Tag: Marathi blogs

  • ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे.

    रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते.
    मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
    टपोरे डोळे, निरागस चेहरा, नाजुक अंगकाठी, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट असलेली रिया अनिकेतला बघता क्षणीच आवडते.
    अनिकेतही तिच्या तोलामोलाचा, आकर्षक अशी पिळदार शरीरयष्टी, दिसायला राजबिंडा. अनिकेत आई बाबांना एकुलता एक, त्यामुळे अतिशय लाडका. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. स्वभावाने प्रेमळ पण आई म्हणेल ती पूर्व दिशा अशा काहीशा विचारांचा.
    दोघांचे लग्न ठरले, दोन्ही कुटुंबे अगदी धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीला लागले होते. काही महिन्यांनी लग्न झाले.
    दोघांचे लग्न ठरल्यापासून रियाला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं त्याला.
    लग्न ठरल्या पासून  लग्न होत पर्यंत तो दररोज रियाला न चुकता भेटायचा. रियाचे ऑफिस जवळच असल्याने रोज सायंकाळी तिला भेटणे सोपे होते. रियालाही त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं, त्याच रोज भेटणं , एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणं तिला खूप सुखद वाटायचं. तिचा शांत , प्रेमळ स्वभाव , निरागस असं सौंदर्य याचे कौतुक करताना तो कधीच थकत नव्हता.  दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले होते, लग्न झाल्यावर ती घरी आली तेव्हा त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
    तिला नववधू च्या रूपात बघून त्याची परत एकदा विकेट उडाली होती. घरत बरीच पाहुणे मंडळी असताना लपून छपून तिच्याशी बोलायला यायचा, तिची झलक बघायला सतत बहाणा शोधायचा. सगळे चिडवत म्हणायचे सुद्धा,  याला काही चैन पडत नाही बाबा बायको चा चेहरा बघितल्या शिवाय. पूजा विधी सगळं आटोपलं, पाहुणे मंडळी परत गेली. राजा राणीच्या संसाराला प्रेमाने सुरवात झाली. दोघांची पहिली मिलनाची रात्र तिला अजुनही आठवते,  किती उत्साहाने त्याने सगळी तयारी केली होती त्याने , ते खास क्षण अविस्मरणीय बनविण्याची. आयुष्यात कधी साथ सोडणार नाही म्हणत हातात हात घेतला तेव्हा किती सुरक्षित वाटलं होतं..किती गोड्या गुलाबी ने दोघांचा संसार सुरु झाला होता. एकत्र ऑफिसला निघायचं, मौज मजा मस्ती, भरभरून प्रेम, किती गोड दिवस होते ते. झालं ते नव्या नवलाईचे नवं दिवस भुर्रकन उडून गेले, जणू कुणाची दृष्ट लागली दोघांच्या प्रेमाला. अनिकेत चे आई बाबा दुसऱ्या गावी राहत असले तरी अनिकेत ची आई सतत त्याला फोन करायची, घरी आलास का, इतका वेळ बाहेर कशाला फिरायचे, बायको डोक्यावर बसेल, जरा धाकात ठेव असेही सल्ले द्यायचे. त्याचे बाबा मात्र या सगळ्याच्या विरोधात, ते उलट सांगायचे नविन आयुष्याची सुरवात  आहे, खूप एन्जॉय करा पण बाबांनी आईला क्रॉस केले की अनिकेत ची आई मोठा ड्रामा करायची.

    जेव्हा रियाला हे सगळं कळालं तेव्हा सासूबाईंच्या विचारांची तिला कीव आली. मुलगा सुनेचा संसार आनंदाने चाललेला जणू त्यांना बघवत नव्हते की आपला मुलगा आपल्या पासून दूर जातोय अशी असुरक्षितता, एक प्रकारची भिती त्यांना वाटत होती, कोण जाणे.

    एकत्र राहत नसले तरी सतत फोन करून अनिकेत ला आई सगळे अपडेट विचारायची. अनिकेत सुद्धा त्यांना एकुण एक लहानसहान गोष्टी सांगायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण हळूहळू सगळं विचित्र वाटत होतं रियाला. ती याबाबत अनिकेतला काही बोलली की त्याला वाटायचं रियाला माझे आई बाबा नकोय, दूर राहतात तरी इतक्या तक्रारी करते ही.. झालं अशा गोष्टींवरून वाद सुरू झाले. लग्नाला एक वर्षही झाले नव्हते,  अशाच गोष्टी वरून एकदा दोघांचा वाद झाला आणि रिया रागारागाने आई कडे निघून गेली. रियाचे आई बाबा त्याच शहरात राहायचे तेव्हा राग शांत झाला की अनिकेत नक्कीच घ्यायला येणार याची तिला खात्री होती पण झालं वेगळंच. अनिकेतने रिया अशी निघून गेल्याचा राग मनात धरून ठेवला, मी का माघार घ्यावी म्हणत त्यानेही पुढाकार घेतला नाही. अनिकेत चे आई बाबा त्यादरम्यान त्याच्याजवळ रहायला आले.
    इकडे रिया त्याची वाट बघत एक एक दिवस मोजत होती आणि तिकडे आईच्या सल्ल्याने, धाकाने अनिकेत काही रियाला घरी आणण्याचा पुढाकार घेत नव्हता. अनिकेत चे बाबा त्याला खूप समजवायचा प्रयत्न करायचे, आईचं ऐकून दोघांमध्ये फूट पडू नये म्हणून प्रयत्न करायचे पण आईपुढे काही अनिकेत ठाम भूमिका घेत नव्हता.
    रिया ची आई तिला समजून सांगायची पण तो घ्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही या रियाच्या निर्णयामुळे आई बाबांचे काही एक चालत नव्हते शिवाय अनिकेत आणि त्याच्या घरच्यांची विचित्र विचारसरणीची कल्पना तिने घरी दिल्यावर रियाच्या बाबांनाही अनिकेत चे वागणे पटले नव्हते. अशातच एक दिवस अचानक अनिकेत कडून डिव्होर्स नोटीस आली आणि रिया हादरली.

    नवरा बायको यांच्यात भांडण, मतभेद हे होतातच पण असं अचानक डिव्होर्स नोटीस बघताच रियाला काही कळत नव्हतं, अनिकेत विषयी आधी जरा राग मनात होताच पण आता त्याच्या अशा वागण्याने तिला अजूनच संताप आला. त्याला , त्याच्या घरच्यांना मी नको असेल तर मलाही जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात परत जायचं ना नाही असा विचार करून ती आई बाबांकडे राहू लागली. 
    अशातच सहा महिने गेले आणि आज अचानक अनिकेत रियाला भेटला.

    अनिकेत रियाला सांगू लागला, “रिया अगं तू अशी रागात निघून गेली तेव्हा माझी खूप चिडचिड झाली, राग मलाही आलेलाच. तुला माझ्या घरच्यांशी प्रोब्लेम आहे असं मला वाटलं, माझं खरंच चुकलं रिया. तू निघून गेल्यावर आई बाबा आले, त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा बाबांनी मला तुला परत आणण्यासाठी खूप समजावले पण आईला ते मान्य नव्हते. आईला वाटत होतं मी तुझ्यामध्ये खूप गुंतल्या मुळे तिला मी विसरतो की काय..आईचा खूप लाडका ना मी म्हणून कदाचित तिच्यापासून दूर जाण्याची भिती तिला वाटली असावी. तुझ्याविषयी का माहित नाही पण एक राग, चिड तिने मनात धरून ठेवली. मी खूप गोंधळलो, आई बाबा आणि बायको प्रत्येकाची आयुष्यात एक वेगळी जागा असते हे मला खूप उशीरा कळलं. मला निर्णय घेता येत नव्हता, तुझ्या शिवाय एकटा पडलो होतो मी, मनात सतत कुढत होतो पण मनातलं सगळं बोलून दाखवता येत नव्हतं मला, तुझी खूप आठवण यायची पण तुला कसं सामोरं जावं कळत नव्हतं शिवाय आई परत ड्रामा करेल , चिडेल म्हणून वेगळाच धाक. अशातच मला कंपनीतर्फे विदेशात जाण्याची संधी चालून आली. आई म्हणाली वेळ गेली, राग शांत झाला की तू स्वतः परत येशील, तिला राहू दे काही दिवस माहेरी, तू ही संधी सोडू नकोस. झालं, परत मी भरकटलो, मला खूप मनापासून वाटत होतं तुला ही बातमी सांगावी पण त्या दरम्यान तुझ्या आई बाबांनी मला तुला भेटू दिले नाही, त्यांना माझा राग आलेला. तूसुद्धा फोन उचलले नाही. मी सहा महिन्यांसाठी लंडनला गेलो. कामाच्या, नविन प्रोजेक्टच्या व्यापात गुंतलो. तुझी आठवण सतत यायची, तुला मेसेज केले पण तू मला उत्तर देत नव्हती. आपल्यात काही कम्युनिकेशन राहीले नव्हते आणि म्हणूनच गैरसमज निर्माण झाले.
    इकडे आईने बाबांना असं सांगितलं की रियाला अनिकेत सोबत राहायची इच्छा नाही. आपल्या घरच्यांमध्येही गैरसमज झालेले त्यामुळे आईने त्या संधीचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीने तुला डिव्होर्स नोटीस पाठवली आणि परिस्थिती अजूनच बिघडली. मी परत आलो तेव्हा बाबांकडून मला सगळं कळालं, पण तू माझ्यासोबत राहायला तयार नाही यावर माझा विश्वास नव्हता. तुला डिव्होर्स नोटीस पाठवली हे ऐकून मला मोठा धक्का बसला, खूप रडलो मी बाबांजवळ, पण त्याक्षणी माझे डोळे उघडले. आईच्या संकुचित स्वभावामुळे आपल्या सगळ्यांमध्ये गैरसमज झाले, आपल्या दोघांमध्ये फूट पडली. मला कळून चुकलं की माझी ठाम भूमिका नसल्याने आपल्या नात्यात विष पसरलं. आई, बाबा आणि बायको प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात घेऊन मी नातं जपलं असतं तर अशी वेळ आली नसती. पण रिया अजूनही वेळ गेलेली नाही, मला तू हवी आहेस. मला एक संधी दे..परत असं नाही होणार..मी तुझाच आहे आणि तुझी साथ मी नाही सोडणार..मला माफ कर रिया.. प्लीज मला माफ कर.. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..गेले सहा महिने जो दुरावा निर्माण झाला त्यामुळे मला खरंच माझ्या प्रेमाची जाणीव नव्याने झाली आहे मला..”

    हे सगळं ऐकून रियाला काय बोलावं कळत नव्हतं, तिचं खरंखुरं प्रेम होतं त्याच्यावर. दोघेही वेगळे राहून मनोमन कुढत, रडत होते पण मीपणा, गैरसमज यामुळे पुढाकार कुणी घेत नव्हते.
    रिया काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.
    अनिकेत तिला म्हणाला , ” रिया मी तुझ्या आई बाबांशी बोलून माफी मागतो, तुला मानाने आपल्या घरी परत घ्यायला येतो..आई ला बाबांनी समजावले आहे, तिचा स्वभाव बदलला नाही तरी मी यापुढे कधीच साथ सोडणार नाही. बाबा आणि मी तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सुट्टी आहे, मी घ्यायला येतो तुला, आपल्या हक्काच्या घरी घेऊन जायला. मला खरंच एकदा माफ कर.. खूप प्रेम आहे रिया माझं तुझ्यावर..”

    रियाने अश्रू पुसत मानेनेच त्याला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते. अनिकेत ने रियाचा हात हातात घेतला त्या क्षणी तिला त्यांच्या लग्नानंतर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तोच स्पर्श, तिच भावना आता नव्याने जागी झाल्याची तिला जाणीव झाली.रियाच्या आई बाबांना या गोष्टीचा आनंदच होईल हे तिला माहीत होते.
    तिलाही हेच हवं होतं. त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने त्याला माफ केलं. दोघांचे नाते आज परत एकदा नव्याने बहरले.
    किती तरी वेळ ते हातात हात घेऊन शब्दाविना बरेच काही बोलले.

    दूर राहून त्यांच्यातील नातं आज अजूनच घट्ट झालं आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.

    खरंच बर्‍याच जणांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नवरा बायको यांच्यातील नात्यात गैरसमज, मतभेद यामुळे फूट पडते. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घेतले, ठाम भूमिका घेऊन विश्वास जपला तर नातं तुटण्या ऐवजी जोडल्या जाईल. अनिकेत ला उशीरा का होईना पण त्याच्या चुकीची जाणीव झाली, आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात आलं म्हणून दोघांचे नाते नव्याने बहरले.

    समाप्त.

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

    “रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.”

    अनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती.
    मनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता काय फायदा भेटून बोलून.. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीस… माझ्यावर विश्वास ठेवून कधी माझी बाजू समजून घेतली नाहीस…किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर, वाटलं होतं अनिकेत कधीच माझी साथ सोडणार नाही पण ह्याने इतका मोठा धक्का दिला मला.. नाही मी नाही भेटणार परत अनिकेत ला…आता आमचे मार्ग वेगळे आहेत..”

    अशा भूतकाळातल्या विचारचक्रात गुंतली असताना मैत्रिणीच्याआवाजाने रिया भानावर आली.
    “अगं रिया, लक्ष कुठे आहे तुझं..कधी पासून आवाज देत आहे तुला मी…लंच ला जायचं ना..मला जाम भूक लागली आहे गंं..” ( रियाची मैत्रिण पूजा तिला म्हणाली )

    रिया आणि पूजा गेली पाच वर्षे एकाच ऑफिसमध्ये नोकरीला. दोघींची चांगली मैत्री जमलेली, एकमेकींच्या सुखदुःखात , अडीअडचणीला एकमेकींच्या सोबतीला असायच्या त्या.
    अनिकेत दूर गेल्यानंतर रियाला सावरायला पूजाने बरीच मदत केलेली. पूजा अतिशय बिनधास्त पण समजुतदार मुलगी, ज्याचं चुकलं त्याला स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं आणि हसतखेळत जगायचं असा तिचा जगण्याचा फंडा. 
    रिया मात्र भाऊक, शांत स्वभाव, जरा अबोल. पण पूजा जवळ मनातलं सगळं सुखदुःख सांगायची ती, अगदी विश्वासाने आणि पूजाही तितक्याच आपुलकीने तिचा विश्वास जपायची.
    दोघीही लंच ला निघाल्या, आज परत रियाला असं गप्प गप्प बघून पूजा म्हणाली, “काय मॅडम, आज परत मूड खराब दिसतोय…काय झालंय..सांग पटकन..”
    रिया पडलेल्या चेहऱ्याने चिडक्या सुरात तिला सांगू लागली, “काही नाही गं, आज अनिकेतचा मेसेज आला.. त्याला मला भेटायचं आहे… आता मी जरा सावरायला लागले तर ह्याचा मेसेज आला एकदा भेट म्हणून.. खूप राग आहे गंं मनात पण तरी वाटतयं भेटावे का एकदा..पण असंही वाटतं का भेटायचं मी…गेली सहा महिने वेगळे राहीलो आम्ही तेव्हा नाही आठवण झाली माझी.. डिव्होर्स नोटीस पाठवताना काही नाही वाटलं..आता अचानक काय भेटायचं ….का म्हणून भेटू मी..”
    पूजा तिला समजावून सांगत म्हणाली, ” रिया तू शांत हो बघू.. अगं तुला नाही भेटायचं ना मग नको विचार करुस..हे सगळं जरा अवघड आहे पण तुला आता निर्णय घेतला पाहिजे.. यातून बाहेर पडायला पाहिजे..”
    रिया रडकुंडीला येत म्हणाली, “मी अजूनही खूप मिस करते गं अनिकेत ला..त्याच्या शिवाय अख्खं आयुष्य जगण्याची कल्पनाही करवत नाही मला.. वाटतं जावं त्याच्या जवळ, त्याला भेटून, भांडून  अनिकेतला परत मिळवावं पण त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली त्या क्षणापासून खूप राग येतोय त्याचा… खूप गोंधळ उडाला गं माझ्या मनात..काय करावं खरंच सुचत नाही मला आता..”

    पूजा तिची अवस्था समजून होती, तिला धीर देत ती म्हणाली, ” रिया, तू एकदा भेटुन सगळं क्लिअर का करत नाही..मला अजूनही कळत नाहीये की अनिकेत इतका कसा बदलला..नक्की काय झालं की त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली…मला खरंच वाटत अगं तू एकदा त्याला भेटायला पाहिजे.. सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे..”

    रियाला सुद्धा मनातून वाटत होतं एकदा अनिकेत ला भेटावे, त्याला जाब विचारावा. आता पूजा ने म्हंटल्यावर खरंच एकदा त्याला भेटायच ठरवलं.

    ठरलेल्या वेळी रिया त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच तिच्या ऑफिस जवळच्या बागेत पोहोचली. दुरूनच एका बाकावर अनिकेत पाठमोरा बसलेला तिला दिसला. त्याला बघता क्षणीच धावत जाऊन मिठी मारावी असं तिला वाटलं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याच्या दिशेने जायला निघाली. जसजशी ती त्याच्या दिशेने जात होती तसतशी तिची धडधड वाढत होती.
    जसे दोघे एकमेकांसमोर आले तसाच अनिकेत उठून उभा झाला, रियाचा निरागस चेहरा बघताच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली, नजरानजर होताच तिच्या अश्रूंनी वाट मोकळी केली. किती तरी वेळ फक्त नजरेने बोलत होते ते, त्यालाही भावना आवरता येत नव्हत्या. इशारा करतच त्याने तीला बाजुला बसायला सांगितलं. ती त्याची नजर चुकवत इकडे तिकडे बघत होती. अनिकेत तिला शांत करत म्हणाला, “रिया प्लीज अशी रडू नकोस..आधी तू शांत हो.. मला माहिती आहे माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली आहे पण मला माझी चूक कळून चुकली गं..नाही राहू शकत मी तुझ्याविणा..एक संधी दे मला..आपल्या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले आहेत..मला तेच दूर करायचे आहेत.. म्हणूनच तुला बोलावलं मी भेटायला..मला खात्री होती तू नक्कीच येणार…”
    रिया अश्रू आवरत म्हणाली, “गैरसमज.. आपल्यात.. खूप लवकर कळालं रे तुला..सहा महिने आठवण नाही झाली माझी.. आणि संधी कशाची मागतोय..तुला तर डिव्होर्स पाहिजे ना… नोटीस पाठवलीस ना मला..मग आता काय बोलायचं बाकी राहीलं अनिकेत..तू माझा अनिकेत नाहीस..ज्याच्यावर मी प्रेम केलेलं तो अनिकेत तू नाहीस..तो माझ्याशी असा कधीच वागला नसता.. तुझ्या अशा वागण्याने माझी काय अवस्था झाली असेल कधी विचार केला तू…”
    अनिकेत अपराधी भावनेने उत्तरला, ” रिया अगं ती डिव्होर्स नोटीस मी पाठवली नाही..तुला खरंच असं वाटतं का गं मी इतका वाईट वागेल तुझ्याशी.. मान्य आहे तुला मी दुखावलं, माहेरी जायला सांगितलं पण डिव्होर्स नोटीस खरंच मी नाही पाठवली..मी सगळं सांगतो तुला..मला तू हवी आहेस…मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय…”
    अनिकेत चे बोलणे ऐकून रिया आश्चर्य चकित झाली, अनिकेत ने नोटीस नाही पाठवली मग कुणी पाठवली.. आणि का…पण मग अनिकेत सहा महिने भेटला नाही..बोलला नाही त्याचं काय..या सगळ्या विचाराने ती जरा गोंधळली.

    क्रमशः

    रिया आणि अनिकेत यांच्या आयुष्यात नक्की काय झालं जाणून घेऊया पुढच्या भागात ?
    पुढचा भाग लवकरच…

    तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार..मग कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

    लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पहिल्या प्रेमाची पहिली भेट..??

    तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का. 

    अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढचं सगळं ठरवणार होते. 

    ती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी. 

    ती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.

    ठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.

    तो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तिच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तरे मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं. 

    नंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तिने विचार करायला जरा वेळ घेतला. 

    त्याला भेटल्या पासून ती मनात एकच गाणं गुणगुणत होती.

    ” उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…..”

    रात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.

    सोबतच गाण्याच्या पंक्ती आठवतं होत्या,

    “जब वो मिले मुझे पहली बार
    उनसे हो गई आँखे चार
    पास ना बैठे पल भर वो
    फिर भी हो गया उनसे प्यार..”

    पुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरलं. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.

    हळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.

    दोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते. 

    त्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

    त्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं. 

    दोघंही सगळं आनंदाने अनुभवत होते,

    “पहला पहला प्यार है….पहली पहली बार है….

    अशीच दोघांची अवस्था झाली होती ?

    लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं तिच्या मनात येवून ती हळवी होत होती. 

    त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं. 

    लग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. ???

    अशीही छोटीशी प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्या प्रेमाची पहिली भेटीची?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

    ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.

    आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.

    ईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.

    वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले , 

    ” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”

    ईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न. 

    अमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची. 

    दोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.

    त्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”

    ईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”

    आताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा. 

    मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”

    कसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता. 

    नोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं. 

    तिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.

      

    आज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं. 

    ईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला, 

    “आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”

    टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण  स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला. 

    खरंच विचार करण्याजोगे आहे नाही का?

    ईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • जन पळभर म्हणतील हाय हाय….

    जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
    मी जातां राहील कार्य काय ?

    कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत.

    सखेसोयरे डोळे पुसतील,
    पुन्हा आपल्या कामी लागतील,
    उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
    मी जातां त्यांचें काय जाय ?

    अगदी खरंय, आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं  आहे, कुणाचं आयुष्य किती कुणालाच माहीत नाही. काही विपरीत घडले तर कुणाला काय फरक पडतो हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

    खरंच विचार केला तर फरक हा पडतोच आणि तो म्हणजे आपल्या आई वडीलांना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, आपण आई वडील होतो तेव्हा जाणवतं की आपल्या आई वडीलांना आपल्याला इथवर पोहोचवताना किती खस्ता खाव्या लागल्या असणार. आपल्या पदरात मुलबाळ असताना आपल्यावर चुकून वाईट प्रसंग ओढावला तर खरंच फरक पडतो त्या इवल्याशा जीवाला. आई वडील दोघांचीही गरज असते मुलांना‌ जशी आपल्याला अजूनही वाटते.
    इतर नातलगांना मात्र दोन दिवसाचे दु:ख होते आणि परत ते आपापल्या कामी लागतात. निसर्गाचा नियम आहे तो, अपवाद फक्त आई वडील आणि मुले.

    अनेक बातम्या कानावर पडतात, अपघात, आत्महत्या, हिंसा, आजारपण त्यामुळे ओढावलेला मृत्यू…ते ऐकताच प्रश्न पडतो जाणारा जातो पण त्या जन्मदात्या ला, त्यांच्या मुलाबाळांना किती बिकट परिस्थितीतून जावे लागत असेल, मनात शेवट पर्यंत एक दु:खाची सल कायम राहत असेल ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतील पण काही गोष्टींची काळजी घेत आपण आनंदाने आयुष्य जगणे कधीही चांगले.

    नवरा आणि बायको यांच्यातलं नातं म्हणाल तर तेही पूनर्विवाह करून आपल्या आयुष्यात गुंतल्या जातात पण अशा वेळी मुलांची मनस्थिती काय असते हे त्यांचं त्यांनाच कळत असावं.

    या जगात कुणीच कुणाचं नसतं, ज्याचं त्यालाच पहावं लागतं.  गेल्यावर दोन दिवस गोडवे गाणारे अनेक असतात पण जिवंतपणी कौतुक करणारे मोजकेच.

    आई वडीलांची उणीव ही कुणीही भरून काढत नाही.  म्हणूनच कुणाकडून  काहीअपेक्षा  न बाळगता स्वतः ची काळजी स्वतः घेणे कधीही फायद्याचेच, स्वतः साठी, आई‌वडिलांसाठी आणि मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी.

    काय मग , पटतंय ना.  स्वतः ची काळजी घ्या,  तंदुरुस्त रहा, बिनधास्त राहून आनंदाने आयुष्य जगा…हसत रहा…हसवत रहा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

    पंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले.

    कंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात काय माल आहे.. ”

    आजोबा हसून उत्तरले,

    “काय माल बिल नाही बाबा…आमच्या म्हातारीनं मोठ्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर आलेले टमाटर, मिरची, वांगे , कोथींबीर हाय..तालुक्याला आज बाजार हाय.. तिथं जाऊन इकतो..जरा का होईना पैसा मिळेल तितकाच म्हातारीच्या हातात तिच्या मेहनतीचा मोबदला..पण न चुकता त्या पैशातले काही पैसे मलाही देते ती मोठ्या प्रेमानं तिकीट काढून जाऊन विकण्याचा मोबदला म्हणून..”

    आजोबांचं उत्तर ऐकून कंडक्टर आणि आजुबाजुच्या लोकांना आजी आजोबांचे प्रेम बघून खूप उत्सुकता वाटली. शेजारच्या सीटवर बसलेल्या एका तरूणाने आजोबांना विचारले “किती मोबदला मिळतो आजोबा..आणि एरवी मग कशावर चालतं घरदार..”

    आजोबा – ” पोरा, मी सरकारी नोकरीत होतो. मिळते जरा पेंशन… दोघांना पुरेसं हाय तितकं पण आमच्या म्हातारीला आधीपासूनच स्वतः च्या कमाईचे पैसे बटव्यात असल्याशिवाय काही दम निघत नाही. अगुदर तीच जायची बाजारी पण आता तिच्या आजारपणामुळे तिच्या कडून प्रवास व्हत नाय… म्हणून म्या जातुय..तिची औषधं बी आणल्या जातात.. म्या कधी जवळचे पैसे टाकून खोटं बोलून जास्त पैसे दिले तरी म्हातारी लगेच वळखते..लय हुशार हाय ती..”

    अशाच गप्पा सुरू असताना आजोबांचा स्टॉप आला आणि ते उतरले. दिवसभर भाजी विकून तीनशे वीस रुपये जमलेले. आजीने दिलेला जेवणाचा डबा खाऊन आजोबा म्हातारीचे औषधे घ्यायला गेले. वाटेत गजरा विकणारा लहान मुलगा त्यांना दिसला. खिशातून दहा रुपयांची नोट काढून आजोबांनी आजी साठी मोगर्‍याचा गजरा घेतला. आजोबा परतीला निघाले, घरी पोहोचताच आजीच्या पांढर्‍या केसांच्या आंबाड्यात गजरा माळून तीनशे वीस रुपये आजीच्या हातात ठेवले. आजीने वरचे वीस रुपये मोठ्या प्रेमाने आजोबांना मोबदला म्हणून दिले आणि म्हणाल्या,

    “हे वय हाय होय माझं गजरा माळायचं.. तुमी पण उगाच खर्च करता..”

    DLF

    आजोबा लाडात येऊन आज्जीची मस्करी करत म्हणाले, “अगं आज आपल्या लग्नाचा पंचावन्न वा वाढदिवस.. म्हणून लय प्रेमानं आणलायं बघं गजरा..”

    आजी लाजून , “ठाउक हाय मला म्हणून तर तुमच्या आवडीचा बेत केला रातच्या जेवणाला.. पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी ते बी म्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या झाडाचे ताजे वांगे बरं का..चला हात पाय धुवा..चहा ठेवते.”

    आजी आजोबांच्या घरी नेहमी मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा..आजही सुरू होता आणि त्यावर गाणं लागलं होतं,

    “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं….”

    आजी आजोबांना मुलं बाळं नव्हते. दोघेच गावातील घरात राहायचे, अख्या गावातील मुलांचे लाडके होते दोघेही कारण सगळ्यांना जीव लावायचे मग ते पशू पक्षी का असेना. काही गोडधोड केले की आजुबाजूला, येणाजाणार्‍याला आग्रहाने खाऊ घालायचे. आजोबा सरकारी नोकरीत कामाला, आजीने सुरवातीपासूनच अंगणात छान बाग तयार केलेली. त्यात फुले, फळे, भाज्या सगळंच असायचं. आजी मग गावच्या बाजारात तर कधी तालुक्याला जाऊन ते विकून यायच्या. आजोबा म्हणायचे अगं मी चांगला सरकारी नोकर, दोघांना पुरून उरेल इतकं आहे आपल्याकडे, कशाला उगाच राबतेस पण आजीच मत असं की कुठल्याही कामाची लाज नको वाटायला शिवाय माझ्या मेहनतीचे पैसे बटव्यात असल्याशिवाय मला नाही बाई आवडत.
    आजोबांना आजीच्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटे.

    आजीचं मन राखायला आजोबाही मदत करायला लागले होते.

    आजीला दम्याचा त्रास होता त्यामुळे ये-जा करणे आता पेलायचे नाही पण आजोबा मात्र अजूनही तरतरीत.‌ दोघेही छान बाग कामात, घरकामात एकमेकांना मदत करायचे. आजोबा अगदी चिरतरुण हृदय असलेले, गमतीजमती करत आजीला हसवायचे, चिडवायचे. गावात अनेक जोडप्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते.

    एकदा अशेच आजोबा तालुक्याला जाऊन सायंकाळी घरी आले, बघते तर काय दरवाजा उघडा आणि आजी झोपलेली. आजोबांनी आजीला आवाज दिला आणि नेहमीप्रमाणे मस्करीच्या सुरात म्हणाले, “आज कशी काय सायंकाळी झोपली गं, मला दुरून येताना बघून मुद्दाम जाऊन झोपली वाटतं.. बरं आज मीच करतो च्या दोघांसाठी मग तर झालं..बरं आइक ना आज तुझ्या बागेतले पेरू सगळे विकल्या गेले. हे घे सगळे धरून चारशे साठ रुपये हाती आले…”

    आजोबा हात पाय धुवून परत आले तरी आजी काय उठल्या नव्हत्या. आजोबांनी जाऊन हलवले तर आजी स्तब्ध होऊन निर्जीव वस्तू सारख्या पडल्या होत्या, बाजुला आजीचा बटवा सुद्धा होता. आजोबा घाबरले, शेजारच्या गण्याला हाक मारली, आजोबांच्या हाकेने आजुबाजुची मंडळी घरी आली, बघतात तर काय , आजी आजोबांना कायमच्या सोडून गेल्या होत्या. घरात मंद आवाजात आजीच्या रेडिओ वर गाणे सुरू होते,

    “भातुकलीच्या खेळा मधली..राजा आणिक राणी…

    अर्ध्या वरती डाव मोडला अधुरी एक कहाणी….”

    आजी गेली म्हणताच आजोबा ढसाढसा रडायला लागले. थंडीचे दिवस त्यात आजीला दम्याचा आजार असल्याने श्वास घेताना त्रास होऊन त्या गेल्या असल्याची शक्यता गावातील वैद्याने सांगितली.

    आजीच्या जाण्याने आजोबा खूप खचले, आता कुणासाठी जगायचे असं म्हणत स्वतः कडे दुर्लक्ष करत त्यांनीही स्वतः च्या तब्येतीवर चांगलाच परिणाम करून घेतला.
    आजी आजोबांनी मिळून तयार केलेली बाग, बागेतील प्रत्येक झाडाला , इवल्या इवल्या रोपट्याला आजीने जिवापाड जपले होते. आजीच्या जाण्याने आजोबां सोबतच बाग ही ओसाड , सुकलेली दिसत होती.

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

    मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.

    दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न करीत होता. कार मधून दोघेही निघाले, रेडिओ वर मंद आवाजात गाणे सुरू झाले,

    “तेरे बिना जिया जाए ना…

    बिन तेरे…तेरे बिन….साजना

    सांस में सांस आये ना…”

    अदितीने चॅनल बदलले..

    दुसऱ्या चॅनल वर गाणे लागले,

    “बहुत प्यार करते है…तुमको सनम…”

    अदितीला जास्तच अवघडल्यासारखे वाटले आणि तिने रेडिओ बंद केला.

    अविनाश तिची घालमेल बघत होता, तो लगेच म्हणाला, “आपल्या सिच्युएशन वर गाणे लागताहेत असं वाटतंय ना..”

    अदिती त्यावर काही बोलली नाही, नजर चुकवत इकडे तिकडे बघत विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली.

    अविनाश – “अदिती, मी खूप मिस केले गं तुला दोन वर्ष..तू अचानक पूर्ण पणे संपर्क तोडला माझ्याशी तेव्हा मी खूप झुरलो तुझ्यासाठी..एका सहकार्‍याकडून तुझी चौकशी केली, तू स्वतः ला कामात झोकून घेतलं असं कळालं..तुझी कंपनीतील प्रगती ऐकून आनंदी झालो पण तू माझ्या पासून दूर जातेय हा विचार सहन होत नव्हता गं मला.. असं वाटत होतं यावं, भेटाव तुला पण कुठलही नातं तुझ्यावर लादायचं नव्हतं मला.

    दोन वर्षांनंतर आज आपली भेट झाली, अख्खा दिवस तुला भेटण्यासाठी तळमळत होतो पण तू कामात गुंतलेली बघून डिस्टर्ब नाही केलं तुला शिवाय तू आज मला बघून काय प्रतिक्रिया देशील याचीही खात्री नव्हती. खूप छान वाटतंय आज तुझ्यासोबत…भावना आवरू नाही शकलो मी.. म्हणून सगळं बोलून गेलो…”

    अदिती त्याचं बोलणं ऐकून रडायला लागली जणू दोन वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर पडत होत्या. ती अशी रडताना पाहून अविनाश ला अपराधी वाटू लागले तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून तिची समजुत काढत म्हणाला, 

    “अदिती, तुला दुखवायचं नाही गं..सो सॉरी..मी नको होतं असं सगळं अचानक बोलायला…माफ कर मला.. प्लीज रडू नकोस..शांत हो…”

    अदिती त्यावर उत्तरली,

     “तुला काय वाटतं रे..मी खूप निर्दयी आहे..तुला दोन वर्ष अवघड गेली पण इकडे माझं काय.. कितीही आवरलं स्वतः ला तरी एक दिवस असा नव्हता की तुझी आठवण आली नसेल. मीही तितकीच झुरले तुझ्यासाठी फक्त मला व्यक्त होता येत नव्हतं. तुझ्याशी संपर्कात राहीले तर अजूनच गुंतल्या जाईल मी तुझ्यात असं वाटायचं म्हणून टाळत आले तुला..तू कदाचित वेळेनुसार मला विसरशील.. तुझं आयुष्य आनंदाने जगशील असं वाटलं होतं..तू गेल्यावर हा पाऊस, ती कॉफी सुद्धा नको वाटायची मला..कारण त्यात आपल्या अनेक आठवणी दडलेल्या होत्या. आज तू समोर दिसताच वाटलं मोकळं करावं मन, सांगावं तुला की माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर पण हिम्मत होत नव्हती माझी.. इतक्यात आई बाबांनी काही स्थळ आणले माझ्यासाठी तेव्हा खूप गरज वाटली होती मला तुझी.. दुसऱ्या कुणाचा विचार करूच शकत नव्हते मी..आई बाबांनाही कळाल होतं माझ्या मनात काही तरी गोंधळ उडाला आहे पण कसं विचारावं कदाचीत त्यांना सुद्धा कळत नव्हतं..अगदी वेळेत परत आलास तू…आज तू व्यक्त झालास आणि मी कमजोर पडले.. आवरले नाही मला अश्रू… तेव्हाही आवडायचा तू मला पण मन मानत नव्हतं.. आजही आवडतोस, हवाहवासा वाटतो तुझा सहवास..आय लव्ह यू अविनाश…”

    अविनाश अदितीचा हात हातात घेत म्हणाला ” आय लव्ह यू टू अदिती..आजचा दिवस खुप खास आहे माझ्यासाठी…चल पुढे कॉफी शॉप आहे..आपला हा आनंद साजरा करायलाच पाहिजे ना…”

    अदितीने गोड स्माइल देत होकार दर्शविला आणि तिच्या गालावरची खळी बघून अविनाश अजूनच घायाळ झाला.

    दोघांनीही मस्त कॉफी घेतली, अविनाश ने अदितीला घरी सोडले. वाटेत मंद आवाजात गाणे सुरू होते,

    “पहला नशा, पहला खुमार नया प्यार हैं नया इंतज़ार करलूँ मैं क्या अपना हाल ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार तू ही बता……”

    दोघांच्याही भावना आज नकळत बाहेर पडल्या आणि त्यांच्या प्रेमाची गोड सुरवात झाली.

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.

    दोन वर्षांपूर्वी अदिती मुलाखतीसाठी आलेली तेव्हा बाहेर असाच जोरात पाऊस सुरू होता, त्यामुळे तिला जरा उशीर ही झाला होता. लगबगीने ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि आल्यावर कॉन्टॅक्ट पर्सन मिस्टर महेश शर्मा यांना भेटायचं आहे असं सिक्युरिटी कडे सांगितलं.

    सिक्युरिटी कडून कळाले की काही तरी तातडीचे काम आल्यामुळे महेश सर आज उशीरा येणार आहेत पण त्यांनी तुम्हाला मिस्टर अविनाश यांना भेटायला सांगितले आहे. पावसात तासभर प्रवास करून भिजली जरी नसेल तरी अंगात थंडी भरलेली होती.

    सिक्युरिटी ने पहिल्या मजल्यावर जाऊन उजवीकडे आत जा, तिथे तुम्हाला अविनाश सर भेटतील असं सांगितलं. जाताना अदिती विचार करत होती, “सर उशीरा येणार म्हणताहेत, आता हे अविनाश कोण बघुया.. इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणजे बरे..मोठ्या हुद्द्यावर असलेल्या लोकांचे बरे बाबा.. उशीर झाला की कळवून मोकळे..आपण मात्र लगबग करत वेळेत पोहोचण्याच्या तयारीत..असो त्यांनाही कधी तरी अशाच परिस्थितीतून जावे लागले असणार..”

    उजवीकडून आत आले, आता कुणाला तरी विचारायला पाहिजे अशा विचारात असतानाच तिची गाठ पडली अविनाश सोबत पण तिला कुठे मी माहित की हाच अविनाश आहे. ती त्याला म्हणाली, “Excuse me, मिस्टर अविनाश पाठक कुठे भेटतील सांगू शकता का..मी मुलाखतीसाठी आलेली आहे..”

    अविनाश ने तिच्याकडे बघितले तशीच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली पण तिला न कळू देण्याच्या आवेशात तो म्हणाला, ” समोर मिटिंग रूम आहे, तुम्ही बसा तिथे.. अविनाश ला सांगतो मी तुम्ही आलात म्हणून..”

    अदिती मान हलवून थॅंक्यू म्हणत मिटिंग रूम कडे निघाली. आत एका खुर्चीत बसून अविनाश सर येण्याची वाट बघत होती.

    अविनाश पुढच्या पाच मिनिटात आत आला आणि हात पुढे करून म्हणाला, “हॅलो,मी अविनाश पाठक. ”

    अदिती जरा गोंधळून हसू आवरत जरा घाबरत म्हणाली, “हॅलो सर, मी अदिती..म्हणजे मी तुम्हालाच तुमच्याविषयी विचारले तर..सो सॉरी..मला माहित नव्हतं त्यामुळे जरा कन्फ्युजन झालं असावं..”

    “डोन्ट बी सॉरी..मिस अदिती.. होतं असं कधी कधी..”

    “अदिती, आज महेश सर उशीरा येणार असल्याने तुमची मुलाखत त्यांनी मला घ्यायला सांगितली आहे..पुढचा राऊंड सर घेतील..ते येतीलच तासाभरात..” अविनाश.

    अदिती -“ओके सर..नो प्रोब्लेम..”

    अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, थंडी अंगात भरल्याने तिच्या अंगावर काटे उभे झाले होते आणि resume अविनाश च्या हातात देताना तिच्या हातावरचे काटे अविनाश च्या नजरेतून ते सुटले नव्हते. तिची एकंदरीत परिस्थिती पाहता तो म्हणाला, “मिस अदिती, तुम्हाला फ्रेश होवून यायचे असेल तर तुम्ही दहा मिनिटे जाऊन येऊ शकता, त्यानंतर आपण मुलाखत घेऊ. ”

    “इट्स ओके सर, मी तयार आहे मुलाखतीसाठी..” असं म्हणत अदितीने त्याचा प्रस्ताव नाकारला.

    अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, पाच मिनिटां पूर्वी थंडीने जरा कुडकुडत असलेली अदिती आत्मविश्वासाने उत्तर देत होती. तिची एकाग्रता, चेहऱ्यावर आत्मविश्वास, तिचे भाव टिपत अविनाश मधूनच हरवल्या सारखा होत होता. तिच्या एकंदरीत मुलाखतीनंतर तो अजूनच तिच्यावर इंप्रेस झाला. उत्तर देताना तिचा सखोल अभ्यास, प्रत्येक गोष्ट पटवून देताना तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला भाळले. अर्धा तास कसा गेला कळाले सुद्धा नाही. नंतर अविनाश ने वेल डन मिस अदिती म्हणताच ती मनोमन आनंदी झाली. आता महेश सर आले की पुढची प्रोसेस होईल तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल असं अविनाश ने सांगितले.

    अदिती त्यावर म्हणाली,” थॅंक्यू सर. एक विचारायचं होतं, इथे कॅन्टीन कुठे आहे..”

    अविनाश-“चला मी नेतो तुम्हाला..मलाही कॉफी घ्यायला जायचेच आहे..”

    अदिती आणि अविनाश एकत्र कॉफी घ्यायला ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेले. अदिती जरा गप्प गप्प आहे बघून अविनाश म्हणाला “तुम्ही टेंशन मुळे अशा गप्प आहात की मुळातच कमी बोलता..मला घाबरलात तर नाही ना.. मी साधा एम्प्लॉयी आहे बस.. गेल्या चार वर्षांपासून इथे नोकरीला आहे, माझं काम बघून सर काही महत्वाच्या जबाबदारी सोपवितात माझ्यावर विश्वासाने बाकी काही नाही… घाबरण्याचे कारण नाही..? तेव्हा अदितीला जरा हायसे वाटले..ती जरा का होईना पण बोलायला लागली. दोघांची ती पहिलीच भेट आणि पहिलीच एकत्र कॉफी ?

    जरा एकमेकांची ओळख करून देत त्यांनी औपचारिक गप्पा मारल्या. काही वेळाने महेश सरांचा अविनाश ला फोन आला.

    अदिती ला घेऊन तो महेश सरांना भेटायला गेला. अदितीची महेश सरांनी पुढची मुलाखत घेतली. तिची हुशारी , आत्मविश्वास असं एकंदरीत सगळं बघता तिला त्यांनी सिलेक्ट केले. पुढच्याच आठवड्यात तिला कंपनीत रूजू व्हायचे होते. ती अविनाश ला नोकरी मिळाल्याची बातमी आनंदाने सांगून थॅंक्यू म्हणत घरी परतली.

    अविनाश ला त्या दिवसापासून अदिती चा चेहरा सतत डोळ्यापुढे दिसत होता, किती निरागस मुलगी आहे ही.. स्वभावाने शांत वाटली पण एक वेगळाच आत्मविश्वास आहे तिच्यात असा विचार करून तो स्वतः वर हसत स्वतः ला म्हणाला , “मी का इतका विचार करतोय तिचा..”

    वरवर स्वतः ची समजुत काढत असला तरी मनातून ती कधी एकदा कामावर रूजू होते असं त्याला वाटत होते.

    अदितीला मनासारखी नोकरी मिळाल्याने ती आणि तिच्या घरचे ही खूप आनंदी होते. आठवड्यानंतर अदिती ऑफिसमध्ये आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस हा होताच. ती आॅफिसला पोहोचली, पहिल्या दिवशी महेश सरांनी तिची टीम मध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली, तिची नजर अविनाश ला शोधत होती तितक्यात अविनाश एका मिटिंगमध्यून बाहेर येताना तिला दिसला. त्याला बघताच एक गोड स्माइल देत दोघांनी हाय हॅलो केले.

    अविनाश ने काही वेळाने तिला कॉफी घ्यायला येणार का विचारले आणि क्षणाचाही विचार न करता ती गेली. कॉफी तिला खूप प्रिय, त्यात असा संततधार पाऊस मग तर काय विचारायलाच नको ?

    अविनाश ला त्या दिवशी कळाले अदिती आणि कॉफी मधलं प्रेम.

    अविनाश ऑफिसमधला पहिलाच मित्र होता तिचा. तशी जरा अबोल असल्याने फारसे मित्र मैत्रिणी नव्हते, एकाग्रतेने आणि प्रमाणिक पणे काम करणे हे तिचं खरंच कौतुकास्पद होतं. पुढे कामात कुठे काही अडकले की अविनाश तिला मदत करायचा. आता रोजचा एकत्र कॉफीचा कार्यक्रम हा ठरलेला होता दोघांचाही. अविनाश देखणा, आकर्षक, मॉडर्न राहणीमान त्यामुळे ऑफिसमध्ये अतिशय फेमस पर्सनालीटी. अदिती ला सुध्दा मनातून आवडायला लागला होता तो पण त्याच राहणीमान, श्रीमंत घरातला मुलगा आपल्याला का म्हणून पसंत करणार तेव्हा मनातल्या भावना मनातच ठेवलेल्या बर्‍या या विचाराने ती अविनाश ला काही जाणवू देत नव्हती.

    अविनाश ला मात्र ती पहिल्या भेटीतच आवडली होती, आता तर तिच्या सहवासात तिचं निरागस रूप, साधं राहणीमान त्याला अधिकच आवडू लागलं होतं. अदिती सारखी मुलगी आयुष्यात असतं किती सुखकर आहे हे त्याला कळू लागलं. दोघांची छान मैत्री झाली, तुम्ही आम्ही चे नाते मैत्री झाल्याने तू मी वर आले.

    असेच सहा महिने गेले. आज अदितीचा वाढदिवस होता, ती मस्तपैकी तयार होऊन सगळ्यांसाठी मिठाई , नमकिन घेऊन ऑफिसला आली, बघते तर काय अविनाश आणि इतर सहकार्‍यांनी मिळून तिचं क्युबिकल छान सजवलंं होतं. ते बघून ती अजूनच आनंदली, हा वाढदिवस खूप खास आहे असं तिला वाटत होतं. अविनाश सोबत कॉफी घ्यायला गेल्यावर त्याने तिला छान नाजूक असं सोन्याचं ब्रेसलेट गिफ्ट दिलं आणि म्हणाला “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अदिती..तू खूप खास मैत्रीण आहेस माझी.. म्हणून तुझ्यासाठी माझ्याकडून हे खास गिफ्ट..”

    अदिती त्यावर म्हणाली,” थॅंक्यू अविनाश पण असं महागडं गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. प्लीज समजुन घे..आई बाबांना सुद्धा नाही आवडणार अरे.. त्यांना काय सांगणार ना मी..”

    अविनाश जरा नाराज होऊन, “अगं वेडाबाई, गिफ्ट आहे ते..स्वस्त महाग असं काही नसतं.. तुझ्यासाठी खास निवडून आणलं मी..खरंच खूप आवडीने आणलं.. असं नाही म्हणून नाकारू नकोस ना.. प्लीज..”

    अदितीला अविनाश चे बोलणे आज नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते, त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव तिला दिसत होते.. तिलाही त्याच असं खास मैत्रीण म्हणनं, वाढदिवसाचं छान सरप्राइज देणं मनापासून आवडलं होतं पण तिचं मन मात्र मानत नव्हतं. नकळत ती बोलून गेली, “इतकी खास मैत्रीण आहे का रे मी तुझी..माझा वाढदिवस लक्षात ठेवून असं दिवसभर स्पेशल वागणूक देतोय तू आज मला… सगळं असं छान वाटतंय…आजचा वाढदिवस सगळ्यात खास आहे असं वाटतंय अविनाश मला…फक्त तुझ्यामुळे..तुझ्यासारखा मित्र मिळाला याचा खूप आनंद वाटतो मला.. थॅंक्यू सो मच…”

    अविनाश तिच्या डोळ्यात बघत , ” अदिती, खास मैत्रीण तर आहेच तू माझी पण त्या पलिकडे ही काही तरी वाटतयं मला..तू आवडतेस मला..”

    अदितीला हे सगळं खूप हवंहवंसं वाटत होतं, तो अगदी आपल्या मनातलं बोलतोय असं वाटत होतं पण का कोण जाणे तिचं मन मात्र मानत नव्हतं..आपण अविनाश पुढे काहीच नाही..तो घरंदाज, श्रीमंत, देखणा..आपण साधारण कुटुंबात वाढलेलो शिवाय दिसायला त्याच्या मानाने साधारण असा विचार तिला त्याच्या आयुष्यात जाण्यापासून तिला अडवत होता..त्याला आपल्यापेक्षा खूप देखणी, त्याच्या तोलामोलाची मुलगी मिळेल तेव्हा वेळीच आपण थांबलेले, भावनांना आवरलेले बरे असा विचार करून ती त्याच्या विचारातून मागे फिरली आणि म्हणाली, “अविनाश, तू काय बोलतोय, अरे आपण चांगले मित्र आहोत पण… नाही अविनाश आपण इथेच थांबलेलं बरं..”

    अविनाश नाराज होऊन, “अदिती तुला दुखवायचं नाही गं, पण का कोण जाणे आज नकळत मनातलं सगळं बाहेर आलं..But I really mean it..मला मनापासून आवडतेस तू…”

    त्यावर अदिती निरूत्तर होती, त्याने दिलेलं गिफ्ट सुद्धा तिने नाकारलं.

    अचानक अदितीच्या वागण्यातला बदल त्याला जाणवू लागला. ती शक्य तितकं त्याला टाळायचा प्रयत्न करत होती, मनातून तिलाही तसं वागायला आवडत नव्हतं पण तरीही त्याला टाळत तिने स्वतःला कामात झोकून दिलं. अविनाश ला सगळं खूप विचित्र वाटलं, मनोमन तो खूप दुखावला गेला होता. शक्य तो प्रयत्न करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, आता एकत्र कॉफी सुद्धा कधीतरीच त्यांच्या नशीबी यायची. अविनाश ने विचारल्यावर ती इतकंच म्हणायची, मला आता तरी करीअर वर लक्ष द्यायचे आहे..तू माझा विचार करू नकोस…

    अविनाश तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणायचा “अदिती, तू हवा तितका वेळ घे..तू माझं प्रेम स्विकारावे असा हट्ट नाही माझा पण असं टाळून मला दुखवू नकोस गं..आपण मित्र म्हणून तर राहूच शकतो ना..”

    तिलाही त्याच पटत होतं पण आता मैत्री सुद्धा पूर्वीप्रमाणे राहीली नव्हती. अविनाश ला दुखवायला नको म्हणून ती न चुकता त्याच्या सोबत कॉफी घ्यायला जायची पण पूर्वीसारखा संवाद राहीला नव्हता.

    इतर सहकार्‍यांचीही दोघांविषयी काही तरी कुजबुज सुरु झाली होती.

    अविनाश ला त्याच्या कामातील हुशारी मुळे प्रमोशन मिळाले. दुसऱ्या एका टिम मधून एक नविन प्रोजेक्ट UK मध्ये सुरू होणार होता आणि त्यासाठी अनुभवाच्या जोरावर योग्य व्यक्ती म्हणून अविनाश ची निवड झाली. दोन वर्षांसाठी अविनाश UK ला जाणार होता. ते कळाल्यावर अदितीला मनोमन आनंद तर झालाच पण तो सोबत नसणार म्हणून एक अस्वस्थताही वाटू लागली.

    अविनाश ची अवस्था सुद्धा अशीच झाली होती. एकीकडे UK ला जाण्याची संधी, प्रमोशन याचा आनंद तर दुसरीकडे अदितीला सोडून जावं लागणार म्हणून वेगळीच अस्वस्थता. परत येईपर्यंत अदिती च्या मनात काय असणार, दुर गेल्यावर तिचं मन बदलेल का, तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल का अशे अनेक विचार त्याच्या मनात गोंधळ घालत होते.

    अविनाश साठी जाण्यापूर्वी सगळ्यांनी छोटीशी पार्टी ठेवली होती, त्या पार्टीत अविनाश आणि अदिती वरवर आनंदी वाटत असले तरी मनातून एकमेकांसाठी झुरत होते.

    अदिती माझ्या संपर्कात राहशील ना..I will really miss you.. specially will miss our coffee..” असं तिला म्हणताच तिच्या डोळ्यात त्याला अश्रू दिसले. कसं बसं अश्रु आवरत ती हसून म्हणाली ,”All the best अविनाश..I will miss you too..”

    अविनाश ठरलेल्या दिवशी UK ला रवाना झाला.

    अदिती त्याची आठवण काढून खूपदा रडायची, तिला मनांतून वाटायचं त्याला फोन करावा, त्याचा फोन मेसेज आला की बोलावं, मन हलकं करावं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याला टाळत होती. सध्या कामाचा व्याप वाढलाय, नंतर बोलते म्हणत वेळ मारायची. हळूहळू त्याला पूर्णपणे टाळायला सुरू केले तिने. असं कुणाला दुखावणे योग्य नाही हे कळत असून भावना आवरण्याच्या नादात ती असं वागायला लागली. मनात रोज आठवण काढून , जुन्या आठवणी, सोबतचे क्षण आठवायची आणि मग अचानक भानावर येत स्वतः ला दुसरीकडे गुंतवू पाहायची. असेच दोन वर्ष गेले.

    आज अविनाश आणि अदितीची पुन्हा भेट झाली.

    मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे दोघे एकत्र घरी जायला निघाले.

    पुढे अदिती आणि अविनाश यांच्या नात्यांचं काय होणार हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात. ?

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १

    अदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली,

    “नेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस…? कधी थांबतो कुणास ठाऊक….चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल..”

    अदिती कॉफी घ्यायला निघाली आणि जाताना आजुबाजूला फ्लोअर वर एक नजर टाकली तर मोजकेच लोक होते.. शुक्रवार असल्याने बरेच जण लवकर निघून गेलेत वाटतं असा विचार करून ती कॅन्टीन मध्ये निघून गेली.

    एका टेबल खुर्ची वर बसून कॉफी घेत समोरच्या काचेतून बाहेरचा पाऊस बघत ती मग्न झालेली असतानाच एक आवाज आला,

    “excuse me miss Aditi….मी इथे बसलो तर चालेल..?”

    तो आवाज ऐकताच तिने वळून पाहिले , “अविनाश तू…अरे बस ना… कधी आलास इकडे..तू UK ला होतास ना..”

    अविनाश समोरच्या खुर्चीवर बसून, अदिती च्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदी होत बोलला,

    “आजच जॉइन झालो अगं इकडे… मागच्या आठवड्यात आलो परत..दोन वर्षांचा प्रोजेक्ट होता..संपला..आलो परत…तू सांग कशी आहेस.. अजूनही तशीच दिसतेस..जशी ऑफिसच्या पहिल्या दिवशी दिसत होती ? आठवतोय मला तो दिवस… तेव्हाही असाच पाऊस सुरू होता…आठवतो ना…”

    अदिती जरा लाजत, मनातल्या भावना आनंद लपवत , ” काहीही काय रे…तू पण ना..मी मजेत आहे….तू सांग कसं वाटलं दोन वर्षे..आणि आज दिवसभर तर दिसला नाहीस..आता अचानक इथे कसा.. म्हणजे उशीर झाला ना.. म्हणून म्हणतेय..”

    अविनाश एकटक अदितीला बघत होता, तिचा नाजूक चेहरा, तिला शोभून दिसणारे कुरळे केस, तिच्या गालावरची ती खळी, मध्यम उंचीची साधी सिंपल पण अगदीच गोड मुलगी.

    मध्यमवर्गीय कुटुंबातली , आई वडिलांना एकुलती एक. हुशार, समजुतदार आणि मेहनती, त्यामुळे कामात परफेक्शन. स्वभावाने जरा लाजाळू, अबोल पण हसरी मुलगी. ?

    तिच्या डोळ्यातले भाव टिपत तो म्हणाला, “दिवसभरात किती वेळा तुझ्याशी भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत येऊन बघितलं पण मॅडम बिझी..एकदा कॉलवर, एकदा मिटिंगमध्ये.. लक्षही नव्हतं तुझं..कामात मग्न होतीस, व्यत्यय नको आणायला म्हणून काही तुला डिस्टर्ब केलं नाही..म्हंटलं आता आज भेटतात मॅडम की नाही काय माहित.. म्हणून थांबलो तुमची वाट बघत…”

    “म्हणजे तू मला भेटायला थांबलास…. अरे, सध्या खूप काम आहे त्यामुळे कुठेच आजुबाजूला लक्ष नसतं..रोज घरी जायला उशीर होतो..” अदिती.

    “हो, खरं तर तुला भेटायलाचं थांबलो..किती कॉल, मेसेज, इमेल केले तुला.. ऑफिसच्या मेसेंजर वर सुद्धा किती तरी वेळा मेसेज केला पण तू मात्र काहीच उत्तर दिले नाही…आज ठरवलं होतं तुला भेटूनचं जायचं घरी..” अविनाश.

    अदिती विषय बदलत म्हणाली, “कॉफी घ्यायची का अजून एक.. बोलता बोलता ही कॉफी कधी थंड झाली कळालेच नाही..”.

    “अजूनही तशीच कॉफी प्रेमी आहेस वाटत तू… थांब मी घेऊन येतो…” अविनाश.

    अदिती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.
    ( अविनाश उंच पुरा, गोरापान, रूबाबदार व्यक्तीमत्व, हुशार, आत्मविश्वास असलेला होतकरू मुलगा. अगदीच मॉडर्न विचारांचा, घरी मोठा व्यवसाय असूनही पारंपरिक व्यवसाय नको म्हणून स्वबळावर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. घरचा व्यवसाय वडील आणि भाऊ सांभाळायचे. दोघेच भाऊ. घरी आई वडील, भाऊ ,वहिनी आणि अविनाश सगळ्यात लहान. )

    अविनाश दोघांसाठी कॉफी घेऊन आला.

    अदिती आधीच्या गोष्टींवर बोलण्याच्या मूड मध्ये नाही हे लक्षात घेऊन अविनाश तिला चिडवत म्हणाला, “काय मग, पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही.. कशी जाणार आहेस घरी..”

    अदिती बाहेर एक नजर टाकत, “हो ना..पाऊस कधी थांबतो काय माहीत.. आई-बाबांना कळवायला पाहिजे.. काळजी करत असतील ते.. कॅब मिळते का बघते आता.. बसने जाणे तर अशक्यच वाटतेय..”

    “तुझी हरकत नसेल तर मी सोडतो ना तुला.. पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून कार घेऊन आलेलो आज..” अविनाश.

    “नको अरे मी बघते कॅब मिळते का…तुला उगाच चक्कर होईल मला सोडून घरी जायला…” अदिती.

    “अगं, किती ही औपचारिकता…खरंच इतक्या पावसात आता कॅब मिळेल का.. मिळाली तरी मी नाही जाऊ देणार तुला एकटीला..नऊ वाजत आलेत आता..चल मी सोडतो.. काही चक्कर वगैरे होणार नाही मला…” अविनाश.

    “बरं ठीक आहे, मी आईला फोन करून कळवते..तसं आज उशीर होईल ते सांगितलं होतंच पण इतका उशीर होईल वाटलं नव्हतं…हा पाऊस पण ना…” अदिती.

    “बरं झालं आला ना पाऊस.. नाही तर काम आटोपून निघून गेली असतीस..मला तुझ्याशी भेटताही आलं नसतं…?” अविनाश.

    त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अदीती म्हणाली,

    “चला, निघायचं का…”

    न बोलताच अदीतीला मान हलवून होकार देत अविनाश चल म्हणाला.

    दोघेही पार्कींग कडे निघाले.

    क्रमशः

    अदिती आणि अविनाश यांच्यातल्या नात्याला जाणून घेऊया पुढच्या भागात ?

    पुढचा भाग लवकरच…

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ??

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

    मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”

    मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.

    मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता

    घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”

    रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी,  बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”

    मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”

    रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”

    मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
    मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”

    मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.

    रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
    मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
    लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
    अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
    सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
    रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
    एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
    एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
    तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
    महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
    महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
    तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
    मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
    दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
    आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
    मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.

    मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.

    फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
    त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.

    अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

    तिला काही सांगायचंय..
    हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
    लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
    आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
    एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
    घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
    असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
    खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
    संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
    ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
    कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
    राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
    आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
    आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
    तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
    मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
    खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
    प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

    प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
    कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
    कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

    आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

    रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.
    कोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.
    शरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहायचे. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.
    पुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”
    वयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.
    अचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.
    रखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.
    उसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.
    अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.
    सतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.
    दोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.
    मुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.

    अशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.

    हे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.
    आई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.
    कष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.
    कुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

    मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

    ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
    ( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
    रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
    रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
    राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
    रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
    दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
    त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
    एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
    राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
    दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
    “राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
    “रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
    “राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
    “रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
    “राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
    दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
    रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
    हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
    “राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
    राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
    “राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
    इतकं बोलून रश्मी निघून गेली.
    तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
    तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
    रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
    रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
    कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
    इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

    आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
    राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

    सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
    सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

    त्यावर तो निशब्द झाला.
    आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

    वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

    राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
    रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

    आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

    राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

    समाप्त..!!

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही.
    अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

    https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी… भाग १

    नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
    राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
    नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
    तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
    त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
    राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
    दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

    हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

    पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

    “व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

    “हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

    सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
    राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

    तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

    (महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

    “बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
    नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

    राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

    ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

    राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

    पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

    राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

    लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

    क्रमशः

    पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पाणी मिळेल का पाणी..

    रवी नामक एक‌ गृहस्थ दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याश्या हॉटेलवर थांबून हॉटेल वाल्याशी संवाद साधत होता.

    “दादा, जरा पाणी मिळेल का प्यायला..”

    हॉटेल वाला – “हो मिळेल ना, किती पाहिजे.. अर्धा ग्लास ५ रूपये,  एक ग्लास १० रूपये..पाणी बॉटल ४० रूपये..”

    “अहो, मी पाणी मागतोय, कोल्ड ड्रिंक्स किंवा चहा कॉफी नाही…पाण्याची इतकी किंमत… ”

    “दादा, अहो किंमत तर करावीच लागेल ना‌ पाण्याची… सगळीकडे दुष्काळ पडला आहे बघा… दूर दूर वरून आम्ही पाणी‌ आणतो…या कडक उन्हात पाणीच मिळत नाही जवळपास… १०-१० किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं..तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा, नाश्ता आहे आमच्याकडे तयार…पाणी फ्री बरं का‌ नाश्ता केला तर…”

    “दे बाबा एक प्लेट समोसा, ग्लासभर तरी पाणी मिळणार ना फ्री त्याच्यासोबत..घशात कोरड पडली रे…”

    रवी समोसा खाऊन पाणी प्यायला आणि परतीच्या वाटेला निघाला.
    वाटेत तो विचार करू लागला “हॉटेल वाला जे बोलला, त्यात खरंच तथ्य आहे..किती पाणीटंचाई आहे काही ठिकाणी..दूर दूर पर्यंत पाण्यासाठी भटकावे लागते, आंघोळ तर लांबच पण पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही.. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे…सहज उपलब्ध होते म्हणून आपल्याला पाण्याची किंमत नाही.. मिळतंय म्हणून आपण पाणी किती वाया घालवतो.. ज्याला टंचाई माहीत आहे, त्यालाच पाण्याची किंमत कळते.. पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आता अनुभवलेली परिस्थिती काही वर्षांनी सर्वत्र दिसेल… कोल्ड ड्रिंक्स सारखे पाणी सुद्धा किंमत मोजून विकत घ्यावे लागेल…आताही ते मिळतेच पण ते फिल्टर केलेले… साधं पाणी पाणपोई किंवा इतर ठिकाणी उपलब्ध तरी होते…”

    खरंच विचार करण्याजोगे आहे, नाही का?

    मनुष्य पाणी विकत तरी घेईल पण पशू पक्ष्यांचे काय ?
    कडक रखरखत्या उन्हात एक वेळ जेवण नाही मिळाले तर चालेल पण पाणी मात्र गरजेचे आहे , मग तो मनुष्य असो वा पशू पक्षी..
    वेळीच काळजी घेतली नाही तर दुष्काळग्रस्त भागात जसं दूरदूरपर्यंत चालत जाऊन पाणी आणावं लागतं तशी परिस्थिती सर्वत्र दिसायला वेळ लागणार नाही.

    आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून वाया न घालवता काटकसरीने वापरले तर खरंच फायद्याचे आहे. घराबाहेर, आजुबाजूला प्राणी पक्षी यांच्यासाठी पाणी ठेवले तर त्यांना पाण्याविना तडफडत मरणाची वेळ येणार नाही.
    दरवर्षी किती तरी जीव पाण्याविना आपला जीव गमावतात, मग ते पशू पक्षी असो किंवा मनुष्य..

    तेव्हा वेळीच काळजी घ्या. प्रत्येकाने पाणी जपून वापरण्याचे मनावर घेतले तर किती पाणी वाचू शकते विचार करा?

    भविष्यासाठी एक पाऊल पुढे उचलून वेळीच काळजी घेतली नाही तर पुढच्या काही वर्षांत आपल्याला ही म्हणावं लागेल “पाणी मिळेल का पाणी…”

    प्रत्येक चांगल्या गोष्टींची सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे म्हणतात ना, चला तर मग पाणी जपून वापरण्याच्या , पशू पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा.
    ज्यांनी हा प्रयत्न आधीच सुरू केलाय त्यांचं खरंच कौतुक ?

    अश्विनी कपाळे गोळे