Tag: Motherhood

  • नकारात्मक विचार.. जीवघेणे परीणाम-भाग २

    अनन्याला  नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता.
    गरोदरपणात तिसऱ्या त्रैमासिकित जास्त काळजी घ्यायला हवी पण अनन्या मात्र दिवसेंदिवस खचून जाऊ लागली, वेडेवाकडे विचार करू लागली. तिला बाळाची हालचाल जरा कमी वाटली की रडायला लागायची, माझ्या बाळाला काही झालं नाही ना म्हणून सतत आईला प्रश्न विचारायची. जरा पोटात पाठीत दुखले तरी घाबरून रडायची, मग डॉक्टर कडे घेऊन गेल्या शिवाय पर्याय नसायचा. एक एक दिवस आता अवघड जाऊ लागला.
    कशातच तिचं मन लागत नव्हते, सतत नकारात्मक विचार, चिडचिड सुरू असायची.
    अशातच एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले, शतपावली करताना चक्कर आली आणि ती खाली पडली. नशिबाने आई  आणि राघव सोबतच होते. त्यांनी लगेच तिला हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेले तर अनन्याचं ब्लडप्रेशर खूप वाढलेले होते आणि त्यामुळे तिला चक्कर आली होती. अजूनही ती पुर्णपणे शुद्धीत नव्हती. डॉक्टरांनी तिला अॅडमीट करून घेतले. ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, या सगळ्या प्रकाराने अनन्या अजूनच नकारात्मक होत गेली आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले, ब्लडप्रेशर वाढले. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत होते.
    बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालले होते शिवाय अनन्याची परिस्थिती नाजूक झाली होती. सगळ्यांना काळजी वाटत होती. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याचे सगळे उपाय डॉक्टर करत होते शिवाय बाळ आणि आई सुखरूप राहण्याचे प्रयत्न सुरू होते. अनन्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सहा तास होत आले तरी काही सुधारणा होत नव्हती. अशातच अचानक अनन्याला परत चक्कर आली आणि तिची शुद्ध पुर्णपणे हरपली, थोडा वेळात ती शुद्धीवर आली पण बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र थांबले होते, सातव्या महिन्याच्या अखेरीस उच्च रक्तदाब ( हाय ब्लडप्रेशर) मुळे बाळाने जन्माला येण्याआधीच या जगाचा निरोप घेतला होता.
    राघव तसेच घरी सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.
    अनन्याच्या जीवाला सुद्धा धोका होता. ती नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन उच्च रक्तदाबाच्या वेढ्यात अडकली होती, अस्वस्थ होती. अशावेळी बाळाला जास्त काळ पोटात ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे इंजेक्शन व्दारे कृत्रिम कळा आणून नैसर्गिक रित्या बाळाला बाहेर काढले गेले.
    जे काही झाले ते अतिशय धक्कादायक होते, टेंशन, नकारात्मक विचार, चिडचिड , मनात सतत दडपण यामुळे इतका मानसिक व शारीरिक त्रास अनन्याला आणि सोबतच घरी सगळ्यांनाच झाला होता.
    अनन्याला यातून सावरण्यासाठी वर्ष लागले. पण तिला समजून चुकले होते की सगळं सुरळीत चालू असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नकारात्मक विचार करून इतक्या वर्षांनी लाभलेलं मातृत्व ती गमावून बसली होती.
    यातून सावरण्यासाठी घरी सगळ्यांनी अनन्याला खूप मदत केली.
    सुदैवाने पुढे दोन वर्षांनी अनन्या आणि राघव च्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली, त्यांच्या जीवनात एका गोंडस बाळाचे आगमन झाले.

    या कथेतून हाच संदेश द्यायचा आहे की “नकारात्मक विचार किती जीवघेणे ठरू शकतात, नकारात्मकता जवळ बाळगू नका. कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक राहून शांतपणे सामना केला तर योग्य मार्ग नक्कीच मिळतो.”
    माझ्या या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमा असावी. नकारात्मकता दूर करणे हाच हेतू यामागे आहे.

    अशाच कथा वाचत राहण्यासाठी मला फॉलो करा.
    कथा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नकारात्मक विचार….जीवघेणे परिणाम- भाग १

    अनन्या आज खूप आनंदात होती, काय करू कुणाला सांगू अशा अवस्थेत  तिने आईला फोन केला ” हॅलो आई, काय करते आहे, कामात होतीस का… बरं ऐक मला तुझ्याशी बोलायचं आहे… म्हणजे तुला काही तरी सांगायचे आहे…आई…आई…. अगं तू आजी होणार आहे”, आताच आम्ही डाॅक्टरांकडे जाऊन आलो.. आई मी आज खूप खुश आहे..”.
    हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले, “अनन्या अगं किती गोड बातमी दिली तू…मी लवकरच येते तुला भेटायला.. काळजी घे बाळा… आणि हो, तुम्हा दोघांचेही अभिनंदन..”
    फोन ठेवताच सासूबाईंना अनन्याने गोड बातमी दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला.. लग्नानंतर सात वर्षांनी अनन्या आणि राघवच्या आयुष्यात एक बाळ येण्याची चाहूल लागली होती. राघवही खूप आनंदात होता, त्याने अनन्याला अलगद मिठीत घेतले आणि कपाळावर चुंबन घेत आनंद व्यक्त केला. आता स्वतःची नीट काळजी घ्या राणीसाहेब, दगदग करू नका असं म्हणतं अनन्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अनन्याला खूप प्रसन्न वाटले.
    अनन्या घरीच ट्युशन्स घ्यायची, राघव एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा.  दोघांचा प्रेमविवाह. अनन्या दिसायला अतिशय सुंदर, हुशार पण जरा चिडखोर, रागीट, आई वडिलांची एकुलती एक  त्यामुळे थोडी हट्टी मुलगी. राघव एकत्र कुटुंबात वाढलेला, नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत असला तरी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा शांत, समजुतदार मुलगा. कॉलेजमध्ये असताना अनन्या सोबत ओळख होती नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झाले आणि मग‌ लग्न. लग्नाला दोन वर्षे  झाले तसेच बाळ होण्या साठी दोघेही प्रयत्नशील होते सोबतच दवाखाना सुरू. आज लग्नाच्या सात वर्षांनी त्यांच्या जीवनात गोड बातमी आली. दोघांच्याही घरी सगळे लाड पुरवत होते, अनन्या स्वत: ची व्यवस्थित काळजी घेत होती. जेवण, आराम, फिरणं सगळं अगदी वेळेत. तिला राग येऊ नये, तिची चिडचिड होऊ नये याची पुरेपूर काळजी राघव घेत होता. असेच पाच महिने पूर्ण झाले. राघवनी नवीन घर खरेदी केले होते आणि त्याचा ताबा आता त्याला मिळणार होता. बाळाचं आगमन नवीन घरात होईल म्हणून दोघेही खूष. सामान नवीन घरात शिफ्ट करताना दगदग  नको म्हणून अनन्याला राघवने काही दिवस आई कडे ठेवले. घरच्यांच्या मदतीने नवीन घर सजवले.
    अनन्या नवीन घरात जायला खूप उत्सुक होती, ती घरी परत येताना राघवने तिचं छान सरप्राइज वेलकम केले. घरात तिच्या आवडीचे टेरेस गार्डन, रूममध्ये बाळाचे फोटो, दारात फुलांची रांगोळी, तोरणं शिवाय घरगुती वास्तुशांतीची पुजा आयोजित केली. सगळं अगदी आनंदाने पार पडले.
    नवीन ठिकाणी अजून जास्त ओळख नसल्याने आणि बाळ होणार म्हणून आता अनन्याने काही दिवस ट्युशन घ्यायचं बंद केले. सायंकाळी सोसायटीच्या आवारात अनन्या फेरफटका मारायला जाऊ लागली, त्यामुळे हळूहळू तिची ओळख होतं गेली.
    एक दिवस एका स्त्रीने तिला विचारले की ” तुम्ही नवीन रहायला आल्या का, कुठल्या मजल्यावर..”
    अनन्याने आनंदात उत्तर दिले ” हो, पाचव्या मजल्यावर, ५०५ मध्ये.”
    ते ऐकताच ती स्त्री घाबरून म्हणाली “५०५ मध्ये, जरा जपून हा.. त्यात तुम्ही गरोदर”.
    अनन्या दचकून म्हणाली” असं काय म्हणताय तुम्ही? काय झालं”.
    तिने अडखळत उत्तर दिले ” विशेष काही नाही पण असं ऐकलं आहे की आधी हे घर कुणी तरी बूक केले होते एका तुमच्या सारख्या जोडप्याने पण घराची खरेदी पक्की करून येताना त्यांचा अपघात झाला आणि ती गेली..तो अपंग झाला.. आणि मग त्यांनी ती खरेदी रद्द केली.. तेव्हा पासून ते घर घेण्याचे सगळे टाळायचे…तू काळजी करू नकोस.. होईल सगळं नीट.. वास्तुशांती केली ना..?” 
    त्या स्त्रीचे बोलणे ऐकून अनन्या हादरली.. घाबरून घरात जायला दचकली…ते ऐकल्यापासून तिच्या मनात सतत नकारात्मक विचार यायला सुरु झाले.. काही वाईट होणार नाही ना म्हणून सतत विचार करायला लावली.. अचानक झोपेतून दचकून जागी व्हायची.
    राघवला मात्र याची काही कल्पना नव्हती.
    अनन्याच्या वागण्यात बदल होत आहे हे राघवला जाणवलं. तिला विचारायचा प्रयत्न केला पण ती फक्त म्हणाली ” सगळं नीट होईल ना रे राघव.. काही संकट येणार नाही ना.. मला भीती वाटते..”
    राघव अनन्याला खूप समजावून सांगत होता की काही होणार नाही… आपल्याला बाळ होणार आहे..तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.. अनन्या अशी का वागते … गोंधळलेली का असते हे त्याला कळत नव्हतं..
    शेवटी तीन चार दिवस मनात गुंतागुंत निर्माण झाल्यावर अनन्याने झालेला प्रकार राघवला सांगितला.
    राघव ने तिची खूप समजूत काढली की हे सगळे आपण घर घेण्यापूर्वी झाले शिवाय त्यांनी फक्त घर बूक केले होते.. राहायला आले नव्हते..जे झाले तो एक अपघात होता शिवाय हे कितपत खरे आहे हे माहीत नसताना तू स्वत:ला अशा अवस्थेत त्रास करून घेऊ नकोस, तेही कुणाच्या सांगण्यावरून..तू याविषयी काही विचार करू नकोस. आपल्या आयुष्यात आनंदाचे दिवस आहेत ते एंजॉय कर…हवं असल्यास आईला आपण बोलावून घेऊ म्हणजे तुला एकटं वाटणार नाही.
    अनन्याला प्रसन्न वाटावं म्हणून शक्य तितका वेळ राघव तिला द्यायचा.. तिच्या आईला त्याने बोलावून घेतले.. आता सातवा महिना सुरू झाला.. अनन्या मात्र नकारात्मक विचारात गुंतलेली असायची.. सगळे आपापल्या परीने तिची समजूत काढून आनंदात ठेवायचा प्रयत्न करत होते पण अनन्याला नकारात्मक विचारांनी घेरले होते. जरा काही दुखले की ती टोकाचा विचार करायला लागत होती.. गरोदर असताना आनंदात राहणे किती गरजेचे आहे हे आई, राघव शिवाय डॉक्टर तिला समजून सांगत होते.. नकारात्मकता बाळासाठी तसेच अनन्या साठी घातक ठरू शकते हे सगळयांना लक्षात आले होते.
    अनन्याला यातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता..

    यातून अनन्या बाहेर पडणार की नाही.. त्याचा काय परिणाम होईल हे पुढील भागात पाहू.
    ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे..
    पुढचा भाग लवकरच… गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • आई- मातृदिन विशेष

    आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते.

    सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार आई सकाळी सगळ्यात आधी उठून डबा बनवते, ती घरी असली तरी वेळेत सगळं तयार ठेवण्याची जबाबदारी तिची असतेच.

    आई नोकरी करणारी असेल तरी तिची ही जबाबदारी चुकत नाही.

    मुलं जशजशी मोठी होतात त्यानुसार त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-बाबा दोघांची असली तरी त्यात आईचा मोलाचा वाटा असतो.

    मुलं वयात येऊ लागली की मुलांना मैत्रीण बनून समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे अशा अनेक जबाबदारी आई तत्परतेने सांभाळत असते. या सगळ्यात घरातील प्रत्येकाची काळजी तिला असतेच. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सगळी काळजी आईला, पण ती आजारी असेल तर सगळ्यांची दिनचर्या विस्कटून जाते.

    आई हा प्रत्येक घराचा आधार स्तंभ असते, तिच्याशिवाय घरातील प्रत्येकजण अपुर्ण असतो.

    तरुण वयात‌ तसेच लग्नानंतर मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई. मनातलं सगळं आई जवळ सांगितले की मन कसं हलकं वाटतं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना तिचे मार्गदर्शन नेहमी महत्वाचे ठरते. घरात काय आहे काय नाही‌ याची यादी, इस्रीवाला, दूधवाला, कामवाली अशे घरातले बाहेरचे सगळे मॅनेजमेंट खाते आईकडेच असते.

    आईची भूमिका ही आयुष्यभर संपत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्या असह्य कळा सहन करत आई बाळाला जन्म देते, बाळासाठी अनेक रात्री जागून काढते. आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखे जपते. मुलं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांच्या मागे ती उभी असते, मुलांचे जीवन सुरळीत चालू आहे हे बघून ती आनंदात असते. शेवटपर्यंत तिला आपल्या मुलांची काळजी असते, कशाचीही अपेक्षा न ठेवता ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत: उपाशी राहीन पण ती घरात सगळ्यांना पोटभर खाऊपिऊ घालण्यासाठी धडपडत असते.

    बाबांच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी ती जपते, त्यांच्या गरजा पूर्ण करते.

    ती आयुष्यात स्वत: साठी खूप कमी जगते, तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती घरात सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.

    ते म्हणतात ना”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ते खरेच आहे. आईविना आयुष्य अपूर्ण आहे. आईची माया, तिची भूमिका दुसरा कुणीच साकारू शकत नाही. आई या शब्दात खरंच खूप भावना दडलेल्या आहेत.

    आईची महती जितकी लिहिली तितकी कमीच आहे.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

    सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे. 

    ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट.

    तो : एक काम कर, ती किट ठेव जरा वेळ बाजूला आणि झोप. उठल्यावर बघू आपण परत. आता तरी मला एकच लाइन दिसते आहे.

    एवढे बोलून त्याने तिला झोपवले आणि तो परत झोपी गेला. 

    काही वेळाने तो उठला आणि बघतो तर ती अजूनही किट कडे कटाक्षाने बघत बसलेली.

    त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि किट कडे बघितले तर त्याला सुद्धा दुसरी अंधुक लाईन दिसत होती.

    त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आनंदाची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. Gynaecologist कडे जाऊन गुड न्यूज ची खात्री करून घ्यायची असे ठरले. रविवार असल्याने दोघंही जरा निवांत होते. 

    आता दोघांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्याने लगेच Gynaec ची अपॉइंटमेंट घेतली.

    ठरलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन check up केला, डाॅक्टरांनी ती आई‌ होणार असल्याचे सांगितले आणि काही आवश्यक सुचना दिल्या. तो अतिशय लक्ष देऊन सगळं ऐकत होता, ती मात्र आनंदाच्या भरात दुसरीकडेच हरवली होती, चेहऱ्यावर एक स्मीत करत वेगळ्याच विश्वात रमली होती. 

    ठिक आहे, Again Congratulations and take care या डॉक्टरांच्या वाक्याने ती हरवलेल्या विश्वातून बाहेर आली. 

    दोघेही खूप आनंदात होते, घरी येतांच त्याने तिला हळूवारपणे मिठी मारली. त्या मिठीत तिला एक काळजी, होणार्‍या बाळाचे जबाबदार वडील अशा अनेक भावना जाणवल्या. 

    आई जवळ आणि सासुबाई जवळ ही आनंदाची बातमी कधी एकदा शेअर करते असं तिला झालं. आईला बातमी सांगितली त्याच क्षणापासून आईची काळजी, काय करायचे काय नाही करायचे अशी सूचनांची यादी यायला सुरुवात झाली. आई आणि सासूबाई दोघिंनीही सांगितले की लगेच ही बातमी कुणाला सांगू नकोस. सुरवातीला तीन महिने गर्भ अगदी नाजूक अवस्थेत असतो, त्यामुळे पुर्णपणे विकास होईपर्यंत कुणाला सांगत नसतात. 

    नंतर Bike वर जाणं बंद झाले आणि त्याऐवजी कार चा वापर सुरू झाला. शक्यतो bike ने कुठे जाणे या अवस्थेत टाळलेले बरे असते, गेले तरी दोन पाय दोन्ही कडे टाकून न बसता एका बाजूला बसून जावे. दररोज आॅफिसला नवर्‍यासोबत जाताना दोन पाय दोन्ही बाजूला टाकून बसून जाण्याने आणि धक्क्यांमुळे एका मैत्रिणीची गर्भपिशवी चौथ्या महिन्यांतच ओपन झालेली आणि पुढे बाळ होत पर्यंत मग complete bed rest. त्यामुळे सहसा ते टाळलेले बरे. 

    आहारात आता फळं, शक्य ते पौष्टिक पदार्थ असे बदल झाले. सुरवातीला दोन महिने काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र भयंकर मळमळ, उलटी, थकवा यांनी घेरले. काही खाल्लं की उलटी होणार, कशाचाही वास नको नको वाटायचा. अन्न तर नकोच वाटायचे पण बाळाचा विचार करून जे खावं वाटले ते बिंदास खायचं असं ठरवलं. 

    Papaya, pineapple आणि Chinese food सोडलं तर बाकी जे खावं वाटले ते बिंदास पण प्रमाणात खाल्ले. Papaya, pineapple आणि Chinese food या अवस्थेत खायला चालत नाही पण बाकी कशानेही काही अपाय नसतो याची खात्री पटली. अर्थात सगळे पोषक रस पोटात गेलेले चांगले असतात मग ते गोड, आंबट, कडू अशे कुठलेही असो.  

    गरोदरपणाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण ही नैसर्गिक अवस्था असते, आजारपण नाही हे लक्षात घेऊन नीट काळजी घेणे आवश्यक असते. बाळाचा पूर्ण विकास आईच्या खाण्यापिण्यावर आणि तिच्या दिनचर्येवर अवलंबून असतो, त्यासाठी योग्य काळजी घेतली तर कधीही चांगले. हंगामी फळे, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. 

    खूप कर्कश आवाज, जास्त हळव्या करणारे कार्यक्रम अशा गोष्टी टाळाव्यात. जितकं आनंदात राहता येईल तितके चांगले. योग्य आराम, व्यायाम, चांगले साहित्य वाचन केले की मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते, या अवस्थेत अशी दिनचर्या पाळली तर फायद्याचे ठरते.

    तब्येत बरी नसली तरी आई होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता मनात, माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल. या सगळ्यात पाचवा महिना संपत आला तेव्हा मळमळ उलटी थकवा दूर झाल्यासारखा वाटला, तब्येतीत सुधारणा झाली, बाळाची हालचाल सुरू झाली. बाळाची पहिली हालचाल पोटात जाणवली तो क्षण तर शब्दात मांडता येणार नाही. हळूहळू बाहेर सगळ्यांना पोटाच्या वाढत्या आकारावरून गुड न्यूज असल्याचे जाणवायला लागले. 

    या अवस्थेत सगळे किती काळजी घेतात, नवरा तर अगदी फुलाप्रमाणे जपतो, काय हवं नको ते अगदी समोर नाव काढताच हजर. 

    जसजसा पोटाचा आकार वाढत गेला तशा बाथरूमच्या चकरा वाढल्या. नऊ महिने कसे भराभर गेले, सातव्या महिन्यात ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला, छान फोटोशूट केले, अगदी आनंदात हे दिवस गेले. 

    पाच ते सात महिन्यांच्या कालावधीत अगदी छान वाटत होते. आठवा महिना सुरू झाला आणि नंतर शरीर जड वाटायला लागले, पायावर जरा सुज यायला सुरुवात झाली ,जास्त वेळ बसून नको वाटायचे त्यामुळे मध्ये जरा चालायचे. या दिवसांत जितके जास्त चालायला जमेल तितकं चांगलं पण ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते पण पोटाचा वाढलेला घेर सांभाळून झोपताना जरा त्रास हा होतोच. 

    या पुर्ण अनुभवात जेव्हा सोनोग्राफी मध्ये बाळाला आपण बघतो तो क्षण किती गोड असतो. कधी एकदा बाळ बघायला मिळते असं वाटतं. 

    सगळ्या गोष्टी अनुभवताना दिवस भराभर गेले, जसजसा बाळ होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत होती तसतशी मनात हुरहूर, अनेक प्रश्न, एक भिती अशी गोंधळलेली अवस्था झाली होती. 

    अचानक काही त्रास झाला आणि ट्राफीक मध्ये अडकले तर काय, कळा नक्की कशा येतात, बाळ होताना खूप त्रास होईल का, मला सहन होईल का अशा अनेक शंका मनात असतात पण मनाची तयारी, बाळाच्या आगमनाची उत्सुकता यामुळे आपण खूप strong होत जातो. 

    बघता बघता वेळ आली बाळ होण्याची, २४ तास Labour Room मध्ये कळा , OT मधल्या वेदना सहन करून एक गोंडस परी आमच्या आयुष्यात आली. मनापासून वाटायचे मला मुलगी व्हावी, तिला बघून एका क्षणात सगळ्या वेदनांचा विसर पडला. दोघेही खूप खुप आनंदी झालो.

    आई होण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, प्रत्येकाची गरोदरपणातील अवस्था, अनुभव हा वेगळा असतो. त्यासाठी योग्य काळजी, आनंदी मन , संयम खूप आवश्यक आहे. 

    – अश्विनी कपाळे गोळे

  • Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव

        आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते.

    अशा या सुंदर अनुभवात breast Abscess सारखी समस्या आली की तो अनुभव अतिशय painful असतो, आई आणि बाळ दोघांनाही या गोष्टीचा त्रास होतो. असाच एक painful अनुभव मी शेयर करते आहे.

    बाळासोबत छान वेळ घालवताना भराभर दिवस जात होते. एक दिवस अचानक सकाळी उजव्या Breast मध्ये दुखायला लागले, अंगात ताप आलेला होता. गरगरल्या सारखे वाटत होते, मळमळ आणि उलटी सुद्धा सुरू होती. अचानक अशे काय झाले कळायला मार्ग नव्हता कारण बाळंतपण झाल्यामुळे घरीच, बाहेर जाणं, बाहेर खाणं सगळं बंद. माझी मुलगी तेव्हा फक्त चार महिन्यांची, मला क्षणभरही सोडून वेगळी कधी नव्हतीच.

    वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी सासरी खेडेगावात खूप काही तज्ज्ञ डॉक्टर नव्हते आणि शहर अगदी दहा किलोमीटर अंतरावर असले तरी उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात बाळाला सोडून अथवा घेऊन जाणं जरा कठीणच वाटले. गावातील डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या म्हणण्यानुसार उन्हामुळे असं झालं आहे हे सांगून त्यांनी ताप कमी होण्यासाठी औषधे दिली आणि आराम करण्याचे सुचवले. Breast मध्ये दुखत होते त्यासाठी जरा शेक देऊन मालीश करायला सांगीतले. सांगितल्या प्रमाणे पाच दिवस औषध आणि बाकी काळजी घेतली पण त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला. अचानक आहारात बदल झाला, जेवणाची इच्छा होत नव्हती पण बाळासाठी म्हणून जेवण सुरू होते. कदाचित ताप असल्यानं असं होतं आहे असे समजून आठवडा गेला आणि आम्ही आमच्या घरी पुण्यात आलो. प्रवासानंतर रात्री अंगात परत खूप ताप भरला, अशक्त वाटू लागले. स्तनातील वेदना वाढत होत्या, ताप आणि त्या वेदना यामुळे रात्र जागून काढली. सकाळी लगेच Gynaec कडे गेले, तपासणी केल्यानंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे अंगात ताप आलेला आहे. त्यासाठी अॅंटीबायोटिक्स दिली आणि स्तनात गाठ जाणवत असल्याने स्तनाचे स्कॅनींग करायला सांगीतले. पुढचे पाच दिवस औषध घेत असताना वेदना कमी होत नव्हत्या त्यामुळे स्कॅनींग करायचे ठरले. 

    स्कॅनींगमध्ये कळाले की स्तनामध्ये गाठ होऊन पस सुद्धा झालेला आहे. त्यामुळे स्तनावर लालसरपणा आला असून अंगात ताप आहे. स्कॅनींगचे रीपोर्ट ब्रेस्ट स्पेशालीस्टला दाखवताच तिने आॅपरेशन करून लवकरात लवकर पस काढण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आॅपरेशन करायचे ठरले. या सगळ्यात माझ्या सोबत बाळालाही त्रास सहन करावा लागत होता. माझ्या दुखण्यामुळे तिला लवकरच फाॅर्मुला मिल्क सारखे टॉप फिडींग सुरू करावे लागले.

    वेळ न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळी मी आॅपरेशन साठी हाॅस्पीटलला दाखल झाले. या सगळ्यात माझ्या मनात सतत विचार येत होता तो म्हणजे मला स्तनांचा कर्करोग तर झाला नसेल. मला काही झाले तर माझ्या बाळाचं कसं होणार. डॉक्टर समजूत काढत असली तरी मला मात्र अशा अनेक वाईट विचारांनी घेरले होते, पहील्यांदाच मी आणि माझं बाळ एकमेकींपासून वेगळे राहणार होतो. मी २४ तास हाॅस्पीटलला असताना माझ्या बाळाची काळजी मला जास्त त्रास देत होती. 

    तिची सुद्धा वेगळी अवस्था नव्हती, सतत रडून मला माझी आई पाहिजे या भावनेने ती सगळीकडे मला शोधत होती.

    ठरल्याप्रमाणे आॅपरेशन झाले, इन्फेक्शन परत होऊ नये म्हणून अशा केस मध्ये टाके देत नाही, त्यामुळे पाच ते सहा आठवडे जखम भरून येईपर्यंत ड्रेसिंग करावे लागणार होते. जखमेतला पस तपासणीसाठी पाठविण्यात आला, सुरवातीला जखम मोठी आणि खोल असल्याने दररोज ड्रेसिंग करताना तिव्र वेदना व्हायच्या. माझ्या साठी हा एक अतिशय वेदनादायी अनुभव होता.

    या तीन आठवड्यात वजन अचानक पाच किलो कमी झाले. अशक्तपणा आला, बाळ माझ्यावर अवलंबून असल्याने स्वत: कडे मी आता नीट लक्ष देऊ लागली. पस तपासणीनंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात झाले त्यासाठी दहा दिवस दररोज दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार. पस रिपोर्ट वरून ब्रेस्ट अॅब्सेस आणि कॅन्सर यामध्ये फरक आहे, हे मला डॉक्टरांनी पटवून दिले तेव्हा मला खात्री पटली.

    सतत हाॅस्पीटलच्या चकरा मारून वैताग आला होता पण अर्थातच काही पर्याय नव्हता.

     या सगळ्यात बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न सुरू होते. हळूहळू जखम भरून येत होती, तब्येतीत सुधारणा होत गेली. या सगळ्यात माझ्या दुखण्यामुळे घरी सगळ्यांनाच मानसिक, शारीरिक त्रास होत होता. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, औषधे न मिळाल्याने तसेच स्तनातील वेदनांकडे दुर्लक्ष झाल्याने माझ्यावर ही वेळ आली होती. 

    स्तनात दूध साठू नये म्हणून काळजी घेणे किती आवश्यक आहे हे मला जाणवत होते. 

    माझ्या अनुभवावरून मी नविन आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की स्तनामध्ये दुध साठवून राहणार नाही याची काळजी घ्या, काहीही त्रास झाला तर दूर्लक्ष न करता त्वरीत उपचार करून घ्या.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • आई, बाळ आणि नोकरी

    सरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू झाला.

    काही दिवसांतच एका गोंडस बाळाचे आगमन झाले. आई झाल्याचा आनंद, तो सुखद अनुभव शब्दात मांडता येणार नाही. बाळाच्या सहवासात दिवस कसे भराभर जात होते, रोज काहीतरी नवीन अनुभव. बाळाच्या झोपच्या वेळेनुसार आईची दिनचर्या ठरलेली. सहा महिन्यांची रजा संपत आली. बाळासाठी अजून एक महीनाभर रजा वाढवून मिळाली तेव्हा खूप छान वाटले. बघता बघता ती सहा महिन्यांची झाली.

    सुट्टी कशी संपत होती कळत नव्हतं. निरागस, गोंडस , सुंदर चेहऱ्याला न्याहाळत दिवस कधी मावळतो कळत नव्हतं. हळूहळू नोकरीवर परत रूजू होण्याची वेळ जवळ येत होती, तसतशी मनात हुरहूर लागायला सुरु झाली. मी आॅफिसला गेल्यावर बाळ कसे राहणार. नोकरीत जरा ब्रेक घ्यावा का अशे अनेक विचार मनात गोंधळ उडवू लागले. नवर्‍याशी त्याबाबत चर्चाही केली. आपण नोकरी केली तर बाळाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी मदतच होईल. शहरातील वाढता खर्च, महागडे शिक्षण यासाठी दोघांनीही नोकरी केली तर फायद्याचे आहे हा विचार करून आॅफिसला रुजू व्हायचे ठरवले. सासुबाई आणि मदतीला बाई घरी असल्यामुळे जरा निश्चिंत होते पण शेवटी आईचं मन. प्रत्येक नोकरी करणारी स्त्री या परीस्थितीतून जाते.

    सुरवातीला आॅफिसमध्ये सतत कानात तिचे बोबडे बोल गुंजन करायचे , डोळ्यांपुढे तिचं हसणं, तो निरागस चेहरा, अवतीभवती सगळीकडे तिचं निरीक्षण सुरू असतानाचे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक क्षणही दूर जात नव्हते.. या सगळ्यात कामात काही लक्ष लागत नव्हते. आईसाठी खरंच ही द्विधा मनस्थिती असते.त्यात घरी आपुलकीने बाळाची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर जरा समाधान वाटते. शरीराने आॅफिसला असले तरी मन मात्र घरीच, बाळाच्या विचारात गुंतलेले. मग फोनमध्ये तिचे फोटो बघून चेहऱ्यावर एक स्मितहास्य, अधूनमधून फोनवर तिची विचारपूस.

    सुरवातीला आॅफिसला फार काम नसल्याने लवकर घरी यायला मिळायचं. घरी आले की ती अगदी दिवसभर आई दिसत नसल्याने आईला एकही क्षणही आईला सोडत नाही. घरी आल्यावर बाळाची ती गोड मिठी, तिचं हसणं खूप काही सांगून जाते. 

    प्रत्येक आईसाठी खरंच हा एक वेगळाच अनुभव असतो. 

    अश्विनी कपाळे गोळे

  • इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा

    तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”
    आई म्हणाली “बरं, तुला हवा तो क्लास लावून देते, आता वेळ आहे तुझ्याकडे. शिकून होईल आणि वेळही जाईल तुझा. सध्या खूप काम आहे गंं, सुट्टी नाही मिळणार मला. तरी बघूया काही दिवसांनी, तोपर्यंत तू स्विमींग, डान्सिंग, जे काही शिकायचे ते शिकून घे.”
    तनूचा इवलासा चेहरा पाहून आईला मनातून वाईट वाटले आणि मनात विचार आला की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीची किती आतुरतेने वाट बघायचो आपणं, किती मज्जा करायचो.
    सुट्टी सुरू झाली की मामाच्या गावाला कधी कधी जाणार ही‌ घाई असायची, कारण तिथे मज्जा सुद्धा तशीच यायची. सगळे भावंडे एकत्र येणार, मामा मामी, मावशी ‌काका, आजी आजोबां कडून मस्त लाड पुरवले जायचे. सकाळ‌ पासून रात्र कशी झाली कळायला वेळ नसायचा. सगळी भावंडं एकत्र जमली की‌ नुसतीच मज्जा. एकमेकांच्या खोड्या काढत, मनसोक्त खेळत,‌ छान छान खाऊन कुठे दिवस जायचा कळत नव्हतं.
    विहीरीत पोहायला जायचं, ज्यांना अजून पोहता येत नाही त्यांच्या पाठीला भोपळा किंवा जूना‌ टायर बांधून मामा,‌मोठी भावंडे पोहायला शिकवायचे. मनसोक्त पोहून झालं की‌ मस्त भूक लागायची मग मामींच्या ,‌आजीच्या हातचे नवनवीन पदार्थ, शेतातल्या ताज्या कैरी,‌आंबे अगदी नैसर्गिक रित्या आलेले सगळं खाण्याचा मोह आवरायचा नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत अंगणात, घरात इकडे तिकडे भटकायच, मनसोक्त खेळत मज्जा मस्ती करायची. त्यात भर दुपारी सायकलवरून कुल्फी वाला, आइस कॅंडी वाला यायचा मग सगळी बच्चे कंपनी त्याच्या भोवती गोळा, मला‌ ही कुल्फी, मला‌ लाल आइस कॅंडी, मला‌ हे मला‌ ते…काय मज्जा यायची नाही त्यात. कधी मग भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे‌ लग्न, त्यात आजी मग खाऊ बनवून देणार, कधी कबड्डी, कधी खो-खो, घरभर पळत लपाछपी, मातीचा खेळ, लगोरी अगदी उत्साहात खेळ रंगाचे. कधी बैलगाडीची सफर असायची. पूर्ण वर्षभराचा‌ रिचार्ज केल्यासारखे वाटायचे. भावंडांची भांडणे, त्यांचं प्रेम , चिडवाचीडवी यामुळे त्यांचं नातंही तितकंच घट्ट व्हायचं.
    खाण्या पिण्याची मज्जा, खेळण्यातील मौजमस्ती, मोठ्यांचा एक वेगळाच अनुभव, गप्पा गोष्टी, पापड , शेवया , वाळवणी पदार्थ बनवायची त्यांची वेगळी मज्जा.
    रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर किंवा अंगणात गादी टाकून सगळे झोपायचो आणि आकाशातील तार्‍यांची मज्जा बघायची, चंद्राची लपाछपी‌ बघायची, आजी मग छान छान गोष्टी सांगणार ते ऐकत झोपायचो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात.
    ही सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं. त्यात घरी कुणाचं लग्न‌ जर असेल मग तर विचारायलाच नको, सगळीकडे आनंदीआनंद…
    भेटीसाठी होऊन एकत्र वेळ घालवून नात्यांमधला गोडवा टिकून राहायचा, सुखदुःख वाटले जायचे, एकमेकांची ओढ वाटायची.
    हल्ली शहरांमध्ये नोकरी करताना‌, शहर असो किंवा ग्रामीण भाग ही सगळी मज्जा कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. आई‌ वडील इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग इंटरनेट‌ मुलांचा‌ मित्र बनतो, मोबाईल, टिव्ही, व्हिडिओ गेम यामुळे मामाच्या गावाला जी मज्जा यायची ती खरंच  हरवली आहे. नात्यात एक दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब, फोन वरून औपचारिक बोलून ती आधी सारखी आपुलकी, नात्यातला‌ जिव्हाळा कुठे तरी हरवला आहे. आई‌ वडीलांना‌ वेळ नसतो मग‌ मुलांना‌ मनासारखी सुट्टी अनुभवता येत नाही. या वेळी समर‌ कॅम्प, या वेळी हा क्लास असा अगदी टाइमटेबल ठरलेला असतो, त्यात जो‌ वेळ मिळेल तो मग इंटरनेटवर गेम, टिव्ही,‌मोबाइल. यामुळे मग मुलांनाही नात्यात ओढ वाटत नाही, आई बाबा कामात, भावंडे असली तरी मोबाईल गेम मध्ये व्यस्त. सुट्टीच्या दिवशी फार फार तर सिनेमा, माॅलमध्ये फिरायला जायचं. काही दिवस सुट्टी मिळालीच तर मग जवळपास कुठे फिरून यायचं अशी हल्ली सुट्टी संपते पण त्यात पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा नसते.
    खरंच वाईट वाटत‌ं ना विचार करून. म्हणूनच मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवून त्यांना वेळ देण्याची गरज आहे, आजोळी काही दिवस घालवले, घरातल्या घरात न राहता बाहेर मनसोक्त खेळू दिले, मुलांना जबरदस्तीने व्यस्त ठेवण्यासाठी क्लास न लावता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देऊन हवं ते शिकू दिले, आवडीची‌ गोष्टींची पुस्तकं दिली तर त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लक्षात राहील. ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    तुमच्या लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..

    “आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता.
    आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.”
    अमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे नेहमी. विनय माझ्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करतो. नंतर पाहिजे तेव्हा सापडत नाही मला. मी नाही देणार, त्याची खेळणी का नाही खेळत तो. आता मी गिटार प्रॅक्टीस करतोय तर त्यालाही तेच पाहिजे आहे.”
    विनय आणि अमन, दोघे भावंडे. विनय अगदी तीन वर्षांचा तर अमन‌ बारा वर्षांचा. अमन समजूतदार , जरा अबोल तर विनय खूप मस्तीखोर. हळूच अमनच्या खोड्या काढायचा आणि काही न झाल्यासारखा दूर पळायचा. दोघांमध्ये जास्त अंतर असल्याने नेहमी दोघांचे भांडण झाले की नेहमी अमनला ओरडा खावा लागायचा, तू मोठा आहेस, विनय अजून लहान आहे, त्याला समजून घे. विनयला वाटायचं आपण काही केले तरी आई बाबा दादाला रागावतात, मग हळूहळू तो या गोष्टीचा बालीश पणे फायदा घ्यायचा.
    सारखं आई बाबांचा ओरडा खाऊन अमन मनातल्या मनात विनयचा राग करायला लागला, त्याला वाटायचं अमन खोड्या करतो आणि ओरडा मी खातो, विनय झाल्यापासून आई बाबा विनय वरच प्रेम करतात‌, काही झाले की मलाच ओरडतात, माझ्यावर आता आई बाबा प्रेमच करत नाही. ही भावना हळूहळू अमनच्या मनात घर करत होती.
    आई बाबांना वाटायचे इतर भावंडा प्रमाणे हे दोघेही भांडतात पण नेहमी अमनला रागविल्याने तो मनात सलते विचार करायला लागला. एकदा बाबा घरी आले तेव्हा दोघेही अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर दोघांचे भांडण बघून घरात येताच बाबा अमनवर ओरडले ” अमन‌ हे काय चाललंय, किती भांडता दोघे, लहान आहेस का तू आता,  उगाच कशाला विनयला त्रास देतो, इतका मोठा झाला तरी अगदी लहान असल्यासारखा वागतो.”
    बाबा रागाच्या भरात बोलून गेले पण अमनच्या मनाला ते खूप खोलवर लागलं. तो त्याच्या खोलीत जाऊन दार बंद करून रडत बसला.
    आईलाही त्याच असं वागणं बघुन अजूनच राग आला, खोलीचं दार वाजवत आई म्हणाली “अमन हा काय वेडेपणा, दार का लावून घेतलंस. उघड दार पटकन आणि ये बाहेर.”
    अमनने रडतच दार उघडले आणि आई-बाबांना रडतच म्हणाला “मी तुमचाच मुलगा आहे ना नक्की… काही झालं की मलाच ओरडता तुम्ही दोघे..विनय किती कुरापती करतो, खोड्या काढतो त्यालाही कधीच रागवत नाही..मला नाही राहायचं इथे..मला हॉस्टेलवर ठेवा मी नको असेल तुम्हाला तर..माझ्यावर कुणाचं प्रेमच नाही..”
    अमनच्या अशा बोलण्याने, वागण्याने आई बाबांना धक्का बसला. बाबांना वाईटही वाटले की आपण असं ओरडायला नको होतं, जरा समजून सांगायला पाहिजे होतं.
    बाबांनी अमनला जवळ घेतले आणि त्याला समजावत म्हणाले ” अमन बेटा, असा का म्हणतो आहेस तू.. अरे आमचं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे..तू इतका समजूतदार आहेस तरी असं म्हणतोय..फक्त तू मोठा आहेस आणि विनय अजून लहान आहे तेव्हा त्याच्याशी नुसतं भांडण न करता दादा म्हणून ते त्याला हक्काने समजून सांग..तू असं चिडलास तर विनय तुझं अनुकरण करून तोही चिडेल.. हट्ट करेल.. त्याच्याशी चिडून न‌‌‌ बोलता, नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणार नाही. मी दमून आलो रे घरी आणि तुम्ही अशे आरडाओरड करताना बघून माझी चिडचिड होणारच ना.. आणि तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला वाढदिवसाला गिटार गिफ्ट दिली असती का..तुला pets आवडतात म्हणून तर आपण टफी (Tuffy – त्यांच्या घरचा पाळीव कुत्रा) घेऊन आलो ना घरी. तेव्हा असा विचार परत करायचा नाहीस..हस बघू आता..”
    आईनेही अमनची समजूत काढली. त्याला पटवून दिले की आई बाबांचं प्रेम हे सारखंच असतं.
    झालेल्या प्रसंगावरून आई बाबांनाही त्यांची चूक लक्षात आली, आपण अमन मोठा आहे तेव्हा त्यानेच समजून घ्यावे, विनय लहान आहे त्याला तितकं कळत नाही म्हणून अमन कडून अपेक्षा ठेवत गेलो पण यामुळे विनय अजून हट्टी आणि खोडकर झाला असून अमनला इतका मोठा गैरसमज झाला , तो दुखावला गेला याचे दोघांनाही वाईट वाटले.
    यापुढे हा लहान हा मोठा असा विचार न करता दोघांनाही चूका‌ केल्यास समजून सांगायच्या असे आई बाबांनी ठरवले शिवाय अशी वेळ परत यायला नको याची पुरेपूर काळजी घेतली.

    भावंडं म्हंटले की छोट्या छोट्या खोड्या काढणे, भांडणे हे आलेच पण त्यावरून मुलांमध्ये एकमेकांविषयी राग, घरात आपल्यावर कुणाचं प्रेम नाही कारण मलाच नेहमी रागावतात ही भावना जास्त प्रमाणात निर्माण झाली तर ते धोक्याचे ठरते. मुलं वयात यायला लागली की त्यांच्यातील शारीरिक मानसिक बदल समजून घेत वर्तणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.

    • अश्विनी कपाळे गोळे
  • ADHD- पाल्यांमधील एक समस्या

    एखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”.
    ADHD नक्की काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.
    ही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरा सुरू करणे, गोष्टी लगेच विसरून जाणे, Hyperactive असणे , Restless होणे अशातच कुणी समजून घेत नसेल तर आक्रमक, नकारात्मक होणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती साधारणतः बालपणापात सुरू होऊन किशोर वयातपर्यंत  दिसून येते. बालक असताना सगळी मुले आजुबाजूच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, मस्ती करतात, एकाग्र नसतात पण जसजसे मुलं मोठी होतात तसं हे सगळं कमी होऊ लागते. काही मुलांमध्ये मात्र अती चंचलता, एकाग्रतेची कमी वयानुसार वाढत जाते. काहींना अभ्यासात रस नसतो पण खेळण्याची अथवा इतर कुठल्या गोष्टीची आवड असते. अशा वेळी काळजीचं कारण नाही पण कुठल्याच गोष्टीत मन रमत नसेल तर ADHD ची लक्षणे असू शकतात तेव्हा त्यानूसार काळजी घेणे गरजेचे असते. ही एक मानसिक स्थिती असते, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांव्दारे काऊन्सलिंग करून घेतले तर मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते.

    ADHD होण्याची कारणे-

    १. आनुवंशिकता
    २. पर्यावरण – गर्भावस्थेत आई अल्कोहोल प्राशन करत असेल तर fetal alcohol spectrum disorders होऊन मुलांमध्ये ADHD ची लक्षणे दिसून येतात.
    ३. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास – मुलांचा विकास नीट झाला नसेल तरी ही लक्षणे दिसून येतात.

    काही पाल्य अतिशय चंचल आहे, अभ्यासात किंवा कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रीत करु शकत नाही, रांगेत उभं राहिल्यावर आपला नंबर येईपर्यंत थांबत नाही, अशी लक्षणं सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलांमध्ये पाहायला मिळतात. पण ही लक्षणं जास्त प्रमाणात आढळल्यास चिंतेची बाब ठरु शकते. असा स्वभाव असल्याने पाल्यांना शिक्षकांकडून तसेच पालकांकडून चुकीच्या अथवा असंवेदनशील वर्तणुकीला सामोरे जावे लागते. मुलं चंचल आहे, आपलं ऐकत नाही, वर्गात लक्ष नाही म्हणून सतत रागवले कि मुलांमधील चिडखोरपणा, आक्रमकता जास्त प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मुलांना काऊन्सेलिंग द्वारे कंट्रोल करता येते, म्हणूनच २०१७ मध्ये शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत’काऊन्सलिंग सेल’असणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं.
    मुलं अती प्रमाणात चंचल असतील, एकाग्रता नसेल तर अशा मुलांना प्रेमाने समजून सांगणे खूप गरजेचे आहे. पालकांना अशा परिस्थितीत खूप त्रास होतो पण चिडचिड न करता योग्य वेळ देऊन मुलांना समजून सांगणे, त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये त्यांना एकाग्र व्हायला मदत करणे खूप आवश्यक आहे, त्यात आई मुलांना सगळ्यात जवळची असल्याने आईने मुलांना समजून घेणे, प्रेमाने हाताळणे महत्वाचे असते, सोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काऊन्सलिंग करून घेणे फायदेशीर ठरते.

    याविषयी अधिक माहिती असल्यास नक्की शेअर करा.

    • अश्विनी कपाळे गोळे