Tag: Marathi blogs

  • जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २

     

    मागच्या भागात आपण पाहीले की अनघाला मुलगा बघायला यायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनघा आईने वाढदिवसाला घेतलेला लाल पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. आईच्या सांगण्यावरून कपाळावर इवलिशी टिकली लावली. ती कधीच मेकअप करायची नाही आणि आजही नाही पण तिचं नैसर्गिक सौंदर्य आज अजूनच उठून दिसत होतं.
    उंच बांधा, चेहऱ्यावर आत्मविश्वास, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, नाजूक ओठ, चिरेदार नाक आणि त्यावर तिला केसांचा बॉयकट अगदी शोभेसा दिसायचा.
    ठरलेल्या वेळेत मुलगा , आई‌ वडील, सोबत अनघाची मावशी असे सगळे घरी आले.
    अनघा अजून मनातून या गोष्टींसाठी तयार नव्हती तेव्हा ती आईचं मन राखायला आज सगळं करत होती.
    अनघाला मावशी बाहेर सगळ्यांना भेटायला घेऊन आली. अनघाची ओळख सगळ्यांशी करून दिली.
    मावशी म्हणाली “हा रितेश, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, दोन वर्षांपासून कंपनीतर्फे  प्रोजेक्टसाठी अमेरिकेत राहायला आहे.”
    अनघाने रितेश‌कडे बघितले आणि दोघांची नजरानजर झाली, अनघाने स्मितहास्य केले.
    रितेश उंच पुरा, रूबाबदार, डोळ्यांवर चष्मा, दाढीची फ्रेंच कट, एकंदरीत देखणा. अनघा अधूनमधून त्याच्या कडे बघत होती आणि तिला लक्ष्यात आले की रितेश एकसारखा अनघाला बघतो आहे. तिचे लक्ष गेले की तो दुसरीकडे बघायचा आणि परत अनघाकडे.
    ते पाहून अनघाला वाटले ह्याला जर आपण आवडलो असेल तर काही खरं नाही, आई लगेच मागे लागेल लग्न ठरवायच्या. अनघाच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तितक्यात रितेश चे बाबा म्हणाले ” तुम्हा दोघांना काही बोलायचे असेल तर एकांतात बोला. ”
    ते‌ ऐकताच मावशी दोघांना घेऊन अनघाच्या खोलीत गेली. तिथेच दोघांसाठी कॉफी पाठवली आणि मनसोक्त गप्पा मारा म्हणत बाहेर निघून आली. रितेशची नजर काही केल्या अनघाच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती, न राहावून अनघा हसत  म्हणाली “हॅलो जेंटलमॅन, इतकं काय निरिक्षण करत आहेस.”
    त्यावर रितेश म्हणाला “You are beautiful”
    अनघा पहिल्यांदा जरा लाजली आणि स्वतःला सावरत म्हणाली “हे बघ, मला आता लग्न करायचं नाही, आईच्या आग्रहाखातर मी आजच्या भेटीसाठी तयार झाली. तू नाही म्हणून सांग ना‌ तुझ्या घरच्यांना. माझं करिअर सेट होत पर्यंत मी काही लग्न वगैरे नाही करणार. माझं लहानपणापासून स्वप्न आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे. असं अर्ध्यावर सोडून मला‌ लग्नाच्या भानगडीत नाही पडायचं. प्लीज तू नकार दे मला.”
    रितेश तिच्या बोलण्याने जरा‌ गोंधळला पण तिचा हा स्पष्टवक्तेपणा, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द बघून अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला.
    रितेश अनघाची मज्जा घेत म्हणाला “तू किती सॉलिड आहेस गं, मनातलं भराभर बोलून मोकळी झाली, I liked it ha… पण मला तू आवडली आहेस मग मी का नकार देऊ, तुला मी नसेन आवडलो तर तू नकार दे हवं तर.”
    अनघाला ते ऐकून जरा मनात चिडचिड झाली, त्याला समजावत ती म्हणाली”अरे , कसं सांगू तुला, माझा छंद, माझं स्वप्न, करीअर एकच आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी. ते पूर्ण होत पर्यंत मी लग्न करणार नाही. तू होकार दिला तर आई मावशी माझं काही ऐकणार नाही, सतत मागे लागतील लग्न लावून देण्याच्या आणि मग मला माझ्या करीअर कडे तितकं लक्ष देता येणार नाही,समजून घे ना”
    अनघा चिडली हे लक्षात येताच रितेश म्हणाला “बरं, मी काय म्हणतो, आपण मित्र तर बनू शकतो ना. मी सांगतो घरी लगेच लग्न करायचं नाही आणि पुढच्या सुट्टीला आल्यावर बघू म्हणून. मग तर झालं…मी खूप मुली बघितल्या पण तुझ्या सारखी तूच..I am impressed अनघा.”
    अनघा ते ऐकून खूश झाली. दोघांची मैत्री झाली आणि ठरलं की घरच्यांशी बोलून लगेच लग्न करायचं नाही असं सांगायचं.
    दोघांनी मस्त गप्पा मारल्या, रितेश तिला म्हणाला ” तू आता फोटोग्राफी साठी जाशील तेव्हा मी सोबत आलो तर चालेल तुला. मी फक्त नोकरी नोकरी आणि नोकरी यातच वेळ घालवतो. पण असा वेगळा अनुभव घ्यावा वाटतो तुला बघुन, चालेल ना‌ मी आलो तर.”
    अनघा त्याला घेऊन जायला तयार झाली आणि सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता तयार रहा‌, मी घ्यायला येईल तुला.

    रितेश आणि अनघा खोली बाहेर येताच दोघांच्याही घरच्यांनी एका होकारार्थी अपेक्षेने त्यांच्या कडे बघितले. रितेश चे बाबा लगेच म्हणाले ” काय मग रितेश, कशी वाटली अनघा.”
    रितेश म्हणाला ” बाबा घरी गेल्यावर बोलू आपण. आता नको.”
    अनघाच्या आईला जरा काळजी वाटली, मनोमन त्या विचार करू लागल्या नक्कीच अनघाने काही तरी म्हंटलं असेल. कित्येक वेळा सांगितलं हिला लगेच अटी घालू नकोस.
    काही वेळाने मुलाकडची मंडळी परत निघून गेली तोच आई अनघाला ओरडली ” अनू, तू काय सांगितलं रितेश ला.. काही बोलली की नुसत्या अटी घातल्या..लग्न न करण्याच्या..”
    अनघा काहीच बोलली नाही..
    तिकडे वाटेतच रितेशने घरच्यांना सांगितले की ” मी लग्न करेल ते अनघाशीच..मला ती पसंत आहे..पण लगेच लग्नाला ती तयार नाही.. आपण तिला जरा वेळ देऊया..”  त्याच्या आई बाबांना पटलं नाही ते म्हणाले ” तयार का नाही.. आणि कशावरून वेळ दिल्यावर ती तुझ्याशी लग्न करेन.. तिने सांगितले का तिला तू पसंत आहे म्हणून..”
    रितेश म्हणाला ” बाबा अहो असं सांगितलं नाही पण मला खात्री आहे जरा वेळ मी तिच्या सोबत घालवला, मैत्री करून एकमेकांना समजून घेतलं तर ती मला नकार नक्कीच देणार नाही.”
    दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने रितेश तिच्या सोबत येणार असल्याचे आईला सांगितले आणि त्याला घ्यायला ती निघाली.
    आईला मनातून आनंदही झाला, चला गाडी जरा रुळावर येत आहे, हळूहळू बदलेल तिचं मन आणि होईल लग्नाला तयार असं स्वतःशी बोलत त्या कामात व्यस्त झाल्या.
    रितेश पहाटेच उठून तयार..अनघा सोबत जंगल सफारी, फोटोग्राफी..तो खूप आतुर झाला होता. अनघा घराबाहेर आली आणि रितेशला फोन केला, रितेश लगेच बाहेर आला..अनघाचा जीन्स टी शर्ट, जॅकेट मधला लूक, तिची बाइक ( स्कुटी), डोक्यावर हेल्मेट बघून जरा वेळ न्याहाळत बसला.
    अनघा त्याला म्हणाली, हे घे हेल्मेट आणि बस पटकन. उशीर होईल.
    तिच्या बोलण्याने तो भानावर आला आणि म्हणाला “मी चालवू का बाइक.”
    अनघा त्याला चिडवत गालात हसत म्हणाली “नको, जंगलाच्या रस्त्यावर तुला नाही जमणार चालवायला.. शिवाय सवय तुटली असेल ना आता गाडी चालवायची..”
    रितेश मागे बसला आणि दोघेही निघाले. काही अंतरावर खूप सारी झाडं, बाजूला एक तळं , पक्ष्यांचा किलबिलाट अशा ठिकाणी ते पोहोचले. अतिशय रम्य वातावरण , गार वारा..रितेश पहिल्यांदा हे अनुभवत होता.
    अनघा सांगत होती,  सकाळी इथे काही पक्षी येतात त्यांचे फोटो काढायचे आहेत मला, सहसा ते पक्षी फारसे दिसत नाही. माझ्या प्रोजेक्ट साठी नक्कीच उपयोगी पडेल ‌
    ती तिचा लांब लेन्स असलेला कॅमेरा सेट करत रितेश सोबत बोलत होती आणि रितेश त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत होता, अनघाची फोटो घेण्याची एकाग्रता, तिचा तो अंदाज सगळं न्याहाळत होता.
    काही वेळ व्यस्त असलेली अनघा म्हणाली “चल आज इतकेच बस..मस्त फोटो मिळालेत बघ…” आणि रितेशला फोटो दाखवू लागली. मग दोघांनी त्यांच्या मैत्रीचा पहिला एकत्र फोटो त्या ठिकाणी काढला.
    ते पक्षांचे अप्रतिम फोटो बघून रितेशला तिचं खरंच कौतुक वाटलं. तिला त्याने प्रश्न केला “तू अशी एकटी फिरतेस नेहमी कि सहकार्‍यांसोबत.. एकटीला भिती नाही वाटत का..”
    अनघा हसत म्हणाली “कधी सहकारी असतात कधी एकटीच..अरे मी कराटे चॅम्पियन आहे.. शिवाय मार्शल आर्ट ही शिकले. सोबत फर्स्ट एड किट सुद्धा असते, कधी काही किरकोळ दुखापत झाली तर उपयोगी पडते.
    रितेश तिच्यावर अजूनच फिदा झाला आणि तिला चिडवत म्हणाला ” बापरे, म्हणजे अकेली लडकी देख के मैने कुछ किया तो मैं पूरा कामसे गया मग तर…?”
    दोघेही त्यावर हसले.
    ती म्हणाली ” चल इथे काही अंतरावर एक धाबा आहे, मस्त मिसळ पाव खाऊन मग पुढे जाऊ.”
    ओके मॅडम म्हणत रितेश अनघाच्या मागे निघाला.
    अनघा सोबत असं मस्त निसर्ग सौंदर्य न्याहाळत फिरायला, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी विषयी जाणून घ्यायला रितेश ला मजा येत होती.
    रोज काही वेळ अनघा सोबत घालवायचं असं त्याचं दोन आठवडे रूटीन झालं होतं. तो दिवसेंदिवस अनघाच्या प्रेमात पडत होता. रितेश ला आता सुट्टी संपल्याने परत जावं लागणार होतं.
    अनघा मात्र अजूनही त्याला एक मित्र मानत होती. तिचं सगळं लक्ष सध्या करीअर वर होतं.

    अनघा आणि रितेशची मैत्री प्रेमात बदलेल का.. अनघा रितेश सोबत लग्नाला तयार होईल का हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    क्रमशः

    पुढचा भाग लवकरच….

    हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा 

    ©अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

     

  • जुळून येती रेशीमगाठी..( एक प्रेमकथा)- भाग १

    “आई, मी निघतेय गं. सायंकाळी उशीर होऊ शकतो, कळवते तुला घरी यायला निघाले की.” अनघा गाडीला चाबी लावतच आईला सांगत बाहेर जायला निघाली.  आई बाबाही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले.
    अनघा आई बाबांना एकुलती एक, अगदीच बिनधास्त मुलगी, तिला पक्षी, प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे तिचे स्वप्न तिला सत्यात उतरवायचे होते. अनघा एक आत्मविश्वासू मुलगी, तिला शोभेसा तिचा बॉयकट, शक्यतो टिशर्ट पॅंट शूज जॅकेट असा तिचा पोशाख असायचा. बाबा तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत करायचे पण आईला मात्र ते फारसं पटत नसलं तरी अनघाची जिद्द आणि बाबांचा पाठिंबा त्यापुढे आईचे काही चालत नव्हते. अनघाचे कॉलेज संपून तिने वाइल्ड लाइफ फोटोग्राफी चा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्या प्रोजेक्ट्स साठी ती शहराबाहेर फोटोग्राफी साठी जात असे.
    असंच आज रविवार असून सुद्धा ती सकाळीच घराबाहेर पडली. आईला तिच्या अशा रूटीन मुळे फार चिडचिड व्हायची.
    न‌ राहावून आई बाबांना म्हणाली, “आता अनघा‌ लहान नाही हो, किती दिवस असं बाहेर बाहेर राहणार. मुलीने जरा घरकामात मदत करावी, घर कसं सांभाळतात समजून घ्यावं, लग्नाचं वय झालं आता तिचं. करीअर ठिक आहे पण हेही महत्त्वाचे आहेच ना. तुम्ही तिला काही म्हणत नाही, माझं काही ती ऐकत नाही कारण बाबा असतात ना पाठीशी घालायला.”
    आईचा मुड काही ठिक नाही याचा बाबांना मॉर्निंग वॉकला जातानाच अंदाज आला होता.
    बाबा त्यावर म्हणाले ” अगं, जबाबदारी पडली की करेल ती सगळं, तू कशाला काळजी करतेस आणि लग्नाचं आताच काय घाई आहे, करीयर होऊ दे तिचं सेट, मग बघूया. खूप काही वय झालं का आपल्या मुलीचं.”
    आईला ते ऐकून अजूनच राग आला. दुपारी अनघाच्या मावशीचा नेमका त्याच दिवशी फोन आला अनघा साठी स्थळ सुचवायला. मावशी म्हणाली ” ताई, आपल्या अनूसाठी साजेसे स्थळ आहे, मुलगा परदेशात नोकरी करतो. घरी एकुलता एक, परिस्थिती चांगली आहे.  त्याची आई आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. मुलगा अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा आहे. अनूला शोधून सापडणार नाही असं स्थळ. पुढच्या आठवड्यात सुट्टीला येतोय तो, त्यांना मी अनू विषयी सांगितले, त्याच्या आईची इच्छा आहे की मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घ्यावा. तू अनूला कल्पना दे आणि भाऊजींना सांग हे स्थळ हातचं सोडू नका.”
    आईने ते ऐकून अजूनच अनघाच्या लग्नाचं मनावर घेतलं आणि बाबांना याविषयी कल्पना दिली. बाबा म्हणाले “अनघाला सांगून बघूया पण घाई नको करायला.”
    आई  चिडून म्हणाली “अहो, बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे, पुढचं पुढे बघू. त्यालाही अनघा आवडायला नको का. तिच्या केसांचा बॉयकट, राहणीमान, तिचे विचार त्यांना पटेल याची काय खात्री. कित्येक वेळा सांगितलं तिला जरा मुलींसारख राहत जा. जरा केस वाढव. इतकं बिनधास्त राहणं बरं आहे का मुलींच्या जातीला‌. मी सांगितले ते तुझ्या दोघांनाही पटत नाही.”
    आईला शांत करत बाबा म्हणाले “तू आधी शांत हो बघू. काळजी करू नकोस, मी बोलतो अनघा सोबत पण मला अजूनही वाटते की घाई नको करायला.”
    बाबांना खात्री होती की अनघा आता लग्नाला नकारच देणार पण आईला वाईट नको वाटायला म्हणून बाबा बोलून गेले.
    सायंकाळी अनघा घरी आली, तिच्या फोटोग्राफी मधल्या दिवस भराच्या गमतीजमती ती आई बाबांना सांगत होती. रात्री जेवण झाल्यावर आईने बाबांना इशारा करून अनघा सोबत लग्नाच्या स्थळा विषयी बोलण्याची आठवण करून दिली.
    बाबा अनघाला म्हणाले “अनू बेटा, तुला आता करीअर सोबतच भविष्याचा, लग्नाचा विचार करायला हवा. लगेच लग्न कर असं म्हणत नाही आम्ही पण जरा आता मनावर घे, तुला कसा मुलगा हवा, तुझ्या अपेक्षा काय आहेत याविषयी जरा विचार कर.”
    बाबांच्या अशा बोलण्याने अनघा जरा गोंधळली आणि तिला हेही लक्षात आले की आईने लग्नाचा विषय काढला असणार म्हणून बाबा असं म्हणत आहेत, ती म्हणाली “बाबा असं अचानक काय लग्नाचं, मला सद्ध्या तरी लग्न नाही करायचं.”
    आई तिला चिडून म्हणाली “मग कधी करणार आहे लग्न तू, अगं जरा विचार कर आता, जरा इतर मुलींसारख राहायला शिक. करीअर सोड नाही म्हणत मी पण सोबत हे सगळं महत्त्वाचं आहे ना.”
    आईचा पारा चढलेला बघून अनघा आईच्या मिठीत शिरून हसविण्याचा प्रयत्न करत म्हणाली “आई तुला मला सासरी पाठवायची किती घाई झाली गं, नको झाली का गं तुला मी. आई अगं मी आता लगेच लग्न नको म्हणते , कधीच नाही करणार कुठे म्हणाली.”
    आई तिला समजावत म्हणाली “अनू , अगं आईच्या काळजीपोटी बोलते मी. योग्य वयात लग्न झालेलं बरं. सरळच सांगते तुला, एक स्थळ आणलं आहे मावशीने, पुढच्या आठवड्यात तू त्या मुलाला भेटावं असं वाटतं आम्हाला. चांगले स्थळ आहे, बघायला काय हरकत आहे.”
    अनघाने बाबांकडे बघितले, बाबांनी इशार्‍याने हो म्हण म्हणून सांगितले. ‌
    अनघा इच्छा नसतानाही होकारार्थी मान हलवून म्हणाली “आई, ठिक आहे, मुलगा बघायला हरकत नाही पण त्याला मी आहे तशीच आवडली तर ठिक आणि माझं करीअर, माझं स्वप्न पूर्ण होत पर्यंत  लग्न उरकून घ्यायची घाई नको हे सगळं मला त्याच्याशी आधी क्लिअर करायचे आहे. हे पटलं तर ठिक नाहीतर नको मला इतक्यात लग्न.”
    त्यावर म्हणाली “अगं किती अटी घालशील, आधी बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. त्यांनी होकार दिला तर मग ह्या गोष्टींचा विचार करू.”

    पुढे काय होते ते बघूया पुढच्या भागात ?

    क्रमशः

    पुढचा भाग लवकरच….

    हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ?

    ©अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.