Tag: Marathi blogs

  • बहुपती विवाह- एक प्रथा

    विज्ञान युगात अजूनही आपल्या देशात अनेक प्रथा जिवंत आहेत त्यातलीच एक म्हणजे “बहुपती विवाह”.एका पुरूषाला अनेक पत्नी आहेत असं बरेचदा ऐकलं पण आजच्या काळात एका मुलीचा विवाह अनेक पुरूषांसोबत एकाच वेळी केला जातो हे क्वचितच ऐकायला मिळते.

    हो, ही सत्य परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर मधली. भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या किन्नौर गावात एकाच मुलीचा विवाह कुटुंबातील सर्व सख्ख्या भावासोबत केला जातो, अशी प्रथा तिथे अजूनही आहे. किन्नौर मधल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की अज्ञातवासात पांडवांनी त्याच ठिकाणी वास केला होता आणि म्हणून अजूनही तिथे बहुपती विवाह ही प्रथा सुरू आहे.

    या ठिकाणी सगळे सदस्य एकाच घरात राहतात शिवाय बहुपती मधील एखाद्याचे निधन झाले तरी पत्नी दु:खी राहत नाही.

    किन्नौर मध्ये खूप वाईट प्रकारे ही प्रथा पाळली जाते.

    घरातील कुठल्या पुरूषाला वाईट वाटू नये म्हणून दारू आणि तंबाखूचे सेवन जेवणासोबत केले जाते.

    आश्चर्य म्हणजे या परीसरात घराची मुख्य ही स्त्री असते. घराचा ताबा तिच्या हातात असतो.

    एक‌ पती पत्नीसोबत यौन संबंध साधत असेल तर तो त्याची टोपी दारावर अडकवून ठेवतो. ती टोपी बघून बाकी पतींना कळते की काय सुरू आहे आणि त्यात मान मर्यादा इतकी असते की बाकी कुणीही त्या ठिकाणी टोपी असेपर्यंत जात नाही.

    जेव्हा पत्नीला कुठल्या गोष्टीच दु:ख होत असेल तर ती गाणी गाते.

    हे सगळं ऐकून विचित्र वाटत असेल तरी ही प्रथा अजूनही जिवंत आहे.

    असं ऐकल्यावर प्रश्न पडतो की या सगळ्यात प्रेम, स्त्रीचा आदर, स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. स्त्री असो किंवा पुरुष पण त्यांच्या भावना, परस्परांमधील प्रेम, आदर या गोष्टीचा आनंद त्यांना माहीतच नाही कारण वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा त्यापेक्षा महत्वाची मानली जाते.

    सध्या परीस्थिती खूप बदलत आहे मात्र देशाच्या बर्‍याच भागात बालविवाह, बहुपती विवाह सारख्या अनेक प्रथा अजूनही सुरू आहेत. अशा प्रकारच्या प्रथा हळूहळू बंद झाल्या तर आपला देश खर्‍या अर्थाने विकसित झाला असं म्हणायला हरकत नाही. याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

    असेच वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचन्यासाठी मला फॉलो करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नातेसंबंधात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • वडिल

    “आई असते जन्माची शिदोरी,जी सरतही नाही आणि उरतही नाही”तसेच वडील म्हणजे ते , जे म्हणतात “सोड ती चिंता सारी, आनंदात रहा तू बाळा, तुला असं उदास बघून मला लागत नाही डोळा”.

    हे अगदी खरं आहे. आपल्या मुलांच्या आनंदात वडीलांचे सुख असते. कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील सतत धडपडत असतात. ऊन पाऊस कशाचही विचार न करता रोज घराबाहेर पडतात. पैसा कमावण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्यभर झटत असतात.

    कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद, घर, गाडी अशा अनेक जबाबदारी सतत त्यांच्या डोळ्यासमोर असते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. बायकोला, मुलांना कशाचीही कमी पडू नये म्हणून स्वत: साठी ते कधी काही घेणार नाही.

    मुलांच्या संगोपनात आईचा वाटा मोठा असला तरी त्यांच भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी वडीलांचा मोलाचा वाटा असतो. ते व्यक्त करत नसेल पण वडिलांचा मुलांवर जास्त जीव असतो. त्यात जर ते मुलीचे वडील असेल तर ती सासरी जाताना सगळ्यात जास्त हळवे वडीलच होतात. प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम हे तिचे वडील. मुलांसाठी ते हिरो असतात, एक आदर्श असतात.

    आई जन्म देते, वेदना सहन करते पण त्याच वेळी अगदी भावुक होऊन आई आणि बाळ सुखरूप असू दे म्हणून प्रार्थना करतात ते वडील. बाळाला बघून त्यांना जबाबदारीची जाणीव होते, त्याच्या उज्वल भविष्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकायची धडपड ते करतात. उच्च शिक्षणासाठी सगळी तरतूद ते करून ठेवतात.

    त्यांच्या खांद्यावर बसून आपण हे नविन जग बघतो. अगदी सुरक्षा कवचाप्रमाणे ते आपल्या पाठीशी उभे असतात. कितीही मोठे संकट आले तरी वडील पाठीशी तटस्थ उभे राहतात, हिंमत न हारता संकटांना सामोरे जातात.

    स्वतः बसमधून प्रवास करतील पण मुलांना गरजेनुसार ते गाडी घेऊन देणारच. स्वतः फाटके चप्पल बूट शिवून घालतील पण मुलांना नीटनेटकेच ठेवणार. स्वतः टपरा मोबाईल वापरून, मुलांना महागडा मोबाईल घेऊन देतात.

    ज्या घरात वडील नाही त्या घरात मुलांवर कमी वयात सगळी जबाबदारी पडते, सतत वडिलांची कमी भासते. वेळ आली की वडील आई होऊन मुलांचे संगोपनही करतात.

    खरंच वडील कुटुंबाचा मोठा आधार असतात, कुटुंबाला कवच असतात, त्यांचे मजबूत हात सतत कुटुंबाच्या रक्षणासाठी, आनंदासाठी तत्पर असतात.

    अश्विनी कपाळे गोळे

  • Extramarital Affair – भाग २ ( अंतिम भाग)

    मागच्या भागात आपण पाहीले की आभा आणि मनिष‌ यांची बॅडमिंटन खेळताना ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरवात होते. आता‌ पुढे.

    दररोज सकाळी आभा आणि मनिष बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्ताने भेटायचे, खेळून झाल्यावर कधी ज्यूस घ्यायला तर कधी एकत्र नाश्ता करायला दोघेही जायचे. मनिष बडबड्या, विनोदी स्वभावाचा त्यामुळे आभाला त्याच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा यायची. त्याच्यासोबत ती मनसोक्त हसायची.
    एकदा सुजय नसताना‌ मनिष ने आभा ला सिनेमा ला जाण्या विषयी विचारले, तीही तयार झाली.
    मनिष हा अविवाहित तरुण, एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायचा. पार्टी, सिनेमा, फिरणं असं सगळं त्याला खूप आवडायचं. आता आभा सोबत मैत्री झाल्यावर तिलाही तो सोबत येण्यासाठी विचारायचा, या सगळ्या गोष्टींची आवड आभाला सुद्धा होतीच त्यामुळे मैत्रीच्या नात्याने ती तयार व्हायची.
    अशा सगळ्या गोष्टींमुळे तिला मनिष ची सवय झाली होती. सुजय सोबत असताना, त्याच्या सोबत फिरताना ती पूर्वी सारखी आनंदी नसायची, आपण सुजय ला धोका देतोय हे तिला कळत होतं. सुजय जवळ यायला लागल्यावर तिला त्याची आधी सारखी ओढ वाटत नव्हती. काही तरी चुकतंय हे सतत जाणवतं असल्याने तिच्या आणि सुजय च्या नात्यात एक दुरावा निर्माण होत होता. सुजय खुपदा तिला विचारण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा “आभा, तू हल्ली कुठल्या तरी विचारात असतेस, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं, काही प्रॉब्लेम तर नाही ना..कुठलं दडपण आहे का..मला सांग, मी नक्की मदत करेल तुला.. काय झालं आहे..”
    त्यावर आभाचं उत्तर ठरलेलं असायचं, “नाही रे, दडपण वगैरे काही नाही..उगाच वाटतं तुला असं.. काहीही झालं नाहीये..”
    वरवर असं बोलत असली तरी मनात मात्र मनिषचा विचार असायचा..तिला वाटायचं आपण मनिषच्या प्रेमात तर पडलो नाही ना..आपण चुकतोय का.. मनिष मला फक्त एक मैत्रीण मानतो पण मीच जास्त विचार तर करत नाही ना.. अनेक प्रश्न मनात येऊन सतत गोंधळ उडाल्या सारखं तिला वाटायचं. मनिष सोबत एकदा बोलाव‌ का याविषयी..की त्याला भेटायच टाळावं… सुजय माझा नवरा आहे..आमचं एकमेकांवर प्रेम आहे..मी उगाच मनिष कडे आकर्षित होत आहे..आता त्याला न भेटलेले बरे असा विचार करत तिने अचानक बॅडमिंटन खेळायला जायचे बंद केले.
    आभा का येत नसेल म्हणून तिकडे मनिष सुद्धा काळजीत पडला, फोन केला तर आभा काही उत्तर देत नव्हती. अशेच तीन दिवस गेले..आभा ला हे तीन दिवस तीन वर्षांसारखे वाटत होते..सतत मनिष सोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते तर एकीकडे सुजय चा विचार करून ती स्वतः ची समजुत काढत होती.
    मनिष सुद्धा आभा ला न भेटल्यामुळे अस्वस्थ झाला होता. काय झालं असेल..आभा ठिक तर असेल ना…आभा च्या घरी जाऊन बघावं का अशे अनेक विचार तो करत होता. आपण आभाच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला कळत होतं पण या नात्याला काही अर्थ नाही..आभा विवाहित आहे, तिच्या संसारात आपल्यामुळे काही विष पसरायला नको म्हणून तो स्वतः ला सावरत होता. एकदा आभा ला भेटून सगळं बोलून क्लीयर करावं म्हणजे अशी हुरहूर लागून राहणार नाही असा विचार करून त्याने आभा ला मेसेज केला, ” आभा, मला माहित आहे जे मला वाटतंय तेच तुझ्या मनात आहे.. आपलं नातं मैत्रीच्या पलिकडे जात आहे..वेळीच आपण थांबलो तरच योग्य राहील..तुझ्या आयुष्यात सुजय आहे..मला त्याची जागा घ्यायची नाही..पण एकदा मला भेट शेवटचं.. त्यानंतर मी परत तुला त्रास देणार नाही.. प्लीज मला भेट..”
    आभा त्याचा मेसेज बघून रडायला लागली, तिचीही अवस्था वेगळी नव्हतीच . रडतच तिने रिप्लाय केला, ” आज सायंकाळी, ७ वाजता भेटूया..कुठे भेटायचं तू ठरव..”
    मनिषचा रिप्लाय आला, “तुला हरकत नसेल तर माझ्या घरीच ये.. सविस्तर सगळं बोलता येईल..”
    मागचा पुढचा विचार न करता आभा तयार झाली. ठरल्याप्रमाणे ती ७ वाजता मनिषच्या घरी पोहोचली. मनिष तिची वाटच बघत होता. घरात छान सुगंध दरवळत होता, सगळीकडे मंद प्रकाश, हॉलमध्ये टेबलवर सुंदर गुलाबांच्या फुलांचा गुच्छ असं प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांसमोर येताच आभाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. कुठलाही विचार न करता तिने जाऊन मनिषला मिठी मारली.
    मनिष ने ही तिला मिठीत घेतले, काही वेळ दोघेही काही बोलले नाही. नंतर आभाला मिठीतून सोडवत मनिष तिला म्हणाला, “मी मस्त पैकी जेवण मागवले आहे..आज आपण छान पार्टी करू.. मनसोक्त गप्पा मारू..आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहीला पाहिजे.. रडून हे क्षण खराब करायचे नाही..आता हस बघू..”
    आभाने एक गोड स्माइल दिली.
    मनिष -” आभा, आपली मैत्री झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक क्षण मी आठवणीत जपून ठेवला आहे..मला तू खूप आवडतेस..तू आहेच इतकी गोड की कुणीही प्रेमात पडेल तुझ्या.. तसंच माझं झालं..पण मला माहीत आहे तू माझी होऊ शकत नाही..आपल्या नात्याचा प्रवास इथपर्यंतच होता असा समजुया..मला तुला आनंदात बघायचं आहे.. सुजय आणि तुझ्या मध्ये येऊन मला तुझं सुख हिरावुन घ्यायचं नाही. अचानक आपलं भेटणं बंद झालं तेव्हा मनात एक खंत वाटली.. गैरसमज मनात ठेऊन आयुष्यभर ते ओझं आपल्या मनात राहीलं असतं म्हणून आपल्या मैत्रीच्या प्रवासाचा शेवट गोड असावा म्हणून आज तुला बोलावलं मी..सोपं नसलं तरी आजच्या नंतर आपण भेटायला नको.. हळूहळू होईल सवय.. वेळ गेला ना की माणूस जुन्या गोष्टी विसरतो..तसंच आपणं पडू यातुन बाहेर..”
    आभा मनिष च्या बोलण्याने अजूनच भावनिक झाली पण मनिष जे बोलतो आहे हे सत्य आहे हे तिलाही कळत होतेच.
    मनिष ने मस्त मंद आवाजात गाणे लावले, दोघांनी एकत्र डिनर केला.. केक कापला…आज‌ मात्र ठरवूनही गप्पा काही होत नव्हत्या. विरहाची एक सल दोघांच्याही मनात बोचत होती.
    मनिष ने न राहावून आभा जवळ मनातल्या भावना व्यक्त केल्या, “आय लव्ह यू आभा.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर..आपण एकत्र येऊ शकत नसलो तरी माझं प्रेम हे खरं आहे..या प्रेमाची आठवण ठेव.. हसत रहा नेहमी…” असं म्हणत त्याने आभाला करकचून मिठी मारली.
    दोघेही भावनिक झाले पण मनिषच्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
    रात्री ११ वाजलेत तेव्हा आभा म्हणाली, “चल मनिष मी निघते.. उशीर झाला आहे..”
    मनिषने तिला घरापर्यंत सोडले आणि वाटेतच म्हणाला “तू खरच खूप सॉलिड आहेस..आजची आपली शेवटची भेट..या शहरात राहून मी तुला विसरू शकणार नाही.. म्हणून ट्रान्स्फर साठी अर्ज केला आहे…”
    आभा फक्त ऐकत होती.. काय बोलावं तिला काही कळत नव्हते. गाडीतून उतरताना इतकंच म्हणाली, “मनिष, तुझ्यामुळे जे क्षण मी खूप मनापासून एॅंजाॅय केले ते विसरणे अशक्य आहे..मी सुजय आणि माझ्या नात्यात यावरून दुरावा होऊ नये म्हणून नक्कीच प्रयत्न करेन पण तुझी आठवण मात्र कायम मनात असेल माझ्या…मला तू आवडतो पण प्रेम म्हणशील तर माझं प्रेम सुजय वर आहे रे…आपलं काय नातं आहे नाही माहीत मला..पण सुजय माझं पहिलं प्रेम आहे.. ”
    मनिष हसत भावनांना आवरत म्हणाला, ” मला माहित आहे आभा, तू सुजय वर खूप प्रेम करते..आपल्या गप्पांमध्ये तोच तर असायचा नेहमी..किती सांगायची तू मला त्याच्या विषयी.. माझं तुझ्यावर मात्र खरं प्रेम आहे पण मला तुला कुठल्याही बंधनात अडकवायचे नाही.. म्हणून तर हा निर्णय घेतला आहे मी..”
    आभा डोळे पाणावून, “चल मी निघते..बाय.. काळजी घे..”
    दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

    आभा घरी आली तर सुजय आधीच हजर होता.
    सुजय दोन दिवसांपूर्वी आठवडाभरासाठी दुसऱ्या शहरात गेला होता पण काम लवकर संपल्याने तो लगेच परतला.
    आभा त्याला बघताच गोंधळलेल्या अवस्थेत विचारू लागली “सुजय तू….तू तर आठवडाभरासाठी गेलेला..कधी आलास.. फोन का नाही केलास..कळवायचं तरी येतोय म्हणून..”
    सुजय आभाला शांत करत, “अगं हो.. शांत हो… माझं काम लवकर संपलं म्हंटलं चला‌ तुला सरप्राइज देऊ तर तू घरी नव्हतीस..किती उशीर केलास घरी यायला.. फोनही लागत नव्हता तुझा..”
    आभा जरा अडखळत बोलली, ” हा.. अरे मैत्रिणी कडे गेलेले.. उशीर झाला यायला..फोन बहुतेक बॅटरी संपली असेल..कळालेच नाही मला..”
    सुजय -” बरं असो, तू जेवण करून आलीस का.. मी पार्सल मागवलं होतं दोघांसाठी पण तुझी वाट बघून खाऊन घेतलं मी..”
    आभा – “हो मी जेवण करून आले..चल फ्रेश होऊन येते..तू पण थकला असशील ना..आराम कर..”
    आभाच वागणं सुजय ला जरा विचित्र वाटलं पण बाहेरून आली शिवाय उशीर झाल्याने थकली असेल म्हणून त्याने जास्त खोलात जाऊन काही विचारले नाही.

    दुसऱ्या दिवशी सकाळी आभा आंघोळीला गेली, तितक्यात आभाच्या फोनवर मनिष चा मेसेज आला आणि तो सुजय ने बघितला, तो विचार करू लागला
    “आभा आपल्याला फसवत आहे, काल रात्री ही‌ मैत्रिणी कडे गेली नसून मनिष सोबत होती. मग मला खोटं का सांगितलं आभा नी”
    आभा आंघोळ करून बाहेर येताच सुजय ने तिला मनिष विषयी आणि त्याच्या अशा‌ मेसेज विषयी जाब विचारला.

    दोघांनीही बराच वेळ यावर चर्चा, वाद , राग संताप व्यक्त केला. आभा ने तिची चूक मान्य केली, माफी मागितली, एक संधी दे म्हणत विनवणी केली पण सुजय मनोमन खूप दुखावला होता. आभा अशा प्रकारे आपल्याला धोका देऊ शकते यावर त्याला विश्वास बसत नव्हता.

    “कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही ” हे वाक्य सुजय ला खूप त्रास देत होते.
    आभाने रडत रडत सुजय ला घडलेली सगळी हकीकत सांगितली. पण एकदा विश्वासात तुटल्याने आता सुजयला तिचा विश्वास बसत नव्हता.

    ” मनिष आणि मी आज शेवटचं भेटलो…आम्हाला कळालं आहे आमच्या नात्याला काही अर्थ नाही..तो आता शहर सोडून जाणार आहे..मी खरंच अपराधी आहे सुजय तुझी.. भावनेच्या भरात नकळत त्याच्यात गुंतले पण आकर्षक होतं ते..माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर…मला एक संधी दे..”

    आभाच्या या बोलण्यावर कसाबसा विश्वास ठेवून तिच्या वरच्या प्रेमापोटी सुजयने तिला एक संधी दिली, पण दोघांच्या नात्यात एक दुरावा मात्र होताच.. एकत्र संसार करत असले तरी एकदा गमावलेला विश्वास आता परत येणं शक्य नव्हतं. आभा सुजय चा विश्वास परत मिळविण्याच्या सतत प्रयत्न करत होती, तोही तिला सुखी ठेवण्यासाठी धडपड करत होताच. पण त्या नात्यात आता पूर्वीसारखा गोडवा कायम नव्हता… एकत्र आनंदी दिसत असले तरी आभाच्या मनात अपराधी भावना तर सुजयच्या मनात एक अविश्वास होता, हि भावना बदलणे आता खरंच अवघड झाले होते.
    अशाच भावना मनात दडवून दोघे संसार करत होते.

    खरंच , नवरा बायको यांच्यातलं नातं हे प्रेम, विश्वास यावरच टिकून असतं. एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यातला गोडवा कमी होत जातोच पण सोबतच जी अविश्वसाची भिंत दोघांमध्ये निर्माण होते ती क्वचितच दूर होते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • Extramarital Affair – भाग १

    “सुजय, मला एक संधी दे ना रे..मी खरंच चुकले अरे.. भावनेच्या भरात वाहवत गेले…एकदा माफ कर ना‌ रे मला.. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर…प्लीज सुजय..एकदा संधी दे मला…” आभा रडत रडतच सुजय ला नातं टिकवण्यासाठी एक संधी मागत होती.
    सुजय (भावनिक होऊन राग व्यक्त करत) उत्तरला- “प्रेम..‌…माझ्यावर… आणि तुझं..ते असतं तर अशी वागली नसती आभा तू….माझ्या भावनेचा एकदा तरी विचार केलास असं वागताना..हे सगळं करताना‌ कधी माझा चेहरा तुझ्या नजरेसमोर कसा नाही आला… विश्वासघात केला तू…एकदा विचार कर .. तुझ्या जागेवर मी असतो.. असं वागलो असतो तर तू मला संधी दिली असतीस..कुठे कमी पडलो गं मी…आपल्या संसारासाठीच तर सगळी धडपड करतोय ना…तुला कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये, तुझ्या आवडीनुसार जगता यावं यासाठी शक्य तो प्रयत्न करतो… कोणतीही गोष्ट करायला नाही म्हणालो का मी तुला आता पर्यंत…पण तू मात्र माझा जराही विचार केला नाहीस…धोका दिला तू मला..माझ्या प्रेमाला…”
    आभा ( अपराधी भावनेने रडत ) – ” सुजय, मी चुकले..मी खरंच अपराधी आहे तुझी..माझी चूक मी मान्य करते…पण असं म्हणू नकोस रे…मला‌ एक संधी दे..मी वाहवत गेले रे.. माझं त्याच्याकडून खेळताना होणारं‌ कौतुक, दिसण्यावरून होणारी माझी स्तुती, रोज छान छान कॉंप्लीमेंटस ऐकून मी भारावून गेले होते… नकळत मला‌ एक वेगळीच ओढ लागली होती…त्याचा सहवास हवाहवासा वाटायला लागला होता..पण हे एक आकर्षण होतं सुजय… विश्वास ठेव माझ्यावर…तुझा‌ विचार मनात येत नव्हता असं नाही रे..मलाही कळत होतं, आमच्या नात्याला काही भविष्य नाही..क्षणिक सुखाच्या मोहात अडकले होते रे मी…तू इथे नसताना‌ एकटी पडायचे.. त्याच्या सोबत एकटेपणाचा विसर पडला…वाहवत गेले मी भावनेच्या भरात..पण मला माझी चूक कळते आहे सुजय…मला‌ प्लीज माफ कर..” (एवढं बोलून आभा ढसाढसा रडायला लागली)
    आभा इतकी चुकिची वागली असली तरी तिला असं रडताना‌ पाहून सुजयला‌ खूप वाईट वाटत होतं.. स्वतःच्या भावनांना सावरत आभाला जड अंतःकरणाने तो म्हणाला, “आभा, तू शांत हो… चूक तुझी नाही..मीच कमी‌ पडलो तुझ्यावरचं प्रेम  व्यक्त करण्यात.. पण प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते गं… तोंडभरून स्तुती केली, छान छान बोललं तरच प्रेम व्यक्त होतं का..तुला बॅडमिंटन खेळण्याची आवड आहे म्हणून तुला स्पोर्ट्स क्लब जॉइन करायला लावला ना‌ मी..ते प्रेम नाही…तुला फिरायला आवडतं म्हणून वर्षातून दोनदा तरी आपण नवनव्या जागी ट्रिप काढतो..तुला शॉपिंग करायला‌ आवडते म्हणून मी महीन्याला एक‌ वेगळी रक्कम तुला देतो मनसोक्त शॉपिंग कर……हवं ते घे म्हणत… तुला हॉटेलिंग आवडतं म्हणून शहरातलं प्रत्येक हॉटेलमध्ये आपण डेट वर गेलो…तुला कधी ताप आला तरी रात्र रात्र झोप लागत नाही मला..मी बिझनेस टूर वर असलो तरी तुझा चेहरा सतत डोळ्यापुढे असतो माझ्या..हे प्रेम नाही…मनात भावना महत्वाच्या की फक्त शब्दांनी स्तुती केलेली महत्वाची हे तूच ठरव..तुला माझ्या प्रेमावर शंका‌ असेल तर तुझा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस..”
    “असं म्हणू नकोस सुजय…मी चुकले रे… माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर..पण तुझ्या बिझनेस ट्रिप..मिटिंगस.. आठवडा आठवडाभर टूर..या सगळ्यामुळे मला खूप एकटं वाटू लागलं होतं…तशातच आमची मैत्री झाली…मला‌ तुला दुखवायचं नव्हतं रे पण माझ्याकडून नकळत सगळं घडलं.. विश्र्वास ठेव माझ्यावर…”
    ” कसा विश्र्वास ठेवू आभा… ‘कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही..तू खूप सॉलिड आहेस…आय लव्ह यू..’ असाच मेसेज आला ना‌ सकाळी तुला मनिष चा… चुकून मला तो दिसला म्हणून हे उघडकीस आलं..तुझ्या वागण्यातला बदल मला‌ जाणवत होता पण विश्वास होता माझा तुझ्यावर, मी विचारण्याचा प्रयत्न केला पण तू काही सांगत नव्हतीस..आज मला कळालं..तुला माझ्या जवळ यायला का आवडत नव्हतं इतक्यात..तू मला धोका देत होतीस आभा…मला खरंच विश्र्वास बसत नाहीये..नवरा बायकोचं नातं एका विश्वासावर, प्रेमावर अवलंबून असतं..पण आता आपल्या नात्यात एक तडा गेला आहे..तो‌ कसा भरून काढायचा ..तूच सांग..मी माफ करेनही पण माझ्या मनावर जी जखम झाली ती तर‌ कायमची राहील ना… त्याच काय…बोल आभा बोल.. ”
    आता मात्र आभा निशब्द झाली…

    आभा दिसायला सुंदर, मध्यम बांधा, चाफेकळी सारखे नाक, कुणीही बघता क्षणी मोहात पडेल असं सौंदर्य..सुजय हुशार, देखणा, मनमिळावू मुलगा…
    सुजय आणि आभाचे वडिल चांगले मित्र त्यामुळे आधीपासूनच दोघांची मैत्री होती..सुजयला‌ आधी पासूनच आभा आवडायची..त्याने प्रपोज केल्यावर जास्त आढेवेढे न घेता तिने होकार दिला..दोघांचे लग्न झाले.. लग्नापूर्वी सुजय तिला भेटायचा, दोघे खूप फिरायचे.. सिनेमा.. शॉपिंग… स्पेशल वागणूक यामुळे आभा खूप आनंदी होती… सुजयची नोकरी मार्केटिंग क्षेत्रात असल्याने त्याला बरेचदा वेगवेगळ्या शहरात, कधी परदेशात बिझनेस टूर वर जावं लागायचं. या सगळ्यामुळे लग्नानंतर मात्र हवा तितका वेळ तो आभाला देऊ शकत नव्हता. शिवाय सुजय जरा अबोल त्यामुळे प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायचं त्याला फारसं जमत नव्हतं. प्रेम मनात असल पाहिजे, वरवर बोलून व्यक्त केले तेच प्रेम असतं असं नाही अशा‌ विचारांचा तो.
    आभाला बॅडमिंटन खेळण्याची आवड लहानपणापासूनच होती, एकटेपणा जाणवायला‌ नको म्हणून सुजय च्या सांगण्यावरून आभाने परत स्पोर्ट्स क्लब जॉइन केला, तिथे तिची ओळख मनिष सोबत झाली.
    मनिष अगदी चार्मिंग पर्सनालिटी, दिसायला हिरो, पिळदार शरीरयष्टी, बोलण्यात गोडवा, अगदी सहज कुणीही प्रेमात पडेल असाच.
    पहिल्या दिवशी आभा बॅडमिंटन खेळायला गेली, तेव्हा योगायोगाने मनिष सुद्धा खेळण्यासाठी पार्टनर शोधत होता.. तेव्हाच पहिल्यांदा दोघे एकमेकांच्या समोर आलेले..मनिष ची पिळदार शरीरयष्टी, खेळण्याची, बोलण्याची स्टाइल बघून आभा त्याच्याकडे बघतच राहिली. खेळून झाल्यावर मनिष आभाला हात पुढे देत म्हणाला, “हाय, मी मनिष, रोज येतो खेळायला.. तुम्ही आज पहिल्यांदाच? बाय द वे, तुम्ही खूप छान खेळता… जितक्या सुंदर दिसता तितक्याच छान बॅडमिंटन खेळता..? आय होप यू डोन्ट माईंड..”
    आभाला त्यावर काय बोलावे सुचेना, हसतच हात पुढे देत ती म्हणाली,”थॅंक्यू सो मच..मी आभा..आजच पहिला दिवस क्लब मधला.. पूर्वी कॉलेजमध्ये असताना खेळायचे पण आज खूप दिवसांनी खेळले.. तुम्ही सुद्धा खूप छान खेळता.. बरं ज्यूस घ्यायचा का…इथे बाजुला ज्युस सेंटर आहे..मला‌ खरंच गरज आहे.. खूप दिवसांनंतर खेळले ना..”
    “ऑफ कोर्स..चला‌ जाऊया.. तुम्ही इतक्या प्रेमाने ऑफर केल्यावर नाही कसं म्हणायचं..? ” -मनिष .
    दोघेही ज्युस पिण्यासाठी निघाले.. ज्युस घेताना पूर्ण वेळ मनिष आभाच सौंदर्य न्याहाळत होता.. त्याच असं एकटक बघणं बघता आभा म्हणाली, “हॅलो मिस्टर मनिष, असं काय बघताय मला.. माझं लग्न झालं आहे बर‌ का..???”
    जरा भानावर येत मनिष म्हणाला,
    “ओह..रिअली ..तुमने तो‌ मेरा दिल तोड दिया… अरे खरंच वाटत नाही तुझं लग्न झालं आहे..असो… तुम्हीं खूप छान दिसता.. कसं मेन्टेन केलंस मॅडम.. नाही म्हणजे लग्नानंतर मुली जरा जाड होतात.. तुम्ही मात्र अगदी वेल मेन्टेन..क्या राज है..”
    “अरे, प्लीज राज वगैरे काही नाही..एकच वर्ष झालं आमच्या लग्नाला.. आणि अजून एक असं तुम्ही आम्ही नको..तू‌ म्हणं मला सरळ..”
    “ओके मॅडम..तू‌ पण मला तू म्हणं मग.. फ्रेंड्स…” असं म्हणत मनिषने फ्रेंडशिप साठी हात पुढे केला..
    एकमेकांच्या नजरेत बघून दोघांनी हात मिळवून फ्रेंडशिप मान्य केली.

    पुढे आभा आणि मनिषचे नाते कसे बहरत जाते, त्याचा आभा आणि सुजय च्या संसारावर काय परिणाम होतो, सुजय आभाला माफ करेल का..अशे अनेक प्रश्न पडले असणार ना तुम्हाला..?
    तर पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.
    पुढचा भाग लवकरच…

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अनोळखी नातं..

    रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू खूश आहे हे ऐकून छान वाटले एवढंच तो बोलला. रीयाला त्याच्या बोलण्यात आज खूप फरक जाणवला. रीयाने विचारले, ‘”काय झालं अमेय, तू आज इतका शांत कसा , नेहमी तर माझी खिल्ली उडवत असतोस. मी किती अल्लड आहे हे मला पटवून देत असतोस, आज मी इतकी छान बातमी सांगितली पण तू मात्र आनंदी नाही असं वाटत आहे मला. सांग ना काय झाले, तू माझ्यासाठी खूश आहेस ना”.

    “रीया अगं मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, तुला हवा तसा जोडीदार तुला मिळाला हे ऐकून खरंच छान वाटले मला. तुझं जय बद्दलच वर्णन ऐकून तू आता अल्लड नसून मॅच्युअर झाली आहे हे मला जाणवलं. पण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता माझ्यासोबत जास्त बोलू शकणार नाही, माझे चांगले वाईट अनुभव, माझी प्रेमप्रकरणं आता मी कुणाजवळ सांगणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाची खिल्ली उडवणार मी म्हणून जरा उदास झालो एवढंच.” अमेय बोलला.

    अमेयचं उत्तर ऐकून रीयाला काय बोलावे कळत नव्हते, काही क्षण शांतता पसरली. एकीकडे आनंद तर एकीकडे मैत्री आता जरा कमी होणार म्हणून उदासीनता अशी दोघांची मनस्थिती झाली.

    आपली मैत्री अशीच राहणार असं म्हणत रीयाने शांतता दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अमेय तिला समजूत सांगत म्हणाला “रीया अगं तुझ्या आयुष्यात आता एक स्पेशल व्यक्ती आहे तो म्हणजे जय, तुझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पूर्ण आयुष्य तुम्ही एकत्र घालवणार आहे, आपल्या दोघांना माहित आहे की आपण खूप छान मित्र आहोत पण सगळ्यांना अशी मैत्री पटेल असं नाही. मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही, जय आणि तू हे दिवस खूप एंजॉय करा. आपल्या मैत्रीमुळे त्याला उगाच काही गैरसमज नको. अधूनमधून आपण बोलायला हरकत नाही पण नको तू छान वेळ दे त्याला, समजून घे जय ला आणि हो कधीही माझी आठवण आली, काहीही मदत लागली तर बिंदास सांग मला.” अमेयचं हे बोलणे ऐकून रियाने हो..चालेल.. बाय.. टेक केअर म्हणत फोन ठेवला.

    रीया आणि अमेय शाळेपासून चांगले मित्र मैत्रीण. अमेय अतिशय बिंदास मनमोकळ्या स्वभावाचा, बडबडा, नेहमी हसत खेळत, कॉमेडी मूड मध्ये असणारा पण सगळ्यांना मदत करायला तयार. रीया अगदी अल्लड, शांत, साधी भोळी मुलगी. रीयाला मित्र मैत्रीणी मोजकेच होते पण त्यात अमेय तिचा चांगला मित्र होता. त्याची सगळी प्रकरणं, मज्जा मस्ती तो तिला सांगायचा. रीया किती साधी भोळी आहे, तिला कुणी किती सहज फसवू शकतं ही जाणीव तिला करून द्यायचा. अमेयची गर्लफ्रेंड उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशी गेलेली त्यामुळे त्यांचं फार काही बोलून होत नसे पण तिची आणि अमेयची लव स्टोरी, त्यांची भांडणं, सरप्राइज अशे चांगले वाईट अनुभव तो रिया जवळ शेअर करायचा. रीया अमेय मुळ माणसं ओळखायला शिकली होती, कुठल्याही परिस्थितीत आनंदी कशे राहायचे हे तिला अमेय मुळे कळाले होते. इतके चांगले मित्र मैत्रीण असून एकमेकांचा आदर त्यांना होता, पवित्र अशी त्यांची मैत्री होती.

    फोन ठेवल्यानंतर रीया विचार करू लागली की मुलगा मुलगी ह्यांच्यात मैत्रीचं नातं नसू शकते का. लग्न होणार म्हणून अशी मैत्री अचानक कमी, का तर उगाच नवर्‍याला गैरसमज नको, तिला जरा विचित्र वाटले. आता आधी सारखा वेळ मित्र मैत्रीणी सोबत घालवता येणार नाही हे मान्य कारण आता नवं आयुष्य सुरु होणार, प्रायोरिटी बदलणार पण नविन आयुष्यात अशा मैत्रीमुळे गैरसमज नको हे तिला काही पटत नव्हते. ज्या पवित्र मैत्रीमुळे ती खरं जीवन जगायला शिकली, माणूस ओळखायला शिकली, कुणी आपली सहज फसवणूक करू शकते पण अमेय मुळे असं काही झालं नाही, बर्‍याच नविन गोष्टी अमेय मुळे आपल्याला कळायला लागल्या हे ती कधीच विसरू शकत नव्हती. असं हे नातं अनोळखी का आहे याचे उत्तर मात्र तिला मिळत नव्हते.

    तुमच्या मते या अनोळखी नात्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट मध्ये लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • संसाराचा गाडा सुरळीत चालवायला दोघांचीही गरज..

    नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नविन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असल्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असले तर होणारा तो आनंद. जीवनातील सुंदर अनुभव असतो तो.

    तेव्हा सगळं अगदी गोडगोड असतं. सुरुवातीच्या काही वर्षांत सगळं छान छानच असते.

    हळूहळू जबाबदारी दिसू लागते. एकमेकांच्या सवयी आवडेलच याची खात्री नसते, मग सुरू होते तू तू मी मी पण तरीही तू आणि मी. एकमेकांकडून नकळत अपेक्षा वाढतात, पूर्ण होत नसेल तर चिडचिड होते. पण प्रेम मात्र कमी होत नसते. दोघांच्या भांडणात, रुसवा फुगवा दूर करण्यात एक मज्जाच असते.

    भांडण झाले की समजूत काढायची जबाबदारी त्याचीच असते. हळूहळू मुलांच्या येण्याने एक वेगळाच आनंद, प्रेम दोघांमध्ये असतं. मुलांचे संगोपन करण्यात, घर, नोकरी सांभाळण्यात ती खूप थकून जाते पण तिचे कष्ट बघून त्याने प्रेमाने मिठी मारली की ती सगळं विसरून जाते. आई म्हणून संस्कार, मुलांची देखरेख ती करत असेल तरी त्यांच्या भविष्याची काळजी त्याला असतेच. त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, घरखर्च, बायको मुलांची हौसमौज करत तो सगळा गाडा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. दोघांनी एकमेकांना ‌समजून घेणं, प्रेम, विश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. खुप गोड असं हे दोघांचं नातं असतं. या सगळ्यात दोघांचं नातं घट्ट होत जातं, प्रेम वाढतच असतं. दोघांनीही एकमेकांची खुप सवय झाली असते. दोघांचे एक सुंदर नाते निर्माण झालेले असते.

    त्याच्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय तो अपूर्णच असतात. दोघांनीही समजून घेवुन विश्र्वासानं हे नाजूक जन्मभराचं नातं जपण्याची गरज असते. जसजसे वय वाढत जाते, मुले मोठी होतात तसतशी एकमेकांची जास्त गरज भासू लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालवायला खरंच दोघांचीही गरज असते.

    अश्विनी कपाळे गोळे

  • सात मुली नंतर आठवा मुलगा झाला…

    आजच्या विज्ञान युगात आठ वेळा बाळंतपण, ऐकूनच धक्का बसतो ना…कामवाल्या मावशी अतिशय आनंदाने सांगत होत्या की माझ्या बहिणीला वारीस जन्माला आला, सात मुली नंतर आठवा मुलगा झाला.

    ते ऐकून आश्चर्यने त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. आजच्या काळात आठ वेळा बाळंतपण. त्या मात्र अतिशय आनंदात होत्या.

    जरा वेळ विचारात गुंतून भानावर आले आणि त्यांना म्हणाले “मावशी, अहो मुलगा असो की मुलगी आजकाल इतका भेद नाही राहीला. मुलगा व्हावा म्हणून इतके वेळा बाळंतीण झालेल्या बाईची काय अवस्था झाली असेल शिवाय त्यांच्या हातात नाही ना मुलगाच व्हावा ते.”

    त्यावर मावशी म्हणतात ” ताई तुम्ही सुशिक्षित, शहरात राहता म्हणून तुम्हाला तसं वाटतं. गावाकडे असं न्हाय, वारीस नसला‌ की बाईच्या जातीला लय टोमणे मारतात बघा. त्यासाठी बहीणीनं नवस केला, तेव्हा मुलगा झाला. सगळ्यात मोठ्या मुलीचं अनं आईचं बाळंतपण एकाच वेळी पाठोपाठ झालं बघा. लेकीला मुलगा झाल्यावर आईला आठवड्यानंतर मुलगा झाला. भाच्याच्या पायगुणानं मामा जन्माला आला बघा ”

    मावशीचे उत्तर ऐकून धक्काच बसला, चक्कर येणेच बाकी राहिले. अजूनही अशे विचार, अशी परिस्थिती आजुबाजुला आहे हा विचार कधी केला नव्हता. त्यात सगळ्यात मोठ्या मुलीचं आणि आईचं बाळंतपण एकाच वेळी हे ऐकून तर आश्चर्याने ताणलेल्या भुवया पूर्वस्थितीत यायला बराच वेळ लागला. मावशी सगळं सहजरीत्या आनंदात सांगून गेल्या. मी मात्र अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातच होते.

    आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे, मग मुलगा असो वा मुलगी. या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असताना मुलगाच व्हावा म्हणून बाईच्या जीवाचा, तिच्या वेदनेचा विचार न ‌करता तिला मुलगी झाली म्हणून मानसिक छळ कितपत योग्य आहे. मुलगा नाही म्हणून टोमणे ऐकायचे पण ते खरंच तिच्या हातात आहे का. आठ वेळा बाळंतपण झाल्यावर तिची शारीरिक अवस्था काय झाली असेल. केवळ समाजात टोमणे नको, मुलगा होत नाही म्हणून नवरा सोडून देयील या भितीने हे सगळं सहन करणे हाच यावर उपाय आहे का.

    ग्रामिण भागात अजूनही अशे विचार जिवंत आहेत. अजूनही मुलगा होत नाही म्हणून सासरी छळ, नवर्‍याने सोडून दिले असले प्रकार सुरू आहेत. ही परिस्थिती खरंच बदलायला हवी. यासाठी स्त्रीनेच पाऊल उचलायला हवे, खंबीर व्हायला हवे. अशा परिस्थितीतून गेलेल्या आईने मुलीलाही अशाच विचारांचे घडवले, अन्याय सहन करत राहिले तर ही परिस्थिती बदलणे खरंच खूप कठीण आहे.

    अश्विनी कपाळे गोळे

  • निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..

    समिधा आणि अजय, कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. समिधा देखणी, अतिशय उत्साही, मेहनती आणि मनमिळावू मुलगी. कुणालाही काही अडचण असो, ती मदतीला तत्पर असायची, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. अजयला तिचा हाच गुण खूप आवडायचा. अजय म्हणजे शांत, संकोची स्वभावाचा आणि हुशार मुलगा. समिधा त्याला सुरवाती‌ पासूनच खूप आवडायची पण तिला अचानक प्रेमाची कबुली दिली तर ती ते स्विकारेल की नाही या भितीने तो काही बोलला नाही. दोघांची चांगली मैत्री होती पण समिधाच्या मनमिळावू स्वभावामुळे तिचे बरेच मित्र मैत्रिणी होते. अजयला मात्र समिधा जवळची मैत्रीण, बाकी काही मोजकेच मित्र. कॉलेज संपत आले तेव्हा शेवटच्या दिवसात मोठी हिम्मत करून अजयने समिधाला प्रपोज केले, तिने त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही, अजय जरा नाराज झाला. पण कॉलेज नंतर योगायोगाने नोकरीसाठी दोघेही एकाच शहरात आले, परत त्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अजय समिधाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, समिधा लाही आता अजय आवडायला लागला, अजयने परत एकदा तिला विचारले असता तिने लगेच होकार दिला. समिधाच्या घरी मात्र तिच्यासाठी स्थळ बघण्याची तयारी सुरू झाली, समिधाने घरी अजय विषयी सांगितले पण आंतरजातीय प्रेमविवाह तिच्या वडीलांना मान्य नव्हता. तिने खूप समजविण्याचा‌ प्रयत्न केला पण घरी ते मान्य नव्हते. इकडे अजयच्या घरीही तिचं परिस्थिती. अशा परिस्थितीत अजय काही निर्णय घेत नव्हता पण समिधाला इतकंच म्हणायचा की “तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, काही झालं तरी लग्न तुझ्याशीच करणार.” समिधाचीही तिचं मनस्थिती होती. कितीतरी महीने झाले पण दोघांच्याही घरचे त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. शेवटी समिधा आणि अजयने कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. मित्र मैत्रिणींच्या मदतीने सगळी तयारी झाली. तारीख, वेळ निश्चित करण्यात आली,  समिधा ठरल्याप्रमाणे मैत्रिणी सोबत रजिस्ट्रेशन ऑफिसला आली पण अजय काही आला नाही, त्याचा फोनही लागत नव्हता, किती वेळ त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचा मॅसेज आला, “घरच्यांना धोक्यात ठेवून मी लग्न करू शकत नाही. तू मला विसरून जा. त्यातच आपलं भलं आहे.”
    त्याचा असा मॅसेज वाचून समिधा हादरली, आई वडिलांचा विरोध पत्करून त्याच्या प्रेमापोटी सगळं सोडून ती आली होती आणि अजयने मात्र तिचा विश्वासघात केला. समिधाचे आई वडील राहायचे त्या गावात अशी बदनामी झाली की समिधाने पळून जाऊन दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले.
    झाल्या प्रकाराने समिधाच्या वडिलांना धक्का बसला, यापुढे आमच्याशी तुझ्याशी काही संबंध नाही असे बोलून त्यांनी तिला कायमचे पोरके केले. समिधा मुळे आपल्याला मान खाली घालायची वेळ आली, तिच्यामुळे गावात अपमान झाला तेव्हा आता तिला आता माफी नाही अशी तिच्या वडिलांची भूमिका झाली होती. समिधा पूर्ण पणे एकटी पडली होती. मित्र मैत्रिणींकडून कळाले की घरच्यांच्या दबावाखाली येऊन अजयने असा निर्णय घेतला, पण मग समिधाच्या प्रेमाचं काय, तिचा विश्वासघात केला त्याच काय..अशे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.
    माहेरी स्थान नाही आणि प्रेमाने पाठ फिरवली अशा परिस्थितीत स्वतः ला सावरणे तिच्या साठी कठीण झाले होते. ती सतत शक्य त्या मार्गाने अजय सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती पण काही फायदा नव्हता, इकडे आई वडिलही तिच्याशी बोलायला, तिची अवस्था समजून घ्यायला तयार नव्हते. अशात ऑफिसमध्ये सुद्धा तिचं मन लागत नव्हतं, किती तरी दिवस ती एकटीच घरात रडत बसून राहिली. झाल्या प्रकारामुळे समिधा खचून गेली होती, सतत एकच विचार तिच्या मनात येत होता, “अजयवर इतका विश्वास न ठेवता आई वडिलांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”
    या सगळ्याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला, तिने स्वतःला दोष देत आत्महत्येचा प्रयत्न केला, मित्र मैत्रिणींमुळे तिचे प्राण वाचले पण एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य चुकत गेले. पुढे स्वतःला‌ कसं बसं सावरत ती जगत होती, आता प्रेम या गोष्टीवरचा तिचा विश्वास उडाला होता, अशातच तिची नोकरीही गेली. ती मानसिक आजाराची बळी ठरली, आता महीलाश्रम हाच तिचा शेवटचा आधार बनला. जेव्हाही तिला भूतकाळ आठवायचा तेव्हा एकच विचार मनात यायचा, ” तेव्हा विचार पूर्वक निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”

    हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, पण वास्तविक आयुष्यात अशा घटना‌ घडताना दिसतात. आयुष्यात एखादा निर्णय चुकला की पुढचे आयुष्य चुकतच जाते. तेव्हा आयुष्याचे निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे असते.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा )

    “रसिका, मला यायला रात्री उशिर होईल गं, जेवणासाठी वाट बघत बसू नकोस..सध्या खूप काम आहेत ऑफिसमध्ये.. निघतोय मी..” (शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता)
    “शशी, अरे नाश्ता करून जा ना.. झालाचं आहे तयार..काल रात्रीही उशीरा आलास.. खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला..” (रसिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत शशी सोबत बोलत होती)
    “नको गं, मी निघतोय.. रश्मीचा फोन येऊन गेला, क्लायंट येत आहेत मिटींगसाठी शिवाय नवीन ऑफिसच्या उद्घाटनाचा दिवस जवळ येत आहे, बरेच काम राहिलेत अजून. चल भेटूया रात्री..बाय..”
    इतकं बोलून शशी निघाला.
    रसिका जरा निराश होऊन चहाचा कप हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि बाल्कनीतल्या झुल्यावर चहा घेत बसली. तिच्या मनात बर्‍याच गोष्टी थैमान घालत होत्या. ती चहाबरोबरच विचारचक्रात गुंतली.
    किती बदलला आहे शशी, पूर्वी मी प्रेम केलं तो हाच शशी आहे ना..सतत ऑफिस, क्लायंट, मिटिंगमध्ये गुंतलेला असतो..एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला शशी एक पती म्हणून मात्र औपचारिक वागतो हल्ली..पूर्वीचे ते दिवस आठवले की कसं छान वाटत.. असं वाटत नको तो पैसा, नको ती प्रसिद्धी.. दोघांना एकत्र वेळ मिळत नसेल..संवादच होत नसेल तर काय फायदा ह्या संपत्तीचा..सगळं मातीमोल आहे..
    विचारचक्र सुरू असतानाच दारावरची बेल वाजली आणि रसिका भानावर आली. कामवाली मावशी “गुड मॉर्नींग ताई” म्हणताच रसिकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
    “काय मग ताई आज कोणतं पेंटिंग करणार तुम्ही…आधी तुमची पेंटिंग ची खोली‌ आवरते… तुम्ही म्हणालात ना‌ काल, खूप सारे पेंटिंग करायचे आहे..आर्डर का‌‌ काय आली आहे..”
    रसिका आनंदी चेहऱ्याने मोठ्या उत्साहाने उत्तरली, “तुला‌ किती लक्षात राहतं गं मावशी, काल सहज म्हणून बोलले मी‌ तुझ्याजवळ..पण खरं आहे ते एक ऑर्डर आली आहे.. एकाच वेळी वीस वेगवेगळ्या पेंटिंग्ज ची.. तसं झालं आहे बर्‍यापैकी फ्रेम करून तयार आहेत पण देण्यापूर्वी फिनीशींग करते आज..आणि हो तुझे काम आटोपले की मला‌ पेंटींग्ज च्या पॅकिंग साठी मदत कर..” – रसिका.

    “ताई तुमच्यासाठी काय पण बघा…चला‌ मी आवरते पटापट..” असं म्हणत मावशी कामाला लागली.

    मावशीचं बोलणं रसिकाला खूप कौतुकास्पद वाटलं..इथे साधं माझ्या पेंटिंग च्या खोलीत शशी कधी डोकावत सुद्धा नाही..तुला‌ आवडतं तर तू कर पण मला‌ ह्या सगळ्यात काही रस नाही म्हणणारा शशी आणि एक हि कलेविषयी फारसं काही माहीत नसताना भरभरून कौतुक करणारी, नवीन ऑर्डर आली की माझ्या इतकीच उत्सुक असलेली‌ ही मावशी किती जमीन आसमानचा फरक‌ आहे दोघांमध्ये..असो,  चला‌ आज ऑर्डर पिक-अप साठी येणार आहे..पटापट‌ सगळं तयार करूया..( मनात असं सगळं पुटपुटत रसिका तिच्या आवडत्या पेंटिंग साठी स्पेशल तयार केलेल्या खोलीत गेली आणि सगळ्या पेंटिंग्ज कडे एक नजर फिरवत मनोमन आनंदी होत कुठे काही कमी जास्त वाटत नाही ना हे न्याहाळू लागली.)

    शशीकांत आणि रसिका, दोघांची ओळख दोघांच्या एका कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. रसिका‌, त्यावेळी फाइन आर्ट्स मध्ये पदवी अभ्यासक्रमाला होती, दिसायला सुंदर, टपोरे डोळे, नाजूक अंगकाठी, उंच बांधा, आकर्षक दिसणारी रसिका पाहताक्षणी शशीला आवडली. दोघांची ओळख मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. पाच वर्षें दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते.
    शशी‌ एमबीए करून वडिलांचा व्यवसाय बघायचा. अचानक आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर घरची , व्यवसायाची सगळी जबाबदारी शशीवर येऊन पडली. शशी रुबाबदार, हुशार, आत्मविश्वासू तरुण..कमी वयात मेहनतीने घरचा व्यवसाय मोठ्या पातळीवर आणला…एक यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला. या सगळ्यात रसिका प्रत्येक वेळी त्याच्या साथीला होती. तिने स्वत:च आयुष्य जणू शशीला अर्पण करून टाकलं होतं. रसिका मुळे तो आई वडिलांच्या अपघाती मृत्यू नंतर सावरला, दोघांनी वर्षभराने लग्न केले.
    शशी घरचा श्रीमंत त्यात एकुलता एक, आता तर यश , श्रीमंती त्याच्या पायाशी लोळण घेत होती. तेव्हा नोकरी करण्याची गरज नाही, हवं तर आपल्या ऑफिसमध्ये तू मला मदतीला ये असं तो रसिकाला सांगत असे पण तिचं स्वप्न वेगळं होतं. तिला तिच्यातल्या कलागुणांना वाव द्यायचा होता, अप्रतिम पेंटिंग करणारी रसिका, तिला स्वतः चा असा एक पेंटिंग स्टुडिओ उभारायचा होता, आपणही एग्झिबिशन मध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करावं, पेंटिंग घ्या माध्यमातून एक नवी ओळख बनवावी असे सुंदरसे स्वप्न होते तिचे.
    शशीच्या आयुष्यात त्याला प्रोत्साहन देत, घर सांभाळताना तिचं स्वप्न मात्र मागे पडलं. शशी दिवसभर कामात व्यस्त, रसिका घरी एकटीच त्यामुळे वेळेचा सदुपयोग घेत घरीच काही तरी सुरवात करावी म्हणून एका खोलीत तिने पेंटिंग करायला सुरुवात केली, शशीला सरप्राइज द्यायचं म्हणून मोठ्या कौतुकाने पहिले पेंटिंग आणि तयार केलेली खोली दाखवली. पण शशी मात्र अरसिक , त्याने फार काही प्रतिक्रिया दिली नाही, तुला हवं ते तू कर, मला या सगळ्यात मला फारसा रस नाही, असं म्हणत रसिकाचा हिरमोड केला.
    रसिकाला त्या क्षणी फार वाईट वाटले, आपल्याला व्यवसायातील काही माहीत नसताना‌ शशीला पाठिंबा दिला, आपलं स्वप्न बाजुला ठेवलं पण आज माझ्या कलेचं साधं कौतुक करायलाही नको‌ वाटलं शशीला. काही असो , मी माझं स्वप्न पूर्ण करणार..असा निश्चय करून रसिकाने अप्रतिम अशा‌ अनेक पेंटिंग्ज बनविल्या, शक्य त्या प्रकारे जाहिरात करून, काही वेबसाइट्स वर पेंटिंग्ज विकायला सुरुवात केली. तिच्या पेंटिंग्जला भराभर मागणी सुरू झाली. शशीला याविषयी काही माहितीच नव्हते, वेळच नव्हता त्याला‌ सगळं जाणून घ्यायला असं म्हणायला हरकत नाही ?
    पूर्वी छोट्या मोठ्या ऑर्डर यायच्या पण आज सगळ्यात मोठी अशी ऑर्डर डिलीव्हर होणार होती.
    मावशीच्या मदतीने सगळं पॅकिंग करून तयार‌ केले, काही वेळाने दोघेजण आले, लाख रुपयांचा चेक रसिकाच्या हातात देत ऑर्डर घेऊन गेले. आपल्या कलेचं रूपांतर‌ चक्क व्यवसायात झालं यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
    डोळ्यात आनंदाश्रु होते, पण आनंद वाटून घेणारा नवरा मात्र यात रस घेत नाही याची खंतही होतीच.
    अशेच दिवस जात होते, रसिका तिच्या कलेत व्यस्त तर शशी व्यवसायात. रसिकाला आता चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता.
    एके दिवशी शशी नेहमीपेक्षा लवकर घरी आला, “रसिका, आज मी खूप खुश आहे..उद्या आपल्या नवीन ऑफिसचा उद्घाटन सोहळा आहे..किती‌ मेहनत घेतली मी आजच्या दिवसासाठी.. सकाळी मस्त तयार हो‌ बरं…मी गिफ्ट केलेली‌ गुलबक्षी रंगाची साडी नेस उद्या.. सकाळी लवकरच निघाव लागेल आपल्याला..” असं म्हणत तो खोलीत निघून गेला.
    शशी कसाही वागला तरी रसिका त्याला कधी दुखवत नसे, स्वभावच नव्हता तिचा तो..
    रात्री कितीतरी वेळ शशी त्याच्या यशाचे कौतुक रसिकाला सांगत होता, तिही चेहऱ्यावर हास्य आणून त्याला दाद देत होती.
    सकाळी दोघेही तयार झाले, गुलबक्षी रंगाच्या साडीत रसिकांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं, जसा शशी तिच्यासमोर आला तसाच म्हणाला, ” ब्युटिफुल… किती सुंदर दिसते आहेस तू..मला‌ आपली पहिली भेट आठवली आज तुला असं सजलेलं बघून..”
    आज चक्क स्वारी तारिफ करताहेत म्हंटल्यावर रसिकालाही छान वाटलं, लाजून नजरेनेच खूप काही बोलून गेले दोघेही..?
    “चला, उशीर होत आहे…” असं रसिका म्हणताच शशी भानावर आला, दोघेही निघाले.
    ऑफिसमध्ये पोहोचताच रसिकाला आश्चर्याचा धक्का बसला, “अय्या, हि सगळी पेंटिंग्ज जी काही दिवसांपूर्वी मी डिलीव्हर केली ती इथे… म्हणजे ती मोठी ऑर्डर ज्या ऑफिससाठी होती ते हेच ऑफिस..” रसिकाला क्षणभर काहीच कळत नव्हते.. शशीला यातलं काही माहिती नाही आणि सांगायलाही नको असं विचार करत असतानाच शशी रश्मी ला घेऊन आला रसिका सोबत ओळख करून द्यायला. रश्मी रसिकाला बघताच आश्चर्याने “मॅम, तुम्ही..म्हणजे सर रसिका मॅम तुमच्या मिसेस..”
    शशी गोंधळलेल्या अवस्थेत, “रश्मी, तू कशी ओळखतेस रसिकाला…म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच भेटत आहात…रसिका ही, रश्मी माझी असिस्टंट..हिनेच सगळं सजावट, आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..पण तुम्ही एकमेकींना कशा‌ ओळखता..”
    “सर, आपल्या ऑफिससाठी पेंटिंग्ज सिलेक्ट केल्या मी, त्या सगळ्या मॅम कडूनच घेतल्या आहेत.. अप्रतिम कलाकार आहेत मॅम..पण मला खरंच माहीत नव्हतं की या तुमच्या मिसेस आहेत..”
    हे ऐकताच शशीला आश्चर्याचा धक्का बसला.. म्हणजे रसिका तू इतकी मोठी कलाकार झालीस आणि मला कळाले सुद्धा नाही..मीच मुळात रस घेतला नाही..खरंच मला अभिमान वाटतो आहे तू माझी अर्धांगिनी असल्याचा..( रसिकाकडे अपराधी नजरेने बघत शशी मनोमन सगळं बोलत होता.)

    प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑफिसचे उद्घाटन झाले, सगळ्यांनी ऑफिस बघताना‌ सजावटीला लावलेल्या पेंटिंग्ज चे भरभरून कौतुक केले.. रसिकाच्या म्हणण्यावरून रश्मी आणि शशी ने तिथे उपस्थित कलाकाराविषयी कुणालाही काही सांगितले नाही..रसिकाला प्रसिध्दीची हाव‌ नव्हती..आपल्या कलेचं इतकं कौतुक होताना‌ बघूनच ती सुखावली होती.. पण सगळ्यांकडून बायकोने केलेल्या त्या अप्रतिम पेंटिंग्ज चे कौतुक बघता आज शशी अजूनच तिच्या प्रेमात पडला..त्याची चुक त्याला आपसुकच समजली…आपण रसिकाला गृहित धरून चाललो.. तिच्यातल्या कलेला प्रोत्साहन देण्याऐवजी अरसिक भावना दाखवली याच त्याला खूप वाईट वाटलं.

    परत येताना दोघे एकमेकांच्या नजरेत बघून खूप काही बोलत होते.. रेडिओ वर त्याच क्षणी गाणं सुरू झालं “तू जहा जहा चलेगा..मेरा साया.. साथ होगा…मेरा साया….मेरा‌ साया…”?

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ??
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    अश्विनी कपाळे गोळे

  • देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की सुलोचनाला भेटायला मानसी आश्रमात गेल्यावर सुलोचना मानसीला तिच्या आयुष्यात काय घडले ते सांगत असते.
    सुलोचना एका अतिशय गरीब घरातील मुलगी, आई वडील दुसर्‍यांच्या शेतात काम करून कुटुंब चालवत असतात. शेताजवळच एका छोट्याश्या झोपडीत आई वडील सुलोचना आणि दोन लहान भाऊ असे एकूण पाच जणांचं कुटुंब राहायचं. त्या गावात, आजुबाजूच्या परिसरात देवदासी प्रथा खूप वाईट प्रकारे पाळली जात असे.
    देवदासी प्रथा म्हणजेच चौदा पंधरा वर्षांच्या मुलींचे लग्न देवासोबत लाऊन देतात. चोरून पुजा-याच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. पूर्वी मुलगी सोडतानाचा विधी हा लग्नासारखा असतो. या विधीत नव-यामुलाऐवजी बाजूला तांब्या पूजतात.
    या लहान मुलीला नवंकोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागते.
    ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागतं. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. यामागे कारण असे की गावांतील त्यांच्या भाऊबंधांना कळावं, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये.

    देवदासी म्हणून सोडल्या जाणा-या मुली, बरेचदा मागासवर्गातील असतात आधीच मागासलेपण त्यात अंधश्रद्धा, गरिबी ही कारणं मुली व मुले सोडायला कारणीभूत होतात. डोक्यात जट आली की, देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत मग आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येतं. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवतात. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

    देवीला मुलं-मुली सोडण्याची अनेक कारणं असतात. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना डॉक्टर करणं परवडत नाही किंवा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असतो. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा, ही पूर्वापार चालत आलेली कल्पना अनेक सुशिक्षितांमध्येही आढळून येते. मग या अशिक्षित मागासवर्गीयांमध्ये तर विचारूच नका. अनेक मुली झाल्यावरही मुलगा व्हावा, ही इच्छा. त्यासाठी पहिल्या मुलीला देवाला सोडली जाते.

    अशाच प्रथेचा बळी ठरलेली मुलगी म्हणजे सुलोचना. सुलोचनाचे अशेच गावाबाहेर मंदिरात लग्न लावून दिले गेले आणि आता त्याच मंदिरात राहायचं असे‌ सांगून तिचे आई वडील परत गेले. तिथल्या पुजार्‍याने तिला एका शेजारच्या गावात पाटलांकडे सोडले. तिच्या सोबत काय होते आहे तिला कळायला मार्ग नव्हता. त्या पाटलांनी तिचे हवे तसे लैंगिक शोषण‌ केले, तिचा उपभोग घेतला, त्याच वाड्यात एका खोलीत बंद करून ठेवले. काही वर्षांनी जेव्हा अशीच अजून‌ एक देवदासी मुलगी त्या वाड्यात आली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला दूर कुठेतरी अनोळखी ठिकाणी नेऊन सोडले. तिथे तिला काही तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पण अशाच देवदासी महिला भेटल्या. त्यांनी तिला एक परडी दिली त्यात देवीचा फोटो होता. ती परडी हातात देत सांगितले की आता व देवीच्या नावाने जोगवा मागायचा आणि जे पदरी पडेल त्यावर जगायचं.
    तिची कहाणी ऐकून मानसीच्या डोळ्यात पाणी आले.
    अंधश्रद्धेच्या नावाखाली काय काय प्रकार चालतात याची तिला खूप कीव आली. आता मात्र सुलोचना आश्रमात आली तेव्हा पुढचं आयुष्यात ती अशा गोष्टींपासून दूर राहील याचे समाधान मानसीला वाटले.
    अशा देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या मुलींचे मंदिराच्या पुजार्‍यांकडून, बाकी लोकांकडून शारिरीक शोषण केले जाते. अशावेळी गर्भ धारणा झाली की जन्माला आलेल्या मुलीला देवदासी तर मुलाला तिथेच मंदीरात सेवेसाठी ठेवून देवाला अर्पण केले जाते.

    ही अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. यावर सरकारने कडक कारवाई करून बंदी घातली असूनही लपून छपून ही प्रथा मागासवर्गीय, दलितांमध्ये सुरू आहेच. अनेक समाज सुधारक हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग १

    उन्हाळ्याच्या कडक उन्हात डोक्यावर देविचा फोटो असलेली परडी घेऊन जाताना सुलोचनाला चक्कर आली आणि ती रस्त्यातच खाली कोसळली. आजूबाजूच्या लोकांनी तिला रस्त्याच्या बाजूला नेले, चेहऱ्यावर पाणी शिंपडले, जरा वेळाने ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूची गर्दी कमी झाली. त्याच गर्दीत असलेली मानसी मात्र तिची अवस्था बघून तिथेच थांबली, मानसीने सुलोचनाला पाणी प्यायला दिले, काही खाल्लं की नाही म्हणून चौकशी केली तर सकाळपासून पोटात काही नाही म्हणत सुलोचना डोळे मिटून बसून होती.
    मानसीने तिच्या जवळचा जेवणाचा डबा सुलोचनाला दिला आणि जेवण करायला लावले.
    मानसी ही एका शाळेत शिक्षिका होती सोबतच ती समाजकार्य करायची. शाळेत जाताना रस्त्यात सुलोचनाची अवस्था बघून ती तिच्या जवळ‌ थांबलेली होती.
    सुलोचना नाकी डोळी नीट, चेहऱ्यावरून कळत होते की वय काही जास्त नाही. सावळा वर्ण, कपाळावर मोठं गोल कुंकू, केस कित्येक वर्षांपासून न विंचरलेले दिसत होते, त्यामुळे केसांच्या गुंता होऊन जट झालेले, अंगावर एक हिरव्या रंगाची जुनी साडी, सोबत एक देवीचा फोटो असलेली परडी.
    सुलोचनाचं जेवण होत पर्यंत मानसी तिचं निरिक्षण करत होती, काय प्रकार आहे हे तिला लगेच कळाले. सुलोचना देवदासी प्रथेचा बळी असल्याचा अंदाज तिला आला. तिला योग्य ठिकाणी पोहचवायचे हे मानसीने ठरविले. सुलोचनाच्या अंगात त्राण नव्हता, जेवण करून साडीचा मळका पदर चेहऱ्यावर फिरवत परत सुलोचना डोळे मिटून भिंतीला टेकून बसली.  सुलोचनाला विचारल्यावर कळाले की तिचं जवळचं असं कुणी नाही. मानसी ने एक फोन केला आणि सविस्तर माहिती , पत्ता विचारत फोन बंद केला. . एक रिक्षा थांबवली आणि सुलोचनाला‌ सोबत घेऊन ती एका आश्रमात पोहोचली. तिथल्या एका डॉक्टरांच्या मदतीने सुलोचना ची तपासणी केली, तिला खूप अशक्तपणा आला होता. मानसीने प्रेमळ वागणूक दिली, जेवायला दिले‌ त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून सुलोचना त्या आश्रमात गेली. डॉक्टरांनी सुलोचनाला काही औषधे देऊन आराम करायला लावला. आश्रमात अनेक वयोगटातील स्त्रिया होत्या. त्यांच्या मदतीने सुलोचनाला एका बेडवर झोपवून दिले. तिला आरामाची खूप गरज होती. मानसीने शकुंतला बाईंना घडलेली घटना सांगितली त्यावर तिची काळजी आम्ही घेऊ, ती आता इथेच राहील, तुम्ही काळजी करू नका असं तिथल्या शकुंतला बाईंनी म्हंटल्यावर मानसी निश्चिंत झाली.
    शकुंतला बाई आणि त्यांच्या काही सहकारी देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी, पिडीत महिलांसाठी हा आश्रम चालवायच्या. त्यांची पुर्ण काळजी घेत एक लघुउद्योग तिथल्या महिलांच्या मदतीने चालवायच्या, त्यातून मिळणारे उत्पन्न आश्रयासाठी उपयोगी पडायचे. शकुंतला बाईंचे पती त्यांना मदत करायचे.
    मानसी शाळेसाठी आश्रमातून परत निघाली मात्र सुलोचनाचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. उद्या सकाळी आपण सुलोचनाला‌ भेटायला जायचे असं ठरवून ती शांत झाली. सुलोचना कोण आहे, तिच्या सोबत काय झाले अशा अनेक गोष्टी मानसीला‌ जाणून घ्यायच्या होत्या.
    दुसऱ्या दिवशी ठरविल्या प्रमाणे मानसी सुलोचनाला भेटायला आश्रमात पोहोचली. गेल्या गेल्याच सुलोचना काही महिलांसोबत एका झाडाखाली बसून आश्रमाचं निरीक्षण करत होती. मानसी दिसतात तिने हलकेच स्मित हास्य करत मानसीकडे बघितले. मानसीने तिच्या तब्येतीची चौकशी केली, आज सुलोचना ला जरा बरं वाटतं आहे ऐकून मानसीला समाधान वाटले. शिवाय आज सुलोचनाचे धुळीने माखलेले शरीर स्वच्छ दिसत होते, अंगावर दुसरी नीटनेटकी साडी दिसत होती.
    सुलोचना म्हणाली “ताय, तुम्ही कोण कुठच्या, माह्या देवीच्या रूपात धावत आल्या पा मदत कराया. काल माह्या जीवचं काय झालं असतं तुम्ही नसत्या तं.”
    मानसीने तिला धीर देत सांगितले तू आता इकडे तिकडे भटकायच नाही, इथेच राहायचं, हेच तुझं कुटुंब. सुलोचनाला ऐकून बरं वाटलं. होकारार्थी मान हलवून तिने ते मान्य केले.
    मानसीने तिची विचारपूस केली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाली “ताय, मले लहानपणीच माय बापानं देवाच्या पदरात सोडलं. चौदाव्या वर्षी गावा बाहेरच्या देवळात देवासंग लगिन लावून दिलं आणं मंग आता तिथंच राहाचं सांगून ते गेले, अजून नाही गवसले. देवदासी हाय म्या. नंतर त्या माणसानं माह्या आयष्याची राखरांगोळी केली ताय. यीट आल्यावर सोडलं मले वार्‍यावर. ” एवढं बोलून सुलोचना ढसाढसा रडू लागली. रडतचं घडलेली हकीकत सविस्तर सांगायला सुरुवात केली.

    देवदासी हा काय प्रकार आहे, सुलोचनाची सविस्तर कहाणी काय आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत stay tuned.

    कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

    पुढचा भाग लवकरच.

    आपल्या देशात अनेक कुप्रथा आहे, अशीच एक प्रथा म्हणजे  देवदासी प्रथा. देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे.  याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात.

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास

    सोहम, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. सोहम, आई वडील ,बहीण आणि एक भाऊ असं पाच जणांचं कुटुंब. वडील सरकारी नोकरीत कामाला. सोहम सगळ्यात मोठा मुलगा, देखणा, गोरापान, अभ्यासात हुशार पण वयानुसार मात्र त्याचा आवाज पुरुषांसारखा बदलला नाही. वयात आल्यावर सोहम मध्ये बदल होईल म्हणून सुरवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. शाळेत मात्र त्याला या गोष्टींमुळे सगळे चिडवायचे, त्याच्या आवाजाची नक्कल करायचे.
    बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला पण त्याच्या नाजूक, अगदी मुली सारख्या आवाजामुळे त्याला परत चीडवणे, आवाजाची नक्कल करणे या गोष्टी सुरू झाल्या. सोबतच्या मुलांमध्ये बरेच बदल झालेले त्याला जाणवत होते, त्यांच्या आवाजात बदल झाले होते मग आपल्या आवाजात का बदल होत नाही‌ म्हणून सोहम सतत आई जवळ रडायचा, कॉलेजमध्ये जायला टाळायचा. या प्रकारामुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सोहम मध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. सोहमची आर्थिक परिस्थिती साधारण त्यामुळे मुलांनी चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे वडीलांचे स्वप्न. सोहमच्या वडिलांचा स्वभाव रागीट, कडक होता त्यांच्यापुढे आईचे काही चालत नव्हते.
    सोहम आता बाहेर जायला टाळायचा, कुठल्या कार्यक्रमात जाणे, मित्रांमध्ये जाणे त्याने बंद केले, कॉलेजमध्येही कधी तरीच जायचा, त्यामुळे अभ्यासात तो मागे पडत होता. या प्रकारामुळे सोहमचे वडील त्याचावर खूप चिडायचे.
    पदवी परीक्षेत कसा बसा तो उत्तीर्ण झाला. पदवीधर झाला असला तरी नोकरीचं काय, वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा मुलगा अपयशी ठरला म्हणून वडिल सगळा राग सोहमवर काढायचे.
    या सगळ्या प्रकाराने आईचा जीव तीळ तीळ तुटत होता. बाहेर गेलो की कुणी आवाजावरून पुरुषत्व ठरवतील, चिडवतील म्हणून दिवसभर सोहम घरात असायचा. घरातही बहीण भावांशी वडीलांशी बोलणे टाळायचा. एकटाच एका खोलीत स्वत:च्या विचारात उदास पडून असायचा सोबतीला मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा.
    असंच रेडिओ ऐकताना आईच्या डोक्यात एक कल्पना आली, तिने आपल्या भावाला म्हणजेच सोहमच्या मामाला फोन केला. मामा शहरात नोकरीला होता. त्याला सोहमच्या परीस्थिती बद्दल माहिती होते. आई आणि मामाचे बोलणे झाल्यावर मामा लगेच येत्या शनिवारी सोहमला सोबत घेऊन जायला आला. जरा हवापालट होईल शिवाय शहरात तुला कुणी ओळखत नाही तेव्हा चिडवायचा प्रश्न नाही म्हणून सोहमची समजुत काढून त्याला सोबत घेऊन गेला. वडिलांना सोहम असल्याने नसल्याने काही फरक पडत नव्हता, आपली दोनचं मुलं आहेत असं मानून ते चालले होते. त्यामुळे त्यांनी सोहमला मामासोबत जाण्यासाठी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
    सोहम मामासोबत शहरात आला, कित्येक दिवसांनी तो बाहेर मोकळ्या हवेत वावरत होता, बाहेरच जग बघत होता. मामा त्याला अगदी मित्राप्रमाणे वागणूक देत त्याचा न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करत होता.  सोमवारी मामाने सुट्टी घेतली आणि सोहमला घेऊन एका कंपनीत गेला. ते होते रेडिओ रेकॉर्डींग आॉफिस. मामाचा एक मित्र तिथे काम करायचा. तिथलं वातावरण, काम करायची पद्धत सगळं सोहमला दाखवून दोघे घरी आले. मामाने सोहमची समजुत काढली आणि पटवून दिले की रेडिओ स्टेशन वर काम केले तर देवाने तुला दिलेल्या नाजूक, सुरेख आवाजाने तू सगळ्यांना जिंकू शकतो. जगाला कुठे कळणार की जो स्त्रीचा आवाज रेडिओ वर आपण ऐकतो आहे तो एका पुरूषाचा आहे.
    नोकरी मिळेल शिवाय तुझी ओळख ही सोहम नसून शिवानी म्हणून पुढे आणू. सोहमला ते पटले पण‌ हे खरंच इतके सोपे आहे का, पण प्रयत्न करायला हरकत नाही ना म्हणून मामाने सोहमची मानसिक तयारी केली. सोहमनेही त्यासाठी रेडिओ जॉकी होण्यासाठी लागणारी माहिती नेटवरून मिळवली आणि प्रॅक्टीस सुरू केली. लहानपणापासून घरात रेडिओ ऐकायची सवय असल्याने सोहमला ते इंटरेस्टिंग वाटले.
    मामाच्या मित्राच्या मदतीने बाॅसला पूर्ण परीस्थिती सांगितली आणि दोन दिवसांनी सोहमला इंटरव्ह्यू साठी बोलावले गेले.
    सोहमला “रेडिओ जॉकी” म्हणून नोकरी मिळाली. आई आणि मामा सोडून घरात कुणालाही हे माहीत नव्हते. आॅफिसमध्ये याविषयी गोपनीयता ठेवण्यासाठी बॉस कडून आदेश दिले गेलेले होते. लवकरच त्याने सगळ्यांना आपलसं केलं.
    सोहम मुळातच हुशार, त्याचा गमावलेला आत्मविश्वास मामा मुळे आणि नोकरी मुळे परत आला. नोकरीच्या ठिकाणी बाकी सहकारी सुरवातीला त्याला हसायचे पण त्याची हुशारी, त्याच्यातला आत्मविश्वास, त्याचा प्रेमळ स्वभाव बघून सगळ्यांना त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटला. लवकरच तो फेमस “रेडिओ जॉकी शिवानी” म्हणून प्रसिद्ध झाला. बेस्ट रेडिओ जॉकी म्हणूनही त्याला अवार्ड मिळाला.
    वडीलांनी सोहमचा विषय कधीच सोडला होता पण आई मात्र लपून छपून सोहम सोबत फोनवर बोलायची. त्याच्या रेडिओ वरच्या आवाजाचं कौतुक करायची.
    एकदा सामान आवरताना सोहमला एक डायरी दिसली त्यात घरात एकटा बसून असताना त्याने लिहिलेल्या बर्‍याच कविता, गाणे होते. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, एक गिटार विकत घेतली. मामाच्या मदतीने सुट्टीच्या दिवशी सोहमने लिहिलेल्या गाण्यांचे दोघे मिळून रेकॉर्डींग करायचे. सोहमने गायलेल्या गाण्यांचा एक ऑडिओ अल्बम बनवून इंटरनेट वर टाकला आणि अल्बम ला नाव दिले ‘सिक्रेट सुपरस्टार’. त्याच्या गाण्यात इतका दर्द, शब्दात अनेक भावना होत्या. इंटरनेट वर तो अल्बम वार्‍या सारखा पसरला. जो तो त्या गाण्यांचा फॅन झालेला.  हे सिक्रेट फक्त मामा भाच्यालाच माहित होते.  हा सिक्रेट सुपरस्टार कोण हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली होती.
    एकदा रेडिओ स्टेशनच्या आॅफिसमध्ये स्वतः चे गाणे गुणगुणत असताना एका सहकार्‍याने म्हणजेच साहीलने बघितले, त्यातलं एक शब्द न शब्द अगदी हुबेहूब सिक्रेट सुपरस्टार सारखा सोहम गातोय ऐकून सहकार्‍याला शंका आली. जेवायला बसल्यावर साहीलने सिक्रेट सुपरस्टार अल्बमचा विषय काढला, सगळ्यांनी खूप वाहवा केली.   साहिल सोहमच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता, ती चर्चा ऐकून सोहमला मनोमन किती आनंद झाला हे त्याने ओळखले.
    संधी बघताच सोहमला भेटून साहिल म्हणाला ” सोहम, तू जगासाठी सिक्रेट सुपरस्टार, रेडिओ ऐकणार्‍यांसाठी शिवानी आहे पण आमचा सगळ्यांचा सच्चा यार आहे. ”
    सोहमला ऐकून धक्का बसला, ह्याला कसं कळाल की सिक्रेट सुपरस्टार माझा अल्बम आहे. साहिलने सगळा किस्सा सोहमला सांगितला, जेवताना जेव्हा सगळे सिक्रेट सुपरस्टार विषयी बोलत होते तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान, जो आनंद होता त्यावरून माझी शंका खरी ठरल्याचे साहिलने सांगितले.
    साहिल म्हणाला ” सोहम, जगभरात सिक्रेट सुपरस्टार च्या गाण्यांचे चाहते आहेत, तेव्हा तू तुझी ओळख आता जगासमोर आणली तरी चाहत्यांचं प्रेम कमी होणार नाही शिवाय तुझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.”
    सोहमला मात्र भिती वाटत होती की खरी ओळख जगासमोर आली तर आता पर्यंत मिळालेली सिक्रेट सुपरस्टारची प्रसिध्दी , सगळ्यांच्या आवडत्या रेडिओ जॉकी शिवानी चे नाव खराब तर होणार नाही ना. लोकांना सत्य परिस्थिती समजली आणि कुणी ते चुकीचं ठरवून फसवणूक समजून स्विकारले नाही तर काय होईल. घराण्याचे नाव खराब होईल म्हणून आहे तेच ठिक आहे या विचाराने तो साहिलला उत्तर न देता निघून गेला.
    साहिलने खरं काय ते इतर सहकार्‍यांना सोबत बॉसला सांगितले, सिक्रेट सुपरस्टार दुसरी कुणी नसून आपली शिवानी म्हणजे आपला सोहम आहे हे ऐकून सगळ्यांना आनंद झाला शिवाय आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांना खूप अभिमान वाटला.
    बॉसने सगळ्यांना एकत्र बोलावले, त्यात सोहम होताच. सगळ्यांनी सोहमचे खूप कौतुक केले, बॉसने अनाउन्समेंट केली की आपण आपल्या चॅनल तर्फे सिक्रेट सुपरस्टारची म्युझिक कॉंसर्ट  करायची आहे आणि त्यातून सोहमची ओळख जगासमोर आणून त्याचा मान त्याला मिळवून द्यायचा. सोहमला ऐकून धक्का बसला पण बॉसने त्याला विश्वासात घेतले , कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत असेन असे आश्वासन दिले. रेडिओ चॅनल वरून सिक्रेट सुपरस्टार च्या म्युझिक कॉंसर्ट ची जाहिरात सुरू झाली. अवघ्या तीन दिवसांत सगळे तिकीट विक्री झाले.
    ठरल्याप्रमाणे सिक्रेट सुपरस्टार जगासमोर आला, फिमेल व्हाॅइस मधला ‘ सिक्रेट सुपरस्टार’  अल्बम एका पुरुषाचा आहे ऐकून सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला, पण सोबत सोहमची वाहवा झाली, न्यूनगंड दूर करून परिस्थिती वर मात देत मिळवलेली प्रसिध्दी बघून सोहम जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान म्हणून सोहम प्रसिद्ध झाला.

    त्याचा हा काटेरी प्रवास एका मुलाखतीत सांगताना आई, मामा आणि माझ्या सहकाऱ्यांमुळे मी सुपरस्टार झालो हे ऐकून आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू ओठांवर आले. वडिलांना सोहमचा खूप अभिमान वाटला, ते त्याला भेटायला गेले, माझ्या मुलाने माझी मान अभिमानानं उंचावली असं म्हणताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, त्यांनी कित्येक वर्षांनी सोहमला मिठीत घेतले. आपण किती वाईट वागणूक दिली सोहमला म्हणून पश्चात्तापाने ते सोहमला कवटाळून रडायला लागले.

    काही गोष्टी या माणसांमध्ये नैसर्गिक असतात त्या बदलता येत नसेल तरी परिस्थिती वर मात करून योग्य मार्ग नक्कीच काढता येतो. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला असेल तर नावासह शेअर करा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    ©अश्विनी कपाळे गोळे

  • तेच खरे हिरो….

    मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने मनवाच्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती म्हणाली “काकू आज क्लास उशीरा संपला पण आम्ही सोबतच बस स्टॉप वर आलो. माझी बस लवकर आल्यामुळे मी निघाले, मनवा बस साठी थांबली होती. येयीलच इतक्यात काळजी करू नका.”
    आईचं मन मात्र काळजीने व्याकूळ, मनवा ठिक तर असेल ना , फोन का बंद आहे, किती हा निश्काळजीपणा , उशीर होईल म्हणून कळवायचे तरी ना अशा विचाराने आई काळजीत पडली शिवाय जरा संतापलेली. तितक्यात एक रिक्षा घरापुढे थांबली, मनवा त्यातून उतरली बघून आईच्या जीवात जीव आला. पण हे काय सोबत हे कोण….
    मनवा सोबत रिक्षा मधून त्रृतीयपंथी म्हणजेच दोन हिजडे उतरले बघून आईचा पारा चढला, आई दारातूनच ओरडली ” मनवा,‌हा काय प्रकार आहे,  हे लोक इथे कशाला, तुला काही कळते की नाही. ह्यांच्या सोबत तू…शी… तुला काय हिच रिक्षा मिळाली का…”  आई चिडून नको ते बोलून गेली.
    मनवा आईला शांत करायचा प्रयत्न करत होती पण आई मात्र सगळ्या‌ प्रकाराने शिवाय मनवाला उशीर झाल्याने संतापलेली होती.
    ते पाहून सोबत आलेले दोघे तसेच कधी परत गेले मनवाला कळालेही नाही.
    आईचं बोलणं ऐकून मनवा रडायला लागली आणि चिडून म्हणाली “आई आता गप्प बस… त्यांच्या विषयी असं बोलण्याआधी मी काय म्हणते ऐक..ते हिजडे नाही..तेच खरे हिरो आहेत..ते नसते‌ तर आज माझ्या सोबत काय झाले असते कुणास ठाऊक.. कदाचित मी तुझ्या समोर अशी उभी नसते..”
    मनवा‌ आईच्या कुशीत शिरून हुंदके देत रडायला लागली.
    काही तरी गंभीर आहे आईला लक्षात आले.
    मनवाला शांत करून विचारले तेव्हा ती म्हणाली “आई, आज आमचा क्लास नेहमी पेक्षा उशीरा संपला आणि त्यामुळे माझी रोजची बस चुकली. दुसऱ्या बस‌ची वाट बघत मी बस स्टॉप वर थांबली, सोबतच्या मैत्रिणी त्यांच्या बस आल्यावर निघून गेल्या. बस स्टॉप वर बरेच लोक होते, त्यात काही टवाळक्या करणार्‍या पोरांचा ग्रुप होता. मी एकटी मुलगी दिसल्यावर ते काही तरी अश्लील बोलत माझ्या आजूबाजूला उभे होते. मी ज्या बाजूला जाईल तिकडे येऊन उभे. बरेच लोक तिथे असूनही कुणी त्यांना काही बोलत नव्हते, दुर्लक्ष करत आपापल्या फोन मध्ये, काही जण दुसरीकडे बघत उभे होते. मी खूप घाबरले तशातच तुला फोन करून कळवावे म्हणून फोन काढला तर एकाने येऊन धक्का दिला, माझा फोन खाली पडला, बंद झाला.. कसाबसा उचलून बॅगेत ठेवून बस कधी येते म्हणून मी रडकुंडीला येऊन बसची वाट पाहत होते. एकाने येऊन ओढणी ओढली आणि चूकून झालं असं दाखवत पुढे गेला..त्याच्या सोबतचे त्याला वाहवा करत हसू लागले.. माझ्या फिगरवरून काही तरी अश्लील बोलायला लागले..ते सगळे नजरेने बलात्कार करत होते आई…”
    बोलतानाच मनवा सगळा प्रकार आठवून रडू लागली..परत सांगायला लागली..
    ” तिथल्या गर्दीत सगळ्यांना कळत होते की मी घाबरली आहे.. रडकुंडीला आली आहे..पण कुणी दखल घेत नव्हते.. तितक्यात तिथून एक हिजड्यांचा ग्रूप जात होता, त्यात एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, ते सगळे जवळ आले, माझी विचारपूस केली..मी रडायला लागली..माझ्या सोबत होत असलेला प्रकार सांगितला.. एकाने जाऊन त्या ओढणी ओढणार्‍या मुलाच्या कानाखाली मारली. त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला.. घाबरून ते टवाळके तिथून पळत सुटले. आजूबाजूला असलेले लोक सगळा प्रकार बघत होते पण फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. ते मुलं पळून गेल्यावर काही लोक सांत्वन करण्यासाठी आले पण तेच लोकं आधी मात्र लक्ष नसल्यासारखे उभे होते. मी खूप घाबरले आई.. माझं रडणं थांबतच नव्हतं.. तेव्हा एकाने रिक्षा थांबवली, मला पत्ता विचारला आणि म्हणून त्यातले दोघे मला सुखरूप घरी पोहोचवायला घरा पर्यंत आले. तू मात्र त्यांना नको ते बोललीस. काही माहित नसताना त्यांचा अपमान केला..ते काही अपेक्षा न ठेवता परत गेले आई तुझं बोलणं ऐकून. त्यांचे मी साधे आभार सुद्धा मानले नाही..मी खूप घाबरले होते..ते माझ्या मदतीला आले नसते तर माझं काय झालं असतं काय माहित. आई माझी इज्जत त्यांच्यामुळे वाचली. ते हिजडे नाही तेच खरे हिरो आहेत..”
    मनवाच्या बोलण्याने आईला रडू आवरले नाही.. ऐकूनच आईच्या अंगावर काटा आला.. ज्यांना आपण हिजडे म्हणून अपमानीत केले त्यांच्यामुळे आपल्या मुलीची इज्जत वाचली. त्यांचे उपकार कशे फेडायचे.. आई मनवाला कुशीत घेऊन पश्चात्ताप करत रडू लागली..मनवा सुखरूप घरी पोहोचली म्हणून मनोमन त्यांचे आभार मानू लागली.

    कधी कधी आपल्याला परीस्थिती माहीत नसताना आपण कुणाला असं दुखावतो आणि नंतर पश्चात्ताप होतो.. जसं मनवाच्या आईच्या बाबतीत झालं..
    जे आहे ते नैसर्गिक आहे..ते लोक त्रृतीयपंथी असले तरी एक मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत.. तेव्हा त्यांच्यावर हसत त्यांची खिल्ली उडवणे, नको ते त्यांना बोलणे खरंच अयोग्य आहे…

    कथा कशी वाटली ते जरूर कळवा.. शिवाय तुमचं याबद्दल मत मांडायला विसरू नका…

    – अश्विनी कपाळे गोळे