Author: ashvini

  • भुताटकी इमारत ( भयकथा)

    मदन नोकरीच्या शोधात पुण्यात आलेला. सुरवातीला एक खोली मित्रांसोबत शेअर करून काटकसरीने वर्ष काढलं. आता मात्र चांगली नोकरी मिळाली आणि आई बाबांना आता पुण्यातच घेऊन यायचं असं त्याचं ठरलं. आई बाबा इकडे येणार म्हंटल्यावर अर्थातच घराची शोधाशोध सुरू झाली. जिथून ऑफिस फार लांब पडणार नाही अशा एरिया मध्ये घर बघावं असा विचार करून त्याने घर शोधायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी आता बजेटमध्ये बसेल असा घर/ फ्लॅट शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरत होता.

    अशातच एक दिवस त्याच्या नजरेत पडली एक सोसायटी. मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेली ही सोसायटी बाहेरून अगदी राजवाड्यासारखे आर्किटेक्चर असलेली, साधारण तीन चार वर्षांपूर्वीच तयार झालेली असावी असा अंदाज बिल्डिंग बघताच येत होता. मदन चे लक्ष या सोसायटीकडे गेले आणि तो आपली टू व्हीलर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करून रस्ता ओलांडून सोसायटी गेटच्या दिशेने चौकशी करायला जाऊ लागला. बिल्डिंगच्या आजुबाजूला बरीच हिरवीगार झाडे होती, आवारात पालापाचोळा पडलेला, दुरून एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासणारी ही सोसायटी मदनला जवळून बघताच जरा भयाण वाटली. गेटच्या आत चिटपाखरूही दिसत नव्हते पण गेटवर खुर्ची टाकून एक पन्नाशीच्या वयातील सिक्युरिटी गार्ड हातात काठी घेऊन बसलेले. मदन त्यांच्या दिशेने आला आणि म्हणाला,
    “नमस्कार, या सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट आहे का भाड्याने मिळेल असा..?”

    सिक्युरिटी गार्ड हसून उत्तरला, “भाड्याने फ्लॅट..या सोसायटीमध्ये.. नाही रे बाबा…इथे कुणीच राहत नाही.. अख्खी सोसायटी रिकामी आहे.. फ्लॅट तर आहेत पण राहण्याची हिंमत कुणातही नाही इथे…”

    गार्डच्या बोलण्याने मदन जरा गोंधळला आणि म्हणाला, “म्हणजे..मला काही कळालं नाही..इतकी सुंदर सोसायटी, तीही अगदी मोक्याच्या ठिकाणी आणि पूर्ण रिकामी.. म्हणजे काही प्रोब्लेम आहे का?”

    गार्ड आजुबाजूला नजर फिरवत म्हणाला, “हो..इथे भूत आहे भूत..दिवसा तरी मी असतो पण रात्री तर चिटपाखरूही फिरकत नाही इकडे.. ”

    मदन त्यावर हसला आणि म्हणाला, “भूत…..काही तरीच काय हो..भूत वगैरे काही नसतं बघा..उगाच मनात येईल ते सांगू नका..सरळ सांगा ना फ्लॅट उपलब्ध नाही म्हणून..”

    गार्ड त्यावर म्हणाला, “हे बघ पोरा..मला काही हौस नाही उगाच काहीतरी सांगण्याची..तुझा विश्वास नसेल तर नको ठेवू पण जे काही मी सांगतोय ना ते खरं आहे..तुला कुणी तरी दिसतंय का इथं बघ ना जरा.. खूप मोठी स्टोरी आहे या सोसायटीची…”

    मदनला अजूनही गार्ड च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. “बरं..भूत आहे तर मग तुम्ही कसे काय इथे? सोसायटी तर रिकामी आहे ना मग तुमची उगाच ड्युटी का इथे..”

    गार्ड – “बंद सोसायटी बघून चोरट्यांनी, सट्टा जुगार वाल्यांनी भरदिवसा इथं अड्डा बनवायला नको म्हणून मी असतो सायंकाळी सहा वाजेपर्यंत..पण त्यानंतर कानाला खडा.. पोटापाण्यासाठी दिवसभर ड्युटीवर यावं लागतं..”

    गार्ड चे उत्तर ऐकून मदन परत जायला निघाला. रात्री रूमवर आल्यावर घडलेला सगळा प्रकार त्याने मित्राला हसत हसत सांगितला तर त्यावर मित्र म्हणाला ,”अरे मदन, हसू नकोस..ती सोसायटी खरंच भुताटकी आहे..मी ऐकलंय त्या सोसायटी विषयी बरंच काही पण नक्की काय स्टोरी आहे हे काही माहित नाही..”

    मित्राचे बोलणे ऐकून मात्र मदनला हा भूत प्रकार, ही बंद सोसायटी फार इंटरेस्टिंग वाटली. आता या सोसायटीची स्टोरी माहिती करून घ्यायला हवी असा विचार करून उद्या परत त्या गार्ड ला भेटायचं त्याने ठरवलं. रात्रभर सतत ती राजवाड्या प्रमाणे भासणारी बंद सोसायटी त्याच्या नजरेसमोर येत होती, डोक्यात गार्ड चे शब्द , भूत.. अख्खी सोसायटी रिकामी..बंद..हे सगळे विचार काही गोंधळ घालत होते.. मदनने कशीबशी रात्र काढली.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच मदन त्या सोसायटी जवळ गेला. सिक्युरिटी गार्ड गेटच्या आतला परिसर स्वच्छ करत होता. मदन ने बंद गेट जवळून त्यांना हाक मारली, “दादा.. ओळखलं का? मी काल आलेलो बघा..जरा बोलायचं होतं हो..”

    गार्ड ने हातातला झाडू बाजूला ठेवला आणि म्हणाला, “अरे आज परत इकडे..तेही सकाळीच..बोल काय म्हणतोस..”

    मदन – “काल तुम्ही सांगितलं ना या सोसायटी विषयी..भूत..अख्खी सोसायटी रिकामी.. यामागे काही तरी मोठी स्टोरी आहे म्हणालात..मला ना ते सगळं जाणून घ्यायचंय हो..काल रात्री सतत हाच विचार सुरू होता डोक्यात..प्लीज मला सांगा ना काय स्टोरी आहे या बंद सोसायटीच्या मागे..”

    गार्ड – “अरे बाळा, काल तर विश्वास नव्हता तुझा..हसत होतास माझ्या बोलण्यावर..पण मला सांग, कशासाठी जाणून घ्यायचं आहे सगळं..?”

    मदन – “दादा, खरं सांगायचं म्हणजे माझा ना भूत वगैरे वर विश्वास नाही हो पण काल ही सोसायटी बघितली..दुरून अगदी राजवाडा वाटणारी ही सुंदर सोसायटी अशी अख्खी रिकामी, बंद कशी काय असू शकते हा विचार माझ्या डोक्यातून काही केल्या जात नाहीये.. मित्रांकडून सुद्धा कळाले की या सोसायटीची मोठी स्टोरी आहे म्हणून.. तेव्हापासून तर अजूनच वेड लागलंय मला..प्लीज सांगा ना..”

    गार्ड – “बरं बरं सांगतो सगळं पण मी जे सांगतोय ते कुणाला सांगू नकोस.. माझ्याही पोटापाण्याचा प्रश्न आहे.. बिल्डर मलाच रस्त्यावर आणेल जर त्यांना कळालं की मी कुण्या परक्या व्यक्तीला सोसायटी विषयी सांगितलं तर माझी नोकरी जाईल..”

    मदन – “नाही सांगत मी कुणाला पण मला प्लीज सांगा आता तुम्ही सगळं..”

    गार्ड गेटमधून बाहेर आला आणि मदनची अस्वस्थता बघून म्हणाला, “फार हट्टी आहेस रे पोरा.. थांब बाजुच्या टपरीवरून दोन चहा आणतो..बस इथे.. बसून बोलूया..”

    गेटजवळ असलेल्या झाडाभोवतीच्या ओट्यावर मदन बसला. गार्ड लगेच चहाचे दोन कप हातात घेऊन येत आला आणि मदनला एक कप देत सोसायटीची स्टोरी सांगू लागला,

    “तर गोष्ट अशी आहे की, दोन‌ वर्षांपूर्वी ही राजवाड्यासारखी सोसायटी उभी झाली.. बांधकाम सुरू होते तेव्हापासून मी इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. कधी दिवसा तर कधी रात्री माझी इथे ड्युटी. इमारत तयार झाली तसेच मोठ्या आनंदाने अनेक कुटुंबे इथे राहायला आले. बर्‍याच जणांनी धुमधडाक्यात वास्तुशांती वगैरे केली. सगळे आपापलं नवं घर सजविण्यात गुंतलेले. कुणी उत्साहाने फर्निचर बनवून घेतले तर कुणी लाखोंचे इंटेरियर करवून घेतले. अशातच काही महिने निघून गेले.
    एका रात्री माझी नाईट ड्युटी होती. पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात विजा चमकत होत्या, विजांचा गडगडाट त्या रात्रीच्या शांततेचा भंग करत होता.  अचानक लाइट गेली, सोसायटी मधील काही इमरजन्सी लाइट सोडले तर सगळीकडे किर्र अंधार. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजत आलेले. मी छत्री हातात घेतली आणि सोसायटीच्या आवारात पहारा देण्यासाठी राऊंड वर निघणार तोच एक किंचाळी कानावर पडली सोबतच धपकन काही तरी पडल्याचा आवाज सुद्धा आला.  पावसाळी रात्रीच्या त्या भयाण वातावरणात अशी अचानक किंचाळी ऐकून मी सुद्धा घाबरलो पण देवाचा धावा करत धपाधप पावले टाकत नेमकं काय झालंय याचा अंदाज घ्यायला बिल्डिंग भोवती जायला लागलो. मागच्या बाजूला जाऊन बघतो तर काय, कुणीतरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला.. भळाभळा रक्त वाहत होते, उघडे डोळे स्थीर नजर ठेवून एकटक कुठेतरी बघत होते. एकंदरीत चित्र बघून मला पार घाम फुटला, भितीने हातपाय थरथरत होते. धावतच गेटवर आलो आणि सोसायटीच्या सेक्रेटरी ला इंटरकॉम वरून फोन लावला. पुढच्या काही मिनीटात त्यांच्यासह सोसायटी मधले बरेच जण खाली आले.
    एम्बुलन्स ला बोलावले गेले पण ती व्यक्ती कधीच हे जग सोडून गेलेली.

    ती मृत व्यक्ती म्हणजेच नवव्या मजल्यावर राहणारा सुधीर. सुधीर इथे एकटाच राहायचा. अतिशय उत्साही व्यक्तीमत्व असलेला हा तरुण दररोज न चुकता सकाळी सहा वाजता खाली दिसायचा. कधी मॉर्निंग वॉक करायला तर कधी व्यायाम व्हावा म्हणून सायकल चालवायचा. नंतर जिम मध्ये बराच वेळ व्यायाम वगैरे करून मग घरी परत जायचा. त्याची माझी दररोज सकाळी न चुकता गाठ पडायची आणि गुड मॉर्निंग म्हंटल्याशिवाय, कसे आहात वगैरे विचारपूस केल्याशिवाय तो दिसल्यावर कधीही न बोलता जायचा नाही. दररोज डोळ्यांसमोर बघितलेला हा माझ्या मुला समान सुधीर नवव्या मजल्यावरून रात्री उशिरा असा अचानक खाली कसा काय पडला याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. कुणी म्हणे त्याने आत्महत्या केली तर कुणी म्हणे अपघात झाला, पाय घसरून वगैरे तोल गेला असावा. नंतर तर कळालं की हा घातपात होता. त्याचा आणि बिल्डरचा बराच मोठा वाद होता, केस का काय सुरू होती कोर्टात. त्या वैमनस्यातून घातपात घडवून आणला अशीही चर्चा झाली पण नक्की काही पुरावा मिळाला नाही बघ.

    तो शरीराने तर गेला पण त्याचा आत्मा इथेच भटकत असतो. त्याच्या अशा अपघाती मृत्यूनंतर सोसायटीत भितीचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा खाली यायला जायला सगळे घाबरू लागले. इतकंच काय तर बर्‍याच जणांना तो मृत्यूनंतर सुद्धा दिसायचा. नववा मजला तर आठवडाभरात रिकामा झाला. भितीपोटी त्याच्या आजूबाजूचे लोक घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. त्यानंतर बर्‍याच जणांना तो दिसला. एकदा पहाटे दुसऱ्या मजल्यावरील नेने काकांना तो सोसायटीच्या आवारात सायकल फिरवत असलेला दिसला. काकांना भितीमुळे इतका मोठा धक्का बसला की ते दुसऱ्या मुलाकडे राहायला गेले. सुरवातीला काकांवर कुणी विश्वास ठेवला नाही पण हळूहळू बर्‍याच जणांनी त्याला बघितलं. कधी तो जॉगिंग करताना दिसायचा तर कधी गाडीवरून येताना, कधी सायकलवर तर जिम मध्ये. महिन्या दोन महिन्यात अख्खी सोसायटी रिकामी झाली. सगळे आपलं घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेले. घराचे लोन, हफ्ते सगळं सुरू.. आवडीने उत्साहाने सजवलेले हक्काचे घर सोडून लोकं दुसरीकडे भाड्याने राहायला गेले. त्यानंतर कुणी इथे कमी किंमतीत सुद्धा घर विकत घेतले नाही ना भाड्याने घर घेतले. वर्ष होऊन गेलं पण ही सोसायटी बंद पडून आहे. मी सुरवातीला रात्री सुद्धा असायचो पण मलाही तो दिसला. पूर्वी कितीही चांगला माणूस असला तरी मृत्यूनंतर तो दिसल्यावर भिती वाटणारच ना..तसा मी सुध्दा घाबरलो.. त्याने मृत्यूनंतर कुणाला त्रास दिला नाही पण त्याच्या अशा दिसण्याने लोकं जाम घाबरून गेली. अख्खी सोसायटी रिकामी झाली.
    म्हणून आता फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतो मी इथे. ”

    मदन सगळं ऐकूनच जाम घाबरला. दबक्या आवाजात त्याने विचारले, ” घातपात घडवून आणला म्हणजे नक्की काय झालेले..बिल्डर सोबत कशावरून वाद होता सुधीर चा? मग त्याचा घातपात असेल तर काहीच पुरावा नाही मिळाला?”

    गार्ड म्हणाला, “खरं तर ही सोसायटी ज्या जागेवर उभी आहे ना, ती जागा सुधीरच्या वडिलांची‌. पूर्वी त्यांचे लहानसे घर होते इथे आणि आजुबाजूला शेती. मोक्याची जागा म्हणून बिल्डरने त्यांच्या मागे लागून ही जागा मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला पण सुधीरचे बाबा काही जागा द्यायला तयार नव्हते. काही दिवसांनी सुधीरच्या आईला कॅन्सर झाल्याचे कळाले, मग उपचारासाठी पैसा हवा होता म्हणून सुधीरच्या बाबांनी फार काही विचार न करता ही जागा बिल्डरला दिली पण त्यांना मात्र बिल्डरने फसवले. जितकी किंमत होती त्याच्या अर्धे सुद्धा पैसे दिले नाही. एक फ्लॅट त्यांना राहायला दिला नवव्या मजल्यावर, जिथे सुधीर राहायचा तोच फ्लॅट. या दरम्यान सुधीर शिक्षणासाठी बाहेर होता शिवाय आईचे आजारपण, ऑपरेशन त्यामुळे त्याला या व्यवसायातील गोष्टी काही माहीत नव्हत्या. बिल्डरने सुधीरच्या वडीलांच्या सह्या घेऊन कमी किंमतीत ही जागा हडप केल्याची गोष्ट सुधीरला कळाली तेव्हा त्याने कोर्टात केस टाकली. इकडे उपचार करूनहु काही फायदा झाला नाही, काही महिन्यांत त्याच्या आईला स्वर्गवास झाला. बाबांना फसवणूक झाल्याचे कळाले शिवाय आई गेल्याचा धक्का, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली. तेही वर्षभरात हे जग सोडून गेले. सुधीर त्यांना एकटाच मुलगा होता. आई बाबा गेल्यावर तो खूप खचला पण बिल्डरने केलेल्या फसवणूकीचा बदला घ्यायचा असं त्याचं ठरलेलं होतं. पण अचानक त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्याने मृत्यूनंतर बिल्डरचा बदला घेतला बघ.. या सोसायटीतुल करोडो रुपये किंमतीची घरे बंदच आहे. बिल्डरची बदनामी झाली, लोकांनी बिल्डर वर केस करून घराची किंमत परत मागितली. अजूनही तो बिल्डर अनेक केस लढतो आहे कोर्टात. फसवून हडप केलेल्या या जागेवर सोसायटी तर उभी आहे पण इथे राज्य मात्र सुधीर करतो आहे, तेही ह्यात नसताना..ते म्हणतात ना, अतृप्त आत्मा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भटकत असतो तसाच हा प्रकार..”

    मदनचे मन सगळं काही ऐकून सुन्न झाले. सुधीरच्या आत्म्याला शांती मिळो असं नकळत तो मनोमन बोलून गेला. गार्ड परत गेट उघडून सोसायटीच्या आत आपल्या ड्युटीवर निघून गेला.

    समाप्त!!

     

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

           तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

       अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

        आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
       दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
    पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

    जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

    तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
    त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
    जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
    विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

    या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
    तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
    तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

    तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
    तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

    तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
    ती परत रडायला लागली.

    जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
    जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

    आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

    तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

    झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

    झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

    हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

    ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

    प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग अंतिम

    अमन डायरी हातात घेऊन नदी किनारी गेला. नदीचे पाणी स्थिर पणे वाहत होते, आजुबाजूला दुरवर पसरलेली झाडे अमन बघत होता. त्याला या किनाऱ्यावरची आरती सोबतची भेट आठवली. तिच्या आई सोबत तर कधी एकटीच ती या नदी किनारी कपडे धुवायला यायची. अशीच एकदा एकटी आलेली तेव्हा अमन घरच्यांच्या लपून छपून तिला भेटायला नदीवर गेलेला. गुलाबी रंगाचा अगदी साधासा सलवार कमीज घालून आपल्या लांबसडक केसांची वेणी सांभाळत ती कपडे धुण्यात व्यस्त होती. अमन लांबूनच तिला न्याहाळत बसलेला. आजुबाजूला गावातील काही बाया सुद्धा धुणी धुवायला तिथे आलेल्या होत्या. जशा त्या बायका तिथून गेल्या तोच अमन धावत जाऊन आरतीला भेटला‌. अमनला बघताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती. बोलायला शब्द सुचत नव्हते पण आजुबाजूला बघत ती म्हणाली, “अमन अरे असं एकांतात आपल्या दोघांना कुणी बघितले तर गावात उगाच अफवा पसरतील…”

    तिच्या डोळ्यात बघतच तो म्हणाला, “किती सुंदर दिसतेस गं आरती तू…तुला भेटण्याची संधी बघत इथे आलो‌ आणि तू पळवून लावतेस…”

    ती लाजतच इकडे तिकडे बघत होती आणि अमन तिला बघत होता.

    ती गोड भेट आठवत असताना एक वार्‍याची गार झुळूक त्याला जवळून स्पर्शून गेली आणि तो भानावर आला. नदी किनारी बसून त्याने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.

    तिने त्या नदीवरील दोघांच्या भेटीचे छान वर्णन केले होते. तिच्या मनातल्या भावना, प्रेम, त्याला भेटल्यावर झालेला आनंद अगदी छान शब्दात उतरविला होता.

    पुढे पान बदलले तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यात लिहीले होते,

    “अमन, त्या दिवशी नदी किनारी आपण भेटलो‌ हे गावातल्या पाटलांच्या दिनूने बघितलं. आपल्या विषयी त्याला संशय आला. तू परत गेल्यावर त्याने एकदा मला असंच एकटं बघून गाठलं आणि आपल्या दोघांविषयी विचारलं. त्याची माझ्यावर वाईट नजर होती. त्याला मी आवडते, माझ्याशी त्याला लग्न करायचं असं तो मला बोलून गेला पण मी काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्यानंतर रोज कुठे ना कुठे तो माझा पाठलाग करत राहीला. मी त्याला भाव देत नाही त्याच्या प्रश्नांना उडवून लावते हे त्याला कळालं तसाच तो चिडला. गपगुमान मला हो‌ म्हण नाही तर गावात तुझी बदनामी करतो, तुझ्या घरच्यांना गावात राहणे मुश्किल करतो अशा धमक्या तो देत राहीला. मी खूप घाबरली अमन..तू कधी एकदा येतोस आणि मला यातून सोडवितो असं झालेलं मला..त्याच्या विषयी कुणाला सांगावं हे मला कळत नव्हतं… त्याचा अख्ख्या गावात दरारा..कुणी त्याच्या विरोधात जाणार नाही हे माहीत असल्याने काय करावं मला कळत नव्हतं. मला एकटीला घरातून बाहेर पडायला पण भिती वाटत होती अमन..मी फक्त तुझी वाट बघत होते. तू आलास की सगळं काही ठीक होईल म्हणून मी दिवस मोजत होते… वर्ष संपत होते…”

    इतकंच काय त्या डायरीत लिहीलं होतं.
    पण पुढे काय? हा प्रश्न अमनला पडला तितक्यात आरतीचा भास त्याला झाला.

    “अमन, एक दिवशी त्या दिनूने मला नदीवर एकटी बघून गाठलं. आईची तब्येत बरी नसल्याने मी एकटीच नदीवर आलेली. त्याने संधीचा फायदा घेत माझा हात धरून लग्नासाठी तयार हो म्हणत हट्टच धरला. मी नाही म्हणत त्याला एक कानाखाली वाजवली. तो‌ माझ्या अशा वागण्याने चिडला, तुला सोडणार नाही. बघून घेतो म्हणत त्या क्षणी तर तिथून निघून गेला पण मी भितीने कापत होते, रडत होते. आता झाला प्रकार आई बाबांना सांगायला पाहिजे म्हणून मनात ठरवलं पण झालं उलटच. मी घरी गेले तर  बाबा आईला तालुक्याला घेऊन जायला निघत होते. आईला डॉक्टर कडे घेऊन जातो आणि सायंकाळी परत येतो म्हणत आई बाबा बाहेर पडले. मी घरात एकटीच खूप रडले‌. तुझ्या मामी सुद्धा माझी चौकशी करायला आलेल्या तेव्हा त्यांना सांगू की नको असं झालेलं मला… काही वाटलं तर हाक मार, घरी ये म्हणत त्या निघून गेल्या. त्या दिवशी मी मामीला माझी परिस्थिती सांगितली असती तर कदाचित मी आज जिवंत असते. दिवसभर मी दार लावून घरातच होते. सायंकाळी आई बाबांना यायला जरा उशीर झाला आणि अंधाराचा फायदा घेत दिनू घरी आला. दार ठोठावले तेव्हा आई बाबा आले असं समजून मी दार उघडले तर दिनू होता. त्याने घरात शिरून माझ्यावर अत्याचार केला, माझ्या इज्जतीवर हात टाकला. त्याच्यापुढे माझी ताकद कमी पडली, मला प्रतिकार करता आला नाही. आता माझ्याशी लग्न केल्याशिवाय पर्याय नाही म्हणत तो कुत्सितपणे हसून निघून गेला. मी अंगावरचे कपडे सावरत रडत होते. आई बाबा उशीरा घरी आले, दोघेही दमून भागून आल्यावर जेवण करून झोपी गेले. मी रात्रभर रडत राहीली, वेदनेने तडफडत राहीली. झाल्या प्रकाराने माझ्या अंगात ताप भरला होता, मनात भितीने कापत होते मी पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नव्हता अमन. आई बाबांनाही मी काही सांगू शकले नाही. काही दिवस मी घरातल्या घरातच होते, बाहेरच्या जगाची भिती वाटत होती मला. परत एक दिवस घराबाहेर पडावे लागले आणि भर दुपारी आजुबाजूला कुणीही नाही बघून दिनूने माझे अपहरण केले त्याच्या गाडीतून मला शेतातल्या झोपडीत घेऊन गेला. हवा तसा उपभोग घेतला. मी सायंकाळी घरी आली नाही म्हणून आई बाबा गावभर मला शोधत होते. ही गोष्ट दिनूला मित्रांनी कळविली तेव्हा तो‌ घाबरला. आपलं सत्य गावकर्‍यांसमोर आलं तर कुटुंबाची प्रतिष्ठा खालावली जाईल, बदनामी होईल म्हणून त्याने परत परत माझ्यावर राग काढत अत्याचार केला आणि अखेरीस गळा आवळून मला ठार मारले. रात्री अंधाराचा फायदा घेत माझ्या अंगावर नीट चढवून नदीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी माझा मृतदेह नदीतील दगडाला अडकलेला सापडला तेव्हा तो परत घाबरला, त्याने मित्राच्या मदतीने माझ्या घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात होते “मी आरती, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने मला धोका दिला म्हणून मी स्वतःला संपविते आहे.”

    गावकर्‍यांना वाटले मी प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केली पण माझ्यावर किती अत्याचार झाला हे कुणालाच माहीत नाही अमन.
    योग्य वेळी मी आई बाबांना, तुझ्या मामींना हे सांगितले असते तर अशाप्रकारे माझा शेवट झाला नसता. काही तरी पर्याय नक्कीच निघाला असता.

    अमनला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसला. माझ्या आरतीचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्याने दिनूला भेटायला बेत आखला. त्याने सायंकाळी दिनूला गाठले. अमनला बघताच दिनू जरा गोंधळला पण ह्याला कुठे काय माहित म्हणून त्याने मनातला गोंधळ लपवत त्याच्याशी हाय हॅलो केले. गप्पांच्या ओघात अमन त्याला आज एकत्र जेवण करू म्हणत दारु मिळेल अशा एका धाब्यावर घेऊन गेला. दिनू काही ना काही बहाना देत नाही म्हणता म्हणता शेवटी तयार झाला. अमन ने जेवताना दारुचा ग्लास दिनूच्या पुढे करत इकड तिकडच्या गप्पा मारल्या आणि शेवटी आरतीचा विषय काढला. सुरवातीला दिनू काही त्यावर बोलत नव्हता, अमन त्याच्या तोंडून सत्य बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. बराच वेळ आरतीचा विषय काढल्यावर , जसजशी दिनूला नशा चढली तसा तो जरा जरा बोलू लागला, “मस्त आयटम होती यार ती..पुरी लाइफ तिच्या सोबत मज्जा करणार होतो, लगीन करणार होतो पण साली तयार होत नव्हती. तुझ्यासोबत लफड होतं का रे तिचं.. म्हणूनच मला नाही बोलली ती..पण मी सोडली नाही तिला, मज्जा केली तिच्या संग अन् दिली फेकून नदीत..कुणाला कळालं बी नाही..”

    अमन ने दिनूचे सगळे बोलणे त्याच्या नकळत फोनमध्ये रेकॉर्ड केले. रात्री उशिरा घरी आल्यावर अमन ने आरती विषयी त्याच्या भावना, तिच्या मृत्यूचे सत्य, पुराव्यानिशी मामांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामांच्या मदतीने दिनूच्या विरूद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली, पुरावे दाखल केले. दिनूला काही कळण्याच्या आत त्याला अटक झाली आणि वर्षभराने का होईना पण आरतीच्या मृत्यूचे सत्य सर्वांसमोर आले.

    अमनने अखेर आरतीला न्याय मिळवून दिला, तिला मुक्ती मिळाली. अमनला होणारा तिचा भास आता जाणवत नव्हता पण ज्यांनी तिच्यावर अन्याय केला, तिच्या चारित्र्यावर शिंंतोडे उडविले त्याला शिक्षा सुनावली गेली याचे अमनला समाधान वाटले.

    अमनचं पहिलं प्रेम या जगात नव्हतं पण तिच्या आठवणी त्याच्या मनात अमर होत्या.
    या आठवणी नव्याने मनात साठवून अमन शहरात परत गेला.

    समाप्त.

    मी लिहीलेली ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग दुसरा

         अमन आणि आरती एकाच वयाचे. आरती दिसायला सुंदर, उजव्या गालावर पडणारी तिची खळी कुणालाही वेड लावणारी. गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, साधं सरळ राहणीमान असलेली आरती अमनची बालपणीची मैत्रीण, दोघे दिवसभर एकत्र खेळायचे या अंगणात.  लहान असताना कधी मामांसोबत शेतात बैलगाडी सफर करायचे तर कधी मामा, आरतीचे बाबा यांच्यासोबत नदीवर पोहायला जायचे. प्रत्येक सुट्टीला आजोळी आल्यावर अमन आरतीला भेटायला अगदी आतुर असायचा. आरती सुद्धा मोठ्या उत्साहाने त्याची वाट बघायची. जरा वयात यायला लागल्यावर दोघांचे एकत्र खेळणे कमी झाले पण भेटीगाठी गप्पागोष्टी सुरू झाल्या. मुलगा मुलगी एकत्र दिसल्यावर गावात लोकं नावं ठेवतील म्हणून ती खेळायला वगैरे येत नसे पण लपून छपून कधी नजरेने तर कधी समोरासमोर भेटून दोघे खूप काही बोलायचे.

         दहावीची परीक्षा झाल्यावर अमन चांगला महीनाभर मामांकडे राहीला होता, त्यावेळी दोघांना एकमेकांविषयी जरा वेगळीच ओढ निर्माण झाली. बालपणाचा टप्पा पार करून आता तारुण्याची नवी उमेद, एकमेकांविषयी काही तरी आकर्षणाच्या भावना दोघांनाही जाणवल्या होत्या. त्यावेळी परत जाताना त्याचा पाय काही केल्या मामांकडून जायला निघत नव्हता पण आई बाबा घ्यायला आले आणि तो शहरात निघून गेला. त्याने आरतीला पत्र लिहिले होते,

    “आरती, मला तू खूप आवडतेस..माझं प्रेम आहे तुझ्यावर..आता आपली भेट कधी होईल सांगू शकत नाही पण कॉलेज संपल्यावर लवकरच चांगली नोकरी शोधून तुला मागणी घालायला घरी नक्की येईल. मला खात्री आहे तू नक्कीच माझी वाट बघशील…आता परत आलो‌ की आपल्या नात्याविषयी घरी सांगणार आहे मी…
    पत्र कुणाला दिसू देऊ नकोस, उगाच माझ्यामुळे तुझ्यावर काही आरोप झाले, कुणी काही उलट बोललं तुला तर मला सहन‌ नाही होणार ते… काळजी घे…

    तुझाच,
    अमन…”

    ती भेट आरती सोबतची शेवटची भेट होती. तिला दिलेलं वचन पूर्ण करायला, नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी तिला सांगायला तो गावी आला होता पण ती मात्र कधीच हे जग सोडून गेली होती. किती‌ वाट पाहीली असेल आरतीने आपली पण या सहा वर्षांत आपण एकदाही येऊ शकलो‌ नाही इकडे याची त्याला खंत वाटली, आपसुकच त्याचे डोळे पाणावले. त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू बघताच एक आवाज आला,
    “अमन, रडू नकोस..तुला रडताना नहीं बघवत रे…जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही..”

    अमन‌ त्या आवाजाच्या दिशेने बघतो तर आजुबाजुला कुणीच नव्हते. घरातले सगळे एव्हाना झोपी गेले होते.

    अमन अस्वस्थ होत इकडे तिकडे बघत म्हणाला, “आरती…तू का दिसत नाहीये मला.. कुठे आहेस तू.. मला अशी कशी सोडून गेलीस गं…काय झालंय तुझ्यासोबत…आरती एकदा तरी माझ्या समोर येत ना… खूप काही बोलायच आहे.. खूप काही सांगायचं आहे तुला… कुठे आहेस तू…”

    ” अमन, आता मला तुझ्या समोर नाही येता येणार… खूप वाट बघितली रे मी तुझी..मला माहित होतं तू नक्की येणार पण थांबता नाही आलं मला तुझ्यासाठी… पण मी तुझ्यासाठी एक डायरी लिहून ठेवली आहे…उद्या सकाळी माझ्या घरी जा, माझी आई देईल तुला ती डायरी. तिला लिहीता वाचता येत नाही त्यामुळे त्यात काय आहे हे तिलाही नाही माहित पण जसं तू मला ऐकू शकतोस ना तसं आई सुद्धा मला ऐकू शकते, माझ्या आवाजाच्या सहाय्याने ती निदान जगते तरी आहे. माझ्या आणि बाबांच्या मृत्यू नंतर ती स्वतः ला संपविणार होती पण माझं अस्तित्व, माझा आवाज यातून मी तिला शपथ दिली की मी देवघरात लपवून ठेवलेली डायरी अमन आल्यावर त्यालाच द्यायची, तो एक दिवस नक्कीच येणार तोपर्यंत तरी तुला जगायचं आहे. तुझ्या येण्याने माझ्या मृत्युचे सत्य तुझ्या समोर, जगासमोर नक्की येईल याची मला खात्री होती. आईला सत्य कळाले तरी ती काही करू शकणार नाही आणि गावात कुणाला सत्य कळूनही ते काहीही करणार नाही म्हणून माझी डायरी फक्त तुझ्या हातात‌ यावी‌ आणि मला न्याय मिळावा यासाठी ही माझी इच्छा अपूर्ण असल्याने मला आजवर मुक्ती मिळाली नाही. उद्या आईला भेटून डायरी घे आणि नदी किनारी मला भेटायला ये. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला.”

    “आरती…का गेलीस अशी सोडून मला…काय झालं नक्की तुझ्यासोबत…ये ना परत आरती…ये ना…”

    अमन ओक्साबोक्सा रडत तिला आजुबाजूला शोधत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आरतीच्या आईला मी जाऊन भेटतो असं झालेलं त्याला.

    आरतीच्या विचारातच रात्री उशिरा त्याला झोप लागली. सकाळी जशी जाग आली तसाच तो खाडकन उठून बसला. लवकरच आवरुन बाहेर आला तोच मामींनी गरमागरम चहा नाश्ता दिला. घाईघाईत चहा नाश्ता करून तो आरतीच्या घरी गेला, दारातून आरतीच्या आईला हाक मारली. अमनला समोर बघताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमन घरात गेला तोच त्याचे लक्ष समोरच्या भिंतीवर लावलेल्या आरतीच्या आणि तिच्या बाबांच्या हार घातलेल्या फोटोंकडे गेले. आरतीच्या आईने डोळे पुसत त्याला बसायला एक खुर्ची पुढे केली आणि त्या आत गेल्या. अमनची नजर आरतीच्या फोटोवर स्थिरावली. तिचा निरागस चेहरा बघत दु:ख, प्रेम, विरह अशा मिश्र भावनांनी त्याचे डोळे पाणावले.

    आरतीच्या आई पाण्याचा ग्लास त्याला देत त्याला म्हणाल्या, “अमन बाळा, आरती आपल्याला सोडून गेली रे… पण तिनं आत्महत्या केली नाही तर तिचा घातपात झाला असं सारखं वाटतं मला. तिच्या जाण्याचं सत्य अजूनही मी शोधतच आहे रे..वर्ष होईल तिला जाऊन पण आजही माझ्या आजूबाजूला वावरते ती असंच वाटतं मला.. त्यामुळे तर मी जगते आहे..आणि हो ही डायरी तितकी तुझ्यासाठी ठेवून गेली ती..तेही मला ती गेल्यावर कळालं..बघ बाबा काय लिहिलंय त्यात..”
    त्या परत तिच्या आठवणीने रडायला लागल्या.

    अमन ती डायरी हातात घेत त्यांना म्हणाला, “काकी, असं रडू नका, हिंमत ठेवा..मी आलोय ना.. सत्य शोधून काढल्याशिवाय नाही जाणार मी.. विश्र्वास ठेवा माझ्यावर..मला काही मदत लागली तर सांगतो .. आलोच मी..”

    अमन डायरी घेऊन नदी किनारी जायला निघाला.

    क्रमशः

    डायरीत आरतीने नक्की काय लिहीले आहे? आरतीच्या मृत्यूचे सत्य काय आहे? याची उत्सुकता लागली ना…तर हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला

           अमन बर्‍याच वर्षांनी आज आजोळी आलेला. आजोळी आता आजी आजोबा नसले तरी दोन मामा मामी, भावंडे असं एकत्र कुटुंब. गावाच्या मधोमध प्रशस्त घर, चहुबाजूंनी अंगण त्यात फुलाफळांची झाडे. अमन‌ बालपणी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचाच पण जसजसे दहावी नंतर शिक्षण सुरू झाले तसे त्याचे येणे जाणे बंदच झालेले. आता कॉलेज संपले, नोकरीची ऑफर हातात होती पण तिथे रुजू व्हायला अजून काही दिवस बाकी होते तेव्हा मामा मामींना भेटायला जायचा अमनचा बेत ठरला.

         सायंकाळी सहाच्या सुमारास तो गावात पोहोचला. गावी येताच त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. बस मधून उतरून मामांच्या घराच्या दिशेने जायला निघाला तोच त्याच्या कानावर शब्द पडले, “अमन…कसा आहेस? खूप वाट बघितली रे तुझी… खूप उशीर केलास यायला…”

    त्याला तो आवाज ओळखीचा वाटला, त्याने मागे वळुन पाहिले तर काही माणसे त्यांच्याच कामात गुंतलेली दिसली पण जिचा हा आवाज आला ती काही दिसली नाही. त्याला जरा विचित्र वाटले, जिची आठवण दररोज व्याकूळ करायची तिचाच आवाज होता हा याची त्याला खात्री पटली पण ती दिसत का नाही… उशीर केलास यायला असं का म्हणाली ती…अशा प्रश्नांची उत्तरे काही त्या क्षणी त्याला मिळत नव्हती.

         मामा मामी तर एक निमित्त आहे पण मनापासून जिला भेटायला आलो ती भेटणार की नाही हा विचार त्याच्या मनात आला तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो पुढेपुढे जात राहीला. काही मिनिटांतच मामाच्या घरी तो पोहोचला. अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, दादा आला म्हणून सारी भावंडं त्याच्या अवतीभवती फिरत आनंदात उड्या मारत होती. मामा मामी मोठ्या कौतुकाने अमनचे स्वागत करत होती. जरा फ्रेश होऊन तो अंगणात खाटेवर येऊन बसला, सगळी बच्चे कंपनी अंगणात खेळण्यात मग्न होते. त्याची नजर बाजुला असलेल्या आरतीच्या घरावर स्थिरावली, तिच्या घरात कुणी दिसत नव्हते पण घरासमोर दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. तिची एक‌ झलक दिसावी या आशेने त्याचे डोळे तिलाच शोधत होते तितक्यात मामी गरमागरम चहा घेऊन आल्या.

    “काय अमन, दमला असशील ना रे…चहा घे…बरं वाटेल जरा…”

    “दमलो‌ नाही पण चहा नक्कीच घेणार मामी तुमच्या हातचा…” असं म्हणत त्याने चहाचा कप उचलला. मामा येतात बरं का गाई म्हशी बांधून, तू घे सावकाश चहा.. आम्ही जरा स्वयंपाकाचं बघतो म्हणत मामी घरात गेल्या.

    अमन ने हळूच छोट्या भावाला जवळ बोलावून आरतीच्या घराकडे बोट दाखवून विचारले , “या घरांत कुणी राहते‌ की नाही..अंधार दिसतोय..”

    छोट्या म्हणाला, “आरती ताई ची आई असते ना..एकटीच राहते ती..”

    त्याच्या बोलण्याने अमनला विचार करायला भाग पाडले. आरतीची आई एकटीच राहते मग तिचे बाबा, आरती हे सगळे कुठे असतील या प्रश्नाने तो विचारात पडला. आरतीचे लग्न झाले असेल का…आणि मग तो आवाज कुणाचा होता…आवाज आला पण ती का नसेल दिसली…काय झालं असेल नक्की…
    विचार करून अमनच्या डोक्यात नुसताच गोंधळ उडाला होता. काही तरी विचित्र नक्की घडतंय याची त्याला चाहूल लागली होती. आजुबाजूला कुणीतरी आहे असा भास त्याला जाणवत होता पण काय होतंय ते नेमकं कळत नसल्याने तो जरा अस्वस्थ झाला. तितक्यात मोठे मामा त्याच्या शेजारी येऊन बसले. लहान मामा अंगणातल्या हौदा जवळ हात पाय धूत होते.
      
      मामांसोबत जरा वेळ गप्पा गोष्टी केल्यावर त्याने विचारले, “मामा, शेजारी आरती राहायची ना हो.. लहानपणी यायची माझ्यासोबत खेळायला…आता कुणी दिसत नाही त्यांच्या घरात…”

    त्यावर मामा म्हणाले, “आरतीची आई एकटीच राहते तिथे आता. मागच्या वर्षी आरतीने आत्महत्या केली आणि तिच्या वडिलांना तो धक्का सहन झाला नाही, ते आजारपणाने गेले. आरतीच्या आईच्या डोक्यावर बराच परिणाम झाला या सगळ्याचा. बिचारी कुणाशी बोलत नाही, काही संबंध ठेवत नाही, सतत म्हणते की माझी आरती माझ्या आजुबाजूला आहे, ती माझ्याशी बोलते. त्यामुळे गावकरी तिला वेडी म्हणतात…”

    अमनला हे सगळं ऐकून धक्काच बसला. “आरतीने आत्महत्या केली?…पण का?…”

    “कुणालाच सत्य माहीत नाही, काही जण म्हणतात तिचं लफड होत कुणाशी तरी..ती गरोदर होती…त्याने लग्नाला नाही म्हंटले म्हणून हिने स्वतः ला संपविले. कुणी म्हणते पाय घसरुन पडली नदीत कपडे धुताना… नुसत्याच मनाच्या थापा मारतात लोकं पण खरं काय कुणास ठाऊक..”

    आता मात्र अमनच्या पायाखालची जमीन सरकली. काही तरी गडबड नक्कीच आहे हे त्याला लक्षात आले. त्याला हे सगळं ऐकून खूप दुःख झाले. आरती असं कधीच करणार नाही याची त्याला खात्री होती तेव्हा नक्कीच तिच्यासोबत काही तरी झालंय हे कळायला अमनला वेळ लागला नाही. आरतीला भेटायच्या ओढीने आज इथे आलो आणि ती या जगात नाही हे त्याच्यासाठी खूप धक्कादायक होते. गावात पोहोचताच त्याला झालेला तिच्या आवाजाचा भास….गावात आल्यापासून जाणविणारं तिचं अस्तित्व त्याला या सगळ्यात काही तरी गुपीत नक्की आहे , कदाचित तिला काही तरी सांगायचे आहे हे त्याला लक्षात आले.
    आता आरतीच्या सत्य जाणून घेण्याचा त्याने निर्धार केला.

    या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मामींनी जेवायला हाक मारली आणि अमन भानावर आला. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मामा मामी , भावंडे सगळे हसत खेळत जेवण करण्यात , गप्पा गोष्टीत रमले होते पण अमन मात्र वेगळ्याच विश्वात हरवला होता, मनोमन अस्वस्थ झाला होता.

    जेवणानंतर मामांसोबत गावात जरा फेरफटका मारायला गेला तेव्हा त्याला सतत आजुबाजूला कुणाचा तरी भास होत होता. आरती अदृश्य स्वरूपात आजुबाजूला वावरत आहे हे त्याला जाणवत होते.
    रात्री झोपताना त्याला आरती सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाली.

    क्रमशः

    आरती आणि अमन यांच्यात काय नातं होतं?
    आरती सोबत काय झाले, ती अमनला तिच्या आत्महत्येचे कारण सांगेल का..तिने नक्की आत्महत्या केली की काही अपघात झाला…अमन हे सत्य कशाप्रकारे शोधून काढणार हे बघूया पुढच्या भागात.

    पुढे काय होणार याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असणार ना…

    पुढचा भाग लवकरच…

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू आणि तुझं प्रेम हवंय…

         मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.

         मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.

    कॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे,  दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”

    शुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.

      मोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात  रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.
    शुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.

        शुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”
    तिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”
    शुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.

    अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.
    शुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”
    मोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…

      एकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”

    तिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला.  लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो,  जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…

    असा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.
    त्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.

    अशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”

    ती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.

    दोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.

    मोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.

    काही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”

    त्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”

    ते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”

    आज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.

    या दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.

    एका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग

          सानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.

        सानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घालवायचा.
    सानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.

    कितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.
    सुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,
    पण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
    “काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही? तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”

    त्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”

    ते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे? नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”

    सुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान? मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”

    इतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.

    आता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..

    एव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.

    आता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,

    “जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”

    आता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.
    जाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.   

    ही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.
    त्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.

    सानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.

    माहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

    सानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”

    त्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”

    या सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.
    सानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.

    हळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.

           एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.

    अशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक कथा.

    या प्रकारात नक्की चूक कुणाची आहे? याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    समाप्त !!!

    कथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग दुसरा

        सानिकाला सासरी जाऊबाई जरा जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. सासूबाई, सासरे तर त्यांच्याच दिनचर्येत व्यस्त असायचे. सनिकाच्या मनात मात्र सुशांत विषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. लग्नाला दोन आठवडे होत आले तरी नवरा म्हणून त्याने तिला अजूनही जवळ घेतले नव्हते. सध्या खूप काम आहेत तेव्हा काही दिवस मी तुला शक्य तितका वेळ देऊ शकत नाही पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरा कामाचा व्याप कमी झाला की छान कुठे तरी फिरून येऊ म्हणत त्याने सानिकाची समजूत काढली. कामाचं निमीत्त सांगून उशीरा घरी येणे, शक्य तितके सानिकाला टाळणे असे प्रकार सुरू होते.  सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुशांत घरी नसायचा‌. घरी कुणाला काही म्हंटलं की म्हणायचे काम असतील त्याला , जरा काही दिवस गेले की देईल तो तुला वेळ. सानिकाला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने याविषयी जाऊबाईला सुद्धा बोलून दाखवलं.

    त्यावर त्या म्हणाल्या, “खरं सांगू का सानिका, सुशांत आधीपासूनच घरात फारसा नसतो, त्याचे मित्र आणि तो असंच होतं त्याचं लग्नापूर्वी सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर तरी घरात थांबेल पण आताही असंच दिसतंय. तू एक काम कर, त्याला सांग सुट्टी असली की एक दिवस तरी तुला वेळ द्यावा म्हणून. तुम्ही बोला एकमेकांशी याविषयी स्पष्टपणे.”

    ते ऐकताच सानिकाला अजूनच विचित्र वाटले.

    जेव्हा जाऊबाईंना कळाले की सानिका आणि सुशांत यांच्यात लग्नानंतर अजून एकदाही जवळीक आली नाही तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. त्यांनी सानिकाला याविषयी पुढाकार घे असंही सांगितलं.
    जाऊबाई चे बोलणे ऐकून सानिकाला सुशांत विषयी अनेक शंका मनात आल्या. लग्न म्हंटलं की एकमेकांविषयी आपसुकच ओढ निर्माण होते, एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो, तसंच सानिका चेही झाले पण सुशांत मात्र सानिकापासून लांबच होता. त्याने आपल्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशा अनेक भावना तिच्या मनात उफाळून येत होत्या.
    आता आपणच पुढाकार घेऊन सुशांतच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा निश्चय तिने केला. कदाचित तो खरच कामात गुंतलेला असेल त्यामुळे वेळ देत नसेल अशी स्वतः ची समजुत सुद्धा तिने काढली.

    मनात काही तरी प्लॅनिंग करून तिने आज रात्री कितीही उशीर झाला तरीही सुशांत आल्याशिवाय झोपायचे नाही असे ठरवले. खोली छान आवरली, नवी कोरी बेडशीट बेडवर अंथरली. रात्री आठच्या सुमारास सुशांतला फोन केला आणि जेवणाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, “मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. मी बाहेरच खाऊन घेईल. ”

    सानिका आणि जाऊबाईंनी जेवणाची तयारी केली, सगळ्यांनी एकत्र जेवण केले पण सानिका मात्र सुशांतला मिस करत होती. मोठे दिर जाऊ कसं छान एकत्र जेवतात, सासू सासरे सुद्धा दोन्ही वेळा एकमेकांशिवाय जेवण करत नाहीत पण आपण मात्र अजून एकदाही असं एकत्र बसून ना जेवण केलयं ना जरा गप्पा मारल्या अशा विचाराने तिला एकही घास घशाखाली उतरत नव्हता. कशीबशी ती जरा जेवली आणि स्वयंपाक घरात आवरून आपल्या खोलीत निघून गेली.

    जाऊबाईंनी तिला सांगितले होतेच की, आज तू त्याच्या जवळ स्वतः हून जा, प्रेमाने त्याच्याशी बोल, त्याच्यावर तुझं किती प्रेम आहे हे त्याला जाणवू दे म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी तुला जरा तरी वेळ देईल शिवाय त्याचं असं घराबाहेर राहणं जरा कमी होईल. तू प्रयत्न कर तरी काही शंका वाटलीच तर सुशांतच्या दादाला सांगते मी त्याच्याशी बोलायला.

    सुशांत रात्री बाराच्या सुमारास घरी आला. सानिका त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघत होती. तो आलेला दिसताच तिने स्वतः ला आरशात बघून कपाळावरची टिकली उगाच नीट केली आणि स्वतःशीच लाजून तिने खोलीचा लाइट बंद केला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर मंद मेणबत्त्या लावल्या. सुशांत खोलीत आला तसंच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले. त्याने एक कटाक्ष सानिकाकडे टाकला, ती लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती मोकळ्या केसात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला असं छान सजलेलं बघून सुशांत आनंदी होईल अशी गोड अपेक्षा तिला होती पण तिची अशी सगळी तयारी बघून त्याचा चेहरा उतरला. तो‌ काही एक न बोलता बाथरुम मध्ये निघून गेला.

    त्याची अशी प्रतिक्रिया बघून सानिकाचा मूड खराब झालेला पण तरीही जरा शांत राहून ती त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. तो जरा फ्रेश होऊन बाहेर आला तशीच ती त्याला टॉवेल द्यायला जवळ गेली, त्याने तिच्याकडे न बघताच तिच्या जवळचा टॉवेल घेऊन चेहरा पुसला. आज तिला त्याच्या वरच्या प्रेमाची जाणिव त्याला करून द्यायची होती. ती अलगद त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळण्याच्या आत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
    “सुशांत, किती उशीर केला यायला. खूप वाट बघत होते मी तुमची..बायको घरी आहे तेव्हा जरा लवकर येत जा ना.. प्लीज… दिवसांतला काही वेळ माझ्या साठी तर काढायला हवाच ना तुम्ही..माझा‌ हक्क आहे तितका…”

    असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवायला मान वर केली तसंच त्याने तिला दूर केले आणि म्हणाला, “सानिका, अगं कळतंय मला पण सध्या कामाचा व्याप आहे खूप… नाही होत लवकर यायला…तू वाट नको बघत जाऊ असं…”

    तिला त्याच्या अशा वागण्याचा जरा राग आलाच पण त्याला आपण समजून घ्यायलाच हवे असे ती स्वतःला समजून सांगत होती. ती त्याला उत्तर देत म्हणाली, ” सुशांत मलाही तुमची परिस्थिती कळते आहे पण असं किती दिवस दूर राहायचे आपण.. लग्नाआधी सुद्धा आपल्याला नीट बोलायला, समजून घ्यायला वेळ मिळाला नाही..आताही तेच होतेय.. मी खूप मिस करते तुम्हाला दिवसभर…”

    सुशांत मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत थकल्याचे कारण सांगून झोपी गेला. सानिका त्या रात्री खूप खूप रडली, तिच्या भावनांचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. आपण इतकं सगळं बोलून दाखवले तरी सुशांतला कांहीच कसं वाटत नसेल आपल्याविषयी हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. रात्रभर कड बदलत ती बेडवर पडून होती.

    सकाळी उठून तिने सुशांतला चहा करून दिला. त्याने मुकाट्याने चहा घेतला आणि तो घराबाहेर पडला. सानिकाचा चेहरा पाहून जाऊबाई काय ते समजून गेल्या. सासू सासरे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्यावर दोघीच घरात असताना सानिकाने रात्री घडलेला सगळा प्रसंग रडतच जाऊबाईंना सांगितला. जाऊबाई ते ऐकताच जरा गोंधळलेल्या अवस्थेत सानिकाला म्हणाल्या, “सानिका, तू शांत हो..मी आहे तुझ्या सोबत पण खरं सांगू का, मलाही आता सुशांत वर शंका यायला लागली..मी ह्यांना सांगते त्याच्याशी बोलायला… काय होते ते बघूया.. नाही तर खरं काय ते शोधून काढू आपण..तू काळजी करू नकोस..”

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम  भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग पहिला

           सानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली. हसतमुख चेहरा असलेल्या सानिकाचे डोळे रडून सुजलेले होते, चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आई बाबांच्या काळजात धडकी भरली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत. नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. आई बाबांनी तिला आधी शांत केले, बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला. सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की काय झालंय ते ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं.

       सानिका अजूनही रडतच होती, बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सानू, आधी तू चहा घे, नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला.

    कसंबसं रडू आवरून ती चहा प्यायली. आई बाबा पुढे काही बोलण्याआधी ती म्हणाली, “आई बाबा, आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी… खूप मोठी फसवणूक..” इतकं बोलून ती परत रडायला लागली.

    तिचं हे वाक्य ऐकताच आई बाबांना अजूनच काळजी वाटली.

    बाबांनी तिला विचारले, “सानू, असं का‌ म्हणते आहेस.. नक्की काय झालंय ते नीट सांग बघू…तू‌ काय बोलते आहेस काही एक‌ कळत नाहीये आम्हाला..”

    सानिका रडत रडत सगळं सांगायला‌ लागली. ती जे काही सांगत होती ते ऐकून आई बाबांना मोठा धक्का बसला.

    सानिका आणि सुशांत यांचे काही महीन्यांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झाले. दोघांचेही अरेंज मॅरेज. 

    सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत, उंच सडपातळ बांधा, स्वभावाने जरा लाजाळू, अबोल, सहनशील. भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी. मोठा भाऊ नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहायचा.
    सानिकाचा पदवी‌ अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांत चे स्थळ आले.

    सुशांत सरकारी नोकरीत कामाला, दिसायला राजबिंडा, घारे डोळे, उंच पुरा, पिळदार शरीरयष्टी. सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले. दोघांचे लग्न ठरल्यावर महीनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना‌ बोलायला भेटायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला. वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबाविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.

    लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आई बाबांना घर अगदी खायला उठू लागले. इकडे सानिका सुद्धा नविन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्न म्हंटलं की प्रेम, उत्साह, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले.
    लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांत ची वाट बघत राहीली पण तो आलाच नाही. शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला, सानिका लाजतच त्याला म्हणाली ,”रात्री बराच वेळ वाट बघितली मी तुमची..”

    त्यावर तो इतकंच बोलला, “सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलचं नाही…..त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती, जरा वेळ जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला..मुळात येऊच दिले नाही मला..असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला..तू ही दमली असणार ना लग्नाच्या धावपळीत….”

    सुशांत अगदी सहज असं बोलून गेला. पहिल्या रात्री पेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालंय की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार, असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्याचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटत असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही.

    फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली. मोठे दिर जाऊ, सासू सासरे सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला. सुशांत सुद्धा जरा फ्रेश होऊन त्यांच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला. जाऊबाईंनी हळूच सानिकाला विचारले, “काय मग, कशी होती पहिली रात्र.. काही त्रास तर होत नाहीये ना..काही वाटलं तर मला बिनधास्त सांग…मोठ्या बहिणी प्रमाणे आहे मी तुला..”

    जाऊबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं. तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली.

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • ओढ मिलनाची…( प्रेमकथा)

    पहाटे पाचचा गजर झाला तशीच स्वरा लगबगीने उठून आवरायला लागली. आज खूपच उत्साहात होती स्वारी, कारणही तसेच होते. तब्बल सहा महिन्यांनंतर ती मयंकला भेटणार होती. आठ वाजता मयंक पोहोचणार तेव्हा त्यापूर्वी तयार होऊन एअरपोर्टवर जायचा तिचा प्लॅन होता. आंघोळ करून आली तशीच ओल्या केसांना सुकवत स्वतः ला आरशात निरखून बघताना तिला त्यांच्या लग्नानंतर मयंक सोबतची पहिली सकाळ आठवली.

    त्या दिवशी ती अशीच नुकतीच न्हाऊन आलेली. मयंकच्या आवडीची लाल रंगाची साडी नेसून तयार झाली आणि आपल्या ओल्या केसांना सुकवत असताना मयंकने हळूच येऊन तिला मिठी मारली. अलगद तिची हनुवटी बोटांनी वर करत नव्या नवरीच्या चेहऱ्यावरचे ते तेज बघून तो क्षणभर तिला बघतच राहीला आणि ती लाजून चूर..🥰 त्याच्या नजरेला नजर सुद्धा भिडवू शकत नव्हती ती. तितक्यात तिच्या ओलसर केसांची बट गालावरुन मागे करत त्याने तिच्याकडे बघत “गुड मॉर्निंग स्वीटहार्ट” म्हणताच ती आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवून कशीबशी गुड मॉर्निंग म्हणाली होती.

    आजची सकाळ तिला अगदी तशीच काहीशी वाटत होती. आजही त्याचा आवडता नी लेन्थ ड्रेस घालून , हलकासा मेकअप करून ती तयार झाली.  घरात त्याच्या स्वागताची तयारी रात्रीच करून ठेवलेली तरीही सगळं नीट तर आहे याची खात्री करून ती कार घेऊन एअरपोर्टवर जायला‌ निघाली. कधी एकदा मयंकला भेटते असं झालेलं तिला.

    स्वरा आणि मयंक हे एक नवविवाहित जोडपे, दोघांचे अरेंज मॅरेज. स्वरा दिसायला अतिशय नाजूक, प्रेमळ स्वभावाची एक लहर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची. चाफेकळी नाक, बोलके डोळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडायचे. साधारण राहणीमान असलेली ही स्वरा बघताक्षणी कुणालाही आवडेल अशीच गोड असली तरी तिला काही तिच्या मनात घर करेल असा कुणी आजवर भेटला नव्हता शिवाय तिचा जरा लाजाळू स्वभाव सुद्धा आड यायचाच. आयटी कंपनीत चांगल्या पदावर ती नोकरीला होती. अशी ही सर्वगुणसंपन्न स्वरा मयंकला पहिल्या भेटीतच खूप आवडली.
    मयंक एका इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला, आकर्षक व्यक्तिमत्त्व, पिळदार शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज असलेला मयंक स्वराला पहिल्या नजरेत मनात घर करून गेला.

    दोघांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नाला आठवडा होत नाही तोच त्याला सहा महिन्यांसाठी विदेशी जाण्याची संधी चालून आली. लग्नापूर्वी जरा कल्पना होतीच त्याला याविषयी पण इतक्या लवकर सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन लगेच जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तशी कल्पना त्याने लग्नापूर्वी स्वराला दिलेली. शिवाय शॉर्ट टर्म ट्रिप असल्याने तिला घेऊन जाणे इतक्यात शक्य नव्हतेच. नुकतंच लग्न झाल्यावर हे गोड दिवस अनुभवावे अशी मनापासून खूप इच्छा असूनही त्याला स्वरा पासून काही महिने दूर जावे लागले. स्वराने त्याला याबाबत खूप समजून घेतले. सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे नंतर आयुष्यभर आपण सोबत आहोतच असं तिने मोठ्या विश्वासाने त्याला म्हंटल्यावर तो तिच्या अजूनच प्रेमात पडला. फोन, व्हिडिओ कॉल वर एकमेकांना बघत सहा महिने संपले खरे पण हा काळ अगदी सहा वर्षां प्रमाणे भासलेला. आज दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागली होती.
    मयंकची नजर स्वराला शोधत होती आणि स्वराची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती.

    एअरपोर्टवर पोहोचतात मोठ्या आतुरतेने ती त्याची वाट बघत होती. काही वेळातच तो समोरून येताना दिसला तशीच तिची धडधड वाढली. त्याचीही नजर तिच्यावर पडली तसाच तो एकटक तिला बघत तिच्या दिशेने येत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. तो जवळ आला तशीच तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली, नजरेनेच क्षणभर ते एकमेकांशी बोलत होते. एकमेकांच्या डोळ्यांत बघताना ती एका वेगळ्या विश्वात हरवली, त्याला डोळेभरून बघताना या भेटीची आतुरता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो तिचे हे भाव अलदी अलगद टिपत तिचं सौंदर्य न्याहाळत होता.
    “आय मिस्ड यू सो मच स्वरा..” असं मयंक अगदी मनापासून प्रेमळ भावनेने म्हणताच ती भानावर आली.
    त्याच्या चेहऱ्यावर खिळलेली तिची नजर स्थिर ठेवून ती लाजतच उत्तरली , “आय मिस्ड यू टू.. चला निघूया..”

    दोघेही घरी जायला निघाले. स्वरा ला कार ड्राइव्ह करताना पहिल्यांदाच बघितले होते त्याने. ती कार ड्रायव्ह करताना तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. कधी एकदा स्वराला मिठीत घेऊ असंच काहीसं झालेलं त्यांचं. मयंक एकटक आपल्याला बघतोय हे तिला कळत होतं, तिलाही ते आवडलं होतं. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायच होत पण आनंदाच्या भरात शब्द काही सुचत नव्हते. ही गोड शांतता भंग करायला तिने कार मधला रेडिओ सुरू केला. त्यावर या क्षणाला अनुसरून अगदी योग्य गाणे लागले…

    “उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये….

    उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये….

    ऐसा हुआ असर….

    ऐसा हुआ असर………

    ऐसा हुआ असर के मेरे होश उड़ गये‌…

    उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…”

    अगदी या गाण्या प्रमाणे तिच्या मनाची अवस्था झाली होती.
    ते गाण्याचे बोल ऐकताच तिने स्वतः शीच हसून चॅनल बदलायला हात पुढे केला आणि मयंकने तिचा हात पकडून गाणे न बदलण्याचा इशारा केला. त्याच्या स्पर्शाने तिला अंगावर रोमांचक काटा आला. स्वतः चा हात पटकन बाजूला घेत ती म्हणाली, “कार ड्रायव्ह करताना असं डिस्टर्ब करू नये..”
    तिच्या या वाक्याने दोघांचे प्रेमळ  संभाषण सुरू झाले.  त्याला हा क्षण खूप आवडला होता. काही वेळातच ते घरी पोहोचले. दार उघडताच घरातून येणारी सुगंधी लहर त्याला स्पर्शून गेली. हॉलमध्ये त्याच्या स्वागतासाठी तिने छान तयारी केली होती. समोरच्या टेबलावर त्याची आवडती जरबेरा ची फुले
    अगदी सुंदररित्या मांडलेली होती. गुलाबांच्या पाकळ्यांनी हार्ट च्या आकार तयार केलेला होता त्यावर स्वराने लगेच ‘वेलकम बॅक स्वीटहार्ट’ लिहीलेला केक आणून ठेवला, मेणबत्त्या लावल्या. घरात सर्वत्र एक वेगळाच सुगंध दरवळत होता. दोघांचं हे घर स्वराने खूप सुंदर सजविले होते. घरात येताच त्याला अगदी प्रसन्न वाटले.
    “चला आता पहिले फ्रेश होऊन या तुम्ही..” असा स्वराचा प्रेमळ आदेश मिळताच मयंक भानावर आला. फ्रेश व्हायला आत गेला तसंच त्याला अजून एक सरप्राइज मिळाले. बेडरूम मधल्या भिंतीवर स्वराने दोघांचे एकत्र घालवलेल्या काही गोड क्षणांचे फोटो लावलेले होते. लग्नापूर्वीची दोघांची पहिली कॉफी डेट पासून ते मयंकला एअरपोर्टवर सोडायला गेल्यावर काढलेला सोबतचा फोटो असा त्यांचा आतापर्यंतचा प्रेमाचा सगळा प्रवास फोटो बघून परत एकदा त्याच्या नजरेखालून गेला.
    तो फ्रेश होऊन आला‌. इकडे स्वरा स्वतः च्या हातांनी बनविलेला त्याच्या आवडीचा नाश्ता , चहा, केक कटींग साठीची सगळी तयारी करत होती. तो तिला न्याहाळत तिच्याजवळ आला आणि क्षणाचाही विलंब न लावता अलगद त्याने तिला मिठीत घेतले. या क्षणासाठी किती वाट बघावी लागली असंच काहीसं झालेलं त्यांचं. तिनेही तिचा चेहरा त्याच्या छातीवर ठेवला. त्याची मिठी हीच आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा आहे याची तिला परत एकदा जाणिव झाली. सहा महिन्यांचा दुरावा आता संपला होता, एकमेकांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या दोघांसाठी हा खूप खास क्षण होता. हळूहळू दोघांची मिठी घट्ट होत गेली, हृदयाची स्पंदने वाढतच गेली. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर करून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले तशीच ती शहारून परत त्याच्या मिठीत शिरली.

    दोघांच्या प्रेमाला , संसाराला आज खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

    अशी ही दोघांच्या आतुर भेटीची प्रेमळ कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

    नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघणारच होती तितक्यात मोहन म्हणजेच तिचा पती तिची वाट अडवून म्हणाला, “माहेरी जायला निघाली आहेस खरी पण रिकाम्या हाताने परत येणार असशील तर मुळीच घरी येऊ नकोस. भावांकडून घराचा हिस्सा घेतल्याशिवाय परत आलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही. ”

    नलिनीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मोहनचे बोलणे ऐकून त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ती गपगुमान माहेरी जायला निघाली. वाटेत तिचे अश्रू अनावर झाले आणि ती भूतकाळात हरवली.

    नलिनी सुखवस्तू कुटुंबात लाडाकौतुकात वाढलेली. आई वडील दोघेही नोकरी करायचे. तीन भावंडे, त्यात ही सगळ्यात लहान. दोन्ही भावांची आणि आई वडिलांची लाडकी लेक. नलिनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिच्या आईचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आईच्या अशाप्रकारे अचानक झालेल्या निधनामुळे अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, नलिनी चे वडील पूर्णपणे खचून गेलेले. मुलांचे शिक्षण पूर्ण होतंच आलेले होते.
    “आता लवकरच तिन्ही मुलांचा थाटलेला आनंदी संसार बघितला की आपले आयुष्य मार्गी लागले म्हणून समजा. ” असं मोठ्या उत्साहाने म्हणणारी आई बाबांना सोडून गेल्यावर हा संसार एकट्याने कसा सांभाळावा हाच प्रश्न बाबांना पडलेला.
    त्यातून स्वतः ला कसंबसं सावरून बाबांनी मुलांना धीर देत आईची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात नलिनीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले. मुलेही आता शिक्षण पूर्ण करून काही तरी कामधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. बाबांनी दोन्ही मुलांना लहानसहान व्यवसायात गुंतवले. आता नलिनी साठी साजेसा मुलगा मिळाला की तिचं लग्न लावून द्यायच म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होणार असाच काहीसा विचार केलेला नलिनीच्या बाबांनी. बाबा आणि दोन्ही भावांनी नलिनी साठी वर संशोधन सुरू केले. आई गेल्यापासून नलिनीला फार एकटेपणा जाणवायचा. भाऊ आणि बाबा वेळेनुसार आपापल्या आयुष्यात गुंतलेले पण नलिनी मात्र आईच्या आठवणीने दररोज रडायची. बाबांना तिची अवस्था कळत होती. तिची शक्य ती काळजी घेत, भरभरून प्रेम देत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करत होते पण म्हणतात ना आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असंच काहीसं झालेलं.

    आता नलिनीला तिच्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा मिळावा , तिने संसारात रमून आनंदी राहावं हीच बाबांची इच्छा होती. पण झालं मात्र काही तरी वेगळंच.

    नलिनी साठी बरेच स्थळ बघितल्यावर मोहनचे स्थळ आले. वरवर बघता एकंदरीत छान वाटलेले आणि मोहन सोबत नलिनी चे लग्न झाले. लग्नानंतर नव्यानवलाईचे नऊ दिवस संपले तसेच मोहनने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. मोहन व्यवसाय करायचा तेव्हा नफा तोटा आलाच पण कधी फार काही नुकसान झालेच तर त्याची फार चिडचिड व्हायची मग सगळा राग तो नलिनी वर काढायचा. दारूच्या नशेत तिच्यावर हातही उचलायचा. आईच्या मायेला पोरक्या झालेल्या नलिनीच्या नशिबात सासरीही सुख नव्हतेच. वडीलांना सांगितले तर त्यांना काळजी वाटेल म्हणून तिने वडीलांना याबाबत सुरवातीला काही सांगितले नाही. पण दिवसेंदिवस मोहन तिला फार त्रास द्यायला लागला. तुझ्या माहेरचे माझा मानपान करत नाहीत, दिवाळसणाला काही दागिना नाही केला म्हणून तिला सतत टोमणे मारायचा. मोहन सारख्या लोभी व्यक्तीला सासर कडून मोठमोठ्या अपेक्षा असायच्या पण आई नसताना बाबा कसं घर सांभाळत आहेत हे नलिनी बघत आलेली त्यामुळे ती माहेरी कुणालाही मोहन विषयी काही सांगत नव्हती. अशातच तिला दिवस गेले आणि लवकरच ती एका मुलाची आई झाली. गरोदरपणात सुद्धा मोहन‌ असाच वागला. माहेरी आई नसताना तिचे बाळंतपण कोण करणार याचा जराही विचार न करता त्याने तिला माहेरी नेऊन ठेवले. बाबांनी कामवाल्या मावशीच्या मदतीने तिची नीट काळजी घेतली. भाऊ सुद्धा सोबतीला होतेच. या दरम्यान नलिनीच्या माहेरी येऊन मोहन उगाच काहीतरी तमाशा करायला लागला. तेव्हा तिच्या दोन्ही भावांनी त्याला चांगलाच दम दिला पण नलिनी मध्ये पडून तिने मोहनला परत जायला सांगितले. बाळंतपणानंतर सासरी गेल्यावर तिची एकटिची चांगलीच तारांबळ उडत होती. सासुबाई वयस्कर त्यामुळे त्यांची काही मदत होणे शक्य नव्हते. बाळ, घर आणि मोहनचा असा चिडखोर स्वभाव , त्याचा छळ सहन करणे असंच तिचं आयुष्य झालेलं.

    माहेरी आता बाबांनी दोन्ही भावांची लग्न उरकले. दोघेही भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झालेले. बाबा असताना‌ ती हक्काने माहेरी जाऊन राहायची. चार दिवस का होईना पण सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात यायचे. काही वर्षांतच आजारपणाने बाबा देवाघरी गेले आणि तिचं माहेर संपल्या सारखे झाले. दोन्ही भाऊ वहीनी संसारात गुंतल्याने तिच्याकडे कुणी फारसे लक्ष देत नव्हते. भावाकडे पाहुणी म्हणून आली तरी दोन‌ दिवसांपेक्षा जास्त तिला आता राहावं वाटत नव्हतं. सासरचे, नवर्‍याचे प्रश्न भावाजवळ मांडले की वहिनीला आवडत नव्हते. त्या म्हणायच्या आपला संसार आपण बघावा, आम्हाला मध्ये घेऊ नये. भावाचे मन दुखत असले तरी वहिनी पुढे दोघेही काही बोलेना.
    एकदा तर मोहनने तिला दारू पिऊन मारहाण केली आणि घराबाहेर काढले. रडत रडत ती माहेरी आली . मोठ्या भावाला झाला प्रकार सांगितला तर तो म्हणाला, “नलू, आता हे नेहमीचं झालंय. एक तर तू त्याला सोडून दे नाही तर तुझं तू बघून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसाच हा मोहन काही केल्या सुधारत नाही. आम्हाला सांगून काय फायदा, तुझ्या नशिबात हेच असेल. सहनशक्ती नसेल तर आत्महत्या कर पण सारखं तेच रडगाणे गाऊ नको. ”

    भावाचे हे असे बोलणे ऐकल्यावर ती मनोमन खुप दुःखी झाली. एके काळी याच घरात लाडात , मोठ्या तोर्‍यात वावरणारी मी. आज मला माझ्याच या घरांत हा दादा आत्महत्येचा सल्ला देतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. अश्रू ढसाढसा वाहत होते पण तोंडातून शब्द निघत नव्हता. आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी ती मोहन‌कडे परतली.
    सख्खा भाऊ असा बोलतोय मग इतर नातलगांना सांगून काय फायदा म्हणत ती आहे त्या परिस्थितीला सामोरे जात होती.

    परत तेच मोहनचे टोमणे, मारझोड सहन‌ करत तिचा संसार सुरू होता. मुलगा भराभर मोठा होत होता. त्याच्यासाठी का होईना आपण जगायला हवं म्हणून ती सगळं सहन करत होती.
    आपली जरा आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने लहान मुलांना शिकवणी, खाणावळ चालवणे यांसारखे उद्योग करण्याचा प्रयत्न केला पण मोहनने त्यावर पाणी फेरले. कुणाचा जराही पाठींबा नसताना स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे तिचे प्रयत्न असफल झाले.
    भाऊ वहीणीचे इतके सगळे बरेवाईट अनुभव आले तरी बहीणीची माया म्हणून ती दर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला माहेरी जायची. वरवर का होईना पण एक दिवस तरी भाऊ बहिणीच्या नात्यात तिला गोडवा जाणवायचा. परिस्थिती वाईट आहे, आपले भाऊ वाईट नाही असाच विचार ती करायची. माहेरी आली की बालपणीच्या आठवणीत क्षणभर रमून जायची आणि आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमन करून भरल्या डोळ्यांनी सासरी परत जायची.

    अशातच नलिनीचा मुलगा बारा वर्षांचा झालेला. आता मोहन‌चा व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नव्हता. त्याने नलिनीच्या मागे एक वेगळाच तगादा लावला. तो‌ तिला म्हणायचा की तुझ्या माहेरी आता आई वडिल तर नाहीत तेव्हा आहे ती मालमत्तेच्या वाटण्या करून तू तुझा हिस्सा माग.
    तिन्ही भावंडांचे लग्न, शिक्षण , वडिलांचे आजारपण यात होते नव्हते ते पैसे गेले याची तिला जाणीव होती. होते फक्त त्यांचे राहते घर. त्यातही भावांचे मन दुखावून काहीही हिस्सा वगैरे नको होता पण मोहन मात्र हात धुवून तिच्या मागे लागलेला. मोहनला नाही म्हंटले की तो तिला मारझोड करत शिवीगाळ करायचा. या अशा वातावरणात मुलाला ठेवले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करून मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिने मुलाला होस्टेलमध्ये ठेवले होते.
    दिवाळी झाल्यावर मुलगा होस्टेलमध्ये परत गेला आणि नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघाली.

    ती मालमत्तेच्या वाटण्या, हिस्सा मागणे याविषयी भावांना काही एक बोलणार नव्हती. दोन दिवस आनंदात माहेरी राहून परत यायचे, मोहन‌ला काय करायचं ते करू दे पण मला हे दोन दिवस मिळणारं माहेरपण जपायला हवे. उगाच पैशावरून भाऊ बहिणीच्या नात्यात फूट नको असेच तिने मनोमन ठरवले होते.

    रिक्षावाला म्हणाला, “ताई, इथेच उतरायचं ना तुम्हाला. ”
    त्याच्या बोलण्याने ती विचारांमधून बाहेर आली, रिक्षातून उतरून घरात जाताना परत एकदा त्याच बालपणीच्या आठवणीत क्षणभर हरवली.

    समाप्त!

    अशी ही नलिनीच्या आयुष्याची व्यथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
    खरंच आई वडील असेपर्यंत हक्काने वावरता येणारे माहेर त्यांच्या नसल्याने पोरके झाले की मनाची काय अवस्था होत असेल याचा अनुभव नलिनी प्रमाणे अनेक भगिनींना येतो.
    अशा बर्‍याच मुली आपल्या आजूबाजूला आहेत ज्या मोहन सारख्या नवर्‍याचा छळ सहन करत संसाराचा गाडा चालवताना दिसतात. पैशासाठी, हुंड्यासाठी बराच त्रास सहन करतात.
    छळ सहन करायला नको म्हणून अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी धडपड करताना कधी कधी मार्ग सापडत नाही. अशा वेळी आहे त्या परिस्थितीला शरण जातात.
    यासाठी आई‌ वडिलांनी मुलींना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे, अन्याय सहन‌ न करता परिस्थितीशी लढायला शिकविणे खूप गरजेचे आहे.

    याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • यशापयशाचे अवकाश

    डॉ. चिटणीस एक प्रसिद्ध समुपदेशक (काऊन्सेलर ). आज अमेयची अपॉइंटमेंट होती त्यांच्याकडे. अमेय विषयी संपूर्ण माहिती एकत्र करून बनविलेली फाइल असिस्टंट मनिषा  चिटणीसांना देत म्हणाली,
    “सर , अमेयचे आई वडील येत आहेत त्याला घेऊन. हि त्याची फाइल, त्याच्या घरच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत परिस्थिती मी तुम्हाला सांगते.”
    मनिषा बोलू लागली, “सर, पेशंटचे नावं अमेय पटेल, वय वर्षे सोळा. हा अमेय म्हणजेच प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर शाम पटेल यांचा एकुलता एक नातू. शाम पटेल यांच्या मुलाने म्हणजेच अमेयच्या वडिलांनी परंपरागत उद्योग न चालवता वेगळे क्षेत्र निवडले, ते पेशाने मोठ्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मुलाने उद्योग सांभाळला नाही म्हणून त्यांचा मुलावर जरा राग होताच, पण माझा नातू माझा उद्योग सांभाळून घराण्याचे नावं अजून मोठे करणार म्हणत अमेयच्या बालवयापासून आजोबांनी त्याच्या मनावर उद्योग सांभाळण्याचे धडे रूजवायला सुरू केले. अमेयला कळत नसताना ते त्याला शाळेनंतर कंपनीत घेऊन जायचे, त्या वातावरणात राहून तो आपसूकच सगळं शिकेल असं त्यांचं मत. पुढे मेकॅनिकल इंजिनिअर होऊन उद्योग सांभाळण्यासाठी अमेयला तयार करायचे हे त्यांचं ध्येय बनलं पण अमेयला ह्या सगळ्यात आवड आहे की नाही याचा विचार त्यांनी कदाचित केला नाही. हि झाली आजोबांची बाजू, आजीला फारसे कळत नसल्याने आजी काही ह्यात बोलत नाहीत. दुसरी बाजू अमेयच्या वडिलांची, ते अतिशय हुशार नावाजलेले प्राध्यापक तेव्हा आपल्या मुलाने भरपूर मार्क्स मिळवून नाव कमवावे, मोठ्या आय आय टी सारख्या प्रसिद्ध कॉलेजमधून, परदेशातून शिक्षण घेत प्रगती करावी हे त्यांचे स्वप्न पण इथेही तेच झाले, मुळात अमेयची बुद्धीमत्ता, आवड याचा विचार दूरच राहिला.
    अमेयला मुळात आवड आहे ती क्रिकेटची. आजोबा आणि वडिलांच्या लपून छपून आईच्या मदतीने तो पूर्वी क्रिकेट खेळायला जायचा पण आता दहावी जवळ आली, अभ्यास वाढला म्हणून आईने वडील आणि आजोबांच्या धाकाने त्याचे खेळणे बंद केले. आता फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास असंच त्याच्या मनावर घरात प्रत्येकाने रुजवले. दोन वर्षांपासून त्याची इच्छा असूनही खेळणे बंद झाले.
    आजोबा म्हणायचे भरपूर अभ्यास कर तुला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे आहे तर बाबा म्हणायचे तुला आय आय टी मधून, नंतर परदेशातून शिक्षण घ्यायचे आहे. अमेय आता विचित्र परिस्थितीत अडकला होता, कितीही वेळ पुस्तकांमध्ये एकनिष्ठ झाला तरी त्याचा अभ्यास काही एका विशिष्ट पातळीच्या पुढे जात नव्हता. डोक्यावर अपेक्षांचे ओझे होते. अशातच त्याची दहावीची परीक्षा झाली, फार काही खास नव्हते गेले पेपर पण आता निकाल काय लागतो बघूया म्हणून तो सतत एका दडपणाखाली जगत होता. अशातच निकाल लागला, अमेय सगळ्या विषयात अगदी काठावर पास झाला, सरासरी चौरेचाळीस टक्के गुण मिळाले. ते गुण बघून तो रडू लागला. बाबांचे, आजोबांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही म्हणून खूप निराश झाला. आता घरच्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. घरातला प्रत्येक जण एकमेकांना दोष देत आपला राग अमेयवर काढत होता. बाबा म्हणे आईच्या लाडाने असं झालं तर आजोबा म्हणे बाबांच्या दडपणाखाली जाऊन असं झालं पण आपण सगळ्यांनीच त्याला समजून न घेता, आवड लक्षात न घेता त्याच्यावर अपेक्षांचे ओझे लादले हे मात्र कुणी मान्य करत नव्हते. अमेयला स्वतःला हरल्याची भावना मनात निर्माण झाली, त्याचा त्याला खूप त्रास झाला. आपण घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात असमर्थ ठरलो म्हणत तो एक प्रकारे डिप्रेशन चा शिकार बनला. या दिवसात कुणी त्याच्याशी नीट बोलले नव्हते. आजीचा, आईचा जीव तुटायचा पण ती परिस्थिती हाताळणे त्यांना जमले नाही. अमेय ने स्वतः ला एका खोलीत बंद करून घेतले, कुठल्यातरी औषधी गोळ्या त्याच्या हाती लागल्या आणि त्या सगळ्या गोळ्या एकावेळी खाऊन स्वतः ला संपविण्याचा प्रयत्न त्याने केला. काही वेळातच कामवाली ने खोली स्वच्छ करण्यासाठी दरवाजा ठोठावला पण आतून उत्तर मिळाले नाही म्हणून आरडाओरडा केला तेव्हा अमेयच्या घरच्यांना हा प्रकार कळाला. लगेच त्याला दवाखान्यात घेऊन गेले, त्यातून तो कसाबसा वाचला पण एका मोठ्या डिप्रेशन मध्ये तो अडकलाय. कुणाशीही न बोलता नजर स्थिर करून एकटक कुठे तरी बघतो. या सगळ्या प्रकाराने घरात प्रत्येकाला आपापली चुक कदाचित उमगली, त्यांनी त्याला खूप समजावले पण आता उशीर झाला आहे तो आमचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं त्याच्या घरचे सांगताहेत..सर इतकी माहिती मिळवली आहे मी… ”

    चिटणीस विचाराधीन होऊन मनिषाला म्हणाले, ” थॅंक्यू मिस मनिषा, अमेय आला की तुम्ही फक्त त्याच्या आई वडिलांना आत पाठवा ..आणि हो ड्रायव्हर ला गाडी तयार ठेवायला सांगा. मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन तासात कुणालाही अपॉइंटमेंट देऊ नका..”

    ओके सर म्हणत मनिषा केबिन बाहेर गेली. बाहेर अमेय आई बाबांसोबत आलेला होता. त्याच्याकडे मनिषाने  बघितले तेव्हाही तो एकटक खाली जमिनीकडे बघत होता, या उमलत्या वयात अशा परिस्थितीत अमेयला बघताच मनिषाला मनातून वाईट वाटले. त्याला इथेच थांबू द्या, तुम्ही दोघे आत जा, सरांना तुम्हा दोघांशी आधी बोलायचे आहे. अमेय कडे मी लक्ष देते म्हणत मनिषा ने मिस्टर  अँड मिसेस पटेलला आत पाठवले.

    मिस्टर पटेल काळजीच्या सुरात डॉ चिटणीस यांना‌ म्हणाले , ” सर, मी मिस्टर पटेल. तुम्हाला कदाचित अमेय विषयी कल्पना दिली मिस मनिषाने. खूप काळजी वाटते आहे आम्हाला त्याची. आम्ही कमी पडलो त्याला समजून घेण्यात पण आम्हाला तो हवाय सर.. प्लीज हेल्प..”
    “एस आय नो..मला अमेयची अवस्था कळाली‌ आहे. मी त्याला जरा बाहेर घेऊन जाणार आहे..तो इथे क्लिनिक मध्ये मला प्रतिसाद देण्याची शक्यता कमी आहे म्हणूनच दररोज दोन तास तो माझ्यासोबत एकटा असेल.. बाकी काळजी करू नका..आय विल ट्राय माय बेस्ट..” डॉ. चिटणीस.

    “बाहेर म्हणजे नक्की कुठे..तो तयार होईल यायला..” आई काळजीच्या सुरात म्हणाली.

    “ते तुम्ही माझ्यावर सोडा..” डॉ. चिटणीस.

    “ठिक आहे सर पण प्लीज त्याला यातून बाहेर काढा..” अमेयची आई कळकळीने सांगत होत्या.

    डॉ चिटणीस अमेयला घेऊन बाहेर जायला निघाले. वाटेत चिटणीस अमेयशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होते पण फार काही प्रतिसाद मिळत नव्हता. शहरातील एका मोठ्या स्पोर्ट्स क्लब मध्ये दोघेही पोहोचले. अमेय जरा निराशेने आजुबाजूला बघत होता. डॉ चिटणीस त्याला एका ठिकाणी बसवून  समोर सुरू असलेली बॅडमिंटन स्पर्धा दाखवत सांगत होते, “अमेय हा बघ केदार…माझ्या ओळखीचा आहे.. आम्ही शेजारी राहायचो पूर्वी..साधारण तुझ्याच वयाचा मुलगा तो..तो आणि मी छान बॅडमिंटन खेळायचो सकाळी बरोबर सहा ते सात. न चुकता माझ्या आधी हजर असायचा, मलाही आवडतं बॅडमिंटन खेळायला आणि त्यालाही. तो मात्र माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मस्त खेळायचा. मागच्या वर्षी दहावीला होता, फार काही चांगले गुण मिळाले नाही, घरच्यांचे खूप बोलणे खाल्ले पण जिद्दीच्या जोरावर राज्य पातळीवर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली त्याची, जिंकून आला. त्याच अभिनंदन करायला गेलो तेव्हा म्हणाला , “काका, तुमच्यामुळे दररोज तासभर प्रॅक्टिस व्हायची आणि नंतर शाळेत खेळायला सुरु केले. घरी माहिती नव्हते त्यात कमी गुण मिळाले तेव्हा खूप निराश झालो पण मूळात माझं ठरलं होतं क्रिडा क्षेत्रात करिअर करायचं, मग काय नाव नोंदविले राज्य स्तरीय निवड समिती मध्ये. घरच्यांचा विरोध होता पण त्यांचा विरोध सांभाळत खेळत गेलो. बॅडमिंटन हे माझं स्वप्न माझं ध्येय होतं..आज मी राज्य पातळीवर नावं कमावलं…”
    अमेय तुला सांगतो त्याने हे सगळं करताना अभ्यास केलाच पण कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. आता लवकरच तो अठरा वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहे..त्याचीच तयारी करतोय तेही शाळा सांभाळून.

    अमेय हे सगळं ऐकून चकित होत केदार कडे बघत होता. त्याने स्वतः ला केदारच्या जागी ठेवून बघितले. इतर कुणाचाही विचार न करता क्रिकेट मध्ये नाव कमवायचे असं ध्येय ठेवून आपण खेळलो तर आपणही केदार प्रमाणे एक ओळख बनवू शकतो हे त्याला मनोमन वाटले.
    नंतर चिटणीस त्याला क्रिकेट ग्राउंड कडे घेऊन गेले, तिथल्या कोच सोबत बोलून अमेयच्या हातात बॅट दिली. अमेय निराशेने बॅट कडे बघत होता पण चिटणीस आणि कोच यांच्या आग्रहानंतर त्याने बॅट हातात घेतली. त्याची आवड होती ती, ध्येय होतं जे घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलं होतं. आज जशी बॅट हातात आली तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो फटाफट बॉल उडवत खेळण्यात मग्न झाला. त्याला असं बघून चिटणीस मनोमन आनंदी झाले, त्याचा खेळतानाचा एक व्हिडिओ त्यांनी तयार केला. दोन तास त्या स्पोर्ट्स क्लब मध्ये घालवून दोघे परत निघाले. अमेय आता जरा बोलू लागला. क्रिकेट मधलं त्याच सखोल ज्ञान चिटणीस यांना तो ऐकवू लागला. चिटणीस त्याची प्रशंसा करत त्याचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. क्लिनिक आले तसेच तो परत निराश झाला, परत घरी जायची त्याला जराही उत्सुकता नव्हती. चिटणीस त्याला आता केबिनमध्ये घेऊन गेले आणि परत केदार विषयी आठवायला लावले. चांगल्या गोष्टींना सगळीकडून विरोध हा होत असतो पण असं निराश न होता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे कधीही चांगले हे त्याच्या मनावर रुजवले.
    आता उद्यापासून दररोज दोन ते तीन तास स्पोर्ट्स क्लब मध्ये जायचे मनसोक्त खेळायचे, लक्षात ठेव तुला या क्षेत्रात नावं कमवायचे आहे बरोबर ना..
    अमेय त्यांनां एक हलकी स्माइल देत म्हणाला , “हो सर.. खूप मोठा क्रिकेटपटू होणार मी.. जिद्दीने प्रयत्न करणार..आणि हो शिक्षण सुरू असेल सर… तुम्ही सांगितल्या प्रमाणे. 🙂”
    “ग्रेट.. खूप शुभेच्छा तुला.. आणि हो उद्या परत जाऊया आपण आजच्या जागेवर..उद्या तुझी नोंदणी करायची आहे स्पोर्ट्स क्लब चा मेंबर म्हणून..”

    अमेयच्या आई वडिलांना आत बोलावून चिटणीस त्यांना व्हिडिओ दाखवत म्हणाले, “हे बघा आपला अमेय..आज मनसोक्त खेळला.. पुढचे काही दिवस मी त्याला तिकडे घेऊन जाईल..त्याच ध्येय आहे क्रिकेटपटू बनण्याचे..त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत केली तर तो नक्कीच यातून बाहेर पडेल.. राहीला प्रश्न शिक्षणाचा तर तो‌ आय आय टी मधून शिकला नाही तरी साध्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करून का होईना पण तुमचं नाव नक्कीच मोठं करेल..कमी वयात काय कमाल ज्ञान आहे त्याला क्रिकेट बद्दल…”

    त्यावर आई बाबा म्हणाले, “आम्ही नक्की त्याला सपोर्ट करू..आम्हाला तो हवाय बाकी काही नाही..आमची चूक कळली आम्हाला.. आमच्यामुळे, आमच्या अपेक्षांमुळे आम्ही मुलाला गमावून बसलो असतो.. कधीही स्वतः ला माफ करू शकलो नसतो..त्याच्या आजोबांना ही धक्का बसला अमेय ची अवस्था बघून..तेही आजारी आहेत..आता आम्ही नव्याने सुरुवात करणार अमेय साठी..त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी..”

    अमेय ला घेऊन आई बाबा घरी आले. आता दररोज खेळण्याचा कार्यक्रम सुरू झाला तसाच तो डिप्रेशन मधून बाहेर पडायला लागला. घरीही प्रत्येकाने त्याला समजून घेत शक्य ती मदत केली.

    यश अपयश हे केवळ पेपरवर लिहिलेले मार्क बघून ठरवता येत नाही तर मुळात मुलांच्या आवडी लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना मदत करून त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरीत करता येते. अमेय थोडक्यात बचावला , नव्याने जगायला लागला. आवडीनुसार क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडू लागला. पण अशे कितीतरी अमेय घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःचा जीव गमावतात त्याचे काय..?

    खरंच पालकांची जबाबदारी आहे ती. मुलांची मनस्थिती समजून घेत योग्य मार्गदर्शन केले, त्यांची गुणवत्ता केवळ मार्क बघून न ठरवता त्यांचे ध्येय, स्वप्न लक्षात घेत त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर अशी परिस्थिती खरंच येणार नाही. त्यासाठी आपली मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे.

    © अश्विनी कपाळे गोळे

    मी लिहीलेला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा 😊

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले की विनयला मानसी आवडते आणि तो मानसीला प्रपोज करणार आहे, ते ऐकताच मोना मनोमन दुःखी झाली. 

    पुढे मानसी विषयी विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते.  प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.

         त्याला भेटून मोना होस्टेलमध्ये परत आली. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मानसी सोबतही फारसं काही ती बोलली नाही. जरा थकले गं, आपण उद्या बोलू म्हणत मोना बेडवर पडली. रात्रीच्या त्या अंधारात ती ढसाढसा रडली. पण आता विनयला प्रॉमिस केल्या प्रमाणे त्याला मदत करायची असं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती मानसी आणि विनय सोबत अगदी नॉर्मल वागत असल्याचं दाखवत असली तरी मनापासून ती उदास होती.

    इकडे विनय मानसीचा वाढदिवस खास बनविण्यासाठी मस्त तयारीला लागला होता. मोना शक्य ती मदत त्याला करत होती.  बघता बघता तो दिवस आला. आज मानसीचा वाढदिवस होता. ठरल्याप्रमाणे सकाळीच मोना मानसीला तयार करून बाहेर घेऊन गेली. दोघीही एका मंदिरात पोहोचल्या तर विनय तिथे आधीच हजर होता. दररोज न चुकता देवाला नमस्कार करून मानसी दिवसाची सुरुवात करायची त्यामुळे आज वाढदिवसाची सुरवात सुद्धा मंदिरात जाऊन झाली. तिघेही नंतर एका हॉटेलमध्ये पोहोचले. विनय ने आधीच तिथे एक टेबल बूक करून सगळी तयारी केली होती. पूर्ण टेबलवर गुलाबांच्या पाकळ्या, त्याच्या मधोमध तिचा आवडता चॉकलेट केक, हार्ट च्या आकारात लावलेल्या मेणबत्त्या, टेबलच्या बरोबर वरच्या बाजूला छताच्या दिशेने लावलेले लाल फुगे, मंद आवाजात हॅपी बर्थडे टू यू असे म्युझिक. सगळं बघून मानसीला आनंदाचा गोड धक्का बसला. “किती सुंदर आहे हे सगळं..फक्त माझ्यासाठी..माझ्या वाढदिवसासाठी.. आयुष्यात पहिल्यांदाच इतका छान वाढदिवस साजरा होतोय आपला..” मनात असाच काहीसा विचार करत ती टेबलच्या दिशेने जात होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. लाल पिवळ्या रंगाचा बांधणीचा पंजाबी ड्रेस घातलेली मानसी चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना खूप सुंदर दिसत होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून विनय अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. मोना त्यांच्या सोबत आहे याचा क्षणभर विनयला विसर पडला. तिघेही टेबलवर पोहोचले. मानसीने केक कट केला. नंतर काही वेळाने विनय ने मानसीच्या हातात गुलाबाचे फुल देत तिला प्रपोज केले. त्याला ती अगदी शाळेपासून आवडते, तिच्यावर त्याचं खूप प्रेम आहे हे तिला अगदी आत्मविश्वासाने सांगत आयुष्यभर मला तुझी साथ हवी म्हणत तिला मागणी घातली. त्याचं असं सरप्राइज बघून मानसी जरा घाबरली, लाजली पण तिच्याही मनात त्याच्या विषयी प्रेम होतेच. शाळेपासून नाही पण कॉलेजमध्ये आल्यावर तो तिचा पहिलाच मित्र, त्याची झालेली मदत, त्याचा मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव, त्याचा सहवास यामुळे तिलाही तो आवडायचा पण त्याच्या मनात सुद्धा आपल्याविषयी प्रेम आहे याची तिला जरा जराही शंका आली नव्हती. त्याच्या या सरप्राइज मुळं पण तिचा जरा गोंधळ उडाला तरी तिने कुठलाही विचार न करता त्याचे प्रपोजल स्विकारले तशीच मोना मनोमन रडायला लागली. विनय आणि मानसी खूप आनंदी होते पण मोना‌ला मात्र हा प्रेमभंग अगदी नको नकोसा झाला होता. कुठे तरी दूर पळून जावेसे वाटत होते पण विनय आणि मानसी साठीचा आनंदी क्षण आपल्यामुळे खराब होऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर कसे बसे हास्य आणून ती त्यांच्या आनंदाची साक्षीदार बनली होती.

    वेळ गेली तशी ती विनयच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं त्याच्यावर असलेलं हे प्रेम विसरणे तिला अशक्य झाले होते.
    मानसी आणि विनय मात्र एका नव्या विश्वात रमलेले होते. दोघांचं जिवापाड प्रेम बघून मोनाला कधी कधी त्यांचा हेवा वाटायचा.
    आता शक्य तितकं त्यांच्या सहवासात जाणे मोना‌ टाळत होती.

    अशातच भराभर वर्ष संपत आले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा तिघांनी मस्त पार्टी करायचे ठरवले. तिघेही एकत्र बर्‍याच दिवसांनी बाहेर पडले. त्या दिवशी विनय ने मोनाची मस्करी करत तिला विचारले, “मोना, काय गं..तुला अख्ख्या कॉलेजमध्ये कुणीच आवडला नाही का..”

    त्या क्षणी तिच्या मनात परत एकदा कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे एकच गाणे गुणगुणत होते,

    “तुझे याद ना मेरी आई..किसी से अब क्या कहना…”

    कॉलेज नंतरही दिवसेंदिवस मानसी आणि विनय यांचे प्रेम बहरत गेले. दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोना‌ आयुष्यात पुढे जात होती पण अजूनही विनय मध्ये गुंतलेली होती. दुसऱ्या कुणावर परत असं मनापासून प्रेम करता येईल की नाही याची तिला शंकाच वाटत होती. मानसी आणि विनय यांना मात्र मोनाच्या मनस्थितीची, विनय विषयीच्या प्रेमाची जराही कल्पना नव्हती.

    अशी ही तिघांच्या मैत्रीची आणि विनय-मानसीच्या प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे