Category: Relations

  • अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा

    “समिधा…..समिधा……समिधा, अगं लक्ष कुठे आहे तुझं..मी काय विचारतेय? चहा घ्यायला जायचं ना? कोणत्या विश्वात रमली आज ऑफिसला आल्या आल्या..चल पटकन..”
    समिधा ची मैत्रिण प्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून आवाज देत म्हणाली.

    प्रियाच्या आवाजाने भानावर येत दचकून समिधा म्हणाली, “अ..हो..हो..जाऊया ना..चल… अगं नकळत विचारांमध्ये अशी गुंतले की कळालच नाही तू कधी आलीस ते..”

    दोघीही चहा घ्यायला कॅन्टीन मध्ये निघाल्या. समिधा आज जरा अस्वस्थ आहे बघून प्रिया तिला म्हणाली, “समिधा, कशाचा विचार करते आहेस..सगळं ठीक आहे ना..काय झालंय..”

    समिधा- “प्रिया, अगं अनिकेत ने बहुतेक आपलं ऑफिस जॉइन केलंय..आज मी पार्कींग मध्ये लिफ्टची वाट बघत उभी होते तेव्हा तिथे मला तो दिसला. आम्ही दोघंही असं अचानक एकमेकांसमोर आल्याने ना फारच वेगळं वाटलं… तो दिसल्या पासून ना मन अगदी अस्वस्थ झालंय..तुला माहित आहे ना मला भूतकाळातून बाहेर पडताना किती त्रास झाला.. कसं बसं सावरलं मी स्वतःला आणि आज हा असा परत माझ्यासमोर आल्यावर परत नको असताना‌ही माझं मन भूतकाळात भरकटत आहे ..”

    प्रिया – “काय? त्याला माहीत होते का तू आता इथे नोकरी करते ते.. म्हणजे मुद्दाम तर इथे आला नाही ना तो..”

    समिधा – “मला तरी असं वाटत नाही..कारण आमचा डिव्होर्स झाला त्यानंतर आम्ही जराही संपर्कात नाही इतकंच काय तर आमचे कॉमन मित्र मंडळ जे होते त्यांच्याशी सुद्धा माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि मी हे ऑफिस जॉइन केले हे घरच्यांना सोडून कुणालाही माहीत नव्हते..मुळात ते मला कुणालाच कळू द्यायचे नव्हते.. आणि अनिकेत तरी आता मुद्दाम कशाला माझ्या मागावर येणार ना..आमचे मार्ग वर्षभरापूर्वीच वेगळे झालेत..”

    प्रिया – “समिधा, अगं मग झालं ना..सोड त्याचा विचार..त्यालाही कदाचित माहिती नसेल तू इथे अशी अचानक दिसशील ते..केवळ योगायोग म्हणून सोडून दे..नको लक्ष देऊ..अनोळखी समजून दुर्लक्ष कर..”

    समिधा काहीही न बोलता चहाचा घोट घेत होती आणि परत समोरच्या काउंटरवर तो उभा दिसला…अजूनही तो तसाच हॅंडसम, अगदी नीटनेटके  रहाणीमान..समिधा क्षणभर त्याला बघतच राहिली आणि पटकन भानावर येत स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागली, “मी का त्याला बघते आहे..तो आता फक्त एक अनोळखी व्यक्ती आहे माझ्यासाठी..पण आता हा नेहमीच असा मला दिसत राहणार आणि मग मी अशीच…नाही नाही..समिधा मूव्ह ऑन..”

    प्रिया काही तरी सांगत होती, बोलत होती पण समिधाचे तिच्याकडे जराही लक्ष नव्हते. समिधा डेस्क वर आली , इमेल चेक करून आजच्या कामाचे प्लॅनिंग केले पण आज कामात तिचं लक्षच लागत नव्हतं. नकळत ती भूतकाळात जाऊन पोहोचली.

    समिधा आणि अनिकेत कॉलेजला असल्यापासून एकमेकांवर अगदी जिवापाड प्रेम करायचे. समिधा सुखवस्तू कुटुंबात वाढलेली एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, उंच कमनीय बांधा, गव्हाळ वर्ण, नीटनेटके आणि जरा मॉडर्न रहाणीमान असलेली समिधा बघता क्षणी कुणाच्याही नजरेत बसेल अशीच. अनिकेत साधारण परिस्थितीत लहानाचा मोठा झाला, दिसायला अगदीच हॅंडसम हिरो, उंचपुरा त्यात पिळदार शरीरयष्टी त्यामुळे कॉलेजमध्ये अनेक मुलींचा क्रश होता तो. समिधाला तो खूप आवडायचा आणि त्यालाही समिधा पहिल्यांदा बघताक्षणीच आवडलेली. त्यानेच पुढाकार घेऊन मग मैत्रीचा हात पुढे केला आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही. समिधाचा क्रश असणार्‍या अनिकेत ने तिला प्रपोज केले तो क्षण तर तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. तिला त्याच्या एकंदरीत परिस्थिती विषयी कल्पना होती, त्याच्या सहवासात अगदी झोपडीत सुद्धा रहायला तयार होती ती. त्याचेही तिच्यावर तितकेच प्रेम होते, समिधाला अगदी जिवापाड जपायचे असाच त्याचा गोड प्रयत्न असायचा नेहमी. कॉलेज नंतर दोघांनाही नोकरी मिळाली आणि आता लग्नासाठी घरी बोलायचे त्यांनी ठरविले. समिधाच्या आई बाबांना अनिकेत विषयी काहीच प्रोब्लेम नव्हता शिवाय समिधाच्या निवडीवर त्यांचा विश्वास सुद्धा होता. अनिकेत च्या घरी मात्र श्रीमंत घरातील मुलगी समिधा, आपल्या घरात रुळणार की नाही, रितीरिवाज, मानपान समजून घेत घरच्यांना बरोबर घेऊन संसार चालवेल की नाही याची काळजी होती, त्यांनी अनिकेत ला बोलूनही दाखवले पण दोघेही आपापल्या मतांवर ठाम आहे बघून ते या लग्नाला तयार झाले.

    घरच्यांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले. दोघेही खूप आनंदात होते, त्यांचं प्रेम आता नात्यात बदललं होतं. अगदी लव्ह बर्ड सारखे हे गोड जोडपे होते. अनिकेत तिला अगदी राणी सारखं ठेवायच्या प्रयत्नात असायचा पण आता प्रेमा सोबतच जबाबदारी वाढली होतीच, संसाराला सुरुवात झाली होती.
    दोघांचेही कुटुंब राहायला एकाच शहरात त्यामुळे समिधाला लग्नानंतर सुरवातीला फार काही वेगळे वाटले नाही पण हळूहळू नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळताना तिची फार चिडचिड व्हायला लागली. घरकामाला बाई असली तरी लहानसहान कामे पडायचीच पण समिधाला त्याची फारशी सवय नसल्याने तिला फार काही लोड झेपायचा नाही, सासूबाई मदतीला असायच्या पण आता जबाबदारी वाढलेली होतीच. पाहुण्यांचे येणे जाणे, सणवार असं सगळं रूटीन सुरू झालं. त्यात अनिकेतच्या घरातील सगळ्यांना समजून घेत त्यानुसार जरा जुळवून घेत संसार करताना अनिकेत आणि ती एकमेकांना फारसा वेळ देऊ शकत नव्हते. आता तर विकेंडला मूव्ही बघणे, शॉपिंग करणे , फिरणे सगळंच फार कमी झालेलं. अनिकेत दिवसभर त्याच्या कामात गुंतलेला असायचा, आता फक्त रात्रीच काय तो वेळ दोघांना एकत्र घालवायला मिळायचा. समिधा अचानक बदललेल्या या परिस्थितीला, जबाबदारीला जाम कंटाळली होती. अनिकेत नी तिला जरा समजून घेत आठवड्यात एक दिवस तरी पूर्णपणे तिच्यासाठी द्यावा असं तिला वाटे, ती त्याच्यावर चिडायची, रडायची, तुझं आता माझ्यावर प्रेमच राहीलं नाही म्हणत अनिकेत कडे पाठ फिरवून रडत रडत झोपी जायची. सुरवातीला तो तिची समजूत काढून तिला शांत करायचा पण समिधा ची वाढती चिडचिड बघून तोही रागाच्या भरात उलट काहीतरी बोलून जायचा. लग्नाला सहा महिने सुद्धा झाले नसतील तर दोघांचे भांडणं सुरू झाले मग कितीतरी वेळा समिधा रागारागाने आई बाबांकडे निघून जायची‌. अनिकेत बरेचदा तिला समजवायला जायचा, तिला परत घरी घेऊन यायचा पण काही दिवसांनी परत तेच घडत होतं..

    अनिकेत च्या आई-बाबांना वाटलं, आपल्यामुळे दोघांना त्यांची स्पेस मिळत नसावी म्हणून ते सुद्धा गावी राहायला गेले पण त्यांच्या गावी जाण्याने प्रश्न सुटला नाही. समिधा मुळे आई बाबांना गावी जाऊन राहावं लागतंय ही गोष्ट अनिकेतला खटकत होती. दोघेही एकत्र असले तरी मनाने मात्र दुरावत चालले होते, संवाद संपत चालला होता.
    दिवसेंदिवस अनिकेत आणि समिधा मध्ये मतभेद इतके वाढत गेले की एक दिवस समिधाची चिडचिड बघून अनिकेत बोलून गेला, “समिधा, मला ना तुझं काही कळतच नाहीये..तुझ्यामुळे आई बाबा गावी राहायला गेले…तरी तुझं समाधान झालं नाही..तुला नक्की काय हवंय हे तरी सांग..मला आता तुझ्या चिडचिडेपणाचा, भांडणाचा जाम कंटाळा आलाय..मला प्लीज शांत राहू दे..”

    अनिकेतचे बोलणे समिधाच्या मनाला खोलवर वार करून गेले. ती परत एकदा रागाच्या भरात आई बाबांकडे निघून गेली ती कायमचीच..नंतर अनिकेत सुद्धा पूर्वी प्रमाणे तिची समजूत काढायला आला नाही. समिधाने महीनाभर वाट बघितली आणि वेगळं व्हायचा निर्णय घेतला. अनिकेत ने त्यावर जराही आक्षेप घेतला नाही, तो अगदी सहजपणे डिव्होर्स साठी तयार झाला ही गोष्ट समिधाच्या मनाला खूप लागली. दोघांचा अहंकार, गैरसमज यापुढे घरच्यांचे ही काहीच चालले नाही. शेवटी दोघे कायद्याने वेगळे झाले.

    या सगळ्याचा मानसिक त्रास दोघांनाही झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी समिधाने नोकरी बदलली, नविन लोकांच्या सानिध्यात राहून वेळेनुसार सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं पण आज अनिकेत अचानक समोर आला आणि ती परत नकळत भूतकाळात शिरली.

    जुन्या आठवणींच्या विश्वात रमली असतानाच मॉनिटरवर कुणाचं तरी पिंग आलं. बघते तर अनिकेत ने “हाय समिधा..हाऊ आर यू..” असं पिंग केलेलं.
    त्याच पिंग बघून समिधाच्या डोळ्यात चटकन पाणी आले.

    अनिकेत ला काहीही रिप्लाय नको द्यायला असा विचार करत मनातल्या मनात समिधा पुटपुटली, “नको ना रे परत नेऊ मला भूतकाळात… मनाच्या कोपऱ्यात सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत… आता कुठे मी भूतकाळातून बाहेर पडू बघत होते आणि तू परत समोर आलास आज..आता असं बोलायला सुरुवात करशील आणि मी परत नकळत तुझ्यात गुंतले तर…..नाही नाही… अनिकेत प्लीज नको घेऊन जाऊस मला भूतकाळात..”

    अनिकेत ला काहीही रिप्लाय न देता तिने कामाला सुरुवात केली. दुपारी लंच टाईम मध्ये परत तो समोर आलाच, नजरानजर झाली आणि परत ती भावनिक झाली.

    दुसऱ्या दिवशी परत ऑफिसच्या कम्युनीकेटर वर त्याचं “हाय..गुड मॉर्निंग..” असं पिंग आलं. शेवटी न राहवून तिने “हाय..” म्हणत रिप्लाय दिला.

    लगेच त्याने एकामागोमाग एक पाच सहा मेसेज केले पण तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी ते अंधूक दिसत असतानाच तिने ती चॅट विंडो बंद करून मोठा श्वास घेतला, जणू वर्षभर त्याच्या विरहात मनी दाटलेल्या भावना आज नकळत अश्रू रुपात ओघळायला लागल्या होत्या.
    अश्रूंना आवरत ती वाशरूम मध्ये निघून गेली, चेहर्‍यावर पाणी मारून जरा फ्रेश होऊन आली आणि कामाला लागली पण त्याचा विचार नको म्हंटलं तरी डोक्यातून जात नव्हता. का आला असेल हा परत माझ्या आयुष्यात ? का प्रयत्न करतोय आता बोलायचा…काही बोलायचं बाकी आहे का खरंच आता? नाही त्याला जाब विचारावा लागेल नाही तर मला इथे कामात कधी लक्षच लागणार नाही…
    तिने चिडून त्याला पिंग केले , “मला तुला भेटायचंय… कॅन्टीन मध्ये येशील?”

    त्याचा लगेच रिप्लाय आला, “हो नक्की.. साडेतीन ला भेटुया..?”

    “ओके..” तिने रिप्लाय दिला.

    साडेतीन वाजता समिधा कॅन्टीन मध्ये गेली तर अनिकेत तिची वाट बघत बसलेला होता. ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली आणि म्हणाली, “वेळेआधीच आलास..”

    “नाही तसं काही नाही.. आत्ताच आलोय मी…कशी आहेस समिधा..”

    “हा प्रश्न विचारून नक्की काय जाणून घ्यायचं आहे तुला…”

    “असो.. कॉफी घेणार..?” – अनिकेत

    समिधाने यावर काहीही उत्तर दिले नाही. तिचा नाराज सूर, उदास चेहरा बघून अनिकेत उठून गेला आणि दोन कप कॉफी घेऊन आला.

    “थ्यॅंक्स…मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी..”

    “समू..मला पण खूप काही बोलायचं आहे गं…एकदा संधी निघून गेली आणि सगळं विस्कटलं…नको असताना..”

    “समू..? समिधा नाव आहे माझं..समू फक्त एकच व्यक्ती म्हणायचा, ज्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही त्याच्यावर.. बाकी कुणी समू म्हंटलेलं नाही आवडत मला.. ”

    “तो मीच होतो ना गं…तुझा अन्नू….
    समू…. सॉरी… ‌‌समिधा, मी खूप मिस केलं गं तुला‌.. असं नको होतं व्हायला…तू आयुष्यातून निघून गेलीस आणि सगळं विस्कटलं.‌.कामात लक्ष लागत नव्हतं, वारंवार चुका होत गेल्या.. माझी जी एक इमेज तयार झाली होती ना कंपनीत, ती लगेच धुळीला मिळाली माझ्या सततच्या चुकांमुळे..तीन महिने नुसताच ताणतणाव..शेवटी नोकरी गेली…
    खरं सांगायचं तर आपल्या डिव्होर्स नंतर अगदी शून्य झालेलं माझं आयुष्य..
    माझी अवस्था बघून आई बाबा सतत काळजीत होते..खरं तर ह्या सगळ्याला मीच जबाबदार होतो ना गं.. माझ्याच चुकांची शिक्षा मी भोगली‌…
    मला तू परत हवी होतीस.. खूप शोधायचा प्रयत्न केला.. तू जुनी कंपनी सोडून गेलीस इतकंच कळालं… हातात नोकरी नव्हती.. आयुष्यात तू नव्हतीस..एक क्षण असं वाटलं संपवून टाकावं सगळं एका क्षणात पण कसंबसं स्वतः ला सावरून तुझा शोध घेतला..तू इथे नोकरी करतेस कळालं त्यानंतर या कंपनीत नोकरी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले..खरं तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी…”

    समिधाच्या डोळ्यातून अश्रु टपकत होते. इकडे तिकडे बघत तिने डोळे पुसले आणि म्हणाली, “माझा डाऊट खरा निघाला तर..मला वाटलेच होते तू माझा पाठलाग करत आलास इथे‌‌..मला त्रास द्यायला…तुला काय पोरखेळ वाटतो काय रे सगळा… कोर्टाने संधी दिली होती ना.. तेव्हा तुला मी नको होते…तेव्हा का नाही माघार घेतलीस डिव्होर्स घेण्यापासून… आणि तुला काय वाटते,त्रास फक्त तुला झाला..मलाही मन आहे…त्रास मी सुद्धा सहन केलाच ना.. चूक
    माझीही होतीच.. चिडचिड व्हायची मला खूप, सगळं आयुष्य अचानक बदललं होतं लग्नानंतर…नव्हती मला कधी सवय ऍडजस्ट करायची पण तू समजून घेत प्रेमाने डोक्यावरुन हात फिरवला असतास ना तर जुळवून घेत गेले असते मी वेळेनुसार..सवय झाली असती मला सगळ्या गोष्टींची पण लग्नानंतर तू माझा अन्नू राहीला नव्हतास..तू नवरा झाला होतास माझा..मी ही चुकले, मलाही मान्य आहे पण आपलं ठरलं होतं ना, एकमेकांच्या चुका सुधारत समजून घेत आयुष्यभर साथ द्यायचं.. त्या फक्त लग्नाआधी घेतलेल्या आणाभाका म्हणाव्या का?”

    “समू, आय नो..पण तेव्हा नाही कळालं गं..जेव्हा चुक उमगली तेव्हा खूप उशीर झाला होता…मला कळायला हवं होतं तुझं मन त्या क्षणी…तू माझ्यासाठी सगळं सोडून आलेली पण नवीन परिस्थितीत जुळवून घेताना मी तुझी साथ द्यायला हवी होती.. सॉरी समू..खरंच चुकलो गं मी… तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे समू माझं…प्लीज मला एक संधी दे..मला माफ कर.. आपण सगळं नीट करूया… प्लीज माझ्या आयुष्यात परत ये..मी नाही जगू शकत गं तुझ्याशिवाय.. आणि हे फक्त म्हणत नाहीये मी, अनुभवलं आहे मी…प्लीज समू…कमी बॅक..”

    “अनिकेत सगळं इतकं सोपं नाहीये…मी यातून कशी बाहेर पडले माझं मलाच माहीत… कित्येक रात्री रडत रडत जागले मी तुझ्या आठवणीत… झोपेच्या गोळ्या खाव्या लागल्या मला.. रात्र रात्र झोप लागत नव्हती…कामात लक्ष लागत नव्हतं… वाटायचं, ज्याच्यावर प्रेम केलं तो असा कसा वागू शकतो…माझ्या अल्लड हट्टी स्वभावाची जाणिव असताना लग्न केलंस पण नंतर समजून घेणारा अन्नू कुठेतरी हरवला होता…माझी अवस्था बघून आई सतत लक्ष ठेवून असायची.. तिच्या हातांनी झोपेची गोळी द्यायची, नजरेसमोर घे म्हणायची..तिला वाटायचं मी जीवाचं काही बरं वाईट करून घेईन..त्यातही नातलग दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन यायचे… खूप चिड यायची मला..आता कुठे जरा सगळ्यातून बाहेर पडले आणि तू परत समोर आलास..
    माझं ना आता डोकं सुन्न झालंय…का आलास रे परत…” समिधा दोन्ही हात चेहर्‍यावर ठेवत म्हणाली.

    “समू..मला तू परत हवी आहेस…आपण एक नवी सुरुवात करू…नाही दुखावणार गं मी परत कधी तुला.. मनात खोलवर जखम झाली आहे जी कायम मला लक्षात राहणार..अगदी शेवटच्या क्षणापर्यंत…प्लीज समू…एक संधी दे मला..”

    “अनिकेत काय म्हणतील सगळे…संसार काही भातुकलीचा खेळ नहीं ना…हवं तेव्हा मांडला.. हवं तेव्हा मोडला…”

    “समू, किती मॅच्युअर झालीस गं‌…किती विचार करते आहेस सगळ्यांचा..पण आता यापुढे कोण काय म्हणते आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही समू.. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस..माझी समू हवी आहे मला…आपल्या परत एकत्र येण्याने आई बाबांना आनंदच होईल असे..मला खात्री आहे तुझ्या घरी सुद्धा काही हरकत नसेल…मी माफी मागतो त्यांची..हात पसरतो हवं तर पण मला तू हवी आहेस समू..आय लव्ह यू समू…आय मिस्ड यू सो मच..”

    “अन्नू तू वेडा झाला आहेस…”

    “तुझ्याशिवाय खरंच वेड लागलं मला..प्लीज समू, ये ना परत… नेहमीसाठी… जन्मोजन्मी साठी… प्लीज..एक संधी दे, पहिली आणि शेवटची…”

    समिधा ने भरल्या डोळ्यांनी अनिकेतच्या हातावर हात ठेवला आणि वर्षभर मनात दाटलेल्या भावना अलगद ओठांवर आणत म्हणाली, “आय मिस्ड यू टू अन्नू…प्लीज परत नको असा सोडून जाऊस मला अर्ध्या वाटेवर…”

    समिधाच्या होकारार्थी उत्तराने अनिकेतच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले, तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याने तिचा हात हातात घेत तिच्या पाणावलेल्या डोळ्यांत बघत मानेनेच उत्तर दिले.

    दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला…आता कुणी काहीही म्हणो पण एकमेकांशिवाय आयुष्य शून्य आहे तेव्हा परत एक नवी सुरुवात नक्कीच करायला हवी हा विचार करत अनिकेत आणि समिधा परत एकत्र आले.

    दोघांनाही आयुष्यात मोठी ठेच लागलेली पण स्वतः च्या चुकांची जाणीव सुद्धा झाली. दोघांच्या संसाराला, नव्या नात्याला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

    समाप्त!!!

    कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी संबंधित आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

           तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

       अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

        आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
       दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
    पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

    जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

    तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
    त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
    जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
    विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

    या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
    तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
    तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

    तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
    तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

    तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
    ती परत रडायला लागली.

    जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
    जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

    आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

    तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

    झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

    झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

    हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

    ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

    प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू आणि तुझं प्रेम हवंय…

         मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.

         मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.

    कॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे,  दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”

    शुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.

      मोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात  रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.
    शुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.

        शुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”
    तिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”
    शुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.

    अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.
    शुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”
    मोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…

      एकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”

    तिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला.  लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो,  जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…

    असा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.
    त्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.

    अशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”

    ती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.

    दोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.

    मोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.

    काही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”

    त्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”

    ते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”

    आज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.

    या दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.

    एका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग

          सानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.

        सानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घालवायचा.
    सानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.

    कितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.
    सुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,
    पण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
    “काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही? तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”

    त्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”

    ते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे? नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”

    सुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान? मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”

    इतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.

    आता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..

    एव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.

    आता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,

    “जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”

    आता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.
    जाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.   

    ही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.
    त्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.

    सानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.

    माहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

    सानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”

    त्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”

    या सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.
    सानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.

    हळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.

           एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.

    अशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक कथा.

    या प्रकारात नक्की चूक कुणाची आहे? याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    समाप्त !!!

    कथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग दुसरा

        सानिकाला सासरी जाऊबाई जरा जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. सासूबाई, सासरे तर त्यांच्याच दिनचर्येत व्यस्त असायचे. सनिकाच्या मनात मात्र सुशांत विषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. लग्नाला दोन आठवडे होत आले तरी नवरा म्हणून त्याने तिला अजूनही जवळ घेतले नव्हते. सध्या खूप काम आहेत तेव्हा काही दिवस मी तुला शक्य तितका वेळ देऊ शकत नाही पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरा कामाचा व्याप कमी झाला की छान कुठे तरी फिरून येऊ म्हणत त्याने सानिकाची समजूत काढली. कामाचं निमीत्त सांगून उशीरा घरी येणे, शक्य तितके सानिकाला टाळणे असे प्रकार सुरू होते.  सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुशांत घरी नसायचा‌. घरी कुणाला काही म्हंटलं की म्हणायचे काम असतील त्याला , जरा काही दिवस गेले की देईल तो तुला वेळ. सानिकाला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने याविषयी जाऊबाईला सुद्धा बोलून दाखवलं.

    त्यावर त्या म्हणाल्या, “खरं सांगू का सानिका, सुशांत आधीपासूनच घरात फारसा नसतो, त्याचे मित्र आणि तो असंच होतं त्याचं लग्नापूर्वी सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर तरी घरात थांबेल पण आताही असंच दिसतंय. तू एक काम कर, त्याला सांग सुट्टी असली की एक दिवस तरी तुला वेळ द्यावा म्हणून. तुम्ही बोला एकमेकांशी याविषयी स्पष्टपणे.”

    ते ऐकताच सानिकाला अजूनच विचित्र वाटले.

    जेव्हा जाऊबाईंना कळाले की सानिका आणि सुशांत यांच्यात लग्नानंतर अजून एकदाही जवळीक आली नाही तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. त्यांनी सानिकाला याविषयी पुढाकार घे असंही सांगितलं.
    जाऊबाई चे बोलणे ऐकून सानिकाला सुशांत विषयी अनेक शंका मनात आल्या. लग्न म्हंटलं की एकमेकांविषयी आपसुकच ओढ निर्माण होते, एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो, तसंच सानिका चेही झाले पण सुशांत मात्र सानिकापासून लांबच होता. त्याने आपल्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशा अनेक भावना तिच्या मनात उफाळून येत होत्या.
    आता आपणच पुढाकार घेऊन सुशांतच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा निश्चय तिने केला. कदाचित तो खरच कामात गुंतलेला असेल त्यामुळे वेळ देत नसेल अशी स्वतः ची समजुत सुद्धा तिने काढली.

    मनात काही तरी प्लॅनिंग करून तिने आज रात्री कितीही उशीर झाला तरीही सुशांत आल्याशिवाय झोपायचे नाही असे ठरवले. खोली छान आवरली, नवी कोरी बेडशीट बेडवर अंथरली. रात्री आठच्या सुमारास सुशांतला फोन केला आणि जेवणाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, “मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. मी बाहेरच खाऊन घेईल. ”

    सानिका आणि जाऊबाईंनी जेवणाची तयारी केली, सगळ्यांनी एकत्र जेवण केले पण सानिका मात्र सुशांतला मिस करत होती. मोठे दिर जाऊ कसं छान एकत्र जेवतात, सासू सासरे सुद्धा दोन्ही वेळा एकमेकांशिवाय जेवण करत नाहीत पण आपण मात्र अजून एकदाही असं एकत्र बसून ना जेवण केलयं ना जरा गप्पा मारल्या अशा विचाराने तिला एकही घास घशाखाली उतरत नव्हता. कशीबशी ती जरा जेवली आणि स्वयंपाक घरात आवरून आपल्या खोलीत निघून गेली.

    जाऊबाईंनी तिला सांगितले होतेच की, आज तू त्याच्या जवळ स्वतः हून जा, प्रेमाने त्याच्याशी बोल, त्याच्यावर तुझं किती प्रेम आहे हे त्याला जाणवू दे म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी तुला जरा तरी वेळ देईल शिवाय त्याचं असं घराबाहेर राहणं जरा कमी होईल. तू प्रयत्न कर तरी काही शंका वाटलीच तर सुशांतच्या दादाला सांगते मी त्याच्याशी बोलायला.

    सुशांत रात्री बाराच्या सुमारास घरी आला. सानिका त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघत होती. तो आलेला दिसताच तिने स्वतः ला आरशात बघून कपाळावरची टिकली उगाच नीट केली आणि स्वतःशीच लाजून तिने खोलीचा लाइट बंद केला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर मंद मेणबत्त्या लावल्या. सुशांत खोलीत आला तसंच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले. त्याने एक कटाक्ष सानिकाकडे टाकला, ती लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती मोकळ्या केसात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला असं छान सजलेलं बघून सुशांत आनंदी होईल अशी गोड अपेक्षा तिला होती पण तिची अशी सगळी तयारी बघून त्याचा चेहरा उतरला. तो‌ काही एक न बोलता बाथरुम मध्ये निघून गेला.

    त्याची अशी प्रतिक्रिया बघून सानिकाचा मूड खराब झालेला पण तरीही जरा शांत राहून ती त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. तो जरा फ्रेश होऊन बाहेर आला तशीच ती त्याला टॉवेल द्यायला जवळ गेली, त्याने तिच्याकडे न बघताच तिच्या जवळचा टॉवेल घेऊन चेहरा पुसला. आज तिला त्याच्या वरच्या प्रेमाची जाणिव त्याला करून द्यायची होती. ती अलगद त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळण्याच्या आत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
    “सुशांत, किती उशीर केला यायला. खूप वाट बघत होते मी तुमची..बायको घरी आहे तेव्हा जरा लवकर येत जा ना.. प्लीज… दिवसांतला काही वेळ माझ्या साठी तर काढायला हवाच ना तुम्ही..माझा‌ हक्क आहे तितका…”

    असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवायला मान वर केली तसंच त्याने तिला दूर केले आणि म्हणाला, “सानिका, अगं कळतंय मला पण सध्या कामाचा व्याप आहे खूप… नाही होत लवकर यायला…तू वाट नको बघत जाऊ असं…”

    तिला त्याच्या अशा वागण्याचा जरा राग आलाच पण त्याला आपण समजून घ्यायलाच हवे असे ती स्वतःला समजून सांगत होती. ती त्याला उत्तर देत म्हणाली, ” सुशांत मलाही तुमची परिस्थिती कळते आहे पण असं किती दिवस दूर राहायचे आपण.. लग्नाआधी सुद्धा आपल्याला नीट बोलायला, समजून घ्यायला वेळ मिळाला नाही..आताही तेच होतेय.. मी खूप मिस करते तुम्हाला दिवसभर…”

    सुशांत मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत थकल्याचे कारण सांगून झोपी गेला. सानिका त्या रात्री खूप खूप रडली, तिच्या भावनांचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. आपण इतकं सगळं बोलून दाखवले तरी सुशांतला कांहीच कसं वाटत नसेल आपल्याविषयी हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. रात्रभर कड बदलत ती बेडवर पडून होती.

    सकाळी उठून तिने सुशांतला चहा करून दिला. त्याने मुकाट्याने चहा घेतला आणि तो घराबाहेर पडला. सानिकाचा चेहरा पाहून जाऊबाई काय ते समजून गेल्या. सासू सासरे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्यावर दोघीच घरात असताना सानिकाने रात्री घडलेला सगळा प्रसंग रडतच जाऊबाईंना सांगितला. जाऊबाई ते ऐकताच जरा गोंधळलेल्या अवस्थेत सानिकाला म्हणाल्या, “सानिका, तू शांत हो..मी आहे तुझ्या सोबत पण खरं सांगू का, मलाही आता सुशांत वर शंका यायला लागली..मी ह्यांना सांगते त्याच्याशी बोलायला… काय होते ते बघूया.. नाही तर खरं काय ते शोधून काढू आपण..तू काळजी करू नकोस..”

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम  भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग पहिला

           सानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली. हसतमुख चेहरा असलेल्या सानिकाचे डोळे रडून सुजलेले होते, चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आई बाबांच्या काळजात धडकी भरली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत. नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. आई बाबांनी तिला आधी शांत केले, बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला. सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की काय झालंय ते ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं.

       सानिका अजूनही रडतच होती, बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सानू, आधी तू चहा घे, नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला.

    कसंबसं रडू आवरून ती चहा प्यायली. आई बाबा पुढे काही बोलण्याआधी ती म्हणाली, “आई बाबा, आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी… खूप मोठी फसवणूक..” इतकं बोलून ती परत रडायला लागली.

    तिचं हे वाक्य ऐकताच आई बाबांना अजूनच काळजी वाटली.

    बाबांनी तिला विचारले, “सानू, असं का‌ म्हणते आहेस.. नक्की काय झालंय ते नीट सांग बघू…तू‌ काय बोलते आहेस काही एक‌ कळत नाहीये आम्हाला..”

    सानिका रडत रडत सगळं सांगायला‌ लागली. ती जे काही सांगत होती ते ऐकून आई बाबांना मोठा धक्का बसला.

    सानिका आणि सुशांत यांचे काही महीन्यांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झाले. दोघांचेही अरेंज मॅरेज. 

    सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत, उंच सडपातळ बांधा, स्वभावाने जरा लाजाळू, अबोल, सहनशील. भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी. मोठा भाऊ नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहायचा.
    सानिकाचा पदवी‌ अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांत चे स्थळ आले.

    सुशांत सरकारी नोकरीत कामाला, दिसायला राजबिंडा, घारे डोळे, उंच पुरा, पिळदार शरीरयष्टी. सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले. दोघांचे लग्न ठरल्यावर महीनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना‌ बोलायला भेटायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला. वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबाविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.

    लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आई बाबांना घर अगदी खायला उठू लागले. इकडे सानिका सुद्धा नविन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्न म्हंटलं की प्रेम, उत्साह, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले.
    लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांत ची वाट बघत राहीली पण तो आलाच नाही. शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला, सानिका लाजतच त्याला म्हणाली ,”रात्री बराच वेळ वाट बघितली मी तुमची..”

    त्यावर तो इतकंच बोलला, “सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलचं नाही…..त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती, जरा वेळ जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला..मुळात येऊच दिले नाही मला..असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला..तू ही दमली असणार ना लग्नाच्या धावपळीत….”

    सुशांत अगदी सहज असं बोलून गेला. पहिल्या रात्री पेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालंय की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार, असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्याचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटत असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही.

    फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली. मोठे दिर जाऊ, सासू सासरे सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला. सुशांत सुद्धा जरा फ्रेश होऊन त्यांच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला. जाऊबाईंनी हळूच सानिकाला विचारले, “काय मग, कशी होती पहिली रात्र.. काही त्रास तर होत नाहीये ना..काही वाटलं तर मला बिनधास्त सांग…मोठ्या बहिणी प्रमाणे आहे मी तुला..”

    जाऊबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं. तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली.

    क्रमशः

    सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

    पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे 

  • कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

    नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघणारच होती तितक्यात मोहन म्हणजेच तिचा पती तिची वाट अडवून म्हणाला, “माहेरी जायला निघाली आहेस खरी पण रिकाम्या हाताने परत येणार असशील तर मुळीच घरी येऊ नकोस. भावांकडून घराचा हिस्सा घेतल्याशिवाय परत आलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही. ”

    नलिनीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मोहनचे बोलणे ऐकून त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ती गपगुमान माहेरी जायला निघाली. वाटेत तिचे अश्रू अनावर झाले आणि ती भूतकाळात हरवली.

    नलिनी सुखवस्तू कुटुंबात लाडाकौतुकात वाढलेली. आई वडील दोघेही नोकरी करायचे. तीन भावंडे, त्यात ही सगळ्यात लहान. दोन्ही भावांची आणि आई वडिलांची लाडकी लेक. नलिनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिच्या आईचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आईच्या अशाप्रकारे अचानक झालेल्या निधनामुळे अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, नलिनी चे वडील पूर्णपणे खचून गेलेले. मुलांचे शिक्षण पूर्ण होतंच आलेले होते.
    “आता लवकरच तिन्ही मुलांचा थाटलेला आनंदी संसार बघितला की आपले आयुष्य मार्गी लागले म्हणून समजा. ” असं मोठ्या उत्साहाने म्हणणारी आई बाबांना सोडून गेल्यावर हा संसार एकट्याने कसा सांभाळावा हाच प्रश्न बाबांना पडलेला.
    त्यातून स्वतः ला कसंबसं सावरून बाबांनी मुलांना धीर देत आईची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात नलिनीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले. मुलेही आता शिक्षण पूर्ण करून काही तरी कामधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. बाबांनी दोन्ही मुलांना लहानसहान व्यवसायात गुंतवले. आता नलिनी साठी साजेसा मुलगा मिळाला की तिचं लग्न लावून द्यायच म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होणार असाच काहीसा विचार केलेला नलिनीच्या बाबांनी. बाबा आणि दोन्ही भावांनी नलिनी साठी वर संशोधन सुरू केले. आई गेल्यापासून नलिनीला फार एकटेपणा जाणवायचा. भाऊ आणि बाबा वेळेनुसार आपापल्या आयुष्यात गुंतलेले पण नलिनी मात्र आईच्या आठवणीने दररोज रडायची. बाबांना तिची अवस्था कळत होती. तिची शक्य ती काळजी घेत, भरभरून प्रेम देत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करत होते पण म्हणतात ना आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असंच काहीसं झालेलं.

    आता नलिनीला तिच्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा मिळावा , तिने संसारात रमून आनंदी राहावं हीच बाबांची इच्छा होती. पण झालं मात्र काही तरी वेगळंच.

    नलिनी साठी बरेच स्थळ बघितल्यावर मोहनचे स्थळ आले. वरवर बघता एकंदरीत छान वाटलेले आणि मोहन सोबत नलिनी चे लग्न झाले. लग्नानंतर नव्यानवलाईचे नऊ दिवस संपले तसेच मोहनने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. मोहन व्यवसाय करायचा तेव्हा नफा तोटा आलाच पण कधी फार काही नुकसान झालेच तर त्याची फार चिडचिड व्हायची मग सगळा राग तो नलिनी वर काढायचा. दारूच्या नशेत तिच्यावर हातही उचलायचा. आईच्या मायेला पोरक्या झालेल्या नलिनीच्या नशिबात सासरीही सुख नव्हतेच. वडीलांना सांगितले तर त्यांना काळजी वाटेल म्हणून तिने वडीलांना याबाबत सुरवातीला काही सांगितले नाही. पण दिवसेंदिवस मोहन तिला फार त्रास द्यायला लागला. तुझ्या माहेरचे माझा मानपान करत नाहीत, दिवाळसणाला काही दागिना नाही केला म्हणून तिला सतत टोमणे मारायचा. मोहन सारख्या लोभी व्यक्तीला सासर कडून मोठमोठ्या अपेक्षा असायच्या पण आई नसताना बाबा कसं घर सांभाळत आहेत हे नलिनी बघत आलेली त्यामुळे ती माहेरी कुणालाही मोहन विषयी काही सांगत नव्हती. अशातच तिला दिवस गेले आणि लवकरच ती एका मुलाची आई झाली. गरोदरपणात सुद्धा मोहन‌ असाच वागला. माहेरी आई नसताना तिचे बाळंतपण कोण करणार याचा जराही विचार न करता त्याने तिला माहेरी नेऊन ठेवले. बाबांनी कामवाल्या मावशीच्या मदतीने तिची नीट काळजी घेतली. भाऊ सुद्धा सोबतीला होतेच. या दरम्यान नलिनीच्या माहेरी येऊन मोहन उगाच काहीतरी तमाशा करायला लागला. तेव्हा तिच्या दोन्ही भावांनी त्याला चांगलाच दम दिला पण नलिनी मध्ये पडून तिने मोहनला परत जायला सांगितले. बाळंतपणानंतर सासरी गेल्यावर तिची एकटिची चांगलीच तारांबळ उडत होती. सासुबाई वयस्कर त्यामुळे त्यांची काही मदत होणे शक्य नव्हते. बाळ, घर आणि मोहनचा असा चिडखोर स्वभाव , त्याचा छळ सहन करणे असंच तिचं आयुष्य झालेलं.

    माहेरी आता बाबांनी दोन्ही भावांची लग्न उरकले. दोघेही भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झालेले. बाबा असताना‌ ती हक्काने माहेरी जाऊन राहायची. चार दिवस का होईना पण सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात यायचे. काही वर्षांतच आजारपणाने बाबा देवाघरी गेले आणि तिचं माहेर संपल्या सारखे झाले. दोन्ही भाऊ वहीनी संसारात गुंतल्याने तिच्याकडे कुणी फारसे लक्ष देत नव्हते. भावाकडे पाहुणी म्हणून आली तरी दोन‌ दिवसांपेक्षा जास्त तिला आता राहावं वाटत नव्हतं. सासरचे, नवर्‍याचे प्रश्न भावाजवळ मांडले की वहिनीला आवडत नव्हते. त्या म्हणायच्या आपला संसार आपण बघावा, आम्हाला मध्ये घेऊ नये. भावाचे मन दुखत असले तरी वहिनी पुढे दोघेही काही बोलेना.
    एकदा तर मोहनने तिला दारू पिऊन मारहाण केली आणि घराबाहेर काढले. रडत रडत ती माहेरी आली . मोठ्या भावाला झाला प्रकार सांगितला तर तो म्हणाला, “नलू, आता हे नेहमीचं झालंय. एक तर तू त्याला सोडून दे नाही तर तुझं तू बघून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसाच हा मोहन काही केल्या सुधारत नाही. आम्हाला सांगून काय फायदा, तुझ्या नशिबात हेच असेल. सहनशक्ती नसेल तर आत्महत्या कर पण सारखं तेच रडगाणे गाऊ नको. ”

    भावाचे हे असे बोलणे ऐकल्यावर ती मनोमन खुप दुःखी झाली. एके काळी याच घरात लाडात , मोठ्या तोर्‍यात वावरणारी मी. आज मला माझ्याच या घरांत हा दादा आत्महत्येचा सल्ला देतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. अश्रू ढसाढसा वाहत होते पण तोंडातून शब्द निघत नव्हता. आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी ती मोहन‌कडे परतली.
    सख्खा भाऊ असा बोलतोय मग इतर नातलगांना सांगून काय फायदा म्हणत ती आहे त्या परिस्थितीला सामोरे जात होती.

    परत तेच मोहनचे टोमणे, मारझोड सहन‌ करत तिचा संसार सुरू होता. मुलगा भराभर मोठा होत होता. त्याच्यासाठी का होईना आपण जगायला हवं म्हणून ती सगळं सहन करत होती.
    आपली जरा आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने लहान मुलांना शिकवणी, खाणावळ चालवणे यांसारखे उद्योग करण्याचा प्रयत्न केला पण मोहनने त्यावर पाणी फेरले. कुणाचा जराही पाठींबा नसताना स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे तिचे प्रयत्न असफल झाले.
    भाऊ वहीणीचे इतके सगळे बरेवाईट अनुभव आले तरी बहीणीची माया म्हणून ती दर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला माहेरी जायची. वरवर का होईना पण एक दिवस तरी भाऊ बहिणीच्या नात्यात तिला गोडवा जाणवायचा. परिस्थिती वाईट आहे, आपले भाऊ वाईट नाही असाच विचार ती करायची. माहेरी आली की बालपणीच्या आठवणीत क्षणभर रमून जायची आणि आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमन करून भरल्या डोळ्यांनी सासरी परत जायची.

    अशातच नलिनीचा मुलगा बारा वर्षांचा झालेला. आता मोहन‌चा व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नव्हता. त्याने नलिनीच्या मागे एक वेगळाच तगादा लावला. तो‌ तिला म्हणायचा की तुझ्या माहेरी आता आई वडिल तर नाहीत तेव्हा आहे ती मालमत्तेच्या वाटण्या करून तू तुझा हिस्सा माग.
    तिन्ही भावंडांचे लग्न, शिक्षण , वडिलांचे आजारपण यात होते नव्हते ते पैसे गेले याची तिला जाणीव होती. होते फक्त त्यांचे राहते घर. त्यातही भावांचे मन दुखावून काहीही हिस्सा वगैरे नको होता पण मोहन मात्र हात धुवून तिच्या मागे लागलेला. मोहनला नाही म्हंटले की तो तिला मारझोड करत शिवीगाळ करायचा. या अशा वातावरणात मुलाला ठेवले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करून मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिने मुलाला होस्टेलमध्ये ठेवले होते.
    दिवाळी झाल्यावर मुलगा होस्टेलमध्ये परत गेला आणि नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघाली.

    ती मालमत्तेच्या वाटण्या, हिस्सा मागणे याविषयी भावांना काही एक बोलणार नव्हती. दोन दिवस आनंदात माहेरी राहून परत यायचे, मोहन‌ला काय करायचं ते करू दे पण मला हे दोन दिवस मिळणारं माहेरपण जपायला हवे. उगाच पैशावरून भाऊ बहिणीच्या नात्यात फूट नको असेच तिने मनोमन ठरवले होते.

    रिक्षावाला म्हणाला, “ताई, इथेच उतरायचं ना तुम्हाला. ”
    त्याच्या बोलण्याने ती विचारांमधून बाहेर आली, रिक्षातून उतरून घरात जाताना परत एकदा त्याच बालपणीच्या आठवणीत क्षणभर हरवली.

    समाप्त!

    अशी ही नलिनीच्या आयुष्याची व्यथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
    खरंच आई वडील असेपर्यंत हक्काने वावरता येणारे माहेर त्यांच्या नसल्याने पोरके झाले की मनाची काय अवस्था होत असेल याचा अनुभव नलिनी प्रमाणे अनेक भगिनींना येतो.
    अशा बर्‍याच मुली आपल्या आजूबाजूला आहेत ज्या मोहन सारख्या नवर्‍याचा छळ सहन करत संसाराचा गाडा चालवताना दिसतात. पैशासाठी, हुंड्यासाठी बराच त्रास सहन करतात.
    छळ सहन करायला नको म्हणून अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी धडपड करताना कधी कधी मार्ग सापडत नाही. अशा वेळी आहे त्या परिस्थितीला शरण जातात.
    यासाठी आई‌ वडिलांनी मुलींना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे, अन्याय सहन‌ न करता परिस्थितीशी लढायला शिकविणे खूप गरजेचे आहे.

    याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)

    मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले की विनयला मानसी आवडते आणि तो मानसीला प्रपोज करणार आहे, ते ऐकताच मोना मनोमन दुःखी झाली. 

    पुढे मानसी विषयी विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते.  प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.

         त्याला भेटून मोना होस्टेलमध्ये परत आली. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मानसी सोबतही फारसं काही ती बोलली नाही. जरा थकले गं, आपण उद्या बोलू म्हणत मोना बेडवर पडली. रात्रीच्या त्या अंधारात ती ढसाढसा रडली. पण आता विनयला प्रॉमिस केल्या प्रमाणे त्याला मदत करायची असं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती मानसी आणि विनय सोबत अगदी नॉर्मल वागत असल्याचं दाखवत असली तरी मनापासून ती उदास होती.

    इकडे विनय मानसीचा वाढदिवस खास बनविण्यासाठी मस्त तयारीला लागला होता. मोना शक्य ती मदत त्याला करत होती.  बघता बघता तो दिवस आला. आज मानसीचा वाढदिवस होता. ठरल्याप्रमाणे सकाळीच मोना मानसीला तयार करून बाहेर घेऊन गेली. दोघीही एका मंदिरात पोहोचल्या तर विनय तिथे आधीच हजर होता. दररोज न चुकता देवाला नमस्कार करून मानसी दिवसाची सुरुवात करायची त्यामुळे आज वाढदिवसाची सुरवात सुद्धा मंदिरात जाऊन झाली. तिघेही नंतर एका हॉटेलमध्ये पोहोचले. विनय ने आधीच तिथे एक टेबल बूक करून सगळी तयारी केली होती. पूर्ण टेबलवर गुलाबांच्या पाकळ्या, त्याच्या मधोमध तिचा आवडता चॉकलेट केक, हार्ट च्या आकारात लावलेल्या मेणबत्त्या, टेबलच्या बरोबर वरच्या बाजूला छताच्या दिशेने लावलेले लाल फुगे, मंद आवाजात हॅपी बर्थडे टू यू असे म्युझिक. सगळं बघून मानसीला आनंदाचा गोड धक्का बसला. “किती सुंदर आहे हे सगळं..फक्त माझ्यासाठी..माझ्या वाढदिवसासाठी.. आयुष्यात पहिल्यांदाच इतका छान वाढदिवस साजरा होतोय आपला..” मनात असाच काहीसा विचार करत ती टेबलच्या दिशेने जात होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. लाल पिवळ्या रंगाचा बांधणीचा पंजाबी ड्रेस घातलेली मानसी चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना खूप सुंदर दिसत होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून विनय अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. मोना त्यांच्या सोबत आहे याचा क्षणभर विनयला विसर पडला. तिघेही टेबलवर पोहोचले. मानसीने केक कट केला. नंतर काही वेळाने विनय ने मानसीच्या हातात गुलाबाचे फुल देत तिला प्रपोज केले. त्याला ती अगदी शाळेपासून आवडते, तिच्यावर त्याचं खूप प्रेम आहे हे तिला अगदी आत्मविश्वासाने सांगत आयुष्यभर मला तुझी साथ हवी म्हणत तिला मागणी घातली. त्याचं असं सरप्राइज बघून मानसी जरा घाबरली, लाजली पण तिच्याही मनात त्याच्या विषयी प्रेम होतेच. शाळेपासून नाही पण कॉलेजमध्ये आल्यावर तो तिचा पहिलाच मित्र, त्याची झालेली मदत, त्याचा मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव, त्याचा सहवास यामुळे तिलाही तो आवडायचा पण त्याच्या मनात सुद्धा आपल्याविषयी प्रेम आहे याची तिला जरा जराही शंका आली नव्हती. त्याच्या या सरप्राइज मुळं पण तिचा जरा गोंधळ उडाला तरी तिने कुठलाही विचार न करता त्याचे प्रपोजल स्विकारले तशीच मोना मनोमन रडायला लागली. विनय आणि मानसी खूप आनंदी होते पण मोना‌ला मात्र हा प्रेमभंग अगदी नको नकोसा झाला होता. कुठे तरी दूर पळून जावेसे वाटत होते पण विनय आणि मानसी साठीचा आनंदी क्षण आपल्यामुळे खराब होऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर कसे बसे हास्य आणून ती त्यांच्या आनंदाची साक्षीदार बनली होती.

    वेळ गेली तशी ती विनयच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं त्याच्यावर असलेलं हे प्रेम विसरणे तिला अशक्य झाले होते.
    मानसी आणि विनय मात्र एका नव्या विश्वात रमलेले होते. दोघांचं जिवापाड प्रेम बघून मोनाला कधी कधी त्यांचा हेवा वाटायचा.
    आता शक्य तितकं त्यांच्या सहवासात जाणे मोना‌ टाळत होती.

    अशातच भराभर वर्ष संपत आले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा तिघांनी मस्त पार्टी करायचे ठरवले. तिघेही एकत्र बर्‍याच दिवसांनी बाहेर पडले. त्या दिवशी विनय ने मोनाची मस्करी करत तिला विचारले, “मोना, काय गं..तुला अख्ख्या कॉलेजमध्ये कुणीच आवडला नाही का..”

    त्या क्षणी तिच्या मनात परत एकदा कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे एकच गाणे गुणगुणत होते,

    “तुझे याद ना मेरी आई..किसी से अब क्या कहना…”

    कॉलेज नंतरही दिवसेंदिवस मानसी आणि विनय यांचे प्रेम बहरत गेले. दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोना‌ आयुष्यात पुढे जात होती पण अजूनही विनय मध्ये गुंतलेली होती. दुसऱ्या कुणावर परत असं मनापासून प्रेम करता येईल की नाही याची तिला शंकाच वाटत होती. मानसी आणि विनय यांना मात्र मोनाच्या मनस्थितीची, विनय विषयीच्या प्रेमाची जराही कल्पना नव्हती.

    अशी ही तिघांच्या मैत्रीची आणि विनय-मानसीच्या प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

     
         मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले.
    “हाय मानसी..!”
    या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक  मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी शाळेत एकाच वर्गात होते पण कधीच बोलणं वगैरे झालं नव्हतं. नावाने आणि चेहर्‍याने फक्त दोघांची ओळख होती. आज मात्र या अनोळखी कॉलेजमध्ये त्याला बघताच मानसी मनोमन आनंदी झाली.

    “हाय विनय..तू इथे..म्हणजे तुला याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला का..”

    तिच्या आश्चर्यकारक प्रश्नावर त्याने हो म्हणत उत्तर दिले तशीच ती अजूनच आनंदी झाली. या अनोळखी शहरात , कॉलेजमध्ये ओळखीची व्यक्ती भेटल्यावर किती बरं वाटलं तिला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
    विनय क्षणभर तिच्या गोड निरागस चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यालाही तिला तिथे बघून खूप आनंद झाला होता.
    मानसी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, सडपातळ उंच बांधा, लांबसडक केसांची वेणी, साधे पण नीटनेटके राहणीमान. मानसी लहान असताना आई आजारपणाने देवाघरी गेली आणि वडीलांनी दुसरं लग्न केलं. तेव्हापासून मामा मामींनी तिला लहानाचं मोठं केलेलं.
          बारावीपर्यंतचे शिक्षण जरा ग्रामीण भागात झाल्यावर आता पहिल्यांदाच ती शहरी वातावरण अनुभवत होती. मुळातच अभ्यासू, मेहनती असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या जवळच असलेल्या होस्टेलमध्ये ती राहणार होती. विनय हा तिचा पहिलाच मित्र.
    हळूहळू ती या शहरी वातावरणात रमायला लागली.
    होस्टेलमध्ये तिची रुममेट मोना हिच्याशी मानसीची लवकरच मैत्री झाली. मानसी मुळे मोना आणि विनयची सुद्धा ओळख झाली. तिघांचीही हळूहळू चांगली मैत्री झाली. एकमेकांना अभ्यासात मदत करणे, सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे सुरू झाले. 
    शाळेत असल्यापासूनच शांत, सालस, निरागस मानसी विनयला खूप आवडायची पण कधी बोलणं सुद्धा झालं नव्हतं. आता योगायोगाने दोघे एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मैत्रीचं नातं त्यांच्यात निर्माण झालेलं. विनयच्या मनात आपल्याविषयी प्रेमाची भावना आहे याची जराही कल्पना मानसीला नव्हती. विनय सुद्धा तिला काही जाणवू देत नव्हता. योग्य वेळ आली की मानसीला प्रपोज करायचे असे त्याने ठरवले होते.
      विनय उंचपुरा, दिसायला साधारण पण आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला, स्वभावाने प्रेमळ, मदतीला धावून जाणारा. कुणालाही आपलसं करेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. यामुळेच मोनाला पहिल्या भेटीतच विनय खूप आवडला होता. जसजशी मैत्री घट्ट झाली तशीच मोना विनयच्या प्रेमात पडली. त्याच्या मनात मात्र मानसी होती.

         कॉलेजचे पहिले वर्ष संपत आले होते. पुढच्या  आठवड्यात मानसीचा वाढदिवस होता. तिच्यासाठी काही तरी खास प्लॅन करून तिचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्याचा विचार विनयच्या डोक्यात सुरू होता. या सगळ्यात मोनाची मदत घ्यायची असे त्याने ठरवले आणि त्यासाठी विनयने मोनाला फोन केला. त्याने तिला एकटीला भेटायला बोलावले शिवाय याविषयी मानसीला काही सांगू नकोस असंही सांगितलं. ते ऐकताच मोनाच्या मनात आनंदाने लाडू फुटायला लागले.

      विनय ने कशासाठी बोलावले असेल, त्याचेही माझ्यावर प्रेम असेल का ? त्याविषयी तो काही बोलणार असेल का? अशे अनेक प्रश्न मोनाच्या मनात गोंधळ निर्माण करायला लागले. त्याला पहिल्यांदाच असं एकट्यात भेटायचं म्हंटल्यावर ती छान तयार झाली. मोनाला असं चार वेळा आरश्यात स्वतः ला निरखून बघत, लाजत लाजत तयार होताना बघून मानसीने तिला विचारले,” काय मॅडम, आज काय खास..छान दिसतेस पण निघाली कुठे..तेही मला न सांगता, मला एकटीला रूमवर सोडून?”

    काही खास नाही गं, शाळेतली मैत्रिण भेटायला येतेय म्हणून जरा बाहेर जाऊन येते तासाभरात असं मानसीला सांगून ती बाहेर पडली.

    ठरलेल्या ठिकाणी विनय पाठमोरा उभा तिला दिसला. त्याची पाठमोरी आकृती बघतच ती त्याच्या दिशेने निघाली. जसजशी जवळ जात होती तशीच तिची धडधड वाढली होती. चेहऱ्यावर लाजरे भाव होते. ती जवळ पोहोचताच ती लाजतच म्हणाली,

    “विनय… उशीर झाला का रे मला..बराच वेळ वाट बघतोय का..”

    तिचा आवाज ऐकताच तो‌ तिच्याकडे वळून म्हणाला, “हाय मोना… अगं नाही..मी जरा लवकर पोहोचलो..तू वेळेत आलीस..बरं आपण त्या पुढच्या बाकावर बसूया का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी.”

    ते ऐकताच ती अजूनच लाजून चूर झाली. दोघेही जवळच्या एका बाकावर जाऊन बसले. बसताना नकळत त्याच्या हाताचा स्पर्श तिला झाला तशीच ती क्षणभर एका विश्वात रमली. काय बोलणार असेल विनय असा विचार करत जरा अस्वस्थ सुद्धा झाली. आपण विनय साठी छान तयार होऊन आलोय पण ह्याने नीट बघितलं सुद्धा नाही किंवा काही प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही म्हणून तिला जरा त्याचा रागही आला.

    विनय मोनाला म्हणाला, ” मोना, आज तुला मी माझं एक सिक्रेट सांगायला बोलावलं आहे. खूप दिवसांपासून एक गोष्ट माझ्या मनात आहे आणि आज तुझ्यासोबत ती गोष्ट शेअर करणार आहे.”

    विनयचे हे शब्द ऐकताच मोना मनोमन आनंदी झाली. आता विनय आपल्याला बहुतेक प्रपोज करणार असं तिला वाटलं. ज्याच्यावर मी मनोमन प्रेम करते त्याच्या मनात सुद्धा आपल्या विषयी अगदी त्याच भावना आहे, आणि तो आज चक्क व्यक्त होतोय.. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असा काहीसा विचार करून ती अगदी गुलाबी स्वप्न बघितल्या प्रमाणे अत्यानंदी झालेली होती.

    त्याच्या बोलण्यावर फक्त गोड स्माइल देत ती ऐकत होती‌. तो पुढे म्हणाला, “मोना, माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे…अगदी मनापासून प्रेम. मी आज पर्यंत तिला याविषयी जाणवू दिले नाही पण आता मला ते व्यक्त करायचे आहे. तुला माहित आहेच की मानसी आणि मी शाळेपासूनच एकत्र शिकलो पण मैत्री मात्र कॉलेजमध्ये आल्यावर झाली. पण मला शाळेपासूनच ती आवडते. माझं खरंच खूप प्रेम आहे मानसी वर. मला आता ते व्यक्त करायचे आहे. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आहे तेव्हा खास काही तरी प्लॅन करून तिच्या विषयीच्या माझ्या मनातील भावना मला तिला सांगायच्या आहेत. यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील ना मला मदत. ”

    हे ऐकताच गुलाबी स्वप्न रंगवत असलेल्या मोनाचे मन अगदी क्षणभरात तुटले. असं काही असेल याची तिला जराही शंका आली नव्हती. ज्या विनय वर आपलं प्रेम आहे तो आपल्या समोर दुसऱ्या मुलीवरील प्रेमाविषयी बोलतोय हे तिला सहनच होत नव्हते. तिला अगदी मोठ्याने रडून त्याला सांगावं वाटत होतं की विनय अरे तू माझा आहेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…पण त्याने जे काही सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. काय प्रतिक्रिया द्यावी तिला कळत नव्हते.

    विनय तिच्या डोळ्यापुढे उभा होऊन म्हणाला, “मोना, प्लीज करशील ना मला मदत..”

    त्यावर कसंबसं ती “हा..” म्हणाली.

        विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. ती मनोमन रडत होती, दु:खी झाली होती. प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.
    या क्षणी कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे आपली अवस्था झाली याची जाणीव तिला झाली. तिचं मन अगदी या गाण्या प्रमाणे रडत होतं.

    “रब्बा मेरे, इश्क किसी को ऐसे ना तडपाये, होय
    दिल की बात रहे इस दिल में, होठों तक ना आये
    ना आये….

    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    दिल रोया की अंख भर आयी
    दिल रोया की अंख भर आयी किसी से अब क्या कहना…”

    विनय मानसी जवळ प्रेम व्यक्त करेल का? मानसी या प्रेमाचा स्वीकार करेल का..मोना हा धक्का कसा सहन करेल..मानसी आणि मोनाच्या मैत्रीत यामुळे फूट पडेल का… याची उत्सुकता तुम्हाला लागली असणार ना..

    तर हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होईल याविषयी तुमचा अंदाज अशा प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

         मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा चंद्र, आकाशात लुकलुकणारे चांदणे अगदी हुबेहूब दृश्य तिने त्या कागदावर उतरवले. जणू त्या बाहेर दिसणार्‍या दृश्याचा फोटो काढला असंच सुरेख चित्र तिने अगदी सहजपणे रेखाटले.

    त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत ती तिच्याच विश्वात रमली तितक्यात दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. माधव घरी आलेला बघून तिला अजूनच आनंद झाला. तो घरात येताच त्याच्या हातातली बॅग बाजूला ठेवून ती त्याला बिलगली आणि म्हणाली, “किती उशीर केलास यायला. कधीपासून वाट बघते आहे मी.. फोन तरी करायचा उशीर होत असेल तर..”
    त्याचं लक्ष मात्र समोर ठेवलेल्या त्या चित्राकडे गेले, तिला मिठीतून बाजुला करत तो म्हणाला, “मीरा, हे चित्र तू काढले ?”
    तिने चेहऱ्यावर हास्य आणून मानेनेच होकार दिला.
    तो त्यावर आश्र्चर्यचकित होऊन म्हणाला,

    “व्वा …किती सुंदर…अगदी हुबेहूब दृश्य रेखाटले आहे तू…माझी बायको इतकी छान कलाकार आहे हे मला तर पहिल्यांदाच कळते आहे..”

    ती लाजतच त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत म्हणाली, “खूप आवडते रे मला लहानपणापासूनच असे बोलके चित्र रेखाटायला. आश्चर्य वाटेल तुला पण तू मला बघायला आलेला ना त्यानंतर मी तुझा चेहरा आठवून आठवून एका कागदावर उतरवला. दाखवते तुला ते,  माझ्या बॅगेत आहे सगळे माझे आवडते चित्र. हे घे पाणी पी आधी, नुकताच आलास ना..दमला असशील..”

    पाण्याचा ग्लास हातात घेत तो म्हणाला,
    “अगं तू इतकं छान सरप्राइज दिलं की सगळा थकवा क्षणात दूर झाला. पण तू मला तुझ्यातल्या या कलेविषयी कधी बोलली नाहीस.”

    ती  बॅगेतून काही चित्र काढलेले कागद हातात घेऊन येत म्हणाली “चित्र, रांगोळी काढणे माझा छंद आहे असं सांगितलं होतं मी तुला आपल्या पहिल्या भेटीतच पण तुलाच लक्षात नसावं..”

    तो मनात विचार करू लागला,  छंद आहे असं म्हणाली होती मीरा पण इतकी सुंदर कला हिच्या हातात आहे असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. म्हणूनच कदाचित फार काही मनावर घेतलं नसावं मी.

    तिने रेखाटलेले त्याच्या चेहऱ्याचे चित्र बघून तर तो अजूनच चकित झाला. कांदेपोहे कार्यक्रमात पंधरा मिनिटे समोर बघितलेला माझा चेहरा हिने कसा काय इतका अप्रतिम रेखाटला याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तिने रेखाटलेले एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे बघून तो त्यात अगदी रमून गेला.
    इतक्या कौतुकाने ते सगळे चित्र निरखत असताना त्याला बघून तिला अजूनच आनंद झाला. पहिल्यांदा कुणीतरी तिच्या कलेची वाहवा करत होते.

    तो तिचं भरभरून कौतुक करत तिला मिठी मारत म्हणाला, ” मीरा, उद्या सकाळी आपल्याला बाहेर जायचे आहे. कुठे, कशासाठी ते तुझ्यासाठी सरप्राइज आहे. ”

    ती मानेनेच होकार देत त्याच्या मिठीत सामावली.

    मीरा आणि माधवचे काही दिवसांपूर्वी लग्न झालेले.
    माधव दिसायला साधारण, सावळा वर्ण, उंच पुरा, अतिशय प्रेमळ स्वभावाचा, समजुतदार हुशार मुलगा. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा
    झालेला. नोकरी निमित्त शहरात एकटाच राहायचा.

    मीरा दिसायला सुंदर, सडपातळ, उंच बांधा, रेशमी केस, नितळ कांती, चाफेकळी नाक, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे अगदी प्रसन्न चेहरा. लहानपणी आजारपणात आईचे निधन झाले आणि तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मीराच्या मामा मामींनी तिचा सांभाळ केला. ते एका गावातच राहायला होते. मामा मामी तिला खूप जीव लावायचे. मीराच्या अंगात छान कला होती, सहजपणे ती सुंदर चित्र रेखाटायची पण इतर कुणी त्याची फारशी दक्षता घेत नव्हते. मामा शेतीच्या कामात गुंतलेला तर मामी घरकाम, मुलंबाळं यांच्यात आणि कलेच्या जोरावर आपण खूप पुढे जाऊ शकतो हे गावात राहून असल्याने तिला फारसं माहिती नव्हतं. कधी तिने मनावर सुद्धा घेतलं नव्हतं.

    पदवी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षाला होती तसेच तिला माधवचे स्थळ आले, पहिल्या भेटीतच त्याला ती खूप आवडली आणि दोघांचे लग्न झाले.

    आज माधवने केलेल्या तिच्या कलेचे कौतुक बघून ती खूप आनंदात होती. सकाळी माधव काय सरप्राइज देणार आहे हाच विचार तिच्या मनात रात्रभर सुरू होता.

    सकाळ झाली तशीच ती उठून भराभर आवरू लागली. शनिवार असल्याने माधवला सुट्टी होती त्यामुळे तो अजूनही गाढ झोपेत होता. तो उठून बघतो तर मॅडम आंघोळ करून छान फ्रेश होऊन तयार. ती छान गुलाबी रंगाचा कुर्ता घालून नुकतेच धुतलेले ओले मोकळे केस वाळवत असताना तिला तो निरखत होता. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य बघून त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. तिच्या गोड आवाजात गुड मॉर्निंग शब्द ऐकून तो भानावर आला. तिला गुड मॉर्निंग म्हणत बेडवरून उठला. फ्रेश होऊन हॉलमध्ये आला तर ती नाश्त्याची तयारी करत होती. गरमागरम चहा, नाश्ता करून दोघेही घराबाहेर पडले. माधव मीराला एका प्रख्यात चित्रकाराचे प्रदर्शन बघायला घेऊन गेला. तिच्या आवडत्या कलेचे प्रदर्शन बघण्यात ती अगदी रममाण झाली. एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे, लोकांकडून होणारे त्या चित्रकाराचे कौतुक बघत ती विचारांमध्ये हरवली. जणू स्वतःचे भविष्य ती त्या चित्रकारात बघत होती.

      प्रदर्शन बघून झाल्यावर दोघेही एका मोठ्या हॉटेलमध्ये लंच करायला गेले. लंच करताना माधव मीराला म्हणाला, “मीरा, तुझ्या कलेचे असेच भरभरून कौतुक सगळ्यांनी करावे असे मला वाटते. तुला माहित आहे आजच्या या प्रदर्शनात ठेवलेल्या पेंटिंग्जची किंमत लाखो रूपये आहे. खूप मागणी आहे या कलेला. केवळ पैशासाठी म्हणून म्हणत नाही मी तुला पण तुझ्या या कलेमुळे तुला एक नवी ओळख मिळावी म्हणून सांगतोय तू या क्षेत्रात खूप यशस्वी होशील. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. छोट्या स्तरावर का होईना पण तू याची सुरुवात कर असं वाटतंय मला.”

    मीरा माधवच्या बोलण्याने खूप आनंदी झाली, त्याला म्हणाली, ” माधव, अरे माझ्यातली ही कला तुझ्यामुळे जगासमोर येत असेल तर मी अगदी एका पायावर तयार आहे. मुळात या कलेच्या क्षेत्रात करीअर करता येते याविषयी फारसं माहीत नव्हतं रे मला. आपण आजच तयारीला लागूया. आजचा दिवस माझ्यासाठी खरच खूप खास आहे. तू दिलेलं सरप्राइज तर आयुष्यातील सर्वात सुंदर भेट.”

    मीराला पेंटिंग साठी लागणारी सगळी सामग्रीची खरेदी दोघांनी केली. मीरा ने वेळ न घालवता सहजपणे अगदी सुंदर अशा पेंटिंग्ज बनवायला सुरुवात केली. माधवने तिला काही ऑनलाईन साइट वर पेंटिंग्ज टाकायला सांगितले, कसे करायचे सगळे शिकविले. भराभर तिच्या कलेला ओळख मिळायला सुरुवात झाली, भरपूर मागणी येऊ लागली. हे सगळं करताना, अनुभवताना मीरा खूप आनंदी असायची. माधवला तिचं खूप कौतुक वाटत होतं.

    आता तर मोठमोठ्या ऑर्डर सोबतच पेंटिंग्ज वर्कशॉप्स सुरू केले. तिच्या आवडत्या क्षेत्रात मन लावून काम करत मीराने लवकरच छान प्रगती केली. या सगळ्यात माधव अगदी तिच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला.

    आज तर तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. गेली तीन वर्षे अप्रतिम कलाकुसर करून नाव कमावलेल्या मीराचे पेंटींग्ज एका मोठ्या प्रदर्शनात बर्‍याच कलाकारांच्या पेंटिंग्ज सोबत लावलेले होते. तिथे बघायला येणार्‍या गर्दीतून तिचे पेंटींग्जचे होणारे कौतुक ऐकताना मीराला एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. माधवची इच्छा आपण पूर्ण केली याचा आनंद सोबतच कलेच्या माध्यमातून मिळालेली ओळख याचा जणू आज दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
    माधवला मीराचा खूप अभिमान वाटत होता.

    घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं होतं. त्याच्या हात हातात घेत त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली, “माधव, तुझ्यामुळे मला हे यश मिळाले. आय लव्ह यू..”

    त्यानेही तिला अलगद मिठीत घेत आय लव्ह यू टू म्हंटले.

    मीरा मनोमन एकच गाणे गुणगुणत होती,

    “जीवनात ही घडी अशीच राहू दे…
    प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे….

    रंगविले मी मनात चित्र देखणे
    आवडले वेडीला स्वप्न खेळणे
    स्वप्नातिल चांदवा….जिवास लाभु दे…

    जीवनात ही घडी अशीच राहू दे….”

    अशी ही मीरा आणि माधवची प्रेरणादायी प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

    तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या की लिखाणाचा हुरूप वाढतो तेव्हा कमेंट करायला विसरू नका ?

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • होम मिनिस्टर तू या घरची…

            गौरव घरी आला तसंच त्याचा उदास चेहरा बघून प्रियाने ओळखले की आज नक्कीच काहीतरी बिघडलंय. ऑफिसमधून घरी येताच नेहमी तो सोफ्यावर बॅग फेकत दोन्ही मुलांसोबत अगदी लहान होऊन खेळायला लागतो पण आज मात्र हातातली बॅग अगदी व्यवस्थित जागेवर ठेवून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दोन्ही मुले बाबांना आपले कारनामे दाखवायला बाथरूमच्या दारापाशी जाऊन तयार.
        लहान मुलगा चिन्मय त्याने काढलेले पहिलेच चित्र आपल्या बाबांना मोठ्या उत्साहाने दाखवत होता. मुलगी साक्षी विज्ञान प्रदर्शनात मिळालेली ट्राॅफी दाखवत प्रदर्शनातील गमतीजमती सांगण्यात तल्लीन झाली होती. मुलांचं कौतुक,अभिनंदन करत त्यांच्या कलेची वाहवा करतानाही त्याच्या चेहऱ्यावरची निराशा प्रियाला स्पष्ट दिसत होती.  सदैव हसतमुख गौरवचा निराश चेहरा आज प्रियाला बघवत नव्हता. नक्की काय झाले हे आताच नको विचारायला म्हणून तिने आधी जेवणाची तयारी केली. चौघांनी एकत्र बसून जेवण केले, मुलांचा अभ्यास झाल्यावर मुले झोपी गेली तेव्हा प्रियाने गौरवच्या पाठीवर हात फिरवत विचारले, “काय झालंय? इतका का निराश आहेस आज?”

    त्यावर गौरव म्हणाला, “प्रिया अगं माझी नोकरी गेली. इतके वर्ष कंपनीसाठी मेहनत घेतली पण नविन बॉस ज्याला मी सुरवातीपासूनच आवडत नव्हतो का तर मी स्पष्टवक्ता, ज्याचं जिथे चुकलं तिथे त्याला बोलायचं, प्रामाणिकपणे काम करायचं पण यामुळे बॉसच्या विरोधात मी आहे असा गैरसमज करून घेतलेला त्यांनी, पॉलिटिक्स तर बघायलाच नको या कॉर्पोरेट क्षेत्रात यांमुळे माझ्या उत्तम कामाची जराही दखल न घेता मला काढून टाकलं आज कंपनीतून. तसं मंदीमुळे सगळीकडे अशीच परिस्थिती आहेच त्यात मेहनत, काम यापेक्षा पॉलिटिक्स जास्त आहे, त्यात माझ्यासारख्या विरोध करणाऱ्या लोकांचे हमखास नुकसान होते. आता सगळं मार्केट डाऊन तेव्हा लगेच दुसरी नोकरी मिळणेही जरा अवघड वाटत आहे गं… घराचं लोन, मुलांचा वाढता खर्च, घरखर्च सगळं कसं मॅनेज होणार आहे देव जाणे.. त्याचंच टेन्शन आलंय मला..”

    प्रिया त्यावर म्हणाली, “अरे इतकंच ना.. नको टेन्शन घेऊ. तुझ्याजवळ उत्तम ज्ञान आहे, आत्मविश्वास आहे शिवाय कामाचा अनुभव आहे. दुसरी नोकरी नक्कीच मिळेल. दोन महिने घरी राहिलास तरी काही अडचण येणार नाही आपल्याला घरखर्च चालवायला. राहीला प्रश्न घराच्या लोन चा तर जे काही थोड फार सेव्हींग आहे त्यातून करूया मॅनेज काळजी करू नकोस. ”

    गौरव प्रश्नार्थक नजरेने प्रियाला बघत होता. त्याला वाटलेले प्रियाला ही बातमी ऐकून टेन्शन येईल पण झालं उलटच. तो तिला म्हणाला, “घरखर्च कसा मॅनेज होईल म्हणालीस. मला कळाल नाही तू काय म्हणते आहेस. ”

    प्रिया त्याला धीर देत म्हणाली, “अरे दर महिन्याला घरखर्च करायला तू जे पैसे देतोस ना त्यातले शिल्लक राहीलेले पैसे मी तसेच जपून ठेवते. मुलांना खाऊ म्हणून मिळालेले, मला ओवाळणी म्हणून मिळालेले अशे सगळे पैसे माझ्याजवळ जमा असतात अगदी सुरक्षित. इतक्या वर्षांचा संसार आपला त्यात मी माझ्या जवळचे क्वचितच पैसे खर्च केले असतील बाकी सगळे आहेत. सगळे मी माझ्या खात्यात जमा करते दर महिन्याला. हे बघ पासबुक.”

    गौरव ते पासबुक बघताच त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तिने पै पै साठवून सत्तर हजार रुपये जमवले होते. तो ते बघताच म्हणाला, “तू तर खरंच लक्ष्मी आहेस.”
    ती त्यावर म्हणाली, “आता चेहऱ्यावरचे भाव जरा बदला. असं उदास नाही बघवत रे तुला आणि अजून एक दुसरी नोकरी मिळेपर्यंत तू क्लासेस घ्यायला सुरु कर.  घरात बसून तोच तो विचार करत असं निराश राहिल्या पेक्षा क्लासेस घेतले तर तुझं मन फ्रेश राहील शिवाय जरा पैसा सुद्धा मिळेल.”

    गौरव ते ऐकताच विचार करू लागला, किती समजुतदार बायको आहे आपली. अचानक नोकरी गेल्याने किती टेन्शन मध्ये आलेलो मी. वाटलं होतं ही गोष्ट ऐकून प्रियाला सुद्धा टेन्शन येईल पण हिने पाच मिनिटांत मध्ये सगळं टेन्शन कमी केलं. किती भाग्यवान आहे मी, मला प्रिया सारखी अर्धांगिनी मिळाली.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच गौरव जवळच्या एका इन्स्टिट्यूट मध्ये गेला. आयटी क्षेत्रात लागणारे बर्‍याच टेक्नॉलॉजी चे क्लासेस देणारे हे इन्स्टिट्यूट, त्यांना उत्तम ज्ञान असलेल्या ट्रेनर ची गरज होतीच त्यामुळे गौरवला लगेच तिथे नोकरी मिळाली. चांगल्या कंपनीत पूर्वीच्या पदाला साजेशी नोकरी मिळेपर्यंत दररोज क्लासेस घ्यायचे आणि नोकरी मिळाली की शनिवार रविवारी या इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनर म्हणून यायचे असं ठरलं. घरी येताच मोठ्या आनंदाने त्याने सगळं प्रियाला सांगितले आणि अशा अचानक ओढावलेल्या आर्थिक संकटातून पटकन मार्ग काढण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभ्या प्रियाचे त्याने मनोमन कौतुक केले.

    प्रिया आणि गौरव यांचा पंधरा वर्षांचा संसार.  त्यांच्या या संसाराच्या वेलीवर पाच वर्षांचा चिन्मय आणि अकरा वर्षांची साक्षी अशी दोन गोड मुले.
    गौरव आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. पूर्वी प्रिया सुद्धा त्याच क्षेत्रात नोकरी करायची पण चिन्मय झाल्यावर तिने नोकरी सोडली. या संसाराच्या वाटेवर अनेक संकटे आली, चिन्मयच्या जन्मापूर्वी अचानक गौरवच्या आई बाबांचा अपघातात मृत्यू झाला‌. त्या घटनेने गौरव पार हादरला होता, त्यावेळी सुद्धा प्रियाने गौरवला खूप हिंमत दिली. असेच अनेक चढ-उतार झेलत दोघेही आनंदाने नांदत होते.

    गौरव एक परखडपणे मत मांडणारा, हुशार , आत्मविश्वासू पण तितकाच भाऊक स्वभावाचा. गरीब परिस्थितीतून वर येत यशस्वी झालेला पण कुठलेही संकट आले की लगेच निराश व्हायचा. अशा वेळी प्रिया मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असायची त्यामुळेच गौरवला प्रियाचा खूप अभिमान वाटायचा. आजही तिच्यामुळे निराश न होता दुसरी चांगली नोकरी मिळविण्यासाठी तो नव्याने सज्ज झाला.

    त्याला असलेले उत्तम सखोल ज्ञान आणि समजून सांगण्याची पद्धत यामुळे महिनाभरात त्याची उत्तम ट्रेनर म्हणून प्रसिध्दी झाली. त्यातून मिळणारा पैसा वाढतच गेला. आता तर नोकरी न करता नोकरी करणार्‍यांना, फ्रेशर्स ला टेक्निकल ट्रेनिंग देत तो पगाराएवढा पैसा क्लासेस मधूनच मिळवू लागला.
    अख्ख्या शहरात त्याचे नाव झाले. टेक्निकल विषयांवर व्हिडिओ बनवून स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले. त्याचे नाव भराभर प्रसिद्ध झाले. या सगळ्यांचे श्रेय तो प्रियाला देतो. तिचा पाठींबा असल्याने मी यशस्वी झालो असं अभिमानाने सांगतो.

    ते म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी एक स्त्री असते त्याचे हे जिवंत उदाहरण. 

    अशा बर्‍याच स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतात. पै पै अगदी जपून ठेवतात, संसारात अडीअडचणीला तो साठवून ठेवलेला पैसा कामी पडतो. पतीच्या , मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. संसारात येणाऱ्या अनेक संकटांचा मोठ्या हिमतीने सामना करत त्यातून या शोधतात. अशा समस्त गृहलक्ष्मींना मानाचा मुजरा ☺️

    मी लिहिलेला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    मी लिहिलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

    फोटो गूगल साभार

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

       लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.

        दोघेही मलेशियाला पोहोचले, स्पेशल हनीमून पॅकेज घेतले असल्याने दोघे हॉटेल मध्ये त्यांच्या खोलीत पोहोचले तसंच त्यांना एक गोड सरप्राइज मिळाले. खोली गुलाबांच्या फुलांनी, पाकळ्यांनी छान सजविली होती. सगळीकडे मंद सुवास दरवळत होता. लाईटच्या मंद प्रकाशात अतिशय रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ते बघताच मोनिका आपसूकच पुटपुटली,  
    “व्वा..किती रोमॅंटिक वाटतंय ना सगळं..”

        मयंकच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नव्हता. तिच्या बोलण्याला काही एक उत्तर न देता तो बॅग ठेवून आंघोळीला निघून गेला. तो बाहेर आला तसंच मोनिकाने त्याला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो दचकून तिला दूर करत म्हणाला, “चला भूक लागली आहे, पटकन फ्रेश हो आपण खाली जरा काही खाऊन येऊ आणि फेरफटका मारून येऊ.

         त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मोनिकाला फार वाईट वाटले, अशा प्रकारे दूर का लोटले असावे मयंक ने. त्याला मी असं जवळ आलेलं आवडलं नसेल का, की मी फार उतावीळ झाले असं काही वाटत असेल. पण मिठी मारण्यात काही वावगं तर नाही शिवाय आता आम्ही नवरा बायको आहोत मग असा का वागतोय मयंक लग्नापासून. जराही प्रेमाने बोलला नाही की जवळही घेतले नाही. अजून त्याला वेळ हवा असेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत मोनिका आंघोळ करताना करत होती. फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघेही खाली गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही खाली फेरफटका मारत होते. खोलीवर परतले तेव्हा मयंक म्हणाला , आज प्रवासामुळे थकवा वाटतोय, उद्या सकाळीच फिरायला निघायचं आहे. लवकर झोपा. इतकं बोलून तो अंगावर चादर ओढून झोपी गेला. मोनिकाला मात्र त्याच हे वागणं अजूनच खटकलं.
         

         त्याने प्रेमाने छान रोमॅंटिक काही तरी बोलावं, हळूहळू या नात्याला बहरायला एक पाऊल पुढे घ्यावं इतकीच तर अपेक्षा होती तिची पण मयंक ने तिचा हिरमोड केला. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या साथीदाराकडून प्रेमाची अपेक्षा ही असतेच पण मयंक मात्र फारच वेगळा वागत होता. विचार करत तिचे डोळे पाणावले.

     
       पुढे आठवडाभर एकाच खोलीत दोघेच असूनही तो तिला जराही जवळ घेत नव्हता. दिवसा बाहेर फिरायचे आणि हॉटेल मध्ये येऊन आराम करायचा असाच काय तो त्यांचा हनीमून साजरा झाला. मोनिका त्याच्या कुशीत शिरण्याचा, त्याला मिठी मारण्याचा अलगद प्रयत्न करत होती पण तो मात्र तिला दूर करत तिला टाळायचा प्रयत्न करत होता. आता दोघांच्या नात्यात या नाजुक विषयावर बोलायचं म्हणजे मुलीसाठी कठीणच तेव्हा नक्की काय करावे तिला काही सुचेना.

       दोघेही हनीमून वरून परत आले. मयंक ची सुट्टी संपली होती आणि तो नोकरीला रूजू झाला. मोनिका सुद्धा वडीलांच्या व्यवसायात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्यायला सुरु झाली. ती सतत काही तरी विचारात दिसते आहे हे तिच्या आई वडिलांनी ओळखले, “मोना , सगळं ठीक आहे ना..कशाच्या विचारात आहेस..” असही आईने तिला विचारले.
    नवरा बायको यांच्या मिलनाच्या विषयावर आई सोबत तरी कसं बोलावं तिला कळेना‌ त्यामुळे “काही नाही..मी ठिक आहे..” इतकंच ती बोलली.
         
        मोनिकाला आता मयंक विषयी जरा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. मयंक रोज उशीरा घरी यायचा, सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचा. मोनिका दिवसभर प्रवास , काम यामुळे थकून त्याची वाट बघत झोपी जायची. त्याला तर तेच हवे होते. शक्य त्या प्रकारे तिला टाळण्याचा प्रयत्न तो करत होता. आता आपणच पुढाकार घ्यावा असं मनोमन ठरवून मोनिका तो येत पर्यंत झोपली नाही. उगाच झोपण्याचे नाटक  करत ती बेडवर पडून होती.

    रात्री १२:३० च्या सुमारास तो घरी आला. बराच वेळ बाथरूम मधे फ्रेश होत होता. बाहेर आला तर मोनिका मस्त तयार होऊन छान आकर्षक नाइट ड्रेस घालून त्याच्या समोर उभी राहिली. तिला बघताच त्याला धक्काच बसला. आपल्याला असं छान तयार झालेलं बघून मयंक आपल्याकडे आकर्षित होईल असे तिला वाटलेले पण तशी काहीही भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तिचा सुडौल बांधा, सेक्सी नाइट ड्रेस कडे दुर्लक्ष करत तो म्हणाला , “झोपली नाही अजून..”
    आता तिला त्याचा फार राग आलेला. लग्नाला तीन आठवडे होत आले होते पण मयंक तिला जराही स्पर्श करत नव्हता, जराही प्रेमाने छान काही बोलत नव्हता.

      ती आपला राग आवरत त्याला जाऊन बिलगली तसंच त्याने तिला जोरात दूर लोटले. “मोनिका, काय करतेय, खूप उशीर झाला आहे झोप आता” असं चिडक्या सुरात बोलून तो झोपला. ती रात्रभर रडत होती, विचार करत होती.
      आता त्याच्या विषयी अजूनच शंका तिला आल्या. मनात काही तरी ठरवून तिने पुढच्या काही दिवसांत त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या विषयी चौकशी सुरू केली. मयंकच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी तर नाही ना हाच संशय आता पर्यंत तिला होता. त्याच्या मित्रांकडून याविषयी असंच कळालं की आमच्या माहिती नुसार तरी त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी नव्हती, ना आहे. त्याच्या कंपनीत तर त्याच्या विषयी सगळ्यांनी त्याच्या कामाबाबत फारच कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. हुशार, मनमिळाऊ, वेळेत काम पूर्ण करणारा सगळ्यांचा लाडका मयंक असंच तिला कळालं.

        मग मयंक असं का वागतोय तिला काही कळत नव्हते. तिने एका मैत्रिणीला याविषयी सांगितले तेव्हा याविषयी स्पष्ट बोलून दोघांनी हा प्रश्न सोडवलेला बरा असं तिने सांगितलं.
       मयंकच्या जवळ जाण्यासाठी मोनिका अनेकदा पुढाकार घेत होती पण तो तिला टाळत ,दूर करत होता आणि तिच्या पदरात प्रेम नाही तर निराशाच येते होती.
       लग्नाला जवळपास दोन महिने झालेले होते. सगळ्यांसमोर आपल्याशी अगदी छान वागणारा हा मयंक काही तरी नक्कीच लपवितो आहे याची मोनिकाला खात्री पटली होती. आज मयंक सोबत स्पष्ट बोलून हा मनातला गोंधळ कमी करावा असं तिने ठरवलं.

        रविवार असल्याने दोघेही घरी होते. मयंक नाश्ता करून टिव्ही बघत बसला‌ होता. मोनिका हळूच त्याच्या पाठीमागून आली आणि तिने परत एकदा पुढाकार घेत त्याला मिठी मारत त्याच्या गालावर चुंबन केले. तिच्या या कृतीमुळे तो ताडकन उठून उभा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो चिडून म्हणाला, “मोनिका कितीदा सांगितलं तुला मला नाही आवडत तुझं असं वागणं…का करतेस तू असं…”

    मोनिका त्यावर उत्तरली “का रे…काय प्रोब्लेम आहे..आपण नवरा बायको आहोत ना..मग इतका अधिकार तर नक्कीच आहे मला..तुला आवडत नाही का मी..का टाळतोय मला सतत.. कुणी दुसरी असेल तुझ्या आयुष्यात तर तसं तरी सांग..का वागतोय असा तू..बोल मयंक बोल..”

    तो चिडून म्हणाला, “दुसरं कुणी आयुष्यात असण्याचा काही प्रश्नच नाही….मला नाही आवडत तू अशी मला चिपकलेली…मला‌ या सगळ्यात काही एक रस नाहीये… लैंगिक संबंध ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला..मी शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही ह्या सगळ्यासाठी…झालं आता समाधान…हेच ऐकायचं होतं ना‌ तुला..कळालं आता…आता परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस..”

    हातातलं रिमोट जमिनीवर आपटत तो तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, शरीर त्याच्या शब्दांनी थरथरू लागले. स्वतः ला सावरत ती सोफ्यावर बसून रडत होती. मयंक ने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपविली, आपली फसवणूक केली या गोष्टीचा तिला विश्र्वासच होत नव्हता.

        किती तरी वेळ विचार करत , रडत ती तिथेच बसून राहीली. मयंक ने तिचा मोठा विश्वासघात केला होता याचा जाब विचारण्यासाठी ती त्याच्या समोर गेली. त्याला विचारले, ” मयंक लग्नापूर्वी का नाही सांगितलं हे सगळं…का केला इतका मोठा विश्वासघात..किती प्रेम करते मी तुझ्यावर माहीत होतं ना तुला..अरे मला लग्नानंतर सुद्धा एकदा कधी तू विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर काही तरी उपचार केले असते.. काही तरी मार्ग काढला असता..पण तू फक्त माझ्या भावनांशी खेळला..मला‌ अंधारात ठेवले..प्रेमाचे दोन शब्द कधी बोलला नाही तू.. फसवणूक केली मयंक तू माझी..याची शिक्षा तुला मिळणारच..”

      त्यावर तो म्हणाला, “कर आता माझी बदनामी करत..सांग सगळ्यांना मी खरा पुरुष नाही.. लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही..नाहीये मी सक्षम.. माहीत आहे मला…लग्न का केलं म्हणतेस ना…लग्न न करण्याचे हे कारण नव्हतो सांगू शकत मी कुणाला..सगळ्यांचा सतत तगादा..काय सांगू त्यांना मी.. म्हणून केलं लग्न…”

    “अरे‌ पण तुझी अवस्था तुला माहीत होती ना… इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे…माझं आयुष्य उध्वस्त केलं मयंक तू…कळतंय का तुला… विश्वासाने. सांगितलं जरी असतं ना तर सहनही केलं असतं मी..मार्ग काढला असता यातून आपण..पण आता नाही… विश्वासघात केला तू…नाही राहू शकत मी तुझ्यासोबत..”

    इतकं बोलून कशीबशी पर्स उचलून मोनिका आई वडीलांकडे निघून आली. मोनिका अशी रडत रडत अचानक असं घरी आल्याने आई बाबा गोंधळले. तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसाच त्यांनाही मोठा धक्का बसला. या सगळ्याचा मोनिकाच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झाला. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे तिची तब्येत चांगलीच खालावली.

    सत्य कळताच मोनिकाच्या आई वडीलांनी मयंकचया घरच्यांना‌ फोन केला तर त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले मयंकला जाब विचारला तर त्याने सगळं खरं असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली होती. मोनिकाला भेटायला आले असता तिची माफी मागत ते इतकंच म्हणाले, ” मोना, आम्हाला हे सगळं माहीत असतं तर त्याच लग्न केलच नसतं गं..पण आम्हाला याविषयी खरंच काही कल्पना नव्हती. आमच्या मुलामुळे तुझ्यावर ही वेळ आली याचा आम्हालाही खूप त्रास होतोय..आम्ही सुद्धा कधीच स्वतः ला माफ करू शकणार नाही….”

    सतत तोच विषय, इतका मोठा मानसिक धक्का यामुळे मोनिका ची तब्येत जरा जास्त बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दिवसात मयंक एकदाही तिला भेटला नाही, फोन नाही.

    मोनिका तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असे त्याचे वडील त्याला ओरडून बोलले तेव्हा तिला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये आला‌ पण मोनिकाच्या आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले.
      काही दिवसांनी मोनिका बरी झाली. मयंकला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला. लग्न, प्रेम या सगळयां वरून आता तिचा विश्वास उडाला होता.

        एक सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आयुष्याच्या जोडीदाराला ओळखण्यात चुकली होती. लग्नापूर्वी कधीच तिला भेटायला पुढाकार मयंक का घेत नव्हता, लग्नापूर्वी कधीच रोमॅंटिक का बोलत नव्हता यांचं उत्तर तिला आता मिळालं होतं. आपण त्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, त्याच्या शांत स्वभावाचा दोष समजून त्याच्या वागण्या कडे, त्याला आपल्यात रस आहे की नाही हे जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केले याची मनापासून तिला खंत वाटली. 

        मयंक मध्ये शारीरिक दोष असताना त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून मोनिका ची फसवणूक केली. तिची काहीही चूक नसताना तिच्या भावना, तिच्या आयुष्याशी तो खेळला. असंच हल्ली समाजात बरेच ठिकाणी होताना दिसते आहे.

    अशाच एका सत्य घटनेवर आधारित मी ही कथा लिहिली आहे.

      मुलांमध्ये शारिरीक दोष असतील, ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतुल तर याविषयी त्यांच्या आई वडिलांना तरी कसे कळणार ना. पण मुळात अशा वेळी स्वतः ची परिस्थिती माहीत असताना एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळणे म्हणजे गुन्हाच म्हणावा‌ लागेल. लग्नानंतरही हे सत्य इतरांना कळणारच ना त्यापेक्षा असा प्रोब्लेम असल्यास आधीच विचार करून निर्णय घेतला तर अशी बिकट परिस्थिती येणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
    नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

        मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे..”

    ते ऐकताच मयंक काहीही न बोलता तिथून निघून गेला.

    आई मोनिकाच्या केसांवरून हात फिरवत पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात बुडाली.

        मोनिका अतिशय हुशार, आत्मविश्वासाने वडिलांचा मुंबई सारख्या शहरातील व्यवसाय अगदी सहजपणे सांभाळून शिक्षण पूर्ण करणारी. व्यवसायातील महत्वाच्या कामांमध्ये वडीलांना तिचा मोठा आधार वाटायचा. आई वडिलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, वयाच्या मानाने तिला व्यवसायातील उत्तम ज्ञान होते. अगदी महत्वाचा निर्णय ती मोठ्या चतुराईने घेत असे. अशा या मोनिकाच्या लग्नाचा विचार आता आई वडिलांच्या मनात सुरू झाला.

        मोनिका शी याविषयी बोलल्यावर तिने एकच अट घातली ती म्हणजे, ” मुलगा हा मुंबईत नोकरी करणारा असावा, म्हणजे वडीलांना व्यवसायात मदत करता येईल शिवाय आई वडीलांकडे लक्ष सुद्धा देता येईल..”

         मोनिकाच्या आई वडीलांना ही हे पटलं होतं. लहानपणापासून ती वडिलांसोबत त्यांच्या कामात शक्य तसा हातभार लावायची त्यामुळे तिच्या शिवाय एकट्याने या भल्या मोठ्या व्यवसायाची धुरा सांभाळणे त्यांनाही अवघडच होते.

           आता तिच्या अटी लक्षात घेऊन वर संशोधन सुरू झाले. जे स्थळ यायचे त्यांना आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली मोनिका सहजच पसंत पडायची. अशातच मयंकचे स्थळ आले. तो मूळचा मुंबईचा नसला तरी कॉलेज, नोकरी सगळं मुंबईत झालेले शिवाय दोघेही एकाच वयाचे. मयंक दिसायला देखणा, चांगल्या पदावर नोकरीला, शांत स्वभावाचा  त्यामुळे पहिल्या भेटीतच तिला तो बर्‍यापैकी आवडला. मग पुढे अजून जरा भेटून बोलून निर्णय घ्यावा असं तिने मनोमन ठरवलं. त्यालाही पहिल्या भेटीतच ती आवडली. तिच्या अटीनुसार तो सुयोग्य वाटल्याने तिने पुढाकार घेत पुढे गाठी भेटी घडवून आणल्या.

       त्याच्याशी बोलून तिला तो अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा वाटला. आता गोष्टी पुढे न्यायला हरकत नाही असंही तिला जाणवलं पण त्याचा हा शांत, जरा अबोल स्वभाव तिच्या अगदीच विरूद्ध त्यामुळे तिला जरा वेगळे वाटले पण प्रत्येकाचा स्वभाव असतो शिवाय नातं अजून नविन आहे तेव्हा वेळेनुसार तो मोकळा बोलेल असा विचार करून तिने लग्नाला होकार दिला.
       त्याच्याकडून तर सुरवातीपासूनच होकार मिळाला होता त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. दोघांचं लग्न ठरलं. तिला अगदी मनाप्रमाणे मुलगा मिळाल्याने ती अगदीच आनंदात होती. आता एकाच शहरात आहे म्हंटल्यावर वारंवार भेटी गाठी होणार म्हणून ती अजूनच सुखावली. लग्न ठरल्यानंतर एकमेकांना ओळखण्याची एक ओढ, उत्सुकता, आकर्षक अशा अनेक भावनांनी तिच्या मनात गर्दी केली. अशीच अवस्था त्याचीही असेल असेच तिला वाटलेले. तिच्या बिनधास्त, बोलक्या स्वभावामुळे तिनेच पुढाकार घेत त्याला फोन, मेसेज वरून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या पुढाकाराला तोही अगदी छान प्रतिसाद द्यायचा तेव्हा त्याच्याविषयी कुठली शंका मनात येणे शक्यच नव्हतं.
      लग्नाला अजून दोन महिन्यांचा अवधी होता तेव्हा मधल्या काळात दोघांच्या भेटी, संवाद हा सुरू होताच. पण या दरम्यान प्रत्येक वेळी भेटण्यासाठी तिच पुढाकार घ्यायची, तिला ही गोष्ट जरा खटकली पण त्याच्या शांत स्वभावामुळे कदाचित तो स्वतःहून भेटण्यासाठी काही बोलत नसावा किंवा आपणच पुढाकार घेतोय तेव्हा त्याला संधी मिळत नसावी असंही तिला वाटलं. भेटल्यावर त्याची अगदी छान वागणूक असल्याने तिने मनात कधी फार शंका निर्माण होऊ दिली नाही. भेटल्यावर त्याच्या वागण्या बोलण्यातून काही वेगळे तिला कधी जाणवलं नाही. दोन महिन्यांत लग्नाची खरेदी, सगळी तयारी ह्यात भराभर वेळ निघून गेली. मुंबईत मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. सगळेच अगदी उत्साहात, लग्न सोहळ्यात कशाचीच कमी नव्हती.
       लग्नात पाठवणी झाल्यावर मुंबईतल्या त्याच्या फ्लॅटवर दोघेही गेले. सोबतीला पाहुणे मंडळी होतीच. मनाप्रमाणे सगळं झाल्याने मोनिका खूप आनंदी होती. मयंकच्या फ्लॅट वर दुसऱ्या दिवशी लग्नानंतर सत्यनारायण पुजा करण्यात आली आणि पहिल्या रात्रीची तयारीही.
       लग्न म्हंटलं की दोघांच्याही मनात प्रेमाचा एक वेगळाच बंध निर्माण होऊन मीलनाची ओढ लागलेली असते. नैसर्गिक भावनाच आहे ती पण या ओढी सोबतच मनात भिती, हुरहूर सुद्धा असते. मोनिका चेही तेच झाले. आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आज लाजून, घाबरून सजविलेल्या खोलीत बसून मयंकची वाट बघत होती. नाईलाजाने तो खोलीत आला तसंच तिची धडधड वाढली, मयंक प्रेमळ नजरेने आपल्याला बघून अलगद मिठीत घेईल , छान काही तरी रोमॅंटिक बोलेल असेच काहीसे तिला वाटलेले पण घडले काही तरी भलतेच. त्याने खोलीत येताच तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला , “छान दिसते आहेस…आजचा दिवस खुप खास आहे ना पण मोनिका मला जरा वेळ हवा आहे.. खूप दगदग झाली ना मागच्या काही दिवसात..तू सुद्धा दमली असशील ना ..आराम कर..‌मलाही खूप झोप येत आहे… मागच्या काही दिवसात झोपच झाली नाही..”

       त्याचं असं बोलणं तिला खटकलं पण कदाचित मयंक ला वेळ हवा आहे, तो आता या सगळ्याला मानसिकरीत्या तयार नाही, शारिरीक थकवा जाणवत असेल त्याला असा बराच विचार करून तिने अंगावरचे दागिने काढले, साडी बदलून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. मनात एक प्रकारची हुरहूर तिला जाणवत होती पण पुढच्या दोन दिवसांनी दोघेही हनीमून साठी मलेशिया ला जाणार होते. तिथे दोघांना छान एकांत मिळेल अशा सुखद भावनेने ती आजच्या रात्रीचा फारसा विचार न करता झोपी गेली.
      व्यवसायातील महत्वाचे, अवघड निर्णय अगदी सहजपणे, मोठ्या आत्मविश्वासाने घेत असली तरी मनात मयंक विषयी प्रेम, एक नाजुक भावना तिच्या मनात होती. आता तिच्या मनाला आतुरता लागली होती ती म्हणजे हनीमून ला जाण्याची. या सगळ्यात त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र तिला ओळखता आले नाही.

       मोनिका आणि मयंक यांच्या नात्यात पुढे नक्की काय होते, मयंक काही लपवत तर नाहीये ना. जशी मोनिकाला मयंकची ओढ वाटते आहे तशीच त्याला मोनिकाची ओढ जाणवत असेल का?
    मोनिका हॉस्पिटलमध्ये कशी? तिची आई जे म्हणाली फसवणूक, विश्वासघात हे सगळं नक्की काय आहे ?
    असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असणार ना. कथेत पुढे काय होते याची उत्सुकता सुद्धा लागली असणार,
    तर ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. दोघांच्या नात्याविषयी जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

    मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे

      
     
      

  • नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

        शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”

        धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवता जा बरं दोघेही. मुलांचं आवरून त्यांना बस मध्ये बसवून शुभदा आली तसच नवरोबा म्हणाले, “अगं काल झोपण्यापूर्वी बघत बसलेलो ती फाइल कुठे आहे माझी..इथेच तर होती..” शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाइल सापडली. ती त्याच्या हातात फाइल देत म्हणाली, ” रात्री आवरून ठेवायला काय होते हो..अस सकाळी सकाळी गडबडीत हे कुठेय ते कुठेय…मी काय काय बघायचं..समोरची उशी सुद्धा उचलून बघत नाही…नुसता वैताग माझ्या जीवाला..”

    त्यावर महाशय तिला म्हणाले, “अगं आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामचं असतो ना..मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं..”

    आराम आणि मला…शुभदा‌ ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली, “दिवसभर किती काम पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना… वरून म्हणायला मोकळे की तू आता आधी सारखी उत्साही राहीली नाहीस… हसतखेळत वावरत नाहीस..माझं मलाच ठाऊक किती दमून जाते मी सगळं आवरता आवरता..”

    शेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात‌ डबा देत बाय केले आणि मनात काही तरी विचार करत आरशासमोर जाऊन ती उभी राहिली.
    जरा वेळ स्वतः ला आरश्यात निरखून पाहिले तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणार्‍या केसांमुळे पहिल्या भेटीतच आपल्यावर भाळलेले आपले पती देव आता हा जरा पांढर्‍या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा अंबाडा बघून काय विचार करत असणार.
    लग्न झाल्यावर मला बघताच तुझ्यापुढे चंद्र फिका म्हणणारा माझा हा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्याभोवती आलेले काळसर वर्तुळ बघून काय कौतुक करणार.
    मुलं झाल्यापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतः कडे जरा लक्ष दे, स्वतः साठी वेळ काढ, केसांना कलर कर, पार्लर मध्ये जाऊन फेशियल कर पण मी मात्र त्यांच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने म्हणणे बंद केले. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही… पूर्वीसारखा कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले पण चूक माझीही आहेच ना.

      सगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतः कडे दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झालीत. त्यांचं ते सहज करू शकतात.

    काही तरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला, पार्लर वालीला घरी बोलावले. मस्त पैकी फेशियल करून केसांना कलर करवून घेतला.
    सुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लास ची चौकशी करत क्लास जॉइन करण्याचे ठरविले.

    मुले घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी आई आज आपलं आपल्याला सगळं आवरायला सांगते बघताच मुलेही जरा गोंधळली पण मुकाट्याने आपापली कामे आवरून दोघेही मुले डायनिंग टेबल वर येऊन बसत आईच्या गोड बदलाचे निरीक्षण करत होती.

    मुलगा आईला म्हणाला , “आई आज काय खास… हेअर कलर छान दिसतोय बरं का…”
    तिनेही थॅंक्यू म्हणत गोड स्माइल दिली आणि म्हणाली, ” आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही..मग मला‌ जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना..नाही तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी विचारातील अरे ही तुझी आई की आजी…”
    त्यावर तिघेही खिदिखिदी हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सॅंडवीच दोघांनीही फस्त केले.

      आता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतः ची लहानसहान कामे स्वतः करण्याची सवय लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणे कमी झाले. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितके स्वतः साठी वेळ काढत ती स्वतः कडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बस मध्ये बसवून नवर्‍याचे आवरून दिले की नियमीत योगा करणे, वेळेत नाश्ता , जेवण सगळं कसं तिने ठरविल्याप्रमाणे सुरू केले. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पती राजांना तिच्यातला हा बदल खूप आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली, मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता, त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता पण आता शुभदा मधल्या तिच्यातल्या ‘ ती ‘ ने नव्याने जन्म घेत हा दुरावा‌ दूर केला. दोघा राजा राणीचे नाते नव्याने बहरत गेले.

      खरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घरदार, मुलंबाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होत जाते. मग तिची होणारी चिडचिड ही सहाजिकच आहे, ही चिडचिड व्हायला मग कुठलेही लहानसहान कारण पुरेसे असते. नवरोबांना वाटते बायको आता पूर्वी सारखी राहीली नाही तर बायकोला वाटतो नवरोबा आता बदलले पण सत्य हे आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदलली असते. मग छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू.
    अशा या संसाराच्या वाटेवर शक्य तो वेळ स्वतः साठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो.

      चला तर मग आपल्यातल्या ‘ मी ‘ ला शोधून स्वतः साठी वेळ काढा आणि हसतखेळत आयुष्य जगा.?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे