Tag: सामाजिक प्रश्न

  • लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

    मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

    ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
    ( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
    रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
    रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
    राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
    रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
    दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
    त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
    एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
    राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
    दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
    “राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
    “रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
    “राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
    “रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
    “राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
    दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
    रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
    हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
    “राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
    राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
    “राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
    इतकं बोलून रश्मी निघून गेली.
    तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
    तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
    रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
    रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
    कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
    इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

    आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
    राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

    सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
    सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

    त्यावर तो निशब्द झाला.
    आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

    वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

    राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
    रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

    आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

    राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

    समाप्त..!!

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही.
    अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

    https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी… भाग १

    नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
    राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
    नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
    तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
    त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
    राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
    दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

    हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

    पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

    “व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

    “हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

    सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
    राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

    तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

    (महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

    “बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
    नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

    राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

    ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

    राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

    पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

    राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

    लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

    क्रमशः

    पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बहुपती विवाह- एक प्रथा

    विज्ञान युगात अजूनही आपल्या देशात अनेक प्रथा जिवंत आहेत त्यातलीच एक म्हणजे “बहुपती विवाह”.एका पुरूषाला अनेक पत्नी आहेत असं बरेचदा ऐकलं पण आजच्या काळात एका मुलीचा विवाह अनेक पुरूषांसोबत एकाच वेळी केला जातो हे क्वचितच ऐकायला मिळते.

    हो, ही सत्य परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर मधली. भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या किन्नौर गावात एकाच मुलीचा विवाह कुटुंबातील सर्व सख्ख्या भावासोबत केला जातो, अशी प्रथा तिथे अजूनही आहे. किन्नौर मधल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की अज्ञातवासात पांडवांनी त्याच ठिकाणी वास केला होता आणि म्हणून अजूनही तिथे बहुपती विवाह ही प्रथा सुरू आहे.

    या ठिकाणी सगळे सदस्य एकाच घरात राहतात शिवाय बहुपती मधील एखाद्याचे निधन झाले तरी पत्नी दु:खी राहत नाही.

    किन्नौर मध्ये खूप वाईट प्रकारे ही प्रथा पाळली जाते.

    घरातील कुठल्या पुरूषाला वाईट वाटू नये म्हणून दारू आणि तंबाखूचे सेवन जेवणासोबत केले जाते.

    आश्चर्य म्हणजे या परीसरात घराची मुख्य ही स्त्री असते. घराचा ताबा तिच्या हातात असतो.

    एक‌ पती पत्नीसोबत यौन संबंध साधत असेल तर तो त्याची टोपी दारावर अडकवून ठेवतो. ती टोपी बघून बाकी पतींना कळते की काय सुरू आहे आणि त्यात मान मर्यादा इतकी असते की बाकी कुणीही त्या ठिकाणी टोपी असेपर्यंत जात नाही.

    जेव्हा पत्नीला कुठल्या गोष्टीच दु:ख होत असेल तर ती गाणी गाते.

    हे सगळं ऐकून विचित्र वाटत असेल तरी ही प्रथा अजूनही जिवंत आहे.

    असं ऐकल्यावर प्रश्न पडतो की या सगळ्यात प्रेम, स्त्रीचा आदर, स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. स्त्री असो किंवा पुरुष पण त्यांच्या भावना, परस्परांमधील प्रेम, आदर या गोष्टीचा आनंद त्यांना माहीतच नाही कारण वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा त्यापेक्षा महत्वाची मानली जाते.

    सध्या परीस्थिती खूप बदलत आहे मात्र देशाच्या बर्‍याच भागात बालविवाह, बहुपती विवाह सारख्या अनेक प्रथा अजूनही सुरू आहेत. अशा प्रकारच्या प्रथा हळूहळू बंद झाल्या तर आपला देश खर्‍या अर्थाने विकसित झाला असं म्हणायला हरकत नाही. याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

    असेच वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचन्यासाठी मला फॉलो करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नातेसंबंधात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अनोळखी नातं..

    रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू खूश आहे हे ऐकून छान वाटले एवढंच तो बोलला. रीयाला त्याच्या बोलण्यात आज खूप फरक जाणवला. रीयाने विचारले, ‘”काय झालं अमेय, तू आज इतका शांत कसा , नेहमी तर माझी खिल्ली उडवत असतोस. मी किती अल्लड आहे हे मला पटवून देत असतोस, आज मी इतकी छान बातमी सांगितली पण तू मात्र आनंदी नाही असं वाटत आहे मला. सांग ना काय झाले, तू माझ्यासाठी खूश आहेस ना”.

    “रीया अगं मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, तुला हवा तसा जोडीदार तुला मिळाला हे ऐकून खरंच छान वाटले मला. तुझं जय बद्दलच वर्णन ऐकून तू आता अल्लड नसून मॅच्युअर झाली आहे हे मला जाणवलं. पण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता माझ्यासोबत जास्त बोलू शकणार नाही, माझे चांगले वाईट अनुभव, माझी प्रेमप्रकरणं आता मी कुणाजवळ सांगणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाची खिल्ली उडवणार मी म्हणून जरा उदास झालो एवढंच.” अमेय बोलला.

    अमेयचं उत्तर ऐकून रीयाला काय बोलावे कळत नव्हते, काही क्षण शांतता पसरली. एकीकडे आनंद तर एकीकडे मैत्री आता जरा कमी होणार म्हणून उदासीनता अशी दोघांची मनस्थिती झाली.

    आपली मैत्री अशीच राहणार असं म्हणत रीयाने शांतता दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अमेय तिला समजूत सांगत म्हणाला “रीया अगं तुझ्या आयुष्यात आता एक स्पेशल व्यक्ती आहे तो म्हणजे जय, तुझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पूर्ण आयुष्य तुम्ही एकत्र घालवणार आहे, आपल्या दोघांना माहित आहे की आपण खूप छान मित्र आहोत पण सगळ्यांना अशी मैत्री पटेल असं नाही. मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही, जय आणि तू हे दिवस खूप एंजॉय करा. आपल्या मैत्रीमुळे त्याला उगाच काही गैरसमज नको. अधूनमधून आपण बोलायला हरकत नाही पण नको तू छान वेळ दे त्याला, समजून घे जय ला आणि हो कधीही माझी आठवण आली, काहीही मदत लागली तर बिंदास सांग मला.” अमेयचं हे बोलणे ऐकून रियाने हो..चालेल.. बाय.. टेक केअर म्हणत फोन ठेवला.

    रीया आणि अमेय शाळेपासून चांगले मित्र मैत्रीण. अमेय अतिशय बिंदास मनमोकळ्या स्वभावाचा, बडबडा, नेहमी हसत खेळत, कॉमेडी मूड मध्ये असणारा पण सगळ्यांना मदत करायला तयार. रीया अगदी अल्लड, शांत, साधी भोळी मुलगी. रीयाला मित्र मैत्रीणी मोजकेच होते पण त्यात अमेय तिचा चांगला मित्र होता. त्याची सगळी प्रकरणं, मज्जा मस्ती तो तिला सांगायचा. रीया किती साधी भोळी आहे, तिला कुणी किती सहज फसवू शकतं ही जाणीव तिला करून द्यायचा. अमेयची गर्लफ्रेंड उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशी गेलेली त्यामुळे त्यांचं फार काही बोलून होत नसे पण तिची आणि अमेयची लव स्टोरी, त्यांची भांडणं, सरप्राइज अशे चांगले वाईट अनुभव तो रिया जवळ शेअर करायचा. रीया अमेय मुळ माणसं ओळखायला शिकली होती, कुठल्याही परिस्थितीत आनंदी कशे राहायचे हे तिला अमेय मुळे कळाले होते. इतके चांगले मित्र मैत्रीण असून एकमेकांचा आदर त्यांना होता, पवित्र अशी त्यांची मैत्री होती.

    फोन ठेवल्यानंतर रीया विचार करू लागली की मुलगा मुलगी ह्यांच्यात मैत्रीचं नातं नसू शकते का. लग्न होणार म्हणून अशी मैत्री अचानक कमी, का तर उगाच नवर्‍याला गैरसमज नको, तिला जरा विचित्र वाटले. आता आधी सारखा वेळ मित्र मैत्रीणी सोबत घालवता येणार नाही हे मान्य कारण आता नवं आयुष्य सुरु होणार, प्रायोरिटी बदलणार पण नविन आयुष्यात अशा मैत्रीमुळे गैरसमज नको हे तिला काही पटत नव्हते. ज्या पवित्र मैत्रीमुळे ती खरं जीवन जगायला शिकली, माणूस ओळखायला शिकली, कुणी आपली सहज फसवणूक करू शकते पण अमेय मुळे असं काही झालं नाही, बर्‍याच नविन गोष्टी अमेय मुळे आपल्याला कळायला लागल्या हे ती कधीच विसरू शकत नव्हती. असं हे नातं अनोळखी का आहे याचे उत्तर मात्र तिला मिळत नव्हते.

    तुमच्या मते या अनोळखी नात्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट मध्ये लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • सात मुली नंतर आठवा मुलगा झाला…

    आजच्या विज्ञान युगात आठ वेळा बाळंतपण, ऐकूनच धक्का बसतो ना…कामवाल्या मावशी अतिशय आनंदाने सांगत होत्या की माझ्या बहिणीला वारीस जन्माला आला, सात मुली नंतर आठवा मुलगा झाला.

    ते ऐकून आश्चर्यने त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. आजच्या काळात आठ वेळा बाळंतपण. त्या मात्र अतिशय आनंदात होत्या.

    जरा वेळ विचारात गुंतून भानावर आले आणि त्यांना म्हणाले “मावशी, अहो मुलगा असो की मुलगी आजकाल इतका भेद नाही राहीला. मुलगा व्हावा म्हणून इतके वेळा बाळंतीण झालेल्या बाईची काय अवस्था झाली असेल शिवाय त्यांच्या हातात नाही ना मुलगाच व्हावा ते.”

    त्यावर मावशी म्हणतात ” ताई तुम्ही सुशिक्षित, शहरात राहता म्हणून तुम्हाला तसं वाटतं. गावाकडे असं न्हाय, वारीस नसला‌ की बाईच्या जातीला लय टोमणे मारतात बघा. त्यासाठी बहीणीनं नवस केला, तेव्हा मुलगा झाला. सगळ्यात मोठ्या मुलीचं अनं आईचं बाळंतपण एकाच वेळी पाठोपाठ झालं बघा. लेकीला मुलगा झाल्यावर आईला आठवड्यानंतर मुलगा झाला. भाच्याच्या पायगुणानं मामा जन्माला आला बघा ”

    मावशीचे उत्तर ऐकून धक्काच बसला, चक्कर येणेच बाकी राहिले. अजूनही अशे विचार, अशी परिस्थिती आजुबाजुला आहे हा विचार कधी केला नव्हता. त्यात सगळ्यात मोठ्या मुलीचं आणि आईचं बाळंतपण एकाच वेळी हे ऐकून तर आश्चर्याने ताणलेल्या भुवया पूर्वस्थितीत यायला बराच वेळ लागला. मावशी सगळं सहजरीत्या आनंदात सांगून गेल्या. मी मात्र अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातच होते.

    आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे, मग मुलगा असो वा मुलगी. या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असताना मुलगाच व्हावा म्हणून बाईच्या जीवाचा, तिच्या वेदनेचा विचार न ‌करता तिला मुलगी झाली म्हणून मानसिक छळ कितपत योग्य आहे. मुलगा नाही म्हणून टोमणे ऐकायचे पण ते खरंच तिच्या हातात आहे का. आठ वेळा बाळंतपण झाल्यावर तिची शारीरिक अवस्था काय झाली असेल. केवळ समाजात टोमणे नको, मुलगा होत नाही म्हणून नवरा सोडून देयील या भितीने हे सगळं सहन करणे हाच यावर उपाय आहे का.

    ग्रामिण भागात अजूनही अशे विचार जिवंत आहेत. अजूनही मुलगा होत नाही म्हणून सासरी छळ, नवर्‍याने सोडून दिले असले प्रकार सुरू आहेत. ही परिस्थिती खरंच बदलायला हवी. यासाठी स्त्रीनेच पाऊल उचलायला हवे, खंबीर व्हायला हवे. अशा परिस्थितीतून गेलेल्या आईने मुलीलाही अशाच विचारांचे घडवले, अन्याय सहन करत राहिले तर ही परिस्थिती बदलणे खरंच खूप कठीण आहे.

    अश्विनी कपाळे गोळे

  • निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..

    समिधा आणि अजय, कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. समिधा देखणी, अतिशय उत्साही, मेहनती आणि मनमिळावू मुलगी. कुणालाही काही अडचण असो, ती मदतीला तत्पर असायची, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. अजयला तिचा हाच गुण खूप आवडायचा. अजय म्हणजे शांत, संकोची स्वभावाचा आणि हुशार मुलगा. समिधा त्याला सुरवाती‌ पासूनच खूप आवडायची पण तिला अचानक प्रेमाची कबुली दिली तर ती ते स्विकारेल की नाही या भितीने तो काही बोलला नाही. दोघांची चांगली मैत्री होती पण समिधाच्या मनमिळावू स्वभावामुळे तिचे बरेच मित्र मैत्रिणी होते. अजयला मात्र समिधा जवळची मैत्रीण, बाकी काही मोजकेच मित्र. कॉलेज संपत आले तेव्हा शेवटच्या दिवसात मोठी हिम्मत करून अजयने समिधाला प्रपोज केले, तिने त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही, अजय जरा नाराज झाला. पण कॉलेज नंतर योगायोगाने नोकरीसाठी दोघेही एकाच शहरात आले, परत त्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अजय समिधाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, समिधा लाही आता अजय आवडायला लागला, अजयने परत एकदा तिला विचारले असता तिने लगेच होकार दिला. समिधाच्या घरी मात्र तिच्यासाठी स्थळ बघण्याची तयारी सुरू झाली, समिधाने घरी अजय विषयी सांगितले पण आंतरजातीय प्रेमविवाह तिच्या वडीलांना मान्य नव्हता. तिने खूप समजविण्याचा‌ प्रयत्न केला पण घरी ते मान्य नव्हते. इकडे अजयच्या घरीही तिचं परिस्थिती. अशा परिस्थितीत अजय काही निर्णय घेत नव्हता पण समिधाला इतकंच म्हणायचा की “तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, काही झालं तरी लग्न तुझ्याशीच करणार.” समिधाचीही तिचं मनस्थिती होती. कितीतरी महीने झाले पण दोघांच्याही घरचे त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. शेवटी समिधा आणि अजयने कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. मित्र मैत्रिणींच्या मदतीने सगळी तयारी झाली. तारीख, वेळ निश्चित करण्यात आली,  समिधा ठरल्याप्रमाणे मैत्रिणी सोबत रजिस्ट्रेशन ऑफिसला आली पण अजय काही आला नाही, त्याचा फोनही लागत नव्हता, किती वेळ त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचा मॅसेज आला, “घरच्यांना धोक्यात ठेवून मी लग्न करू शकत नाही. तू मला विसरून जा. त्यातच आपलं भलं आहे.”
    त्याचा असा मॅसेज वाचून समिधा हादरली, आई वडिलांचा विरोध पत्करून त्याच्या प्रेमापोटी सगळं सोडून ती आली होती आणि अजयने मात्र तिचा विश्वासघात केला. समिधाचे आई वडील राहायचे त्या गावात अशी बदनामी झाली की समिधाने पळून जाऊन दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले.
    झाल्या प्रकाराने समिधाच्या वडिलांना धक्का बसला, यापुढे आमच्याशी तुझ्याशी काही संबंध नाही असे बोलून त्यांनी तिला कायमचे पोरके केले. समिधा मुळे आपल्याला मान खाली घालायची वेळ आली, तिच्यामुळे गावात अपमान झाला तेव्हा आता तिला आता माफी नाही अशी तिच्या वडिलांची भूमिका झाली होती. समिधा पूर्ण पणे एकटी पडली होती. मित्र मैत्रिणींकडून कळाले की घरच्यांच्या दबावाखाली येऊन अजयने असा निर्णय घेतला, पण मग समिधाच्या प्रेमाचं काय, तिचा विश्वासघात केला त्याच काय..अशे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.
    माहेरी स्थान नाही आणि प्रेमाने पाठ फिरवली अशा परिस्थितीत स्वतः ला सावरणे तिच्या साठी कठीण झाले होते. ती सतत शक्य त्या मार्गाने अजय सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती पण काही फायदा नव्हता, इकडे आई वडिलही तिच्याशी बोलायला, तिची अवस्था समजून घ्यायला तयार नव्हते. अशात ऑफिसमध्ये सुद्धा तिचं मन लागत नव्हतं, किती तरी दिवस ती एकटीच घरात रडत बसून राहिली. झाल्या प्रकारामुळे समिधा खचून गेली होती, सतत एकच विचार तिच्या मनात येत होता, “अजयवर इतका विश्वास न ठेवता आई वडिलांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”
    या सगळ्याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला, तिने स्वतःला दोष देत आत्महत्येचा प्रयत्न केला, मित्र मैत्रिणींमुळे तिचे प्राण वाचले पण एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य चुकत गेले. पुढे स्वतःला‌ कसं बसं सावरत ती जगत होती, आता प्रेम या गोष्टीवरचा तिचा विश्वास उडाला होता, अशातच तिची नोकरीही गेली. ती मानसिक आजाराची बळी ठरली, आता महीलाश्रम हाच तिचा शेवटचा आधार बनला. जेव्हाही तिला भूतकाळ आठवायचा तेव्हा एकच विचार मनात यायचा, ” तेव्हा विचार पूर्वक निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, पण वास्तविक आयुष्यात अशा घटना‌ घडताना दिसतात. आयुष्यात एखादा निर्णय चुकला की पुढचे आयुष्य चुकतच जाते. तेव्हा आयुष्याचे निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे असते.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की सुलोचनाला भेटायला मानसी आश्रमात गेल्यावर सुलोचना मानसीला तिच्या आयुष्यात काय घडले ते सांगत असते.
    सुलोचना एका अतिशय गरीब घरातील मुलगी, आई वडील दुसर्‍यांच्या शेतात काम करून कुटुंब चालवत असतात. शेताजवळच एका छोट्याश्या झोपडीत आई वडील सुलोचना आणि दोन लहान भाऊ असे एकूण पाच जणांचं कुटुंब राहायचं. त्या गावात, आजुबाजूच्या परिसरात देवदासी प्रथा खूप वाईट प्रकारे पाळली जात असे.
    देवदासी प्रथा म्हणजेच चौदा पंधरा वर्षांच्या मुलींचे लग्न देवासोबत लाऊन देतात. चोरून पुजा-याच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. पूर्वी मुलगी सोडतानाचा विधी हा लग्नासारखा असतो. या विधीत नव-यामुलाऐवजी बाजूला तांब्या पूजतात.
    या लहान मुलीला नवंकोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागते.
    ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागतं. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. यामागे कारण असे की गावांतील त्यांच्या भाऊबंधांना कळावं, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये.

    देवदासी म्हणून सोडल्या जाणा-या मुली, बरेचदा मागासवर्गातील असतात आधीच मागासलेपण त्यात अंधश्रद्धा, गरिबी ही कारणं मुली व मुले सोडायला कारणीभूत होतात. डोक्यात जट आली की, देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत मग आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येतं. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवतात. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

    देवीला मुलं-मुली सोडण्याची अनेक कारणं असतात. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना डॉक्टर करणं परवडत नाही किंवा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असतो. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा, ही पूर्वापार चालत आलेली कल्पना अनेक सुशिक्षितांमध्येही आढळून येते. मग या अशिक्षित मागासवर्गीयांमध्ये तर विचारूच नका. अनेक मुली झाल्यावरही मुलगा व्हावा, ही इच्छा. त्यासाठी पहिल्या मुलीला देवाला सोडली जाते.

    अशाच प्रथेचा बळी ठरलेली मुलगी म्हणजे सुलोचना. सुलोचनाचे अशेच गावाबाहेर मंदिरात लग्न लावून दिले गेले आणि आता त्याच मंदिरात राहायचं असे‌ सांगून तिचे आई वडील परत गेले. तिथल्या पुजार्‍याने तिला एका शेजारच्या गावात पाटलांकडे सोडले. तिच्या सोबत काय होते आहे तिला कळायला मार्ग नव्हता. त्या पाटलांनी तिचे हवे तसे लैंगिक शोषण‌ केले, तिचा उपभोग घेतला, त्याच वाड्यात एका खोलीत बंद करून ठेवले. काही वर्षांनी जेव्हा अशीच अजून‌ एक देवदासी मुलगी त्या वाड्यात आली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला दूर कुठेतरी अनोळखी ठिकाणी नेऊन सोडले. तिथे तिला काही तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पण अशाच देवदासी महिला भेटल्या. त्यांनी तिला एक परडी दिली त्यात देवीचा फोटो होता. ती परडी हातात देत सांगितले की आता व देवीच्या नावाने जोगवा मागायचा आणि जे पदरी पडेल त्यावर जगायचं.
    तिची कहाणी ऐकून मानसीच्या डोळ्यात पाणी आले.
    अंधश्रद्धेच्या नावाखाली काय काय प्रकार चालतात याची तिला खूप कीव आली. आता मात्र सुलोचना आश्रमात आली तेव्हा पुढचं आयुष्यात ती अशा गोष्टींपासून दूर राहील याचे समाधान मानसीला वाटले.
    अशा देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या मुलींचे मंदिराच्या पुजार्‍यांकडून, बाकी लोकांकडून शारिरीक शोषण केले जाते. अशावेळी गर्भ धारणा झाली की जन्माला आलेल्या मुलीला देवदासी तर मुलाला तिथेच मंदीरात सेवेसाठी ठेवून देवाला अर्पण केले जाते.

    ही अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. यावर सरकारने कडक कारवाई करून बंदी घातली असूनही लपून छपून ही प्रथा मागासवर्गीय, दलितांमध्ये सुरू आहेच. अनेक समाज सुधारक हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग १

    उन्हाळ्याच्या कडक उन्हात डोक्यावर देविचा फोटो असलेली परडी घेऊन जाताना सुलोचनाला चक्कर आली आणि ती रस्त्यातच खाली कोसळली. आजूबाजूच्या लोकांनी तिला रस्त्याच्या बाजूला नेले, चेहऱ्यावर पाणी शिंपडले, जरा वेळाने ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूची गर्दी कमी झाली. त्याच गर्दीत असलेली मानसी मात्र तिची अवस्था बघून तिथेच थांबली, मानसीने सुलोचनाला पाणी प्यायला दिले, काही खाल्लं की नाही म्हणून चौकशी केली तर सकाळपासून पोटात काही नाही म्हणत सुलोचना डोळे मिटून बसून होती.
    मानसीने तिच्या जवळचा जेवणाचा डबा सुलोचनाला दिला आणि जेवण करायला लावले.
    मानसी ही एका शाळेत शिक्षिका होती सोबतच ती समाजकार्य करायची. शाळेत जाताना रस्त्यात सुलोचनाची अवस्था बघून ती तिच्या जवळ‌ थांबलेली होती.
    सुलोचना नाकी डोळी नीट, चेहऱ्यावरून कळत होते की वय काही जास्त नाही. सावळा वर्ण, कपाळावर मोठं गोल कुंकू, केस कित्येक वर्षांपासून न विंचरलेले दिसत होते, त्यामुळे केसांच्या गुंता होऊन जट झालेले, अंगावर एक हिरव्या रंगाची जुनी साडी, सोबत एक देवीचा फोटो असलेली परडी.
    सुलोचनाचं जेवण होत पर्यंत मानसी तिचं निरिक्षण करत होती, काय प्रकार आहे हे तिला लगेच कळाले. सुलोचना देवदासी प्रथेचा बळी असल्याचा अंदाज तिला आला. तिला योग्य ठिकाणी पोहचवायचे हे मानसीने ठरविले. सुलोचनाच्या अंगात त्राण नव्हता, जेवण करून साडीचा मळका पदर चेहऱ्यावर फिरवत परत सुलोचना डोळे मिटून भिंतीला टेकून बसली.  सुलोचनाला विचारल्यावर कळाले की तिचं जवळचं असं कुणी नाही. मानसी ने एक फोन केला आणि सविस्तर माहिती , पत्ता विचारत फोन बंद केला. . एक रिक्षा थांबवली आणि सुलोचनाला‌ सोबत घेऊन ती एका आश्रमात पोहोचली. तिथल्या एका डॉक्टरांच्या मदतीने सुलोचना ची तपासणी केली, तिला खूप अशक्तपणा आला होता. मानसीने प्रेमळ वागणूक दिली, जेवायला दिले‌ त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून सुलोचना त्या आश्रमात गेली. डॉक्टरांनी सुलोचनाला काही औषधे देऊन आराम करायला लावला. आश्रमात अनेक वयोगटातील स्त्रिया होत्या. त्यांच्या मदतीने सुलोचनाला एका बेडवर झोपवून दिले. तिला आरामाची खूप गरज होती. मानसीने शकुंतला बाईंना घडलेली घटना सांगितली त्यावर तिची काळजी आम्ही घेऊ, ती आता इथेच राहील, तुम्ही काळजी करू नका असं तिथल्या शकुंतला बाईंनी म्हंटल्यावर मानसी निश्चिंत झाली.
    शकुंतला बाई आणि त्यांच्या काही सहकारी देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी, पिडीत महिलांसाठी हा आश्रम चालवायच्या. त्यांची पुर्ण काळजी घेत एक लघुउद्योग तिथल्या महिलांच्या मदतीने चालवायच्या, त्यातून मिळणारे उत्पन्न आश्रयासाठी उपयोगी पडायचे. शकुंतला बाईंचे पती त्यांना मदत करायचे.
    मानसी शाळेसाठी आश्रमातून परत निघाली मात्र सुलोचनाचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. उद्या सकाळी आपण सुलोचनाला‌ भेटायला जायचे असं ठरवून ती शांत झाली. सुलोचना कोण आहे, तिच्या सोबत काय झाले अशा अनेक गोष्टी मानसीला‌ जाणून घ्यायच्या होत्या.
    दुसऱ्या दिवशी ठरविल्या प्रमाणे मानसी सुलोचनाला भेटायला आश्रमात पोहोचली. गेल्या गेल्याच सुलोचना काही महिलांसोबत एका झाडाखाली बसून आश्रमाचं निरीक्षण करत होती. मानसी दिसतात तिने हलकेच स्मित हास्य करत मानसीकडे बघितले. मानसीने तिच्या तब्येतीची चौकशी केली, आज सुलोचना ला जरा बरं वाटतं आहे ऐकून मानसीला समाधान वाटले. शिवाय आज सुलोचनाचे धुळीने माखलेले शरीर स्वच्छ दिसत होते, अंगावर दुसरी नीटनेटकी साडी दिसत होती.
    सुलोचना म्हणाली “ताय, तुम्ही कोण कुठच्या, माह्या देवीच्या रूपात धावत आल्या पा मदत कराया. काल माह्या जीवचं काय झालं असतं तुम्ही नसत्या तं.”
    मानसीने तिला धीर देत सांगितले तू आता इकडे तिकडे भटकायच नाही, इथेच राहायचं, हेच तुझं कुटुंब. सुलोचनाला ऐकून बरं वाटलं. होकारार्थी मान हलवून तिने ते मान्य केले.
    मानसीने तिची विचारपूस केली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाली “ताय, मले लहानपणीच माय बापानं देवाच्या पदरात सोडलं. चौदाव्या वर्षी गावा बाहेरच्या देवळात देवासंग लगिन लावून दिलं आणं मंग आता तिथंच राहाचं सांगून ते गेले, अजून नाही गवसले. देवदासी हाय म्या. नंतर त्या माणसानं माह्या आयष्याची राखरांगोळी केली ताय. यीट आल्यावर सोडलं मले वार्‍यावर. ” एवढं बोलून सुलोचना ढसाढसा रडू लागली. रडतचं घडलेली हकीकत सविस्तर सांगायला सुरुवात केली.

    देवदासी हा काय प्रकार आहे, सुलोचनाची सविस्तर कहाणी काय आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत stay tuned.

    कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

    पुढचा भाग लवकरच.

    आपल्या देशात अनेक कुप्रथा आहे, अशीच एक प्रथा म्हणजे  देवदासी प्रथा. देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे.  याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात.

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास

    सोहम, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. सोहम, आई वडील ,बहीण आणि एक भाऊ असं पाच जणांचं कुटुंब. वडील सरकारी नोकरीत कामाला. सोहम सगळ्यात मोठा मुलगा, देखणा, गोरापान, अभ्यासात हुशार पण वयानुसार मात्र त्याचा आवाज पुरुषांसारखा बदलला नाही. वयात आल्यावर सोहम मध्ये बदल होईल म्हणून सुरवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. शाळेत मात्र त्याला या गोष्टींमुळे सगळे चिडवायचे, त्याच्या आवाजाची नक्कल करायचे.
    बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला पण त्याच्या नाजूक, अगदी मुली सारख्या आवाजामुळे त्याला परत चीडवणे, आवाजाची नक्कल करणे या गोष्टी सुरू झाल्या. सोबतच्या मुलांमध्ये बरेच बदल झालेले त्याला जाणवत होते, त्यांच्या आवाजात बदल झाले होते मग आपल्या आवाजात का बदल होत नाही‌ म्हणून सोहम सतत आई जवळ रडायचा, कॉलेजमध्ये जायला टाळायचा. या प्रकारामुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सोहम मध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. सोहमची आर्थिक परिस्थिती साधारण त्यामुळे मुलांनी चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे वडीलांचे स्वप्न. सोहमच्या वडिलांचा स्वभाव रागीट, कडक होता त्यांच्यापुढे आईचे काही चालत नव्हते.
    सोहम आता बाहेर जायला टाळायचा, कुठल्या कार्यक्रमात जाणे, मित्रांमध्ये जाणे त्याने बंद केले, कॉलेजमध्येही कधी तरीच जायचा, त्यामुळे अभ्यासात तो मागे पडत होता. या प्रकारामुळे सोहमचे वडील त्याचावर खूप चिडायचे.
    पदवी परीक्षेत कसा बसा तो उत्तीर्ण झाला. पदवीधर झाला असला तरी नोकरीचं काय, वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा मुलगा अपयशी ठरला म्हणून वडिल सगळा राग सोहमवर काढायचे.
    या सगळ्या प्रकाराने आईचा जीव तीळ तीळ तुटत होता. बाहेर गेलो की कुणी आवाजावरून पुरुषत्व ठरवतील, चिडवतील म्हणून दिवसभर सोहम घरात असायचा. घरातही बहीण भावांशी वडीलांशी बोलणे टाळायचा. एकटाच एका खोलीत स्वत:च्या विचारात उदास पडून असायचा सोबतीला मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा.
    असंच रेडिओ ऐकताना आईच्या डोक्यात एक कल्पना आली, तिने आपल्या भावाला म्हणजेच सोहमच्या मामाला फोन केला. मामा शहरात नोकरीला होता. त्याला सोहमच्या परीस्थिती बद्दल माहिती होते. आई आणि मामाचे बोलणे झाल्यावर मामा लगेच येत्या शनिवारी सोहमला सोबत घेऊन जायला आला. जरा हवापालट होईल शिवाय शहरात तुला कुणी ओळखत नाही तेव्हा चिडवायचा प्रश्न नाही म्हणून सोहमची समजुत काढून त्याला सोबत घेऊन गेला. वडिलांना सोहम असल्याने नसल्याने काही फरक पडत नव्हता, आपली दोनचं मुलं आहेत असं मानून ते चालले होते. त्यामुळे त्यांनी सोहमला मामासोबत जाण्यासाठी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
    सोहम मामासोबत शहरात आला, कित्येक दिवसांनी तो बाहेर मोकळ्या हवेत वावरत होता, बाहेरच जग बघत होता. मामा त्याला अगदी मित्राप्रमाणे वागणूक देत त्याचा न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करत होता.  सोमवारी मामाने सुट्टी घेतली आणि सोहमला घेऊन एका कंपनीत गेला. ते होते रेडिओ रेकॉर्डींग आॉफिस. मामाचा एक मित्र तिथे काम करायचा. तिथलं वातावरण, काम करायची पद्धत सगळं सोहमला दाखवून दोघे घरी आले. मामाने सोहमची समजुत काढली आणि पटवून दिले की रेडिओ स्टेशन वर काम केले तर देवाने तुला दिलेल्या नाजूक, सुरेख आवाजाने तू सगळ्यांना जिंकू शकतो. जगाला कुठे कळणार की जो स्त्रीचा आवाज रेडिओ वर आपण ऐकतो आहे तो एका पुरूषाचा आहे.
    नोकरी मिळेल शिवाय तुझी ओळख ही सोहम नसून शिवानी म्हणून पुढे आणू. सोहमला ते पटले पण‌ हे खरंच इतके सोपे आहे का, पण प्रयत्न करायला हरकत नाही ना म्हणून मामाने सोहमची मानसिक तयारी केली. सोहमनेही त्यासाठी रेडिओ जॉकी होण्यासाठी लागणारी माहिती नेटवरून मिळवली आणि प्रॅक्टीस सुरू केली. लहानपणापासून घरात रेडिओ ऐकायची सवय असल्याने सोहमला ते इंटरेस्टिंग वाटले.
    मामाच्या मित्राच्या मदतीने बाॅसला पूर्ण परीस्थिती सांगितली आणि दोन दिवसांनी सोहमला इंटरव्ह्यू साठी बोलावले गेले.
    सोहमला “रेडिओ जॉकी” म्हणून नोकरी मिळाली. आई आणि मामा सोडून घरात कुणालाही हे माहीत नव्हते. आॅफिसमध्ये याविषयी गोपनीयता ठेवण्यासाठी बॉस कडून आदेश दिले गेलेले होते. लवकरच त्याने सगळ्यांना आपलसं केलं.
    सोहम मुळातच हुशार, त्याचा गमावलेला आत्मविश्वास मामा मुळे आणि नोकरी मुळे परत आला. नोकरीच्या ठिकाणी बाकी सहकारी सुरवातीला त्याला हसायचे पण त्याची हुशारी, त्याच्यातला आत्मविश्वास, त्याचा प्रेमळ स्वभाव बघून सगळ्यांना त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटला. लवकरच तो फेमस “रेडिओ जॉकी शिवानी” म्हणून प्रसिद्ध झाला. बेस्ट रेडिओ जॉकी म्हणूनही त्याला अवार्ड मिळाला.
    वडीलांनी सोहमचा विषय कधीच सोडला होता पण आई मात्र लपून छपून सोहम सोबत फोनवर बोलायची. त्याच्या रेडिओ वरच्या आवाजाचं कौतुक करायची.
    एकदा सामान आवरताना सोहमला एक डायरी दिसली त्यात घरात एकटा बसून असताना त्याने लिहिलेल्या बर्‍याच कविता, गाणे होते. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, एक गिटार विकत घेतली. मामाच्या मदतीने सुट्टीच्या दिवशी सोहमने लिहिलेल्या गाण्यांचे दोघे मिळून रेकॉर्डींग करायचे. सोहमने गायलेल्या गाण्यांचा एक ऑडिओ अल्बम बनवून इंटरनेट वर टाकला आणि अल्बम ला नाव दिले ‘सिक्रेट सुपरस्टार’. त्याच्या गाण्यात इतका दर्द, शब्दात अनेक भावना होत्या. इंटरनेट वर तो अल्बम वार्‍या सारखा पसरला. जो तो त्या गाण्यांचा फॅन झालेला.  हे सिक्रेट फक्त मामा भाच्यालाच माहित होते.  हा सिक्रेट सुपरस्टार कोण हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली होती.
    एकदा रेडिओ स्टेशनच्या आॅफिसमध्ये स्वतः चे गाणे गुणगुणत असताना एका सहकार्‍याने म्हणजेच साहीलने बघितले, त्यातलं एक शब्द न शब्द अगदी हुबेहूब सिक्रेट सुपरस्टार सारखा सोहम गातोय ऐकून सहकार्‍याला शंका आली. जेवायला बसल्यावर साहीलने सिक्रेट सुपरस्टार अल्बमचा विषय काढला, सगळ्यांनी खूप वाहवा केली.   साहिल सोहमच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता, ती चर्चा ऐकून सोहमला मनोमन किती आनंद झाला हे त्याने ओळखले.
    संधी बघताच सोहमला भेटून साहिल म्हणाला ” सोहम, तू जगासाठी सिक्रेट सुपरस्टार, रेडिओ ऐकणार्‍यांसाठी शिवानी आहे पण आमचा सगळ्यांचा सच्चा यार आहे. ”
    सोहमला ऐकून धक्का बसला, ह्याला कसं कळाल की सिक्रेट सुपरस्टार माझा अल्बम आहे. साहिलने सगळा किस्सा सोहमला सांगितला, जेवताना जेव्हा सगळे सिक्रेट सुपरस्टार विषयी बोलत होते तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान, जो आनंद होता त्यावरून माझी शंका खरी ठरल्याचे साहिलने सांगितले.
    साहिल म्हणाला ” सोहम, जगभरात सिक्रेट सुपरस्टार च्या गाण्यांचे चाहते आहेत, तेव्हा तू तुझी ओळख आता जगासमोर आणली तरी चाहत्यांचं प्रेम कमी होणार नाही शिवाय तुझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.”
    सोहमला मात्र भिती वाटत होती की खरी ओळख जगासमोर आली तर आता पर्यंत मिळालेली सिक्रेट सुपरस्टारची प्रसिध्दी , सगळ्यांच्या आवडत्या रेडिओ जॉकी शिवानी चे नाव खराब तर होणार नाही ना. लोकांना सत्य परिस्थिती समजली आणि कुणी ते चुकीचं ठरवून फसवणूक समजून स्विकारले नाही तर काय होईल. घराण्याचे नाव खराब होईल म्हणून आहे तेच ठिक आहे या विचाराने तो साहिलला उत्तर न देता निघून गेला.
    साहिलने खरं काय ते इतर सहकार्‍यांना सोबत बॉसला सांगितले, सिक्रेट सुपरस्टार दुसरी कुणी नसून आपली शिवानी म्हणजे आपला सोहम आहे हे ऐकून सगळ्यांना आनंद झाला शिवाय आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांना खूप अभिमान वाटला.
    बॉसने सगळ्यांना एकत्र बोलावले, त्यात सोहम होताच. सगळ्यांनी सोहमचे खूप कौतुक केले, बॉसने अनाउन्समेंट केली की आपण आपल्या चॅनल तर्फे सिक्रेट सुपरस्टारची म्युझिक कॉंसर्ट  करायची आहे आणि त्यातून सोहमची ओळख जगासमोर आणून त्याचा मान त्याला मिळवून द्यायचा. सोहमला ऐकून धक्का बसला पण बॉसने त्याला विश्वासात घेतले , कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत असेन असे आश्वासन दिले. रेडिओ चॅनल वरून सिक्रेट सुपरस्टार च्या म्युझिक कॉंसर्ट ची जाहिरात सुरू झाली. अवघ्या तीन दिवसांत सगळे तिकीट विक्री झाले.
    ठरल्याप्रमाणे सिक्रेट सुपरस्टार जगासमोर आला, फिमेल व्हाॅइस मधला ‘ सिक्रेट सुपरस्टार’  अल्बम एका पुरुषाचा आहे ऐकून सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला, पण सोबत सोहमची वाहवा झाली, न्यूनगंड दूर करून परिस्थिती वर मात देत मिळवलेली प्रसिध्दी बघून सोहम जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान म्हणून सोहम प्रसिद्ध झाला.

    त्याचा हा काटेरी प्रवास एका मुलाखतीत सांगताना आई, मामा आणि माझ्या सहकाऱ्यांमुळे मी सुपरस्टार झालो हे ऐकून आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू ओठांवर आले. वडिलांना सोहमचा खूप अभिमान वाटला, ते त्याला भेटायला गेले, माझ्या मुलाने माझी मान अभिमानानं उंचावली असं म्हणताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, त्यांनी कित्येक वर्षांनी सोहमला मिठीत घेतले. आपण किती वाईट वागणूक दिली सोहमला म्हणून पश्चात्तापाने ते सोहमला कवटाळून रडायला लागले.

    काही गोष्टी या माणसांमध्ये नैसर्गिक असतात त्या बदलता येत नसेल तरी परिस्थिती वर मात करून योग्य मार्ग नक्कीच काढता येतो. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला असेल तर नावासह शेअर करा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • नकारात्मक विचार.. जीवघेणे परीणाम-भाग २

    अनन्याला  नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता.
    गरोदरपणात तिसऱ्या त्रैमासिकित जास्त काळजी घ्यायला हवी पण अनन्या मात्र दिवसेंदिवस खचून जाऊ लागली, वेडेवाकडे विचार करू लागली. तिला बाळाची हालचाल जरा कमी वाटली की रडायला लागायची, माझ्या बाळाला काही झालं नाही ना म्हणून सतत आईला प्रश्न विचारायची. जरा पोटात पाठीत दुखले तरी घाबरून रडायची, मग डॉक्टर कडे घेऊन गेल्या शिवाय पर्याय नसायचा. एक एक दिवस आता अवघड जाऊ लागला.
    कशातच तिचं मन लागत नव्हते, सतत नकारात्मक विचार, चिडचिड सुरू असायची.
    अशातच एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले, शतपावली करताना चक्कर आली आणि ती खाली पडली. नशिबाने आई  आणि राघव सोबतच होते. त्यांनी लगेच तिला हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेले तर अनन्याचं ब्लडप्रेशर खूप वाढलेले होते आणि त्यामुळे तिला चक्कर आली होती. अजूनही ती पुर्णपणे शुद्धीत नव्हती. डॉक्टरांनी तिला अॅडमीट करून घेतले. ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, या सगळ्या प्रकाराने अनन्या अजूनच नकारात्मक होत गेली आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले, ब्लडप्रेशर वाढले. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत होते.
    बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालले होते शिवाय अनन्याची परिस्थिती नाजूक झाली होती. सगळ्यांना काळजी वाटत होती. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याचे सगळे उपाय डॉक्टर करत होते शिवाय बाळ आणि आई सुखरूप राहण्याचे प्रयत्न सुरू होते. अनन्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सहा तास होत आले तरी काही सुधारणा होत नव्हती. अशातच अचानक अनन्याला परत चक्कर आली आणि तिची शुद्ध पुर्णपणे हरपली, थोडा वेळात ती शुद्धीवर आली पण बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र थांबले होते, सातव्या महिन्याच्या अखेरीस उच्च रक्तदाब ( हाय ब्लडप्रेशर) मुळे बाळाने जन्माला येण्याआधीच या जगाचा निरोप घेतला होता.
    राघव तसेच घरी सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.
    अनन्याच्या जीवाला सुद्धा धोका होता. ती नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन उच्च रक्तदाबाच्या वेढ्यात अडकली होती, अस्वस्थ होती. अशावेळी बाळाला जास्त काळ पोटात ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे इंजेक्शन व्दारे कृत्रिम कळा आणून नैसर्गिक रित्या बाळाला बाहेर काढले गेले.
    जे काही झाले ते अतिशय धक्कादायक होते, टेंशन, नकारात्मक विचार, चिडचिड , मनात सतत दडपण यामुळे इतका मानसिक व शारीरिक त्रास अनन्याला आणि सोबतच घरी सगळ्यांनाच झाला होता.
    अनन्याला यातून सावरण्यासाठी वर्ष लागले. पण तिला समजून चुकले होते की सगळं सुरळीत चालू असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नकारात्मक विचार करून इतक्या वर्षांनी लाभलेलं मातृत्व ती गमावून बसली होती.
    यातून सावरण्यासाठी घरी सगळ्यांनी अनन्याला खूप मदत केली.
    सुदैवाने पुढे दोन वर्षांनी अनन्या आणि राघव च्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली, त्यांच्या जीवनात एका गोंडस बाळाचे आगमन झाले.

    या कथेतून हाच संदेश द्यायचा आहे की “नकारात्मक विचार किती जीवघेणे ठरू शकतात, नकारात्मकता जवळ बाळगू नका. कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक राहून शांतपणे सामना केला तर योग्य मार्ग नक्कीच मिळतो.”
    माझ्या या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमा असावी. नकारात्मकता दूर करणे हाच हेतू यामागे आहे.

    अशाच कथा वाचत राहण्यासाठी मला फॉलो करा.
    कथा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नकारात्मक विचार….जीवघेणे परिणाम- भाग १

    अनन्या आज खूप आनंदात होती, काय करू कुणाला सांगू अशा अवस्थेत  तिने आईला फोन केला ” हॅलो आई, काय करते आहे, कामात होतीस का… बरं ऐक मला तुझ्याशी बोलायचं आहे… म्हणजे तुला काही तरी सांगायचे आहे…आई…आई…. अगं तू आजी होणार आहे”, आताच आम्ही डाॅक्टरांकडे जाऊन आलो.. आई मी आज खूप खुश आहे..”.
    हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले, “अनन्या अगं किती गोड बातमी दिली तू…मी लवकरच येते तुला भेटायला.. काळजी घे बाळा… आणि हो, तुम्हा दोघांचेही अभिनंदन..”
    फोन ठेवताच सासूबाईंना अनन्याने गोड बातमी दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला.. लग्नानंतर सात वर्षांनी अनन्या आणि राघवच्या आयुष्यात एक बाळ येण्याची चाहूल लागली होती. राघवही खूप आनंदात होता, त्याने अनन्याला अलगद मिठीत घेतले आणि कपाळावर चुंबन घेत आनंद व्यक्त केला. आता स्वतःची नीट काळजी घ्या राणीसाहेब, दगदग करू नका असं म्हणतं अनन्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अनन्याला खूप प्रसन्न वाटले.
    अनन्या घरीच ट्युशन्स घ्यायची, राघव एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा.  दोघांचा प्रेमविवाह. अनन्या दिसायला अतिशय सुंदर, हुशार पण जरा चिडखोर, रागीट, आई वडिलांची एकुलती एक  त्यामुळे थोडी हट्टी मुलगी. राघव एकत्र कुटुंबात वाढलेला, नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत असला तरी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा शांत, समजुतदार मुलगा. कॉलेजमध्ये असताना अनन्या सोबत ओळख होती नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झाले आणि मग‌ लग्न. लग्नाला दोन वर्षे  झाले तसेच बाळ होण्या साठी दोघेही प्रयत्नशील होते सोबतच दवाखाना सुरू. आज लग्नाच्या सात वर्षांनी त्यांच्या जीवनात गोड बातमी आली. दोघांच्याही घरी सगळे लाड पुरवत होते, अनन्या स्वत: ची व्यवस्थित काळजी घेत होती. जेवण, आराम, फिरणं सगळं अगदी वेळेत. तिला राग येऊ नये, तिची चिडचिड होऊ नये याची पुरेपूर काळजी राघव घेत होता. असेच पाच महिने पूर्ण झाले. राघवनी नवीन घर खरेदी केले होते आणि त्याचा ताबा आता त्याला मिळणार होता. बाळाचं आगमन नवीन घरात होईल म्हणून दोघेही खूष. सामान नवीन घरात शिफ्ट करताना दगदग  नको म्हणून अनन्याला राघवने काही दिवस आई कडे ठेवले. घरच्यांच्या मदतीने नवीन घर सजवले.
    अनन्या नवीन घरात जायला खूप उत्सुक होती, ती घरी परत येताना राघवने तिचं छान सरप्राइज वेलकम केले. घरात तिच्या आवडीचे टेरेस गार्डन, रूममध्ये बाळाचे फोटो, दारात फुलांची रांगोळी, तोरणं शिवाय घरगुती वास्तुशांतीची पुजा आयोजित केली. सगळं अगदी आनंदाने पार पडले.
    नवीन ठिकाणी अजून जास्त ओळख नसल्याने आणि बाळ होणार म्हणून आता अनन्याने काही दिवस ट्युशन घ्यायचं बंद केले. सायंकाळी सोसायटीच्या आवारात अनन्या फेरफटका मारायला जाऊ लागली, त्यामुळे हळूहळू तिची ओळख होतं गेली.
    एक दिवस एका स्त्रीने तिला विचारले की ” तुम्ही नवीन रहायला आल्या का, कुठल्या मजल्यावर..”
    अनन्याने आनंदात उत्तर दिले ” हो, पाचव्या मजल्यावर, ५०५ मध्ये.”
    ते ऐकताच ती स्त्री घाबरून म्हणाली “५०५ मध्ये, जरा जपून हा.. त्यात तुम्ही गरोदर”.
    अनन्या दचकून म्हणाली” असं काय म्हणताय तुम्ही? काय झालं”.
    तिने अडखळत उत्तर दिले ” विशेष काही नाही पण असं ऐकलं आहे की आधी हे घर कुणी तरी बूक केले होते एका तुमच्या सारख्या जोडप्याने पण घराची खरेदी पक्की करून येताना त्यांचा अपघात झाला आणि ती गेली..तो अपंग झाला.. आणि मग त्यांनी ती खरेदी रद्द केली.. तेव्हा पासून ते घर घेण्याचे सगळे टाळायचे…तू काळजी करू नकोस.. होईल सगळं नीट.. वास्तुशांती केली ना..?” 
    त्या स्त्रीचे बोलणे ऐकून अनन्या हादरली.. घाबरून घरात जायला दचकली…ते ऐकल्यापासून तिच्या मनात सतत नकारात्मक विचार यायला सुरु झाले.. काही वाईट होणार नाही ना म्हणून सतत विचार करायला लावली.. अचानक झोपेतून दचकून जागी व्हायची.
    राघवला मात्र याची काही कल्पना नव्हती.
    अनन्याच्या वागण्यात बदल होत आहे हे राघवला जाणवलं. तिला विचारायचा प्रयत्न केला पण ती फक्त म्हणाली ” सगळं नीट होईल ना रे राघव.. काही संकट येणार नाही ना.. मला भीती वाटते..”
    राघव अनन्याला खूप समजावून सांगत होता की काही होणार नाही… आपल्याला बाळ होणार आहे..तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.. अनन्या अशी का वागते … गोंधळलेली का असते हे त्याला कळत नव्हतं..
    शेवटी तीन चार दिवस मनात गुंतागुंत निर्माण झाल्यावर अनन्याने झालेला प्रकार राघवला सांगितला.
    राघव ने तिची खूप समजूत काढली की हे सगळे आपण घर घेण्यापूर्वी झाले शिवाय त्यांनी फक्त घर बूक केले होते.. राहायला आले नव्हते..जे झाले तो एक अपघात होता शिवाय हे कितपत खरे आहे हे माहीत नसताना तू स्वत:ला अशा अवस्थेत त्रास करून घेऊ नकोस, तेही कुणाच्या सांगण्यावरून..तू याविषयी काही विचार करू नकोस. आपल्या आयुष्यात आनंदाचे दिवस आहेत ते एंजॉय कर…हवं असल्यास आईला आपण बोलावून घेऊ म्हणजे तुला एकटं वाटणार नाही.
    अनन्याला प्रसन्न वाटावं म्हणून शक्य तितका वेळ राघव तिला द्यायचा.. तिच्या आईला त्याने बोलावून घेतले.. आता सातवा महिना सुरू झाला.. अनन्या मात्र नकारात्मक विचारात गुंतलेली असायची.. सगळे आपापल्या परीने तिची समजूत काढून आनंदात ठेवायचा प्रयत्न करत होते पण अनन्याला नकारात्मक विचारांनी घेरले होते. जरा काही दुखले की ती टोकाचा विचार करायला लागत होती.. गरोदर असताना आनंदात राहणे किती गरजेचे आहे हे आई, राघव शिवाय डॉक्टर तिला समजून सांगत होते.. नकारात्मकता बाळासाठी तसेच अनन्या साठी घातक ठरू शकते हे सगळयांना लक्षात आले होते.
    अनन्याला यातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता..

    यातून अनन्या बाहेर पडणार की नाही.. त्याचा काय परिणाम होईल हे पुढील भागात पाहू.
    ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे..
    पुढचा भाग लवकरच… गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • संसाराचे ब्रेकअप

    संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच..
    आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..”
    होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता संजय. अजयची बडबड ऐकून त्यावर फारसं प्रत्युत्तर न देता गुपचूप तो ऐकून घेत होता. न राहवून काही वेळाने अजयने त्याला विचारले तेव्हा बराच वेळ काही नाही झालं म्हणणारा संजय शेवटी म्हणाला,”त्याच्यामुळे आज तुझ्या वहिनीचे आणि माझे भांडण झाले रे..नकोच तो मला आता आयुष्यात..म्हणजे डोक्याला ताप नसेल..”
    अजयला मात्र काही कळालं नाही..”अरे..तो कोण.. कशामुळे भांडण झालं..नीट सांगशील का तू..”
    संजय – “अरे तो रे.. मोबाईल.. त्याच्यामुळेच आमची जास्त भांडणे होतात..आज तर सकाळीच भांडण ?..नकोच मला‌ मोबाईल..”
    अजय जरा चक्रावून गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, “मोबाईलमुळे भांडणं..मला तू नीट सांग यार.. काय बोलतोय काही कळत नाही..”
    संजय – “अरे, काल रात्री ही‌ लवकर झोपली, मी आपला वेबसिरीज बघत बसलेलो मोबाईलवर..?हिने आवाज दिला असेल मधेच जाग आल्यावर..किती वेळ झालाय झोपा आता असं म्हणत , तर मला काही हेडफोन्स मुळे कळाल नाही.. झालं ना..मला‌‌ सकाळी म्हणाली तुम्ही रात्री कुणाशी चाटींग करत होते.. माझ्याकडे लक्ष नव्हतं..मी किती आवाज दिले तरी चेहऱ्यावर हास्य आणून चाटींग करत होतात.. माझ्याशी बोलायला वेळ नसतो.. घरी आले की मोबाईलवर असता सारखे.. वरून हद्द म्हणजे आजपर्यंत माझा फोटो डिपी‌ वर ठेवला नाही म्हणे तुम्ही.. फेसबुकवर टाकला नाही.. तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही.. नंतर तर चक्क संशय घेतला आणि म्हणाली, तुमची नक्कीच गर्लफ्रेंड आहे..तिला कळू नये तुमचं लग्न झालेलं म्हणून तुम्ही माझा फोटो लावत नाही डिपी ला..रडायला लागली राव स्वतःच संशय घेऊन..
    समजून घ्यायला तयार नव्हती.. शेवटी तिचा माझा सोबतचा फोटो ठेवलाय व्हॉट्स ॲप’ला डिपी.. चूक नसताना सॉरी म्हणालो.. कशीबशी समजूत काढली आणि आलो ऑफिसला.”
    हे सगळं ऐकून अजयला खूप हसू आलं..?? तो हसू आवरत म्हणाला,”डिपी न‌ ठेवण्यावरून भांडण..?? काय रे..तू घाबरून ठेवला मग डिपी दोघांचा फोटो ??”
    संजय – ” हसून घे.. तुझं लग्न झालं ना‌ कि मग कळेल तुला.. अरे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर काहीतरी शायरी पोस्ट केलेली मी… एव्हाना विसरलो होतो.. मॅडम ने वाचली एकदा आणि मागेच लागली विचारायला की कुणासाठी लिहीलेली तुम्ही शायरी.. माझ्या आधी कुणी होती का वगैरे..मी सारखं डिपी बदल.. फोटो अपलोड करणार्‍यातला नाही रे.. जास्तच काय तर वेबसिरीज नाही तर गेम..किती सांगितलं हिला पण पटतच नाही..इतरांचे कपल फोटो, रोमॅंटिक स्टेटस बघितले की आमचं भांडण ठरलेलंच.”
    अजयला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले.. मोबाईल मुळे संसारात इतके गैरसमज होतात याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

    तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना..पण खरं आहे हे.. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली “लग्नापासून एकदाही पतीने पत्नीचा फोटो डिपी न ठेवल्याने पत्नीने चक्क महिला सहायता कक्षाकडे पतीची तक्रार केली.” पोलिसांनाही ऐकून धक्काच बसला.. समुपदेशन करून दोघांची समजूत काढली गेली आणि पतीने व्हॉट्स ॲपवर पत्नी सोबतचा फोटो डिपी ठेवण्याचे मान्य केले तेव्हा दोघांमधला वाद मिटला. पोलिसांनी हेही सांगितले की हल्ली पती पत्नी यांच्यात जास्तीत जास्त वाद हे मोबाईल मुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींवरून संसाराच्या ब्रेकअप चे कारण हे मोबाईल असल्याने बरेचदा समुपदेशन करून वाद मिटतात तर कधी संशयावरून टोकाला जातात.
    मुलांमधील मोबाईलचे वेड आणि त्यामुळे होणारे पालकांचे भांडण यांचंही बरंच प्रमाण आहे..पण आता पती पत्नी यांच्या संसारात मोबाईल, सोशल मीडिया मुळे ब्रेकअप होण्याची वेळ येते म्हणजे विचार करण्याजोगे आहे..
    मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा असा अतिरेक करत जोडिदाराच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमक करणे चुकीचे नाही का?
    नात्यात एक स्पेस असणं, एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया, मोबाईल मुळे इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना करून नात्यात फूट पाडणे खरंच अयोग्य आहे. मोबाईल, इंटरनेट मुळे आपण अपडेटेड राहतो, नवनवीन गोष्टींची माहिती मिळते, जगभरात कनेक्टेड राहतो.. अशे फायदे अनेक आहेत पण त्यांच्या गैरवापर अथवा अतिरेकामुळे संसाराचे ब्रेकअप होत असेल तर वेळीच सावरायला हवे. संसारातील विश्वास जपायला हवा, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे, परिस्थिती वेगळी तेव्हा इतरांशी तुलना करून वाद निर्माण झाले तर आयुष्य सुखी होण्याऐवजी नात्यात फूट पडायला सुरुवात होईल.

    तुमचं याविषयी मत मांडायला विसरू नका ?? नकळत तुमच्या संसारात असंच मोबाईल, सोशल मीडिया मुळे गैरसमज होत असतील तर वेळीच सावरा.?? संवाद साधा.. गैरसमज दूर करा…??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

    सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच रिक्षा पकडून डॉक्टरांकडे निघाली. डॉक्टरांनी  तपासणी केली तर अंगात खूप जास्त ताप होता शिवाय तिला अशक्तपणा मुळे गरगरायला लागले होते.
    घरी आल्यावर जेवण करायला स्वयंपाक घरात गेली तर लगेच तिच्या कानावर शब्द पडले ” आज एका कामाला हात लावला नाही, सगळं मला‌ एकटीला करावं लागलं.” सुमित्राने कसे बसे दोन घास खाऊन औषध घेतले आणि जाऊन अंथरूणावर पडली तोच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिच्या मनात विचार आला, ” आपण घरी सगळ्यांसाठी किती झिजलो, कुणालाही गरज असो सुमित्रा तयार आणि आज आपल्यावर वेळ आली तर तब्येतीची साधी चौकशी नाही. वरून अपमानास्पद बोलून मोकळे होतात सगळे. आता बस झाल्या इतरांच्या सेवा, आता मी स्वतः साठी जगणार.. स्वतः ची काळजी घेणार.”
    सुमित्रा एकोणीस वर्षांची असताना लग्न करून बापूरावांच्या आयुष्यात आली. बापूराव प्रतिष्ठित घरातले , एकत्र कुटुंबात राहणारे. तिचं सौंदर्य बघता बापूराव तिला कुठे ठेवू कुठे नाही असे अगदी फुलाप्रमाणे जपायचे. नव्या नवरीचे नवलाईचे नवं दिवस संपले आणि ती जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकली. कुणालाही कुठल्या कामासाठी नाही म्हणने सुमित्राला जमत नव्हते. कुटुंबात कुठलाही सोहळा असो , कुणाचं आजारपण असो किंवा बाळंतपण असो सुमित्रा मदतीसाठी तत्पर असायची. अशा स्वभावामुळे सगळे तिची वाहवा करायचे शिवाय बापूरावांची मान अख्ख्या कुटुंबात वाढलेला बायकोच्या वाहवा मुळे अगदी ताठ असायची. सगळ्यांचं करता करता घरासाठी राबत असताना सुमित्रा आणि बापूरावांच्या नात्यात मात्र फूट कशी पडली सुमित्राला कळालेही नाही. त्यात भर म्हणजे कित्येक प्रयत्न केले तरी सुमित्राला आईपण काही लाभत नव्हते. सासूबाई ह्या त्या देवस्थानात नवस बोलायच्या, दवाखान्याच्या चकरा सुरूच पण सुमित्रा कडून आनंदाची बातमी काही मिळत नव्हती. असं करता करता लग्नाला सहा वर्षे झाली. गावातील लोक, नातलग नावं ठेवायला लागली. मग सासूबाईंनी सूर काढला बापूरावांच्या दुसऱ्या लग्नाचा, बघता बघता लवकरच अगदी मुलगी शोधून लग्न करायची तयारीच झाली. सुमित्राला ते ऐकून धक्का बसला, तिने आई वडीलांना सांगितले, त्यांची परिस्थिती जेमतेम, ते म्हणाले “अजून लहान बहीणींचे लग्न व्हायचे आहे तेव्हा तू कायमची माहेरी आली तर लोक काय म्हणतील शिवाय बहिणीच्या लग्नात अडथळा येयील.” क्षणभरात माहेरही तिच्यासाठी परकं झालं.
    सुमित्राच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. कुणालाही नाही म्हणने तर तिचा स्वभावच नव्हता. बापूरावांनी दुसरं लग्न करून सवत घरी आणली. लग्नानंतर दोन महिन्यांत तिला दिवस गेले, मग काय सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतले, तिचे लाड पुरवले जाऊ लागले. सुमित्रा दिवसभर राब राब राबून घर सांभाळायची पण कुणीही तिच्या कडे फारसे लक्ष देत नव्हते. एखाद्या मोलकरीणी  सारखी तिची अवस्था झाली होती. बापूराव सुद्धा साधं कधी प्रेमाने बोलत नव्हते, कामापुरते काम ठेवायचे. सुमित्रा रोज रडायची, आयुष्य संपवायचा विचार करायची पण काही उपयोग नव्हता.
    तिच्या सवतीचे दोन बाळंतपण तिनेच केले. अजूनही कुटुंबात कुणाला मदतीची गरज पडली की बापूराव तिला त्यांच्या घरी नेऊन सोडायचे. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन सगळ्यांचे बाळंतपण, म्हातारपणी सेवा,. लग्न असो किंवा कुठलाही सोहळा समारंभ , सगळं ओझं सुमित्रा वरच असायचं. तिची सवत सुद्धा तिला मोलकरीण समजून राबवून घ्यायची. घरात जिव्हाळा, प्रेम देणार कुणीच उरलं नव्हतं. जिथे नवराच आपला राहीला नाही तर इतरांकडून काय अपेक्षा असं समजून सुमित्रा जगत होती, माहेरी सुद्धा एक पाहुणीच. अशातच वयाची पन्नाशी जवळ आली, तब्येत आधी सारखी धडधाकट राहीली नव्हती, पण कुटुंबात अपेक्षा मात्र संपल्या नव्हत्या.  असंच आज अंगात इतका ताप असूनही साधी विचारपूस तर नाही पण कामात मदत केली नाही म्हणून तिची सवत तिला कुरकुर करत होती. औषधी घेऊन जरा वेळ सुमित्राला झोप लागली.
    काही वेळाने जाग आली तर कानावर शब्द पडले ” सुमित्रा आहे ना, पाठवा की तिला.”
    ते ऐकताच सुमित्रा बाहेर आली तर बापूराव,त्यांच्या आई आणि सवत बोलत होते. सुमित्राला बघताच सासूबाई म्हणाल्या “सुमित्रा, लहान काकी दवाखान्यात भरती आहे, तुला त्यांच्या जवळ जावं लागेल. एक जण बाई माणूस पाहिजे त्यांच्या सेवेत.”
    त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सुमित्रा म्हणाली “मी जाणार नाही, माझ्या अंगात इतका ताप, अशक्तपणा, तुम्हा कुणाला माझी अवस्था कळत नाही, माझा फक्त गरजेच्या वेळी वापर केला इतके वर्ष तुम्ही. पण आता बस..मला नाही जमणार जायला. हे तसं तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता माझे डोळे उघडले. सूनेच्या नात्याने कर्तव्य म्हणून मी राबत गेले पण आता बस.. नाही जमणार मला.”
    सगळे सुमित्राच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. सुमित्राचे हे रुप सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. उशीरा का होईना पण नाही म्हणण्याच्या कलेत सुमित्रा नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत होती, स्वतः साठी जगण्याची नवी उमेद तिच्या मनात नव्याने जागी झाली होती.

    अशा अनेक सुमित्रा आज समाजात आहेत ज्यांना नाही म्हणता येत नाही आणि म्हणून मग सगळे फायदा घेतात. अशावेळी घरात कुणालाच आपुलकी नसेल तर त्याचा किती त्रास होतो हे सहन करणार्‍यालाच माहीत असते म्हणूनच योग्य वेळी नाही म्हणने खुप गरजेचे असते.

    लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही. लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे