला आतुरता लागली होती ती म्हणजे हनीमून ला जाण्याची. या सगळ्यात त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र तिला ओळखता आले नाही.

       मोनिका आणि मयंक यांच्या नात्यात पुढे नक्की काय होते, मयंक काही लपवत तर नाहीये ना. जशी मोनिकाला मयंकची ओढ वाटते आहे तशीच त्याला मोनिकाची ओढ जाणवत असेल का?
    मोनिका हॉस्पिटलमध्ये कशी? तिची आई जे म्हणाली फसवणूक, विश्वासघात हे सगळं नक्की काय आहे ?
    असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असणार ना. कथेत पुढे काय होते याची उत्सुकता सुद्धा लागली असणार,
    तर ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. दोघांच्या नात्याविषयी जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

      
     
      

  • तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

    आरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली.
    दोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात गुंतल्याने आई आणि आरती दोघींचेच विश्व. दिवाळीच्या सुट्टीत चार दिवस पाहुणे म्हणून भाऊ, भावजया, भाचे कंपनी यायची आणि पुढे वर्षभर त्यांच्या आठवणी मनात साठवून जगायचं असंच काहीसं झालं होतं आरतीच्या आईचं.

    मुळात शांत स्वभाव त्यामुळे मुला सुनांवर ओझे नको म्हणून त्या काही त्यांना कुठल्याच बाबतीत काही बोलेना. बाबांची पेन्शन शिवाय दादांच्या महिन्याला येणार्‍या पॉकेट मनी मधून दोघी मायलेकी घरखर्च करायच्या. त्यातही वहिनीच्या लपून छपून दादा पैसे पाठवतो असं कळाल्यावर तर आरतीला अजूनच वाईट वाटे.

    आता आरती वयात आली होती आईला वाटे आपल्या डोळ्यासमोर पोरीचे हात पिवळे झाले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळं. त्यांनी आरती जवळ तिच्या लग्नाविषयी बोलून पण दाखविले पण प्रत्येक वेळी तिचं उत्तर ठरलेलं, “मला नाही करायचं लग्न..तुला एकटीला सोडून मला नाही जायचं सासरी..”

    आपण सासरी गेलो तर आईचं कसं होणार या विचाराने लग्न न करण्याचा निश्चय आरतीने केला, कारण भाऊ भावजय आईला सोबत घेऊन जाणार नाही याची तिला एव्हाना खात्री पटली होती. इकडे आईला वाटे आपण आहोत तोपर्यंत ठिक पण आपण गेल्यावर आरती एकटी आयुष्य कसं जगणार? भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही? आरतीच्या लग्न न करण्याच्या निश्चयाने भाऊ सुद्धा तिला त्याविषयी फार काही आग्रह करत नसे.

    दोघीही आपापल्या हट्टाला चिकटून. आरतीला एक छोटीशी नोकरी मिळाली होती, नोकरी आणि आई असं तिचं विश्व बनलेलं. भराभर दिवस , वर्षे जात होते.
    अशातच एकदा आईची तब्येत खराब झाली आणि तिला कॅन्सर असल्याचे कळाले. आईचे उपचार सुरू असले तरी तिच्या जगण्याची शक्यता कमी आहे हे डॉक्टरांकडून सुरवातीलाच कळाले होते.

    आता तर आरतीने आपला निश्चय अजूनच पक्का केला. आईची सेवा करायची आणि ती हयात आहे तितके दिवस आनंदात घालवायचं असं ठरवलं. नोकरी सोडून आरतीने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. घरीच ट्युशन घेताना आई कडेही लक्ष देता यायचे आणि थोडी फार कमाई सुद्धा व्हायची. भाऊ भावजय अधूनमधून भेटायला येत असे. आई म्हणायची आरती तू माझ्या डोळ्यांदेखत लग्न कर पण आरती काही मानत नव्हती. तू माझी काळजी करू नकोस म्हणत तीच आईची समजूत काढत होती.
    असेच कसंबसं एक वर्ष‌ गेलं आणि आई आरतीला सोडून कायमची निघून गेली.

    आई कुठल्याही क्षणी आपल्याला सोडून जाऊ शकते हे माहीत असले तरी ती गेल्यावर ते वास्तव स्विकारण्याची हिम्मत आरती मध्ये नव्हती. आईच्या जाण्याने ती पोरकी झाली होती, पूर्णपणे एकटी पडली होती, मनातून पार खचून गेली होती. आईच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात जिवंत होत्या.
    आई गेल्यावर आरतीला मोठा भाऊ आग्रह करत सोबत घेऊन गेला पण भावाच्या संसारात आपली अडचण होतेय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवले. दोन भाऊ आहेत मग दुसर्‍यानेही बहिणीचा जरा भार उचलावा अशी भावजयीची प्रतिक्रिया कानावर पडताच आरतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या राहत्या घरी आईच्या आठवणीने एक एक क्षण कठीण म्हणून आरतीने होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गावचे राहते घर भाड्याने दिले आणि पूर्वी नोकरीला होती त्या मालकाशी बोलून नोकरी परत मिळविली.

    आरती पूर्णपणे एकटी पडली होती. कधीतरी भाऊ भेटून जायचे, सोबत चल म्हणायचे पण तुमच्यावर भार नको मी इथेच बरी म्हणत ती आयुष्य जगत होती. असं खडतर आयुष्य जगताना पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेली आरती चाळीशी पलिकडची दिसायला लागली, स्वतः कडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. भाऊ म्हणायचे अजून वेळ गेलेली नाही, तू लग्न कर पण प्रेम, भावना सगळ्या गोष्टींचा विचार तिने कधी केलाच नव्हता आणि आता तर तिने मनातून सगळे भाव पुसून टाकले होते. तारूण्यात मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी काही तरी जाणवत असेलही पण जबाबदारी पुढे तिने ते कधी अनुभवण्याचा विचार केला नव्हताच.
    आई गेल्यावर एकटेपणाची भावना मनात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचारही तिच्या मनात आलेला पण आई नेहमी सांगायची, ” मी गेल्यावर खचून जाऊ नकोस, तू दुर्गा आहेस, तूच रणरागिणी आहेस…”
    आईचे शब्द आठवून मनातल्या वाईट विचारांना लाथ मारत ती नव्याने जगायचा प्रयत्न करत होती. होस्टेलमध्ये बर्‍याच पिडीत महिला, शिकणाऱ्या अनाथ मुली होत्या. त्यांच्याकडे बघत आरती विचार करायची, ” आपल्या वयाच्या पस्तीशी पर्यंत का होईना पण आईचं प्रेम लाभलं.. दूर का असेना पण भाऊ म्हणायला भाऊ सुद्धा आहेत…कधी फोन वर चौकशी तर करतात.. इतरांच्या मानाने आपण सुखीचं आहोत..”
    कशीबशी मनाची समजूत काढत ती नोकरी करत आयुष्य जगत होती. गरजूंना शक्य ती मदत करत समाजसेवा करण्याचा निर्णय तिने घेतला आणि पुढचे आयुष्य असंच समाजसेवेत अर्पण करण्याचे मनोमन ठरविले.

    हा लेख सत्य परिस्थिती वर आधारित असून काही भाग काल्पनिक आहे.
    आरती सारखं आयुष्य जगणार्‍या स्त्रिया म्हणजे खरंच रणरागिणी आहेत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

    नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला पडायचे पण कधी कुणाला विचारण्याची हिंमत झाली नाही. अनाथाश्रमाच्या मुख्य सविता ताई म्हणजेच माई तिच्या साठी आई समान होत्या तर अख्खा आश्रम तिचं कुटुंब.

    बारावीमध्ये ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. पुढे संगणक शाखेत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिलाच दिवस होता तो. नेहमीप्रमाणेच अगदी साधा पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली आणि माईंचा आशिर्वाद घेऊन कॉलेजला निघाली. जुलै महिना असल्याने जरा पावसाचे चिन्ह दिसत होतेच. लगबगीने बस स्टॉपवर येऊन उभी राहिली. बस स्टॉपवर दोन लहान मुले बाजूला खाली फुटपाथवर बसून खेळत होते आणि त्यांची आई तिथे उभ्या असलेल्या लोकांना गुलाबाची फुले विकत घेण्यासाठी विनवण्या करत होती. यावरच त्यांचं पोट भरत असं एकंदरीत परिस्थिती पाहता नेत्राला लक्षात  आलं. तिला त्या मुलांकडे बघून वाईट वाटत होते, मनात काही तरी विचार करत तिने स्वतः जवळचा जेवणाचा डबा त्या लहान मुलांना दिला आणि ती मुलेही अगदी त्यावर तुटून पडली. ते बघताच त्यांच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि तिने एक गुलाबाचे फुल नेत्राला आग्रहाने दिले.

    हा सगळा प्रकार बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येक जण बघत होता. त्या गर्दीत राघव सुद्धा उभा होता. त्याला नेत्रा विषयी एक वेगळाच अभिमान वाटला, कौतुकही वाटले. तिच्या प्रेमळ स्वभावाची जाण त्याला त्या क्षणभरात झाली‌. त्याचे डोळे तिच्यावरच स्थिरावले.

    काही वेळातच बस आली आणि नेत्रा बसमध्ये चढली. योगायोगाने नेत्रा आणि राघवला आजुबाजूला जागा मिळाली. नेत्राचे कौतुक करण्याच्या उद्देशाने राघव म्हणाला , “हाय, मी राघव. तुम्ही खरंच खूप छान काम केलं आज..त्या भुकेल्या मुलांना डबा दिला तेव्हा त्या मुलांच समाधान बघता खरंच खूप छान वाटलं. तुमचं खरंच खूप कौतुक वाटलं..आपणही काही मदत करावी म्हणून मी दोन पिवळ्या गुलाबाची फुले त्या बाईंकडून घेतली पण आता या फुलांचा तुम्ही स्वीकार केला तर मला आनंदच होईल. फक्त तुमचं कौतुक म्हणून माझ्याकडून हि भेट समजा.”

    नेत्राला त्याच्या बोलण्याने जरा अवघडल्या सारखे वाटले. ती त्याला म्हणाली, “माफ करा पण आपली काही ओळख नसताना मी या फुलांचा स्वीकार करू शकत नाही..”

    त्यावर तो म्हणाला, ” असो… काही हरकत नाही..पण गैरसमज नको..मला खरंच कौतुकास्पद वाटलं तुमचं वागणं म्हणून म्हंटलं शिवाय मी एका मुलाखतीला जातोय तिथे फुले घेऊन कसा जाऊ हाही प्रश्न आहेच..”

    ते ऐकताच मनोमन विचार करत नेत्रा म्हणाली, “ठिक आहे द्या मग मला ती फुले.. गरज नसताना त्या माऊली ला मदत व्हावी म्हणून घेतलीत ना फुले..मग तुमचं सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल.. तुमच्या मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा ?..”

    तिचं बोलणं, तिचं वागणं बघता राघवच्या मनात तिच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. दोघांनी स्टॉप येत पर्यंत गप्पा मारल्या.

    कॉलेजचा पहिला दिवस नेत्रा साठी खास होता.सगळा नविन अनुभव, नविन विश्व. आश्रमात परत आल्यावर तिने माईंजवळ दिवसभराच्या सगळ्या आठवणींची उजळणी केली. त्यात राघव विषयी सांगताना का कोण जाणे पण एक आनंदाची लहर तिच्या चेहऱ्यावर झळकली, ते भाव माईंनी अलगद टिपले. माईंना जरा काळजी सुद्धा वाटली पण आपली नेत्रा समजुतदार आहे, विचारी आहे शिवाय ती आपल्या पासून काही लपवत नाही याची त्यांना खात्री होती.

    दोन दिवसांनी सकाळी परत बस स्टॉपवर तिला राघव भेटला, पेढ्यांचा डबा तिच्यासमोर देत तिला म्हणाला, “मिस नेत्रा, तुम्ही माझ्यासाठी लकी ठरलात..मला नोकरी मिळाली.. तुमच्याशी गप्पा मारून फ्रेश मूडमध्ये मुलाखत दिली आणि निवड झाली..थ्यॅंक्यू.. प्लीज पेढा घ्या ना..”

    नेत्राने त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “माझ्या मुळे नाही तुम्ही तुमच्या जिद्दीने, मेहनतीमुळे निवडले गेले..”

    राघव तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता. काळी सावळी असली तरी किती सुंदर व्यक्तीमत्व आहे हे असा विचार करत तो एकटक तिला बघत होता. दोघांची नजरानजर झाली तशीच ती लाजली.

    राघव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार मेहनती मुलगा. पिळदार शरीरयष्टी, सावळा वर्ण, उंच पुरा रूबाबदार.

    दोघांची त्या बस स्टॉपवर अधून मधून भेट व्हायची. हळूहळू मैत्री झाली.

    आजकाल नेत्राच्या वागण्यात बोलण्यात जरा वेगळा बदल माईंना जाणवत होता. ती एका वेगळ्या विश्वात वावरत होती. आनंदी राहत होती, आपण कसं दिसतोय, कॉलेजला जाताना नीट तयारी केली की नाही अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे नेत्रा बारकाईने लक्ष देऊ लागली होती.

    माईंना हा बदल आवडत होता पण नेत्रा प्रेमात तर पडली नसेल ना की कॉलेज मध्ये इतर मुलींमध्ये आपणही नेटकं दिसावं म्हणून हा बदल झाला याचा अंदाज त्यांना बांधता येत नव्हता. हल्ली तिच्या बोलण्यात राघवचा उद्धार हा असायचाच.
    पहीलाच मित्र होता तो तिचा शिवाय वयाच्या ज्या टप्प्यावर नेत्रा होती त्यामुळे माईंना तिची काळजी वाटू लागली. तिच्याशी यावर बोलावं का असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

    इकडे दोघांची मैत्री छान रंगली होती. एकमेकांची ओढ निर्माण झाली होती. राघवला नेत्राने ती अनाथ असल्याचे सांगितले होतेच पण त्याला त्याची काही अडचण नव्हती. तो तिच्या प्रेमात पडला होता. मनापासून त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली होती.

    एक दिवस त्याने बस स्टॉपवरच्या त्या माऊली कडून लाल गुलाबाचे फुल नेत्राला देत आपले प्रेम व्यक्त केले. तिलाही सगळं हवंहवंसं वाटत होतं पण आपण अनाथ आहोत तेव्हा राघवचे आई वडील आपला स्वीकार करतील का या विचाराने ती निराश झाली. राघव वर तिचेही प्रेम होतेच, त्याच्या सोबत संसार करण्याचे स्वप्न ती बघत होती. पण त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला तरी पुढे काय..हे संसाराचं स्वप्न वास्तव्यात उतरू शकणार की नाही याची तिला भिती वाटत होती.

    याविषयी माईंसोबत बोलावं का असंही तिला वाटत होतं.

    राघव तिच्या उत्तराची वाट बघत होता पण नेत्रा मात्र विचारांच्या गर्दीत अडकली होती.

    आता नेत्रा पुढे काय करेल ? दोघांच्या नात्याचे भविष्य काय असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    काय मग उत्सुकता वाढली की नाही, कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आईची दुहेरी भूमिका…

    रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची. 
    जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
    भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
    लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
    ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
    दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
    हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
    दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी. 

    खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

    मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”

    मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.

    मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता

    घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”

    रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी,  बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”

    मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”

    रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”

    मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
    मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”

    मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.

    रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
    मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
    लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
    अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
    सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
    रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
    एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
    एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
    तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
    महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
    महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
    तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
    मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
    दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
    आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
    मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.

    मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.

    फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
    त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.

    अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

    तिला काही सांगायचंय..
    हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
    लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
    आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
    एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
    घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
    असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
    खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
    संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
    ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
    कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
    राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
    आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
    आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
    तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
    मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
    खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
    प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

    प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
    कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
    कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

    आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

    रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.
    कोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.
    शरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहायचे. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.
    पुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”
    वयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.
    अचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.
    रखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.
    उसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.
    अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.
    सतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.
    दोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.
    मुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.

    अशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.

    हे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.
    आई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.
    कष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.
    कुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे