Tag: Parenting

  • रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

           तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

       अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

        आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
       दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
    पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

    जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

    तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
    त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
    जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
    विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

    या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
    तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
    तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

    तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
    तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

    तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
    ती परत रडायला लागली.

    जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
    जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

    आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

    तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

    झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

    झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

    हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

    ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

    प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आईची दुहेरी भूमिका…

    रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची. 
    जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
    भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
    लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
    ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
    दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
    हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
    दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी. 

    खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तेच खरे हिरो….

    मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने मनवाच्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती म्हणाली “काकू आज क्लास उशीरा संपला पण आम्ही सोबतच बस स्टॉप वर आलो. माझी बस लवकर आल्यामुळे मी निघाले, मनवा बस साठी थांबली होती. येयीलच इतक्यात काळजी करू नका.”
    आईचं मन मात्र काळजीने व्याकूळ, मनवा ठिक तर असेल ना , फोन का बंद आहे, किती हा निश्काळजीपणा , उशीर होईल म्हणून कळवायचे तरी ना अशा विचाराने आई काळजीत पडली शिवाय जरा संतापलेली. तितक्यात एक रिक्षा घरापुढे थांबली, मनवा त्यातून उतरली बघून आईच्या जीवात जीव आला. पण हे काय सोबत हे कोण….
    मनवा सोबत रिक्षा मधून त्रृतीयपंथी म्हणजेच दोन हिजडे उतरले बघून आईचा पारा चढला, आई दारातूनच ओरडली ” मनवा,‌हा काय प्रकार आहे,  हे लोक इथे कशाला, तुला काही कळते की नाही. ह्यांच्या सोबत तू…शी… तुला काय हिच रिक्षा मिळाली का…”  आई चिडून नको ते बोलून गेली.
    मनवा आईला शांत करायचा प्रयत्न करत होती पण आई मात्र सगळ्या‌ प्रकाराने शिवाय मनवाला उशीर झाल्याने संतापलेली होती.
    ते पाहून सोबत आलेले दोघे तसेच कधी परत गेले मनवाला कळालेही नाही.
    आईचं बोलणं ऐकून मनवा रडायला लागली आणि चिडून म्हणाली “आई आता गप्प बस… त्यांच्या विषयी असं बोलण्याआधी मी काय म्हणते ऐक..ते हिजडे नाही..तेच खरे हिरो आहेत..ते नसते‌ तर आज माझ्या सोबत काय झाले असते कुणास ठाऊक.. कदाचित मी तुझ्या समोर अशी उभी नसते..”
    मनवा‌ आईच्या कुशीत शिरून हुंदके देत रडायला लागली.
    काही तरी गंभीर आहे आईला लक्षात आले.
    मनवाला शांत करून विचारले तेव्हा ती म्हणाली “आई, आज आमचा क्लास नेहमी पेक्षा उशीरा संपला आणि त्यामुळे माझी रोजची बस चुकली. दुसऱ्या बस‌ची वाट बघत मी बस स्टॉप वर थांबली, सोबतच्या मैत्रिणी त्यांच्या बस आल्यावर निघून गेल्या. बस स्टॉप वर बरेच लोक होते, त्यात काही टवाळक्या करणार्‍या पोरांचा ग्रुप होता. मी एकटी मुलगी दिसल्यावर ते काही तरी अश्लील बोलत माझ्या आजूबाजूला उभे होते. मी ज्या बाजूला जाईल तिकडे येऊन उभे. बरेच लोक तिथे असूनही कुणी त्यांना काही बोलत नव्हते, दुर्लक्ष करत आपापल्या फोन मध्ये, काही जण दुसरीकडे बघत उभे होते. मी खूप घाबरले तशातच तुला फोन करून कळवावे म्हणून फोन काढला तर एकाने येऊन धक्का दिला, माझा फोन खाली पडला, बंद झाला.. कसाबसा उचलून बॅगेत ठेवून बस कधी येते म्हणून मी रडकुंडीला येऊन बसची वाट पाहत होते. एकाने येऊन ओढणी ओढली आणि चूकून झालं असं दाखवत पुढे गेला..त्याच्या सोबतचे त्याला वाहवा करत हसू लागले.. माझ्या फिगरवरून काही तरी अश्लील बोलायला लागले..ते सगळे नजरेने बलात्कार करत होते आई…”
    बोलतानाच मनवा सगळा प्रकार आठवून रडू लागली..परत सांगायला लागली..
    ” तिथल्या गर्दीत सगळ्यांना कळत होते की मी घाबरली आहे.. रडकुंडीला आली आहे..पण कुणी दखल घेत नव्हते.. तितक्यात तिथून एक हिजड्यांचा ग्रूप जात होता, त्यात एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, ते सगळे जवळ आले, माझी विचारपूस केली..मी रडायला लागली..माझ्या सोबत होत असलेला प्रकार सांगितला.. एकाने जाऊन त्या ओढणी ओढणार्‍या मुलाच्या कानाखाली मारली. त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला.. घाबरून ते टवाळके तिथून पळत सुटले. आजूबाजूला असलेले लोक सगळा प्रकार बघत होते पण फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. ते मुलं पळून गेल्यावर काही लोक सांत्वन करण्यासाठी आले पण तेच लोकं आधी मात्र लक्ष नसल्यासारखे उभे होते. मी खूप घाबरले आई.. माझं रडणं थांबतच नव्हतं.. तेव्हा एकाने रिक्षा थांबवली, मला पत्ता विचारला आणि म्हणून त्यातले दोघे मला सुखरूप घरी पोहोचवायला घरा पर्यंत आले. तू मात्र त्यांना नको ते बोललीस. काही माहित नसताना त्यांचा अपमान केला..ते काही अपेक्षा न ठेवता परत गेले आई तुझं बोलणं ऐकून. त्यांचे मी साधे आभार सुद्धा मानले नाही..मी खूप घाबरले होते..ते माझ्या मदतीला आले नसते तर माझं काय झालं असतं काय माहित. आई माझी इज्जत त्यांच्यामुळे वाचली. ते हिजडे नाही तेच खरे हिरो आहेत..”
    मनवाच्या बोलण्याने आईला रडू आवरले नाही.. ऐकूनच आईच्या अंगावर काटा आला.. ज्यांना आपण हिजडे म्हणून अपमानीत केले त्यांच्यामुळे आपल्या मुलीची इज्जत वाचली. त्यांचे उपकार कशे फेडायचे.. आई मनवाला कुशीत घेऊन पश्चात्ताप करत रडू लागली..मनवा सुखरूप घरी पोहोचली म्हणून मनोमन त्यांचे आभार मानू लागली.

    कधी कधी आपल्याला परीस्थिती माहीत नसताना आपण कुणाला असं दुखावतो आणि नंतर पश्चात्ताप होतो.. जसं मनवाच्या आईच्या बाबतीत झालं..
    जे आहे ते नैसर्गिक आहे..ते लोक त्रृतीयपंथी असले तरी एक मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत.. तेव्हा त्यांच्यावर हसत त्यांची खिल्ली उडवणे, नको ते त्यांना बोलणे खरंच अयोग्य आहे…

    कथा कशी वाटली ते जरूर कळवा.. शिवाय तुमचं याबद्दल मत मांडायला विसरू नका…

    – अश्विनी कपाळे गोळे

  • आई- मातृदिन विशेष

    आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते.

    सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार आई सकाळी सगळ्यात आधी उठून डबा बनवते, ती घरी असली तरी वेळेत सगळं तयार ठेवण्याची जबाबदारी तिची असतेच.

    आई नोकरी करणारी असेल तरी तिची ही जबाबदारी चुकत नाही.

    मुलं जशजशी मोठी होतात त्यानुसार त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-बाबा दोघांची असली तरी त्यात आईचा मोलाचा वाटा असतो.

    मुलं वयात येऊ लागली की मुलांना मैत्रीण बनून समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे अशा अनेक जबाबदारी आई तत्परतेने सांभाळत असते. या सगळ्यात घरातील प्रत्येकाची काळजी तिला असतेच. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सगळी काळजी आईला, पण ती आजारी असेल तर सगळ्यांची दिनचर्या विस्कटून जाते.

    आई हा प्रत्येक घराचा आधार स्तंभ असते, तिच्याशिवाय घरातील प्रत्येकजण अपुर्ण असतो.

    तरुण वयात‌ तसेच लग्नानंतर मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई. मनातलं सगळं आई जवळ सांगितले की मन कसं हलकं वाटतं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना तिचे मार्गदर्शन नेहमी महत्वाचे ठरते. घरात काय आहे काय नाही‌ याची यादी, इस्रीवाला, दूधवाला, कामवाली अशे घरातले बाहेरचे सगळे मॅनेजमेंट खाते आईकडेच असते.

    आईची भूमिका ही आयुष्यभर संपत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्या असह्य कळा सहन करत आई बाळाला जन्म देते, बाळासाठी अनेक रात्री जागून काढते. आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखे जपते. मुलं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांच्या मागे ती उभी असते, मुलांचे जीवन सुरळीत चालू आहे हे बघून ती आनंदात असते. शेवटपर्यंत तिला आपल्या मुलांची काळजी असते, कशाचीही अपेक्षा न ठेवता ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत: उपाशी राहीन पण ती घरात सगळ्यांना पोटभर खाऊपिऊ घालण्यासाठी धडपडत असते.

    बाबांच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी ती जपते, त्यांच्या गरजा पूर्ण करते.

    ती आयुष्यात स्वत: साठी खूप कमी जगते, तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती घरात सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.

    ते म्हणतात ना”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ते खरेच आहे. आईविना आयुष्य अपूर्ण आहे. आईची माया, तिची भूमिका दुसरा कुणीच साकारू शकत नाही. आई या शब्दात खरंच खूप भावना दडलेल्या आहेत.

    आईची महती जितकी लिहिली तितकी कमीच आहे.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

    सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे. 

    ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट.

    तो : एक काम कर, ती किट ठेव जरा वेळ बाजूला आणि झोप. उठल्यावर बघू आपण परत. आता तरी मला एकच लाइन दिसते आहे.

    एवढे बोलून त्याने तिला झोपवले आणि तो परत झोपी गेला. 

    काही वेळाने तो उठला आणि बघतो तर ती अजूनही किट कडे कटाक्षाने बघत बसलेली.

    त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि किट कडे बघितले तर त्याला सुद्धा दुसरी अंधुक लाईन दिसत होती.

    त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आनंदाची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. Gynaecologist कडे जाऊन गुड न्यूज ची खात्री करून घ्यायची असे ठरले. रविवार असल्याने दोघंही जरा निवांत होते. 

    आता दोघांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्याने लगेच Gynaec ची अपॉइंटमेंट घेतली.

    ठरलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन check up केला, डाॅक्टरांनी ती आई‌ होणार असल्याचे सांगितले आणि काही आवश्यक सुचना दिल्या. तो अतिशय लक्ष देऊन सगळं ऐकत होता, ती मात्र आनंदाच्या भरात दुसरीकडेच हरवली होती, चेहऱ्यावर एक स्मीत करत वेगळ्याच विश्वात रमली होती. 

    ठिक आहे, Again Congratulations and take care या डॉक्टरांच्या वाक्याने ती हरवलेल्या विश्वातून बाहेर आली. 

    दोघेही खूप आनंदात होते, घरी येतांच त्याने तिला हळूवारपणे मिठी मारली. त्या मिठीत तिला एक काळजी, होणार्‍या बाळाचे जबाबदार वडील अशा अनेक भावना जाणवल्या. 

    आई जवळ आणि सासुबाई जवळ ही आनंदाची बातमी कधी एकदा शेअर करते असं तिला झालं. आईला बातमी सांगितली त्याच क्षणापासून आईची काळजी, काय करायचे काय नाही करायचे अशी सूचनांची यादी यायला सुरुवात झाली. आई आणि सासूबाई दोघिंनीही सांगितले की लगेच ही बातमी कुणाला सांगू नकोस. सुरवातीला तीन महिने गर्भ अगदी नाजूक अवस्थेत असतो, त्यामुळे पुर्णपणे विकास होईपर्यंत कुणाला सांगत नसतात. 

    नंतर Bike वर जाणं बंद झाले आणि त्याऐवजी कार चा वापर सुरू झाला. शक्यतो bike ने कुठे जाणे या अवस्थेत टाळलेले बरे असते, गेले तरी दोन पाय दोन्ही कडे टाकून न बसता एका बाजूला बसून जावे. दररोज आॅफिसला नवर्‍यासोबत जाताना दोन पाय दोन्ही बाजूला टाकून बसून जाण्याने आणि धक्क्यांमुळे एका मैत्रिणीची गर्भपिशवी चौथ्या महिन्यांतच ओपन झालेली आणि पुढे बाळ होत पर्यंत मग complete bed rest. त्यामुळे सहसा ते टाळलेले बरे. 

    आहारात आता फळं, शक्य ते पौष्टिक पदार्थ असे बदल झाले. सुरवातीला दोन महिने काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र भयंकर मळमळ, उलटी, थकवा यांनी घेरले. काही खाल्लं की उलटी होणार, कशाचाही वास नको नको वाटायचा. अन्न तर नकोच वाटायचे पण बाळाचा विचार करून जे खावं वाटले ते बिंदास खायचं असं ठरवलं. 

    Papaya, pineapple आणि Chinese food सोडलं तर बाकी जे खावं वाटले ते बिंदास पण प्रमाणात खाल्ले. Papaya, pineapple आणि Chinese food या अवस्थेत खायला चालत नाही पण बाकी कशानेही काही अपाय नसतो याची खात्री पटली. अर्थात सगळे पोषक रस पोटात गेलेले चांगले असतात मग ते गोड, आंबट, कडू अशे कुठलेही असो.  

    गरोदरपणाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण ही नैसर्गिक अवस्था असते, आजारपण नाही हे लक्षात घेऊन नीट काळजी घेणे आवश्यक असते. बाळाचा पूर्ण विकास आईच्या खाण्यापिण्यावर आणि तिच्या दिनचर्येवर अवलंबून असतो, त्यासाठी योग्य काळजी घेतली तर कधीही चांगले. हंगामी फळे, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. 

    खूप कर्कश आवाज, जास्त हळव्या करणारे कार्यक्रम अशा गोष्टी टाळाव्यात. जितकं आनंदात राहता येईल तितके चांगले. योग्य आराम, व्यायाम, चांगले साहित्य वाचन केले की मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते, या अवस्थेत अशी दिनचर्या पाळली तर फायद्याचे ठरते.

    तब्येत बरी नसली तरी आई होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता मनात, माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल. या सगळ्यात पाचवा महिना संपत आला तेव्हा मळमळ उलटी थकवा दूर झाल्यासारखा वाटला, तब्येतीत सुधारणा झाली, बाळाची हालचाल सुरू झाली. बाळाची पहिली हालचाल पोटात जाणवली तो क्षण तर शब्दात मांडता येणार नाही. हळूहळू बाहेर सगळ्यांना पोटाच्या वाढत्या आकारावरून गुड न्यूज असल्याचे जाणवायला लागले. 

    या अवस्थेत सगळे किती काळजी घेतात, नवरा तर अगदी फुलाप्रमाणे जपतो, काय हवं नको ते अगदी समोर नाव काढताच हजर. 

    जसजसा पोटाचा आकार वाढत गेला तशा बाथरूमच्या चकरा वाढल्या. नऊ महिने कसे भराभर गेले, सातव्या महिन्यात ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला, छान फोटोशूट केले, अगदी आनंदात हे दिवस गेले. 

    पाच ते सात महिन्यांच्या कालावधीत अगदी छान वाटत होते. आठवा महिना सुरू झाला आणि नंतर शरीर जड वाटायला लागले, पायावर जरा सुज यायला सुरुवात झाली ,जास्त वेळ बसून नको वाटायचे त्यामुळे मध्ये जरा चालायचे. या दिवसांत जितके जास्त चालायला जमेल तितकं चांगलं पण ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते पण पोटाचा वाढलेला घेर सांभाळून झोपताना जरा त्रास हा होतोच. 

    या पुर्ण अनुभवात जेव्हा सोनोग्राफी मध्ये बाळाला आपण बघतो तो क्षण किती गोड असतो. कधी एकदा बाळ बघायला मिळते असं वाटतं. 

    सगळ्या गोष्टी अनुभवताना दिवस भराभर गेले, जसजसा बाळ होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत होती तसतशी मनात हुरहूर, अनेक प्रश्न, एक भिती अशी गोंधळलेली अवस्था झाली होती. 

    अचानक काही त्रास झाला आणि ट्राफीक मध्ये अडकले तर काय, कळा नक्की कशा येतात, बाळ होताना खूप त्रास होईल का, मला सहन होईल का अशा अनेक शंका मनात असतात पण मनाची तयारी, बाळाच्या आगमनाची उत्सुकता यामुळे आपण खूप strong होत जातो. 

    बघता बघता वेळ आली बाळ होण्याची, २४ तास Labour Room मध्ये कळा , OT मधल्या वेदना सहन करून एक गोंडस परी आमच्या आयुष्यात आली. मनापासून वाटायचे मला मुलगी व्हावी, तिला बघून एका क्षणात सगळ्या वेदनांचा विसर पडला. दोघेही खूप खुप आनंदी झालो.

    आई होण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, प्रत्येकाची गरोदरपणातील अवस्था, अनुभव हा वेगळा असतो. त्यासाठी योग्य काळजी, आनंदी मन , संयम खूप आवश्यक आहे. 

    – अश्विनी कपाळे गोळे

  • Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव

        आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते.

    अशा या सुंदर अनुभवात breast Abscess सारखी समस्या आली की तो अनुभव अतिशय painful असतो, आई आणि बाळ दोघांनाही या गोष्टीचा त्रास होतो. असाच एक painful अनुभव मी शेयर करते आहे.

    बाळासोबत छान वेळ घालवताना भराभर दिवस जात होते. एक दिवस अचानक सकाळी उजव्या Breast मध्ये दुखायला लागले, अंगात ताप आलेला होता. गरगरल्या सारखे वाटत होते, मळमळ आणि उलटी सुद्धा सुरू होती. अचानक अशे काय झाले कळायला मार्ग नव्हता कारण बाळंतपण झाल्यामुळे घरीच, बाहेर जाणं, बाहेर खाणं सगळं बंद. माझी मुलगी तेव्हा फक्त चार महिन्यांची, मला क्षणभरही सोडून वेगळी कधी नव्हतीच.

    वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी सासरी खेडेगावात खूप काही तज्ज्ञ डॉक्टर नव्हते आणि शहर अगदी दहा किलोमीटर अंतरावर असले तरी उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात बाळाला सोडून अथवा घेऊन जाणं जरा कठीणच वाटले. गावातील डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या म्हणण्यानुसार उन्हामुळे असं झालं आहे हे सांगून त्यांनी ताप कमी होण्यासाठी औषधे दिली आणि आराम करण्याचे सुचवले. Breast मध्ये दुखत होते त्यासाठी जरा शेक देऊन मालीश करायला सांगीतले. सांगितल्या प्रमाणे पाच दिवस औषध आणि बाकी काळजी घेतली पण त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला. अचानक आहारात बदल झाला, जेवणाची इच्छा होत नव्हती पण बाळासाठी म्हणून जेवण सुरू होते. कदाचित ताप असल्यानं असं होतं आहे असे समजून आठवडा गेला आणि आम्ही आमच्या घरी पुण्यात आलो. प्रवासानंतर रात्री अंगात परत खूप ताप भरला, अशक्त वाटू लागले. स्तनातील वेदना वाढत होत्या, ताप आणि त्या वेदना यामुळे रात्र जागून काढली. सकाळी लगेच Gynaec कडे गेले, तपासणी केल्यानंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे अंगात ताप आलेला आहे. त्यासाठी अॅंटीबायोटिक्स दिली आणि स्तनात गाठ जाणवत असल्याने स्तनाचे स्कॅनींग करायला सांगीतले. पुढचे पाच दिवस औषध घेत असताना वेदना कमी होत नव्हत्या त्यामुळे स्कॅनींग करायचे ठरले. 

    स्कॅनींगमध्ये कळाले की स्तनामध्ये गाठ होऊन पस सुद्धा झालेला आहे. त्यामुळे स्तनावर लालसरपणा आला असून अंगात ताप आहे. स्कॅनींगचे रीपोर्ट ब्रेस्ट स्पेशालीस्टला दाखवताच तिने आॅपरेशन करून लवकरात लवकर पस काढण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आॅपरेशन करायचे ठरले. या सगळ्यात माझ्या सोबत बाळालाही त्रास सहन करावा लागत होता. माझ्या दुखण्यामुळे तिला लवकरच फाॅर्मुला मिल्क सारखे टॉप फिडींग सुरू करावे लागले.

    वेळ न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळी मी आॅपरेशन साठी हाॅस्पीटलला दाखल झाले. या सगळ्यात माझ्या मनात सतत विचार येत होता तो म्हणजे मला स्तनांचा कर्करोग तर झाला नसेल. मला काही झाले तर माझ्या बाळाचं कसं होणार. डॉक्टर समजूत काढत असली तरी मला मात्र अशा अनेक वाईट विचारांनी घेरले होते, पहील्यांदाच मी आणि माझं बाळ एकमेकींपासून वेगळे राहणार होतो. मी २४ तास हाॅस्पीटलला असताना माझ्या बाळाची काळजी मला जास्त त्रास देत होती. 

    तिची सुद्धा वेगळी अवस्था नव्हती, सतत रडून मला माझी आई पाहिजे या भावनेने ती सगळीकडे मला शोधत होती.

    ठरल्याप्रमाणे आॅपरेशन झाले, इन्फेक्शन परत होऊ नये म्हणून अशा केस मध्ये टाके देत नाही, त्यामुळे पाच ते सहा आठवडे जखम भरून येईपर्यंत ड्रेसिंग करावे लागणार होते. जखमेतला पस तपासणीसाठी पाठविण्यात आला, सुरवातीला जखम मोठी आणि खोल असल्याने दररोज ड्रेसिंग करताना तिव्र वेदना व्हायच्या. माझ्या साठी हा एक अतिशय वेदनादायी अनुभव होता.

    या तीन आठवड्यात वजन अचानक पाच किलो कमी झाले. अशक्तपणा आला, बाळ माझ्यावर अवलंबून असल्याने स्वत: कडे मी आता नीट लक्ष देऊ लागली. पस तपासणीनंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात झाले त्यासाठी दहा दिवस दररोज दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार. पस रिपोर्ट वरून ब्रेस्ट अॅब्सेस आणि कॅन्सर यामध्ये फरक आहे, हे मला डॉक्टरांनी पटवून दिले तेव्हा मला खात्री पटली.

    सतत हाॅस्पीटलच्या चकरा मारून वैताग आला होता पण अर्थातच काही पर्याय नव्हता.

     या सगळ्यात बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न सुरू होते. हळूहळू जखम भरून येत होती, तब्येतीत सुधारणा होत गेली. या सगळ्यात माझ्या दुखण्यामुळे घरी सगळ्यांनाच मानसिक, शारीरिक त्रास होत होता. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, औषधे न मिळाल्याने तसेच स्तनातील वेदनांकडे दुर्लक्ष झाल्याने माझ्यावर ही वेळ आली होती. 

    स्तनात दूध साठू नये म्हणून काळजी घेणे किती आवश्यक आहे हे मला जाणवत होते. 

    माझ्या अनुभवावरून मी नविन आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की स्तनामध्ये दुध साठवून राहणार नाही याची काळजी घ्या, काहीही त्रास झाला तर दूर्लक्ष न करता त्वरीत उपचार करून घ्या.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • आई, बाळ आणि नोकरी

    सरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू झाला.

    काही दिवसांतच एका गोंडस बाळाचे आगमन झाले. आई झाल्याचा आनंद, तो सुखद अनुभव शब्दात मांडता येणार नाही. बाळाच्या सहवासात दिवस कसे भराभर जात होते, रोज काहीतरी नवीन अनुभव. बाळाच्या झोपच्या वेळेनुसार आईची दिनचर्या ठरलेली. सहा महिन्यांची रजा संपत आली. बाळासाठी अजून एक महीनाभर रजा वाढवून मिळाली तेव्हा खूप छान वाटले. बघता बघता ती सहा महिन्यांची झाली.

    सुट्टी कशी संपत होती कळत नव्हतं. निरागस, गोंडस , सुंदर चेहऱ्याला न्याहाळत दिवस कधी मावळतो कळत नव्हतं. हळूहळू नोकरीवर परत रूजू होण्याची वेळ जवळ येत होती, तसतशी मनात हुरहूर लागायला सुरु झाली. मी आॅफिसला गेल्यावर बाळ कसे राहणार. नोकरीत जरा ब्रेक घ्यावा का अशे अनेक विचार मनात गोंधळ उडवू लागले. नवर्‍याशी त्याबाबत चर्चाही केली. आपण नोकरी केली तर बाळाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी मदतच होईल. शहरातील वाढता खर्च, महागडे शिक्षण यासाठी दोघांनीही नोकरी केली तर फायद्याचे आहे हा विचार करून आॅफिसला रुजू व्हायचे ठरवले. सासुबाई आणि मदतीला बाई घरी असल्यामुळे जरा निश्चिंत होते पण शेवटी आईचं मन. प्रत्येक नोकरी करणारी स्त्री या परीस्थितीतून जाते.

    सुरवातीला आॅफिसमध्ये सतत कानात तिचे बोबडे बोल गुंजन करायचे , डोळ्यांपुढे तिचं हसणं, तो निरागस चेहरा, अवतीभवती सगळीकडे तिचं निरीक्षण सुरू असतानाचे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक क्षणही दूर जात नव्हते.. या सगळ्यात कामात काही लक्ष लागत नव्हते. आईसाठी खरंच ही द्विधा मनस्थिती असते.त्यात घरी आपुलकीने बाळाची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर जरा समाधान वाटते. शरीराने आॅफिसला असले तरी मन मात्र घरीच, बाळाच्या विचारात गुंतलेले. मग फोनमध्ये तिचे फोटो बघून चेहऱ्यावर एक स्मितहास्य, अधूनमधून फोनवर तिची विचारपूस.

    सुरवातीला आॅफिसला फार काम नसल्याने लवकर घरी यायला मिळायचं. घरी आले की ती अगदी दिवसभर आई दिसत नसल्याने आईला एकही क्षणही आईला सोडत नाही. घरी आल्यावर बाळाची ती गोड मिठी, तिचं हसणं खूप काही सांगून जाते. 

    प्रत्येक आईसाठी खरंच हा एक वेगळाच अनुभव असतो. 

    अश्विनी कपाळे गोळे