Category: Social issues

  • अशीही एक सावित्री…

    “मॅडम, इधर क्या करने आयी है..अच्छे घर की लग रही..ये रेड लाइट एरिया है..पता है ना..”
    एक लाल भडक लिपस्टिक लावलेली , जरा विचित्र पोझ देत उभी असलेली, तोडके कपडे घातलेली एक चाळीशीतली स्त्री सविता कडे बघत बोलली.
    सविता तिच्या कडे किळसवाण्या नजरेने बघत इच्छा नसताना उत्तरली, “अहो बाई, माझा नवरा शाम, सारखा इकडे येतो असं कळालं त्यांच्या मित्रांकडून. दोन दिवस झाले घरी परतला नाही म्हणून शोधायला आली..हा बघा हा फोटो, तुम्ही बघितला का ह्याला इकडे..”
    “लैला नाम है मेरा..बाई मत बोल..धंदे का टाइम है..निकल यहाँ से नहीं तो तुझे भी लेके जायगा कोई..” फोटो कडे दुर्लक्ष करत लैला सविता ला जायला सांगत होती.
    “बरं लैला, एकदा बघ ना हा फोटो, ह्याला पाहिलं का इकडे तेवढं सांग मग मी निघते लगेच.. खूप काळजी वाटत आहे गंं..”
    “दिखा तो कोण है ये तेरा शाम..” फोटो बघत लैला म्हणाली.
    सविताने तिला फोटो दाखवला आणि आजुबाजूला कटाक्ष टाकला तर लैला सारख्या अनेक स्त्रिया तिथे खोल गळ्याचे कपडे घालून , भडक मेकअप करून विचित्र पणे इशारे करत गिर्‍हाईक शोधत होत्या. एकंदरीत परिस्थिती पाहता सविता ला भिती वाटत होती, तितक्यात लैला म्हणाली,
    “ये तेरा मर्द है..इसको तो कल अस्पताल पहुचाके आये हमारे शेठ..हरामी ने बहोत दंगा किया इधर.. बहुत मार पडा इसको कल..रेश्मा के पास आता था हमेशा.. बहुत पैसा लुटाया न रेश्मा पे इसने.. शराब के नशे मे डूब पडा था तब रेश्मा के पास दुसरा गिर्‍हाइक आया..इसने रेश्मा को दुसरे के साथ देखा तो गुस्सा होकर रेश्मा पे हाथ उठा रहा था.. जैसे के इसने खरिद लिया रेश्मा को..दंगा किया बहुत..सबने इसको बहुत मार पिटा..मर जायगा ओर हम पे आयेगा कर के शेठ अस्पताल पहुचाके आये इसको..”
    सविता ते ऐकताच हादरली, घाबरून शब्द बाहेर पडत नव्हता तिच्या तोंडातून. अडखळत म्हणाली, “कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे…”
    लैला जरा चिडून ,”इतना बताया ना अब निकल..धंदे का टाइम है बोला ना.. बाकी का नहीं पता मेरेको..”
    तितक्यात एक जण आला आणि लैला त्याला घेऊन एका लाकडी जिन्यातून आत निघून गेली.

    सगळं ऐकून सविता रडकुंडीला आली होती, कुणाला विचारावं, काय करावं काही कळत नव्हतं तिला. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करावी म्हणून तिथून निघाली. जाताना एक दोघांनी मुद्दाम धक्का देत ‘आती क्या मेरे साथ’ म्हंटल्यावर तिला अक्षरशः किळस वाटली. धावपळ करत त्या गल्लीतून बाहेर पडली. डोक्यावर रखरखतं उन्ह होतं, घरी पोरांना सोडून नवर्‍याच्या शोधात ती इथपर्यंत आली होती.
    काय पाप केलं म्हणून हा दिवस नशिबात आला आज असा विचार करत ती चालत होती. तितक्यात सविताचा फोन वाजला. शामच्या मित्राचा फोन होता, “वहिनी, शाम हॉस्पिटलमध्ये दाखल आहे…मला तिथल्या नर्स ने फोन करून कळवलं..मी पत्ता पाठवतो तुम्ही या तिकडे..मी पण येतोच..”
    सविताने रिक्षा पकडली आणि हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचली. चौकशी करून शाम जवळ आली, शामचा मित्र बंडूही सोबतीला आला होताच. शामच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या, डोक्याला ड्रेसिंग केलेलं होतं, मळकट कपडे, अंगावर मारल्याचे व्रण, पट्टी बघून सविताला राग करावा की कीव करून रडावे कळत नव्हते. एकही शब्द न बोलता ती त्याच्याकडे बघत होती. शाम मात्र औषधे घेऊन झोपी गेला होता. नर्स कडून कळाले की जास्त मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत कुणी तरी आणलेलं, जरा शुद्धीवर आल्यावर बंडूचा नंबर दिला त्याने आणि आम्ही त्यांना कळवले म्हणून.
    सविता बाजुला एका बेंचवर बसून शाम जागा होण्याची वाट बघत होती. डोळ्यातून अश्रु वाहून नकळत ओठांवर येऊन टेकत होते. डोक्यात अनेक विचारांचे थैमान उडत होते.
    सविता आणि शामच्या लग्नाला बारा वर्षे झालेली. शामचे हार्डवेअर चे दुकान होते, बर्‍यापैकी कमाई असायची. सविता शिवणकाम करून संसाराला हातभार लावायची.
    दोघ राजा राणी आणि दोन मुले असं सुखी कुटुंब होतं ते. कसा कुणास ठाऊक पण शामला दारूचे व्यसन लागले मग उशीरा घरी येणे, भांडणे अशे प्रकार सुरू झाले. मुलेही लहान, त्यांच्यासमोर उगाच तमाशा नको म्हणून सविताने त्याची खूपदा समजुत काढली. त्यानेही परत असं करणार नाही म्हणत वेळ मारली पण एक दिवस जे सविताला कळाल त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली.
    शाम दुकान बंद करून बरेचदा रेश्मा कडे शरीरसुखासाठी जाऊ लागला. दारूची सवय ही कमी होत नव्हतीच. उशीरा घरी यायचा तेव्हा मुलं झोपलेली, अशावेळी त्याला बोलण्यात अर्थ नाही म्हणून मुलं शाळेत असताना जिवांचा आकांत करत सविता त्याला जाब विचारायची, म्हणायची, “काय चुकलं रे माझं, कुठे कमी पडले मी तुला समजुन घेण्यात..का जातोस त्या सटवीकडे…”
    शाम मात्र काही झालं की हात उगारून तिला गप्प करत निघून जायचा आणि म्हणायचा , “मी काही करेन..तू मध्ये पडू नकोस..वीट आला तुझा, तुझ्या कटकटीचा..”
    सविताला खूपदा वाटायचे सोडून द्यावं सगळं पण मुलांकडे बघून ती शांत बसायची, ते म्हणतात ना कुठल्याही स्त्रिला आपला नवरा दारू पिऊन पडला तरी चालतं पण दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला मुळीच सहन होत नाही. सविताचेही असेच झाले.
    ती स्वतः ची चूक शोधत रडायची, मनातल्या मनात कुढत बसायची. मुलांसाठी संसारासाठी धडपड मात्र सुरू असायची तिची.
    गेले तीन वर्षे ती असंच आयुष्य ती जगत होती. आज तर हद्दच झाली होती.

    काही वेळाने शाम जागा झाला आणि समोर सविताला बघून जरा बिचकला. तिच्या डोळ्यात एक प्रकारची घृणा त्याला दिसली. नजर लपवत अपराधी भावनेने तो इकडे तिकडे बघत होता. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली, परत एकदा तपासणी करून घरी जाण्याची परवानगी दिली. बंड्याने औषधे आणून दिली आणि त्याच्या दुचाकीवर तो निघाला.
    सोबतच शाम आणि सविता रिक्षातून घरी यायला  निघाले. वाटेत शाम गप्प गप्पच होता.
    दोघेही घरी पोहोचलो तसेच दोन्ही मुलांनी आईला मिठी मारली आणि म्हणाले, “आई, किती वेळ वाट बघत होतो आम्ही..कुठे होतीस तू..”
    दोन्ही मुले आपल्याकडे दुर्लक्ष करत आईसोबत बोलताना बघून शामला अजूनच अपराधी वाटले. त्यांचीही काय चूक, बाबांचं प्रेम अनुभवायला बाबांना वेळच कुठे होता.
    सायंकाळ होत आली होती. सविताने स्वयंपाक करून जेवायला घेतले. काही न बोलता शामचे औषधे आणि ताट शाम समोर आणून दिले. तोही मुकाट्याने जेवला, औषधे घेऊन झोपी गेला.
    दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून सविता तयार झाली. मुलांसाठी, शामसाठी नाश्ता चहा  बनवून स्वतः कपाटातील जरीकाठी साडी नेसून तयार झाली. पुजेचं ताट तयार करतच होती तितक्यात शेजारच्या सुनंदाने आवाज दिला. हो आलेच गं म्हणत पटकन आवरून ती मुलांना म्हणाली, ” मी आलेच रे वडाची पूजा करून..नाश्ता करून घ्या दोघेही.. बाहेर जाऊ नका मी येत पर्यंत..”
    ते ऐकताच शाम च्या मनात विचार आला, आपल्यामुळे इतका त्रास सहन करूनही सविता वटपौर्णिमेचं व्रत करून सात जन्मासाठी देवाकडे आपल्यालाच मागत असणार का….

    तुम्हाला काय वाटतं सविता शाम सारखा पती  जन्मोजन्मी मिळावा म्हणून सविता वडाची पूजा करायला गेली असेल का ?

    हो..अशा अनेक सविता आहेत आपल्या आजूबाजूला. ज्यांना पती कितीही त्रास देत असेल, दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला असेल, तिच्याशी प्रेमाने वागत नसेल, मारपीट, शिवीगाळ करत असेल तरीही ती वटपौर्णिमा मात्र साजरी करतेच, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना सुद्धा करते.

    शाम वेश्येच्या मागे लागला पण दोन दिवस घरी आला नाही म्हणून सविताने जीवाची पर्वा न करता त्याचा शोध घेतला, रेड लाइट एरिया मध्ये जाऊन काही शोध लागतो का बघितले. पोलिसांकडे गेली तर नवराच दोषी असा विचार करून त्याला स्वतः शोधून काढले. त्याच्या औषध पाण्याकडे लक्ष देत काळजी घेतली. अशाही काही सावित्री आजही आहेत.

    अन्याय सहन करणे योग्य नाहीच, अन्यायाविरुद्ध आवाज आ उठवलाच पाहिजे पण काही भगिनी सविता सारख्या सुद्धा आहेच.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

    मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”

    मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.

    मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता

    घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”

    रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी,  बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”

    मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”

    रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”

    मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
    मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”

    मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.

    रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
    मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
    लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
    अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
    सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
    रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
    एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
    एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
    तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
    महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
    महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
    तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
    मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
    दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
    आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
    मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.

    मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.

    फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
    त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.

    अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

    तिला काही सांगायचंय..
    हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
    लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
    आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
    एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
    घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
    असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
    खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
    संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
    ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
    कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
    राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
    आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
    आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
    तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
    मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
    खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
    प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

    प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
    कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
    कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

    आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

    रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.
    कोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.
    शरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहायचे. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.
    पुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”
    वयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.
    अचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.
    रखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.
    उसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.
    अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.
    सतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.
    दोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.
    मुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.

    अशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.

    हे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.
    आई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.
    कष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.
    कुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

    मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

    ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
    ( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
    रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
    रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
    राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
    रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
    दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
    त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
    एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
    राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
    दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
    “राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
    “रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
    “राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
    “रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
    “राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
    दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
    रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
    हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
    “राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
    राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
    “राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
    इतकं बोलून रश्मी निघून गेली.
    तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
    तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
    रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
    रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
    कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
    इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

    आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
    राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

    सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
    सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

    त्यावर तो निशब्द झाला.
    आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

    वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

    राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
    रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

    आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

    राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

    समाप्त..!!

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही.
    अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

    https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी… भाग १

    नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
    राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
    नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
    तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
    त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
    राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
    दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

    हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

    पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

    “व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

    “हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

    सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
    राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

    तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

    (महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

    “बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
    नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

    राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

    ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

    राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

    पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

    राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

    लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

    क्रमशः

    पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पाणी मिळेल का पाणी..

    रवी नामक एक‌ गृहस्थ दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याश्या हॉटेलवर थांबून हॉटेल वाल्याशी संवाद साधत होता.

    “दादा, जरा पाणी मिळेल का प्यायला..”

    हॉटेल वाला – “हो मिळेल ना, किती पाहिजे.. अर्धा ग्लास ५ रूपये,  एक ग्लास १० रूपये..पाणी बॉटल ४० रूपये..”

    “अहो, मी पाणी मागतोय, कोल्ड ड्रिंक्स किंवा चहा कॉफी नाही…पाण्याची इतकी किंमत… ”

    “दादा, अहो किंमत तर करावीच लागेल ना‌ पाण्याची… सगळीकडे दुष्काळ पडला आहे बघा… दूर दूर वरून आम्ही पाणी‌ आणतो…या कडक उन्हात पाणीच मिळत नाही जवळपास… १०-१० किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं..तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा, नाश्ता आहे आमच्याकडे तयार…पाणी फ्री बरं का‌ नाश्ता केला तर…”

    “दे बाबा एक प्लेट समोसा, ग्लासभर तरी पाणी मिळणार ना फ्री त्याच्यासोबत..घशात कोरड पडली रे…”

    रवी समोसा खाऊन पाणी प्यायला आणि परतीच्या वाटेला निघाला.
    वाटेत तो विचार करू लागला “हॉटेल वाला जे बोलला, त्यात खरंच तथ्य आहे..किती पाणीटंचाई आहे काही ठिकाणी..दूर दूर पर्यंत पाण्यासाठी भटकावे लागते, आंघोळ तर लांबच पण पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही.. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे…सहज उपलब्ध होते म्हणून आपल्याला पाण्याची किंमत नाही.. मिळतंय म्हणून आपण पाणी किती वाया घालवतो.. ज्याला टंचाई माहीत आहे, त्यालाच पाण्याची किंमत कळते.. पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आता अनुभवलेली परिस्थिती काही वर्षांनी सर्वत्र दिसेल… कोल्ड ड्रिंक्स सारखे पाणी सुद्धा किंमत मोजून विकत घ्यावे लागेल…आताही ते मिळतेच पण ते फिल्टर केलेले… साधं पाणी पाणपोई किंवा इतर ठिकाणी उपलब्ध तरी होते…”

    खरंच विचार करण्याजोगे आहे, नाही का?

    मनुष्य पाणी विकत तरी घेईल पण पशू पक्ष्यांचे काय ?
    कडक रखरखत्या उन्हात एक वेळ जेवण नाही मिळाले तर चालेल पण पाणी मात्र गरजेचे आहे , मग तो मनुष्य असो वा पशू पक्षी..
    वेळीच काळजी घेतली नाही तर दुष्काळग्रस्त भागात जसं दूरदूरपर्यंत चालत जाऊन पाणी आणावं लागतं तशी परिस्थिती सर्वत्र दिसायला वेळ लागणार नाही.

    आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून वाया न घालवता काटकसरीने वापरले तर खरंच फायद्याचे आहे. घराबाहेर, आजुबाजूला प्राणी पक्षी यांच्यासाठी पाणी ठेवले तर त्यांना पाण्याविना तडफडत मरणाची वेळ येणार नाही.
    दरवर्षी किती तरी जीव पाण्याविना आपला जीव गमावतात, मग ते पशू पक्षी असो किंवा मनुष्य..

    तेव्हा वेळीच काळजी घ्या. प्रत्येकाने पाणी जपून वापरण्याचे मनावर घेतले तर किती पाणी वाचू शकते विचार करा?

    भविष्यासाठी एक पाऊल पुढे उचलून वेळीच काळजी घेतली नाही तर पुढच्या काही वर्षांत आपल्याला ही म्हणावं लागेल “पाणी मिळेल का पाणी…”

    प्रत्येक चांगल्या गोष्टींची सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे म्हणतात ना, चला तर मग पाणी जपून वापरण्याच्या , पशू पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा.
    ज्यांनी हा प्रयत्न आधीच सुरू केलाय त्यांचं खरंच कौतुक ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • बहुपती विवाह- एक प्रथा

    विज्ञान युगात अजूनही आपल्या देशात अनेक प्रथा जिवंत आहेत त्यातलीच एक म्हणजे “बहुपती विवाह”.एका पुरूषाला अनेक पत्नी आहेत असं बरेचदा ऐकलं पण आजच्या काळात एका मुलीचा विवाह अनेक पुरूषांसोबत एकाच वेळी केला जातो हे क्वचितच ऐकायला मिळते.

    हो, ही सत्य परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर मधली. भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या किन्नौर गावात एकाच मुलीचा विवाह कुटुंबातील सर्व सख्ख्या भावासोबत केला जातो, अशी प्रथा तिथे अजूनही आहे. किन्नौर मधल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की अज्ञातवासात पांडवांनी त्याच ठिकाणी वास केला होता आणि म्हणून अजूनही तिथे बहुपती विवाह ही प्रथा सुरू आहे.

    या ठिकाणी सगळे सदस्य एकाच घरात राहतात शिवाय बहुपती मधील एखाद्याचे निधन झाले तरी पत्नी दु:खी राहत नाही.

    किन्नौर मध्ये खूप वाईट प्रकारे ही प्रथा पाळली जाते.

    घरातील कुठल्या पुरूषाला वाईट वाटू नये म्हणून दारू आणि तंबाखूचे सेवन जेवणासोबत केले जाते.

    आश्चर्य म्हणजे या परीसरात घराची मुख्य ही स्त्री असते. घराचा ताबा तिच्या हातात असतो.

    एक‌ पती पत्नीसोबत यौन संबंध साधत असेल तर तो त्याची टोपी दारावर अडकवून ठेवतो. ती टोपी बघून बाकी पतींना कळते की काय सुरू आहे आणि त्यात मान मर्यादा इतकी असते की बाकी कुणीही त्या ठिकाणी टोपी असेपर्यंत जात नाही.

    जेव्हा पत्नीला कुठल्या गोष्टीच दु:ख होत असेल तर ती गाणी गाते.

    हे सगळं ऐकून विचित्र वाटत असेल तरी ही प्रथा अजूनही जिवंत आहे.

    असं ऐकल्यावर प्रश्न पडतो की या सगळ्यात प्रेम, स्त्रीचा आदर, स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. स्त्री असो किंवा पुरुष पण त्यांच्या भावना, परस्परांमधील प्रेम, आदर या गोष्टीचा आनंद त्यांना माहीतच नाही कारण वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा त्यापेक्षा महत्वाची मानली जाते.

    सध्या परीस्थिती खूप बदलत आहे मात्र देशाच्या बर्‍याच भागात बालविवाह, बहुपती विवाह सारख्या अनेक प्रथा अजूनही सुरू आहेत. अशा प्रकारच्या प्रथा हळूहळू बंद झाल्या तर आपला देश खर्‍या अर्थाने विकसित झाला असं म्हणायला हरकत नाही. याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

    असेच वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचन्यासाठी मला फॉलो करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सात मुली नंतर आठवा मुलगा झाला…

    आजच्या विज्ञान युगात आठ वेळा बाळंतपण, ऐकूनच धक्का बसतो ना…कामवाल्या मावशी अतिशय आनंदाने सांगत होत्या की माझ्या बहिणीला वारीस जन्माला आला, सात मुली नंतर आठवा मुलगा झाला.

    ते ऐकून आश्चर्यने त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. आजच्या काळात आठ वेळा बाळंतपण. त्या मात्र अतिशय आनंदात होत्या.

    जरा वेळ विचारात गुंतून भानावर आले आणि त्यांना म्हणाले “मावशी, अहो मुलगा असो की मुलगी आजकाल इतका भेद नाही राहीला. मुलगा व्हावा म्हणून इतके वेळा बाळंतीण झालेल्या बाईची काय अवस्था झाली असेल शिवाय त्यांच्या हातात नाही ना मुलगाच व्हावा ते.”

    त्यावर मावशी म्हणतात ” ताई तुम्ही सुशिक्षित, शहरात राहता म्हणून तुम्हाला तसं वाटतं. गावाकडे असं न्हाय, वारीस नसला‌ की बाईच्या जातीला लय टोमणे मारतात बघा. त्यासाठी बहीणीनं नवस केला, तेव्हा मुलगा झाला. सगळ्यात मोठ्या मुलीचं अनं आईचं बाळंतपण एकाच वेळी पाठोपाठ झालं बघा. लेकीला मुलगा झाल्यावर आईला आठवड्यानंतर मुलगा झाला. भाच्याच्या पायगुणानं मामा जन्माला आला बघा ”

    मावशीचे उत्तर ऐकून धक्काच बसला, चक्कर येणेच बाकी राहिले. अजूनही अशे विचार, अशी परिस्थिती आजुबाजुला आहे हा विचार कधी केला नव्हता. त्यात सगळ्यात मोठ्या मुलीचं आणि आईचं बाळंतपण एकाच वेळी हे ऐकून तर आश्चर्याने ताणलेल्या भुवया पूर्वस्थितीत यायला बराच वेळ लागला. मावशी सगळं सहजरीत्या आनंदात सांगून गेल्या. मी मात्र अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातच होते.

    आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे, मग मुलगा असो वा मुलगी. या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असताना मुलगाच व्हावा म्हणून बाईच्या जीवाचा, तिच्या वेदनेचा विचार न ‌करता तिला मुलगी झाली म्हणून मानसिक छळ कितपत योग्य आहे. मुलगा नाही म्हणून टोमणे ऐकायचे पण ते खरंच तिच्या हातात आहे का. आठ वेळा बाळंतपण झाल्यावर तिची शारीरिक अवस्था काय झाली असेल. केवळ समाजात टोमणे नको, मुलगा होत नाही म्हणून नवरा सोडून देयील या भितीने हे सगळं सहन करणे हाच यावर उपाय आहे का.

    ग्रामिण भागात अजूनही अशे विचार जिवंत आहेत. अजूनही मुलगा होत नाही म्हणून सासरी छळ, नवर्‍याने सोडून दिले असले प्रकार सुरू आहेत. ही परिस्थिती खरंच बदलायला हवी. यासाठी स्त्रीनेच पाऊल उचलायला हवे, खंबीर व्हायला हवे. अशा परिस्थितीतून गेलेल्या आईने मुलीलाही अशाच विचारांचे घडवले, अन्याय सहन करत राहिले तर ही परिस्थिती बदलणे खरंच खूप कठीण आहे.

    अश्विनी कपाळे गोळे

  • निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..

    समिधा आणि अजय, कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. समिधा देखणी, अतिशय उत्साही, मेहनती आणि मनमिळावू मुलगी. कुणालाही काही अडचण असो, ती मदतीला तत्पर असायची, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. अजयला तिचा हाच गुण खूप आवडायचा. अजय म्हणजे शांत, संकोची स्वभावाचा आणि हुशार मुलगा. समिधा त्याला सुरवाती‌ पासूनच खूप आवडायची पण तिला अचानक प्रेमाची कबुली दिली तर ती ते स्विकारेल की नाही या भितीने तो काही बोलला नाही. दोघांची चांगली मैत्री होती पण समिधाच्या मनमिळावू स्वभावामुळे तिचे बरेच मित्र मैत्रिणी होते. अजयला मात्र समिधा जवळची मैत्रीण, बाकी काही मोजकेच मित्र. कॉलेज संपत आले तेव्हा शेवटच्या दिवसात मोठी हिम्मत करून अजयने समिधाला प्रपोज केले, तिने त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही, अजय जरा नाराज झाला. पण कॉलेज नंतर योगायोगाने नोकरीसाठी दोघेही एकाच शहरात आले, परत त्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अजय समिधाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, समिधा लाही आता अजय आवडायला लागला, अजयने परत एकदा तिला विचारले असता तिने लगेच होकार दिला. समिधाच्या घरी मात्र तिच्यासाठी स्थळ बघण्याची तयारी सुरू झाली, समिधाने घरी अजय विषयी सांगितले पण आंतरजातीय प्रेमविवाह तिच्या वडीलांना मान्य नव्हता. तिने खूप समजविण्याचा‌ प्रयत्न केला पण घरी ते मान्य नव्हते. इकडे अजयच्या घरीही तिचं परिस्थिती. अशा परिस्थितीत अजय काही निर्णय घेत नव्हता पण समिधाला इतकंच म्हणायचा की “तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, काही झालं तरी लग्न तुझ्याशीच करणार.” समिधाचीही तिचं मनस्थिती होती. कितीतरी महीने झाले पण दोघांच्याही घरचे त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. शेवटी समिधा आणि अजयने कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. मित्र मैत्रिणींच्या मदतीने सगळी तयारी झाली. तारीख, वेळ निश्चित करण्यात आली,  समिधा ठरल्याप्रमाणे मैत्रिणी सोबत रजिस्ट्रेशन ऑफिसला आली पण अजय काही आला नाही, त्याचा फोनही लागत नव्हता, किती वेळ त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचा मॅसेज आला, “घरच्यांना धोक्यात ठेवून मी लग्न करू शकत नाही. तू मला विसरून जा. त्यातच आपलं भलं आहे.”
    त्याचा असा मॅसेज वाचून समिधा हादरली, आई वडिलांचा विरोध पत्करून त्याच्या प्रेमापोटी सगळं सोडून ती आली होती आणि अजयने मात्र तिचा विश्वासघात केला. समिधाचे आई वडील राहायचे त्या गावात अशी बदनामी झाली की समिधाने पळून जाऊन दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले.
    झाल्या प्रकाराने समिधाच्या वडिलांना धक्का बसला, यापुढे आमच्याशी तुझ्याशी काही संबंध नाही असे बोलून त्यांनी तिला कायमचे पोरके केले. समिधा मुळे आपल्याला मान खाली घालायची वेळ आली, तिच्यामुळे गावात अपमान झाला तेव्हा आता तिला आता माफी नाही अशी तिच्या वडिलांची भूमिका झाली होती. समिधा पूर्ण पणे एकटी पडली होती. मित्र मैत्रिणींकडून कळाले की घरच्यांच्या दबावाखाली येऊन अजयने असा निर्णय घेतला, पण मग समिधाच्या प्रेमाचं काय, तिचा विश्वासघात केला त्याच काय..अशे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.
    माहेरी स्थान नाही आणि प्रेमाने पाठ फिरवली अशा परिस्थितीत स्वतः ला सावरणे तिच्या साठी कठीण झाले होते. ती सतत शक्य त्या मार्गाने अजय सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती पण काही फायदा नव्हता, इकडे आई वडिलही तिच्याशी बोलायला, तिची अवस्था समजून घ्यायला तयार नव्हते. अशात ऑफिसमध्ये सुद्धा तिचं मन लागत नव्हतं, किती तरी दिवस ती एकटीच घरात रडत बसून राहिली. झाल्या प्रकारामुळे समिधा खचून गेली होती, सतत एकच विचार तिच्या मनात येत होता, “अजयवर इतका विश्वास न ठेवता आई वडिलांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”
    या सगळ्याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला, तिने स्वतःला दोष देत आत्महत्येचा प्रयत्न केला, मित्र मैत्रिणींमुळे तिचे प्राण वाचले पण एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य चुकत गेले. पुढे स्वतःला‌ कसं बसं सावरत ती जगत होती, आता प्रेम या गोष्टीवरचा तिचा विश्वास उडाला होता, अशातच तिची नोकरीही गेली. ती मानसिक आजाराची बळी ठरली, आता महीलाश्रम हाच तिचा शेवटचा आधार बनला. जेव्हाही तिला भूतकाळ आठवायचा तेव्हा एकच विचार मनात यायचा, ” तेव्हा विचार पूर्वक निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, पण वास्तविक आयुष्यात अशा घटना‌ घडताना दिसतात. आयुष्यात एखादा निर्णय चुकला की पुढचे आयुष्य चुकतच जाते. तेव्हा आयुष्याचे निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे असते.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की सुलोचनाला भेटायला मानसी आश्रमात गेल्यावर सुलोचना मानसीला तिच्या आयुष्यात काय घडले ते सांगत असते.
    सुलोचना एका अतिशय गरीब घरातील मुलगी, आई वडील दुसर्‍यांच्या शेतात काम करून कुटुंब चालवत असतात. शेताजवळच एका छोट्याश्या झोपडीत आई वडील सुलोचना आणि दोन लहान भाऊ असे एकूण पाच जणांचं कुटुंब राहायचं. त्या गावात, आजुबाजूच्या परिसरात देवदासी प्रथा खूप वाईट प्रकारे पाळली जात असे.
    देवदासी प्रथा म्हणजेच चौदा पंधरा वर्षांच्या मुलींचे लग्न देवासोबत लाऊन देतात. चोरून पुजा-याच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. पूर्वी मुलगी सोडतानाचा विधी हा लग्नासारखा असतो. या विधीत नव-यामुलाऐवजी बाजूला तांब्या पूजतात.
    या लहान मुलीला नवंकोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागते.
    ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागतं. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. यामागे कारण असे की गावांतील त्यांच्या भाऊबंधांना कळावं, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये.

    देवदासी म्हणून सोडल्या जाणा-या मुली, बरेचदा मागासवर्गातील असतात आधीच मागासलेपण त्यात अंधश्रद्धा, गरिबी ही कारणं मुली व मुले सोडायला कारणीभूत होतात. डोक्यात जट आली की, देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत मग आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येतं. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवतात. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

    देवीला मुलं-मुली सोडण्याची अनेक कारणं असतात. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना डॉक्टर करणं परवडत नाही किंवा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असतो. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा, ही पूर्वापार चालत आलेली कल्पना अनेक सुशिक्षितांमध्येही आढळून येते. मग या अशिक्षित मागासवर्गीयांमध्ये तर विचारूच नका. अनेक मुली झाल्यावरही मुलगा व्हावा, ही इच्छा. त्यासाठी पहिल्या मुलीला देवाला सोडली जाते.

    अशाच प्रथेचा बळी ठरलेली मुलगी म्हणजे सुलोचना. सुलोचनाचे अशेच गावाबाहेर मंदिरात लग्न लावून दिले गेले आणि आता त्याच मंदिरात राहायचं असे‌ सांगून तिचे आई वडील परत गेले. तिथल्या पुजार्‍याने तिला एका शेजारच्या गावात पाटलांकडे सोडले. तिच्या सोबत काय होते आहे तिला कळायला मार्ग नव्हता. त्या पाटलांनी तिचे हवे तसे लैंगिक शोषण‌ केले, तिचा उपभोग घेतला, त्याच वाड्यात एका खोलीत बंद करून ठेवले. काही वर्षांनी जेव्हा अशीच अजून‌ एक देवदासी मुलगी त्या वाड्यात आली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला दूर कुठेतरी अनोळखी ठिकाणी नेऊन सोडले. तिथे तिला काही तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पण अशाच देवदासी महिला भेटल्या. त्यांनी तिला एक परडी दिली त्यात देवीचा फोटो होता. ती परडी हातात देत सांगितले की आता व देवीच्या नावाने जोगवा मागायचा आणि जे पदरी पडेल त्यावर जगायचं.
    तिची कहाणी ऐकून मानसीच्या डोळ्यात पाणी आले.
    अंधश्रद्धेच्या नावाखाली काय काय प्रकार चालतात याची तिला खूप कीव आली. आता मात्र सुलोचना आश्रमात आली तेव्हा पुढचं आयुष्यात ती अशा गोष्टींपासून दूर राहील याचे समाधान मानसीला वाटले.
    अशा देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या मुलींचे मंदिराच्या पुजार्‍यांकडून, बाकी लोकांकडून शारिरीक शोषण केले जाते. अशावेळी गर्भ धारणा झाली की जन्माला आलेल्या मुलीला देवदासी तर मुलाला तिथेच मंदीरात सेवेसाठी ठेवून देवाला अर्पण केले जाते.

    ही अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. यावर सरकारने कडक कारवाई करून बंदी घातली असूनही लपून छपून ही प्रथा मागासवर्गीय, दलितांमध्ये सुरू आहेच. अनेक समाज सुधारक हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग १

    उन्हाळ्याच्या कडक उन्हात डोक्यावर देविचा फोटो असलेली परडी घेऊन जाताना सुलोचनाला चक्कर आली आणि ती रस्त्यातच खाली कोसळली. आजूबाजूच्या लोकांनी तिला रस्त्याच्या बाजूला नेले, चेहऱ्यावर पाणी शिंपडले, जरा वेळाने ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूची गर्दी कमी झाली. त्याच गर्दीत असलेली मानसी मात्र तिची अवस्था बघून तिथेच थांबली, मानसीने सुलोचनाला पाणी प्यायला दिले, काही खाल्लं की नाही म्हणून चौकशी केली तर सकाळपासून पोटात काही नाही म्हणत सुलोचना डोळे मिटून बसून होती.
    मानसीने तिच्या जवळचा जेवणाचा डबा सुलोचनाला दिला आणि जेवण करायला लावले.
    मानसी ही एका शाळेत शिक्षिका होती सोबतच ती समाजकार्य करायची. शाळेत जाताना रस्त्यात सुलोचनाची अवस्था बघून ती तिच्या जवळ‌ थांबलेली होती.
    सुलोचना नाकी डोळी नीट, चेहऱ्यावरून कळत होते की वय काही जास्त नाही. सावळा वर्ण, कपाळावर मोठं गोल कुंकू, केस कित्येक वर्षांपासून न विंचरलेले दिसत होते, त्यामुळे केसांच्या गुंता होऊन जट झालेले, अंगावर एक हिरव्या रंगाची जुनी साडी, सोबत एक देवीचा फोटो असलेली परडी.
    सुलोचनाचं जेवण होत पर्यंत मानसी तिचं निरिक्षण करत होती, काय प्रकार आहे हे तिला लगेच कळाले. सुलोचना देवदासी प्रथेचा बळी असल्याचा अंदाज तिला आला. तिला योग्य ठिकाणी पोहचवायचे हे मानसीने ठरविले. सुलोचनाच्या अंगात त्राण नव्हता, जेवण करून साडीचा मळका पदर चेहऱ्यावर फिरवत परत सुलोचना डोळे मिटून भिंतीला टेकून बसली.  सुलोचनाला विचारल्यावर कळाले की तिचं जवळचं असं कुणी नाही. मानसी ने एक फोन केला आणि सविस्तर माहिती , पत्ता विचारत फोन बंद केला. . एक रिक्षा थांबवली आणि सुलोचनाला‌ सोबत घेऊन ती एका आश्रमात पोहोचली. तिथल्या एका डॉक्टरांच्या मदतीने सुलोचना ची तपासणी केली, तिला खूप अशक्तपणा आला होता. मानसीने प्रेमळ वागणूक दिली, जेवायला दिले‌ त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून सुलोचना त्या आश्रमात गेली. डॉक्टरांनी सुलोचनाला काही औषधे देऊन आराम करायला लावला. आश्रमात अनेक वयोगटातील स्त्रिया होत्या. त्यांच्या मदतीने सुलोचनाला एका बेडवर झोपवून दिले. तिला आरामाची खूप गरज होती. मानसीने शकुंतला बाईंना घडलेली घटना सांगितली त्यावर तिची काळजी आम्ही घेऊ, ती आता इथेच राहील, तुम्ही काळजी करू नका असं तिथल्या शकुंतला बाईंनी म्हंटल्यावर मानसी निश्चिंत झाली.
    शकुंतला बाई आणि त्यांच्या काही सहकारी देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी, पिडीत महिलांसाठी हा आश्रम चालवायच्या. त्यांची पुर्ण काळजी घेत एक लघुउद्योग तिथल्या महिलांच्या मदतीने चालवायच्या, त्यातून मिळणारे उत्पन्न आश्रयासाठी उपयोगी पडायचे. शकुंतला बाईंचे पती त्यांना मदत करायचे.
    मानसी शाळेसाठी आश्रमातून परत निघाली मात्र सुलोचनाचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. उद्या सकाळी आपण सुलोचनाला‌ भेटायला जायचे असं ठरवून ती शांत झाली. सुलोचना कोण आहे, तिच्या सोबत काय झाले अशा अनेक गोष्टी मानसीला‌ जाणून घ्यायच्या होत्या.
    दुसऱ्या दिवशी ठरविल्या प्रमाणे मानसी सुलोचनाला भेटायला आश्रमात पोहोचली. गेल्या गेल्याच सुलोचना काही महिलांसोबत एका झाडाखाली बसून आश्रमाचं निरीक्षण करत होती. मानसी दिसतात तिने हलकेच स्मित हास्य करत मानसीकडे बघितले. मानसीने तिच्या तब्येतीची चौकशी केली, आज सुलोचना ला जरा बरं वाटतं आहे ऐकून मानसीला समाधान वाटले. शिवाय आज सुलोचनाचे धुळीने माखलेले शरीर स्वच्छ दिसत होते, अंगावर दुसरी नीटनेटकी साडी दिसत होती.
    सुलोचना म्हणाली “ताय, तुम्ही कोण कुठच्या, माह्या देवीच्या रूपात धावत आल्या पा मदत कराया. काल माह्या जीवचं काय झालं असतं तुम्ही नसत्या तं.”
    मानसीने तिला धीर देत सांगितले तू आता इकडे तिकडे भटकायच नाही, इथेच राहायचं, हेच तुझं कुटुंब. सुलोचनाला ऐकून बरं वाटलं. होकारार्थी मान हलवून तिने ते मान्य केले.
    मानसीने तिची विचारपूस केली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाली “ताय, मले लहानपणीच माय बापानं देवाच्या पदरात सोडलं. चौदाव्या वर्षी गावा बाहेरच्या देवळात देवासंग लगिन लावून दिलं आणं मंग आता तिथंच राहाचं सांगून ते गेले, अजून नाही गवसले. देवदासी हाय म्या. नंतर त्या माणसानं माह्या आयष्याची राखरांगोळी केली ताय. यीट आल्यावर सोडलं मले वार्‍यावर. ” एवढं बोलून सुलोचना ढसाढसा रडू लागली. रडतचं घडलेली हकीकत सविस्तर सांगायला सुरुवात केली.

    देवदासी हा काय प्रकार आहे, सुलोचनाची सविस्तर कहाणी काय आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत stay tuned.

    कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

    पुढचा भाग लवकरच.

    आपल्या देशात अनेक कुप्रथा आहे, अशीच एक प्रथा म्हणजे  देवदासी प्रथा. देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे.  याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात.

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • तेच खरे हिरो….

    मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने मनवाच्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती म्हणाली “काकू आज क्लास उशीरा संपला पण आम्ही सोबतच बस स्टॉप वर आलो. माझी बस लवकर आल्यामुळे मी निघाले, मनवा बस साठी थांबली होती. येयीलच इतक्यात काळजी करू नका.”
    आईचं मन मात्र काळजीने व्याकूळ, मनवा ठिक तर असेल ना , फोन का बंद आहे, किती हा निश्काळजीपणा , उशीर होईल म्हणून कळवायचे तरी ना अशा विचाराने आई काळजीत पडली शिवाय जरा संतापलेली. तितक्यात एक रिक्षा घरापुढे थांबली, मनवा त्यातून उतरली बघून आईच्या जीवात जीव आला. पण हे काय सोबत हे कोण….
    मनवा सोबत रिक्षा मधून त्रृतीयपंथी म्हणजेच दोन हिजडे उतरले बघून आईचा पारा चढला, आई दारातूनच ओरडली ” मनवा,‌हा काय प्रकार आहे,  हे लोक इथे कशाला, तुला काही कळते की नाही. ह्यांच्या सोबत तू…शी… तुला काय हिच रिक्षा मिळाली का…”  आई चिडून नको ते बोलून गेली.
    मनवा आईला शांत करायचा प्रयत्न करत होती पण आई मात्र सगळ्या‌ प्रकाराने शिवाय मनवाला उशीर झाल्याने संतापलेली होती.
    ते पाहून सोबत आलेले दोघे तसेच कधी परत गेले मनवाला कळालेही नाही.
    आईचं बोलणं ऐकून मनवा रडायला लागली आणि चिडून म्हणाली “आई आता गप्प बस… त्यांच्या विषयी असं बोलण्याआधी मी काय म्हणते ऐक..ते हिजडे नाही..तेच खरे हिरो आहेत..ते नसते‌ तर आज माझ्या सोबत काय झाले असते कुणास ठाऊक.. कदाचित मी तुझ्या समोर अशी उभी नसते..”
    मनवा‌ आईच्या कुशीत शिरून हुंदके देत रडायला लागली.
    काही तरी गंभीर आहे आईला लक्षात आले.
    मनवाला शांत करून विचारले तेव्हा ती म्हणाली “आई, आज आमचा क्लास नेहमी पेक्षा उशीरा संपला आणि त्यामुळे माझी रोजची बस चुकली. दुसऱ्या बस‌ची वाट बघत मी बस स्टॉप वर थांबली, सोबतच्या मैत्रिणी त्यांच्या बस आल्यावर निघून गेल्या. बस स्टॉप वर बरेच लोक होते, त्यात काही टवाळक्या करणार्‍या पोरांचा ग्रुप होता. मी एकटी मुलगी दिसल्यावर ते काही तरी अश्लील बोलत माझ्या आजूबाजूला उभे होते. मी ज्या बाजूला जाईल तिकडे येऊन उभे. बरेच लोक तिथे असूनही कुणी त्यांना काही बोलत नव्हते, दुर्लक्ष करत आपापल्या फोन मध्ये, काही जण दुसरीकडे बघत उभे होते. मी खूप घाबरले तशातच तुला फोन करून कळवावे म्हणून फोन काढला तर एकाने येऊन धक्का दिला, माझा फोन खाली पडला, बंद झाला.. कसाबसा उचलून बॅगेत ठेवून बस कधी येते म्हणून मी रडकुंडीला येऊन बसची वाट पाहत होते. एकाने येऊन ओढणी ओढली आणि चूकून झालं असं दाखवत पुढे गेला..त्याच्या सोबतचे त्याला वाहवा करत हसू लागले.. माझ्या फिगरवरून काही तरी अश्लील बोलायला लागले..ते सगळे नजरेने बलात्कार करत होते आई…”
    बोलतानाच मनवा सगळा प्रकार आठवून रडू लागली..परत सांगायला लागली..
    ” तिथल्या गर्दीत सगळ्यांना कळत होते की मी घाबरली आहे.. रडकुंडीला आली आहे..पण कुणी दखल घेत नव्हते.. तितक्यात तिथून एक हिजड्यांचा ग्रूप जात होता, त्यात एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, ते सगळे जवळ आले, माझी विचारपूस केली..मी रडायला लागली..माझ्या सोबत होत असलेला प्रकार सांगितला.. एकाने जाऊन त्या ओढणी ओढणार्‍या मुलाच्या कानाखाली मारली. त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला.. घाबरून ते टवाळके तिथून पळत सुटले. आजूबाजूला असलेले लोक सगळा प्रकार बघत होते पण फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. ते मुलं पळून गेल्यावर काही लोक सांत्वन करण्यासाठी आले पण तेच लोकं आधी मात्र लक्ष नसल्यासारखे उभे होते. मी खूप घाबरले आई.. माझं रडणं थांबतच नव्हतं.. तेव्हा एकाने रिक्षा थांबवली, मला पत्ता विचारला आणि म्हणून त्यातले दोघे मला सुखरूप घरी पोहोचवायला घरा पर्यंत आले. तू मात्र त्यांना नको ते बोललीस. काही माहित नसताना त्यांचा अपमान केला..ते काही अपेक्षा न ठेवता परत गेले आई तुझं बोलणं ऐकून. त्यांचे मी साधे आभार सुद्धा मानले नाही..मी खूप घाबरले होते..ते माझ्या मदतीला आले नसते तर माझं काय झालं असतं काय माहित. आई माझी इज्जत त्यांच्यामुळे वाचली. ते हिजडे नाही तेच खरे हिरो आहेत..”
    मनवाच्या बोलण्याने आईला रडू आवरले नाही.. ऐकूनच आईच्या अंगावर काटा आला.. ज्यांना आपण हिजडे म्हणून अपमानीत केले त्यांच्यामुळे आपल्या मुलीची इज्जत वाचली. त्यांचे उपकार कशे फेडायचे.. आई मनवाला कुशीत घेऊन पश्चात्ताप करत रडू लागली..मनवा सुखरूप घरी पोहोचली म्हणून मनोमन त्यांचे आभार मानू लागली.

    कधी कधी आपल्याला परीस्थिती माहीत नसताना आपण कुणाला असं दुखावतो आणि नंतर पश्चात्ताप होतो.. जसं मनवाच्या आईच्या बाबतीत झालं..
    जे आहे ते नैसर्गिक आहे..ते लोक त्रृतीयपंथी असले तरी एक मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत.. तेव्हा त्यांच्यावर हसत त्यांची खिल्ली उडवणे, नको ते त्यांना बोलणे खरंच अयोग्य आहे…

    कथा कशी वाटली ते जरूर कळवा.. शिवाय तुमचं याबद्दल मत मांडायला विसरू नका…

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नकारात्मक विचार.. जीवघेणे परीणाम-भाग २

    अनन्याला  नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता.
    गरोदरपणात तिसऱ्या त्रैमासिकित जास्त काळजी घ्यायला हवी पण अनन्या मात्र दिवसेंदिवस खचून जाऊ लागली, वेडेवाकडे विचार करू लागली. तिला बाळाची हालचाल जरा कमी वाटली की रडायला लागायची, माझ्या बाळाला काही झालं नाही ना म्हणून सतत आईला प्रश्न विचारायची. जरा पोटात पाठीत दुखले तरी घाबरून रडायची, मग डॉक्टर कडे घेऊन गेल्या शिवाय पर्याय नसायचा. एक एक दिवस आता अवघड जाऊ लागला.
    कशातच तिचं मन लागत नव्हते, सतत नकारात्मक विचार, चिडचिड सुरू असायची.
    अशातच एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले, शतपावली करताना चक्कर आली आणि ती खाली पडली. नशिबाने आई  आणि राघव सोबतच होते. त्यांनी लगेच तिला हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेले तर अनन्याचं ब्लडप्रेशर खूप वाढलेले होते आणि त्यामुळे तिला चक्कर आली होती. अजूनही ती पुर्णपणे शुद्धीत नव्हती. डॉक्टरांनी तिला अॅडमीट करून घेतले. ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, या सगळ्या प्रकाराने अनन्या अजूनच नकारात्मक होत गेली आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले, ब्लडप्रेशर वाढले. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत होते.
    बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालले होते शिवाय अनन्याची परिस्थिती नाजूक झाली होती. सगळ्यांना काळजी वाटत होती. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याचे सगळे उपाय डॉक्टर करत होते शिवाय बाळ आणि आई सुखरूप राहण्याचे प्रयत्न सुरू होते. अनन्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सहा तास होत आले तरी काही सुधारणा होत नव्हती. अशातच अचानक अनन्याला परत चक्कर आली आणि तिची शुद्ध पुर्णपणे हरपली, थोडा वेळात ती शुद्धीवर आली पण बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र थांबले होते, सातव्या महिन्याच्या अखेरीस उच्च रक्तदाब ( हाय ब्लडप्रेशर) मुळे बाळाने जन्माला येण्याआधीच या जगाचा निरोप घेतला होता.
    राघव तसेच घरी सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.
    अनन्याच्या जीवाला सुद्धा धोका होता. ती नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन उच्च रक्तदाबाच्या वेढ्यात अडकली होती, अस्वस्थ होती. अशावेळी बाळाला जास्त काळ पोटात ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे इंजेक्शन व्दारे कृत्रिम कळा आणून नैसर्गिक रित्या बाळाला बाहेर काढले गेले.
    जे काही झाले ते अतिशय धक्कादायक होते, टेंशन, नकारात्मक विचार, चिडचिड , मनात सतत दडपण यामुळे इतका मानसिक व शारीरिक त्रास अनन्याला आणि सोबतच घरी सगळ्यांनाच झाला होता.
    अनन्याला यातून सावरण्यासाठी वर्ष लागले. पण तिला समजून चुकले होते की सगळं सुरळीत चालू असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नकारात्मक विचार करून इतक्या वर्षांनी लाभलेलं मातृत्व ती गमावून बसली होती.
    यातून सावरण्यासाठी घरी सगळ्यांनी अनन्याला खूप मदत केली.
    सुदैवाने पुढे दोन वर्षांनी अनन्या आणि राघव च्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली, त्यांच्या जीवनात एका गोंडस बाळाचे आगमन झाले.

    या कथेतून हाच संदेश द्यायचा आहे की “नकारात्मक विचार किती जीवघेणे ठरू शकतात, नकारात्मकता जवळ बाळगू नका. कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक राहून शांतपणे सामना केला तर योग्य मार्ग नक्कीच मिळतो.”
    माझ्या या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमा असावी. नकारात्मकता दूर करणे हाच हेतू यामागे आहे.

    अशाच कथा वाचत राहण्यासाठी मला फॉलो करा.
    कथा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे