Tag: lockdown

  • भुताटकी इमारत ( भयकथा)

    मदन नोकरीच्या शोधात पुण्यात आलेला. सुरवातीला एक खोली मित्रांसोबत शेअर करून काटकसरीने वर्ष काढलं. आता मात्र चांगली नोकरी मिळाली आणि आई बाबांना आता पुण्यातच घेऊन यायचं असं त्याचं ठरलं. आई बाबा इकडे येणार म्हंटल्यावर अर्थातच घराची शोधाशोध सुरू झाली. जिथून ऑफिस फार लांब पडणार नाही अशा एरिया मध्ये घर बघावं असा विचार करून त्याने घर शोधायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी आता बजेटमध्ये बसेल असा घर/ फ्लॅट शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरत होता.

    अशातच एक दिवस त्याच्या नजरेत पडली एक सोसायटी. मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेली ही सोसायटी बाहेरून अगदी राजवाड्यासारखे आर्किटेक्चर असलेली, साधारण तीन चार वर्षांपूर्वीच तयार झालेली असावी असा अंदाज बिल्डिंग बघताच येत होता. मदन चे लक्ष या सोसायटीकडे गेले आणि तो आपली टू व्हीलर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करून रस्ता ओलांडून सोसायटी गेटच्या दिशेने चौकशी करायला जाऊ लागला. बिल्डिंगच्या आजुबाजूला बरीच हिरवीगार झाडे होती, आवारात पालापाचोळा पडलेला, दुरून एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासणारी ही सोसायटी मदनला जवळून बघताच जरा भयाण वाटली. गेटच्या आत चिटपाखरूही दिसत नव्हते पण गेटवर खुर्ची टाकून एक पन्नाशीच्या वयातील सिक्युरिटी गार्ड हातात काठी घेऊन बसलेले. मदन त्यांच्या दिशेने आला आणि म्हणाला,
    “नमस्कार, या सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट आहे का भाड्याने मिळेल असा..?”

    सिक्युरिटी गार्ड हसून उत्तरला, “भाड्याने फ्लॅट..या सोसायटीमध्ये.. नाही रे बाबा…इथे कुणीच राहत नाही.. अख्खी सोसायटी रिकामी आहे.. फ्लॅट तर आहेत पण राहण्याची हिंमत कुणातही नाही इथे…”

    गार्डच्या बोलण्याने मदन जरा गोंधळला आणि म्हणाला, “म्हणजे..मला काही कळालं नाही..इतकी सुंदर सोसायटी, तीही अगदी मोक्याच्या ठिकाणी आणि पूर्ण रिकामी.. म्हणजे काही प्रोब्लेम आहे का?”

    गार्ड आजुबाजूला नजर फिरवत म्हणाला, “हो..इथे भूत आहे भूत..दिवसा तरी मी असतो पण रात्री तर चिटपाखरूही फिरकत नाही इकडे.. ”

    मदन त्यावर हसला आणि म्हणाला, “भूत…..काही तरीच काय हो..भूत वगैरे काही नसतं बघा..उगाच मनात येईल ते सांगू नका..सरळ सांगा ना फ्लॅट उपलब्ध नाही म्हणून..”

    गार्ड त्यावर म्हणाला, “हे बघ पोरा..मला काही हौस नाही उगाच काहीतरी सांगण्याची..तुझा विश्वास नसेल तर नको ठेवू पण जे काही मी सांगतोय ना ते खरं आहे..तुला कुणी तरी दिसतंय का इथं बघ ना जरा.. खूप मोठी स्टोरी आहे या सोसायटीची…”

    मदनला अजूनही गार्ड च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. “बरं..भूत आहे तर मग तुम्ही कसे काय इथे? सोसायटी तर रिकामी आहे ना मग तुमची उगाच ड्युटी का इथे..”

    गार्ड – “बंद सोसायटी बघून चोरट्यांनी, सट्टा जुगार वाल्यांनी भरदिवसा इथं अड्डा बनवायला नको म्हणून मी असतो सायंकाळी सहा वाजेपर्यंत..पण त्यानंतर कानाला खडा.. पोटापाण्यासाठी दिवसभर ड्युटीवर यावं लागतं..”

    गार्ड चे उत्तर ऐकून मदन परत जायला निघाला. रात्री रूमवर आल्यावर घडलेला सगळा प्रकार त्याने मित्राला हसत हसत सांगितला तर त्यावर मित्र म्हणाला ,”अरे मदन, हसू नकोस..ती सोसायटी खरंच भुताटकी आहे..मी ऐकलंय त्या सोसायटी विषयी बरंच काही पण नक्की काय स्टोरी आहे हे काही माहित नाही..”

    मित्राचे बोलणे ऐकून मात्र मदनला हा भूत प्रकार, ही बंद सोसायटी फार इंटरेस्टिंग वाटली. आता या सोसायटीची स्टोरी माहिती करून घ्यायला हवी असा विचार करून उद्या परत त्या गार्ड ला भेटायचं त्याने ठरवलं. रात्रभर सतत ती राजवाड्या प्रमाणे भासणारी बंद सोसायटी त्याच्या नजरेसमोर येत होती, डोक्यात गार्ड चे शब्द , भूत.. अख्खी सोसायटी रिकामी..बंद..हे सगळे विचार काही गोंधळ घालत होते.. मदनने कशीबशी रात्र काढली.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच मदन त्या सोसायटी जवळ गेला. सिक्युरिटी गार्ड गेटच्या आतला परिसर स्वच्छ करत होता. मदन ने बंद गेट जवळून त्यांना हाक मारली, “दादा.. ओळखलं का? मी काल आलेलो बघा..जरा बोलायचं होतं हो..”

    गार्ड ने हातातला झाडू बाजूला ठेवला आणि म्हणाला, “अरे आज परत इकडे..तेही सकाळीच..बोल काय म्हणतोस..”

    मदन – “काल तुम्ही सांगितलं ना या सोसायटी विषयी..भूत..अख्खी सोसायटी रिकामी.. यामागे काही तरी मोठी स्टोरी आहे म्हणालात..मला ना ते सगळं जाणून घ्यायचंय हो..काल रात्री सतत हाच विचार सुरू होता डोक्यात..प्लीज मला सांगा ना काय स्टोरी आहे या बंद सोसायटीच्या मागे..”

    गार्ड – “अरे बाळा, काल तर विश्वास नव्हता तुझा..हसत होतास माझ्या बोलण्यावर..पण मला सांग, कशासाठी जाणून घ्यायचं आहे सगळं..?”

    मदन – “दादा, खरं सांगायचं म्हणजे माझा ना भूत वगैरे वर विश्वास नाही हो पण काल ही सोसायटी बघितली..दुरून अगदी राजवाडा वाटणारी ही सुंदर सोसायटी अशी अख्खी रिकामी, बंद कशी काय असू शकते हा विचार माझ्या डोक्यातून काही केल्या जात नाहीये.. मित्रांकडून सुद्धा कळाले की या सोसायटीची मोठी स्टोरी आहे म्हणून.. तेव्हापासून तर अजूनच वेड लागलंय मला..प्लीज सांगा ना..”

    गार्ड – “बरं बरं सांगतो सगळं पण मी जे सांगतोय ते कुणाला सांगू नकोस.. माझ्याही पोटापाण्याचा प्रश्न आहे.. बिल्डर मलाच रस्त्यावर आणेल जर त्यांना कळालं की मी कुण्या परक्या व्यक्तीला सोसायटी विषयी सांगितलं तर माझी नोकरी जाईल..”

    मदन – “नाही सांगत मी कुणाला पण मला प्लीज सांगा आता तुम्ही सगळं..”

    गार्ड गेटमधून बाहेर आला आणि मदनची अस्वस्थता बघून म्हणाला, “फार हट्टी आहेस रे पोरा.. थांब बाजुच्या टपरीवरून दोन चहा आणतो..बस इथे.. बसून बोलूया..”

    गेटजवळ असलेल्या झाडाभोवतीच्या ओट्यावर मदन बसला. गार्ड लगेच चहाचे दोन कप हातात घेऊन येत आला आणि मदनला एक कप देत सोसायटीची स्टोरी सांगू लागला,

    “तर गोष्ट अशी आहे की, दोन‌ वर्षांपूर्वी ही राजवाड्यासारखी सोसायटी उभी झाली.. बांधकाम सुरू होते तेव्हापासून मी इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. कधी दिवसा तर कधी रात्री माझी इथे ड्युटी. इमारत तयार झाली तसेच मोठ्या आनंदाने अनेक कुटुंबे इथे राहायला आले. बर्‍याच जणांनी धुमधडाक्यात वास्तुशांती वगैरे केली. सगळे आपापलं नवं घर सजविण्यात गुंतलेले. कुणी उत्साहाने फर्निचर बनवून घेतले तर कुणी लाखोंचे इंटेरियर करवून घेतले. अशातच काही महिने निघून गेले.
    एका रात्री माझी नाईट ड्युटी होती. पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात विजा चमकत होत्या, विजांचा गडगडाट त्या रात्रीच्या शांततेचा भंग करत होता.  अचानक लाइट गेली, सोसायटी मधील काही इमरजन्सी लाइट सोडले तर सगळीकडे किर्र अंधार. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजत आलेले. मी छत्री हातात घेतली आणि सोसायटीच्या आवारात पहारा देण्यासाठी राऊंड वर निघणार तोच एक किंचाळी कानावर पडली सोबतच धपकन काही तरी पडल्याचा आवाज सुद्धा आला.  पावसाळी रात्रीच्या त्या भयाण वातावरणात अशी अचानक किंचाळी ऐकून मी सुद्धा घाबरलो पण देवाचा धावा करत धपाधप पावले टाकत नेमकं काय झालंय याचा अंदाज घ्यायला बिल्डिंग भोवती जायला लागलो. मागच्या बाजूला जाऊन बघतो तर काय, कुणीतरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला.. भळाभळा रक्त वाहत होते, उघडे डोळे स्थीर नजर ठेवून एकटक कुठेतरी बघत होते. एकंदरीत चित्र बघून मला पार घाम फुटला, भितीने हातपाय थरथरत होते. धावतच गेटवर आलो आणि सोसायटीच्या सेक्रेटरी ला इंटरकॉम वरून फोन लावला. पुढच्या काही मिनीटात त्यांच्यासह सोसायटी मधले बरेच जण खाली आले.
    एम्बुलन्स ला बोलावले गेले पण ती व्यक्ती कधीच हे जग सोडून गेलेली.

    ती मृत व्यक्ती म्हणजेच नवव्या मजल्यावर राहणारा सुधीर. सुधीर इथे एकटाच राहायचा. अतिशय उत्साही व्यक्तीमत्व असलेला हा तरुण दररोज न चुकता सकाळी सहा वाजता खाली दिसायचा. कधी मॉर्निंग वॉक करायला तर कधी व्यायाम व्हावा म्हणून सायकल चालवायचा. नंतर जिम मध्ये बराच वेळ व्यायाम वगैरे करून मग घरी परत जायचा. त्याची माझी दररोज सकाळी न चुकता गाठ पडायची आणि गुड मॉर्निंग म्हंटल्याशिवाय, कसे आहात वगैरे विचारपूस केल्याशिवाय तो दिसल्यावर कधीही न बोलता जायचा नाही. दररोज डोळ्यांसमोर बघितलेला हा माझ्या मुला समान सुधीर नवव्या मजल्यावरून रात्री उशिरा असा अचानक खाली कसा काय पडला याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. कुणी म्हणे त्याने आत्महत्या केली तर कुणी म्हणे अपघात झाला, पाय घसरून वगैरे तोल गेला असावा. नंतर तर कळालं की हा घातपात होता. त्याचा आणि बिल्डरचा बराच मोठा वाद होता, केस का काय सुरू होती कोर्टात. त्या वैमनस्यातून घातपात घडवून आणला अशीही चर्चा झाली पण नक्की काही पुरावा मिळाला नाही बघ.

    तो शरीराने तर गेला पण त्याचा आत्मा इथेच भटकत असतो. त्याच्या अशा अपघाती मृत्यूनंतर सोसायटीत भितीचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा खाली यायला जायला सगळे घाबरू लागले. इतकंच काय तर बर्‍याच जणांना तो मृत्यूनंतर सुद्धा दिसायचा. नववा मजला तर आठवडाभरात रिकामा झाला. भितीपोटी त्याच्या आजूबाजूचे लोक घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. त्यानंतर बर्‍याच जणांना तो दिसला. एकदा पहाटे दुसऱ्या मजल्यावरील नेने काकांना तो सोसायटीच्या आवारात सायकल फिरवत असलेला दिसला. काकांना भितीमुळे इतका मोठा धक्का बसला की ते दुसऱ्या मुलाकडे राहायला गेले. सुरवातीला काकांवर कुणी विश्वास ठेवला नाही पण हळूहळू बर्‍याच जणांनी त्याला बघितलं. कधी तो जॉगिंग करताना दिसायचा तर कधी गाडीवरून येताना, कधी सायकलवर तर जिम मध्ये. महिन्या दोन महिन्यात अख्खी सोसायटी रिकामी झाली. सगळे आपलं घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेले. घराचे लोन, हफ्ते सगळं सुरू.. आवडीने उत्साहाने सजवलेले हक्काचे घर सोडून लोकं दुसरीकडे भाड्याने राहायला गेले. त्यानंतर कुणी इथे कमी किंमतीत सुद्धा घर विकत घेतले नाही ना भाड्याने घर घेतले. वर्ष होऊन गेलं पण ही सोसायटी बंद पडून आहे. मी सुरवातीला रात्री सुद्धा असायचो पण मलाही तो दिसला. पूर्वी कितीही चांगला माणूस असला तरी मृत्यूनंतर तो दिसल्यावर भिती वाटणारच ना..तसा मी सुध्दा घाबरलो.. त्याने मृत्यूनंतर कुणाला त्रास दिला नाही पण त्याच्या अशा दिसण्याने लोकं जाम घाबरून गेली. अख्खी सोसायटी रिकामी झाली.
    म्हणून आता फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतो मी इथे. ”

    मदन सगळं ऐकूनच जाम घाबरला. दबक्या आवाजात त्याने विचारले, ” घातपात घडवून आणला म्हणजे नक्की काय झालेले..बिल्डर सोबत कशावरून वाद होता सुधीर चा? मग त्याचा घातपात असेल तर काहीच पुरावा नाही मिळाला?”

    गार्ड म्हणाला, “खरं तर ही सोसायटी ज्या जागेवर उभी आहे ना, ती जागा सुधीरच्या वडिलांची‌. पूर्वी त्यांचे लहानसे घर होते इथे आणि आजुबाजूला शेती. मोक्याची जागा म्हणून बिल्डरने त्यांच्या मागे लागून ही जागा मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला पण सुधीरचे बाबा काही जागा द्यायला तयार नव्हते. काही दिवसांनी सुधीरच्या आईला कॅन्सर झाल्याचे कळाले, मग उपचारासाठी पैसा हवा होता म्हणून सुधीरच्या बाबांनी फार काही विचार न करता ही जागा बिल्डरला दिली पण त्यांना मात्र बिल्डरने फसवले. जितकी किंमत होती त्याच्या अर्धे सुद्धा पैसे दिले नाही. एक फ्लॅट त्यांना राहायला दिला नवव्या मजल्यावर, जिथे सुधीर राहायचा तोच फ्लॅट. या दरम्यान सुधीर शिक्षणासाठी बाहेर होता शिवाय आईचे आजारपण, ऑपरेशन त्यामुळे त्याला या व्यवसायातील गोष्टी काही माहीत नव्हत्या. बिल्डरने सुधीरच्या वडीलांच्या सह्या घेऊन कमी किंमतीत ही जागा हडप केल्याची गोष्ट सुधीरला कळाली तेव्हा त्याने कोर्टात केस टाकली. इकडे उपचार करूनहु काही फायदा झाला नाही, काही महिन्यांत त्याच्या आईला स्वर्गवास झाला. बाबांना फसवणूक झाल्याचे कळाले शिवाय आई गेल्याचा धक्का, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली. तेही वर्षभरात हे जग सोडून गेले. सुधीर त्यांना एकटाच मुलगा होता. आई बाबा गेल्यावर तो खूप खचला पण बिल्डरने केलेल्या फसवणूकीचा बदला घ्यायचा असं त्याचं ठरलेलं होतं. पण अचानक त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्याने मृत्यूनंतर बिल्डरचा बदला घेतला बघ.. या सोसायटीतुल करोडो रुपये किंमतीची घरे बंदच आहे. बिल्डरची बदनामी झाली, लोकांनी बिल्डर वर केस करून घराची किंमत परत मागितली. अजूनही तो बिल्डर अनेक केस लढतो आहे कोर्टात. फसवून हडप केलेल्या या जागेवर सोसायटी तर उभी आहे पण इथे राज्य मात्र सुधीर करतो आहे, तेही ह्यात नसताना..ते म्हणतात ना, अतृप्त आत्मा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भटकत असतो तसाच हा प्रकार..”

    मदनचे मन सगळं काही ऐकून सुन्न झाले. सुधीरच्या आत्म्याला शांती मिळो असं नकळत तो मनोमन बोलून गेला. गार्ड परत गेट उघडून सोसायटीच्या आत आपल्या ड्युटीवर निघून गेला.

    समाप्त!!

     

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे