Tag: Marathi blogs

  • पहिली भेट

    तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का. 

    अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढच सगळ ठरवणार होते. 

    ती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी. 

    ती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.

    ठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.

    तो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तीच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तर मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं. 

    नंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तीने विचार करायला जरा वेळ घेतला. 

    रात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.

    पुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरलं. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.

    हळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.

    दोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते. 

    त्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

    त्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं. 

    लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं तिच्या मनात येवून ती हळवी होत होती. 

    त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं. 

    लग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. 


    Ashvini Kapale Goley

  • प्रेमकथा

    अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी बेशुद्ध पडली होती. मागुन येणारी एक गाडी सुद्धा मदतीला थांबली. त्यांच्या मदतीने तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. अर्णव खुप घाबरला होता. तो रात्री तिच्याजवळच थांबला. ती अजून शुद्धिवर आली नव्हती. ती दुसरी कुणी नसुन त्याची कॉलेज मधली मैत्रीण आभा होती. आभा दिसायला सुंदर, आकर्षक, हुशार, आत्मविश्वासी, बिंदास, श्रीमंत घरची एकुलती एक लाडकी, मोकळ्या मनाची. काॅलेजला दोघे सोबतच शिकायला होते. अर्णव गरीब घरातील साधा, शांत, मेहनती, लाजाळू स्वभावाचा मुलगा. त्याला आभा पहिल्या भेटीपासूनच खूप आवडायची.तो तिच्यावर खुप प्रेम करायचा पण कधी तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले नव्हते. त्याला भीती होती की आभाला हे आवडले नाही तर दोघांची मैत्री संपेल शिवाय तो लाजाळू स्वभावाचा. कॉलेज संपल्यावर काही कारणाने दोघे फार काही संपर्कात नव्हते पण अजूनही तो तिला विसरला नव्हता. दोघांच्या अशा अपघाती भेटीमुळे तो हैराण झाला होता. रात्री इतक्या उशिरा ती कुठे निघाली‌ होती. तिला काय झाले असेल असा विचार करत तो तिच्या जवळ ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसला होता. रात्र कशी गेली त्याला कळाले नाही.काही तासानंतर ती शुद्धिवर आली. समोर अर्णवला बघून तिला आश्चर्य वाटले. ती हाॅस्पीटलमधे कशी आली, काय झाले हे तिला काही आठवत नव्हते. त्याने तिला नंतर सगळं सांगतो असं म्हणतं धीर दिला आणि तिच्या घरी कळवावे म्हणुन घरचा फोन नंबर वगैरे विचारला. काही न बोलता ती फक्त रडू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक निराशा, अस्वस्थता पसरली. त्याला काही कळेना. तितक्यात डॉक्टर तपासणी करायला आले. काही औषधे लिहून दिली, कशी घ्यायची ते समजून दिली. आता तीला घरी घेऊन जायला हरकत नाही असं सांगितलं. त्याने तिचा घरचा पत्ता विचारला, ती पुन्हा रडू लागली, माझं या जगात कुणीच नाही, मी कुठे जाणार मला माहित नाही. ते ऐकून त्याला काही समजत नव्हतं की काय झालं, आभा अशी का बोलत आहे. काहितरी वाईट झाल्याची जाणीव त्याला झाली. तीला आपल्या घरी घेऊन जायचे त्याने ठरवले, तसा प्रस्ताव तिने नाकारला. तो आई-वडीलांसोबत राहायचा, ती खूप साधी माणसं, गरीब परिस्थितीतून वर आलेलं कुटुंब. अर्णवच्या नोकरी मुळे आता सगळं छान झालेलं होतं. तिला घरी घेऊन जायला आई बाबांची हरकत नसावी हे त्याला माहीत होते. बराच वेळ तिची समजूत काढून तो तिला घेऊन घरी जायला निघाला. रात्री काय झाले ते वाटेतच त्यानं तिला सांगितले.

    ती स्तब्ध होऊन फक्त ऐकत होती. 

    त्याच्या मनात तिच्याविषयी अनेक प्रश्न गोंधळ घालत होते. ती जरा बरी झाली की मग विचारावं असे म्हणतं त्यानं स्वतःला धीर दिला. 

    दोघे घरी आले, त्याने घडलेली हकीकत आई बाबांना सांगितली. ती सावरेपर्यंत आपण तिची काळजी घेऊ असं आईकडुन ऐकाल्यावर त्याला खूप समाधान वाटले. ती आधीची आभा राहिली नव्हती. तीला खुप मोठा धक्का बसला आहे याची जाणीव त्याला झाली होती. ती अबोलपणे एकटक कुठे बघत राहायची. अर्णव आणि त्याच्या घरचे तिची सगळी काळजी घेत होते. ती अजुनही सावरली नव्हती. अर्णवची तिच्याविषयीची काळजी, त्याचं प्रेम त्याच्या आईला जाणवत होतं. तिला हसवण्याचे, सावरण्याचे सगळे प्रयत्न तो करत होता. 

    एका रात्री अचानक ती दचकून जागी झाली आणि रडू लागली. ते सगळे जागे झाले. ती खूप घाबरलेली होती. अर्णवच्या आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. त्या प्रेमळ स्पर्शाने ती मोकळी झाली, तिला पाझर फुटला आणि ती घडलेली हकीकत सांगू लागली.

    आभा नोकरीवर असताना तिच्या आई वडिलांसोबत काही दिवस सुटृीचा आनंद घ्यायला कोकणात जायला निघाले होते. काही दिवस आनंदात घालवून परत येताना भयंकर अपघात झाला, आभा कशीबशी वाचली पण तिचे आई-वडील जागेवरच गेले. त्यांच्या अशा जाण्याने ती खूप हादरली होती, पुर्णपणे एकटी झाली होती. जीवनातला आनंद एका क्षणात नियतीने हिरावून घेतला होता.

    स्वतःला कसंबसं सावरून ती नोकरी करत होती. मित्र-मैत्रिणी मध्ये ती आता जास्त रमत नव्हती. 

    अशा परिस्थितीत आॅफीसमधला एक मित्र तेजस, हा तिला आधार देत होता. कामात तिचं लक्ष लागत नव्हतं ,मनस्थिती ठिक नसल्याने कामात तिच्याकडुन झालेल्या चुका त्याने सांभाळून घेतल्या होत्या. तो तिला आधार देत असल्याने ती त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायची. त्याच्या सहवासात ती एकटेपण विसरून जायची. 

    एक दिवस त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. त्याची झालेली मदत, काळजी अशी एकूण परिस्थिती पाहून ती लग्नाला तयार झाली. त्यांच्यामुळे आपण सावरलो या भावनेने ती त्याच्यात गुंतली, प्रेमात पडली. दोघांनी लग्न केले. ती आनंदात होती. सगळें छान चालले होते.

    काही दिवसांनी तो काही कामानिमित्त बाहेर गेला, एक आठवड्यानंतर येणार‌ होता. पण तो गेल्यानंतर त्याचा फोन नाही, दहा दिवस झाले अजून तो आला नाही. ती घाबरली, बरेवाईट विचार तिच्या मनात येऊ लागले. 

    काय करायचे तिला काही सुचत नव्हते. 

    आॅफीसमधून माहिती काढली तेव्हा कळले की तो दोन आठवडे रजेवर गेला आहे. तो खोटं का बोलला‌ तिला कळत नव्हतं. 

    आॅफीसच्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. ती घरी गेली, त्याचं कपाट उघडून काही माहिती मिळेल या हेतूने कपाटात सगळं शोधू लागली. त्यात तिला एक फोटो सापडला. तो बघून पुन्हा ती हादरली. तो त्याच्या लग्नाचा फोटो होता, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं. त्याने तिला फसवले होते. तिच्यासाठी हा जीवनातला दुसरा मोठा धक्का होता. 

    त्याची रजा संपल्यावर तो परत आला. तीने त्याला जाब विचारला, ती त्याच्यावर भयंकर संतापली होती. आभाला सगळं कळलं असं त्याच्या लक्षात आलं, त्यानी सांगितलं, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं, शिवाय त्याला तीन वर्षांचा एक मुलगा सुद्धा होता. आभाला खोटं सांगून तो त्यांना भेटायला गावी गेला होता. आभा सोबत त्याने फक्त तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन हव्यासापोटी लग्न केले होते, तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला होता.

    हे ऐकून ती हादरली, त्यांच्या लग्नाचा काही पुरावा नसल्याने ती काही करू शकत नव्हती. ती हतबल झाली होती. त्या रात्री ती स्वतःला संपवायला निघाली होती पण नियतीने तिची अर्णव सोबत गाठ घातली. हे सगळं ऐकून अर्णव आणि त्याच्या आई बाबाला धक्काच बसला.

    अर्णवच्या आईने तिला धीर दिला, तिची समजूत काढली, तिला शांत केले. तू एकटी नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत, अर्णव धीर देत बोलला. 

    अर्णवचं आजही आभावर तितकंच प्रेम होतं. त्याच्या आईलाही ते माहीत होतं. आभा हळूहळू सावरू लागली पण तीचा आत्मविश्वास खुप कमी झाला होता. कुणावरही तिचा विश्वास राहिलेला नव्हता.अशा परीस्थितीत अर्णवच्या कुटुंबाने तिला सावरले होते. त्यांची काळजी,प्रेम तिला जगण्याची नवी उमेद देत होते. अर्णवने अजूनही त्याच्या प्रेमाबद्दल तिला काही सांगितले नव्हते. 

    काही दिवसांनी तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आणि गिफ्ट म्हणून त्याने त्याची काॅलेजला असताना लिहिलेली डायरी दिली. घरी आल्यावर तीने ती डायरी वाचली, त्यात त्याने आभावरच्या प्रेमाबद्दल लिहिले होते.

    तिच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते. त्याचं तिच्यावर खुप प्रेम होतं आणि आहे हे तिला जाणवलं. अर्णवने केलेल्या मदतीत कुठलाच स्वार्थ नाही हे तिला कळाले होते. 

    अर्णवला त्याचं खरं प्रेम आयुष्यात आल्यामुळे तो खूप आनंदी होता. आपल्यावर इतका जिवापाड , निरागस, निस्वार्थी भावनेने प्रेम करणारा अर्णव आयुष्यात आल्यामुळे ती सुखावली होती. तीने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं पण नियतीने तिच्यावर जिवापाड प्रेम करणा-या अर्णवला तिच्या आयुष्यात आणले होते. अर्णवच्या प्रेमाने तिला जिंकलं होतं. 

  • आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

    सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे. 

    ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट.

    तो : एक काम कर, ती किट ठेव जरा वेळ बाजूला आणि झोप. उठल्यावर बघू आपण परत. आता तरी मला एकच लाइन दिसते आहे.

    एवढे बोलून त्याने तिला झोपवले आणि तो परत झोपी गेला. 

    काही वेळाने तो उठला आणि बघतो तर ती अजूनही किट कडे कटाक्षाने बघत बसलेली.

    त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि किट कडे बघितले तर त्याला सुद्धा दुसरी अंधुक लाईन दिसत होती.

    त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आनंदाची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. Gynaecologist कडे जाऊन गुड न्यूज ची खात्री करून घ्यायची असे ठरले. रविवार असल्याने दोघंही जरा निवांत होते. 

    आता दोघांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्याने लगेच Gynaec ची अपॉइंटमेंट घेतली.

    ठरलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन check up केला, डाॅक्टरांनी ती आई‌ होणार असल्याचे सांगितले आणि काही आवश्यक सुचना दिल्या. तो अतिशय लक्ष देऊन सगळं ऐकत होता, ती मात्र आनंदाच्या भरात दुसरीकडेच हरवली होती, चेहऱ्यावर एक स्मीत करत वेगळ्याच विश्वात रमली होती. 

    ठिक आहे, Again Congratulations and take care या डॉक्टरांच्या वाक्याने ती हरवलेल्या विश्वातून बाहेर आली. 

    दोघेही खूप आनंदात होते, घरी येतांच त्याने तिला हळूवारपणे मिठी मारली. त्या मिठीत तिला एक काळजी, होणार्‍या बाळाचे जबाबदार वडील अशा अनेक भावना जाणवल्या. 

    आई जवळ आणि सासुबाई जवळ ही आनंदाची बातमी कधी एकदा शेअर करते असं तिला झालं. आईला बातमी सांगितली त्याच क्षणापासून आईची काळजी, काय करायचे काय नाही करायचे अशी सूचनांची यादी यायला सुरुवात झाली. आई आणि सासूबाई दोघिंनीही सांगितले की लगेच ही बातमी कुणाला सांगू नकोस. सुरवातीला तीन महिने गर्भ अगदी नाजूक अवस्थेत असतो, त्यामुळे पुर्णपणे विकास होईपर्यंत कुणाला सांगत नसतात. 

    नंतर Bike वर जाणं बंद झाले आणि त्याऐवजी कार चा वापर सुरू झाला. शक्यतो bike ने कुठे जाणे या अवस्थेत टाळलेले बरे असते, गेले तरी दोन पाय दोन्ही कडे टाकून न बसता एका बाजूला बसून जावे. दररोज आॅफिसला नवर्‍यासोबत जाताना दोन पाय दोन्ही बाजूला टाकून बसून जाण्याने आणि धक्क्यांमुळे एका मैत्रिणीची गर्भपिशवी चौथ्या महिन्यांतच ओपन झालेली आणि पुढे बाळ होत पर्यंत मग complete bed rest. त्यामुळे सहसा ते टाळलेले बरे. 

    आहारात आता फळं, शक्य ते पौष्टिक पदार्थ असे बदल झाले. सुरवातीला दोन महिने काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र भयंकर मळमळ, उलटी, थकवा यांनी घेरले. काही खाल्लं की उलटी होणार, कशाचाही वास नको नको वाटायचा. अन्न तर नकोच वाटायचे पण बाळाचा विचार करून जे खावं वाटले ते बिंदास खायचं असं ठरवलं. 

    Papaya, pineapple आणि Chinese food सोडलं तर बाकी जे खावं वाटले ते बिंदास पण प्रमाणात खाल्ले. Papaya, pineapple आणि Chinese food या अवस्थेत खायला चालत नाही पण बाकी कशानेही काही अपाय नसतो याची खात्री पटली. अर्थात सगळे पोषक रस पोटात गेलेले चांगले असतात मग ते गोड, आंबट, कडू अशे कुठलेही असो.  

    गरोदरपणाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण ही नैसर्गिक अवस्था असते, आजारपण नाही हे लक्षात घेऊन नीट काळजी घेणे आवश्यक असते. बाळाचा पूर्ण विकास आईच्या खाण्यापिण्यावर आणि तिच्या दिनचर्येवर अवलंबून असतो, त्यासाठी योग्य काळजी घेतली तर कधीही चांगले. हंगामी फळे, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. 

    खूप कर्कश आवाज, जास्त हळव्या करणारे कार्यक्रम अशा गोष्टी टाळाव्यात. जितकं आनंदात राहता येईल तितके चांगले. योग्य आराम, व्यायाम, चांगले साहित्य वाचन केले की मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते, या अवस्थेत अशी दिनचर्या पाळली तर फायद्याचे ठरते.

    तब्येत बरी नसली तरी आई होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता मनात, माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल. या सगळ्यात पाचवा महिना संपत आला तेव्हा मळमळ उलटी थकवा दूर झाल्यासारखा वाटला, तब्येतीत सुधारणा झाली, बाळाची हालचाल सुरू झाली. बाळाची पहिली हालचाल पोटात जाणवली तो क्षण तर शब्दात मांडता येणार नाही. हळूहळू बाहेर सगळ्यांना पोटाच्या वाढत्या आकारावरून गुड न्यूज असल्याचे जाणवायला लागले. 

    या अवस्थेत सगळे किती काळजी घेतात, नवरा तर अगदी फुलाप्रमाणे जपतो, काय हवं नको ते अगदी समोर नाव काढताच हजर. 

    जसजसा पोटाचा आकार वाढत गेला तशा बाथरूमच्या चकरा वाढल्या. नऊ महिने कसे भराभर गेले, सातव्या महिन्यात ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला, छान फोटोशूट केले, अगदी आनंदात हे दिवस गेले. 

    पाच ते सात महिन्यांच्या कालावधीत अगदी छान वाटत होते. आठवा महिना सुरू झाला आणि नंतर शरीर जड वाटायला लागले, पायावर जरा सुज यायला सुरुवात झाली ,जास्त वेळ बसून नको वाटायचे त्यामुळे मध्ये जरा चालायचे. या दिवसांत जितके जास्त चालायला जमेल तितकं चांगलं पण ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते पण पोटाचा वाढलेला घेर सांभाळून झोपताना जरा त्रास हा होतोच. 

    या पुर्ण अनुभवात जेव्हा सोनोग्राफी मध्ये बाळाला आपण बघतो तो क्षण किती गोड असतो. कधी एकदा बाळ बघायला मिळते असं वाटतं. 

    सगळ्या गोष्टी अनुभवताना दिवस भराभर गेले, जसजसा बाळ होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत होती तसतशी मनात हुरहूर, अनेक प्रश्न, एक भिती अशी गोंधळलेली अवस्था झाली होती. 

    अचानक काही त्रास झाला आणि ट्राफीक मध्ये अडकले तर काय, कळा नक्की कशा येतात, बाळ होताना खूप त्रास होईल का, मला सहन होईल का अशा अनेक शंका मनात असतात पण मनाची तयारी, बाळाच्या आगमनाची उत्सुकता यामुळे आपण खूप strong होत जातो. 

    बघता बघता वेळ आली बाळ होण्याची, २४ तास Labour Room मध्ये कळा , OT मधल्या वेदना सहन करून एक गोंडस परी आमच्या आयुष्यात आली. मनापासून वाटायचे मला मुलगी व्हावी, तिला बघून एका क्षणात सगळ्या वेदनांचा विसर पडला. दोघेही खूप खुप आनंदी झालो.

    आई होण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, प्रत्येकाची गरोदरपणातील अवस्था, अनुभव हा वेगळा असतो. त्यासाठी योग्य काळजी, आनंदी मन , संयम खूप आवश्यक आहे. 

    – अश्विनी कपाळे गोळे

  • Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव

        आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते.

    अशा या सुंदर अनुभवात breast Abscess सारखी समस्या आली की तो अनुभव अतिशय painful असतो, आई आणि बाळ दोघांनाही या गोष्टीचा त्रास होतो. असाच एक painful अनुभव मी शेयर करते आहे.

    बाळासोबत छान वेळ घालवताना भराभर दिवस जात होते. एक दिवस अचानक सकाळी उजव्या Breast मध्ये दुखायला लागले, अंगात ताप आलेला होता. गरगरल्या सारखे वाटत होते, मळमळ आणि उलटी सुद्धा सुरू होती. अचानक अशे काय झाले कळायला मार्ग नव्हता कारण बाळंतपण झाल्यामुळे घरीच, बाहेर जाणं, बाहेर खाणं सगळं बंद. माझी मुलगी तेव्हा फक्त चार महिन्यांची, मला क्षणभरही सोडून वेगळी कधी नव्हतीच.

    वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी सासरी खेडेगावात खूप काही तज्ज्ञ डॉक्टर नव्हते आणि शहर अगदी दहा किलोमीटर अंतरावर असले तरी उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात बाळाला सोडून अथवा घेऊन जाणं जरा कठीणच वाटले. गावातील डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या म्हणण्यानुसार उन्हामुळे असं झालं आहे हे सांगून त्यांनी ताप कमी होण्यासाठी औषधे दिली आणि आराम करण्याचे सुचवले. Breast मध्ये दुखत होते त्यासाठी जरा शेक देऊन मालीश करायला सांगीतले. सांगितल्या प्रमाणे पाच दिवस औषध आणि बाकी काळजी घेतली पण त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला. अचानक आहारात बदल झाला, जेवणाची इच्छा होत नव्हती पण बाळासाठी म्हणून जेवण सुरू होते. कदाचित ताप असल्यानं असं होतं आहे असे समजून आठवडा गेला आणि आम्ही आमच्या घरी पुण्यात आलो. प्रवासानंतर रात्री अंगात परत खूप ताप भरला, अशक्त वाटू लागले. स्तनातील वेदना वाढत होत्या, ताप आणि त्या वेदना यामुळे रात्र जागून काढली. सकाळी लगेच Gynaec कडे गेले, तपासणी केल्यानंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे अंगात ताप आलेला आहे. त्यासाठी अॅंटीबायोटिक्स दिली आणि स्तनात गाठ जाणवत असल्याने स्तनाचे स्कॅनींग करायला सांगीतले. पुढचे पाच दिवस औषध घेत असताना वेदना कमी होत नव्हत्या त्यामुळे स्कॅनींग करायचे ठरले. 

    स्कॅनींगमध्ये कळाले की स्तनामध्ये गाठ होऊन पस सुद्धा झालेला आहे. त्यामुळे स्तनावर लालसरपणा आला असून अंगात ताप आहे. स्कॅनींगचे रीपोर्ट ब्रेस्ट स्पेशालीस्टला दाखवताच तिने आॅपरेशन करून लवकरात लवकर पस काढण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आॅपरेशन करायचे ठरले. या सगळ्यात माझ्या सोबत बाळालाही त्रास सहन करावा लागत होता. माझ्या दुखण्यामुळे तिला लवकरच फाॅर्मुला मिल्क सारखे टॉप फिडींग सुरू करावे लागले.

    वेळ न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळी मी आॅपरेशन साठी हाॅस्पीटलला दाखल झाले. या सगळ्यात माझ्या मनात सतत विचार येत होता तो म्हणजे मला स्तनांचा कर्करोग तर झाला नसेल. मला काही झाले तर माझ्या बाळाचं कसं होणार. डॉक्टर समजूत काढत असली तरी मला मात्र अशा अनेक वाईट विचारांनी घेरले होते, पहील्यांदाच मी आणि माझं बाळ एकमेकींपासून वेगळे राहणार होतो. मी २४ तास हाॅस्पीटलला असताना माझ्या बाळाची काळजी मला जास्त त्रास देत होती. 

    तिची सुद्धा वेगळी अवस्था नव्हती, सतत रडून मला माझी आई पाहिजे या भावनेने ती सगळीकडे मला शोधत होती.

    ठरल्याप्रमाणे आॅपरेशन झाले, इन्फेक्शन परत होऊ नये म्हणून अशा केस मध्ये टाके देत नाही, त्यामुळे पाच ते सहा आठवडे जखम भरून येईपर्यंत ड्रेसिंग करावे लागणार होते. जखमेतला पस तपासणीसाठी पाठविण्यात आला, सुरवातीला जखम मोठी आणि खोल असल्याने दररोज ड्रेसिंग करताना तिव्र वेदना व्हायच्या. माझ्या साठी हा एक अतिशय वेदनादायी अनुभव होता.

    या तीन आठवड्यात वजन अचानक पाच किलो कमी झाले. अशक्तपणा आला, बाळ माझ्यावर अवलंबून असल्याने स्वत: कडे मी आता नीट लक्ष देऊ लागली. पस तपासणीनंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात झाले त्यासाठी दहा दिवस दररोज दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार. पस रिपोर्ट वरून ब्रेस्ट अॅब्सेस आणि कॅन्सर यामध्ये फरक आहे, हे मला डॉक्टरांनी पटवून दिले तेव्हा मला खात्री पटली.

    सतत हाॅस्पीटलच्या चकरा मारून वैताग आला होता पण अर्थातच काही पर्याय नव्हता.

     या सगळ्यात बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न सुरू होते. हळूहळू जखम भरून येत होती, तब्येतीत सुधारणा होत गेली. या सगळ्यात माझ्या दुखण्यामुळे घरी सगळ्यांनाच मानसिक, शारीरिक त्रास होत होता. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, औषधे न मिळाल्याने तसेच स्तनातील वेदनांकडे दुर्लक्ष झाल्याने माझ्यावर ही वेळ आली होती. 

    स्तनात दूध साठू नये म्हणून काळजी घेणे किती आवश्यक आहे हे मला जाणवत होते. 

    माझ्या अनुभवावरून मी नविन आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की स्तनामध्ये दुध साठवून राहणार नाही याची काळजी घ्या, काहीही त्रास झाला तर दूर्लक्ष न करता त्वरीत उपचार करून घ्या.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • आई, बाळ आणि नोकरी

    सरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू झाला.

    काही दिवसांतच एका गोंडस बाळाचे आगमन झाले. आई झाल्याचा आनंद, तो सुखद अनुभव शब्दात मांडता येणार नाही. बाळाच्या सहवासात दिवस कसे भराभर जात होते, रोज काहीतरी नवीन अनुभव. बाळाच्या झोपच्या वेळेनुसार आईची दिनचर्या ठरलेली. सहा महिन्यांची रजा संपत आली. बाळासाठी अजून एक महीनाभर रजा वाढवून मिळाली तेव्हा खूप छान वाटले. बघता बघता ती सहा महिन्यांची झाली.

    सुट्टी कशी संपत होती कळत नव्हतं. निरागस, गोंडस , सुंदर चेहऱ्याला न्याहाळत दिवस कधी मावळतो कळत नव्हतं. हळूहळू नोकरीवर परत रूजू होण्याची वेळ जवळ येत होती, तसतशी मनात हुरहूर लागायला सुरु झाली. मी आॅफिसला गेल्यावर बाळ कसे राहणार. नोकरीत जरा ब्रेक घ्यावा का अशे अनेक विचार मनात गोंधळ उडवू लागले. नवर्‍याशी त्याबाबत चर्चाही केली. आपण नोकरी केली तर बाळाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी मदतच होईल. शहरातील वाढता खर्च, महागडे शिक्षण यासाठी दोघांनीही नोकरी केली तर फायद्याचे आहे हा विचार करून आॅफिसला रुजू व्हायचे ठरवले. सासुबाई आणि मदतीला बाई घरी असल्यामुळे जरा निश्चिंत होते पण शेवटी आईचं मन. प्रत्येक नोकरी करणारी स्त्री या परीस्थितीतून जाते.

    सुरवातीला आॅफिसमध्ये सतत कानात तिचे बोबडे बोल गुंजन करायचे , डोळ्यांपुढे तिचं हसणं, तो निरागस चेहरा, अवतीभवती सगळीकडे तिचं निरीक्षण सुरू असतानाचे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक क्षणही दूर जात नव्हते.. या सगळ्यात कामात काही लक्ष लागत नव्हते. आईसाठी खरंच ही द्विधा मनस्थिती असते.त्यात घरी आपुलकीने बाळाची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर जरा समाधान वाटते. शरीराने आॅफिसला असले तरी मन मात्र घरीच, बाळाच्या विचारात गुंतलेले. मग फोनमध्ये तिचे फोटो बघून चेहऱ्यावर एक स्मितहास्य, अधूनमधून फोनवर तिची विचारपूस.

    सुरवातीला आॅफिसला फार काम नसल्याने लवकर घरी यायला मिळायचं. घरी आले की ती अगदी दिवसभर आई दिसत नसल्याने आईला एकही क्षणही आईला सोडत नाही. घरी आल्यावर बाळाची ती गोड मिठी, तिचं हसणं खूप काही सांगून जाते. 

    प्रत्येक आईसाठी खरंच हा एक वेगळाच अनुभव असतो. 

    अश्विनी कपाळे गोळे

  • इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा

    तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”
    आई म्हणाली “बरं, तुला हवा तो क्लास लावून देते, आता वेळ आहे तुझ्याकडे. शिकून होईल आणि वेळही जाईल तुझा. सध्या खूप काम आहे गंं, सुट्टी नाही मिळणार मला. तरी बघूया काही दिवसांनी, तोपर्यंत तू स्विमींग, डान्सिंग, जे काही शिकायचे ते शिकून घे.”
    तनूचा इवलासा चेहरा पाहून आईला मनातून वाईट वाटले आणि मनात विचार आला की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीची किती आतुरतेने वाट बघायचो आपणं, किती मज्जा करायचो.
    सुट्टी सुरू झाली की मामाच्या गावाला कधी कधी जाणार ही‌ घाई असायची, कारण तिथे मज्जा सुद्धा तशीच यायची. सगळे भावंडे एकत्र येणार, मामा मामी, मावशी ‌काका, आजी आजोबां कडून मस्त लाड पुरवले जायचे. सकाळ‌ पासून रात्र कशी झाली कळायला वेळ नसायचा. सगळी भावंडं एकत्र जमली की‌ नुसतीच मज्जा. एकमेकांच्या खोड्या काढत, मनसोक्त खेळत,‌ छान छान खाऊन कुठे दिवस जायचा कळत नव्हतं.
    विहीरीत पोहायला जायचं, ज्यांना अजून पोहता येत नाही त्यांच्या पाठीला भोपळा किंवा जूना‌ टायर बांधून मामा,‌मोठी भावंडे पोहायला शिकवायचे. मनसोक्त पोहून झालं की‌ मस्त भूक लागायची मग मामींच्या ,‌आजीच्या हातचे नवनवीन पदार्थ, शेतातल्या ताज्या कैरी,‌आंबे अगदी नैसर्गिक रित्या आलेले सगळं खाण्याचा मोह आवरायचा नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत अंगणात, घरात इकडे तिकडे भटकायच, मनसोक्त खेळत मज्जा मस्ती करायची. त्यात भर दुपारी सायकलवरून कुल्फी वाला, आइस कॅंडी वाला यायचा मग सगळी बच्चे कंपनी त्याच्या भोवती गोळा, मला‌ ही कुल्फी, मला‌ लाल आइस कॅंडी, मला‌ हे मला‌ ते…काय मज्जा यायची नाही त्यात. कधी मग भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे‌ लग्न, त्यात आजी मग खाऊ बनवून देणार, कधी कबड्डी, कधी खो-खो, घरभर पळत लपाछपी, मातीचा खेळ, लगोरी अगदी उत्साहात खेळ रंगाचे. कधी बैलगाडीची सफर असायची. पूर्ण वर्षभराचा‌ रिचार्ज केल्यासारखे वाटायचे. भावंडांची भांडणे, त्यांचं प्रेम , चिडवाचीडवी यामुळे त्यांचं नातंही तितकंच घट्ट व्हायचं.
    खाण्या पिण्याची मज्जा, खेळण्यातील मौजमस्ती, मोठ्यांचा एक वेगळाच अनुभव, गप्पा गोष्टी, पापड , शेवया , वाळवणी पदार्थ बनवायची त्यांची वेगळी मज्जा.
    रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर किंवा अंगणात गादी टाकून सगळे झोपायचो आणि आकाशातील तार्‍यांची मज्जा बघायची, चंद्राची लपाछपी‌ बघायची, आजी मग छान छान गोष्टी सांगणार ते ऐकत झोपायचो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात.
    ही सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं. त्यात घरी कुणाचं लग्न‌ जर असेल मग तर विचारायलाच नको, सगळीकडे आनंदीआनंद…
    भेटीसाठी होऊन एकत्र वेळ घालवून नात्यांमधला गोडवा टिकून राहायचा, सुखदुःख वाटले जायचे, एकमेकांची ओढ वाटायची.
    हल्ली शहरांमध्ये नोकरी करताना‌, शहर असो किंवा ग्रामीण भाग ही सगळी मज्जा कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. आई‌ वडील इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग इंटरनेट‌ मुलांचा‌ मित्र बनतो, मोबाईल, टिव्ही, व्हिडिओ गेम यामुळे मामाच्या गावाला जी मज्जा यायची ती खरंच  हरवली आहे. नात्यात एक दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब, फोन वरून औपचारिक बोलून ती आधी सारखी आपुलकी, नात्यातला‌ जिव्हाळा कुठे तरी हरवला आहे. आई‌ वडीलांना‌ वेळ नसतो मग‌ मुलांना‌ मनासारखी सुट्टी अनुभवता येत नाही. या वेळी समर‌ कॅम्प, या वेळी हा क्लास असा अगदी टाइमटेबल ठरलेला असतो, त्यात जो‌ वेळ मिळेल तो मग इंटरनेटवर गेम, टिव्ही,‌मोबाइल. यामुळे मग मुलांनाही नात्यात ओढ वाटत नाही, आई बाबा कामात, भावंडे असली तरी मोबाईल गेम मध्ये व्यस्त. सुट्टीच्या दिवशी फार फार तर सिनेमा, माॅलमध्ये फिरायला जायचं. काही दिवस सुट्टी मिळालीच तर मग जवळपास कुठे फिरून यायचं अशी हल्ली सुट्टी संपते पण त्यात पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा नसते.
    खरंच वाईट वाटत‌ं ना विचार करून. म्हणूनच मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवून त्यांना वेळ देण्याची गरज आहे, आजोळी काही दिवस घालवले, घरातल्या घरात न राहता बाहेर मनसोक्त खेळू दिले, मुलांना जबरदस्तीने व्यस्त ठेवण्यासाठी क्लास न लावता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देऊन हवं ते शिकू दिले, आवडीची‌ गोष्टींची पुस्तकं दिली तर त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लक्षात राहील. ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    तुमच्या लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा

    शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..????”.
    आई मनात पुटपुटली “तुमची मज्जा..आमची सजा..?..बरं आता मस्त फ्रेश होऊन ये..आराम कर जरा‌ वेळ..”
    नेहमी फ्रेश हो म्हणत ‌अर्धा तास जायचा, आज‌ मात्र पाच मिनिटांत मॅडम कपडे बदलून फ्रेश होऊन तयार.
    निधी- “आई, माझा‌ व्हिडिओ गेम कुठे आहे गंं, तू म्हणाली होतीस परिक्षा संपली की काढू.”
    आई – “अगं, आताच घरी आलीस, जरा खाऊन घे, आराम कर..दोन‌ महिने आहेत खेळायला.”
    निधी – ” नको आज आम्हाला शाळेत स्नॅक्स होता ना, भूक नाही.. झोप पण नाही आली..सांग ना‌ कुठे आहे व्हिडिओ गेम.. “
    आई – ” बाबा आल्यावर काढायला‌ सांगते रात्री..आता‌ नको..”
    निधी – “असं ‌काय करतेस गं, तूच म्हणाली होती परिक्षा संपली की काढू..बरं मग मी रिमा कडे जाऊ खेळायला..”
    आई‌ – ” अगं, सायंकाळी जा‌ खेळायला..आता‌ जरा आराम कर..”
    निधी – ” काय गं आई‌ ..हे नको ते नको.. सुट्टीची मजा घेऊ‌ दे मला. “
    नंतर निधी‌ टिव्हीवर कार्टून बघत बसलेली…
    आई – ” निधी जरा आवाज कमी करशील का टिव्ही चा..”
    आईच्या डोक्यात विचार आला.. आजच सुट्टी सुरू झाली की इतका गोंधळ.. पुढचे दोन महिने काही खरं नाही..
    रात्री बाबा घरी आल्यावर तर विचारायलाच नको..आई‌ जेवायला‌ आज हे बनव.. नाश्त्याला ते बनव.. सकाळी आईची‌ ड्युटी स्विमींग ला‌ घेऊन जाणे..नंतर घरकाम..बाहेर उन्हामुळे ‌दिवसभर घरात टिव्हीचा, व्हिडिओ गेमचा आवाज..सोबत कुणी ना कुणी मित्र मैत्रिणी..मग निधीच्या खाण्या पिण्याच्या डिमांड.. एक मिनिट दुपारी आराम नाही..
    पूर्ण घर डोक्यावर घेऊन निधी सुट्टीचा‌ पुरेपूर आनंद घेत होती.
    सायंकाळी पाच वाजले की‌ एक सेकंद इकडे तिकडे न होऊ देता खेळायला बाहेर.. नंतर सात वाजले तरी घरात यायचं नावं नाही..
    घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण झाले की बाबांसोबत मस्ती.. दोघांची बडबड..बाबा दिवसभर घरी नसतात‌ मग आल्यावर काय करू नी काय नको…आई मात्र कधी एकदा जाऊन झोपते अशा विचारात..
    निधी शाळेत गेली की ‌आईला‌ जरा‌ स्वतः साठी वेळ मिळायचा.. घरातील काम आवरले जायचे..आता‌ मात्र दिवसभर आईचे काम काही संपत नाहीत.. त्यात निधी मॅडम‌ रात्री सुद्धा लवकर झोपायचे नावं घेत नाही..आई गोष्टी सांग ना..आताच काय झोपते..बाबा चला ना हे खेळू..ते खेळू..मग निधी आणि बाबांचा लुडो‌, बुद्धीबळ, सापसिडी तर कधी पेंटिंग ‌असा काही ना‌ काही कार्यक्रम उशीरा पर्यंत सुरू.. आईनेही झोपायचे नाही..?
    बाबांनी मग काही दिवस सुट्टी घेतली आणि फिरायला जायचा बेत आखला, तर आठवडाभर आधी निधीची तयारी..आतुरता..तिथे गेल्यावर असं करायचं तसं करायचं.. प्लॅनिंग ची मोठीं यादी तयार आणि आईने ती यादी दररोज ऐकायची.
    आई बिचारी मनात विचार करत बसायची , का शाळेला‌ इतक्या सुट्ट्या देतात.. घरात किती पसारा झालाय.. मैत्रिणींना ही भेटले नाही मी इतक्यात..सगळा वेळ निधीच्या मागे.. निधीची परिक्षा संपली आणि माझी सुरू झाली..?

    निधीच्या आई सारखी सगळ्या आयांची परिक्षा असते, मुलांची उडालेली झोप आणि अर्थातच आईची सुद्धा..दिवस भर घरात गोंधळ.. टिव्हीचा आवाज.. भावंडांची भांडणे.. अरे शांत बसा, भांडू नका अशी आईची कमेंटरी ..नोकरी करणारी आई असेल तर वेगळी काळजी..डे केअर अथवा मावशी जवळ सोडून जात‌ असेल तर सुचनांची यादी.. आईने सुट्टी घ्यावी म्हणून मुलांची चिडचिड..खाण्या पिण्याच्या डिमांड..हा क्लास तो क्लास.. नेऊन सोडा.. घेऊन या.. रात्री उशिरापर्यंत मस्ती.. आणि बरंच काही.. बिचारी थकलेली‌ आई?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..

    “आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता.
    आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.”
    अमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे नेहमी. विनय माझ्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करतो. नंतर पाहिजे तेव्हा सापडत नाही मला. मी नाही देणार, त्याची खेळणी का नाही खेळत तो. आता मी गिटार प्रॅक्टीस करतोय तर त्यालाही तेच पाहिजे आहे.”
    विनय आणि अमन, दोघे भावंडे. विनय अगदी तीन वर्षांचा तर अमन‌ बारा वर्षांचा. अमन समजूतदार , जरा अबोल तर विनय खूप मस्तीखोर. हळूच अमनच्या खोड्या काढायचा आणि काही न झाल्यासारखा दूर पळायचा. दोघांमध्ये जास्त अंतर असल्याने नेहमी दोघांचे भांडण झाले की नेहमी अमनला ओरडा खावा लागायचा, तू मोठा आहेस, विनय अजून लहान आहे, त्याला समजून घे. विनयला वाटायचं आपण काही केले तरी आई बाबा दादाला रागावतात, मग हळूहळू तो या गोष्टीचा बालीश पणे फायदा घ्यायचा.
    सारखं आई बाबांचा ओरडा खाऊन अमन मनातल्या मनात विनयचा राग करायला लागला, त्याला वाटायचं अमन खोड्या करतो आणि ओरडा मी खातो, विनय झाल्यापासून आई बाबा विनय वरच प्रेम करतात‌, काही झाले की मलाच ओरडतात, माझ्यावर आता आई बाबा प्रेमच करत नाही. ही भावना हळूहळू अमनच्या मनात घर करत होती.
    आई बाबांना वाटायचे इतर भावंडा प्रमाणे हे दोघेही भांडतात पण नेहमी अमनला रागविल्याने तो मनात सलते विचार करायला लागला. एकदा बाबा घरी आले तेव्हा दोघेही अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर दोघांचे भांडण बघून घरात येताच बाबा अमनवर ओरडले ” अमन‌ हे काय चाललंय, किती भांडता दोघे, लहान आहेस का तू आता,  उगाच कशाला विनयला त्रास देतो, इतका मोठा झाला तरी अगदी लहान असल्यासारखा वागतो.”
    बाबा रागाच्या भरात बोलून गेले पण अमनच्या मनाला ते खूप खोलवर लागलं. तो त्याच्या खोलीत जाऊन दार बंद करून रडत बसला.
    आईलाही त्याच असं वागणं बघुन अजूनच राग आला, खोलीचं दार वाजवत आई म्हणाली “अमन हा काय वेडेपणा, दार का लावून घेतलंस. उघड दार पटकन आणि ये बाहेर.”
    अमनने रडतच दार उघडले आणि आई-बाबांना रडतच म्हणाला “मी तुमचाच मुलगा आहे ना नक्की… काही झालं की मलाच ओरडता तुम्ही दोघे..विनय किती कुरापती करतो, खोड्या काढतो त्यालाही कधीच रागवत नाही..मला नाही राहायचं इथे..मला हॉस्टेलवर ठेवा मी नको असेल तुम्हाला तर..माझ्यावर कुणाचं प्रेमच नाही..”
    अमनच्या अशा बोलण्याने, वागण्याने आई बाबांना धक्का बसला. बाबांना वाईटही वाटले की आपण असं ओरडायला नको होतं, जरा समजून सांगायला पाहिजे होतं.
    बाबांनी अमनला जवळ घेतले आणि त्याला समजावत म्हणाले ” अमन बेटा, असा का म्हणतो आहेस तू.. अरे आमचं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे..तू इतका समजूतदार आहेस तरी असं म्हणतोय..फक्त तू मोठा आहेस आणि विनय अजून लहान आहे तेव्हा त्याच्याशी नुसतं भांडण न करता दादा म्हणून ते त्याला हक्काने समजून सांग..तू असं चिडलास तर विनय तुझं अनुकरण करून तोही चिडेल.. हट्ट करेल.. त्याच्याशी चिडून न‌‌‌ बोलता, नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणार नाही. मी दमून आलो रे घरी आणि तुम्ही अशे आरडाओरड करताना बघून माझी चिडचिड होणारच ना.. आणि तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला वाढदिवसाला गिटार गिफ्ट दिली असती का..तुला pets आवडतात म्हणून तर आपण टफी (Tuffy – त्यांच्या घरचा पाळीव कुत्रा) घेऊन आलो ना घरी. तेव्हा असा विचार परत करायचा नाहीस..हस बघू आता..”
    आईनेही अमनची समजूत काढली. त्याला पटवून दिले की आई बाबांचं प्रेम हे सारखंच असतं.
    झालेल्या प्रसंगावरून आई बाबांनाही त्यांची चूक लक्षात आली, आपण अमन मोठा आहे तेव्हा त्यानेच समजून घ्यावे, विनय लहान आहे त्याला तितकं कळत नाही म्हणून अमन कडून अपेक्षा ठेवत गेलो पण यामुळे विनय अजून हट्टी आणि खोडकर झाला असून अमनला इतका मोठा गैरसमज झाला , तो दुखावला गेला याचे दोघांनाही वाईट वाटले.
    यापुढे हा लहान हा मोठा असा विचार न करता दोघांनाही चूका‌ केल्यास समजून सांगायच्या असे आई बाबांनी ठरवले शिवाय अशी वेळ परत यायला नको याची पुरेपूर काळजी घेतली.

    भावंडं म्हंटले की छोट्या छोट्या खोड्या काढणे, भांडणे हे आलेच पण त्यावरून मुलांमध्ये एकमेकांविषयी राग, घरात आपल्यावर कुणाचं प्रेम नाही कारण मलाच नेहमी रागावतात ही भावना जास्त प्रमाणात निर्माण झाली तर ते धोक्याचे ठरते. मुलं वयात यायला लागली की त्यांच्यातील शारीरिक मानसिक बदल समजून घेत वर्तणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.

    • अश्विनी कपाळे गोळे
  • हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग

    मागच्या भागात आपण पाहीले की मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त अमनने काही तरी सरप्राइज प्लॅन केला होता. ते कळाल्यापासून काही केल्या मैथिलीला रात्री झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती. विचार करतच कशी बशी ती झोपी गेली तोच सकाळ झाली. सासूबाई लवकर उठून आंघोळ करून पूजा करत होत्या, त्या आवाजाने मैथिली जागी झाली. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर सकाळचे सात वाजले होते, आजूबाजूला अमन नव्हता. बेडच्या बाजुला टेबलवर एक सुंदर फुलांचा गुच्छ आणि हॅपी बर्थडे लिहिलेले कार्ड होते.
    फ्रेश होऊन मैथिली बाहेर आली, सासूबाईंनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मैथिलीची नजर मात्र अमनला शोधत होती. सासूबाईंना ते लक्षात आले, त्यांनी तिला लगेच सांगितले “अमन तुझ्यासाठी काही तरी आणायला गेला, तो येत पर्यंत तू आवरून तयार हो. आई बाबा निघालेत, येतीलच ते इतक्यात.”
    मैथिलीचे मन अजूनही गोंधळलेले होते, ती आवरून तयार झाली, चहा बनवला. थोड्याच वेळात आई बाबा आले, मागोमाग अमनही केक घेऊन आला. सर्वांनी मैथिलीला शुभेच्छा दिल्या. बाबा आज गप्प गप्प आहेत, भावनीक वाटत आहे हे मैथिलीने ओळखले. आईला विचारले असता आईने फक्त एवढंच म्हणाली “आज आम्ही दोघेही खूप आनंदात आहोत, तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अमन सारखा जोडीदार मिळाला. ”
    आईचं बोलणं मैथिलीला कोड्यात पाडणारं होतं, आई असं का म्हणते आहे काही कळत नव्हते.
    तितक्यात अमन‌ आला आणि म्हणाला ” चला निघुया, वाटेतच मैथिलीच्या आवडत्या ठिकाणी नाश्ता करू.”
    मैथिली – “कुठे जायचे आहे?”
    अमन – तेच तर सरप्राइज आहे राणी ?”
    अमन, मैथिली, सासुबाई, आई बाबा सगळे कुठे तरी जायला निघाले, मैथिली सोडून सगळ्यांना माहीत होते की आपण कुठे जात आहोत. अमनने तशी पूर्व कल्पना दिली होती. वाटेत एका ठिकाणी छान नाश्ता केला आणि नंतर एका अनाथाश्रम मध्ये पोहचले. मैथिलीला काय सुरू आहे काही कळत नव्हते. तिथे गेल्यावर एका सात वर्षाच्या गोड मुलीला अमन मैथिली जवळ घेऊन आला आणि म्हणाला “कोण म्हणतं की तू कधीच आई होऊ शकत नाही, ही तुझीच मुलगी आहे राणी. तू तिला पहिल्यांदा बघत असली तरी हीने तुझ्याच उदरातून जन्म घेतला आहे. आता पर्यंत ती अनाथ म्हणून या आश्रमात राहीली पण आता आपण हिला दत्तक घेऊन आपल्या घरी घेऊन जायचे आहे. हीच आपली मुलगी आहे, निधी नाव ठेवूया का आपण तिचं. आणि आता यापुढे माझी राणी तू उदास राहायचं नाही.? आम्हा सगळ्यांना हे सत्य माहीत आहे आणि मान्यही आहे. निधी बाळ चल आईला हॅपी बर्थडे म्हणा.”
    निधी ,हॅपी बर्थडे आई म्हणताच मैथिली तिला मिठीत घेऊन ढसढसा रडू लागली.
    अमनचे आभार कसे मानावेत, कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते.
    बाबांनी मैथिलीची माफी मागितली आणि म्हणाले “माझ्यामुळे तुला तुझ्या पोटच्या गोळ्यापासून दूर रहावे लागले , पण जे मी केले ते तुझ्या भविष्यासाठी बाळा. मनावर दगड ठेवून मी लेकराला अनाथाश्रमात ठेवले पण आई आणि मी नेहमीच तिला भेटायला यायचो. कुणीही तिला दत्तक घेऊ नये याची खबरदारी घ्यायचो.
    तू खरच खूप भाग्यवान आहेस, तुला अमन जोडीदार म्हणून भेटला, खूप प्रेम आहे त्याच तुझ्यावर, तुझं हरवलेलं आईपण अमनमुळे नव्याने तुझ्या पदरात पडलं. अमन आणि त्याच्या आईचे आई बाबांनी खूप आभार मानले.”
    अमनच्या आईने सगळं समजून घेतलं, मुलगा सुनेचं सुख कशात आहे ते बघून योग्य निर्णय घेतला याचा मैथिलीच्या आई बाबांना अभिमान वाटला.
    मैथिलीला मात्र प्रश्न पडला की हे अमनला कसं कळाल.
    मैथिलीच्या आईने तिला मिठीत घेतले आणि म्हणाली ” त्या दिवशी अमन मुद्दामच घरी आम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांनी तुझी अवस्था सांगितली मला, शिवाय हेही सांगितले की तू कधीच आई होऊ शकत नाही. या गोष्टींमुळे तू स्वतःला दोष देत उदास राहते, डॉक्टरांनी गर्भाशयाच्या इजा विषयी विचारताच तू अस्वस्थ होत रडायला लागली, तेव्हा अमनला कळाले होते की काही तरी कारण नक्कीच आहे जे तू त्यांना सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी मला विश्वासात घेऊन विचारले. मला‌ राहावलं नाही, बाबांच्या भितीने तुझ्या भूतकाळाविषयी शब्द ही काढता येत नव्हता पण ते घरी नाही हे बघून मी अमनला सत्य सांगितले. जे होईल ते होईल पण किती दिवस सगळं लपवायचे म्हणून मी सांगितले. त्याने ते स्विकारले हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. अमनने आईला याची कल्पना दिली, त्यांनीही तुमच्या दोघांच्या प्रेमापोटी ते स्विकारले. तू खरंच नशिबवान आहेस बाळा. आईला आणि अमनला कधीच दुखवू नकोस.”
    मैथिलीला अमन‌ इतकं गोड सरप्राइज देईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.
    आई बाबा अमन सासूबाई निधी सोबत गप्पा मारत होते, सगळे खूप आनंदात होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मैथिलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते. तशीच ती भूतकाळात शिरली.
    मैथिली आणि निनाद कॉलेजमध्ये सोबत शिकायला होते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम. कॉलेज संपल्यावर सगळे मित्र मैत्रिणी कुठे तरी फिरायला गेले. निनादचं प्लेसमेंट झालं होतं आणि नोकरीनिमित्त बेंगलोरला जाणार होता, आता आपण दोघे परत कधी भेटणार म्हणून दोघेही सगळ्यांसोबत फिरायला गेले असले तरी खूप भावनिक झाले होते. अशातच ते एकमेकांच्या खूप जास्त जवळ आले. अशातच मैथिलीला दिवस गेले.  सुरवातीला घाबरून तिने कुणाला काही सांगितले नाही पण नंतर निनादला याची कल्पना दिली. आई बाबांशी बोलून आपण लग्न करू, सत्य आहे ते सांगू म्हणून निनादने तिची समजूत काढली. आईलाही हे कळाले , ती खूप संतापली, आईने तिला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला पण भितीपोटी ती नाकारत होती शिवाय निनाद बाबांशी बोलून लवकरच लग्न करायचं म्हणाला म्हणून आईला विनवण्या करत होती. निनाद आई बाबांना भेटायला आला, बाबांना हा प्रकार कळाला, ते भयंकर संतापले, दोघांनाही नको ते बोलले पण बदनामी नको शिवाय निनाद लग्नाला तयार आहे म्हणून त्यांनी लवकरच दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. बाहेर कुणाला लग्नापूर्वी हे कळू नये म्हणून खबरदारी घेतली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच. निनाद बेंगलोरला परत जात असताना त्याच्या ट्रॅव्हल्स ला अपघात झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. मैथिली झाल्या प्रकाराने हादरली, स्वतः ला संपवायचा विचार करू लागली. आई बाबांना ही परिस्थिती सांभाळणे कठीण झाले होते. ओळखीतल्या डॉक्टर कडे तपासणी केली पण खूप उशीर झाला होता. आई बाबांनी मैथिलीची खूप समजूत काढली. काही महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला पण त्या बाळाला बघून मैथिली भावनिक होऊन खचून जाऊ नये म्हणून भविष्याचा विचार करून बाबांनी बाळाला तिला न दाखवता अनाथाश्रमात ठेवले. बाळंतपणात मैथिलीला खूप त्रास झाला, तिने अनेकदा स्वतः ला करून घेतलेला शारीरिक त्रास, वेदना यामुळे तिची अवस्था नाजुक होती, अशातच तिच्या गर्भ पिशवीला इजा झाली होती. मैथिली बाळा विषयी विचारायची पण बाबांनी तिच्या भविष्यासाठी तिला एवढेच सांगितले की बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे, यापुढे तुझा बाळाशी काही संबंध नाही. तू भविष्याचा विचार कर. यातून बाहेर पडण्यासाठी तिला वर्ष लागले, नोकरीला लागल्यावर काही काळ का होईना ती यातून बाहेर पडली पण मनात या वेदना ताज्या होत्या. हेच ती लग्नापूर्वी अमनला सांगायचं प्रयत्न करत होती पण बाबांचा धाक, बदनामीची भिती यामुळे ती फक्त मनात झुरत होती.
    हा सगळा भूतकाळ आठवत असतानाच निधी तिच्या जवळ आली आणि हात ओढत म्हणाली “आई , बाबा बोलवत आहेत, माझ्या इथल्या मित्र मैत्रिणी सोबत आपण केक कापायचा आहे. चल पटकन.. “

    मैथिली निधीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अश्रू सांभाळत उठून तिच्या बरोबर जाऊ लागली. मैथिलीचं हरवलेलं आईपण तिला अमनमुळे नव्याने लाभलं.?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा.

    अशाच नवनवीन कथा, माहिती वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका ?

    © अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

  • हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का. अशातच नकळत तिचा आणि अमन‌चा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.
    मैथिली आई वडीलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, घरकामात तरबेज, शिकलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई वडिलांसोबत पुण्यातच राहायची, वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. अमन आणि मैथिलीची भेट एका कंपनीच्या कॉन्फरन्स मध्ये झाली. दोघेही आपापल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आलेले. मैथिलीचे प्रेझेंटेशन, तिचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास बघून अमन तिच्या अगदी प्रेमात पडला. अशीच दोघांची ओळख झाली, हळूहळू मैत्री झाली.
    अमन कॉलेजमध्ये असताना त्याचे वडील अपघातात गेले तेव्हा पासून घरी आई आणि अमन दोघेच. अमन हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला समजुतदार मुलगा.
    मैथिलीची आणि अमनची चांगली मैत्री झाली.
    त्याला मैथिली सोबत बोलायला, तिच्या सोबत वेळ घालवायला आवडू लागले. दोघांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अमन तिच्या प्रेमात पडला. एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. त्यावर काही उत्तर न देता ती म्हणाली ” अमन , मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायला नक्कीच आवडेल पण त्यापूर्वी काही तरी तुला सांगायचे आहे..”
    मैथिलीचं बोलणं मध्येच थांबवत अमन‌ म्हणाला “कम ऑन मैथिली, आता पण बिण काही नाही.. तुला मी आवडतो ना..तुला आवडेल ना माझ्यासोबत आयुष्य घालवायला..मग झालं..मी आजच आई सोबत बोलतो.‌‌.तुझ्या घरी आपल्या लग्ना बद्दल बोलून पुढे ठरवतो.. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर..”
    मैथिलीने त्यावर फक्त होकारार्थी मान हलविली.
    अमनने आईला मैथिली विषयी सांगितले, आईला फोटो वरूनच ती खूप आवडली. दोघांनी मैथिलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला. आपल्या मुलीवर इतकं प्रेम करणारा मुलगा शिवाय सगळ्या गोष्टीं सुयोग्य असल्याने तिच्या आई वडिलांनी लग्नाला परवानगी दिली. लवकरच लग्नाची तारीख ठरवली.
    मैथिलीला मात्र अमनला भूतकाळा बद्दल सगळं सांगायचं होतं, त्याला अंधारात ठेवून लग्न करायचं नव्हतं , त्याविषयी ती आई बाबांशी बोलली तेव्हा बाबांनी तिला खडसावले “भूतकाळ आता विसरून जा, त्याविषयी फक्त आपल्याला तिघांना माहीत आहे परत सगळ्या गोष्टींमुळे बदनामी नको.शिवाय सत्य परिस्थिती कळाल्यावर अमन लग्न करायला नाही म्हणाला तर.. त्याच्या सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही.. भूतकाळात जे झाले तो एक अपघात होता पण त्यामुळे आता पुढचं आयुष्य त्या विचारात घालवू नकोस.”
    आईला आणि मैथिलीला बाबांचं म्हणनं पटत नसतानाही त्या काही करू शकत नव्हत्या.
    आता पुढील आयुष्य अमनसोबत आनंदात घालवायचं हा विचार करून मैथिली लग्नाला तयार झाली.
    दोघांचे लग्न धुमधडाक्यात झाले, माहेरी सासरी मैथिलीचे खूप कौतुक झाले, या सगळ्यात ती भूतकाळात झालेल्या गोष्टी पूर्ण पणे विसरून गेली. सुरवातीचे दोन वर्ष आनंदात गेले. नंतर दोघांनाही बाळाचे वेध लागले. पण काही केल्या आनंदाची बातमी मिळत नव्हती, बर्‍याच टेस्ट केल्या, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता.
    आता मात्र मैथिलीला भूतकाळातील गोष्टींचा त्रास व्हायचा, आपल्या चुकीमुळे अमनला आपण आनंदी करू शकत नाही हे तिला बोचत होते. सतत स्वत:ला दोशी ठरवत ती उदास राहू लागली. अमन तिला खूप समजावून सांगत होता पण तिला मात्र स्वतः आईपण हरवल्याची सल मनात बोचत होती.
    अमनला आता खरं काय ते सांगून मोकळं व्हावं असं सारखं वाटत होतं पण बाबांची भिती शिवाय पुढे काय हा विचार करून ती इतके वर्ष स्तब्ध होती.
    काही वेळाने अमन घरी आला. मैथिलीने घाबरतच त्याला विचारले “अमन‌ तू आई बाबांकडे गेला होता, काही काम होतं का…”
    अमन हसतच म्हणाला “हो, एका मित्राचा फोन आला.. त्याला भेटायला गेलो..आई बाबा तिकडे जवळच राहतात ना म्हणून मग आई बाबांना तुझ्या बर्थडे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेलो होतो, आई एकट्याच होत्या घरी. बाबा नाही भेटले.
    पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे हे विसरली वाटतं माझी राणी..किती उदास असते तू हल्ली, सतत विचारात.. म्हणून म्हंटलं यावेळी बर्थडे ला छान प्लॅन करू.. आई बाबांना इकडे बोलावू..तुला फ्रेश वाटेल..पण हा त्याआधी मला एक दिवस जरा बाहेरगावी कामानिमित्त जावे लागेल.”
    मैथिलीला ऐकून आश्चर्य वाटले..आनंदही झाला… अरे हा माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात..अमन किती लक्षात ठेवतो..किती प्रेम करतो माझ्यावर.. त्याला काही कळाले नाही हे बघून ती जरा शांत झाली पण भूतकाळाविषयी विचारचक्र मात्र सुरू होतेच.
    काही महिन्यांपूर्वीच मैथिलीने तब्येतीमुळे म्हणून नोकरी सोडली होती. अमन कामानिमित्त बाहेर गावी गेला. घरी सासूबाई आणि मैथिली दोघीच होत्या. अमनने सासूबाईंना सांगीतल्या प्रमाणे त्या मैथिलीला वाढदिवसाचा नवीन ड्रेस घ्यायला बाहेर घेऊन गेल्या. दोघींनी छान शॉपिंग केली, काही वेळासाठी का होईना पण मैथिली आनंदात होती. ते पाहून सासूबाईंना समाधान वाटले.
    घरी परत आल्या‌ त्याआधी अमन घरी तयार होता. खूप सारे गिफ्टस्, मिठाई, फुलांचा गुच्छ घेऊन तो आलेला. सगळं बघून मैथिली खूप खुश झाली. तिने पटकन अमनला मिठी मारली. त्यांचं प्रेम बघून सासुबाई मनोमन आणि गालातल्या गालात हसू लागल्या.
    अमन मैथिलीला म्हणाला ” उद्या तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक मस्त सरप्राइज देणार आहे..ते बघून तू अजूनच आनंदी होशील.. कदाचित परत माझी राणी मला उदास दिसणार नाही..”
    ते ऐकताच मैथिली दचकली. असं काय सरप्राइज आहे अमन… अडखळत बोलली..
    ते तर उद्याच कळेल, अमन हसत म्हणाला.
    रात्री काही केल्या मैथिलीला झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती.

    अमनने मैथिली साठी काऊ सरप्राइज प्लॅन केला आहे..अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ती परत कदाचित उदास राहणार नाही असं अमनला वाटते. या सगळ्याचा मैथिलीच्या भूतकाळाशी काही संबंध आहे का हे जाणून घेऊया पुढच्या भागात म्हणजेच अंतीम भागात.
    तोपर्यंत stay tuned.

    पुढचा भाग लवकरच…

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा.

    अशाच नवनवीन गोष्टी, कथा वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका ??

    © अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..

  • हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग १

    मैथिली आणि अमन, दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करून काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, दोघांच्याही काही टेस्ट दोन दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार होते.
    मैथिलीच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ उडाला होता, भूतकाळात जे झाले त्यामुळे तर काही अडचण येत नसेल ना, या विचाराने ती अस्वस्थ होती. इतक्या वर्षांपासून लपवलेली गोष्ट, आपला भूतकाळ सगळं जर अमनला कळाले तर अमन आपल्याला सोडून तर देणार नाही ना.. त्याला काय वाटेल..आपणं खूप मोठी चूक केली का अमनला अंधारात ठेवून..अशे अनेक प्रश्न मैथिलीला त्रस्त करीत होते.
    दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले, डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितले की मैथिलीची गर्भ पिशवी कमकुवत आहे, बाळाच्या वाढीसाठी सक्षम नाही आणि म्हणूनच आता पर्यंत केलेले सगळे प्रयोग अपयशी ठरले आहे. ट्रिटमेंट घेऊनही त्यात पाहिजे तसा बदल दिसून येत नाही, गर्भ पिशवीला काही तरी मोठी इजा झाली असेल तर अशे होते हेही सांगितले. सगळं ऐकून मैथीली खूप घाबरली.
    डॉक्टरांनी जेव्हा तिला विचारले “कधी काही अॅबॉर्शन , काही अपघात अथवा इजा होण्यासारखे काही घडले आहे का” त्यावर मैथिली काही न बोलता रडायला लागली, तिला अस्वस्थ वाटायला लागले. काही सांगितले तर अमनला भूतकाळ कळेल आणि त्याने तो स्विकारला नाही तर…या विचाराने परत मैथिली घाबरली.. तिच्या मनात एक विचार आला की सगळं खरं काय ते सांगून मोकळं व्हावं..जे होईल ते होईल..पण सत्य सांगण्याची हिम्मत होत नव्हती…अशातच दोघेही घरी पोहोचले.. मैथिली जरा शांत झाल की तिच्याशी नीट बोलून पुढे ठरवू म्हणून अमन तिला घेऊन परत आला.

    हॉस्पिटलमधून आल्यापासून सतत रडत होती, सासूबाई आणि अमन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मैथिली मात्र स्वतः ला दोशी ठरवत रडत बसली, मनोमन पश्चात्ताप करत बसली. आपण कधीही आई होऊ शकणार नाही ही गोष्ट तिला कळल्यापासून ती पूर्णपणे खचून गेली.  शिवाय भूतकाळात झालेलं सगळं इतके वर्ष अमन पासून लपवले, काही तरी मार्ग निघेल आणि आईपण लाभेल म्हणून एक आशा मनात ठेवून अमन पासून लपविलेलं कटू सत्य आता समोर आले तर काय.. या विचारांचं ओझं तिला जास्त कमजोर बनवत  होतं.
    अशा विचारातच तिला झोप लागली… काही वेळाने जाग आली, सायंकाळचे सहा वाजले होते.. आदल्या रात्री काळजी करत झोप लागली नव्हती म्हणून आज रडून थकली आणि कधी झोप लागली तिला कळाले नव्हते. उठून चेहऱ्यावर पाणी मारून लगबगीने खोलीच्या बाहेर आली तर अमन घरात नव्हता. सासूबाई स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. मैथिलीला बघून म्हणाल्या “अगं उठलीसं, बस मी मस्त आलं घालून चहा बनवते.. अमन जरा बाहेर गेला आणि तुला झोप लागली तर मला एकटीला काही चहा जाईना. तुझीच वाट बघत होते उठण्याची. माझ्या हाताच्या चहाने बघ फ्रेश वाटेल तुला.. “
    मैथिली मात्र काळजीतच होती, होकारार्थी मान हलवून ती  विचार करू लागली ,किती प्रेमळ सासू आहे माझी, किती काळजी घेतात..सून‌ म्हणून कधीच वागणूक नाही..जसा अमन‌ तशी मी असंच समजून मला जीव लावतात आणि मी मात्र त्यांना अंधारात ठेवते आहे.. सासूबाईंना सांगितले सत्य तर त्या समजून घेतील का.. एकदा आई सोबत या विषयी आता बोलायला हवं, ती नाही म्हणाली तरी अमनला आणि सासूबाईंना सत्य परिस्थिती सांगून टाकायची..मनातला गोंधळ कमी होईल..एक ओझं घेऊन किती दिवस जगायचं..पुढे जे होईल ते होईल..आता वेळ आली आहे भूतकाळ पुढे आणण्याची.. हिम्मत करून सगळं काही सांगायचं ठरवत असताना सासूबाई‌ चहा घेऊन आल्या.
    चहा घेताना मैथिलीची समजूत काढत म्हणाल्या ” तुला असं उदास बघवत नाही मैथीली, तू हसत खेळत राहिली तर अमन आणि मी आनंदी राहू. आपण प्रयत्न करतोय पण यश आलं नाही तरी तू हताश होऊ नकोस.. तुला उदास बघून अमनही खचून जाईल.. त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे..तो तुला आनंदात  बघण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.. आणि माझं म्हणालं तर तुम्ही दोघांनी मुलं दत्तक घेतले तरी माझी हरकत नाही..पण तू स्वतःला दोष देत उदास राहू नकोस..”
    मैथिलीला सासूबाईंच्या बोलण्याने एक आधार वाटला.. आपण किती भाग्यवान आहोत हेही जाणवले..
    तू आराम कर..मी करते स्वयंपाक.. असं म्हणतं त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या.
    मैथिलीने खोलीत जाऊन आईला फोन केला तेव्हा कळाले की अमन मैथिलीच्या घरी‌ गेलेला आहे.. तेव्हा तू तब्येतीची काळजी घे बाळा.. आराम कर..अमन आलेत त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवते, तुझ्याशी नंतर बोलते म्हणून आईने फोन बंद केला..ते ऐकून तिला धक्काच बसला..
    आई बाबा अमनला खरं काय ते सांगणार तर नाही ना… अमनला सत्य कळाले तर पुढे काय या विचाराने परत मैथिली हैराण झाली, नकळत दोघांचा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.

    अमन आणि मैथिलीची भेट कशी झाली.. मैथिलीचा भूतकाळ काय आहे..ती काय आणि का लपवते आहे ..ती अमनला सत्य सांगेल का.. त्यावर अमनची प्रतिक्रिया काय असेल हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागांमध्ये… तोपर्यंत stay tuned….

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका… ?

    © अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… अंतीम भाग

    कांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे नीलम दुखावल्या जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला.
    आॅफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता. फोन उचलताच ती म्हणाली” संजय फोन कट करू नकोस, मला खूप गरज आहे मदतीची, माझं बोलणं ऐकून घे. मी परत तुला त्रास देणार नाही.” संजयने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही फक्त ती काय म्हणतेय ते तो ऐकत होता.
    कांचन म्हणाली “संजय, मला फोनवर सविस्तर बोलता येणार नाही. मला माहित आहे तू माझ्यावर खुप नाराज आहेस. कदाचित मला माफ करणार नाहीस पण माझ्यासाठी नाही तर माझया आई वडिलांसाठी मला एक मदत कर. आता फक्त एवढंच सांगू शकते कि बाबांना मागच्या महिन्यात  हार्ट अटॅक आला, ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर, सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली, एवढेच काय तर हॉस्पीटलचे बील भरायला ही काका तयार नव्हते. आईच्या नावावर काही पैसे होते ते सगळे बाबांच्या उपचारासाठी खर्च झाले. आई बाबांना खूप मोठा धक्का बसला आहे. मी सतत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला ह्या सगळ्यात कुणाचाच आधार नाही. प्लीज मला एवढी एक मदत कर. मला तू एकदा भेटालास तर बरं होईल. सविस्तर चर्चा करता येईल.प्लीज संजय”
    कांचनचं बोलणं ऐकून संजयला खूप वाईट वाटले. आधीच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून तो कांचनला भेटायला तयार झाला. सायंकाळी सहा वाजता एका कॅफे मध्ये भेटायचे ठरले. नीलमला नंतर सविस्तर सांगू म्हणून एका कामानिमित्त बाहेर जातोय, तू घरी जा, आॅफिसमधून निघताना माझी वाट नको बघू. घरी आल्यावर सविस्तर सांगतो म्हणून तो निघाला. भूतकाळात कांचन कशीही वागली असली तरी अशा परीस्थितीत तिला मदत करण्यापासून तो स्वत:ला थांबवू शकत नव्हता.
    नीलमला मात्र संजयच्या वागण्यात बदल जाणवत होता, तो काही तरी लपवतो आहे हे तिला कळत होते. संजयच्या मागोमाग नीलम ही कॅफे मध्ये गेली, जरा लांबूनच पाहिले तर संजय आणि एक सुंदर मुलगी (कांचन) काही तरी बोलत बसलेले तिला दिसले. संजय तर म्हणाला कामानिमित्त बाहेर जातोय, मग ही कोण शिवाय आई सुद्धा म्हणाल्या होत्या कुणी तरी मुलगी संजयला भेटायला घरी आलेली म्हणून. संजय आपल्याला फसवत तर नाही ना, काय संबंध असेल दोघांमध्ये अशा विचारचक्रात नीलम अडकली. तशाच विचारात घरी गेली, संजय सोबत आज काय ते क्लिअर करायलाच पाहिजे असा निश्चय तिने केला.
    इकडे कांचनने  संजयला सगळी परिस्थिती सांगितली पण संजयला प्रश्न पडला की कांचनचा नवरा हिला मदत करत नसेल का.. त्यानं तिला ते विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्या डोळ्यात पाणी आले, तिच्या अश्रूंसोबत शब्द बाहेर पडले “संजय, तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, अगदी मला हवा तसा जोडीदार, भक्कम पैसा, परदेशात नोकरी करणारा, अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार होता तो. आम्ही दोघेही छान मज्जा करायचो पण दोघेही आम्ही चिडखोर, एकही शब्द ऐकून न घेणारे, वर्ष भर सगळं सुरळीत होतं पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले, नंतर किती किती दिवस अबोला, आमच्यातील अंतर वाढत गेलं शिवाय तिथे दोघांची समजुत काढणारं कुणी नव्हतं, वाद, मतभेद इतके वाढले की प्रकरण घटस्फोटावर आलं, त्याला आता मी नको आहे. या सगळ्या गोष्टींचा बाबांच्या तब्येतीवर परीणाम झाला, त्यांना हार्ट अटॅक आला. माझी अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती. काही महिन्यांपूर्वी मी भारतात परत आले. त्यानंतर बाबांच्या उपचारासाठी ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर आणि सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली. एकेकाळी श्रीमंत घराणे आमचं पण आज हातात काही शिल्लक नाही. काकांनी मोठी फसवणूक केली आहे, मला त्यांना शिक्षा द्यायची आहे, खोट्या सह्या घेऊन काकांनी केलेल्या फसवणूकीचा गुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे. आई बाबा सद्ध्या माझ्या मामाच्या गावाला आहेत, मी चांगल्या वकिलांच्या शोधात इकडे आले, इथे कुणी ओळखीचे नाही, विचार करतच त्या दिवशी माॅल मध्ये फिरताना तू दिसला आणि एक आशेचा किरण जागा झाला. यातून बाहेर पडले की मी तुला परत कधी त्रास देणार नाही. पण या सगळ्यात मला प्लीज मदत कर. पुढे मला आई बाबांना खूप आनंदात बघायचं आहे. तूच आहेस जो या परिस्थितीत मला मदत करू शकतो. मी तुला खूप दुखावले आहे, पण कधी काळी आपण चांगले मित्र होतो या नात्याने मला मदत कर.”
    कांचनची अवस्था बघून संजयला वाईट वाटले, तिला शक्य ती मदत करायला तो तयार झाला.
    दोघांनी नीट विचार करून दुसऱ्या दिवशी एका नामांकित वकिलांना भेटण्याचा बेत आखला. सगळं बोलून झाल्यावर संजय घरी आला तर नीलमच मूड बिघडलेला त्याला दिसला. ती खूप संतापलेली होती, चिडूनच तिने विचारले “कोण होती ती अप्सरा जिच्या साठी तू माझ्याशी खोटं बोलला, कामानिमित्त बाहेर जातोय सांगून कॅफे मध्ये गेला.”
    संजयला नीलमच्या प्रश्नावर काय बोलावे कळत नव्हते, त्याने आधी तिचा राग शांत करायचा प्रयत्न केला, तिला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं. नीलमला ऐकून धक्काच बसला, ती रडायला लागली, संजयच्या मिठीत शिरून म्हणाली “तिला मदत करताना ते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना.” संजयच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिला घट्ट पकडून तो म्हणाला “नीलम, तू आयुष्यात आली त्यानंतर तर मी भूतकाळातून बाहेर पडलो. तुझ्यामुळे जगण्याचा नवा अर्थ शिकलो. मी जो प्रेमभंग अनुभवला तो कुणाच्याही वाट्याला येऊ नये, तू तर माझी अर्धांगिनी आहेस. तू माझ्यावर किती प्रेम करते याची मला जाणीव आहे. माझं आता फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरचं प्रेम आहे. राहीला प्रश्न कांचनला मदत करण्याचा तर तिच्या जागी कुणीही असतं तर माणुसकीच्या नात्याने मी मदत केलीच असती. या सगळ्याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही, याची मी खात्री देतो.”
    नीलम संजयच्या कुशीत शिरून म्हणाली‌ “संजय, मी या सगळ्यात तुझ्या सोबत आहे. कांचनला यातून बाहेर काढण्यासाठी मीही तुला मदत करीन. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तू नक्कीच यातून कांचनला सोडवणार.” नीलमला कित्येक वर्षांपासून तिच्या मनात असलेला संजय च्या भूतकाळात बद्दलचा गुंता सुटल्याचे समाधान वाटले. संजयलाही आज नीलमला सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे मन अगदी हलके वाटले. या प्रकारामुळे संजय आणि नीलमचे नाते अजून घट्ट झाले.
    दोघांनी मिळून कांचनला मदत केली, तिला या सगळ्यातून बाहेर काढले. त्यादरम्यान कांचन आणि तिचा पती कित्येक महिने वेगळे राहील्या मुळे त्यांना आपापल्या चुकांची जाणीव झाली. संजयने समजूत काढल्यानंतर कांचनने पुढाकार घेऊन तिच्या पतीची माफी मागितली, त्यालाही कांचन शिवाय एकटेपणा जाणवत होता पण मीपणामुळे तो पुढाकार घेऊन कांचनशी बोलत नव्हता. कांचनने स्वत: फोन केल्यावर तो कांचनला घ्यायला भारतात आला. आई बाबांची संपत्ती संजय मुळे त्यांना परत मिळाली शिवाय नीलमने विश्वास ठेवून संजयला मदत केल्याने ते शक्य झाले.
    कांचन पतीसोबत परत गेली, सगळयांनी संजयचे खूप कौतुक केले, आभार मानले. नीलमची मान आनंदाने आणि गर्वाने ताठ झाली.

    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग २

    कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला, नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. नीलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते. आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या नीलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला. आपल्या आयुष्यात आता नीलमच सगळं काही आहे हे त्याला कळत होते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याने नीलम सोबत काही दिवस गोव्याला फिरायला जायचा बेत आखला. आॅफिसमध्ये रजा घेऊन पाच दिवसांसाठी दोघेही गोव्याला गेले, तिथे छान मज्जा केली. नीलम ही खूप आनंदात, उत्साहात होती. पाच दिवसांनी परत आल्यावर संजयला आई कडून कळाले की त्याला भेटायला कांचन घरी येऊन गेली, तिला काही तरी मदत हवी आहे आणि त्यासाठी ती आली होती शिवाय संजय चा फोन नंबर ही घेऊन गेली. ते ऐकताच संजय हादरला. ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गोष्ट परत परत त्याच्या जवळ येत होती. संजयच्या आईला कांचन त्याच्या सोबत शिकायला होती एवढेच माहीत होते त्यामुळे ऑफिसशी निगडित नोकरी संबंधित काम असेल म्हणून त्यांनी फार मनावर घेतले नाही. या सगळ्या प्रकाराने नीलमही गोंधळली, कांचन कोण आहे, कशासाठी घरी आली, तिचं संजयकडे काय काम आहे हे प्रश्न तिला त्रास देत होते. संजयला संधी साधून याविषयी विचारले पाहिजे असा विचार नीलम करू लागली.
    अशा परिस्थितीत काय करावे संजयलाही कळत नव्हते. नीलमला सुद्धा याविषयी अंधारात ठेवायचे नव्हते. योग्य वेळी नीलमला याविषयी सांगायचे अशे संजयने ठरविले.
    रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागत नव्हती. नकळत तो भूतकाळात शिरला.
    कांचन आणि संजय शाळेपासून एकत्र शिकायला होते, काॅलेजलाही एकत्र. कांचन श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, हुशार,आत्मविश्वास तिच्या नसानसात भरलेला, कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही अशा विचारांची. तिच्या मीपणा असलेल्या स्वभावामुळे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. संजय गरीब घराण्यातील शांत स्वभावाचा समजुतदार मुलगा, तिच्या अल्लड स्वभावाची जाणीव त्याला होती, तिच्या घरी तिचे जास्त प्रमाणात लाड पुरवले जातात त्यामुळे ती हट्टी आहे हे त्याला माहीत होते. दोघांची शाळेपासून चांगली मैत्री होती. कुठलीही गोष्ट असो कांचन संजय पासून लपवत नव्हती, दोघेही अगदी बेस्ट फ्रेंड्स. शाळेत असताना अभ्यासातही संजय कांचनला मदत करायचा. संजयचा मित्र परिवार ब-यापैकी मोठा पण कांचन अगदी जवळची मैत्रीण.
    शाळेत कुठल्याही स्पर्धा असो किंवा नृत्य, गायन स्पर्धा.. दोघेही सोबतच. बारावीच्या परीक्षेत संजय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दोघांनाही योगायोगाने एकच काॅलेज मिळाले.
    सुरवातीला कांचनला फक्त संजय हा एकच जवळचा मित्र पण आता कॉलेजमध्ये तिला तिच्यासारख्या घराण्यातील मित्र मैत्रिणी मिळाले, तिचा एक ग्रुप झाला, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीज, सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे सुरू झाले. संजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती, तो पार्टीज सारख्या गोष्टी शक्यतो टाळायचा. कांचनला मात्र जीवन शक्य तितकं एॅंजाॅय करायला आवडायचं, ती संजय सोबतही वेळ घालवायची पण त्यांच्या मैत्रीत एक अंतर पडत होतं. संजयला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं. कांचन आपल्या पासून दूर जात आहे ही गोष्ट त्याला खूप बोचत होती.
    नकळत संजय पूर्णपणे कांचनच्या प्रेमात बुडाला होता. कांचनला एकदा मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत, तिचं प्रेम नसेल तरी या मैत्रीमध्ये अंतर पडता कामा नये हे सगळं एकदा कांचन सोबत बोलायला हवं नाहीतर ती आपल्या पासून दूर जाईल अशी भिती त्याला वाटत होती. कांचनला कुणीही मित्र मैत्रिणी नसताना प्रत्येक परीस्थितीत संजय सोबत असल्याने ती आपल्याला दुखावणार तरी नाही याची त्याला खात्री होती.
    खूप हिम्मत करून एक दिवस संजयने कांचनला भेटायला बोलावले, तीही लगेच आली.
    क्षणाचाही विलंब न लावता संजयने तिला सांगितल “कांचन, आपण दोघे बालपणापासून सोबत आहोत, एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत आलो, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस, आता मात्र आपल्या मैत्रीत एक अंतर पडत आहे, मला त्याचा खूप त्रास होतो. मला तू खूप आवडतेस कांचन, तू माझ्यापासून दूर गेलेली मला सहन होत नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. “.
    संजयच्या बोलण्यावर कांचन मिश्कीलपणे हसत म्हणाली ” कमाॅन संजय, हा काय बालीशपणा. आपण चांगले मित्र आहोत पण मला तुझ्या विषयी असं काहीच वाटत नाही. माझे स्वप्न खुप वेगळे आहे, मला जीवनात खूप काही करायचे आहे, आधी मला कुणी मित्र मैत्रिणी नव्हते पण आता माझा छान ग्रुप आहे, आम्ही छान मज्जा करतो. तुला हे सगळं आवडत नाही त्यात मी काही करू शकत नाही. शिवाय मी खूप प्रॅक्टिकल विचारांची आहे. मला तुझ्या सोबत आयुष्य घालवणे शक्य नाही कारण तुझी स्वप्न, तुझी आर्थिक परिस्थिती माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला छान वर्ल्ड टूर करायचा आहे, पार्टीज , शॉपिंग, एॅंजाॅयमेंट सगळं जे मला आवडतं ते तुला जमणार नाही तेव्हा तू माझा विचार सोड. आपल्या मैत्रीचा प्रवास इतकाच होता असं समज.”
    एवढं बोलून कांचन निघून गेली. प्रेमाचा स्वीकार नाही केला ठिक आहे पण इतक्या वर्षांच्या मैत्रीचा प्रवास असा अचानक संपवणे कितपत योग्य आहे. तेही अशा प्रकारे भावना दुखावून. आता गरीब परिस्थिती आहे पण ती बदलू तर शकतेच, कांचनचा इतका अविश्वास असेल असं संजयला कधीच वाटले नव्हते. तो तिच्या बोलण्याने खूप दुखावला.
    त्यानंतर कांचनने संजयला टाळायला सुरू केले, बोलणे बंद केले, या सगळ्याचा संजयला खूप त्रास होत होता. कांचनला मात्र काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या आयुष्यात खुश होती.
    या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजयला खूप वेळ लागला, बालपणापासूनच्या तिच्या आठवणी, सोबत घालवलेले गोष्ट क्षण त्याच्या मनात घर करून बसले होते. तिने त्या सगळ्यांचा क्षणात चुराडा केला होता.
    यातू्न स्वतःला कसं बसं सावरुन संजयने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले, चांगल्या कंपनीत त्याचं प्लेसमेंट झालं.
    लवकरच नोकरी सुरू झाली, घरची परिस्थिती बदलायला वेळ लागला नाही. त्याला हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर पटापट प्रमोशन मिळत गेले. मनात मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या होत्या. कांचनने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि ती परदेशात गेली एवढंच त्याला एका मित्राकडून कळालं होतं.
    त्यानंतर नीलम त्याच्या आयुष्यात आली आणि त्या आठवणीतून तो बाहेर पडला.
    पण अचानक अशा प्रकारे कांचनचं आयुष्यात परत येणं, मदत मागनं त्याला भुतकाळात ओढून नेत होतं.
    कांचनच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने संजयला मदत मागितली. तिचं अशा अचानक आयुष्यात येण्याने संजय आणि नीलमच्या नात्यात काही अंतर येयील का..नीलमला हे कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग लवकरच… तोपर्यंत stay tuned..
    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग १

    नीलम आणि संजय, एक आनंदी , सुखी जोडपं. वर्षभरापूर्वी लग्न झाले. संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि नीलमही त्याचं कंपनीत नोकरीला. संजय नेहमी कामात मग्न असायचा, अतिशय हुशार, गरीब परिस्थितीतून वर आलेला. जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा, कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले. नीलम बडबडी, दिसायला साधारण पण बोलण्यात गोडवा, मेहनती मुलगी. तिथे नोकरीला लागल्यापासून नीलमला संजय आवडायचा, ती स्वतः हून त्याच्याशी बोलायची संधी शोधायची. तोही तिला कामात मदत करायचा, नीलमच्या स्वभावामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. संजय क्वचितच हसायचा आणि नीलम कायम त्याला हसवायचा प्रयत्न करायची. संजय मुळातच इतक्या गंभीर स्वभावाचा आहे की काही कारणाने तो असा गंभीर, आपल्याच विश्वात मग्न असतो हा प्रश्न नीलमला पडायचा, याविषयी ती इतरांनीही विचारायची पण संजयच्या अबोल स्वभावामुळे कुणालाही काही माहित नव्हते. संजयच्या अबोल राहण्याच रहस्य जाणून घेण्यासाठी नीलम खूप प्रयत्न करायची. ऑफिसमध्ये नीलम ही संजयची पहिलीच मैत्रिण.
    काही महीन्यात दोघांची छान मैत्री झाली तेव्हा नीलमने संजयला सुट्टीच्या दिवशी शाॅपींगला सोबत जाण्यासाठी आग्रह केला, बराच वेळ आग्रह केल्यावर संजय तयार झाला. ठरल्याप्रमाणे दोघांनी सोबत शॉपिंग केली, डिनर केला नंतर संजय नीलमला घरी सोडायला आला. आवडत्या व्यक्तीबरोबर छान वेळ घालवल्यामुळे नीलम जाम खुश होती. असेच नीलमच्या आग्रहाखातर संजय तिच्यासोबत वेळ घालवू लागला, त्यालाही तिची सोबत आवडायला लागली.
    एक आठवड्यानंतर संजयचा वाढदिवस होता, नीलमने आॅफिसमध्ये छान सरप्राइज प्लॅन केला. संजय पहिल्यांदा आॅफिसमध्ये सगळ्यांसोबत एंजॉय करत होता. कित्येक वर्षांनी त्यानी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आज दिसत होता. आॅफिसनंतर संजयने स्वतः नीलमला डिनर साठी विचारले, नीलम तर एका पायावर तयार झाली. आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हरकत नाही असं मनोमन ठरवून नीलम छान तयार होऊन संजयला भेटायला गेली. संजय स्वतःहून मनातील भावना कदाचित व्यक्त करणारं नाही तेव्हा आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार करून नीलम छान लाल रंगाचा गुलाबाच्या फुलाचा गुच्छ जाताना घेऊन गेली. दोघांनी सोबत डिनर केला आणि परत जाताना नीलमने संजयला प्रपोज केले, आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले. संजयला नीलमच्या मनातील भावना आधीच कळल्या होत्या, त्याच्यावर नीलम इतकं मनापासून प्रेम करते तिला दुखवायचे नाही हे संजयने मनोमन ठरवले होते कारण प्रेमभंग काय असतो हे त्याने जवळून अनुभवले होते. संजयने नीलमच्या प्रेमाचा स्वीकार केला, पण मनात अजूनही कांचनच्या आठवणी ताज्या होत्या. आता पुढचं आयुष्य नीलम सोबत आनंदात घालवायचा निर्णय त्याने घेतला. नीलमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लवकरच संजय नीलमच्या घरी भेटायला गेला, दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि जन्मोजन्मीच नातं बांधून दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. आनंदात संसार सुरू झाला. संजय हसतखेळत राहायचा, पूर्वीचा गंभीर संजय आता आनंदी, उत्साही असायचा.
    नीलमला खूपदा वाटायचे की संजयला त्याच्या भूतकाळाविषयी विचारावे, कोणत्या कारणाने तो इतका गंभीर, उदास असायचा जाणून घ्यावं पण संजयला ते आवडले नाही तर गोड नात्यात काही दुरावा यायला नको म्हणून तिची त्याविषयी विचारायची हिम्मत होत नव्हती.
    एकदा शाॅपींग मॉल मध्ये दोघे फिरत असताना संजयला अचानक समोर कांचन दिसली , तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास दिसत नव्हता शिवाय एकटेपणा न आवडणारी ती आज एकटीच फिरत होती. कांचननेही संजयला पाहिले पण संकोचाने ती भराभर नजरेआड गेली. संजयने ते लगेच घेरले, आपल्याला पाहून कांचन लपली हे त्याला लक्षात आले शिवाय नीलम सोबत असल्याने तो गुपचूप तिथून निघून गेला. त्याच्या मनात मात्र विचार चक्र सुरू झाले,  इतक्या वर्षांनी आज कांचन इथे कशी, ती तर परदेशी गेली होती. त्याच्या मनात तिच्या आठवणी परत नको असताना जाग्या झाल्या. आता याविषयी विचार करायला नको म्हणून संजय स्वतःला नीलम मध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा, तिला शक्य तितका जास्त वेळ द्यायचा.
    एक दिवस अचानक संजयला फेसबुकवर कांचनचा मॅसेज आला “संजय, मी खूप अडचणीत आहे. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मला माहित आहे तुझ्या आयुष्यात मला आता काही स्थान नाही पण मला फक्त एकदा मदत कर. मी परत तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. ”
    कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला. कितीही नाही म्हटले तरी कांचनचे परत अशा प्रकारे समोर येणे संजयला विचार करायला भाग पाडत होते.

    कांचन आणि संजयच काय नातं होतं,  नीलम आयुष्यात येण्यापूर्वी संजय का इतका गंभीर, उदास असायचा, कांचन कुठल्या अडचणीत आहे, तिला संजय कडून काय मदत पाहिजे आहे हे सगळं पुढील भागात जाणून घेऊच. तोपर्यंत stay tuned..
    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

  • जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग ३ (अंतिम)

    1.  

    मागच्या भागात आपण पाहीले की अनघासोबत रितेश वाइल्ड लाइफ फोटोग्राफी साठी जातो, असंच रोजचं त्याच रूटीन बनतं. पाहता पाहता त्याला अमेरिकेत परत जाण्याची वेळ जवळ येत असते. एकत्र वेळ घालवून रितेश अजूनच अनघाच्या प्रेमात पडतो. अनघाचं सगळं लक्ष मात्र सध्या करीअर वर असतं. आता पुढे.

    रितेश अनघाला सांगतो “आजचा दिवस संपूच नये असं वाटत आहे. माझी सुट्टी संपली, उद्या मला सकाळीच परत जायला निघायचे आहे. अनघा तुझ्यामुळे माझी सुट्टी खूप मजेत गेली, एक वेगळाच अनुभव अनुभवला मी, आयुष्यभर लक्षात राहील असा. Thank you so much ? “
    अनघा त्यावर हसत म्हणाली ” झालं तुझं आभारप्रदर्शन ? कमॉन रितेश, हे असं औपचारिक होऊ नकोस, आपण चांगले मित्र आहोत, मैत्री मधल्या आठवणी मजेशीर असतातच.. पुढच्या सुट्टीला आल्यावर अजून नवीन जागी घेऊन जाते तुला..आता तर हस ?”
    अनघा‌ आता परत कधी भेटणार म्हणून रितेश भावनिक झाला, तो तिच्या प्रेमात बुडाला होता, पण अनघाला सांगायची हिम्मत होत नव्हती.
    रितेश अमेरिकेत परत गेला पण अनघाच्या विचारातून काही केल्या तो बाहेर पडत नव्हता. मी इकडे असताना अनघाच्या आयुष्यात दुसरा कुणी आला तर..या विचाराने अस्वस्थ होऊ लागला. काही झाले तरी अनघा सोबतच लग्न करायचे, तिला‌ मनातलं सगळं सांगायचं असं सारखं मनोमन ठरवून‌ स्वतः चे समाधान करून घ्यायचा.
    इकडे अनघा प्रोजेक्ट मध्ये व्यस्त झाली पण दोन आठवडे रितेश सोबत असल्याने तिला कुठे तरी काही तरी चुकल्यासारखे जाणवायला लागले.
    काय होतं आहे कळत नसलं तरी ती रितेशला मिस करत होती. दोघांचे फोन वर चाटींग सुरू असायचेच.
    एक दिवस अनघाला रितेशचा फोन आला, दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. अनघा तिच्या कामाबद्दल सांगत होती आणि सोबतच म्हणाली “काम मस्त चाललंय, आता प्रोजेक्ट पूर्ण होईल. काही नामांकित फोटोग्राफर ला मी अप्लीकेशन दिलं होतं, सोबत फोटो पाठवले. त्यात एकाने मला मुंबईला बोलावले आहे. माझ्या करिअरचा पहिला टप्पा बहुतेक सुरू होणार. मी खूप एक्साईटेड आहे.
    बरं तुझं काय चाललंय, परत कधी येणार आहेस. तू परत गेल्यावर खूप मिस केलं तुला..तुझं आभारप्रदर्शन आठवून हसू येते मला अजूनही.”
    अनघा सुद्धा आपल्याला मिस करते ऐकताच रितेशला आनंदी आनंद झाला. तो उत्साहाच्या भरात तिला म्हणाला “तू म्हणशील तेव्हा यायला तयार आहे मी, I miss you so much अनघा..”
    अनघाला त्याच उत्तर ऐकून हसू आले आणि मनोमन आनंदही झाला. आपण रितेश साठी किती स्पेशल आहोत हे  तिला जाणवलं. दोघांचे आता दररोज फोन, व्हिडिओ कॉल, चाटींग सुरू झाले.
    अनघा आतुरतेने रितेशच्या फोनची वाट पहायची. दिवसभरात घडलेल्या गमतीजमती, गप्पा रितेशला सांगायची.
    अनघाला मुंबईत नोकरी मिळाली, एका प्रख्यात फोटोग्राफर सोबत ती काम करायला मुंबईत गेली. तिचे स्वप्न पूर्ण होतं होते.
    सोबतच ती रितेशच्या‌ प्रेमात पडली होती पण तिला ते कळत नव्हते. रोजच्या दोघांच्या फोन वर गप्पा सुरू होत्याच.
    काही दिवसांनी अनघाचा वाढदिवस होता. ती आई बाबांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी जाणार होती. आई बाबांसाठी तिनं स्वत:च्या कमाईने छान गिफ्ट घेतले. अगदी उत्साहात घरी जाण्याची तयारी सुरू होती पण मागच्या दोन दिवसांपासून रितेशने तिला फोन केला नव्हता. मॅसेज वर इतकाच रिप्लाय आला “काही दिवस मी कॉन्फरन्स मध्ये व्यस्त असणार आहे तेव्हा फोन करू शकणार नाही. त्यानंतर मॅसेजला‌‌ सुद्धा काही रिप्लाय नाही.”
    अनघाला अस्वस्थ वाटू लागले, ती घरी जायला निघाली पण तिचं मन मात्र रितेशला मिस करत होतं. फोन नाही तर साधा मॅसेज तरी करायचा ना.. इतकं काय बिझी असतात लोकं. आपण रितेश मध्ये गुंतलो आहे हे तिला जाणवत होते. ती त्याच्या विचारातच घरी पोहोचली.
    आई बाबा अनघाला‌ बघून खूप आनंदी होते, आईला तिच्या मनातली घालमेल कळत होती. नक्कीच रितेशच्या विचाराने अनघा बेचैन आहे हे आईने ओळखले.
    दुसऱ्या दिवशी अनघाचा वाढदिवस होता, आज रितेश नक्कीच फोन करणार याची तिला खात्री होती, सतत ती त्याच्या फोनची वाट पहात होती.
    आईने तिचे औक्षवान केले, जेवणात अनघाच्या आवडीचा मेनू बनवला पण अनघा मात्र नेहमी वाढदिवसाला जशी उत्साहात असते तशी आज नव्हती. आई बाबांनी तिच्या जुन्या मित्र मैत्रिणींना सायंकाळी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित केले. अनघा मात्र रितेशने फोन कसा केला नसेल, माझा वाढदिवस माहीत कसा नसेल अशा विचाराने बेचैन होती. रितेशच्या‌ आई बाबांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या, न‌ राहावून अनघाने त्याच्या आईला विचारले ” काकू, रितेश सोबत काही बोलून झालं का इतक्यात. ” त्यावर त्या म्हणाल्या ” हो कालच रात्री बोलले मी त्याच्याशी. का गं, तुमचं बोलणं चालणं सुरू आहे वाटतं ? असंही मिश्कीलपणे तिला चिडवत म्हणाल्या. “
    अनघाला आता अजून विचारात पडली, आईला तर फोन केला मग माझ्या सोबत का बोलत नाहीये रितेश, तो मला टाळत तर नाही ना..
    सायंकाळी ठरल्याप्रमाणे सगळे मित्र मैत्रिणी, अनघाची मावशी सगळे घरी  वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले, अनघा वर वर आनंदी दिसत असली तरी ती सतत रितेशचा विचार करत होती.
    घरी बाबांनी मस्त सजावट करून सुंदर केक आणला. केक कापणार तितक्यात समोरून आवाज आला ” मला सोडून केक कापणार आहेस अनघा तू..”
    बघते तर काय रितेश आणि त्याचे आई बाबा फुलांचा गुच्छ आणि हातात गिफ्ट घेऊन उभे.
    अनघाचा आनंद ओसंडून वाहू लागला, धावत जाऊन ती त्याला बिलगली, डोळ्यात आनंदाश्रु आले रडतच त्याला म्हणाली ” तू खूप वाईट आहे..का मला फोन‌ केला नाहीस, किती काळजी वाटली मला..एक एक क्षण जड जात होता तुझ्या शिवाय, एकही क्षण तुझ्या विचारांतून मला बाहेर येवू देत नव्हता… तुला कळत कसं नाही मी प्रेमात पडलीय तुझ्या, नाही राहू शकत तुझ्याशिवाय..I love you..I missed you so much..”
    अनघाची आई म्हणाली “अनघा अगं आत तर येवू दे त्यांना..”
    आईच्या बोलण्याने अनघा भानावर आली. आपण सगळ्यांसमोर काय काय बोललो, चक्क प्रेमाची कबुली दिली..अनघा लाजून चूर झाली आणि पळतच तिच्या खोलीत पळाली. रितेश सुद्धा लाजला‌, आई बाबांना आनंदही झाला. मावशी अनघाला बाहेर घेऊन आली.
    रितेश सोबत अनघाने केक कापला आणि नंतर रितेशने गुडघ्यावर बसून अनघाचा हात हातात घेऊन तिला लग्नाची मागणी घातली. सुंदर अशी एक अंगठी तिच्या बोटात घातली. अनघा मनोमन इतकी आनंदी होती की एखाद्या स्वप्नात असल्याचा भास तिला होत होता. तिने होकारार्थी मान हलवून त्याच प्रपोजल स्विकारलं आणि सगळ्यांनी टाळया वाजविल्या. मागून आई म्हणाली ” अनू, हि घे अंगठी , रितेशच्या बोटात घाल. आम्हाला रितेशने सांगितले होते तो येणार असल्याचे आणि हा सगळा प्लॅन त्याचाच तर आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा अंगठी आणून ठेवली. “
    अनघाला रितेशचं सरप्राइज खूप आवडलं. अशा प्रकारे जुळून आल्या रेशिमगाठी… दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. पुढे तयारी सुरू झाली त्यांच्या लग्नाची.

    समाप्त.

    अनघा आणि रितेशची ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा 

    नावासह शेअर करायला हरकत नाही 

    © अश्विनी कपाळे गोळे