Category: Relations

  • म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

    पंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले.

    कंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात काय माल आहे.. ”

    आजोबा हसून उत्तरले,

    “काय माल बिल नाही बाबा…आमच्या म्हातारीनं मोठ्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर आलेले टमाटर, मिरची, वांगे , कोथींबीर हाय..तालुक्याला आज बाजार हाय.. तिथं जाऊन इकतो..जरा का होईना पैसा मिळेल तितकाच म्हातारीच्या हातात तिच्या मेहनतीचा मोबदला..पण न चुकता त्या पैशातले काही पैसे मलाही देते ती मोठ्या प्रेमानं तिकीट काढून जाऊन विकण्याचा मोबदला म्हणून..”

    आजोबांचं उत्तर ऐकून कंडक्टर आणि आजुबाजुच्या लोकांना आजी आजोबांचे प्रेम बघून खूप उत्सुकता वाटली. शेजारच्या सीटवर बसलेल्या एका तरूणाने आजोबांना विचारले “किती मोबदला मिळतो आजोबा..आणि एरवी मग कशावर चालतं घरदार..”

    आजोबा – ” पोरा, मी सरकारी नोकरीत होतो. मिळते जरा पेंशन… दोघांना पुरेसं हाय तितकं पण आमच्या म्हातारीला आधीपासूनच स्वतः च्या कमाईचे पैसे बटव्यात असल्याशिवाय काही दम निघत नाही. अगुदर तीच जायची बाजारी पण आता तिच्या आजारपणामुळे तिच्या कडून प्रवास व्हत नाय… म्हणून म्या जातुय..तिची औषधं बी आणल्या जातात.. म्या कधी जवळचे पैसे टाकून खोटं बोलून जास्त पैसे दिले तरी म्हातारी लगेच वळखते..लय हुशार हाय ती..”

    अशाच गप्पा सुरू असताना आजोबांचा स्टॉप आला आणि ते उतरले. दिवसभर भाजी विकून तीनशे वीस रुपये जमलेले. आजीने दिलेला जेवणाचा डबा खाऊन आजोबा म्हातारीचे औषधे घ्यायला गेले. वाटेत गजरा विकणारा लहान मुलगा त्यांना दिसला. खिशातून दहा रुपयांची नोट काढून आजोबांनी आजी साठी मोगर्‍याचा गजरा घेतला. आजोबा परतीला निघाले, घरी पोहोचताच आजीच्या पांढर्‍या केसांच्या आंबाड्यात गजरा माळून तीनशे वीस रुपये आजीच्या हातात ठेवले. आजीने वरचे वीस रुपये मोठ्या प्रेमाने आजोबांना मोबदला म्हणून दिले आणि म्हणाल्या,

    “हे वय हाय होय माझं गजरा माळायचं.. तुमी पण उगाच खर्च करता..”

    DLF

    आजोबा लाडात येऊन आज्जीची मस्करी करत म्हणाले, “अगं आज आपल्या लग्नाचा पंचावन्न वा वाढदिवस.. म्हणून लय प्रेमानं आणलायं बघं गजरा..”

    आजी लाजून , “ठाउक हाय मला म्हणून तर तुमच्या आवडीचा बेत केला रातच्या जेवणाला.. पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी ते बी म्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या झाडाचे ताजे वांगे बरं का..चला हात पाय धुवा..चहा ठेवते.”

    आजी आजोबांच्या घरी नेहमी मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा..आजही सुरू होता आणि त्यावर गाणं लागलं होतं,

    “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं….”

    आजी आजोबांना मुलं बाळं नव्हते. दोघेच गावातील घरात राहायचे, अख्या गावातील मुलांचे लाडके होते दोघेही कारण सगळ्यांना जीव लावायचे मग ते पशू पक्षी का असेना. काही गोडधोड केले की आजुबाजूला, येणाजाणार्‍याला आग्रहाने खाऊ घालायचे. आजोबा सरकारी नोकरीत कामाला, आजीने सुरवातीपासूनच अंगणात छान बाग तयार केलेली. त्यात फुले, फळे, भाज्या सगळंच असायचं. आजी मग गावच्या बाजारात तर कधी तालुक्याला जाऊन ते विकून यायच्या. आजोबा म्हणायचे अगं मी चांगला सरकारी नोकर, दोघांना पुरून उरेल इतकं आहे आपल्याकडे, कशाला उगाच राबतेस पण आजीच मत असं की कुठल्याही कामाची लाज नको वाटायला शिवाय माझ्या मेहनतीचे पैसे बटव्यात असल्याशिवाय मला नाही बाई आवडत.
    आजोबांना आजीच्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटे.

    आजीचं मन राखायला आजोबाही मदत करायला लागले होते.

    आजीला दम्याचा त्रास होता त्यामुळे ये-जा करणे आता पेलायचे नाही पण आजोबा मात्र अजूनही तरतरीत.‌ दोघेही छान बाग कामात, घरकामात एकमेकांना मदत करायचे. आजोबा अगदी चिरतरुण हृदय असलेले, गमतीजमती करत आजीला हसवायचे, चिडवायचे. गावात अनेक जोडप्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते.

    एकदा अशेच आजोबा तालुक्याला जाऊन सायंकाळी घरी आले, बघते तर काय दरवाजा उघडा आणि आजी झोपलेली. आजोबांनी आजीला आवाज दिला आणि नेहमीप्रमाणे मस्करीच्या सुरात म्हणाले, “आज कशी काय सायंकाळी झोपली गं, मला दुरून येताना बघून मुद्दाम जाऊन झोपली वाटतं.. बरं आज मीच करतो च्या दोघांसाठी मग तर झालं..बरं आइक ना आज तुझ्या बागेतले पेरू सगळे विकल्या गेले. हे घे सगळे धरून चारशे साठ रुपये हाती आले…”

    आजोबा हात पाय धुवून परत आले तरी आजी काय उठल्या नव्हत्या. आजोबांनी जाऊन हलवले तर आजी स्तब्ध होऊन निर्जीव वस्तू सारख्या पडल्या होत्या, बाजुला आजीचा बटवा सुद्धा होता. आजोबा घाबरले, शेजारच्या गण्याला हाक मारली, आजोबांच्या हाकेने आजुबाजुची मंडळी घरी आली, बघतात तर काय , आजी आजोबांना कायमच्या सोडून गेल्या होत्या. घरात मंद आवाजात आजीच्या रेडिओ वर गाणे सुरू होते,

    “भातुकलीच्या खेळा मधली..राजा आणिक राणी…

    अर्ध्या वरती डाव मोडला अधुरी एक कहाणी….”

    आजी गेली म्हणताच आजोबा ढसाढसा रडायला लागले. थंडीचे दिवस त्यात आजीला दम्याचा आजार असल्याने श्वास घेताना त्रास होऊन त्या गेल्या असल्याची शक्यता गावातील वैद्याने सांगितली.

    आजीच्या जाण्याने आजोबा खूप खचले, आता कुणासाठी जगायचे असं म्हणत स्वतः कडे दुर्लक्ष करत त्यांनीही स्वतः च्या तब्येतीवर चांगलाच परिणाम करून घेतला.
    आजी आजोबांनी मिळून तयार केलेली बाग, बागेतील प्रत्येक झाडाला , इवल्या इवल्या रोपट्याला आजीने जिवापाड जपले होते. आजीच्या जाण्याने आजोबां सोबतच बाग ही ओसाड , सुकलेली दिसत होती.

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अशीही एक सावित्री…

    “मॅडम, इधर क्या करने आयी है..अच्छे घर की लग रही..ये रेड लाइट एरिया है..पता है ना..”
    एक लाल भडक लिपस्टिक लावलेली , जरा विचित्र पोझ देत उभी असलेली, तोडके कपडे घातलेली एक चाळीशीतली स्त्री सविता कडे बघत बोलली.
    सविता तिच्या कडे किळसवाण्या नजरेने बघत इच्छा नसताना उत्तरली, “अहो बाई, माझा नवरा शाम, सारखा इकडे येतो असं कळालं त्यांच्या मित्रांकडून. दोन दिवस झाले घरी परतला नाही म्हणून शोधायला आली..हा बघा हा फोटो, तुम्ही बघितला का ह्याला इकडे..”
    “लैला नाम है मेरा..बाई मत बोल..धंदे का टाइम है..निकल यहाँ से नहीं तो तुझे भी लेके जायगा कोई..” फोटो कडे दुर्लक्ष करत लैला सविता ला जायला सांगत होती.
    “बरं लैला, एकदा बघ ना हा फोटो, ह्याला पाहिलं का इकडे तेवढं सांग मग मी निघते लगेच.. खूप काळजी वाटत आहे गंं..”
    “दिखा तो कोण है ये तेरा शाम..” फोटो बघत लैला म्हणाली.
    सविताने तिला फोटो दाखवला आणि आजुबाजूला कटाक्ष टाकला तर लैला सारख्या अनेक स्त्रिया तिथे खोल गळ्याचे कपडे घालून , भडक मेकअप करून विचित्र पणे इशारे करत गिर्‍हाईक शोधत होत्या. एकंदरीत परिस्थिती पाहता सविता ला भिती वाटत होती, तितक्यात लैला म्हणाली,
    “ये तेरा मर्द है..इसको तो कल अस्पताल पहुचाके आये हमारे शेठ..हरामी ने बहोत दंगा किया इधर.. बहुत मार पडा इसको कल..रेश्मा के पास आता था हमेशा.. बहुत पैसा लुटाया न रेश्मा पे इसने.. शराब के नशे मे डूब पडा था तब रेश्मा के पास दुसरा गिर्‍हाइक आया..इसने रेश्मा को दुसरे के साथ देखा तो गुस्सा होकर रेश्मा पे हाथ उठा रहा था.. जैसे के इसने खरिद लिया रेश्मा को..दंगा किया बहुत..सबने इसको बहुत मार पिटा..मर जायगा ओर हम पे आयेगा कर के शेठ अस्पताल पहुचाके आये इसको..”
    सविता ते ऐकताच हादरली, घाबरून शब्द बाहेर पडत नव्हता तिच्या तोंडातून. अडखळत म्हणाली, “कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे…”
    लैला जरा चिडून ,”इतना बताया ना अब निकल..धंदे का टाइम है बोला ना.. बाकी का नहीं पता मेरेको..”
    तितक्यात एक जण आला आणि लैला त्याला घेऊन एका लाकडी जिन्यातून आत निघून गेली.

    सगळं ऐकून सविता रडकुंडीला आली होती, कुणाला विचारावं, काय करावं काही कळत नव्हतं तिला. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करावी म्हणून तिथून निघाली. जाताना एक दोघांनी मुद्दाम धक्का देत ‘आती क्या मेरे साथ’ म्हंटल्यावर तिला अक्षरशः किळस वाटली. धावपळ करत त्या गल्लीतून बाहेर पडली. डोक्यावर रखरखतं उन्ह होतं, घरी पोरांना सोडून नवर्‍याच्या शोधात ती इथपर्यंत आली होती.
    काय पाप केलं म्हणून हा दिवस नशिबात आला आज असा विचार करत ती चालत होती. तितक्यात सविताचा फोन वाजला. शामच्या मित्राचा फोन होता, “वहिनी, शाम हॉस्पिटलमध्ये दाखल आहे…मला तिथल्या नर्स ने फोन करून कळवलं..मी पत्ता पाठवतो तुम्ही या तिकडे..मी पण येतोच..”
    सविताने रिक्षा पकडली आणि हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचली. चौकशी करून शाम जवळ आली, शामचा मित्र बंडूही सोबतीला आला होताच. शामच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या, डोक्याला ड्रेसिंग केलेलं होतं, मळकट कपडे, अंगावर मारल्याचे व्रण, पट्टी बघून सविताला राग करावा की कीव करून रडावे कळत नव्हते. एकही शब्द न बोलता ती त्याच्याकडे बघत होती. शाम मात्र औषधे घेऊन झोपी गेला होता. नर्स कडून कळाले की जास्त मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत कुणी तरी आणलेलं, जरा शुद्धीवर आल्यावर बंडूचा नंबर दिला त्याने आणि आम्ही त्यांना कळवले म्हणून.
    सविता बाजुला एका बेंचवर बसून शाम जागा होण्याची वाट बघत होती. डोळ्यातून अश्रु वाहून नकळत ओठांवर येऊन टेकत होते. डोक्यात अनेक विचारांचे थैमान उडत होते.
    सविता आणि शामच्या लग्नाला बारा वर्षे झालेली. शामचे हार्डवेअर चे दुकान होते, बर्‍यापैकी कमाई असायची. सविता शिवणकाम करून संसाराला हातभार लावायची.
    दोघ राजा राणी आणि दोन मुले असं सुखी कुटुंब होतं ते. कसा कुणास ठाऊक पण शामला दारूचे व्यसन लागले मग उशीरा घरी येणे, भांडणे अशे प्रकार सुरू झाले. मुलेही लहान, त्यांच्यासमोर उगाच तमाशा नको म्हणून सविताने त्याची खूपदा समजुत काढली. त्यानेही परत असं करणार नाही म्हणत वेळ मारली पण एक दिवस जे सविताला कळाल त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली.
    शाम दुकान बंद करून बरेचदा रेश्मा कडे शरीरसुखासाठी जाऊ लागला. दारूची सवय ही कमी होत नव्हतीच. उशीरा घरी यायचा तेव्हा मुलं झोपलेली, अशावेळी त्याला बोलण्यात अर्थ नाही म्हणून मुलं शाळेत असताना जिवांचा आकांत करत सविता त्याला जाब विचारायची, म्हणायची, “काय चुकलं रे माझं, कुठे कमी पडले मी तुला समजुन घेण्यात..का जातोस त्या सटवीकडे…”
    शाम मात्र काही झालं की हात उगारून तिला गप्प करत निघून जायचा आणि म्हणायचा , “मी काही करेन..तू मध्ये पडू नकोस..वीट आला तुझा, तुझ्या कटकटीचा..”
    सविताला खूपदा वाटायचे सोडून द्यावं सगळं पण मुलांकडे बघून ती शांत बसायची, ते म्हणतात ना कुठल्याही स्त्रिला आपला नवरा दारू पिऊन पडला तरी चालतं पण दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला मुळीच सहन होत नाही. सविताचेही असेच झाले.
    ती स्वतः ची चूक शोधत रडायची, मनातल्या मनात कुढत बसायची. मुलांसाठी संसारासाठी धडपड मात्र सुरू असायची तिची.
    गेले तीन वर्षे ती असंच आयुष्य ती जगत होती. आज तर हद्दच झाली होती.

    काही वेळाने शाम जागा झाला आणि समोर सविताला बघून जरा बिचकला. तिच्या डोळ्यात एक प्रकारची घृणा त्याला दिसली. नजर लपवत अपराधी भावनेने तो इकडे तिकडे बघत होता. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली, परत एकदा तपासणी करून घरी जाण्याची परवानगी दिली. बंड्याने औषधे आणून दिली आणि त्याच्या दुचाकीवर तो निघाला.
    सोबतच शाम आणि सविता रिक्षातून घरी यायला  निघाले. वाटेत शाम गप्प गप्पच होता.
    दोघेही घरी पोहोचलो तसेच दोन्ही मुलांनी आईला मिठी मारली आणि म्हणाले, “आई, किती वेळ वाट बघत होतो आम्ही..कुठे होतीस तू..”
    दोन्ही मुले आपल्याकडे दुर्लक्ष करत आईसोबत बोलताना बघून शामला अजूनच अपराधी वाटले. त्यांचीही काय चूक, बाबांचं प्रेम अनुभवायला बाबांना वेळच कुठे होता.
    सायंकाळ होत आली होती. सविताने स्वयंपाक करून जेवायला घेतले. काही न बोलता शामचे औषधे आणि ताट शाम समोर आणून दिले. तोही मुकाट्याने जेवला, औषधे घेऊन झोपी गेला.
    दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून सविता तयार झाली. मुलांसाठी, शामसाठी नाश्ता चहा  बनवून स्वतः कपाटातील जरीकाठी साडी नेसून तयार झाली. पुजेचं ताट तयार करतच होती तितक्यात शेजारच्या सुनंदाने आवाज दिला. हो आलेच गं म्हणत पटकन आवरून ती मुलांना म्हणाली, ” मी आलेच रे वडाची पूजा करून..नाश्ता करून घ्या दोघेही.. बाहेर जाऊ नका मी येत पर्यंत..”
    ते ऐकताच शाम च्या मनात विचार आला, आपल्यामुळे इतका त्रास सहन करूनही सविता वटपौर्णिमेचं व्रत करून सात जन्मासाठी देवाकडे आपल्यालाच मागत असणार का….

    तुम्हाला काय वाटतं सविता शाम सारखा पती  जन्मोजन्मी मिळावा म्हणून सविता वडाची पूजा करायला गेली असेल का ?

    हो..अशा अनेक सविता आहेत आपल्या आजूबाजूला. ज्यांना पती कितीही त्रास देत असेल, दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला असेल, तिच्याशी प्रेमाने वागत नसेल, मारपीट, शिवीगाळ करत असेल तरीही ती वटपौर्णिमा मात्र साजरी करतेच, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना सुद्धा करते.

    शाम वेश्येच्या मागे लागला पण दोन दिवस घरी आला नाही म्हणून सविताने जीवाची पर्वा न करता त्याचा शोध घेतला, रेड लाइट एरिया मध्ये जाऊन काही शोध लागतो का बघितले. पोलिसांकडे गेली तर नवराच दोषी असा विचार करून त्याला स्वतः शोधून काढले. त्याच्या औषध पाण्याकडे लक्ष देत काळजी घेतली. अशाही काही सावित्री आजही आहेत.

    अन्याय सहन करणे योग्य नाहीच, अन्यायाविरुद्ध आवाज आ उठवलाच पाहिजे पण काही भगिनी सविता सारख्या सुद्धा आहेच.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

    तिला काही सांगायचंय..
    हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
    लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
    आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
    एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
    घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
    असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
    खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
    संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
    ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
    कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
    राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
    आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
    आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
    तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
    मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
    खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
    प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

    प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
    कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
    कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

    आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

    मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

    ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
    ( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
    रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
    रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
    राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
    रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
    दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
    त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
    एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
    राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
    दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
    “राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
    “रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
    “राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
    “रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
    “राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
    दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
    रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
    हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
    “राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
    राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
    “राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
    इतकं बोलून रश्मी निघून गेली.
    तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
    तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
    रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
    रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
    कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
    इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

    आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
    राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

    सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
    सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

    त्यावर तो निशब्द झाला.
    आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

    वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

    राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
    रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

    आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

    राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

    समाप्त..!!

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही.
    अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

    https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी… भाग १

    नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
    राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
    नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
    तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
    त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
    राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
    दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

    हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

    पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

    “व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

    “हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

    सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
    राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

    तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

    (महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

    “बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
    नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

    राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

    ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

    राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

    पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

    राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

    लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

    क्रमशः

    पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • नातेसंबंधात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • वडिल

    “आई असते जन्माची शिदोरी,जी सरतही नाही आणि उरतही नाही”तसेच वडील म्हणजे ते , जे म्हणतात “सोड ती चिंता सारी, आनंदात रहा तू बाळा, तुला असं उदास बघून मला लागत नाही डोळा”.

    हे अगदी खरं आहे. आपल्या मुलांच्या आनंदात वडीलांचे सुख असते. कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील सतत धडपडत असतात. ऊन पाऊस कशाचही विचार न करता रोज घराबाहेर पडतात. पैसा कमावण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्यभर झटत असतात.

    कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद, घर, गाडी अशा अनेक जबाबदारी सतत त्यांच्या डोळ्यासमोर असते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. बायकोला, मुलांना कशाचीही कमी पडू नये म्हणून स्वत: साठी ते कधी काही घेणार नाही.

    मुलांच्या संगोपनात आईचा वाटा मोठा असला तरी त्यांच भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी वडीलांचा मोलाचा वाटा असतो. ते व्यक्त करत नसेल पण वडिलांचा मुलांवर जास्त जीव असतो. त्यात जर ते मुलीचे वडील असेल तर ती सासरी जाताना सगळ्यात जास्त हळवे वडीलच होतात. प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम हे तिचे वडील. मुलांसाठी ते हिरो असतात, एक आदर्श असतात.

    आई जन्म देते, वेदना सहन करते पण त्याच वेळी अगदी भावुक होऊन आई आणि बाळ सुखरूप असू दे म्हणून प्रार्थना करतात ते वडील. बाळाला बघून त्यांना जबाबदारीची जाणीव होते, त्याच्या उज्वल भविष्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकायची धडपड ते करतात. उच्च शिक्षणासाठी सगळी तरतूद ते करून ठेवतात.

    त्यांच्या खांद्यावर बसून आपण हे नविन जग बघतो. अगदी सुरक्षा कवचाप्रमाणे ते आपल्या पाठीशी उभे असतात. कितीही मोठे संकट आले तरी वडील पाठीशी तटस्थ उभे राहतात, हिंमत न हारता संकटांना सामोरे जातात.

    स्वतः बसमधून प्रवास करतील पण मुलांना गरजेनुसार ते गाडी घेऊन देणारच. स्वतः फाटके चप्पल बूट शिवून घालतील पण मुलांना नीटनेटकेच ठेवणार. स्वतः टपरा मोबाईल वापरून, मुलांना महागडा मोबाईल घेऊन देतात.

    ज्या घरात वडील नाही त्या घरात मुलांवर कमी वयात सगळी जबाबदारी पडते, सतत वडिलांची कमी भासते. वेळ आली की वडील आई होऊन मुलांचे संगोपनही करतात.

    खरंच वडील कुटुंबाचा मोठा आधार असतात, कुटुंबाला कवच असतात, त्यांचे मजबूत हात सतत कुटुंबाच्या रक्षणासाठी, आनंदासाठी तत्पर असतात.

    अश्विनी कपाळे गोळे

  • आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही

    ती : (सगळे कप्पे पुर्ण पणे भरून असलेल्या कपाटात बघून) अरे, मी आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही.तो : (गमतीच्या सुरात चिडवत) अगं इतकं काय त्यात, माझे कपडे घालून जा आॅफिसला.

    ती : गप्प बस तू. खरंच अरे आॅफीसला घालायला कपडेच नाही मला.

    तो : (आश्चर्याने कपाटात डोकावून) इतके तर आहेत, घाल ना काही तरी.

    ती : तेच ते घालून कंटाळा आलाय रे. हा बघ टॉप, दोन वर्षांपूर्वी घेतलेला आपण..आठवतोय. हा ड्रेस आपल्या लग्नापूर्वीचा..हा तू आवडीने वाढदिवसाला भेट दिलेला, मला खूप आवडला म्हणून सारखाच घातला.. आणि हा…

    तो : ( पुढे काही बोलण्याच्या आधी) अगं बस..बस…तू ह्यातला एखादा घाल आता. आपण घेऊ तुला नवीन ड्रेस.

    ती : (बराच विचार करून एक ड्रेस हातात घेऊन) लग्नापूर्वी मी किती शॉपिंग करायची. आता तर काहीच नाही.

    तो : अगं मग घे ना कपडे, मी कुठे नाही म्हणतो तुला.

    ती: अरे सध्या वेळ तरी आहे का शाॅपींगला जायला. आॅफीसचे काम लवकर आटोपले की कधी एकदा घरी येते आणि बाळाला घेते असं होतं मला. कधी जाऊ शाॅपींगला.

    विकेंडला तर गर्दी मध्ये कुठे जायला नको वाटते.

    तो: आॅनलाइन शाॅपींग कर मग. इतकं काय त्यात. वेळ मिळाला की Myntra, Amazon ला बघ काय आवडेल ते घे बिंदास. पण आता लवकर आवर उशीर झाला आहे आपल्याला निघायला.

    ती: ( मनात विचार करत) अरे हो, आॅनलाइन शाॅपींग तर कधीही करू शकते मी. मला आधी कसं नसेल सुचलं.
    कितीही कपडे असेल तरीही आज काय बरं घालावे, माझ्या जवळ तर कपडेच नाही असा प्रश्र्न कित्येक स्त्रियांना नेहमीच पडतो. अशा क्वचितच स्त्रिया असतील ज्यांना कपड्यांची , वेगवेगळ्या चपलांची, दागिन्यांची आवड नसेल. त्यात मला कपड्यांचे फार वेड. सगळ्या प्रकारचे, विभिन्न रंगाचे कपडे आपल्या जवळ असावे म्हणून आधी पासूनच वाटते.

    शाॅपींग माॅल मध्ये जाऊन एकाच ठिकाणी नवरा बायको मुलं, घरासाठी सगळी खरेदी करता येते त्यामुळे सगळीकडे शोधत फिरण्याचा त्रास वाचतो. पण शाॅपींग माॅल्स मुळे तर हल्ली सगळ्यांना ब्रॅंडेड वस्तूंचे एक वेड लागले आहे, माझंही असंच काहीसं. त्यात तिथल्या आकर्षक आॅफर आणि प्रत्येक वेळी नविन पॅटर्न वगेरे मुळे कधी नको असेल तरीही काहीतरी घ्यावे वाटतेच. ड्रेस काही वेळा घातला की त्याचा लवकरच कंटाळा येणार, तोच तो पॅटर्न पण बोअर होणार.

    काही कपड्यांचे तर नशिब असे पण असते जे घेताना आवडले पण नंतर एक दोन वेळा घातल्यावर नको वाटते. साडी घालायला क्वचितच चान्स मिळाला तरी आपल्या जवळ छान छान साड्यांचे कलेक्शन मात्र असायलाच हवे, कधी वेळप्रसंगी मग साडी घालायचा योग आला की कसं जास्त विचार करायला लागत नाही.

    आॅनलाइन शाॅपींग आणि त्यावरील आॅफर मुळे तर कधी नको असेल तरीही शाॅपींग केली जाते. मग एखादा नवीन ड्रेस घालून बाहेर गेल्यावर अगदी सेम ड्रेस कुणी घातलेला दिसला की मनात विचार येतो, हा ड्रेस, पॅटर्न जरा कॉमन झालंय, काही तरी वेगळा घेऊ. परत मग शाॅपींग सुरू. दसरा, दिवाळी, ख्रिसमस च्या आॅफरची तर बरेच जण वाट बघत असतात. आँनलाईन शाॅपींग मुळे गर्दीत, पावसात, लहान मुलांना घेऊन येण्या जाण्याचा वेळ, त्रास वाचतो त्यामुळे घरबसल्या खरेदी सोयीची वाटते. शिवाय आवडले नाहीच तर परत करता येतेच.

    मुलांची खरेदी असो किंवा नवर्‍याची सोबत आपली थोडी का होईना पण खरेदी ठरलेलीच. मग कपाटात ठेवायला जागा कमी पडते पण प्रत्येक वेळी ड्रेस घालताना हा प्रश्र्न पडतोच की आज मी काय घालू, माझ्या जवळ कपडेच नाही.

    तुमचही असंच काही होतं का नक्की शेअर करा कमेंट्स मध्ये.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • Extramarital Affair – भाग २ ( अंतिम भाग)

    मागच्या भागात आपण पाहीले की आभा आणि मनिष‌ यांची बॅडमिंटन खेळताना ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरवात होते. आता‌ पुढे.

    दररोज सकाळी आभा आणि मनिष बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्ताने भेटायचे, खेळून झाल्यावर कधी ज्यूस घ्यायला तर कधी एकत्र नाश्ता करायला दोघेही जायचे. मनिष बडबड्या, विनोदी स्वभावाचा त्यामुळे आभाला त्याच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा यायची. त्याच्यासोबत ती मनसोक्त हसायची.
    एकदा सुजय नसताना‌ मनिष ने आभा ला सिनेमा ला जाण्या विषयी विचारले, तीही तयार झाली.
    मनिष हा अविवाहित तरुण, एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायचा. पार्टी, सिनेमा, फिरणं असं सगळं त्याला खूप आवडायचं. आता आभा सोबत मैत्री झाल्यावर तिलाही तो सोबत येण्यासाठी विचारायचा, या सगळ्या गोष्टींची आवड आभाला सुद्धा होतीच त्यामुळे मैत्रीच्या नात्याने ती तयार व्हायची.
    अशा सगळ्या गोष्टींमुळे तिला मनिष ची सवय झाली होती. सुजय सोबत असताना, त्याच्या सोबत फिरताना ती पूर्वी सारखी आनंदी नसायची, आपण सुजय ला धोका देतोय हे तिला कळत होतं. सुजय जवळ यायला लागल्यावर तिला त्याची आधी सारखी ओढ वाटत नव्हती. काही तरी चुकतंय हे सतत जाणवतं असल्याने तिच्या आणि सुजय च्या नात्यात एक दुरावा निर्माण होत होता. सुजय खुपदा तिला विचारण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा “आभा, तू हल्ली कुठल्या तरी विचारात असतेस, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं, काही प्रॉब्लेम तर नाही ना..कुठलं दडपण आहे का..मला सांग, मी नक्की मदत करेल तुला.. काय झालं आहे..”
    त्यावर आभाचं उत्तर ठरलेलं असायचं, “नाही रे, दडपण वगैरे काही नाही..उगाच वाटतं तुला असं.. काहीही झालं नाहीये..”
    वरवर असं बोलत असली तरी मनात मात्र मनिषचा विचार असायचा..तिला वाटायचं आपण मनिषच्या प्रेमात तर पडलो नाही ना..आपण चुकतोय का.. मनिष मला फक्त एक मैत्रीण मानतो पण मीच जास्त विचार तर करत नाही ना.. अनेक प्रश्न मनात येऊन सतत गोंधळ उडाल्या सारखं तिला वाटायचं. मनिष सोबत एकदा बोलाव‌ का याविषयी..की त्याला भेटायच टाळावं… सुजय माझा नवरा आहे..आमचं एकमेकांवर प्रेम आहे..मी उगाच मनिष कडे आकर्षित होत आहे..आता त्याला न भेटलेले बरे असा विचार करत तिने अचानक बॅडमिंटन खेळायला जायचे बंद केले.
    आभा का येत नसेल म्हणून तिकडे मनिष सुद्धा काळजीत पडला, फोन केला तर आभा काही उत्तर देत नव्हती. अशेच तीन दिवस गेले..आभा ला हे तीन दिवस तीन वर्षांसारखे वाटत होते..सतत मनिष सोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते तर एकीकडे सुजय चा विचार करून ती स्वतः ची समजुत काढत होती.
    मनिष सुद्धा आभा ला न भेटल्यामुळे अस्वस्थ झाला होता. काय झालं असेल..आभा ठिक तर असेल ना…आभा च्या घरी जाऊन बघावं का अशे अनेक विचार तो करत होता. आपण आभाच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला कळत होतं पण या नात्याला काही अर्थ नाही..आभा विवाहित आहे, तिच्या संसारात आपल्यामुळे काही विष पसरायला नको म्हणून तो स्वतः ला सावरत होता. एकदा आभा ला भेटून सगळं बोलून क्लीयर करावं म्हणजे अशी हुरहूर लागून राहणार नाही असा विचार करून त्याने आभा ला मेसेज केला, ” आभा, मला माहित आहे जे मला वाटतंय तेच तुझ्या मनात आहे.. आपलं नातं मैत्रीच्या पलिकडे जात आहे..वेळीच आपण थांबलो तरच योग्य राहील..तुझ्या आयुष्यात सुजय आहे..मला त्याची जागा घ्यायची नाही..पण एकदा मला भेट शेवटचं.. त्यानंतर मी परत तुला त्रास देणार नाही.. प्लीज मला भेट..”
    आभा त्याचा मेसेज बघून रडायला लागली, तिचीही अवस्था वेगळी नव्हतीच . रडतच तिने रिप्लाय केला, ” आज सायंकाळी, ७ वाजता भेटूया..कुठे भेटायचं तू ठरव..”
    मनिषचा रिप्लाय आला, “तुला हरकत नसेल तर माझ्या घरीच ये.. सविस्तर सगळं बोलता येईल..”
    मागचा पुढचा विचार न करता आभा तयार झाली. ठरल्याप्रमाणे ती ७ वाजता मनिषच्या घरी पोहोचली. मनिष तिची वाटच बघत होता. घरात छान सुगंध दरवळत होता, सगळीकडे मंद प्रकाश, हॉलमध्ये टेबलवर सुंदर गुलाबांच्या फुलांचा गुच्छ असं प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांसमोर येताच आभाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. कुठलाही विचार न करता तिने जाऊन मनिषला मिठी मारली.
    मनिष ने ही तिला मिठीत घेतले, काही वेळ दोघेही काही बोलले नाही. नंतर आभाला मिठीतून सोडवत मनिष तिला म्हणाला, “मी मस्त पैकी जेवण मागवले आहे..आज आपण छान पार्टी करू.. मनसोक्त गप्पा मारू..आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहीला पाहिजे.. रडून हे क्षण खराब करायचे नाही..आता हस बघू..”
    आभाने एक गोड स्माइल दिली.
    मनिष -” आभा, आपली मैत्री झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक क्षण मी आठवणीत जपून ठेवला आहे..मला तू खूप आवडतेस..तू आहेच इतकी गोड की कुणीही प्रेमात पडेल तुझ्या.. तसंच माझं झालं..पण मला माहीत आहे तू माझी होऊ शकत नाही..आपल्या नात्याचा प्रवास इथपर्यंतच होता असा समजुया..मला तुला आनंदात बघायचं आहे.. सुजय आणि तुझ्या मध्ये येऊन मला तुझं सुख हिरावुन घ्यायचं नाही. अचानक आपलं भेटणं बंद झालं तेव्हा मनात एक खंत वाटली.. गैरसमज मनात ठेऊन आयुष्यभर ते ओझं आपल्या मनात राहीलं असतं म्हणून आपल्या मैत्रीच्या प्रवासाचा शेवट गोड असावा म्हणून आज तुला बोलावलं मी..सोपं नसलं तरी आजच्या नंतर आपण भेटायला नको.. हळूहळू होईल सवय.. वेळ गेला ना की माणूस जुन्या गोष्टी विसरतो..तसंच आपणं पडू यातुन बाहेर..”
    आभा मनिष च्या बोलण्याने अजूनच भावनिक झाली पण मनिष जे बोलतो आहे हे सत्य आहे हे तिलाही कळत होतेच.
    मनिष ने मस्त मंद आवाजात गाणे लावले, दोघांनी एकत्र डिनर केला.. केक कापला…आज‌ मात्र ठरवूनही गप्पा काही होत नव्हत्या. विरहाची एक सल दोघांच्याही मनात बोचत होती.
    मनिष ने न राहावून आभा जवळ मनातल्या भावना व्यक्त केल्या, “आय लव्ह यू आभा.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर..आपण एकत्र येऊ शकत नसलो तरी माझं प्रेम हे खरं आहे..या प्रेमाची आठवण ठेव.. हसत रहा नेहमी…” असं म्हणत त्याने आभाला करकचून मिठी मारली.
    दोघेही भावनिक झाले पण मनिषच्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
    रात्री ११ वाजलेत तेव्हा आभा म्हणाली, “चल मनिष मी निघते.. उशीर झाला आहे..”
    मनिषने तिला घरापर्यंत सोडले आणि वाटेतच म्हणाला “तू खरच खूप सॉलिड आहेस..आजची आपली शेवटची भेट..या शहरात राहून मी तुला विसरू शकणार नाही.. म्हणून ट्रान्स्फर साठी अर्ज केला आहे…”
    आभा फक्त ऐकत होती.. काय बोलावं तिला काही कळत नव्हते. गाडीतून उतरताना इतकंच म्हणाली, “मनिष, तुझ्यामुळे जे क्षण मी खूप मनापासून एॅंजाॅय केले ते विसरणे अशक्य आहे..मी सुजय आणि माझ्या नात्यात यावरून दुरावा होऊ नये म्हणून नक्कीच प्रयत्न करेन पण तुझी आठवण मात्र कायम मनात असेल माझ्या…मला तू आवडतो पण प्रेम म्हणशील तर माझं प्रेम सुजय वर आहे रे…आपलं काय नातं आहे नाही माहीत मला..पण सुजय माझं पहिलं प्रेम आहे.. ”
    मनिष हसत भावनांना आवरत म्हणाला, ” मला माहित आहे आभा, तू सुजय वर खूप प्रेम करते..आपल्या गप्पांमध्ये तोच तर असायचा नेहमी..किती सांगायची तू मला त्याच्या विषयी.. माझं तुझ्यावर मात्र खरं प्रेम आहे पण मला तुला कुठल्याही बंधनात अडकवायचे नाही.. म्हणून तर हा निर्णय घेतला आहे मी..”
    आभा डोळे पाणावून, “चल मी निघते..बाय.. काळजी घे..”
    दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

    आभा घरी आली तर सुजय आधीच हजर होता.
    सुजय दोन दिवसांपूर्वी आठवडाभरासाठी दुसऱ्या शहरात गेला होता पण काम लवकर संपल्याने तो लगेच परतला.
    आभा त्याला बघताच गोंधळलेल्या अवस्थेत विचारू लागली “सुजय तू….तू तर आठवडाभरासाठी गेलेला..कधी आलास.. फोन का नाही केलास..कळवायचं तरी येतोय म्हणून..”
    सुजय आभाला शांत करत, “अगं हो.. शांत हो… माझं काम लवकर संपलं म्हंटलं चला‌ तुला सरप्राइज देऊ तर तू घरी नव्हतीस..किती उशीर केलास घरी यायला.. फोनही लागत नव्हता तुझा..”
    आभा जरा अडखळत बोलली, ” हा.. अरे मैत्रिणी कडे गेलेले.. उशीर झाला यायला..फोन बहुतेक बॅटरी संपली असेल..कळालेच नाही मला..”
    सुजय -” बरं असो, तू जेवण करून आलीस का.. मी पार्सल मागवलं होतं दोघांसाठी पण तुझी वाट बघून खाऊन घेतलं मी..”
    आभा – “हो मी जेवण करून आले..चल फ्रेश होऊन येते..तू पण थकला असशील ना..आराम कर..”
    आभाच वागणं सुजय ला जरा विचित्र वाटलं पण बाहेरून आली शिवाय उशीर झाल्याने थकली असेल म्हणून त्याने जास्त खोलात जाऊन काही विचारले नाही.

    दुसऱ्या दिवशी सकाळी आभा आंघोळीला गेली, तितक्यात आभाच्या फोनवर मनिष चा मेसेज आला आणि तो सुजय ने बघितला, तो विचार करू लागला
    “आभा आपल्याला फसवत आहे, काल रात्री ही‌ मैत्रिणी कडे गेली नसून मनिष सोबत होती. मग मला खोटं का सांगितलं आभा नी”
    आभा आंघोळ करून बाहेर येताच सुजय ने तिला मनिष विषयी आणि त्याच्या अशा‌ मेसेज विषयी जाब विचारला.

    दोघांनीही बराच वेळ यावर चर्चा, वाद , राग संताप व्यक्त केला. आभा ने तिची चूक मान्य केली, माफी मागितली, एक संधी दे म्हणत विनवणी केली पण सुजय मनोमन खूप दुखावला होता. आभा अशा प्रकारे आपल्याला धोका देऊ शकते यावर त्याला विश्वास बसत नव्हता.

    “कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही ” हे वाक्य सुजय ला खूप त्रास देत होते.
    आभाने रडत रडत सुजय ला घडलेली सगळी हकीकत सांगितली. पण एकदा विश्वासात तुटल्याने आता सुजयला तिचा विश्वास बसत नव्हता.

    ” मनिष आणि मी आज शेवटचं भेटलो…आम्हाला कळालं आहे आमच्या नात्याला काही अर्थ नाही..तो आता शहर सोडून जाणार आहे..मी खरंच अपराधी आहे सुजय तुझी.. भावनेच्या भरात नकळत त्याच्यात गुंतले पण आकर्षक होतं ते..माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर…मला एक संधी दे..”

    आभाच्या या बोलण्यावर कसाबसा विश्वास ठेवून तिच्या वरच्या प्रेमापोटी सुजयने तिला एक संधी दिली, पण दोघांच्या नात्यात एक दुरावा मात्र होताच.. एकत्र संसार करत असले तरी एकदा गमावलेला विश्वास आता परत येणं शक्य नव्हतं. आभा सुजय चा विश्वास परत मिळविण्याच्या सतत प्रयत्न करत होती, तोही तिला सुखी ठेवण्यासाठी धडपड करत होताच. पण त्या नात्यात आता पूर्वीसारखा गोडवा कायम नव्हता… एकत्र आनंदी दिसत असले तरी आभाच्या मनात अपराधी भावना तर सुजयच्या मनात एक अविश्वास होता, हि भावना बदलणे आता खरंच अवघड झाले होते.
    अशाच भावना मनात दडवून दोघे संसार करत होते.

    खरंच , नवरा बायको यांच्यातलं नातं हे प्रेम, विश्वास यावरच टिकून असतं. एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यातला गोडवा कमी होत जातोच पण सोबतच जी अविश्वसाची भिंत दोघांमध्ये निर्माण होते ती क्वचितच दूर होते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अनोळखी नातं..

    रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू खूश आहे हे ऐकून छान वाटले एवढंच तो बोलला. रीयाला त्याच्या बोलण्यात आज खूप फरक जाणवला. रीयाने विचारले, ‘”काय झालं अमेय, तू आज इतका शांत कसा , नेहमी तर माझी खिल्ली उडवत असतोस. मी किती अल्लड आहे हे मला पटवून देत असतोस, आज मी इतकी छान बातमी सांगितली पण तू मात्र आनंदी नाही असं वाटत आहे मला. सांग ना काय झाले, तू माझ्यासाठी खूश आहेस ना”.

    “रीया अगं मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, तुला हवा तसा जोडीदार तुला मिळाला हे ऐकून खरंच छान वाटले मला. तुझं जय बद्दलच वर्णन ऐकून तू आता अल्लड नसून मॅच्युअर झाली आहे हे मला जाणवलं. पण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता माझ्यासोबत जास्त बोलू शकणार नाही, माझे चांगले वाईट अनुभव, माझी प्रेमप्रकरणं आता मी कुणाजवळ सांगणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाची खिल्ली उडवणार मी म्हणून जरा उदास झालो एवढंच.” अमेय बोलला.

    अमेयचं उत्तर ऐकून रीयाला काय बोलावे कळत नव्हते, काही क्षण शांतता पसरली. एकीकडे आनंद तर एकीकडे मैत्री आता जरा कमी होणार म्हणून उदासीनता अशी दोघांची मनस्थिती झाली.

    आपली मैत्री अशीच राहणार असं म्हणत रीयाने शांतता दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अमेय तिला समजूत सांगत म्हणाला “रीया अगं तुझ्या आयुष्यात आता एक स्पेशल व्यक्ती आहे तो म्हणजे जय, तुझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पूर्ण आयुष्य तुम्ही एकत्र घालवणार आहे, आपल्या दोघांना माहित आहे की आपण खूप छान मित्र आहोत पण सगळ्यांना अशी मैत्री पटेल असं नाही. मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही, जय आणि तू हे दिवस खूप एंजॉय करा. आपल्या मैत्रीमुळे त्याला उगाच काही गैरसमज नको. अधूनमधून आपण बोलायला हरकत नाही पण नको तू छान वेळ दे त्याला, समजून घे जय ला आणि हो कधीही माझी आठवण आली, काहीही मदत लागली तर बिंदास सांग मला.” अमेयचं हे बोलणे ऐकून रियाने हो..चालेल.. बाय.. टेक केअर म्हणत फोन ठेवला.

    रीया आणि अमेय शाळेपासून चांगले मित्र मैत्रीण. अमेय अतिशय बिंदास मनमोकळ्या स्वभावाचा, बडबडा, नेहमी हसत खेळत, कॉमेडी मूड मध्ये असणारा पण सगळ्यांना मदत करायला तयार. रीया अगदी अल्लड, शांत, साधी भोळी मुलगी. रीयाला मित्र मैत्रीणी मोजकेच होते पण त्यात अमेय तिचा चांगला मित्र होता. त्याची सगळी प्रकरणं, मज्जा मस्ती तो तिला सांगायचा. रीया किती साधी भोळी आहे, तिला कुणी किती सहज फसवू शकतं ही जाणीव तिला करून द्यायचा. अमेयची गर्लफ्रेंड उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशी गेलेली त्यामुळे त्यांचं फार काही बोलून होत नसे पण तिची आणि अमेयची लव स्टोरी, त्यांची भांडणं, सरप्राइज अशे चांगले वाईट अनुभव तो रिया जवळ शेअर करायचा. रीया अमेय मुळ माणसं ओळखायला शिकली होती, कुठल्याही परिस्थितीत आनंदी कशे राहायचे हे तिला अमेय मुळे कळाले होते. इतके चांगले मित्र मैत्रीण असून एकमेकांचा आदर त्यांना होता, पवित्र अशी त्यांची मैत्री होती.

    फोन ठेवल्यानंतर रीया विचार करू लागली की मुलगा मुलगी ह्यांच्यात मैत्रीचं नातं नसू शकते का. लग्न होणार म्हणून अशी मैत्री अचानक कमी, का तर उगाच नवर्‍याला गैरसमज नको, तिला जरा विचित्र वाटले. आता आधी सारखा वेळ मित्र मैत्रीणी सोबत घालवता येणार नाही हे मान्य कारण आता नवं आयुष्य सुरु होणार, प्रायोरिटी बदलणार पण नविन आयुष्यात अशा मैत्रीमुळे गैरसमज नको हे तिला काही पटत नव्हते. ज्या पवित्र मैत्रीमुळे ती खरं जीवन जगायला शिकली, माणूस ओळखायला शिकली, कुणी आपली सहज फसवणूक करू शकते पण अमेय मुळे असं काही झालं नाही, बर्‍याच नविन गोष्टी अमेय मुळे आपल्याला कळायला लागल्या हे ती कधीच विसरू शकत नव्हती. असं हे नातं अनोळखी का आहे याचे उत्तर मात्र तिला मिळत नव्हते.

    तुमच्या मते या अनोळखी नात्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट मध्ये लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • संसाराचा गाडा सुरळीत चालवायला दोघांचीही गरज..

    नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नविन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असल्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असले तर होणारा तो आनंद. जीवनातील सुंदर अनुभव असतो तो.

    तेव्हा सगळं अगदी गोडगोड असतं. सुरुवातीच्या काही वर्षांत सगळं छान छानच असते.

    हळूहळू जबाबदारी दिसू लागते. एकमेकांच्या सवयी आवडेलच याची खात्री नसते, मग सुरू होते तू तू मी मी पण तरीही तू आणि मी. एकमेकांकडून नकळत अपेक्षा वाढतात, पूर्ण होत नसेल तर चिडचिड होते. पण प्रेम मात्र कमी होत नसते. दोघांच्या भांडणात, रुसवा फुगवा दूर करण्यात एक मज्जाच असते.

    भांडण झाले की समजूत काढायची जबाबदारी त्याचीच असते. हळूहळू मुलांच्या येण्याने एक वेगळाच आनंद, प्रेम दोघांमध्ये असतं. मुलांचे संगोपन करण्यात, घर, नोकरी सांभाळण्यात ती खूप थकून जाते पण तिचे कष्ट बघून त्याने प्रेमाने मिठी मारली की ती सगळं विसरून जाते. आई म्हणून संस्कार, मुलांची देखरेख ती करत असेल तरी त्यांच्या भविष्याची काळजी त्याला असतेच. त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, घरखर्च, बायको मुलांची हौसमौज करत तो सगळा गाडा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. दोघांनी एकमेकांना ‌समजून घेणं, प्रेम, विश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. खुप गोड असं हे दोघांचं नातं असतं. या सगळ्यात दोघांचं नातं घट्ट होत जातं, प्रेम वाढतच असतं. दोघांनीही एकमेकांची खुप सवय झाली असते. दोघांचे एक सुंदर नाते निर्माण झालेले असते.

    त्याच्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय तो अपूर्णच असतात. दोघांनीही समजून घेवुन विश्र्वासानं हे नाजूक जन्मभराचं नातं जपण्याची गरज असते. जसजसे वय वाढत जाते, मुले मोठी होतात तसतशी एकमेकांची जास्त गरज भासू लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालवायला खरंच दोघांचीही गरज असते.

    अश्विनी कपाळे गोळे