Tag: Premkatha

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३

    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे.

    दादाने अजितचा फोटो नंबर मिळवून त्याला कॉल केला आणि भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलावले, हेही सांगितले की याविषयी संपदाला काही कळायला नको. दादाच्या फोन नंतर अजित जरा घाबरलेला, त्याला बर्‍याच शंका मनात येऊ लागल्या, दादाला आमचं प्रेम प्रकरण माहीत झालं असेल आणि चिडून मला दम द्यायला तर बोलावलं नसेल ना, माझं सैराट मधल्या प्रिंस दादा सारखा तर वागणार नाही ना संपदाचा दादा अशे अनेक बरेवाईट विचार अजितला हैराण करू लागले. संपदाची परिक्षा संपेपर्यंत तिला त्रास द्यायला नको, डिस्टर्ब करायला नको म्हणून तिच्याशी मोजकेच बोलणे सुरू होते.
    जे होईल ते होईल पण आता दादाला भेटायचं, त्यांना संपदाचा हात लग्नासाठी मागायचा असं ठरवून ठरल्याप्रमाणे अजित दादाला भेटायला गेला.
    एका छोट्याशा हॉटेल मध्ये दोघे भेटणार होते, अजित पोहोचला आणि दादाला कॉल केला तर तो आधीच पोहोचला होता, एका टेबलावर अजितची वाट बघत होता. अजित जरा संकोचाने जवळ गेला, भेटला आणि दोघांनी मस्त चहा कॉफी मागवली. दादाने अजितचा गोंधळ ओळखला, त्याला शांत करत म्हणाला, ” अरे , तू इतका संकोचाने बोलू नकोस, मी सहज भेटायला आलो आहे. काळजी करू नकोस, मला तुझ्यावर राग वगैरे नाही. आता माझ्या बहिणीची आवड कशी आहे, मलाही कळायला नको का..? तू हवं तर एक मित्र म्हणून बोल माझ्याशी..”
    दादाच्या बोलण्याने अजितला जरा धीर आला.. पुढे अजित विषयी जाणून घेण्यासाठी दादाने गप्पा सुरू केल्या. अजितच्या प्रत्येक वाक्यात संपदा विषयीचं प्रेम दादाला जाणवतं होतं. आपल्या बहिणीची निवड योग्य आहे याची दादाला खात्री होत होती. दादाने अजितला विचारले, “तुझे आई बाबा संपदाला स्विकारतील का, जर त्यांना मान्य नसेल तर काय..”
    अजित त्यावर म्हणाला, ” माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक, माझं मन आतापर्यंत त्यांनी खूप जपलं, माझ्या आवडीनुसार शिक्षण, नोकरी, इतर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हा या लग्नाला नकार देतील असं वाटत नाही मला, आणि संपदा इतकी गुणी मुलगी आहे, गोड स्वभाव, निरागस आहे ती, तिला भेटल्यावर माझे आई बाबा नाही म्हणतील असं वाटतं नाही मला..तरी जर ते तयार नसतीलच तर मी खरंच पूर्ण प्रयत्न करेन त्यांची समजूत काढण्याचा.. काही झालं तरी संपदा शिवाय आयुष्य मी नाही जगू शकत दादा.. आमचं लग्न नाही झालं तर तिच्या जागी मी कुणाचाही आयुष्यभर स्विकार करणार नाही..लग्नच करणार नाही..”
    दादाला अजितचे बोलणे फिल्मी वाटत असले तरी त्यामागच्या भावना मात्र खर्‍या आहे हे जाणवले. लवकरच संपदाची परीक्षा संपली की आमच्या घरी मी तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी बोलतो असं दादाने म्हणताच अजित आनंदी झाला. मीही आई बाबांना याविषयी कल्पना देतो आणि पुढे घरच्यांना भेटायचं ठरवूया असंही अजितने सांगितलं. सगळं सूरळीत होत पर्यंत या विषयी संपदाला कळायला नको असं दादाने अजितला सांगितले.

    दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, अजितला आता एक आशेचा किरण दिसला. काही दिवसांतच अजितने घरी संपदा विषयी सांगितले, आई बाबांना अजितच्या वागण्यातून संशय आला होता पण तो स्वतः हून सांगेपर्यंत काही विचारायचे नाही असं त्यांचं ठरलं होतं. आई बाबांनी संपदा विषयी सगळी चौकशी केली, फोटो बघितला. संपदाच्या घरच्यांनी पुढाकार घेतला तर आमची काही हरकत नाही हेही सांगितले. ते ऐकताच अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई बाबा इतक्या सहज तयार झाले म्हणताच अजितला सुखद धक्का बसला. आता प्रश्न होता संपदाच्या घरच्यांचा, त्यांनी पुढाकार घेतला तर संपदा कायमची माझी होणार म्हणून अजित नकळत अनेक स्वप्न रंगवायला लागला.
    इकडे दादाने आईला याविषयी कल्पना दिली पण असं प्रेमविवाह आपल्या कुटुंबात कुणाचाच नाही रे.. नातलग काय म्हणतील म्हणत आईने विषयाला वेगळं वळण दिलं. बाबांना हे मान्य होणार नाही, प्रेमविवाह तोही आंतरजातीय..नको आपण बाबांना नको सांगायला..उगाच चिडतील ते..संपदा समजदार आहे.. समजून सांगू आपण तिला असं म्हणत आईने अप्रत्यक्षपणे या लग्नाला नकार दिला.
    दादा आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, ” आई, अगं अजितला भेटलो मी, चांगला मुलगा आहे तो.. शिवाय संपदावर खूप प्रेम आहे त्याच..सुखात राहील आपली चिऊ.. बाबांशी बोलून तर बघू.. आंतरजातीय विवाह म्हणजे काही गुन्हा नाही.. संपदाला कुणीही पसंत करेन पण ती त्याचा मनापासून स्विकार करेल असं वाटत नाही मला..आई बाबांना दुखवायचे नाही म्हणून तडजोड करत लग्न करेन ती पण प्रेम करेलच असं नाही..अजितला विसरणे कठीण जाईल तिला.. इतक्यात तू बघितले असशील कशी गप्प गप्प असते ती..अजित विषयी घरी कसं सांगायचं याच विचाराने हैराण झाली आहे ती.. शेवटी तिचं सुख महत्वाचं..आपण सगळी चौकशी करून अजितच्या घरच्यांना भेटून सगळ्यांना मान्य असेल तर दोघांचा विचार करून लग्न लावून द्यायला काय हरकत आहे. नातलग बोलतील ते किती दिवस.. जातीतल्या मुलाशी लग्न केले तरी काही ना काही उणीव काढून सुद्धा बोलतातच.. इतरांच्या बोलण्याचा विचार बाजूला ठेवून एकदा संपदाचा विचार कर आई..तू हो म्हणालीस तर बाबांशी बोलू आपण..”
    दादाचं बोलणं संपते तितक्यात बाबांचा मागून आवाज आला, “माझी मुलं इतकी मोठी झाली कळालेच नाही रे मला..मी तुम्हा दोघांचं सगळं बोलणं ऐकलं..माझी मुलं चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची खात्री होती मला..संपदा असं अचानक कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं, मी अजूनही लहानच समजत आलो तुम्हा दोघांना..तू आईला जसं समजून सांगितलं त्यावरून बहिणींचं आयुष्य सुखी करण्यासाठीची तुझी धडपड, तिच्या विषयीचं प्रेम बघून मला खरंच अभिमान वाटला आज तुझा..” बाबांचं बोलणं ऐकून दादा बाबांच्या मिठीत शिरला..बाबा तुम्ही परवानगी द्याल ना संपदा अजितच्या लग्नाला..
    संपदा आपल्याला हट्ट करून लग्न लावून द्या असं कधीच म्हणणार नाही..पण मला तिची घालमेल कळत होती बाबा.. म्हणून मी अजितला भेटलो.. नकार द्यावा असा नाहीच तो..घरी बोलणार आहे तो संपदा विषयी..बाबा आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे..
    बाबा यावर जास्त काही बोलले नाही..संपदा ची परीक्षा संपली की बघू..अजितच्या घरी तयार असतील तर आपण विचार करू म्हणाले.
    काही वेळाने अजितचा दादाला फोन आला, त्यांचे आई बाबा लग्नाला तयार आहे हे मोठ्या आनंदाने त्याने सांगितले. आता सगळे वाट बघत होते संपदा ची परीक्षा संपण्याची. अजितच्या घरी काही अडचण नाही हे दादाने बाबांच्या कानावर टाकले.
    शेवटचा पेपर संपल्यावर संपदा घरी आली, पुढे अकाऊंटींग मध्ये करीयर करण्याविषयीची इच्छा बाबांना तिने बोलून दाखवली. आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे असं बाबांनी म्हंटल्यावर तिला हायसे वाटले.
    बाबांनी संपदा जवळ अजितचा विषय काढला, तिला ऐकताच धक्का बसला, बाबांच्या मिठीत शिरून ती रडकुंडीला आली.. काय बोलावे तिला काही कळेना.. बाबांनी तिला विचारले, “अजित सोबत लग्न करण्याविषयी काय मत आहे तुझं..”
    “बाबा, तुम्हाला कसं कळलं.. म्हणजे मी सांगणार होतेच पण…..बाबा तुम्ही रागावले का माझ्यावर….” असं तुटक तुटक बोलत संपदा गोंधळली..
    दादा‌ आणि आई तिथे होतेच..बाबा हसून म्हणाले, ” अगं, रागवत नाही आहे.. विचारतोय मी तुला.. लगेच लग्न करायचं नाही म्हणत पण तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला..”
    संपदा स्वतःला सावरत कसंबसं बोलून गेली,” बाबा‌, अजित आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे.. त्याने लग्नासाठी मागणी घातली होती पण तुम्ही तयार असाल तरच हो म्हणेल मी असंच सांगितलं मी त्याला..मला तुम्हाला दुखवायचं नाही बाबा..”
    बाबा म्हणाले, “तुला पुढे तुझं करिअर करायचं आहे.. स्वतः च्या पायावर उभं राहायचं आहे.. पुढे कधी चुकून वाईट प्रसंग आलाच तर स्वावलंबी असणं गरजेचं आहे.. लग्नाचं म्हणशील तर मी अजितच्या घरच्यांना भेटायला तयार आहे..”
    बाबांचं म्हणनं ऐकताच सगळ्यांना आनंद झाला..
    दादाने अजित विषयी घरी कसं कळाल याची पूर्ण गोष्ट संपदाला सांगितली..
    अजित आणि दादा यांनी दोन्ही कुटुंबे एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठरविला.. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरी सगळे त्यांच्या लग्नाला तयार झाले..संपदाला शिक्षण, करिअर याबाबतीत आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अजितच्या घरच्यांनी बोलून दाखवले.
    आपण सगळं स्वप्न तर बघत नाही ना‌ असा भास अजित आणि संपदाला होत होता.
    इतक्या सहजपणे सगळं जुळून येणं म्हणजे नशिबच असं दोघांनाही वाटत होतं.
    दादा नसता तर आपण कधीच बाबांशी या विषयावर बोलू शकलो नसतो असं संपदाच्या मनात आलं, दादामुळे अजित आयुष्यभरासाठी आपला होणार, दादाचे आभार मानावे की काय करावं संपदाला सुचत नव्हतं.. दाराकडे पाहून त्याच्या मिठीत शिरून तिचे आनंदाश्रु भराभर वाहू लागले..त्यावर तिला दादा भाऊक होत म्हणाला, “अगं वेडाबाई, आज लग्नाची बोलणी आहे.. सासरी जायला वेळ आहे अजून..आता पासून रडते की काय..सांगू का अजितला..संपदाला नाही यायचं तुझ्या घरी म्हणून..??”
    दादाच्या बोलण्याने रडतच हसू आलं तिला..अजितने ही दादाला मिठी मारत मनापासून आभार मानले..दादा माझ्या आयुष्यात इतका सुंदर दिवस तुमच्यामुळे आला असं म्हणताना अजितचे डोळे आनंदाने पाणावले होते..

    अशा प्रकारे दोघांच्या प्रेमकथेचा गोड शेवट आणि संसाराकडे सुंदर वाटचाल सुरू झाली..

    ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा ??

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे ?

    अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर आधार म्हणून तिने नकळत अचानक तिचा‌ हात अजितच्या खांद्यावर ठेवला आणि तिच्या हाताच्या स्पर्शाने अजितची अजून एकदा विकेट उडाली. संपदाच्या लक्षात येताच ती पटकन हात काढून लाजतच सॉरी म्हणाली आणि त्यावर अजितने लगेचच हात ठेवलास तरी हरकत नाही म्हणताच तिने परत आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. आज दोघांचीही अवस्था जरा‌ वेगळीच झाली होती. असं ठरवून भेटल्यावर काय बोलावे काय नाही अशी दोघांची अवस्था झालेली होती. कॉफी शॉप मध्ये पोहोचताच अजितने दोघांसाठी कॉफी मागवली, दोघेही आजूबाजूला बघत लाजत अवघडल्यासारखे एकमेकांसमोर बसले होते. चुकून नजरानजर झाली की संपदा एक गोड स्माइल द्यायची आणि अजित त्या स्माइल मुळे घायाळ??. बराच वेळ दोघे शांतपणे बसून नजरेनेच बोलत होते, काही वेळाने  अजितने पुढाकार घेत गप्पा सुरू केल्या. ही वेळ कधी संपूच नये अशी अजितची अवस्था झाली होती.
    अशाच दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. संपदाचा सहवास अजितला हवाहवासा वाटू लागला.संपदा कधी भेटायला तयार व्हायची तर कधी मुद्दामच अजितची मज्जा बघायला काही कारण काढून भेटायला नकार द्यायची. मनातून तर तिही त्याला भेटायला तितकीच उत्सुक असायची. असं दोघांचं भेटणं, बोलणं सुरू होत, आता संपदाला मनातल्या भावना सांगायला हव्या, तिला लग्नासाठी विचारायला हवं असं अजीतने मनोमन ठरवलं.
    येत्या रविवारी संपदाला निवांत भेटून प्रपोज करायचं असं ठरवून अजित तयारीला लागला. कसं प्रपोज करायचं याची प्रॅक्टीस आठवडाभर सुरु होती. संपदा आठवडाभरात दोन वेळा भेटली, फोनवर संवाद हा सुरू होताच. त्याने तिला रविवारी भेटायचं विचारलं तेव्हा काहीही आढेवेढे न घेता ती तयार झाली.
    ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी अजित एक सुंदर लाल गुलाबांचा गुच्छ, एक छानसा दोघांचा फोटो असलेलं पेंडंट घेऊन संपदाची वाट पाहात होता. आज नेहमीपेक्षा जास्त तयार होऊन मोठ्या उत्साहात तो भेटायला आला.
    संपदाला यायला मात्र बराच उशीर झाला, फोन केला तरी ती उत्तर देत नव्हती, तेव्हा संपदा नक्की येयील ना भेटायला, असं तर ती वागत नाही. यायचं नसतं तर आधीच नकार कळवलं असतं संपदाने अशा विचारांमध्ये अजित गुंतला असतानाच मागून येऊन कुणीतरी अजितचे़ डोळे हातांनी झाकले. त्या नाजूक बोटांचा स्पर्श अजितने लगेच ओळखला. हळूच तिचे हात पकडून डोळयांवरून बाजूला करत तो काही बोलणार तितक्यात ती म्हणाली, ” I’m really sorry..मला यायला खूप उशीर झाला..बराच वेळ वाट पहावी लागली ना तुला..sorry again..”

    अजितने मागे वळून पाहिले, संपदा सुद्धा आज छान तयार होऊन आलेली. तिचं निरागस रूप पाहून अजितचा मूड एकदम फ्रेश झाला आणि नकळत तो बोलून गेला, “अगं, sorry म्हणू नकोस, तुझ्यासाठी एक तास काय , आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे मी….? ( जरा वेळ दोघेही स्तब्ध राहून परत अजित बोलला)खूप सुंदर दिसत आहेस संपदा तू.. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..आज तुला यायला जरा उशीर झाला तर अस्वस्थ वाटू लागले होते मला, पण विश्वास होता तू येणार म्हणून.. मला आता तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाहीये.. आयुष्यभर साथ देशील माझी..?”
    अजित अचानक सगळं बोलून गेला, संपदाला त्याच्या मनातील भावना कळत होत्या पण अचानक तो व्यक्त झाल्याने त्यावर काय बोलावे तिला कळत नव्हते. जरा लाजत, गोंधळलेल्या अवस्थेत संपदा म्हणाली, “अजित , मलाही तू खूप आवडतोस पण मला जर वेळ हवा आहे विचार करायला..जरी आपलं प्रेम असलं तरी बाकी गोष्टींचा विचारही करायला हवा.. माझं कुटुंब साधारण आहे, तू श्रीमंत घरातला..तुझ्या घरी आपलं प्रेम स्विकारतील का.. शिवाय माझ्या घरच्यांनाही हे पटेल की नाही मला नाही माहित..प्रेम महत्त्वाचं असलं तरी घरच्यांना नाही दुखावू शकणार मी..मला प्लीज वेळ दे विचार करायला….”
    संपदाच्या अशा उत्तराने अजित जरा नाराज झाला. ” संपदा, अगं तू तयार असशील तर मी घरच्यांशी बोलेल या विषयावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत..प्लीज समजुन घे..”
    “अजित, अरे तू असा विचार नको करू, मी फक्त वेळ मागते आहे विचार करायला.. नाही म्हणत नाहीये..पण लग्न म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.. तेव्हा घरच्यांच्या परवानगीने सगळं झालं तर चांगलं असेल..”
    आता मात्र अजित गोंधळला, संपदाच्या बोलण्याने त्याला तिचा अभिमानही वाटला.. भावनेच्या भरात निर्णय न घेता वास्तविकतेचा विचार करणारी संपदा त्याला आज अजूनच आवडली..”संपदा, तू हवा तितका वेळ घे. माझं खूप मनापासून प्रेम प्रेम आहे गंं तुझ्यावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे.. ” इतकंच तो बोलला.
    आज याविषयी बोलल्यावर दोघेही स्तब्ध झाले.. पुढे काय बोलावे दोघांनाही काही सुचत नव्हते..
    संपदा घरी आल्यावर तिच्या मनात सतत अजितचा विचार सुरू होता. तिचही त्याच्यावर प्रेम होतच पण घरची परिस्थिती लक्षात घेता ती आता विचारात पडली होती.
    संपदाच्या भावाने तिच्या मनातली घालमेल ओळखली. काही तरी नक्कीच बिनसलंय, त्याशिवाय आपली चिमुकली बहीण अशी सतत विचारात राहणार नाही हे त्याच्या लक्षात आले. संपदा शी प्रत्यक्ष बोललो तर ती सांगेल की नाही त्याला शंका वाटली. त्याने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने माहिती काढली तेव्हा त्याला अजित विषयी कळाले. आपली चिऊताई आता मोठी झाली, कुणाच्या तरी प्रेमात पडली या विचाराने दादाला जरा आश्चर्याचा धक्का बसला पण या परिस्थितीत संपदाला मदत करायची असं दादाने ठरवलं.
    पुढचे काही दिवस संपदा आणि अजित भेटलेही नाही आणि फारसं पूर्वी सारखं बोलणंही नाही.. इकडे अजित सतत संपदाच्या उत्तराची वाट बघत होता आणि तिकडे संपदा सगळ्यांचा विचार करून गोंधळलेली होती.
    संपदाची अंतिम वर्षाची परीक्षा जवळच होती, कसाबसा अभ्यास करायची पण पूर्वी सारखं तिचं कशातच मन लागत नव्हतं.
    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता.

    आता दादा अजितला भेटून पुढे संपदाला कशी मदत करतो..त्याला अजित बहिणीचा जीवनसाथी म्हणून आवडेल का..दोघांच्या घरी याविषयी कळाल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच..तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग

    मागच्या भागात आपण पाहीले की मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त अमनने काही तरी सरप्राइज प्लॅन केला होता. ते कळाल्यापासून काही केल्या मैथिलीला रात्री झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती. विचार करतच कशी बशी ती झोपी गेली तोच सकाळ झाली. सासूबाई लवकर उठून आंघोळ करून पूजा करत होत्या, त्या आवाजाने मैथिली जागी झाली. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर सकाळचे सात वाजले होते, आजूबाजूला अमन नव्हता. बेडच्या बाजुला टेबलवर एक सुंदर फुलांचा गुच्छ आणि हॅपी बर्थडे लिहिलेले कार्ड होते.
    फ्रेश होऊन मैथिली बाहेर आली, सासूबाईंनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मैथिलीची नजर मात्र अमनला शोधत होती. सासूबाईंना ते लक्षात आले, त्यांनी तिला लगेच सांगितले “अमन तुझ्यासाठी काही तरी आणायला गेला, तो येत पर्यंत तू आवरून तयार हो. आई बाबा निघालेत, येतीलच ते इतक्यात.”
    मैथिलीचे मन अजूनही गोंधळलेले होते, ती आवरून तयार झाली, चहा बनवला. थोड्याच वेळात आई बाबा आले, मागोमाग अमनही केक घेऊन आला. सर्वांनी मैथिलीला शुभेच्छा दिल्या. बाबा आज गप्प गप्प आहेत, भावनीक वाटत आहे हे मैथिलीने ओळखले. आईला विचारले असता आईने फक्त एवढंच म्हणाली “आज आम्ही दोघेही खूप आनंदात आहोत, तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अमन सारखा जोडीदार मिळाला. ”
    आईचं बोलणं मैथिलीला कोड्यात पाडणारं होतं, आई असं का म्हणते आहे काही कळत नव्हते.
    तितक्यात अमन‌ आला आणि म्हणाला ” चला निघुया, वाटेतच मैथिलीच्या आवडत्या ठिकाणी नाश्ता करू.”
    मैथिली – “कुठे जायचे आहे?”
    अमन – तेच तर सरप्राइज आहे राणी ?”
    अमन, मैथिली, सासुबाई, आई बाबा सगळे कुठे तरी जायला निघाले, मैथिली सोडून सगळ्यांना माहीत होते की आपण कुठे जात आहोत. अमनने तशी पूर्व कल्पना दिली होती. वाटेत एका ठिकाणी छान नाश्ता केला आणि नंतर एका अनाथाश्रम मध्ये पोहचले. मैथिलीला काय सुरू आहे काही कळत नव्हते. तिथे गेल्यावर एका सात वर्षाच्या गोड मुलीला अमन मैथिली जवळ घेऊन आला आणि म्हणाला “कोण म्हणतं की तू कधीच आई होऊ शकत नाही, ही तुझीच मुलगी आहे राणी. तू तिला पहिल्यांदा बघत असली तरी हीने तुझ्याच उदरातून जन्म घेतला आहे. आता पर्यंत ती अनाथ म्हणून या आश्रमात राहीली पण आता आपण हिला दत्तक घेऊन आपल्या घरी घेऊन जायचे आहे. हीच आपली मुलगी आहे, निधी नाव ठेवूया का आपण तिचं. आणि आता यापुढे माझी राणी तू उदास राहायचं नाही.? आम्हा सगळ्यांना हे सत्य माहीत आहे आणि मान्यही आहे. निधी बाळ चल आईला हॅपी बर्थडे म्हणा.”
    निधी ,हॅपी बर्थडे आई म्हणताच मैथिली तिला मिठीत घेऊन ढसढसा रडू लागली.
    अमनचे आभार कसे मानावेत, कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते.
    बाबांनी मैथिलीची माफी मागितली आणि म्हणाले “माझ्यामुळे तुला तुझ्या पोटच्या गोळ्यापासून दूर रहावे लागले , पण जे मी केले ते तुझ्या भविष्यासाठी बाळा. मनावर दगड ठेवून मी लेकराला अनाथाश्रमात ठेवले पण आई आणि मी नेहमीच तिला भेटायला यायचो. कुणीही तिला दत्तक घेऊ नये याची खबरदारी घ्यायचो.
    तू खरच खूप भाग्यवान आहेस, तुला अमन जोडीदार म्हणून भेटला, खूप प्रेम आहे त्याच तुझ्यावर, तुझं हरवलेलं आईपण अमनमुळे नव्याने तुझ्या पदरात पडलं. अमन आणि त्याच्या आईचे आई बाबांनी खूप आभार मानले.”
    अमनच्या आईने सगळं समजून घेतलं, मुलगा सुनेचं सुख कशात आहे ते बघून योग्य निर्णय घेतला याचा मैथिलीच्या आई बाबांना अभिमान वाटला.
    मैथिलीला मात्र प्रश्न पडला की हे अमनला कसं कळाल.
    मैथिलीच्या आईने तिला मिठीत घेतले आणि म्हणाली ” त्या दिवशी अमन मुद्दामच घरी आम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांनी तुझी अवस्था सांगितली मला, शिवाय हेही सांगितले की तू कधीच आई होऊ शकत नाही. या गोष्टींमुळे तू स्वतःला दोष देत उदास राहते, डॉक्टरांनी गर्भाशयाच्या इजा विषयी विचारताच तू अस्वस्थ होत रडायला लागली, तेव्हा अमनला कळाले होते की काही तरी कारण नक्कीच आहे जे तू त्यांना सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी मला विश्वासात घेऊन विचारले. मला‌ राहावलं नाही, बाबांच्या भितीने तुझ्या भूतकाळाविषयी शब्द ही काढता येत नव्हता पण ते घरी नाही हे बघून मी अमनला सत्य सांगितले. जे होईल ते होईल पण किती दिवस सगळं लपवायचे म्हणून मी सांगितले. त्याने ते स्विकारले हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. अमनने आईला याची कल्पना दिली, त्यांनीही तुमच्या दोघांच्या प्रेमापोटी ते स्विकारले. तू खरंच नशिबवान आहेस बाळा. आईला आणि अमनला कधीच दुखवू नकोस.”
    मैथिलीला अमन‌ इतकं गोड सरप्राइज देईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.
    आई बाबा अमन सासूबाई निधी सोबत गप्पा मारत होते, सगळे खूप आनंदात होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मैथिलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते. तशीच ती भूतकाळात शिरली.
    मैथिली आणि निनाद कॉलेजमध्ये सोबत शिकायला होते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम. कॉलेज संपल्यावर सगळे मित्र मैत्रिणी कुठे तरी फिरायला गेले. निनादचं प्लेसमेंट झालं होतं आणि नोकरीनिमित्त बेंगलोरला जाणार होता, आता आपण दोघे परत कधी भेटणार म्हणून दोघेही सगळ्यांसोबत फिरायला गेले असले तरी खूप भावनिक झाले होते. अशातच ते एकमेकांच्या खूप जास्त जवळ आले. अशातच मैथिलीला दिवस गेले.  सुरवातीला घाबरून तिने कुणाला काही सांगितले नाही पण नंतर निनादला याची कल्पना दिली. आई बाबांशी बोलून आपण लग्न करू, सत्य आहे ते सांगू म्हणून निनादने तिची समजूत काढली. आईलाही हे कळाले , ती खूप संतापली, आईने तिला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला पण भितीपोटी ती नाकारत होती शिवाय निनाद बाबांशी बोलून लवकरच लग्न करायचं म्हणाला म्हणून आईला विनवण्या करत होती. निनाद आई बाबांना भेटायला आला, बाबांना हा प्रकार कळाला, ते भयंकर संतापले, दोघांनाही नको ते बोलले पण बदनामी नको शिवाय निनाद लग्नाला तयार आहे म्हणून त्यांनी लवकरच दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. बाहेर कुणाला लग्नापूर्वी हे कळू नये म्हणून खबरदारी घेतली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच. निनाद बेंगलोरला परत जात असताना त्याच्या ट्रॅव्हल्स ला अपघात झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. मैथिली झाल्या प्रकाराने हादरली, स्वतः ला संपवायचा विचार करू लागली. आई बाबांना ही परिस्थिती सांभाळणे कठीण झाले होते. ओळखीतल्या डॉक्टर कडे तपासणी केली पण खूप उशीर झाला होता. आई बाबांनी मैथिलीची खूप समजूत काढली. काही महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला पण त्या बाळाला बघून मैथिली भावनिक होऊन खचून जाऊ नये म्हणून भविष्याचा विचार करून बाबांनी बाळाला तिला न दाखवता अनाथाश्रमात ठेवले. बाळंतपणात मैथिलीला खूप त्रास झाला, तिने अनेकदा स्वतः ला करून घेतलेला शारीरिक त्रास, वेदना यामुळे तिची अवस्था नाजुक होती, अशातच तिच्या गर्भ पिशवीला इजा झाली होती. मैथिली बाळा विषयी विचारायची पण बाबांनी तिच्या भविष्यासाठी तिला एवढेच सांगितले की बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे, यापुढे तुझा बाळाशी काही संबंध नाही. तू भविष्याचा विचार कर. यातून बाहेर पडण्यासाठी तिला वर्ष लागले, नोकरीला लागल्यावर काही काळ का होईना ती यातून बाहेर पडली पण मनात या वेदना ताज्या होत्या. हेच ती लग्नापूर्वी अमनला सांगायचं प्रयत्न करत होती पण बाबांचा धाक, बदनामीची भिती यामुळे ती फक्त मनात झुरत होती.
    हा सगळा भूतकाळ आठवत असतानाच निधी तिच्या जवळ आली आणि हात ओढत म्हणाली “आई , बाबा बोलवत आहेत, माझ्या इथल्या मित्र मैत्रिणी सोबत आपण केक कापायचा आहे. चल पटकन.. “

    मैथिली निधीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अश्रू सांभाळत उठून तिच्या बरोबर जाऊ लागली. मैथिलीचं हरवलेलं आईपण तिला अमनमुळे नव्याने लाभलं.?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा.

    अशाच नवनवीन कथा, माहिती वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका ?

    © अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

  • हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का. अशातच नकळत तिचा आणि अमन‌चा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.
    मैथिली आई वडीलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, घरकामात तरबेज, शिकलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई वडिलांसोबत पुण्यातच राहायची, वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. अमन आणि मैथिलीची भेट एका कंपनीच्या कॉन्फरन्स मध्ये झाली. दोघेही आपापल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आलेले. मैथिलीचे प्रेझेंटेशन, तिचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास बघून अमन तिच्या अगदी प्रेमात पडला. अशीच दोघांची ओळख झाली, हळूहळू मैत्री झाली.
    अमन कॉलेजमध्ये असताना त्याचे वडील अपघातात गेले तेव्हा पासून घरी आई आणि अमन दोघेच. अमन हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला समजुतदार मुलगा.
    मैथिलीची आणि अमनची चांगली मैत्री झाली.
    त्याला मैथिली सोबत बोलायला, तिच्या सोबत वेळ घालवायला आवडू लागले. दोघांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अमन तिच्या प्रेमात पडला. एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. त्यावर काही उत्तर न देता ती म्हणाली ” अमन , मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायला नक्कीच आवडेल पण त्यापूर्वी काही तरी तुला सांगायचे आहे..”
    मैथिलीचं बोलणं मध्येच थांबवत अमन‌ म्हणाला “कम ऑन मैथिली, आता पण बिण काही नाही.. तुला मी आवडतो ना..तुला आवडेल ना माझ्यासोबत आयुष्य घालवायला..मग झालं..मी आजच आई सोबत बोलतो.‌‌.तुझ्या घरी आपल्या लग्ना बद्दल बोलून पुढे ठरवतो.. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर..”
    मैथिलीने त्यावर फक्त होकारार्थी मान हलविली.
    अमनने आईला मैथिली विषयी सांगितले, आईला फोटो वरूनच ती खूप आवडली. दोघांनी मैथिलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला. आपल्या मुलीवर इतकं प्रेम करणारा मुलगा शिवाय सगळ्या गोष्टीं सुयोग्य असल्याने तिच्या आई वडिलांनी लग्नाला परवानगी दिली. लवकरच लग्नाची तारीख ठरवली.
    मैथिलीला मात्र अमनला भूतकाळा बद्दल सगळं सांगायचं होतं, त्याला अंधारात ठेवून लग्न करायचं नव्हतं , त्याविषयी ती आई बाबांशी बोलली तेव्हा बाबांनी तिला खडसावले “भूतकाळ आता विसरून जा, त्याविषयी फक्त आपल्याला तिघांना माहीत आहे परत सगळ्या गोष्टींमुळे बदनामी नको.शिवाय सत्य परिस्थिती कळाल्यावर अमन लग्न करायला नाही म्हणाला तर.. त्याच्या सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही.. भूतकाळात जे झाले तो एक अपघात होता पण त्यामुळे आता पुढचं आयुष्य त्या विचारात घालवू नकोस.”
    आईला आणि मैथिलीला बाबांचं म्हणनं पटत नसतानाही त्या काही करू शकत नव्हत्या.
    आता पुढील आयुष्य अमनसोबत आनंदात घालवायचं हा विचार करून मैथिली लग्नाला तयार झाली.
    दोघांचे लग्न धुमधडाक्यात झाले, माहेरी सासरी मैथिलीचे खूप कौतुक झाले, या सगळ्यात ती भूतकाळात झालेल्या गोष्टी पूर्ण पणे विसरून गेली. सुरवातीचे दोन वर्ष आनंदात गेले. नंतर दोघांनाही बाळाचे वेध लागले. पण काही केल्या आनंदाची बातमी मिळत नव्हती, बर्‍याच टेस्ट केल्या, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता.
    आता मात्र मैथिलीला भूतकाळातील गोष्टींचा त्रास व्हायचा, आपल्या चुकीमुळे अमनला आपण आनंदी करू शकत नाही हे तिला बोचत होते. सतत स्वत:ला दोशी ठरवत ती उदास राहू लागली. अमन तिला खूप समजावून सांगत होता पण तिला मात्र स्वतः आईपण हरवल्याची सल मनात बोचत होती.
    अमनला आता खरं काय ते सांगून मोकळं व्हावं असं सारखं वाटत होतं पण बाबांची भिती शिवाय पुढे काय हा विचार करून ती इतके वर्ष स्तब्ध होती.
    काही वेळाने अमन घरी आला. मैथिलीने घाबरतच त्याला विचारले “अमन‌ तू आई बाबांकडे गेला होता, काही काम होतं का…”
    अमन हसतच म्हणाला “हो, एका मित्राचा फोन आला.. त्याला भेटायला गेलो..आई बाबा तिकडे जवळच राहतात ना म्हणून मग आई बाबांना तुझ्या बर्थडे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेलो होतो, आई एकट्याच होत्या घरी. बाबा नाही भेटले.
    पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे हे विसरली वाटतं माझी राणी..किती उदास असते तू हल्ली, सतत विचारात.. म्हणून म्हंटलं यावेळी बर्थडे ला छान प्लॅन करू.. आई बाबांना इकडे बोलावू..तुला फ्रेश वाटेल..पण हा त्याआधी मला एक दिवस जरा बाहेरगावी कामानिमित्त जावे लागेल.”
    मैथिलीला ऐकून आश्चर्य वाटले..आनंदही झाला… अरे हा माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात..अमन किती लक्षात ठेवतो..किती प्रेम करतो माझ्यावर.. त्याला काही कळाले नाही हे बघून ती जरा शांत झाली पण भूतकाळाविषयी विचारचक्र मात्र सुरू होतेच.
    काही महिन्यांपूर्वीच मैथिलीने तब्येतीमुळे म्हणून नोकरी सोडली होती. अमन कामानिमित्त बाहेर गावी गेला. घरी सासूबाई आणि मैथिली दोघीच होत्या. अमनने सासूबाईंना सांगीतल्या प्रमाणे त्या मैथिलीला वाढदिवसाचा नवीन ड्रेस घ्यायला बाहेर घेऊन गेल्या. दोघींनी छान शॉपिंग केली, काही वेळासाठी का होईना पण मैथिली आनंदात होती. ते पाहून सासूबाईंना समाधान वाटले.
    घरी परत आल्या‌ त्याआधी अमन घरी तयार होता. खूप सारे गिफ्टस्, मिठाई, फुलांचा गुच्छ घेऊन तो आलेला. सगळं बघून मैथिली खूप खुश झाली. तिने पटकन अमनला मिठी मारली. त्यांचं प्रेम बघून सासुबाई मनोमन आणि गालातल्या गालात हसू लागल्या.
    अमन मैथिलीला म्हणाला ” उद्या तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक मस्त सरप्राइज देणार आहे..ते बघून तू अजूनच आनंदी होशील.. कदाचित परत माझी राणी मला उदास दिसणार नाही..”
    ते ऐकताच मैथिली दचकली. असं काय सरप्राइज आहे अमन… अडखळत बोलली..
    ते तर उद्याच कळेल, अमन हसत म्हणाला.
    रात्री काही केल्या मैथिलीला झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती.

    अमनने मैथिली साठी काऊ सरप्राइज प्लॅन केला आहे..अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ती परत कदाचित उदास राहणार नाही असं अमनला वाटते. या सगळ्याचा मैथिलीच्या भूतकाळाशी काही संबंध आहे का हे जाणून घेऊया पुढच्या भागात म्हणजेच अंतीम भागात.
    तोपर्यंत stay tuned.

    पुढचा भाग लवकरच…

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा.

    अशाच नवनवीन गोष्टी, कथा वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका ??

    © अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..

  • हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग १

    मैथिली आणि अमन, दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करून काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, दोघांच्याही काही टेस्ट दोन दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार होते.
    मैथिलीच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ उडाला होता, भूतकाळात जे झाले त्यामुळे तर काही अडचण येत नसेल ना, या विचाराने ती अस्वस्थ होती. इतक्या वर्षांपासून लपवलेली गोष्ट, आपला भूतकाळ सगळं जर अमनला कळाले तर अमन आपल्याला सोडून तर देणार नाही ना.. त्याला काय वाटेल..आपणं खूप मोठी चूक केली का अमनला अंधारात ठेवून..अशे अनेक प्रश्न मैथिलीला त्रस्त करीत होते.
    दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले, डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितले की मैथिलीची गर्भ पिशवी कमकुवत आहे, बाळाच्या वाढीसाठी सक्षम नाही आणि म्हणूनच आता पर्यंत केलेले सगळे प्रयोग अपयशी ठरले आहे. ट्रिटमेंट घेऊनही त्यात पाहिजे तसा बदल दिसून येत नाही, गर्भ पिशवीला काही तरी मोठी इजा झाली असेल तर अशे होते हेही सांगितले. सगळं ऐकून मैथीली खूप घाबरली.
    डॉक्टरांनी जेव्हा तिला विचारले “कधी काही अॅबॉर्शन , काही अपघात अथवा इजा होण्यासारखे काही घडले आहे का” त्यावर मैथिली काही न बोलता रडायला लागली, तिला अस्वस्थ वाटायला लागले. काही सांगितले तर अमनला भूतकाळ कळेल आणि त्याने तो स्विकारला नाही तर…या विचाराने परत मैथिली घाबरली.. तिच्या मनात एक विचार आला की सगळं खरं काय ते सांगून मोकळं व्हावं..जे होईल ते होईल..पण सत्य सांगण्याची हिम्मत होत नव्हती…अशातच दोघेही घरी पोहोचले.. मैथिली जरा शांत झाल की तिच्याशी नीट बोलून पुढे ठरवू म्हणून अमन तिला घेऊन परत आला.

    हॉस्पिटलमधून आल्यापासून सतत रडत होती, सासूबाई आणि अमन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मैथिली मात्र स्वतः ला दोशी ठरवत रडत बसली, मनोमन पश्चात्ताप करत बसली. आपण कधीही आई होऊ शकणार नाही ही गोष्ट तिला कळल्यापासून ती पूर्णपणे खचून गेली.  शिवाय भूतकाळात झालेलं सगळं इतके वर्ष अमन पासून लपवले, काही तरी मार्ग निघेल आणि आईपण लाभेल म्हणून एक आशा मनात ठेवून अमन पासून लपविलेलं कटू सत्य आता समोर आले तर काय.. या विचारांचं ओझं तिला जास्त कमजोर बनवत  होतं.
    अशा विचारातच तिला झोप लागली… काही वेळाने जाग आली, सायंकाळचे सहा वाजले होते.. आदल्या रात्री काळजी करत झोप लागली नव्हती म्हणून आज रडून थकली आणि कधी झोप लागली तिला कळाले नव्हते. उठून चेहऱ्यावर पाणी मारून लगबगीने खोलीच्या बाहेर आली तर अमन घरात नव्हता. सासूबाई स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. मैथिलीला बघून म्हणाल्या “अगं उठलीसं, बस मी मस्त आलं घालून चहा बनवते.. अमन जरा बाहेर गेला आणि तुला झोप लागली तर मला एकटीला काही चहा जाईना. तुझीच वाट बघत होते उठण्याची. माझ्या हाताच्या चहाने बघ फ्रेश वाटेल तुला.. “
    मैथिली मात्र काळजीतच होती, होकारार्थी मान हलवून ती  विचार करू लागली ,किती प्रेमळ सासू आहे माझी, किती काळजी घेतात..सून‌ म्हणून कधीच वागणूक नाही..जसा अमन‌ तशी मी असंच समजून मला जीव लावतात आणि मी मात्र त्यांना अंधारात ठेवते आहे.. सासूबाईंना सांगितले सत्य तर त्या समजून घेतील का.. एकदा आई सोबत या विषयी आता बोलायला हवं, ती नाही म्हणाली तरी अमनला आणि सासूबाईंना सत्य परिस्थिती सांगून टाकायची..मनातला गोंधळ कमी होईल..एक ओझं घेऊन किती दिवस जगायचं..पुढे जे होईल ते होईल..आता वेळ आली आहे भूतकाळ पुढे आणण्याची.. हिम्मत करून सगळं काही सांगायचं ठरवत असताना सासूबाई‌ चहा घेऊन आल्या.
    चहा घेताना मैथिलीची समजूत काढत म्हणाल्या ” तुला असं उदास बघवत नाही मैथीली, तू हसत खेळत राहिली तर अमन आणि मी आनंदी राहू. आपण प्रयत्न करतोय पण यश आलं नाही तरी तू हताश होऊ नकोस.. तुला उदास बघून अमनही खचून जाईल.. त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे..तो तुला आनंदात  बघण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.. आणि माझं म्हणालं तर तुम्ही दोघांनी मुलं दत्तक घेतले तरी माझी हरकत नाही..पण तू स्वतःला दोष देत उदास राहू नकोस..”
    मैथिलीला सासूबाईंच्या बोलण्याने एक आधार वाटला.. आपण किती भाग्यवान आहोत हेही जाणवले..
    तू आराम कर..मी करते स्वयंपाक.. असं म्हणतं त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या.
    मैथिलीने खोलीत जाऊन आईला फोन केला तेव्हा कळाले की अमन मैथिलीच्या घरी‌ गेलेला आहे.. तेव्हा तू तब्येतीची काळजी घे बाळा.. आराम कर..अमन आलेत त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवते, तुझ्याशी नंतर बोलते म्हणून आईने फोन बंद केला..ते ऐकून तिला धक्काच बसला..
    आई बाबा अमनला खरं काय ते सांगणार तर नाही ना… अमनला सत्य कळाले तर पुढे काय या विचाराने परत मैथिली हैराण झाली, नकळत दोघांचा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.

    अमन आणि मैथिलीची भेट कशी झाली.. मैथिलीचा भूतकाळ काय आहे..ती काय आणि का लपवते आहे ..ती अमनला सत्य सांगेल का.. त्यावर अमनची प्रतिक्रिया काय असेल हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागांमध्ये… तोपर्यंत stay tuned….

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका… ?

    © अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… अंतीम भाग

    कांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे नीलम दुखावल्या जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला.
    आॅफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता. फोन उचलताच ती म्हणाली” संजय फोन कट करू नकोस, मला खूप गरज आहे मदतीची, माझं बोलणं ऐकून घे. मी परत तुला त्रास देणार नाही.” संजयने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही फक्त ती काय म्हणतेय ते तो ऐकत होता.
    कांचन म्हणाली “संजय, मला फोनवर सविस्तर बोलता येणार नाही. मला माहित आहे तू माझ्यावर खुप नाराज आहेस. कदाचित मला माफ करणार नाहीस पण माझ्यासाठी नाही तर माझया आई वडिलांसाठी मला एक मदत कर. आता फक्त एवढंच सांगू शकते कि बाबांना मागच्या महिन्यात  हार्ट अटॅक आला, ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर, सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली, एवढेच काय तर हॉस्पीटलचे बील भरायला ही काका तयार नव्हते. आईच्या नावावर काही पैसे होते ते सगळे बाबांच्या उपचारासाठी खर्च झाले. आई बाबांना खूप मोठा धक्का बसला आहे. मी सतत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला ह्या सगळ्यात कुणाचाच आधार नाही. प्लीज मला एवढी एक मदत कर. मला तू एकदा भेटालास तर बरं होईल. सविस्तर चर्चा करता येईल.प्लीज संजय”
    कांचनचं बोलणं ऐकून संजयला खूप वाईट वाटले. आधीच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून तो कांचनला भेटायला तयार झाला. सायंकाळी सहा वाजता एका कॅफे मध्ये भेटायचे ठरले. नीलमला नंतर सविस्तर सांगू म्हणून एका कामानिमित्त बाहेर जातोय, तू घरी जा, आॅफिसमधून निघताना माझी वाट नको बघू. घरी आल्यावर सविस्तर सांगतो म्हणून तो निघाला. भूतकाळात कांचन कशीही वागली असली तरी अशा परीस्थितीत तिला मदत करण्यापासून तो स्वत:ला थांबवू शकत नव्हता.
    नीलमला मात्र संजयच्या वागण्यात बदल जाणवत होता, तो काही तरी लपवतो आहे हे तिला कळत होते. संजयच्या मागोमाग नीलम ही कॅफे मध्ये गेली, जरा लांबूनच पाहिले तर संजय आणि एक सुंदर मुलगी (कांचन) काही तरी बोलत बसलेले तिला दिसले. संजय तर म्हणाला कामानिमित्त बाहेर जातोय, मग ही कोण शिवाय आई सुद्धा म्हणाल्या होत्या कुणी तरी मुलगी संजयला भेटायला घरी आलेली म्हणून. संजय आपल्याला फसवत तर नाही ना, काय संबंध असेल दोघांमध्ये अशा विचारचक्रात नीलम अडकली. तशाच विचारात घरी गेली, संजय सोबत आज काय ते क्लिअर करायलाच पाहिजे असा निश्चय तिने केला.
    इकडे कांचनने  संजयला सगळी परिस्थिती सांगितली पण संजयला प्रश्न पडला की कांचनचा नवरा हिला मदत करत नसेल का.. त्यानं तिला ते विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्या डोळ्यात पाणी आले, तिच्या अश्रूंसोबत शब्द बाहेर पडले “संजय, तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, अगदी मला हवा तसा जोडीदार, भक्कम पैसा, परदेशात नोकरी करणारा, अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार होता तो. आम्ही दोघेही छान मज्जा करायचो पण दोघेही आम्ही चिडखोर, एकही शब्द ऐकून न घेणारे, वर्ष भर सगळं सुरळीत होतं पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले, नंतर किती किती दिवस अबोला, आमच्यातील अंतर वाढत गेलं शिवाय तिथे दोघांची समजुत काढणारं कुणी नव्हतं, वाद, मतभेद इतके वाढले की प्रकरण घटस्फोटावर आलं, त्याला आता मी नको आहे. या सगळ्या गोष्टींचा बाबांच्या तब्येतीवर परीणाम झाला, त्यांना हार्ट अटॅक आला. माझी अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती. काही महिन्यांपूर्वी मी भारतात परत आले. त्यानंतर बाबांच्या उपचारासाठी ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर आणि सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली. एकेकाळी श्रीमंत घराणे आमचं पण आज हातात काही शिल्लक नाही. काकांनी मोठी फसवणूक केली आहे, मला त्यांना शिक्षा द्यायची आहे, खोट्या सह्या घेऊन काकांनी केलेल्या फसवणूकीचा गुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे. आई बाबा सद्ध्या माझ्या मामाच्या गावाला आहेत, मी चांगल्या वकिलांच्या शोधात इकडे आले, इथे कुणी ओळखीचे नाही, विचार करतच त्या दिवशी माॅल मध्ये फिरताना तू दिसला आणि एक आशेचा किरण जागा झाला. यातून बाहेर पडले की मी तुला परत कधी त्रास देणार नाही. पण या सगळ्यात मला प्लीज मदत कर. पुढे मला आई बाबांना खूप आनंदात बघायचं आहे. तूच आहेस जो या परिस्थितीत मला मदत करू शकतो. मी तुला खूप दुखावले आहे, पण कधी काळी आपण चांगले मित्र होतो या नात्याने मला मदत कर.”
    कांचनची अवस्था बघून संजयला वाईट वाटले, तिला शक्य ती मदत करायला तो तयार झाला.
    दोघांनी नीट विचार करून दुसऱ्या दिवशी एका नामांकित वकिलांना भेटण्याचा बेत आखला. सगळं बोलून झाल्यावर संजय घरी आला तर नीलमच मूड बिघडलेला त्याला दिसला. ती खूप संतापलेली होती, चिडूनच तिने विचारले “कोण होती ती अप्सरा जिच्या साठी तू माझ्याशी खोटं बोलला, कामानिमित्त बाहेर जातोय सांगून कॅफे मध्ये गेला.”
    संजयला नीलमच्या प्रश्नावर काय बोलावे कळत नव्हते, त्याने आधी तिचा राग शांत करायचा प्रयत्न केला, तिला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं. नीलमला ऐकून धक्काच बसला, ती रडायला लागली, संजयच्या मिठीत शिरून म्हणाली “तिला मदत करताना ते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना.” संजयच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिला घट्ट पकडून तो म्हणाला “नीलम, तू आयुष्यात आली त्यानंतर तर मी भूतकाळातून बाहेर पडलो. तुझ्यामुळे जगण्याचा नवा अर्थ शिकलो. मी जो प्रेमभंग अनुभवला तो कुणाच्याही वाट्याला येऊ नये, तू तर माझी अर्धांगिनी आहेस. तू माझ्यावर किती प्रेम करते याची मला जाणीव आहे. माझं आता फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरचं प्रेम आहे. राहीला प्रश्न कांचनला मदत करण्याचा तर तिच्या जागी कुणीही असतं तर माणुसकीच्या नात्याने मी मदत केलीच असती. या सगळ्याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही, याची मी खात्री देतो.”
    नीलम संजयच्या कुशीत शिरून म्हणाली‌ “संजय, मी या सगळ्यात तुझ्या सोबत आहे. कांचनला यातून बाहेर काढण्यासाठी मीही तुला मदत करीन. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तू नक्कीच यातून कांचनला सोडवणार.” नीलमला कित्येक वर्षांपासून तिच्या मनात असलेला संजय च्या भूतकाळात बद्दलचा गुंता सुटल्याचे समाधान वाटले. संजयलाही आज नीलमला सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे मन अगदी हलके वाटले. या प्रकारामुळे संजय आणि नीलमचे नाते अजून घट्ट झाले.
    दोघांनी मिळून कांचनला मदत केली, तिला या सगळ्यातून बाहेर काढले. त्यादरम्यान कांचन आणि तिचा पती कित्येक महिने वेगळे राहील्या मुळे त्यांना आपापल्या चुकांची जाणीव झाली. संजयने समजूत काढल्यानंतर कांचनने पुढाकार घेऊन तिच्या पतीची माफी मागितली, त्यालाही कांचन शिवाय एकटेपणा जाणवत होता पण मीपणामुळे तो पुढाकार घेऊन कांचनशी बोलत नव्हता. कांचनने स्वत: फोन केल्यावर तो कांचनला घ्यायला भारतात आला. आई बाबांची संपत्ती संजय मुळे त्यांना परत मिळाली शिवाय नीलमने विश्वास ठेवून संजयला मदत केल्याने ते शक्य झाले.
    कांचन पतीसोबत परत गेली, सगळयांनी संजयचे खूप कौतुक केले, आभार मानले. नीलमची मान आनंदाने आणि गर्वाने ताठ झाली.

    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग २

    कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला, नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. नीलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते. आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या नीलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला. आपल्या आयुष्यात आता नीलमच सगळं काही आहे हे त्याला कळत होते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याने नीलम सोबत काही दिवस गोव्याला फिरायला जायचा बेत आखला. आॅफिसमध्ये रजा घेऊन पाच दिवसांसाठी दोघेही गोव्याला गेले, तिथे छान मज्जा केली. नीलम ही खूप आनंदात, उत्साहात होती. पाच दिवसांनी परत आल्यावर संजयला आई कडून कळाले की त्याला भेटायला कांचन घरी येऊन गेली, तिला काही तरी मदत हवी आहे आणि त्यासाठी ती आली होती शिवाय संजय चा फोन नंबर ही घेऊन गेली. ते ऐकताच संजय हादरला. ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गोष्ट परत परत त्याच्या जवळ येत होती. संजयच्या आईला कांचन त्याच्या सोबत शिकायला होती एवढेच माहीत होते त्यामुळे ऑफिसशी निगडित नोकरी संबंधित काम असेल म्हणून त्यांनी फार मनावर घेतले नाही. या सगळ्या प्रकाराने नीलमही गोंधळली, कांचन कोण आहे, कशासाठी घरी आली, तिचं संजयकडे काय काम आहे हे प्रश्न तिला त्रास देत होते. संजयला संधी साधून याविषयी विचारले पाहिजे असा विचार नीलम करू लागली.
    अशा परिस्थितीत काय करावे संजयलाही कळत नव्हते. नीलमला सुद्धा याविषयी अंधारात ठेवायचे नव्हते. योग्य वेळी नीलमला याविषयी सांगायचे अशे संजयने ठरविले.
    रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागत नव्हती. नकळत तो भूतकाळात शिरला.
    कांचन आणि संजय शाळेपासून एकत्र शिकायला होते, काॅलेजलाही एकत्र. कांचन श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, हुशार,आत्मविश्वास तिच्या नसानसात भरलेला, कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही अशा विचारांची. तिच्या मीपणा असलेल्या स्वभावामुळे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. संजय गरीब घराण्यातील शांत स्वभावाचा समजुतदार मुलगा, तिच्या अल्लड स्वभावाची जाणीव त्याला होती, तिच्या घरी तिचे जास्त प्रमाणात लाड पुरवले जातात त्यामुळे ती हट्टी आहे हे त्याला माहीत होते. दोघांची शाळेपासून चांगली मैत्री होती. कुठलीही गोष्ट असो कांचन संजय पासून लपवत नव्हती, दोघेही अगदी बेस्ट फ्रेंड्स. शाळेत असताना अभ्यासातही संजय कांचनला मदत करायचा. संजयचा मित्र परिवार ब-यापैकी मोठा पण कांचन अगदी जवळची मैत्रीण.
    शाळेत कुठल्याही स्पर्धा असो किंवा नृत्य, गायन स्पर्धा.. दोघेही सोबतच. बारावीच्या परीक्षेत संजय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दोघांनाही योगायोगाने एकच काॅलेज मिळाले.
    सुरवातीला कांचनला फक्त संजय हा एकच जवळचा मित्र पण आता कॉलेजमध्ये तिला तिच्यासारख्या घराण्यातील मित्र मैत्रिणी मिळाले, तिचा एक ग्रुप झाला, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीज, सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे सुरू झाले. संजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती, तो पार्टीज सारख्या गोष्टी शक्यतो टाळायचा. कांचनला मात्र जीवन शक्य तितकं एॅंजाॅय करायला आवडायचं, ती संजय सोबतही वेळ घालवायची पण त्यांच्या मैत्रीत एक अंतर पडत होतं. संजयला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं. कांचन आपल्या पासून दूर जात आहे ही गोष्ट त्याला खूप बोचत होती.
    नकळत संजय पूर्णपणे कांचनच्या प्रेमात बुडाला होता. कांचनला एकदा मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत, तिचं प्रेम नसेल तरी या मैत्रीमध्ये अंतर पडता कामा नये हे सगळं एकदा कांचन सोबत बोलायला हवं नाहीतर ती आपल्या पासून दूर जाईल अशी भिती त्याला वाटत होती. कांचनला कुणीही मित्र मैत्रिणी नसताना प्रत्येक परीस्थितीत संजय सोबत असल्याने ती आपल्याला दुखावणार तरी नाही याची त्याला खात्री होती.
    खूप हिम्मत करून एक दिवस संजयने कांचनला भेटायला बोलावले, तीही लगेच आली.
    क्षणाचाही विलंब न लावता संजयने तिला सांगितल “कांचन, आपण दोघे बालपणापासून सोबत आहोत, एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत आलो, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस, आता मात्र आपल्या मैत्रीत एक अंतर पडत आहे, मला त्याचा खूप त्रास होतो. मला तू खूप आवडतेस कांचन, तू माझ्यापासून दूर गेलेली मला सहन होत नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. “.
    संजयच्या बोलण्यावर कांचन मिश्कीलपणे हसत म्हणाली ” कमाॅन संजय, हा काय बालीशपणा. आपण चांगले मित्र आहोत पण मला तुझ्या विषयी असं काहीच वाटत नाही. माझे स्वप्न खुप वेगळे आहे, मला जीवनात खूप काही करायचे आहे, आधी मला कुणी मित्र मैत्रिणी नव्हते पण आता माझा छान ग्रुप आहे, आम्ही छान मज्जा करतो. तुला हे सगळं आवडत नाही त्यात मी काही करू शकत नाही. शिवाय मी खूप प्रॅक्टिकल विचारांची आहे. मला तुझ्या सोबत आयुष्य घालवणे शक्य नाही कारण तुझी स्वप्न, तुझी आर्थिक परिस्थिती माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला छान वर्ल्ड टूर करायचा आहे, पार्टीज , शॉपिंग, एॅंजाॅयमेंट सगळं जे मला आवडतं ते तुला जमणार नाही तेव्हा तू माझा विचार सोड. आपल्या मैत्रीचा प्रवास इतकाच होता असं समज.”
    एवढं बोलून कांचन निघून गेली. प्रेमाचा स्वीकार नाही केला ठिक आहे पण इतक्या वर्षांच्या मैत्रीचा प्रवास असा अचानक संपवणे कितपत योग्य आहे. तेही अशा प्रकारे भावना दुखावून. आता गरीब परिस्थिती आहे पण ती बदलू तर शकतेच, कांचनचा इतका अविश्वास असेल असं संजयला कधीच वाटले नव्हते. तो तिच्या बोलण्याने खूप दुखावला.
    त्यानंतर कांचनने संजयला टाळायला सुरू केले, बोलणे बंद केले, या सगळ्याचा संजयला खूप त्रास होत होता. कांचनला मात्र काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या आयुष्यात खुश होती.
    या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजयला खूप वेळ लागला, बालपणापासूनच्या तिच्या आठवणी, सोबत घालवलेले गोष्ट क्षण त्याच्या मनात घर करून बसले होते. तिने त्या सगळ्यांचा क्षणात चुराडा केला होता.
    यातू्न स्वतःला कसं बसं सावरुन संजयने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले, चांगल्या कंपनीत त्याचं प्लेसमेंट झालं.
    लवकरच नोकरी सुरू झाली, घरची परिस्थिती बदलायला वेळ लागला नाही. त्याला हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर पटापट प्रमोशन मिळत गेले. मनात मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या होत्या. कांचनने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि ती परदेशात गेली एवढंच त्याला एका मित्राकडून कळालं होतं.
    त्यानंतर नीलम त्याच्या आयुष्यात आली आणि त्या आठवणीतून तो बाहेर पडला.
    पण अचानक अशा प्रकारे कांचनचं आयुष्यात परत येणं, मदत मागनं त्याला भुतकाळात ओढून नेत होतं.
    कांचनच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने संजयला मदत मागितली. तिचं अशा अचानक आयुष्यात येण्याने संजय आणि नीलमच्या नात्यात काही अंतर येयील का..नीलमला हे कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग लवकरच… तोपर्यंत stay tuned..
    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग १

    नीलम आणि संजय, एक आनंदी , सुखी जोडपं. वर्षभरापूर्वी लग्न झाले. संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि नीलमही त्याचं कंपनीत नोकरीला. संजय नेहमी कामात मग्न असायचा, अतिशय हुशार, गरीब परिस्थितीतून वर आलेला. जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा, कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले. नीलम बडबडी, दिसायला साधारण पण बोलण्यात गोडवा, मेहनती मुलगी. तिथे नोकरीला लागल्यापासून नीलमला संजय आवडायचा, ती स्वतः हून त्याच्याशी बोलायची संधी शोधायची. तोही तिला कामात मदत करायचा, नीलमच्या स्वभावामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. संजय क्वचितच हसायचा आणि नीलम कायम त्याला हसवायचा प्रयत्न करायची. संजय मुळातच इतक्या गंभीर स्वभावाचा आहे की काही कारणाने तो असा गंभीर, आपल्याच विश्वात मग्न असतो हा प्रश्न नीलमला पडायचा, याविषयी ती इतरांनीही विचारायची पण संजयच्या अबोल स्वभावामुळे कुणालाही काही माहित नव्हते. संजयच्या अबोल राहण्याच रहस्य जाणून घेण्यासाठी नीलम खूप प्रयत्न करायची. ऑफिसमध्ये नीलम ही संजयची पहिलीच मैत्रिण.
    काही महीन्यात दोघांची छान मैत्री झाली तेव्हा नीलमने संजयला सुट्टीच्या दिवशी शाॅपींगला सोबत जाण्यासाठी आग्रह केला, बराच वेळ आग्रह केल्यावर संजय तयार झाला. ठरल्याप्रमाणे दोघांनी सोबत शॉपिंग केली, डिनर केला नंतर संजय नीलमला घरी सोडायला आला. आवडत्या व्यक्तीबरोबर छान वेळ घालवल्यामुळे नीलम जाम खुश होती. असेच नीलमच्या आग्रहाखातर संजय तिच्यासोबत वेळ घालवू लागला, त्यालाही तिची सोबत आवडायला लागली.
    एक आठवड्यानंतर संजयचा वाढदिवस होता, नीलमने आॅफिसमध्ये छान सरप्राइज प्लॅन केला. संजय पहिल्यांदा आॅफिसमध्ये सगळ्यांसोबत एंजॉय करत होता. कित्येक वर्षांनी त्यानी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आज दिसत होता. आॅफिसनंतर संजयने स्वतः नीलमला डिनर साठी विचारले, नीलम तर एका पायावर तयार झाली. आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हरकत नाही असं मनोमन ठरवून नीलम छान तयार होऊन संजयला भेटायला गेली. संजय स्वतःहून मनातील भावना कदाचित व्यक्त करणारं नाही तेव्हा आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार करून नीलम छान लाल रंगाचा गुलाबाच्या फुलाचा गुच्छ जाताना घेऊन गेली. दोघांनी सोबत डिनर केला आणि परत जाताना नीलमने संजयला प्रपोज केले, आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले. संजयला नीलमच्या मनातील भावना आधीच कळल्या होत्या, त्याच्यावर नीलम इतकं मनापासून प्रेम करते तिला दुखवायचे नाही हे संजयने मनोमन ठरवले होते कारण प्रेमभंग काय असतो हे त्याने जवळून अनुभवले होते. संजयने नीलमच्या प्रेमाचा स्वीकार केला, पण मनात अजूनही कांचनच्या आठवणी ताज्या होत्या. आता पुढचं आयुष्य नीलम सोबत आनंदात घालवायचा निर्णय त्याने घेतला. नीलमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लवकरच संजय नीलमच्या घरी भेटायला गेला, दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि जन्मोजन्मीच नातं बांधून दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. आनंदात संसार सुरू झाला. संजय हसतखेळत राहायचा, पूर्वीचा गंभीर संजय आता आनंदी, उत्साही असायचा.
    नीलमला खूपदा वाटायचे की संजयला त्याच्या भूतकाळाविषयी विचारावे, कोणत्या कारणाने तो इतका गंभीर, उदास असायचा जाणून घ्यावं पण संजयला ते आवडले नाही तर गोड नात्यात काही दुरावा यायला नको म्हणून तिची त्याविषयी विचारायची हिम्मत होत नव्हती.
    एकदा शाॅपींग मॉल मध्ये दोघे फिरत असताना संजयला अचानक समोर कांचन दिसली , तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास दिसत नव्हता शिवाय एकटेपणा न आवडणारी ती आज एकटीच फिरत होती. कांचननेही संजयला पाहिले पण संकोचाने ती भराभर नजरेआड गेली. संजयने ते लगेच घेरले, आपल्याला पाहून कांचन लपली हे त्याला लक्षात आले शिवाय नीलम सोबत असल्याने तो गुपचूप तिथून निघून गेला. त्याच्या मनात मात्र विचार चक्र सुरू झाले,  इतक्या वर्षांनी आज कांचन इथे कशी, ती तर परदेशी गेली होती. त्याच्या मनात तिच्या आठवणी परत नको असताना जाग्या झाल्या. आता याविषयी विचार करायला नको म्हणून संजय स्वतःला नीलम मध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा, तिला शक्य तितका जास्त वेळ द्यायचा.
    एक दिवस अचानक संजयला फेसबुकवर कांचनचा मॅसेज आला “संजय, मी खूप अडचणीत आहे. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मला माहित आहे तुझ्या आयुष्यात मला आता काही स्थान नाही पण मला फक्त एकदा मदत कर. मी परत तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. ”
    कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला. कितीही नाही म्हटले तरी कांचनचे परत अशा प्रकारे समोर येणे संजयला विचार करायला भाग पाडत होते.

    कांचन आणि संजयच काय नातं होतं,  नीलम आयुष्यात येण्यापूर्वी संजय का इतका गंभीर, उदास असायचा, कांचन कुठल्या अडचणीत आहे, तिला संजय कडून काय मदत पाहिजे आहे हे सगळं पुढील भागात जाणून घेऊच. तोपर्यंत stay tuned..
    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

  • जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग ३ (अंतिम)

    1.  

    मागच्या भागात आपण पाहीले की अनघासोबत रितेश वाइल्ड लाइफ फोटोग्राफी साठी जातो, असंच रोजचं त्याच रूटीन बनतं. पाहता पाहता त्याला अमेरिकेत परत जाण्याची वेळ जवळ येत असते. एकत्र वेळ घालवून रितेश अजूनच अनघाच्या प्रेमात पडतो. अनघाचं सगळं लक्ष मात्र सध्या करीअर वर असतं. आता पुढे.

    रितेश अनघाला सांगतो “आजचा दिवस संपूच नये असं वाटत आहे. माझी सुट्टी संपली, उद्या मला सकाळीच परत जायला निघायचे आहे. अनघा तुझ्यामुळे माझी सुट्टी खूप मजेत गेली, एक वेगळाच अनुभव अनुभवला मी, आयुष्यभर लक्षात राहील असा. Thank you so much ? “
    अनघा त्यावर हसत म्हणाली ” झालं तुझं आभारप्रदर्शन ? कमॉन रितेश, हे असं औपचारिक होऊ नकोस, आपण चांगले मित्र आहोत, मैत्री मधल्या आठवणी मजेशीर असतातच.. पुढच्या सुट्टीला आल्यावर अजून नवीन जागी घेऊन जाते तुला..आता तर हस ?”
    अनघा‌ आता परत कधी भेटणार म्हणून रितेश भावनिक झाला, तो तिच्या प्रेमात बुडाला होता, पण अनघाला सांगायची हिम्मत होत नव्हती.
    रितेश अमेरिकेत परत गेला पण अनघाच्या विचारातून काही केल्या तो बाहेर पडत नव्हता. मी इकडे असताना अनघाच्या आयुष्यात दुसरा कुणी आला तर..या विचाराने अस्वस्थ होऊ लागला. काही झाले तरी अनघा सोबतच लग्न करायचे, तिला‌ मनातलं सगळं सांगायचं असं सारखं मनोमन ठरवून‌ स्वतः चे समाधान करून घ्यायचा.
    इकडे अनघा प्रोजेक्ट मध्ये व्यस्त झाली पण दोन आठवडे रितेश सोबत असल्याने तिला कुठे तरी काही तरी चुकल्यासारखे जाणवायला लागले.
    काय होतं आहे कळत नसलं तरी ती रितेशला मिस करत होती. दोघांचे फोन वर चाटींग सुरू असायचेच.
    एक दिवस अनघाला रितेशचा फोन आला, दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. अनघा तिच्या कामाबद्दल सांगत होती आणि सोबतच म्हणाली “काम मस्त चाललंय, आता प्रोजेक्ट पूर्ण होईल. काही नामांकित फोटोग्राफर ला मी अप्लीकेशन दिलं होतं, सोबत फोटो पाठवले. त्यात एकाने मला मुंबईला बोलावले आहे. माझ्या करिअरचा पहिला टप्पा बहुतेक सुरू होणार. मी खूप एक्साईटेड आहे.
    बरं तुझं काय चाललंय, परत कधी येणार आहेस. तू परत गेल्यावर खूप मिस केलं तुला..तुझं आभारप्रदर्शन आठवून हसू येते मला अजूनही.”
    अनघा सुद्धा आपल्याला मिस करते ऐकताच रितेशला आनंदी आनंद झाला. तो उत्साहाच्या भरात तिला म्हणाला “तू म्हणशील तेव्हा यायला तयार आहे मी, I miss you so much अनघा..”
    अनघाला त्याच उत्तर ऐकून हसू आले आणि मनोमन आनंदही झाला. आपण रितेश साठी किती स्पेशल आहोत हे  तिला जाणवलं. दोघांचे आता दररोज फोन, व्हिडिओ कॉल, चाटींग सुरू झाले.
    अनघा आतुरतेने रितेशच्या फोनची वाट पहायची. दिवसभरात घडलेल्या गमतीजमती, गप्पा रितेशला सांगायची.
    अनघाला मुंबईत नोकरी मिळाली, एका प्रख्यात फोटोग्राफर सोबत ती काम करायला मुंबईत गेली. तिचे स्वप्न पूर्ण होतं होते.
    सोबतच ती रितेशच्या‌ प्रेमात पडली होती पण तिला ते कळत नव्हते. रोजच्या दोघांच्या फोन वर गप्पा सुरू होत्याच.
    काही दिवसांनी अनघाचा वाढदिवस होता. ती आई बाबांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी जाणार होती. आई बाबांसाठी तिनं स्वत:च्या कमाईने छान गिफ्ट घेतले. अगदी उत्साहात घरी जाण्याची तयारी सुरू होती पण मागच्या दोन दिवसांपासून रितेशने तिला फोन केला नव्हता. मॅसेज वर इतकाच रिप्लाय आला “काही दिवस मी कॉन्फरन्स मध्ये व्यस्त असणार आहे तेव्हा फोन करू शकणार नाही. त्यानंतर मॅसेजला‌‌ सुद्धा काही रिप्लाय नाही.”
    अनघाला अस्वस्थ वाटू लागले, ती घरी जायला निघाली पण तिचं मन मात्र रितेशला मिस करत होतं. फोन नाही तर साधा मॅसेज तरी करायचा ना.. इतकं काय बिझी असतात लोकं. आपण रितेश मध्ये गुंतलो आहे हे तिला जाणवत होते. ती त्याच्या विचारातच घरी पोहोचली.
    आई बाबा अनघाला‌ बघून खूप आनंदी होते, आईला तिच्या मनातली घालमेल कळत होती. नक्कीच रितेशच्या विचाराने अनघा बेचैन आहे हे आईने ओळखले.
    दुसऱ्या दिवशी अनघाचा वाढदिवस होता, आज रितेश नक्कीच फोन करणार याची तिला खात्री होती, सतत ती त्याच्या फोनची वाट पहात होती.
    आईने तिचे औक्षवान केले, जेवणात अनघाच्या आवडीचा मेनू बनवला पण अनघा मात्र नेहमी वाढदिवसाला जशी उत्साहात असते तशी आज नव्हती. आई बाबांनी तिच्या जुन्या मित्र मैत्रिणींना सायंकाळी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित केले. अनघा मात्र रितेशने फोन कसा केला नसेल, माझा वाढदिवस माहीत कसा नसेल अशा विचाराने बेचैन होती. रितेशच्या‌ आई बाबांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या, न‌ राहावून अनघाने त्याच्या आईला विचारले ” काकू, रितेश सोबत काही बोलून झालं का इतक्यात. ” त्यावर त्या म्हणाल्या ” हो कालच रात्री बोलले मी त्याच्याशी. का गं, तुमचं बोलणं चालणं सुरू आहे वाटतं ? असंही मिश्कीलपणे तिला चिडवत म्हणाल्या. “
    अनघाला आता अजून विचारात पडली, आईला तर फोन केला मग माझ्या सोबत का बोलत नाहीये रितेश, तो मला टाळत तर नाही ना..
    सायंकाळी ठरल्याप्रमाणे सगळे मित्र मैत्रिणी, अनघाची मावशी सगळे घरी  वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले, अनघा वर वर आनंदी दिसत असली तरी ती सतत रितेशचा विचार करत होती.
    घरी बाबांनी मस्त सजावट करून सुंदर केक आणला. केक कापणार तितक्यात समोरून आवाज आला ” मला सोडून केक कापणार आहेस अनघा तू..”
    बघते तर काय रितेश आणि त्याचे आई बाबा फुलांचा गुच्छ आणि हातात गिफ्ट घेऊन उभे.
    अनघाचा आनंद ओसंडून वाहू लागला, धावत जाऊन ती त्याला बिलगली, डोळ्यात आनंदाश्रु आले रडतच त्याला म्हणाली ” तू खूप वाईट आहे..का मला फोन‌ केला नाहीस, किती काळजी वाटली मला..एक एक क्षण जड जात होता तुझ्या शिवाय, एकही क्षण तुझ्या विचारांतून मला बाहेर येवू देत नव्हता… तुला कळत कसं नाही मी प्रेमात पडलीय तुझ्या, नाही राहू शकत तुझ्याशिवाय..I love you..I missed you so much..”
    अनघाची आई म्हणाली “अनघा अगं आत तर येवू दे त्यांना..”
    आईच्या बोलण्याने अनघा भानावर आली. आपण सगळ्यांसमोर काय काय बोललो, चक्क प्रेमाची कबुली दिली..अनघा लाजून चूर झाली आणि पळतच तिच्या खोलीत पळाली. रितेश सुद्धा लाजला‌, आई बाबांना आनंदही झाला. मावशी अनघाला बाहेर घेऊन आली.
    रितेश सोबत अनघाने केक कापला आणि नंतर रितेशने गुडघ्यावर बसून अनघाचा हात हातात घेऊन तिला लग्नाची मागणी घातली. सुंदर अशी एक अंगठी तिच्या बोटात घातली. अनघा मनोमन इतकी आनंदी होती की एखाद्या स्वप्नात असल्याचा भास तिला होत होता. तिने होकारार्थी मान हलवून त्याच प्रपोजल स्विकारलं आणि सगळ्यांनी टाळया वाजविल्या. मागून आई म्हणाली ” अनू, हि घे अंगठी , रितेशच्या बोटात घाल. आम्हाला रितेशने सांगितले होते तो येणार असल्याचे आणि हा सगळा प्लॅन त्याचाच तर आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा अंगठी आणून ठेवली. “
    अनघाला रितेशचं सरप्राइज खूप आवडलं. अशा प्रकारे जुळून आल्या रेशिमगाठी… दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. पुढे तयारी सुरू झाली त्यांच्या लग्नाची.

    समाप्त.

    अनघा आणि रितेशची ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा 

    नावासह शेअर करायला हरकत नाही 

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २

     

    मागच्या भागात आपण पाहीले की अनघाला मुलगा बघायला यायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनघा आईने वाढदिवसाला घेतलेला लाल पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. आईच्या सांगण्यावरून कपाळावर इवलिशी टिकली लावली. ती कधीच मेकअप करायची नाही आणि आजही नाही पण तिचं नैसर्गिक सौंदर्य आज अजूनच उठून दिसत होतं.
    उंच बांधा, चेहऱ्यावर आत्मविश्वास, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, नाजूक ओठ, चिरेदार नाक आणि त्यावर तिला केसांचा बॉयकट अगदी शोभेसा दिसायचा.
    ठरलेल्या वेळेत मुलगा , आई‌ वडील, सोबत अनघाची मावशी असे सगळे घरी आले.
    अनघा अजून मनातून या गोष्टींसाठी तयार नव्हती तेव्हा ती आईचं मन राखायला आज सगळं करत होती.
    अनघाला मावशी बाहेर सगळ्यांना भेटायला घेऊन आली. अनघाची ओळख सगळ्यांशी करून दिली.
    मावशी म्हणाली “हा रितेश, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, दोन वर्षांपासून कंपनीतर्फे  प्रोजेक्टसाठी अमेरिकेत राहायला आहे.”
    अनघाने रितेश‌कडे बघितले आणि दोघांची नजरानजर झाली, अनघाने स्मितहास्य केले.
    रितेश उंच पुरा, रूबाबदार, डोळ्यांवर चष्मा, दाढीची फ्रेंच कट, एकंदरीत देखणा. अनघा अधूनमधून त्याच्या कडे बघत होती आणि तिला लक्ष्यात आले की रितेश एकसारखा अनघाला बघतो आहे. तिचे लक्ष गेले की तो दुसरीकडे बघायचा आणि परत अनघाकडे.
    ते पाहून अनघाला वाटले ह्याला जर आपण आवडलो असेल तर काही खरं नाही, आई लगेच मागे लागेल लग्न ठरवायच्या. अनघाच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तितक्यात रितेश चे बाबा म्हणाले ” तुम्हा दोघांना काही बोलायचे असेल तर एकांतात बोला. ”
    ते‌ ऐकताच मावशी दोघांना घेऊन अनघाच्या खोलीत गेली. तिथेच दोघांसाठी कॉफी पाठवली आणि मनसोक्त गप्पा मारा म्हणत बाहेर निघून आली. रितेशची नजर काही केल्या अनघाच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती, न राहावून अनघा हसत  म्हणाली “हॅलो जेंटलमॅन, इतकं काय निरिक्षण करत आहेस.”
    त्यावर रितेश म्हणाला “You are beautiful”
    अनघा पहिल्यांदा जरा लाजली आणि स्वतःला सावरत म्हणाली “हे बघ, मला आता लग्न करायचं नाही, आईच्या आग्रहाखातर मी आजच्या भेटीसाठी तयार झाली. तू नाही म्हणून सांग ना‌ तुझ्या घरच्यांना. माझं करिअर सेट होत पर्यंत मी काही लग्न वगैरे नाही करणार. माझं लहानपणापासून स्वप्न आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे. असं अर्ध्यावर सोडून मला‌ लग्नाच्या भानगडीत नाही पडायचं. प्लीज तू नकार दे मला.”
    रितेश तिच्या बोलण्याने जरा‌ गोंधळला पण तिचा हा स्पष्टवक्तेपणा, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द बघून अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला.
    रितेश अनघाची मज्जा घेत म्हणाला “तू किती सॉलिड आहेस गं, मनातलं भराभर बोलून मोकळी झाली, I liked it ha… पण मला तू आवडली आहेस मग मी का नकार देऊ, तुला मी नसेन आवडलो तर तू नकार दे हवं तर.”
    अनघाला ते ऐकून जरा मनात चिडचिड झाली, त्याला समजावत ती म्हणाली”अरे , कसं सांगू तुला, माझा छंद, माझं स्वप्न, करीअर एकच आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी. ते पूर्ण होत पर्यंत मी लग्न करणार नाही. तू होकार दिला तर आई मावशी माझं काही ऐकणार नाही, सतत मागे लागतील लग्न लावून देण्याच्या आणि मग मला माझ्या करीअर कडे तितकं लक्ष देता येणार नाही,समजून घे ना”
    अनघा चिडली हे लक्षात येताच रितेश म्हणाला “बरं, मी काय म्हणतो, आपण मित्र तर बनू शकतो ना. मी सांगतो घरी लगेच लग्न करायचं नाही आणि पुढच्या सुट्टीला आल्यावर बघू म्हणून. मग तर झालं…मी खूप मुली बघितल्या पण तुझ्या सारखी तूच..I am impressed अनघा.”
    अनघा ते ऐकून खूश झाली. दोघांची मैत्री झाली आणि ठरलं की घरच्यांशी बोलून लगेच लग्न करायचं नाही असं सांगायचं.
    दोघांनी मस्त गप्पा मारल्या, रितेश तिला म्हणाला ” तू आता फोटोग्राफी साठी जाशील तेव्हा मी सोबत आलो तर चालेल तुला. मी फक्त नोकरी नोकरी आणि नोकरी यातच वेळ घालवतो. पण असा वेगळा अनुभव घ्यावा वाटतो तुला बघुन, चालेल ना‌ मी आलो तर.”
    अनघा त्याला घेऊन जायला तयार झाली आणि सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता तयार रहा‌, मी घ्यायला येईल तुला.

    रितेश आणि अनघा खोली बाहेर येताच दोघांच्याही घरच्यांनी एका होकारार्थी अपेक्षेने त्यांच्या कडे बघितले. रितेश चे बाबा लगेच म्हणाले ” काय मग रितेश, कशी वाटली अनघा.”
    रितेश म्हणाला ” बाबा घरी गेल्यावर बोलू आपण. आता नको.”
    अनघाच्या आईला जरा काळजी वाटली, मनोमन त्या विचार करू लागल्या नक्कीच अनघाने काही तरी म्हंटलं असेल. कित्येक वेळा सांगितलं हिला लगेच अटी घालू नकोस.
    काही वेळाने मुलाकडची मंडळी परत निघून गेली तोच आई अनघाला ओरडली ” अनू, तू काय सांगितलं रितेश ला.. काही बोलली की नुसत्या अटी घातल्या..लग्न न करण्याच्या..”
    अनघा काहीच बोलली नाही..
    तिकडे वाटेतच रितेशने घरच्यांना सांगितले की ” मी लग्न करेल ते अनघाशीच..मला ती पसंत आहे..पण लगेच लग्नाला ती तयार नाही.. आपण तिला जरा वेळ देऊया..”  त्याच्या आई बाबांना पटलं नाही ते म्हणाले ” तयार का नाही.. आणि कशावरून वेळ दिल्यावर ती तुझ्याशी लग्न करेन.. तिने सांगितले का तिला तू पसंत आहे म्हणून..”
    रितेश म्हणाला ” बाबा अहो असं सांगितलं नाही पण मला खात्री आहे जरा वेळ मी तिच्या सोबत घालवला, मैत्री करून एकमेकांना समजून घेतलं तर ती मला नकार नक्कीच देणार नाही.”
    दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने रितेश तिच्या सोबत येणार असल्याचे आईला सांगितले आणि त्याला घ्यायला ती निघाली.
    आईला मनातून आनंदही झाला, चला गाडी जरा रुळावर येत आहे, हळूहळू बदलेल तिचं मन आणि होईल लग्नाला तयार असं स्वतःशी बोलत त्या कामात व्यस्त झाल्या.
    रितेश पहाटेच उठून तयार..अनघा सोबत जंगल सफारी, फोटोग्राफी..तो खूप आतुर झाला होता. अनघा घराबाहेर आली आणि रितेशला फोन केला, रितेश लगेच बाहेर आला..अनघाचा जीन्स टी शर्ट, जॅकेट मधला लूक, तिची बाइक ( स्कुटी), डोक्यावर हेल्मेट बघून जरा वेळ न्याहाळत बसला.
    अनघा त्याला म्हणाली, हे घे हेल्मेट आणि बस पटकन. उशीर होईल.
    तिच्या बोलण्याने तो भानावर आला आणि म्हणाला “मी चालवू का बाइक.”
    अनघा त्याला चिडवत गालात हसत म्हणाली “नको, जंगलाच्या रस्त्यावर तुला नाही जमणार चालवायला.. शिवाय सवय तुटली असेल ना आता गाडी चालवायची..”
    रितेश मागे बसला आणि दोघेही निघाले. काही अंतरावर खूप सारी झाडं, बाजूला एक तळं , पक्ष्यांचा किलबिलाट अशा ठिकाणी ते पोहोचले. अतिशय रम्य वातावरण , गार वारा..रितेश पहिल्यांदा हे अनुभवत होता.
    अनघा सांगत होती,  सकाळी इथे काही पक्षी येतात त्यांचे फोटो काढायचे आहेत मला, सहसा ते पक्षी फारसे दिसत नाही. माझ्या प्रोजेक्ट साठी नक्कीच उपयोगी पडेल ‌
    ती तिचा लांब लेन्स असलेला कॅमेरा सेट करत रितेश सोबत बोलत होती आणि रितेश त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत होता, अनघाची फोटो घेण्याची एकाग्रता, तिचा तो अंदाज सगळं न्याहाळत होता.
    काही वेळ व्यस्त असलेली अनघा म्हणाली “चल आज इतकेच बस..मस्त फोटो मिळालेत बघ…” आणि रितेशला फोटो दाखवू लागली. मग दोघांनी त्यांच्या मैत्रीचा पहिला एकत्र फोटो त्या ठिकाणी काढला.
    ते पक्षांचे अप्रतिम फोटो बघून रितेशला तिचं खरंच कौतुक वाटलं. तिला त्याने प्रश्न केला “तू अशी एकटी फिरतेस नेहमी कि सहकार्‍यांसोबत.. एकटीला भिती नाही वाटत का..”
    अनघा हसत म्हणाली “कधी सहकारी असतात कधी एकटीच..अरे मी कराटे चॅम्पियन आहे.. शिवाय मार्शल आर्ट ही शिकले. सोबत फर्स्ट एड किट सुद्धा असते, कधी काही किरकोळ दुखापत झाली तर उपयोगी पडते.
    रितेश तिच्यावर अजूनच फिदा झाला आणि तिला चिडवत म्हणाला ” बापरे, म्हणजे अकेली लडकी देख के मैने कुछ किया तो मैं पूरा कामसे गया मग तर…?”
    दोघेही त्यावर हसले.
    ती म्हणाली ” चल इथे काही अंतरावर एक धाबा आहे, मस्त मिसळ पाव खाऊन मग पुढे जाऊ.”
    ओके मॅडम म्हणत रितेश अनघाच्या मागे निघाला.
    अनघा सोबत असं मस्त निसर्ग सौंदर्य न्याहाळत फिरायला, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी विषयी जाणून घ्यायला रितेश ला मजा येत होती.
    रोज काही वेळ अनघा सोबत घालवायचं असं त्याचं दोन आठवडे रूटीन झालं होतं. तो दिवसेंदिवस अनघाच्या प्रेमात पडत होता. रितेश ला आता सुट्टी संपल्याने परत जावं लागणार होतं.
    अनघा मात्र अजूनही त्याला एक मित्र मानत होती. तिचं सगळं लक्ष सध्या करीअर वर होतं.

    अनघा आणि रितेशची मैत्री प्रेमात बदलेल का.. अनघा रितेश सोबत लग्नाला तयार होईल का हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    क्रमशः

    पुढचा भाग लवकरच….

    हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा 

    ©अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

     

  • जुळून येती रेशीमगाठी..( एक प्रेमकथा)- भाग १

    “आई, मी निघतेय गं. सायंकाळी उशीर होऊ शकतो, कळवते तुला घरी यायला निघाले की.” अनघा गाडीला चाबी लावतच आईला सांगत बाहेर जायला निघाली.  आई बाबाही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले.
    अनघा आई बाबांना एकुलती एक, अगदीच बिनधास्त मुलगी, तिला पक्षी, प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे तिचे स्वप्न तिला सत्यात उतरवायचे होते. अनघा एक आत्मविश्वासू मुलगी, तिला शोभेसा तिचा बॉयकट, शक्यतो टिशर्ट पॅंट शूज जॅकेट असा तिचा पोशाख असायचा. बाबा तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत करायचे पण आईला मात्र ते फारसं पटत नसलं तरी अनघाची जिद्द आणि बाबांचा पाठिंबा त्यापुढे आईचे काही चालत नव्हते. अनघाचे कॉलेज संपून तिने वाइल्ड लाइफ फोटोग्राफी चा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्या प्रोजेक्ट्स साठी ती शहराबाहेर फोटोग्राफी साठी जात असे.
    असंच आज रविवार असून सुद्धा ती सकाळीच घराबाहेर पडली. आईला तिच्या अशा रूटीन मुळे फार चिडचिड व्हायची.
    न‌ राहावून आई बाबांना म्हणाली, “आता अनघा‌ लहान नाही हो, किती दिवस असं बाहेर बाहेर राहणार. मुलीने जरा घरकामात मदत करावी, घर कसं सांभाळतात समजून घ्यावं, लग्नाचं वय झालं आता तिचं. करीअर ठिक आहे पण हेही महत्त्वाचे आहेच ना. तुम्ही तिला काही म्हणत नाही, माझं काही ती ऐकत नाही कारण बाबा असतात ना पाठीशी घालायला.”
    आईचा मुड काही ठिक नाही याचा बाबांना मॉर्निंग वॉकला जातानाच अंदाज आला होता.
    बाबा त्यावर म्हणाले ” अगं, जबाबदारी पडली की करेल ती सगळं, तू कशाला काळजी करतेस आणि लग्नाचं आताच काय घाई आहे, करीयर होऊ दे तिचं सेट, मग बघूया. खूप काही वय झालं का आपल्या मुलीचं.”
    आईला ते ऐकून अजूनच राग आला. दुपारी अनघाच्या मावशीचा नेमका त्याच दिवशी फोन आला अनघा साठी स्थळ सुचवायला. मावशी म्हणाली ” ताई, आपल्या अनूसाठी साजेसे स्थळ आहे, मुलगा परदेशात नोकरी करतो. घरी एकुलता एक, परिस्थिती चांगली आहे.  त्याची आई आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. मुलगा अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा आहे. अनूला शोधून सापडणार नाही असं स्थळ. पुढच्या आठवड्यात सुट्टीला येतोय तो, त्यांना मी अनू विषयी सांगितले, त्याच्या आईची इच्छा आहे की मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घ्यावा. तू अनूला कल्पना दे आणि भाऊजींना सांग हे स्थळ हातचं सोडू नका.”
    आईने ते ऐकून अजूनच अनघाच्या लग्नाचं मनावर घेतलं आणि बाबांना याविषयी कल्पना दिली. बाबा म्हणाले “अनघाला सांगून बघूया पण घाई नको करायला.”
    आई  चिडून म्हणाली “अहो, बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे, पुढचं पुढे बघू. त्यालाही अनघा आवडायला नको का. तिच्या केसांचा बॉयकट, राहणीमान, तिचे विचार त्यांना पटेल याची काय खात्री. कित्येक वेळा सांगितलं तिला जरा मुलींसारख राहत जा. जरा केस वाढव. इतकं बिनधास्त राहणं बरं आहे का मुलींच्या जातीला‌. मी सांगितले ते तुझ्या दोघांनाही पटत नाही.”
    आईला शांत करत बाबा म्हणाले “तू आधी शांत हो बघू. काळजी करू नकोस, मी बोलतो अनघा सोबत पण मला अजूनही वाटते की घाई नको करायला.”
    बाबांना खात्री होती की अनघा आता लग्नाला नकारच देणार पण आईला वाईट नको वाटायला म्हणून बाबा बोलून गेले.
    सायंकाळी अनघा घरी आली, तिच्या फोटोग्राफी मधल्या दिवस भराच्या गमतीजमती ती आई बाबांना सांगत होती. रात्री जेवण झाल्यावर आईने बाबांना इशारा करून अनघा सोबत लग्नाच्या स्थळा विषयी बोलण्याची आठवण करून दिली.
    बाबा अनघाला म्हणाले “अनू बेटा, तुला आता करीअर सोबतच भविष्याचा, लग्नाचा विचार करायला हवा. लगेच लग्न कर असं म्हणत नाही आम्ही पण जरा आता मनावर घे, तुला कसा मुलगा हवा, तुझ्या अपेक्षा काय आहेत याविषयी जरा विचार कर.”
    बाबांच्या अशा बोलण्याने अनघा जरा गोंधळली आणि तिला हेही लक्षात आले की आईने लग्नाचा विषय काढला असणार म्हणून बाबा असं म्हणत आहेत, ती म्हणाली “बाबा असं अचानक काय लग्नाचं, मला सद्ध्या तरी लग्न नाही करायचं.”
    आई तिला चिडून म्हणाली “मग कधी करणार आहे लग्न तू, अगं जरा विचार कर आता, जरा इतर मुलींसारख राहायला शिक. करीअर सोड नाही म्हणत मी पण सोबत हे सगळं महत्त्वाचं आहे ना.”
    आईचा पारा चढलेला बघून अनघा आईच्या मिठीत शिरून हसविण्याचा प्रयत्न करत म्हणाली “आई तुला मला सासरी पाठवायची किती घाई झाली गं, नको झाली का गं तुला मी. आई अगं मी आता लगेच लग्न नको म्हणते , कधीच नाही करणार कुठे म्हणाली.”
    आई तिला समजावत म्हणाली “अनू , अगं आईच्या काळजीपोटी बोलते मी. योग्य वयात लग्न झालेलं बरं. सरळच सांगते तुला, एक स्थळ आणलं आहे मावशीने, पुढच्या आठवड्यात तू त्या मुलाला भेटावं असं वाटतं आम्हाला. चांगले स्थळ आहे, बघायला काय हरकत आहे.”
    अनघाने बाबांकडे बघितले, बाबांनी इशार्‍याने हो म्हण म्हणून सांगितले. ‌
    अनघा इच्छा नसतानाही होकारार्थी मान हलवून म्हणाली “आई, ठिक आहे, मुलगा बघायला हरकत नाही पण त्याला मी आहे तशीच आवडली तर ठिक आणि माझं करीअर, माझं स्वप्न पूर्ण होत पर्यंत  लग्न उरकून घ्यायची घाई नको हे सगळं मला त्याच्याशी आधी क्लिअर करायचे आहे. हे पटलं तर ठिक नाहीतर नको मला इतक्यात लग्न.”
    त्यावर म्हणाली “अगं किती अटी घालशील, आधी बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. त्यांनी होकार दिला तर मग ह्या गोष्टींचा विचार करू.”

    पुढे काय होते ते बघूया पुढच्या भागात ?

    क्रमशः

    पुढचा भाग लवकरच….

    हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ?

    ©अश्विनी कपाळे गोळे

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.