Tag: Marathi blogs

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

           तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

       अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

        आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
       दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
    पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

    जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

    तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
    त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
    जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
    विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

    या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
    तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
    तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

    तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
    तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

    तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
    ती परत रडायला लागली.

    जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
    जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

    आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

    तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

    झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

    झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

    हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

    ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

    प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग अंतिम

    अमन डायरी हातात घेऊन नदी किनारी गेला. नदीचे पाणी स्थिर पणे वाहत होते, आजुबाजूला दुरवर पसरलेली झाडे अमन बघत होता. त्याला या किनाऱ्यावरची आरती सोबतची भेट आठवली. तिच्या आई सोबत तर कधी एकटीच ती या नदी किनारी कपडे धुवायला यायची. अशीच एकदा एकटी आलेली तेव्हा अमन घरच्यांच्या लपून छपून तिला भेटायला नदीवर गेलेला. गुलाबी रंगाचा अगदी साधासा सलवार कमीज घालून आपल्या लांबसडक केसांची वेणी सांभाळत ती कपडे धुण्यात व्यस्त होती. अमन लांबूनच तिला न्याहाळत बसलेला. आजुबाजूला गावातील काही बाया सुद्धा धुणी धुवायला तिथे आलेल्या होत्या. जशा त्या बायका तिथून गेल्या तोच अमन धावत जाऊन आरतीला भेटला‌. अमनला बघताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती. बोलायला शब्द सुचत नव्हते पण आजुबाजूला बघत ती म्हणाली, “अमन अरे असं एकांतात आपल्या दोघांना कुणी बघितले तर गावात उगाच अफवा पसरतील…”

    तिच्या डोळ्यात बघतच तो म्हणाला, “किती सुंदर दिसतेस गं आरती तू…तुला भेटण्याची संधी बघत इथे आलो‌ आणि तू पळवून लावतेस…”

    ती लाजतच इकडे तिकडे बघत होती आणि अमन तिला बघत होता.

    ती गोड भेट आठवत असताना एक वार्‍याची गार झुळूक त्याला जवळून स्पर्शून गेली आणि तो भानावर आला. नदी किनारी बसून त्याने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.

    तिने त्या नदीवरील दोघांच्या भेटीचे छान वर्णन केले होते. तिच्या मनातल्या भावना, प्रेम, त्याला भेटल्यावर झालेला आनंद अगदी छान शब्दात उतरविला होता.

    पुढे पान बदलले तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यात लिहीले होते,

    “अमन, त्या दिवशी नदी किनारी आपण भेटलो‌ हे गावातल्या पाटलांच्या दिनूने बघितलं. आपल्या विषयी त्याला संशय आला. तू परत गेल्यावर त्याने एकदा मला असंच एकटं बघून गाठलं आणि आपल्या दोघांविषयी विचारलं. त्याची माझ्यावर वाईट नजर होती. त्याला मी आवडते, माझ्याशी त्याला लग्न करायचं असं तो मला बोलून गेला पण मी काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्यानंतर रोज कुठे ना कुठे तो माझा पाठलाग करत राहीला. मी त्याला भाव देत नाही त्याच्या प्रश्नांना उडवून लावते हे त्याला कळालं तसाच तो चिडला. गपगुमान मला हो‌ म्हण नाही तर गावात तुझी बदनामी करतो, तुझ्या घरच्यांना गावात राहणे मुश्किल करतो अशा धमक्या तो देत राहीला. मी खूप घाबरली अमन..तू कधी एकदा येतोस आणि मला यातून सोडवितो असं झालेलं मला..त्याच्या विषयी कुणाला सांगावं हे मला कळत नव्हतं… त्याचा अख्ख्या गावात दरारा..कुणी त्याच्या विरोधात जाणार नाही हे माहीत असल्याने काय करावं मला कळत नव्हतं. मला एकटीला घरातून बाहेर पडायला पण भिती वाटत होती अमन..मी फक्त तुझी वाट बघत होते. तू आलास की सगळं काही ठीक होईल म्हणून मी दिवस मोजत होते… वर्ष संपत होते…”

    इतकंच काय त्या डायरीत लिहीलं होतं.
    पण पुढे काय? हा प्रश्न अमनला पडला तितक्यात आरतीचा भास त्याला झाला.

    “अमन, एक दिवशी त्या दिनूने मला नदीवर एकटी बघून गाठलं. आईची तब्येत बरी नसल्याने मी एकटीच नदीवर आलेली. त्याने संधीचा फायदा घेत माझा हात धरून लग्नासाठी तयार हो म्हणत हट्टच धरला. मी नाही म्हणत त्याला एक कानाखाली वाजवली. तो‌ माझ्या अशा वागण्याने चिडला, तुला सोडणार नाही. बघून घेतो म्हणत त्या क्षणी तर तिथून निघून गेला पण मी भितीने कापत होते, रडत होते. आता झाला प्रकार आई बाबांना सांगायला पाहिजे म्हणून मनात ठरवलं पण झालं उलटच. मी घरी गेले तर  बाबा आईला तालुक्याला घेऊन जायला निघत होते. आईला डॉक्टर कडे घेऊन जातो आणि सायंकाळी परत येतो म्हणत आई बाबा बाहेर पडले. मी घरात एकटीच खूप रडले‌. तुझ्या मामी सुद्धा माझी चौकशी करायला आलेल्या तेव्हा त्यांना सांगू की नको असं झालेलं मला… काही वाटलं तर हाक मार, घरी ये म्हणत त्या निघून गेल्या. त्या दिवशी मी मामीला माझी परिस्थिती सांगितली असती तर कदाचित मी आज जिवंत असते. दिवसभर मी दार लावून घरातच होते. सायंकाळी आई बाबांना यायला जरा उशीर झाला आणि अंधाराचा फायदा घेत दिनू घरी आला. दार ठोठावले तेव्हा आई बाबा आले असं समजून मी दार उघडले तर दिनू होता. त्याने घरात शिरून माझ्यावर अत्याचार केला, माझ्या इज्जतीवर हात टाकला. त्याच्यापुढे माझी ताकद कमी पडली, मला प्रतिकार करता आला नाही. आता माझ्याशी लग्न केल्याशिवाय पर्याय नाही म्हणत तो कुत्सितपणे हसून निघून गेला. मी अंगावरचे कपडे सावरत रडत होते. आई बाबा उशीरा घरी आले, दोघेही दमून भागून आल्यावर जेवण करून झोपी गेले. मी रात्रभर रडत राहीली, वेदनेने तडफडत राहीली. झाल्या प्रकाराने माझ्या अंगात ताप भरला होता, मनात भितीने कापत होते मी पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नव्हता अमन. आई बाबांनाही मी काही सांगू शकले नाही. काही दिवस मी घरातल्या घरातच होते, बाहेरच्या जगाची भिती वाटत होती मला. परत एक दिवस घराबाहेर पडावे लागले आणि भर दुपारी आजुबाजूला कुणीही नाही बघून दिनूने माझे अपहरण केले त्याच्या गाडीतून मला शेतातल्या झोपडीत घेऊन गेला. हवा तसा उपभोग घेतला. मी सायंकाळी घरी आली नाही म्हणून आई बाबा गावभर मला शोधत होते. ही गोष्ट दिनूला मित्रांनी कळविली तेव्हा तो‌ घाबरला. आपलं सत्य गावकर्‍यांसमोर आलं तर कुटुंबाची प्रतिष्ठा खालावली जाईल, बदनामी होईल म्हणून त्याने परत परत माझ्यावर राग काढत अत्याचार केला आणि अखेरीस गळा आवळून मला ठार मारले. रात्री अंधाराचा फायदा घेत माझ्या अंगावर नीट चढवून नदीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी माझा मृतदेह नदीतील दगडाला अडकलेला सापडला तेव्हा तो परत घाबरला, त्याने मित्राच्या मदतीने माझ्या घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात होते “मी आरती, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने मला धोका दिला म्हणून मी स्वतःला संपविते आहे.”

    गावकर्‍यांना वाटले मी प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केली पण माझ्यावर किती अत्याचार झाला हे कुणालाच माहीत नाही अमन.
    योग्य वेळी मी आई बाबांना, तुझ्या मामींना हे सांगितले असते तर अशाप्रकारे माझा शेवट झाला नसता. काही तरी पर्याय नक्कीच निघाला असता.

    अमनला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसला. माझ्या आरतीचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्याने दिनूला भेटायला बेत आखला. त्याने सायंकाळी दिनूला गाठले. अमनला बघताच दिनू जरा गोंधळला पण ह्याला कुठे काय माहित म्हणून त्याने मनातला गोंधळ लपवत त्याच्याशी हाय हॅलो केले. गप्पांच्या ओघात अमन त्याला आज एकत्र जेवण करू म्हणत दारु मिळेल अशा एका धाब्यावर घेऊन गेला. दिनू काही ना काही बहाना देत नाही म्हणता म्हणता शेवटी तयार झाला. अमन ने जेवताना दारुचा ग्लास दिनूच्या पुढे करत इकड तिकडच्या गप्पा मारल्या आणि शेवटी आरतीचा विषय काढला. सुरवातीला दिनू काही त्यावर बोलत नव्हता, अमन त्याच्या तोंडून सत्य बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. बराच वेळ आरतीचा विषय काढल्यावर , जसजशी दिनूला नशा चढली तसा तो जरा जरा बोलू लागला, “मस्त आयटम होती यार ती..पुरी लाइफ तिच्या सोबत मज्जा करणार होतो, लगीन करणार होतो पण साली तयार होत नव्हती. तुझ्यासोबत लफड होतं का रे तिचं.. म्हणूनच मला नाही बोलली ती..पण मी सोडली नाही तिला, मज्जा केली तिच्या संग अन् दिली फेकून नदीत..कुणाला कळालं बी नाही..”

    अमन ने दिनूचे सगळे बोलणे त्याच्या नकळत फोनमध्ये रेकॉर्ड केले. रात्री उशिरा घरी आल्यावर अमन ने आरती विषयी त्याच्या भावना, तिच्या मृत्यूचे सत्य, पुराव्यानिशी मामांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामांच्या मदतीने दिनूच्या विरूद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली, पुरावे दाखल केले. दिनूला काही कळण्याच्या आत त्याला अटक झाली आणि वर्षभराने का होईना पण आरतीच्या मृत्यूचे सत्य सर्वांसमोर आले.

    अमनने अखेर आरतीला न्याय मिळवून दिला, तिला मुक्ती मिळाली. अमनला होणारा तिचा भास आता जाणवत नव्हता पण ज्यांनी तिच्यावर अन्याय केला, तिच्या चारित्र्यावर शिंंतोडे उडविले त्याला शिक्षा सुनावली गेली याचे अमनला समाधान वाटले.

    अमनचं पहिलं प्रेम या जगात नव्हतं पण तिच्या आठवणी त्याच्या मनात अमर होत्या.
    या आठवणी नव्याने मनात साठवून अमन शहरात परत गेला.

    समाप्त.

    मी लिहीलेली ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग दुसरा

         अमन आणि आरती एकाच वयाचे. आरती दिसायला सुंदर, उजव्या गालावर पडणारी तिची खळी कुणालाही वेड लावणारी. गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, साधं सरळ राहणीमान असलेली आरती अमनची बालपणीची मैत्रीण, दोघे दिवसभर एकत्र खेळायचे या अंगणात.  लहान असताना कधी मामांसोबत शेतात बैलगाडी सफर करायचे तर कधी मामा, आरतीचे बाबा यांच्यासोबत नदीवर पोहायला जायचे. प्रत्येक सुट्टीला आजोळी आल्यावर अमन आरतीला भेटायला अगदी आतुर असायचा. आरती सुद्धा मोठ्या उत्साहाने त्याची वाट बघायची. जरा वयात यायला लागल्यावर दोघांचे एकत्र खेळणे कमी झाले पण भेटीगाठी गप्पागोष्टी सुरू झाल्या. मुलगा मुलगी एकत्र दिसल्यावर गावात लोकं नावं ठेवतील म्हणून ती खेळायला वगैरे येत नसे पण लपून छपून कधी नजरेने तर कधी समोरासमोर भेटून दोघे खूप काही बोलायचे.

         दहावीची परीक्षा झाल्यावर अमन चांगला महीनाभर मामांकडे राहीला होता, त्यावेळी दोघांना एकमेकांविषयी जरा वेगळीच ओढ निर्माण झाली. बालपणाचा टप्पा पार करून आता तारुण्याची नवी उमेद, एकमेकांविषयी काही तरी आकर्षणाच्या भावना दोघांनाही जाणवल्या होत्या. त्यावेळी परत जाताना त्याचा पाय काही केल्या मामांकडून जायला निघत नव्हता पण आई बाबा घ्यायला आले आणि तो शहरात निघून गेला. त्याने आरतीला पत्र लिहिले होते,

    “आरती, मला तू खूप आवडतेस..माझं प्रेम आहे तुझ्यावर..आता आपली भेट कधी होईल सांगू शकत नाही पण कॉलेज संपल्यावर लवकरच चांगली नोकरी शोधून तुला मागणी घालायला घरी नक्की येईल. मला खात्री आहे तू नक्कीच माझी वाट बघशील…आता परत आलो‌ की आपल्या नात्याविषयी घरी सांगणार आहे मी…
    पत्र कुणाला दिसू देऊ नकोस, उगाच माझ्यामुळे तुझ्यावर काही आरोप झाले, कुणी काही उलट बोललं तुला तर मला सहन‌ नाही होणार ते… काळजी घे…

    तुझाच,
    अमन…”

    ती भेट आरती सोबतची शेवटची भेट होती. तिला दिलेलं वचन पूर्ण करायला, नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी तिला सांगायला तो गावी आला होता पण ती मात्र कधीच हे जग सोडून गेली होती. किती‌ वाट पाहीली असेल आरतीने आपली पण या सहा वर्षांत आपण एकदाही येऊ शकलो‌ नाही इकडे याची त्याला खंत वाटली, आपसुकच त्याचे डोळे पाणावले. त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू बघताच एक आवाज आला,
    “अमन, रडू नकोस..तुला रडताना नहीं बघवत रे…जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही..”

    अमन‌ त्या आवाजाच्या दिशेने बघतो तर आजुबाजुला कुणीच नव्हते. घरातले सगळे एव्हाना झोपी गेले होते.

    अमन अस्वस्थ होत इकडे तिकडे बघत म्हणाला, “आरती…तू का दिसत नाहीये मला.. कुठे आहेस तू.. मला अशी कशी सोडून गेलीस गं…काय झालंय तुझ्यासोबत…आरती एकदा तरी माझ्या समोर येत ना… खूप काही बोलायच आहे.. खूप काही सांगायचं आहे तुला… कुठे आहेस तू…”

    ” अमन, आता मला तुझ्या समोर नाही येता येणार… खूप वाट बघितली रे मी तुझी..मला माहित होतं तू नक्की येणार पण थांबता नाही आलं मला तुझ्यासाठी… पण मी तुझ्यासाठी एक डायरी लिहून ठेवली आहे…उद्या सकाळी माझ्या घरी जा, माझी आई देईल तुला ती डायरी. तिला लिहीता वाचता येत नाही त्यामुळे त्यात काय आहे हे तिलाही नाही माहित पण जसं तू मला ऐकू शकतोस ना तसं आई सुद्धा मला ऐकू शकते, माझ्या आवाजाच्या सहाय्याने ती निदान जगते तरी आहे. माझ्या आणि बाबांच्या मृत्यू नंतर ती स्वतः ला संपविणार होती पण माझं अस्तित्व, माझा आवाज यातून मी तिला शपथ दिली की मी देवघरात लपवून ठेवलेली डायरी अमन आल्यावर त्यालाच द्यायची, तो एक दिवस नक्कीच येणार तोपर्यंत तरी तुला जगायचं आहे. तुझ्या येण्याने माझ्या मृत्युचे सत्य तुझ्या समोर, जगासमोर नक्की येईल याची मला खात्री होती. आईला सत्य कळाले तरी ती काही करू शकणार नाही आणि गावात कुणाला सत्य कळूनही ते काहीही करणार नाही म्हणून माझी डायरी फक्त तुझ्या हातात‌ यावी‌ आणि मला न्याय मिळावा यासाठी ही माझी इच्छा अपूर्ण असल्याने मला आजवर मुक्ती मिळाली नाही. उद्या आईला भेटून डायरी घे आणि नदी किनारी मला भेटायला ये. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला.”

    “आरती…का गेलीस अशी सोडून मला…काय झालं नक्की तुझ्यासोबत…ये ना परत आरती…ये ना…”

    अमन ओक्साबोक्सा रडत तिला आजुबाजूला शोधत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आरतीच्या आईला मी जाऊन भेटतो असं झालेलं त्याला.

    आरतीच्या विचारातच रात्री उशिरा त्याला झोप लागली. सकाळी जशी जाग आली तसाच तो खाडकन उठून बसला. लवकरच आवरुन बाहेर आला तोच मामींनी गरमागरम चहा नाश्ता दिला. घाईघाईत चहा नाश्ता करून तो आरतीच्या घरी गेला, दारातून आरतीच्या आईला हाक मारली. अमनला समोर बघताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमन घरात गेला तोच त्याचे लक्ष समोरच्या भिंतीवर लावलेल्या आरतीच्या आणि तिच्या बाबांच्या हार घातलेल्या फोटोंकडे गेले. आरतीच्या आईने डोळे पुसत त्याला बसायला एक खुर्ची पुढे केली आणि त्या आत गेल्या. अमनची नजर आरतीच्या फोटोवर स्थिरावली. तिचा निरागस चेहरा बघत दु:ख, प्रेम, विरह अशा मिश्र भावनांनी त्याचे डोळे पाणावले.

    आरतीच्या आई पाण्याचा ग्लास त्याला देत त्याला म्हणाल्या, “अमन बाळा, आरती आपल्याला सोडून गेली रे… पण तिनं आत्महत्या केली नाही तर तिचा घातपात झाला असं सारखं वाटतं मला. तिच्या जाण्याचं सत्य अजूनही मी शोधतच आहे रे..वर्ष होईल तिला जाऊन पण आजही माझ्या आजूबाजूला वावरते ती असंच वाटतं मला.. त्यामुळे तर मी जगते आहे..आणि हो ही डायरी तितकी तुझ्यासाठी ठेवून गेली ती..तेही मला ती गेल्यावर कळालं..बघ बाबा काय लिहिलंय त्यात..”
    त्या परत तिच्या आठवणीने रडायला लागल्या.

    अमन ती डायरी हातात घेत त्यांना म्हणाला, “काकी, असं रडू नका, हिंमत ठेवा..मी आलोय ना.. सत्य शोधून काढल्याशिवाय नाही जाणार मी.. विश्र्वास ठेवा माझ्यावर..मला काही मदत लागली तर सांगतो .. आलोच मी..”

    अमन डायरी घेऊन नदी किनारी जायला निघाला.

    क्रमशः

    डायरीत आरतीने नक्की काय लिहीले आहे? आरतीच्या मृत्यूचे सत्य काय आहे? याची उत्सुकता लागली ना…तर हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला

           अमन बर्‍याच वर्षांनी आज आजोळी आलेला. आजोळी आता आजी आजोबा नसले तरी दोन मामा मामी, भावंडे असं एकत्र कुटुंब. गावाच्या मधोमध प्रशस्त घर, चहुबाजूंनी अंगण त्यात फुलाफळांची झाडे. अमन‌ बालपणी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचाच पण जसजसे दहावी नंतर शिक्षण सुरू झाले तसे त्याचे येणे जाणे बंदच झालेले. आता कॉलेज संपले, नोकरीची ऑफर हातात होती पण तिथे रुजू व्हायला अजून काही दिवस बाकी होते तेव्हा मामा मामींना भेटायला जायचा अमनचा बेत ठरला.

         सायंकाळी सहाच्या सुमारास तो गावात पोहोचला. गावी येताच त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. बस मधून उतरून मामांच्या घराच्या दिशेने जायला निघाला तोच त्याच्या कानावर शब्द पडले, “अमन…कसा आहेस? खूप वाट बघितली रे तुझी… खूप उशीर केलास यायला…”

    त्याला तो आवाज ओळखीचा वाटला, त्याने मागे वळुन पाहिले तर काही माणसे त्यांच्याच कामात गुंतलेली दिसली पण जिचा हा आवाज आला ती काही दिसली नाही. त्याला जरा विचित्र वाटले, जिची आठवण दररोज व्याकूळ करायची तिचाच आवाज होता हा याची त्याला खात्री पटली पण ती दिसत का नाही… उशीर केलास यायला असं का म्हणाली ती…अशा प्रश्नांची उत्तरे काही त्या क्षणी त्याला मिळत नव्हती.

         मामा मामी तर एक निमित्त आहे पण मनापासून जिला भेटायला आलो ती भेटणार की नाही हा विचार त्याच्या मनात आला तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो पुढेपुढे जात राहीला. काही मिनिटांतच मामाच्या घरी तो पोहोचला. अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, दादा आला म्हणून सारी भावंडं त्याच्या अवतीभवती फिरत आनंदात उड्या मारत होती. मामा मामी मोठ्या कौतुकाने अमनचे स्वागत करत होती. जरा फ्रेश होऊन तो अंगणात खाटेवर येऊन बसला, सगळी बच्चे कंपनी अंगणात खेळण्यात मग्न होते. त्याची नजर बाजुला असलेल्या आरतीच्या घरावर स्थिरावली, तिच्या घरात कुणी दिसत नव्हते पण घरासमोर दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. तिची एक‌ झलक दिसावी या आशेने त्याचे डोळे तिलाच शोधत होते तितक्यात मामी गरमागरम चहा घेऊन आल्या.

    “काय अमन, दमला असशील ना रे…चहा घे…बरं वाटेल जरा…”

    “दमलो‌ नाही पण चहा नक्कीच घेणार मामी तुमच्या हातचा…” असं म्हणत त्याने चहाचा कप उचलला. मामा येतात बरं का गाई म्हशी बांधून, तू घे सावकाश चहा.. आम्ही जरा स्वयंपाकाचं बघतो म्हणत मामी घरात गेल्या.

    अमन ने हळूच छोट्या भावाला जवळ बोलावून आरतीच्या घराकडे बोट दाखवून विचारले , “या घरांत कुणी राहते‌ की नाही..अंधार दिसतोय..”

    छोट्या म्हणाला, “आरती ताई ची आई असते ना..एकटीच राहते ती..”

    त्याच्या बोलण्याने अमनला विचार करायला भाग पाडले. आरतीची आई एकटीच राहते मग तिचे बाबा, आरती हे सगळे कुठे असतील या प्रश्नाने तो विचारात पडला. आरतीचे लग्न झाले असेल का…आणि मग तो आवाज कुणाचा होता…आवाज आला पण ती का नसेल दिसली…काय झालं असेल नक्की…
    विचार करून अमनच्या डोक्यात नुसताच गोंधळ उडाला होता. काही तरी विचित्र नक्की घडतंय याची त्याला चाहूल लागली होती. आजुबाजूला कुणीतरी आहे असा भास त्याला जाणवत होता पण काय होतंय ते नेमकं कळत नसल्याने तो जरा अस्वस्थ झाला. तितक्यात मोठे मामा त्याच्या शेजारी येऊन बसले. लहान मामा अंगणातल्या हौदा जवळ हात पाय धूत होते.
      
      मामांसोबत जरा वेळ गप्पा गोष्टी केल्यावर त्याने विचारले, “मामा, शेजारी आरती राहायची ना हो.. लहानपणी यायची माझ्यासोबत खेळायला…आता कुणी दिसत नाही त्यांच्या घरात…”

    त्यावर मामा म्हणाले, “आरतीची आई एकटीच राहते तिथे आता. मागच्या वर्षी आरतीने आत्महत्या केली आणि तिच्या वडिलांना तो धक्का सहन झाला नाही, ते आजारपणाने गेले. आरतीच्या आईच्या डोक्यावर बराच परिणाम झाला या सगळ्याचा. बिचारी कुणाशी बोलत नाही, काही संबंध ठेवत नाही, सतत म्हणते की माझी आरती माझ्या आजुबाजूला आहे, ती माझ्याशी बोलते. त्यामुळे गावकरी तिला वेडी म्हणतात…”

    अमनला हे सगळं ऐकून धक्काच बसला. “आरतीने आत्महत्या केली?…पण का?…”

    “कुणालाच सत्य माहीत नाही, काही जण म्हणतात तिचं लफड होत कुणाशी तरी..ती गरोदर होती…त्याने लग्नाला नाही म्हंटले म्हणून हिने स्वतः ला संपविले. कुणी म्हणते पाय घसरुन पडली नदीत कपडे धुताना… नुसत्याच मनाच्या थापा मारतात लोकं पण खरं काय कुणास ठाऊक..”

    आता मात्र अमनच्या पायाखालची जमीन सरकली. काही तरी गडबड नक्कीच आहे हे त्याला लक्षात आले. त्याला हे सगळं ऐकून खूप दुःख झाले. आरती असं कधीच करणार नाही याची त्याला खात्री होती तेव्हा नक्कीच तिच्यासोबत काही तरी झालंय हे कळायला अमनला वेळ लागला नाही. आरतीला भेटायच्या ओढीने आज इथे आलो आणि ती या जगात नाही हे त्याच्यासाठी खूप धक्कादायक होते. गावात पोहोचताच त्याला झालेला तिच्या आवाजाचा भास….गावात आल्यापासून जाणविणारं तिचं अस्तित्व त्याला या सगळ्यात काही तरी गुपीत नक्की आहे , कदाचित तिला काही तरी सांगायचे आहे हे त्याला लक्षात आले.
    आता आरतीच्या सत्य जाणून घेण्याचा त्याने निर्धार केला.

    या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मामींनी जेवायला हाक मारली आणि अमन भानावर आला. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मामा मामी , भावंडे सगळे हसत खेळत जेवण करण्यात , गप्पा गोष्टीत रमले होते पण अमन मात्र वेगळ्याच विश्वात हरवला होता, मनोमन अस्वस्थ झाला होता.

    जेवणानंतर मामांसोबत गावात जरा फेरफटका मारायला गेला तेव्हा त्याला सतत आजुबाजूला कुणाचा तरी भास होत होता. आरती अदृश्य स्वरूपात आजुबाजूला वावरत आहे हे त्याला जाणवत होते.
    रात्री झोपताना त्याला आरती सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाली.

    क्रमशः

    आरती आणि अमन यांच्यात काय नातं होतं?
    आरती सोबत काय झाले, ती अमनला तिच्या आत्महत्येचे कारण सांगेल का..तिने नक्की आत्महत्या केली की काही अपघात झाला…अमन हे सत्य कशाप्रकारे शोधून काढणार हे बघूया पुढच्या भागात.

    पुढे काय होणार याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असणार ना…

    पुढचा भाग लवकरच…

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू आणि तुझं प्रेम हवंय…

         मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.

         मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.

    कॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे,  दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”

    शुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.

      मोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात  रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.
    शुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.

        शुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”
    तिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”
    शुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.

    अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.
    शुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”
    मोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…

      एकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”

    तिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला.  लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो,  जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…

    असा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.
    त्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.

    अशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”

    ती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.

    दोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.

    मोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.

    काही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”

    त्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”

    ते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”

    आज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.

    या दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.

    एका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग

          सानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.

        सानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घालवायचा.
    सानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.

    कितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.
    सुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,
    पण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
    “काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही? तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”

    त्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”

    ते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे? नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”

    सुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान? मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”

    इतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.

    आता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..

    एव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.

    आता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,

    “जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”

    आता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.
    जाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.   

    ही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.
    त्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.

    सानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.

    माहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

    सानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”

    त्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”

    या सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.
    सानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.

    हळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.

           एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.

    अशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक कथा.

    या प्रकारात नक्की चूक कुणाची आहे? याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    समाप्त !!!

    कथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग पहिला

           सानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली. हसतमुख चेहरा असलेल्या सानिकाचे डोळे रडून सुजलेले होते, चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आई बाबांच्या काळजात धडकी भरली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत. नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. आई बाबांनी तिला आधी शांत केले, बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला. सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की काय झालंय ते ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं.

       सानिका अजूनही रडतच होती, बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सानू, आधी तू चहा घे, नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला.

    कसंबसं रडू आवरून ती चहा प्यायली. आई बाबा पुढे काही बोलण्याआधी ती म्हणाली, “आई बाबा, आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी… खूप मोठी फसवणूक..” इतकं बोलून ती परत रडायला लागली.

    तिचं हे वाक्य ऐकताच आई बाबांना अजूनच काळजी वाटली.

    बाबांनी तिला विचारले, “सानू, असं का‌ म्हणते आहेस.. नक्की काय झालंय ते नीट सांग बघू…तू‌ काय बोलते आहेस काही एक‌ कळत नाहीये आम्हाला..”

    सानिका रडत रडत सगळं सांगायला‌ लागली. ती जे काही सांगत होती ते ऐकून आई बाबांना मोठा धक्का बसला.

    सानिका आणि सुशांत यांचे काही महीन्यांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झाले. दोघांचेही अरेंज मॅरेज. 

    सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत, उंच सडपातळ बांधा, स्वभावाने जरा लाजाळू, अबोल, सहनशील. भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी. मोठा भाऊ नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहायचा.
    सानिकाचा पदवी‌ अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांत चे स्थळ आले.

    सुशांत सरकारी नोकरीत कामाला, दिसायला राजबिंडा, घारे डोळे, उंच पुरा, पिळदार शरीरयष्टी. सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले. दोघांचे लग्न ठरल्यावर महीनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना‌ बोलायला भेटायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला. वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबाविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.

    लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आई बाबांना घर अगदी खायला उठू लागले. इकडे सानिका सुद्धा नविन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्न म्हंटलं की प्रेम, उत्साह, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले.
    लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांत ची वाट बघत राहीली पण तो आलाच नाही. शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला, सानिका लाजतच त्याला म्हणाली ,”रात्री बराच वेळ वाट बघितली मी तुमची..”

    त्यावर तो इतकंच बोलला, “सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलचं नाही…..त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती, जरा वेळ जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला..मुळात येऊच दिले नाही मला..असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला..तू ही दमली असणार ना लग्नाच्या धावपळीत….”

    सुशांत अगदी सहज असं बोलून गेला. पहिल्या रात्री पेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालंय की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार, असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्याचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटत असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही.

    फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली. मोठे दिर जाऊ, सासू सासरे सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला. सुशांत सुद्धा जरा फ्रेश होऊन त्यांच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला. जाऊबाईंनी हळूच सानिकाला विचारले, “काय मग, कशी होती पहिली रात्र.. काही त्रास तर होत नाहीये ना..काही वाटलं तर मला बिनधास्त सांग…मोठ्या बहिणी प्रमाणे आहे मी तुला..”

    जाऊबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं. तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली.

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • ओढ मिलनाची…( प्रेमकथा)

    पहाटे पाचचा गजर झाला तशीच स्वरा लगबगीने उठून आवरायला लागली. आज खूपच उत्साहात होती स्वारी, कारणही तसेच होते. तब्बल सहा महिन्यांनंतर ती मयंकला भेटणार होती. आठ वाजता मयंक पोहोचणार तेव्हा त्यापूर्वी तयार होऊन एअरपोर्टवर जायचा तिचा प्लॅन होता. आंघोळ करून आली तशीच ओल्या केसांना सुकवत स्वतः ला आरशात निरखून बघताना तिला त्यांच्या लग्नानंतर मयंक सोबतची पहिली सकाळ आठवली.

    त्या दिवशी ती अशीच नुकतीच न्हाऊन आलेली. मयंकच्या आवडीची लाल रंगाची साडी नेसून तयार झाली आणि आपल्या ओल्या केसांना सुकवत असताना मयंकने हळूच येऊन तिला मिठी मारली. अलगद तिची हनुवटी बोटांनी वर करत नव्या नवरीच्या चेहऱ्यावरचे ते तेज बघून तो क्षणभर तिला बघतच राहीला आणि ती लाजून चूर..🥰 त्याच्या नजरेला नजर सुद्धा भिडवू शकत नव्हती ती. तितक्यात तिच्या ओलसर केसांची बट गालावरुन मागे करत त्याने तिच्याकडे बघत “गुड मॉर्निंग स्वीटहार्ट” म्हणताच ती आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवून कशीबशी गुड मॉर्निंग म्हणाली होती.

    आजची सकाळ तिला अगदी तशीच काहीशी वाटत होती. आजही त्याचा आवडता नी लेन्थ ड्रेस घालून , हलकासा मेकअप करून ती तयार झाली.  घरात त्याच्या स्वागताची तयारी रात्रीच करून ठेवलेली तरीही सगळं नीट तर आहे याची खात्री करून ती कार घेऊन एअरपोर्टवर जायला‌ निघाली. कधी एकदा मयंकला भेटते असं झालेलं तिला.

    स्वरा आणि मयंक हे एक नवविवाहित जोडपे, दोघांचे अरेंज मॅरेज. स्वरा दिसायला अतिशय नाजूक, प्रेमळ स्वभावाची एक लहर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची. चाफेकळी नाक, बोलके डोळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडायचे. साधारण राहणीमान असलेली ही स्वरा बघताक्षणी कुणालाही आवडेल अशीच गोड असली तरी तिला काही तिच्या मनात घर करेल असा कुणी आजवर भेटला नव्हता शिवाय तिचा जरा लाजाळू स्वभाव सुद्धा आड यायचाच. आयटी कंपनीत चांगल्या पदावर ती नोकरीला होती. अशी ही सर्वगुणसंपन्न स्वरा मयंकला पहिल्या भेटीतच खूप आवडली.
    मयंक एका इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला, आकर्षक व्यक्तिमत्त्व, पिळदार शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज असलेला मयंक स्वराला पहिल्या नजरेत मनात घर करून गेला.

    दोघांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नाला आठवडा होत नाही तोच त्याला सहा महिन्यांसाठी विदेशी जाण्याची संधी चालून आली. लग्नापूर्वी जरा कल्पना होतीच त्याला याविषयी पण इतक्या लवकर सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन लगेच जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तशी कल्पना त्याने लग्नापूर्वी स्वराला दिलेली. शिवाय शॉर्ट टर्म ट्रिप असल्याने तिला घेऊन जाणे इतक्यात शक्य नव्हतेच. नुकतंच लग्न झाल्यावर हे गोड दिवस अनुभवावे अशी मनापासून खूप इच्छा असूनही त्याला स्वरा पासून काही महिने दूर जावे लागले. स्वराने त्याला याबाबत खूप समजून घेतले. सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे नंतर आयुष्यभर आपण सोबत आहोतच असं तिने मोठ्या विश्वासाने त्याला म्हंटल्यावर तो तिच्या अजूनच प्रेमात पडला. फोन, व्हिडिओ कॉल वर एकमेकांना बघत सहा महिने संपले खरे पण हा काळ अगदी सहा वर्षां प्रमाणे भासलेला. आज दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागली होती.
    मयंकची नजर स्वराला शोधत होती आणि स्वराची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती.

    एअरपोर्टवर पोहोचतात मोठ्या आतुरतेने ती त्याची वाट बघत होती. काही वेळातच तो समोरून येताना दिसला तशीच तिची धडधड वाढली. त्याचीही नजर तिच्यावर पडली तसाच तो एकटक तिला बघत तिच्या दिशेने येत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. तो जवळ आला तशीच तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली, नजरेनेच क्षणभर ते एकमेकांशी बोलत होते. एकमेकांच्या डोळ्यांत बघताना ती एका वेगळ्या विश्वात हरवली, त्याला डोळेभरून बघताना या भेटीची आतुरता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो तिचे हे भाव अलदी अलगद टिपत तिचं सौंदर्य न्याहाळत होता.
    “आय मिस्ड यू सो मच स्वरा..” असं मयंक अगदी मनापासून प्रेमळ भावनेने म्हणताच ती भानावर आली.
    त्याच्या चेहऱ्यावर खिळलेली तिची नजर स्थिर ठेवून ती लाजतच उत्तरली , “आय मिस्ड यू टू.. चला निघूया..”

    दोघेही घरी जायला निघाले. स्वरा ला कार ड्राइव्ह करताना पहिल्यांदाच बघितले होते त्याने. ती कार ड्रायव्ह करताना तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. कधी एकदा स्वराला मिठीत घेऊ असंच काहीसं झालेलं त्यांचं. मयंक एकटक आपल्याला बघतोय हे तिला कळत होतं, तिलाही ते आवडलं होतं. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायच होत पण आनंदाच्या भरात शब्द काही सुचत नव्हते. ही गोड शांतता भंग करायला तिने कार मधला रेडिओ सुरू केला. त्यावर या क्षणाला अनुसरून अगदी योग्य गाणे लागले…

    “उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये….

    उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये….

    ऐसा हुआ असर….

    ऐसा हुआ असर………

    ऐसा हुआ असर के मेरे होश उड़ गये‌…

    उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…”

    अगदी या गाण्या प्रमाणे तिच्या मनाची अवस्था झाली होती.
    ते गाण्याचे बोल ऐकताच तिने स्वतः शीच हसून चॅनल बदलायला हात पुढे केला आणि मयंकने तिचा हात पकडून गाणे न बदलण्याचा इशारा केला. त्याच्या स्पर्शाने तिला अंगावर रोमांचक काटा आला. स्वतः चा हात पटकन बाजूला घेत ती म्हणाली, “कार ड्रायव्ह करताना असं डिस्टर्ब करू नये..”
    तिच्या या वाक्याने दोघांचे प्रेमळ  संभाषण सुरू झाले.  त्याला हा क्षण खूप आवडला होता. काही वेळातच ते घरी पोहोचले. दार उघडताच घरातून येणारी सुगंधी लहर त्याला स्पर्शून गेली. हॉलमध्ये त्याच्या स्वागतासाठी तिने छान तयारी केली होती. समोरच्या टेबलावर त्याची आवडती जरबेरा ची फुले
    अगदी सुंदररित्या मांडलेली होती. गुलाबांच्या पाकळ्यांनी हार्ट च्या आकार तयार केलेला होता त्यावर स्वराने लगेच ‘वेलकम बॅक स्वीटहार्ट’ लिहीलेला केक आणून ठेवला, मेणबत्त्या लावल्या. घरात सर्वत्र एक वेगळाच सुगंध दरवळत होता. दोघांचं हे घर स्वराने खूप सुंदर सजविले होते. घरात येताच त्याला अगदी प्रसन्न वाटले.
    “चला आता पहिले फ्रेश होऊन या तुम्ही..” असा स्वराचा प्रेमळ आदेश मिळताच मयंक भानावर आला. फ्रेश व्हायला आत गेला तसंच त्याला अजून एक सरप्राइज मिळाले. बेडरूम मधल्या भिंतीवर स्वराने दोघांचे एकत्र घालवलेल्या काही गोड क्षणांचे फोटो लावलेले होते. लग्नापूर्वीची दोघांची पहिली कॉफी डेट पासून ते मयंकला एअरपोर्टवर सोडायला गेल्यावर काढलेला सोबतचा फोटो असा त्यांचा आतापर्यंतचा प्रेमाचा सगळा प्रवास फोटो बघून परत एकदा त्याच्या नजरेखालून गेला.
    तो फ्रेश होऊन आला‌. इकडे स्वरा स्वतः च्या हातांनी बनविलेला त्याच्या आवडीचा नाश्ता , चहा, केक कटींग साठीची सगळी तयारी करत होती. तो तिला न्याहाळत तिच्याजवळ आला आणि क्षणाचाही विलंब न लावता अलगद त्याने तिला मिठीत घेतले. या क्षणासाठी किती वाट बघावी लागली असंच काहीसं झालेलं त्यांचं. तिनेही तिचा चेहरा त्याच्या छातीवर ठेवला. त्याची मिठी हीच आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा आहे याची तिला परत एकदा जाणिव झाली. सहा महिन्यांचा दुरावा आता संपला होता, एकमेकांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या दोघांसाठी हा खूप खास क्षण होता. हळूहळू दोघांची मिठी घट्ट होत गेली, हृदयाची स्पंदने वाढतच गेली. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर करून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले तशीच ती शहारून परत त्याच्या मिठीत शिरली.

    दोघांच्या प्रेमाला , संसाराला आज खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

    अशी ही दोघांच्या आतुर भेटीची प्रेमळ कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले की विनयला मानसी आवडते आणि तो मानसीला प्रपोज करणार आहे, ते ऐकताच मोना मनोमन दुःखी झाली. 

    पुढे मानसी विषयी विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते.  प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.

         त्याला भेटून मोना होस्टेलमध्ये परत आली. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मानसी सोबतही फारसं काही ती बोलली नाही. जरा थकले गं, आपण उद्या बोलू म्हणत मोना बेडवर पडली. रात्रीच्या त्या अंधारात ती ढसाढसा रडली. पण आता विनयला प्रॉमिस केल्या प्रमाणे त्याला मदत करायची असं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती मानसी आणि विनय सोबत अगदी नॉर्मल वागत असल्याचं दाखवत असली तरी मनापासून ती उदास होती.

    इकडे विनय मानसीचा वाढदिवस खास बनविण्यासाठी मस्त तयारीला लागला होता. मोना शक्य ती मदत त्याला करत होती.  बघता बघता तो दिवस आला. आज मानसीचा वाढदिवस होता. ठरल्याप्रमाणे सकाळीच मोना मानसीला तयार करून बाहेर घेऊन गेली. दोघीही एका मंदिरात पोहोचल्या तर विनय तिथे आधीच हजर होता. दररोज न चुकता देवाला नमस्कार करून मानसी दिवसाची सुरुवात करायची त्यामुळे आज वाढदिवसाची सुरवात सुद्धा मंदिरात जाऊन झाली. तिघेही नंतर एका हॉटेलमध्ये पोहोचले. विनय ने आधीच तिथे एक टेबल बूक करून सगळी तयारी केली होती. पूर्ण टेबलवर गुलाबांच्या पाकळ्या, त्याच्या मधोमध तिचा आवडता चॉकलेट केक, हार्ट च्या आकारात लावलेल्या मेणबत्त्या, टेबलच्या बरोबर वरच्या बाजूला छताच्या दिशेने लावलेले लाल फुगे, मंद आवाजात हॅपी बर्थडे टू यू असे म्युझिक. सगळं बघून मानसीला आनंदाचा गोड धक्का बसला. “किती सुंदर आहे हे सगळं..फक्त माझ्यासाठी..माझ्या वाढदिवसासाठी.. आयुष्यात पहिल्यांदाच इतका छान वाढदिवस साजरा होतोय आपला..” मनात असाच काहीसा विचार करत ती टेबलच्या दिशेने जात होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. लाल पिवळ्या रंगाचा बांधणीचा पंजाबी ड्रेस घातलेली मानसी चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना खूप सुंदर दिसत होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून विनय अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. मोना त्यांच्या सोबत आहे याचा क्षणभर विनयला विसर पडला. तिघेही टेबलवर पोहोचले. मानसीने केक कट केला. नंतर काही वेळाने विनय ने मानसीच्या हातात गुलाबाचे फुल देत तिला प्रपोज केले. त्याला ती अगदी शाळेपासून आवडते, तिच्यावर त्याचं खूप प्रेम आहे हे तिला अगदी आत्मविश्वासाने सांगत आयुष्यभर मला तुझी साथ हवी म्हणत तिला मागणी घातली. त्याचं असं सरप्राइज बघून मानसी जरा घाबरली, लाजली पण तिच्याही मनात त्याच्या विषयी प्रेम होतेच. शाळेपासून नाही पण कॉलेजमध्ये आल्यावर तो तिचा पहिलाच मित्र, त्याची झालेली मदत, त्याचा मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव, त्याचा सहवास यामुळे तिलाही तो आवडायचा पण त्याच्या मनात सुद्धा आपल्याविषयी प्रेम आहे याची तिला जरा जराही शंका आली नव्हती. त्याच्या या सरप्राइज मुळं पण तिचा जरा गोंधळ उडाला तरी तिने कुठलाही विचार न करता त्याचे प्रपोजल स्विकारले तशीच मोना मनोमन रडायला लागली. विनय आणि मानसी खूप आनंदी होते पण मोना‌ला मात्र हा प्रेमभंग अगदी नको नकोसा झाला होता. कुठे तरी दूर पळून जावेसे वाटत होते पण विनय आणि मानसी साठीचा आनंदी क्षण आपल्यामुळे खराब होऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर कसे बसे हास्य आणून ती त्यांच्या आनंदाची साक्षीदार बनली होती.

    वेळ गेली तशी ती विनयच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं त्याच्यावर असलेलं हे प्रेम विसरणे तिला अशक्य झाले होते.
    मानसी आणि विनय मात्र एका नव्या विश्वात रमलेले होते. दोघांचं जिवापाड प्रेम बघून मोनाला कधी कधी त्यांचा हेवा वाटायचा.
    आता शक्य तितकं त्यांच्या सहवासात जाणे मोना‌ टाळत होती.

    अशातच भराभर वर्ष संपत आले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा तिघांनी मस्त पार्टी करायचे ठरवले. तिघेही एकत्र बर्‍याच दिवसांनी बाहेर पडले. त्या दिवशी विनय ने मोनाची मस्करी करत तिला विचारले, “मोना, काय गं..तुला अख्ख्या कॉलेजमध्ये कुणीच आवडला नाही का..”

    त्या क्षणी तिच्या मनात परत एकदा कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे एकच गाणे गुणगुणत होते,

    “तुझे याद ना मेरी आई..किसी से अब क्या कहना…”

    कॉलेज नंतरही दिवसेंदिवस मानसी आणि विनय यांचे प्रेम बहरत गेले. दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोना‌ आयुष्यात पुढे जात होती पण अजूनही विनय मध्ये गुंतलेली होती. दुसऱ्या कुणावर परत असं मनापासून प्रेम करता येईल की नाही याची तिला शंकाच वाटत होती. मानसी आणि विनय यांना मात्र मोनाच्या मनस्थितीची, विनय विषयीच्या प्रेमाची जराही कल्पना नव्हती.

    अशी ही तिघांच्या मैत्रीची आणि विनय-मानसीच्या प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

     
         मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले.
    “हाय मानसी..!”
    या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक  मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी शाळेत एकाच वर्गात होते पण कधीच बोलणं वगैरे झालं नव्हतं. नावाने आणि चेहर्‍याने फक्त दोघांची ओळख होती. आज मात्र या अनोळखी कॉलेजमध्ये त्याला बघताच मानसी मनोमन आनंदी झाली.

    “हाय विनय..तू इथे..म्हणजे तुला याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला का..”

    तिच्या आश्चर्यकारक प्रश्नावर त्याने हो म्हणत उत्तर दिले तशीच ती अजूनच आनंदी झाली. या अनोळखी शहरात , कॉलेजमध्ये ओळखीची व्यक्ती भेटल्यावर किती बरं वाटलं तिला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
    विनय क्षणभर तिच्या गोड निरागस चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यालाही तिला तिथे बघून खूप आनंद झाला होता.
    मानसी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, सडपातळ उंच बांधा, लांबसडक केसांची वेणी, साधे पण नीटनेटके राहणीमान. मानसी लहान असताना आई आजारपणाने देवाघरी गेली आणि वडीलांनी दुसरं लग्न केलं. तेव्हापासून मामा मामींनी तिला लहानाचं मोठं केलेलं.
          बारावीपर्यंतचे शिक्षण जरा ग्रामीण भागात झाल्यावर आता पहिल्यांदाच ती शहरी वातावरण अनुभवत होती. मुळातच अभ्यासू, मेहनती असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या जवळच असलेल्या होस्टेलमध्ये ती राहणार होती. विनय हा तिचा पहिलाच मित्र.
    हळूहळू ती या शहरी वातावरणात रमायला लागली.
    होस्टेलमध्ये तिची रुममेट मोना हिच्याशी मानसीची लवकरच मैत्री झाली. मानसी मुळे मोना आणि विनयची सुद्धा ओळख झाली. तिघांचीही हळूहळू चांगली मैत्री झाली. एकमेकांना अभ्यासात मदत करणे, सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे सुरू झाले. 
    शाळेत असल्यापासूनच शांत, सालस, निरागस मानसी विनयला खूप आवडायची पण कधी बोलणं सुद्धा झालं नव्हतं. आता योगायोगाने दोघे एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मैत्रीचं नातं त्यांच्यात निर्माण झालेलं. विनयच्या मनात आपल्याविषयी प्रेमाची भावना आहे याची जराही कल्पना मानसीला नव्हती. विनय सुद्धा तिला काही जाणवू देत नव्हता. योग्य वेळ आली की मानसीला प्रपोज करायचे असे त्याने ठरवले होते.
      विनय उंचपुरा, दिसायला साधारण पण आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला, स्वभावाने प्रेमळ, मदतीला धावून जाणारा. कुणालाही आपलसं करेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. यामुळेच मोनाला पहिल्या भेटीतच विनय खूप आवडला होता. जसजशी मैत्री घट्ट झाली तशीच मोना विनयच्या प्रेमात पडली. त्याच्या मनात मात्र मानसी होती.

         कॉलेजचे पहिले वर्ष संपत आले होते. पुढच्या  आठवड्यात मानसीचा वाढदिवस होता. तिच्यासाठी काही तरी खास प्लॅन करून तिचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्याचा विचार विनयच्या डोक्यात सुरू होता. या सगळ्यात मोनाची मदत घ्यायची असे त्याने ठरवले आणि त्यासाठी विनयने मोनाला फोन केला. त्याने तिला एकटीला भेटायला बोलावले शिवाय याविषयी मानसीला काही सांगू नकोस असंही सांगितलं. ते ऐकताच मोनाच्या मनात आनंदाने लाडू फुटायला लागले.

      विनय ने कशासाठी बोलावले असेल, त्याचेही माझ्यावर प्रेम असेल का ? त्याविषयी तो काही बोलणार असेल का? अशे अनेक प्रश्न मोनाच्या मनात गोंधळ निर्माण करायला लागले. त्याला पहिल्यांदाच असं एकट्यात भेटायचं म्हंटल्यावर ती छान तयार झाली. मोनाला असं चार वेळा आरश्यात स्वतः ला निरखून बघत, लाजत लाजत तयार होताना बघून मानसीने तिला विचारले,” काय मॅडम, आज काय खास..छान दिसतेस पण निघाली कुठे..तेही मला न सांगता, मला एकटीला रूमवर सोडून?”

    काही खास नाही गं, शाळेतली मैत्रिण भेटायला येतेय म्हणून जरा बाहेर जाऊन येते तासाभरात असं मानसीला सांगून ती बाहेर पडली.

    ठरलेल्या ठिकाणी विनय पाठमोरा उभा तिला दिसला. त्याची पाठमोरी आकृती बघतच ती त्याच्या दिशेने निघाली. जसजशी जवळ जात होती तशीच तिची धडधड वाढली होती. चेहऱ्यावर लाजरे भाव होते. ती जवळ पोहोचताच ती लाजतच म्हणाली,

    “विनय… उशीर झाला का रे मला..बराच वेळ वाट बघतोय का..”

    तिचा आवाज ऐकताच तो‌ तिच्याकडे वळून म्हणाला, “हाय मोना… अगं नाही..मी जरा लवकर पोहोचलो..तू वेळेत आलीस..बरं आपण त्या पुढच्या बाकावर बसूया का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी.”

    ते ऐकताच ती अजूनच लाजून चूर झाली. दोघेही जवळच्या एका बाकावर जाऊन बसले. बसताना नकळत त्याच्या हाताचा स्पर्श तिला झाला तशीच ती क्षणभर एका विश्वात रमली. काय बोलणार असेल विनय असा विचार करत जरा अस्वस्थ सुद्धा झाली. आपण विनय साठी छान तयार होऊन आलोय पण ह्याने नीट बघितलं सुद्धा नाही किंवा काही प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही म्हणून तिला जरा त्याचा रागही आला.

    विनय मोनाला म्हणाला, ” मोना, आज तुला मी माझं एक सिक्रेट सांगायला बोलावलं आहे. खूप दिवसांपासून एक गोष्ट माझ्या मनात आहे आणि आज तुझ्यासोबत ती गोष्ट शेअर करणार आहे.”

    विनयचे हे शब्द ऐकताच मोना मनोमन आनंदी झाली. आता विनय आपल्याला बहुतेक प्रपोज करणार असं तिला वाटलं. ज्याच्यावर मी मनोमन प्रेम करते त्याच्या मनात सुद्धा आपल्या विषयी अगदी त्याच भावना आहे, आणि तो आज चक्क व्यक्त होतोय.. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असा काहीसा विचार करून ती अगदी गुलाबी स्वप्न बघितल्या प्रमाणे अत्यानंदी झालेली होती.

    त्याच्या बोलण्यावर फक्त गोड स्माइल देत ती ऐकत होती‌. तो पुढे म्हणाला, “मोना, माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे…अगदी मनापासून प्रेम. मी आज पर्यंत तिला याविषयी जाणवू दिले नाही पण आता मला ते व्यक्त करायचे आहे. तुला माहित आहेच की मानसी आणि मी शाळेपासूनच एकत्र शिकलो पण मैत्री मात्र कॉलेजमध्ये आल्यावर झाली. पण मला शाळेपासूनच ती आवडते. माझं खरंच खूप प्रेम आहे मानसी वर. मला आता ते व्यक्त करायचे आहे. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आहे तेव्हा खास काही तरी प्लॅन करून तिच्या विषयीच्या माझ्या मनातील भावना मला तिला सांगायच्या आहेत. यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील ना मला मदत. ”

    हे ऐकताच गुलाबी स्वप्न रंगवत असलेल्या मोनाचे मन अगदी क्षणभरात तुटले. असं काही असेल याची तिला जराही शंका आली नव्हती. ज्या विनय वर आपलं प्रेम आहे तो आपल्या समोर दुसऱ्या मुलीवरील प्रेमाविषयी बोलतोय हे तिला सहनच होत नव्हते. तिला अगदी मोठ्याने रडून त्याला सांगावं वाटत होतं की विनय अरे तू माझा आहेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…पण त्याने जे काही सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. काय प्रतिक्रिया द्यावी तिला कळत नव्हते.

    विनय तिच्या डोळ्यापुढे उभा होऊन म्हणाला, “मोना, प्लीज करशील ना मला मदत..”

    त्यावर कसंबसं ती “हा..” म्हणाली.

        विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. ती मनोमन रडत होती, दु:खी झाली होती. प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.
    या क्षणी कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे आपली अवस्था झाली याची जाणीव तिला झाली. तिचं मन अगदी या गाण्या प्रमाणे रडत होतं.

    “रब्बा मेरे, इश्क किसी को ऐसे ना तडपाये, होय
    दिल की बात रहे इस दिल में, होठों तक ना आये
    ना आये….

    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    दिल रोया की अंख भर आयी
    दिल रोया की अंख भर आयी किसी से अब क्या कहना…”

    विनय मानसी जवळ प्रेम व्यक्त करेल का? मानसी या प्रेमाचा स्वीकार करेल का..मोना हा धक्का कसा सहन करेल..मानसी आणि मोनाच्या मैत्रीत यामुळे फूट पडेल का… याची उत्सुकता तुम्हाला लागली असणार ना..

    तर हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होईल याविषयी तुमचा अंदाज अशा प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

         मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा चंद्र, आकाशात लुकलुकणारे चांदणे अगदी हुबेहूब दृश्य तिने त्या कागदावर उतरवले. जणू त्या बाहेर दिसणार्‍या दृश्याचा फोटो काढला असंच सुरेख चित्र तिने अगदी सहजपणे रेखाटले.

    त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत ती तिच्याच विश्वात रमली तितक्यात दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. माधव घरी आलेला बघून तिला अजूनच आनंद झाला. तो घरात येताच त्याच्या हातातली बॅग बाजूला ठेवून ती त्याला बिलगली आणि म्हणाली, “किती उशीर केलास यायला. कधीपासून वाट बघते आहे मी.. फोन तरी करायचा उशीर होत असेल तर..”
    त्याचं लक्ष मात्र समोर ठेवलेल्या त्या चित्राकडे गेले, तिला मिठीतून बाजुला करत तो म्हणाला, “मीरा, हे चित्र तू काढले ?”
    तिने चेहऱ्यावर हास्य आणून मानेनेच होकार दिला.
    तो त्यावर आश्र्चर्यचकित होऊन म्हणाला,

    “व्वा …किती सुंदर…अगदी हुबेहूब दृश्य रेखाटले आहे तू…माझी बायको इतकी छान कलाकार आहे हे मला तर पहिल्यांदाच कळते आहे..”

    ती लाजतच त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत म्हणाली, “खूप आवडते रे मला लहानपणापासूनच असे बोलके चित्र रेखाटायला. आश्चर्य वाटेल तुला पण तू मला बघायला आलेला ना त्यानंतर मी तुझा चेहरा आठवून आठवून एका कागदावर उतरवला. दाखवते तुला ते,  माझ्या बॅगेत आहे सगळे माझे आवडते चित्र. हे घे पाणी पी आधी, नुकताच आलास ना..दमला असशील..”

    पाण्याचा ग्लास हातात घेत तो म्हणाला,
    “अगं तू इतकं छान सरप्राइज दिलं की सगळा थकवा क्षणात दूर झाला. पण तू मला तुझ्यातल्या या कलेविषयी कधी बोलली नाहीस.”

    ती  बॅगेतून काही चित्र काढलेले कागद हातात घेऊन येत म्हणाली “चित्र, रांगोळी काढणे माझा छंद आहे असं सांगितलं होतं मी तुला आपल्या पहिल्या भेटीतच पण तुलाच लक्षात नसावं..”

    तो मनात विचार करू लागला,  छंद आहे असं म्हणाली होती मीरा पण इतकी सुंदर कला हिच्या हातात आहे असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. म्हणूनच कदाचित फार काही मनावर घेतलं नसावं मी.

    तिने रेखाटलेले त्याच्या चेहऱ्याचे चित्र बघून तर तो अजूनच चकित झाला. कांदेपोहे कार्यक्रमात पंधरा मिनिटे समोर बघितलेला माझा चेहरा हिने कसा काय इतका अप्रतिम रेखाटला याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तिने रेखाटलेले एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे बघून तो त्यात अगदी रमून गेला.
    इतक्या कौतुकाने ते सगळे चित्र निरखत असताना त्याला बघून तिला अजूनच आनंद झाला. पहिल्यांदा कुणीतरी तिच्या कलेची वाहवा करत होते.

    तो तिचं भरभरून कौतुक करत तिला मिठी मारत म्हणाला, ” मीरा, उद्या सकाळी आपल्याला बाहेर जायचे आहे. कुठे, कशासाठी ते तुझ्यासाठी सरप्राइज आहे. ”

    ती मानेनेच होकार देत त्याच्या मिठीत सामावली.

    मीरा आणि माधवचे काही दिवसांपूर्वी लग्न झालेले.
    माधव दिसायला साधारण, सावळा वर्ण, उंच पुरा, अतिशय प्रेमळ स्वभावाचा, समजुतदार हुशार मुलगा. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा
    झालेला. नोकरी निमित्त शहरात एकटाच राहायचा.

    मीरा दिसायला सुंदर, सडपातळ, उंच बांधा, रेशमी केस, नितळ कांती, चाफेकळी नाक, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे अगदी प्रसन्न चेहरा. लहानपणी आजारपणात आईचे निधन झाले आणि तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मीराच्या मामा मामींनी तिचा सांभाळ केला. ते एका गावातच राहायला होते. मामा मामी तिला खूप जीव लावायचे. मीराच्या अंगात छान कला होती, सहजपणे ती सुंदर चित्र रेखाटायची पण इतर कुणी त्याची फारशी दक्षता घेत नव्हते. मामा शेतीच्या कामात गुंतलेला तर मामी घरकाम, मुलंबाळं यांच्यात आणि कलेच्या जोरावर आपण खूप पुढे जाऊ शकतो हे गावात राहून असल्याने तिला फारसं माहिती नव्हतं. कधी तिने मनावर सुद्धा घेतलं नव्हतं.

    पदवी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षाला होती तसेच तिला माधवचे स्थळ आले, पहिल्या भेटीतच त्याला ती खूप आवडली आणि दोघांचे लग्न झाले.

    आज माधवने केलेल्या तिच्या कलेचे कौतुक बघून ती खूप आनंदात होती. सकाळी माधव काय सरप्राइज देणार आहे हाच विचार तिच्या मनात रात्रभर सुरू होता.

    सकाळ झाली तशीच ती उठून भराभर आवरू लागली. शनिवार असल्याने माधवला सुट्टी होती त्यामुळे तो अजूनही गाढ झोपेत होता. तो उठून बघतो तर मॅडम आंघोळ करून छान फ्रेश होऊन तयार. ती छान गुलाबी रंगाचा कुर्ता घालून नुकतेच धुतलेले ओले मोकळे केस वाळवत असताना तिला तो निरखत होता. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य बघून त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. तिच्या गोड आवाजात गुड मॉर्निंग शब्द ऐकून तो भानावर आला. तिला गुड मॉर्निंग म्हणत बेडवरून उठला. फ्रेश होऊन हॉलमध्ये आला तर ती नाश्त्याची तयारी करत होती. गरमागरम चहा, नाश्ता करून दोघेही घराबाहेर पडले. माधव मीराला एका प्रख्यात चित्रकाराचे प्रदर्शन बघायला घेऊन गेला. तिच्या आवडत्या कलेचे प्रदर्शन बघण्यात ती अगदी रममाण झाली. एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे, लोकांकडून होणारे त्या चित्रकाराचे कौतुक बघत ती विचारांमध्ये हरवली. जणू स्वतःचे भविष्य ती त्या चित्रकारात बघत होती.

      प्रदर्शन बघून झाल्यावर दोघेही एका मोठ्या हॉटेलमध्ये लंच करायला गेले. लंच करताना माधव मीराला म्हणाला, “मीरा, तुझ्या कलेचे असेच भरभरून कौतुक सगळ्यांनी करावे असे मला वाटते. तुला माहित आहे आजच्या या प्रदर्शनात ठेवलेल्या पेंटिंग्जची किंमत लाखो रूपये आहे. खूप मागणी आहे या कलेला. केवळ पैशासाठी म्हणून म्हणत नाही मी तुला पण तुझ्या या कलेमुळे तुला एक नवी ओळख मिळावी म्हणून सांगतोय तू या क्षेत्रात खूप यशस्वी होशील. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. छोट्या स्तरावर का होईना पण तू याची सुरुवात कर असं वाटतंय मला.”

    मीरा माधवच्या बोलण्याने खूप आनंदी झाली, त्याला म्हणाली, ” माधव, अरे माझ्यातली ही कला तुझ्यामुळे जगासमोर येत असेल तर मी अगदी एका पायावर तयार आहे. मुळात या कलेच्या क्षेत्रात करीअर करता येते याविषयी फारसं माहीत नव्हतं रे मला. आपण आजच तयारीला लागूया. आजचा दिवस माझ्यासाठी खरच खूप खास आहे. तू दिलेलं सरप्राइज तर आयुष्यातील सर्वात सुंदर भेट.”

    मीराला पेंटिंग साठी लागणारी सगळी सामग्रीची खरेदी दोघांनी केली. मीरा ने वेळ न घालवता सहजपणे अगदी सुंदर अशा पेंटिंग्ज बनवायला सुरुवात केली. माधवने तिला काही ऑनलाईन साइट वर पेंटिंग्ज टाकायला सांगितले, कसे करायचे सगळे शिकविले. भराभर तिच्या कलेला ओळख मिळायला सुरुवात झाली, भरपूर मागणी येऊ लागली. हे सगळं करताना, अनुभवताना मीरा खूप आनंदी असायची. माधवला तिचं खूप कौतुक वाटत होतं.

    आता तर मोठमोठ्या ऑर्डर सोबतच पेंटिंग्ज वर्कशॉप्स सुरू केले. तिच्या आवडत्या क्षेत्रात मन लावून काम करत मीराने लवकरच छान प्रगती केली. या सगळ्यात माधव अगदी तिच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला.

    आज तर तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. गेली तीन वर्षे अप्रतिम कलाकुसर करून नाव कमावलेल्या मीराचे पेंटींग्ज एका मोठ्या प्रदर्शनात बर्‍याच कलाकारांच्या पेंटिंग्ज सोबत लावलेले होते. तिथे बघायला येणार्‍या गर्दीतून तिचे पेंटींग्जचे होणारे कौतुक ऐकताना मीराला एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. माधवची इच्छा आपण पूर्ण केली याचा आनंद सोबतच कलेच्या माध्यमातून मिळालेली ओळख याचा जणू आज दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
    माधवला मीराचा खूप अभिमान वाटत होता.

    घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं होतं. त्याच्या हात हातात घेत त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली, “माधव, तुझ्यामुळे मला हे यश मिळाले. आय लव्ह यू..”

    त्यानेही तिला अलगद मिठीत घेत आय लव्ह यू टू म्हंटले.

    मीरा मनोमन एकच गाणे गुणगुणत होती,

    “जीवनात ही घडी अशीच राहू दे…
    प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे….

    रंगविले मी मनात चित्र देखणे
    आवडले वेडीला स्वप्न खेळणे
    स्वप्नातिल चांदवा….जिवास लाभु दे…

    जीवनात ही घडी अशीच राहू दे….”

    अशी ही मीरा आणि माधवची प्रेरणादायी प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या की लिखाणाचा हुरूप वाढतो तेव्हा कमेंट करायला विसरू नका ?

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

       लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.

        दोघेही मलेशियाला पोहोचले, स्पेशल हनीमून पॅकेज घेतले असल्याने दोघे हॉटेल मध्ये त्यांच्या खोलीत पोहोचले तसंच त्यांना एक गोड सरप्राइज मिळाले. खोली गुलाबांच्या फुलांनी, पाकळ्यांनी छान सजविली होती. सगळीकडे मंद सुवास दरवळत होता. लाईटच्या मंद प्रकाशात अतिशय रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ते बघताच मोनिका आपसूकच पुटपुटली,  
    “व्वा..किती रोमॅंटिक वाटतंय ना सगळं..”

        मयंकच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नव्हता. तिच्या बोलण्याला काही एक उत्तर न देता तो बॅग ठेवून आंघोळीला निघून गेला. तो बाहेर आला तसंच मोनिकाने त्याला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो दचकून तिला दूर करत म्हणाला, “चला भूक लागली आहे, पटकन फ्रेश हो आपण खाली जरा काही खाऊन येऊ आणि फेरफटका मारून येऊ.

         त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मोनिकाला फार वाईट वाटले, अशा प्रकारे दूर का लोटले असावे मयंक ने. त्याला मी असं जवळ आलेलं आवडलं नसेल का, की मी फार उतावीळ झाले असं काही वाटत असेल. पण मिठी मारण्यात काही वावगं तर नाही शिवाय आता आम्ही नवरा बायको आहोत मग असा का वागतोय मयंक लग्नापासून. जराही प्रेमाने बोलला नाही की जवळही घेतले नाही. अजून त्याला वेळ हवा असेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत मोनिका आंघोळ करताना करत होती. फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघेही खाली गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही खाली फेरफटका मारत होते. खोलीवर परतले तेव्हा मयंक म्हणाला , आज प्रवासामुळे थकवा वाटतोय, उद्या सकाळीच फिरायला निघायचं आहे. लवकर झोपा. इतकं बोलून तो अंगावर चादर ओढून झोपी गेला. मोनिकाला मात्र त्याच हे वागणं अजूनच खटकलं.
         

         त्याने प्रेमाने छान रोमॅंटिक काही तरी बोलावं, हळूहळू या नात्याला बहरायला एक पाऊल पुढे घ्यावं इतकीच तर अपेक्षा होती तिची पण मयंक ने तिचा हिरमोड केला. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या साथीदाराकडून प्रेमाची अपेक्षा ही असतेच पण मयंक मात्र फारच वेगळा वागत होता. विचार करत तिचे डोळे पाणावले.

     
       पुढे आठवडाभर एकाच खोलीत दोघेच असूनही तो तिला जराही जवळ घेत नव्हता. दिवसा बाहेर फिरायचे आणि हॉटेल मध्ये येऊन आराम करायचा असाच काय तो त्यांचा हनीमून साजरा झाला. मोनिका त्याच्या कुशीत शिरण्याचा, त्याला मिठी मारण्याचा अलगद प्रयत्न करत होती पण तो मात्र तिला दूर करत तिला टाळायचा प्रयत्न करत होता. आता दोघांच्या नात्यात या नाजुक विषयावर बोलायचं म्हणजे मुलीसाठी कठीणच तेव्हा नक्की काय करावे तिला काही सुचेना.

       दोघेही हनीमून वरून परत आले. मयंक ची सुट्टी संपली होती आणि तो नोकरीला रूजू झाला. मोनिका सुद्धा वडीलांच्या व्यवसायात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्यायला सुरु झाली. ती सतत काही तरी विचारात दिसते आहे हे तिच्या आई वडिलांनी ओळखले, “मोना , सगळं ठीक आहे ना..कशाच्या विचारात आहेस..” असही आईने तिला विचारले.
    नवरा बायको यांच्या मिलनाच्या विषयावर आई सोबत तरी कसं बोलावं तिला कळेना‌ त्यामुळे “काही नाही..मी ठिक आहे..” इतकंच ती बोलली.
         
        मोनिकाला आता मयंक विषयी जरा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. मयंक रोज उशीरा घरी यायचा, सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचा. मोनिका दिवसभर प्रवास , काम यामुळे थकून त्याची वाट बघत झोपी जायची. त्याला तर तेच हवे होते. शक्य त्या प्रकारे तिला टाळण्याचा प्रयत्न तो करत होता. आता आपणच पुढाकार घ्यावा असं मनोमन ठरवून मोनिका तो येत पर्यंत झोपली नाही. उगाच झोपण्याचे नाटक  करत ती बेडवर पडून होती.

    रात्री १२:३० च्या सुमारास तो घरी आला. बराच वेळ बाथरूम मधे फ्रेश होत होता. बाहेर आला तर मोनिका मस्त तयार होऊन छान आकर्षक नाइट ड्रेस घालून त्याच्या समोर उभी राहिली. तिला बघताच त्याला धक्काच बसला. आपल्याला असं छान तयार झालेलं बघून मयंक आपल्याकडे आकर्षित होईल असे तिला वाटलेले पण तशी काहीही भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तिचा सुडौल बांधा, सेक्सी नाइट ड्रेस कडे दुर्लक्ष करत तो म्हणाला , “झोपली नाही अजून..”
    आता तिला त्याचा फार राग आलेला. लग्नाला तीन आठवडे होत आले होते पण मयंक तिला जराही स्पर्श करत नव्हता, जराही प्रेमाने छान काही बोलत नव्हता.

      ती आपला राग आवरत त्याला जाऊन बिलगली तसंच त्याने तिला जोरात दूर लोटले. “मोनिका, काय करतेय, खूप उशीर झाला आहे झोप आता” असं चिडक्या सुरात बोलून तो झोपला. ती रात्रभर रडत होती, विचार करत होती.
      आता त्याच्या विषयी अजूनच शंका तिला आल्या. मनात काही तरी ठरवून तिने पुढच्या काही दिवसांत त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या विषयी चौकशी सुरू केली. मयंकच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी तर नाही ना हाच संशय आता पर्यंत तिला होता. त्याच्या मित्रांकडून याविषयी असंच कळालं की आमच्या माहिती नुसार तरी त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी नव्हती, ना आहे. त्याच्या कंपनीत तर त्याच्या विषयी सगळ्यांनी त्याच्या कामाबाबत फारच कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. हुशार, मनमिळाऊ, वेळेत काम पूर्ण करणारा सगळ्यांचा लाडका मयंक असंच तिला कळालं.

        मग मयंक असं का वागतोय तिला काही कळत नव्हते. तिने एका मैत्रिणीला याविषयी सांगितले तेव्हा याविषयी स्पष्ट बोलून दोघांनी हा प्रश्न सोडवलेला बरा असं तिने सांगितलं.
       मयंकच्या जवळ जाण्यासाठी मोनिका अनेकदा पुढाकार घेत होती पण तो तिला टाळत ,दूर करत होता आणि तिच्या पदरात प्रेम नाही तर निराशाच येते होती.
       लग्नाला जवळपास दोन महिने झालेले होते. सगळ्यांसमोर आपल्याशी अगदी छान वागणारा हा मयंक काही तरी नक्कीच लपवितो आहे याची मोनिकाला खात्री पटली होती. आज मयंक सोबत स्पष्ट बोलून हा मनातला गोंधळ कमी करावा असं तिने ठरवलं.

        रविवार असल्याने दोघेही घरी होते. मयंक नाश्ता करून टिव्ही बघत बसला‌ होता. मोनिका हळूच त्याच्या पाठीमागून आली आणि तिने परत एकदा पुढाकार घेत त्याला मिठी मारत त्याच्या गालावर चुंबन केले. तिच्या या कृतीमुळे तो ताडकन उठून उभा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो चिडून म्हणाला, “मोनिका कितीदा सांगितलं तुला मला नाही आवडत तुझं असं वागणं…का करतेस तू असं…”

    मोनिका त्यावर उत्तरली “का रे…काय प्रोब्लेम आहे..आपण नवरा बायको आहोत ना..मग इतका अधिकार तर नक्कीच आहे मला..तुला आवडत नाही का मी..का टाळतोय मला सतत.. कुणी दुसरी असेल तुझ्या आयुष्यात तर तसं तरी सांग..का वागतोय असा तू..बोल मयंक बोल..”

    तो चिडून म्हणाला, “दुसरं कुणी आयुष्यात असण्याचा काही प्रश्नच नाही….मला नाही आवडत तू अशी मला चिपकलेली…मला‌ या सगळ्यात काही एक रस नाहीये… लैंगिक संबंध ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला..मी शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही ह्या सगळ्यासाठी…झालं आता समाधान…हेच ऐकायचं होतं ना‌ तुला..कळालं आता…आता परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस..”

    हातातलं रिमोट जमिनीवर आपटत तो तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, शरीर त्याच्या शब्दांनी थरथरू लागले. स्वतः ला सावरत ती सोफ्यावर बसून रडत होती. मयंक ने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपविली, आपली फसवणूक केली या गोष्टीचा तिला विश्र्वासच होत नव्हता.

        किती तरी वेळ विचार करत , रडत ती तिथेच बसून राहीली. मयंक ने तिचा मोठा विश्वासघात केला होता याचा जाब विचारण्यासाठी ती त्याच्या समोर गेली. त्याला विचारले, ” मयंक लग्नापूर्वी का नाही सांगितलं हे सगळं…का केला इतका मोठा विश्वासघात..किती प्रेम करते मी तुझ्यावर माहीत होतं ना तुला..अरे मला लग्नानंतर सुद्धा एकदा कधी तू विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर काही तरी उपचार केले असते.. काही तरी मार्ग काढला असता..पण तू फक्त माझ्या भावनांशी खेळला..मला‌ अंधारात ठेवले..प्रेमाचे दोन शब्द कधी बोलला नाही तू.. फसवणूक केली मयंक तू माझी..याची शिक्षा तुला मिळणारच..”

      त्यावर तो म्हणाला, “कर आता माझी बदनामी करत..सांग सगळ्यांना मी खरा पुरुष नाही.. लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही..नाहीये मी सक्षम.. माहीत आहे मला…लग्न का केलं म्हणतेस ना…लग्न न करण्याचे हे कारण नव्हतो सांगू शकत मी कुणाला..सगळ्यांचा सतत तगादा..काय सांगू त्यांना मी.. म्हणून केलं लग्न…”

    “अरे‌ पण तुझी अवस्था तुला माहीत होती ना… इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे…माझं आयुष्य उध्वस्त केलं मयंक तू…कळतंय का तुला… विश्वासाने. सांगितलं जरी असतं ना तर सहनही केलं असतं मी..मार्ग काढला असता यातून आपण..पण आता नाही… विश्वासघात केला तू…नाही राहू शकत मी तुझ्यासोबत..”

    इतकं बोलून कशीबशी पर्स उचलून मोनिका आई वडीलांकडे निघून आली. मोनिका अशी रडत रडत अचानक असं घरी आल्याने आई बाबा गोंधळले. तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसाच त्यांनाही मोठा धक्का बसला. या सगळ्याचा मोनिकाच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झाला. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे तिची तब्येत चांगलीच खालावली.

    सत्य कळताच मोनिकाच्या आई वडीलांनी मयंकचया घरच्यांना‌ फोन केला तर त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले मयंकला जाब विचारला तर त्याने सगळं खरं असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली होती. मोनिकाला भेटायला आले असता तिची माफी मागत ते इतकंच म्हणाले, ” मोना, आम्हाला हे सगळं माहीत असतं तर त्याच लग्न केलच नसतं गं..पण आम्हाला याविषयी खरंच काही कल्पना नव्हती. आमच्या मुलामुळे तुझ्यावर ही वेळ आली याचा आम्हालाही खूप त्रास होतोय..आम्ही सुद्धा कधीच स्वतः ला माफ करू शकणार नाही….”

    सतत तोच विषय, इतका मोठा मानसिक धक्का यामुळे मोनिका ची तब्येत जरा जास्त बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दिवसात मयंक एकदाही तिला भेटला नाही, फोन नाही.

    मोनिका तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असे त्याचे वडील त्याला ओरडून बोलले तेव्हा तिला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये आला‌ पण मोनिकाच्या आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले.
      काही दिवसांनी मोनिका बरी झाली. मयंकला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला. लग्न, प्रेम या सगळयां वरून आता तिचा विश्वास उडाला होता.

        एक सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आयुष्याच्या जोडीदाराला ओळखण्यात चुकली होती. लग्नापूर्वी कधीच तिला भेटायला पुढाकार मयंक का घेत नव्हता, लग्नापूर्वी कधीच रोमॅंटिक का बोलत नव्हता यांचं उत्तर तिला आता मिळालं होतं. आपण त्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, त्याच्या शांत स्वभावाचा दोष समजून त्याच्या वागण्या कडे, त्याला आपल्यात रस आहे की नाही हे जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केले याची मनापासून तिला खंत वाटली. 

        मयंक मध्ये शारीरिक दोष असताना त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून मोनिका ची फसवणूक केली. तिची काहीही चूक नसताना तिच्या भावना, तिच्या आयुष्याशी तो खेळला. असंच हल्ली समाजात बरेच ठिकाणी होताना दिसते आहे.

    अशाच एका सत्य घटनेवर आधारित मी ही कथा लिहिली आहे.

      मुलांमध्ये शारिरीक दोष असतील, ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतुल तर याविषयी त्यांच्या आई वडिलांना तरी कसे कळणार ना. पण मुळात अशा वेळी स्वतः ची परिस्थिती माहीत असताना एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळणे म्हणजे गुन्हाच म्हणावा‌ लागेल. लग्नानंतरही हे सत्य इतरांना कळणारच ना त्यापेक्षा असा प्रोब्लेम असल्यास आधीच विचार करून निर्णय घेतला तर अशी बिकट परिस्थिती येणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

    आरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली.
    दोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात गुंतल्याने आई आणि आरती दोघींचेच विश्व. दिवाळीच्या सुट्टीत चार दिवस पाहुणे म्हणून भाऊ, भावजया, भाचे कंपनी यायची आणि पुढे वर्षभर त्यांच्या आठवणी मनात साठवून जगायचं असंच काहीसं झालं होतं आरतीच्या आईचं.

    मुळात शांत स्वभाव त्यामुळे मुला सुनांवर ओझे नको म्हणून त्या काही त्यांना कुठल्याच बाबतीत काही बोलेना. बाबांची पेन्शन शिवाय दादांच्या महिन्याला येणार्‍या पॉकेट मनी मधून दोघी मायलेकी घरखर्च करायच्या. त्यातही वहिनीच्या लपून छपून दादा पैसे पाठवतो असं कळाल्यावर तर आरतीला अजूनच वाईट वाटे.

    आता आरती वयात आली होती आईला वाटे आपल्या डोळ्यासमोर पोरीचे हात पिवळे झाले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळं. त्यांनी आरती जवळ तिच्या लग्नाविषयी बोलून पण दाखविले पण प्रत्येक वेळी तिचं उत्तर ठरलेलं, “मला नाही करायचं लग्न..तुला एकटीला सोडून मला नाही जायचं सासरी..”

    आपण सासरी गेलो तर आईचं कसं होणार या विचाराने लग्न न करण्याचा निश्चय आरतीने केला, कारण भाऊ भावजय आईला सोबत घेऊन जाणार नाही याची तिला एव्हाना खात्री पटली होती. इकडे आईला वाटे आपण आहोत तोपर्यंत ठिक पण आपण गेल्यावर आरती एकटी आयुष्य कसं जगणार? भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही? आरतीच्या लग्न न करण्याच्या निश्चयाने भाऊ सुद्धा तिला त्याविषयी फार काही आग्रह करत नसे.

    दोघीही आपापल्या हट्टाला चिकटून. आरतीला एक छोटीशी नोकरी मिळाली होती, नोकरी आणि आई असं तिचं विश्व बनलेलं. भराभर दिवस , वर्षे जात होते.
    अशातच एकदा आईची तब्येत खराब झाली आणि तिला कॅन्सर असल्याचे कळाले. आईचे उपचार सुरू असले तरी तिच्या जगण्याची शक्यता कमी आहे हे डॉक्टरांकडून सुरवातीलाच कळाले होते.

    आता तर आरतीने आपला निश्चय अजूनच पक्का केला. आईची सेवा करायची आणि ती हयात आहे तितके दिवस आनंदात घालवायचं असं ठरवलं. नोकरी सोडून आरतीने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. घरीच ट्युशन घेताना आई कडेही लक्ष देता यायचे आणि थोडी फार कमाई सुद्धा व्हायची. भाऊ भावजय अधूनमधून भेटायला येत असे. आई म्हणायची आरती तू माझ्या डोळ्यांदेखत लग्न कर पण आरती काही मानत नव्हती. तू माझी काळजी करू नकोस म्हणत तीच आईची समजूत काढत होती.
    असेच कसंबसं एक वर्ष‌ गेलं आणि आई आरतीला सोडून कायमची निघून गेली.

    आई कुठल्याही क्षणी आपल्याला सोडून जाऊ शकते हे माहीत असले तरी ती गेल्यावर ते वास्तव स्विकारण्याची हिम्मत आरती मध्ये नव्हती. आईच्या जाण्याने ती पोरकी झाली होती, पूर्णपणे एकटी पडली होती, मनातून पार खचून गेली होती. आईच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात जिवंत होत्या.
    आई गेल्यावर आरतीला मोठा भाऊ आग्रह करत सोबत घेऊन गेला पण भावाच्या संसारात आपली अडचण होतेय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवले. दोन भाऊ आहेत मग दुसर्‍यानेही बहिणीचा जरा भार उचलावा अशी भावजयीची प्रतिक्रिया कानावर पडताच आरतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या राहत्या घरी आईच्या आठवणीने एक एक क्षण कठीण म्हणून आरतीने होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गावचे राहते घर भाड्याने दिले आणि पूर्वी नोकरीला होती त्या मालकाशी बोलून नोकरी परत मिळविली.

    आरती पूर्णपणे एकटी पडली होती. कधीतरी भाऊ भेटून जायचे, सोबत चल म्हणायचे पण तुमच्यावर भार नको मी इथेच बरी म्हणत ती आयुष्य जगत होती. असं खडतर आयुष्य जगताना पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेली आरती चाळीशी पलिकडची दिसायला लागली, स्वतः कडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. भाऊ म्हणायचे अजून वेळ गेलेली नाही, तू लग्न कर पण प्रेम, भावना सगळ्या गोष्टींचा विचार तिने कधी केलाच नव्हता आणि आता तर तिने मनातून सगळे भाव पुसून टाकले होते. तारूण्यात मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी काही तरी जाणवत असेलही पण जबाबदारी पुढे तिने ते कधी अनुभवण्याचा विचार केला नव्हताच.
    आई गेल्यावर एकटेपणाची भावना मनात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचारही तिच्या मनात आलेला पण आई नेहमी सांगायची, ” मी गेल्यावर खचून जाऊ नकोस, तू दुर्गा आहेस, तूच रणरागिणी आहेस…”
    आईचे शब्द आठवून मनातल्या वाईट विचारांना लाथ मारत ती नव्याने जगायचा प्रयत्न करत होती. होस्टेलमध्ये बर्‍याच पिडीत महिला, शिकणाऱ्या अनाथ मुली होत्या. त्यांच्याकडे बघत आरती विचार करायची, ” आपल्या वयाच्या पस्तीशी पर्यंत का होईना पण आईचं प्रेम लाभलं.. दूर का असेना पण भाऊ म्हणायला भाऊ सुद्धा आहेत…कधी फोन वर चौकशी तर करतात.. इतरांच्या मानाने आपण सुखीचं आहोत..”
    कशीबशी मनाची समजूत काढत ती नोकरी करत आयुष्य जगत होती. गरजूंना शक्य ती मदत करत समाजसेवा करण्याचा निर्णय तिने घेतला आणि पुढचे आयुष्य असंच समाजसेवेत अर्पण करण्याचे मनोमन ठरविले.

    हा लेख सत्य परिस्थिती वर आधारित असून काही भाग काल्पनिक आहे.
    आरती सारखं आयुष्य जगणार्‍या स्त्रिया म्हणजे खरंच रणरागिणी आहेत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • फुलले रे क्षण माझे ( प्रेमकथा )

    रुपा आज अगदीच उत्साहात होती. कारणही तसेच होते, तिच्या स्वप्नातला राजकुमार आज तिला भेटणार होता. परी कथेतल्या राजकुमाराची स्वप्न बघणारी रुपा दिसायला अतिशय सुंदर, सुडौल बांधा, लांबसडक केस, निळसर डोळे, गालावर खळी. नावाप्रमाणेच रुपवान, अगदीच लाडात कौतुकात वाढलेली. गावात मोठा वाडा, एकत्र कुटुंब, त्यात आजी आजोबा, आई बाबा, दोन काका काकू, एकूण सहा भाऊ आणि त्या सगळ्यात रुपा एकुलती एक लाडकी बहीण शिवाय सगळ्यात लहान. मग काय ताईसाहेबांचा तोरा बघायलाच नको. अगदी फुलाप्रमाणे जपायचे सगळे तिला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून रूपा गावातल्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची. आवाज सुरेख असल्याने गायनाचे क्लास सुद्धा घ्यायची.
    रुपा आजीकडून लहानपणापासून परी कथा ऐकत आलेली आणि मनात कुठेतरी असेच राजकुमाराचे स्वप्न रंगवत बसायची.

    कितीही लाडाची लेक असली तरी भविष्यात काळजी नको म्हणून आई आणि काकूंनी तिला घरकामात, स्वयंपाक करण्यातही तरबेज बनविले होते. अगदी सर्वगुणसंपन्न म्हणून रुपाची चर्चा गावात असायची.

    जशीच ती वयात आली तसे तिचे सौंदर्य बघता तिला बरेच स्थळ यायचे पण तिच्या तोलामोलाचा राजकुमार काही एव्हाना गवसला नव्हता.
    कधी घरच्यांना पसंत नसे तर कधी रुपाला पसंत नसे. गावात वावर असला तरी रुपाच्या घरी सगळे आधुनिक विचाराचे त्यामुळे तिचे मत लक्षात घेऊनच राजकुमाराचा शोध सुरू होता.

    एक दिवस रुपा गायन क्लास घेऊन परत आली तसंच दादाने तिला चिडवत एक लिफाफा हातात दिला आणि म्हणाला, ” हे बघ आम्ही तुझ्यासाठी मुलगा पसंत केलाय, फोटो वरून अगदी चाळीशी पार केलेला दिसतोय, डोक्यावर केस मोजकेच आहेत शिवाय भिंगाचा चष्मा लावतो असं दिसतोय. पण मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे बरं का..तेही मोठ्या शहरात..बघ जरा आवडतो का..”

    रुपा दादाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे धावली. अगदी मांजर बोका सारखे दोघेही बहीण भावाची मज्जा मस्ती सुरू झाली. सोबतीला इतर भावंडे होतीच. चिडून म्हणाली, “मला नाही करायचं लग्न जा… फोटो पण नाही बघायचा..तूच बघ..”

    ती चिडक्या सुरात रडकुंडीला येऊन आईच्या कुशीत शिरली. सगळ्या भावांनी रुपाची मस्करी करत खोड्या केल्या की राणीसाहेब हमखास आईच्या कुशीत शिरणार हे ठरलेलेच.
    आज आईच्या कुशीत शिरताच आई म्हणाली, “अगं, मस्करी करताहेत ते सगळे. फोटो बघ एकदा मुलाचा. अगदी साजेसा आहे तुला. बाबा आणि काका जाऊन आलेत त्यांच्याकडे, तुझा फोटो बघताच सगळ्यांना आवडली तू..शहरात चांगल्या पदावर नोकरीला आहे मुलगा. मुलाचे नाव काय बरं म्हणाले बाबा..( जरा विचार करत)….हा…. सुशांत गायकवाड..घराणे सुद्धा आपल्या सारखेच..उद्या तुला बघायला येणार आहेत..तुला मुलगा पसंत असला तरच पुढचं ठरवू….”

    आईचं बोलणं ऐकून जरा लाजतच ती लिफाफा हातात घेत आपल्या खोलीत निघून गेली. आज का कोण जाणे पण त्याचा फोटो बघण्याची वेगळीच आतुरता लागली होती तिला. खोलीत एका खुर्चीवर बसून लाजर्‍या चेहऱ्याने ती फोटो लिफाफ्यातून बाहेर काढू लागली. हृदयाची धडधड अलगदपणे का वाढली तिला कळत नव्हते. तसाच त्याचा फोटो बघितला तशीच त्याच्या घार्‍या डोळ्यांवर तिची नजर स्थिरावली. दादाने वर्णन केले त्याच्या अगदीच विरूद्ध, दिसायला राजबिंडा, फोटोतही लक्षात येतील असे त्याचे घारे डोळे, काळ्याभोर केसांची हेअरस्टाईल अगदीच शाहीद कपूर सारखी. एकंदरीत तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आज गवसला होता. असं आलेल्या स्थळांचे फोटो बघणं, त्या मुलाची सगळी माहिती ऐकणे काही पहिल्यांदा होत नव्हते पण आज सुशांतचा फोटो बघताच, त्याच एकंदरीत वर्णन ऐकता तिच्या मनात एकच भाव होता तो म्हणजे, “हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार..”

    उगाच कितीतरी वेळ ती त्याचा फोटो निरखत बसलेली. स्वत:शीच हसत, लाजत एका वेगळ्याच विश्वात हरवली होती ती.‌ तिच्या भावंडांनी तिचे भाव लपून छपून टिपले आणि घरात एकच दवंडी पिटत सांगितले, “रुपाला पोरगा आवडलेला दिसतोय…तासभर फोटो बघत बसली आहे ती…हसतेय काय…लाजतेय काय..”

    ते ऐकताच घरातील प्रत्येक जण मनोमन आनंदी होत म्हणत होते, आता उद्या एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला की सगळं सुरळीत होवो म्हणजे झालं. घरात सगळ्यांना दुसऱ्या दिवशीची आतुरता लागली होती.

    इकडे रुपाला काही रात्रभर झोप लागत नव्हती. फोटो तर एव्हाना बाबांच्या ताब्यात गेलेला पण सुशांतचा चेहरा तिच्या सतत नजरेसमोर होता. अजून भेट सुद्धा झाली नाही मग का इतका विचार करते आहे मी असंही तिला वाटलं पण मन काही त्याच्या विचारातून बाहेर पडेना. रात्रभर स्वप्न रंगवत कशीबशी पहाटे ती झोपी गेली.

    सकाळी जाग आली तशीच स्वतः ला आरश्यात बघून लाजतच ती स्वतःशीच पुटपुटली, “चला आज राजकुमार येणार आहे….तयार व्हा लवकर…” मनात एकीकडे आतुरता तर होती पण एक वेगळीच भितीही तिला वाटत होती. त्याने मला नाकारले तर…हाही विचार करून जरा मधूनच अस्वस्थता तिला जाणवत होती.

    मोठ्या उत्साहाने काकूंच्या मदतीने ती तयार झाली. घरातला जो तो तिला चिडवत , मस्करी करत तिचं भरभरून कौतुक करत होते. लाल रंगाची जरी काठी साडी नेसून ती तयार झाली. लांबसडक केसांची वेणी, त्यावर मोगर्‍याचा गजरा, हातात मॅचिंग बांगड्या , कानात इवल्याशा कुड्या, गळ्यात नाजुक नेकलेस, कपाळावर इवलिशी टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत होते. चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना एखाद्या अप्सरेसारखी सुरेख ती दिसत होती.

    पाहुणे मंडळी आली म्हणताच रुपाची धडधड वाढली. खोली वरच्या बाजूला असल्याने खिडकीतून मुख्य दरवाजा सहज दिसत होता. काकू तिला तयार करून खोलीबाहेर पडताच रुपा लपून छपून खिडकीतून डोकावून बघत होती आणि तितक्यात तिची नजर सुशांत वर गेली. आकाशी रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट परिधान केलेला सुशांत हळूच डोळ्यांवरचा गॉगल काढत असताना तिला दिसला तशीच ती त्याच्यावर फिदा. फोटो पेक्षा प्रत्यक्षात अजूनच हॅंडसम दिसत होता तो.
    त्याने त्या अप्रतिम अशा वाड्यावर एक नजर फिरवली तशीच रुपा खिडकीतून लपून बघताना त्याला दिसली. दोघांची नजरानजर होताच ती भरकन बाजुला सरकली. पण त्याने ते घेरले, तिची एक झलक बघताच तिला बघण्यासाठी तो आतुर झाला होता.

    रुपाची धडधड आता अजूनच वाढली. कितीतरी वेळा ती स्वतः ला आरश्यात निरखून बघत हसत लाजत होती.

    काही वेळातच काकू तिला बैठकीत घेऊन जायला‌ आल्या. ती जिन्यावरून जसजशी खाली उतरत होती तशीच तिच्या हृदयाची स्पंदने वाढत होती. खाली नजर ठेवून ती सगळ्यांसमोर आली. सुशांत तिला बघताच घायाळ झालेला. तिचं निरागस सौंदर्य, तिचा सुडौल बांधा, तिला शोभेसा तिचा लूक बघताच त्याला ती पहिल्या नजरेतच आवडली. सुशांत च्या आई बाबांनी तिला काही प्रश्न विचारले. सुशांत मात्र सगळ्यांची नजर चुकवत तिला न्याहाळत होता. तिचा सुमधुर आवाज त्याला अजूनच तिच्याकडे आकर्षित करत होता.

    काही वेळाने घरातल्या मोठ्यांनी दोघांना एकत्र बोलायला बाजुला पाठवले. दादाच्या मदतीने दोघेही बैठकी बाजुच्या खोलीत बसले. रुपा लाजून चूर झाली होती. खाली नजर ठेवून बसलेल्या रुपाचे सौंदर्य निरखत सुशांत तिला म्हणाला , “खूप छान दिसत आहेस…”

    लाजतच ती थॅंक्यू म्हणाली पण नजर काही त्याच्याकडे वळत नव्हती. मनात अनेक भावना होत्या पण या क्षणी काय बोलावं, कसं वागावं तिला सुचत नव्हतं. ती शांतता दूर करण्यासाठी सुशांत तिला एक एक प्रश्न विचारत तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. न राहवून तो‌ तिला म्हणाला, ” हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध तर होत नाहीये ना…कारण मी एकटाच बोलतोय पण तू एक नजर सुद्धा मला बघत नाहीये..”

    तशीच ती त्याला बघत म्हणाली, “नाही नाही मनाविरुद्ध अजिबात नाही…उलट तुमचा फोटो बघताच मला तुम्ही खूप आवडलात पण आता या क्षणी काय करावं खरंच मला सुचत नाहीये…”
    दोघांची नजरानजर झाली आणि क्षणभर दोघेही एकमेकांच्या नजरेत बघतच राहिले. आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच जीभ चावत तिने परत त्याची नजर चुकवली तसंच त्याला काही हसू आवरलं नाही. आनंदी होत तो म्हणाला , “खरंच…इतका आवडलो मी..तरीच मघाशी खिडकीतून लपून छपून बघत होतीस मला..”

    ते ऐकताच तिलाही हसू आलं शिवाय लाजून चूर सुद्धा झाली आणि एकमेकांना बघत दोघेही हसले.
    आता ती जरा मोकळी झाली बघत दोघांनी एकमेकांविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारले, अपेक्षा जाणून घेतल्या. तिच्या मनात एकच गाणे गुणगुणत होते,

    “फुलले रे क्षण माझे फुलले रे….”

    हा दिवस हे क्षण इथेच थांबावे आणि आम्ही असंच एकमेकांच्या नजरेत बघत गप्पा माराव्या असंच काहीसं झालेलं दोघांना. त्या पहिल्या भेटीतच दोघांनाही एकमेकांच्या भावना आपसूकच कळाल्या.

    रुपाला स्वप्नातला राजकुमार भेटला होता, अगदी मनात आकृती कोरलेली तसाच तिला तो भासत होता. त्यालाही तिची प्रत्येक छबी घायाळ करत होती.

    इथूनच त्यांच्या प्रेमाची एक गोड सुरवात झाली. घरच्यांनी मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न लावून दिले. अगदी फुलाप्रमाणे जपलेल्या रुपाला सासरी पाठवताना‌ दादांना आज काही केल्या रडू आवरले नव्हते, आजोबा, बाबा आणि काका सगळ्यांची नजर चुकवत डोळे पुसत होते. आजी रडतच तिला म्हणाली, “परीकथेतला राजकुमार आमच्या राजकुमारीला गवसला..आता आनंदाने संसार करू बाळा…”

    मिश्र भावनांनी रुपाने सुशांतच्या आयुष्यात पाऊल टाकले. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून तोही भावनिक झाला. तिचा हात हातात घेत सगळ्यांना म्हणाला, “काळजी करू नका, मी खूप आनंदात ठेवेल रुपाला..” त्याच्या हाताच्या स्पर्शाने, त्याच्या बोलण्याने रुपा मनोमन आनंदी झाली. समाधानाचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवले तशीच त्याच्या चेहऱ्याकडे बघत ती मनातच म्हणाली,

    ” फुलले रे क्षण माझे फुलले रे….
    फुलले रे क्षण माझे फुलले रे…
    मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
    सजले रे क्षण माझे सजले रे….”

    अशी झाली दोघांच्या नात्याची सुरुवात.

    ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

    मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे