Category: Relations

  • सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

    राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली.

    माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले, “नेत्रा , कशाचा विचार करते आहेस. कॉलेजमध्ये काही झालं का..चिमुकले सानू, गोलू तुला हाक मारत ताई ताई करत अवतीभवती फिरत होते पण आज पहिल्यांदाच तू त्यांना जवळ न घेता सरळ खोलीत निघून गेली. काही काळजीचं कारण असेल तर सांग मला बिनधास्त. ”

    नेत्राला स्वतः च्या वागण्यातला बदल जाणवला. तिने मोठी हिंमत करून माई जवळ सगळं काही सांगायला सुरुवात केली, “माई, रागवू नका पण मी राघव विषयी बोलले ना…. त्याने त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं.. तसं तो मनाने चांगला वाटला पण मला खूप घाबरल्या सारखं वाटलं माई..मनात काय चलबिचल सुरू आहे मला खरंच कळत नाही आहे..”

    माई- “नेत्रा , तू नुकतीच कॉलेजला जायला लागली आहे, आयुष्याच्या नव्या वळणावर आहेस..तुला स्वतः च्या पायावर उभे राहायचे तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना.. राघव तुझा मित्र आहे शिवाय तुमची ओळख काही दिवसांपूर्वी झालेली..तो तुझा पहिलाच मित्र ना..त्याच्या विषयी ही भावना‌ तुझ्या मनात निर्माण होणे नैसर्गिक आहे..हे आकर्षक आहे की प्रेम मी आता नाही सांगू शकणार..पण बाळा जरा विचार कर.. सध्या तुला तुझ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.. प्रेम, संसार या गोष्टी आयुष्यात येतातच पण त्याची एक ठराविक वेळ असते..आज तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि पुढे काही दिवसांनी नाही पटलं तर पुढचं आयुष्य नुसतच झुरत घालवायचं नाही तेव्हा वेळीच सावर मनाला..मित्र म्हणून रहा यात माझी हरकत नाही पण प्रेम, संसार अशा गोष्टींचा विचार आता करू नकोस..तुला तो आवडतो मला कळतंय पण हे प्रेमच आहे असं नाही ना..”

        माईंच्या बोलण्याने नेत्राला मन अगदी हलके वाटले. मनातला गोंधळ बराच कमी झाला. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून तिने स्पष्ट काय ते राघवशी बोलायचं ठरवलं.
    राघवला भेटल्यावर तिने त्याला सांगितले, “राघव, आता तरी मला उत्तर देणे शक्य नाही..मला माझ्या मनाची अवस्था कळत नाहीये..मला तू आवडतोस पण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं अजून तरी ठामपणे माझं मन मानत नाहीये. मला वेळ दे. तू नोकरी करतोस.. लवकरच सेट होशील पण माझं स्वतः च्या पायावर उभे राहायचे स्वप्न माझं नसून माई, आमचा आश्रम या सगळ्यांचं आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी याविषयी, आपल्या नात्याविषयी काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. पण हा, आपण चांगले मित्र बनून नक्कीच राहू शकतो.”

    नेत्राच्या बोलण्याने राघव अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. इतक्या कमी वयात इतका समजुतदारपणा बघून त्याला तिचं खरंच खूप कौतुक वाटलं. त्यानेही तिला त्यावर उत्तर दिले, “तू हवा तितका वेळ घे..मी वाट पाहीन..आपण चांगले मित्र नक्कीच आहोत..तुला काहीही मदत लागली तर मला हक्काने सांग..तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच मदत करेन.”

    तिनेही त्यावर एक गोड स्माइल देत मैत्री स्वीकारली. मित्र बनून राहत असला तरी राघव तिच्या प्रेमात पडला होता आणि मान्य करत नसेल तरी मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नेत्रा सुद्धा त्याच्यावर जिवापाड प्रेम करत होती.

    दोघांची मैत्री दिवसेंदिवस बहरतचं होती. अशातच भराभर वर्षे निघून गेली. नेत्रा कॉलेजच्या अंतिम वर्षाला होती. तिचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने तिची योग्य ती वाटचाल सुरू होती. राघवच्या घरी दोघांच्या मैत्री विषयी काही एक माहिती नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक साजेस स्थळ आणले आणि त्याविषयी राघवला सांगितले. या क्षणी राघवने मला हे स्थळ मान्य नाही सांगून नकार दिला पण नकार देण्यासारखे काहीच नव्हतं. मुलगी त्याच्या तोलामोलाची, सुंदर, सुशिक्षित नोकरी करणारी. त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे आई बाबांना शंका आली. त्यांनी त्याच्याशी बोलल्यावर त्यांना नेत्रा विषयी कळाले. त्यात ती अनाथाश्रमात वाढलेली म्हंटल्यावर त्याच्या वडिलांचा पारा चढला. “कोण कुठली मुलगी, प्रेम करायचं होतं तर जरा तोलामोलाची तरी बघायचं होतं..आई वडिलांशिवाय वाढलेली ती.. काही संस्कार तरी असतील का..” असं बोलून त्यांनी राग व्यक्त केला.
    आईने तिचा फोटो बघताच ती म्हणाली, “कशी काय आवडली रे तुला..ना‌ रंग ना रूप.. वरून अनाथ..राघव तिला विसरून जा.. आम्ही तिचा कधीच स्वीकार करू शकत नाही..”

    आई बाबांच्या बोलण्याने राघव खूप दुखावला पण त्याने विचार केला, “समाज अजूनही जात धर्म, रंग रूप या गोष्टींचा विचार करतोच..तसाच विचार आई बाबा करत आहेत.. त्यांचं चुकलं असंही नाही पण जी परिस्थिती नेत्रा वर ओढावली त्याच काय..त्यात तिची काय चूक..मला तिचं रंग रूप पाहून नाही तर तिचं प्रेमळ मन, तिची जिद्द, तिचा स्वभाव बघून ती आवडली.. वरवर पाहता प्रेम कुणीही करेल पण मन समजून घेत प्रेम केल हा माझा गुन्हा का वाटला आई बाबांना..”

    आता आई बाबांची समजुत कशी काढावी म्हणून राघव काळजीत पडला‌. त्याने याविषयी नेत्रा ला काही एक सांगितले नाही. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू द्यावं म्हणून तो गप्प राहिला.

    माईंना भेटून त्याने सगळी परिस्थिती त्यांना सांगितली शिवाय नेत्रा साठी त्यांच्याकडे मागणी घातली. एकंदरीत त्याची धडपड, नेत्रा विषयी आपुलकी, प्रेम बघता माईंना आता राघवची, त्याच्या नेत्रा वरच्या खर्‍या प्रेमाची खात्री पटली होती. त्या त्याला मदत करायला तयार झाल्या पण आई बाबा तयार नसतील तर नेत्रा सोबत लग्न लावून देऊ शकणार नाही हेही त्यांनी राघवला सांगितले.

    त्याने आई बाबांची कशीबशी समजूत काढत एकदा त्या अनाथाश्रमात येण्यासाठी त्यांना तयार केले. आई बाबा माईं सोबत आश्रमात एका झाडाखाली खुर्चीवर बसले होते. माईंनी त्यांना नेत्राचा भूतकाळ सांगितला, “नेत्रा त्यांना एका मंदिरात सापडली. मुलगा व्हावा म्हणून पहिल्या मुलीचा बळी जाणार होती पण अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी तिला वाचवले आणि आश्रमात सोडले. केवळ दोन महिन्यांची होती ती‌. जसजशी मोठी झाली तसंच अख्खं आश्रम तिने प्रेमाने जिंकले, खूप हुशार, मेहनती आहे ती.. दुर्दैव इतकंच की आई वडिलांना तिची किंमत नव्हती..मुलगा हवा होता म्हणून तिला बळी देणार होते तिचा..” त्याविषयी त्यांच्याकडे असणारे पुरावेही माईंनी दाखवले. आता राघवचे आई बाबा कितपत विश्वास ठेवतील हे त्यांच्या वर सोडले.

    ते ऐकताच राघवच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले, नेत्रा विषयी वाईट वाटले पण अशा अनाथ मुलीला सून करून घ्यायचं हे काही त्यांना पटलं नव्हतं.

    माईंनी त्यांना हेही स्पष्ट केले की, तुम्ही तयार नसाल तर तुमचे मन दुखावून ती कधीच राघव सोबत लग्न करणार नाही.
    माईंनी नेत्राला बोलावून घेतले. तिला मात्र काय चाललं आहे काही कळालं नाही. ती तिथे जाताच अतिथी म्हणून आई बाबांच्या पाया पडली. त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. माईंनी ओळख करून दिली तेव्हा तिला कळाले की हे राघव चे आई बाबा आहेत. ते ऐकताच ती जरा गोंधळली, अचानक ते इथे कशे आणि मग राघव कुठे आहे याचा विचार करत स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. तिचं साधं सरळ राहणीमान, निरागस चेहरा, प्रेमळ बोली बघून आईला ती चांगली वाटली पण तिचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी मात्र अजूनही मन मानत नव्हतं.

    बाबां तर अजूनही नकारावर ठाम होते. त्यांचा नकार माईंना कळाला तसंच ते गेल्यावर त्यांनी नेत्रा आणि राघव ची समजुत काढली. राघव, तुझ्या घरी ही गोष्ट स्वीकारण्यास कुणी तयार नाही तेव्हा तुम्ही दोघेही इथेच तुमच्या भावनांना थांबवले तर योग्य राहील असे सांगितले. 

    नेत्रा हळवी असली तरी वास्तविकतेचा विचार करणारी होती. तिने माईंच्या बोलण्याचा आदर ठेवत राघवला भेटणे, बोलणे बंद केले. या गोष्टीचा विचार करून मनोमन तिला खूप त्रास होत होता पण चेहऱ्यावर हास्य ठेवून ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होती. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीचे प्रयत्न सुरू केले.

    वेळेनुसार हळूहळू ती राघवला विसरण्याचा प्रयत्न करत होती पण मनोमन त्याला आठवत खूप रडतही होती.

    इकडे राघव आई बाबांशी तुटक पणे वागायला लागला, आयुष्यभर लागलं करायचं नाही म्हणत आले ते स्थळ हूडकावून लावू लागला. नेत्रा ला भेटायचा खूप प्रयत्न केला पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. मनोमन झुरत तो जगत होता. आईला त्याची ही अवस्था बघवत नव्हती पण बाबांच्या निर्णयापुढे, समाजाच्या भितीने त्या काही पुढाकार घेत नव्हत्या.

    अशातच वर्ष गेले पण राघव काही नेत्राच्या विचारातून बाहेर पडला नव्हता. तिघेही रात्री जेवताना टिव्ही समोर बसले होते. एका न्यूज चॅनलवर माईंची मुलाखत सुरू होती. आश्रमाला इथवर आणण्याचा प्रवास त्या वर्णन करताना त्यांच्या बोलण्यात नेत्रा चा उद्धार सतत होत होता. आमची नेत्रा मेहनतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून मोठ्या हुद्द्यावर रूजू झाली हे त्या अभिमानाने सांगत होत्या. ते बघताच राघवच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. माझी नेत्रा, तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं असं तो रडक्या सुरात बोलून गेला. तिला माईंसोबत तिला टिव्हीवर बघताच त्याला खूप आनंद झाला. आपला मुलगा इतका हळवा झालाय हे बघताच बाबांच्या डोळ्यातही पाणी आले. आपण ज्या मुली विषयी चुकीचा विचार करत आलो तिने खरंच नाव कमावलं असा विचार बाबांच्या मनात आला. समाज, नातलग काय म्हणतील म्हणून आपल्या मुलाचं सुख आपण हिरावून घेत आहोत याची त्यांना जाणीव झाली.

    एक अपराधीपणाची भावना मनात घेऊन ते काही दिवसांनी राघव सह आश्रमात आले. नेत्राच्या कर्तुत्वाचे कौतुक करत त्यांनी माईंची माफी मागितली आणि नेत्रा ला राघव साठी मागणी घातली. आता हा समाज, माझे नातलग कांहीही म्हणो पण माझ्या मुलाचा सुखी संसार आम्हाला बघायचा आहे आणि तो नेत्रा शिवाय अपूर्ण आहे हे त्यांनी माईंना सांगितले.

    राघव आणि नेत्रा हे सगळं ऐकून मनोमन खूप आनंदी झाले. इतके दिवस मनात साठवलेले प्रेम, राघवच्या आठवणी नेत्राच्या डोळ्यातून अश्रु रूपात बरसायला लागल्या.तिचा बांध फुटला, राघव कडे बघत ती आनंदाने रडायला लागली. त्यानेही तिचे अश्रू पुसत हळूच तिला मिठी मारली.

    माईंनी मोठ्या आनंदाने नेत्रा चे लग्न राघव सोबत लावून दिले. आपली नोकरी सांभाळत सासरी आल्यावर सुरवातीला कुरकुर करणार्‍या  नातलगांची मने नेत्राने प्रेमाने जिंकली.

    आपल्या आजूबाजूला प्रेमापेक्षा जास्त समाज, नातलग , मानपान, प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले जाते. अशाच गोष्टींचा विचार करून घरच्यांचा नकार, धमक्या  बघता अनेकदा तरुण पिढी प्रेमापोटी आपले आयुष्य संपवायला ही मागेपुढे पाहत नाही. अशाच परिस्थितीतून सामाजिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने ही कथा मी लिहीलेली आहे.

    अशी ही आगळीवेगळी सामाजिक प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

    नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला पडायचे पण कधी कुणाला विचारण्याची हिंमत झाली नाही. अनाथाश्रमाच्या मुख्य सविता ताई म्हणजेच माई तिच्या साठी आई समान होत्या तर अख्खा आश्रम तिचं कुटुंब.

    बारावीमध्ये ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. पुढे संगणक शाखेत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिलाच दिवस होता तो. नेहमीप्रमाणेच अगदी साधा पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली आणि माईंचा आशिर्वाद घेऊन कॉलेजला निघाली. जुलै महिना असल्याने जरा पावसाचे चिन्ह दिसत होतेच. लगबगीने बस स्टॉपवर येऊन उभी राहिली. बस स्टॉपवर दोन लहान मुले बाजूला खाली फुटपाथवर बसून खेळत होते आणि त्यांची आई तिथे उभ्या असलेल्या लोकांना गुलाबाची फुले विकत घेण्यासाठी विनवण्या करत होती. यावरच त्यांचं पोट भरत असं एकंदरीत परिस्थिती पाहता नेत्राला लक्षात  आलं. तिला त्या मुलांकडे बघून वाईट वाटत होते, मनात काही तरी विचार करत तिने स्वतः जवळचा जेवणाचा डबा त्या लहान मुलांना दिला आणि ती मुलेही अगदी त्यावर तुटून पडली. ते बघताच त्यांच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि तिने एक गुलाबाचे फुल नेत्राला आग्रहाने दिले.

    हा सगळा प्रकार बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येक जण बघत होता. त्या गर्दीत राघव सुद्धा उभा होता. त्याला नेत्रा विषयी एक वेगळाच अभिमान वाटला, कौतुकही वाटले. तिच्या प्रेमळ स्वभावाची जाण त्याला त्या क्षणभरात झाली‌. त्याचे डोळे तिच्यावरच स्थिरावले.

    काही वेळातच बस आली आणि नेत्रा बसमध्ये चढली. योगायोगाने नेत्रा आणि राघवला आजुबाजूला जागा मिळाली. नेत्राचे कौतुक करण्याच्या उद्देशाने राघव म्हणाला , “हाय, मी राघव. तुम्ही खरंच खूप छान काम केलं आज..त्या भुकेल्या मुलांना डबा दिला तेव्हा त्या मुलांच समाधान बघता खरंच खूप छान वाटलं. तुमचं खरंच खूप कौतुक वाटलं..आपणही काही मदत करावी म्हणून मी दोन पिवळ्या गुलाबाची फुले त्या बाईंकडून घेतली पण आता या फुलांचा तुम्ही स्वीकार केला तर मला आनंदच होईल. फक्त तुमचं कौतुक म्हणून माझ्याकडून हि भेट समजा.”

    नेत्राला त्याच्या बोलण्याने जरा अवघडल्या सारखे वाटले. ती त्याला म्हणाली, “माफ करा पण आपली काही ओळख नसताना मी या फुलांचा स्वीकार करू शकत नाही..”

    त्यावर तो म्हणाला, ” असो… काही हरकत नाही..पण गैरसमज नको..मला खरंच कौतुकास्पद वाटलं तुमचं वागणं म्हणून म्हंटलं शिवाय मी एका मुलाखतीला जातोय तिथे फुले घेऊन कसा जाऊ हाही प्रश्न आहेच..”

    ते ऐकताच मनोमन विचार करत नेत्रा म्हणाली, “ठिक आहे द्या मग मला ती फुले.. गरज नसताना त्या माऊली ला मदत व्हावी म्हणून घेतलीत ना फुले..मग तुमचं सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल.. तुमच्या मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा ?..”

    तिचं बोलणं, तिचं वागणं बघता राघवच्या मनात तिच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. दोघांनी स्टॉप येत पर्यंत गप्पा मारल्या.

    कॉलेजचा पहिला दिवस नेत्रा साठी खास होता.सगळा नविन अनुभव, नविन विश्व. आश्रमात परत आल्यावर तिने माईंजवळ दिवसभराच्या सगळ्या आठवणींची उजळणी केली. त्यात राघव विषयी सांगताना का कोण जाणे पण एक आनंदाची लहर तिच्या चेहऱ्यावर झळकली, ते भाव माईंनी अलगद टिपले. माईंना जरा काळजी सुद्धा वाटली पण आपली नेत्रा समजुतदार आहे, विचारी आहे शिवाय ती आपल्या पासून काही लपवत नाही याची त्यांना खात्री होती.

    दोन दिवसांनी सकाळी परत बस स्टॉपवर तिला राघव भेटला, पेढ्यांचा डबा तिच्यासमोर देत तिला म्हणाला, “मिस नेत्रा, तुम्ही माझ्यासाठी लकी ठरलात..मला नोकरी मिळाली.. तुमच्याशी गप्पा मारून फ्रेश मूडमध्ये मुलाखत दिली आणि निवड झाली..थ्यॅंक्यू.. प्लीज पेढा घ्या ना..”

    नेत्राने त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “माझ्या मुळे नाही तुम्ही तुमच्या जिद्दीने, मेहनतीमुळे निवडले गेले..”

    राघव तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता. काळी सावळी असली तरी किती सुंदर व्यक्तीमत्व आहे हे असा विचार करत तो एकटक तिला बघत होता. दोघांची नजरानजर झाली तशीच ती लाजली.

    राघव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार मेहनती मुलगा. पिळदार शरीरयष्टी, सावळा वर्ण, उंच पुरा रूबाबदार.

    दोघांची त्या बस स्टॉपवर अधून मधून भेट व्हायची. हळूहळू मैत्री झाली.

    आजकाल नेत्राच्या वागण्यात बोलण्यात जरा वेगळा बदल माईंना जाणवत होता. ती एका वेगळ्या विश्वात वावरत होती. आनंदी राहत होती, आपण कसं दिसतोय, कॉलेजला जाताना नीट तयारी केली की नाही अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे नेत्रा बारकाईने लक्ष देऊ लागली होती.

    माईंना हा बदल आवडत होता पण नेत्रा प्रेमात तर पडली नसेल ना की कॉलेज मध्ये इतर मुलींमध्ये आपणही नेटकं दिसावं म्हणून हा बदल झाला याचा अंदाज त्यांना बांधता येत नव्हता. हल्ली तिच्या बोलण्यात राघवचा उद्धार हा असायचाच.
    पहीलाच मित्र होता तो तिचा शिवाय वयाच्या ज्या टप्प्यावर नेत्रा होती त्यामुळे माईंना तिची काळजी वाटू लागली. तिच्याशी यावर बोलावं का असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

    इकडे दोघांची मैत्री छान रंगली होती. एकमेकांची ओढ निर्माण झाली होती. राघवला नेत्राने ती अनाथ असल्याचे सांगितले होतेच पण त्याला त्याची काही अडचण नव्हती. तो तिच्या प्रेमात पडला होता. मनापासून त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली होती.

    एक दिवस त्याने बस स्टॉपवरच्या त्या माऊली कडून लाल गुलाबाचे फुल नेत्राला देत आपले प्रेम व्यक्त केले. तिलाही सगळं हवंहवंसं वाटत होतं पण आपण अनाथ आहोत तेव्हा राघवचे आई वडील आपला स्वीकार करतील का या विचाराने ती निराश झाली. राघव वर तिचेही प्रेम होतेच, त्याच्या सोबत संसार करण्याचे स्वप्न ती बघत होती. पण त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला तरी पुढे काय..हे संसाराचं स्वप्न वास्तव्यात उतरू शकणार की नाही याची तिला भिती वाटत होती.

    याविषयी माईंसोबत बोलावं का असंही तिला वाटत होतं.

    राघव तिच्या उत्तराची वाट बघत होता पण नेत्रा मात्र विचारांच्या गर्दीत अडकली होती.

    आता नेत्रा पुढे काय करेल ? दोघांच्या नात्याचे भविष्य काय असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    काय मग उत्सुकता वाढली की नाही, कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )

    प्रिय दादा,

    रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ?
    यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जाण्याचं ठरवलं असावं आणि म्हणूनच तू आपल्या या लहानग्या बहिणीला स्वरक्षणासाठी बालपणापासूनच सबल बनविले. तुझ्यामुळेच मी क्रिडा स्पर्धेत सहभागी व्हायला लागलेले‌, आजही कॉलेजमध्ये कुठल्याही खेळात मी मागे नाही. सोबतच तुझ्यामुळे मिळालेले कराटे प्रशिक्षण मला स्वतः च्या रक्षणासाठी आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे. या सगळ्यामुळे माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्याच संपूर्ण श्रेय तुलाच आहे दादा. घरी आई बाबांना तुझी उणीव भासू नये म्हणून बाहेरचे सगळे व्यवहार तू मला शाळेपासूनच शिकविले. बॅंकेचे काम असो किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार, तू अगदी मला सोबत घेऊन करत आलास आणि त्यामुळेच मी आज अगदी आत्मविश्वासाने सगळं सांभाळते.

    तुझ्या साठी देशभरातून अनेक राख्या येतात, शाळकरी मुली हातावर राख्या बांधतात तेव्हा तुला माझी आठवण येते असं तू म्हणालास मागच्या वर्षी पण दादा तू मला स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप तत्पर बनविले आहेस पण या भारतमातेला तुझ्या रक्षणाची खूप गरज आहे तेव्हा माझी रक्षा कर असं न म्हणता या भारतमातेच्या रक्षणासाठी असंच कायम लढत रहा हीच माझी इच्छा.

    दादा, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. अख्ख्या देशातील  बहिणींना तुझ्या सारख्या भावाची गरज आहे, तुझ्यामुळे अख्खा देश शांतपणे जगू शकतो, झोपू शकतो. आपल्या या देशात कुठेही काही संकट आलं तरी तू मदतीला धावून जातो तेव्हा संकटात सापडलेल्या प्रत्येक बहिणीला तुझा अभिमान वाटतो, तुला मनोमन ती खूप आशिर्वाद देते. त्या संकटात सापडलेल्या प्रत्येकाला.अगदी ईश्वरा समान भासतो तू.  यापेक्षा मोठे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार दादा. जेव्हा तुझ्या कौतुकाचे गोडवे अख्खा देश गातो त्या क्षणी मला खरंच तुझी बहीण असल्याचा खुप अभिमान वाटतो.

    पत्रा सोबत राखी सुद्धा पाठवत आहे. तसं पाहिलं तर आपलं बहिण भावाचं नातं या राखीच्या रेशमी धाग्यापेक्षा तुझ्या कडून मला मिळालेल्या स्व रक्षणाच्या धड्यांमुळे अजूनच घट्ट झालं आहे. दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस. जिवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी लढणार्‍या माझ्या दादाचं आणि माझं असं एक अनोखं बंधन आहे ज्याला कशाचीही तोड नाही.

    तू घरी आलास ना की आपण सगळे सण एकदाच साजरे करू. तेव्हा आता पत्र वाचून माझी आठवण आली तरी निराश न होता असाच भारतभूमीच्या रक्षणासाठी लढ.

    इकडे आम्ही सगळे ठिक आहोत. आमची काळजी करू नकोस.

    तुझीच लाडकी,
    मिनू

    आपल्या लाडक्या बहिणीचे पत्र वाचून या दादाच्या मनाची अवस्था काय होणार याचा विचार करताना मनात बॉर्डर सिनेमातील “संदेशे आते है…” गाणे आपसूकच आठवते.

    खरंच विचार करण्याजोगे आहे. सीमेवर सदैव तत्पर असणार्‍या या भावावर अख्ख्या भारतभूमीच्या रक्षणाची जबाबदारी आहे. देशभरात बहिण भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सोहळा सुरू असताना हा भाऊ देशसेवा करत या मातृभूमीसाठी लढत असतो. अशा या शूर भावाला माझा सलाम.

     

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    माझा हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    लेख वाचून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

    रोहन पेशाने सिव्हिल इंजिनिअर, उंच पुरा रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला अत्यंत हुशार पंचेवीशीतला मुलगा. एका छोट्याशा गावातील धरणाच्या कामाची मुख्य जबाबदारी रोहनवर सोपवण्यात आली होती आणि त्या निमित्ताने तो एका त्या गावात काही महिन्यांसाठी वास्तव्यास होता. गावात आला तसंच इंजिनिअर साहेब आलेत म्हणत गावकरी त्याच्या मागेपुढे होते, गावात प्रत्येकाला रोहन विषयी फार कौतुक वाटत होते. इतका मानपान, इतकी वाहवा बघता रोहनला मनोमन आनंद होत होता पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांनी आपल्याला असं तुम्ही आम्ही करत मागेपुढे धावणे त्याला जरा अवघडल्यासारखे वाटले. असो, गावकऱ्यांचे प्रेम म्हणून तोही त्यांच्यात रमला. आपल्या कामाची आखणी करत बसला असतानाच एक दिवस गावातला रामू त्याला आवाज देऊ लागला, “रोहन सायब, तुमास्नी गावच्या मंदिरात बोलावलं सरपंचांनी. भजनाचा कार्यक्रम हाय, जरा वेळ या म्हणत्यात तुमास्नी..”

    रोहन जरा विचार करत म्हणाला , “ठिक आहे. आलोच थोडा वेळात काम संपवून. ”

    रोहन हातातील काम संपवून मंदिराच्या दिशेने निघाला तोच त्याच्या कानावर भक्तीगीताचे मधूर सूर पडले, ते सुर एखाद्या तरूणीचे आहे हे लक्षात आले होतेच पण या लहानग्या गावात कोण इतकं छान गात आहे हे बघण्यासाठी तो आतुर झाला.
    जसाच तो मंदिरात पोहोचला तसेच गावकरी साहेबांना खुर्ची द्या, पाणी द्या करत मागेपुढे, आजुबाजूला जमले. तो मात्र त्या गाण्यात तल्लीन झाला होता,

    “श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
    लोग करें मीरा को यूँ ही बदनाम

    साँवरे की बंसी को बजने से काम
    राधा का भी श्याम वोतो मीरा का भी श्याम

    जमुना की लहरें बंसीबट की छैयां
    किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया
    श्याम का दीवाना तो सारा बृज धाम..”

    रोहनचे डोळे त्या आवाजाकडे लागले, ती अगदीच सगळ्यात समोर देवापुढे बसून गाण्यात तल्लीन झाली होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत रोहन क्षणभर हरवला होता. त्या आवाजात जणू काही जादूच असल्यासारखे त्याला जाणवले. पुढच्या काही वेळातच भजन संपून आरतीचा कार्यक्रम झाला आणि इतका वेळ पाठमोरी दिसणारी ती त्याला समोरासमोर दिसली. पांढराशुभ्र सलवार कमीज, लाल ओढणी, केसांची लांबसडक वेणी, त्या वेणीत मळलेला मोगर्‍याचा गजरा, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेली मीरा आरतीचे ताट हातात घेऊन जशी रोहनला दिसली तसाच तो एकटक तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या साध्या राहणीमानात ती खूप सुंदर दिसत होती.

    देवाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच पुजारीजींनी रोहनच्या हातात प्रसाद देत तिची ओळख करून दिली,
    “साहेब ही माझी मुलगी मीरा. अख्ख्या गावात मुलींमध्ये एकटीच सगळ्यात जास्त शिकलेली आहे. तालुक्याला जाऊन पदवी घेतली माझ्या पोरीने. दिवाळीनंतर लग्न आहे तिचं, तुमच्या सारखाच मोठ्या नोकरीत आहे होणारा पाहूणा.”

    ते ऐकताच क्षणभर मिराच्या आवाजाने तिच्याकडे आकर्षित झालेला, तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतच घायाळ झालेला रोहन मनात लड्डू फुटत असतानाच मनोमन उदास झाला. आजुबाजूच्या लोकांचे बोल त्याला आता ऐकू येत नव्हते. मिराकडे चोरून बघताना त्याच्या मनावर झालेला घाव त्याला तिच्याकडे आकर्षित होण्यापासून वाचवत होता. आज अचानक असं काय झालंय,का इतका आकर्षित झालो मी तिच्याकडे हा विचार करतच रोहन त्याच्या राहण्याच्या खोलीवर परत आला.

    रात्री उशिरा पर्यंत त्याला झोप लागत नव्हती, ते गाण्याचे बोल, तो सुमधुर आवाज त्याच्या कानात अजुनही गुंजत होता. मीराचा चेहरा सतत डोळ्यापुढे येत होता. पहिल्यांदाच रोहनची अशी अवस्था झाली होती. तिच्याच विचारात त्याला झोप लागली. सकाळी उठून कामावर जाताना‌ आज पहिले तो मंदिरात गेला. तिथे देवाचे दर्शन घेऊन मग कामावर जायला निघाला तेव्हा मीरा मंदिरात येत होती, तिचे ओले केस, निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस तिला अगदी शोभून दिसत होता. हातात फुलांनी भरलेले पुजेचे ताट होते.

    दोघांची नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना एक स्माइल दिली. ती मंदिराच्या पायर्‍या चढून वर येताच घंटी वाजवून आत गेली. परत एकदा तिच्या विचारात क्षणभर हरवलेला रोहन त्या घंटानादाने भानावर आला.

    तिचं लग्न ठरलं आहे, ती आपली कधीच होऊ शकत नाही हे कळत असूनही तो तिच्यात गुंतत होता. ती न चुकता सकाळी नऊ वाजता मंदिरात येते हे लक्षात आल्यापासून तोही तिची एक झलक बघायला त्याच वेळी तिथे यायचा आणि मग साइटवर जायचा. रोजची ती नजरानजर, ती गोड स्माइल त्याच्या दिनचर्येचा भाग बनले होते.
    कितीही आवरलं तरी तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. आपण मीराच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला एव्हाना कळून चुकले होते. तिलाही त्याचे भाव कदाचित कळाले असावेत.

    एकदा कागदपत्रातील माहिती ऑनलाइन भरून एक रिपोर्ट तयार करायचा होता. अवधी कमी आणि भरपूर काम असल्याने त्याची तारांबळ उडत होती. या परिस्थितीत त्याला मीराची बरीच मदत झाली, तिचे संगणक प्रशिक्षण झाले असल्याने गावकऱ्यांनी तिला रोहनच्या मदतीला पाठवले होते. त्या प्रसंगामुळे जरा का होईना पण दोघांचे बोलणे झाले.

    रोहन आता तिच्यात खूप गुंतला होता, प्रेमात पडला होता पण त्या प्रेमात कुठलाही स्वार्थ, कुठलीही वासना नव्हती. एक निस्वार्थ निरागस प्रेमाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती पण ती भावना तो कधीही व्यक्त करू शकणार नव्हता. गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास त्याला जपायचा होता, मीराला आनंदी बघायचं होतं, तिच्या नजरेत आपल्याविषयी आदर आहे तो टिकवून ठेवायचा होता.

    तिला त्याच्या मनातले भाव कदाचित कळाले होते पण या नात्याला काहीही भविष्य नाही हे त्याला कळत होते. त्याचा प्रोजेक्ट आता संपत आला होता. या काही महिन्यांत मीराच्या अनेक आठवणी त्याने मनात साठवून ठेवल्या होत्या.
    गावाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी एक छोटासा समारोप सोहळा त्याच मंदिरात आयोजित केला होता. सरपंचांनी रोहन चे भरभरून कौतुक करत त्याचा सत्कार केला. त्या सोहळ्यात रोहनची नजर मीराला शोधत होती पण ती काही दिसली नाही.

    परत निघताना गाडीत बसला तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी हात हलवत निरोप देणारी मीरा त्याला अखेर दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याने गावाचा निरोप घेतला.

    मीरा विषयी मनात असलेलं प्रेम आठवणी या कायम रोहनच्या स्मरणात राहणार्‍या होत्या. ते एक अव्यक्त प्रेम होते.
    तिची आठवण आली की तो मनोमन एकच प्रार्थना करायचा, “मीरा तू जिथे कुठे असशील, आनंदी रहा..हसत रहा..”

    आता जेव्हा केव्हा धरणाची पाहणी करण्यासाठी त्याला त्या गावात जावं लागायचं त्यावेळी त्या सगळ्या आठवणी नव्याने ताज्या व्हायच्या. आजही ते सुमधुर आवाजातील गाणे त्याच्या कानात गुंजत असायचे.

    “श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
    लोग करें मीरा को यूँ ही बदनाम..”

    अशी ही एक आगळीवेगळी अव्यक्त प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मैत्री बनली जगण्याची उमेद…

    सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”

    काकू सोसायटीच्या भजन मंडळात अगदी उत्साही व्यक्ती त्यामूळे त्यांच्या बर्‍याच मैत्रिणी होत्या. काका रिटायर्ड झालेले. एकंदरीत सुखी कुटुंब.
    या आनंदात वावरणाऱ्या सुखी कुटुंबावर एक दिवस अचानक मोठे संकट कोसळले. ऑफिसमधून परत येताना सुजयला अपघात झाला. डोक्याला जबर मार लागला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. काका काकूंना हा धक्का पचविणे अशक्य झाले होते.

    सुजयच्या लग्नाचे स्वप्न बघणार्‍या काका काकूंना त्याचे अंतिम सोपस्कार पार पाडावे लागले. काकू रडून मोकळ्या व्हायच्या पण काका मात्र मनातच कुढत काकूंना आधार देत होते. या घटनेला महिना होत नाही तोच या सगळ्या धक्क्यामुळे काकांना हार्ट अटॅक आला, तोही इतका तीव्र की त्यांनीही क्षणभरात या जगाचा निरोप घेतला. आता मात्र काकू पूर्णपणे मोडून पडल्या. आता कुणासाठी जगायचे म्हणत अन्न पाणी सोडण्याचा विचार करत होत्या. नातलग काही दिवस राहून परत गेले, घरी कुणी ना कुणी असेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर ठेवला. नंतर मात्र त्या एकट्या पडल्या, रात्र रात्र जागून फक्त मुलगा आणि नवर्‍याच्या आठवणीत रडायचं इतकंच काय ते सुरू होत. अशामुळे काकूंच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम होत होता. या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी खूप मदत केली. काकूंना एकटे सोडणे धोक्याचे आहे म्हणून आळीपाळीने एक एक मैत्रीण त्यांच्या सोबतीला असायच्या. भजन मंडळात त्यांना बळजबरीने घेऊन जायच्या.या सगळ्यामुळे काकू काही क्षण का होईना पण दु:खातून बाहेर यायच्या.

    काकूंना या सगळ्या धक्क्यामुळे झोपेच्या गोळ्या खावून झोपण्याची वेळ आलेली. सततच्या विचारचक्रामुळे त्यांना झोपच लागेना. काकूंच्या मैत्रीणी त्यांना शक्य तो प्रयत्न करत धक्क्यातून सावरायला मदत करत होत्या. कधी भजनात व्यस्त ठेवायच्या तर कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन जायच्या. असंच एकदा सगळ्या एका अनाथाश्रमात गेल्या. तिथल्या मुलांना मायेची किती गरज आहे हे लक्षात घेऊन काकूंनी स्वतः ला त्या मुलांच्या सेवेत व्यस्त करून घेतले. काकांची पेंशन मिळायची शिवाय काकूंच्या नावाने काही पैसा होताच. त्या सगळ्याला एक वाटा काकू अनाथाश्रमात, गरजूंना दान करण्यात वापरायच्या.

    अधूनमधून नातलग ये-जा करायचे. अशातच वर्ष गेलं. आज काकूंच्या सुजयला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ काकूंच्या मैत्रीणींनी गरजूंना दान धर्म करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुजयला श्रद्धांजली अर्पण करत काकू म्हणाल्या , “आज मी जीवंत आहे हे फक्त आणि फक्त माझ्या या मैत्रीणींमुळे, त्या नसत्या तर कदाचित माझं आयुष्य मी कधीच संपवलं असतं. आता मनावर दगड ठेवून मी जगते आहे. सुजय आणि रावांच्या आठवणी मनात अमर आहेत. पूर्वी झोपेच्या गोळ्या न खाता मला झोपच येत नव्हती पण आता मात्र मला ह्या गोळ्यांची गरज नाही तेही फक्त माझ्या ह्या सख्यां मुळे. या माझ्या जीवलग सख्यांनी मला जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली.”

    हे सगळं बोलताना काकू आणि त्या ठिकाणी असलेला प्रत्येक जण अश्रू गाळत होता.

    ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ह्यातला काही भाग काल्पनिक आहे.

    खरंच आहे ना, मैत्रीच्या नात्यात वय , धर्म, जातपात अशा गोष्टी कवडीमोल असतात. एकेकाळी नातलग पाठ फिरवतिल पण मैत्री मात्र सदैव पाठीशी उभी राहते‌.

    हि कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सासर ते सासरच असतं…

           सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

       सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.
    तापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.
    आता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा,  छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”

    आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”
    ते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “स्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”

    सीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.

    सायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला‌ आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”

    या क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही. 

    सीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.
    अमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.

    दुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.
    अमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.
    तो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”

    आज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच‌. शेवटी सासर आहे हे.. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..

    सीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता
    कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.

    दुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.
    आता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.

    सासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. ?

    तर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. ?

    पटतंय ना….

    मग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग दुसरा ( अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की शिवानी आणि रोहित दोघे फॅमिली फ्रेंड असून घरच्यांच्या मदतीने दोघे लग्नाच्या विचाराने एकमेकांना भेटण्याचे ठरते. रोहीत वेळेत न पोहोचल्याने शिवानी रागारागाने घरी निघून जाते. त्याच्या फोनला सुद्धा उत्तर देत नाही. आता शिवानी चा राग शांत करण्यासाठी रोहीत मनात काही तरी प्लॅनिंग करायचे ठरवतो. आता पुढे.

    रोहीतने शिवानीला फोन मेसेज करून बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उत्तर देत नव्हती. रोहीतला ती आवडत असल्याने तिच्यासाठी काही तरी खास प्लॅनिंग करायचा विचार करताना त्याला आठवण झाली त्यांच्या कॉमन फ्रेंड रेश्मा ची. रोहीतने रेश्माला फोन करून तिला भेटायला बोलावले शिवाय हेही सांगितले की आपण भेटणार आहोत याविषयी शिवानीला सांगू नकोस. रेश्मा आणि शिवानी एकाच ऑफिसमध्ये नोकरीला, शिवानी मुळे रोहीत आणि रेश्मा यांची मैत्री झालेली.
    रेश्मा शिवानी ला म्हणाली, “शिवानी अगं आज मला जरा काम आहे, मी जरा लवकर निघते ऑफिसमधून.”

    इतकं बोलून गडबडीत रेश्मा मोबाईल डेस्क वर सोडून वाॅशरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. तितक्यात रेश्माच्या मोबाईल वर रोहीतचा फोन येताना शिवानीने बघितले तसाच तिचा पारा चढला. काही तरी गडबड नक्कीच आहे म्हणून रेश्मा आज लवकर निघण्याच्या तयारीत आहे हे लक्षात घेऊन शिवानी तिच्या मागोमाग निघाली.

    रेश्मा एका कॉफी शॉप मध्ये गेली तिच्या मागोमाग शिवानीही गेली, बघते तर काय रोहीत आधीच त्या कॉफी शॉप मध्ये बसलेला होता. ते बघून शिवानीला खूप चिड आली, त्या दिवशी तासभर वाट बघत बसून सुद्धा रोहीत आला नाही आणि आज रेश्माला भेटायला आधीच तयार. रेश्मा सुद्धा खोटं बोलली , ती रोहीतला भेटायला येणार आहे हे मला मुद्दाम सांगितले नाही तिने. नक्कीच दोघांचं काही तरी चाललंय म्हणूनच रोहीत मला भेटायला आला नसावा असा तर्क काढून शिवानी पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून निघाली. आज कधी नव्हे ते रोहीत ला रेश्मा सोबत बघून शिवानीला खूप वाईट वाटले होते. रडकुंडीला येऊन रिक्षा पकडून ती घरी निघाली. रोहीत आपल्याशी असा वागूच कसा शकतो हा विचार करत ती मनोमन त्याच्या साठी झुरत घरी पोहोचली.

    घरी आल्यावर शांतच होती ती..आई बाबांशी काही न बोलता सरळ खोलीत निघून गेली. आज तिला काही तरी गमावल्या सारखे वाटत होते. फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली आणि एरवी इतकी बिनधास्त राहणारी शिवानी आज ढसाढसा रडली. आपण रोहीतला दुसऱ्या मुलीसोबत बघू का शकत नाही हा प्रश्न तिला आज सतत विचार करायला भाग पाडत होता. आपण रोहीतच्या प्रेमात पडलो आहे हे तिला आज कळून चुकले पण रोहीत मात्र रेश्माला भेटायला गेला हे आठवून ती परत मनोमन खूप रडली. तिच्या मनात मोठा गोंधळ उडाला होता.
    इकडे रोहीत आणि रेश्मा यांनी मिळून शिवानीचा राग शांत करण्याचा प्लॅन बनविला.

    आता शिवानी ऑफिसमध्ये रेश्माला टाळायला लागली, काय झालं ते मात्र रेश्माला कळत नव्हते. ती शिवानी सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती पण शिवानीला रोहीत सोबतच आता रेश्माचाही राग आला होता. आपल्या रोहीतला हिने आपल्या पासून दूर केले असा गैरसमज करून ती रेश्माचा राग करत होती.

    पुढच्या काही दिवसांत शिवानीचा वाढदिवस होता. दरवेळी अती उत्साहाने वाढदिवसाची वाट बघणारी शिवानी यावेळी जरासुद्धा उत्साहात नव्हती. आई बाबांना ते जाणवले, त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला पण शिवानीने काही सांगितले नाही. रोहीत ने आधीच त्याच्या प्लॅनिंग विषयी शिवानीच्या आई बाबांना सांगितले होते.

    शिवानीसाठी आईने एक ड्रेस आणला जो रोहीत ने त्याच्या आवडीने घेऊन आई बाबांच्या मदतीने तिला दिला आणि हेही सांगितले की मी हा ड्रेस दिला हे न सांगता वाढदिवसाच्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी तिला घेऊन तुम्ही या.

    वाढदिवसाच्या दिवशी शिवानी मुळीच आनंदात नव्हती. ऑफिसमध्ये जायचा मूड नाही म्हणत ती खोलीत एकटीच पडून होती. आज रोहीत ने शुभेच्छा द्यायला फोन सुद्धा केला नाही याचं तिला आज जास्तच वाईट वाटलं. भेटण्याच्या दिवसांनंतर दोन दिवस सोडले तर मागच्या दोन आठवड्यात रोहीत ने ना फोन केला ना मेसेज, तो आता रेश्मा मध्ये अडकला आहे मला विसरला असा समज करून घेत शिवानी खूप रडली.

    आई बाबांना तिची घालमेल कळाली पण रोहीतच्या प्लॅनिंग नुसार सायंकाळ पर्यंत शिवानी ला काही सांगायचं नाही म्हणून ते गप्प बसले. तिला हसायचा प्रयत्न करत शिवानीच्या बालपणीच्या आठवणी काढून तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न करू लागले.

    आईने सायंकाळी जबरदस्तीने शिवानीला तो ड्रेस घालून तयार व्हायला लावले. आपण बाहेर डिनर साठी जातोय असं सांगून तिला रोहीत ने सांगितलेल्या ठिकाणी तिघेही पोहोचले.
    बघते तर काय एका हॉटेलमध्ये एक हॉल मस्त सजवून तयार केलेला होता. दारावर स्वागताला लाल फुगे वापरून तयार केलेला मोठा हार्ट ♥️, आत सगळीकडे लाल रंगाचे फुगे, लाल गुलाबांच्या फुलांचे गुच्छ लावलेले होते. एका प्रोजेक्टर वर हॅपी बर्थडे शिवानी असं झळकत होतं पण आजुबाजूला त्या हॉलमध्ये कुणीच नव्हतं मग ही तयारी केली कुणी असा प्रश्न शिवानीला पडला. जरा आत गेल्यावर एका टेबलावर गुलाबांच्या पाकळ्यांचा मधोमध मोठा केक ठेवलेला होता, सगळीकडे मेणबत्त्यांचा अंधूक प्रकाश पसरला होता. मंद आवाजात गाणे सुरू होते,

    “बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है Happy Birthday to you…..”

    इतकं रम्य रोमॅंटिक वातावरण, इतकी सुंदर तयारी कुणी केली असावी. आई बाबांचा तर प्लॅन नाही ना हा असा विचार करून ती बाजुला बघते तर दोघेही गायब…आता त्या हॉलमध्ये ती एकटीच होती…आई बाबा कुठे गेलेत म्हणून तिने हाक मारली पण कुणीच उत्तर दिले नाही….ती पुढे केक ठेवलेल्या टेबलाकडे चालत होती तितक्यात समोरून कुणी तरी येताना दिसले. अंधूक प्रकाशामुळे चेहरा दिसत नव्हता पण हा रोहीत आहे हे तिने लगेच ओळखले.
    जसजसे दोघे जवळ आले तसंच तो रोहीत असल्याची खात्री पटली.

    तो शिवानी समोर आला, तिचं रूप बघता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. सुंदर लाल काळा वन पीस, हलकासा मेकअप, ते कुरळे केस तिला शोभून दिसत होते.
    अंधूक प्रकाशातही तिचा चेहरा तेजस्वी दिसत होता. तो समोर येऊन तिचा हात हातात घेऊन म्हणाला, “हॅपी बर्थडे शिवानी… खूप सुंदर दिसते आहेस…”
    ती काही न बोलता त्याच्याकडे बघत होती आणि तो बोलत होता, ” शिवानी, माझ्यावर खूप रागावलीस ना…भेटली तर नाहीस पण फोन सुद्धा उचलला नाहीस माझा… म्हणून हा प्लॅन केला तुला भेटून हा क्षण खास बनविण्याचा..आय लव्ह यू शिवानी.. माझ्याशी लग्न करशील…”

    ते ऐकताच तिचे डोळे भरून आले आणि तिला रेश्मा आठवली. ती त्याला म्हणाली, “पण तुला तर रेश्मा आवडते ना..त्या दिवशी बघितलं मी तुम्हा दोघांना एकत्र..”

    तो हसू आवरत म्हणाला , “अगं वेडाबाई, तू बोलत नव्हतीस म्हणून तुझा राग शांत करायचा प्लॅन बनवायला रेश्मा ची मदत घेतली मी… बाकी काही नाही… तुला तर माहीत आहे ना मला तू आवडतेस… माझं प्रेम आहे शिवानी तुझ्यावर…सांग ना लग्न करशील माझ्याशी..” असं बोलून तो एखाद्या सिनेमातल्या हिरो सारखा गुडघ्यावर बसून हात पुढे करत तिला मागणी घालत होता.

    ती तिचा हात त्याच्या हातात देत मानेनेच होकार देत म्हणाली, “थॅंक्यू सो मच रोहीत…आय लव्ह यू टू… खूप मिस केले मी तुला..रेश्मा सोबत बघून तर मनातून खूप दुखावले होते मी..माझा रोहीत माझ्यापासून दूर गेला ही कल्पनाच सहन होत नव्हती मला..तू माझा आणि फक्त माझा आहेस रोहीत…आय लव्ह यू…”
    ती इतकं बोलून त्याला बिलगली. त्याने तिला मिठीत घेत उत्तर दिले, ” यू आर क्रेझी..मी फक्त तुझाच आहे..पण हा अशी रागावत जाऊ नकोस..किती झुरलो मी तुझ्यासाठी…”

    दोघेही हसले तितक्यात हॉलमध्ये लाइट लागले आणि टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे शिवानी म्हणत दोघांचे आई बाबा, काही मित्र मैत्रिणी त्यांच्या दिशेने आले. मोठ्या फुग्यातून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव रोहीत शिवानी वर झाला. सगळं एखादं स्वप्न असल्यासारखं ती बघत होती. सगळयांना तिथे बघून ती लाजतच रोहीतला बघत होती..

    दोघे लहानपणापासून तू तू मैं मैं करत टॉम अँड जेरी सारखे भांडत असले तरी आज फक्त तू आणि मी ? अशा एका गोड प्रेमाच्या ब़धनात अडकले. घरच्यांना सुद्धा खूप आनंद झाला.

    शिवानीने केक कापला, प्रोजेक्टर वर दोघांच्या नटखट फोटोंचा स्लाइड शो सुरू होता. आता सगळ्यांच्या आग्रहाखातर हातात हात घेऊन दोघे डान्स करायला लागले,

    “सोनियो, ओ सोनियो
    तुम्हे देखता हूँ, तो सोचता हूँ, बस यही
    तुम जो
    मेरा साथ दो
    सारे गम भुला के
    जी लूं मुस्कुरा के ज़िन्दगी
    तू दे दे मेरा साथ
    थाम ले हाथ
    चाहे जो भी हो बात
    तू बस दे दे मेरा साथ
    तू दे दे मेरा साथ
    थाम ले हाथ
    चाहे जो भी हो बात
    तू बस दे दे मेरा साथ…..”

    अशी गोड सुरवात झाली दोघांच्या नात्याची. शिवानी आणि रोहित यांच्या प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे नक्की कळवा ?

    माझी ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही ?.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

    शिवानी घरात येताच बॅग टेबलवर ठेवत होती तितक्यात आई पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आणि म्हणाली,
    “काय गं, भेटलीस का रोहीतला…”
    शिवानी चिडून म्हणाली, “आई बाबा तुम्ही म्हणाले म्हणून मी तयार झाले त्याला भेटायला पण त्याने येणार सांगितल्यावर वेळेत पोहोचायला नको होतं का..मी कधी कुणाची वाट न पाहणारी या महाशयासाठी तासभर थांबली पण तो आलाच नाही..वेटर तीन तीन वेळा विचारून गेला, मॅडम कुछ ऑर्डर देना‌ है क्या..तासाभरात दोन कप कॉफी प्यायली मी..आई, बाबा जाम डोक्यात गेलाय हा मुलगा माझ्या.. नाही जमलं यायला तर कळवायला नको का त्याने..”

    बाबा शिवानी ला शांत करत म्हणाले, “अगं शांत हो..काहीतरी काम आलं असेल.. सायंकाळी गर्दी होते ना सगळीकडे, यायला वेळ लागला असेल..पण फोन करून कळवायला हवं होतं त्याने..बरं बघू आपण काय ते..तू शांत हो बघू..त्रास नको करून घेऊन स्वतः ला.”

    शिवानी त्यावर काही न बोलता रागातच फ्रेश व्हायला निघून गेली.

    काही वेळाने शिवानी ला रोहीतचा फोन आला पण तिने चिडल्या मुळे उत्तर दिले नाही. नंतर त्याने शिवानीच्या बाबांना फोन केला, “हॅलो, मी रोहीत बोलतोय..काका, अहो शिवानी ला भेटायच ठरलं होतं पण वेळेवर मिटिंगमध्ये अडकलो आणि उशीर झाला त्यात माझा फोन डिस्चार्ज होऊन बंद पडला त्यामुळे कळवता ही आलं नाही..मी ठरलेल्या कॉफी शॉप मध्ये पोहचलो पण शिवानी बहुतेक माझी वाट पाहून निघून गेली होती.‌.आता घरी आल्यावर फोन चार्ज केला आणि तिला फोन केला पण ती उत्तर देत नाहीये..चिडली बहुतेक माझ्यावर..”

    बाबा- “हो रोहीत .. अरे ती तुझी तासभर वाट बघत होती, तू वेळेत पोहोचला नाही म्हणून जाम चिडली ती.. तुझंही काही चुकलं नाही म्हणा, येतात वेळेवर कामं..पण आता तिची समजुत कशी काढायची बघ बाबा तूच.. आम्ही समजावलं तिला पण तुझ्यावर चिडली ती..तुला तर माहीतच आहे तिचा स्वभाव..”

    शिवानी आणि रोहित दोघांचे वडील बालमित्र त्यामुळे दोन्ही कुटुंबे एकमेकांना चांगले परिचयाचे. रोहीतला पूर्वीपासूनच शिवानी खूप आवडायची पण तिला सांगण्याची हिंमत त्याने केली नव्हती. शिवानी अतिशय बिनधास्त, करीअर ओरिएंटेड, जरा चिडखोर पण तितकीच प्रेमळ स्वभावाची. कुरळे खांद्यापर्यंत केस तिला शोभून दिसायचे, गव्हाळ वर्ण, मध्यम बांधा, नाकी डोळी नीटस आणि आत्मविश्वास असलेली शिवानी कुणाच्याही नजरेत बसेल अशीच.

    रोहीत जरा शांत, समजुतदार, हुशार, दिसायला राजबिंडा, उंच बांध्याचा पिळदार शरीरयष्टी असलेला. कॉलेजमध्ये बर्‍याच मुली त्याच्यावर फिदा पण ह्याच्या मनात शिवानी घर करून बसली होती त्यामुळे तो कुणाला काही भाव देत नव्हता.

    घरच्यांनी रोहीतच्या मनातील शिवानी विषयीच्या भावना ओळखून दोघांच्या लग्नाविषयी विचार केला. दोन्ही कुटुंबे तशी आधुनिक विचारांची. शिवानीला रोहीत आणि तिच्या लग्नाविषयी सांगितल्यावर तिला जरा विचित्र वाटले, सध्या मला लग्न करायचं नाही म्हणत तिने विषय टाळला पण आई बाबांनी तिची समजुत काढली, “रोहीत खरंच खूप चांगला मुलगा आहे, माहितीतला आहे, तुम्ही दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखता तेव्हा तुमची मैत्री लग्नात बदलायला काय हरकत आहे शिवाय आम्हाला तो पसंत आहे.. तसं तुला दुसरा कुणी आवडत असेल तर सांग असंही ते म्हणाले..”

    आता आई बाबांना काय उत्तर द्यावे तिला कळेना. दुसरा कुणी आवडत नाही हो बाबा पण इतक्यात लग्न नको इतकंच म्हणणं आहे असं ती म्हणाली.

    आई त्यावर म्हणाली, “अगं, आताच लग्न करायचं नाही पण तुम्ही जरा एकमेकांना भेटून याविषयी बोलले‌, अपेक्षा जाणून घेतल्या तर बरं होईल.. म्हणजे एकमेकांशी मैत्री असणे आणि त्यालाच जोडीदार म्हणून निवडणे यात फरक आहे.. तुमच्या अपेक्षा, स्वप्न, भविष्याविषयी जरा बोलून जाणून घेतलं तर काय तो निर्णय घेता येईल.. नाही पटलं तर काही जबरदस्ती नाहीच आमची..बघ विचार करून..”

    शिवानी आणि रोहित फॅमिली फ्रेंड असल्याने एकमेकांना चांगले ओळखायचे. सतत भेट होत नसेल तरी भेटले की टॉम अँड जेरी सारखे भांडायचे, शिवानी चिडली की रोहीत तिची अजूनच मज्जा घ्यायचा. रोहीत भावनिक असल्याने ती कधी जास्त दुखावली जाऊ नये म्हणून तो खूप काळजी घ्यायचा. तिची बडबड ऐकायला त्याला कधीच कंटाळा येत नसे. ती अगदी बिनधास्त, मनात आलं ते बोलून मोकळं व्हायचं अशा स्वभावाची पण रोहीत अगदी विरुद्ध,समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील. रोहीतला आपण आवडतो हे शिवानीला कळत होते. शिवानीला मात्र रोहीत विषयी आपल्याला नक्की काय वाटते हे स्वतः च्या मनातले भाव ओळखता येत नव्हते.
    शिवानी आणि रोहित दोघेही कंपनीत नोकरीला, दोघेही चांगल्या पदावर कार्यरत तेव्हा भेटले की करीअर विषयी बोलताना त्यांना वेळ पुरत नसे. आता पर्यंत मित्र मैत्रिण म्हणुन राहिल्यावर शिवानीला रोहीत आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडताना काही कळत नव्हते, मनात नुसता गोंधळ उडाला होता.

    आई बाबांची इच्छा आहे तर एकदा रोहीतला लग्नाच्या हेतूने भेटायला हरकत नाही असा विचार करून ती भेटायला तयार झाली पण रोहीतने यायला उशीर केल्याने खूप चिडली.

    आता रोहित सुद्धा काळजीत पडला, शिवानीचा राग सहज शांत होणार नाही, घरी गेलो तरी ती बोलणार नाही तेव्हा काही तरी खास प्लॅनिंग करायला पाहिजे असा विचार रोहीत करू लागला.

    रोहीत शिवानीचा राग शांत करायला काय करणार आणि पुढे दोघांच्या नात्याचे काय होणार हे जाणून घेऊया पुढच्या भागात ?

    पुढचा भाग लवकरच.

    माझा‌ लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तेरा साथ है तो… ( प्रेमकथा )

    अमनचे काम आज जरा लवकर संपले आणि शैलजाला सरप्राइज द्यावे म्हणून नेहमीपेक्षा लवकर घरी आला. दारावरची बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शैलजाला फोन लावला तरी‌ काही प्रतिसाद नाही. अमनला जरा काळजी वाटली आणि लक्षात आले की घराची एक चावी आपल्याजवळ आहे. नशिबाने लॅचलॉक केले असेल तर आत जाऊन तरी बघता येईल काय झाले. अमनने चावी लावून दार उघडले, योगायोगाने आतून कडी लावलेली नव्हती. बेडरूममधून शंकर महादेवन यांचे breathless गाणे कानावर पडत होते तेही जरा मोठ्या आवाजात.

    ” कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है खुशबू की आँधी है महकी हुई सी अब सारी फ़ज़ायें हैं बहकी हुई सी अब सारी हवायें हैं खोई हुई सी अब सारी दिशायें हैं बदली हुई सी अब सारी अदायें हैं………”

    अमन बेडरूमच्या दिशेने निघाला, हळूवारपणे दार ढकलत आत डोकावून बघतो तर काय शैलजा क्लासिकल नृत्य करण्यात इतकी एकाग्र झालेली होती की बेल वाजलेली, दार उघडलेले काहीच तिला कळाले नाही.

    पहिल्यांदाच तिला इतकं अप्रतिम नृत्य करताना बघून अमनला आश्चर्याचा धक्का बसला, तिला डिस्टर्ब न करता तो तिच्या अदा न्याहाळत बसला. गाण्याच्या शेवटी एक गोल गिरकी घेताना शैलजाला अमन‌ दिसताच ती दचकून जवळजवळ किंचाळी दाबत जरा घाबरतच म्हणाली, “अमन‌ तुम्ही कधी आलात..किती घाबरले मी असं अचानक तुम्हाला बघून..आवाज‌ तरी द्यायचा…”

    तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघत अमन‌ हसतच म्हणाला , “अगं हो‌ हो..शांत हो..बस जरा..किती दचकलीस…आणि‌ मी बराच वेळ बेल वाजवली पण कदाचित गाण्यामुळे तुला आवाज‌ ऐकू नाही आला.. आणि काय बघतोय मी…किती अप्रतिम नृत्य करत होतीस ‌अगदी तल्लीन होऊन..हि कला तुझ्यात आहे हे कधी सांगितलं नाही तू…”

    शैलजा गाणे बंद करीत त्याची नजर चुकवत म्हणाली, “लहानपणापासूनच खूप आवडायचं मला भरतनाट्यम पण…….. आज अचानक सामान आवरताना हे गाणं कानावर पडलं आणि पाय कसे थिरकायला लागले कळालच नाही मला… परत परत तेच गाणं लावून मी थिरकत गेले.. सॉरी मला‌‌ बेल वाजलेली कळालच नाही…”

    अमन – “अगं सॉरी काय त्यात… आणि काय म्हणत होतीस लहानपणापासून भरतनाट्यम आवडते पण…..पुढे काही बोलली नाही..पण काय शैलू…”

    शैलजा – “काही नाही असंच… बरं मी पाणी घेऊन आलेच…” असं म्हणत ती बेडरूम मधून बाहेर जायला निघाली तसंच अमनने तिचा हात धरला आणि स्वतः कडे तिला खेचत म्हणाला, “पण काय…बोल ना राणी… काही तरी सांगणार होतीस पण बोलली नाही तू…”

    शैलजा स्वतःला त्याच्यापासून दूर होत विषय बदलत म्हणाली, “बरं ते जाऊ द्या…आज लवकर आलात तुम्ही.. काही खास…”

    अमन‌ तिला चिडवत म्हणाला, “माझ्या खास बायकोसाठी खास वेळ द्यावा म्हंटलं.. म्हणून आलो लवकर.. सरप्राइज द्यायचं म्हणून घाईघाईने आलो पण तुझी नृत्यकला बघून मलाच सरप्राइज मिळाले…”

    शैलजा- “बरं तुम्ही फ्रेश होऊन या..मी पाणी चहा आणते..”

    शैलजा किचनमध्ये गेली तसाच अमन पटकन फ्रेश होऊन तिच्या मागोमाग हॉलमध्ये आला. दोघांनी एकत्र बसून चहा घेताना अमन म्हणाला, “बरं मला सांग काय सांगणार होतीस तू भरतनाट्यम विषयी..तू सांगेपर्यंत मी विचारणार बरं का…”

    शैलजा एक गोड स्माइल देत म्हणाली, “ऐकायचं ना तुम्हाला, ऐका तर मग ? अरे मला खूप आवडायचं भरतनाट्यम …तेच काय कुठलाही नृत्यप्रकार मी पटकन शिकायची, टिव्हीवर बघून अगदी हुबेहूब नृत्य करायची, लहान होते ना तेव्हा त्यामुळे सगळेच भरभरून कौतुक करायचे. शाळेत बरेच बक्षिसे पटकावली नृत्य स्पर्धेत पण जशी वयात आली तसंच घरच्यांनी माझे नृत्य बंद केले, जरी शहरात शिकले तरी आम्ही गावात राहायचो ना..बाबा गावचे प्रतिष्ठित नागरिक, ते म्हणायचे पोरी बाळीला असं नाच गाणं शोभत नाही, गावातील लोकं नावं ठेवतील. त्यांना वाटायचं मुलीला नावं ठेऊन आपला मान कमी नको व्हायला. तरीही छंद म्हणून मी त्यांच्या लपून कॉलेजमध्ये असताना एक नृत्याचा परफॉर्मन्स दिला, सगळ्यांनी खूप वाहवा केली. कुणीतरी ही गोष्ट बाबांच्या कानावर टाकली, ते इतके चिडले, खूप खूप बोलले. मी कुठला गुन्हा केल्यासारखे वाटले तेव्हा मला.. त्यानंतर कधी नृत्य करण्याची हिंमतच झाली नाही माझी पण आज काय झालं कुणास ठाउक..नकळत थिरकली मी कित्येक वर्षांनी.. खूप छान वाटलं असं मनसोक्त नाचताना…एक वेगळाच आनंद मिळाला मला…”

    हे सगळं सांगताना शैलजा च्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास, तेज सोबतच जरा नाराजी स्पष्ट दिसत होती. तिच्या मनातली सुप्त इच्छा तिने अमनला सांगितल्यावर तिला मनोमन समाधान वाटले.

    अमन आणि शैलजाच्या लग्नाला चार महिने झालेले. शैलजा लग्नापूर्वी गावातील शाळेत शिक्षीका होती. दिसायला साधारण, सुडौल बांधा, लांबसडक केसांची वेणी तिला शोभून दिसायची. अमनच्या मामे भावाचे लग्न होते त्यातच ह्या दोघांचे लग्न ठरले. अमन कंपनीत नोकरीला, उंच पुरा, रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला.

    ज्या लग्नात दोघांची भेट झाली ते लग्न म्हणजेच अमनच्या मामे भावाचे आणि शैलजाच्या चुलत बहिणीचे. त्यामुळे करवली म्हणून शैलजा‌ नवरी‌ सोबत होती, तेव्हाच अमनच्या आई बाबांनी तिला अमनसाठी पसंत केले. अमनने पहिल्यांदा लग्नात शैलजाला बघितले त्यावेळी तिने केशरी रंगाची हिरवे काठ असलेली जरी काठी साठी नेसली होती. हलकासा मेकअप, वेणीवर गुंफलेला गजरा, चंद्रकोर टिकली तिच्यावर शोभून दिसत होती.  सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. एक गोड हास्य चेहऱ्यावर ठेवून आत्मविश्वासाने ती सगळीकडे वावरत होती. अमनला त्याक्षणीच ती आवडली. अमनच्या घरच्यांनी शैलजा कडे लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले. दोघेही आनंदाने नांदत होते. दिवसभर घरी न बसता जवळपासच्या शाळेत नोकरी करावी म्हणून तिचे अर्ज देणे, नोकरी शोधणे सुरू होतेच.

    आज अमनला तिच्या छंदा विषयी माहिती झाले, त्याला खूप आनंदही झाला, आपली बायको एक उत्तम नृत्यांगना आहे हे त्याला कळाले शिवाय तिला तिचा छंद जोपासायला जमले नाही याची खंतही वाटली. आता मात्र शैलजा ची इच्छा पूर्ण करण्याचे त्याने मनोमन ठरवले.
    अमनचे कुटुंब आधुनिक विचाराचे त्यामुळे त्यांना शैलजा विषयी, तिच्या नृत्याविषयी ऐकून आनंदच होईल याची त्याला खात्री होती. अमनने शैलजा ला डान्स क्लास सुरू करण्याचा प्रस्ताव सांगितला. तिला ती कल्पना आवडली पण परत घरच्यांचे काय , त्यांना हे पटेल का म्हणत तिने प्रश्न केला.
    अमन तिला समजावून सांगत म्हणाला, ” आता तू माझी अर्धांगिनी आहेस, तुझ्या प्रत्येक निर्णयात, कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे. डान्स क्लास घेणे शहरात काही वावगे वाटत नाही. तू खूप छान प्रगती करशील त्यात ह्याची मला खात्री आहे…”

    अमनचा विश्वास बघता तिने होकार दिला आणि शैलजाच्या डान्स क्लास चे प्लॅनिंग, तयारी दोघांनी सुरू केली. सुरवातीला घरी आणि काही दिवसांनी सोसायटीच्या जवळच एक जागा भाड्याने घेऊन तिथे मस्त डान्स स्टुडिओ तयार केला. ती इतकी अप्रतिम शिकवायची त्यामुळे तिला भराभर चांगला प्रतिसाद मिळाला. अमनने तिला मोठमोठ्या डान्स शो साठी आॅडीशन विषयी सुद्धा सांगितले. एक ग्रुप तयार करून तिने स्वत:च्या ग्रुपचे नाव त्या शो साठी नोंदविले. बाबांचा अजूनही ते पटत नव्हते पण अमन मुळे ते‌ काही बोलत नव्हते.
    शैलजाचा ग्रुप त्या शो साठी निवडला गेला, त्या शो चे प्रक्षेपण टिव्हीवर होणार होते. ही बातमी ऐकून शैलजाचा आनंद गगनात मावेनासा झाला, तिचं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. लहानपणी टिव्हीवर डान्स शो बघताना आपणही कधीतरी अशा शो मधून टिव्हीवर यावं असं तिला खूप वाटायचं, ती सुप्त इच्छा आज‌ अमनमुळे पूर्ण होत होती.

    तिने अमनला फोन करून ही गोड बातमी सांगितली. सायंकाळी तो घरी येताच तिने त्याला कचकचून मिठी मारली, तिच्या डोळ्यातले आनंदाश्रु अमनच्या शर्टवर टपकत होते. तिचा आनंद बघून अमनला खूप हायसे वाटले, तो तिची मस्करी करत म्हणाला, “मॅडम, नाही जायचं तर नका जाऊ शो साठी पण रडायचं कशाला..माझे शर्ट भिजवले राव तू…”

    ती हसतच जरा बाजुला होत म्हणाली, “आनंदाश्रु आहेत हो ते..आज‌ माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं..फक्त तुमच्यामुळे….कसे आभार मानू तुमचे…”

    अमन जोरात हसत म्हणाला, “आभार… अरे पगली हक है तेरा… कर्तव्य आहे माझं तुझी इच्छा पूर्ण करण्याचे…आभार कसले त्यात…आता मस्त शो साठी तयारीला लाग… आणि हो आज मस्त सेलिब्रेशन करूया…मलाही डान्स शिकव जरा…..”

    अमन‌ फ्रेश होऊन आला, शैलजा ने दोघांसाठी मस्त कॉफी बनविली. अमनने बाहेरून जेवण मागवले आणि रोमॅंटिक गाणे लावले. कॉफी घेत एकमेकांच्या डोळ्यांत बघत त्यांनी आनंद व्यक्त केला. अमनने तिचा हात पकडून तिला उभे करत कपल डान्स करायला सुरु केले..गाणेही तसेच सुरू होते…

    “अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख्याल है
    क्या कहूँ प्यार में दीवानों जैसा हाल है
    दीवानों जैसा हाल है तुम्हारा ही ख्याल है…”

    दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत बघत डान्स करण्यात मग्न होते. मध्येच तिचं लाजणं, गोड स्माइल देणं सुरू होतं. तिची ती अदा बघून अमन तिला अधिकच जवळ खेचत तिची खोडी काढत होता, तशीच ती त्याला दूर लोटत डान्स करीत होती. तितक्यात दारावरची बेल वाजली आणि दोघेही भानावर आले. मागवलेल्या जेवणाची ऑर्डर घेऊन एकजण आलेला. दोघांनी आवडीचा मेनू मस्त एंजॉय केला.

    शैलजा शो साठी जोरात तयारीला लागली होती. ग्रुपची चांगली तयारी करून घेतली. लवकरच तो दिवस आला. आज त्यांचा परफॉर्मन्स होता. शैलजा टिव्हीवर येणार म्हणून अख्ख कुटुंब आज उत्साहात. तिच्या ग्रुपचा परफॉर्मन्स अप्रतिम झाला. परिक्षकांनी त्या डान्स ग्रुपचे कौतुक करत शैलजाला स्टेजवर बोलावून प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली.
    हातात माईक घेऊन तिच्या आनंदाश्रु ने परत वाट शोधली. भावनांना आवरत ती बोलू लागली, “माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते एका मोठ्या डान्स शो मध्ये परफॉर्म करण्याचे, आज माझ्या ग्रुप व्दारे मी माझं स्वप्न पूर्ण केलं..हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त माझे पती अमनमुळे आणि माझ्या ग्रुपमधल्या शिष्यांमुळे. अमन आज इथे आले नसले तरी हा शो‌ ते बघत आहेत..मलाच मनापासून म्हणावसं वाटतं थॅंक्यू सो मच अमन… तुम्ही ग्रेट आहात…”
    बाबांनी तिचा हा शो बघितला तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. आपल्यामुळे तिला इच्छा दाबत रहावं लागलं, किती बोललो आपण तिला नृत्य न करण्यासाठी.. याचं त्यांना वाईट वाटलं शिवाय इतक्या मोठया शो मध्ये ती झळकली बघून तिचा खूप अभिमानही वाटला..

    अमनच्या आई बाबांनी तिचे खूप कौतुक केले. आमच्या मुलीने (सुनेने )नावं कमावले असं ते अभिमानाने सांगत होते.
    शैलजाच्या डान्स क्लास चे लवकरच मोठे नावं झाले. सगळी तिची इच्छा , तिचं स्वप्न अमनने पूर्ण केलं. यामुळेच दोघांचं नातं अजूनच घट्ट झालं, प्रेम वाढतच गेल. ?

    खरंच नात्यात एकमेकांना समजून घेणे किती महत्त्वाचे आहे ना.जोडीदारावर विश्वास ठेवत एकमेकांच्या आवडीनिवडी जपून साथ दिली तर नातं दिवसेंदिवस बहरतचं जातं ?

    दोघांची ही प्रेमकथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका ??

    कथा शेअर करताना‌ लेखिकेच्या नावासह करायला हरकत नाही?

    – अश्विनी कपाळे गोळे

  • आईची दुहेरी भूमिका…

    रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची. 
    जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
    भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
    लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
    ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
    दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
    हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
    दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी. 

    खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे.

    रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते.
    मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
    टपोरे डोळे, निरागस चेहरा, नाजुक अंगकाठी, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट असलेली रिया अनिकेतला बघता क्षणीच आवडते.
    अनिकेतही तिच्या तोलामोलाचा, आकर्षक अशी पिळदार शरीरयष्टी, दिसायला राजबिंडा. अनिकेत आई बाबांना एकुलता एक, त्यामुळे अतिशय लाडका. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. स्वभावाने प्रेमळ पण आई म्हणेल ती पूर्व दिशा अशा काहीशा विचारांचा.
    दोघांचे लग्न ठरले, दोन्ही कुटुंबे अगदी धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीला लागले होते. काही महिन्यांनी लग्न झाले.
    दोघांचे लग्न ठरल्यापासून रियाला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं त्याला.
    लग्न ठरल्या पासून  लग्न होत पर्यंत तो दररोज रियाला न चुकता भेटायचा. रियाचे ऑफिस जवळच असल्याने रोज सायंकाळी तिला भेटणे सोपे होते. रियालाही त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं, त्याच रोज भेटणं , एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणं तिला खूप सुखद वाटायचं. तिचा शांत , प्रेमळ स्वभाव , निरागस असं सौंदर्य याचे कौतुक करताना तो कधीच थकत नव्हता.  दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले होते, लग्न झाल्यावर ती घरी आली तेव्हा त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
    तिला नववधू च्या रूपात बघून त्याची परत एकदा विकेट उडाली होती. घरत बरीच पाहुणे मंडळी असताना लपून छपून तिच्याशी बोलायला यायचा, तिची झलक बघायला सतत बहाणा शोधायचा. सगळे चिडवत म्हणायचे सुद्धा,  याला काही चैन पडत नाही बाबा बायको चा चेहरा बघितल्या शिवाय. पूजा विधी सगळं आटोपलं, पाहुणे मंडळी परत गेली. राजा राणीच्या संसाराला प्रेमाने सुरवात झाली. दोघांची पहिली मिलनाची रात्र तिला अजुनही आठवते,  किती उत्साहाने त्याने सगळी तयारी केली होती त्याने , ते खास क्षण अविस्मरणीय बनविण्याची. आयुष्यात कधी साथ सोडणार नाही म्हणत हातात हात घेतला तेव्हा किती सुरक्षित वाटलं होतं..किती गोड्या गुलाबी ने दोघांचा संसार सुरु झाला होता. एकत्र ऑफिसला निघायचं, मौज मजा मस्ती, भरभरून प्रेम, किती गोड दिवस होते ते. झालं ते नव्या नवलाईचे नवं दिवस भुर्रकन उडून गेले, जणू कुणाची दृष्ट लागली दोघांच्या प्रेमाला. अनिकेत चे आई बाबा दुसऱ्या गावी राहत असले तरी अनिकेत ची आई सतत त्याला फोन करायची, घरी आलास का, इतका वेळ बाहेर कशाला फिरायचे, बायको डोक्यावर बसेल, जरा धाकात ठेव असेही सल्ले द्यायचे. त्याचे बाबा मात्र या सगळ्याच्या विरोधात, ते उलट सांगायचे नविन आयुष्याची सुरवात  आहे, खूप एन्जॉय करा पण बाबांनी आईला क्रॉस केले की अनिकेत ची आई मोठा ड्रामा करायची.

    जेव्हा रियाला हे सगळं कळालं तेव्हा सासूबाईंच्या विचारांची तिला कीव आली. मुलगा सुनेचा संसार आनंदाने चाललेला जणू त्यांना बघवत नव्हते की आपला मुलगा आपल्या पासून दूर जातोय अशी असुरक्षितता, एक प्रकारची भिती त्यांना वाटत होती, कोण जाणे.

    एकत्र राहत नसले तरी सतत फोन करून अनिकेत ला आई सगळे अपडेट विचारायची. अनिकेत सुद्धा त्यांना एकुण एक लहानसहान गोष्टी सांगायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण हळूहळू सगळं विचित्र वाटत होतं रियाला. ती याबाबत अनिकेतला काही बोलली की त्याला वाटायचं रियाला माझे आई बाबा नकोय, दूर राहतात तरी इतक्या तक्रारी करते ही.. झालं अशा गोष्टींवरून वाद सुरू झाले. लग्नाला एक वर्षही झाले नव्हते,  अशाच गोष्टी वरून एकदा दोघांचा वाद झाला आणि रिया रागारागाने आई कडे निघून गेली. रियाचे आई बाबा त्याच शहरात राहायचे तेव्हा राग शांत झाला की अनिकेत नक्कीच घ्यायला येणार याची तिला खात्री होती पण झालं वेगळंच. अनिकेतने रिया अशी निघून गेल्याचा राग मनात धरून ठेवला, मी का माघार घ्यावी म्हणत त्यानेही पुढाकार घेतला नाही. अनिकेत चे आई बाबा त्यादरम्यान त्याच्याजवळ रहायला आले.
    इकडे रिया त्याची वाट बघत एक एक दिवस मोजत होती आणि तिकडे आईच्या सल्ल्याने, धाकाने अनिकेत काही रियाला घरी आणण्याचा पुढाकार घेत नव्हता. अनिकेत चे बाबा त्याला खूप समजवायचा प्रयत्न करायचे, आईचं ऐकून दोघांमध्ये फूट पडू नये म्हणून प्रयत्न करायचे पण आईपुढे काही अनिकेत ठाम भूमिका घेत नव्हता.
    रिया ची आई तिला समजून सांगायची पण तो घ्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही या रियाच्या निर्णयामुळे आई बाबांचे काही एक चालत नव्हते शिवाय अनिकेत आणि त्याच्या घरच्यांची विचित्र विचारसरणीची कल्पना तिने घरी दिल्यावर रियाच्या बाबांनाही अनिकेत चे वागणे पटले नव्हते. अशातच एक दिवस अचानक अनिकेत कडून डिव्होर्स नोटीस आली आणि रिया हादरली.

    नवरा बायको यांच्यात भांडण, मतभेद हे होतातच पण असं अचानक डिव्होर्स नोटीस बघताच रियाला काही कळत नव्हतं, अनिकेत विषयी आधी जरा राग मनात होताच पण आता त्याच्या अशा वागण्याने तिला अजूनच संताप आला. त्याला , त्याच्या घरच्यांना मी नको असेल तर मलाही जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात परत जायचं ना नाही असा विचार करून ती आई बाबांकडे राहू लागली. 
    अशातच सहा महिने गेले आणि आज अचानक अनिकेत रियाला भेटला.

    अनिकेत रियाला सांगू लागला, “रिया अगं तू अशी रागात निघून गेली तेव्हा माझी खूप चिडचिड झाली, राग मलाही आलेलाच. तुला माझ्या घरच्यांशी प्रोब्लेम आहे असं मला वाटलं, माझं खरंच चुकलं रिया. तू निघून गेल्यावर आई बाबा आले, त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा बाबांनी मला तुला परत आणण्यासाठी खूप समजावले पण आईला ते मान्य नव्हते. आईला वाटत होतं मी तुझ्यामध्ये खूप गुंतल्या मुळे तिला मी विसरतो की काय..आईचा खूप लाडका ना मी म्हणून कदाचित तिच्यापासून दूर जाण्याची भिती तिला वाटली असावी. तुझ्याविषयी का माहित नाही पण एक राग, चिड तिने मनात धरून ठेवली. मी खूप गोंधळलो, आई बाबा आणि बायको प्रत्येकाची आयुष्यात एक वेगळी जागा असते हे मला खूप उशीरा कळलं. मला निर्णय घेता येत नव्हता, तुझ्या शिवाय एकटा पडलो होतो मी, मनात सतत कुढत होतो पण मनातलं सगळं बोलून दाखवता येत नव्हतं मला, तुझी खूप आठवण यायची पण तुला कसं सामोरं जावं कळत नव्हतं शिवाय आई परत ड्रामा करेल , चिडेल म्हणून वेगळाच धाक. अशातच मला कंपनीतर्फे विदेशात जाण्याची संधी चालून आली. आई म्हणाली वेळ गेली, राग शांत झाला की तू स्वतः परत येशील, तिला राहू दे काही दिवस माहेरी, तू ही संधी सोडू नकोस. झालं, परत मी भरकटलो, मला खूप मनापासून वाटत होतं तुला ही बातमी सांगावी पण त्या दरम्यान तुझ्या आई बाबांनी मला तुला भेटू दिले नाही, त्यांना माझा राग आलेला. तूसुद्धा फोन उचलले नाही. मी सहा महिन्यांसाठी लंडनला गेलो. कामाच्या, नविन प्रोजेक्टच्या व्यापात गुंतलो. तुझी आठवण सतत यायची, तुला मेसेज केले पण तू मला उत्तर देत नव्हती. आपल्यात काही कम्युनिकेशन राहीले नव्हते आणि म्हणूनच गैरसमज निर्माण झाले.
    इकडे आईने बाबांना असं सांगितलं की रियाला अनिकेत सोबत राहायची इच्छा नाही. आपल्या घरच्यांमध्येही गैरसमज झालेले त्यामुळे आईने त्या संधीचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीने तुला डिव्होर्स नोटीस पाठवली आणि परिस्थिती अजूनच बिघडली. मी परत आलो तेव्हा बाबांकडून मला सगळं कळालं, पण तू माझ्यासोबत राहायला तयार नाही यावर माझा विश्वास नव्हता. तुला डिव्होर्स नोटीस पाठवली हे ऐकून मला मोठा धक्का बसला, खूप रडलो मी बाबांजवळ, पण त्याक्षणी माझे डोळे उघडले. आईच्या संकुचित स्वभावामुळे आपल्या सगळ्यांमध्ये गैरसमज झाले, आपल्या दोघांमध्ये फूट पडली. मला कळून चुकलं की माझी ठाम भूमिका नसल्याने आपल्या नात्यात विष पसरलं. आई, बाबा आणि बायको प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात घेऊन मी नातं जपलं असतं तर अशी वेळ आली नसती. पण रिया अजूनही वेळ गेलेली नाही, मला तू हवी आहेस. मला एक संधी दे..परत असं नाही होणार..मी तुझाच आहे आणि तुझी साथ मी नाही सोडणार..मला माफ कर रिया.. प्लीज मला माफ कर.. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..गेले सहा महिने जो दुरावा निर्माण झाला त्यामुळे मला खरंच माझ्या प्रेमाची जाणीव नव्याने झाली आहे मला..”

    हे सगळं ऐकून रियाला काय बोलावं कळत नव्हतं, तिचं खरंखुरं प्रेम होतं त्याच्यावर. दोघेही वेगळे राहून मनोमन कुढत, रडत होते पण मीपणा, गैरसमज यामुळे पुढाकार कुणी घेत नव्हते.
    रिया काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.
    अनिकेत तिला म्हणाला , ” रिया मी तुझ्या आई बाबांशी बोलून माफी मागतो, तुला मानाने आपल्या घरी परत घ्यायला येतो..आई ला बाबांनी समजावले आहे, तिचा स्वभाव बदलला नाही तरी मी यापुढे कधीच साथ सोडणार नाही. बाबा आणि मी तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सुट्टी आहे, मी घ्यायला येतो तुला, आपल्या हक्काच्या घरी घेऊन जायला. मला खरंच एकदा माफ कर.. खूप प्रेम आहे रिया माझं तुझ्यावर..”

    रियाने अश्रू पुसत मानेनेच त्याला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते. अनिकेत ने रियाचा हात हातात घेतला त्या क्षणी तिला त्यांच्या लग्नानंतर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तोच स्पर्श, तिच भावना आता नव्याने जागी झाल्याची तिला जाणीव झाली.रियाच्या आई बाबांना या गोष्टीचा आनंदच होईल हे तिला माहीत होते.
    तिलाही हेच हवं होतं. त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने त्याला माफ केलं. दोघांचे नाते आज परत एकदा नव्याने बहरले.
    किती तरी वेळ ते हातात हात घेऊन शब्दाविना बरेच काही बोलले.

    दूर राहून त्यांच्यातील नातं आज अजूनच घट्ट झालं आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.

    खरंच बर्‍याच जणांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नवरा बायको यांच्यातील नात्यात गैरसमज, मतभेद यामुळे फूट पडते. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घेतले, ठाम भूमिका घेऊन विश्वास जपला तर नातं तुटण्या ऐवजी जोडल्या जाईल. अनिकेत ला उशीरा का होईना पण त्याच्या चुकीची जाणीव झाली, आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात आलं म्हणून दोघांचे नाते नव्याने बहरले.

    समाप्त.

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

    “रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.”

    अनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती.
    मनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता काय फायदा भेटून बोलून.. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीस… माझ्यावर विश्वास ठेवून कधी माझी बाजू समजून घेतली नाहीस…किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर, वाटलं होतं अनिकेत कधीच माझी साथ सोडणार नाही पण ह्याने इतका मोठा धक्का दिला मला.. नाही मी नाही भेटणार परत अनिकेत ला…आता आमचे मार्ग वेगळे आहेत..”

    अशा भूतकाळातल्या विचारचक्रात गुंतली असताना मैत्रिणीच्याआवाजाने रिया भानावर आली.
    “अगं रिया, लक्ष कुठे आहे तुझं..कधी पासून आवाज देत आहे तुला मी…लंच ला जायचं ना..मला जाम भूक लागली आहे गंं..” ( रियाची मैत्रिण पूजा तिला म्हणाली )

    रिया आणि पूजा गेली पाच वर्षे एकाच ऑफिसमध्ये नोकरीला. दोघींची चांगली मैत्री जमलेली, एकमेकींच्या सुखदुःखात , अडीअडचणीला एकमेकींच्या सोबतीला असायच्या त्या.
    अनिकेत दूर गेल्यानंतर रियाला सावरायला पूजाने बरीच मदत केलेली. पूजा अतिशय बिनधास्त पण समजुतदार मुलगी, ज्याचं चुकलं त्याला स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं आणि हसतखेळत जगायचं असा तिचा जगण्याचा फंडा. 
    रिया मात्र भाऊक, शांत स्वभाव, जरा अबोल. पण पूजा जवळ मनातलं सगळं सुखदुःख सांगायची ती, अगदी विश्वासाने आणि पूजाही तितक्याच आपुलकीने तिचा विश्वास जपायची.
    दोघीही लंच ला निघाल्या, आज परत रियाला असं गप्प गप्प बघून पूजा म्हणाली, “काय मॅडम, आज परत मूड खराब दिसतोय…काय झालंय..सांग पटकन..”
    रिया पडलेल्या चेहऱ्याने चिडक्या सुरात तिला सांगू लागली, “काही नाही गं, आज अनिकेतचा मेसेज आला.. त्याला मला भेटायचं आहे… आता मी जरा सावरायला लागले तर ह्याचा मेसेज आला एकदा भेट म्हणून.. खूप राग आहे गंं मनात पण तरी वाटतयं भेटावे का एकदा..पण असंही वाटतं का भेटायचं मी…गेली सहा महिने वेगळे राहीलो आम्ही तेव्हा नाही आठवण झाली माझी.. डिव्होर्स नोटीस पाठवताना काही नाही वाटलं..आता अचानक काय भेटायचं ….का म्हणून भेटू मी..”
    पूजा तिला समजावून सांगत म्हणाली, ” रिया तू शांत हो बघू.. अगं तुला नाही भेटायचं ना मग नको विचार करुस..हे सगळं जरा अवघड आहे पण तुला आता निर्णय घेतला पाहिजे.. यातून बाहेर पडायला पाहिजे..”
    रिया रडकुंडीला येत म्हणाली, “मी अजूनही खूप मिस करते गं अनिकेत ला..त्याच्या शिवाय अख्खं आयुष्य जगण्याची कल्पनाही करवत नाही मला.. वाटतं जावं त्याच्या जवळ, त्याला भेटून, भांडून  अनिकेतला परत मिळवावं पण त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली त्या क्षणापासून खूप राग येतोय त्याचा… खूप गोंधळ उडाला गं माझ्या मनात..काय करावं खरंच सुचत नाही मला आता..”

    पूजा तिची अवस्था समजून होती, तिला धीर देत ती म्हणाली, ” रिया, तू एकदा भेटुन सगळं क्लिअर का करत नाही..मला अजूनही कळत नाहीये की अनिकेत इतका कसा बदलला..नक्की काय झालं की त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली…मला खरंच वाटत अगं तू एकदा त्याला भेटायला पाहिजे.. सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे..”

    रियाला सुद्धा मनातून वाटत होतं एकदा अनिकेत ला भेटावे, त्याला जाब विचारावा. आता पूजा ने म्हंटल्यावर खरंच एकदा त्याला भेटायच ठरवलं.

    ठरलेल्या वेळी रिया त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच तिच्या ऑफिस जवळच्या बागेत पोहोचली. दुरूनच एका बाकावर अनिकेत पाठमोरा बसलेला तिला दिसला. त्याला बघता क्षणीच धावत जाऊन मिठी मारावी असं तिला वाटलं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याच्या दिशेने जायला निघाली. जसजशी ती त्याच्या दिशेने जात होती तसतशी तिची धडधड वाढत होती.
    जसे दोघे एकमेकांसमोर आले तसाच अनिकेत उठून उभा झाला, रियाचा निरागस चेहरा बघताच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली, नजरानजर होताच तिच्या अश्रूंनी वाट मोकळी केली. किती तरी वेळ फक्त नजरेने बोलत होते ते, त्यालाही भावना आवरता येत नव्हत्या. इशारा करतच त्याने तीला बाजुला बसायला सांगितलं. ती त्याची नजर चुकवत इकडे तिकडे बघत होती. अनिकेत तिला शांत करत म्हणाला, “रिया प्लीज अशी रडू नकोस..आधी तू शांत हो.. मला माहिती आहे माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली आहे पण मला माझी चूक कळून चुकली गं..नाही राहू शकत मी तुझ्याविणा..एक संधी दे मला..आपल्या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले आहेत..मला तेच दूर करायचे आहेत.. म्हणूनच तुला बोलावलं मी भेटायला..मला खात्री होती तू नक्कीच येणार…”
    रिया अश्रू आवरत म्हणाली, “गैरसमज.. आपल्यात.. खूप लवकर कळालं रे तुला..सहा महिने आठवण नाही झाली माझी.. आणि संधी कशाची मागतोय..तुला तर डिव्होर्स पाहिजे ना… नोटीस पाठवलीस ना मला..मग आता काय बोलायचं बाकी राहीलं अनिकेत..तू माझा अनिकेत नाहीस..ज्याच्यावर मी प्रेम केलेलं तो अनिकेत तू नाहीस..तो माझ्याशी असा कधीच वागला नसता.. तुझ्या अशा वागण्याने माझी काय अवस्था झाली असेल कधी विचार केला तू…”
    अनिकेत अपराधी भावनेने उत्तरला, ” रिया अगं ती डिव्होर्स नोटीस मी पाठवली नाही..तुला खरंच असं वाटतं का गं मी इतका वाईट वागेल तुझ्याशी.. मान्य आहे तुला मी दुखावलं, माहेरी जायला सांगितलं पण डिव्होर्स नोटीस खरंच मी नाही पाठवली..मी सगळं सांगतो तुला..मला तू हवी आहेस…मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय…”
    अनिकेत चे बोलणे ऐकून रिया आश्चर्य चकित झाली, अनिकेत ने नोटीस नाही पाठवली मग कुणी पाठवली.. आणि का…पण मग अनिकेत सहा महिने भेटला नाही..बोलला नाही त्याचं काय..या सगळ्या विचाराने ती जरा गोंधळली.

    क्रमशः

    रिया आणि अनिकेत यांच्या आयुष्यात नक्की काय झालं जाणून घेऊया पुढच्या भागात ?
    पुढचा भाग लवकरच…

    तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार..मग कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

    लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पहिल्या प्रेमाची पहिली भेट..??

    तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का. 

    अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढचं सगळं ठरवणार होते. 

    ती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी. 

    ती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.

    ठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.

    तो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तिच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तरे मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं. 

    नंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तिने विचार करायला जरा वेळ घेतला. 

    त्याला भेटल्या पासून ती मनात एकच गाणं गुणगुणत होती.

    ” उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…..”

    रात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.

    सोबतच गाण्याच्या पंक्ती आठवतं होत्या,

    “जब वो मिले मुझे पहली बार
    उनसे हो गई आँखे चार
    पास ना बैठे पल भर वो
    फिर भी हो गया उनसे प्यार..”

    पुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरलं. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.

    हळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.

    दोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते. 

    त्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

    त्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं. 

    दोघंही सगळं आनंदाने अनुभवत होते,

    “पहला पहला प्यार है….पहली पहली बार है….

    अशीच दोघांची अवस्था झाली होती ?

    लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं तिच्या मनात येवून ती हळवी होत होती. 

    त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं. 

    लग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. ???

    अशीही छोटीशी प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्या प्रेमाची पहिली भेटीची?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

    ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.

    आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.

    ईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.

    वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले , 

    ” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”

    ईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न. 

    अमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची. 

    दोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.

    त्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”

    ईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”

    आताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा. 

    मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”

    कसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता. 

    नोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं. 

    तिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.

      

    आज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं. 

    ईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला, 

    “आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”

    टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण  स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला. 

    खरंच विचार करण्याजोगे आहे नाही का?

    ईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • जन पळभर म्हणतील हाय हाय….

    जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
    मी जातां राहील कार्य काय ?

    कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत.

    सखेसोयरे डोळे पुसतील,
    पुन्हा आपल्या कामी लागतील,
    उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
    मी जातां त्यांचें काय जाय ?

    अगदी खरंय, आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं  आहे, कुणाचं आयुष्य किती कुणालाच माहीत नाही. काही विपरीत घडले तर कुणाला काय फरक पडतो हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

    खरंच विचार केला तर फरक हा पडतोच आणि तो म्हणजे आपल्या आई वडीलांना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, आपण आई वडील होतो तेव्हा जाणवतं की आपल्या आई वडीलांना आपल्याला इथवर पोहोचवताना किती खस्ता खाव्या लागल्या असणार. आपल्या पदरात मुलबाळ असताना आपल्यावर चुकून वाईट प्रसंग ओढावला तर खरंच फरक पडतो त्या इवल्याशा जीवाला. आई वडील दोघांचीही गरज असते मुलांना‌ जशी आपल्याला अजूनही वाटते.
    इतर नातलगांना मात्र दोन दिवसाचे दु:ख होते आणि परत ते आपापल्या कामी लागतात. निसर्गाचा नियम आहे तो, अपवाद फक्त आई वडील आणि मुले.

    अनेक बातम्या कानावर पडतात, अपघात, आत्महत्या, हिंसा, आजारपण त्यामुळे ओढावलेला मृत्यू…ते ऐकताच प्रश्न पडतो जाणारा जातो पण त्या जन्मदात्या ला, त्यांच्या मुलाबाळांना किती बिकट परिस्थितीतून जावे लागत असेल, मनात शेवट पर्यंत एक दु:खाची सल कायम राहत असेल ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतील पण काही गोष्टींची काळजी घेत आपण आनंदाने आयुष्य जगणे कधीही चांगले.

    नवरा आणि बायको यांच्यातलं नातं म्हणाल तर तेही पूनर्विवाह करून आपल्या आयुष्यात गुंतल्या जातात पण अशा वेळी मुलांची मनस्थिती काय असते हे त्यांचं त्यांनाच कळत असावं.

    या जगात कुणीच कुणाचं नसतं, ज्याचं त्यालाच पहावं लागतं.  गेल्यावर दोन दिवस गोडवे गाणारे अनेक असतात पण जिवंतपणी कौतुक करणारे मोजकेच.

    आई वडीलांची उणीव ही कुणीही भरून काढत नाही.  म्हणूनच कुणाकडून  काहीअपेक्षा  न बाळगता स्वतः ची काळजी स्वतः घेणे कधीही फायद्याचेच, स्वतः साठी, आई‌वडिलांसाठी आणि मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी.

    काय मग , पटतंय ना.  स्वतः ची काळजी घ्या,  तंदुरुस्त रहा, बिनधास्त राहून आनंदाने आयुष्य जगा…हसत रहा…हसवत रहा ?

    © अश्विनी कपाळे गोळे