Tag: Love story

  • ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे.

    रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते.
    मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
    टपोरे डोळे, निरागस चेहरा, नाजुक अंगकाठी, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट असलेली रिया अनिकेतला बघता क्षणीच आवडते.
    अनिकेतही तिच्या तोलामोलाचा, आकर्षक अशी पिळदार शरीरयष्टी, दिसायला राजबिंडा. अनिकेत आई बाबांना एकुलता एक, त्यामुळे अतिशय लाडका. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. स्वभावाने प्रेमळ पण आई म्हणेल ती पूर्व दिशा अशा काहीशा विचारांचा.
    दोघांचे लग्न ठरले, दोन्ही कुटुंबे अगदी धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीला लागले होते. काही महिन्यांनी लग्न झाले.
    दोघांचे लग्न ठरल्यापासून रियाला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं त्याला.
    लग्न ठरल्या पासून  लग्न होत पर्यंत तो दररोज रियाला न चुकता भेटायचा. रियाचे ऑफिस जवळच असल्याने रोज सायंकाळी तिला भेटणे सोपे होते. रियालाही त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं, त्याच रोज भेटणं , एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणं तिला खूप सुखद वाटायचं. तिचा शांत , प्रेमळ स्वभाव , निरागस असं सौंदर्य याचे कौतुक करताना तो कधीच थकत नव्हता.  दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले होते, लग्न झाल्यावर ती घरी आली तेव्हा त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
    तिला नववधू च्या रूपात बघून त्याची परत एकदा विकेट उडाली होती. घरत बरीच पाहुणे मंडळी असताना लपून छपून तिच्याशी बोलायला यायचा, तिची झलक बघायला सतत बहाणा शोधायचा. सगळे चिडवत म्हणायचे सुद्धा,  याला काही चैन पडत नाही बाबा बायको चा चेहरा बघितल्या शिवाय. पूजा विधी सगळं आटोपलं, पाहुणे मंडळी परत गेली. राजा राणीच्या संसाराला प्रेमाने सुरवात झाली. दोघांची पहिली मिलनाची रात्र तिला अजुनही आठवते,  किती उत्साहाने त्याने सगळी तयारी केली होती त्याने , ते खास क्षण अविस्मरणीय बनविण्याची. आयुष्यात कधी साथ सोडणार नाही म्हणत हातात हात घेतला तेव्हा किती सुरक्षित वाटलं होतं..किती गोड्या गुलाबी ने दोघांचा संसार सुरु झाला होता. एकत्र ऑफिसला निघायचं, मौज मजा मस्ती, भरभरून प्रेम, किती गोड दिवस होते ते. झालं ते नव्या नवलाईचे नवं दिवस भुर्रकन उडून गेले, जणू कुणाची दृष्ट लागली दोघांच्या प्रेमाला. अनिकेत चे आई बाबा दुसऱ्या गावी राहत असले तरी अनिकेत ची आई सतत त्याला फोन करायची, घरी आलास का, इतका वेळ बाहेर कशाला फिरायचे, बायको डोक्यावर बसेल, जरा धाकात ठेव असेही सल्ले द्यायचे. त्याचे बाबा मात्र या सगळ्याच्या विरोधात, ते उलट सांगायचे नविन आयुष्याची सुरवात  आहे, खूप एन्जॉय करा पण बाबांनी आईला क्रॉस केले की अनिकेत ची आई मोठा ड्रामा करायची.

    जेव्हा रियाला हे सगळं कळालं तेव्हा सासूबाईंच्या विचारांची तिला कीव आली. मुलगा सुनेचा संसार आनंदाने चाललेला जणू त्यांना बघवत नव्हते की आपला मुलगा आपल्या पासून दूर जातोय अशी असुरक्षितता, एक प्रकारची भिती त्यांना वाटत होती, कोण जाणे.

    एकत्र राहत नसले तरी सतत फोन करून अनिकेत ला आई सगळे अपडेट विचारायची. अनिकेत सुद्धा त्यांना एकुण एक लहानसहान गोष्टी सांगायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण हळूहळू सगळं विचित्र वाटत होतं रियाला. ती याबाबत अनिकेतला काही बोलली की त्याला वाटायचं रियाला माझे आई बाबा नकोय, दूर राहतात तरी इतक्या तक्रारी करते ही.. झालं अशा गोष्टींवरून वाद सुरू झाले. लग्नाला एक वर्षही झाले नव्हते,  अशाच गोष्टी वरून एकदा दोघांचा वाद झाला आणि रिया रागारागाने आई कडे निघून गेली. रियाचे आई बाबा त्याच शहरात राहायचे तेव्हा राग शांत झाला की अनिकेत नक्कीच घ्यायला येणार याची तिला खात्री होती पण झालं वेगळंच. अनिकेतने रिया अशी निघून गेल्याचा राग मनात धरून ठेवला, मी का माघार घ्यावी म्हणत त्यानेही पुढाकार घेतला नाही. अनिकेत चे आई बाबा त्यादरम्यान त्याच्याजवळ रहायला आले.
    इकडे रिया त्याची वाट बघत एक एक दिवस मोजत होती आणि तिकडे आईच्या सल्ल्याने, धाकाने अनिकेत काही रियाला घरी आणण्याचा पुढाकार घेत नव्हता. अनिकेत चे बाबा त्याला खूप समजवायचा प्रयत्न करायचे, आईचं ऐकून दोघांमध्ये फूट पडू नये म्हणून प्रयत्न करायचे पण आईपुढे काही अनिकेत ठाम भूमिका घेत नव्हता.
    रिया ची आई तिला समजून सांगायची पण तो घ्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही या रियाच्या निर्णयामुळे आई बाबांचे काही एक चालत नव्हते शिवाय अनिकेत आणि त्याच्या घरच्यांची विचित्र विचारसरणीची कल्पना तिने घरी दिल्यावर रियाच्या बाबांनाही अनिकेत चे वागणे पटले नव्हते. अशातच एक दिवस अचानक अनिकेत कडून डिव्होर्स नोटीस आली आणि रिया हादरली.

    नवरा बायको यांच्यात भांडण, मतभेद हे होतातच पण असं अचानक डिव्होर्स नोटीस बघताच रियाला काही कळत नव्हतं, अनिकेत विषयी आधी जरा राग मनात होताच पण आता त्याच्या अशा वागण्याने तिला अजूनच संताप आला. त्याला , त्याच्या घरच्यांना मी नको असेल तर मलाही जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात परत जायचं ना नाही असा विचार करून ती आई बाबांकडे राहू लागली. 
    अशातच सहा महिने गेले आणि आज अचानक अनिकेत रियाला भेटला.

    अनिकेत रियाला सांगू लागला, “रिया अगं तू अशी रागात निघून गेली तेव्हा माझी खूप चिडचिड झाली, राग मलाही आलेलाच. तुला माझ्या घरच्यांशी प्रोब्लेम आहे असं मला वाटलं, माझं खरंच चुकलं रिया. तू निघून गेल्यावर आई बाबा आले, त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा बाबांनी मला तुला परत आणण्यासाठी खूप समजावले पण आईला ते मान्य नव्हते. आईला वाटत होतं मी तुझ्यामध्ये खूप गुंतल्या मुळे तिला मी विसरतो की काय..आईचा खूप लाडका ना मी म्हणून कदाचित तिच्यापासून दूर जाण्याची भिती तिला वाटली असावी. तुझ्याविषयी का माहित नाही पण एक राग, चिड तिने मनात धरून ठेवली. मी खूप गोंधळलो, आई बाबा आणि बायको प्रत्येकाची आयुष्यात एक वेगळी जागा असते हे मला खूप उशीरा कळलं. मला निर्णय घेता येत नव्हता, तुझ्या शिवाय एकटा पडलो होतो मी, मनात सतत कुढत होतो पण मनातलं सगळं बोलून दाखवता येत नव्हतं मला, तुझी खूप आठवण यायची पण तुला कसं सामोरं जावं कळत नव्हतं शिवाय आई परत ड्रामा करेल , चिडेल म्हणून वेगळाच धाक. अशातच मला कंपनीतर्फे विदेशात जाण्याची संधी चालून आली. आई म्हणाली वेळ गेली, राग शांत झाला की तू स्वतः परत येशील, तिला राहू दे काही दिवस माहेरी, तू ही संधी सोडू नकोस. झालं, परत मी भरकटलो, मला खूप मनापासून वाटत होतं तुला ही बातमी सांगावी पण त्या दरम्यान तुझ्या आई बाबांनी मला तुला भेटू दिले नाही, त्यांना माझा राग आलेला. तूसुद्धा फोन उचलले नाही. मी सहा महिन्यांसाठी लंडनला गेलो. कामाच्या, नविन प्रोजेक्टच्या व्यापात गुंतलो. तुझी आठवण सतत यायची, तुला मेसेज केले पण तू मला उत्तर देत नव्हती. आपल्यात काही कम्युनिकेशन राहीले नव्हते आणि म्हणूनच गैरसमज निर्माण झाले.
    इकडे आईने बाबांना असं सांगितलं की रियाला अनिकेत सोबत राहायची इच्छा नाही. आपल्या घरच्यांमध्येही गैरसमज झालेले त्यामुळे आईने त्या संधीचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीने तुला डिव्होर्स नोटीस पाठवली आणि परिस्थिती अजूनच बिघडली. मी परत आलो तेव्हा बाबांकडून मला सगळं कळालं, पण तू माझ्यासोबत राहायला तयार नाही यावर माझा विश्वास नव्हता. तुला डिव्होर्स नोटीस पाठवली हे ऐकून मला मोठा धक्का बसला, खूप रडलो मी बाबांजवळ, पण त्याक्षणी माझे डोळे उघडले. आईच्या संकुचित स्वभावामुळे आपल्या सगळ्यांमध्ये गैरसमज झाले, आपल्या दोघांमध्ये फूट पडली. मला कळून चुकलं की माझी ठाम भूमिका नसल्याने आपल्या नात्यात विष पसरलं. आई, बाबा आणि बायको प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात घेऊन मी नातं जपलं असतं तर अशी वेळ आली नसती. पण रिया अजूनही वेळ गेलेली नाही, मला तू हवी आहेस. मला एक संधी दे..परत असं नाही होणार..मी तुझाच आहे आणि तुझी साथ मी नाही सोडणार..मला माफ कर रिया.. प्लीज मला माफ कर.. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..गेले सहा महिने जो दुरावा निर्माण झाला त्यामुळे मला खरंच माझ्या प्रेमाची जाणीव नव्याने झाली आहे मला..”

    हे सगळं ऐकून रियाला काय बोलावं कळत नव्हतं, तिचं खरंखुरं प्रेम होतं त्याच्यावर. दोघेही वेगळे राहून मनोमन कुढत, रडत होते पण मीपणा, गैरसमज यामुळे पुढाकार कुणी घेत नव्हते.
    रिया काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.
    अनिकेत तिला म्हणाला , ” रिया मी तुझ्या आई बाबांशी बोलून माफी मागतो, तुला मानाने आपल्या घरी परत घ्यायला येतो..आई ला बाबांनी समजावले आहे, तिचा स्वभाव बदलला नाही तरी मी यापुढे कधीच साथ सोडणार नाही. बाबा आणि मी तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सुट्टी आहे, मी घ्यायला येतो तुला, आपल्या हक्काच्या घरी घेऊन जायला. मला खरंच एकदा माफ कर.. खूप प्रेम आहे रिया माझं तुझ्यावर..”

    रियाने अश्रू पुसत मानेनेच त्याला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते. अनिकेत ने रियाचा हात हातात घेतला त्या क्षणी तिला त्यांच्या लग्नानंतर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तोच स्पर्श, तिच भावना आता नव्याने जागी झाल्याची तिला जाणीव झाली.रियाच्या आई बाबांना या गोष्टीचा आनंदच होईल हे तिला माहीत होते.
    तिलाही हेच हवं होतं. त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने त्याला माफ केलं. दोघांचे नाते आज परत एकदा नव्याने बहरले.
    किती तरी वेळ ते हातात हात घेऊन शब्दाविना बरेच काही बोलले.

    दूर राहून त्यांच्यातील नातं आज अजूनच घट्ट झालं आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.

    खरंच बर्‍याच जणांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नवरा बायको यांच्यातील नात्यात गैरसमज, मतभेद यामुळे फूट पडते. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घेतले, ठाम भूमिका घेऊन विश्वास जपला तर नातं तुटण्या ऐवजी जोडल्या जाईल. अनिकेत ला उशीरा का होईना पण त्याच्या चुकीची जाणीव झाली, आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात आलं म्हणून दोघांचे नाते नव्याने बहरले.

    समाप्त.

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

    “रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.”

    अनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती.
    मनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता काय फायदा भेटून बोलून.. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीस… माझ्यावर विश्वास ठेवून कधी माझी बाजू समजून घेतली नाहीस…किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर, वाटलं होतं अनिकेत कधीच माझी साथ सोडणार नाही पण ह्याने इतका मोठा धक्का दिला मला.. नाही मी नाही भेटणार परत अनिकेत ला…आता आमचे मार्ग वेगळे आहेत..”

    अशा भूतकाळातल्या विचारचक्रात गुंतली असताना मैत्रिणीच्याआवाजाने रिया भानावर आली.
    “अगं रिया, लक्ष कुठे आहे तुझं..कधी पासून आवाज देत आहे तुला मी…लंच ला जायचं ना..मला जाम भूक लागली आहे गंं..” ( रियाची मैत्रिण पूजा तिला म्हणाली )

    रिया आणि पूजा गेली पाच वर्षे एकाच ऑफिसमध्ये नोकरीला. दोघींची चांगली मैत्री जमलेली, एकमेकींच्या सुखदुःखात , अडीअडचणीला एकमेकींच्या सोबतीला असायच्या त्या.
    अनिकेत दूर गेल्यानंतर रियाला सावरायला पूजाने बरीच मदत केलेली. पूजा अतिशय बिनधास्त पण समजुतदार मुलगी, ज्याचं चुकलं त्याला स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं आणि हसतखेळत जगायचं असा तिचा जगण्याचा फंडा. 
    रिया मात्र भाऊक, शांत स्वभाव, जरा अबोल. पण पूजा जवळ मनातलं सगळं सुखदुःख सांगायची ती, अगदी विश्वासाने आणि पूजाही तितक्याच आपुलकीने तिचा विश्वास जपायची.
    दोघीही लंच ला निघाल्या, आज परत रियाला असं गप्प गप्प बघून पूजा म्हणाली, “काय मॅडम, आज परत मूड खराब दिसतोय…काय झालंय..सांग पटकन..”
    रिया पडलेल्या चेहऱ्याने चिडक्या सुरात तिला सांगू लागली, “काही नाही गं, आज अनिकेतचा मेसेज आला.. त्याला मला भेटायचं आहे… आता मी जरा सावरायला लागले तर ह्याचा मेसेज आला एकदा भेट म्हणून.. खूप राग आहे गंं मनात पण तरी वाटतयं भेटावे का एकदा..पण असंही वाटतं का भेटायचं मी…गेली सहा महिने वेगळे राहीलो आम्ही तेव्हा नाही आठवण झाली माझी.. डिव्होर्स नोटीस पाठवताना काही नाही वाटलं..आता अचानक काय भेटायचं ….का म्हणून भेटू मी..”
    पूजा तिला समजावून सांगत म्हणाली, ” रिया तू शांत हो बघू.. अगं तुला नाही भेटायचं ना मग नको विचार करुस..हे सगळं जरा अवघड आहे पण तुला आता निर्णय घेतला पाहिजे.. यातून बाहेर पडायला पाहिजे..”
    रिया रडकुंडीला येत म्हणाली, “मी अजूनही खूप मिस करते गं अनिकेत ला..त्याच्या शिवाय अख्खं आयुष्य जगण्याची कल्पनाही करवत नाही मला.. वाटतं जावं त्याच्या जवळ, त्याला भेटून, भांडून  अनिकेतला परत मिळवावं पण त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली त्या क्षणापासून खूप राग येतोय त्याचा… खूप गोंधळ उडाला गं माझ्या मनात..काय करावं खरंच सुचत नाही मला आता..”

    पूजा तिची अवस्था समजून होती, तिला धीर देत ती म्हणाली, ” रिया, तू एकदा भेटुन सगळं क्लिअर का करत नाही..मला अजूनही कळत नाहीये की अनिकेत इतका कसा बदलला..नक्की काय झालं की त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली…मला खरंच वाटत अगं तू एकदा त्याला भेटायला पाहिजे.. सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे..”

    रियाला सुद्धा मनातून वाटत होतं एकदा अनिकेत ला भेटावे, त्याला जाब विचारावा. आता पूजा ने म्हंटल्यावर खरंच एकदा त्याला भेटायच ठरवलं.

    ठरलेल्या वेळी रिया त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच तिच्या ऑफिस जवळच्या बागेत पोहोचली. दुरूनच एका बाकावर अनिकेत पाठमोरा बसलेला तिला दिसला. त्याला बघता क्षणीच धावत जाऊन मिठी मारावी असं तिला वाटलं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याच्या दिशेने जायला निघाली. जसजशी ती त्याच्या दिशेने जात होती तसतशी तिची धडधड वाढत होती.
    जसे दोघे एकमेकांसमोर आले तसाच अनिकेत उठून उभा झाला, रियाचा निरागस चेहरा बघताच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली, नजरानजर होताच तिच्या अश्रूंनी वाट मोकळी केली. किती तरी वेळ फक्त नजरेने बोलत होते ते, त्यालाही भावना आवरता येत नव्हत्या. इशारा करतच त्याने तीला बाजुला बसायला सांगितलं. ती त्याची नजर चुकवत इकडे तिकडे बघत होती. अनिकेत तिला शांत करत म्हणाला, “रिया प्लीज अशी रडू नकोस..आधी तू शांत हो.. मला माहिती आहे माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली आहे पण मला माझी चूक कळून चुकली गं..नाही राहू शकत मी तुझ्याविणा..एक संधी दे मला..आपल्या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले आहेत..मला तेच दूर करायचे आहेत.. म्हणूनच तुला बोलावलं मी भेटायला..मला खात्री होती तू नक्कीच येणार…”
    रिया अश्रू आवरत म्हणाली, “गैरसमज.. आपल्यात.. खूप लवकर कळालं रे तुला..सहा महिने आठवण नाही झाली माझी.. आणि संधी कशाची मागतोय..तुला तर डिव्होर्स पाहिजे ना… नोटीस पाठवलीस ना मला..मग आता काय बोलायचं बाकी राहीलं अनिकेत..तू माझा अनिकेत नाहीस..ज्याच्यावर मी प्रेम केलेलं तो अनिकेत तू नाहीस..तो माझ्याशी असा कधीच वागला नसता.. तुझ्या अशा वागण्याने माझी काय अवस्था झाली असेल कधी विचार केला तू…”
    अनिकेत अपराधी भावनेने उत्तरला, ” रिया अगं ती डिव्होर्स नोटीस मी पाठवली नाही..तुला खरंच असं वाटतं का गं मी इतका वाईट वागेल तुझ्याशी.. मान्य आहे तुला मी दुखावलं, माहेरी जायला सांगितलं पण डिव्होर्स नोटीस खरंच मी नाही पाठवली..मी सगळं सांगतो तुला..मला तू हवी आहेस…मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय…”
    अनिकेत चे बोलणे ऐकून रिया आश्चर्य चकित झाली, अनिकेत ने नोटीस नाही पाठवली मग कुणी पाठवली.. आणि का…पण मग अनिकेत सहा महिने भेटला नाही..बोलला नाही त्याचं काय..या सगळ्या विचाराने ती जरा गोंधळली.

    क्रमशः

    रिया आणि अनिकेत यांच्या आयुष्यात नक्की काय झालं जाणून घेऊया पुढच्या भागात ?
    पुढचा भाग लवकरच…

    तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार..मग कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

    लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पहिल्या प्रेमाची पहिली भेट..??

    तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का. 

    अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढचं सगळं ठरवणार होते. 

    ती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी. 

    ती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.

    ठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.

    तो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तिच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तरे मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं. 

    नंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तिने विचार करायला जरा वेळ घेतला. 

    त्याला भेटल्या पासून ती मनात एकच गाणं गुणगुणत होती.

    ” उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…..”

    रात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.

    सोबतच गाण्याच्या पंक्ती आठवतं होत्या,

    “जब वो मिले मुझे पहली बार
    उनसे हो गई आँखे चार
    पास ना बैठे पल भर वो
    फिर भी हो गया उनसे प्यार..”

    पुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरलं. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.

    हळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.

    दोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते. 

    त्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

    त्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं. 

    दोघंही सगळं आनंदाने अनुभवत होते,

    “पहला पहला प्यार है….पहली पहली बार है….

    अशीच दोघांची अवस्था झाली होती ?

    लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं तिच्या मनात येवून ती हळवी होत होती. 

    त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं. 

    लग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. ???

    अशीही छोटीशी प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्या प्रेमाची पहिली भेटीची?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

    पंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले.

    कंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात काय माल आहे.. ”

    आजोबा हसून उत्तरले,

    “काय माल बिल नाही बाबा…आमच्या म्हातारीनं मोठ्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर आलेले टमाटर, मिरची, वांगे , कोथींबीर हाय..तालुक्याला आज बाजार हाय.. तिथं जाऊन इकतो..जरा का होईना पैसा मिळेल तितकाच म्हातारीच्या हातात तिच्या मेहनतीचा मोबदला..पण न चुकता त्या पैशातले काही पैसे मलाही देते ती मोठ्या प्रेमानं तिकीट काढून जाऊन विकण्याचा मोबदला म्हणून..”

    आजोबांचं उत्तर ऐकून कंडक्टर आणि आजुबाजुच्या लोकांना आजी आजोबांचे प्रेम बघून खूप उत्सुकता वाटली. शेजारच्या सीटवर बसलेल्या एका तरूणाने आजोबांना विचारले “किती मोबदला मिळतो आजोबा..आणि एरवी मग कशावर चालतं घरदार..”

    आजोबा – ” पोरा, मी सरकारी नोकरीत होतो. मिळते जरा पेंशन… दोघांना पुरेसं हाय तितकं पण आमच्या म्हातारीला आधीपासूनच स्वतः च्या कमाईचे पैसे बटव्यात असल्याशिवाय काही दम निघत नाही. अगुदर तीच जायची बाजारी पण आता तिच्या आजारपणामुळे तिच्या कडून प्रवास व्हत नाय… म्हणून म्या जातुय..तिची औषधं बी आणल्या जातात.. म्या कधी जवळचे पैसे टाकून खोटं बोलून जास्त पैसे दिले तरी म्हातारी लगेच वळखते..लय हुशार हाय ती..”

    अशाच गप्पा सुरू असताना आजोबांचा स्टॉप आला आणि ते उतरले. दिवसभर भाजी विकून तीनशे वीस रुपये जमलेले. आजीने दिलेला जेवणाचा डबा खाऊन आजोबा म्हातारीचे औषधे घ्यायला गेले. वाटेत गजरा विकणारा लहान मुलगा त्यांना दिसला. खिशातून दहा रुपयांची नोट काढून आजोबांनी आजी साठी मोगर्‍याचा गजरा घेतला. आजोबा परतीला निघाले, घरी पोहोचताच आजीच्या पांढर्‍या केसांच्या आंबाड्यात गजरा माळून तीनशे वीस रुपये आजीच्या हातात ठेवले. आजीने वरचे वीस रुपये मोठ्या प्रेमाने आजोबांना मोबदला म्हणून दिले आणि म्हणाल्या,

    “हे वय हाय होय माझं गजरा माळायचं.. तुमी पण उगाच खर्च करता..”

    DLF

    आजोबा लाडात येऊन आज्जीची मस्करी करत म्हणाले, “अगं आज आपल्या लग्नाचा पंचावन्न वा वाढदिवस.. म्हणून लय प्रेमानं आणलायं बघं गजरा..”

    आजी लाजून , “ठाउक हाय मला म्हणून तर तुमच्या आवडीचा बेत केला रातच्या जेवणाला.. पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी ते बी म्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या झाडाचे ताजे वांगे बरं का..चला हात पाय धुवा..चहा ठेवते.”

    आजी आजोबांच्या घरी नेहमी मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा..आजही सुरू होता आणि त्यावर गाणं लागलं होतं,

    “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं….”

    आजी आजोबांना मुलं बाळं नव्हते. दोघेच गावातील घरात राहायचे, अख्या गावातील मुलांचे लाडके होते दोघेही कारण सगळ्यांना जीव लावायचे मग ते पशू पक्षी का असेना. काही गोडधोड केले की आजुबाजूला, येणाजाणार्‍याला आग्रहाने खाऊ घालायचे. आजोबा सरकारी नोकरीत कामाला, आजीने सुरवातीपासूनच अंगणात छान बाग तयार केलेली. त्यात फुले, फळे, भाज्या सगळंच असायचं. आजी मग गावच्या बाजारात तर कधी तालुक्याला जाऊन ते विकून यायच्या. आजोबा म्हणायचे अगं मी चांगला सरकारी नोकर, दोघांना पुरून उरेल इतकं आहे आपल्याकडे, कशाला उगाच राबतेस पण आजीच मत असं की कुठल्याही कामाची लाज नको वाटायला शिवाय माझ्या मेहनतीचे पैसे बटव्यात असल्याशिवाय मला नाही बाई आवडत.
    आजोबांना आजीच्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटे.

    आजीचं मन राखायला आजोबाही मदत करायला लागले होते.

    आजीला दम्याचा त्रास होता त्यामुळे ये-जा करणे आता पेलायचे नाही पण आजोबा मात्र अजूनही तरतरीत.‌ दोघेही छान बाग कामात, घरकामात एकमेकांना मदत करायचे. आजोबा अगदी चिरतरुण हृदय असलेले, गमतीजमती करत आजीला हसवायचे, चिडवायचे. गावात अनेक जोडप्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते.

    एकदा अशेच आजोबा तालुक्याला जाऊन सायंकाळी घरी आले, बघते तर काय दरवाजा उघडा आणि आजी झोपलेली. आजोबांनी आजीला आवाज दिला आणि नेहमीप्रमाणे मस्करीच्या सुरात म्हणाले, “आज कशी काय सायंकाळी झोपली गं, मला दुरून येताना बघून मुद्दाम जाऊन झोपली वाटतं.. बरं आज मीच करतो च्या दोघांसाठी मग तर झालं..बरं आइक ना आज तुझ्या बागेतले पेरू सगळे विकल्या गेले. हे घे सगळे धरून चारशे साठ रुपये हाती आले…”

    आजोबा हात पाय धुवून परत आले तरी आजी काय उठल्या नव्हत्या. आजोबांनी जाऊन हलवले तर आजी स्तब्ध होऊन निर्जीव वस्तू सारख्या पडल्या होत्या, बाजुला आजीचा बटवा सुद्धा होता. आजोबा घाबरले, शेजारच्या गण्याला हाक मारली, आजोबांच्या हाकेने आजुबाजुची मंडळी घरी आली, बघतात तर काय , आजी आजोबांना कायमच्या सोडून गेल्या होत्या. घरात मंद आवाजात आजीच्या रेडिओ वर गाणे सुरू होते,

    “भातुकलीच्या खेळा मधली..राजा आणिक राणी…

    अर्ध्या वरती डाव मोडला अधुरी एक कहाणी….”

    आजी गेली म्हणताच आजोबा ढसाढसा रडायला लागले. थंडीचे दिवस त्यात आजीला दम्याचा आजार असल्याने श्वास घेताना त्रास होऊन त्या गेल्या असल्याची शक्यता गावातील वैद्याने सांगितली.

    आजीच्या जाण्याने आजोबा खूप खचले, आता कुणासाठी जगायचे असं म्हणत स्वतः कडे दुर्लक्ष करत त्यांनीही स्वतः च्या तब्येतीवर चांगलाच परिणाम करून घेतला.
    आजी आजोबांनी मिळून तयार केलेली बाग, बागेतील प्रत्येक झाडाला , इवल्या इवल्या रोपट्याला आजीने जिवापाड जपले होते. आजीच्या जाण्याने आजोबां सोबतच बाग ही ओसाड , सुकलेली दिसत होती.

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

    मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.

    दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न करीत होता. कार मधून दोघेही निघाले, रेडिओ वर मंद आवाजात गाणे सुरू झाले,

    “तेरे बिना जिया जाए ना…

    बिन तेरे…तेरे बिन….साजना

    सांस में सांस आये ना…”

    अदितीने चॅनल बदलले..

    दुसऱ्या चॅनल वर गाणे लागले,

    “बहुत प्यार करते है…तुमको सनम…”

    अदितीला जास्तच अवघडल्यासारखे वाटले आणि तिने रेडिओ बंद केला.

    अविनाश तिची घालमेल बघत होता, तो लगेच म्हणाला, “आपल्या सिच्युएशन वर गाणे लागताहेत असं वाटतंय ना..”

    अदिती त्यावर काही बोलली नाही, नजर चुकवत इकडे तिकडे बघत विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली.

    अविनाश – “अदिती, मी खूप मिस केले गं तुला दोन वर्ष..तू अचानक पूर्ण पणे संपर्क तोडला माझ्याशी तेव्हा मी खूप झुरलो तुझ्यासाठी..एका सहकार्‍याकडून तुझी चौकशी केली, तू स्वतः ला कामात झोकून घेतलं असं कळालं..तुझी कंपनीतील प्रगती ऐकून आनंदी झालो पण तू माझ्या पासून दूर जातेय हा विचार सहन होत नव्हता गं मला.. असं वाटत होतं यावं, भेटाव तुला पण कुठलही नातं तुझ्यावर लादायचं नव्हतं मला.

    दोन वर्षांनंतर आज आपली भेट झाली, अख्खा दिवस तुला भेटण्यासाठी तळमळत होतो पण तू कामात गुंतलेली बघून डिस्टर्ब नाही केलं तुला शिवाय तू आज मला बघून काय प्रतिक्रिया देशील याचीही खात्री नव्हती. खूप छान वाटतंय आज तुझ्यासोबत…भावना आवरू नाही शकलो मी.. म्हणून सगळं बोलून गेलो…”

    अदिती त्याचं बोलणं ऐकून रडायला लागली जणू दोन वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर पडत होत्या. ती अशी रडताना पाहून अविनाश ला अपराधी वाटू लागले तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून तिची समजुत काढत म्हणाला, 

    “अदिती, तुला दुखवायचं नाही गं..सो सॉरी..मी नको होतं असं सगळं अचानक बोलायला…माफ कर मला.. प्लीज रडू नकोस..शांत हो…”

    अदिती त्यावर उत्तरली,

     “तुला काय वाटतं रे..मी खूप निर्दयी आहे..तुला दोन वर्ष अवघड गेली पण इकडे माझं काय.. कितीही आवरलं स्वतः ला तरी एक दिवस असा नव्हता की तुझी आठवण आली नसेल. मीही तितकीच झुरले तुझ्यासाठी फक्त मला व्यक्त होता येत नव्हतं. तुझ्याशी संपर्कात राहीले तर अजूनच गुंतल्या जाईल मी तुझ्यात असं वाटायचं म्हणून टाळत आले तुला..तू कदाचित वेळेनुसार मला विसरशील.. तुझं आयुष्य आनंदाने जगशील असं वाटलं होतं..तू गेल्यावर हा पाऊस, ती कॉफी सुद्धा नको वाटायची मला..कारण त्यात आपल्या अनेक आठवणी दडलेल्या होत्या. आज तू समोर दिसताच वाटलं मोकळं करावं मन, सांगावं तुला की माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर पण हिम्मत होत नव्हती माझी.. इतक्यात आई बाबांनी काही स्थळ आणले माझ्यासाठी तेव्हा खूप गरज वाटली होती मला तुझी.. दुसऱ्या कुणाचा विचार करूच शकत नव्हते मी..आई बाबांनाही कळाल होतं माझ्या मनात काही तरी गोंधळ उडाला आहे पण कसं विचारावं कदाचीत त्यांना सुद्धा कळत नव्हतं..अगदी वेळेत परत आलास तू…आज तू व्यक्त झालास आणि मी कमजोर पडले.. आवरले नाही मला अश्रू… तेव्हाही आवडायचा तू मला पण मन मानत नव्हतं.. आजही आवडतोस, हवाहवासा वाटतो तुझा सहवास..आय लव्ह यू अविनाश…”

    अविनाश अदितीचा हात हातात घेत म्हणाला ” आय लव्ह यू टू अदिती..आजचा दिवस खुप खास आहे माझ्यासाठी…चल पुढे कॉफी शॉप आहे..आपला हा आनंद साजरा करायलाच पाहिजे ना…”

    अदितीने गोड स्माइल देत होकार दर्शविला आणि तिच्या गालावरची खळी बघून अविनाश अजूनच घायाळ झाला.

    दोघांनीही मस्त कॉफी घेतली, अविनाश ने अदितीला घरी सोडले. वाटेत मंद आवाजात गाणे सुरू होते,

    “पहला नशा, पहला खुमार नया प्यार हैं नया इंतज़ार करलूँ मैं क्या अपना हाल ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार तू ही बता……”

    दोघांच्याही भावना आज नकळत बाहेर पडल्या आणि त्यांच्या प्रेमाची गोड सुरवात झाली.

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १

    अदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली,

    “नेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस…? कधी थांबतो कुणास ठाऊक….चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल..”

    अदिती कॉफी घ्यायला निघाली आणि जाताना आजुबाजूला फ्लोअर वर एक नजर टाकली तर मोजकेच लोक होते.. शुक्रवार असल्याने बरेच जण लवकर निघून गेलेत वाटतं असा विचार करून ती कॅन्टीन मध्ये निघून गेली.

    एका टेबल खुर्ची वर बसून कॉफी घेत समोरच्या काचेतून बाहेरचा पाऊस बघत ती मग्न झालेली असतानाच एक आवाज आला,

    “excuse me miss Aditi….मी इथे बसलो तर चालेल..?”

    तो आवाज ऐकताच तिने वळून पाहिले , “अविनाश तू…अरे बस ना… कधी आलास इकडे..तू UK ला होतास ना..”

    अविनाश समोरच्या खुर्चीवर बसून, अदिती च्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदी होत बोलला,

    “आजच जॉइन झालो अगं इकडे… मागच्या आठवड्यात आलो परत..दोन वर्षांचा प्रोजेक्ट होता..संपला..आलो परत…तू सांग कशी आहेस.. अजूनही तशीच दिसतेस..जशी ऑफिसच्या पहिल्या दिवशी दिसत होती ? आठवतोय मला तो दिवस… तेव्हाही असाच पाऊस सुरू होता…आठवतो ना…”

    अदिती जरा लाजत, मनातल्या भावना आनंद लपवत , ” काहीही काय रे…तू पण ना..मी मजेत आहे….तू सांग कसं वाटलं दोन वर्षे..आणि आज दिवसभर तर दिसला नाहीस..आता अचानक इथे कसा.. म्हणजे उशीर झाला ना.. म्हणून म्हणतेय..”

    अविनाश एकटक अदितीला बघत होता, तिचा नाजूक चेहरा, तिला शोभून दिसणारे कुरळे केस, तिच्या गालावरची ती खळी, मध्यम उंचीची साधी सिंपल पण अगदीच गोड मुलगी.

    मध्यमवर्गीय कुटुंबातली , आई वडिलांना एकुलती एक. हुशार, समजुतदार आणि मेहनती, त्यामुळे कामात परफेक्शन. स्वभावाने जरा लाजाळू, अबोल पण हसरी मुलगी. ?

    तिच्या डोळ्यातले भाव टिपत तो म्हणाला, “दिवसभरात किती वेळा तुझ्याशी भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत येऊन बघितलं पण मॅडम बिझी..एकदा कॉलवर, एकदा मिटिंगमध्ये.. लक्षही नव्हतं तुझं..कामात मग्न होतीस, व्यत्यय नको आणायला म्हणून काही तुला डिस्टर्ब केलं नाही..म्हंटलं आता आज भेटतात मॅडम की नाही काय माहित.. म्हणून थांबलो तुमची वाट बघत…”

    “म्हणजे तू मला भेटायला थांबलास…. अरे, सध्या खूप काम आहे त्यामुळे कुठेच आजुबाजूला लक्ष नसतं..रोज घरी जायला उशीर होतो..” अदिती.

    “हो, खरं तर तुला भेटायलाचं थांबलो..किती कॉल, मेसेज, इमेल केले तुला.. ऑफिसच्या मेसेंजर वर सुद्धा किती तरी वेळा मेसेज केला पण तू मात्र काहीच उत्तर दिले नाही…आज ठरवलं होतं तुला भेटूनचं जायचं घरी..” अविनाश.

    अदिती विषय बदलत म्हणाली, “कॉफी घ्यायची का अजून एक.. बोलता बोलता ही कॉफी कधी थंड झाली कळालेच नाही..”.

    “अजूनही तशीच कॉफी प्रेमी आहेस वाटत तू… थांब मी घेऊन येतो…” अविनाश.

    अदिती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.
    ( अविनाश उंच पुरा, गोरापान, रूबाबदार व्यक्तीमत्व, हुशार, आत्मविश्वास असलेला होतकरू मुलगा. अगदीच मॉडर्न विचारांचा, घरी मोठा व्यवसाय असूनही पारंपरिक व्यवसाय नको म्हणून स्वबळावर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. घरचा व्यवसाय वडील आणि भाऊ सांभाळायचे. दोघेच भाऊ. घरी आई वडील, भाऊ ,वहिनी आणि अविनाश सगळ्यात लहान. )

    अविनाश दोघांसाठी कॉफी घेऊन आला.

    अदिती आधीच्या गोष्टींवर बोलण्याच्या मूड मध्ये नाही हे लक्षात घेऊन अविनाश तिला चिडवत म्हणाला, “काय मग, पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही.. कशी जाणार आहेस घरी..”

    अदिती बाहेर एक नजर टाकत, “हो ना..पाऊस कधी थांबतो काय माहीत.. आई-बाबांना कळवायला पाहिजे.. काळजी करत असतील ते.. कॅब मिळते का बघते आता.. बसने जाणे तर अशक्यच वाटतेय..”

    “तुझी हरकत नसेल तर मी सोडतो ना तुला.. पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून कार घेऊन आलेलो आज..” अविनाश.

    “नको अरे मी बघते कॅब मिळते का…तुला उगाच चक्कर होईल मला सोडून घरी जायला…” अदिती.

    “अगं, किती ही औपचारिकता…खरंच इतक्या पावसात आता कॅब मिळेल का.. मिळाली तरी मी नाही जाऊ देणार तुला एकटीला..नऊ वाजत आलेत आता..चल मी सोडतो.. काही चक्कर वगैरे होणार नाही मला…” अविनाश.

    “बरं ठीक आहे, मी आईला फोन करून कळवते..तसं आज उशीर होईल ते सांगितलं होतंच पण इतका उशीर होईल वाटलं नव्हतं…हा पाऊस पण ना…” अदिती.

    “बरं झालं आला ना पाऊस.. नाही तर काम आटोपून निघून गेली असतीस..मला तुझ्याशी भेटताही आलं नसतं…?” अविनाश.

    त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अदीती म्हणाली,

    “चला, निघायचं का…”

    न बोलताच अदीतीला मान हलवून होकार देत अविनाश चल म्हणाला.

    दोघेही पार्कींग कडे निघाले.

    क्रमशः

    अदिती आणि अविनाश यांच्यातल्या नात्याला जाणून घेऊया पुढच्या भागात ?

    पुढचा भाग लवकरच…

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ??

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • Extramarital Affair – भाग २ ( अंतिम भाग)

    मागच्या भागात आपण पाहीले की आभा आणि मनिष‌ यांची बॅडमिंटन खेळताना ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरवात होते. आता‌ पुढे.

    दररोज सकाळी आभा आणि मनिष बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्ताने भेटायचे, खेळून झाल्यावर कधी ज्यूस घ्यायला तर कधी एकत्र नाश्ता करायला दोघेही जायचे. मनिष बडबड्या, विनोदी स्वभावाचा त्यामुळे आभाला त्याच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा यायची. त्याच्यासोबत ती मनसोक्त हसायची.
    एकदा सुजय नसताना‌ मनिष ने आभा ला सिनेमा ला जाण्या विषयी विचारले, तीही तयार झाली.
    मनिष हा अविवाहित तरुण, एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायचा. पार्टी, सिनेमा, फिरणं असं सगळं त्याला खूप आवडायचं. आता आभा सोबत मैत्री झाल्यावर तिलाही तो सोबत येण्यासाठी विचारायचा, या सगळ्या गोष्टींची आवड आभाला सुद्धा होतीच त्यामुळे मैत्रीच्या नात्याने ती तयार व्हायची.
    अशा सगळ्या गोष्टींमुळे तिला मनिष ची सवय झाली होती. सुजय सोबत असताना, त्याच्या सोबत फिरताना ती पूर्वी सारखी आनंदी नसायची, आपण सुजय ला धोका देतोय हे तिला कळत होतं. सुजय जवळ यायला लागल्यावर तिला त्याची आधी सारखी ओढ वाटत नव्हती. काही तरी चुकतंय हे सतत जाणवतं असल्याने तिच्या आणि सुजय च्या नात्यात एक दुरावा निर्माण होत होता. सुजय खुपदा तिला विचारण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा “आभा, तू हल्ली कुठल्या तरी विचारात असतेस, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं, काही प्रॉब्लेम तर नाही ना..कुठलं दडपण आहे का..मला सांग, मी नक्की मदत करेल तुला.. काय झालं आहे..”
    त्यावर आभाचं उत्तर ठरलेलं असायचं, “नाही रे, दडपण वगैरे काही नाही..उगाच वाटतं तुला असं.. काहीही झालं नाहीये..”
    वरवर असं बोलत असली तरी मनात मात्र मनिषचा विचार असायचा..तिला वाटायचं आपण मनिषच्या प्रेमात तर पडलो नाही ना..आपण चुकतोय का.. मनिष मला फक्त एक मैत्रीण मानतो पण मीच जास्त विचार तर करत नाही ना.. अनेक प्रश्न मनात येऊन सतत गोंधळ उडाल्या सारखं तिला वाटायचं. मनिष सोबत एकदा बोलाव‌ का याविषयी..की त्याला भेटायच टाळावं… सुजय माझा नवरा आहे..आमचं एकमेकांवर प्रेम आहे..मी उगाच मनिष कडे आकर्षित होत आहे..आता त्याला न भेटलेले बरे असा विचार करत तिने अचानक बॅडमिंटन खेळायला जायचे बंद केले.
    आभा का येत नसेल म्हणून तिकडे मनिष सुद्धा काळजीत पडला, फोन केला तर आभा काही उत्तर देत नव्हती. अशेच तीन दिवस गेले..आभा ला हे तीन दिवस तीन वर्षांसारखे वाटत होते..सतत मनिष सोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते तर एकीकडे सुजय चा विचार करून ती स्वतः ची समजुत काढत होती.
    मनिष सुद्धा आभा ला न भेटल्यामुळे अस्वस्थ झाला होता. काय झालं असेल..आभा ठिक तर असेल ना…आभा च्या घरी जाऊन बघावं का अशे अनेक विचार तो करत होता. आपण आभाच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला कळत होतं पण या नात्याला काही अर्थ नाही..आभा विवाहित आहे, तिच्या संसारात आपल्यामुळे काही विष पसरायला नको म्हणून तो स्वतः ला सावरत होता. एकदा आभा ला भेटून सगळं बोलून क्लीयर करावं म्हणजे अशी हुरहूर लागून राहणार नाही असा विचार करून त्याने आभा ला मेसेज केला, ” आभा, मला माहित आहे जे मला वाटतंय तेच तुझ्या मनात आहे.. आपलं नातं मैत्रीच्या पलिकडे जात आहे..वेळीच आपण थांबलो तरच योग्य राहील..तुझ्या आयुष्यात सुजय आहे..मला त्याची जागा घ्यायची नाही..पण एकदा मला भेट शेवटचं.. त्यानंतर मी परत तुला त्रास देणार नाही.. प्लीज मला भेट..”
    आभा त्याचा मेसेज बघून रडायला लागली, तिचीही अवस्था वेगळी नव्हतीच . रडतच तिने रिप्लाय केला, ” आज सायंकाळी, ७ वाजता भेटूया..कुठे भेटायचं तू ठरव..”
    मनिषचा रिप्लाय आला, “तुला हरकत नसेल तर माझ्या घरीच ये.. सविस्तर सगळं बोलता येईल..”
    मागचा पुढचा विचार न करता आभा तयार झाली. ठरल्याप्रमाणे ती ७ वाजता मनिषच्या घरी पोहोचली. मनिष तिची वाटच बघत होता. घरात छान सुगंध दरवळत होता, सगळीकडे मंद प्रकाश, हॉलमध्ये टेबलवर सुंदर गुलाबांच्या फुलांचा गुच्छ असं प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांसमोर येताच आभाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. कुठलाही विचार न करता तिने जाऊन मनिषला मिठी मारली.
    मनिष ने ही तिला मिठीत घेतले, काही वेळ दोघेही काही बोलले नाही. नंतर आभाला मिठीतून सोडवत मनिष तिला म्हणाला, “मी मस्त पैकी जेवण मागवले आहे..आज आपण छान पार्टी करू.. मनसोक्त गप्पा मारू..आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहीला पाहिजे.. रडून हे क्षण खराब करायचे नाही..आता हस बघू..”
    आभाने एक गोड स्माइल दिली.
    मनिष -” आभा, आपली मैत्री झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक क्षण मी आठवणीत जपून ठेवला आहे..मला तू खूप आवडतेस..तू आहेच इतकी गोड की कुणीही प्रेमात पडेल तुझ्या.. तसंच माझं झालं..पण मला माहीत आहे तू माझी होऊ शकत नाही..आपल्या नात्याचा प्रवास इथपर्यंतच होता असा समजुया..मला तुला आनंदात बघायचं आहे.. सुजय आणि तुझ्या मध्ये येऊन मला तुझं सुख हिरावुन घ्यायचं नाही. अचानक आपलं भेटणं बंद झालं तेव्हा मनात एक खंत वाटली.. गैरसमज मनात ठेऊन आयुष्यभर ते ओझं आपल्या मनात राहीलं असतं म्हणून आपल्या मैत्रीच्या प्रवासाचा शेवट गोड असावा म्हणून आज तुला बोलावलं मी..सोपं नसलं तरी आजच्या नंतर आपण भेटायला नको.. हळूहळू होईल सवय.. वेळ गेला ना की माणूस जुन्या गोष्टी विसरतो..तसंच आपणं पडू यातुन बाहेर..”
    आभा मनिष च्या बोलण्याने अजूनच भावनिक झाली पण मनिष जे बोलतो आहे हे सत्य आहे हे तिलाही कळत होतेच.
    मनिष ने मस्त मंद आवाजात गाणे लावले, दोघांनी एकत्र डिनर केला.. केक कापला…आज‌ मात्र ठरवूनही गप्पा काही होत नव्हत्या. विरहाची एक सल दोघांच्याही मनात बोचत होती.
    मनिष ने न राहावून आभा जवळ मनातल्या भावना व्यक्त केल्या, “आय लव्ह यू आभा.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर..आपण एकत्र येऊ शकत नसलो तरी माझं प्रेम हे खरं आहे..या प्रेमाची आठवण ठेव.. हसत रहा नेहमी…” असं म्हणत त्याने आभाला करकचून मिठी मारली.
    दोघेही भावनिक झाले पण मनिषच्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
    रात्री ११ वाजलेत तेव्हा आभा म्हणाली, “चल मनिष मी निघते.. उशीर झाला आहे..”
    मनिषने तिला घरापर्यंत सोडले आणि वाटेतच म्हणाला “तू खरच खूप सॉलिड आहेस..आजची आपली शेवटची भेट..या शहरात राहून मी तुला विसरू शकणार नाही.. म्हणून ट्रान्स्फर साठी अर्ज केला आहे…”
    आभा फक्त ऐकत होती.. काय बोलावं तिला काही कळत नव्हते. गाडीतून उतरताना इतकंच म्हणाली, “मनिष, तुझ्यामुळे जे क्षण मी खूप मनापासून एॅंजाॅय केले ते विसरणे अशक्य आहे..मी सुजय आणि माझ्या नात्यात यावरून दुरावा होऊ नये म्हणून नक्कीच प्रयत्न करेन पण तुझी आठवण मात्र कायम मनात असेल माझ्या…मला तू आवडतो पण प्रेम म्हणशील तर माझं प्रेम सुजय वर आहे रे…आपलं काय नातं आहे नाही माहीत मला..पण सुजय माझं पहिलं प्रेम आहे.. ”
    मनिष हसत भावनांना आवरत म्हणाला, ” मला माहित आहे आभा, तू सुजय वर खूप प्रेम करते..आपल्या गप्पांमध्ये तोच तर असायचा नेहमी..किती सांगायची तू मला त्याच्या विषयी.. माझं तुझ्यावर मात्र खरं प्रेम आहे पण मला तुला कुठल्याही बंधनात अडकवायचे नाही.. म्हणून तर हा निर्णय घेतला आहे मी..”
    आभा डोळे पाणावून, “चल मी निघते..बाय.. काळजी घे..”
    दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

    आभा घरी आली तर सुजय आधीच हजर होता.
    सुजय दोन दिवसांपूर्वी आठवडाभरासाठी दुसऱ्या शहरात गेला होता पण काम लवकर संपल्याने तो लगेच परतला.
    आभा त्याला बघताच गोंधळलेल्या अवस्थेत विचारू लागली “सुजय तू….तू तर आठवडाभरासाठी गेलेला..कधी आलास.. फोन का नाही केलास..कळवायचं तरी येतोय म्हणून..”
    सुजय आभाला शांत करत, “अगं हो.. शांत हो… माझं काम लवकर संपलं म्हंटलं चला‌ तुला सरप्राइज देऊ तर तू घरी नव्हतीस..किती उशीर केलास घरी यायला.. फोनही लागत नव्हता तुझा..”
    आभा जरा अडखळत बोलली, ” हा.. अरे मैत्रिणी कडे गेलेले.. उशीर झाला यायला..फोन बहुतेक बॅटरी संपली असेल..कळालेच नाही मला..”
    सुजय -” बरं असो, तू जेवण करून आलीस का.. मी पार्सल मागवलं होतं दोघांसाठी पण तुझी वाट बघून खाऊन घेतलं मी..”
    आभा – “हो मी जेवण करून आले..चल फ्रेश होऊन येते..तू पण थकला असशील ना..आराम कर..”
    आभाच वागणं सुजय ला जरा विचित्र वाटलं पण बाहेरून आली शिवाय उशीर झाल्याने थकली असेल म्हणून त्याने जास्त खोलात जाऊन काही विचारले नाही.

    दुसऱ्या दिवशी सकाळी आभा आंघोळीला गेली, तितक्यात आभाच्या फोनवर मनिष चा मेसेज आला आणि तो सुजय ने बघितला, तो विचार करू लागला
    “आभा आपल्याला फसवत आहे, काल रात्री ही‌ मैत्रिणी कडे गेली नसून मनिष सोबत होती. मग मला खोटं का सांगितलं आभा नी”
    आभा आंघोळ करून बाहेर येताच सुजय ने तिला मनिष विषयी आणि त्याच्या अशा‌ मेसेज विषयी जाब विचारला.

    दोघांनीही बराच वेळ यावर चर्चा, वाद , राग संताप व्यक्त केला. आभा ने तिची चूक मान्य केली, माफी मागितली, एक संधी दे म्हणत विनवणी केली पण सुजय मनोमन खूप दुखावला होता. आभा अशा प्रकारे आपल्याला धोका देऊ शकते यावर त्याला विश्वास बसत नव्हता.

    “कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही ” हे वाक्य सुजय ला खूप त्रास देत होते.
    आभाने रडत रडत सुजय ला घडलेली सगळी हकीकत सांगितली. पण एकदा विश्वासात तुटल्याने आता सुजयला तिचा विश्वास बसत नव्हता.

    ” मनिष आणि मी आज शेवटचं भेटलो…आम्हाला कळालं आहे आमच्या नात्याला काही अर्थ नाही..तो आता शहर सोडून जाणार आहे..मी खरंच अपराधी आहे सुजय तुझी.. भावनेच्या भरात नकळत त्याच्यात गुंतले पण आकर्षक होतं ते..माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर…मला एक संधी दे..”

    आभाच्या या बोलण्यावर कसाबसा विश्वास ठेवून तिच्या वरच्या प्रेमापोटी सुजयने तिला एक संधी दिली, पण दोघांच्या नात्यात एक दुरावा मात्र होताच.. एकत्र संसार करत असले तरी एकदा गमावलेला विश्वास आता परत येणं शक्य नव्हतं. आभा सुजय चा विश्वास परत मिळविण्याच्या सतत प्रयत्न करत होती, तोही तिला सुखी ठेवण्यासाठी धडपड करत होताच. पण त्या नात्यात आता पूर्वीसारखा गोडवा कायम नव्हता… एकत्र आनंदी दिसत असले तरी आभाच्या मनात अपराधी भावना तर सुजयच्या मनात एक अविश्वास होता, हि भावना बदलणे आता खरंच अवघड झाले होते.
    अशाच भावना मनात दडवून दोघे संसार करत होते.

    खरंच , नवरा बायको यांच्यातलं नातं हे प्रेम, विश्वास यावरच टिकून असतं. एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यातला गोडवा कमी होत जातोच पण सोबतच जी अविश्वसाची भिंत दोघांमध्ये निर्माण होते ती क्वचितच दूर होते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • Extramarital Affair – भाग १

    “सुजय, मला एक संधी दे ना रे..मी खरंच चुकले अरे.. भावनेच्या भरात वाहवत गेले…एकदा माफ कर ना‌ रे मला.. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर…प्लीज सुजय..एकदा संधी दे मला…” आभा रडत रडतच सुजय ला नातं टिकवण्यासाठी एक संधी मागत होती.
    सुजय (भावनिक होऊन राग व्यक्त करत) उत्तरला- “प्रेम..‌…माझ्यावर… आणि तुझं..ते असतं तर अशी वागली नसती आभा तू….माझ्या भावनेचा एकदा तरी विचार केलास असं वागताना..हे सगळं करताना‌ कधी माझा चेहरा तुझ्या नजरेसमोर कसा नाही आला… विश्वासघात केला तू…एकदा विचार कर .. तुझ्या जागेवर मी असतो.. असं वागलो असतो तर तू मला संधी दिली असतीस..कुठे कमी पडलो गं मी…आपल्या संसारासाठीच तर सगळी धडपड करतोय ना…तुला कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये, तुझ्या आवडीनुसार जगता यावं यासाठी शक्य तो प्रयत्न करतो… कोणतीही गोष्ट करायला नाही म्हणालो का मी तुला आता पर्यंत…पण तू मात्र माझा जराही विचार केला नाहीस…धोका दिला तू मला..माझ्या प्रेमाला…”
    आभा ( अपराधी भावनेने रडत ) – ” सुजय, मी चुकले..मी खरंच अपराधी आहे तुझी..माझी चूक मी मान्य करते…पण असं म्हणू नकोस रे…मला‌ एक संधी दे..मी वाहवत गेले रे.. माझं त्याच्याकडून खेळताना होणारं‌ कौतुक, दिसण्यावरून होणारी माझी स्तुती, रोज छान छान कॉंप्लीमेंटस ऐकून मी भारावून गेले होते… नकळत मला‌ एक वेगळीच ओढ लागली होती…त्याचा सहवास हवाहवासा वाटायला लागला होता..पण हे एक आकर्षण होतं सुजय… विश्वास ठेव माझ्यावर…तुझा‌ विचार मनात येत नव्हता असं नाही रे..मलाही कळत होतं, आमच्या नात्याला काही भविष्य नाही..क्षणिक सुखाच्या मोहात अडकले होते रे मी…तू इथे नसताना‌ एकटी पडायचे.. त्याच्या सोबत एकटेपणाचा विसर पडला…वाहवत गेले मी भावनेच्या भरात..पण मला माझी चूक कळते आहे सुजय…मला‌ प्लीज माफ कर..” (एवढं बोलून आभा ढसाढसा रडायला लागली)
    आभा इतकी चुकिची वागली असली तरी तिला असं रडताना‌ पाहून सुजयला‌ खूप वाईट वाटत होतं.. स्वतःच्या भावनांना सावरत आभाला जड अंतःकरणाने तो म्हणाला, “आभा, तू शांत हो… चूक तुझी नाही..मीच कमी‌ पडलो तुझ्यावरचं प्रेम  व्यक्त करण्यात.. पण प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते गं… तोंडभरून स्तुती केली, छान छान बोललं तरच प्रेम व्यक्त होतं का..तुला बॅडमिंटन खेळण्याची आवड आहे म्हणून तुला स्पोर्ट्स क्लब जॉइन करायला लावला ना‌ मी..ते प्रेम नाही…तुला फिरायला आवडतं म्हणून वर्षातून दोनदा तरी आपण नवनव्या जागी ट्रिप काढतो..तुला शॉपिंग करायला‌ आवडते म्हणून मी महीन्याला एक‌ वेगळी रक्कम तुला देतो मनसोक्त शॉपिंग कर……हवं ते घे म्हणत… तुला हॉटेलिंग आवडतं म्हणून शहरातलं प्रत्येक हॉटेलमध्ये आपण डेट वर गेलो…तुला कधी ताप आला तरी रात्र रात्र झोप लागत नाही मला..मी बिझनेस टूर वर असलो तरी तुझा चेहरा सतत डोळ्यापुढे असतो माझ्या..हे प्रेम नाही…मनात भावना महत्वाच्या की फक्त शब्दांनी स्तुती केलेली महत्वाची हे तूच ठरव..तुला माझ्या प्रेमावर शंका‌ असेल तर तुझा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस..”
    “असं म्हणू नकोस सुजय…मी चुकले रे… माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर..पण तुझ्या बिझनेस ट्रिप..मिटिंगस.. आठवडा आठवडाभर टूर..या सगळ्यामुळे मला खूप एकटं वाटू लागलं होतं…तशातच आमची मैत्री झाली…मला‌ तुला दुखवायचं नव्हतं रे पण माझ्याकडून नकळत सगळं घडलं.. विश्र्वास ठेव माझ्यावर…”
    ” कसा विश्र्वास ठेवू आभा… ‘कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही..तू खूप सॉलिड आहेस…आय लव्ह यू..’ असाच मेसेज आला ना‌ सकाळी तुला मनिष चा… चुकून मला तो दिसला म्हणून हे उघडकीस आलं..तुझ्या वागण्यातला बदल मला‌ जाणवत होता पण विश्वास होता माझा तुझ्यावर, मी विचारण्याचा प्रयत्न केला पण तू काही सांगत नव्हतीस..आज मला कळालं..तुला माझ्या जवळ यायला का आवडत नव्हतं इतक्यात..तू मला धोका देत होतीस आभा…मला खरंच विश्र्वास बसत नाहीये..नवरा बायकोचं नातं एका विश्वासावर, प्रेमावर अवलंबून असतं..पण आता आपल्या नात्यात एक तडा गेला आहे..तो‌ कसा भरून काढायचा ..तूच सांग..मी माफ करेनही पण माझ्या मनावर जी जखम झाली ती तर‌ कायमची राहील ना… त्याच काय…बोल आभा बोल.. ”
    आता मात्र आभा निशब्द झाली…

    आभा दिसायला सुंदर, मध्यम बांधा, चाफेकळी सारखे नाक, कुणीही बघता क्षणी मोहात पडेल असं सौंदर्य..सुजय हुशार, देखणा, मनमिळावू मुलगा…
    सुजय आणि आभाचे वडिल चांगले मित्र त्यामुळे आधीपासूनच दोघांची मैत्री होती..सुजयला‌ आधी पासूनच आभा आवडायची..त्याने प्रपोज केल्यावर जास्त आढेवेढे न घेता तिने होकार दिला..दोघांचे लग्न झाले.. लग्नापूर्वी सुजय तिला भेटायचा, दोघे खूप फिरायचे.. सिनेमा.. शॉपिंग… स्पेशल वागणूक यामुळे आभा खूप आनंदी होती… सुजयची नोकरी मार्केटिंग क्षेत्रात असल्याने त्याला बरेचदा वेगवेगळ्या शहरात, कधी परदेशात बिझनेस टूर वर जावं लागायचं. या सगळ्यामुळे लग्नानंतर मात्र हवा तितका वेळ तो आभाला देऊ शकत नव्हता. शिवाय सुजय जरा अबोल त्यामुळे प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायचं त्याला फारसं जमत नव्हतं. प्रेम मनात असल पाहिजे, वरवर बोलून व्यक्त केले तेच प्रेम असतं असं नाही अशा‌ विचारांचा तो.
    आभाला बॅडमिंटन खेळण्याची आवड लहानपणापासूनच होती, एकटेपणा जाणवायला‌ नको म्हणून सुजय च्या सांगण्यावरून आभाने परत स्पोर्ट्स क्लब जॉइन केला, तिथे तिची ओळख मनिष सोबत झाली.
    मनिष अगदी चार्मिंग पर्सनालिटी, दिसायला हिरो, पिळदार शरीरयष्टी, बोलण्यात गोडवा, अगदी सहज कुणीही प्रेमात पडेल असाच.
    पहिल्या दिवशी आभा बॅडमिंटन खेळायला गेली, तेव्हा योगायोगाने मनिष सुद्धा खेळण्यासाठी पार्टनर शोधत होता.. तेव्हाच पहिल्यांदा दोघे एकमेकांच्या समोर आलेले..मनिष ची पिळदार शरीरयष्टी, खेळण्याची, बोलण्याची स्टाइल बघून आभा त्याच्याकडे बघतच राहिली. खेळून झाल्यावर मनिष आभाला हात पुढे देत म्हणाला, “हाय, मी मनिष, रोज येतो खेळायला.. तुम्ही आज पहिल्यांदाच? बाय द वे, तुम्ही खूप छान खेळता… जितक्या सुंदर दिसता तितक्याच छान बॅडमिंटन खेळता..? आय होप यू डोन्ट माईंड..”
    आभाला त्यावर काय बोलावे सुचेना, हसतच हात पुढे देत ती म्हणाली,”थॅंक्यू सो मच..मी आभा..आजच पहिला दिवस क्लब मधला.. पूर्वी कॉलेजमध्ये असताना खेळायचे पण आज खूप दिवसांनी खेळले.. तुम्ही सुद्धा खूप छान खेळता.. बरं ज्यूस घ्यायचा का…इथे बाजुला ज्युस सेंटर आहे..मला‌ खरंच गरज आहे.. खूप दिवसांनंतर खेळले ना..”
    “ऑफ कोर्स..चला‌ जाऊया.. तुम्ही इतक्या प्रेमाने ऑफर केल्यावर नाही कसं म्हणायचं..? ” -मनिष .
    दोघेही ज्युस पिण्यासाठी निघाले.. ज्युस घेताना पूर्ण वेळ मनिष आभाच सौंदर्य न्याहाळत होता.. त्याच असं एकटक बघणं बघता आभा म्हणाली, “हॅलो मिस्टर मनिष, असं काय बघताय मला.. माझं लग्न झालं आहे बर‌ का..???”
    जरा भानावर येत मनिष म्हणाला,
    “ओह..रिअली ..तुमने तो‌ मेरा दिल तोड दिया… अरे खरंच वाटत नाही तुझं लग्न झालं आहे..असो… तुम्हीं खूप छान दिसता.. कसं मेन्टेन केलंस मॅडम.. नाही म्हणजे लग्नानंतर मुली जरा जाड होतात.. तुम्ही मात्र अगदी वेल मेन्टेन..क्या राज है..”
    “अरे, प्लीज राज वगैरे काही नाही..एकच वर्ष झालं आमच्या लग्नाला.. आणि अजून एक असं तुम्ही आम्ही नको..तू‌ म्हणं मला सरळ..”
    “ओके मॅडम..तू‌ पण मला तू म्हणं मग.. फ्रेंड्स…” असं म्हणत मनिषने फ्रेंडशिप साठी हात पुढे केला..
    एकमेकांच्या नजरेत बघून दोघांनी हात मिळवून फ्रेंडशिप मान्य केली.

    पुढे आभा आणि मनिषचे नाते कसे बहरत जाते, त्याचा आभा आणि सुजय च्या संसारावर काय परिणाम होतो, सुजय आभाला माफ करेल का..अशे अनेक प्रश्न पडले असणार ना तुम्हाला..?
    तर पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.
    पुढचा भाग लवकरच…

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा )

    “रसिका, मला यायला रात्री उशिर होईल गं, जेवणासाठी वाट बघत बसू नकोस..सध्या खूप काम आहेत ऑफिसमध्ये.. निघतोय मी..” (शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता)
    “शशी, अरे नाश्ता करून जा ना.. झालाचं आहे तयार..काल रात्रीही उशीरा आलास.. खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला..” (रसिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत शशी सोबत बोलत होती)
    “नको गं, मी निघतोय.. रश्मीचा फोन येऊन गेला, क्लायंट येत आहेत मिटींगसाठी शिवाय नवीन ऑफिसच्या उद्घाटनाचा दिवस जवळ येत आहे, बरेच काम राहिलेत अजून. चल भेटूया रात्री..बाय..”
    इतकं बोलून शशी निघाला.
    रसिका जरा निराश होऊन चहाचा कप हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि बाल्कनीतल्या झुल्यावर चहा घेत बसली. तिच्या मनात बर्‍याच गोष्टी थैमान घालत होत्या. ती चहाबरोबरच विचारचक्रात गुंतली.
    किती बदलला आहे शशी, पूर्वी मी प्रेम केलं तो हाच शशी आहे ना..सतत ऑफिस, क्लायंट, मिटिंगमध्ये गुंतलेला असतो..एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला शशी एक पती म्हणून मात्र औपचारिक वागतो हल्ली..पूर्वीचे ते दिवस आठवले की कसं छान वाटत.. असं वाटत नको तो पैसा, नको ती प्रसिद्धी.. दोघांना एकत्र वेळ मिळत नसेल..संवादच होत नसेल तर काय फायदा ह्या संपत्तीचा..सगळं मातीमोल आहे..
    विचारचक्र सुरू असतानाच दारावरची बेल वाजली आणि रसिका भानावर आली. कामवाली मावशी “गुड मॉर्नींग ताई” म्हणताच रसिकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
    “काय मग ताई आज कोणतं पेंटिंग करणार तुम्ही…आधी तुमची पेंटिंग ची खोली‌ आवरते… तुम्ही म्हणालात ना‌ काल, खूप सारे पेंटिंग करायचे आहे..आर्डर का‌‌ काय आली आहे..”
    रसिका आनंदी चेहऱ्याने मोठ्या उत्साहाने उत्तरली, “तुला‌ किती लक्षात राहतं गं मावशी, काल सहज म्हणून बोलले मी‌ तुझ्याजवळ..पण खरं आहे ते एक ऑर्डर आली आहे.. एकाच वेळी वीस वेगवेगळ्या पेंटिंग्ज ची.. तसं झालं आहे बर्‍यापैकी फ्रेम करून तयार आहेत पण देण्यापूर्वी फिनीशींग करते आज..आणि हो तुझे काम आटोपले की मला‌ पेंटींग्ज च्या पॅकिंग साठी मदत कर..” – रसिका.

    “ताई तुमच्यासाठी काय पण बघा…चला‌ मी आवरते पटापट..” असं म्हणत मावशी कामाला लागली.

    मावशीचं बोलणं रसिकाला खूप कौतुकास्पद वाटलं..इथे साधं माझ्या पेंटिंग च्या खोलीत शशी कधी डोकावत सुद्धा नाही..तुला‌ आवडतं तर तू कर पण मला‌ ह्या सगळ्यात काही रस नाही म्हणणारा शशी आणि एक हि कलेविषयी फारसं काही माहीत नसताना भरभरून कौतुक करणारी, नवीन ऑर्डर आली की माझ्या इतकीच उत्सुक असलेली‌ ही मावशी किती जमीन आसमानचा फरक‌ आहे दोघांमध्ये..असो,  चला‌ आज ऑर्डर पिक-अप साठी येणार आहे..पटापट‌ सगळं तयार करूया..( मनात असं सगळं पुटपुटत रसिका तिच्या आवडत्या पेंटिंग साठी स्पेशल तयार केलेल्या खोलीत गेली आणि सगळ्या पेंटिंग्ज कडे एक नजर फिरवत मनोमन आनंदी होत कुठे काही कमी जास्त वाटत नाही ना हे न्याहाळू लागली.)

    शशीकांत आणि रसिका, दोघांची ओळख दोघांच्या एका कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. रसिका‌, त्यावेळी फाइन आर्ट्स मध्ये पदवी अभ्यासक्रमाला होती, दिसायला सुंदर, टपोरे डोळे, नाजूक अंगकाठी, उंच बांधा, आकर्षक दिसणारी रसिका पाहताक्षणी शशीला आवडली. दोघांची ओळख मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. पाच वर्षें दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते.
    शशी‌ एमबीए करून वडिलांचा व्यवसाय बघायचा. अचानक आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर घरची , व्यवसायाची सगळी जबाबदारी शशीवर येऊन पडली. शशी रुबाबदार, हुशार, आत्मविश्वासू तरुण..कमी वयात मेहनतीने घरचा व्यवसाय मोठ्या पातळीवर आणला…एक यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला. या सगळ्यात रसिका प्रत्येक वेळी त्याच्या साथीला होती. तिने स्वत:च आयुष्य जणू शशीला अर्पण करून टाकलं होतं. रसिका मुळे तो आई वडिलांच्या अपघाती मृत्यू नंतर सावरला, दोघांनी वर्षभराने लग्न केले.
    शशी घरचा श्रीमंत त्यात एकुलता एक, आता तर यश , श्रीमंती त्याच्या पायाशी लोळण घेत होती. तेव्हा नोकरी करण्याची गरज नाही, हवं तर आपल्या ऑफिसमध्ये तू मला मदतीला ये असं तो रसिकाला सांगत असे पण तिचं स्वप्न वेगळं होतं. तिला तिच्यातल्या कलागुणांना वाव द्यायचा होता, अप्रतिम पेंटिंग करणारी रसिका, तिला स्वतः चा असा एक पेंटिंग स्टुडिओ उभारायचा होता, आपणही एग्झिबिशन मध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करावं, पेंटिंग घ्या माध्यमातून एक नवी ओळख बनवावी असे सुंदरसे स्वप्न होते तिचे.
    शशीच्या आयुष्यात त्याला प्रोत्साहन देत, घर सांभाळताना तिचं स्वप्न मात्र मागे पडलं. शशी दिवसभर कामात व्यस्त, रसिका घरी एकटीच त्यामुळे वेळेचा सदुपयोग घेत घरीच काही तरी सुरवात करावी म्हणून एका खोलीत तिने पेंटिंग करायला सुरुवात केली, शशीला सरप्राइज द्यायचं म्हणून मोठ्या कौतुकाने पहिले पेंटिंग आणि तयार केलेली खोली दाखवली. पण शशी मात्र अरसिक , त्याने फार काही प्रतिक्रिया दिली नाही, तुला हवं ते तू कर, मला या सगळ्यात मला फारसा रस नाही, असं म्हणत रसिकाचा हिरमोड केला.
    रसिकाला त्या क्षणी फार वाईट वाटले, आपल्याला व्यवसायातील काही माहीत नसताना‌ शशीला पाठिंबा दिला, आपलं स्वप्न बाजुला ठेवलं पण आज माझ्या कलेचं साधं कौतुक करायलाही नको‌ वाटलं शशीला. काही असो , मी माझं स्वप्न पूर्ण करणार..असा निश्चय करून रसिकाने अप्रतिम अशा‌ अनेक पेंटिंग्ज बनविल्या, शक्य त्या प्रकारे जाहिरात करून, काही वेबसाइट्स वर पेंटिंग्ज विकायला सुरुवात केली. तिच्या पेंटिंग्जला भराभर मागणी सुरू झाली. शशीला याविषयी काही माहितीच नव्हते, वेळच नव्हता त्याला‌ सगळं जाणून घ्यायला असं म्हणायला हरकत नाही ?
    पूर्वी छोट्या मोठ्या ऑर्डर यायच्या पण आज सगळ्यात मोठी अशी ऑर्डर डिलीव्हर होणार होती.
    मावशीच्या मदतीने सगळं पॅकिंग करून तयार‌ केले, काही वेळाने दोघेजण आले, लाख रुपयांचा चेक रसिकाच्या हातात देत ऑर्डर घेऊन गेले. आपल्या कलेचं रूपांतर‌ चक्क व्यवसायात झालं यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
    डोळ्यात आनंदाश्रु होते, पण आनंद वाटून घेणारा नवरा मात्र यात रस घेत नाही याची खंतही होतीच.
    अशेच दिवस जात होते, रसिका तिच्या कलेत व्यस्त तर शशी व्यवसायात. रसिकाला आता चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता.
    एके दिवशी शशी नेहमीपेक्षा लवकर घरी आला, “रसिका, आज मी खूप खुश आहे..उद्या आपल्या नवीन ऑफिसचा उद्घाटन सोहळा आहे..किती‌ मेहनत घेतली मी आजच्या दिवसासाठी.. सकाळी मस्त तयार हो‌ बरं…मी गिफ्ट केलेली‌ गुलबक्षी रंगाची साडी नेस उद्या.. सकाळी लवकरच निघाव लागेल आपल्याला..” असं म्हणत तो खोलीत निघून गेला.
    शशी कसाही वागला तरी रसिका त्याला कधी दुखवत नसे, स्वभावच नव्हता तिचा तो..
    रात्री कितीतरी वेळ शशी त्याच्या यशाचे कौतुक रसिकाला सांगत होता, तिही चेहऱ्यावर हास्य आणून त्याला दाद देत होती.
    सकाळी दोघेही तयार झाले, गुलबक्षी रंगाच्या साडीत रसिकांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं, जसा शशी तिच्यासमोर आला तसाच म्हणाला, ” ब्युटिफुल… किती सुंदर दिसते आहेस तू..मला‌ आपली पहिली भेट आठवली आज तुला असं सजलेलं बघून..”
    आज चक्क स्वारी तारिफ करताहेत म्हंटल्यावर रसिकालाही छान वाटलं, लाजून नजरेनेच खूप काही बोलून गेले दोघेही..?
    “चला, उशीर होत आहे…” असं रसिका म्हणताच शशी भानावर आला, दोघेही निघाले.
    ऑफिसमध्ये पोहोचताच रसिकाला आश्चर्याचा धक्का बसला, “अय्या, हि सगळी पेंटिंग्ज जी काही दिवसांपूर्वी मी डिलीव्हर केली ती इथे… म्हणजे ती मोठी ऑर्डर ज्या ऑफिससाठी होती ते हेच ऑफिस..” रसिकाला क्षणभर काहीच कळत नव्हते.. शशीला यातलं काही माहिती नाही आणि सांगायलाही नको असं विचार करत असतानाच शशी रश्मी ला घेऊन आला रसिका सोबत ओळख करून द्यायला. रश्मी रसिकाला बघताच आश्चर्याने “मॅम, तुम्ही..म्हणजे सर रसिका मॅम तुमच्या मिसेस..”
    शशी गोंधळलेल्या अवस्थेत, “रश्मी, तू कशी ओळखतेस रसिकाला…म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच भेटत आहात…रसिका ही, रश्मी माझी असिस्टंट..हिनेच सगळं सजावट, आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..पण तुम्ही एकमेकींना कशा‌ ओळखता..”
    “सर, आपल्या ऑफिससाठी पेंटिंग्ज सिलेक्ट केल्या मी, त्या सगळ्या मॅम कडूनच घेतल्या आहेत.. अप्रतिम कलाकार आहेत मॅम..पण मला खरंच माहीत नव्हतं की या तुमच्या मिसेस आहेत..”
    हे ऐकताच शशीला आश्चर्याचा धक्का बसला.. म्हणजे रसिका तू इतकी मोठी कलाकार झालीस आणि मला कळाले सुद्धा नाही..मीच मुळात रस घेतला नाही..खरंच मला अभिमान वाटतो आहे तू माझी अर्धांगिनी असल्याचा..( रसिकाकडे अपराधी नजरेने बघत शशी मनोमन सगळं बोलत होता.)

    प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑफिसचे उद्घाटन झाले, सगळ्यांनी ऑफिस बघताना‌ सजावटीला लावलेल्या पेंटिंग्ज चे भरभरून कौतुक केले.. रसिकाच्या म्हणण्यावरून रश्मी आणि शशी ने तिथे उपस्थित कलाकाराविषयी कुणालाही काही सांगितले नाही..रसिकाला प्रसिध्दीची हाव‌ नव्हती..आपल्या कलेचं इतकं कौतुक होताना‌ बघूनच ती सुखावली होती.. पण सगळ्यांकडून बायकोने केलेल्या त्या अप्रतिम पेंटिंग्ज चे कौतुक बघता आज शशी अजूनच तिच्या प्रेमात पडला..त्याची चुक त्याला आपसुकच समजली…आपण रसिकाला गृहित धरून चाललो.. तिच्यातल्या कलेला प्रोत्साहन देण्याऐवजी अरसिक भावना दाखवली याच त्याला खूप वाईट वाटलं.

    परत येताना दोघे एकमेकांच्या नजरेत बघून खूप काही बोलत होते.. रेडिओ वर त्याच क्षणी गाणं सुरू झालं “तू जहा जहा चलेगा..मेरा साया.. साथ होगा…मेरा साया….मेरा‌ साया…”?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ??
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३

    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे.

    दादाने अजितचा फोटो नंबर मिळवून त्याला कॉल केला आणि भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलावले, हेही सांगितले की याविषयी संपदाला काही कळायला नको. दादाच्या फोन नंतर अजित जरा घाबरलेला, त्याला बर्‍याच शंका मनात येऊ लागल्या, दादाला आमचं प्रेम प्रकरण माहीत झालं असेल आणि चिडून मला दम द्यायला तर बोलावलं नसेल ना, माझं सैराट मधल्या प्रिंस दादा सारखा तर वागणार नाही ना संपदाचा दादा अशे अनेक बरेवाईट विचार अजितला हैराण करू लागले. संपदाची परिक्षा संपेपर्यंत तिला त्रास द्यायला नको, डिस्टर्ब करायला नको म्हणून तिच्याशी मोजकेच बोलणे सुरू होते.
    जे होईल ते होईल पण आता दादाला भेटायचं, त्यांना संपदाचा हात लग्नासाठी मागायचा असं ठरवून ठरल्याप्रमाणे अजित दादाला भेटायला गेला.
    एका छोट्याशा हॉटेल मध्ये दोघे भेटणार होते, अजित पोहोचला आणि दादाला कॉल केला तर तो आधीच पोहोचला होता, एका टेबलावर अजितची वाट बघत होता. अजित जरा संकोचाने जवळ गेला, भेटला आणि दोघांनी मस्त चहा कॉफी मागवली. दादाने अजितचा गोंधळ ओळखला, त्याला शांत करत म्हणाला, ” अरे , तू इतका संकोचाने बोलू नकोस, मी सहज भेटायला आलो आहे. काळजी करू नकोस, मला तुझ्यावर राग वगैरे नाही. आता माझ्या बहिणीची आवड कशी आहे, मलाही कळायला नको का..? तू हवं तर एक मित्र म्हणून बोल माझ्याशी..”
    दादाच्या बोलण्याने अजितला जरा धीर आला.. पुढे अजित विषयी जाणून घेण्यासाठी दादाने गप्पा सुरू केल्या. अजितच्या प्रत्येक वाक्यात संपदा विषयीचं प्रेम दादाला जाणवतं होतं. आपल्या बहिणीची निवड योग्य आहे याची दादाला खात्री होत होती. दादाने अजितला विचारले, “तुझे आई बाबा संपदाला स्विकारतील का, जर त्यांना मान्य नसेल तर काय..”
    अजित त्यावर म्हणाला, ” माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक, माझं मन आतापर्यंत त्यांनी खूप जपलं, माझ्या आवडीनुसार शिक्षण, नोकरी, इतर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हा या लग्नाला नकार देतील असं वाटत नाही मला, आणि संपदा इतकी गुणी मुलगी आहे, गोड स्वभाव, निरागस आहे ती, तिला भेटल्यावर माझे आई बाबा नाही म्हणतील असं वाटतं नाही मला..तरी जर ते तयार नसतीलच तर मी खरंच पूर्ण प्रयत्न करेन त्यांची समजूत काढण्याचा.. काही झालं तरी संपदा शिवाय आयुष्य मी नाही जगू शकत दादा.. आमचं लग्न नाही झालं तर तिच्या जागी मी कुणाचाही आयुष्यभर स्विकार करणार नाही..लग्नच करणार नाही..”
    दादाला अजितचे बोलणे फिल्मी वाटत असले तरी त्यामागच्या भावना मात्र खर्‍या आहे हे जाणवले. लवकरच संपदाची परीक्षा संपली की आमच्या घरी मी तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी बोलतो असं दादाने म्हणताच अजित आनंदी झाला. मीही आई बाबांना याविषयी कल्पना देतो आणि पुढे घरच्यांना भेटायचं ठरवूया असंही अजितने सांगितलं. सगळं सूरळीत होत पर्यंत या विषयी संपदाला कळायला नको असं दादाने अजितला सांगितले.

    दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, अजितला आता एक आशेचा किरण दिसला. काही दिवसांतच अजितने घरी संपदा विषयी सांगितले, आई बाबांना अजितच्या वागण्यातून संशय आला होता पण तो स्वतः हून सांगेपर्यंत काही विचारायचे नाही असं त्यांचं ठरलं होतं. आई बाबांनी संपदा विषयी सगळी चौकशी केली, फोटो बघितला. संपदाच्या घरच्यांनी पुढाकार घेतला तर आमची काही हरकत नाही हेही सांगितले. ते ऐकताच अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई बाबा इतक्या सहज तयार झाले म्हणताच अजितला सुखद धक्का बसला. आता प्रश्न होता संपदाच्या घरच्यांचा, त्यांनी पुढाकार घेतला तर संपदा कायमची माझी होणार म्हणून अजित नकळत अनेक स्वप्न रंगवायला लागला.
    इकडे दादाने आईला याविषयी कल्पना दिली पण असं प्रेमविवाह आपल्या कुटुंबात कुणाचाच नाही रे.. नातलग काय म्हणतील म्हणत आईने विषयाला वेगळं वळण दिलं. बाबांना हे मान्य होणार नाही, प्रेमविवाह तोही आंतरजातीय..नको आपण बाबांना नको सांगायला..उगाच चिडतील ते..संपदा समजदार आहे.. समजून सांगू आपण तिला असं म्हणत आईने अप्रत्यक्षपणे या लग्नाला नकार दिला.
    दादा आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, ” आई, अगं अजितला भेटलो मी, चांगला मुलगा आहे तो.. शिवाय संपदावर खूप प्रेम आहे त्याच..सुखात राहील आपली चिऊ.. बाबांशी बोलून तर बघू.. आंतरजातीय विवाह म्हणजे काही गुन्हा नाही.. संपदाला कुणीही पसंत करेन पण ती त्याचा मनापासून स्विकार करेल असं वाटत नाही मला..आई बाबांना दुखवायचे नाही म्हणून तडजोड करत लग्न करेन ती पण प्रेम करेलच असं नाही..अजितला विसरणे कठीण जाईल तिला.. इतक्यात तू बघितले असशील कशी गप्प गप्प असते ती..अजित विषयी घरी कसं सांगायचं याच विचाराने हैराण झाली आहे ती.. शेवटी तिचं सुख महत्वाचं..आपण सगळी चौकशी करून अजितच्या घरच्यांना भेटून सगळ्यांना मान्य असेल तर दोघांचा विचार करून लग्न लावून द्यायला काय हरकत आहे. नातलग बोलतील ते किती दिवस.. जातीतल्या मुलाशी लग्न केले तरी काही ना काही उणीव काढून सुद्धा बोलतातच.. इतरांच्या बोलण्याचा विचार बाजूला ठेवून एकदा संपदाचा विचार कर आई..तू हो म्हणालीस तर बाबांशी बोलू आपण..”
    दादाचं बोलणं संपते तितक्यात बाबांचा मागून आवाज आला, “माझी मुलं इतकी मोठी झाली कळालेच नाही रे मला..मी तुम्हा दोघांचं सगळं बोलणं ऐकलं..माझी मुलं चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची खात्री होती मला..संपदा असं अचानक कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं, मी अजूनही लहानच समजत आलो तुम्हा दोघांना..तू आईला जसं समजून सांगितलं त्यावरून बहिणींचं आयुष्य सुखी करण्यासाठीची तुझी धडपड, तिच्या विषयीचं प्रेम बघून मला खरंच अभिमान वाटला आज तुझा..” बाबांचं बोलणं ऐकून दादा बाबांच्या मिठीत शिरला..बाबा तुम्ही परवानगी द्याल ना संपदा अजितच्या लग्नाला..
    संपदा आपल्याला हट्ट करून लग्न लावून द्या असं कधीच म्हणणार नाही..पण मला तिची घालमेल कळत होती बाबा.. म्हणून मी अजितला भेटलो.. नकार द्यावा असा नाहीच तो..घरी बोलणार आहे तो संपदा विषयी..बाबा आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे..
    बाबा यावर जास्त काही बोलले नाही..संपदा ची परीक्षा संपली की बघू..अजितच्या घरी तयार असतील तर आपण विचार करू म्हणाले.
    काही वेळाने अजितचा दादाला फोन आला, त्यांचे आई बाबा लग्नाला तयार आहे हे मोठ्या आनंदाने त्याने सांगितले. आता सगळे वाट बघत होते संपदा ची परीक्षा संपण्याची. अजितच्या घरी काही अडचण नाही हे दादाने बाबांच्या कानावर टाकले.
    शेवटचा पेपर संपल्यावर संपदा घरी आली, पुढे अकाऊंटींग मध्ये करीयर करण्याविषयीची इच्छा बाबांना तिने बोलून दाखवली. आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे असं बाबांनी म्हंटल्यावर तिला हायसे वाटले.
    बाबांनी संपदा जवळ अजितचा विषय काढला, तिला ऐकताच धक्का बसला, बाबांच्या मिठीत शिरून ती रडकुंडीला आली.. काय बोलावे तिला काही कळेना.. बाबांनी तिला विचारले, “अजित सोबत लग्न करण्याविषयी काय मत आहे तुझं..”
    “बाबा, तुम्हाला कसं कळलं.. म्हणजे मी सांगणार होतेच पण…..बाबा तुम्ही रागावले का माझ्यावर….” असं तुटक तुटक बोलत संपदा गोंधळली..
    दादा‌ आणि आई तिथे होतेच..बाबा हसून म्हणाले, ” अगं, रागवत नाही आहे.. विचारतोय मी तुला.. लगेच लग्न करायचं नाही म्हणत पण तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला..”
    संपदा स्वतःला सावरत कसंबसं बोलून गेली,” बाबा‌, अजित आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे.. त्याने लग्नासाठी मागणी घातली होती पण तुम्ही तयार असाल तरच हो म्हणेल मी असंच सांगितलं मी त्याला..मला तुम्हाला दुखवायचं नाही बाबा..”
    बाबा म्हणाले, “तुला पुढे तुझं करिअर करायचं आहे.. स्वतः च्या पायावर उभं राहायचं आहे.. पुढे कधी चुकून वाईट प्रसंग आलाच तर स्वावलंबी असणं गरजेचं आहे.. लग्नाचं म्हणशील तर मी अजितच्या घरच्यांना भेटायला तयार आहे..”
    बाबांचं म्हणनं ऐकताच सगळ्यांना आनंद झाला..
    दादाने अजित विषयी घरी कसं कळाल याची पूर्ण गोष्ट संपदाला सांगितली..
    अजित आणि दादा यांनी दोन्ही कुटुंबे एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठरविला.. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरी सगळे त्यांच्या लग्नाला तयार झाले..संपदाला शिक्षण, करिअर याबाबतीत आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अजितच्या घरच्यांनी बोलून दाखवले.
    आपण सगळं स्वप्न तर बघत नाही ना‌ असा भास अजित आणि संपदाला होत होता.
    इतक्या सहजपणे सगळं जुळून येणं म्हणजे नशिबच असं दोघांनाही वाटत होतं.
    दादा नसता तर आपण कधीच बाबांशी या विषयावर बोलू शकलो नसतो असं संपदाच्या मनात आलं, दादामुळे अजित आयुष्यभरासाठी आपला होणार, दादाचे आभार मानावे की काय करावं संपदाला सुचत नव्हतं.. दाराकडे पाहून त्याच्या मिठीत शिरून तिचे आनंदाश्रु भराभर वाहू लागले..त्यावर तिला दादा भाऊक होत म्हणाला, “अगं वेडाबाई, आज लग्नाची बोलणी आहे.. सासरी जायला वेळ आहे अजून..आता पासून रडते की काय..सांगू का अजितला..संपदाला नाही यायचं तुझ्या घरी म्हणून..??”
    दादाच्या बोलण्याने रडतच हसू आलं तिला..अजितने ही दादाला मिठी मारत मनापासून आभार मानले..दादा माझ्या आयुष्यात इतका सुंदर दिवस तुमच्यामुळे आला असं म्हणताना अजितचे डोळे आनंदाने पाणावले होते..

    अशा प्रकारे दोघांच्या प्रेमकथेचा गोड शेवट आणि संसाराकडे सुंदर वाटचाल सुरू झाली..

    ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा ??

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे ?

    अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर आधार म्हणून तिने नकळत अचानक तिचा‌ हात अजितच्या खांद्यावर ठेवला आणि तिच्या हाताच्या स्पर्शाने अजितची अजून एकदा विकेट उडाली. संपदाच्या लक्षात येताच ती पटकन हात काढून लाजतच सॉरी म्हणाली आणि त्यावर अजितने लगेचच हात ठेवलास तरी हरकत नाही म्हणताच तिने परत आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. आज दोघांचीही अवस्था जरा‌ वेगळीच झाली होती. असं ठरवून भेटल्यावर काय बोलावे काय नाही अशी दोघांची अवस्था झालेली होती. कॉफी शॉप मध्ये पोहोचताच अजितने दोघांसाठी कॉफी मागवली, दोघेही आजूबाजूला बघत लाजत अवघडल्यासारखे एकमेकांसमोर बसले होते. चुकून नजरानजर झाली की संपदा एक गोड स्माइल द्यायची आणि अजित त्या स्माइल मुळे घायाळ??. बराच वेळ दोघे शांतपणे बसून नजरेनेच बोलत होते, काही वेळाने  अजितने पुढाकार घेत गप्पा सुरू केल्या. ही वेळ कधी संपूच नये अशी अजितची अवस्था झाली होती.
    अशाच दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. संपदाचा सहवास अजितला हवाहवासा वाटू लागला.संपदा कधी भेटायला तयार व्हायची तर कधी मुद्दामच अजितची मज्जा बघायला काही कारण काढून भेटायला नकार द्यायची. मनातून तर तिही त्याला भेटायला तितकीच उत्सुक असायची. असं दोघांचं भेटणं, बोलणं सुरू होत, आता संपदाला मनातल्या भावना सांगायला हव्या, तिला लग्नासाठी विचारायला हवं असं अजीतने मनोमन ठरवलं.
    येत्या रविवारी संपदाला निवांत भेटून प्रपोज करायचं असं ठरवून अजित तयारीला लागला. कसं प्रपोज करायचं याची प्रॅक्टीस आठवडाभर सुरु होती. संपदा आठवडाभरात दोन वेळा भेटली, फोनवर संवाद हा सुरू होताच. त्याने तिला रविवारी भेटायचं विचारलं तेव्हा काहीही आढेवेढे न घेता ती तयार झाली.
    ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी अजित एक सुंदर लाल गुलाबांचा गुच्छ, एक छानसा दोघांचा फोटो असलेलं पेंडंट घेऊन संपदाची वाट पाहात होता. आज नेहमीपेक्षा जास्त तयार होऊन मोठ्या उत्साहात तो भेटायला आला.
    संपदाला यायला मात्र बराच उशीर झाला, फोन केला तरी ती उत्तर देत नव्हती, तेव्हा संपदा नक्की येयील ना भेटायला, असं तर ती वागत नाही. यायचं नसतं तर आधीच नकार कळवलं असतं संपदाने अशा विचारांमध्ये अजित गुंतला असतानाच मागून येऊन कुणीतरी अजितचे़ डोळे हातांनी झाकले. त्या नाजूक बोटांचा स्पर्श अजितने लगेच ओळखला. हळूच तिचे हात पकडून डोळयांवरून बाजूला करत तो काही बोलणार तितक्यात ती म्हणाली, ” I’m really sorry..मला यायला खूप उशीर झाला..बराच वेळ वाट पहावी लागली ना तुला..sorry again..”

    अजितने मागे वळून पाहिले, संपदा सुद्धा आज छान तयार होऊन आलेली. तिचं निरागस रूप पाहून अजितचा मूड एकदम फ्रेश झाला आणि नकळत तो बोलून गेला, “अगं, sorry म्हणू नकोस, तुझ्यासाठी एक तास काय , आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे मी….? ( जरा वेळ दोघेही स्तब्ध राहून परत अजित बोलला)खूप सुंदर दिसत आहेस संपदा तू.. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..आज तुला यायला जरा उशीर झाला तर अस्वस्थ वाटू लागले होते मला, पण विश्वास होता तू येणार म्हणून.. मला आता तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाहीये.. आयुष्यभर साथ देशील माझी..?”
    अजित अचानक सगळं बोलून गेला, संपदाला त्याच्या मनातील भावना कळत होत्या पण अचानक तो व्यक्त झाल्याने त्यावर काय बोलावे तिला कळत नव्हते. जरा लाजत, गोंधळलेल्या अवस्थेत संपदा म्हणाली, “अजित , मलाही तू खूप आवडतोस पण मला जर वेळ हवा आहे विचार करायला..जरी आपलं प्रेम असलं तरी बाकी गोष्टींचा विचारही करायला हवा.. माझं कुटुंब साधारण आहे, तू श्रीमंत घरातला..तुझ्या घरी आपलं प्रेम स्विकारतील का.. शिवाय माझ्या घरच्यांनाही हे पटेल की नाही मला नाही माहित..प्रेम महत्त्वाचं असलं तरी घरच्यांना नाही दुखावू शकणार मी..मला प्लीज वेळ दे विचार करायला….”
    संपदाच्या अशा उत्तराने अजित जरा नाराज झाला. ” संपदा, अगं तू तयार असशील तर मी घरच्यांशी बोलेल या विषयावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत..प्लीज समजुन घे..”
    “अजित, अरे तू असा विचार नको करू, मी फक्त वेळ मागते आहे विचार करायला.. नाही म्हणत नाहीये..पण लग्न म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.. तेव्हा घरच्यांच्या परवानगीने सगळं झालं तर चांगलं असेल..”
    आता मात्र अजित गोंधळला, संपदाच्या बोलण्याने त्याला तिचा अभिमानही वाटला.. भावनेच्या भरात निर्णय न घेता वास्तविकतेचा विचार करणारी संपदा त्याला आज अजूनच आवडली..”संपदा, तू हवा तितका वेळ घे. माझं खूप मनापासून प्रेम प्रेम आहे गंं तुझ्यावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे.. ” इतकंच तो बोलला.
    आज याविषयी बोलल्यावर दोघेही स्तब्ध झाले.. पुढे काय बोलावे दोघांनाही काही सुचत नव्हते..
    संपदा घरी आल्यावर तिच्या मनात सतत अजितचा विचार सुरू होता. तिचही त्याच्यावर प्रेम होतच पण घरची परिस्थिती लक्षात घेता ती आता विचारात पडली होती.
    संपदाच्या भावाने तिच्या मनातली घालमेल ओळखली. काही तरी नक्कीच बिनसलंय, त्याशिवाय आपली चिमुकली बहीण अशी सतत विचारात राहणार नाही हे त्याच्या लक्षात आले. संपदा शी प्रत्यक्ष बोललो तर ती सांगेल की नाही त्याला शंका वाटली. त्याने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने माहिती काढली तेव्हा त्याला अजित विषयी कळाले. आपली चिऊताई आता मोठी झाली, कुणाच्या तरी प्रेमात पडली या विचाराने दादाला जरा आश्चर्याचा धक्का बसला पण या परिस्थितीत संपदाला मदत करायची असं दादाने ठरवलं.
    पुढचे काही दिवस संपदा आणि अजित भेटलेही नाही आणि फारसं पूर्वी सारखं बोलणंही नाही.. इकडे अजित सतत संपदाच्या उत्तराची वाट बघत होता आणि तिकडे संपदा सगळ्यांचा विचार करून गोंधळलेली होती.
    संपदाची अंतिम वर्षाची परीक्षा जवळच होती, कसाबसा अभ्यास करायची पण पूर्वी सारखं तिचं कशातच मन लागत नव्हतं.
    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता.

    आता दादा अजितला भेटून पुढे संपदाला कशी मदत करतो..त्याला अजित बहिणीचा जीवनसाथी म्हणून आवडेल का..दोघांच्या घरी याविषयी कळाल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच..तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १

    संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची.
    अजितची गाडी बंद पडल्याने तोही आज बसने ऑफिसमध्ये जायला‌ निघाला. सकाळच्या वेळी बस मध्ये बरीच गर्दी असल्याने बरेच जण उभेच होते. अजितला काही वेळाने जागा मिळाली आणि तो लगेच त्या जागी जाऊन बसला. पुढच्या स्टॉप वरून एक वृद्ध आजोबा बस मध्ये चढले पण गर्दी मुळे  बसायला जागा नसल्याने काठीचा आधार घेत कुठे जागा मिळते का याचा अंदाज घेत सर्वत्र नजर फिरवू लागले, तितक्यात संपदा आजोबांजवळ आली, तिने आजोबांना जागा करून दिली. त्याच क्षणी अजितची नजर संपदावर पडली, तिचं मदतीला धावून जाणं, तिचं ते मोहक रूप पाहून अजितची नजर काही केल्या संपदा वरून हटत नव्हती.
    अजित हा आई वडिलांना एकुलता एक, सधन कुटुंबात वाढलेला, नुकताच नोकरीला लागला. दिसायला देखणा, उंच बांधा, स्टायलीश राहणीमान. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर फिदा पण हा कुणाला भाव द्यायचा नाही. मित्रांनी चिडवले की म्हणायचा , “अरे, वो मेरे टाइप की नहीं..” त्याच असं म्हणनं होतं की बघता क्षणी असं वाटलं पाहिजे, “तुम्हे जमी पे बुलाया‌ गया है मेरे लिये..”
    संपदा अगदी अजितच्या विरूद्ध पण अजितला तिला बघताच मनात गाणं सुरू झालं, “देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार..”
    संपदाच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत असताना अजितला आजुबाजूला काय चाललंय काही भान नव्हते. संपदाचा स्टॉप आला आणि ती उतरली ‌तसाच अजित भानावर आला.
    ऑफिसमध्ये सतत संपदाचा चेहरा त्याच्या डोळ्यापुढे येत होता. कामात नेहमी प्रमाणे लक्ष लागत नव्हते. आपल्याला असं कधीच वाटलं नाही, आज पर्यंत इतक्या सुंदर सुंदर मुलींनी प्रपोज केले, मैत्री साठी स्वतः पुढाकार घेतला पण आपल्याला कुणा विषयी काही वाटले नाही. मुली इतक्या भाव देतात म्हणून टाइमपास व्हायचा, मज्जा वाटायची पण आज त्या बस मधल्या मुलीला बघून वेगळंच वाटत आहे. कोण असेल ती, इतका का विचार करतोय मी तिचा अशा मनस्थितीत अजितचा पूर्ण दिवस गेला. सायंकाळी मित्रा सोबत घरी परत गेला.संपदाला बघण्याच्या ओढीने दुसऱ्या दिवशी परत अजित बसनेच ऑफिसला निघाला. आज ती येयील की नाही हेही त्याला निश्चित माहीत नव्हते पण पुन्हा ती दिसल्यावर त्याला मनोमन आनंद झाला. त्या वीस मिनीटांच्या प्रवासात त्याच लक्ष फक्त संपदा कडे होते. संपदाच्याही ते लक्षात आले. नकळत अधून मधून दोघांची नजरानजर व्हायची.
    असाच बसने जाण्याचा कार्यक्रम आठवडाभर चालला. एक दिवस योगायोगाने दोघांना आजुबाजूला बसायला जागा मिळाली. अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला(मन में लड्डू फुटा..)
    जरा वेळ इकडे तिकडे उगाच बघत अजितने बोलण्यासाठी पुढाकार घेतला, “हाय, मी अजित..”
    त्यावर संपदा जरा लाजत, “हाय..”
    अजित ( जरा घाबरून ‌दबक्या आवाजात)- तुम्ही दररोज जाता का बसने.. काही दिवसांपासून मी येतोय तर तुम्ही दररोज दिसता म्हणून विचारलं..”
    संपदा – हो..मी गेली दोन वर्षे बसनेच जाते कॉलेजला..
    असा हाय हॅलो वरून संवाद सुरू झाला. अजित संपदाला भेटायला म्हणून रोज गाडी असूनही बसने प्रवास करायला लागला. कधी हाय हॅलो तर कधी संधी मिळाली तर थोडंफार बोलणं सुरु झालं. काही दिवसांनी दोघांची मैत्री झाली, फोन नंबर एकमेकांसोबत शेअर झाले. अजितला संपदा आवडायला लागली, तिला न बघता, तिच्याशी न बोलता त्याचा दिवसच अपूर्ण वाटू लागला. ती दिसणार नाही म्हणून रविवार नकोसा वाटायचा.
    एक दिवस अजितने संपदाला कॉफी साठी विचारले, बरेच आढेवेढे घेत शेवटी ती कॉलेज नंतर यायला तयार झाली. अजितने ऑफिसमधले काम लवकर संपवले आणि तो वेळेच्या आधीच तिला घ्यायला कॉलेज जवळ पोहोचला. समोरून संपदा येताना‌ दिसली, तिची लांबसडक वेणी उजव्या खांद्यावरून समोर आलेली, लाल पांढरा सलवार कमीज, डोळ्यातलं ते तेज, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघताच अजितची परत‌ एकदा विकेट उडाली. त्याची नजर एकटक तिच्याकडे होती,  स्वप्नातली अप्सरा जणू आपल्या जवळ येत आहे असा भास क्षणभर त्याला झाला. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणाली आणि अजित भानावर आला.

    क्रमशः

    पुढचा प्रवास पुढच्या भागात.. तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अधुरी प्रेम कहाणी- भाग २

    अमन रीता शुद्धिवर येण्याची वाट पाहत होता, ती लवकरच बरी होणार अशी त्याला खात्री होती. कितीही खर्च आला तरी चालेल, काहीही करून रीताला बरं करायचे अशी त्याची धडपड सुरू होती. डॉक्टर सुद्धा शक्य ते प्रयत्न करत होते. अमनचा त्याच्या प्रेमावर विश्वास होता पण नियतीच्या मनात नेमके काही वेगळेच होते. दोन आठवडे होत आले , उपचार सुरू होते पण रीताच्या प्रक्रुतीत हवी तशी सुधारणा होत नव्हती. रीताच्या अंगात बर्‍याच दिवसांपासून ताप होता, त्यामुळे तिची अवस्था अशी झाली असा अंदाज विविध तपासण्या करून डॉक्टरांनी सांगितला. रीताने स्वत: कडे इतके कशे दुर्लक्ष केले, आपल्याही लक्षात कशे आले नसेल हा विचार करत अमन दररोज रिताला बघत बसायचा, तिची शुद्धीवर येण्याची वाट पाहत असायचा.एक दिवस अचानक रीताने या जगाचा निरोप घेतला, अमनच्या पायाखालची जमीन सरकली, रीता आपल्याला अशी सोडून जाऊ शकत नाही हीच गोष्ट त्याच्या मनात होती पण नियतीने तिला अमन पासून वेगळे केले. अमन खूप खचला, इतके मोठे दुःख आयुष्यात कधी येयील असा त्याने कधीच विचार केला नव्हता.

    यातून बाहेर पडणे त्याला सोपे नव्हते, अमनला रीताच्या आणि त्याच्या आई वडिलांनी खूप समजून घेतले. तेही तितकेच खचले होते पण अमनचं अख्खं आयुष्य पुढे आहे, ते सुखी करण्यासाठी शक्य ते प्रयत्न सगळे करत होते. 

    अमनची आई त्याला सतत म्हणायची की रीता चे तुझ्यावर खूप प्रेम होते, ती या जगात नसली तरी तू नेहमी आनंदी असावा हीच रीताची सतत धडपड होती, तू असा खचून जाऊ नकोस, नव्या आयुष्याची सुरुवात कर. रीता ची साथ इथपर्यंतच होती, नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही, अमन तू स्वत:ला सावर. 

    हळूहळू वेळ गेला तसं अमनने सत्य स्विकारलं, रीता शिवाय आयुष्य कठीण असले तरी ते मान्य करावे लागणार हे त्याला जाणवले होते.

    दोन वर्षांनी अमनच्या घरच्यांनी त्याला ओळखीतल्या एका मुलीचे स्थळ सांगितले, मीनल असे तिचे नाव अतिशय साधी सरळ मुलगी. अमनच्या मनात रीताची जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही याची जाणीव अमनला होती, तिच्या गोड आठवणी त्याने मनात जपलेल्या होत्या. नविन आयुष्याची सुरुवात करताना आधी मीनलला रीता बद्दल सगळं सांगायचे अशे अमनने ठरवले. मीनलला रीता विषयी सगळं आधीच कळाले होते ,तीने अमनला समजून घेतले, मी रीता ची जागा घेऊ शकत नसली तरी नेहमी तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल, मला खरंच आवडेल तुझ्या सोबत आयुष्य घालवायला, एवढेच मीनल बोलली. अमनला तिच्या बोलण्यात एक निरागस भाव जाणवला. पुढचं आयुष्य मीनल सोबत घालवण्याचा त्याने निर्णय घेतला. रीता पहिलं प्रेम,ती मनात सदैव असेल, तिच्यासोबतची प्रेम कहाणी अधुरी असली तरी तिच्या गोड आठवणी अमर आहेत.

    मीनलचा प्रेमळ सहवास , तिचा समजुतदारपणामुळे वेळेनुसार अमन मीनल मध्ये गुंतला, तिने आपल्याला खूप समजून घेतले, आपण कधीच मीनलला दुखवायचे नाही हे अमनने मनोमन ठरवले आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात केली.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • पहिली भेट

    तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का. 

    अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढच सगळ ठरवणार होते. 

    ती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी. 

    ती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.

    ठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.

    तो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तीच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तर मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं. 

    नंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तीने विचार करायला जरा वेळ घेतला. 

    रात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.

    पुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरलं. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.

    हळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.

    दोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते. 

    त्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

    त्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं. 

    लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं तिच्या मनात येवून ती हळवी होत होती. 

    त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं. 

    लग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. 


    Ashvini Kapale Goley

  • प्रेमकथा

    अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी बेशुद्ध पडली होती. मागुन येणारी एक गाडी सुद्धा मदतीला थांबली. त्यांच्या मदतीने तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. अर्णव खुप घाबरला होता. तो रात्री तिच्याजवळच थांबला. ती अजून शुद्धिवर आली नव्हती. ती दुसरी कुणी नसुन त्याची कॉलेज मधली मैत्रीण आभा होती. आभा दिसायला सुंदर, आकर्षक, हुशार, आत्मविश्वासी, बिंदास, श्रीमंत घरची एकुलती एक लाडकी, मोकळ्या मनाची. काॅलेजला दोघे सोबतच शिकायला होते. अर्णव गरीब घरातील साधा, शांत, मेहनती, लाजाळू स्वभावाचा मुलगा. त्याला आभा पहिल्या भेटीपासूनच खूप आवडायची.तो तिच्यावर खुप प्रेम करायचा पण कधी तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले नव्हते. त्याला भीती होती की आभाला हे आवडले नाही तर दोघांची मैत्री संपेल शिवाय तो लाजाळू स्वभावाचा. कॉलेज संपल्यावर काही कारणाने दोघे फार काही संपर्कात नव्हते पण अजूनही तो तिला विसरला नव्हता. दोघांच्या अशा अपघाती भेटीमुळे तो हैराण झाला होता. रात्री इतक्या उशिरा ती कुठे निघाली‌ होती. तिला काय झाले असेल असा विचार करत तो तिच्या जवळ ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसला होता. रात्र कशी गेली त्याला कळाले नाही.काही तासानंतर ती शुद्धिवर आली. समोर अर्णवला बघून तिला आश्चर्य वाटले. ती हाॅस्पीटलमधे कशी आली, काय झाले हे तिला काही आठवत नव्हते. त्याने तिला नंतर सगळं सांगतो असं म्हणतं धीर दिला आणि तिच्या घरी कळवावे म्हणुन घरचा फोन नंबर वगैरे विचारला. काही न बोलता ती फक्त रडू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक निराशा, अस्वस्थता पसरली. त्याला काही कळेना. तितक्यात डॉक्टर तपासणी करायला आले. काही औषधे लिहून दिली, कशी घ्यायची ते समजून दिली. आता तीला घरी घेऊन जायला हरकत नाही असं सांगितलं. त्याने तिचा घरचा पत्ता विचारला, ती पुन्हा रडू लागली, माझं या जगात कुणीच नाही, मी कुठे जाणार मला माहित नाही. ते ऐकून त्याला काही समजत नव्हतं की काय झालं, आभा अशी का बोलत आहे. काहितरी वाईट झाल्याची जाणीव त्याला झाली. तीला आपल्या घरी घेऊन जायचे त्याने ठरवले, तसा प्रस्ताव तिने नाकारला. तो आई-वडीलांसोबत राहायचा, ती खूप साधी माणसं, गरीब परिस्थितीतून वर आलेलं कुटुंब. अर्णवच्या नोकरी मुळे आता सगळं छान झालेलं होतं. तिला घरी घेऊन जायला आई बाबांची हरकत नसावी हे त्याला माहीत होते. बराच वेळ तिची समजूत काढून तो तिला घेऊन घरी जायला निघाला. रात्री काय झाले ते वाटेतच त्यानं तिला सांगितले.

    ती स्तब्ध होऊन फक्त ऐकत होती. 

    त्याच्या मनात तिच्याविषयी अनेक प्रश्न गोंधळ घालत होते. ती जरा बरी झाली की मग विचारावं असे म्हणतं त्यानं स्वतःला धीर दिला. 

    दोघे घरी आले, त्याने घडलेली हकीकत आई बाबांना सांगितली. ती सावरेपर्यंत आपण तिची काळजी घेऊ असं आईकडुन ऐकाल्यावर त्याला खूप समाधान वाटले. ती आधीची आभा राहिली नव्हती. तीला खुप मोठा धक्का बसला आहे याची जाणीव त्याला झाली होती. ती अबोलपणे एकटक कुठे बघत राहायची. अर्णव आणि त्याच्या घरचे तिची सगळी काळजी घेत होते. ती अजुनही सावरली नव्हती. अर्णवची तिच्याविषयीची काळजी, त्याचं प्रेम त्याच्या आईला जाणवत होतं. तिला हसवण्याचे, सावरण्याचे सगळे प्रयत्न तो करत होता. 

    एका रात्री अचानक ती दचकून जागी झाली आणि रडू लागली. ते सगळे जागे झाले. ती खूप घाबरलेली होती. अर्णवच्या आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. त्या प्रेमळ स्पर्शाने ती मोकळी झाली, तिला पाझर फुटला आणि ती घडलेली हकीकत सांगू लागली.

    आभा नोकरीवर असताना तिच्या आई वडिलांसोबत काही दिवस सुटृीचा आनंद घ्यायला कोकणात जायला निघाले होते. काही दिवस आनंदात घालवून परत येताना भयंकर अपघात झाला, आभा कशीबशी वाचली पण तिचे आई-वडील जागेवरच गेले. त्यांच्या अशा जाण्याने ती खूप हादरली होती, पुर्णपणे एकटी झाली होती. जीवनातला आनंद एका क्षणात नियतीने हिरावून घेतला होता.

    स्वतःला कसंबसं सावरून ती नोकरी करत होती. मित्र-मैत्रिणी मध्ये ती आता जास्त रमत नव्हती. 

    अशा परिस्थितीत आॅफीसमधला एक मित्र तेजस, हा तिला आधार देत होता. कामात तिचं लक्ष लागत नव्हतं ,मनस्थिती ठिक नसल्याने कामात तिच्याकडुन झालेल्या चुका त्याने सांभाळून घेतल्या होत्या. तो तिला आधार देत असल्याने ती त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायची. त्याच्या सहवासात ती एकटेपण विसरून जायची. 

    एक दिवस त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. त्याची झालेली मदत, काळजी अशी एकूण परिस्थिती पाहून ती लग्नाला तयार झाली. त्यांच्यामुळे आपण सावरलो या भावनेने ती त्याच्यात गुंतली, प्रेमात पडली. दोघांनी लग्न केले. ती आनंदात होती. सगळें छान चालले होते.

    काही दिवसांनी तो काही कामानिमित्त बाहेर गेला, एक आठवड्यानंतर येणार‌ होता. पण तो गेल्यानंतर त्याचा फोन नाही, दहा दिवस झाले अजून तो आला नाही. ती घाबरली, बरेवाईट विचार तिच्या मनात येऊ लागले. 

    काय करायचे तिला काही सुचत नव्हते. 

    आॅफीसमधून माहिती काढली तेव्हा कळले की तो दोन आठवडे रजेवर गेला आहे. तो खोटं का बोलला‌ तिला कळत नव्हतं. 

    आॅफीसच्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. ती घरी गेली, त्याचं कपाट उघडून काही माहिती मिळेल या हेतूने कपाटात सगळं शोधू लागली. त्यात तिला एक फोटो सापडला. तो बघून पुन्हा ती हादरली. तो त्याच्या लग्नाचा फोटो होता, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं. त्याने तिला फसवले होते. तिच्यासाठी हा जीवनातला दुसरा मोठा धक्का होता. 

    त्याची रजा संपल्यावर तो परत आला. तीने त्याला जाब विचारला, ती त्याच्यावर भयंकर संतापली होती. आभाला सगळं कळलं असं त्याच्या लक्षात आलं, त्यानी सांगितलं, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं, शिवाय त्याला तीन वर्षांचा एक मुलगा सुद्धा होता. आभाला खोटं सांगून तो त्यांना भेटायला गावी गेला होता. आभा सोबत त्याने फक्त तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन हव्यासापोटी लग्न केले होते, तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला होता.

    हे ऐकून ती हादरली, त्यांच्या लग्नाचा काही पुरावा नसल्याने ती काही करू शकत नव्हती. ती हतबल झाली होती. त्या रात्री ती स्वतःला संपवायला निघाली होती पण नियतीने तिची अर्णव सोबत गाठ घातली. हे सगळं ऐकून अर्णव आणि त्याच्या आई बाबाला धक्काच बसला.

    अर्णवच्या आईने तिला धीर दिला, तिची समजूत काढली, तिला शांत केले. तू एकटी नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत, अर्णव धीर देत बोलला. 

    अर्णवचं आजही आभावर तितकंच प्रेम होतं. त्याच्या आईलाही ते माहीत होतं. आभा हळूहळू सावरू लागली पण तीचा आत्मविश्वास खुप कमी झाला होता. कुणावरही तिचा विश्वास राहिलेला नव्हता.अशा परीस्थितीत अर्णवच्या कुटुंबाने तिला सावरले होते. त्यांची काळजी,प्रेम तिला जगण्याची नवी उमेद देत होते. अर्णवने अजूनही त्याच्या प्रेमाबद्दल तिला काही सांगितले नव्हते. 

    काही दिवसांनी तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आणि गिफ्ट म्हणून त्याने त्याची काॅलेजला असताना लिहिलेली डायरी दिली. घरी आल्यावर तीने ती डायरी वाचली, त्यात त्याने आभावरच्या प्रेमाबद्दल लिहिले होते.

    तिच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते. त्याचं तिच्यावर खुप प्रेम होतं आणि आहे हे तिला जाणवलं. अर्णवने केलेल्या मदतीत कुठलाच स्वार्थ नाही हे तिला कळाले होते. 

    अर्णवला त्याचं खरं प्रेम आयुष्यात आल्यामुळे तो खूप आनंदी होता. आपल्यावर इतका जिवापाड , निरागस, निस्वार्थी भावनेने प्रेम करणारा अर्णव आयुष्यात आल्यामुळे ती सुखावली होती. तीने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं पण नियतीने तिच्यावर जिवापाड प्रेम करणा-या अर्णवला तिच्या आयुष्यात आणले होते. अर्णवच्या प्रेमाने तिला जिंकलं होतं.