Tag: Social issues

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू आणि तुझं प्रेम हवंय…

         मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.

         मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.

    कॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे,  दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”

    शुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.

      मोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात  रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.
    शुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.

        शुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”
    तिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”
    शुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.

    अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.
    शुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”
    मोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…

      एकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”

    तिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला.  लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो,  जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…

    असा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.
    त्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.

    अशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”

    ती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.

    दोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.

    मोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.

    काही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”

    त्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”

    ते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”

    आज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.

    या दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.

    एका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग

          सानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.

        सानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घालवायचा.
    सानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.

    कितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.
    सुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,
    पण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
    “काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही? तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”

    त्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”

    ते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे? नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”

    सुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान? मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”

    इतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.

    आता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..

    एव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.

    आता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,

    “जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”

    आता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.
    जाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.   

    ही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.
    त्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.

    सानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.

    माहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

    सानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”

    त्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”

    या सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.
    सानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.

    हळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.

           एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.

    अशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक कथा.

    या प्रकारात नक्की चूक कुणाची आहे? याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    समाप्त !!!

    कथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग दुसरा

        सानिकाला सासरी जाऊबाई जरा जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. सासूबाई, सासरे तर त्यांच्याच दिनचर्येत व्यस्त असायचे. सनिकाच्या मनात मात्र सुशांत विषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. लग्नाला दोन आठवडे होत आले तरी नवरा म्हणून त्याने तिला अजूनही जवळ घेतले नव्हते. सध्या खूप काम आहेत तेव्हा काही दिवस मी तुला शक्य तितका वेळ देऊ शकत नाही पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरा कामाचा व्याप कमी झाला की छान कुठे तरी फिरून येऊ म्हणत त्याने सानिकाची समजूत काढली. कामाचं निमीत्त सांगून उशीरा घरी येणे, शक्य तितके सानिकाला टाळणे असे प्रकार सुरू होते.  सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुशांत घरी नसायचा‌. घरी कुणाला काही म्हंटलं की म्हणायचे काम असतील त्याला , जरा काही दिवस गेले की देईल तो तुला वेळ. सानिकाला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने याविषयी जाऊबाईला सुद्धा बोलून दाखवलं.

    त्यावर त्या म्हणाल्या, “खरं सांगू का सानिका, सुशांत आधीपासूनच घरात फारसा नसतो, त्याचे मित्र आणि तो असंच होतं त्याचं लग्नापूर्वी सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर तरी घरात थांबेल पण आताही असंच दिसतंय. तू एक काम कर, त्याला सांग सुट्टी असली की एक दिवस तरी तुला वेळ द्यावा म्हणून. तुम्ही बोला एकमेकांशी याविषयी स्पष्टपणे.”

    ते ऐकताच सानिकाला अजूनच विचित्र वाटले.

    जेव्हा जाऊबाईंना कळाले की सानिका आणि सुशांत यांच्यात लग्नानंतर अजून एकदाही जवळीक आली नाही तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. त्यांनी सानिकाला याविषयी पुढाकार घे असंही सांगितलं.
    जाऊबाई चे बोलणे ऐकून सानिकाला सुशांत विषयी अनेक शंका मनात आल्या. लग्न म्हंटलं की एकमेकांविषयी आपसुकच ओढ निर्माण होते, एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो, तसंच सानिका चेही झाले पण सुशांत मात्र सानिकापासून लांबच होता. त्याने आपल्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशा अनेक भावना तिच्या मनात उफाळून येत होत्या.
    आता आपणच पुढाकार घेऊन सुशांतच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा निश्चय तिने केला. कदाचित तो खरच कामात गुंतलेला असेल त्यामुळे वेळ देत नसेल अशी स्वतः ची समजुत सुद्धा तिने काढली.

    मनात काही तरी प्लॅनिंग करून तिने आज रात्री कितीही उशीर झाला तरीही सुशांत आल्याशिवाय झोपायचे नाही असे ठरवले. खोली छान आवरली, नवी कोरी बेडशीट बेडवर अंथरली. रात्री आठच्या सुमारास सुशांतला फोन केला आणि जेवणाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, “मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. मी बाहेरच खाऊन घेईल. ”

    सानिका आणि जाऊबाईंनी जेवणाची तयारी केली, सगळ्यांनी एकत्र जेवण केले पण सानिका मात्र सुशांतला मिस करत होती. मोठे दिर जाऊ कसं छान एकत्र जेवतात, सासू सासरे सुद्धा दोन्ही वेळा एकमेकांशिवाय जेवण करत नाहीत पण आपण मात्र अजून एकदाही असं एकत्र बसून ना जेवण केलयं ना जरा गप्पा मारल्या अशा विचाराने तिला एकही घास घशाखाली उतरत नव्हता. कशीबशी ती जरा जेवली आणि स्वयंपाक घरात आवरून आपल्या खोलीत निघून गेली.

    जाऊबाईंनी तिला सांगितले होतेच की, आज तू त्याच्या जवळ स्वतः हून जा, प्रेमाने त्याच्याशी बोल, त्याच्यावर तुझं किती प्रेम आहे हे त्याला जाणवू दे म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी तुला जरा तरी वेळ देईल शिवाय त्याचं असं घराबाहेर राहणं जरा कमी होईल. तू प्रयत्न कर तरी काही शंका वाटलीच तर सुशांतच्या दादाला सांगते मी त्याच्याशी बोलायला.

    सुशांत रात्री बाराच्या सुमारास घरी आला. सानिका त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघत होती. तो आलेला दिसताच तिने स्वतः ला आरशात बघून कपाळावरची टिकली उगाच नीट केली आणि स्वतःशीच लाजून तिने खोलीचा लाइट बंद केला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर मंद मेणबत्त्या लावल्या. सुशांत खोलीत आला तसंच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले. त्याने एक कटाक्ष सानिकाकडे टाकला, ती लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती मोकळ्या केसात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला असं छान सजलेलं बघून सुशांत आनंदी होईल अशी गोड अपेक्षा तिला होती पण तिची अशी सगळी तयारी बघून त्याचा चेहरा उतरला. तो‌ काही एक न बोलता बाथरुम मध्ये निघून गेला.

    त्याची अशी प्रतिक्रिया बघून सानिकाचा मूड खराब झालेला पण तरीही जरा शांत राहून ती त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. तो जरा फ्रेश होऊन बाहेर आला तशीच ती त्याला टॉवेल द्यायला जवळ गेली, त्याने तिच्याकडे न बघताच तिच्या जवळचा टॉवेल घेऊन चेहरा पुसला. आज तिला त्याच्या वरच्या प्रेमाची जाणिव त्याला करून द्यायची होती. ती अलगद त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळण्याच्या आत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
    “सुशांत, किती उशीर केला यायला. खूप वाट बघत होते मी तुमची..बायको घरी आहे तेव्हा जरा लवकर येत जा ना.. प्लीज… दिवसांतला काही वेळ माझ्या साठी तर काढायला हवाच ना तुम्ही..माझा‌ हक्क आहे तितका…”

    असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवायला मान वर केली तसंच त्याने तिला दूर केले आणि म्हणाला, “सानिका, अगं कळतंय मला पण सध्या कामाचा व्याप आहे खूप… नाही होत लवकर यायला…तू वाट नको बघत जाऊ असं…”

    तिला त्याच्या अशा वागण्याचा जरा राग आलाच पण त्याला आपण समजून घ्यायलाच हवे असे ती स्वतःला समजून सांगत होती. ती त्याला उत्तर देत म्हणाली, ” सुशांत मलाही तुमची परिस्थिती कळते आहे पण असं किती दिवस दूर राहायचे आपण.. लग्नाआधी सुद्धा आपल्याला नीट बोलायला, समजून घ्यायला वेळ मिळाला नाही..आताही तेच होतेय.. मी खूप मिस करते तुम्हाला दिवसभर…”

    सुशांत मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत थकल्याचे कारण सांगून झोपी गेला. सानिका त्या रात्री खूप खूप रडली, तिच्या भावनांचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. आपण इतकं सगळं बोलून दाखवले तरी सुशांतला कांहीच कसं वाटत नसेल आपल्याविषयी हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. रात्रभर कड बदलत ती बेडवर पडून होती.

    सकाळी उठून तिने सुशांतला चहा करून दिला. त्याने मुकाट्याने चहा घेतला आणि तो घराबाहेर पडला. सानिकाचा चेहरा पाहून जाऊबाई काय ते समजून गेल्या. सासू सासरे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्यावर दोघीच घरात असताना सानिकाने रात्री घडलेला सगळा प्रसंग रडतच जाऊबाईंना सांगितला. जाऊबाई ते ऐकताच जरा गोंधळलेल्या अवस्थेत सानिकाला म्हणाल्या, “सानिका, तू शांत हो..मी आहे तुझ्या सोबत पण खरं सांगू का, मलाही आता सुशांत वर शंका यायला लागली..मी ह्यांना सांगते त्याच्याशी बोलायला… काय होते ते बघूया.. नाही तर खरं काय ते शोधून काढू आपण..तू काळजी करू नकोस..”

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम  भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग पहिला

           सानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली. हसतमुख चेहरा असलेल्या सानिकाचे डोळे रडून सुजलेले होते, चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आई बाबांच्या काळजात धडकी भरली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत. नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. आई बाबांनी तिला आधी शांत केले, बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला. सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की काय झालंय ते ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं.

       सानिका अजूनही रडतच होती, बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सानू, आधी तू चहा घे, नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला.

    कसंबसं रडू आवरून ती चहा प्यायली. आई बाबा पुढे काही बोलण्याआधी ती म्हणाली, “आई बाबा, आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी… खूप मोठी फसवणूक..” इतकं बोलून ती परत रडायला लागली.

    तिचं हे वाक्य ऐकताच आई बाबांना अजूनच काळजी वाटली.

    बाबांनी तिला विचारले, “सानू, असं का‌ म्हणते आहेस.. नक्की काय झालंय ते नीट सांग बघू…तू‌ काय बोलते आहेस काही एक‌ कळत नाहीये आम्हाला..”

    सानिका रडत रडत सगळं सांगायला‌ लागली. ती जे काही सांगत होती ते ऐकून आई बाबांना मोठा धक्का बसला.

    सानिका आणि सुशांत यांचे काही महीन्यांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झाले. दोघांचेही अरेंज मॅरेज. 

    सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत, उंच सडपातळ बांधा, स्वभावाने जरा लाजाळू, अबोल, सहनशील. भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी. मोठा भाऊ नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहायचा.
    सानिकाचा पदवी‌ अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांत चे स्थळ आले.

    सुशांत सरकारी नोकरीत कामाला, दिसायला राजबिंडा, घारे डोळे, उंच पुरा, पिळदार शरीरयष्टी. सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले. दोघांचे लग्न ठरल्यावर महीनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना‌ बोलायला भेटायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला. वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबाविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.

    लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आई बाबांना घर अगदी खायला उठू लागले. इकडे सानिका सुद्धा नविन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्न म्हंटलं की प्रेम, उत्साह, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले.
    लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांत ची वाट बघत राहीली पण तो आलाच नाही. शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला, सानिका लाजतच त्याला म्हणाली ,”रात्री बराच वेळ वाट बघितली मी तुमची..”

    त्यावर तो इतकंच बोलला, “सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलचं नाही…..त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती, जरा वेळ जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला..मुळात येऊच दिले नाही मला..असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला..तू ही दमली असणार ना लग्नाच्या धावपळीत….”

    सुशांत अगदी सहज असं बोलून गेला. पहिल्या रात्री पेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालंय की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार, असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्याचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटत असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही.

    फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली. मोठे दिर जाऊ, सासू सासरे सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला. सुशांत सुद्धा जरा फ्रेश होऊन त्यांच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला. जाऊबाईंनी हळूच सानिकाला विचारले, “काय मग, कशी होती पहिली रात्र.. काही त्रास तर होत नाहीये ना..काही वाटलं तर मला बिनधास्त सांग…मोठ्या बहिणी प्रमाणे आहे मी तुला..”

    जाऊबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं. तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली.

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

    नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघणारच होती तितक्यात मोहन म्हणजेच तिचा पती तिची वाट अडवून म्हणाला, “माहेरी जायला निघाली आहेस खरी पण रिकाम्या हाताने परत येणार असशील तर मुळीच घरी येऊ नकोस. भावांकडून घराचा हिस्सा घेतल्याशिवाय परत आलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही. ”

    नलिनीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मोहनचे बोलणे ऐकून त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ती गपगुमान माहेरी जायला निघाली. वाटेत तिचे अश्रू अनावर झाले आणि ती भूतकाळात हरवली.

    नलिनी सुखवस्तू कुटुंबात लाडाकौतुकात वाढलेली. आई वडील दोघेही नोकरी करायचे. तीन भावंडे, त्यात ही सगळ्यात लहान. दोन्ही भावांची आणि आई वडिलांची लाडकी लेक. नलिनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिच्या आईचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आईच्या अशाप्रकारे अचानक झालेल्या निधनामुळे अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, नलिनी चे वडील पूर्णपणे खचून गेलेले. मुलांचे शिक्षण पूर्ण होतंच आलेले होते.
    “आता लवकरच तिन्ही मुलांचा थाटलेला आनंदी संसार बघितला की आपले आयुष्य मार्गी लागले म्हणून समजा. ” असं मोठ्या उत्साहाने म्हणणारी आई बाबांना सोडून गेल्यावर हा संसार एकट्याने कसा सांभाळावा हाच प्रश्न बाबांना पडलेला.
    त्यातून स्वतः ला कसंबसं सावरून बाबांनी मुलांना धीर देत आईची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात नलिनीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले. मुलेही आता शिक्षण पूर्ण करून काही तरी कामधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. बाबांनी दोन्ही मुलांना लहानसहान व्यवसायात गुंतवले. आता नलिनी साठी साजेसा मुलगा मिळाला की तिचं लग्न लावून द्यायच म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होणार असाच काहीसा विचार केलेला नलिनीच्या बाबांनी. बाबा आणि दोन्ही भावांनी नलिनी साठी वर संशोधन सुरू केले. आई गेल्यापासून नलिनीला फार एकटेपणा जाणवायचा. भाऊ आणि बाबा वेळेनुसार आपापल्या आयुष्यात गुंतलेले पण नलिनी मात्र आईच्या आठवणीने दररोज रडायची. बाबांना तिची अवस्था कळत होती. तिची शक्य ती काळजी घेत, भरभरून प्रेम देत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करत होते पण म्हणतात ना आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असंच काहीसं झालेलं.

    आता नलिनीला तिच्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा मिळावा , तिने संसारात रमून आनंदी राहावं हीच बाबांची इच्छा होती. पण झालं मात्र काही तरी वेगळंच.

    नलिनी साठी बरेच स्थळ बघितल्यावर मोहनचे स्थळ आले. वरवर बघता एकंदरीत छान वाटलेले आणि मोहन सोबत नलिनी चे लग्न झाले. लग्नानंतर नव्यानवलाईचे नऊ दिवस संपले तसेच मोहनने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. मोहन व्यवसाय करायचा तेव्हा नफा तोटा आलाच पण कधी फार काही नुकसान झालेच तर त्याची फार चिडचिड व्हायची मग सगळा राग तो नलिनी वर काढायचा. दारूच्या नशेत तिच्यावर हातही उचलायचा. आईच्या मायेला पोरक्या झालेल्या नलिनीच्या नशिबात सासरीही सुख नव्हतेच. वडीलांना सांगितले तर त्यांना काळजी वाटेल म्हणून तिने वडीलांना याबाबत सुरवातीला काही सांगितले नाही. पण दिवसेंदिवस मोहन तिला फार त्रास द्यायला लागला. तुझ्या माहेरचे माझा मानपान करत नाहीत, दिवाळसणाला काही दागिना नाही केला म्हणून तिला सतत टोमणे मारायचा. मोहन सारख्या लोभी व्यक्तीला सासर कडून मोठमोठ्या अपेक्षा असायच्या पण आई नसताना बाबा कसं घर सांभाळत आहेत हे नलिनी बघत आलेली त्यामुळे ती माहेरी कुणालाही मोहन विषयी काही सांगत नव्हती. अशातच तिला दिवस गेले आणि लवकरच ती एका मुलाची आई झाली. गरोदरपणात सुद्धा मोहन‌ असाच वागला. माहेरी आई नसताना तिचे बाळंतपण कोण करणार याचा जराही विचार न करता त्याने तिला माहेरी नेऊन ठेवले. बाबांनी कामवाल्या मावशीच्या मदतीने तिची नीट काळजी घेतली. भाऊ सुद्धा सोबतीला होतेच. या दरम्यान नलिनीच्या माहेरी येऊन मोहन उगाच काहीतरी तमाशा करायला लागला. तेव्हा तिच्या दोन्ही भावांनी त्याला चांगलाच दम दिला पण नलिनी मध्ये पडून तिने मोहनला परत जायला सांगितले. बाळंतपणानंतर सासरी गेल्यावर तिची एकटिची चांगलीच तारांबळ उडत होती. सासुबाई वयस्कर त्यामुळे त्यांची काही मदत होणे शक्य नव्हते. बाळ, घर आणि मोहनचा असा चिडखोर स्वभाव , त्याचा छळ सहन करणे असंच तिचं आयुष्य झालेलं.

    माहेरी आता बाबांनी दोन्ही भावांची लग्न उरकले. दोघेही भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झालेले. बाबा असताना‌ ती हक्काने माहेरी जाऊन राहायची. चार दिवस का होईना पण सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात यायचे. काही वर्षांतच आजारपणाने बाबा देवाघरी गेले आणि तिचं माहेर संपल्या सारखे झाले. दोन्ही भाऊ वहीनी संसारात गुंतल्याने तिच्याकडे कुणी फारसे लक्ष देत नव्हते. भावाकडे पाहुणी म्हणून आली तरी दोन‌ दिवसांपेक्षा जास्त तिला आता राहावं वाटत नव्हतं. सासरचे, नवर्‍याचे प्रश्न भावाजवळ मांडले की वहिनीला आवडत नव्हते. त्या म्हणायच्या आपला संसार आपण बघावा, आम्हाला मध्ये घेऊ नये. भावाचे मन दुखत असले तरी वहिनी पुढे दोघेही काही बोलेना.
    एकदा तर मोहनने तिला दारू पिऊन मारहाण केली आणि घराबाहेर काढले. रडत रडत ती माहेरी आली . मोठ्या भावाला झाला प्रकार सांगितला तर तो म्हणाला, “नलू, आता हे नेहमीचं झालंय. एक तर तू त्याला सोडून दे नाही तर तुझं तू बघून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसाच हा मोहन काही केल्या सुधारत नाही. आम्हाला सांगून काय फायदा, तुझ्या नशिबात हेच असेल. सहनशक्ती नसेल तर आत्महत्या कर पण सारखं तेच रडगाणे गाऊ नको. ”

    भावाचे हे असे बोलणे ऐकल्यावर ती मनोमन खुप दुःखी झाली. एके काळी याच घरात लाडात , मोठ्या तोर्‍यात वावरणारी मी. आज मला माझ्याच या घरांत हा दादा आत्महत्येचा सल्ला देतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. अश्रू ढसाढसा वाहत होते पण तोंडातून शब्द निघत नव्हता. आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी ती मोहन‌कडे परतली.
    सख्खा भाऊ असा बोलतोय मग इतर नातलगांना सांगून काय फायदा म्हणत ती आहे त्या परिस्थितीला सामोरे जात होती.

    परत तेच मोहनचे टोमणे, मारझोड सहन‌ करत तिचा संसार सुरू होता. मुलगा भराभर मोठा होत होता. त्याच्यासाठी का होईना आपण जगायला हवं म्हणून ती सगळं सहन करत होती.
    आपली जरा आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने लहान मुलांना शिकवणी, खाणावळ चालवणे यांसारखे उद्योग करण्याचा प्रयत्न केला पण मोहनने त्यावर पाणी फेरले. कुणाचा जराही पाठींबा नसताना स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे तिचे प्रयत्न असफल झाले.
    भाऊ वहीणीचे इतके सगळे बरेवाईट अनुभव आले तरी बहीणीची माया म्हणून ती दर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला माहेरी जायची. वरवर का होईना पण एक दिवस तरी भाऊ बहिणीच्या नात्यात तिला गोडवा जाणवायचा. परिस्थिती वाईट आहे, आपले भाऊ वाईट नाही असाच विचार ती करायची. माहेरी आली की बालपणीच्या आठवणीत क्षणभर रमून जायची आणि आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमन करून भरल्या डोळ्यांनी सासरी परत जायची.

    अशातच नलिनीचा मुलगा बारा वर्षांचा झालेला. आता मोहन‌चा व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नव्हता. त्याने नलिनीच्या मागे एक वेगळाच तगादा लावला. तो‌ तिला म्हणायचा की तुझ्या माहेरी आता आई वडिल तर नाहीत तेव्हा आहे ती मालमत्तेच्या वाटण्या करून तू तुझा हिस्सा माग.
    तिन्ही भावंडांचे लग्न, शिक्षण , वडिलांचे आजारपण यात होते नव्हते ते पैसे गेले याची तिला जाणीव होती. होते फक्त त्यांचे राहते घर. त्यातही भावांचे मन दुखावून काहीही हिस्सा वगैरे नको होता पण मोहन मात्र हात धुवून तिच्या मागे लागलेला. मोहनला नाही म्हंटले की तो तिला मारझोड करत शिवीगाळ करायचा. या अशा वातावरणात मुलाला ठेवले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करून मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिने मुलाला होस्टेलमध्ये ठेवले होते.
    दिवाळी झाल्यावर मुलगा होस्टेलमध्ये परत गेला आणि नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघाली.

    ती मालमत्तेच्या वाटण्या, हिस्सा मागणे याविषयी भावांना काही एक बोलणार नव्हती. दोन दिवस आनंदात माहेरी राहून परत यायचे, मोहन‌ला काय करायचं ते करू दे पण मला हे दोन दिवस मिळणारं माहेरपण जपायला हवे. उगाच पैशावरून भाऊ बहिणीच्या नात्यात फूट नको असेच तिने मनोमन ठरवले होते.

    रिक्षावाला म्हणाला, “ताई, इथेच उतरायचं ना तुम्हाला. ”
    त्याच्या बोलण्याने ती विचारांमधून बाहेर आली, रिक्षातून उतरून घरात जाताना परत एकदा त्याच बालपणीच्या आठवणीत क्षणभर हरवली.

    समाप्त!

    अशी ही नलिनीच्या आयुष्याची व्यथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
    खरंच आई वडील असेपर्यंत हक्काने वावरता येणारे माहेर त्यांच्या नसल्याने पोरके झाले की मनाची काय अवस्था होत असेल याचा अनुभव नलिनी प्रमाणे अनेक भगिनींना येतो.
    अशा बर्‍याच मुली आपल्या आजूबाजूला आहेत ज्या मोहन सारख्या नवर्‍याचा छळ सहन करत संसाराचा गाडा चालवताना दिसतात. पैशासाठी, हुंड्यासाठी बराच त्रास सहन करतात.
    छळ सहन करायला नको म्हणून अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी धडपड करताना कधी कधी मार्ग सापडत नाही. अशा वेळी आहे त्या परिस्थितीला शरण जातात.
    यासाठी आई‌ वडिलांनी मुलींना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे, अन्याय सहन‌ न करता परिस्थितीशी लढायला शिकविणे खूप गरजेचे आहे.

    याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

       लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.

        दोघेही मलेशियाला पोहोचले, स्पेशल हनीमून पॅकेज घेतले असल्याने दोघे हॉटेल मध्ये त्यांच्या खोलीत पोहोचले तसंच त्यांना एक गोड सरप्राइज मिळाले. खोली गुलाबांच्या फुलांनी, पाकळ्यांनी छान सजविली होती. सगळीकडे मंद सुवास दरवळत होता. लाईटच्या मंद प्रकाशात अतिशय रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ते बघताच मोनिका आपसूकच पुटपुटली,  
    “व्वा..किती रोमॅंटिक वाटतंय ना सगळं..”

        मयंकच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नव्हता. तिच्या बोलण्याला काही एक उत्तर न देता तो बॅग ठेवून आंघोळीला निघून गेला. तो बाहेर आला तसंच मोनिकाने त्याला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो दचकून तिला दूर करत म्हणाला, “चला भूक लागली आहे, पटकन फ्रेश हो आपण खाली जरा काही खाऊन येऊ आणि फेरफटका मारून येऊ.

         त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मोनिकाला फार वाईट वाटले, अशा प्रकारे दूर का लोटले असावे मयंक ने. त्याला मी असं जवळ आलेलं आवडलं नसेल का, की मी फार उतावीळ झाले असं काही वाटत असेल. पण मिठी मारण्यात काही वावगं तर नाही शिवाय आता आम्ही नवरा बायको आहोत मग असा का वागतोय मयंक लग्नापासून. जराही प्रेमाने बोलला नाही की जवळही घेतले नाही. अजून त्याला वेळ हवा असेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत मोनिका आंघोळ करताना करत होती. फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघेही खाली गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही खाली फेरफटका मारत होते. खोलीवर परतले तेव्हा मयंक म्हणाला , आज प्रवासामुळे थकवा वाटतोय, उद्या सकाळीच फिरायला निघायचं आहे. लवकर झोपा. इतकं बोलून तो अंगावर चादर ओढून झोपी गेला. मोनिकाला मात्र त्याच हे वागणं अजूनच खटकलं.
         

         त्याने प्रेमाने छान रोमॅंटिक काही तरी बोलावं, हळूहळू या नात्याला बहरायला एक पाऊल पुढे घ्यावं इतकीच तर अपेक्षा होती तिची पण मयंक ने तिचा हिरमोड केला. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या साथीदाराकडून प्रेमाची अपेक्षा ही असतेच पण मयंक मात्र फारच वेगळा वागत होता. विचार करत तिचे डोळे पाणावले.

     
       पुढे आठवडाभर एकाच खोलीत दोघेच असूनही तो तिला जराही जवळ घेत नव्हता. दिवसा बाहेर फिरायचे आणि हॉटेल मध्ये येऊन आराम करायचा असाच काय तो त्यांचा हनीमून साजरा झाला. मोनिका त्याच्या कुशीत शिरण्याचा, त्याला मिठी मारण्याचा अलगद प्रयत्न करत होती पण तो मात्र तिला दूर करत तिला टाळायचा प्रयत्न करत होता. आता दोघांच्या नात्यात या नाजुक विषयावर बोलायचं म्हणजे मुलीसाठी कठीणच तेव्हा नक्की काय करावे तिला काही सुचेना.

       दोघेही हनीमून वरून परत आले. मयंक ची सुट्टी संपली होती आणि तो नोकरीला रूजू झाला. मोनिका सुद्धा वडीलांच्या व्यवसायात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्यायला सुरु झाली. ती सतत काही तरी विचारात दिसते आहे हे तिच्या आई वडिलांनी ओळखले, “मोना , सगळं ठीक आहे ना..कशाच्या विचारात आहेस..” असही आईने तिला विचारले.
    नवरा बायको यांच्या मिलनाच्या विषयावर आई सोबत तरी कसं बोलावं तिला कळेना‌ त्यामुळे “काही नाही..मी ठिक आहे..” इतकंच ती बोलली.
         
        मोनिकाला आता मयंक विषयी जरा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. मयंक रोज उशीरा घरी यायचा, सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचा. मोनिका दिवसभर प्रवास , काम यामुळे थकून त्याची वाट बघत झोपी जायची. त्याला तर तेच हवे होते. शक्य त्या प्रकारे तिला टाळण्याचा प्रयत्न तो करत होता. आता आपणच पुढाकार घ्यावा असं मनोमन ठरवून मोनिका तो येत पर्यंत झोपली नाही. उगाच झोपण्याचे नाटक  करत ती बेडवर पडून होती.

    रात्री १२:३० च्या सुमारास तो घरी आला. बराच वेळ बाथरूम मधे फ्रेश होत होता. बाहेर आला तर मोनिका मस्त तयार होऊन छान आकर्षक नाइट ड्रेस घालून त्याच्या समोर उभी राहिली. तिला बघताच त्याला धक्काच बसला. आपल्याला असं छान तयार झालेलं बघून मयंक आपल्याकडे आकर्षित होईल असे तिला वाटलेले पण तशी काहीही भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तिचा सुडौल बांधा, सेक्सी नाइट ड्रेस कडे दुर्लक्ष करत तो म्हणाला , “झोपली नाही अजून..”
    आता तिला त्याचा फार राग आलेला. लग्नाला तीन आठवडे होत आले होते पण मयंक तिला जराही स्पर्श करत नव्हता, जराही प्रेमाने छान काही बोलत नव्हता.

      ती आपला राग आवरत त्याला जाऊन बिलगली तसंच त्याने तिला जोरात दूर लोटले. “मोनिका, काय करतेय, खूप उशीर झाला आहे झोप आता” असं चिडक्या सुरात बोलून तो झोपला. ती रात्रभर रडत होती, विचार करत होती.
      आता त्याच्या विषयी अजूनच शंका तिला आल्या. मनात काही तरी ठरवून तिने पुढच्या काही दिवसांत त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या विषयी चौकशी सुरू केली. मयंकच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी तर नाही ना हाच संशय आता पर्यंत तिला होता. त्याच्या मित्रांकडून याविषयी असंच कळालं की आमच्या माहिती नुसार तरी त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी नव्हती, ना आहे. त्याच्या कंपनीत तर त्याच्या विषयी सगळ्यांनी त्याच्या कामाबाबत फारच कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. हुशार, मनमिळाऊ, वेळेत काम पूर्ण करणारा सगळ्यांचा लाडका मयंक असंच तिला कळालं.

        मग मयंक असं का वागतोय तिला काही कळत नव्हते. तिने एका मैत्रिणीला याविषयी सांगितले तेव्हा याविषयी स्पष्ट बोलून दोघांनी हा प्रश्न सोडवलेला बरा असं तिने सांगितलं.
       मयंकच्या जवळ जाण्यासाठी मोनिका अनेकदा पुढाकार घेत होती पण तो तिला टाळत ,दूर करत होता आणि तिच्या पदरात प्रेम नाही तर निराशाच येते होती.
       लग्नाला जवळपास दोन महिने झालेले होते. सगळ्यांसमोर आपल्याशी अगदी छान वागणारा हा मयंक काही तरी नक्कीच लपवितो आहे याची मोनिकाला खात्री पटली होती. आज मयंक सोबत स्पष्ट बोलून हा मनातला गोंधळ कमी करावा असं तिने ठरवलं.

        रविवार असल्याने दोघेही घरी होते. मयंक नाश्ता करून टिव्ही बघत बसला‌ होता. मोनिका हळूच त्याच्या पाठीमागून आली आणि तिने परत एकदा पुढाकार घेत त्याला मिठी मारत त्याच्या गालावर चुंबन केले. तिच्या या कृतीमुळे तो ताडकन उठून उभा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो चिडून म्हणाला, “मोनिका कितीदा सांगितलं तुला मला नाही आवडत तुझं असं वागणं…का करतेस तू असं…”

    मोनिका त्यावर उत्तरली “का रे…काय प्रोब्लेम आहे..आपण नवरा बायको आहोत ना..मग इतका अधिकार तर नक्कीच आहे मला..तुला आवडत नाही का मी..का टाळतोय मला सतत.. कुणी दुसरी असेल तुझ्या आयुष्यात तर तसं तरी सांग..का वागतोय असा तू..बोल मयंक बोल..”

    तो चिडून म्हणाला, “दुसरं कुणी आयुष्यात असण्याचा काही प्रश्नच नाही….मला नाही आवडत तू अशी मला चिपकलेली…मला‌ या सगळ्यात काही एक रस नाहीये… लैंगिक संबंध ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला..मी शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही ह्या सगळ्यासाठी…झालं आता समाधान…हेच ऐकायचं होतं ना‌ तुला..कळालं आता…आता परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस..”

    हातातलं रिमोट जमिनीवर आपटत तो तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, शरीर त्याच्या शब्दांनी थरथरू लागले. स्वतः ला सावरत ती सोफ्यावर बसून रडत होती. मयंक ने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपविली, आपली फसवणूक केली या गोष्टीचा तिला विश्र्वासच होत नव्हता.

        किती तरी वेळ विचार करत , रडत ती तिथेच बसून राहीली. मयंक ने तिचा मोठा विश्वासघात केला होता याचा जाब विचारण्यासाठी ती त्याच्या समोर गेली. त्याला विचारले, ” मयंक लग्नापूर्वी का नाही सांगितलं हे सगळं…का केला इतका मोठा विश्वासघात..किती प्रेम करते मी तुझ्यावर माहीत होतं ना तुला..अरे मला लग्नानंतर सुद्धा एकदा कधी तू विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर काही तरी उपचार केले असते.. काही तरी मार्ग काढला असता..पण तू फक्त माझ्या भावनांशी खेळला..मला‌ अंधारात ठेवले..प्रेमाचे दोन शब्द कधी बोलला नाही तू.. फसवणूक केली मयंक तू माझी..याची शिक्षा तुला मिळणारच..”

      त्यावर तो म्हणाला, “कर आता माझी बदनामी करत..सांग सगळ्यांना मी खरा पुरुष नाही.. लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही..नाहीये मी सक्षम.. माहीत आहे मला…लग्न का केलं म्हणतेस ना…लग्न न करण्याचे हे कारण नव्हतो सांगू शकत मी कुणाला..सगळ्यांचा सतत तगादा..काय सांगू त्यांना मी.. म्हणून केलं लग्न…”

    “अरे‌ पण तुझी अवस्था तुला माहीत होती ना… इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे…माझं आयुष्य उध्वस्त केलं मयंक तू…कळतंय का तुला… विश्वासाने. सांगितलं जरी असतं ना तर सहनही केलं असतं मी..मार्ग काढला असता यातून आपण..पण आता नाही… विश्वासघात केला तू…नाही राहू शकत मी तुझ्यासोबत..”

    इतकं बोलून कशीबशी पर्स उचलून मोनिका आई वडीलांकडे निघून आली. मोनिका अशी रडत रडत अचानक असं घरी आल्याने आई बाबा गोंधळले. तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसाच त्यांनाही मोठा धक्का बसला. या सगळ्याचा मोनिकाच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झाला. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे तिची तब्येत चांगलीच खालावली.

    सत्य कळताच मोनिकाच्या आई वडीलांनी मयंकचया घरच्यांना‌ फोन केला तर त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले मयंकला जाब विचारला तर त्याने सगळं खरं असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली होती. मोनिकाला भेटायला आले असता तिची माफी मागत ते इतकंच म्हणाले, ” मोना, आम्हाला हे सगळं माहीत असतं तर त्याच लग्न केलच नसतं गं..पण आम्हाला याविषयी खरंच काही कल्पना नव्हती. आमच्या मुलामुळे तुझ्यावर ही वेळ आली याचा आम्हालाही खूप त्रास होतोय..आम्ही सुद्धा कधीच स्वतः ला माफ करू शकणार नाही….”

    सतत तोच विषय, इतका मोठा मानसिक धक्का यामुळे मोनिका ची तब्येत जरा जास्त बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दिवसात मयंक एकदाही तिला भेटला नाही, फोन नाही.

    मोनिका तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असे त्याचे वडील त्याला ओरडून बोलले तेव्हा तिला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये आला‌ पण मोनिकाच्या आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले.
      काही दिवसांनी मोनिका बरी झाली. मयंकला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला. लग्न, प्रेम या सगळयां वरून आता तिचा विश्वास उडाला होता.

        एक सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आयुष्याच्या जोडीदाराला ओळखण्यात चुकली होती. लग्नापूर्वी कधीच तिला भेटायला पुढाकार मयंक का घेत नव्हता, लग्नापूर्वी कधीच रोमॅंटिक का बोलत नव्हता यांचं उत्तर तिला आता मिळालं होतं. आपण त्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, त्याच्या शांत स्वभावाचा दोष समजून त्याच्या वागण्या कडे, त्याला आपल्यात रस आहे की नाही हे जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केले याची मनापासून तिला खंत वाटली. 

        मयंक मध्ये शारीरिक दोष असताना त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून मोनिका ची फसवणूक केली. तिची काहीही चूक नसताना तिच्या भावना, तिच्या आयुष्याशी तो खेळला. असंच हल्ली समाजात बरेच ठिकाणी होताना दिसते आहे.

    अशाच एका सत्य घटनेवर आधारित मी ही कथा लिहिली आहे.

      मुलांमध्ये शारिरीक दोष असतील, ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतुल तर याविषयी त्यांच्या आई वडिलांना तरी कसे कळणार ना. पण मुळात अशा वेळी स्वतः ची परिस्थिती माहीत असताना एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळणे म्हणजे गुन्हाच म्हणावा‌ लागेल. लग्नानंतरही हे सत्य इतरांना कळणारच ना त्यापेक्षा असा प्रोब्लेम असल्यास आधीच विचार करून निर्णय घेतला तर अशी बिकट परिस्थिती येणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

        मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे..”

    ते ऐकताच मयंक काहीही न बोलता तिथून निघून गेला.

    आई मोनिकाच्या केसांवरून हात फिरवत पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात बुडाली.

        मोनिका अतिशय हुशार, आत्मविश्वासाने वडिलांचा मुंबई सारख्या शहरातील व्यवसाय अगदी सहजपणे सांभाळून शिक्षण पूर्ण करणारी. व्यवसायातील महत्वाच्या कामांमध्ये वडीलांना तिचा मोठा आधार वाटायचा. आई वडिलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, वयाच्या मानाने तिला व्यवसायातील उत्तम ज्ञान होते. अगदी महत्वाचा निर्णय ती मोठ्या चतुराईने घेत असे. अशा या मोनिकाच्या लग्नाचा विचार आता आई वडिलांच्या मनात सुरू झाला.

        मोनिका शी याविषयी बोलल्यावर तिने एकच अट घातली ती म्हणजे, ” मुलगा हा मुंबईत नोकरी करणारा असावा, म्हणजे वडीलांना व्यवसायात मदत करता येईल शिवाय आई वडीलांकडे लक्ष सुद्धा देता येईल..”

         मोनिकाच्या आई वडीलांना ही हे पटलं होतं. लहानपणापासून ती वडिलांसोबत त्यांच्या कामात शक्य तसा हातभार लावायची त्यामुळे तिच्या शिवाय एकट्याने या भल्या मोठ्या व्यवसायाची धुरा सांभाळणे त्यांनाही अवघडच होते.

           आता तिच्या अटी लक्षात घेऊन वर संशोधन सुरू झाले. जे स्थळ यायचे त्यांना आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली मोनिका सहजच पसंत पडायची. अशातच मयंकचे स्थळ आले. तो मूळचा मुंबईचा नसला तरी कॉलेज, नोकरी सगळं मुंबईत झालेले शिवाय दोघेही एकाच वयाचे. मयंक दिसायला देखणा, चांगल्या पदावर नोकरीला, शांत स्वभावाचा  त्यामुळे पहिल्या भेटीतच तिला तो बर्‍यापैकी आवडला. मग पुढे अजून जरा भेटून बोलून निर्णय घ्यावा असं तिने मनोमन ठरवलं. त्यालाही पहिल्या भेटीतच ती आवडली. तिच्या अटीनुसार तो सुयोग्य वाटल्याने तिने पुढाकार घेत पुढे गाठी भेटी घडवून आणल्या.

       त्याच्याशी बोलून तिला तो अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा वाटला. आता गोष्टी पुढे न्यायला हरकत नाही असंही तिला जाणवलं पण त्याचा हा शांत, जरा अबोल स्वभाव तिच्या अगदीच विरूद्ध त्यामुळे तिला जरा वेगळे वाटले पण प्रत्येकाचा स्वभाव असतो शिवाय नातं अजून नविन आहे तेव्हा वेळेनुसार तो मोकळा बोलेल असा विचार करून तिने लग्नाला होकार दिला.
       त्याच्याकडून तर सुरवातीपासूनच होकार मिळाला होता त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. दोघांचं लग्न ठरलं. तिला अगदी मनाप्रमाणे मुलगा मिळाल्याने ती अगदीच आनंदात होती. आता एकाच शहरात आहे म्हंटल्यावर वारंवार भेटी गाठी होणार म्हणून ती अजूनच सुखावली. लग्न ठरल्यानंतर एकमेकांना ओळखण्याची एक ओढ, उत्सुकता, आकर्षक अशा अनेक भावनांनी तिच्या मनात गर्दी केली. अशीच अवस्था त्याचीही असेल असेच तिला वाटलेले. तिच्या बिनधास्त, बोलक्या स्वभावामुळे तिनेच पुढाकार घेत त्याला फोन, मेसेज वरून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या पुढाकाराला तोही अगदी छान प्रतिसाद द्यायचा तेव्हा त्याच्याविषयी कुठली शंका मनात येणे शक्यच नव्हतं.
      लग्नाला अजून दोन महिन्यांचा अवधी होता तेव्हा मधल्या काळात दोघांच्या भेटी, संवाद हा सुरू होताच. पण या दरम्यान प्रत्येक वेळी भेटण्यासाठी तिच पुढाकार घ्यायची, तिला ही गोष्ट जरा खटकली पण त्याच्या शांत स्वभावामुळे कदाचित तो स्वतःहून भेटण्यासाठी काही बोलत नसावा किंवा आपणच पुढाकार घेतोय तेव्हा त्याला संधी मिळत नसावी असंही तिला वाटलं. भेटल्यावर त्याची अगदी छान वागणूक असल्याने तिने मनात कधी फार शंका निर्माण होऊ दिली नाही. भेटल्यावर त्याच्या वागण्या बोलण्यातून काही वेगळे तिला कधी जाणवलं नाही. दोन महिन्यांत लग्नाची खरेदी, सगळी तयारी ह्यात भराभर वेळ निघून गेली. मुंबईत मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. सगळेच अगदी उत्साहात, लग्न सोहळ्यात कशाचीच कमी नव्हती.
       लग्नात पाठवणी झाल्यावर मुंबईतल्या त्याच्या फ्लॅटवर दोघेही गेले. सोबतीला पाहुणे मंडळी होतीच. मनाप्रमाणे सगळं झाल्याने मोनिका खूप आनंदी होती. मयंकच्या फ्लॅट वर दुसऱ्या दिवशी लग्नानंतर सत्यनारायण पुजा करण्यात आली आणि पहिल्या रात्रीची तयारीही.
       लग्न म्हंटलं की दोघांच्याही मनात प्रेमाचा एक वेगळाच बंध निर्माण होऊन मीलनाची ओढ लागलेली असते. नैसर्गिक भावनाच आहे ती पण या ओढी सोबतच मनात भिती, हुरहूर सुद्धा असते. मोनिका चेही तेच झाले. आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आज लाजून, घाबरून सजविलेल्या खोलीत बसून मयंकची वाट बघत होती. नाईलाजाने तो खोलीत आला तसंच तिची धडधड वाढली, मयंक प्रेमळ नजरेने आपल्याला बघून अलगद मिठीत घेईल , छान काही तरी रोमॅंटिक बोलेल असेच काहीसे तिला वाटलेले पण घडले काही तरी भलतेच. त्याने खोलीत येताच तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला , “छान दिसते आहेस…आजचा दिवस खुप खास आहे ना पण मोनिका मला जरा वेळ हवा आहे.. खूप दगदग झाली ना मागच्या काही दिवसात..तू सुद्धा दमली असशील ना ..आराम कर..‌मलाही खूप झोप येत आहे… मागच्या काही दिवसात झोपच झाली नाही..”

       त्याचं असं बोलणं तिला खटकलं पण कदाचित मयंक ला वेळ हवा आहे, तो आता या सगळ्याला मानसिकरीत्या तयार नाही, शारिरीक थकवा जाणवत असेल त्याला असा बराच विचार करून तिने अंगावरचे दागिने काढले, साडी बदलून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. मनात एक प्रकारची हुरहूर तिला जाणवत होती पण पुढच्या दोन दिवसांनी दोघेही हनीमून साठी मलेशिया ला जाणार होते. तिथे दोघांना छान एकांत मिळेल अशा सुखद भावनेने ती आजच्या रात्रीचा फारसा विचार न करता झोपी गेली.
      व्यवसायातील महत्वाचे, अवघड निर्णय अगदी सहजपणे, मोठ्या आत्मविश्वासाने घेत असली तरी मनात मयंक विषयी प्रेम, एक नाजुक भावना तिच्या मनात होती. आता तिच्या मनाला आतुरता लागली होती ती म्हणजे हनीमून ला जाण्याची. या सगळ्यात त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र तिला ओळखता आले नाही.

       मोनिका आणि मयंक यांच्या नात्यात पुढे नक्की काय होते, मयंक काही लपवत तर नाहीये ना. जशी मोनिकाला मयंकची ओढ वाटते आहे तशीच त्याला मोनिकाची ओढ जाणवत असेल का?
    मोनिका हॉस्पिटलमध्ये कशी? तिची आई जे म्हणाली फसवणूक, विश्वासघात हे सगळं नक्की काय आहे ?
    असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असणार ना. कथेत पुढे काय होते याची उत्सुकता सुद्धा लागली असणार,
    तर ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. दोघांच्या नात्याविषयी जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

      
     
      

  • पूरग्रस्ताचे मनोगत…

    नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.

       खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे किराणा दुकान, त्यावरच सगळा संसाराचा गाडा चालतो. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे हे एव्हाना कळाले होतेच पण ही नदी आमची देवता धोक्याची पातळी ओलांडून असं रौद्र रूप धारण करून आमचे अख्खे संसार एका क्षणात स्वतःच्या पोटात सामावून घेईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पाहता पाहता आजुबाजूच्या गावात पाणी शिरायला सुरवात झाली, काहींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आम्ही सगळी परिस्थिती टिव्हीवर बघून घाबरलो होतो. नंतर लाइट नसल्याने काय चाललंय काही कळत नव्हतं. आमच्यावर कुठल्याही क्षणी ही परिस्थिती ओढाविणार हे माहित होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती. कधीही आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल म्हणून आम्ही सतर्क होतोच पण आतापर्यंत पै पै साठवून उभ्या केलेल्या ह्या घराचं काय? मोठ्या उत्साहाने घरात एक एक वस्तू घेतली, संसार सजविला पण आता जीवाची पर्वा करत घराचा विचार न करता सगळं सोडून कुठल्याही क्षणी जावं लागणार होतं. ही वेळ यायला फार काही उशीर लागला नाही. अचानक आमच्या गावातही पाणी शिरले, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची धडपड सुरू झाली, बरेच बचाव कार्य करणाऱ्या तुकडीची पथके सुरक्षा जॅकेट, बोट घेऊन गावात पोहोचले. आमचं किराणा दुकान आधीच पाण्याखाली गेले होते. इतका सगळा किराणा माल आता कवडीमोल झाला होता, ज्यावर संसार अवलंबून तेच क्षणात वाहून गेले. आम्ही आहे त्या अवस्थेत सुरक्षा पथकाच्या मदतीने एका शाळेत पोहोचलो. घर असं नजरेपुढे पाण्याखाली जाताना बघून अंतर्बाह्य रडू फुटले होते पण त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाचा जीव जास्त महत्वाचा होता. घरी परत कधी येणार याची शाश्वती नव्हती शिवाय परत आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल याचा विचारही करवत नव्हता.
    गेल्या दोन दिवसांपासून लाइट नव्हती त्यामुळे फोन बंद, कुणाशीही काही संपर्क नाही. नातलग सगळे काळजीत पडले होते. शाळेत आसरा घेतलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तीस वर्षांनंतर अशी परिस्थिती आमच्या गावावर आली होती तिही जास्त भयाण स्वरूपात. काही ठिकाणांहून खाण्यापिण्याचे पॅकेट, ब्लॅंकेट, कपडे अशी मदत मिळत होती. घरात सगळं असूनही आज आमचा संसार उघड्यावर आला होता. यापेक्षा मोठे दुःख काय असणार ना….आपला जीव वाचला याच समाधान मानावं की आल्या परिस्थितीवर रडावं अजूनही काही कळत नाहीये.  हा महापूर, पंचगंगेचे रौद्र रूप कधी शांत होणार माहीत नाही. सतत देवाचा धावा करत आम्ही सगळे परिस्थिती शांत व्हावी म्हणून प्रार्थना करत आहोत. एक एक क्षण आता जड जात आहे. हा सगळा अनुभव खूप भयंकर आहे, होतं नव्हतं सगळं क्षणात नष्ट झालं. परिस्थिती शांत झाल्यावर नव्याने सुरुवात करणेही आता खूप जास्त अवघड आहे.
    या सगळ्यात दोष तरी कुणाला द्यावा.
    या पुरामुळे कितीतरी मुक्या प्राण्यांना, पक्षांना जीव गमवावा लागला. गुरे ढोरे हंबरडा फोडत काही तरी सांगू पाहत आहेत, सगळीकडे नुसताच हाहाकार पसरलाय.

    आता फक्त देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतोय की पावसाला, नदीच्या प्रवाहाला शांत करत आमचं आयुष्य आम्हाला परत दे. आम्हाला आमच्या घरी जाऊ दे. ही परिस्थिती पूर्ववत कधी होणार माहीत नाही पण जे काही आम्ही अनुभवतोय ते खरंच खूप भयानक आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप असं उघड्या डोळ्यांनी पाहणे, अनुभवणे फार अवघड आहे.

    खरंच किती भयानक आहे ना सगळं. आयुष्यभर राबून उभा केलेला संसार क्षणात पाण्याखाली जाताना बघून काय वाटत असेल या सगळ्यांना .
    आपला अख्खा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा शिकार बनला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिकच भयानक आहे. अनेक बचाव पथक, नागरिक या परिस्थितीत मदतीला तत्पर आहेत. शक्य ती मदत करत प्रत्येक जण एकमेकांना आधार देत आहे. जे प्रत्यक्षात या परिस्थितीत अडकले त्यांच्या मनाचा विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतंय.

    अशा परिस्थितीत आपण प्रत्येकाने शक्य ती मदत केली तर खारीचा वाटा उचलल्या सारखे होईल.

    हा लेख लिहिण्यामागे हेतू म्हणजेच आपल्या आजूबाजूला ओढावलेल्या या संकटाची तीव्रतेची जाणिव प्रत्येकाला होत आपल्याकडून शक्य ती मदत आपण करावी.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • सासर ते सासरच असतं…

           सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

       सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.
    तापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.
    आता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा,  छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”

    आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”
    ते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “स्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”

    सीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.

    सायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला‌ आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”

    या क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही. 

    सीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.
    अमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.

    दुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.
    अमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.
    तो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”

    आज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच‌. शेवटी सासर आहे हे.. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..

    सीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता
    कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.

    दुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.
    आता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.

    सासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. ?

    तर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. ?

    पटतंय ना….

    मग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आईची दुहेरी भूमिका…

    रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची. 
    जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
    भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
    लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
    ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
    दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
    हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
    दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी. 

    खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

    मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”

    मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.

    मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता

    घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”

    रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी,  बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना‌ शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”

    मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”

    रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”

    मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
    मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”

    मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.

    रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
    मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
    लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
    अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
    सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
    रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
    एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
    एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
    तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
    महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
    महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
    तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
    मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
    दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
    आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
    मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.

    मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.

    फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
    त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.

    अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

    तिला काही सांगायचंय..
    हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
    लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
    आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
    एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
    घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
    असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
    खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
    संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
    ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
    कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
    राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
    आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
    आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
    तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
    मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
    खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
    प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

    प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
    कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
    कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

    आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

    अश्विनी कपाळे गोळे

  • रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

    रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.
    कोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.
    शरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहायचे. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.
    पुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”
    वयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.
    अचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.
    रखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.
    उसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.
    अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.
    सतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.
    दोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.
    मुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.

    अशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.

    हे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.
    आई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.
    कष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.
    कुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

    मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

    ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
    ( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
    रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
    रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
    राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
    रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
    दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
    त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
    एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
    राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
    दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
    “राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
    “रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
    “राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
    “रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
    “राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
    दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
    रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
    हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
    “राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
    राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
    “राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
    इतकं बोलून रश्मी निघून गेली.
    तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
    तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
    रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
    रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
    कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
    इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

    आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
    राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

    सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
    सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

    त्यावर तो निशब्द झाला.
    आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

    वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

    राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
    रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

    आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

    राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

    समाप्त..!!

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही.
    अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

    https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

    © अश्विनी कपाळे गोळे